* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: बायबल - येशू ख्रिस्त (इ.स.पू.पहिलं शतक)

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

९/६/२३

बायबल - येशू ख्रिस्त (इ.स.पू.पहिलं शतक)

'बायबल' हा परमेश्वराच्या प्रेरणेतून निर्माण झालेला ग्रंथ समजला जातो.हा ग्रंथ ख्रिश्चन धर्माला प्रेरित करणारा,

धर्माची मूलतत्त्वं काय आहेत आणि परमेश्वर हा तारणकर्ता कसा आहे हे सांगणारा आहे.परमेश्वराचं अस्तित्व,त्याचं प्रकटीकरण कधी आणि कसं झालं याबद्दल या ग्रंथात विवेचन केलं आहे.जगभरात या ग्रंथाची सर्वाधिक विक्री झालेली आहे.लिओनार्दो दा व्हिंचीचं 'द लास्ट सपर' आणि मायकेल अँजेलोचं 'क्रिएशन ऑफ अॅडम' ही चित्रं बायबलवरच आधारित होती.


बायबल' हा ख्रिश्चन लोकांचा धर्मग्रंथ आहे. बायबलचा अर्थ 'ग्रंथसंग्रह' असा होतो. याच ग्रंथाला 'पवित्र शास्त्र' असंही म्हणतात. 'ता बिब्लिया' या मूळ ग्रीक शब्दांवरून 'बायबल' हा शब्द इंग्रजीत रूढ झाला असं मानण्यात येतं. बिब्लिया या शब्दाचा अर्थही अनेक पुस्तकांचा संग्रह असाच होतो.बायबल दोन भागांमध्ये असून पहिल्या भागाला 'जुना करार (ओल्ड टेस्टामेंट)', तर दुसऱ्या भागाला 'नवा करार (न्यू टेस्टामेंट)' असं म्हणतात. जुना करार हा ज्यू म्हणजेच यहुदी लोकांचा धर्मग्रंथ मानला जातो. बायबलमध्ये एकूण ११८९ प्रकरणं म्हणजे चॅप्टर्स आहेत.त्यातल्या जुन्या करारामध्ये ३९ पुस्तक (बुक्स) आणि ९२९ प्रकरणं, तर नव्या करारामध्ये २७ पुस्तक (बुक्स) आणि २६० प्रकरणं आहेत. त्यातलं साम ११९ हे सगळ्यात मोठं प्रकरण आहे, तर साम ११७ हे सगळ्यात लहान प्रकरण आहे. बायबलमध्ये एकूण ६११०० शब्द आहेत. दरवर्षी बायबलच्या १० लाख प्रती खपतात.चीनमध्ये बायबलची सगळ्यांत जास्त छपाई होते! पण जगामध्ये सगळ्यात जास्त चोरीला जाणारं पुस्तकही बायबलच आहे.! बायबल लिहायला ४० लोकांनी मदत केली. 'तू व्यभिचार (अॅडल्ट्री) करणार नाहीस' अशा ऐवजी १६३१ साली छापलेल्या बायबलमध्ये चुकून 'तू व्यभिचार करशील' असं छापलं गेल्यामुळे या बायबलला 'व्यभिचारी' किंवा 'पाप्यांचं बायबल' असं म्हटलं गेलं. या बायबलच्या बऱ्याचशा प्रती नष्ट करण्यात आल्या, पण काही 'कलेक्टर्स आयटम्स' बनल्या. त्यांची किंमत आज १ लाख डॉलर्स इतकी आहे.जुना करार लिहायला जवळजवळ १००० च्या वर वर्ष लागली,तर नवा करार ७०-७५ वर्षांत तयार झाला! 'बायबल' मध्ये ६००० भविष्यवाणी केल्या आहेत.आजही 'बायबल' वर हात ठेवून न्यायालयात खरं बोलण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. 'बायबल' मधला शेवटचा शब्द 'आमेन' म्हणजे 'तथास्तु' हा आहे.


ज्यू लोकांच्या आयुष्यात परमेश्वरानं ख्रिस्ताचं आगमन होण्यापूर्वी कोणतं कार्य केलं याची माहिती जुन्या करारात मिळते.तसंच विश्वाच्या निर्मितीपासून ते ज्यू लोकांच्या इतिहासाबद्दल सर्व काही जुन्या करारात वाचायला मिळतं. बायबलमधल्या जुन्या कराराला ३००० वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली आहेत. ख्रिश्चन धर्मामध्येही दोन गट होते.एक कॅथलिक गटातले लोक,तर दुसरे प्रोटेस्टंट गटातले लोक. ख्रिश्चन धर्माच्या उदयाआधी येशू ख्रिस्त आणि त्यांचे अनुयायी हे यहूदी (ज्यू) धर्माचे होते.


नव्या करारात येशू ख्रिस्तासंबंधी माहिती आहे. नव्या कराराला २००० वर्षं झाली आहेत.यात येशू ख्रिस्ताचा जन्म,त्याचं आयुष्य,त्याची शिकवण,त्याच्या आयुष्यातली संकट आणि त्याचा क्रूसावर झालेला मृत्यू या सगळ्यांचा इतिहास वाचायला मिळतो.


बायबलच्या जुन्या करारामध्ये काय आहे? जग जेव्हा निर्माण झालं तेव्हा अॅडम आणि इव्ह हे पहिले स्त्री-पुरुष (मानव) कसे निर्माण झाले यांची एक गोष्ट सांगितली आहे.हे दोघं निर्माण होण्याचा काळ २० लाख वर्षांपेक्षाही जास्त जुना आहे. बायबलप्रमाणे हे जग ६००० ते ८००० वर्षांपूर्वी निर्माण झालं.त्या काळाला 'पेबल कल्चर' असंही संबोधलं जातं.यानंतर अब्राहमची कथा येते.

अब्राहम आपली पत्नी सारा हिच्यासह इस्त्रायल आणि तेव्हाचं कनान इथं (आताचं इराक) आला. त्या दोघांना मूल नव्हतं, मात्र त्याची दासी हागार हिच्यापासून त्याला इश्माएल नावाचा मुलगा झाला. पुढे अनेक वर्षांनी सारालाही इसहाक नावाचा मुलगा झाला. साराच्या छळाला कंटाळून हागार आपला मुलगा इश्माएल याला घेऊन अरबस्तानात निघून गेली. इसहाकपासून पुढे यहुदी (ज्यू) जमात आणि इश्माएलपासून अरबी जमात निर्माण झाली.इसहाक याला इसाब आणि याकोब अशी दोन मुलं झाली.इथून पुढे या जमातींचा वंश विस्तारतच गेला.आजच्या अरब-इस्रायल वादाचं मूळ इतकं जुनं आहे!


तिथे असणाऱ्या हिब्रू भाषिक लोकांनी मोशे नावाच्या व्यक्तीला आपला नेता म्हणून निवडलं. प्रत्यक्ष परमेश्वर त्याला आदेश देतो,अशी त्यांची समजूत होती.मोशेला सिनाय नावाच्या पर्वतावर परमेश्वराकडून दहा आज्ञा (टेन कमांडमेंट्स) मिळाल्या. यावरचा 'टेन कमांडमेंट्स' हा चित्रपट खूप गाजला होता.या आज्ञा बायबलमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.सिनायच्या वाळवंटात या दहा आज्ञांच्या कराराचा कोश करण्यात आला आणि हिब्रू लोकांनी तो पाळणं बंधनकारक समजलं गेलं. काही काळानं मोशेचं निधन झालं.


नव्या कराराची गोष्ट आणखीनच विलक्षण आहे. इ.स. च्या सुमाराला पॅलेस्टाइन देशावर रोमन सत्तेचा ताबा होता. हेरोद हा त्या प्रदेशांवर राज्य करत होता. त्याला दहा बायका होत्या. त्यातली मरियम ही त्याची आवडती बायको होती. हेरोद कर्तव्यदक्ष असला तरी अत्यंत क्रूर आणि हलक्या कानाचा होता. त्याच्या बहिणीनं असूयेपोटी मरियमविरुद्ध हेरोदचे कान भरले आणि ते ऐकून हेरोदनं मरियम,तिची आई आणि आपली दोन मुलं अरिस्तंबुलास आणि अॅलेक्झांडर यांना ठार मारलं.


येशूचा जन्म झाला तेव्हा त्याला आपला प्रतिस्पर्धी समजून हेरोदनं त्या वेळी जी मुलं जन्मली होती आणि दोन वर्षांहून लहान होती त्यांनाही ठार मारलं.येशूच्या अनुयायांनी या सगळ्या घटना संकलित करून त्याची मांडणी केली.यालाच 'नवा करार' म्हणतात.येशू ख्रिस्त आणि त्यांचे शिष्य हे यहुदी (ज्यू) होते आणि 


त्या काळी धार्मिक नीतिनियमांचं खूपच अवडंबर माजलं होतं. येशू ख्रिस्ताचा अशा धार्मिक कर्मकांडाला विरोध होता.चांगल्या परोपकारी

कामांसाठी त्याचा विरोध नव्हता. त्यामुळेच त्यानं मानवतेच्या दृष्टिकोनातून जगण्याचे नियम करण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न केला.


येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवीसन ही कालगणना सुरू झाली असं मानल जात. मेरी आणि जोसेफ यांचा येशू ख्रिस्त मुलगा ! त्याचा जन्म नेमका कधी झाला याबद्दल एकवाक्यता नाही. काहींच्या मते त्याचा जन्म इ.स.पूर्व मध्ये बेथलहेममध्ये झाला. २५ डिसेंबर हा येशूचा जन्मदिवस मानला जातो आणि नाताळ म्हणून तो जगभर साजरा करण्यात येतो.जोसेफ सुतारकाम करत असे.येशूचा जन्म हेरॉड द ग्रेट याच्या शासनकाळात झाला.जन्मलेल्या मुलापासून आपल्याला धोका असल्याचं समजल्यामुळे त्यानं दोन वर्षांखालील सगळ्या मुलांना ठार मारण्याचा आदेश दिला होता. मात्र एका देवदूतानं जोसेफला या धोक्याची पूर्वसूचना दिल्यामुळे त्यानं आपल्या कुटुंबाला घेऊन तिथून इजिप्तला हेरॉडचा मृत्यू होईपर्यंत स्थलांतर केलं होतं. हेरॉडचा मृत्यू झाल्यानंतर जोसेफ आपल्या कुटुंबाला घेऊन गॅलिलीमधल्या नाझरथ या गावात वास्तव्याला आला. खरं तर ख्रिश्चन लोक येशूला परमेश्वराचा अवतार मानतात. लोकांनी केलेल्या पापांसाठी त्यानं मरण पत्करलं,असं म्हटलं जातं.येशूच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मॅथ्यू,मार्क,ल्यूक आणि जॉन यांनी लिहून ठेवलं होतं.


१२ वर्षांचा असताना येशू आपल्या आई- वडिलांबरोबर जेरुसलेमच्या यात्रेला गेला आणि तिथेच तो त्यांच्यापासून वेगळा झाला.अनेक दिवसांनी तो जेरुसलेममधल्या ज्येष्ठांबरोबर चर्चा करत असताना एका मंदिरामध्ये आढळला. येशून काही काळ सुतारकाम केल्याचेही उल्लेख सापडतात.मात्र वयाच्या ३० व्या वर्षी जॉन बॉप्टिस्ट यानं त्याचा बाप्तिस्मा केला आणि त्याच वेळी त्यानं येशू परमेश्वराचा पुत्र असल्याचं जाहीर केलं.हा बाप्तिस्मा झाल्यानंतर येशूने यहुदींच्या वाळवंटात जाऊन ४० दिवस आणि ४० रात्री उपवास करण्यात घालवल्या.


असं म्हटलं जातं की तीन वेळा राक्षस किंवा सैतानानं येशूला वेगवेगळी प्रलोभन दाखवली. एकदा दगडाचं रूपांतर ब्रेडमध्ये करता येईल म्हणून,तर दुसऱ्यांदा तो कितीही उंच पर्वतावरून खाली खोल दरीत कोसळला तर त्याला देवदूत वाचवतील म्हणून,तर तिसऱ्यांदा जगातल्या सगळ्या राज्यांवर तो आपली सत्ता गाजवू शकतो म्हणून पण येशून तिन्ही वेळेस ही प्रलोभनं नाकारली.


त्यानंतर येशू गॅलिलीमध्ये परतला आणि त्यानंतर त्याने अनेक आसपासची पिंजून काढली. या काळात अनेकांनी त्याचं शिष्यत्व पत्करलं. त्यात 


मेरी मेग्डलीन हीदेखील त्याची निस्सीम शिष्या होती.तिने अखेरपर्यंत येशूला साथ दिली.


पॅलेस्टाइन या भागातला सगळा परिसर येशून पिंजून काढला होता.त्याची प्रवचन ऐकण्यासाठी लोक दुरून दुरून येत असत.येशू मानवजातीला पापातून मुक्त करण्यासाठी आला आहे,असं बायबलमध्ये म्हटलं आहे.

येशूची कीर्ती आणि शिष्य दिवसेंदिवस वाढतच गेले.तसंच त्याच्या चमत्कारांनी गरीब,दीनदुबळ्या लोकांचे आजार बरे होऊ लागले,त्यांची संकट दूर होऊ लागली. येशूची कीर्ती सर्वदूर पसरल्यानं तत्कालीन सत्ताधारी चिडले आणि त्याला वयाच्या ३३ व्या वर्षी क्रूसावर चढवून खिळे ठोकून ठार मारण्यात आलं. त्याचं दफन करण्यात आलं.

मृत्यूपूर्वी येशूनं आपल्या बारा शिष्यांसह जे भोजन केलं, त्याला 'लास्ट सपर म्हटलं जातं.या वेळी त्याने आपल्या शिष्यांना उपदेश केला,असं म्हटलं जातं.


येशूला दफन केल्याच्या तीन दिवसांनंतर ज्या ठिकाणी त्याचं दफन करण्यात आलं होतं,ती जागा रिकामी असल्याचं आढळून आलं.


त्याच दिवशी येथून आपली शिष्या मेरी मेग्डलीन आणि आपली आई मेरी हिला दर्शन दिलं. ४० दिवसांनंतर येथून जेरुसलेमच्या पूर्वेकडे असलेल्या ऑलिव्हेट पर्वतावर आपल्या शिष्यांची भेट घेतली.एका ढगाद्वारे स्वर्गात जाण्यापूर्वी येथून आपल्या शिष्यांना आपण आता पवित्र आत्मा झालो असून मानवतेसाठी प्रयत्नशील राहू,असं सांगितलं.


'बायबल' मध्ये सांगितल्यानुसार खूप खूप पूर्वी या जगात अंधार,अन्याय असं काहीही नव्हतं; पण कालांतरानं लोकांमधली राक्षसी वृत्ती आणि अहंकार वाढला गेला आणि त्यामुळे जगभरात अंधार पसरला.या अंधाराला प्रत्यक्ष परमेश्वरानं बांधून ठेवलं आणि पृथ्वीवरचा पहिला मानव ज्याला म्हटलं जातं त्या आदमला पृथ्वीचा राजा बनवलं.मात्र आदमला सैतानानं गोड बोलून पाप करायला भाग पाडलं आणि तेच पाप संपूर्ण मानवजातीत पसरलं.

यामुळे सगळे लोक मृत्युमुखी पडले.त्यामुळे परमेश्वरानं जलप्रलय घडवून आणला आणि पापाचा विनाश केला. त्यानंतर परमेश्वरानं पुन्हा पृथ्वीची निर्मिती केली आणि पृथ्वीवर ऋतू निर्माण केले. त्या त्या ऋतूंचा कालावधीपण निश्चित केला. या ऋतूनुसार परमेश्वरानं माणसाकडे लक्ष ठेवलं. 


अब्राहमच्या काळात लोक सुळावर चढून परमेश्वरासाठी स्वतःचा बळी देत. ही प्रथा जवळजवळ मुसा नबीच्या काळापर्यंत म्हणजेच येशू ख्रिस्त जन्मण्याआधी यासाठी १२०० वर्ष सुरू राहिली. येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर लोकांना न्याय मिळावा तो वारंवार परमेश्वराच्या संपर्कात राहिला त्या पीडित लोकांच्या जीवनात येथून अंधार दूर करून आशेचा किरण आणला. त्यामुळे आजही ख्रिश्चन लोक येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून परमेश्वराशी संपर्क साधतात आणि आपल्या सुखी जीवनाची अपेक्षा करतात.


 बायबलमध्ये येशू ख्रिस्ताची शिकवण दिली आहे.

त्यानुसार यशू म्हणतो, 'सत्य, मार्ग आणि जीवन म्हणजे मीच आहे.मीच जीवनात भूक मिटवणारं अन्न आहे.मी जगताना लागणारं पाणी आहे.मी या जगातला आशेचा किरण आहे.मी एक चांगला जगनियंता आहे.मी पहिला आणि शेवटचा अल्फा आणि ओमेगा आहे. मी या जगाचा आरसा आहे.'


इ. स. ३० ते ५० या कालावधीत येशू ख्रिस्ताच्या विचारांचा त्याचे अनुयायी मौखिक स्वरूपात प्रसार करत होते. त्यानंतर ते एकत्रित करून लिखित स्वरूपात मांडलं गेलं. येशू ख्रिस्त म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचाच अवतार असून त्यानं माणसाचा जन्म घेऊन वाट्याला आलेलं दुःख भोगलं.अखेर त्याला समाजातल्या क्रूर लोकांनी क्रूसावर मारलं.येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर तो पुन्हा येईल आणि जगात न्यायाचं राज्य प्रस्थापित करेल याचा विश्वास त्याच्या अनुयायांना होता.


जुना करार हा मूळ हिब्रू भाषेत लिहिला गेला. हिब्रू ही प्राचीन भाषा असून ती उजवीकडून डावीकडे लिहिली आणि वाचली जाते. ६व्या शतकापर्यंत यहुदी लोक हिब्रू भाषा बोलत असत.जुना करार पपायरसच्या कागदावर लिहिला गेला.पपायरस म्हणजे लव्हाळ्याच्या लगद्यापासून बनवलेला कागद. हा कागद कोरड्या हवामानात अनेक दिवस टिकत असे. 


यात ३९ पुस्तकांचा समावेश होता,तर नव्या करारात २७ पुस्तकं सामील होती. त्यानंतर ग्रीक भाषेत बायबलचं भाषांतर झालं. इ.स.३९० मध्ये सेंट जेरोम यांनी लॅटिन भाषेत भाषांतर केलं आणि या 'भाषांतराला 'व्हलगेट' असं संबोधलं गेलं. त्यानंतरची १००० वर्षं कॅथलिक चर्चचं बायबल म्हणून त्याला मान्यता मिळाली. बायबलच्या प्राचीन हस्तलिखित प्रती आजही जतन करून ठेवलेल्या आहेत.


इस्लाम धर्मातदेखील 'बायबल'कडे खूप आदरानं बघितलं जातं.'कुरआन' (बोलीभाषेत 'कुराण' असं संबोधलं जातं) प्रमाणेच 'बायबल' हाही परमेश्वराच्या प्रेरणेतून निर्माण झालेला ग्रंथ समजला जातो.हा ग्रंथ ख्रिश्चन धर्माला प्रेरित करणारा,धर्माची मूलतत्त्वं काय आहेत हे सांगणारा आणि परमेश्वर हा तारणकर्ता कसा आहे हे सांगणारा ग्रंथ आहे.परमेश्वराचं अस्तित्व, तसंच त्याचं प्रकटीकरण कधी आणि कसं झालं याबद्दल या ग्रंथात विवेचन केलं आहे.जगभरात या ग्रंथाच्या इतर कुठल्याही ग्रंथांपेक्षा सर्वाधिक प्रतींची विक्री झालेली आहे.विख्यात चित्रकार लिओनार्दो दा व्हिंचीचं 'द लास्ट सपर' आणि मायकेल एंजेलोचं 'क्रिएशन ऑफ अॅडम' ही चित्रं 'बायबल' वरच आधारित होती.


१५५७ साली प्रोटेस्टंट पंथाचा मार्टिन ल्युथर किंग यानं बायबलचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं.त्यामुळे सर्वसामान्य लोकांना समजण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला.


आजही अनेक भाषांमध्ये भाषांतर करताना लोक आढळतात.संपूर्ण बायबल हे एकूण ६९८ भाषांमध्ये

भाषांतरित झालं असून,फक्त नवा करार हे १५४८ भाषांमध्ये, तर 'बायबल' मधल्या गोष्टींचा भाग ११३८ भाषांमध्ये आणि 'बायबल' मधला काही भाग घेऊन तो ३३८४ भाषांमध्ये आजवर भाषांतरित झाला आहे. इतर कोणत्याही ग्रंथाचं इतक्या भाषांमध्ये आजपर्यंत भाषांतर झालेलं नाही.१६१६ साली फादर स्टीफन यांनी 'ख्रिस्तपुराण' नावानं 'बायबल'चं मराठीतून भाषांतर केलं,तर डॉ. विल्यम कॅरी यांनी १८०७ साली ४० भाषांमध्ये 'बायबल'चं भाषांतर केलं.१९२४ साली पंडिता रमाबाई यांनी १८ वर्षं परिश्रम करून हिब्रू 'बायबल' मराठीत आणलं. 'बायबल' चं मराठीत भाषांतर करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून त्यांच्याकडे तो मान जातो. ज्या दिवशी त्यांनी शेवटच्या वाक्याचं भाषांतर केलं,त्याच दिवशी (रात्री) त्यांचा मृत्यू झाला.फादर दिब्रिटो यांनी 'बायबल'चा सुबोध मराठी भावानुवाद केला आहे. तसंच मंगेश पाडगावकर यांनी देखील 'बायबल' मराठीत आणलं आहे. १५ व्या शतकात गटेनबर्ग यानं छपाईचा शोध लावला,तेव्हा प्रथम त्यानं 'बायबल'च छापलं होतं.


जगातल्या या पहिल्या छापील 'बायबल'मध्ये दर पानावर ४२ ओळी असल्यामुळे याला '४२ ओळींचं बायबल' असं म्हटलं गेलं. 


ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ म्हणून 'बायबल'ला अपार महत्त्व आहे. जगातल्या अत्यंत प्रभावशाली ग्रंथांमध्ये बायबल या ग्रंथाचा खूप वरचा क्रमांक आहे हे मात्र खरं!


" परमेश्वर तुमचा सोबती असल्यामुळे तुमचं ध्येय तितकंच विशाल ठेवा." - येशु ख्रिस्त


७ जून २०२३ भागातील पुढील भाग..