* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सप्टेंबर 2023

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२९/९/२३

विस्मरणात गेलेला भूसंशोधक लुडविग लीकहार्ट…The forgotten geologist Ludwig Leichhardt..

१९ व्या शतकात ऑस्ट्रेलियाच्या अज्ञात भूभागाचा शोध घेणारा साहसवीर आणि २१व्या शतकात त्याच्या शोधमोहिमेचा माग काढणारी त्याची पणती.भटकी वृत्ती आणि साहसाची ओढ लुडविग लीकहार्ट आणि कॅरी विल्यमसन यांच्या रक्तातच होती.त्यांची ही झपाटून टाकणारी गोष्ट.


 ऑस्ट्रेलिया या भूखंडाचं अंतरंग शोधण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यात लुडविग लीकहार्ट हे नाव अग्रणी आहे.लुडविगचा जन्म प्रशियात झाला.एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली.त्याच वातावरणामध्ये लुडविग वाढला.बर्लिन आणि गॉर्टिजेन विद्यापीठांमध्ये त्याने निसर्गशास्त्राचा अभ्यास केला.याच काळात त्याने निसर्गाचा परिचय व्हावा म्हणून इंग्लंड,फ्रान्स,स्वित्झर्लंड आणि इटलीमध्ये क्षेत्र अभ्यासासाठी भटकंती केली.त्या काळात नवनवे भूभाग बघून तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि काहीशा चमत्कारिक वाटणाऱ्या नैसर्गिक गोष्टी जगापुढे आणायच्या,असा एक पायंडाच युरोपीयन निसर्गशास्त्रज्ञां

मध्ये रूढ होत होता.याला गमतीने 'शास्त्रीय प्रवासज्वर' (सायंटिफिक ट्रॅव्हल फीवर) असं म्हटलं जात असे.

लुडविगलाही याची बाधा झाली होती.त्याच उद्देशाने तो १८४२ मध्ये ऑस्ट्रेलियात गेला.या ठिकाणी नवे शोध लावून शास्त्रीय जगतात आपलं नाव अमर करावं,असा त्याचा विचार होता.लुडविग ऑस्ट्रेलियात पोहोचला त्या वेळी वसाहतकारांनी ऑस्ट्रेलियात पाय ठेवून जेमतेम ५० वर्षं होत होती.त्या काळात ऑस्ट्रेलियाच्या केवळ वायव्य भागात गोऱ्यांच्या तुरळक वसाहती होत्या.त्या भागाचे नकाशे उपलब्ध असले तरी त्यांत बऱ्याच उणिवा होत्या.

त्या भूभागाचे बरेच बारकावे नकाशांत अजून भरलेच गेलेले नव्हते.कारण ऑस्ट्रेलियाच्या अंतर्भागात जाण्याचं धाडस कुणी अजून करत नव्हतं.उत्तर ऑस्ट्रेलियाचा बराच भूभाग तसा अज्ञातच होता.अज्ञाताचा शोध घ्यायचा निश्चय केलेल्या लुडविगला ही सुवर्णसंधी वाटत होती.


त्या काळातली ऑस्ट्रेलियाच्या उत्तर किनाऱ्यावरची सर्वांत मोठी वस्ती म्हणजे पोर्ट एसिंग्टन.तिथे जायचं तर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्याला समांतर असा सागरी मार्ग तेवढा उपलब्ध होता.(पुढे पोर्ट एसिंग्टनच्या पश्चिमेस डार्विन नगर वसलं आणि पोर्ट एसिंग्टनचं महत्त्व कमी झालं.पूर्व आशियाशी संपर्क साधणार प्रमुख ठाणं म्हणून डार्विन नगराला 'पूर्वेकडची खिडकी' हे विशेषण लाभलं.) लुडविगने जमिनीवरून पोर्ट एसिंग्टनपर्यंतचा प्रवास करण्याचं ठरवलं.पूर्व किनाऱ्यावरच्या ब्रिस्बेनहून सुरुवात करून १५ महिन्यांनी,डिसेंबर १८४५ मध्ये तो पोर्ट एसिंग्टनला पोहोचला.(आता हाच प्रवास विमानाने ५ ते ६ तासांत आटोपतो.) असा प्रवास पार पाडणारा तो पहिला मनुष्य होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियन भूसंशोधकांमध्ये त्याचं नाव अमर झालं.त्याचा हा पराक्रम खरोखरच अद्भुत मानावा लागतो.लुडविगने या मोहिमेत एकूण ४८२७ कि.मी.चं अंतर पार केलं.त्यापैकी बहुतेक भूभाग यापूर्वी कुठल्याही गोऱ्या व्यक्तीने बघितलेला नव्हता.या प्रवासात त्याने सर्वप्रथम काही नद्यांची स्थाननिश्चिती केली.त्यामुळे त्या नव्यानेच ऑस्ट्रेलियाच्या नकाशावर दिसू लागल्या.

अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या जातींचीही नोंद अशीच नव्याने करण्यात आली. यामुळे ऑस्ट्रेलियाविषयीच्या शास्त्रीय ज्ञानात भर पडली.(त्यांतील काही प्राणी आणि वनस्पती आता पुन्हा जगासमोर येत आहेत.)


ही मोहीम यशस्वी होण्यास लुडविग लीकहार्टचे नेतृत्वगुण कारणीभूत ठरले होते.त्याने या मोहिमेत अन्न म्हणून स्थानिक वनस्पती आणि प्राण्यांचा काही प्रमाणात वापर करण्याचा प्रयत्न केला.हे प्रयोग काही वेळा फसले,तर काही वेळा यशस्वी झाले.यशस्वी झालेल्या प्रयोगांमुळे मोहिमेत अन्न वाहून नेण्याचे परिश्रम कमी प्रमाणात करावे लागले.दुसरं म्हणजे याआधी ऑस्ट्रेलियाच्या अंतर्भागात गेलेल्या बहुतेक सर्व मोहिमांना 'स्कव्हीं' या विकाराने पिडलं होतं.हा विकार 'सी' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो.लुडविगच्या मोहिमेत मात्र कुणालाही हा त्रास झाला नाही. आणखी एका गोष्टीमुळे लीकहार्टच्या मोहिमेचं महत्त्व ठळकपणे समोर येतं.या मोहिमेनंतर बरोबर एक वर्षाने ऑस्ट्रेलियाचे सर्व्हेयर जनरल सर थॉमस मिचेल यांनी सर्व साधनसामग्रीनिशी अशीच एक मोहीम हाती घेतली होती;पण ही मोहीम लीकहार्टच्या मोहिमेने पार केलेल्या अंतराच्या निम्मं अंतरही पूर्ण करू शकली नाही.


लीकहार्ट या मोहिमेवरून परतला तेव्हा सिडनी शहरात त्याचं भव्य स्वागत झालं.लोकांच्या या उत्साहाचा फायदा घेऊन त्याने लगेचच पुढची मोहीम जाहीर केली.

ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरून निघून पश्चिम किनारा गाठायचा,अशी ती मोहीम होती;पण आजारपण, अशक्तपणा,वावटळी पाऊस,गांधीलमाश्या आणि वाळवंटी माश्यांच्या हल्ल्यांमुळे झालेला त्रास यांच्या एकत्रित परिणामामुळे ८०० मैलांच्या (सुमारे १३०० कि.मी.) प्रवासानंतर दक्षिण क्वीन्सलंडमध्ये पोहोचल्या

वर ही मोहीम आवरती घेतली गेली.


या मोहिमेच्या अपयशातून सावरल्यानंतर सुमारे वर्षभराने लुडविगने एक नवी मोहीम जाहीर केली.ही मोहीम ४ एप्रिल १८४८ रोजी दक्षिण क्वीन्सलंडमधील माउंट ॲबंडन्सच्या दिशेने निघाली.मात्र लुडविगसह या मोहिमेतली सर्व सात माणसं,५० बैल आणि २० खेचरं मध्येच कुठे तरी चक्क नाहीशी झाली.त्यांचे किंवा त्यांच्या सामानाचे कुठलेही अवशेष नंतर कुणालाही सापडले नाहीत.आजतागायत अनेक आधुनिक तंत्रांचा वापर करून या मोहिमेतील काही अवशेष सापडतात का याचा शोध घेण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत.त्या मोहिमेचं नक्की काय झालं हे अजूनही एक न उलगडलेलं कोडंच आहे.


आजवर लीकहार्टसारखे अनेक भूसंशोधक असेच नव्या भूभागांचा शोध घेताना नाहीसे झाले आहेत.त्यांतल्या काहींची नावं भूसंशोधनाच्या इतिहासात अजरामर झाली असली तरी इतर अनेक वीर अज्ञातच राहिले आहेत.

कित्येकांची तर चित्रं अथवा फोटोही आज उपलब्ध नाहीत,पण त्यांच्यामुळे पृथ्वीविषयीच्या भौगोलिक ज्ञानात भर पडली हे विसरून चालणार नाही.


लुडविग लीकहार्टच्या ऑस्ट्रेलियातील मोहिमांची पुढे त्याच्या घरात कायम आठवण काढली जात असे.कॅरी विल्यमसन आणि तिचा भाऊ बेन ही लुडविगच्या भावाच्या नातीची मुलं.ती उत्तर अमेरिकेच्या दक्षिणी राज्यांमध्ये मोठी झाली. त्यांची आईदेखील अत्यंत अभिमानाने त्यांना लुडविगच्या पराक्रमांच्या हकीगती सांगायची. ऑस्ट्रेलियाच्या रासवट भूपदेशातल्या त्याच्या मोहिमा,त्याचं गायब होणं,अशा अनेक गोष्टींबद्दल ती बोलत असे.त्या काळात कॅरी आणि बेन,दोघं आपण ऑस्ट्रेलियात जाऊन आपल्या या चुलत आजोबांचा शोध घेत आहोत, अशी स्वप्नं बघायचे.त्या काळात ऑस्ट्रेलियाबद्दल त्यांना फारशी माहिती नव्हती.त्यांना शिकवल्या गेलेल्या जगाच्या भूगोलात उत्तर अमेरिकी भूखंड आणि ध्रुवीय प्रदेश सोडले तर त्या पलीकडच्या जगाचा केवळ ओझरता उल्लेख तेवढा होता.त्यामुळे या भावंडांचं ऑस्ट्रेलियाबद्दलचं ज्ञान तसं अत्यल्पच होतं. त्यामुळे त्यांची स्वप्नं प्रत्यक्षात येणं तसं अवघडच होतं.पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.


कॅरी साहसी सहलींना जाणाऱ्या व्यक्तींना सल्ला देण्याचा व्यवसाय करत असे.अशाच साहसवीरांच्या ऑस्ट्रेलियन सहलीचं व्यवस्थापन करण्यासाठी ती एप्रिल १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियात गेली.काम पूर्ण झाल्यावर ती तिथेच राहिली आणि तिने 'अंकल लुडविग 'संबंधीची माहिती गोळा करण्याचा उद्योग सुरू केला.न्यू साऊथ वेल्सच्या शासकीय ग्रंथालयात अंकल लुडविगची अनेक कागदपत्रं होती,हे त्याशोधात तिला समजलं.त्या ग्रंथालयाच्या ग्रंथपालांनी तशी असंख्य कागदपत्रं,पुस्तकं आणि खूप मोठा पत्रव्यवहार कॅरीला दाखवला. त्यांचं बोलणं चालू असतानाच तिथे आणखी एक स्त्री आली आणि तिने कॅरीला आपलं लुडविगशी नातं असल्याचं सांगितलं.आता त्या दोघींचा संवाद सुरू झाला.त्या स्त्रीच्या नवऱ्याचे पणजोबाही लुडविगच्या भावंडांपैकी एक असल्याने कॅरी आणि ती एकमेकींच्या नात्यातल्या निघाल्या.त्या स्त्रीने कॅरीला लुडविगसंबंधी बरीच खरी आणि काही ऐकीव माहितीही दिली.त्याचबरोबर लुडविगच्या घराण्याच्या जर्मनीतल्या लीकहार्ट शाखेचीही माहिती तिने कॅरीला दिली.कॅरी अमेरिकेत व्हर्जिनियातील अलेक्झांड्रिया या आपल्या गावी परतली.या प्रवासातच तिने निश्चय केला,की आपण एक मोहीम काढायची आणि लुडविग लीकहार्टच्या मोहिमेच्या मार्गावरून प्रवास करायचा.असा प्रवास केला तर आपल्या या पणजोबांचं काय झालं हे कदाचित कळू शकेल,असं तिला वाटू लागलं.या मोहिमेबद्दल ती म्हणते- 'खरं तर हे सर्व करावं अशी कुणी माझ्यावर सक्ती केलेली नव्हती;पण ही कल्पना माझ्या डोक्यातून जात नव्हती.कदाचित हे माझ्या हातून घडावं असं नियतीच्या मनात असावं. '


या मोहिमेचा विचार पक्का झाल्यावर कॅरी एक महिन्यासाठी सिडनीमध्ये आली.सोबत तिचा भाऊ बेनही होता.तिने आता या मोहिमेची तयारी करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू केलं.हे संशोधन पूर्ण झाल्यावर तिने ठरवलं,की लुडविग पणजोबांच्या १८४४-४५ सालच्या मोहिमेच्या मार्गांचं अनुकरण करायचं,कारण त्या मोहिमेमुळे लीकहार्टचं नाव गाजलं होतं.शिवाय याच मोहिमेमध्ये त्याच्या अंताची बीजंही रोवली गेली होती.

कॅरीला या मोहिमेसाठी सहा आठवडे रजा मिळाली होती.तिला स्वतःचाच पैसा वापरून ही मोहीम पूर्ण करायची होती.यामुळे या मोहिमेवर खूप मर्यादा आल्या होत्या;पण हाती असलेला वेळ आणि उपलब्ध पैसा यांचा वापर करून लुडविगने जिथे जिथे पडाव टाकला अशा जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचण्याची खूणगाठ तिने मनाशी बांधली.त्याचबरोबर प्रत्येक पडावाच्या आजूबाजूच्या भूप्रदेशाची पाहणी करायची,असंही तिने ठरवलं.लीकहार्टच्या नोंदींचा अर्थ लावायला अशा भटकंतीचा आणि निरीक्षणांचा उपयोग होईल असं तिला वाटत होतं.या मोहिमेच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाचा आकडा हळूहळू वाढत कॅरीच्या आवाक्याबाहेर चालला होता.तेव्हा तिने प्रायोजक शोधायचे ठरवले.यापूर्वी तिने कुठल्याही कारणासाठी प्रायोजकत्व मिळवायचे प्रयत्न केले नव्हते. मोठ्या आर्थिक उलाढाली करणाऱ्या कंपन्यांच्या संचालकांपर्यंत कसं पोहोचायचं याची तिला अजिबात कल्पना नव्हती.


मात्र,तिच्या काही कलाकार मित्रांनी आपल्या कलेच्या प्रदर्शनासाठी यापूर्वी कुठल्या ना कुठल्या मोठ्या कंपनीच्या प्रायोजकत्वाचा लाभ मिळवला होता.शिवाय कॅरी स्वतः आठ वर्ष अशा प्रकारच्या साहसपूर्ण सहलींचं आयोजन करत होती.त्या मित्र-मैत्रिणींच्या सूचनांचा आणि आपल्या सहलींच्या आयोजन अनुभवाचा फायदा तिला झाला.तिची चिकाटी कामाला आली.ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक परिसरामध्ये सहली काढणारी सर्वात मोठी सहल आयोजक कंपनी 'न्यूमन्स पॅसिफिक'ने तिच्या साहसी सफरीचा सर्व खर्च आणि संयोजन यांचा भार उचलला.नोटबुक कॉम्प्युटर्स या कंपनीने तिला एक लॅपटॉप दिला,तर स्टेशन ट्रेल्व्ह या नभोवाणीने तिला 'उपग्रही भ्रमणध्वनी' पुरवला. यामुळे कॅरी आणि बेन सातत्याने जगाच्या संपर्कात राहू शकत होतेच,पण ते जे काही पाहत होते त्या सर्व गोष्टींच्या अंकीय प्रतिमाही जगाला दिसणार होत्या.


कॅरीला डार्विनस्थित रिक मरे नावाच्या माहितगार व्यक्तीची ओळख करून घेण्यास सांगण्यात आलं.हा रिक मरे प्रवाशांच्या छोट्या गटांना ऑस्ट्रेलियातील वाळवंटाचं आणि इतर दुर्गम प्रदेशांचं दर्शन घडवून आणण्याचा व्यवसाय करत होता.कॅरीची भेट झाल्यावर तिचं म्हणणं त्याने ऐकून घेतलं,तिच्या गरजा लक्षात घेतल्या आणि मोहिमेच्या नियोजनाची चर्चा करून त्याने आखणीची सुरुवात केली.सर्वप्रथम त्याने टेड टोबिन या तज्ज्ञ मार्गदर्शकाला या मोहिमेत सामील करून घेतलं.त्यानंतर टिम डॅनिएल या माजी सैनिकी अधिकाऱ्याला क्वीन्सलंडमधील प्रवासाचं नेतृत्व करायची विनंती केली.

टिम डॅनिएल हा ऑस्ट्रेलियाच्या 'आऊट बॅक' म्हणजे निर्जन प्रदेशात जगायचं कसं याबाबतचा तज्ज्ञ होता.

टोबिन आणि डॅनिएल हे ऑस्ट्रेलियातील वाळवंटी सहलींचे अग्रणी मार्गदर्शक मानले जातात.


कॅरीप्रमाणेच लुडविग लीकहार्टनेही खासगी प्रायोजकत्व मिळवलं होतं.त्याने आधी ऑस्ट्रेलियाचे सर्व्हेयर जनरल सर थॉमस मिचेल यांच्याकडे मदतीसाठी पत्रव्यवहार केलेला होता; पण ऑस्ट्रेलियाच्या अज्ञात भागाचं सर्वेक्षण खासगी मोहिमेने करावं,हे सर मिचेल यांना मान्य झालं नव्हतं.लुडविगला आर्थिक मदत पुरवणाऱ्यांच्यात प्रामुख्याने त्या प्रदेशातले 'रांचर्स' होते.लीकहार्टला नवी कुरणं सापडली तर आपल्या पशुधनात वाढ होईल आणि आपल्या गुरे चराईच्या व्यवसायाचा विस्तार करणं शक्य होईल असं त्यांना वाटत होतं.


कॅरी,बेन, टेड आणि टिम यांच्या 'लीकहार्ट शोध मोहिमे'ची सुरुवात ४ सप्टेंबर २००० या दिवशी सुरू झाली.

लीकहार्टप्रमाणेच त्यांनी क्वीन्सलंडच्या दक्षिण भागातील डार्लिंग डाऊन या भागातून सुरुवात केली.लीकहार्टच्या काळात या भागात झुडपंच झुडपं होती. त्यांच्या गचपणातून मार्ग काढत त्याचा प्रवास सुरु झाला होता. मधल्या काळात ही झुडपं नाहीशी होऊन त्या जागी गुरे चराई करणाऱ्यांच्या आणि तत्संबंधित व्यावसायिकांच्या छोट्टा छोट्या वस्त्या उभ्या राहिल्या होत्या.


'इथे कॅरीला आश्चर्याचा धक्का बसेल अशी एक घटना घडली.या भागात अनेक छोटे-मोठे 'लीकहार्ट ग्रुप' कार्यरत आहेत.त्यांनी लीकहार्टच्या कहाण्या आणि स्मृती जपून ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत.कॅरीची मोहीम आणि तिचं लीकहार्टशी असलेलं नातं याबद्दल समजताच त्यांनी तिचं स्वागत केलं; इतकंच नव्हे,तर तिला हवी ती मदत देण्याचंही कबूल केलं.ज्यांच्या रांचमध्ये लीकहार्टच्या पडावाच्या जागा होत्या ती ती ठिकाणं त्या लोकांनी कॅरीला दाखवली,तिचा यथायोग्य पाहुणचारही केला. त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून कॅरीला आपल्या पणजोबांसंबंधी बरीच माहिती मिळाली. ही अशी पिढ्यान् पिढ्या जपून ठेवलेल्या आख्यायिकांमधून मिळणारी माहिती कुठल्याही पुस्तकामधून मिळत नसते.


अशाच एका मुक्कामात कॅरीला जॉन गिल्बर्टची कबर बघायला मिळाली.हा जॉन गिल्बर्ट लुडविग लीकहार्टच्या मोहिमांमधील निसर्गशास्त्रज्ञ होता.कॅरी त्या कबरीचं दर्शन घेत असताना आकाशात एक घार घिरट्या घालत होती. कॅरीने गिल्बर्टची नोंदवही वाचलेली होती.त्यात एका नोंदीत 'इथे घारी फारच त्रास देतात.उघड्यावर खाणं घारींनी अशक्य करून सोडलं आहे.त्या कुठली वस्तू पळवतील याचा नेम नाही,'अशी नोंद केलेली आहे,त्याची या वेळी कॅरीला आठवण झाली.


गिल्बर्ट आदिवासींच्या भाल्यांना बळी पडला होता.

त्यामुळे लीकहार्टच्या मोहिमा आणि त्याचं नेतृत्व यांच्यावर प्रश्नचिन्ह लागलं होतं. लीकहार्टची मोहीम यशस्वी झाली खरी,पण ती बऱ्याच अडथळ्यांमधून पार पडली होती. मोहिमेत सुरुवातीला दहा सदस्य सामील झाले होते.त्यांतले दोघं लवकरच मोहीम सोडून निघून गेले.गिल्बर्टचं निधन झालं.त्याच हल्ल्यामध्ये आणखी दोघं गंभीररीत्या जखमी झाले होते. दरम्यान,मोहीम अर्ध्यावर असतानाच त्यांनी बरोबर घेतलेलं अन्न संपलं.

पोर्ट एसिंग्टनपर्यंतच्या प्रवासाला किती वेळ लागेल याबद्दलचा लीकहार्टचा अंदाज साफ चुकला. याला अनेक कारणं असली,तरी इथला अवघड भूभाग पार करण्यात असलेल्या अडचणी हे त्यांतलं प्रमुख कारण होतं.एकदा एक नदी ओलांडताना अचानक आलेल्या पुरामुळे मोहिमेतले बरेच घोडे वाहून गेले होते;बरीच शिधासामग्रीही वाहून गेली होती.अलीकडच्या बऱ्याच इतिहासकारांनी ही कारणं विचारात न घेता लीकहार्टला 'आगाऊ, गर्विष्ठ आणि चुका न सुधारणारा' ठरवलं आहे. लीकहार्ट आपल्या सहकाऱ्यांच्या जिवावर मोठा बनला,

असंही म्हणण्यात आलं आहे.( हटके भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन )


लुडविग लीकहार्टच्या विरोधात लोकमत का गेलं असावं,या प्रश्नाचा कॅरीने खोलात शिरून अभ्यास केला त्या वेळी एक वेगळीच वस्तुस्थिती समोर आली.

ऑस्ट्रेलियात त्या वेळी इंग्रजी बोलणाऱ्यांचं वर्चस्व होतं.लुडविग जर्मन होता. त्याचं इंग्रजीवर म्हणावं तितकं प्रभुत्व नव्हतं. यामुळे त्याच्या मोहिमेतील इतर सदस्यांशी त्याचा भाषिक मेळ बसू शकत नव्हता. त्यात तो उच्चशिक्षित होता;तर त्याच्या मोहिमेत एक कैदी, एक पंधरा वर्षांचा मुलगा आणि एक अशिक्षित मेंढपाळ होता.

त्यांच्याशी संवाद साधणं लीकहार्टला अवघड गेलं.तो अतिशय शिस्तप्रियही होता.त्यामुळेही त्याचे इतर सदस्यांशी खटके उडाले असावेत.पण याची उणीव त्याने आपल्या नोंदी आणि रोजनिशी लेखनातून भरून काढलेली दिसते.ज्यांनी ज्यांनी त्या लेखनाचा अभ्यास केला त्यांना त्या काळात लीकहार्टने जे मिळवलं,ज्या अवघड परिस्थितीला त्याने तोंड दिलं त्याचं कौतुकच वाटतं.कॅरी विल्यमसनने या प्रवासानंतर तिच्या शोध

मोहिमेवर एक पुस्तक लिहिलं असून,आता ती तिच्या चुलत पणजोबांच्या मोहिमेवर माहितीपट करते आहे.

लीकहार्टच्या अखेरच्या मोहिमेवर त्यातून प्रकाश टाकता येईल असं तिला वाटतं.लीकहार्टच्या प्रवासाच्या खुणा जतन करून ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांना ऑस्ट्रेलियातील चाहतेही मदत करत आहेत हे विशेष...

२७/९/२३

जॉर्ज फॉक्स युध्द - प्रतिकारी.. George Fox - War-fighter

या विक्षिप्त व्यक्तीविषयी क्रॉम्वेलला कुतूहल वाटले.

त्याची जिज्ञासा जागृत झाली.त्याने फॉक्सला बोलावले.

सकाळी सहाच्या सुमारास क्रॉम्वेलसमोर त्याला आणण्यात आले.क्रॉम्वेल अंथरुणात होता.त्याचा पोशाख अर्धवट होता.क्वेकर जॉर्ज फॉक्स आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे म्हणाला,"या घराला शांती लाभो..! " क्रॉम्वेलने प्रत्याभिवादन केले.पण तसे करताना त्याने जरा स्मित केले.ते दोघे धर्म,राजकारण,लढाया यांवर बोलले. प्रत्येकाला दुसऱ्याच्या सहानुभूतीविषयी,सूक्ष्म दृष्टीविषयी व विचारशक्तीविषयी आदर वाटत होता,आश्चर्यही वाटत होते. दोघेही क्रांतिकारक होते.मानवामानवांत अधिक मोकळेपणाचे, शहाणपणाचे आणि मित्रभावाचे संबंध असावेत, असे दोघांनाही मनापासून वाटत होते.दोघांचेही ध्येय एकच होते;पण दोघांच्या कार्यपद्धतीत व साधनांत दोन ध्रुवांचा फरक होता.जगात न्यायबुद्धी यावी म्हणून क्रॉम्वेल डोकी उडवीत होता.तर सर्वांच्या हृदयात करुणा व भूतदया यांचा उद्भाव व्हावा म्हणून फॉक्स धडपडत होता.क्वेकर - पंथाचा पुढारी जॉर्ज फॉक्स हासुद्धा एक क्रॉम्वेलच होता.पण आपल्या देशबांधवांचे रक्त सांडण्याचा गुन्हा त्याने कधीही केला नाही.


फॉक्स जाण्यास निघाला,तेव्हा क्रॉम्वेलने त्याचा हात धरून सजल दृष्टीने त्याच्याकडे पाहून म्हटले,"पुन्हा एकदा माझ्या घरी ये.आपण रोज तासभर एकत्र बसल्यास दोघेही परस्परांच्या अधिक जवळ येऊ.मी आपल्या स्वतःच्या आत्म्याचे वाईट चिंतणार नाही." तद्वतच तुमचेही वाईट चिंतणार नाही.तेव्हा फॉक्स शून्यपणे एवढेच म्हणाला,"तू माझे अशुभ चिंतशील तर तू स्वतःच्या आत्म्याचीच हानी करून घेशील." आणि पुन्हा शेवटी म्हणाला, "तू आपले हृदय कठोर होऊ देऊ नको.मी गेल्यावर पुन्हा तुझे हृदय निर्भय होईल,जप." आणि तो चांभार ऋषी त्या हुकूमशहाला सोडून गेला.


क्रॉम्वेल क्केकरचा उपदेश विसरला.त्याच्या घरात तर कधी शांती नांदलीच नाही.पण त्याची हाडेही थडग्यात सुखाने राहू दिली गेली नाहीत. त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा राजेशाही सुरू झाल्यावर वेस्ट मिन्स्टर अ‍ॅबेमधून त्याचे थडगे उकरून त्याचा देह बाहेर काढण्यात आला व त्याला फाशी देण्यात आले.नंतर छिन्नविछिन्न करून तो देह एका कुंभाराच्या शेतात फेकून देण्यात आला.जो क्रॉम्वेल तलवारीच्या जोरावर स्वतःला कीर्ती व स्वतःच्या राष्ट्राला स्वातंत्र्य आणू पाहत होता,त्याच्या जीवनाची शेवटची इतिश्री अशा प्रकारे लिहिली गेली.त्याची क्रांती त्याच्या मृत्यूबरोबरच अस्तास गेली.पण जॉर्ज फॉक्सने सुरू केलेली अहिंसक क्रांती अद्यापि आहे. एवढेच नव्हे;तर ती जगभर अधिकाधिक दृढतेने व तेजाने पसरत आहे.


दुसरा चार्लस गादीवर आला.क्रॉम्वेलच्या कारकिर्दीत क्वेकर मंडळींवर रिपब्लिकविरुद्ध कट केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता त्यांच्यावर राजाविरुद्ध कट केल्याचा आरोप करण्यात आला.विद्यार्थी,धर्मोपदेशक, मेरी,इंग्लंडचे मॅजिस्ट्रेट साऱ्यांनाच क्वेकरांचा छळ म्हणजे गंमत वाटत असे.एकदा तर पंधरा हजार क्वेकर तुरुंगात होते.त्यातील पुष्कळ जण तुरुंगातच मेले.तथापि,त्यांचे छळकही त्यांना जरा भीत असत.क्वेकरांविषयी त्यांना जरा काहीतरी गूढ वाटे.क्वेकर अत्याचाराची परतफेड मधुर वाणीने करीत.अपमानाला स्मिताने उत्तर देत. त्यामुळे हे श्रेष्ठ अशा जगात राहणारे जादूगार आहे असे केव्हा केव्हा वाटे.एकदा फॉक्सला अटक झाली तेव्हा तो उडून जाऊ नये म्हणून चिमणीच्या धुराड्याजवळही एक रखवालदार ठेवण्यात आला होता.फॉक्सवर देखरेख करणारे सैनिक त्याचे धैर्य,त्याचे व्यक्तिमत्त्व व त्याचे विभूतिमत्त्व पाहून दिपून जात.ते त्याला म्हणत, "तुम्ही आमच्या पलटणीत सामील व्हाल तर आम्ही तुम्हाला कॅप्टन करू." फॉक्सने शिपाई व्हावे म्हणून त्या शिपायांनी पराकाष्ठा केली.पण त्यांना यश येण्याऐवजी त्यांच्या - 

तल्याच पुष्कळांवर त्यांच्या पंथाचे अहिंसक सैनिक बनण्याची पाळी आली.


१६६९ सालच्या ऑक्टोबरच्या अठराव्या तारखेस त्याने स्वार्थमूर हॉल येथील न्यायाधीश फेल याच्या विधवेशी लग्न केले.तिचे नाव मागरिट फेल.ती आठ मुलांची आई होती.फेल घराण्याशी फॉक्सचा सतरा वर्षांचा संबंध होता. मागरिट मित्रसंघाची सभासद होती.क्वेकर लोक तुरुंगात होते तेव्हा ती त्यांच्यासाठी रदबदली करी.एकदोनदा तर ती स्वतः त्याच्यासाठी तुरुंगात गेली होती.ती उच्च कुळात जन्मली होती.ती सुंदर व सुसंस्कृत होती.जे जे काम ती हाती घेई,त्यात त्यात तिला यशच येई.ती मनात आणती,

तर समाजात श्रेष्ठ पदवी व राजदरबारांत सत्कार मिळवू शकली असती.पण बहिष्कृत जॉर्ज फॉक्सची संगती लाभावी म्हणून तिने या सर्व गोष्टींवर लाथ मारली.क्वेकर लोकांसाठी तिने मानसन्मान व सुखोपभोग दूर लोटले. फॉक्सशी लग्न करतेवेळी तिचे वय पंचावन्न वर्षांचे होते.

फॉक्स सेहेचाळीस वर्षांचा होता.हे दांपत्य तुरुंगात नसे,

तेव्हा दोघेही शांततेचा संदेश देत सगळीकडे हिंडत असत.

एकमेकांना एकमेकांच्या संगतीत फारसे राहता येत नसे. त्यांच्या बावीस वर्षांच्या वैवाहिक जीवनात फार फार तर पाच वर्षे ती दोघे एकत्र राहिली असतील.पण दोघांमध्ये कोमल व गाढ प्रेम होते. त्यांचा पत्रव्यवहार प्रसिद्ध आहे.

दोघेही परस्परांना पत्रात प्रथम परस्परांचे कुशल विचारतात.फॉक्सने स्वत:साठी एक गरम कोट विकत घ्यावा म्हणून त्याच्या पत्नीने पाठवलेले पैसे एके दिवशी त्याला मिळाले.पण त्या पैशांचे त्याने एक नारिंगी रंगाचे कापड खरेदी करून त्याचा मागरिटकरता एक लांब झगा शिवविला व म्हटले, 'मला कोटाची जरुरी आहे.पण मागरिटला झग्याची अधिक जरुरी आहे.' कधीकधी तो थकल्यासारखा दिसे तेव्हा ती त्याला म्हणायची, "पुरे आता हिंडणे-फिरणे. स्वार्थमूरला घरी येऊन राहा.विश्रांती घे." पण दूर करायला अन्याय शिल्लक असेपर्यंत फॉक्सला विसावा कोठला ? अमेरिकेत केकरांचा छळ होत असल्याचे फॉक्सच्या कानांवर आले, तेव्हा इंडस्ट्री नावाच्या एका फुटक्या जहाजात बसून तो अमेरिकेत जाण्यास निघाला. खलाशी व उतारू गलबतांतील पाणी पंप करून सारखे बाहेर काढीत होते.गलबत बुडू नये रात्रंदिवस सुरू असे.म्हणून हा जलोत्सर्गप्रकार वारा व पाणी यांपासून धोका होता,तसाच समुद्रावरच्या चाच्यांपासूनही होता.पुष्कळ दिवस बार्बरी येथील चाचे त्यांच्या गलबताचा पाठलाग करीत होते.पण 'इंडस्ट्री' कशीतरी निभावली व साठ दिवसांनंतर ब्रिटिश वेस्ट इंडिजमधील बार्बोडास येथे येऊन लागली.


प्रवासात फॉक्सला संधिवात व ताप यांचा आजार जडला.अमेरिकेत उतरल्यावरही या रोगाने तो आजारी होताच.पण तो शारीरिक दुःखाकडे लक्ष देत नसे.

आजारपण त्याला एक किरकोळ बाब वाटत असे.तो आपले काम सारखे करी.पण शेवटी गळून जाई.

गलबतांतून उतरताच त्याने वेस्ट इंडीजमधल्या क्वेकर संस्थेत व्यवस्थितपणा आणला.त्याने निग्रो गुलामांना स्वातंत्र्य दिल्याचे जाहीर केले.. १६७१मध्ये जॉर्ज फॉक्सचे म्हणणे जर अमेरिका ऐकती,तर अमेरिकेत १८६१ साली अमेरिकेमधील आपसांतील गुलामगिरी नष्ट करण्यासाठी जे युद्ध झाले ते झालेच नसते. वेस्ट इंडिज बेटांतून तो अमेरिकेत गेला.अमेरिकन वसाहतीत त्याच्या येण्याची फार आवश्यकता होती.ह्या नवीन खंडात जणू प्रॉटेस्टंटांचीच सत्ता होती.हे खंड प्रॉटेस्टंटांना निर्धोक करता करता क्वेकरांना मात्र ते धोक्याचे झाले.


मॅसाच्युसेट्स वसाहतीचा गव्हर्नर एन्डिकॉम याच्या परवानगीशिवाय चार क्वेकरांनी बोस्टन येथे पाऊल टाकले म्हणून त्यांना फाशी देण्यात आले.त्यांची नावे वुइल्यम रॉबिन्सन, मार्मड्यूक रॉबिन्सन,वुइल्यम लेड्रा व मेरी डायर. याच बोस्टन शहरात क्वेकरांना दूध देणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.डोव्हर गावी तीन क्वेकर बायांना गाडीपाठीमागे बांधून बर्फातून ओढत फरफटत नेण्याची सजा देण्यात आली होती.आणखी नऊ गावांनाही अशीच शिक्षा फर्मावण्यात आली होती. "या भटक्या क्केकरांना पकडा... त्यांच्या पाठीवर दहा- दहा फटके मारा." असे हुकूम त्या शहराच्या सुटले होते.या हुकमांवर राइट ऑनरेबल रिचर्ड वाल्डेन याची सही होती.अंमलबजावणी करण्याचे काम रेव्हरेंड रेनॉर याच्याकडे होते. एका गावच्या पोलिसांनी फटके मारून त्यांना पुढच्या गावच्या पोलिसांच्या ताब्यात द्यायचे व आपल्या वसाहतींमधून त्यांची पीडा घालवून घायची.


अमेरिकेतील प्यूरिटनांची हृदये विरघळण्याचे कामी फॉक्सला फारसे यश आले नाही.पण क्वेकरांची हृदये मजबूत व अविकंप करण्यात त्याला यश लाभले.

'बलवंतांसमोर निर्भय राहा व दुबळ्यांसमोर दयेने वागा.'असे त्याने आपल्या अनुयायांच्या मनावर अत्यंत उत्कृष्टपणे बिंबवले. क्वेकर शरण गेल्याचे उदाहरण इतिहासात नाहीं. त्याचप्रमाणे शरण येण्यासाठी त्यांनीही कोणावर कधी सक्ती केली नाही.पेनसिल्व्हानियात क्वेकरांचे प्रभुत्व पाऊणशे वर्षे होते.पण तेवढ्या काळात क्वेकरांकडून एकही इंडियन कधी फसवला गेला नाही की कत्तल केला गेला नाही.


फॉक्स अमेरिकेतून परत आल्यावर धार्मिक सहिष्णुतेचा संदेश देत इंग्लंडमध्ये फिरत राहिला.जगात सर्वत्र शांतीचे साम्राज्य स्थापा, असे तो शिकवत असे.मरणाआधी चार वर्षे म्हणजे १६८७ साली त्याच्या प्रयत्नांना निम्मे यश आले.दुसऱ्या जेम्सने धर्माच्या बाबतीत भाषणस्वातंत्र्य व विचारस्वातंत्र्य देणारा कायदा पास केला.पण जागतिक शांततेची उरलेली निम्मी लढाई हळूहळू तथापि निश्चितपणे जिंकली जात होती.इतिहासात आपणास प्रथमच युद्धांची जरा लाज वाटू लागली आहे. लष्करी हडेलप्पींवरची श्रद्धा कमी होत चालली आहे.लवकरच एक दिवस असा उजाडेल, की जेव्हा लीस्टरशायरमधील हा अशिक्षित चर्मकार मानवजातीच्या थोर शिक्षकांपैकी एक म्हणून सर्वत्र गौरविला जाईल.


२५.९.२३ या लेखातील शेवटचा भाग..

२५/९/२३

युध्द - प्रतिकारी जॉर्ज फॉक्स.. War-fighter George Fox


इंग्लंडमधील लीस्टरशायर परगण्यातल्या एका खेडेगावात तो वेडा माणूस राहत असे.तो एका चांभाराजवळ उमेदवार म्हणून होता.पण १६४३ च्या जुलै महिन्यात मूसा,येशू,बुद्ध यांच्याप्रमाणे तो फकीर होऊन सत्य

शोधनार्थ बाहेर पडला.या साहसी सत्यशोधकाचे नाव जॉर्ज फॉक्स.त्याची जीवनात निराशा झाली होती.

सभोवतालचे जीवन पाहून तो दुःखी होई.आपण या जगातले नाही असेच जणू त्याला पदोपदी वाटे.या जगातील पशुता व हालअपेष्टा तो समजू शकत नसे.त्या वेळी युरोपात त्रिशतवार्षिक युद्ध जोरात चालू होते.

इंग्लंडात पहिला चार्लस शत्रूंची मुंडकी उडवून ती कुंपणावर लावून ठेवीत होता. 


अखेर पार्लमेंट संतापून राजाच्या मुंडक्यांची मागणी करू लागले.राजकारणाची या लढाईची अजिबात नसणाऱ्यांना घरातून ओढून आणून सक्तीने लढायाला लावण्यात येई.घरी असणाऱ्यांवर अपरंपार कर बसवून त्यांना भिकारी करण्यात येई.वेळच्या वेळी कर न देणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात येई व त्यांच्या घरातले सामान जप्त करण्यात येई.एकदा तर राजाचे हे दूत एका घरात घुसून लहान मुलाचे दूध ठेवलेले भांडे त्यातील दूध ओतून घेऊन गेले. राजे व सेनापती यांच्यापुढे मानवजात मेटाकुटीस आली होती.रोगग्रस्त शरीर हळूहळू मरणाकडे जाते,तद्वत मानवसमाज मरणाकडे जात होता.


वीस वर्षांचा तरुण जॉर्ज जगातल्या या दुःखांवर काही उपाय सापडतो का,हे पाहण्यासाठी आपला धंदा सोडून बाहेर पडला.ईश्वराच्या इच्छेने ज्ञान आपणास आहे.

मानवांना कशाची जरुरी आहे हे आपणास कळते,असा आव आणणाऱ्या धर्मोपदेशकांकडे तो गेला व "माझ्या सत्यशोधनात मला मदत करा." असे त्यांना म्हणाला.पण त्यांनी त्याची टिंगल केली.एक म्हणाला,"लग्न कर म्हणजे सार समजेल." दुसऱ्याने उपदेशिले,"युद्धात जा व युद्धाच्या रणधुमाळीत मनाचा सारा गोंधळ विसरून जा." तिसरा म्हणाला, "मानवजातीच्या चिंतेचा हा तुम्हाला जडलेला रोग बरा होण्यासाठी काही औषध वगैरे घ्या." कोणी सुचविले, 'तंबाखू ओढू लागा!' कोणी म्हटले, 'धार्मिक स्तोत्रे वगैरे म्हणत जा.' जॉर्ज सांगतो,'देवाचे हे जे पाईक,त्यातील एकानेही माझे मन का अशांत आहे ते समजून घेण्याची खटपट केली नाही.ते सारे पोकळ पिशव्या होते.' फॉक्सच्या अनुभवास आले की, सुशिक्षित मनुष्य विचार करणारा असतोच असे नाही.त्या वेळेपासून त्याला नाना भाषा बोलणाऱ्या सुशिक्षित पढतमूर्खाबद्दल व पोकळ धर्मप्रचारकांबद्दल सदैव तिरस्कार वाटे.


चार वर्षे तो स्वतःच्याच मनात विचार करीत होता आणि स्वतःच्या मनाला त्रास देणाऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले.जगातील दुःखांची मुख्यतः तीन कारणे आहेत असे त्याला दिसले.


१. ख्रिश्चन राष्ट्रांना ख्रिश्चन धर्माविषयी काही कळत नव्हते...


२. स्वतःला पुढारी म्हणविणारे फार अहंमन्य असतात,या पुढाऱ्यांच्या पाठोपाठ जाणारे फारच नेभळट असतात..


. जगातील निर्दय युद्धांमुळे मानवजात जणू मरणाच्या पंथाला लागली आहे.ही तीन कारणे शोधून या जगात प्रचार करण्यासाठी,युद्धप्रिय जगाला शांतीचे मार्ग दाखविण्यासाठी तो बाहेर पडला.त्याची आमरण प्रचारयात्रा सुरू झाली. त्याने पाऊस,बर्फ व वारा यांपासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी कातड्याची एक कोट-पाटलोण शिवली व रुंद कडांची एक टोपी तयार करून घेतली आणि निघाला.हा यात्रेकरू ! 


'सॉर्टर रिसॉटर्स्' या ग्रंथात कार्लाईल म्हणतो, 'अर्वाचीन इतिहासातील अत्यंत प्रसिद्ध व लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे वॉटर्लूची. ऑस्टरलिट्झची किंवा आणखी कुठली लढाई नव्हे;तर पुष्कळशा इतिहासकारांनी उल्लेखही न केलेली आणि टिंगल करण्यासाठीच काहींनी उल्लेख केलेली गोष्ट होय.सर्वांनी ती लक्षात ठेवण्या -

सारखी आहे.ती म्हणजे जॉर्ज फॉक्सने आपल्या यात्रेसाठी शिवलेला कातडी सूट,तो क्वेकर पंथाचा आद्य संस्थापक होता.त्याचा धंदा चांभाराचा होता.या विश्वाची दैवी कल्पना ज्यांना आविर्भूत होते.अशांपैकी तो एक होता.काहींना या विश्वाची दिव्यता अधिक उदात्त स्वरूपात दिसते.काहींना जरा कमी उदात्त स्वरूपात दिसते,तर कोणाकोणाला अधिक विशुद्ध स्वरूपात दिसते.ते काहीही असो,जॉर्ज त्यांपैकी एक होता.

ज्यांच्यासमोर विश्वाचे सत्यस्वरूप आविर्भूत होते.त्यांना प्रॉफेट्स,पैगंबर या ईश्वरी वृत्तीने रंगलेले अवलिये असे म्हणतात.जॉर्ज फॉक्सचे लिस्टरशायरमधले चांभाराचे दुकान पोपांच्या प्रासादांपेक्षाही अधिक पवित्र होते.'हे थोर जॉर्ज फॉक्स,शीव,तुझा तो कातड्याचा सूट शीव त्या कोटाला जो जो टांका तू घालीत जाशील.तो तो गुलामगिरीच्या हृदयालाच जाऊन पोहोचेल,धनपूजा व ऐहिकाची पूजा यांच्या हृदयात घुसेल.तुझे हे काम संपले म्हणजे युरोपात एक मुक्त पुरुष दिसेल,एक खरा स्वतंत्र पुरुष दिसेल आणि तो म्हणजे तूच.'


कातड्याच्या सुटातील या शांतिदूताला कधीकधी शेतातील गवताच्या गंजीजवळ निजावे लागे. तुरुंगातल्या थंडगार जमिनीवर,दमट व ओलसर जागेत कित्येक वर्षे त्याला सक्तीने निजायला लावण्यात आले.असा हा जॉर्ज फॉक्स जगातील अत्यंत आश्चर्यकारक अशा सैन्याचा सेनापती होता.'शांतीसाठी झगडणारी अहिंसेने लढणारी सेना!'


जॉर्ज फॉक्सच्या काळातले क्वेकर म्हणजे स्वातंत्र्यार्थ लढणारे वीर शिरोमणी होत.हे सर्वांत शूर असे स्वातंत्र्य

सैनिक धर्मप्रांतातले अराजकवादी होते.धर्माच्या बाबतीत ते कोणाचीही सत्ता मानीत नसत.सतराव्या शतकातल्या या अहिंसक प्रतिकारांनी शत्रूच्या रक्ताचा एकही थेंब न सांडता दीर्घकालपर्यंत लढाई चालविली व अखेर या शांततावीरांनी विजय मिळविला.


जॉर्ज फॉक्स प्रचारार्थ बाहेर पडल्याला आता सहा वर्षे झाली होती.या सहा वर्षांत त्याला साठ निष्ठावंत स्त्री-पुरुष अनुयायी मिळाले.ख्रिश्चनांना खरा धर्म देण्यासाठी त्याचा प्रचार सारखा सुरू होता.दोनच वर्षांत साठांचे पन्नास हजार अनुयायी झाले.ते आपणास 'प्रकाशबाळे' किंवा 'मित्रसंघ' म्हणवीत.पण पुढे त्यांना केकर हे नाव मिळाले.एका विरोधकाने म्हटले, "प्रभूचे नाव उच्चारताच कापू लागावे,असे हा आपल्या अनुयायांना सांगतो." क्वेक होतो,अर्थात कापतो तो केकर.


लोकांची अशी समजूत आहे की,क्वेकर भितुरडे असतात.

शांतीचा प्रचार करणाऱ्या दुबळ्यांचा हा संघ झगडण्याची भीती वाटत असल्यामुळे हे जीवनात प्रत्यक्ष भाग घेण्याला भितात.पण वस्तुस्थिती अगदी वेगळी आहे.

क्वेकरांचा इतिहास हा जगातील अत्यंत रोमहर्षक इतिहास होय.जॉर्ज फॉक्स व कायदा न मानणारे त्याचे सैनिक प्रत्यक्ष क्रियात्मक प्रतिकारांचे पुरस्कर्ते होते.ते मवाळ किंवा क्रियाशून्य प्रतिकाराचे पुरस्कर्ते नव्हते.सर्व प्रकारच्या अन्यायाशी,वाईट गोष्टींशी झगडण्याचा उपदेश ते निर्भयपणे करीत.ते प्रथम चढाई करीत व शत्रूच्या गोटाला जाऊन भिडत.उपवास,कैद,अत्याचार,मरण, कशाचीही त्यांना भीती वाटत नसे.ते राजासमोरही कधी टोपी काढीत नसत.राजांच्या डामडौलाचा त्यांना तिटकारा वाटे.सर्व गुलामांना मुक्त करा असे ते जगातील गुलामांच्या धन्यांना सांगत,धर्मोंपदेशकांच्या उद्धटपणाबद्दल त्यांची हजेरी घेत.अन्याय करणाऱ्या न्यायाधीशांची कानउघडणी करीत,युद्ध सुरू असताना सैनिकांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगायला ते कचरत नसत.


तो एकदा 'तुम्ही माणुसकी दाखवा.दया व प्रेम दाखवा, माणसांसारखे वागा.' असा उपदेश करीत असता एकाने त्याच्या तोंडावर ठोसा मारला,तरी फक्त तोंड पुसून फॉक्सने आपले प्रवचन पुढे चालू केले.त्याने उलट कधीही मारले नाही.स्वतःच्या लढाया लढण्याचे त्याच्या

जवळचे अधिक प्रभावी हत्यार म्हणजे बुद्धी.न्याय्य गोष्ट पटवून देण्याची तो पराकाष्ठा करी.एकदा तर त्याला गुंडांनी खाली पाडून लाथांखाली इतके तुडवले की,शेवटी तो मूच्छित झाला.पण शुद्धीवर येताच उभा राहून व हात पसरून तो म्हणाला, "या, मारा. हे बघा माझे हात,हे माझे डोके, हे माझे गाल.हाणा, मारा." तेव्हा एका धर्माळू गवंड्याने आपल्या हातातल्या फिरायच्या वेळी नेण्याच्या काठीने खरोखरच त्याला चांगले झोडपून काढले.या गुंडांवर कायदेशीर इलाज करण्याचा त्याला देण्यात आलेला सल्ला त्याने मानला नाही.तो म्हणे, "माझे काय त्यांच्याशी भांडण आहे का वैयक्तिक हेवा दावा आहे? मी सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे.जगाच्या स्वातंत्र्याच्या या विश्वव्यापी लढाईत माझ्या जीवनाची काय मातब्बरी! प्रभूने माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना क्षमा केली असता मी त्याच्या बाबतीत का त्रास घ्यावा ?"


आणि यानंतर तो शांतीचा युद्धविरोधाचा प्रचार सर्वत्र करू लागल्यामुळे त्याला तुरुंगात घालण्यात आले.तेव्हापासून त्याचे सारे आयुष्य तुरुंग व प्रचार यातच विभागले गेले.

तुरुंगातून सुटताच प्रचार की पुन्हा तुरुंगवास असे सारखे सुरू होते.मानवावर प्रेम करण्याच्या गुन्ह्यासाठी त्याला तुरुंगवासाची शिक्षा मिळाली.तो ज्या कोठडीत होता,तिचे वर्णन त्याने पुढीलप्रमाणे केले आहे.


'मला उंच टॉवरमध्ये ठेवण्यात आले होते. दुसऱ्या कैद्यांच्या कोठड्यांतला सारा धूर तिथे येई.धुक्याप्रमाणे दाट येणारा तो धूर जणू भिंतींवर चिकटून बसे.तीन कुलपांच्या आत मला कोंडण्यात येत असे.धूर फार झाला,तरी वरचा एखादा दरवाजा उघडण्यासाठीही दुय्यम जेलर येत नसे.आपण धुरात गुदमरून जाऊ असेच जणू त्याला वाटत असावे.शिवाय माझ्या अंथरुणावर गळतही असे.कधी बाहेर थंडी असे, कधी पाऊस पडत असे.गळू नये म्हणून व्यवस्था करावयाला मी गेलो की माझा सदरा भिजून ओलाचिंब होऊन जाई.सर्व हिवाळा पडून राहण्यात गेला.थंडीने मी गारठून जात असे. माझी उपासमारही होत असे.माझ्या शरीराला सूज आली.

अवयव बधिर होऊन गेले!'


आयुष्याचा बराचसा भाग जॉर्ज फॉक्सला अशा प्रकारच्या तुरुंगात काढावा लागला.पापभीरू व ईश्वरभीरू इंग्रज लोक कैद्यांपैक्षा आपल्या कुत्र्यांचीच अधिक काळजी घेत.जॉर्ज फॉक्सची मुक्तता होणे शक्य नसल्यास त्याच्या

ऐवजी तुरुंगात पडून आपलं स्वातंत्र्य गमावण्यास किती

तरी क्वेकरबंधू तयार होते.(मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी) पण मॅजिस्ट्रेट व जेलर जॉर्जला भयंकर माणूस मानीत.जगात शांती असावी असे तो म्हणे, म्हणूनच शांतीला त्याचा धोका होता असे मानून ते त्याला तुरुंगात ठेवू इच्छित.त्यालानास्तिक,पाखंडी,ठक,

देशद्रोही म्हणण्यात येई.दंडे मारून त्याच्या डोक्यातले शांतीचे विचार ते काढून टाकू पाहत.त्याचा शांतीचा रोग गेला असे वाटून त्याला मुक्त करण्यात आले की लगेच त्याचा शांततेचा प्रचार पूर्ववत पुन्हा सुरू होई.माणसे वाईट नसतात.ती स्वभावतः चांगली असतात. इत्यादी कल्पनांचा प्रचार त्याने सुरू केला की पुन्हा त्याला तुरुंगात अडकवीत.असा हा धरसोडीचा खेळ सारखा चालला होता.जॉर्जचे शरीर दणकट होते.तरीही त्याची प्रकृती शेवटी तुरुंगात बिघडलीच.पण तुरुंगाधिकाऱ्यांनी त्याचे शरीर मारले,तरी त्यांना त्याचे मन मारता आले नाही.इंग्लंडमधील कारागृहाच्या घाणीत व अंधारात मानवी स्वातंत्र्याच्या ध्येयाचे बी फुलले.


ऑलिव्हर क्रॉम्बेल इंग्लंडचा हुकूमशहा होता.तेव्हा सरकारविरुद्ध कट केल्याच्या आरोपावरून फॉक्सला पकडण्यात आले.या आरोपाला उत्तर म्हणून फॉक्सने क्रॉम्बेलला एक पत्र पाठवले. त्यात तो लिहितो, "ईश्वरसाक्ष,मी अशी घोषणा केली आहे की,मी कोणाही मानवाविरुद्ध कधीही शस्त्र उचलणार नाही.तुमच्याविरुद्ध किंवा कोणाच्याही विरुद्ध कोणतेही पाशवी शस्त्र मी उचलणार नाही.ईश्वराने सर्व हिंसेच्याविरुद्ध साक्षी म्हणून मला पाठवले आहे.लोकांना अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी मला पाठवण्यात आले आहे.लढाया व लढायांची कारणे यांपासून मानवांना परावृत्त करून त्यांना शांततेच्या मार्गावर आणणे हे माझे जीवितकार्य आहे." 





२३/९/२३

बिबळ्याचा पहिला बळी… Leopard's first victim...

मी रुद्रप्रयागला येण्याअगोदर इबॉटसनने अतिशय सुनियोजित असा एक हाकारा घालण्याची योजना केली होती.जर तो यशस्वी झाला असता तर पुढे जवळजवळ पंधरा माणसांचा जीव वाचला असता.हा हाकारा आणि त्याच्याशी संबंधित घटना खास उल्लेख करण्यासारख्या आहेत.


बद्रीनाथकडे निघालेल्या वीस यात्रेकरूंचा घोळका एकदा संध्याकाळी एका रस्त्यालगतच्या दुकानावर येऊन पोचला.त्यांच्या सर्व गरजा भागवल्यानंतर त्यांना दुकानदाराने सांगितलं की आता लवकरच अंधार पडेल आणि चार मैलावरच्या पिलग्रिम शेल्टर्सपर्यंत वेळेवर पोचायचं असेल तर त्यांना ताबडतोब निघावं लागेल.तिथे एकदा पोचलं की त्यांना कोणताही धोका नाही,त्यांच्या राहण्याजेवणाची सुद्धा चांगली सोय होईल.पण हा सल्ला त्या यात्रेकरूंना काही केल्या पटेना.त्यांचं म्हणणं असं होत की त्यांनी सकाळपासून खूप लांबचा पल्ला मारला होता आणि आता यापुढे परत ४ मैल चालणं अशक्य आहे.त्यांना फक्त जेवण बनवण्यासाठी थोडी जागा हवी होती आणि दुकानाबाहेरच्या पडवीत झोपण्याची परवानगी! यावर मात्र दुकानदाराने जोरदार विरोध दर्शवला.त्याने सांगितलं की त्याच्या दुकानाच्या आसपास तो बिबळ्या सतत येत असतो आणि तिथे उघड्यावर झोपणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे.


ही सगळी वादावादी चालू असतानाच बद्रीनाथकडे चाललेला एक साधू तिथे आला आणि त्याने यात्रेकरूंची बाजू मांडायला सुरुवात केली.तो म्हणाला की जर दुकानदाराने त्यांच्यापैकी स्त्रियांना दुकानात निवारा दिला तर तो पुरुषमंडळींबरोबर बाहेर ओसरीवर झोपेल आणि जर कुठला बिबळ्या - नरभक्षक असो किंवा नसो तिथे आला आणि यात्रेकरूंशी काही आगळीक केली तर तो त्याला तोंडाने आख्खा गिळेल व फाडून टाकेल.या असल्या प्रस्तावासमोर दुकानदाराला मान झुकवावी लागली.शेवटी दहा बायकांना त्याच्या दुकानाच्या आत निवारा मिळाला व साधूला मधोमध ठेवून ती दहा माणसं ओसरीवर आडवी झाली.


सकाळी उठल्यावर यात्रेकरूंना दिसलं की साधू तिथून गायब आहे,त्याचं अंथरूण विस्कटलेलं आहे,त्याने पांघरली चादर ओसरीच्या अर्धी आत आणि अर्धी बाहेर फरफटत गेली आहे व त्यावर रक्ताचे डाग आहेत.या सर्वांचा गलका ऐकून दुकानदार बाहेर आला.एका दृष्टीक्षेपातच त्याला काय झालंय ते कळलं.उन्हं नीट वर आल्यावर त्या सर्वांबरोबर दुकानदाराने रक्ताचा माग कुठे गेलाय ते बघितलं.तो माग डोंगरउतारावर काही अंतर जात तीन सोपानशेतं ओलांडून सर्वात खालच्या शेताच्या बांधापर्यंत गेला होता.त्या उभ्या बांधाच्या कडेला त्यांना साधू सापडला. त्याच्या शरीराच्या खालचा भाग बिबळ्यानं खाल्ला होता.


त्यावेळी इबॉटसनचा मुक्काम रुद्रप्रयागलाच होता आणि तो नरभक्षकाचा ठावठिकाणा शोधण्याच्या प्रयत्नात होता.त्याच्या मुक्कामाच्या काळात कोणताही नरबळी गेला नव्हता.त्यामुळे त्याने अलकनंदा नदीच्या पलीकडच्या जंगलाच्या एका छोट्या पट्ट्यात हाकारा घालायचा बेत केला होता.दिवसा त्या बिबळ्याचं पडून राहण्याचं ठिकाण त्या जंगलात असावं असा गावकऱ्यांचा कयास होता आणि याच अंदाजाच्या आधारावर हा बेत त्याने केला होता. त्यामुळे आदल्या दिवशी ते वीस यात्रेकरू पाय ओढत दुकानाच्या दिशेने चालत होते त्यावेळी पटवारी व इबॉटसनचा नोकरवर्ग आसपासच्या गावात फिरून दुसऱ्या दिवशीच्या हाकाऱ्यासाठी सकाळी तयार राहायला बजावत होते.


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ब्रेकफास्ट करून इबॉटसन,त्याची पत्नी आणि एक मित्र ( त्याचं नाव मला आता आठवत नाहीये) त्यांच्या मागे काही नोकर व हाकारा घालणारी जवळजवळ दोनशे माणसं रुद्रप्रयागचा झुलता पूल ओलांडून नदीपलीकडे मैलभर अंतर कापून डोंगर चढले आणि हाकायासाठी जागा घेतल्या.हाकारा चालू असतानाच इबॉटसनच्या रनरने साधूच्या बळीची बातमी आणली.आता हा निश्चितपणे रिकामा जाणारा हाकारा थांबवला गेला आणि उभ्याउभ्याच पुढे काय करायचं याची योजना आखली गेली.या योजनेनुसार इबॉटसन आणि पार्टी दोनशे हाकाऱ्यांना घेऊन चार मैलांवरच्या एका झुल्यावरून अलकनंदा ओलांडून परत मागे वळून त्या बळीच्या ठिकाणी आली तर त्याचा नोकरवर्ग डोंगराच्या रस्त्याने वाटेवरच्या गावांमध्ये जेवढी माणसं जमवता येतील तेवढी जमवत दुकानावर आली.

दुपारपर्यंत जवळजवळ दोन हजार माणसं जमली आणि दुकानाच्या वरच्या बाजूच्या डोंगरावर वरपासून खालपर्यंत हाकारा घालण्यात आला.ज्यांना इबॉटसन काय चीज आहे. हे माहिती असेल त्यांना निश्चित कल्पना येईल की हा हाकारा किती योजनाबद्ध पार पडला असेल.हाही हाकारा रिकामा गेला त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यावेळी बिबळ्या त्या भागात नव्हताच.


जेव्हा एखादा वाघ किंवा बिबळ्या स्वतःहून त्याचं भक्ष्य असं उघड्यावर सोडून देतो तेव्हा त्याचं त्या भक्ष्यामधलं स्वारस्य संपलं आहे हे गृहीत धरायला हरकत नसते.

अशावेळी तो भक्ष्यावर एकदाच भरपेट ताव मारून दोन-तीन मैल दूर एकांतात जाणं पसंत करतो;नरभक्षक असेल तर दहा- दहा मैल सुद्धा! त्यामुळे ही शक्यता होती की जेव्हा ते जंगल विंचरून काढलं जात होतं तेव्हा तो बिबळ्या दहा-बारा मैल दूर कुठेतरी गाढ झोप घेत असणार.


'नरभक्षक बिबळे' ही अपवादात्मक जनावरं आहेत.त्यामुळे त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसते. (मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे,आरती प्रकाशन )


माझा स्वतःचा याबाबतीतला अनुभव खूपच मर्यादित होता,फार वर्षापूर्वी फक्त एका नरभक्षक बिबळ्याशी झालेला संपर्क इतपतच; व तोही फारच थोड्या काळाकरता.त्यामुळेच नरभक्षक बनल्यावर बिबळ्यांच्या सवयी बदलतात हे जरी मला माहीत असलं तरी किती प्रमाणात त्या बदलल्या असतील याचा अंदाज करणं अशक्य होतं.त्यामुळे निदान पहिले काही दिवस तरी इतर बिबळ्याच्या शिकारीसाठी ज्या पद्धती वापरल्या जातात त्याच पद्धतीचा उपयोग करायचं मी ठरवलं.


सर्वांत जास्त वापरल्या जाणाऱ्या पद्धती म्हणजे बिबळ्याने केलेल्या भक्ष्यावर किंवा त्यांच्यासाठी बांधलेल्या जिवंत जनावराजवळ जागा घेऊन बसणे;

शक्यतो बोकड किंवा मेंढा ! पण यापैकी पहिली पद्धत वापरायची असेल तर भक्ष्याचा शोध लागणं महत्त्वाचं असतं आणि दुसऱ्या बाबतीत बिबळ्याचा ठावठिकाणा शोधणं आवश्यक असतं.माझा रुद्रप्रयागला जाण्याचा मुख्य हेतू यापुढील मनुष्यहानी बंद करणं हा होता त्यामुळे बिबळ्या पुढचा नरबळी घेईल याची वाट बघणं चूक होतं.

साहजिकच एकच गोष्ट माझ्या हातात होती ती म्हणजे काहीही करून त्याचा ठावठिकाणा शोधणे,त्याला संपर्कात आणणे,एखादं जनावर आमिष म्हणून बांधणे आणि त्याच्याजवळ बसून संधीची वाट बघणे.या इथेच माझ्यासमोर फार मोठी अडचण उभी राहीली की जिच्यावरचा तोडगा आज ना उद्या निघणारच होता.मला दिलेल्या नकाशावरून कळत होतं की या नरभक्षकाचा वावर जवळजवळ पाचशे चौ.मैल एवढ्या मोठ्या प्रदेशात होता.कुठेही पाचशे चौ.मैल एवढ्या प्रदेशात एखादं विशिष्ट जनावर हुडकून त्याची शिकार करणं मोठं अवघड काम होतं.इथे तर हा सर्व प्रदेश डोंगराळ आणि रौद्र होता. अशा भागात एखादं जनावर तेही संपूर्ण निशाचर.. शोधणं मला तर प्रथमदर्शनी अशक्यप्राय वाटलं.पण नंतर ह्या प्रदेशाला समान भागात विभागणाऱ्या अलकनंदा नदीचा विचार मनात आला.


सर्वसाधारणपणे लोकांचा असा समज होता की ही नदी बिबळ्याला कोणताही अडथळा निर्माण करू शकत नाही आणि जेव्हा नदीच्या एका अंगाला शिकार मिळणं अवघड पडतं तेव्हा तो ही नदी पोहून पार करतो.माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता.माझ्या मते कोणताही बिबळ्या कोणत्याही परिस्थितीत स्वतःला बर्फासारख्या थंड आणि फेसाळत्या वेगवान प्रवाहात झोकून देणार नाही.त्यामुळे जेव्हा म्हणून बिबळ्या एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जात असेल तेव्हा तो कोणत्यातरी झुलत्या पुलावरूनच नदी ओलांडून जात असणार.


असे दोन पूल या भागात होते.एक रूद्रप्रयागमध्येच होता आणि दुसरा रुद्रप्रयागपासून वरच्या अंगाला बारा मैलांवरच्या 'चटवापिपल' इथे होता.या दोन पुलांच्या मध्ये एक झुला होता. हाच तो झुला... ज्यावरून इबॉटसन व त्याच्या पार्टीने हाकाऱ्याच्या दिवशी नदी ओलांडली होती.एक उंदीर सोडला तर इतर कोणत्याही प्राण्याने ओलांडला नसेल असा हा ब्रिज म्हणजे आजपर्यंत मी पाहिलेल्यांपैकी सर्वांत भयानक चीज होती.हाताने वळलेल्या, धुक्यामुळे आणि जुन्या झाल्याने,काळपट पडलेल्या गवताच्या दोन समांतर केबल्स जवळजवळ दोनशे यार्ड रुंदीच्या फेसाळत्या, बर्फासारख्या थंड आणि वेगवान पात्रावरून पलीकडे गेल्या होत्या.हा प्रवाह पुढे शंभर याडीवर दोन खडकांच्या भिंतीमध्ये मोठ्या गर्जना करून आदळत होता.इथेच एकदा पाठलागावर असलेल्या रानकुत्र्यांपासून जीव वाचवण्यासाठी एका भेकराने जीवाच्या आकांताने लांब झेप घेऊन नदी ओलांडली असल्याची कथा ऐकिवात होती.या दोन समांतर केबल्समध्ये पावलं ठेवण्यासाठी गवताच्याच सैलसर दोरांनी बांधलेल्या इंच अर्धा इंच रुंदीच्या व विषम लांबीच्या कामट्या शेवटपर्यंत जात होत्या.हा एवढा भयानक प्रकार कमीच वाटला म्हणून की काय कोण जाणे पण त्यातली एक केबल जरा सैल पडली होती आणि त्यामुळे या सर्व कामट्यांचा केबलशी ४५" चा कोन झाला होता.जेव्हा मी ह्या भीषण झुल्याला पहिली भेट दिली तेव्हा मी तिथे टोल घेणाऱ्या माणसाला "ह्या झुल्याची कधी तपासणी किंवा डागडुजी केली आहे का?" हे विचारण्याचा मूर्खपणा केला होता.एका पैशाच्या मोबदल्यात माझं आयुष्य खर्ची घालण्याची परवानगी देताना तो माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघत म्हणाला की या झुल्याची तपासणी वगैरे कधी होत नाही पण पूर्वी एकदा त्यावरून जाणाऱ्या कोणा एका माणसाच्या वजनाने तो जेव्हा तुटला तेव्हा तो बदलून दुसरा झुला लावण्यात आला आहे. हे ऐकल्यानंतर माझ्या मणक्यातून जी थंड शिरशिरी गेली ती मी पलीकडे जाईपर्यंत तशीच राहीली.


तर असा हा झुला ओलांडणं ही नरभक्षकाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होती.आता उरले दोन झुलते पूल!मला आता खात्री पटली की जर मी ते दोन पूल बंद करू शकलो तर बिबळ्याला नदीच्या एका बाजूला स्थानबद्ध करू शकेन आणि माझं काम निम्म्याने हलकं करू शकेन.


आता पहिलं काम हे होतं की याक्षणी बिबळ्या नदीच्या कोणत्या बाजूला आहे हे तपासणे, शेवटचा म्हणजेच त्या साधूचा बळी हा चटवापिपल पुलापासून जवळच एका गावात नदीच्या डाव्या अंगाला झाला होता. ह्या घटनेनंतर साहजिकच सर्व लोकांनी खबरदारीचे उपाय दुपटीने जारी केले असणार त्यामुळे बिबळ्याने निश्चित नदी ओलांडलीच असणार पण हे वाचल्यावर तुम्ही विचाराल की इतकी खबरदारी घेऊनसुद्धा एका गावात पाच पाच बळी कसे गेले? मी एवढंच उत्तर देऊ शकतो की अशी सावधानता व प्रयत्न सतत करण्यालाही मर्यादा असतात.

इकडची घरं खूप छोटी आहेत आणि त्यात संडास वगैरेची सोय नसते.त्यामुळे नरभक्षक आपल्यापासून दहा-पंधरा मैल दूर आहे असं कळल्यावर एखादा माणूस,बाई किंवा मूल निसर्गनियमांनुसार आणीबाणीच्या परिस्थितीत एखाददुसरा क्षण दरवाजा उघडण्याचा धोका पत्करणं साहजिक आहे आणि ज्या संधीसाठी नरभक्षक कदाचित कित्येक रात्री वाट बघत असेल ती संधी त्याला मिळत असणार..!


२१/९/२३

कीटकांच्या अद्भुत जगात In the wonderful world of insects

महाभारतात मांडव्य ऋषींचा उल्लेख आहे. प्राचीन भारतातील तो पहिला कीटकशास्त्रज्ञ.काट्याच्या टोकाला कीटक टोचून,त्यांचा संग्रह करून,त्याविषयी तो संशोधन आणि अभ्यास करी.मांडव्य ऋषी करीत असलेली जीवहत्या त्या काळातील समाजातील प्रतिष्ठितांना आवडली नाही.त्यांनी राजाचे कान त्याच्याविरुद्ध भरून त्याला सुळावर चढवून ठार केलं.वयाच्या एकविसाव्या वर्षी चालू केलेल्या या साधनेचा शेवट त्याच्या (३३) तेहतिसाव्या वर्षी झाला.भारतातील एका कीटक

शास्त्रज्ञाचा हा शोकान्त पाहून नंतर कोणी अशा प्रयोगात लक्ष घातलं नसावं मात्र पाश्चात्त्य देशांत याविषयीचा पाठपुरावा होत होता.सृष्टिपदार्थज्ञानी ॲरिस्टॉटल यानं कीटकांविषयी आपल्या ग्रंथांतून माहिती दिली आहे.


फ्रान्समध्ये अठराव्या शतकात रूमर हा कीटकशास्त्रज्ञ झाला;परंतु कीटकासारख्या अतिक्षुद्र जीवाचा अभ्यास करण्यात त्यानं कालापव्यय करावा,याबद्दल त्या काळातील समाजानं त्याची हेटाळणी केली.रूमर त्यामुळं निराश झाला नाही.कीटकांविषयीचं शोधकार्य चालू ठेवून,'नॅचरल हिस्ट्री ऑफ इन्सेक्ट्स' या विषयावर त्यानं बारा खंड लिहून काढले. त्याच्या हयातीत फक्त पहिला खंड प्रसिद्ध झाला.त्या वेळच्या कुरिअरसारख्या नामवंत कीटकशास्त्रज्ञानं रूमरचं लेखन अनावश्यक म्हणून निकालात काढलं होतं.


रूमरच्या मृत्यूनंतर एकशेसाठ वर्षांनी विलियम मार्टिन व्हीलर यानं इ. स. १९२६ मध्ये त्याची हस्तलिखितं वाचली, तेव्हा त्याला ती अतिशय महत्त्वाची वाटली.त्यानं ती फ्रान्समधील सायन्स अ‍ॅकॅडमीतर्फे प्रसिद्ध केली.याच शतकात जे. एच.फेबर या फ्रेंच निसर्गतज्ज्ञाचा उदय झाला. होमर महाकाव्याची रचना करून अजरामर झाला तसेच,फेबरनं कीटकांवर काव्यमय लेखन केलं,म्हणून तो 'इन्सेक्ट होमर' म्हणूनही ओळखला जातो.

कीटकांविषयीची त्याची पुस्तकं जगभर वाचली जातात. इ.स.१९१५ मध्ये वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्याचं निधन झालं. तरुण फेबरविषयी डार्विननं एका ठिकाणी म्हटलं आहे की,फेबरच्या अदम्य निरीक्षणशक्तीचं कोणीच अनुकरण करू शकणार नाही.फेबर निसर्गाशी तादात्म्य पावला होता. फेबर एकदा म्हणाला,'जर डासांविषयी आपणाला परिपूर्ण ज्ञान प्राप्त होऊ शकलं, तर मानवी जीवनाचा इतिहास पुसून टाकावा लागेल.'


सॉक्रेटिसच्या शब्दांत सांगायचं म्हणजे-

'What I know best of all is that I know nothing.' (मला सर्वात चांगले माहित आहे की मला काहीही माहित नाही.')


कीटकांच्या वर्तणुकीविषयी फेबरचा व्यासंग मोठा होता.भुंगोरा,कोळी,मधमाशा,गांधीली, अळी यांचं तो निरीक्षण करीत राहिला.या कीटकसृष्टीविषयी अतिशय साध्या,सरळ,सोप्या आणि चित्रमय भाषेत त्यानं लिहिलं.कीटकांविषयीचं त्याचं समग्र वाड्मय दहा खंडांतून प्रसिद्ध झालं आहे.'वंडर्स ऑफ इन्स्टिंक्ट' हा त्याचा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे.प्रसिद्ध बेल्जियन नाटककार आणि कवी मॉरिस मेटरलिंक याची ख्याती जगातील साहित्य क्षेत्रात मोठी आहे. 'द लाइफ ऑफ द बी' हा मधमाशांविषयी,तसेच,'द लाइफ ऑफ द व्हाइट

अ‍ॅन्ट' हा वारूळ आणि वाळवी यांच्याविषयी ग्रंथ त्यानं लिहिला.ललित लेखनाद्वारे त्यानं शास्त्र सांगितलं.

अमेरिकन शास्त्रज्ञ एडविन वे टील याचा मधमाशांवरील 'गोल्डन थ्रॉंग' हा ग्रंथ अद्वितीय आहे;परंतु मेटर-लिंकचा ग्रंथ अनेक दृष्टींनी टील याच्या ग्रंथापेक्षा उत्तम आहे.

आणखी एक थोर कीटकशास्त्रज्ञ आणि लेखक युजिन माराइस याचा उल्लेख करावा लागेल. 'द सोल ऑफ द व्हाइट अ‍ॅन्ट' हा त्याचा ग्रंथ अभूतपूर्व आहे.


आपल्याकडे आर.के.नारायण आणि खुशवंत सिंग यांनी प्रसंगानुसार कीटकांविषयी इंग्रजीतून लालित्यपूर्ण लेखन केलं असलं,तरी ते जिज्ञासा आणि कुतूहल यांपोटी केलं आहे.शास्त्राचा त्याला आधार नाही.कीटकशास्त्रासारख्या क्षुल्लक वाटणाऱ्या विषयाकडं कोणी सहसा वळत नाही.

शिवाय आपले कीटकशास्त्रज्ञ त्याविषयी इतकं क्लिष्ट शास्त्रीय विवेचन करीत असतात,की ते सारं वाचकांच्या डोक्यावरून जातं.परिणामतः त्याविषयी अरुची निर्माण होते. अलीकडं कृषिविज्ञानाशी संबंधित असलेल्या कीटकांविषयी माहिती प्रसिद्ध होत असते.आश्चर्य म्हणजे,कीटकांची मराठी नावं आणि त्यांविषयीचा सोपा पारिभाषिक कोश अजूनही निर्माण होऊ शकलेला नाही.वनाधिकारी म्हणून नोकरीच्या सुरुवातीला मी डॉ.सालीम अली या प्रसिद्ध पक्षिशास्त्रज्ञाच्या सहवासात आलो. त्यांच्याबरोबर पक्षिनिरीक्षण करीत असता ते म्हणायचे,'चितमपल्ली,तुम्हांला माहीत आहे ना? पक्षिशास्त्र हे अनेक शास्त्रांचं शास्त्र आहे. पक्षितज्ज्ञांना वनस्पतिशास्त्राची,तशीच कीटकशास्त्राची माहिती पाहिजे.

त्यांना वनं आणि वनांचे प्रकार यांविषयी ज्ञान हवं. भूगोलाचा अभ्यास हवा.रसायन आणि भौतिक शास्त्रांचा परिचय पाहिजे.गणिताकडही दुर्लक्ष करून चालणार नाही.'रानकोंबड्या,चकोत्री, लावा,तित्तिर आणि रानबदकं या मृगयायोग्य पक्ष्यांच्या खाद्यसवयींचा अभ्यास करताना मला त्यांच्या पोटातून वनस्पतीच्या बियांबरोबर अनेक प्रकारच्या कीटकांचे अवशेष आढळून येत.त्या वेळी फारशी माहिती नव्हती.कोइमतूर फॉरेस्ट कॉलेजमध्ये असताना झाडांचे शत्रू असलेल्या कीटकांचा परिचय करून देण्यात आला होता. पुण्यात मी वनसंशोधन केंद्रात काम करीत असताना आपल्याला कीटकांविषयी सखोल शास्त्रीय ज्ञान असावं,हे प्रकर्षानं जाणवलं,तेव्हा मी विचार केला,दोन-तीन वर्षांची अध्यासन रजा घेऊन या शास्त्राचा विद्यापीठात अभ्यास करावा; परंतु अनेक कारणांमुळं ते शक्य झालं नाही.परंतु कीटकांच्या अदभुत जीवनाविषयी माझ्या मनात जिज्ञासा होती.या रुचीतूनच मी ॲरिस्टॉटल,

फेबर,मेटरलिंक,टील आणि जेराल्ड ड्युरेल यांची पुस्तकं वाचली.त्यातूनच कीटकांचं जग पक्ष्यांच्या जगापेक्षाही गूढरम्य असल्याची प्रचीती आली.पक्षिनिरीक्षणाबरोबर मी वेळ मिळेल,तेव्हा कीटकांचं देखील जंगलभटकंतीत अवलोकन करू लागलो.त्यांच्या जीवनदर्शनानं मी थक्क झालो.एस. एच. स्केफ या कीटकशास्त्रज्ञाला एका मुलाखतीत विचारण्यात आलं की,


'तुम्ही जर मानव नसता,तर कोणत्या प्राण्याचा जन्म घेणं तुम्हांला आवडलं असतं ?


त्यावर स्केफ म्हणाला,


'मला कालव-शिंपला (ऑइस्टर) व्हायला आवडेल. '


हे त्याचं उत्तर ऐकून परीक्षकाला आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, 'का बरं?'


'कारण कालव-शिंपल्याच्या जीवनाला नर म्हणून सुरुवात होते.नंतर त्याचं रूपांतर मादीत होतं अन् शेवटी तो अर्धनारीनटेश्वर होतो.जीवनाच्या सर्व थरांच्या अनुभवांतून तो जातो.त्यामुळं संपूर्ण जीवनाविषयीचं ज्ञान त्याला अवगत होतं.' परीक्षकांना हे उत्तर आवडलं,हे सांगायला नकोच.


कीटकांच्या जीवनाविषयी अभ्यासाला कोठून आणि कशी सुरुवात करावी,हेच लक्षात येत नाही.आजूबाजूचा सारा परिसर नाना अवस्थांतून जाणाऱ्या,उडणाऱ्या,गाणाऱ्या,गुणगुणणाऱ्या रंगीबेरंगी कीटकांनी व्यापलेला आहे.सुमारे ७०,००,००० प्रकारच्या कीटकांची ओळख झाली आहे दर वर्षी त्यात नवनवीन कीटकांच्या जातींची भर पडत असते.या भूतलावर अस्तित्वात असणाऱ्या प्राणि

जगतापेक्षा तिपटीनं कीटकांच्या जाती आहेत.


डायनोसोर अस्तित्वात होता,तत्पूर्वी तीनशे कोटी वर्षांपासून कीटकसृष्टी पृथ्वीवर आहे.त्यांच्या आवाजानं आजूबाजूचं वातावरण भरलेलं आहे. अभयारण्यात जाणाऱ्या पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना वाघ,सिंह,हत्ती,

गेंडे पाहायचे असतात.त्यांचं लक्ष चुकूनही या अदभुत कीटकांच्या जगाकडं जात नाही.


माझ्यासारखा पक्षिप्रेमी जंगलातील ओढ्याकाठी हिंडताना कीटकांचं अनायासे दर्शन झाल्यावर त्यांना अधिक वेळ न्याहाळीत असतो.


एक दिवस ओढ्याच्या काठानं जात असता शिकारी गांधीलमाशी उडताना दिसली.मी तिच्याकडं पाहू लागलो.

तिनं तोंडात अळी धरली होती.उडत- उडतओढ्याकाठच्या भुसभुशीत दरडीवर असलेल्या बिळातील घरट्याकडं ती जात होती.तिच्या तोंडातील अळी गांधीलमाशीपेक्षा आकारानं मोठी होती.गांधीलमाशीनं मला पाहिलं असावं.

कारण घरट्याजवळ येताच ती क्षणभर अस्वस्थपणे पिंगा घालू लागली.नंतर ती बिळाजवळ अलगद उतरली.

घरट्याचं छिद्र तिनंच तयार केलं होतं.पुढच्या पायानं माती उकरून ती मागच्या पायानं बाहेर काढून टाकीत होती.


मी तिच्याकडे एकाग्रतेनं पाहात होतो.वळसे घेत गेलेल्या छिद्रात बेशुद्धावस्थेत असलेल्या अळीसह तिनं प्रवेश केला.सुरक्षित ठिकाणी त्या अळीला ठेवून ती त्यावर अंडी घालणार होती. अतींद्रिय ज्ञानाच्या साह्यानं ती नांगीनं अळीच्या छातीजवळ असलेल्या मज्जातंतू केंद्रावर असा काही नियंत्रित दंश करते,की भक्ष्य तर जिवंत राहावं;मात्र त्याची हालचाल होऊ नये.अशा अवस्थेत अळी निश्चेष्ट पडली असता,अंड्यांतून बाहेर येणाऱ्या अर्भकांना अनायासे भोजन मिळतं.तसेच,ती सुरक्षितही राहतात.

पाखरमाया - मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी,नागपूर


अळी आत ठेवून ती नंतर बाहेर उडत आली.घरट्याचं छिद्र तिनं रेतीच्या कणांनी बंद केलं. घरट्याचा मागमूस लागू नये,तसेच आजूबाजूच्या वातावरणाशी ते एकरूप व्हावं,म्हणून गवताच्या काड्या घरट्याभोवती तिनं टाकल्या आणि ती तिथून निघून गेली.नंतर योग्य वेळी परत येताना ती तोंडात वाळूचा खडा आणून या घरट्याचा बंद दरवाजा फोडते.


मी मनात विचार करीत होतो की,


'शिकारीसाठी दूरवर गेल्यावर गांधीलमाशी आपलं घरटं पुन्हा कशी शोधून काढीत असेल? तिला दिशांचं ज्ञान कसं होत असेल ? गांधीलमाशी परत या घरट्याकडं येईल,तेव्हा आतील अर्भकाचं रूपांतर पंख फुटलेल्या गांधीलमाशीत झालेलं असेल का?'


परवा मी केशिराज संकलित 'दृष्टांत पाठ' वाचताना भींगरुटीएचा दृष्टांत वाचून थक्क झालो.


भींगरुटी असे : ते कीटकीतें पाहे: 

धरी : कांटा रोवी :

नेऊनि आपुलेया घरांतु घाली : दार 

लींपौनि जाए ।

एउनि मागुती मातें खाईल म्हणौनि 

भेणें तीएतें चींती :

चिंतीत चिंतीतां तीसीहि पाख नीगति :

तेही तीएसारीखी होए ।। (९६)


मला असं सांगायचं नाही,की महानुभाव पंथातील अनुयायांना शास्त्रीय दृष्टी होती; परंतु रानावनांतून भटकंती करणाऱ्या महानुभावांच्या नजरेतून गांधील

माशीविषयीचं निरीक्षण सुटलं नव्हतं.त्यांनी ते सहज पाहिलं.परमेश्वर आणि भक्त यांविषयीचं जे तत्त्वज्ञान सांगायचं ते गांधीलमाशी व अळी यांच्या साह्यानं त्यांनी अतिशय काव्यमय शैलीत सांगितलं आहे,ते मला खूप आवडलं.