जेव्हा रस्त्यात एखादा चिनी आपणास भेटतो, तेव्हा अहंकार-प्रदर्शक तुच्छतेने आपण त्याच्याकडे पाहतो.परंतु चिनी मनुष्यही त्याच तुच्छतेने आपणाकडे पाहत असतो. असे तुम्हाला सांगितले,तर तुम्हाला एकदम धक्का बसल्यासारखे होईल,नाही ? चिनी मनुष्य आपणा पाश्चिमात्यांस अडाणी,अहंकारी अशी जंगली लोकांची एक जात.असे मानतो.तीन हजार वर्षांपर्यंत चिनी जनतेने ज्ञानी पुरुषांची वीरपुरुष समजून पूजा केली.तलवारीची पूजा न करता त्यांनी ज्ञानाची पूजा केली.जी राष्ट्रे आपल्या सैनिकांना नि आपल्या कुबेरांना श्रेष्ठ नागरिक समजतात,
अशा राष्ट्राविषयी चिनी मनुष्य आदर दाखविणे सुतराम अशक्य आहे.चिनी लोकांस स्वतःच्या इतिहासाचा फार अभिमान वाटतो.त्यांच्या दंतकथांप्रमाणे त्यांची संस्कृती वीस हजार वर्षांची जुनी आहे.या दंतकथा आणखी असे सांगतात,की चिनी लोकांचे पूर्वज हे जवळ जवळ पशुतम स्थितीतच होते.ते गुहांमध्ये राहात,कातडी पांघरीत.नंतर कित्येक शतकांनी एक महान राजवंश आला. त्या राजांनी लोकांना शेती शिकविली;त्यांनी त्यांना सुधारणा नि
संस्कृती दिली.डार्विनच्यापूर्वी कित्येक हजार वर्षे ज्ञानगाथा रचणाऱ्या त्या चिनी ऋषिमुनींना उत्क्रांतीची अंधूक का होईना, कल्पना असावी असे वाटते.
संस्कृतीच्या पुरातनत्वाविषयीची त्यांची कल्पना अतिशयोक्तीची आहे,काव्यमय आहे.चीन देशातील संस्कृतीच्या प्रत्यक्ष खुणा ख्रिस्तपूर्व दोन हजार वर्षांपासूनच्या सापडतात.या वेळेस त्यांनी चित्रलिपीचा आरंभ केला होता.तिची वाढ ते करू लागले होते.( मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - सानेगुरुजी,मधुश्री पब्लिकेशन,ख्रिस्ताचा आध्यात्मिक पिता कन्फ्यूशियस या मधील लेख )
चीनच्या आरंभीच्या इतिहासात शत्रूच्या स्वाऱ्यांचा त्यांना त्रास झालेला दिसत नाही. चीनलाही विजयध्वज मिरवीत जाण्याची इच्छा नव्हती.चीनमध्ये सैनिक हा खालच्या दर्जाचा मानला जाई.सैनिकांची प्रतिष्ठा तिथे नव्हती. खाटीक,व्यापारी,सैनिक हे एकाच दर्जाचे,वरचे स्थान ज्ञानोपासकांना असे.राजांची स्तुती त्यांच्या दिग्विजयांसाठी केली.जात नसे,तर शांतता ठेवीत म्हणून.
चिनी प्रजा युद्धाचा तिरस्कार करी. जीवन सुसंस्कृत असावे असे त्यांना वाटे.सज्जन व सुसंस्कृत अशा उदात्त जीवनाची भक्ती त्यांच्या ठायी होती.अशा निर्मळ जीवनाविषयी त्यांना परमादर वाटे.रेशमाच्या किड्यांची त्यांनी वाढ केली.रेशमाचा व्यापार त्यांनी सुरू केला. पागोडाचे अद्भुत शिल्प त्यांनी निर्मिले व त्याची वाढ केली.एकावर एक तंबू उभारल्याप्रमाणे त्यांचे हे शिल्प दिसते.त्यांनी वैद्यकीचा अभ्यास केला,काव्याची जोपासना केली.ताऱ्यांच्या गतींशी त्यांनी परिचय करून घेतला.
बहुजन समाजाला शिक्षण मिळावे व राज्यकारभार नीट चालावा म्हणून पंडितवर्गाची,मांदरिनवर्गाची संस्था त्यांनी स्थापिली.या वर्गात वंशाला मान नसून ज्ञानाला मान असे.
येथे ज्ञानाची प्रतिष्ठा होती.एखाद्या झाडूवाल्याचा मुलगाही मांदारिन होऊ शकत असे.आवश्यक असे ज्ञान त्याने मिळवलेले असले म्हणजे झाले.उलट,एखादा मांदारिनाचा मुलगाही जर त्याला विद्वता नसेल, तर झाडूवाला होत असे. हे मांदारिन म्हणजे आळशी लोक नव्हते.ते सनदी नोकरीत शिरत. राजाला देशाची व्यवस्था ठेवण्यासठी ते मदत करीत.चीनमध्ये राजसत्ता होती.परंतु अनियंत्रित जुलूम नव्हता.बहुतेक चिनी प्रांतांना प्रबुद्ध अशा राजसत्तेचा अनुभव येई.परंतु असे समजू नका,की त्या काळातील चीन म्हणजे निर्दोष भूमी होती.राजाला मदत करणारे पंडित हे नेहमीच प्रामाणिक असत असे नाही.
राजाची मर्जी मिळविण्यासाठी खुशामतीचा वक्र रस्ताच अधिक जवळचा असतो,असे त्यांना आढळून आले होते.लाचलुचपतीस भरपूर वाव होता. धनार्जन करण्याच्या संधी येत आणि तत्त्वज्ञानी असणारे हे मुत्सद्दीही मोहाला बळी पडल्याशिवाय राहात नसत.कधी कधी तत्त्वज्ञान्यालाही स्वतःचे खिसे सोन्याने भरलेले असावेत असे वाटते.तसेच हे तत्त्वज्ञानी जर कधी प्रामाणिक निघाले,तर राजे त्यांचा सल्ला ऐकतच असे होत नसे.या प्राचीन चिनी लोकांत पूर्णता होती.असे समजण्याचे कारण नाही.काही अतिरंजित इतिहासकारांनी चीन म्हणजे जणू स्वर्ग असे चित्र रंगविले आहे,ते बरोबर नाही.चिनी लोकांमध्ये इतरत्र आढळणारा आणखी एक दोष होता.ते फार अहंकारी होते.जे जे परकी येत,ते त्यांना सैतानी वाटत.परकीयांना ते सदैव तिरस्काराने वागवीत.त्यांच्या देशाचे प्राचीन नाव 'मध्यदेश', 'मध्यराज्य' असे होते.त्यांची अशी समजूत होती,की परमेश्वराने आपणास पृथ्वीच्या मध्यभागी ठेवले आहे.इतर राष्ट्रांपेक्षा आपणच प्रभूचे अधिक लाडके असे त्यांना वाटे. आपण काय ते श्रेष्ठ;असे मानण्याचा मूर्खपणा करण्यात ते अर्वाचीनांच्या बरोबरीचे होते.परंतु कितीही दोष असले,तरी चिनी लोक ख्रिस्तीशकापूर्वीच्या नवव्या शतकात उच्च संस्कृतीवर होते.ही गोष्ट नाकबूल करण्यात अर्थ नाही.परंतु नंतर दुर्दिन आले.हूणांशी त्यांचा संबंध आला.हे हूण चीनच्या पश्चिमेस होते.ते शेळ्या-मेंढ्या पाळीत.ते रानटी होते.शांतताप्रिय चिनी लोकांत लष्करी सत्तेचे विष त्यांनी पोहोचवले.हे पाश्चिमात्य जंतू त्यांच्यात शिरले. चीनमध्ये आजही पाश्चिमात्य लष्करशाहीचे जंतू शिरताना दिसत आहेत.हूणांशी संबंध आल्यामुळे सत्तालालसेचे जे विष चिनी राष्ट्रांत शिरले ते नष्ट करावयास बरीच वर्षे लागली.कितीतरी यादवी युद्धे झाली.आणि नंतर अराजकतेचा काळ आला.सारा देश जणू वेडापिसा बनला.सर्वत्र हाणामारी! वाटेल त्याने उठावे व लहान राज्य स्थापावे.देशाचे शत खंड झाले,
अनेक छोटीछोटी राज्ये सर्वत्र निर्माण होऊन ती परस्परांस नष्ट करू पाहात होती.यावेळी बाहेरचे रानटी लोक आले.
विस्कळीत चीन या रानटी टोळधाडीपुढे टिकाव धरू शकला नाही.परंतु सुदैवाने याच सुमारास चीनमध्ये थोर विचारवंत जन्माला आले.त्यांनी लोकांना पुन्हा समतोलपणा दिला.विवेक दिला.या ज्ञानी व चारित्र्यसंपन्न लोकांत दोन मुकुटमणी होते.एक लाओत्से व दुसरा कन्फ्यूशियस.
लाओत्से ख्रिस्त पूर्व सहाव्या शतकात जन्मला. कन्फ्यूशियसपेक्षा लाओत्से पन्नास वर्षांनी वडील.अती पूर्वेकडील भागातील लाओत्से,बुद्ध व कन्फ्यूशियस हे तीन परत थोर महात्मे,मानव जातीचे हे सदगुरू एकाच शतकात झाले,ही महत्त्वाची गोष्ट ध्यानात धरण्यासारखी आहे. धन्य ते शतक !
जॉन दी बॅप्टिस्ट हा जसा ख्रिस्ताचे आगमन सुचविणारा होता,त्याप्रमाणे लाओत्से कन्फ्यूशियसचा जणू अग्रदूत होता.त्याने कन्फ्यूशियससाठी भूमिका तयार करून ठेवली.त्याने कन्फ्यूशियसच्या आगमनाचे जणू शिंग फुंकले.परंतु कन्फ्यूशियसची विचारसरणी जशी स्पष्ट असे,त्याची भाषा जशी साधी व सरळ असे,तसे लाओत्सेचे नसे.लाओत्सेच्या विचारांत विशदता नव्हती.तो थोडा गूढवादी होता. लाओत्से लोकांना उपदेशी, "न्यायावर प्रेम करा; नेमस्त व संयमी बना; प्रमाण राखा, देहान्त शिक्षा रद्द करा; युद्धाचा धिक्कार करा, जगण्यासाठी हे जग अधिक सुखाचे व आनंदाचे करा." ही ध्येये अती सुंदर होती यात शंका नाही. परंतु प्राथमिक अवस्थेतील राष्ट्राला ही ध्येये जरा अमूर्तच होती,
अर्थहीन,दूरची अशी होती. लाओत्से पुष्कळ वेळा रहस्यमय बोले,गूढ बोले. त्याच्या म्हणण्याचा भावार्थ फारच थोड्यांच्या लक्षात येई.त्या बेबंदशाहीच्या काळात चीनला जर कशाची खरोखर जरूर असेल,तर ती व्यवहार्य व समजण्यास सोप्या अशा निश्चित आचारनियमांची होती.दैनंदिन व्यवहारात सर्वांनी कसे वागावे ते सांगणारी व सर्वसंग्राहक अशी सोपी.सुटसुटीत स्मृती त्यांना हवी होती. लाओत्से हे करू शकत नव्हता.तो फार उंच पडे लोकांनी लाओत्सेला देव बनविले.आणि भविष्यकालीन मोक्षप्राप्तीसाठी ते त्याची प्रार्थना करू लागले.परलोकासाठी लाओत्से,परंतु इहलोकी कन्फ्यूशियसच त्यांचा खरा मार्गदर्शक होता. कन्फ्यूशियस किंवा कुंग-फू-त्सी या नावाचा "तत्त्वज्ञानी कुंग" असा अर्थ आहे. त्याच्या पित्याचे नाव शुहलिंग,तो पित्याचे बारावे अपत्य होता.शुहलिंग हा सैनिक होताकू-प्रांतात तो राहात असे.चीनमध्ये सैनिकांना सामान्यतः मान कमी.परंतु त्या वेळेस सैनिकांची किंमत जरा वाढली होती.नैतिक मूल्यांचे जरा पुन्हा मूल्यमापन केले गेले.त्या वेळेस सर्वत्र लष्करी धिंगाणे चालले होते.
गावांचे,शहरांचे रक्षण करणे अगत्याचे असे.कोण कधी हल्ला करील,याचा नेम नसे.म्हणून सैनिकांची प्रतिष्ठा जरा वाढली होती.शुहलिंग हा शूर शिपाईगडी होता.त्याला खूप मानमान्यता मिळाली होती.अनेक पदव्या मिळाल्या होत्या.तथापि तो सुखी नव्हता.त्याला नऊ मुली झाल्या,
परंतु मुलगा नव्हता.त्याची एक रखेली होती.तिच्यापासून त्याला दोन मुलगे झाले.परंतु ते औरस नव्हते.सनातनी चिनी मनुष्यास एक तरी औरस पुत्र असावा असे वाटे, जसे सनातनी ज्यूस अद्याप वाटते.मृत पित्यासाठी जे विधी करावयाचे,ते चिनी लोकांत व ज्यू लोकांत फक्त औरस पुत्रच करू शकतो.म्हणून शुहलिंगने पुन्हा लग्न करण्याचे ठरविले. त्याचे वय सत्तरहून अधिक होते.नऊ मुलांची माता ती पहिली पत्नी त्याने दूर केली आणि एका लहान मुलीबरोबर त्याने लग्न केले.चीनमध्ये पत्नीला पुत्र होत नाही ही सबब काडीमोडीसाठी होई आणि हे जे अप्रस्तुत व असमान असे विषम लग्न लागले,त्याचे फळ म्हणून पूर्वेकडील अत्यंत शहाणा मनुष्य जन्माला आला.
ख्रि.पू.५५१ मध्ये कन्फ्यूशियस जन्मला.वयाच्या
तिसऱ्या वर्षी कन्फ्यूशियस पितृहीन झाला.कन्फ्यूशियस अती बुद्धिमान होता.लहान वयातच त्याची अलौकिक बुद्धी दिसू लागली. त्याच्या त्या निरोगी व धष्टपुष्ट शरीरात अत्यंत प्रभावी असे मन होते;अती प्रभावशाली बुद्धी होती.तो व्यायामाचा फार भोक्ता होता.परंतु त्यापेक्षाही काव्याचा व संगीताचा अधिक भक्त होता.भराभरा त्याने सारे ज्ञान आत्मसात केले. वयाच्या पंधराव्या वर्षीच त्याचे गुरुजन त्याला म्हणाले,"तुला शिकवायला आता आमच्याजवळ काही उरले नाही."पुढे दोन वर्षांनी त्याला अकस्मात स्वत:चा अभ्यास सोडावा लागला.त्याची आई गरीब होती.तिला त्याची मदत हवी होती.आईला आधार देणे त्याचे कर्तव्य होते.आपल्या देशाच्या लहान राज्यातील शेतीखात्यात तो कारकून झाला.सतरा वर्षांच्या मुलाला ती जागा झेपायला जरा कठीणच होती.परंतु कन्फ्यूशियसने कुरकूर केली नाही.वास्तविक स्वतःचा जेवढा बोजा, त्याहूनही तो अधिक उचली.त्याला जणू ती सवयच होती.कारकुनी डोक्यावर असतानाच लग्न करून त्याने बायकोचा आणखी बोजा उचलला.लग्नाच्या वेळेस त्याचे वय केवळ एकोणीस वर्षांचे होते.एका वर्षांने त्याला पहिला मुलगा झाला.त्याचे हे लग्न सुखप्रद झाले नाही. का ते कळत नाही.कदाचित त्याच्या पत्नीला सुंदर सुभाषितांपेक्षा अधिक रूचकर व स्वादिष्ट अशा अन्नाची जरुरी असावी.कन्फ्यूशियस आपल्या शिष्यांना उपदेशाचे,सुंदर सूत्रमय वचनांचे खाद्य देई;परंतु पत्नी या शब्दांनी थोडीच संतुष्ट होणार!तिला प्रत्यक्ष पोटभर अन्न हवे होते.
चोविसाव्या वर्षी त्याची आई त्याला सोडून गेली. सनातनी चिनी रूढीप्रमाणे मातृशोकप्रदर्शनार्थ त्याने नोकरी सोडली.मातृशोकप्रदर्शनाची मुदत अडीच वर्षांची असे.
कन्फ्यूशियसने ती अक्षरक्ष: पाळली.कन्फ्यूशियस आपल्या देशाचे सारे रीतिरिवाज पाळण्यात अत्यंत दक्ष असे.कन्फ्यूशियस जरी तरुण होता,वयाने अद्याप फारसा मोठा नव्हता.तरी स्वतःच्या मित्रमंडळींत सौम्य व शांत स्वभवाचा,तसेच अती बुद्धि मान म्हणून त्याची ख्याती झाली.त्याची बुद्धी खरोखरच तेजस्वी होती.त्याचे मन प्रगल्भ होते. एका मित्रांनी आग्रह केल्यावरून तो फिरता आचार्य झाला,परिवाजक उपदेशक झाला.तो जेथे जेथे जाई तिथे तिथे निष्ठावंत शिष्यांचा मेळावा त्याच्याभोवती जमे.बैलगाडीत बसून तो या गावातून त्या गावी जात असे.
मधूनमधून विश्रांतीसाठी तो मुक्काम करी.एखाद्या नदीकाठी थांबे;शिष्यांना प्रवचन देई.प्रश्नोत्तरे चालत,चर्चा होई.कधी भाताच्या शेताजवळ मुक्काम पडावा. कधी चेरी झाडांनी सुगंधित केलेल्या स्थानी ते थांबत.अशा रीतीने सर्वत्र संचार करीत असता संसाराला उपयोगी असे ज्ञान तो सर्वत्र पेरीत जाई.ते विचार देशभर पसरले.जे श्रीमंत असत त्यांच्याजवळून तो थोडी गुरुदक्षिणा घेई.जे गरीब असत.त्यांनी मूठभर तांदूळ किंवा वाळलेला मांसखंड दिला,तरी त्याला समाधान असे.उदार व उदात्त जीवनाची शिकवण त्याने सर्वत्र दिली. तोच त्याचा अविरत उद्योग होता.श्रेष्ठ अशा मानवांचा एक नवीन वंशच तो चीनमध्ये जणू निर्मू पाहात होता. जणू श्रेष्ठ पुरुषांचे प्रतिष्ठित असे राष्ट्रच निर्माण करण्याचे त्याचे ध्येय होते.
लोकांना नीट वळण द्यायचे असेल, तर आधी न्यायी राज्यव्यवस्था हवी,ही गोष्ट कन्फ्यूशियसच्या लक्षात आली.तो हेतू मनात धरून तो सर्व प्रांतांतून भटकला. तो निरनिराळ्या राजांना भेटला व म्हणाला, "मी तुमचा प्रधान होऊ का? चांगला राज्यकारभार निर्माण करतो.माझे विचार प्रत्यक्षात आणतो." हा तत्त्वज्ञानी अशा राजाच्या शोधात होता. इतिहासातील अत्यंत विचित्र व आश्चर्यकारक असा हा शोध होता.कधीकधी वाटे,की त्याच्या शोधात त्याला यश येईल,एखादा राजा त्याला प्रयोगाला वाव देईल. त्या वेळचा 'चि' प्रांत म्हणजे अती बंडखोर प्रांत होता.त्या प्रांतांच्या राजाने आपल्या दरबारी कन्फ्यूशियसला महत्त्वाची जागा देऊ केली.परंतु एका मत्सरी मंत्र्याने राजाचे कान फुंकले आणि आयत्या वेळेस राजाने नकार दिला. कन्फ्यूशियस पुन्हा आणखी एखादे प्रयोगार्ह राज्यक्षेत्र शोधीत निघाला.तो आपल्या स्वतःच्या लू प्रांती आला.लू प्रांताच्या राजाने त्याला एका शहराचा मेयर नेमले.नंतर त्याने त्याला सर्व राज्यातील मुख्य न्यायाधीश म्हणून नेमले. तो न्यायमंत्री झाला.
कन्फ्यूशियस सम्राटाला म्हणाला,"लोकांना सदैव शांती दे व पोटभर अन्न दे.
उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..