* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: नोव्हेंबर 2023

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३०/११/२३

पहिल्यांदा स्वतःची चूक कबूल करा.. First admit your mistake..

माझी पुतणी जोसेफिन कार्नेगी ही न्यू यॉर्कला सेक्रेटरीचे काम करण्यासाठी माझ्याकडे आली. ती अवघी एकोणीस वर्षांची होती आणि तीन वर्षांआधी तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.एखाद्या व्यवसायासंबंधीचा तिचा अनुभव तर खूपच कमी होता,जवळजवळ नव्हताच! आणि सध्या ती पश्चिम सुएझमधील एक उत्तम सेक्रेटरी म्हणून ओळखली जाते;पण आधी परिस्थिती तशी वाईट होती.तिच्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणणे अत्यंत आवश्यक होते. एक दिवस मी तिला वाईट बोलणार होतो;पण मी जरा स्वतःला सावरले आणि मनाशी विचार केला की,'जरा थांब डेल कार्नेगी! थांब! तुझे वय हे जोसेफिनच्या जवळजवळ दुप्पट आहे.या तुझ्या व्यवसायाचा तिच्यापेक्षा कितीतरी पट अधिक अनुभव तुला आहे,त्यामुळे ती आत्ताच तुझ्या दृष्टिकोनातून सर्वकाही पाहू शकेल,समजू शकेल हे खरेच शक्य आहे का?आज तू तुझ्या कामात तरबेज आहेस;पण जेव्हा तू एकोणीस वर्षांचा होतास,तेव्हा कसा होतास हे तूच जरा आठव,त्या वयामध्ये किती मूर्खपणा व किती चुका तू स्वतः केल्या होत्यास ते जरा नीट आठव.त्या वेळेची आठवण ठेव.ते आठवताना बरेच प्रसंग तुझ्याभोवती आठवणींचा फेर धरतील.'आणि अशा प्रकारे भूतकाळ आठवून मी प्रामाणिकपणे आणि निःपक्षपातीपणे स्वतःच्या मनाशी कबूलच करून टाकले की,'जोसेफिनचा एकोणिसाव्या वर्षी सुरू असलेला हा प्रयत्न, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने उत्तम आहे.'आणि खरंतर मला हे सांगायला सुद्धा लाज वाटते की, मी जोसेफिनशी त्या वेळी चार कौतुकाचे शब्दसुद्धा बोलत नव्हतो.


मग नंतर जेव्हा जेव्हा जोसेफिनच्या चुका मला दिसत आणि त्या तिला दाखवायची आवश्यकता असेल,तेव्हा मी तिला जरा वेगळ्या प्रकारे म्हणे की, 'जोसेफिन, तू थोडी चुकली आहेस;पण खरा सांगायचे तर देवाशप्पथ ही तुझी चूक मी केलेल्या चुकांएवढी वाईट नाही.एक आहे,तू या गोष्टी काही जन्मजात शिकून आली नाहीस.या आणि इतर काही गोष्टी या अनुभवातूनच शिकायच्या असतात.

तुझ्या वयाचा मी असताना जसा होतो त्यापेक्षा तू तर खूपच बरी वाटते आहेस.मी स्वतः खूप गंभीर चुका केल्या आहेत, त्यामुळे तुला किंवा इतर कोणालाही दोषी ठरवण्याचा माझा प्रयत्न आणि अट्टहास नाही; पण असे वाटत नाही का की,तू यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने हे काम केले असतेस,तर जरा बरे झाले असते ?'


दुसऱ्यांच्या चुकांचा पाढा वाचण्याआधी जर एखाद्याने सुरुवातीलाच हे कबूल केले की,त्याने स्वतःसुद्धा बऱ्याच चुका केल्या आहेत,तर लोकांना त्यांचे दोष त्या व्यक्तीकडून ऐकणे तसे सोपे जाते.


कॅनडामधील ब्रेंडन येथे इ.जी.डिलिस्टोन नावाचा एक इंजिनिअर होता.त्याच्याकडे काम करणाऱ्या नवीन सेक्रेटरीबद्दल तो फारसा खूश नव्हता.जी पत्रे तो सेक्रेटरीला तोंडी सांगून टाइप करायला देत असे ती पूर्ण टाइप झाली की,त्यातील प्रत्येक पानावर दोन किंवा तीन चुका हमखास असायच्या.जेव्हा ती पत्रे त्याच्या टेबलावर सहीसाठी येत तेव्हा हे लक्षात येत असे.मि. डिलिस्टोनने ही परिस्थिती कौशल्यपूर्ण पद्धतीने हाताळली.ती अशी,


बहुतांश इंजिनिअर्सप्रमाणेच इंग्लिश भाषेवर माझे पूर्ण प्रभुत्व वगैरे नव्हते आणि इंग्रजी स्पेलिंग लिहिण्याच्या बाबतीमध्येही तसा मी बिनचूक नव्हतो.गेल्या अनेक वर्षांपासून काही विशिष्ट शब्दांच्या स्पेलिंगमध्ये माझ्या चुका होतात.ते सर्व शब्द मी एका वहीत लिहून ठेवून, ती वही सदैव माझ्या ड्रॉवरमध्ये मी ठेवतो. माझ्या हे लक्षात आले की,या नव्या सेक्रेटरीला तिच्या चुका दाखवून किंवा डिक्शनरी वापरायला देऊन हा प्रश्न सुटणार नाही.मग जरा वेगळी युक्ती करण्याचे मी ठरवले.चूक झाल्यानंतर जेव्हा पुढील काही पत्र मी तिला टाइप करण्यास सांगत होतो,त्या वेळीच माझ्या लक्षात येत गेले,की त्यामध्ये काही चुका होत आहेत.मग मी स्वतःच टायपिस्टबरोबर बसलो आणि म्हणालो की,मला का कोण जाणे,पण हा शब्द थोडा खटकतो आहे.या अशा शब्दाच्या स्पेलिंगच्या बाबतीत मला नेहमीच जरा गोंधळायला होते. (मग तो शब्द ज्या ठिकाणी किंवा ज्या पानावर आहे ते पान काढतो.) हे बघ हं! हा तो शब्द.शब्दांच्या स्पेलिंगच्या बाबतीत मी जरा जास्तच सावध असतो,कारण आपली ही पत्रे वाचून लोक आपले व्यक्तिमत्त्व ठरवतात. शिवाय स्पेलिंगच्या अशा साध्या चुका दिसल्या की आपली व्यावसायिक प्रतिष्ठाही जरा कमी होते.मला हे समजले नाही की,तिनेसुद्धा मी ठेवत असे तशी अडखळणाऱ्या शब्दांची वही केली की आणखी वेगळे काही केले;परंतु तेव्हापासून तिचा चुका करण्याचा वेग जाणवण्याइतपत मंदावला.इ.स.१९०९ मध्ये एका सभ्य,सुसंस्कृत राजकुमारास बर्नहार्ड व्हॉन बुलॉला तर हे शिकण्याचीच तीव्र गरज पडली.


त्या वेळी व्हॉन बुलॉ हा जर्मनीचा इंपेरियल चान्सिलर होता आणि विल्हेम (दुसरा) सिंहासनावर बसलेला होता.

विल्हेम खूपच गरम डोक्याचा, उर्मट आणि शेवटचा कैसर होता.त्याने अशा बढाया मारल्या होत्या की,आर्मी आणि नेव्हीच्या स्थापनेमध्ये त्याने खूप मोलाची कामगिरी केली आहे आणि त्या कामामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे.नंतर एक आश्चर्यकारक आणि तशी विचित्रच घटना घडली.

कैसरने खूप अविश्वसनीय आणि अतिरंजित गोष्टी सांगितल्या.अशा गोष्टी की,ज्यामुळे फक्त देशच नाही,तर सगळ्या जगालाच आश्चर्याचा धक्का बसला.हे कमी पडले म्हणून कैसरने सार्वजनिक ठिकाणी अगदी जाहीरपणे त्याच्या मूर्खपणाच्या आणि मीपणाच्या पोकळ बढाया मारल्या.या गोष्टी त्याने,जेव्हा तो इंग्लंडला राजकीय पाहुणा म्हणून गेला होता तेव्हा केल्या.यावरचढ म्हणजे हे सगळे प्रकार त्याने 'डेली टेलिग्राफ' या वृत्तपत्रात छापण्याची शाही परवानगीसुद्धा दिली. 


उदाहरणार्थ,त्याने हे जाहीर केले की,तोच फक्त एकटा असा जर्मन आहे की,ज्याला इंग्लंड आपला मित्र वाटतो.दुसरी गोष्ट म्हणजे जपानवर हल्ला करण्या

करिताच नेव्हीला त्याने अजून बळकट केले होते.तिसरे म्हणजे की,त्यानेच इंग्लंडला रशिया आणि फ्रान्स यांच्यासमोर गुडघे टेकण्यापासून वाचवले होते आणि साउथ आफ्रिकेतील बोअर्सचा पराभव करण्यासाठीचा सर्व आराखडा त्याचाच होता आणि त्यामुळेच इंग्लंडला यश मिळाले.हे आणि आणखी असे बरेच काही!शंभर वर्षांच्या शांततामय काळामध्ये त्या वेळेपर्यंत कुठल्याही युरोपियन राजाच्या तोंडातून अशा प्रकारचे विपरीत,

विचित्र आणि बेताल शब्द बाहेर पडले नव्हते. मधमाश्यांच्या एखाद्या पोळ्यातून घोंघावणाऱ्या माश्या एकदम बाहेर पडाव्यात तसेच काहीसे घडले.इंग्लंड क्रोधीत झाले.जर्मन मुत्सद्दी संतापून लालेलाल झाले.

अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये कैसर पार बावचळला आणि त्याने व्हॉन बुलॉला सुचवले की,आता या सगळ्याची जबाबदारी त्याने स्वतःवर घ्यावी.कैसरने इच्छा केली की, व्हॉन बुलॉने हे जाहीर करावे की,त्यानेच राजाला असे सर्व बोलण्याचा आणि करण्याचा सल्ला दिला आणि म्हणून सगळी जबाबदारी ही बुलॉची असावी.


व्हॉन बुलॉने या प्रकाराला विरोध केला आणि तो म्हणाला, "महाराज, जर्मनी काय किंवा इंग्लंड काय,मी राजाला हा सल्ला देऊ शकेन यावर कोणाचा विश्वास तरी बसेल का?" ज्या वेळी व्हॉन बुलॉच्या तोंडातून हे वाक्य बाहेर पडले, तेव्हा त्याच्या डोक्यात एक धोक्याची घंटा ठणाणली आणि आपण एक फार गंभीर चूक केली आहे,

हे त्याला जाणवले.हे ऐकून कैसर उसळलाच.कैसर म्हणाला, "मी तुला गाढव वाटलो का? तुझे असे म्हणणे आहे की ज्या चुका तू करू शकत नाहीस,त्या मी केल्या आहेत?" व्हॅन बुलॉच्या एक मात्र लक्षात आले की,असे बोलण्यापूर्वी त्याने राजाची निदान थोडीतरी स्तुती करायला हवी होती; पण आता त्याला उशीर झाला होता.

नंतर थोडा विचार करून केलेली ही चूक सुधारण्यासाठी त्याने एक चांगली गोष्ट केली.ती म्हणजे या प्रकारच्या टीकेनंतर त्याने आता कैसरची स्तुती करण्यास प्रारंभ केला आणि चमत्कार झाला.


आता तो प्रेमाने आणि आदरपूर्वक कैसरला म्हणाला, "महाराज, मी तुम्हाला असे सुचवणे हे तर माझ्या अकलेच्या बाहेरचे काम आहे.सर्व बाबतीत आपण माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहात.अर्थातच मिलिटरी आणि नेव्ही या क्षेत्रांतला अधिकार तर फक्त आणि फक्त आपलाच आहे. हे एवढेच नाही,तर नैसर्गिक शास्त्रसुद्धा तुम्ही जाणता.महाराज,आपण जेव्हा बॅरोमीटर, वायरलेस टेलिग्राफी,राँटजेन रेज या सगळ्याबद्दल बोलता तेव्हा मी किती अडाणी आहे,याची मला जाणीव होते आणि लाजही वाटते.कारण शास्त्र शाखेशी माझा कसलाच संबंध नाही.रसायनशास्त्र,पदार्थविज्ञान हे तर मला कधी समजणारच नाही असे वाटते; पण ऐतिहासिक ज्ञान त्यामानाने जरा बरे आहे आणि राज्यशास्त्राचा माझा अभ्यासही दांडगा आहे आणि मुत्सद्देगिरी मला चांगली जमते."हे ऐकून कैसरचा चेहरा उजळला.व्हॉन बुलॉने त्याची जी स्तुती केली होती,त्यामुळे त्याला अभिमान वाटला.व्हॉन बुलॉने त्याला उच्च पदाला नेऊन ठेवले होते आणि त्याच्यासमोर तो नतमस्तक झाला होता. या अशा परिस्थितीमध्ये कैसरने कसलीही चूक माफ केली असती.तो त्याला उत्साहाने म्हणाला,"मी तुला म्हटले होतेच की,आपण दोघे एकमेकांची कमतरता भरून काढू शकतो.आता आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहू,नक्कीच राहू!"


कैसरने व्हॉन बुलॉचा हात हातात घेऊन अभिवादन केले.एकदा नाही तर बऱ्याच वेळा.नंतर दिवसभर तो खूप खुशीत होता इतका की,एकदा तर मूठ आवळून ओरडून तो म्हणाला की, जर कोणी व्हॉन बुलॉच्या विरुद्ध माझ्याकडे काही कागाळी केली,तर मी त्याच्या नाकावर ठोसा मारीन.


व्हॉन बुलॉने वेळेवर स्वतःला सावरले; पण तो एक हुशार आणि मुत्सद्दी व्यक्ती असूनसुद्धा ही चूक केली होती.त्याने स्वतःचे दोष सांगूनच बाकी विषयाला सुरुवात करायला हवी होती.स्वतःकडे थोड्या प्रमाणात कमीपणा घेऊन समोरच्या व्यक्तीचे गोडवे गायल्याने आणि स्तुतीची काही वाक्ये बोलल्याने संतापी,अपमानित कैसरसुद्धा जिगरी दोस्त बनतो,तर विचार करा की,नम्रपणा आणि स्तुती आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये काय जादू करेल... योग्य पद्धतीने जर त्याचा अवलंब केला, तर मानवी संबंधात खरोखर चमत्कार घडतील.


आम्ही जरी आमची चूक सुधारू शकलो नाही तरी आपली स्वतःची चूक कबूल करून समोरच्याची वागणूक बदलण्यात मदत मिळते.(डेल कार्नेगी-मित्र जोडा- मंजुल पब्लिशिंग हाऊस-अनु- कृपा कुलकर्णी )


याचा प्रत्यय आम्हाला टिमोनियम,मेरीलँडच्या क्लरेंस यांच्या उदाहरणामार्फत येतो.क्लॅरेंसच्या लक्षात आलं की त्याचा पंधरा वर्षीय मुलगा डेविड सिगारेट ओढू लागला आहे.क्लरेंसने आम्हाला सांगितले, "उघड आहे की त्याचं सिगारेट ओढणं मला आवडलं नव्हतं.पण त्याची आई अन् मी दोघेही सिगारेट ओढत होतो. याप्रकारे आम्ही प्रत्येक वेळी त्याच्यासमोर एक वाईट उदाहरण ठेवत होतो.मी डेव्हिडला सांगितलं की मी त्याच्या वयात सिगारेट ओढण्यास सुरुवात केली होती आणि निकोटीनसमोर मीसुद्धा हरलो आहे.आता ती सोडणं माझ्यासाठी अशक्य आहे.मी त्याला सांगितलं,सिगारेट ओढण्यामुळेच मला कफचा इतका त्रास होत होता आणि मी त्याला हेसुद्धा सांगितलं की त्याने स्वतःच मला सिगारेट सोडण्याबद्दल अनेक वेळा सल्ला दिलाय.


"मी त्याला सिगारेट सोडण्यावर फार मोठे भाषण दिले नाही,त्याच्या धोक्यांबद्दल कुठला इशारा दिला नाही आणि त्याला सिगारेट ओढायला मनाईसुद्धा केली नाही.मी त्याला फक्त सांगितलं की मला सिगारेट ओढायची सवय कशी लागली आणि त्यामुळे मला किती नुकसान झेलावं लागलं."त्याने याबाबतीत काही वेळ विचार केला आणि मग निर्णय घेतला की तो कॉलेज पूर्ण होईपर्यंत सिगारेट ओढणार नाही. या गोष्टीला अनेक वर्षे होऊन गेलीत, पण डेव्हिडने अजूनही सिगारेटला हात लावला नाही.

भविष्यातही तो सिगारेट ओढणार नाही.


"या चर्चेनंतर मीसुद्धा सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या परिवाराच्या मदतीने त्यात यशस्वी झालो."


एक चांगला नेता या सिध्दान्ताचं पालन करतो.


कुणावर टीका करण्याआधी आपल्या चुका कबूल करा.

२८/११/२३

तत्त्वज्ञानी सम्राट मार्कस ऑरेलियस Philosopher Emperor Marcus Aurelius

रोमच्या पहिल्या आठ सम्राटांपैकी पाचांचे खून झाले! या आठानंतरच्या सम्राटांपैकी पुष्कळसे मारेकऱ्यांकडून मारले गेले! खरोखर रोमन साम्राज्याचा साराच इतिहास कट,कारस्थाने,खून,लुटालुटी,आक्रमणे,,डाकुगिऱ्या,लंपटता व विश्वासघात यांनी भरलेला आहे.आक्रमण करीत जाण्याचे रोमनांना जणू काय बाळकडूच मिळत असे. 'स्वार्थ व आपण' यांची शिकवण त्यांना जणू आईच्या दुधाबरोबरच मिळे.'प्रत्येक जण स्वतःसाठी;जो मागे रेंगाळेल त्याला सैतान धरील',ही म्हणच जणू त्यांच्या धर्माची शिकवण होती! रोमन राजसत्ता तद्वतच प्रत्येक रोमन व्यक्तीही आपल्या बंधूना धूळ चारून,त्यांच्या आशा,त्यांचे मनोरथ किंबहुना त्यांचे देहही धुळीस मिळवून स्वतः पुढे येण्याची खटपट करीत असे.रोम इतर देशांना त्याप्रमाणेच रोमन माणूस इतरांना - स्वकीयांनाही लुटूनच पुढे आला पाहिजे,असा जणू नियमच होता!प्रत्येक जण पुढारी होण्याची खटपट करी.अशा विषारी व मारक वातावरणात वाढणारे सम्राट पुढे भलेबुरे करण्याची सर्व सत्ता हाती येताच साधी माणुसकीही गमावून बसत;यात काय आश्चर्य?

ते रानटी पशुंप्रमाणे वा दैत्यांप्रमाणे वागत;यात काय नवल? फारच थोड्या सम्राटांनी शांततेचे व विवेकाचे जीवन जगण्याचा यत्न केला.पण आक्रमक पिसाटांच्या दुनियेत त्यांचेही काही चालत नसे.अशा विवेकी सम्राटांविरुद्ध महत्त्वाकांक्षेने वेडे झालेले सारे माथेफिरू उभे राहत.मूर्खपणाचे राष्ट्रीय धोरण चालविल्यामुळे भोगावी लागणारी फळे मग अशा चांगल्या राजांच्याही वाट्यास येत. 


गादीवर येताच त्यांना सर्वत्र कटाचे व कारस्थानाचे दूषित वातावरणच दिसे.सर्वत्र संशय व धोका! आपल्या पूर्वीच्या सम्राटांनी सुरू केलेल्या पण त्यांच्या हयातीत न संपलेल्या युद्धांना या विवेकी सम्राटांनाही तोंड द्यावे लागे. पूर्वीच्या सम्राटांनी उत्पन्न केलेली भांडणे व युद्धे यातून शांती व सलोखा निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडे,ती युद्धे यशस्वी करावी लागत.ती भांडणे निभावून न्यावी लागत. सम्राट म्हणून त्यांच्या नावाने नवी द्वाही फिरताच पूर्वजांच्या मूर्खपणाशी व अपराधांशीही ते बांधले जात.त्या अपराधी व सदोष धोरणाच्या शृंखला त्यांनाही जखडून टाकीत.


'सुखी' म्हणून संबोधिले जाणारे रोमचे सम्राट रोमन गुलामांपेक्षाही अधिक दुःखी असत.अशा या रोमन सम्राटांपैकीच शहाणा;पण अती दुःखी सम्राट म्हणजे मार्कस ऑरेलियस.


मार्कस ऑरेलियस हा सम्राट अँन्टोनिनसचा मानलेला दत्तक मुलगा.तो वयाच्या अकराव्या वर्षापासूनच स्टोइक पंथाच्या सहनशील तत्त्वज्ञानाकडे ओढला गेला.स्टोईक यतिधर्मी होते.ते दुःख दैवी मानून त्याची पूजा करीत.दुःख भोगावे लागले तरच ते स्वतःला सुखी व भाग्यवान समजत.आत्मा बलवान व्हावा,मन खंबीर व्हावे म्हणून ते कठीण फळ्यांवर झोपत, खाली काही अंथरीतही नसत.ते एक जाडेभरडे वस्त्र अंगावर घेत,ते अंगाला खुपे.तरुण मार्कस ऑरेलियसही अशा हठयोगाचे आचरण करू लागला.पुढे जेव्हा मन व बुद्धी ही परिपक्व झाली,तेव्हा त्याने या मूर्खपणाच्या बाह्य गोष्टींचा व देखाव्यांचा त्याग केला.पण त्या पंथाच्या तत्त्वज्ञानातील मुख्य गाभा मात्र त्याने कधीही सोडला नाही. सम्राट अँन्टोनिनस व मार्कसची आई या दोघांनीही त्याला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी उत्तेजन दिले व त्या काळातील अत्यंत नामांकित आचार्य त्याच्या अभ्यासासाठी ठेवले. त्यांच्या योग्य देखरेखीखाली व मार्गदर्शनाखाली त्याने केवळ तत्वज्ञानातच प्रगती केली असे नव्हे,तर काव्य,इतिहास व ललितकला यांचाही चांगला अभ्यास केला.

तो स्वभावतःच विद्याप्रिय होता.


मनाचा विकास होत असता तो अत्यंत सुखी होता.

पुढारीपणा त्याच्या ठायी नव्हता.एक अज्ञात तत्त्वज्ञानी म्हणून राहावे,अशीच त्याची इच्छा होती.पण देवाची इच्छा त्याने सम्राट,वैभवशाली राजाधिराज व्हावे,अशी होती.तो आपल्या वयाच्या तिसाव्या वर्षी (इ.स.१६१

मध्ये) सम्राट झाला.प्लेटो ज्याची वाट पाहत होता,तो राजर्षी शेवटी सिंहासनावर आला. 


पण प्लेटोचे स्वप्न प्रत्यक्षात येणे अद्यापि फार दूर होते.

प्लेटोच्या रिपब्लिकमधील तत्त्वज्ञानी राजाला सज्जन व सुसंस्कृत लोकांच्या राष्ट्रावर राज्य करायचे असे;पण मार्कस ऑरेलियसला मूर्ख व गुंड बहुजन समाज असलेल्या राष्ट्रावर राज्य करायचे होते.


इतिहासाच्या चलच्चित्रपटात मार्कस आपल्या डोळ्यां -

पुढून जातो,तेव्हा त्याच्या ठिकाणी आपणास दोन व्यक्ती दिसतात.तो म्हणजे प्राचीन काळचा डॉ.जेकिल वा मि.हाईड होय.रात्रीच्या प्रशांत वेळी तो स्वतःचे हृदय संशोधन करणारा भावनाप्रधान कवी व ज्ञानोपासक दिसतो.हे जग अधिक चांगले कसे होईल,येथे सुखी लोक कसे नांदू लागतील याविषयीचे आपले विचार तो मांडी व त्यातून योजना निर्मी,पण दिवसा मात्र तो शस्त्रास्त्रांच्या खणखणाटात रोमन विजयासाठी बाहेर पडे.शरण जायचे नाही व दया दाखवायची नाही या रोमन तत्त्वांप्रमाणे विजयी सेनानी म्हणून धावपळ करताना व दौडा मारताना तो दिसतो.


मार्कस ऑरेलियस याच्या या द्विविध स्वरूपाचे त्याच्यातील सौम्य कवी व कठोर योद्धा या दोघांचेही थोडे दर्शन आपण घेऊ या.


मार्कस ऑरेलियस हा भला माणूस होता.पण त्याला संगत मात्र भली मिळाली नाही.तो दुष्ट संगतीत सापडलेला सुष्ट होता.


त्याने आपली डायरी लिहिली आहे.ती त्याची चिंतनिका होती.प्राचीन काळातील ते एक उत्कृष्ट पुस्तक आहे. आपण कसे व्हावे व कोणती तत्त्वे आचरणात आणावीत,याबाबतचे आपले सर्व विचार त्याने या चिंतनिकेत लिहिले आहेत. 


पण काय करावे हे कळले,तरी तसे करणे मात्र तितकेसे सोपे नसते.प्रत्यक्ष प्रसंग येताच त्याला तत्त्वांचा विसर पडतो;तत्त्वांप्रमाणे वागण्याची हिंमत होत नाही.

त्याला पुरेसे नीतिधैर्यच नसते. "मार्कस ऑरलियस या नात्याने रोमच माझे शहर व माझा देश असले,तरी मानव या दृष्टीने सारे जगच माझा देश आहे,"असे त्याने चिंतनिकेत लिहिले असले,तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र आपण जगाचे नागरिक आहोत याचे स्मरण त्याला राहत नाही,आपल्या रोमनपणाची जाणीव त्याच्या ठायी बलवत्तर होते. 


वास्तविक,तो युद्धाचा द्वेष्टा आहे.तो लिहितो, "माशी पकडता आली की कोळी नाचू लागतो, ससा सापडला की माणसाला आनंद होतो,थोडे मासे जाळ्यात अडकले की कोळ्याला हर्ष होतो, डुक्कर किंवा अस्वल मारता आले की शिकायला आनंद होतो,तर युद्धात कैदी पकडले की लढवय्यास आनंद होतो (Sarmatian Prisoners). पण या साऱ्यांच्या मनातले तत्त्वज्ञान पाहिले तर सारे एकजात डाकूच नाहीत का ठरत?" पण असे लिहिणाऱ्या मार्कसच्याच कारकिर्दीचा बराचसा भाग मात्र युद्धे लढण्यातच गेला,शत्रूना पकडण्यात व ठार मारण्यातच खर्ची पडला! 


न्यायापेक्षा रणकीर्तीचीच चाड आपणास अधिक असल्याबद्दल वाईट वाटून तो आपल्या चिंतनिकेत आपल्या दुबळेपणाबद्दल स्वत:वर कोरडे उडवितो; "सम्राट म्हणून जर जीवनातील उदारता तुला दाखविता येत नसेल तर जा, कोपऱ्यात जाऊन बस;व तिथे निर्दोष व निर्मळ जीवन जग;व तिथेही जीवनाची उदारता वा उदात्तता तुला दाखविता येत नसेल,तर या जगातून चालता हो...असे निघून जाणेदेखील तुझ्याने घडले,तर ते एक अत्यंत स्तुत्य असे सत्कृत्यच होईल."त्याने असे लिहिण्याचे धैर्य दाखविले तरी,सम्राट झाल्यामुळे उदात्तता दाखविता येत नव्हती; तरी त्याला सत्तात्याग वा प्राणत्याग करण्याचे धैर्य मात्र दाखविता आले नाही.मार्कसवर आपणाला दुबळेपणाचा आरोप करता येईल; पण जाणुनबुजून केलेल्या दुष्टतेचा आरोप मात्र मुळीच करता येणार नाही. 


रॅम्से मॅक्डोनाल्डप्रमाणेच,तो शांततेच्या काळात व शांत वृत्तीच्या माणसांत वावरण्यास योग्य होता.

आजच्या ब्रिटिश साम्राज्याप्रमाणे त्या काळचे रोमन साम्राज्यही संकटात होते. पुष्कळशा वसाहतीत बंडे माजली होती.मार्कसची इच्छा नसूनही सम्राटपदावर असल्यामुळे त्याला बंडखोरांविरुद्ध चालून जावे लागले,त्यांची बंडे मोडावी लागली,आपल्या ध्येयाशी विसंगत धोरण पत्करावे लागले. मानवजातीच्या स्वातंत्र्यापेक्षा 'रोम जगाची अधिराज्ञी आहे' यावर त्याची अधिक श्रद्धा होती व सिंहासनावर आपण राहावे,याची त्याला अधिक तळमळ लागली होती.मार्कसच्या बाबतीत अखेरचा निकाल देण्यापूर्वी आपण स्वतः त्याच्या स्थितीत जाऊन पाहिले पाहिजे. आज आपण ब्रिटिश सत्तेचे प्रमुख चालक असतो तर आपणांपैकी कित्येकांना हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याचे धैर्य दाखविता आले असते? मार्कसचीही नेमकी अशीच स्थिती होती. अर्थातच मार्कस जर बुद्ध असता तर तो वेगळ्या रीतीने वागला असता.पण तो बुद्ध नव्हता.जगाचे भले करावे म्हणून बुद्धाने राज्यत्याग केला.मार्कसने राज्यपदासाठी भले करण्याचे सोडून दिले.हिंदुस्थानने जगाला 'शांती देणारे महापुरुष' दिले. रोम 'जास्तीत

जास्त तत्त्वज्ञानी योद्धा' निर्माण करू शकले." 


मार्कस प्रथम रोमन सम्राट होता व नंतर मानवजातीवर प्रेम करणारा होता हे नीट ध्यानात धरले तर मग आपणास त्याने ख्रिश्चनांचा छळ का केला हे समजू शकेल,थोडी कमी-जास्त माणसे मारली गेली म्हणून वैतागण्याइतका वा विरक्त होण्याइतका कच्चा शिपाई तो नव्हता. शिपाईगिरी त्याच्या रक्तात अधिक भिनलेली होती.ख्रिश्चन लोक रोमन देवदेवतांविरुद्ध बोलत,नवीन राज्य येणार वगैरे भविष्यकथा सांगत. साहजिकच रोमन राज्याला यात धोका आहे असे वाटे.ख्रिश्चनांचे प्रमुख पुढारी ठार मारून त्यांना दडपून ठेवणे हे 'राज्याचे पालनकर्ते' या नात्याने आपले कर्तव्य आहे,असे मार्कसला वाटे. बंड मोडून तो पुन्हा आपल्या हस्तिदंती तत्त्वज्ञान मंदिरात येई तेव्हा तो लिही, "मी दुसऱ्यांना हेतुपुरस्सर वा उगीचच दुःख दिलेले नाही." त्याच्या या लिहिण्यात दंभ नसून सत्यता असावी असे वाटते.


दैवदुर्विलास हा की,मार्कस हा सत्याची तळमळ असणारा माणूस होता.कृत्रिमता वा दंभ त्याच्या ठायी मुळीच नव्हता.स्वत:च्या राष्ट्राची सुरक्षितता किंवा प्रतिष्ठा धोक्यात असता तो सीझरच्या अहंमन्यतेने शासन करी;पण स्वतःचा जीव धोक्यात असताना मात्र तो एखाद्या संताच्या उदारतेने क्षमा करी! त्याचा अँव्हिडिअस कॅशियस नामक एक सेनापती होता.

त्याने त्याला मारण्याचा कट केल्याचे त्याला कळले तेव्हा कॅशियसविरुद्ध काहीही करण्याचे नाकारून तो म्हणाला, "तो दोषी व अपराधी असेल तर आपल्या कृतकर्माचे फळ तो भोगील." कट फसला व कॅशियसचाच कोणीतरी खून केला.मित्रांनीच नव्हे; तर राणी फॉस्टिना हिनेही कॅशियसच्या घराण्यातल्या सर्वांना ठार करावे असे परोपरीने विनविले,निदान स्वतःच्या रक्षणासाठी तरी ही गोष्ट करण्याबद्दल विनविले; पण मार्कसने त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. तो म्हणाला, "पित्याच्या पापासाठी मुलाबाळांनी शासन का बरे भोगावे? त्यांचा काय अपराध ? कटात सामील होण्याबद्दल कॅशियसने अनेक प्रमुख रोमन नागरिकांना लिहिलेल्या पत्रांचे भेंडोळे त्याच्यापुढे टाकण्यात आले.

तो गड्डा पाहून त्याने काय केले असेल? एक शब्द न बोलता त्याने ती सारी पत्रे 'अग्नेय स्वाहा' केली व नंतर पुन्हा चिलखत चढवून तो दुसऱ्या एका युद्धावर जाण्यासाठी,रक्तपातासाठी तयार झाला, एकाच वेळी सम्राट व सामान्य मानव म्हणून तो जगू इच्छित होता.

त्यासाठी त्याची धडपड चालू होती.पण त्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.त्यामुळे त्याच्या जीवनातील आनंद गेला व त्याच्या जागी निराशा आली. 


तो जगाविषयी व एकंदर जीवनाच्या मूल्यांविषयी तिरस्काराने बोलू लागला,कशातच काही अर्थ नाही असे म्हणू लागला.उमर खय्याम किंवा कोहेलेथे याप्रमाणेच कित्येक शतकांपूर्वी बोलताना तोही आपणास दिसतो.तो लिहितो - "ही दुनिया म्हणजे केवळ वाफ आहे.हा संसार निःसार आहे.येथे सदैव झगडे व मारामाऱ्याच आढळणार,आपण या जगात क्षणाचे पाहुणे आहोत.मरणोत्तर कीर्ती ! पण तिचे आपणास काय होय? क्षणभर कीर्ती मिळते.पुन्हा सारे विसरूनही जातात.या मानवी जीवनात हा काळ म्हणजे एक क्षण एक बिंदू.सारे क्षणिक आहे,चंचल आहे,बदलते आहे.आपली प्रजाही दुबळी आहे.अंतर्दृष्टी फार मंद असते.वस्तूंचे अंतरंग कळत नाही.हे शरीर तर सडणारे आहे.आत्मा म्हणजे वायूची एक क्षणिक झुळूक! दैवात काय असते हे कळत नाही,कीर्ती मिळते त्यातही काही अर्थ नसतो.लोक विचार न करताच टाळ्या वाजवितात,

स्तुती करतात.आणि आपण मेल्यावर स्मरण कशाचे करायचे ? पोकळ,शून्य वस्तू, तिचे ?" हे सारे जीवन बाह्य अवडंबर आहे.हे सारेच क्षणिक देखावे,बुडबुडे आहेत.मार्कस ऑरेलियस,त्याचे वैभव,त्याच्या महत्त्वाकांक्षा,त्याची युद्धे,त्याचे विजय,त्याचे यश,सारे सारे पोकळ व निःसार आहे.अनंत बुडबुड्यांतले हेही बुडबुडे! पण त्याचे स्टोइक वळण त्याला धीर देई.

आपल्या नशिबी आलेले पोकळ राजवैभव तो सहन करी. "जे वाट्यास आलेले आहे,ते दैवाने दिलेले आहे. ते अपरिहार्य आहे.ते सहन करा."असे स्टोइक तत्त्वज्ञान सांगते.आपण देवाच्या हातांतली बाहुली आहोत,आपले जीवन त्याच्या इच्छेसाठी आहे,आपल्या मनःपूर्तीसाठी नाही.तो लिहितो,"माझे काय व्हावे,माझ्या नशिबी काय यावे,याचा विचार देवांनी केलाच असेल;व तोच योग्य असणार.त्यांनी खास माझ्या बाबतीत जरी विचार केला नसेल तरी या विश्वाच्या सर्वसाधारण कल्याणाची चिंता त्यांनी केलीच असेल.यासाठी या विश्वसंसारात जे माझ्या नशिबी येईल ते विश्वयोजनेनुसार आहे असे समजून मी आनंदाने सहन केलेच पाहिजे,त्यातच समाधान मानले पाहिजे. 


माझ्या बाबतीत जे जे घडत आहे,ते ते अनंत काळापासून तसे योजिलेलेच आहे."आपल्या आत्म्याच्या खिन्न आदशांत,बघून मार्कस स्वतःची पुढीलप्रमाणे कानउघाडणी करतो; "घाबरू नको.नशिबाने जे ताट वाढून ठेविले आहे ते गोड करून घे.जे दैवाने दिले आहे.त्याच्याशी जमवून घे.दैवाला तुझ्या जीवनाचे वस्त्र जसे विणायचे असेल,तसे विणू दे.तेच तू अंगावर घे.देवांना चांगले कळते,अधिक कळते,सर्वांत जास्त समजते." पण त्याच्या तत्त्वज्ञानाने त्याचे समाधान झाले नाही.त्याच्या जीवनात खोल निराशा होती. त्याची महत्त्वाकांक्षा शेवटपर्यंत अपुरीच राहिली.त्याला हवे होते शांती-समाधान,पण मिळाला पोकळ मोठेपणा


त्याला वैभव लाभले,शांती लाभ झाला नाही.आपल्या अप्राप्य ध्येयाकडे तो एखाद्या भणंग भिकाऱ्याप्रमाणे पाहत राही व अर्धवट धार्मिक अशा शब्दजंजाळात - शाब्दिक धुक्यात -तो आपले ध्येय अदृश्य करून टाकी.त्या अर्धवट धार्मिक शब्दांवर तरी त्याचा पूर्ण भरंवसा कोठे होता ?


इ.स. १८०चा हिवाळा आला. मार्कस एकोणसाठ वर्षांचा झाला होता.उत्तरेस जर्मनांशी लढताना त्या कडक थंडीत त्याची प्रकृती बिघडली,त्याचे सारे शरीर जणू गोठले,गारठून गेले! घरी रोमकडे परतण्यापूर्वीच तो मेला.. त्याची कारकीर्द अयशस्वी झाली.त्याचे जीवन अपयशी होते;ते पाहून फार वाईट वाटते. (मानवजातीची कथा,हेन्री थॉमस))


त्याच्या मनात असलेल्या उदात्ततेनुसार तो वागता,तर तो महापुरुष झाला असता.पण अखेर तो कोण झाला?धंदेवाईक सैनिकांच्या शहरातला एक विजयी सेनापती,इतक्याच नात्याने तो शिल्लक राहिला.त्याने मिळविलेल्या विजयातूनच पुढच्या युद्धाचे बीजारोपण झाले व त्यातच शेवटी रोमचा नाश झाला. 


माकडातून उत्क्रांत होत होत प्राणी जन्माला यायला जवळजवळ चार कोटी वर्षे लागली. त्याला ताठ उभे राहता यायला व दगडधोंड्यांनी आपले भक्ष्य मारून खाता यायला आणखी तीन लक्ष वर्षे लागली.पुढे आणखी पन्नास हजार वर्षे गेली आणि त्याला तांब्याचा शोध लागला. मारण्याची,संहाराची अधिक प्रभावी हत्यारे तो बनवू लागला.त्यानंतर दोन हजार वर्षांनी त्याला लोखंड सापडले.हिंसेची साधने अधिकच प्रखर अशी तयार झाली.मारण्याच्या पद्धतीत अधिक कौशल्य आले.लोखंडाच्या शोधानंतर पाच हजार वर्षांनी डायनामाइटचा शोध लागला.त्यानंतर कित्येक शतकांनी त्याने पाणबुड्या बांधल्या व विमाने बांधली,आणि दुसऱ्या प्राण्यांचा संहार करण्याची त्याची संशोधक बुद्धी पूर्णतेस पोहचली,मानवाच्या मत्थड मेंदूला 'हिंसा म्हणजे मूर्खपणा आहे'.ही गोष्ट कळायला आणखी पन्नास हजार वर्षे लागतील.संहार करण्यापेक्षा हितकर व उपयोगी अशा दुसऱ्या उद्योगात वेळ दवडणे अधिक चांगले,ही गोष्ट तेव्हा त्याच्या लक्षात येईल.


मनुष्य अगदी मत्थड प्राणी आहे.फारच हळूहळू त्याची प्रगती होत आली आहे;.आणि जी काही थोडीफार प्रगती झाली, तीही सारखी अखंड होत आली असेही नाही.कधी प्रगती तर कधी अधोगती,

असे सारखे चालले आहे.उंचावरून कितीदा तरी हा प्राणी खाली घसरला आहे;वर चढून पुन्हा कितीदा तो खाली पडला आहे.





२६/११/२३

सतत आठवणारी भाऊबीज A brother who remembers constantly

म्हातारी....


बरोबर दोन वर्षांपूर्वी दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या दिवशी घडलेला हा प्रसंग... आज आठवण्याचे कारण म्हणजे मागील दिवाळीत ती नव्हती... या दिवाळीत सुद्धा नव्हती आणि पुढेही कधी नसणार...!


ती मला भेटली होती साधारण चार वर्षांपूर्वी.... 

वय असावं साधारण साठीच्या आसपास...

ती तिच्या यजमानांसह अंगाचं मुटकुळं करून पुण्यातल्या नामांकित रस्त्याच्या फुटपाथला एका कडेला शून्यात नजर लावून बघत बसलेली असायची...

येता जाता मी तीला पाहायचो...मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचो पण ती कधी दाद द्यायची नाही.... 


तीला अंधुक दिसायचं... जवळपास नाहीच...


वयाच्या मानाने तिचे यजमान बऱ्यापैकी धडधाकट दिसायचे,परंतु ती मात्र पूर्णतः खचलेली.... वयापेक्षा पंधरा-वीस वर्षांनी जास्त आहे असं वाटायचं.... 


मी तिच्या यजमानांची मैत्री करण्याचा प्रयत्न केला,परंतु त्यांनीही दाद दिली नाही मला याचं काहीच कारण कळत नव्हतं.... 


असंच वर्ष निघून गेलं...


पावसाळा सुरू झाला,एके दिवशी त्या रस्त्याने जात होतो,माझ्या अंगावर रेनकोट होता.... सहज फूटपाथ कडे लक्ष गेलं,ते दोघे भिजत होते... पावसापासून लपण्याचा प्रयत्न करत होते.... !


सगळ्यांनीच छळलं होतं.... पाऊस बरा यांना सोडेल?


खूप वाईट वाटलं..परंतु ते दोघेही सहकार्य करायला तयार नव्हते... मी तरी काय करणार ? 

तरीही एके दिवशी जुन्या बाजारात गेलो आणि तिथून प्लास्टिकची मोठीच्या मोठी ताडपत्री आणि सुतळी विकत आणली.... पाऊस  धो धो कोसळत होता... ते भिजत होतेच...ते ज्या ठिकाणी बसले होते तिथे जाऊन मग त्यांच्याशी काहीही न बोलता या टोकापासून ते त्या टोकापर्यंत प्लास्टिक ची ताडपत्री टाकून छत होईल असा काहीतरी देशी जुगाड केला.... 


तिला दिसत नव्हते...तिने शेजारी बसलेल्या नवऱ्याला विचारले एवढ्या जोरात पाऊस पडत होता अचानक कसा थांबला ? 


यजमानांनी तीच्या कानात काहीतरी सांगितले. 


मी छत टाकून निघणार इतक्यात त्या आजीने मला हाक मारली.... ए बाबा... हिकडं ये....


मी छता खाली गेलो,' मला म्हणाली तू हायस तरी कोण?  आनी आमच्या मागं का लागला हायस? तुला काय पाहिजेन.... जगू दे ना बाबा हित तरी सुखानं...


घरातून बाहेर पडलेले हे दोघे....


जगाने यांना,या ना त्या कारणाने खुप फसवले होते,आता मीही त्यांना असाच फसवणार असा त्यांचा गैरसमज झाला होता....


अनेकांनी यांना धोका दिला होता....


खरंच,विश्वास किंमती असेलही पण धोका खूप महाग असतो...!


पुढे तासभर मी त्यांच्याशी बोलत होतो,मी नेमकं काय करतो आणि कशासाठी हे त्यांना समजेल अशा भाषेत यांना समजावून सांगितलं.... माझ्याकडून तुमची काहीही फसवणूक होणार नाही झाली तर मदतच होईल याची मी त्यांना खात्री दिली...!


मी निघालो जाताना या वेळी तिच्या चेहऱ्यावर हसू होतं... यानंतर अनेक वेळा मी तिच्या त्या तात्पुरत्या उभारलेल्या छताखाली जायचो,जाताना प्रत्येक वेळी संसाराला उपयोगी होईल अशी काहीतरी वस्तू घेऊन जायचो.... बघता बघता दोन माणसांना स्वयंपाक करून खाता येईल  आणि जगता येईल अशा सर्व गोष्टी घेऊन दिल्या.


तीचं मत आता माझ्याविषयी बदलत चाललं... मी तीला फसवणार नाही,याची तीची खात्री झाल्यावर त्या कुटुंबाबरोबर माझा स्नेह जुळला....


यानंतर तीला माझ्या गाडीवर बसवून तीन ते चार वेळा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. ऑपरेशन केली आणि ... शेवटी एकदाचं तिला दिसायला लागलं.... 


एका पायान ती अधू  होती.... तीला मग एक  व्हीलचेअर पण घेवून दिली....


आता नाती घट्ट झाली होती....


मी तीला गमतीने,प्रेमाने नेहमी "ए म्हातारे" असं म्हणूनच हाक मारायचो.तीला बाकी कशाचा नाही,पण म्हातारी म्हटल्याचा राग यायचा, बस एवढ्या एकाच गोष्टीने ती चिडायची....


दरवेळी ती मला म्हणायची, ' म्हातारे नको ना म्हणू.... ताई म्हणत जा की मला'


मी तिचं ऐकायचो नाही..... मी तीला ए म्हातारेच म्हणायचो आणि मग ती तोंडाचा पट्टा सुरु करायची,तोंडातून शिव्या यायच्या,मला मस्त गंमत वाटायची..  


वर अजून म्हणायचो,'म्हातारीच तर आहेस.... तुला काय ताई म्हणायचं गं ?'  यावर  चिडून ती चप्पल दाखवायची....


लोक फूटपाथवर राहणाऱ्या या दोघांना शर्ट-पॅंट साड्या पैसे असं बरच काही द्यायचे.... 


दर भाऊबीज आणि रक्षाबंधनाला मात्र मला ती बोलावून घ्यायची आणि ओवाळून झाल्यानंतर तीला भिकेमध्ये  मिळालेल्या शर्ट पॅन्ट बूट अशा अनेक वस्तू ती मला भेट म्हणून द्यायची....बोचक्यातले शर्ट काढून मला ते होतील की नाही हे ती  माझ्या अंगाला लावून बघायची.... तीला मिळालेले फाटके बूट..... त्यातल्या त्यात चांगले निवडून ती मला द्यायची आणि घालून बघ म्हणून आग्रह करायची.... 'होतील गं दे मी घालतो असं म्हणून,'गुपचूप मी त्या  गोष्टी घ्यायचो.... 


'व्वा...मला असाच शर्ट हवा होता' असं मी तीला म्हणालो की तिचा चेहरा उजळून जायचा....


'मला असाच बूट हवा होता आणि तू नेमका  आज तू तसाच दिलास' म्हटलं की तिला आभाळ ठेंगणं व्हायचं.... 


भीक म्हणून तिला मिळालेल्या गोष्टी ती मला द्यायची आणि मी त्या वस्तू बहिणीने दिल्या आहेत म्हणून सांभाळून ठेवायचो ....


'शर्ट आणि बूट घाल बरं का..... न्हायी बसला तर फूडल्या बारीला देते' हे पण ती आठवणीने सांगायची... 


अशा प्रेमानं मिळालेल्या अनेक गोष्टींचा मी संग्रह केला आहे.... 


ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी अशा वस्तूंची    संग्रहालयं उभारली....आठवणीसाठी स्मारक बांधली...खूप नंतर कळलं..... स्मारक बांधायला आणि संग्रहालय उभं करायला पैसा लागतच नाही....


स्मारक तयार करायचं असतं मनात आणि संग्रहालय उभं करायचं असतं हृदयात....! 

मिळालेल्या वस्तूला किंमत असेलही, नसेलही, देणाऱ्याच्या भावनेला मात्र मोल नसतं...भावनांचं हे स्मारक बांधून उरात घेऊन मिरवायचं असतं...! 


तू डॉक्टर मी अडाणी,तू जरा बऱ्या घरातला मी रस्त्यावर राहणारी,असा काही भेद-भाव ती माझ्या बाबतीत करत नसे.... तीला मी म्हणजे तीच्या कुटुंबाचाच  एक भाग वाटतो.. ती तिच्यात आणि माझ्यात काहीही फरक करत नाही....ती मला तिच्याच सारखा समजते.... तिने मला तिच्याच सारखं समजणं,हा मी माझा विजय मानतो.


मी म्हणजे तूच आहे आणि तू म्हणजे मीच आहे, हे ती समजत होती आणि मी अनुभवत होतो...अद्वैत ही संकल्पना नुसती वाचली होती तीच्या मुळे मला अनुभवायला मिळाली.


लोक बाहेर सर म्हणतात,हि मला मूडद्या म्हणते...


एरव्ही,आपणास कधी वेळ असतो ? कधी आपणास फोन करू ? लोकांचे असे नम्रतेने मेसेज येतात...


ती मात्र बेधडक रात्री बारा वाजता फोन करते,' मुडद्या मेलास का जिवंत हायेस ? भयनीची काय आटवण हाय का नाय ? म्हणत ठेवणीतल्या शिव्या देते.... 


मी हसत तीला म्हणतो,बहीण कसली तू कैदाशीन आहेस,हडळ आहेस म्हातारे ... 


मग काय .... यानंतर आणखी स्पेशल शिव्या सुरू होतात आणि मी तिने उधळलेल्या या फुलांच्या सुगंधाचा आस्वाद घेतो.... 


त्यात बहिणीच्या मायेचा आस्वाद असतो.... ! 


वजन फुलाचं होत असेलही.... सुगंधाचं करता येत नाही....


अगरबत्ती किलोत मोजत असतील सुद्धा,परंतु त्या अगरबत्ती पासून निघालेल्या सुगंधी वलयाचं वजन कशात करावं मी ....? 


ती तशीच होती काटेरी फणसासारखी... बहिण म्हणून ती करत असलेली "माया" मोजायला माझ्याकडे कोणताही तराजू नाही.... 


तीला छत टाकून तात्पुरता निवारा करून दिला होता, त्या झोपड्याला तीने घर म्हणून रूप दिलं होतं.मी त्यात जगण्यासाठी आवश्यक अशा सर्व वस्तू तिला घेऊन दिल्या होत्या.लोक भीक देत होते,त्यात तिची गुजराण होत होती,परंतु माझी बहीण,भीक मागून जगत आहे, हा माझा अपमान होता...


आणि म्हणून त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती....एकदा तीला म्हणालो,'अशी भीक घेण्यापेक्षा 'चार पैशे' कमव... काहीतरी धंदा आपण सुरू करू....' ती म्हणाली होती,' मुडद्या भांडवल काय माजा मेलेला बाप घाललं काय....? '


मी म्हणालो होतो,'नाही ना,तुझा जिवंत असलेला भाऊ भांडवल  घाललं .... '


यावर तिने पदराला पुसलेले डोळे मला अजून आठवतात.... 


यानंतर मी तीला पाच ते दहा विक्री योग्य वस्तू विकत आणून दिल्या होत्या आणि तीला म्हणालो,'बघ हळूहळू हा व्यवसाय सुरु कर.'


तीने माझं ऐकलं....  मी ज्या वस्तू दिल्या होत्या त्या वस्तू ओळीने तीने त्या फूटपाथ वरच्या तिच्या घरात मांडून ठेवल्या...... व्हीलचेयर घेऊन ती आता घराबाहेर बसू लागली.... येणार्‍या-जाणार्‍या लोकांना वस्तू घेण्याचा आग्रह करू लागली.... व्यवसाय हळूहळू वाढत गेला.मी दिलेल्या पाच दहा वस्तूंची संख्या वाढवत तीने ती दोनशे-तीनशेच्या वर नेली.आता वस्तू ठेवायला घर पुरेना... हे कर्तुत्व तिचं होतं ....!


तीला मी फक्त एक हात दिला होता,तीने या संधीचे सोनं केलं.... ती आकाशात  भरारी  घेत  होती....!


कोणतंही काम करण्याच्या पलीकडे गेलेला एक अपंग माणूस रोज तीच्या दारावर यायचा.... या ताईने त्याला रोज दोन वेळचं जेवण द्यायला सुरुवात केली. 


स्वतःला जाणवते ती वेदना पण जेव्हा दुसऱ्याची वेदना जाणवायला सुरुवात होते ती म्हणजे संवेदना....!


तीने त्याची वेदना जाणून त्या अपंग व्यक्तीला हात दिला होता....आपण उठून उभे राहिल्यावर दुसऱ्याला सुद्धा मदतीचा हात द्यावा..... कुठून आला असेल हा विचार तिच्या मनात...? 


मी तिला मनोमन नमस्कार करायचो.


ती मला नेहमी म्हणायची,'एवढ्या लोकांचं करतोस,याचं पण पांग फेड बाबा,या अधू पोरासाठी पण कायतरी कर.... ' कालांतराने या व्यक्तीवर सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार केले,तो आता स्वतःच्या पायावर चालतो, यानंतर त्याला एका आश्रमात नोकरी मिळवून दिली आहे. त्याचं सर्व छान झालं,या सर्व गोष्टींचा सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल,तर तीला...!


दुसर्‍याच्या आनंदात आपलं सुख मानणं, म्हणजे खऱ्या अर्थाने मोठं होणं .... बाकी नुसतंच वय वाढण्यानं कुणी मोठा  होतं नसतो....!


मोठं होणं म्हणजे maturity येणं....!

किती कॅरेटचं सोनं घातलंय यापेक्षा किती मूल्यांचं कॅरेक्टर आहे हे समजणं म्हणजे maturity....!

चुका  शोधायला मेंदू लागतो.... पण माफ करायला हृदय.... हे समजणं म्हणजे maturity....!


.... अशाच एके दिवशी शिव्या देत फोन करत मला तिने घर बघायला बोलवलं.... तिथे तिने अनंत वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या, ते पाहून माझे डोळे दिपून गेले....कृतज्ञतेने म्हणाली,'ही भरभराट तुज्यामुळं झाली बाबा'खरंच तिची भरभराट झाली होती.... पण केवळ वस्तूंची संख्या वाढली म्हणून तीला भरभराट म्हणायचं का ? मुळीच नाही.....


काळ्याकुट्ट अंधारात मिणमिणता का होईना पण दुसऱ्याच्या घरात एक दिवा लावणे म्हणजे भरभराट.... सर्वकाही संपलेलं असतानासुद्धा उठून उभं राहण्याची इच्छा मनात बाळगणे म्हणजे भरभराट… पाय नसतानाही आकाशात भरारी घ्यायचं वेड मनात बाळगणं म्हणजे भरभराट...


चार वर्ष मी या कुटुंबासोबत आहे...


स्वतःचा विकास करत असताना,या सर्व प्रवासात तीने रस्त्यावरच्या आणखी एका व्यक्तीला हात दिला होता.... याचंच मला जास्त अप्रूप  !


दिवसेंदिवस ती उन्नती करत होती... रस्त्यावर व्यवसाय करताना तिला अनंत अडचणी सुद्धा येत होत्या परंतु त्यातून ती मार्ग काढत होती... 


फुंकर मारल्याने दिवा विझतो..... अगरबत्ती नाही....!

जो दुसऱ्याला सुगंध  देतो तो कसा विझेल....?


रस्त्यावरची निराधार भिक्षेकरी ते आताची सक्षम कष्टकरी असा हा तिचा प्रवास.... मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे.... नव्हे अनुभवलाय....


स्वतःला भूक लागते तेव्हा खाणं म्हणजे प्रकृती, दुसऱ्याचं ओढून घेऊन खाणं म्हणजे विकृती, पण स्वतःला भूक लागलेली असताना,आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला देणं ही झाली संस्कृती....!


ती शिकली नाही,तीची भाषा ओबड-धोबड आहे....पण तरीही माझ्यासाठी ती सुसंस्कृतच आहे...! 


या दिवाळीत तिने मला पुन्हा शिव्या देऊन भाऊबीजेला घरी बोलावलं....


भाऊबीजेच्या दिवशी तीने फुटपाथवर तीच्या घरासमोर रस्त्यावरच एक चटई अंथरली.... तिथे तिने मला साग्रसंगीत ओवाळले...मी तिला ओवाळणी दिली.


तीने मला पेढा भरवला आणि पेढ्याचा बॉक्स माझ्या हाती दिला.... पेढ्याचा बॉक्स वरच भागवते म्हातारे... मला वाटलं जेवायला बोलवशील...', मी हसत  म्हणालो.


'म्हातारी म्हणू नगो ' तिरक्या डोळ्यानं माझ्याकडे बघत,हातातलं ताट ठेवता ठेवता ती गुरगुरली. 


'बघितलं तर म्हातारी आणि मला म्हणते ताई म्हण...' मुद्दाम मी तिला उचकवलं .... आता पुढं काय होणार हे मला  माहित होतं...


'म्हातारी कुणाला म्हणतो रे मुडद्या... ' म्हणत तीने पायातली चप्पल काढून माझी ओवाळणी केली होती....

एका भावाला प्रेमळ बहिणीच्या या मायेच्या चपलीपेक्षा आणखी जास्त काय हवं ....?


माझ्या आईच्या वयाची ती बाई,आता तिचा आशीर्वाद घ्यावा आणि निघावं म्हणून उठलो. 


तिच्या पाया पडत म्हणालो,'तुला म्हातारे म्हटलेलं आवडत नाही,तुला मी ताई म्हणावं अशी तुझी इच्छा आहे....परंतु खरं सांगू का ताई पेक्षा तुला मी आई म्हणणं जास्त योग्य आहे....!' तीच्या भावूक झालेल्या चेहऱ्यावर आता प्रश्नचिन्ह होतं...


तीला म्हणालो,'अगं तू स्वतः अपंग, त्यात तू स्वतः रस्त्यावर राहत होतीस,मात्र जेव्हा स्वतः सावरलीस

,तेव्हा तू एका अपंग माणसाला वर्षभर सांभाळलंस हे सारं काही एक आईच करू शकते ना ....


आता तीच्या डोळ्यात पाणी होतं.... ती म्हणाली,'पाय नसत्यात तवा त्याचं दुःख काय आस्त हे मला म्हाईत हाय,रस्त्यावर कुत्र्यावानी निराधार म्हणून उनात पावसात पडणं म्हंजी काय आस्तंय हे सुदा मला म्हाईत हाय,मला तू आदार देऊन पायावर हुबी केलीस .... डोक्यावर छत टाकलस .... पोटातली भूक भागवलीस....  तू माजा कुनीही नसताना माज्या साटी तू हे केलंस... मी तुजी आई नसताना तू माजा पोरगा झालास....


म्हणलं,चला बीन बाळंतपनाचं या वयात आपल्याला बी पोरगं झालंय.... तर संबळु या अपंग  पोराला.... आपुन बी या वयात आई हुन बगु.... मी आय झाले आन ह्यो बाप......'  तीने नवऱ्याकडे  बोट दाखवत म्हटले....!


आता डोळ्यात पाणी माझ्या होतं....!

म्हटलं, 'म्हातारे तू लय मोटी झालीस.... '


यावेळी "म्हातारी" म्हटल्यावर ती चिडली नाही, उलट गालातल्या गालात हसली.... 


हसत ती झोपडीत गेली आणि चार-पाच बोचकी उचकटली... त्यातून एक शर्ट काढला .... एक साडी घेतली आणि मला म्हणाली, 'दिवाळीला ह्यो शर्ट घालशील का ? तू घिवून जा,नाय बसला तर सांग मला आणि मनीषाला ही साडी पन दे... तीला म्हणावं साडीतच ब्लाउज पीस पन हाय....' 


हा "भरजरी पोशाख" मी घेतला.... 


गाडीला किक मारली आणि तीला हात जोडून मनोमन नमस्कार करत म्हणालो,'जातो मी माई...'


ती म्हणाली,' ए मुडद्या,जातो म्हणू न्हायी.... येतो म्हणावं.... आनी हो.... माई आणि ताई म्हणायची थेरं करू नगोस, मला आपली म्हातारीच म्हन....मी तुजी म्हातारीच हाय....! मी माझ्या या म्हातारीला मनोमन नमस्कार करून शर्ट आणि साडी घेऊन निघालो.... 


आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी होतो..! 


डाॕ.अभिजीत सोनवणे,भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर

डाॕक्टर फाॕर बेगर्स,१३ नोव्हेंबर २०२१

२४/११/२३

शीर्षक कशाला हवे ! Why do you need the title!

चिचोरा तलाव - 

   

दिवाळी पाडव्याची ऑफिसला सुटटी असल्याने पोरींना घेवून त्यांच्या आजोळी गेलो होतो. त्यांच्या आजोबांचे घर शेतात असल्याने व खेळायला भलंमोठं अंगण असल्याने दिवसभर इकडुन तिकडे हुंदडुन पोरी थकल्या होत्या. दिवस मावळायला झाला होता.

गावातल्या मंदिरात संध्याकाळचे भजन सुरू झाले होते. अंगणात खुर्च्या टाकुन आम्ही घरबसल्या भजनाचा आनंद घेत होतो.डाॅ.रामेश्वर नाईक सरांचा मोबाईलवर काॅल आला आणि चारठाणा परिसरातल्या तलावावर पट्टेरी राजहंस दिसत असल्याची बातमी दोन दिवसांपुर्वी वर्तमानपत्रात वाचली,उद्या भाऊबीजेची सुटटी आहे.आम्ही चारपाच जण सकाळी चारठाणाला येणार आहेत.पक्ष्यांचे लोकेशन घ्या आणि कळवा असे फर्मानच डाॅ रामेश्वर नाईक सरांनी सोडले. काॅन्फरन्स काॅलवर डाॅ.दुर्गादास कान्हडकर सुद्धा होते.साधारणतः दहा पंधरा मिनिटे आम्ही त्यावर चर्चा केली आणि तलाव व पक्ष्यांच्या स्थितीची माहीती घेवून कळवतो असे सांगुन मी फोन बंद केला.चारठाण्याच्या जवळपासच्या पट्टयात म्हटलं तर चारपाच पाझर तलाव आहेत.त्यातला सर्वात मोठा तलाव म्हणजे कवडयाचा गावशिवारी असलेला तलाव,कान्हा गाव शिवारातील तलाव व जिंतूर संभाजीनगर राज्यरस्त्यावर रायखेडयाजवळ असलेला छोटासा तलाव.परंतू पट्टेरी राजहंस आणि ज्या तलावावर नेहमीच पाणपक्षी दिसण्याची शक्यता जास्त असते त्या चिचोरा तलावाला यावर्षी पाणीच आहे की नाही याबाबत मी साशंक होतो.


चिचोरा तलाव... चारठाणा गावाला ज्या दोन तलावातुन पाणीपुरवठा केल्या जातो त्यापैकी एक असलेला मोठा तलाव.चारठाणा कावी रोडवर कान्हा शिवारात चारठाणा गावाच्या पुर्वेला असलेला हा पाझर तलाव.या तलावावर मी यापूर्वी अनेकवेळा पक्षिनिरीक्षण केले आहे.


  ४० ते ५० पट्टेरी राजहंस पक्ष्यांच्या थव्याची नोंद मागील वर्षी मी याठिकाणी घेतलेली आहे.

पावसाळा चांगला झाला आणि तलाव शंभर टक्के भरला तर हा तलाव शेतकऱ्यांच्या पिकाला हिवाळभरणी पाणी पुरवुन गावाची,वन्यप्राण्यांची,

पक्ष्यांची तहान भागवण्याचं काम हा तलाव करत असतो.


जसजसा उन्हाळा जवळ यायला लागतो,ऊन तापायला लागतं,पिकांसाठी पाणी उपस्याचा जोर वाढतो तेव्हा हळुहळु या तलावाची पाणी पातळी कमी व्हायला लागते.पाण्याची पातळी कमी झाली की पाणपक्ष्यांना खाद्य सहज उपलब्ध होतं आणि हिवाळी स्थलांतरित पाणपक्ष्यांची या तलावावर गर्दी व्हायला लागते. 


चक्रवाक बदक,थापटया बदक,चमचा, हळदीकुंकु बदक,नदीसुरय,रंगीत करकोचा, पांढऱ्या मानेचा करकोचा,पांढरे बगळे,पांढरा, पिवळा धोबी,वारकरी,

जांभळी पाणकोंबडी अशा कितीकरी पक्ष्यांचे निरीक्षण या तलावावर करता येते. मागच्या तीन वर्षांपासुन मी आणि पुष्पक ने अनेकवेळा या तलावावर पक्ष्यांचे निरीक्षण केले आहे,फोटोशुट केले आहे.मागील वर्षीच उन्हाळा संपत आलेला असतानाही मोठया प्रमाणात खाद्य उपलब्ध असल्याने पट्टेरी राजहंस पक्षी येथुन आपल्या मुळ देशात परतायचे नांव घेत नव्हते.साधारणतः ४० ते ५० पक्ष्यांचे निरीक्षण व नोंदी मी या चिचोरा तलावावर घेतलेल्या आहेत.परंतू यावर्षी मुळातच पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने तलावात पाणी असेल कि नाही या साशंकतेनेच हिवाळा सुरू होवूनही मी अजुन त्या तलावाकडे फिरकलो नव्हतो.

परंतु आता मात्र कसंही करून त्याची माहीती घेणं आवश्यक होतं.माझे सहकारी सोमनाथ खके यांना फोन करून तलावाची व पक्ष्यांची स्थिती काय आहे याची एखाद्या शेतकऱ्यांकडुन माहीती घ्यायला सांगितली.त्यांनीही लगेच आजुबाजुच्या दोन तीन शेतकऱ्यांना फोन करून तलावातील पाण्याची व दिसणाऱ्या पक्ष्यांची माहीती घेतली. पाण्याने तळ गाठलेला आहे,पक्षी दिसतात मात्र फारसे नाही अशी खात्रीलायक माहीती मिळाली. लगेच 'माणिक' सरांना फोन करून सर्व माहीती दिली व डाॅ.नाईक सरांसोबत येण्यासाठी आग्रह केला.शाळेला सुटया असल्याने व माझ्या अगोदरच डाॅ नाईक सरांनी त्यांना फोन केल्याने क्षणाचाही विलंब न लावता सकाळी मी सोबत येतोय असं त्यांनी सांगीतलं.आता गावाकडुन सकाळी लवकर उठुन मला चारठाणा जावं लागणारं होतं.जेवण करून राजहंस दिसतील की नाही या विचारात मी तसाच बाजेवर आडवा होवून झोपेच्या आधीन झालो.


सकाळी (चार) वाजता उठण्याच्या रोजच्या सवयीप्रमाणे उठलो.घराबाहेर आलो असता थंडीने चांगलंच डोकं वर काढलेलं जाणवत होतं. काहीशी बोचरी वाटणारी थंडी अंगाला झोंबत होती.थंडीशी दोन हात करत तसेच सकाळचे सर्व कार्यभाग उरकुन आंघोळीला फाटा देत मी साडेपाचच्या सुमारास चारठाणा जाण्यासाठी घराबाहेर पडलो.सगळीकडे काळोख दाटलेला होता.रानपाखरांचा हलकासा चिवचिवाट कानवर पडत होता.मोबाईल बॅटरीच्या उजेडात गाडीपर्यंत पोचलो.मस्त मराठी भावगीते ऐकत साधारणतः सव्वासहाच्या सुमारास मी चारठाण्यात पोचलो.नुकतंच उजाडायला लागलं होतं.माणिक सरांना फोन केला.ते जिंतूरच्या जवळपास आले होते. सातच्या आसपास वालुरहुन डाॅ.ज्ञानेश्वर हरबक चारठाण्यात पोचले.साडेसातपर्यंत डाॅ नाईक सर, माणिक सर,

गोदातीर समाचारचे जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब काळे,समीर पावडे,डाॅ उमेश लाड,अशोक लाड,डाॅ रणजीत लाड,दत्ता बनसोडे,सुधीर सोनूनकर व इतर काही सहकारी चारठाण्यात पोचले.चार गाडयांचा ताफा चिचोरा तलावाच्या दिशेने निघाला होता.चिचोरा तलावाकडे जाण्यासाठी चारठाणा गावाला वळसा घालुन जाणाऱ्या कान्हा कावि रस्त्याने आम्ही चिचोरा तलावाकडे निघालो होतो.दोन किमी अंतरावर गेल्यानंतर डांबरी रस्ता सोडुन आम्ही कच्च्या रस्त्याने तलावाकडे निघालो. अंगावर पांढऱ्या मातीचा धुरळा साठवत गाडया चिचोरा तलावाकडे सरकत होत्या.

थोडयाच वेळात आम्ही तलावाजवळ पोचलो.गाडीतुन खाली उतरताच माझी नजर एका शिकारी पक्ष्यावर पडली.कदाचित आपली तहान भागविण्यासाठी तो तलावावर उतरला असावा. नजरेत सामावून घेईपर्यंत व इतर सहकाऱ्यांना त्याची माहिती देई पर्यंत तो शिकारी पक्षी भर्रकन उडाला.त्याची ओळख पटेपर्यंत तो नजरेआड झाला होता.कदाचित पाणघार किंवा बोनेलीचा गरुड असावा...तलावाच्या पश्चिम दिशेकडुन खालच्या बाजुला उतरत मी तलावातील पाण्याचा व पक्ष्यांच्या स्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होतो.पाण्याने तर तळ गाठलेला दिसत होता परंतू पक्ष्यांच्या कुठंच काही हालचाली दिसत नव्हत्या.

तलावातल्या गाळाचा उपसा केल्याने जागोजागी पाण्याचे डबके साचलेले दिसत होते.


माणिक सरांकडुन दुर्बीण घेवून तलावाच्या चौफेर मी पक्ष्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होतो.पलिकडच्या काठावर दक्षिणेकडुन दोन हळदीकुंकु बदक आणि पाण्यात दुरवर पसरलेल्या खरपणाच्या रांगेवर एक राखाडी बगळा ध्यान लावुन बसलेला दिसला त्याशिवाय काहीच नजरेस पडत नव्हतं. तलावाच्या दक्षिणेकडुन पुढे सरकुन पुन्हा काही हालचाली दिसतात का म्हणुन मी बाकी सर्वांना तिकडुन जाण्याचा इशारा केला आणि मी स्वतः पाळुवरच्या रस्त्याने पुढे सरकलो.माझ्या मागे डाॅ.नाईक सर आणि माणिक सर होतेच.थोडया अंतरावर एका बाभळीच्या झाडावर काळसर पांढरट रंगाचे एक पिल्लु नजरेस पडले.नाईक सरांनी त्याच्यावर कॅमेरा रोखत त्याला कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला परंतू कॅमेरा फोकस होईपर्यंत ते पिल्लु उडुन दुसऱ्या झाडावर थोडंसं आतमध्ये जावुन बसलं.त्याच्या बाह्यरंगावरून ते  चातक पक्ष्यांचं पिल्लु असावं असा अंदाज मी आणि माणिक सरांनी लावला.


सातभाई आणि चातक पक्ष्यांची पिल्लं लहान असताना सारखीच दिसत असल्याने त्यांना ओळखणं तसं कठीणच जातं.त्याला आहे त्या अवस्थेत त्याचा नाद सोडुन आम्ही पुढे सरकलो.


 पाळुवरून तलावाच्या दिशेनं दगडांची एक उतरंड वजा पायवाट उतरली होती.तलावावर पाणी पिण्यासाठी जाणारी जनावरं किंवा शेताकडं जाणारे शेतकरी याच वाटेचा वापर करत असावीत,म्हणुन वाट दगडाची असली तरी चांगलीच रूळलेली होती.त्याच दगडी वाटेवरून आम्ही तलावाच्या दिशेनं खाली उतरलो.

वाटाड्या म्हणून मी पुढे असल्याने पुन्हा एकदा पक्ष्यांच्या काही हालचाली दिसतात का ते न्याहाळतच होतो.गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी खोदलेल्या विहीरीच्या खरपणाचा ढिग तलावाच्या काही भागात आतपर्यंत लांबवर गेलेला होता.ढिग संपतो त्या टोकाकडे दोन तीन मोठे दगड विखुरलेले होते त्या दोन दगडांच्या आडोशाला करवानक (ग्रेटर थिकनी) पक्ष्यांची एक जोडी जी की या भागात दिसायला अत्यंत दुर्मीळ असे पक्षी आहेत ते नजरेस पडले.यापुर्वी मागच्या वर्षी कवडा तलाव परिसरात व याच चिचोरा तलावात ग्रेटर थिकनी मी पाहीले होते.सोबत असलेल्या बाकीच्यांना मी करवानक पक्षी दाखवले.ज्यांच्याकडे कॅमेरा होता ते सर्व फोटोशुट करण्यासाठी पुढे सरकले.

दुर्बीण असलेले सहकारी दुर्बीणीतुन त्यांचे निरीक्षण करत होते.दोन्ही पक्षी दगडांच्या आड असल्याने फोटोसाठी अडथळा वाटत होता.डाॅ नाईक,डाॅ रणजीत लाड व अजुन एकजण खरपणाच्या ढिगारावर वरपर्यंत चढुन फोटो काढण्याचा प्रयत्न करत होते.त्यांना आता थिकनी ठळकपणे दिसत होती.माणिक सर आणि मी इतरांना थिकनीबद्यल माहीती देत होतो.सर्वचजण लक्ष देवुन माहीती ऐकत होते आणि त्या पक्ष्यांचे निरीक्षण करत होते.आमच्या कलकलाटाने थिकनी सावध झाल्या होत्या.काही कळायच्या आत त्यांनी आमच्याजवळुन दुर होत पलिकडच्या काठावर जावुन अलिप्त बसणे पसंत केले.इकडे दोन पांढरा धोबी पक्षी तुरूतुरू किडे शोधण्यात व्यस्त असल्याचे दिसत होते.

काहीच हालचाल नाही म्हणता म्हणता करवानक,पांढरा धोबी,राखी बगळा,हळदी कुंकु बदक अशा पक्ष्यांच्या हालचाली आता नजरेला पडत होत्या.दत्ता बनसोडे आणि सुधीर सोनुनकर पक्ष्यांचे निरीक्षण करता करता पुर्वेला पुढे सरकत होते.काही अंतरावर गेल्यावर त्यांची चाहुल लागताच तलावाच्या काठावरील ओल्या मातीतल्या हिरव्या गवताचे कोवळे कोंब खाण्यात व्यस्त असलेल्या चक्रवाक बदकांनी वर माना काढत कर्कश असा बैंक बैंक असा आवाज काढला.त्यांचा आवाज कानावर पडताच आमच्या सर्वांच्या नजरा चक्रवाक पक्ष्यांकडे वळल्या.दत्ता बनसोडे आणि सुधीर सोनुनकर जसजसे पुढे सरकत होते तसे सहा ते आठ चक्रवाक हळुहळु खोलगट भागातुन वर येवुन पाण्याच्या दिशेने सरकु लागले.एका जोडीने वेळ न लावता पाण्यात उतरत दुसऱ्या दिशेला जाण्यासाठी जलविहार सुरू केला होता.बाकीचे मात्र अजुनही अंदाज घेत जागेवरच पुढे पुढे सरकत होते.आता मात्र उरलेल्या चक्रवाक पक्ष्यांनी सुद्धा धोका न पत्करता दुर जायचं ठरवलं.एका जोडीने आकाशाकडे झेप घेत दुरपर्यंत भरारी घेतली आणि लगेच नजरेआड झाले.तर दोन जोडयांनी आकाशात काही उंचावरून दोन तीन घिरटया मारत आमच्या हालचालीचा अंदाज घेतला आणि एखाद्या लढावू विमानानं आपला वेग नियंत्रित करत आल्हादपणे जमीनीवर उतरावं तसं आमच्यापासुन काही अंतरावर पाण्यात हे चक्रवाक उतरले होते.आम्ही सर्वच त्यांच्या करामतीचे निरीक्षण करत आनंद घेत होतो. दुरवर पाण्याच्या एका वळमनीत एक काळा शराटी किडे शोधण्यात मग्न होता.दत्ता बनसोडे आणि सोनुनकर सरांच्या पाठोपाठ पलिकडचे चक्रवाक पक्षी पाहण्यासाठी मी,सोमनाथ खके आणि कैलास रावुत सुदधा तलावाच्या पुर्वेला पुढे सरकलो.काळा शराटी शेणकुडात किडे शोधण्याचा प्रयत्न करत होता.सर्वचजण आता आपापल्या परीने तलावाभोवती पांगले होते. साधारणतः तास दिड तास पक्ष्यांचे निरीक्षण केल्यावर हळुहळु सर्वजण पुन्हा एकत्र जमा होत होते.तोपर्यंत सोमनाथ खके यांनी नाश्त्याची व्यवस्था केली होती.गरमागरम खिचडी भजे घेवून दिपक पवार तलावावर येवून पोचला होता.

तलावाच्या काठावरच मोकळी जागा पाहुन आम्ही सर्वांना नाश्त्यासाठी गोलाकार बसवले. काही जणांनी घरून येताना दिवाळी फराळ, पराठे,गोड पदार्थ सोबत आणले होते.खिचडी भज्यांसोबत या सर्व पदार्थांवर ताव मारत आम्ही सर्वांनी नाश्ता उरकला.तिकडे पक्षी सुदधा आपल्या खाण्यावर ताव मारण्यात मग्न झालेले दिसत होते.वर्तमानपत्रातुन पट्टेरी राजहंसची बातमी प्रसिद्ध झाली होती.पट्टेरी राजहंस नजरेस पडले नसले तरी करवानक आणि चक्रवाक पक्ष्यांनी ती कमतरता भरून काढल्याने कुणी नाराज झालं नव्हतं.


तलाव आणि जंगलं कधीच नाराज करत नाहीत. त्यांच्याजवळ जे असेल ते मुक्तहस्ते ते इतरांना देत असतात.


 पट्टेरी राजहंस दिसायला लागल्यावर पुन्हा या तलावावर यायचे असे ठरवुन आम्ही चिचोरा तलावावरून परतीच्या मार्गाला लागलो होतो.


विजय जनार्धन ढाकणे

शिवाई,शिवाजी नगर,जिंतूर 


सहज सुंदर घडलेली अशी घटना आपल्या सहज सुंदर भाषेमध्ये मांडलेली आहे.हे वाचत असताना.


फर्ननचे एक वाक्य समोर आले.


" समजून घेणे ही एक कला आहे.आणि प्रत्येकजण कलाकार नसतो. "


शीर्षक कशाला हवे !


छोटे ओठ बालकाचे

आईच्या विस्तारित गालावर

महाकाय सुख अनुभवत

त्याचे मन मोठे मोठे होत जाते 

आहे का हे सत्य ?


ही आमची सृष्टी

पृथ्वीने जन्मास घातली

ही जीवसृष्टी

बाईपणातून प्रसवली

हे खरे सत्य.


कळते झाल्यावर आम्ही

हे जग विराट पुरूषाने

ईश्वराने जन्मास घातले

असे सांगत सुटतो

 बिनदिक्कत


वय उमलते तसे

प्रेम शरीरात फुलून येते

आपले आपले वेगळेपण 

विसरून क्षणभर सर्व 

इच्छितात एकांत


मिलन संपले की

पुन्हा वेगळे ते,

तो पुरुष महान

अन् ती स्त्री लहान 

 मनोविश्वात - धर्मग्रंथात 


श्रमणांचे एक संचित इथे

पुसट जरी काहीसे ते

माझ्या जाणीवेत दाटून येते

नेणीवेला चकवा देऊन मी

होतो उत्कट काठोकाठ 


मी उमलवून माझे पुरूषत्व

तिच्याकडे खेचला जातो 

तिच्यात असतेच स्त्रीत्व - मातृत्व

अन् प्रेमाचे कोवळे बळ

विराट अफाट


ओठ माझे छोटे

तिच्या ओठावर झुकतात जेव्हा 

ती पृथ्वी होऊन

 बिलगते विराटतेने अन् तेव्हा 

होते जीवन संतृप्त 


 माझ्यातला छोटा पुरूष

विरघळतो वितळतो

रूपांतरित होऊन

आदिमाया बनतो मी

होतो मातृत्व 


क्षणिक असते पुरूषत्व

सदोदित उरते मातृत्व

लिंग म्हणजे केवळ जीव

 पुरूषपण निभावत हरवत

उरवावे मनुष्यत्व


डॉ.रवींद्र श्रावस्ती


अतिशय मार्मिक व बरचं काही सांगुन जाणारी ही कविता तयार करण्यास .डॉ..रवींद्र श्रावस्ती यांना 

चार तास लागले.आपल्या सर्वांसाठी ही पहिली कविता..