* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मार्च 2024

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३१/३/२४

अखेरचे आवाहन.. Last call (1)

मार्टिन ल्यूथर किंग ज्यु.

(१९२९ जानेवारी१५-१९६८ एप्रिल ४)


"हिंसा अनैतिक आहे;कारण प्रेमापेक्षा द्वेषावर तिचा भर असतो.हिंसेमुळे समाजाचा नाश होतो आणि भ्रातृभाव अशक्यप्राय होतो.हिंसेमुळे समाजात सहकार्याऐवजी विभक्तपणाची प्रवृत्ती निर्माण होते.हिंसेमुळे पराभूत लोकांत कडवटपणा आणि विजेत्यांत पाशवी वृत्ती निर्माण होते.हिंसेचा शेवट अखेर खुद हिंसेच्याच पराभवात होतो.,नागरिक हक्कांच्या चळवळीचे नेते मार्टिन ल्यूथर किंग यांनी नॉर्वेतील ऑझ्लो विद्यापीठात शांततेच्या नोबेल पारितोषकाचा स्वीकार करताना केलेले उत्स्फूर्त भाषण.


आजच्या काळातील मानवाने सर्व जगापुढे भावी काळाचे अचंबा वाटण्याजोगे चित्र उभे केले आहे.वैज्ञानिक यशाची नवी व आश्चर्यकारक शिखरे त्याने पादाक्रांत केली आहेत. माणसांप्रमाणे विचार करू शकणारी यंत्रे आणि विश्वमालेतील अनंत अवकाशाचा ठाव घेणारी उपकरणे त्यांनी तयार केली आहेत.सागर उल्लंघण्यासाठी प्रचंड पूल,तसेच गगनचुंबी भव्य इमारती बांधल्या गेल्या आहेत.

माणसाने तयार केलेल्या विमानामुळे व अवकाशयानामुळे अनंत कःपदार्थ बनले आहे,काळाला मर्यादा पडली आहे.

आणि अवकाशातून हमरस्ते केले गेले आहेत.आधुनिक काळातील माणसाने केलेल्या शास्त्रीय व तांत्रिक प्रगतीचे हे नेत्रदीपक चित्र आहे.पण विज्ञानाच्या व तंत्रशास्त्राच्या क्षेत्रात इतकी भव्य प्रगती होऊनही आणि भावी काळात अमर्याद प्रगती होण्याची चिन्हे दिसत असूनही काही तरी मूलभूत हरपलेले आहे,असे वाटते.आजच्या जगात आत्मिक तेजाचे दारिद्र्य भासते.विशेषतः आपल्या वैज्ञानिक व तांत्रिक समृद्धतेच्या पार्श्वभूमीवर हे दारिद्र्य प्रकर्षाने जाणवते.आपण आधिभौतिकदृष्ट्या अधिक सधन झालो आहोत पण नैतिक व आध्यात्मिकदृष्ट्या अधिक दरिद्री झालो आहोत. आपण आकाशात पक्ष्यांप्रमाणे विहार करण्यास आणि सागरात माशांप्रमाणे तरंगण्यास शिकलो आहोत,पण भाऊ भाऊ म्हणून एकत्र राहण्याची साधी कला मात्र आपण शिकलो नाही.


प्रत्येक मनुष्य दोन जगात वावरत असतो,एक अंतर्गत व दुसरे बाह्य.अंतर्गत जग हे आध्यात्मिक आकांक्षांचे जग असून ते कला, वाड्मय,नैतिक मूल्ये व धर्म यांच्याद्वारे व्यक्त होते.बाह्य जग हे विविध साधने,तंत्रे,यांत्रिकी व्यवस्था व उपकरणे यांनी युक्त असून त्यांच्या साहाय्याने आपण जीवन कंठीत असतो.आपण आपले अंतर्गत जग बाह्य जगात का लुप्त होऊ दिले,हीच आज आपल्या

पुढील समस्या आहे. ज्या साध्यासाठी आपण जगतो,त्या साध्यावर आपण साधनांची मात होऊ दिली आहे.


थोडक्यात कविवर्य थोरो यांच्या पुढील उद्बोधक वचनात आधुनिक जीवनाचे समालोचन करता येईल,"न सुधारलेल्या साध्यासाठी सुधारलेली साधने," जर मानवजातीला अस्तित्वात रहावयाचे असेल तर मानवानी आपल्यातील नैतिक व आध्यात्मिक क्षेत्रातील

मागासले पणा घालविला पाहिजे.वाढत्या आधिभौतिक शक्तीच्या प्रमाणात जर आत्मिक बल वाढले नाही तर जगात अधिक प्रमाणात प्रलय होईल.जेव्हा माणसाच्या स्वभावातील बाह्य प्रवृत्ती आंतरिक शक्तीवर विजय मिळवते,तेव्हा जगात वादळाचे काळे ढग जमू लागतात.


आध्यात्मिक व नैतिक मागासलेपणा ही आधुनिक काळातील माणसापुढील मुख्य समस्या आहे.माणसाच्या नैतिक ऱ्हासातून जे तीन व्यापक प्रश्न उद्भवतात,त्यांतून ही समस्या व्यक्त होते.हे तीन प्रश्न वेगवेगळे असतात,पण ते एकमेकांत गुंतलेले आहेत.हे तीन प्रश्न म्हणजे अन्याय,

दारिद्र्य व युद्ध होत.प्रथम मी वांशिक अन्यायाचा उल्लेख करतो.वांशिक अन्यायाचे पाप नष्ट करण्यासाठी चाललेला लढा हा आजच्या काळात एक मोठा लढा आहे. अमेरिकेतील निग्रोत आज जागृती झालेली दिसत आहे.स्वातंत्र्य व समानता मूर्त स्वरूपात आणण्याच्या नितांत व तीव्र श्रद्धेतून ही जागृती झाली आहे.


उद्ध्वस्त जीवनाची प्रलयंकर गर्जना


ज्या काळात सामाजिक संस्कृतीतील मूलभूत दृष्टिकोन बदलत आहे अशा काळातच आपण वावरत आहोत,असे आल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड हे तत्त्वज्ञ म्हणतात.इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.ज्या गृहीत तत्त्वावर समाजव्यवस्था आधारलेली आहे,त्या तत्त्वांचे पृथक्करण केले जात आहे, त्यांना जोराचे आव्हान दिले जात आहे.आणि त्यात मोठे बदल होत आहेत.आज जग स्वातंत्र्याच्या वृत्तीने भारलेले आहे.व्हिक्टर ह्यूगोच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे या विचारसरणीला मूर्त स्वरूप लाभण्याची वेळ आली आहे.आज आपल्याला असंतोषाचा मोठा घरघराट ऐकू येत आहे.हा घरघराट म्हणजे ज्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे अशा जनतेची मेघगर्जना आहे.ही जागृत झालेली जनता गांजवणुकीच्या खाईतून स्वातंत्र्याच्या उज्ज्वल शिखरावर आरूढ होऊन एका भव्य आवाजात स्वातंत्र्याची गर्जना करत आहे.जगातील अत्यंत व्यापक असा हा विमोचनाचा काळ आहे.या काळात आगीच्या वणव्याप्रमाणे सर्व जगात स्वातंत्र्याची चळवळ पसरत आहे.आपले वंश व आपला देश यांची पिळवणूक थांबविण्याचा प्रचंडसंख्याक जनतेने निर्धार केला आहे.

प्रत्येक खेड्यात,रस्त्यावर,गोद्यांत,घरात,विद्यार्थ्यांत, प्रार्थनामंदिरांत व राजकीय सभांत स्वातंत्र्याचा हा घरघराट ऐकू येत आहे.अनेक शतकांपर्यंत ही ऐतिहासिक चळवळ या पश्चिम युरोपातील राष्ट्र व समाज यापुरतीच मर्यादित होती.बाकीच्या जगाला अनेक प्रकारे नागवण्यात ही राष्ट्र गुंतली होती.तो काळ,वसाहतवादाचे युग आता संपलेले आहे.पूर्व व पश्चिम यांचा मिलाफ होत आहे. 


जगाची फेर वाटणी होत आहे.आपल्या मूलभूत दृष्टिकोनात बदल होत आहे.या घडामोडीमुळे इतिहासाच्या कोणत्याही विद्यार्थ्याला आश्चर्य वाटणार नाही.पददलित लोक कायमचे पददलित राहणार नाहीत.स्वातंत्र्याची आकांक्षा अखेर व्यक्त होतेच. अनेक शतकांपूर्वी मोझीझने कैरोच्या न्यायालयात "माझ्या लोकांना जाऊ द्या," ही घोषणा कशी केली त्याची रोमांचकारी कथा बायबलात आली आहे.अखंड चालू असलेल्या कथेचे ते जणू काय सुरूवातीचे प्रकरण होते.


अमेरिकेतील सध्याचा लढा याच अखंड कथेतील एक नंतरचे प्रकरण आहे.काही तरी आंतरिक शक्तीने निग्रोंना त्यांच्या स्वातंत्र्याच्या जन्मसिद्ध हक्काची जाणीव करून दिली आहे आणि काहीतरी बाह्य शक्तीने त्याला हे स्वातंत्र्य मिळविता येईल,हे पटवून दिले आहे.


अमेरिकेतील निग्रोंचे स्वातंत्र्याचे स्वप्न मूर्त स्वरूपात आणण्यासाठी अद्याप कितीतरी मजल मारावयाची आहे.बायबलातील आलंकारिक भाषेत सांगावयाचे म्हणजे इजिप्तमधील धुळीने भरलेल्या प्रदेशातून आम्ही निघालो आणि प्रदीर्घ व अतिशय तीव्र झोंबणाऱ्या हिवाळ्यामुळे अनेक वर्षे गोठून गेलेला तांबडा समुद्र आम्ही ओलांडला.पण आश्वासित समृद्ध प्रदेशाच्या भव्य किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचण्यापूर्वी निराशाजनक व त्रस्त करणाऱ्या वैराण मुलखातून आम्हाला जावे लागणार आहे. आम्हाला अद्यापही विरोधाची उत्तुंग शिखरे व प्रतिकाराचे प्रचंड पर्वत ओलांडावयाचे आहेत. पण धिम्या व दृढ निश्चयाने आम्ही मार्गक्रमण करीत राहू आणि अशा रीतीने निराशेच्या प्रत्येक दरीचे रूपांतर उत्तुंग आशेच्या व दयेच्या शिखरात करू.अहंकाराचा व असमंजसपणाचा प्रत्येक पर्वत नम्रतेच्या व दयेच्या साधनांनी सखल करू.

अन्यायाच्या खबदाडाचे रूपांतर समान संधीच्या सपाट प्रदेशात करू आणि पूर्वग्रहांच्या वेड्यावाकड्या स्थळांचे स्वरूप सुजाणतेच्या प्रवृत्तीने पालटून टाकू.


इतिहासातील अपूर्व शस्त्र : अहिंसा


स्वातंत्र्य,समानता,रोजंदाऱ्या व नागरिकत्व या संबंधीची मागणी सोडावयाची नाही किंवा तीत भेसळ करावयाची नाही किंवा ती लांबणीवर टाकावयाची नाही,अशी अमेरिकेतील नागरिक हक्कांच्या चळवळीतील मुख्य गटांची भूमिका आहे.त्यासाठी प्रतिकार व झगडा करावा लागला तरी आम्ही माघार घेणार नाही.आम्ही नमणार नाही.आम्ही आता घाबरणार नाही.आचार व विचार या दोन्ही दृष्टीनी अहिंसा हे आमच्या लढ्याचे अधिष्ठान आहे आणि त्याचमुळे या लढ्यातील एका सैनिकाला शांततेचे नोबेल पारितोषिक देणे समर्पक वाटले असावे.स्थूल मानाने बोलावयाचे म्हणजे नागरिक हक्काच्या चळवळीत अहिंसेचा अवलंब याचा अर्थ या लढ्यात शस्त्रास्त्रांवर अवलंबून न राहण्याचे धोरण.याचा अर्थ विषमता व गुलामगिरीचा पुरस्कार करणाऱ्या राजवटीचे रिवाज व कायदे यांच्याशी असहकार.

याचा अर्थ प्रतिकाराच्या चळवळीत जनतेचा प्रत्यक्ष सहभाग.अप्रत्यक्ष मार्गावर भर दिला तर जनतेला प्रत्यक्ष कृतीत सहभागी होण्याची संधी बऱ्याच वेळा मिळत नाही,असा अनुभव आहे.अहिंसा याचा अर्थ असाही आहे की,अलीकडच्या काळातील कष्टप्रद लढ्यात भाग घेतलेले माझे सहकारी बांधव इतरांना क्लेश न देता स्वतः क्लेश सहन करीत आहेत. यापूर्वी मी म्हटल्याप्रमाणे यापुढे आम्ही घाबरणार नाही किंवा नमणार नाही; पण त्याबरोबर बऱ्याच प्रमाणात हेही खरे आहे की, इतरांना किंवा ज्या समाजाचे आम्ही घटक आहोत,त्या समाजाला घाबरून सोडण्याचा आमचा हेतू नाही.गौरकाय लोकांची मानहानी करून आणि त्यांना गुलाम करून निग्रो लोकांचे विमोचन करणे हा या चळवळीचा हेतू नाही.आम्हाला कोणावरही विजय मिळवावयाचा नाही.अमेरिकन समाजाचे विमोचन करणे आणि सर्व जनतेच्या विमोचनात सहभागी होणे,हा आमच्या चळवळीचा उद्देश आहे.

वांशिक न्याय मिळविण्यासाठी हिंसेचा मार्ग अव्यवहार्य व त्याचबरोबर अनैतिक आहे. बऱ्याच वेळा राष्ट्रांनी लढाई करून स्वातंत्र्य मिळविले आहे;पण तात्पुरते विजय मिळाले तरी हिंसेमुळे चिरस्थायी शांतता होत नाही.

हिंसेमुळे सामाजिक प्रश्न सुटत नाहीत,उलट नवीन व अधिक गुंतागुंतीचे प्रश्न उद्भवतात.हिंसा अव्यवहार्य आहे.कारण तीमुळे अधोगती होत जाऊन अखेर सर्वांचाच नाश होतो. हिंसा अनैतिक आहे,कारण सुज्ञपणे विरोधकांना आपलेसे करण्यापेक्षा तीत विरोधकांची मानहानी करण्याची प्रवृत्ती असते,हृदयपरिवर्तन करण्यापेक्षा द्वेषावर तिचा भर असतो.हिंसेमुळे समाजाचा नाश होतो,आणि भ्रातृभाव अशक्यप्राय होतो.हिंसेमुळे समाजात सहकार्याऐवजी विभक्तपणाची प्रवृत्ती निर्माण होते.हिंसेमुळे पराभूत लोकात कडवटपणा आणि विजेत्यांत पाशवी वृत्ती निर्माण होते.खुद्द हिंसेचा शेवट अखेर खुद्द हिंसेच्या पराभवात होतो.खऱ्याखुऱ्या अर्थी अहिंसा ही माणसातील आध्यात्मिक व नैतिक मागासलेपणा घालवू पाहते.यापूर्वी मी म्हटल्याप्रमाणे हाच मागासलेपणा म्हणजे आजच्या काळातील माणसापुढील मुख्य समस्या आहे. अहिंसा ही नैतिक साधनांद्वारे नैतिक उद्दिष्टे साध्य करू पाहते.अहिंसा हे प्रभावी व न्याय्य शस्त्र आहे इतिहासात अपूर्व असे हे शस्त्र आहे. जखम न करता अहिंसा शस्त्रक्रिया करते, आणि हे शस्त्र पेलणारा माणूस स्वतः उदात्त बनतो

.अहिंसेच्या साधनावर माझा विश्वास आहे.मला वाटते,भंगलेल्या समाजाचे पुनरुत्थान करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. ज्यांनी अंधवृत्ती,भीती,अहंकार व असमंजसपणा यांच्या आहारी जाऊन आपल्या सदसद्विवेकबुद्धीकडे दुर्लक्ष केले आहे,अशा प्रचंड बहुसंख्याक लोकांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करून न्याय्य कायदा अंमलात आणण्याचा अहिंसा हाच मार्ग आहे.


अणुयुद्धांची भयानक समस्या..


अहिंसेच्या मार्गाने प्रतिकार करणाऱ्यांना आपल्या संदेशाचे समालोचन पुढील सुलभ शब्दांत करता येईल.अन्यायाविरुद्ध सरकारी व इतर अधिकृत यंत्रणांनी जरी आवश्यक ती उपाययोजना प्रथम केली नाही.

तरीसुद्धा आम्ही अन्यायाविरुद्ध उघडउघड झगडू.आम्ही अन्यायी कायदे मानणार नाही किंवा अन्याय्य रिवाजापुढे नमणार नाही.अर्थात आम्ही हे सर्व शांतपणे, उघडपणे,

आनंदाने करू,कारण हृदयपरिवर्तन करणे आमचे उद्दिष्ट आहे.आम्ही अहिंसेच्या साधनाचा अवलंब करीत आहोत,

कारण शांततावादी समाज हे आमचे उद्दिष्ट आहे.आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडून हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू,पण त्यात अपयश आले तर आम्ही प्रत्यक्ष आचरणाने हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करू.

वाटाघाटी करण्यास आणि तडजोडी करण्यास आमची नेहमीच तयारी आहे.पण आम्हाला जे सत्य वाटते त्याचा आविष्कार व्हावा म्हणून जरूर तेव्हा क्लेश सहन करण्याची व प्रसंगी प्राण देण्याची आमची तयारी आहे.वांशिक अन्यायाच्या समस्येला प्रतिकार करण्यासाठी हे जे साधन स्वीकारले गेले आहे, त्याला पूर्वी यशही आले आहे.मोहनदास करमचंद गांधी यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या प्रबळ सत्तेविरुद्ध याच साधनाचा उत्कृष्ट रीतीने उपयोग केला,आणि अनेक शतकांच्या राजकीय वर्चस्वातून व आर्थिक पिळवणुकीतून भारतीय जनतेची मुक्तता केली.

गांधीजींनी फक्त सत्य,आत्मबल,अहिंसा व धैर्य या अस्त्रांचा उपयोग केला.गेल्या दहा वर्षांत अमेरिकेतील निःशस्त्र स्त्री-पुरुषांनी अहिंसेच्या नैतिक शक्तीची व परिणामकारकतेची कृतीने साक्ष पटवून दिली आहे.हजारो अज्ञात व निर्भय निग्रो व गौरकाय तरुणांनी शिक्षणाला तात्पुरता रामराम ठोकून देहदंड सोसला.अन्यायाच्या उष्णतेने रणरणत असलेल्या वाळवंटात त्यांचे धीरोदात्त व शिस्तबद्ध कार्य म्हणजे आल्हाददायक हिरवळच होय.

त्यांनी सर्व अमेरिकन लोकांना लोकशाहीच्या महान जलाशयाकडे पुन्हा नेले आहे.अमेरिकन राष्ट्राच्या संस्थापकांनी राज्यघटना व स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करून ही लोकशाहीची समृद्ध जलाशये खोदली आहेत.

एक दिवस सर्व अमेरिकेला त्यांच्या कार्याचा अभिमान वाटेल.(गांधी नावाचे महात्मा, संपादक - रॉय किणीकर,साहाय्यक,अनिल किणीकर,डायमंड पब्लिकेशन्स)


माणसाचे दौर्बल्य व अपयश यांची मला चांगलीच जाणीव आहे.अनेकजण अहिंसेच्या परिणामकारते

विषयी शंका घेऊन हिंसेचा उघड पुरस्कार करतात;

पण शतकानुशतकांच्या वांशिक अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी अहिंसा हे सर्वात व्यवहार्य व नैतिकदृष्ट्या सर्वोत्कृष्ट साधन आहे अशी माझी अद्यापही खात्री आहे.


उर्वरित भाग पुढील ०२.०४.२४ रोजीच्या लेखामध्ये…!

२९/३/२४

रजनीगंधा एक आठवण..!! A memory of Rajnigandha..!!

मुंबई शहरात तसंच उपनगरांत माझे अनेक परिचित आहेत.हा बहुधा माझ्या साहित्याचा वाचकवर्ग आहे.मात्र मित्र हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आहेत.सुमंतभाई माझे मित्र आहेत.तसं आमच्या वयात खूप अंतर आहे. त्यांची पहिली भेट नवेगावबांध येथे १९७५ सालच्या डिसेंबर महिन्यात झाली.अशीच ती कडक थंडीची सायंकाळ होती.माझ्या अभ्यासिकेत मी वाचत बसलो होतो.इतक्यात माझ्या शिपायानं एक ओळखपत्र आणून दिलं. त्यावर लिहिलं होतं,सुमंत शहा,बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा सभासद,मी लगेच बाहेर आलो,तो माझ्या

समोर एक वृद्ध गृहस्थ उभे होते.चणीनं बुटके.किंचित स्थूल.प्रवासामुळे कपडे मळलेले.बरोबर एक सडपातळ,

गोरी,वयस्क स्त्री होती.ती त्यांची पत्नी असावी.

बसस्टँडवरून आलेल्या हमालाच्या डोक्यावर एक भली मोठी काळी ट्रंक होती.तो अजून उभा होता.ट्रंक जड झाल्यामुळं तो जरा अस्वस्थ झाला होता.मी त्या दोघांना घरात बोलावलं.हमालाला ती ट्रंक घराच्या व्हरांड्यात ठेवायला सांगितलं.नंतर बैठकीच्या खोलीत बसून चहा-पाणी झालं. त्यांना म्हटलं,"आपण प्रवासानं थकून आलात. आता चांगलं गरम पाण्यानं स्नान करा.विश्रांती घ्या.मी थोड्या वेळानं विश्रामगृहावर तुम्हाला घेण्यासाठी येईन.आज जेवण माझ्याकडं करा."


त्यावर ते म्हणाले,"आपण कशाला त्रास घेता. आमच्याजवळ रेशन बॉक्स आहे.स्टोव्ह आहे. आम्ही स्वतः स्वयंपाक करून जेवण करू."


"ते उद्या करा. आज माझे आपण पाहुणे.


त्या दोघा पति-पत्नीचा चेहरा उजळला.अशा थकलेल्या अवस्थेत देखील त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित पाहून मला आनंद झाला.या भेटीनंतर अनेक वर्षांनी ते एकदा ह्या पहिल्या भेटीची मला आठवण करीत म्हणाले."

चितमपल्ली साहेब,वुई लव्ह यू.तुम्ही तसे मोठे सुंदर आहात असं नव्हे, तुमच्या अंतःकरणाच्या सौंदर्यानं आम्ही तुमच्यावर फिदा झालो."


आज या गोष्टीला पंधरा वर्षे लोटली.पण माझा सुमंत

भाईंना यत्किंचितही विसर पडला नाही.त्यांना मराठी येत नाही अन् मला गुजराती.आम्ही भेटलो की इंग्रजीत बोलतो.तर कधी हिंदीत.त्यांनी माझं लेखन वाचलं नाही.ते अधून-मधून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या जर्नलमध्ये 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' विषयी किरकोळ टिप्पणी लिहितात.ते फुलांचे उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत 'व्हॅली ऑफ फ्लॉवर'चा पहिला परिचय त्यांच्याकडून झाला.

वयाच्या साठाव्या वर्षी ते मुंबईतील एका शिपिंग कंपनीमधून सेवानिवृत्त झाले.पण हिमालयातील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर'ला ते वयाच्या बाविसाव्या वर्षापासून भेट देतात.पहिल्यांदा एकटे जायचे. नंतर लग्न झाल्यावर पत्नीसह.अगदी एका वर्षाच्या आपल्या मुलाला ते घेऊन जाऊ लागले. एखाद्या पवित्र स्थळाला जावं तसं हे तिघं दरवर्षी नियमितपणे 'व्हॅली ऑफ फ्लॉवर'ला जात.परवा मुलाचं लग्न झालं.सूनही मिळाली ती निसर्गावर प्रेम करणारी.आता ते चौघे जातात.मुंबईला माझं क्वचितच जाणं होतं.तिथं एखादी ग्रंथयात्रा भरली किंवा पुस्तकाचं प्रदर्शन भरलं तर पुस्तक खरेदी करायला मी जातो.तसे सुमंतभाई ग्रंथप्रेमी नाहीत.वृत्तपत्र सोडलं तर फारसं काही वाचत नाहीत.भाभीजींना मात्र वाचनाची आवड आहे. त्यांच्या संग्रही चांगली गुजराती पुस्तकं आहेत. वेळ मिळाला,तर दुपारच्या वेळी एखादं गुजराती मासिक वाचताना दिसतात.माझ्या ग्रंथप्रेमाविषयी त्यांना आदर आहे.नवेगावबांधला आले तेव्हा माझा खाजगी ग्रंथसंग्रह पाहून उभयतांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.


सुमंतभाईंना पत्रानं कळवितो की,मी अमूक तारखेला अमूक गाडीनं मुंबईला पोचत आहे.गाडी धाडधाड करीत व्हीटी स्टेशनवर पोचते.माझी छाती धाडधाड होते.

सुमंतभाई नक्की स्टेशनवर असतील काय?कारण प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर तिथल्या जनप्रवाहामुळं मी निराश होतो.दोन्ही बाजूंनी लोक मला धक्का देत निघून जात असतात.मी सुमंतभाईंना पाहत असतो. तोच ते दुरून येताना दिसतात.पांढरा शुभ्र पायजमा,अंगात तसाच कुडता,पायात चप्पल, चांदीसारखे दिसणारे केस व्यवस्थित विचरलेले,गुळगुळीत दाढी केलेली.हसतमुखानं ते जवळ येऊन हातात हात घेऊन स्वागत करतात.तेव्हा कुठं माझा जीव भांड्यात पडतो.टॅक्सीनं त्यांच्या लेमिंग्टन रोडवरील 'शक्ती सदन' या घरी पोचतो.भाभीजी आमची वाटच पाहत असतात.मग गप्पागोष्टी करीत चहा होतो.

नंतर स्नान केल्यावर मला प्रसन्न वाटू लागतं.तोपर्यंत भाभीजींनी नाश्ता तयार करून टेबलावर मांडलेला असतो.मला मधुमेह आहे हे माहीत आहे.नाश्त्याला मेथ्या घातलेलं थालिपीठ असतं. मला मुंबईत ग्रंथखरेदीला जायचं असतं.सकाळी दहा वाजता जेवण करून मी ग्रंथजत्रेत सुमंतभाईंबरोबर जाई ते रात्री परत येई.फक्त तिथं सोडायला आणि रात्री घ्यायला सुमंतभाई जत्रेच्या गेटपर्यंत येत.तिथून ते परत जात.आत येऊन त्यांनी कधीही ग्रंथ पाहिले नाहीत किंवा चाळलेही नाहीत.

दिवसभर मी प्रत्येक स्टॉलमध्ये जाऊन इंग्रजी,हिंदी,मराठी भाषेतील ग्रंथ पाहत, चाळीत,आवडलेलं पुस्तक खरेदी करी. रात्रीपर्यंत चांगली पाच- पन्नास पुस्तकं मी निवडलेली असत.माझ्या खांद्यावरची शबनमबॅग

पुस्तकांनी भरून गेलेली असे.ब्रीफकेसही.पुस्तकांचं तसं वजन फार असतं.नेमकं त्या ब्रीफकेसचं हँडल तुटून जाई.मी ती बगलेत धरून गेटवर त्यांची वाट पाहत उभा असे.मला म्हणायचे, "झाली का पुस्तक खरेदी?तुटली वाटतं ब्रीफकेस.आणा ती माझ्याकडे." ती वजनदार ब्रीफकेस बगलेत मारून ते पुढं चालू लागत.विनोदानं म्हणत,"कधी काळी तुम्ही फार मोठे लेखक झाला,तर माझी आठवण काढाल ना? तुमच्या ग्रंथाचं ओझं वाहून नेणारा म्हणून. मात्र तुमचं मला नेहमीच स्मरण होईल.

एका थोर माणसाची पुस्तकं बाहून नेण्याचं आपणाला भाग्य मिळालं म्हणून."माझ्या ग्रंथवेडा बद्दलची ही त्यांची टीकाटिपणी असे.एकदा रात्री मला नित्याप्रमाणं घ्यायला ते आले नाहीत.पुस्तकाचं भलं मोठं ओझं झालेलं.माझ्या ओळखीच्या स्टॉलवर ती पुस्तकं ठेवली.बरीच रात्र झाली.

स्टॉलमधील गृहस्थ म्हणाले,"साहेब, आता कुठं जाता? इथंच थांबा अन् सकाळी जा."त्या सज्जन गृहस्थानं दोन बाकं एकमेकांना जोडून त्यावर सतरंजी अंथरून दिल्यावर मी दिव्याच्या उजेडाचा त्रास होऊ नये म्हणून कपाळावर आडवा हात ठेवून झोपी जाण्याचा प्रयत्न करत होतो.मुंबई कधी शांत नसते. अहोरात्र ती गजबजलेली दिसते.जवळच्या स्टेशनवर येणाऱ्या- जाणाऱ्या गाड्यांच्या शिट्ट्यांचा आवाज येई.रस्त्यावरील बसगाड्या, मोटारींचा हॉर्न वाजे.मुंबई शहर मला कधी आवडलं नाही.त्याविषयी कधी आकर्षणही वाटलं नाही.

परंतु तिथं ग्रंथयात्रा भरे.चांगल्या ग्रंथांची आंतरराष्ट्रीय कीर्तीची प्रदर्शनं भरत. वर्षानुवर्षं ज्या पुस्तकांची मला आतुरतेनं वाट पाहावी लागे ती इथं मिळून जात.ती मिळाल्यावरचा आनंद एखाद्या ग्रंथप्रेमीलाच समजू शकेल.पहाटे केव्हातरी डोळा लागला.


कुणीतरी मला हाक मारून जागं करीत होतं. माझी झोप कावळ्यासारखी.मी लगेच जागा झालो.तो समोर सुमंतभाई उभे.म्हणाले,"अरे, तुमची आम्ही किती वाट पाहिली याल म्हणून, पण आला नाहीत.भाभीजीनं मला रात्रभर झोपू दिलं नाही.ती सारखं मला कोशीत होती की, तुम्हाला रात्री घ्यायला मी गेलो नाही म्हणून.मी चक्क ती वेळ विसरलो.थोडा आळस केला."


घरी आल्यावर भाभीजी म्हणाली,"सुमंतभाई मोठे विसरभोळे आहेत.घरीही त्यांचं असंच चालतं.त्यांना मिळालेला एखादा चेक किंवा ड्राफ्ट ते कुठंतरी ठेवतोल अन् विसरून जातील. मग त्या शोधात त्यांचा वेळ जातो.

मला ते शोधून द्यावं लागतं."शेवटी सुमंतभाई कबूल करायचे.ते गंमतीनं म्हणायचे,"चितमपल्ली साब ! शी इज माय हजबण्ड अँड आय एम हर वाईफ !"


"ते आहेच खरं.साऱ्या प्रवासात त्यांना सामानाची काळजी नसते.हमालाशी कसं बोलावं कळत नाही.तिकिटं सांभाळून ठेवीत नाहीत.मी जर त्यांच्च्याबरोबर प्रवासाला नसेन,तर ते आपल्या ठिकाणी कधीच पोचणार नाहीत.

तिकिटांचं आरक्षण मीच करायचं.खिडकीजवळ उभं राहून मी तिकिटं काढायची,ते हसत म्हणतात कसं, 'अगऽऽ, पुरुषांची रांग भली मोठी असते. स्त्रियांची रांग पहा.फक्त तीन-चार स्त्रिया रांगेत उभ्या आहेत.तेव्हा तूच तिकिटं काढ ना !" पण भाभीजी हे सारं हसण्यावारी नेतात.त्यांना सुमंतभाईंचा स्वभाव माहीत झाला आहे.त्या आपल्या नवऱ्याला पुरेपूर ओळखतात.पण खरं म्हणजे ती एकमेकांत कशी एकजीव झाली आहेत.राधा कृष्ण बनते.कृष्ण राधा होतो. दसऱ्याच्या दिवसांत गुजराती समाजात दुर्गापूजा मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते.

सुमंतभाई एखादा दिवस तो सोहळा पाहायला मला बरोबर नेतात.तिथं गेल्यावर मन प्रसन्न होतं.


साऱ्या नवोढा माहेरवासिनी जमल्या आहेत.त्यांत वयात आलेल्या लाडक्या लेकीही आहेत. आधीच त्या रूपवान.

त्यात तारुण्याचा बहर अन् ह्या साऱ्यांना शोभेल असा साजशृंगार,अन् गात फेर धरीत एका लयीत टिपऱ्या खेळत आहेत. त्या लयबद्ध नृत्याकडं मी कितीतरी वेळ भान हरपून पाहत असे.मला भरतपूर पक्षिअभयारण्य व

त्यातील दिवस आठवले.तिथं माझं चांगले महिनाभर वास्तव्य होतं.तिथल्या चौहान या वनाधिकाऱ्याशी चांगलीच ओळख झाली.असाच काहीतरी सोहळा होता,

म्हणून त्यानं मला घरी जेवायला बोलावलं होतं.

सायंकाळची वेळ. त्यांच्या घराच्या अंगणात तरुण मुलं-मुली टिपऱ्या खेळत होती.माझा मित्रही त्यांच्यात समाविष्ट होता.थोड्या वेळानं ते सारे विश्रांतीसाठी थांबले.दुसऱ्या फेरीत चौहान म्हणाले,"चला चितमपल्ली साहेब,घ्या या टिपऱ्या.खेळा तरी बघू." मी प्रयत्न केला. दोघा-तिघा मुलींच्या टिपऱ्या माझ्या बोटांवर बसल्या,तेव्हा मी तो नाद सोडून दिला.एका प्रेक्षकाची भूमिका घेऊन त्यांच्या टिपऱ्या खेळतानाचं लयबद्ध नृत्य पाहत राहिलो.

आता इतकी वर्षं झालीत,परंतु गुजराती साडी ल्यालेल्या,

त्यांच्या काठावर हत्ती,घोडे,हरीण आणि सिंह यांची चित्रं रेखाटली आहेत,भरघोस पदर आहे,त्या साडीचा रंग मांजिठा म्हणजे लालभडक आहे.हे सारं पुढं येऊन मला ज्ञानेश्वरांची विराणी आठवतेय.


हत्ती घोडे हरण सिंहाडे ।

तैसे हे गुजराति लुगडे गे माये ॥१॥

पालव मिरवित गाईन । 

शेलापदरी धरून राहीन ॥२॥

बाप-रखुमादेवीवरू विठ्ठल सावळा ।

तेणे मज माजिठा दिला साऊळा ॥३


सकाळी लवकर उठून सुमंतभाईंबरोबर मी हँगिंग गार्डनला फिरायला जात असे.प्रामुख्यानं तिथं फिरायला यायची ती मंडळी गुजराती,जैन, मारवाडी,पारशी समाजातील असायची.गार्डन लहान,त्यामुळं तिथल्या तिथं लोक प्रदक्षिणा घालत.घाईनं कुणी चालत तर कुणी पळत असत.सारे सुखवस्तू घरातील.त्यामुळं शरीरानं गोल,जाड आणि मोठे असत.शेक्सपिअरनं एका ठिकाणी त्याला अशी माणसं आवडत असल्याचा उल्लेख केला आहे.


हँगिंग गार्डनच्या रस्त्याच्या कडेनं गुलाबी बहावा असा भरगच्च फुललेला असे.झाडाला एकही पान नाही.नुसती फुलंच फुलं.खाली गुलाबी पाकळ्यांचा सडा पडलेला.

फुलांच्या मंद गंधानं मी भावाकुल होत असे.कधी अमलतासाचं शिल्प उभं राही.हातभर लांबीच्या काळसर- तपकिरी पिकलेल्या शेंगा वृक्षावर एखाद्या बासरीसारख्या लोंबत आहेत.झाडावर कोवळी इवलीशी लाल लाल नाजूक पानं फुटत आहेत, साऱ्या झाडावर सोन्यासारखे फुलांचे झुंबर लोंबत आहेत,काही फुलली आहेत,तर काही गोलाकार कळ्यांवर आहेत.सोनवर्खी फुलं तर किती सुंदर दिसायची.ह्या फुललेल्या वृक्षांकडं पाहिलं की,मला सुंदर गुर्जर तरुणींच्या चेहऱ्याची आठवण व्हायची अन् असे चेहरे पाहिले की, सर्वांगानं बहरलेला अमलतास आठवायचा.मी सुमंतभाईंकडं गेलो अन् एक-दोन दिवसांचा मुक्काम असला,तर लवकुमार खाचर या पक्षितज्ज्ञाला जेवायला बोलवायला सुमंतभाई विसरायचे नाहीत.लवकुमार राजकोटचे राजपुत्र. धर्मकुमारसिंह या विख्यात पक्षिशास्त्रज्ञांचे ते शिष्य.ते वन्यजीव निधी या संस्थेतील निसर्गशिक्षणाचे प्रमुख होते.पहिल्यांदा लवकुमारांची ओळख सुमंतभाईंनीच करून दिली.नंतर आम्ही एकमेकांचे मित्र झालो. जगप्रसिद्ध छायाचित्रकार आश्विन मेहता यांची ओळख सुमंतभाईंनीच मुंबईतील एका मुक्कामात करून दिली.त्या वेळी त्यांनी नुकताच एका खाजगी कंपनीतील व्यवस्थापक ह्या हुद्याचा राजीनामा दिला होता.स्वतःचा छोटासा फ्लॅट होता.दोन सुंदर गोंडस मुली होत्या.असं मध्येच भरल्या संसारात नोकरी सोडून फोटोग्राफीचा छंद घेतलेला.मेहताबाईंनी सुमंतभाईंजवळ किंचित नापसंतीही दर्शविली.त्या व्यवहारी होत्या.कलाकार म्हणून ते श्रेष्ठ असतील,परंतु कुटुंबाची त्यावर उपजीविका होईल की नाही याबद्दल साशंक होत्या.त्यांचं काही चुकलं नव्हतं.त्यांच्या संग्रही असलेली उत्तम उत्तम छायाचित्रं पाहिली.नुकतेच ते 'झाड' या विषयावर जहांगीर आर्ट गॅलरीमधील प्रदर्शनाच्या तयारीत होते.वृक्षाचं प्रत्येक छायाचित्र म्हणजे सुंदर काव्य होतं.वृक्षाविषयी इतके संवेदनशील मन कुणाचं पाहिल्याचं आठवत नाही.झाडांविषयीची सखोल चिंतनशीलता त्यांच्या छायाचित्रांत डोकावत होती.समुद्राविषयी मला विलक्षण आकर्षण आहे.पश्चिम सागरकाठी मी पायी फिरलो आहे.समुद्राचं अभूतपूर्व सौंदर्य अनुभवलं आहे.तेच सौंदर्य त्यांच्या एका,

समुद्रकिनारा ह्या छायाचित्रप्रदर्शनात आढळून आलं.[शब्दांचं धन-मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर] तसंच त्यांनी दगडा-धोंड्याच्या छायाचित्रांतून शिळांचं जे शिल्प उभं केलं होतं ते देखील अद्वितीय होतं.जहांगीर आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन पाहताना पार्श्वभूमीवर डमरूची मनोहर साथ दिली होती.वाटत होतं की,ते संगीत दगडातून तर येत नाही!नंतर या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारानं मुंबई शहर सोडलं आणि ते नौसारी इथं स्थायिक झाले.त्यानंतर त्यांना मी तिथं भेटायला गेलो होतो,परंतु भेट झाली नाही.पत्रं लिहिली,परंतु पत्राची उत्तरं येत नाहीत.सकाळी भाभीजी मंडईत नियमितपणे

जातात.भाजीपाला,फळं विकत आणतात.पण मी जितके दिवस असेन तितके दिवस रजनीगंधाची फुलं आणायला विसरत नाहीत.रोज मला त्या रजनीगंधाच्या सुगंधी फुलांचा गुच्छ द्यायला विसरत नाहीत.मुंबईहून परत जायच्या दिवशी तर मला रजनीगंधाचा मोठा गुच्छ भेट म्हणून देतात.ती फुलं नवेगावपर्यंत मी सांभाळून आणतो.

साऱ्या प्रवासात त्या फुलांचा गंध साथ करीत असतो.शेवटी मी नवेगावबांधावरील माझ्या निवासस्थानासमोर रजनीगंधाच्या फुलांचा ताटवा लावला,रोज ती फुलं फुलतात.साऱ्या आसमंतात त्यांचा सुवास दरवळत असतो.ती फुललेली फुलं पाहिली की भाभीजींची आठवण होते.एखाद्या जपानी बाहुलीसारख्या त्या माझ्या दृष्टीसमोर दिसू लागतात.म्हणतात कशा,

"भाईसाब,आजकाल तुम्ही मुंबईला आमच्याकडं येत नाही?" खरं आहे तिचं.आता मुंबईत माझं फारसं जाणं होत नाही. आता त्यांचा मुलगा मोठा झालाय.घरात सून आलीय.त्यांना देखील आता मुलंबाळं झालीत, घर लहान झालं.ह्या भरल्या घरात पाहुणा म्हणून जायला मलाच संकोच होतो.पण मुंबईत गेलो, तर त्यांना भेटल्याशिवाय राहत नाही.असंच कधीतरी अवेळी त्यांच्या घराची घंटा वाजवितो. भाभीजी दार उघडायला येतात.आता खूप थकल्या आहेत.डायनिंग टेबलाजवळ बसून त्यांच्याबरोबर गप्पा मारतो.तेवढ्यात भोपळ्याचं थालिपीठ तयार करून ते भाभीजी लोण्याबरोबर एका थाळीत देतात.त्यांना माहीत आहे. हॉटेलमध्ये खात नसल्यानं मी सकाळपासून उपाशी असणार! तिच्या हातचं ते अंगठ्या एवढं जाड,

गरम थालिपीठ खाताना मला अन्नपूर्णची आठवण होते.आता रजनीगंधाची फुलं पाहिली की,त्या वृद्ध पति-पत्नीची आठवण होते.खरेदी केलेल्या एका एका ग्रंथाची आठवण होते.त्या ग्रंथात खुणेसाठी मी रजनीगंधाची फुलं ठेवली आहेत.त्या ग्रंथालादेखील फुलांचा वास लागला आहे.लौकिक दृष्टीनं माझं तिचं कसलंही नातं नाही.पण मनात येतं पूर्वसंचित असेल,तर प्रार्थना करीन की,मी पुत्र म्हणून तिच्या पोटी जन्माला यावं.

२७/३/२४

फार्टी मोवॅट - पर्यावरणरक्षक Farty Mowat - Environmentalist

त्याने युद्ध संपल्यावर युद्धातील अनुभवांवर पुस्तकं लिहिणं हे साहजिकच होतं,पण त्याचं 'अँड नो बर्डस सँग' हे पुस्तक टीकाकारांनी आणि जाणकारांनी डोक्यावर घेतलं.अशा प्रकारचं हे एकमेव पुस्तक आहे.

असं त्याचं वर्णन केलं गेलंच; पण या पुस्तकाने युद्धाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन जनतेला दिला , असं म्हटलं गेलं.मोवॅट सैन्यात भरती झाल्यावर 'द हेस्टिंग्ज अँड प्रिन्स एडवर्ड रेजिमेंट'च्या दुसऱ्या बटालियनमध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाला.युद्धात जखमी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यात सिसिलीच्या मोहिमेत पाठवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या तुकडीत सेकंड लेफ्टनंट मोवॅट होता.या मोहिमेत फार्लीने प्लॅटून कमांडर म्हणून एका सैनिकी तुकडीचं नेतृत्व केलं.ही मोहीम संपल्यावर त्यांची तुकडी इटलीतील युद्धआघाडीवर पाठवण्यात आली. डिसेंबर १९४३ पर्यंत एक पराक्रमी अधिकारी म्हणून मोवॅट ओळखला जाऊ लागला.१९४३ संपता संपता त्याला युद्धातल्या पहिल्या भीषण अनुभवाला सामोरं जावं लागलं.त्याचा मित्र आणि सहकारी लेफ्टनंट ॲलन पार्क याच्या डोक्यात शत्रूची गोळी शिरली.तो बेशुद्ध पडला. ती गोळी फार्लीलासुद्धा लागू शकली असती. फक्त सहा इंचाचा प्रश्न होता. त्या दिवशी खरं तर ख्रिसमस होता.तात्पुरती युद्धबंदी अमलात होती.त्या दिवशी वैद्यकीय मदत मिळणं अवघड होतं.

मिळूनही तसा फारसा उपयोग झाला नसता.मोवॅट मित्राचं डोकं मांडीवर घेऊन रडत बसला होता.या घटनेनंतर फार्लीला मानसोपचार घ्यावे लागले.तोपर्यंत त्याने दाखवलेलं शौर्य आणि त्याची कार्यक्षमता लक्षात घेऊन त्याला गुप्तचर विभागात कॅप्टनच्या हृद्यावर नेमणूक देण्यात आली.आता त्याचा प्रत्यक्ष आघाडीशी संबंध येणार नव्हता,तर माहिती संकलन, पृथक्करण आणि युद्धकैद्यांचे जाबजबाब यांद्वारे शत्रूच्या परिस्थितीची आणि मनोधैर्याची माहिती मिळवण्याच्या कामासाठी त्याची नेमणूक झाली.संपूर्ण युद्धाचा काळ त्याने इटलीत घालवला.या काळात त्याला वडिलांच्या पत्रांचा आधार होता. 'माय फादर्स सन' मध्ये या पत्रांच्या साहाय्याने त्याने युद्ध परिस्थितीवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे.पुस्तकभर अशी पत्रं विखुरलेली आहेत.एक पत्र वानगीदाखल बघू या.तो लिहितो, 'हिज मॅजेस्टीच्या कॅनेडियन टपालखात्याचा कारभार काही औरच आहे. गेल्या महिन्याभरात आम्हाला एकही पत्र मिळालेलं नाही.काल अचानक मला तुमची तीन पत्रं मिळाली.

२७,२९ आणि ३० मार्चची आहेत ती.काय चाललंय काही कळत नाही.प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात बहुधा अग्निबाणाच्या साहाय्याने पत्रं पोचवतात की काय?आतापर्यंत इतक्या जलदगतीने मला कधीच पत्रं मिळालेली नाहीत.याला एकमेव अपवाद म्हणजे साधारणपणे दर दोन महिन्यांनी सैन्यभरती केंद्राकडून येणारी नोटिस- 'तुमच्या जवळच्या सैन्यभरती केंद्रात सक्तीच्या लष्करी भरतीसाठी ताबडतोब हजर व्हा.' एक दिवस मी खरोखर सैनिकी गणवेषातच जवळच्या लष्करभरती केंद्रात हजर झालो तर काय होईल? त्यांची पंचाईत होईल का? काल बर्ट केनेडी एका दुर्दैवी अपघातात सापडला.त्यानेच पेरलेल्या एका सुरुंगाचा त्याच्याच हातून स्फोट झाला.त्याला किरकोळ जखमा झाल्या.गंभीर असं काही नाही,पण त्याला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं.तो परत आमच्याच रेजिमेंटमध्ये येईल याची मात्र खात्री देता येत नाही.स्टॅन केचेसन हा आता त्याच्या जागी सेकंड- इन-कमांड बनेल.दरम्यान, मला परत आघाडीवर जावं लागणार अशा बातम्या आहेत;पण त्या बहुधा वावड्याच आहेत.त्या वावड्याच ठराव्यात असं मला राहून राहून वाटतं.मी आता कॅप्टन झालोय.तेव्हा मला एका सैन्यतुकडीचं नेतृत्व करावं लागेल.मला ती जबाबदारी पार पाडण्याइतपत उत्साह वाटेल असं मला वाटत नाही.राजा आणि देशासाठी प्राणार्पण,या कल्पनेचं आकर्षण आता विरलं आहे.


बॉसनी परवाच एक संध्याकाळ माझं साहित्य वाचण्यात घालवली.(त्यांनी माझ्याकडून ते लेखन मागून घेतलं.

कुठला कॅप्टन ब्रिगेडियरची आज्ञा मोडू शकेल?) मग त्यांनी माझ्या लेखनाबद्दलचं त्यांचं मत स्पष्टपणे मला सांगितलं.त्यातल्या चुका सांगितल्या.त्यांच्या मते त्यात काही दम नव्हता.एखाद्या कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याने लष्करात वरिष्ठ अधिकाऱ्याचं म्हणणं ऐकायचं असतं,पण मोवॅटांचा अडेलतट्टू स्वभाव माझ्यातही आहे.ते माझ्या वागण्याने चांगलेच खवळले;पण मला ड्रिंक ऑफर करून त्यांनी नंतर माझी बोळवण केली.'मोवॅटच्या आणखी एका लेखानंतर ब्रिगेडियरनी 'तो लेख छापला किंवा पत्ररूपाने घरी पाठवला तर त्याच्यावर खटला भरला जाईल;युद्ध संपल्यानंतर काय हवं ते लिही,' असा त्याला दम दिला.तो लेख पुढे १९४४ मध्ये फार्लीने अँगसना पत्र म्हणून पाठवला.फार्ली युद्धआघाडीवर असतानाही स्थानिक जनजीवनाचे बारकावे टिपून ठेवत होता.खेड्यातील स्त्रियांची पाण्यासाठी वणवण, दैनंदिन कष्ट यांचं चित्रण त्याच्या पत्रांत आढळतं.त्या काळात इटलीतल्या खेड्यांत १५ वर्षांच्या वरचे आणि सत्तरीच्या खालचे पुरुष दिसत नसत.एक तर ते सैन्यात होते किंवा भूमिगत बनून लढत होते.त्यामुळे संसार चालवायची सर्व जबाबदारी स्त्रियांवरच असे.१९४५ मध्ये इटालियन मोहीम संपल्यावर फार्ली मोवॅट आणि त्याच्या तुकडीला हॉलंडमध्ये पाठवण्यात आलं.इथे गुप्तचर अधिकारी म्हणून बऱ्याचदा त्याला जर्मनव्याप्त प्रदेशात जावं लागत होतं.तिथल्या जर्मन सैन्याची उपासमार सुरू होती.जर जर्मनांनी शरणागती पत्करली तर त्यांच्यासाठी अत्राची पाकिटं टाकण्याची दोस्त सैन्याची तयारी होती.


या संदर्भातील गुप्त स्वरूपाची बोलणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या अधिकाऱ्यांमध्ये मोवॅटचा समावेश होता.जर्मन सैन्याने वेढलेल्या डच भागातील नागरिकांची उपासमार टाळावी, यासाठी खरं तर ही योजना होती;पण त्याचा जर्मन सैन्यालाही फायदा होणार होता.नाही तर जर्मन सैन्याने डच नागरिकांना मदतच मिळू दिली नसती.जनरल ब्लास्कोवित्झ यांच्याशी झालेली ही बोलणी यशस्वी झाली.त्यामुळे हजारो डच नागरिकांचे जीव वाचले.पुढे जर्मन सैन्यही झपाट्याने शरण आलंच,पण अनेक जर्मन शास्त्रज्ञांनीही दोस्त सैन्यापुढे शरणागती पत्करली.या महत्त्वाच्या कामगिरी

बद्दल मोवॅटलाही शौर्यपदक मिळालं.दुसऱ्या महायुद्धाची युरोपातली अखेर झाली तेव्हा त्याला लष्करात राहणार का,असं विचारण्यात आलं होतं.


मेजर' म्हणून त्याला पदोन्नती मिळू शकली असती;पण त्याने निवृत्ती स्वीकारायचं ठरवलं.'युरोपमधील युद्ध संपल्याचा एकमेव फायदा म्हणजे सक्तीच्या लष्कर

भरतीसाठी जवळच्या लष्करभरती केंद्रावर दाखल हो या नोटिसा येणं थांबलं,'असं फार्ली म्हणतो.


दुसरं महायुद्ध संपल्यानंतर मोवॅटने त्याचं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं.'जीवशास्त्र' या विषयावर पदवी मिळवल्यावर उत्तरध्रुवीय प्रदेशातील काही वैज्ञानिक मोहिमांत त्याने भाग घेतला;पण या मोहिमांमधील पुस्तकी विद्वानांशी त्याचे मतभेद झाल्यानंतर त्यातून तो बाहेर पडला.

आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवलंय त्यापेक्षा प्रत्यक्ष निरीक्षणांमध्ये काय दिसतं त्याचा अर्थ लावणं महत्त्वाचं ठरेल असं त्याला वाटायचं.मोवॅटच्या काही पुस्तकांना बालसाहित्याची बक्षिसं मिळाली. 'लॉस्ट इन द बॅरन्स' या कादंबरीला १९५६ सालचं सर्वोत्कृष्ट पुस्तकाचं पारितोषिक मिळालं. पुढे ही कादंबरी 'टू अगेन्स्ट नॉर्थ' या नावाने प्रसिद्ध झाली.कॅनडाच्या वायव्येकडच्या हिमाच्छादित प्रदेशात चुकलेल्या दोन मुलांची ही कहाणी अंगावर काटा उभा करते.फार्ली लहानपणी एकट्याने हिवाळ्यामध्ये शीतनिद्रेतले प्राणी शोधत हिंडायचा,तेव्हा 'आपण हरवलो तर?' या भावनेने त्याला बऱ्याचदा सतावलं होतं. याशिवाय हिमवादळातून वाचलेल्या लोकांचे अनुभव तर तो नेहमीच ऐकत होता.ते त्याच्या मनात कुठे तरी मुरत होतं.त्यातून ही कादंबरी जन्माला आली,असं त्याने म्हटलं होतं.या कादंबरीला 'गव्हर्नर जनरल्स ॲवॉर्ड फॉर ज्युव्हेनाइल फिक्शन' हा सन्मान लाभला. तसंच १९५८ सालच्या कॅनेडियन लायब्ररी असोसिएशन बुक ऑफ द इअर फॉर द चिल्ड्रेन या पुरस्कारानेदेखील या कादंबरीला नावाजण्यात आलं.

फार्लीला जगभर प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या 'नेव्हर क्राय वुल्फ' या पुस्तकामुळे,या पुस्तकाचे जगातल्या ५२ भाषांत अनुवाद झाले.त्याला असंख्य पारितोषिके मिळाली.हे पुस्तक जरी काल्पनिक असलं तरी ते वास्तवावर आधारित होतं.१९४० मध्ये मोवॅटला फ्रैंक बार्नफील्ड यांच्या कॅरिबूंच्या अभ्यासात भाग घेण्याची संधी लाभली होती.क्षेत्र परीक्षण सहायक म्हणून काम करताना 'कॅरिबूंच्या संख्येचं नियंत्रण करण्यात लांडगे महत्त्वाची भूमिका बजावत असतात; ते क्रौर्य नसून तो नैसर्गिक शृंखलेचा भाग आहे,' हे मत त्याने त्याच वेळी नोंदवलं होतं.पुढे युद्धसमाप्तीनंतर १९४७ मध्ये फ्रान्सिस हार्पर या ख्यातनाम अमेरिकन निसर्ग

शास्त्रज्ञाच्या मोहिमेला क्षेत्र परीक्षण तंत्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी मोवॅटला मिळाली.वायव्य कॅनडातील उजाड प्रदेशातील कॅरिबू (बॅरनग्राऊंड कॅरिबू) - हा या अभ्यासाचा विषय होता.इथेसुद्धा कॅरिबूंच्या अस्तित्वाच्या झगड्यात लांडग्यांचं महत्त्व मोवॅटच्या लक्षात आलं.

लांडग्यांचं शिकारकौशल्य,परस्परांवरचा विश्वास, संघभावना,कळपातली शिस्त या गोष्टींनी मोवॅट प्रभावित झाला.याच मोहिमेत मोवॅटचा ल्युक ॲनोटॉलिक या पंधरा वर्षांच्या इन्युइटशी आणि त्याच्या बहिणीशी परिचय झाला. दुसऱ्या महायुद्धकाळात उत्तर ध्रुवीय वर्तुळात कधी नव्हे एवढा तीव्र हिवाळा ओढवला होता. त्यात या दोघांची संपूर्ण टोळीच नाहीशी झाली होती.हे दोघंच वाचले होते.त्यांच्याशी जमलेल्या मैत्रीतून पुढे मोवॅटचं 'पीपल ऑफ द डिअर' हे पुस्तक अस्तित्वात आलं.मोवॅटला इतर पर्यावरणशास्त्रज्ञांबद्दलही आदर वाटत असे.डायन फॉसींबद्दलच्या हकिकती ऐकून तो फारच प्रभावित झाला होता.त्यांच्या व्याख्यानांना हजर राहण्याची त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नव्हती.याचं कारण 'सी ऑफ स्लॉटर' या पुस्तकात अमेरिकी धोरणावर त्याने टीका केली होतीच,पण अमेरिकेतील मूळ स्थानिकांना (म्हणजे आपण ज्यांना रेड इंडियन' म्हणतो त्यांना) स्वायत्तता मिळायला हवी,असं तो म्हणत असे.त्यामुळे मोवॅटवर अमेरिकेत प्रवेशबंदी होती.'सी ऑफ स्लॉटर' हे पुस्तक राचेल कार्सनच्या 'सायलेंट स्प्रिंग 'इतकंच महत्त्वाचं मानलं जातं. या दोन्ही पुस्तकांनी पर्यावरण चळवळीला जागतिक स्तरावर नेलं.कॅनडाचा पूर्व किनारा आणि अमेरिकेचा ईशान्य किनारा हे पूर्वापार पारंपरिक स्वरूपाच्या मासेमारीसाठी प्रसिद्ध होते.शेवंडं (लॉब्स्टर्स), खेकडे,झिंगे अशा जलचरांची इथे रेलचेल होती. गल्फ स्ट्रीम संधिपाद प्राणी मोठ्या संख्येने आढळत.या उबदार सागरी प्रवाहामुळे या भागात हे पुढे जेव्हा यांची मागणी वाढली तसतसे या शिकारीत यांत्रिक पडाव शिरले. सागरतळ खरवडून सर्व जलचर वर काढायचे, हवे ते ठेवायचे,उरलेले परत सागरात टाकायचे,अशी ही शिकार पद्धत होती.त्याचबरोबर न्यू फॉडलंडमध्ये सील आणि वॉलरसांची निघृण हत्या सुरू होती.आफ्रिकेतील आणि आशियातील हस्तिदंताच्या व्यापारावर जागतिक स्तरावर बंदी घालण्यात आल्यानंतर वॉलरस आणि सी-लायन या प्राण्यांच्या सुळ्यांना महत्त्व आलं.आंतरराष्ट्रीय सागरातही जहाजं उभी राहून स्थलांतर करणाऱ्या सील,वॉलरस आणि देवमासे यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावत.तीन वर्ष मोवॅट या जहाजांवर वावरला.जहाजांवरच्या कार्यपद्धतीचा त्याने अभ्यास केला.ही मंडळी कायद्यातील पळवाटा कशा शोधतात ते जवळून पाहिलं आणि त्यानंतर त्याचं 'सी ऑफ स्लॉटर' बाजारात आलं.त्या पुस्तकाच्या आगमनानंतर बरेच कायदे सुधारले गेले.

सागराची लूट करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर टीकेची झोड उठवली गेली.त्या कंपन्यांच्या जनसंपर्क विभागांनी मोवॅटला लक्ष्य केलं.त्याला साम्यवादी आणि राष्ट्रद्रोही वगैरे विशेषणं लावण्यात आली.या पुस्तकाच्या प्रचारार्थ त्याला अमेरिकेत जायचं होतं.त्याला कस्टम खात्याने अडवलं. त्याच्यावरच्या प्रवेशबंदीची मुदत वाढवण्यात आली.पुढे ही बंदी आणि ज्या कायद्यान्वये मोवॅटवर बंदी घातली होती तो कायदा १९९० मध्ये रद्द करण्यात आला. या त्याच्या अनुभवावर त्याने 'डिस्कव्हरी ऑफ अमेरिका' हे पुस्तक लिहिलं.


डायन फॉसींची निघृण हत्या झाल्याचं कळताच मोवॅटला जबरदस्त धक्का बसला.त्याने डायन फॉसींचं काम बघण्यासाठी रवांडात जाण्याची तयारी सुरू केली होती.फॉसींच्या कामाची दखल जगाने घ्यायला हवी असं त्याला वाटत होतं;पण गोरिलांची चोरटी शिकार करणाऱ्यांनी १९८५ मध्ये फॉर्सीचा खून केला.त्यानंतर मोवॅटने डायन फॉसींचं चरित्र लिहायला घेतलं.कॅनडात ते 'विरुंगा : द पेंशन ऑफ डायन फॉसी' या नावाने प्रसिद्ध झालं;तर अमेरिकेत ते 'वूमन इन द मिस्ट्स : द स्टोरी ऑफ डायन फॉसी अँड माउंटन गोरिलाज' या नावाने प्रसिद्ध झालं. प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट न देता मोवॅटने लिहिलेलं हे एकमेव पुस्तक असावं.याचं कारण त्या काळात रवांडा धोकादायक तर बनलं होतंच,पण गोऱ्या व्यक्तींना रवांडात प्रवेश मिळवणंही अवघड झालेलं होतं.मोवॅटची बरीच पुस्तकं आत्मचरित्रात्मक आहेत, पण त्यातही त्याची निसर्गात रममाण होण्याची वृत्ती दिसून येते.किंबहुना त्यामुळेच आपल्याला ती वाचावीशी वाटतात.मोवॅटच्या लिखाणात वैज्ञानिक अचूकतेपेक्षा भावनांवर अधिक भर दिलेला असतो,अशी टीकाही त्याच्यावर झाली; पण त्याची बहुतेक पुस्तकं म्हणजे स्वानुभवकथन असल्यामुळे आणि मोवॅटला त्या प्राण्यांबद्दल मनापासून प्रेम वाटत असल्यामुळे हे घडणं अपरिहार्य होतं.शिवाय त्यामुळेच त्या त्या पर्यावरणीय प्रश्नाकडे बघण्याचा जनसामान्यांचा दृष्टिकोन बदलायला मदत झाली.मोवॅटला नऊ विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट दिली. इतरही अनेक सन्मान त्याच्या वाट्याला आले.एखाद्या पुस्तकाचं एखादं भाषांतर होणं अवघड असताना त्याच्या अनेक पुस्तकांची २०-२५ भाषांत भाषांतरं प्रसिद्ध झाली.अनधिकृत भाषांतरं तर आणखीही असतील. मुख्य म्हणजे पुस्तकांच्या मानधनातून मिळालेला सर्व पैसा त्याने पर्यावरणासंबंधींच्या चळवळींच्या आणि कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी खर्च केला. त्याने निसर्गसंरक्षणात मग्न असलेल्या अनेक संस्थांना आर्थिक मदत केली.

नोव्हास्कोशिया नेचर ट्रस्टच्या कार्याला मदत म्हणून त्याने त्याची दोनशे एकर जमीन देऊन टाकली.


आपल्या भटकंतीच्या आवडीतून पर्यावरण रक्षणासाठी अनेक चळवळी उभ्या करणारा हा भटक्या लेखक ६ मे २०१४ या दिवशी वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने देवाघरी गेला. पण त्याची पुस्तकं वाचताना मी त्याच्यासोबत जगभर फिरलो.आजही फिरतोच आहे.


आपल्याला काय हवे आहे याबद्दल आपण प्रामाणिक असले पाहिजे आणि स्वतःशी खोटे बोलण्यापेक्षा आणि आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहण्यासाठी कारणे बनवण्यापेक्षा जोखीम पत्करली पाहिजे.- रॉय बेनेट


२५.०३.२४ या लेखातील शेवटचा भाग..


२५/३/२४

पर्यावरणरक्षक - फार्टी मोवॅट Environmentalist-Farty Mowat

एखाद्या लेखकाने निसर्गप्रेमापोटी केलेल्या लेखनामुळे राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये बदल केले जाण्याचं उदाहरण विरळाच. कॅनडाच्या फार्ली मोवॅट या अवलियाने ते केलं. अमेरिकेसारख्या महासत्तेलाही अंगावर घेणाऱ्या या भटक्या लेखकाचा हा प्रवास.


काही वर्षांपूर्वी,म्हणजे १९७५-७६ च्या सुमारास जगदीश गोडबोले या माझ्या मित्राने मला विचारलं,"तू एवढं वाचतोस,फार्ली मोवॅटचं काही वाचलंयस का?"


"नेव्हर क्राय वुल्फ." मी पटकन सांगितलं.


"दे टाळी ! मीही ते नुकतंच वाचलं.काय लेखक आहे रे!" जगदीश म्हणाला.


पुढे मी नागपूरला असताना मला बर्डीच्या पदपथावरच्या पुस्तकांच्या बाजारात मोवॅटची आणखी पुस्तकं मिळत गेली.त्यामुळे माझं मोवॅट प्रेम आणि जगदीशशी मैत्री अधिक पक्की होत गेली.पुढे जगदीशने 'नेव्हर क्राय वुल्फ'

चा अनुवाद केला-'लांडगा आला रे आला'.हा अनुवाद खूपच चांगला आहे.मात्र,मोवॅटच्या असंख्य पुस्तकांपैकी फक्त दोनच पुस्तकं मराठीत आली.दुसरं पुस्तक म्हणजे 'हरिण पारधी' (पीपल ऑफ द डिअर) आता तर तीही उपलब्ध नाहीत.फार्ली मोवॅट हा माझ्या आवडत्या तीन भटक्यांपैकी एक.सर रिचर्ड बर्टन आणि सर टी. एच. लॉरेन्स ऊर्फ लॉरेन्स ऑफ अरेबिया हे उरलेले दोघं.या सर्व मंडळींचं आयुष्य अफलातूनच होतं.या तिघांच्या भटक्या वृत्तीचं मूळ त्यांच्या बालपणात सापडतं.त्यांच्यात आणखी एक गुणसाधर्म्य होतं,ते म्हणजे त्यांचा पारदर्शी प्रामाणिकपणा.काही लोकांच्या पायावर चक्र असतं,असं म्हणायची आपल्याकडे जुनी पद्धत आहे.ही माणसं आयुष्यात कधीच एका ठिकाणी स्थिरावत नाहीत.सतत भ्रमंती हेच त्यांच्या आयुष्याचं सूत्र असतं.मोवॅटचं तसंच असावं. मात्र,ही भटकंती त्याने सत्कारणी लावली. लांडगे,देवमासे,इन्युइट (एस्किमो लोक), रेनडिअर,घुबडं,

सील अशा अनेकांच्यावर सतत होणाऱ्या अन्यायाला त्याने वाचा फोडली. कॅनडात इन्युइट जमातीला स्वायत्तता मिळाली त्यामागे मोवॅटच्या लिखाणाचा हातभार होता.अमेरिकेत लांडग्यांच्या शिकारीवर बंदी आली आणि काही राज्यांत लांडग्यांचं पुनर्वसन करण्याच्या योजना आखल्या गेल्या त्यालाही मोवॅटचं लेखन कारणीभूत होतं.इतकं,की रोनाल्ड रीगन यांनी त्याला अमेरिकेचा शत्रू असं संबोधून त्याच्या अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घातली.निसर्गविषयक अनेक प्रश्नांवर आणि अनेक भटक्या जमातींवर त्याने लिहिलं होतं.हे पुस्तकी ज्ञान नव्हतं.'नेव्हर क्राय वुल्फ' लिहिण्याआधी तो लांडग्यांच्या टोळीचा मागोवा घेत काही वर्षं लांडगे-अभ्यासकांबरोबर फिरला होता.'ए व्हेल फॉर द किलिंग' लिहिण्यापूर्वी दोन-तीन वर्ष देवमाशांच्या शिकारी ताफ्याबरोबर त्या-त्या मोसमात राहून त्याने त्या शिकारीतलं क्रौर्य शब्दबद्ध केलं होतं.'इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन'ने त्याचा शब्द प्रमाण मानला आणि पुराव्यात त्याची दखल घेतली. त्यानंतर बऱ्याच देशांनी देवमाशांच्या शिकारीवर बंदी घालण्याच्या करारावर सह्या केल्या.केसाळ कातड्यासाठी सीलची आणि सुळ्यांसाठी वॉलरसची जी हत्या केली जाते त्यातली अमानुषता मोवॅटने 'सी ऑफ स्लॉटर'मधून जगापुढे आणली.


त्यानंतर निसर्गसंरक्षक संस्थांनी या क्रूर कत्तलीची दखल घेतली.'पीपल ऑफ द डिअर'मधून टुंड्रामधल्या रेनडिअर पालन करणाऱ्यांचं जीवन त्याने जगापुढे आणलं. त्यासाठी दोन-तीन वर्षं तो त्यांच्यासह त्यांच्या आयुष्याशी एकजीव झाला.प्रत्येक पुस्तक लिहिण्यापूर्वी त्याने त्या-त्या विषयाचा आणि प्रश्नांचा सखोल अभ्यास केला होता.त्याचं सर्व आयुष्य असं भटकण्यातच गेलं.

त्याच्या सर्वच पुस्तकांतून त्याच्या या भटक्या वृत्तीचं दर्शन आपल्याला घडतं.फार्ली मोवॅटची खुसखुशीत लेखनशैली,

स्वतःची फजिती सांगतानाचा मोकळेपणा आणि सर्वसाधारण माणूस जायला धजणार नाही अशा ठिकाणी जाऊन तिथल्या जनसामान्यांमध्ये मिसळण्याची हातोटी,

या गोष्टींमुळे खरं तर मी त्याच्या लेखनाच्या प्रेमात पडलो.

त्याच्या सर्वच पुस्तकांचा आणि सर्व भटकंतीचा एका लेखात आढावा घेणं शक्य नाही.मुख्य म्हणजे प्रयत्न करूनही त्याची बरीच पुस्तकं मिळू शकली नाहीत.पण त्याच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांतून त्याच्या बालपणाचा वेध घेण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे.'बॉर्न नेकेड' आणि 'माय फादर्स सन' ही ती दोन पुस्तकं.ज्यांना शक्य असेल त्यांनी फार्ली मोवॅटची मूळ पुस्तकं मिळवून वाचावीत. माझ्याप्रमाणेच तेही मोवॅटच्या प्रेमात पडतील याची मला खात्री वाटते.आपण 'बॉर्न नेकेड' पासून सुरुवात करू.या पुस्तकाची सुरुवात त्याच्या वडिलांच्या (अँगस मोवॅट) पहिल्या विमानप्रवासाने होते.१९५० सालचा ऑगस्ट महिना.स्वच्छ,निरभ्र,निळं आकाश.अँगस टोरंटोहून माँट्रिअलला निघाला आहे.


विमान लेक ऑटारिओच्या उत्तर किनाऱ्यावरून चाललंय,

ते काही फार उंचावरून चाललेलं नाही.अँगस हा उत्साहाने खदखदणारा गृहस्थ.तो अगदी छोट्याशा कारणानेही झटकन उत्तेजित होत असे.हा तर त्याचा पहिला विमानप्रवास.विमान त्या सरोवराच्या ज्या भागावरून उडत होतं,तो अंगसच्या परिचयाचा भूभाग होता.एका छोट्या पडावातून त्या पाण्यावर भटकत त्याचं सारं आयुष्य खर्च झालं होतं.विमानाच्या गोल खिडकीतून आपली कर्मभूमी बघताना त्याच्या उत्साहाला अनावर भरती आलेली होती;आपलं तरुणपण त्याच्या डोळ्यांसमोर उभं राहत होतं.एका क्षणी मरे कालव्याच्या मुखाशी विमान आलं.अँगसला विमानाच्या खिडकीतून हे दृश्य पाहताना भावना अनावर झाल्या.त्याला काय झालं,

हे पाहायला आलेल्या एअर होस्टेसला त्याने मनगटाला धरून जवळ खेचली आणि खिडकीजवळ ढकललं.त्या हवाईसुंदरीला वाटलं,हा कुणी बहकलेला प्रवासी आहे."मी आत्ता ड्यूटीवर आहे.माँट्रिअलला माझी ड्यूटी संपते." तिने अँगसला सांगितलं."खाली बघ ! डॅम इट! त्या खाडीत ते एक छोटं बेट दिसतंय ना,त्याचं नाव इंडियन आयलंड.

तीस वर्षांपूर्वी माझ्या मुलाचा,फार्लीचा जन्म व्हायला या बेटाच्या आडोशाला झालेली घटना कारणीभूत ठरली.

एका छोट्या हिरव्या सुंदर कॅनोत ते घडलं बरं!" ते ऐकून त्या हवाईसुंदरीने आपला हात अँगसच्या पकडीतून सोडवून घेतला.श्वास घेत ती स्थिरावली आणि म्हणाली, 'अभिनंदन ! तुमचं कृत्य असामान्यच म्हणावं लागेल, मग त्या कॅनोचा रंग कुठला का असेना!" अशा बापाच्या पोटी फार्लीचा जन्म झाला.ते १९२१ हे वर्ष होतं.पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होतं.युरोपचा फार मोठा भूभाग उद्ध्वस्त झाला होता.कोटी दीड कोटी लोक मृत्युमुखी पडले होते;तेवढेच जखमी आणि अपंग झाले होते.त्यात ऐंशी हजार कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता.हे विषारी वायूने तरी मारले गेले होते किंवा यातले बरेच अटलांटिकमध्ये बुडून मेले होते.दोन लक्ष कॅनेडियन अपंग बनले होते.या जखमींमध्ये अँगस मोवॅटचाही समावेश होता.या युद्धाच्या मानसिक आणि शारीरिक परिणामांचा अँगसच्या आणि मोवॅट कुटुंबाच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम झाला होता.हे मोवॅट कुटुंब मालदार होतं.त्यातले पुरुष महत्त्वाकांक्षी होते.फार्लीचे पणजोबा त्या काळातले धर्मशास्त्राचे नामवंत प्राध्यापक होते. त्यांचे बंधू नामवंत वकील होते.सर ऑलिव्हर मोवॅट ऑटारिओचे पुढे पंतप्रधान झालेच,पण त्यांनी कॅनडातील सर्व घटकराज्यं एकत्रित करून कॅनेडियन संघराज्य स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता.त्यामुळे फार्लीच्या आजोबांकडून बऱ्याच अपेक्षा ठेवण्यात आल्या होत्या.त्यांना गिल म्हणत.मोवॅट कुटुंबात गिल ही व्यक्ती काहीशी वेगळी आणि मोवॅट कुटुंबाच्या दृष्टीने अकर्तृत्ववान ठरली होती.


गिल कवी होता.त्याला भटकंतीची आवड होती. छोटा पडाव वल्हवत निवांत,निर्मनुष्य ठिकाणी जावं,निसर्गात रममाण व्हावं आणि कविता कराव्यात,या गोष्टी त्याला आवडत होत्या. घरंदाज श्रीमंतीमुळे आपण उपजीविके-

साठी काही करावं असं त्याला बहुधा वाटत नसावं.गिल देखणा होता.घराणं मोठं होतं.त्यामुळे त्याचं लग्न मेरी जोन्सशी सहजच झालं.आधीच अबोल असलेली मेरी लग्नानंतर नवऱ्याच्य वागण्याने अधिकच अबोल बनली.

मोवॅट घराण्याच्या वेगवेगळ्या व्यवसायांत अपयशी ठरल्यानंतर जोन्स मंडळींनी या जावयाला सुधारायचा प्रयत्न केला.तिथेही गिलचा जम बसला नाही.तेव्हा साधारण हजार लोकवस्तीच्या ट्रॅटन या खेड्यात घर बांधून तिथे या जोडप्याची रवानगी करण्यात आली.तिथे गिलला 'ट्रेंटन हार्डवेअर स्टोअर' काढून देण्यात आलं.

तेही त्याला नीट चालवता आलं नाही.हा वारसा पुढे अँगसने चालवला. कॅनो आणि लेक ओंटारिओचा उत्तर किनारा हे त्याचे आवडते होते.तसंच तो उत्तर ओंटारिओच्या जंगल भागात 'फायर रेंजर' म्हणून हिंडत असे.१९१४ साली तो सैन्यात भरती झाला.जखमी झाला.१९१८ साली सैन्यातून मुक्ती मिळाल्यावर तो त्याच्या मनात भरलेल्या एका मुलीला आपलीशी करण्याची धडपड करू लागला.तिचं नाव हेलन थॉम्सन.गिल मोवॅटच्या मुलाला मुलगी देणं म्हणजे तिच्या गळ्यात धोंडा बांधून विहिरीत ढकलणं.थॉम्सन मंडळी त्याला तयार नव्हती.अँगसच्या सुदैवाने या काळातच थॉम्सन मंडळी आर्थिक संकटात सापडली.तर युद्धात अनेक शौर्यपदकं मिळवलेला अँगस तेव्हा 'वॉर हीरो' बनून हिंडत होता.तेव्हा थॉम्सननी 'मुलगी खपतेय ना' असा विचार करून अँगसला होकार दिला.युद्धात हात निकामी झाल्यामुळे अँगसची वनखात्यातली नोकरी पुढे चालू राहणं शक्यच नव्हतं.त्याचा हात फक्त देखाव्यापुरताच उरला होता.त्याने तो कुठलंही काम करू शकत नसे. पुढे काही वर्षांनी त्यात थोडासा जीव आला. त्याने काही काळ आईच्या माहेरच्या व्यवसायात कारकून म्हणून नोकरी केली;पण त्यात मन रमलं नाही तेव्हा तो ट्रॅटनला परतला.त्या वेळी फार्ली जन्माला आला. १२ मे १९२१ हा तो दिवस.अँगसजवळ पैसे मिळवण्याचं कौशल्यही नव्हतं आणि कोणतं साधनही नव्हतं,मात्र त्याला खूप मित्र होते.लिली फ्रेझर हा अब्जाधीश त्या मित्रांपैकी एक.त्याने त्याचं गावाबाहेरचं एक ओसाड पडकं घर 'हवे तितके दिवस राहा' म्हणून अंगसला दिलं.इथे हेलनला तिचा संसार थाटता आला.फार्लीचं बालपणही इथेच गेलं. 


अँगसने आपल्या मुलाच्या जन्माचं वर्णन लिहून ठेवलंय -'हा मुलगा कायम अस्वस्थ असे. आईच्या पोटात राहणंही त्याला फारसं मान्य नसावं.

हॉस्पिटलच्या वाटेवर टॅक्सीतच त्याने जग पाहायचं ठरवलं.हेलनने त्याला थोपवलं. रूग्णालयात जेमतेम पोहोचलो.डॉक्टर येईपर्यंत काही त्याला धीर धरवला नाही.डॉक्टर आले. त्यांनी बाळ बघितलं आणि 'चांगला आहे' असं म्हणून नर्सला मुलाची काळजी घ्यायला सांगून ते गेले.' फार्ली आईच्या वळणावर गेला होता.शाळेतली दांडगी मुलं त्याला त्रास देत.त्याला 'फार्टली' (पाद्रा) अशी हाक मारली जात असे.यामुळे तो फारसा कुणात मिसळत नसे.नदीच्या काठी जाऊन पाणपक्षी बघत बसणं किंवा बीव्हर झाडं कुरतडून कशी पाडतात हे बघण्यात त्याला जास्त आनंद मिळत असे.

वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजावरून तो पक्षी ओळखू शकत होता. लौकरच शाळेत 'प्राण्यांची भाषा जाणणारा मुलगा' अशी त्याची कीर्ती पसरली.त्याचा प्राणिसंग्रहही वाढू लागला.'मट' हा त्याचा कुत्रा (यावर 'द डॉग देंट वुड नॉट बी' हे पुस्तकच त्याने लिहिलं),'कोल' नावाचं श्रुंगी घुबड,अनेक पांढरे उंदीर,काही साप,एक काळी खार,एक सागरी पाणमांजर आणि इतरही काही प्राणी त्याच्याबरोबर बागडत असत.तो जिवंत प्राणीच गोळा करायचा असंही नाही.


जंगलात मृतावस्थेत सापडलेले काही प्राणीही तो गोळा करून आणत असे.एकदा त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना त्याने एका सुतार पक्ष्याचं शवविच्छेदन करून त्यातून खाण्यायोग्य अवयव जेवताजेवताच काढून दिले.पाहुण्यांनी ते खाल्ले नाहीत,पण 'अँगसच्या पोराचा एक स्क्रू ढिला आहे' अशी कीर्ती त्यामुळे पसरली,हे निश्चित.


बऱ्याच जलाशयांच्या किनारी,जिथे ओढे-नाले येऊन जलाशयांना मिळतात तिथे,तसंच काही ठिकाणी जलाशयाचं पाणी जमिनीत आत घुसतं अशा ठिकाणी बऱ्यापैकी आडोसा असतो,दाट झाडी असते.याला 'कोव्ह' असं म्हणतात.पूर्वी चाचे अशा ठिकाणी लपत.पुढे जेव्हा अमेरिकेत दारूबंदी झाली तेव्हा अशा ठिकाणी हातभट्ट्या लावल्या गेल्या.कॅनडातून अमेरिकेत चोरट्या मार्गाने दारू पाठवून अनेकजण श्रीमंत झाले.ती झाली पुढची गोष्ट.पण फार्ली त्याच्या कॅनोतून अशा अनेक ठिकाणी एकांत शोधायचा,तिथले पशुपक्षी न्याहाळत बसायचा आणि कल्पनेच्या राज्यात रममाण व्हायचा.गुप्त खजिना शोधणं, चाचे जमवून साहसं करणं किंवा शूरवीर बनून चाच्यांच्या तावडीतून ओलीस ठेवलेल्या निरपराध नागरिकांची सुटका करणं यात त्याचा वेळ बरा जायचा.

शिवाय खेकडे,बेडूक, पाणपक्ष्यांची अंडी,साप अशा नानाविध वस्तूंचा खजिनाही त्याला गोळा करता यायचा.

यात मट त्याला साथ द्यायचा.मट स्वतःला कुत्रा न समजता माणूस समजतो याबद्दल फार्लीची खात्री पटलेली होती.वयाच्या पाचव्या वर्षी फार्ली 'स्किफ' प्रकारच्या छोट्या होड्या एकट्यानेच वल्हवत जलप्रवास करू लागला.त्यामुळे त्याला हळूहळू 'इंडियन आयलँड' च्या किनाऱ्यावरील सर्व छोट्या-मोठ्या लपण्याच्या जागांची माहिती झाली.या इंडियन आयलंडचा फार्टीचा प्रवास सुरू झाला,की त्याच्या आईचा जीव कासावीस व्हायचा;तर अंँगस आपल्या मुलाचं कौतुक करत किनाऱ्यावरून त्याला प्रोत्साहन द्यायचा,या बेटावर अठराव्या शतकात इरॉक्वा इंडियनांनी गोऱ्या व्यापाऱ्यांच्या तांड्याची कत्तल केलेली होती.त्यामुळे त्या बेटाला 'मॅसॅकर आयलंड' हे नाव मिळालं होतं. इथे बऱ्याचदा किनाऱ्यावर हाडं,जुनी हत्यारं आणि इतरही वस्तू मिळत.शिवाय एखादा मोठा दगड पायाने उलथला की त्याखाली शेवंडं (लॉब्स्टर),खेकडे नाहीतर पाणसर्प नक्कीच असायचे.फार्लीने इथे अनेक वेळा कल्पनेतले इंडियन हल्ले परतवून लावले होते.त्याची एक आवडती काठी आणि वल्ही कधी तलवार तर कधी बंदुका बनत असत.या इंडियन (हटके भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन )आयलंडवरील साहसांचा दारूबंदीदरम्यान ऐकलेल्या आणि बघितलेल्या कहाण्यांशी मेळ घालून फार्लीने पुढे 'द ब्लॅक जोक' नावाची कादंबरी लिहिली.ती अमाप लोकप्रिय झाली. फ्रेंच नौदलातील जोनाथन स्पेन्स या नौसैनिकाची ही साहसपूर्ण गाथा खूप झपाट्याने खपली.या कादंबरीचं इंग्रजी बालवाङ्‌मयात एक अनोखं स्थान आहे.युरोपातील अनेक भाषांत या कादंबरीची भाषांतरं झाली;पण ही खूप पुढची गोष्ट.

लहानपणाच्या भटकंतीप्रमाणेच फार्लीच्या लेखनावर परिणाम करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे दुसऱ्या महायुद्धातील त्याची लष्करी सेवा.'माय फादर्स सन- मेमॉयर्स ऑफ वॉर अँड पीस' हे त्याच्या युद्धातील अनुभवांचं पुस्तक.काहीशा विनोदी आणि बऱ्याच गांभीर्याने लिहिलेलं एका संवेदनशील तरुणाच्या अनुभवांचं हे पुस्तक आहे.वयाच्या अठराव्या वर्षी फार्ली रॉयल कॅनेडियन आर्मीत भरती झाला.दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं.अमेरिका अजून युद्धात उतरली नव्हती.

ब्रिटिशांनी फ्रान्ससह दुसऱ्या महायुद्धात भाग घेताना सर्व वसाहतींनाही युद्धात खेचलं होतं.फार्लीला ही देशोदेशी भटकायची संधी वाटत होती.त्याचं कारण युद्धातील शौर्यकथाच त्याने ऐकल्या होत्या.अँगस अशा कथा रंगवून सांगण्यात कसलीही कसर सोडत नसे.त्यामुळे फार्लीला आपणही युद्धात जाऊन पराक्रम गाजवावा असं वाटणं साहजिकच होतं.पहिल्या महायुद्धात लढलेल्या अँगसच्या दृष्टीने त्याच्या मुलासाठी ही एक फार मोठी संधी होती.

आपल्या मुलाने युद्धात खूप पराक्रम करून नाव कमवावं असं त्याला वाटत होतं.म्हणून त्याने फार्लीला सैन्यात भरती व्हायला प्रोत्साहित केलं होतं.युद्धातील अनेक घटनांची वर्णनं वेगवेगळ्या सैन्याधिकाऱ्यांनी वेळोवेळी लिहून ठेवली आहेत; पण युद्धात होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीबद्दल लिहिणारा,मला वाटतं,

फार्ली मोवॅट हा एकमेव सैनिक असावा.


राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..!