आज सकाळी विजय गायकवाड सरचा फोन आला.
माझे पप्पा फोन मध्ये बोलू लागले.विजय गायकवाड सर म्हणाले,"पाऊस आहे का?" पप्पा म्हणाले," सकाळपासून सुरू आहे शेतकऱ्यांचे तर नुकसान आहे आता." गायकवाड सर म्हणाले,"शेतकरी देव माणूस आहे. काम करतो सगळे. शेतकऱ्यां इतके कोणीच सहन करत नाही." पप्पा म्हणाले," शेतकऱ्यांचे किती मरण आहे विचार करा.
आजवर सोयाबीन अकरा हजार रुपये विकत होती,
आता पाच हजारावर आली." गायकवाड सर म्हणाले,"हो आज तुम्हाला सर फोन लावतील.नवोदय परीक्षेच्या निकालाबद्दल.आपल्या मुलांचे निकाल आले नाही.
आपली मुलं त्या परीक्षेला बसली हे खूप महत्त्वाचे आहे.
श्री गव्हाणे सरांनी व मॅडमनी खूप कष्ट घेतले."पप्पा म्हणाले,"त्यांनीं यांना ज्ञान जे दिलेले आहे ते कधीही त्यांच्या लक्षात राहणार आहे.आता पास व्हावा की न व्हावा.ते थोडेच आपल्या हातात आहे.इच्छा,आशा सगळ्यांना असते पण तिथं भरपूर मार्क लागतात."
गायकवाड सर म्हणाले," हो बरोबर आहे तुमचं म्हणणं.
दुसरी गोष्ट सर आणि मॅडमने भरपूर कष्ट घेतले आपल्या मुलांनी सुद्धा कष्ट केलेले आहेत.अभ्यास केलेला आहे.
आता काय आहे पहिल्यापेक्षा जास्त अभ्यास करावा लागेल.या परीक्षेला का बसलो होतो कारण आपण किती अभ्यास करू शकतो,आपल्याला किती अभ्यास करायचा आहे,आपण त्या परीक्षेतून शिकलो.त्याचा आपल्याला परिणाम मिळालाच आहे." पप्पा हो म्हणाले.सर म्हणाले,
"काय नाही यासाठीच फोन लावला होता,काळजी घ्या." सरने फोन ठेवला.
आज आमच्या इथे पित्र होते.थोड्या वेळाने गव्हाणे सरचा फोन आला.सर म्हणाले," ताण घ्यायचा नाही. फ्रेश राहायचं.निकाल केव्हा पाहिलास आता का रात्री?" मी म्हणाले," रात्री" सर म्हणाले," झोपली होती का नव्हती मग?" मी म्हणाले," नाही" .सर म्हणाले," झोपलीच नाही रात्रभर?" मी म्हणाले," नंतर झोपले होते." सर म्हणाले,
"काही ताण घ्यायचा नाही ,मस्तपैकी राहायचं.पप्पाकडं दे." मग मी माझ्या पप्पाकडे फोन दिला.आणि मी 'बाकी वीस रुपयांचं काय' या धड्याचे प्रश्न उत्तर लिहू लागले.
थोड्या वेळाने दुपार झाली.आम्ही दुपारचे जेवण केले.
थोड्या वेळाने मला झोप येऊ लागली.माझ्या पप्पाने माझ्या कपाळाला हात लावला तर मला खूप ताप आली होती.पप्पा ने मला औषध दिली. मी थोड्या वेळ झोपले.
थोड्यावेळाने संध्याकाळ झाली. गव्हाणे सरचा फोन आला.माझे पप्पा थोडा वेळ फोनवर बोलले.थोड्यावेळाने पप्पाने माझ्याकडे फोन दिला गव्हाणे सर म्हणाले," जे झालं ते होऊन गेलं वैशू.मी तुला दोन गोष्टी सांगणार आहे.आपल्या देशाचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचं नाव घेतलं जातं.त्यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो.हे असे माणूस आहेत की जे काम करता करता म्हणजे शेवटपर्यंत देशासाठी झटले,देशासाठीच जगले.शिलॉंग मध्ये एका संशोधनाविषयी लेक्चर देत असताना ते पडले.त्यांना अटॅक आला आणि ते आपल्या सर्वांना सोडून गेले.ए.पी.जे अब्दुल कलाम साहेबांची पुस्तकं आपण वाचली पाहिजेत.आता एक गोष्ट तुला सांगतो.ते अतिशय गरीब होते की त्यांच्या गरिबीला अंत नाही.
आपण लय श्रीमंत आहे त्यांच्या पेक्षा.शिक्षणासाठी रोज घरोघरी पेपर टाकायचे.त्यांचं स्वप्न होतं मी पायलट व्हावं.
पायलट म्हणजे वैमानिक.ते परीक्षा पास झाले.वैमानिक होण्याच्या मुलाखतीला ते गेले.पण त्यांना तिथे नोकरी देण्यात आली नाही.तुमची उंची नाही किंवा इतर काही गोष्टींमुळे आम्ही तुम्हाला वैमानिक म्हणून घेऊ शकत नाही.असे त्यांना सांगण्यात गेले.ते म्हणाले "ठीक आहे,तुम्ही माझ्यातील कमतरता सांगितल्या.यासाठी मी तुमचा आभारी आहे." असे ते त्या मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्याला म्हणाले.तिथून परत आल्यानंतर पुन्हा मोठ्या जोमाने अभ्यासाला लागले.एवढा अभ्यास केला की,रडार यंत्रणा तयार केली.रडार यंत्रणा काय असते तुला माहिती आहे का?विमान किती उंचावरुन चालवायचं,
कुठून चालवायचं कुठून उडवायचं, कुठे उतरायचं,
विमान कोणत्या ठिकाणी आहे,विमान पुढे जाण्यासाठी इथलं वातावरण योग्य आहे का याचा काही त्रास होईल का.?, काही पक्षी समोर आहेत का…? म्हणजे विमान कसे चालवले पाहिजे.त्याची संपूर्ण माहिती देणारी रडार यंत्रणा देत असते.रडार निर्माण करण्यात अब्दुल कलाम यांचे कष्ट मोलाचे होते...आता मला सांग ते पायलेट झाले असते तर ते किती विमान चालू शकले असते?" मी म्हणाले," एक" सर म्हणाले," एक विमान चालवलं असतं.पण आता सगळे विमान रडारमुळे चलायलेत.
कारण रडार जर बंद पडलं तर विमानाला काहीच कळत नाही.कुठे उतरायचं कुठे चढायचं,समोर ढग आहेत का...पाखरं आहे का...अजून काय आहे.त्याला काहीच कळत नाही.हेच अब्दुल कलाम होते ज्यांना वैमानिक म्हणून नाकारलं होतं.म्हणजे एक संधी गेली.अरे मी एक विमान चालू शकलो नाही.पण आज माझ्या मुळे हजारो विमान उडत आहेत.असं त्यांना वाटलंच असेल ना…! दुसरी गोष्ट.तुला अभिनेते अमिताभ बच्चन माहिती असतील.अमिताभ बच्चनचे ध्येय होतं की, मी आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो त्या ऑल इंडिया रेडिओ केंद्रात निवेदक म्हणून नोकरी लागावी.ते रेडिओच्या मुलाखतीला गेले.तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ,"सॉरी आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही कारण तुमचा आवाज व्यवस्थित वाटत नाही.." या कारणावरून त्यांना डावलण्यात आले आणि मग ते चित्रपट अभिनयात काम करू लागले.आज तेच अमिताभ बच्चन आहेत की ज्या रेडिओने त्यांना नाकारलं होते त्या रेडिओ व त्यांचे घंटा घंटा कार्यक्रम लागतात."
आता मॅडम सोबत बोल." मी हो म्हणाले.मॅडम म्हणाल्या," नाराज झाली काय?" मी हो म्हणाले.मॅडम म्हणाल्या," नाराज नाही व्हायचं ,पुन्हा जोमाने तयारीला लागायचं.
तुला माहितीये ना ही परीक्षा आणखीन कधी असते बरं?" मी म्हणाले," आठवीला" मॅडम म्हणाल्या," ही आपली पहिलीच परीक्षा होती.ती परीक्षा इयत्ता पाचवीमध्ये दिली आहे.ती पण पहिली. तुम्ही चांगल्या गुणांनी ऑलरेडी पास आहात बाळांनो.फक्त गुणानुक्रमात आपण इतरांपेक्षा थोडं कमी पडलोत म्हणून काय झालं…? आपण थोडंच त्याच्यामध्ये नापास झालो आहोत.
मी तुम्हाला त्या दिवशी पोलीस भरतीचा पेपर सोडविण्यासाठी पाठवला होता.तो पोलीस भरतीचा पेपर ग्रॅज्युएशन म्हणजे पंधरावीची मुलं देतात.तुमचं वय तरी आहे का १५ वर्ष…? बघा बरं …. तुम्हाला बी. ए .झालेले असतात किंवा एम. ए. झालेले असतात अशा लेकरांचा पेपर सुटलाय.त्या लेकरांना जे येत नाही ते आज तुम्हाला येते. यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही,
आपल्याला आणखीन परीक्षा द्यायच्या आहेत.
काल आम्ही दोघं पण खूप वेळ पर्यंत जागेच होतो.चर्चा करू लागलो. फोन नाही केला.म्हणलं झोपले असतील सगळे" .मी म्हणाले," झोपलोच नाही मॅडम." मॅडम म्हणाल्या," थोडीसी चांगली बातमी असती तर लावला असता.एवढ्या उशिरा पण टेन्शन घ्यायचं नाही.आणखीन अभ्यास करायचा." मी हो म्हणाले.
गव्हाणे सर म्हणाले," प्रिय बाळा, तुझ्या पायात वाळा.मोकळं वाटलं ना.आता एक करायचं. जे येत नाही त्याचा जास्त अभ्यास करायचा.तुम्हाला जे गणित आलं नाही ते सांगत जा.आणि आता एक लक्षात घे तुझा पाचवीपासूनचा प्रत्येक विषय अत्यंत महत्त्वाचा आहे." मॅडम म्हणाल्या," वैष्णवी माहिती आहे का ९० ला पासिंग होतं.आणि मला ८९ मार्क होते.मला कसं वाटलं असेल.तुझ्या सारखंच झालं मला." सर म्हणाले," तू नवोदयला लागली असती तर चांगलंच होतं.पण तशाच दर्जाचे शिक्षण आपण इथे घेऊ.तुला लागेल ती पुस्तके आणून देत जाईल.तुझ्या माहितीसाठी मीही नापास झालो होतो नवोदयला.नवोदयला जर मी पास झालो असतो तर आपली भेट झाली असती का?मला तुझ्यासारखी प्रेमळ,हुशार,अभ्यास करणारी,आज्ञाधारक, विद्यार्थिनी भेटली असती का?तुझी कविता किशोर मासिकात आली तेव्हा तुझं वय नऊ वर्ष होतं.आणि माझी कविता किशोरमध्ये ३५ व्या वर्षी आली.मग तू ग्रेट झाली ना." मग थोडावेळ सर पप्पाला बोलले.थोड्यावेळाने फोन ठेवला.आणि आम्ही झोपलो.सरला बोलून मला मोकळं वाटलं.
◇वैष्णवी सिद्धार्थ मस्के,वर्ग सहावा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,रायपुर,तालुका सेलू जिल्हा परभणी
माझी अविस्मरणीय डायरी
२८/०९/२०१९ रोजीची..
अशी पाखरे येती..It's like this..
(श्री अजय कटारिया सर यांना सादर समर्पित)
पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकाचं नाक जिथून सुरू होतं,तिथे चॉईस नावाचं पुस्तकाचे दुकान आहे.
दुकानाच्या मालकांचे नाव आहे.श्री अजय कटारिया.
बरोबर सहा वर्षांपूर्वी एका स्नेह्यांच्या माध्यमातून यांची आणि माझी ओळख झाली.
बोलता बोलता ते म्हणाले, 'माझे पुस्तकाचे दुकान आहे, कधी काही लागलं तर या...!'
भीक मागणाऱ्या अनाथ मुलांना आपण दत्तक घेऊन,त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. दरवर्षी मला खूप शैक्षणिक साहित्य लागतेच.
कटारिया साहेबांच्या चॉईस दुकानात गेलो;तर थोडी सूट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचे साहित्य मिळेल,हा स्वार्थी विचार करून मी त्यांना चार-पाच वर्षांपूर्वी प्रथमच,सर्व शैक्षणिक साहित्याची लिस्ट दिली.
त्यानंतर दोन दिवसांनी सर्व साहित्य आले.
बॉक्स उघडून पाहिला,आम्ही दिलेल्या लिस्टपेक्षाही सामान जास्त होते.
आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या,एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होती, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे २५ होत्या...
मी त्यांना फोन करून म्हणालो, 'कटारिया साहेब,बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे... हि आमची लिस्ट नव्हे !
ते हसून म्हणाले, 'असू द्या हो डॉक्टर,अनाथ पोरांना शिकवताय... थोडं इकडे तिकडे चालणारच... पोरं आहेत...
घ्या आमच्याकडून डोनेशन समजून...'
एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना देणगी म्हणून पावती दिली,त्यांनी ती हसत खिशात ठेवली.
पुढच्या वर्षी म्हणजे साधारण २०२१ ला त्यांना पुन्हा लिस्ट दिली... पुन्हा पाचपट सामान जास्त होते... मी पुन्हा तोच फोन केला... पुन्हा त्यांचे तेच उत्तर आले... एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना पुन्हा पावती दिली... ही पावती हसत त्यांनी पुन्हा खिशात ठेवली...!
एकावर एक फ्री... हि बिझनेस स्ट्रॅटेजी मी समजू शकतो,पण एकावर पाच फ्री... ???
मग २०२२ साल उजाडले...
यावेळी सामानाची लिस्ट घेऊन मी स्वतः दुकानात गेलो.दुकानात भरपूर कर्मचारी आहेत, परंतु माझ्याकडची लिस्ट घेऊन त्यांनी स्वतः सामान बांधायला सुरुवात केली.
मी बारकाईने पाहत होतो,माझ्या लिस्ट पेक्षा पाचपटीने जास्त गोष्टी ते स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरत होते.
मी त्यांना म्हणालो साहेब,आपण आपले नुकसान का करून घेता ? माझ्या लिस्ट प्रमाणेच मला सामान द्या...
यावर ते माझ्याकडे न बघता,स्टूल घेऊन, वरच्या कप्प्यातले सामान काढता काढता म्हणाले, 'डॉक्टर भरगच्च भरलेल्या ताटामधून दोन घास चिमण्यांना टाकले म्हणजे आपलं काही नुकसान होत नाही हो ...!
ए त्या चौथा कप्प्यातला,नवीन माल काढ... त्यांचं सगळं लक्ष बॉक्स भरण्याकडे....
तरीही मी माझं बोलणं रेटत म्हणालो, पण हा आपला व्यवसाय आहे साहेब,मला साहित्य देणे म्हणजे आपला तोटा आहे ...! मी आवंढा गिळत म्हणालो.
तितक्याच उत्स्फूर्तपणे बॉक्समध्ये साहित्य टाकत ते म्हणाले, 'साहेब धंदा म्हणा,व्यवसाय म्हणा, कारभार म्हणा,कारोबार म्हणा.... जे काही करायचं ते नफ्यासाठी... मी पक्का व्यापारी आहे, तोट्यामध्ये कधीच व्यापार नाही केला मी ...
'आत्ता बी मी तोट्यामंदी नाहीच,नफ्यामंदीच आहे...' चष्म्या मागून डोळे मिचकावत ते बोलले.मागितलेल्या गोष्टीपेक्षा,पाचपटीने भरलेल्या बॉक्स कडे बघत,'हे कसं काय बुवा ? हा प्रश्न मला त्यांना विचारायचा होता...
माझ्या बावळट चेहऱ्यावर त्यांना तो दिसला असावा... !
'छोटू,आपल्याकडच्या दुरेघी वह्या संपल्या का रे?शेजारच्या दुकानातून दहा डझन मागव आणि घाल या बॉक्समध्ये.... !' हात झटकत ते बोलले.
माझा बावळट चेहरा अजून तसाच असावा.
नफा तोट्याचा त्यांनी मग उलगडा केला...
'डॉक्टर तुमी कितीबी नाय म्हणले तरी जास्तीचा सामान पाहून तुम्हाला आनंद होतो का नाही ? तो माझा नफा....
दहा पोरं नाही,आता तुम्ही ५० पोरांना सामान देऊ शकता,त्या पोरांना आनंद होतो की नाही...? तो माझा नफा...कटारिया काका कोण ? हे पोरांना कधीच कळणार नाही... पण ५० पोरं शिकत आहेत, याचा मला आनंद होणार का नाही ? तोच माझा नफा...
जलमाला येऊन आपण कोणाच्या उपयोगी नाही पडलो,हा खरा तोटा... !
"तोटा" या शब्दावर जोर देत , डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली...!
आपून तोट्यात धंदाच करत नाही सायेब,पक्का व्यापारी आहे मी ...' काउंटर वरच्या टेबलावर बोटांनी तबला वाजवत ते म्हणाले, 'ए चाय सांगा रे डॉक्टरला...!'
तोट्याची शेती करून,आनंदाची बाग फुलवत; नफ्याची फुलं वेचणाऱ्या या माणसापुढे मी मनोमन नतमस्तक झालो ! चहाचा घोट घेऊन मी त्यांना म्हणालो,'सर पण हे नुकसान किती आहे तुमचं, यात विनाकारण खर्च खूप आहे...' ते पुन्हा हसत म्हणाले, 'डॉक्टर पोरगं तुमचं असो,माझं असो किंवा आणखी कोणाचं असो, पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजतच नाही,पोरांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते.गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा... मंग खर्च झालाच कुठे ?
आलतू फालतू स्कीम मध्ये अपुन पैसा गुतवतच नाही... सांगितलं ना ? पक्का व्यापारी आहे मी... ! मी खर्च केला नाही सायबा... फक्त गुंतवणूक केली... माझ्या पोरांवर गुंतवणूक केली... बघा भरभक्कम परतावा येणारच...
"येणारच" म्हणताना पुन्हा डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली...!
मी भारावून म्हणालो या अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करत आहात... ? अनाथ कशानं हो... पालक म्हणून तुम्ही आहे... मी आहे.... काय डॉक्टर तुम्ही सुद्धा...!
'चहा संपवा तो...' म्हणत, टेबलावर पुन्हा त्यांनी हसत तबला वाजवला... तो तबला होता ? की माझ्या हृदयाची धडधड ? माझं मलाच कळलं नाही...!
शर्टाच्या बाहीला डोळे पुसत कटारिया साहेबांची नजर चुकवत मी बाहेर पडलो !
सर्व साहित्य घेऊन मी आलो... दहा ऐवजी ५० मुलांना ते वाटले... तरीही कुठेतरी अपराधीपणाची भावना होती.
भावनेच्या भरात हा "वेडा माणूस" स्वतःचं खूप नुकसान करून घेत आहे,याची मला मनोमन जाणीव होती.
याच प्रेमाच्या भावनेतून, २०२३ साली मी यांच्याकडे ऑर्डर दिली नाही,आप्पा बळवंत चौकातील दुसऱ्या एका नामांकित दुकानातून मी साहित्य विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली.
लिस्ट नीट लिहून आणायची,अक्षर तुमचं तुम्हाला तरी कळतंय का ? बाजूला थांबा जरा, बाकीची गिऱ्हाईकं बघू देत ... वेळ किती लागेल म्हणून काय विचारता ? इतकं एकच काम आहे का ? सामान काय आहे ते आत्ताच मोजून घ्या, पुन्हा कटकट करायची नाही... ए यांना मराठी भाषा कळत नाही, दुसऱ्या भाषेत सांग रे यांना जरा.... असा स्वतःचा पाणउतारा करून घेतला...यानंतर कॅरीबॅगचे सुट्टे पैसे देईपर्यंत आमच्या वस्तूंना त्यांनी आम्हाला हात सुद्धा लावू दिला नाही... ! हरकत नाही... जगात सगळेच कटारिया साहेब जन्माला आले तर मग अनुभव कसा मिळणार ? असो... हा प्रकार पुढे कटारिया साहेबांना कसा कोण जाणे पण कळला.
एके दिवशी शंकर महाराज मठाजवळ भीक मागणाऱ्या लोकांना मी तपासत असताना ते तावातावाने आले.
चेहऱ्यावरचा मृदुभाव आणि ओठांवरची मृदू वाणी यावेळी लुप्त झाली होती.
'डॉक्टर तुम्ही स्वतःला समजता काय ? सेवा करण्याचा मक्ता काय तुम्हीच घेतला आहात का ?थोडीफार सेवा आम्ही करत होतो,आमच्या हातून हि सेवा काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?'
सेवा करणे हा माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.
मी तुम्हाला माफ नाही करणार...
ते रागानं थरथर कापत बोलत होते...
या जमदग्नीपुढे मी नतमस्तक झालो... पायावर डोकं टेकवलं... आणि त्यांच्या प्रेमाचा राग माझ्या झोळीत मनसोक्त भरून घेतला !
तुम्हाला ऑर्डर न देण्यामागे माझी पण काय भावना आहे,हे सर्व मी त्यांना उलगडून सांगितले,क्षणात या जमदग्नीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले... !
स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी लोक आंदोलन,
उपोषण,रास्ता रोको करतात... सेवा करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी हा माणूस आज माझ्याशी..माझ्याशी भांडला.!
यानंतर पुढे दोन-तीन वेळा मोघम भेटी झाल्या.
आता साल उजाडले २०२४.
यावर्षीची शैक्षणिक ऑर्डर "चॉईस" मध्ये देण्याशिवाय मला दुसरा कोणताही "चॉईस" नव्हता...!
मी १३ जून २०२४ला कटारिया साहेबांच्या फोनवर फोन केला.पलीकडून आवाज आला हॅलो मी चिराग बोलतोय... !
चिराग हे कटारिया साहेबांचे सुपुत्र,चार्टर्ड अकाउंटंट आहेत ! हॅलो चिराग सर,कटारिया साहेब कुठे गेले त्यांना फोन द्या ना..'
'सर बाबा गेले' पलीकडून मंद आवाज आला.
आमचा हा माणूस कोणालातरी मदत करण्यासाठी,कोणाच्यातरी पाठी धावतच असतो,सतत फिरत असतो,हे मला माहित होतं. त्याच भावनेने मी बोललो...
'अच्छा गेले का ? बरं पुन्हा कधी येतील ?' मी हसत बोललो.
'बाबा गेले सर... परत ते पुन्हा कधीही येणार नाहीत ... तुम्हाला माहित नाही ?'
माझ्या पायाखालची जमीन सरकली... मी सुन्न झालो... मी काय ऐकतोय यावर माझा विश्वास बसेना...भानावर आलो,तेव्हा मात्र या माणसाची मला भयंकर चीड आली... पलीकडच्या चौकात जाताना सुद्धा घरात आपण सांगून जातो... मग इतक्या मोठ्या प्रवासाला जाताना साधं आम्हाला सांगण्याची,निरोप घेण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटली नाही ?
भांडून सेवेचे अधिकार मागता आणि असं बेजबाबदारपणे सोडून जाता ?
आमच्या पोरांना पोरकं करून जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?
हे...हे... असं... काउंटरवर तबला वाजवत आम्हाला आशा का दाखवलीत ?
कटारिया साहेब,आता मी सुध्दा तुम्हाला माफ नाही करणार...!
'सर काही काम होतं का ?' फोन अजून चालूच होता,पलीकडून चिराग सरांचा आवाज आला.
'शैक्षणिक साहित्याची ऑर्डर द्यायची होती...' मी शांतपणे बोललो.
'ठीक आहे सर,दोन दिवसात पाठवतो.' तितक्याच शांतपणे उत्तर आले.
दोन दिवसांनी सामान आले,मी बॉक्स खोलले.
आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होते, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे २५ होत्या...
मी चिराग सरांना फोन केला,म्हणालो, 'चिराग सर,बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे... हि आमची लिस्ट नव्हे,काहीतरी चूक झाली असावी !
चिराग सर म्हणाले, 'सर मी चार्टर्ड अकाउंटंट आहे,
आकड्यांच्या खेळात मी चुकत नाही, तुम्ही दिलेले सामान मी अत्यंत काटेकोरपणे मोजून मापून स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरलं आहे, चूक होणार नाही माझी...!'
'अहो पण, चिराग सर... एका वस्तूच्या बदल्यात पाच पाच वस्तू आल्या आहेत आम्हाला...'
'अच्छा... हां... हां.... त्या एक्स्ट्रा वस्तू का ? त्या मी नाही... बाबांनी पाठवल्या असतील कदाचित सर ...'
फोन कट झाला ...!!!
इतका वेळ धरून ठेवलेला बांध आता फुटून गेला... !
कटारिया साहेब चिरंतन प्रवासाला निघून गेले... पण जाताना आपल्या विचारांची एक पणती मागे ठेवून गेले. या पणतीला नाव सुद्धा काय दिलं आहे... ? चिराग... व्वा...!!!
यानंतर १५ जून २०२४ ला सर्व चिल्ल्या -
पिल्लांना बोलावून शैक्षणिक साहित्य दिले.
नवीन वही,नवीन पुस्तक,नवीन दप्तर,नवीन कंपास पेटी पाहून या सर्व चिमण्या आनंदाने चिवचिवल्या... ! या चिवचिवणाऱ्या चिमण्यांना आता कोणत्या तोंडाने सांगू ..!
बाळांनो,आज खऱ्या अर्थानं तुम्ही पोरके झालात रे.... आणि तुमच्या बरोबर मी सुद्धा... !!!
२१ जून २०२४
डॉ.अभिजीत सोनवणे-डॉक्टर फॉर बेगर्स,
सोहम ट्रस्ट पुणे