पक्ष्यांच्या घरट्यांची रचना त्यांच्या कुळाप्रमाणं बदलत असते.रातवा पक्षी अजिबात घरटं बांधीत नाही.मादी जमिनीवर अंडी घालते.जमिनीवर घरटं बांधणारे दुसरे पक्षी बहुतेक बशीच्या आकाराचं घरटं तयार करतात. त्यांपैकी कुररी (टर्न) आणि जलचर पक्षी घरट्याच्या अस्तराशिवाय शंख-शिंपल्यांचे तुकडे, खडे किंवा गवतासारख्या वस्तू यांचा उपयोग करतात.ज्या पक्ष्यांची झाडावर वीण होते,असे पक्षी काटक्या,मुळ्या,
गवत,शेवाळ,इत्यादी वस्तूंचा उपयोग करून घरटी बांधतात.देवकन्हई मात्र चिखलाचं घरटं बांधते.होल्याचं घरटं म्हणजे आडव्या-तिडव्या ठेवलेल्या चार काटक्या,
नारंग पक्ष्याचं घरटं चेंडूसारखं गोलाकार आणि सुबक असतं.शिंपी पक्षी आपलं घरटं पानांनी शिवून तयार करतो. सुगरण पक्षी तर सुंदर आणि कलापूर्ण घरटी विणण्याकरिता प्रसिद्ध आहे.यजुर्वेदात तिच्या घरट्याचा उल्लेख आढळतो.
'सोमाय लवनालभते त्वष्ट्रे कौलीकान्'
अर्थात सौम्य स्वभावासाठी लवा नावाच्या पक्ष्याकडं व कलाकुसरीसाठी सुगरण पक्ष्याकडं पाहावं.
पक्ष्यांविषयीच्या ग्रंथांतून पाखरांच्या घरट्यांविषयी सविस्तर वर्णनं दिलेली असतात; परंतु पाखरं प्रत्यक्षात घरटी कशी बांधतात याविषयीचं निरीक्षण क्वचितच नोंदलेलं असतं.
जिज्ञासू पक्षिनिरीक्षकांकरिता ही एक चित्ताकर्षक कामगिरीच आहे.पक्षी पिलांना भरविताना पाहणं जितकं सोपं आहे,तितकं घरटी बांधताना त्याचं निरीक्षण करणं सोपं नाही. याचं कारण असं की,
काही पक्षी आपली घरटी मोठ्या गूढपणे बांधीत असतात.घरटी बांधताना त्यांना कोणी पाहिलं,तर ते घरटं अपुरं सोडून ते निघून जातात.पुन्हा तिकडं फिरकतदेखील नाहीत.
याचा प्रत्यय आपणाला ऋग्वेदात केलेल्या वर्णनावरून येतो.पक्ष्याच्या पिलाप्रमाणं गूढस्थळी ठेवलेला,निधीप्रमाणं मौल्यवान, स्वर्गाहून आणलेला आणि दगडात झाकलेला सोम इंद्रानं प्राप्त केला. (१. १३०. ३). एका ठिकाणी पक्ष्यांची घरटी मृदू असतात असा उल्लेख आहे,तर अन्यत्र ती घरटी उबदार असल्याचा निर्देश आहे. (९. २०. ५)
सुरुवातीला घरट्याची जागा पक्षी जोडीनं शोधतात.अडई नावाची रानबदकं घरट्याची जागा भुईताडाच्या हिरव्या झुडपात निवडतात. झुडपात प्रवेश करण्यासाठी भुयार करतात. भुयार करताना पानं एकमेकांत गुंतवितात.काही चोचीनं छाटून टाकतात.आतल्या भागात बशीच्या आकाराची गादी करतात.त्यासाठी ताडाची पानं आणि पिसं उपयोगात आणतात. बहिरी ससाणा मात्र झाडाच्या शेंड्यावरील मजबूत फांदीच्या दुबेळक्यात घरटं करतो. सर्पगरुड आपलं घरटं उंच वृक्षाच्या शेंड्यावर करतो.
तेथून सारा टापू त्याच्या दृष्टिक्षेपात येतो.
केम कुकडी आपलं तरंगतं घरटं पाणवनस्पतीच्या साहाय्यानं उंच वाढलेल्या देवधानात करते.परंतु हे घरटं पाण्यापासून फार दूर नसतं.कारण जेवढं घरट्यात प्रवेश करणं सोपं जावं,तेवढंच घरट्यातून निसटून पाण्यात जायलादेखील सहज शक्य व्हावं,असा त्यांचा हेतू असतो.सारस पक्ष्यांची जोडी एका ठरावीक क्षेत्रात,उथळ पाण्यात पाणवनस्पतीचा उंचवटा करून,त्यावर खोलगट आकाराचं घरटं बांधते, तेव्हा ते एखाद्या बेटासारखं दिसू लागतं.
बरेच पक्षी आपलं घरटं साध्या रीतीनं बांधतात. मत्स्य गरुडाची जोडी नवेगावबांध सरोवरातील बेटावर घरटं बांधताना मी अनेक वेळा पाहिली आहे.दर वर्षी त्यांना घरट्यासाठी नवीन जागा शोधावी लागत नाही.झाडावरील जुन्याच घरट्याची ते डागडुजी करतात.त्याकरिता चोचीत काटक्या घेऊन जुन्या घरट्यावर त्या रचतात.
कित्येकदा हिरव्या पानांची एखादी फांदी तोडून नेतात.
त्यावरून समजतं,की या गरुडानं घरटं बांधण्यास सुरुवात केली आहे.घरट्याचं तक्तपोस तयार होताच त्यावर बसून हे गरुड काटक्या नीट रचून घेतात.ज्या वेळी तक्तपोस उंच होतं,त्या वेळी ते पायांनी तुडवितात.काड्या खाली-वर करून मध्य भागाला खोलगट आकार देतात.
जमिनीवर,तसेच झाडावर घरटी तयार करणारे पक्षी घरटी बांधण्याचं काम ठरावीक एका जागेवर बसून करतात.
घरटं बांधण्याची सामग्री चोचीनं रचीत असतात.त्यानंतर पायांनी तुडवून त्यास मध्यभागी खोलगट आकार देतात.
झाडावर कावळे घरटी बांधताना पाहणं मोठं मनोरंजक असतं.कावळ्यांच्या जोड्या आपापल्या जुन्या घरट्याचा ताबा घेऊन,त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करतात.
घरट्यात जोडीपैकी एक थांबतो.दुसरा घरट्यासाठी काड्या जमा करू लागतो.अनुभवी कावळे घरटं सोडून कधीही जाणार नाहीत.
तरुण कावळ्यांच्या जोड्या घरट्याचं साहित्य गोळा करून ते बांधायला सुरुवात करतात. मोठ्या प्रयत्नानं त्या घरटं रचीत असतात.पुन्हा पुन्हा जोडीनं काड्या गोळा करायला जातात; परंतु एवढ्या प्रयासानं बांधीत असलेल्या घरट्याची प्रगती होत नाही,याचं त्यांना आश्चर्य वाटतं.एकदा मला याचं कारण पाहण्याची संधी मिळाली.
तरुण कावळे घरट्याची सामग्री आणायला गेले,की शेजारच्या घरट्यातील कावळा हळूच त्यांच्या घरट्यातील काड्या चोरून स्वतःच्या घरट्यात आणून ठेवीत होता. तरुण कावळे घरट्याचं साहित्य घेऊन परतले, की तो शेजारचा कावळा,आपण त्या गावचे नाही,असा भाव आणून दुसरीकडं पाहात राही.
पंकोळीसारखे पक्षी आपली घरटी चिखलानं बांधतात.ते बांधताना पाहणं मोठं चित्तवेधक असतं.पक्ष्यांच्या अंड्यांतील जीवांचा विकास ती पाखरांच्या शरीराच्या तापमानाइतकी उबदार ठेवल्यानं होतो.अगदी कमी अथवा जास्त तापमानामुळं अंड्यातील जीव मरून जातो. पक्षी अंड्यांवर बसून त्यांचं योग्य ते तापमान ठेवतात.
पक्ष्याची मादी सर्वच अंडी एका वेळी घालू शकत नाही.
ठरावीक दिवसांच्या अंतरानं ती अंडी घालते.बरेचसे पक्षी रोज एक किंवा एक दिवसा आड एक अंडं देतात.
रानबदकानं घातलेल्या अंड्यांची संख्या मोठी असते.ही संख्या पुरी करायला रानबदकांना एखादा पंधरवडा तरी लागतो.अंडी उबविण्यास मात्र एकाच दिवशी सुरुवात करतात,याचं कारण असं,की शेवटचं अंडं घातल्याशिवाय ती उबविण्यास सुरुवात करीत नाहीत.
घुबड मात्र एक-दोन अंडी घालताच ती उबविण्यास सुरुवात करीत असल्यानं सगळी अंडी उबविण्यास त्याला दीर्घ काळ लागतो.इतर पक्षी मात्र सुरुवातीच्या काळात अंडी उबवीत नाहीत,तर ती नुसतीच झाकून ठेवतात...
पोट आणि छाती यांच्या मध्ये कातड्याचा भाग असतो.
त्याचा उपयोग पक्षी अंडी उबविण्यासाठी करतात. या कातडीभोवतीची पिसं फुलवून हे पक्षी अंड्यावर त्याचं आवरण घालीत नाहीत, तोपर्यंत ती थंडच असतात.
अंडी उबविण्याचं काम फक्त मादीचं नसतं.लावा आणि पाणपिपुली या पक्ष्यांत फक्त नरच अंडी उबवितो; परंतु बऱ्याच पक्षिकुळांत नर आणि मादी आळीपाळीनं अंडी उबविण्याचं कार्य करतात. अशा वेळी ते एकमेकांपासून घरट्याचा ताबा कसा घेतात, हे पाहणं मोठं मनोरंजक असतं.
पाखरमाया,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सिताबर्डी-नागपूर
पाखरांच्या बाबतीत अंडी उबविणं हे कार्य म्हणजे त्यांचा आनंदसोहळा असतो.ते त्यांच्या बाबतीत नुसतं उबविणं राहात नाही,तर ते 'जाणिजे यज्ञकर्म' असतं.असंही दिसून येतं,की अनेक तासांनंतरही अंडी उबविणारा जोडीदार घरटं सोडायला तयार नसतो.घरट्यातून, अल्पकाळ का होईना,नर-मादींना जी मुक्तता लाभते,ती शांततापूर्वक असते.अशा प्रयत्नात एक प्रकारचं आश्वासन असतं.त्यामुळं त्यांचे संबंध दृढ होतात.जोडीदाराला मुक्त करण्यासाठी येणारा पक्षी अंड्यांवर बसण्याचा हेतू अनेक प्रकारांनी व्यक्त करतो.तो पोटावरची पिसं फुलवितो.
हळूवार कूजन करतो.बसलेल्या पक्ष्याला डोक्यानं दुशी मारतो.शक्य असल्यास घरटं बांधण्याचं साहित्य घेऊन येतो.साहजिकच अंड्यांवर बसलेल्या जोडीदाराला नाइलाजानं उठावं लागतं.तो घरट्याचं प्रथम निरीक्षण करतो.अंडी पाहून त्यांवर पुनश्च बसण्याचा मोह त्याला टाळता येत नाही;परंतु जोडीदार ही संधी साधून अंड्यांवर बसतो.पक्षी अंड्यांवर बसला,की तो चोचीच्या टोकानं अंडी घुसळतो.अंड्यांवर बसला असताना हे कार्य तो सतत करीत असतो.अंड्यांवर निरीक्षणासाठी चिन्हं केली,तर असं दिसून येईल की,ही अंडी गोल गोल फिरत असतात.जेणेकरून साऱ्यांना समान ऊब मिळते.जमिनीवर घरटी करणारे पक्षी घरट्याबाहेर चुकून गेलेलं अंडं पुन्हा लोटून आत घेतात.तुम्ही एखादं अंडं घरट्याच्या किनाऱ्यावर ठेवल्यास,पक्षी जेव्हा तिथं येईल,
तेव्हा हा प्रकार त्याच्या लवकर लक्षात येणार नाही.पण जेव्हा तो घरट्यातील अंड्यांवर स्थानापन्न होईल,तेव्हा त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटून घरट्याच्या काठावर पडलेलं अंडं तो चोचीनं पुन्हा आत घेईल.अंडं जर त्याच्या आवाक्याबाहेर असेल, तर तो उठून अंड्यापर्यंत जाऊन ते ढकलीत घरट्यात लोटील.
अंड्यातून जीव बाहेर पडण्याची वेळ येते तेव्हा आतील पिलू शरीराचं प्रसरण करीत गोलगोल फिरत असतं.या जीवनचक्रातून जात असताना अंडं तडकतं.तीक्ष्ण अशा चोचीतील दातऱ्यानं पिलू आपल्या भोवतीच्या कवचाला बारीक छिद्र पाडतं.छिद्र उत्तरोत्तर मोठं होत असतं.अशा त-हेनं कवच फोडून द्विज बाहेर येतो.
माता-पिता या जन्मसोहळ्याकडं अनिमिष नेत्रांनी पाहात असताना,त्यांचं निरीक्षण करण्याचा आपण एक अपूर्व अनुभव घेत असतो.अंड्याला छिद्र पाडण्यापूर्वी अंतर्नाद येत असतो.माता-पिता वारंवार घरट्यातील अंड्यांकडं पाहात असतात.पूर्वीप्रमाणे अंड्यांवर बसण्यापेक्षा किंचित पंख पसरून मादी उभी राहाते.हे अभूतपूर्व दृश्य पाहून मला केशिराज संकलित कुकडीयेच्या दृष्टांताची आठवण झाली.
'कुकडी असे : ते आंडी घाली : पीलीं होति : तेयांसि पाखवा दे : अमृतकळा असे ते संचरे : तयातवं तीयें वाढति ।।' यातील अमृतकळेची कल्पना अभूतपूर्व आहे. कोंबडी अमृतकळेचा संचार पिलांना 'पाखवा' देऊन म्हणजे स्पर्शानं करते.
ज्या वेळी अंड्यांतून पिलं बाहेर पडतात,तेव्हा त्यांचे माता-पिता अंड्यांची कवचं उचलून बाहेर फेकतात.
पानगळीनंतर पाने-फुले सोडून गेली म्हणून झाड त्यांचा द्वेष करत बसत नाही.ते वठत नाही. आपल्या जीवनावरचे प्रेमही सोडत नाही. आपल्या अंगची पुन्हा बहरण्याची आशा सोडत नाही.अनुकूल ऋतू आला की पुन्हा ते बहरून उठते.निसर्गात अशी अनेक दृश्ये आपण बघत असतो.पण त्यातून आपण आवश्यक तो बोध घेत नाही.कुणी सोबत सोडली,नाती तुटली, प्रेमभंग झाला
की माणूस लागलीच वठायला लागतो.जीवनातून उठतो.किंवा इतरांना जीवनातून उठवतो.फुलण्याची शक्यता असूनही तो फुलणे सोडतो.म्हणून हे असे होतो.झाडाला जसा नवा ऋतू भेटतो,तसेच माणसांनाही नवे कुणीतरी भेटत असते.नवे काही तरी घडण्याची शक्यता असतेच.त्यासाठी माणसांनी अवेळी वठून जाणे सोडले पाहिजे.!
डॉ.रवींद्र श्रावस्ती