* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: महत्व मतदानाचं,आवाहन याचकांचं/Importance of voting,Appeal of petitioner...!!!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१८/११/२४

महत्व मतदानाचं,आवाहन याचकांचं/Importance of voting,Appeal of petitioner...!!!

दावणीला बांधलेला बैल,जवा दावं तोडून,वारं भरल्यागत,गावातनं मोकाट पळत सुटतो,त्यावेळी शंभर जणांना धडका देत तो विध्वंसच घडवतो... ! या बैलाला वेळीच आवर घातला... चुचकारत योग्य दिशा दाखवली... चारापाणी घातला ... याच्याशी प्रेमाने वागलं... की आपण म्हणू ते काम तो चुटकीसरशी करतो..! 


मग ती शेतातली नांगरणी असो,पाणी शेंदणं असो, बैलगाडीला जुंपून घेणं असो किंवा आणखी काही... ! 


पाण्याचंही तसंच... 


कशाही वाहणाऱ्या पाण्याला प्रेमानं थोपवून धरलं; की ह्येच पाणी भिंती आड गप गुमान धरण म्हणून हुबं ऱ्हातंय... प्रेमानं चुचकारून पायपात घातलं की घरात नळ म्हणून वाहतंय... पात्यावर गरागरा फिरून वीज बी तयार करतंय... 


अय बाळा... आरं हिकडं बग... आरं तकडं न्हवं ल्येकरा ... हिकडं बग... हिकडं रं... हांग आशी ... फलीकडल्या गल्लीत आपली साळू आजी ऱ्हाती... तिला कोनच  न्हाय रं... आत्ताच मका पेरलाय तिनं... अर्ध्या गुंट्याचं वावार हाय तिचं.... एक चक्कर मारून जरा मक्याची तहान भागवून यी की...इतक्या प्रेमाने पाण्याला सांगितल्यावर,हेच पाणी झुळू झुळू वाहत,शिट्टी वाजवत,मंग त्या मक्याला भेटायला जातंय... बोळक्या तोंडाची साळु आजी तोंडाला पदर लावून मंग आशीं हासती... अन डोळ्यात आस्तंय पाणी... हो पुन्हा पाणीच... ! 


अस्ताव्यस्त वाहणाऱ्या या पाण्याला मात्र दिशा दाखवून,त्याचा योग्य वापर करून घेतला नाही;तर पूर ठरलेला... विध्वंस हा ठरलेलाच आहे... ! 


सांगायचा मुद्दा हा की मस्तावलेला बैल असो किंवा अस्ताव्यस्त वाहणारं पाणी...! त्यांना आवरून - सावरून योग्य दिशा दाखवून, त्यांच्यातल्या जबरदस्त ताकदीचा उपयोग करून घेता यायला हवा... ! 


आमचा भिक्षेकरी - याचक समाज.... याचीही ताकद खूप जबरदस्त आहे... !


या सर्वांनी जर एकत्र येऊन ठरवलं... तर उभा डोंगर,ते आडवा करतील...!


बुलडोझर ला सुध्दा जे काम दोन दिवसांत जमणार नाही,ते काम हे लोक एकत्र आले तर दोन तासात करतील... ! गेल्या दहा वर्षापासून मी आणि मनीषा यांच्या या जबरदस्त ताकतीचा उपयोग विधायक कामांसाठी करुन घेत आहोत.... ! 


यांच्या ताकदीचा उपयोग;आम्ही यांच्याच विकासासाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी करण्याचा प्रयत्न करत आहोत... ! 


पुण्यातील सार्वजनिक भाग,भीक मागणाऱ्या आज्या / मावश्या यांच्या टीममार्फत (खराटा पलटण - Community Cleanliness Team)  स्वच्छ करून घेणे असो की,


वैद्यकीय दृष्टीने फिट असणाऱ्या भिक्षेकर्यांकडून रक्तदान करून घेणे असो.... 


जे काही करतो आहोत;ते समाजानं यांना दिलेलं दान काही अंशी फेडण्यासाठी...


अर्थात् याचं श्रेय माझं किंवा डॉ.मनीषाचं नाही...  एकट्या दुकट्याचं कामच नव्हे हे... आपण सर्व साथीला आहात म्हणून हे शक्य होत आहे. 


'It's not "Me"... It's "We"...!!!'


तर,दान या शब्दावरून आठवलं,सध्या मतदानाचं वारं वाहत आहे... ! ज्यांना मतदानाचे अधिकार आहेत,असे अनेक सुजाण नागरिक मतदान करतच आहेत,मात्र काही लोक; मतदानादिवशी ऑफिसला / कामावर दिलेली सुट्टी हि vacation समजून,मतदान न करता फिरायला जातात. 


काही लोक जरा गर्दी कमी हुदे... थोडं ऊन कमी होऊ दे... म्हणत म्हणत मतदान करायचंच विसरून जातात...! 


अशा लोकांचं प्रबोधन कसे करता येईल ? असा विचार मनात आला आणि मला माझ्या मागे उभ्या असलेल्या ताकदीची आठवण झाली....! 


तर,आज शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी आम्ही पुण्यातील वर्दळीच्या ठिकाणी आमच्या किमान १०० याचकांना एकत्र केलं आणि "चला आपण सर्वजण मतदान करूया"अशा अर्थाचे  हातात बोर्ड दिले .... ! 


भिक्षेकर्‍यांना आम्ही रस्त्यात आणि चौका - चौकात हे बोर्ड घेऊन उभं केलं... आम्हाला जमेल त्या पद्धतीने आम्ही मतदानाचं महत्त्व आणि मतदान करण्याची विनंती समाजाला केली...  ! 


सांगतंय कोण... ? अडाणी भिक्षेकरी... ! 


ऐकणार का ... ? सुशिक्षित गावकरी... ?? 


असो; आम्ही प्रयत्न करतोय... बैलाला आवरण्याचा आणि पाण्याला सावरण्याचा.... ! 


यात अंध अपंग वृद्ध याचक या सर्वांनी सहभाग घेतला... मी या सर्वांचा ऋणी आहे !!!


मला माहित आहे,आमच्या या उपक्रमामुळे एका रात्रीत फार काही दिवे पेटणार नाहीत...पण एखादी पणती लावायला काय हरकत आहे ? 


बघू... जे सुचेल ते आपल्या सर्वांच्या साथीने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतोय...


शेवटी एक माहीत आहे... 


कोशिश करने वालों की हार नही होती... !!!


शुक्रवार दिनांक १५  नोव्हेंबर २०२४


ऑक्टोबर महिन्याचा लेखाजोखा..


सर्वप्रथम आपणास दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा !!


या महिन्यात घटस्थापना,दसरा,कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी यासारख्या सणांची रेलचेल होती... ! 


या महिन्यात ज्या घटना घडल्या;त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा आणखी एक वेगळा दृष्टिकोन निर्माण झाला...! 


वाघ आणि हरिण दोघेही जीव खाऊन पळत असतात... एक भूक भागवण्यासाठी आणि दुसरा जीव वाचवण्यासाठी...!!! 


हातात पैसा नसतो,तेव्हा पोटात दुखते;कारण भूक सहन होत नाही.... खूप पैसा असतो,तेव्हाही पोटात दुखते; कारण अपचन सहन होत नाही... 


पैसा नसताना वणवण फिरावे लागते अन्न मिळवण्यासाठी...  पैसा असतानाही वणवण फिरावे लागते... अन्न जिरवण्यासाठी ...  


बीज उगवताना आवाज येत नाही... झाड मोडले तर मात्र प्रचंड आवाज होतो...


आवाज विनाशाला असतो,निर्मितीला नाही...!!! 


किती विरोधाभास आहे .... ! 


जगण्यातले विरोधाभास,जगणं शिकवून जातात...! 


पुनर्वसन- फुटपाथ वर पडून असलेली एक ताई...  थोड्यावेळात ती जाणार,हे गृहीत धरून तिच्या घरातल्या लोकांनी बाकीची सर्व तयारी सुरू केली होती... अक्षरशः तिरडी सुद्धा मागवली होती...! 


मी सहज पाहिलं,हि तिरडी म्हणजे अर्धी कापलेली शिडी होती... मधले एक दोन बांबू फक्त निखळले होते... गंमत काय,की शिडी उभी ठेवली तर तीला "शिडी" म्हणतात; त्यावरून वर चढता येते... हिच बांबू निखळलेली शिडी जर आडवी ठेवली तर तिला "तिरडी" म्हणतात...त्यावरून सुद्धा वर जाता येते,पण कायमचे ... 


पुन्हा विरोधाभास !!! 


जाणाऱ्या या ताईला ऍडमिट केले,ती बरी झाली... अगदी खरं सांगायचं तर;ती जगली यावर माझा सुद्धा विश्वास बसेना....! यानंतर तिच्या इच्छेनुसार,तीला खेळणी विकायचा व्यवसाय सुरू करून दिला...! 


काँग्रेस भवन पुणे येथे ती खेळणे विकते...!


ती तर जगलीच परंतु आता कुटुंबाला जगवते आहे !  


असाच दुसरा माणूस...रस्त्यावर पडून होता, यालाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.... पूर्णतः बरा झाला.... आता याला हात गाडी देऊन अनेक वस्तू विक्री करण्यासाठी दिल्या आहेत. 


येरवडा येथे याने व्यवसाय सुरू केला आहे. 


याच्या घरात सर्व लोक आहेत तरीही काही ना काही परिस्थितीमुळे याला घरातल्या लोकांनी दूर लोटले आहे...! एकदा मी त्याला छेडले,त्याला म्हणालो,घरातल्यांची आठवण येत नाही का रे तुला? तुला त्यांनी भेटायला यावं असं तुला वाटत नाही का ? तू त्यांची वाट कधी बघत असतोस  की नाही ?' 


तो माझ्याकडे पहात हसत म्हणाला, सर वाट हरवलेल्या लोकांची पहायची असते....  ज्यांनी स्वतःहून वाटच बदललेली आहे... त्यांची वाट कशी पहायची ?'चुकून दरवाजा बंद झाला असेल तर तो उघडता तरी येतो... आतल्या माणसाने आपल्यासाठी तो कायमचा बंदच करून ठेवला असेल तर तो दरवाजा कसा उघडावा ? 


आणि उघडला तरी उपयोग काय ? जबरदस्तीच्या नात्यात पूर्वीसारखा गोडवा थोडाच राहणार आहे..??? 


अंगावर शहारे आले माझ्या,हे ऐकून .. !


माझ्याशी बोलल्यानंतर चेहरा तिकडे करून तो डोळे पुसत होता... 


मी त्याला हळुवारपणे म्हणालो काय झालं रे ? 


तो म्हणाला, काही नाही सर डोळ्यात काहीतरी गेले वाटतं.... !' हं... खरंच आहे बाळा .. सध्या प्रदूषण खूप वाढलं आहे ....हवेत आणि नात्यातही... ! 


घटस्थापना - 


पहिली आई, दुसरी आज्जी , तिसरी मावशी,चौथी आत्या,पाचवी बहीण,सहावी पत्नी, सातवी *मुलगी, आठवी सून,नववी नात...हिच आहेत आपल्या आयुष्यातील देवीची नऊ रूपे...!!!*


या नऊ देवींची आम्ही "माऊली" म्हणून पूजन केले आणि नवीन साडी चोळी दिली... ! 


"तू आहेस गं माऊली, म्हणून मी आहे,तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही, तू मायेनं भरलेला "घट"* आहेस आणि आयुष्यभर मी माझ्या मनात तो "स्थापन" करूनच जगणार आहे... हाच माझा भाव... "भक्ती" म्हणून स्वीकार कर गं माऊली,असं म्हणून आम्ही घटस्थापना केली... !!! 


या निमित्ताने आम्ही कुमारी पूजन केले...  रस्त्यावरील वृद्ध मायमाऊलींना साड्या दिला...! 


त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले... ! 


चंदनाचा टिळा आपण जेव्हा दुसऱ्याच्या कपाळावर लावतो, तेव्हा आपलीच बोटं सुगंधित होतात... 


आपण स्वतःसाठी घेतो तो आनंद आणि दुसऱ्याला देतो ते समाधान... !!! 


या समाधानी चेहऱ्यांची बेरीज कशी करावी...? 


जर कोणाला करता आलीच,तर यातून जे सार मिळेल,तितकंच आपलं आयुष्य समजावे ..!!! 


- चादर आणि पणत्या -  येणाऱ्या थंडीचे दिवस लक्षात घेऊन आम्ही आपल्या लोकांना सोलापुरी चादर द्यायचे ठरवले.


डॉ.श्री अनिल पटेल,यवतमाळ यांनी आम्हाला सोलापुरी चादर दिल्या,सौ जयश्रीताई नेटके या माझ्या छोट्या बहिणीने स्वतः तयार करून पणत्या दिल्या.अनेक लोकांना आम्ही या पणत्या विकायला दिल्या.... ज्यांच्या अंगावर काहीही नव्हते अशा लोकांच्या अंगावर आम्ही मशिदीत न जाता सुद्धा चादर चढवली....! 


देवासमोर उभे राहून आपण काय मागतो,यापेक्षा देवाकडे पाठ असताना,आपण काय देतो हे जास्त महत्त्वाचं असतं... ! 


हि खरी प्रार्थना... !!! 


प्रार्थना करण्यासाठी दोन हात एकत्र जोडावे लागतात... दोन हात एकत्र करूनच नमाज पढता येतो .... प्रेयर करण्यासाठी सुद्धा दोन हातच लागतात.


हेच दोन हात एकत्र येऊन सेवा करतात...त्यावेळी आपोआप प्रार्थना होते,नमाज पढला जातो,प्रेयर सुद्धा तिथेच होते...! 


तळागाळातल्या लोकांना आपण सर्वजण मदत करत आहात... 


आपण खऱ्या अर्थाने प्रार्थना,नमाज आणि प्रेयर जगत आहात..!!! 


आम्ही नतमस्तक आहोत आपल्यापुढे... !!! 


- उटणे - डॉ.मनीषा ही आयुर्वेद पारंगत आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा उटणे तयार केले... या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून आपण भीक मागणाऱ्या मुलांचे शिक्षण करत आहोत.... म्हणुन लोकांना हे उटणे विकत घेण्यासंबंधात आवाहन केले... ! 


केवळ पंधरा दिवसात ५००० उटण्याच्या ऑर्डर आल्या... 


आमची झोळी कमी पडली... आपले दातृत्व नाही...!!! 


आपल्या या प्रेमाची तुलना मी कशाशी करू ??? 


गुण माहित असताना एखाद्याला जवळ करणं हा स्वार्थ.... 


परंतु दोष माहित असताना सुद्धा एखाद्याला साथ देणं हे प्रेम... !!! 


गुण आणि दोषांसकट आपण मला स्वीकारलं आहे... हे फक्त एक आईच करू शकते... 


आपणा सर्वांना सुद्धा मी आईच्याच भूमिकेत स्वीकारलं आहे...


प्रणाम माऊली !!! 


- खराटा पलटण


आम्ही आमच्या खराटा पलटणच्या माध्यमातून तळजाई टेकडी स्वच्छ केली.खराटा पलटण म्हणजे ज्या आज्यांना भीक मागायची नाही,अशा आज्ज्यांना आम्ही एकत्र केलं आहे,त्यांना युनिफॉर्म दिला आहे या आज्ज्यांच्या मार्फत आम्ही सर्वजण मिळून एखादा सार्वजनिक भाग झाडून पुसून स्वच्छ करतो आणि त्या बदल्यात त्यांना पगार किंवा शिधा देतो.  


तळजाई टेकडी स्वच्छ केल्यानंतर,सद्गुरु श्री शंकर महाराज समाधी ट्रस्ट,चे श्री प्रतापराव भोसले यांनी माझ्या सर्व याचकांना दहा किलो साखर दिली, आम्ही यावेळी या सर्वांना चादरी आणि फराळाचे वाटप केले.महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष, आदरणीय श्री.शेखरजी मुंदडा,राज्यमंत्री हे आमच्या याचक समाजाला भेटायला आले आणि स्वहस्ते त्यांनी हजारो याचकांना दिवाळीनिमित्त फराळ दिला. आदरणीय मुंदडा साहेब मला म्हणाले अभिजीत मी तुला कशी मदत करू ? 


मी म्हणालो,आमचा याचक समाज म्हणजे सहावं बोट आहे... असून फायदा नाही नसून तोटा नाही...! परंतु हि फार मोठी ताकद आहे... 


या ताकदीचा जर उपयोग करून घ्यायचा असेल; तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायला लागेल आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जर आणायचं असेल तर त्यांना काहीतरी ओळखपत्र देऊन त्यांच्या शिक्षण आणि नोकरी च्या वाटा मोकळ्या केल्या पाहिजेत.


अत्यंत भावुकपणे माझ्या खांद्यावर हात ठेवून,  याबाबत मी नक्की काहीतरी भरीव करेन असं त्यांनी मला वचन दिलं. 


त्यांच्या या "वजनदार" शब्दांनी,माझ्या मनावरचा "भार" थोडा हलका झाला...! 


वैद्यकीय


या महिन्यात रस्त्यावर असहायपणे पडलेल्या अनेकांवर रस्त्यावरच उपचार केले. 


ज्या गोष्टी रस्त्यावर जमत नाहीत, उदा.एक्सीडेंट मुळे हात मोडणे,पाय मोडणे,डोके फुटणे अशांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन उपचार केले आहेत. 


बरे झाल्यानंतर,भीक मागणे सोडून,काम करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत आहे.रस्त्यावरच याचकांच्या रक्त लघवी तपासण्या करत आहे.सर्दी पासून कॅन्सर पर्यंत रस्त्यावरच ट्रीटमेंट देत आहे. 


अनेक वैद्यकीय साधने त्यांना देत आहे. 


अनेक वृद्ध याचकांच्या पायात चपला नाहीत,याचं मला नेहमीच वाईट वाटतं.इथून पुढे वैद्यकीय साधनांबरोबरच चपला सुद्धा विकत घेऊन सोबत ठेवणार आहे.*


असो....


जगणं हरलेल्या माणसांसाठी आपल्या सर्वांच्या मदतीने मला जे शक्य आहे ते करतो आहे.यासाठी आपणा सर्वांचेच हात उधार घेतले आहेत, अन्यथा माझ्या दोन हातांनी हे शक्य झालं नसतं...! 


हरणं मिठासारखं खारट असेलही...नव्हे असतंच... पण आयुष्याला चव त्यामुळेच येते ! 


ज्याने कधी हरणं अनुभवलं नाही;त्याला जिंकण्याची गोडी कशी समजेल ? 


आज हरलेली ही माणसं,उद्या नक्की जिंकतील... कारण सोबतीला तुम्ही सर्वजण आहात... !!! 


घड्याळ ही कधीतरी बंद पडतं... मागं पडतं पण म्हणून ते लगेच फेकून द्यायचं नसतं... कधी चावी द्यायचे असते ... कधी सेल बदलायचे असतात....


माझी हि चावी आणि सेल आपणच आहात....!!!


म्हणूनच या महिन्याचा लेखा जोखा आपणा सर्वांना सविनय सादर !!! 


१ नोव्हेंबर २०२४


डॉ.अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे

डॉक्टर फॉर बेगर्स