* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: 2025

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१५/१२/२५

समुद्राच्या लाटांवर एक वर्ष / A year on the waves of the sea

जोनाथन फ्रैंकलिन या मध्य आणि दक्षिण अमेरिकेचा अभ्यास करणाऱ्या पत्रकाराने जोस सॅल्वडोर अल्वरेंगासोबत वर्षभर मुक्काम करून 'फोरथर्टीएट डेज' हे पुस्तक लिहिलं.सुरुवातीला जोनाथनचाही अल्वरेंगाच्या हकीगतीवर विश्वास बसत नव्हता;पण सर्व शक्यता तपासून पाहिल्यावर अल्वरेंगाने सांगितलेली प्रत्येक गोष्टी खरी आहे,असं त्याच्या लक्षात आलं आणि त्यातून एक उत्तम पुस्तक उभं राहिलं.


अल्वरेंगा त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो,की खात राहिलास तर तू मरणार नाहीस;पण त्याला ते पटत नाही.एकदा कोडोंबाच्या मनात येतं,मागील लेखावरून पुढे…हा आपला शेवटचा प्रवास भाग तिसरा व शेवटचा…


असं मरणाची वाट बघत राहण्यापेक्षा सरळ शार्कच्या झुंडीसमोर उडी मारलेली काय वाईट ! एकदा अल्वरेंगाचं लक्ष नाही हे बघून तो उडी मारायचा प्रयत्नही करतो;पण तेवढ्यात अल्वरेंगा त्याला सावरतो. पुढे काही दिवस कोडोंबा खाण्यासाठीही जागचा उठत नाही.अल्वरेंगाच त्याला खायला घालतो,पाणी पाजतो; पण त्याची जगण्याची इच्छा आणि टिकून राहण्याची ताकद कमी कमी होत चालल्याचं अल्वरेंगालाही जाणवू लागलेलं असतं.बोट भरकटून तीन महिने उलटून गेलेले असतात.एके दिवशी कोर्डोबा नेहमीपेक्षा जास्तच थकलेला वाटतो.बहुतेक त्याला आतून मरणाची चाहूल लागलेली असते.आता मी फार काळ जगत नाही,असं तो सतत पुटपुटत राहतो.अखेर अल्वरेंगाचाही धीर सुटतो.तो कोर्डोबावर ओरडतो,"तू मरू शकत नाहीस. तुला जगायला पाहिजेस.तू मेलास तर मी एकटा काय करू इथे?" पण हा उद्रेक ऐकायलाही कोर्डोबा जिवंत नसतो.त्याचे प्राण गेलेले असतात.


अल्वरेंगा धाय मोकलून रडतो.इतके दिवस दोघांच्या टीमचं नेतृत्व अल्वरेंगाकडे असलं तरी कोर्डोबाची त्याला सोबत असते.शिवाय,

आपल्यापेक्षा लहान आणि आपल्या जबाबदारीवर आलेला मुलगा म्हणून त्याची काळजी घेण्याचंही काम अल्वरेंगा पार पाडत असतो. आता अचानक ते काम संपून जातं.वर आकाश आणि खाली समुद्र यामध्ये आता अल्वरेंगा पूर्ण एकटा पडतो. आपल्या मृत सोबत्याचं शरीर समुद्रात फेकून देण्याचं धाडसही त्याला होत नाही.हा धक्का सहन करण्याचा सोपा मार्ग त्याला सापडतो,तो म्हणजे असं घडलंच नाही असं मानणं ! कोर्डोबा मेलाच नाहीये असं मानून तो त्याच्याकडे बघत बोलत राहतो.स्वतःच कोर्डोबाच्या वतीने उत्तरंही देतो.एक आठवडा उलटतो.कोर्डोबाचं शरीर तसंच पडून असतं.एके रात्री ताऱ्यांकडे पाहत अल्वरेंगा कोर्डोबाच्या शेजारी पहुडलेला असतो. त्याच्याशी बोलत असतो.अचानक झोपेतून जाग आल्याप्रमाणे त्याला जाणवतं की आपण एका मृतदेहाशी बोलतो आहोत.आपलं मानसिक संतुलन बिघडलं तर नाही ना अशी शंका त्याला येऊ लागते. शेवटी धीर गोळा करून तो कोर्डोबाचा मृतदेह पाण्यात ढकलतो.चार महिने उलटतात.

अल्वरेंगा जिवंत असतो, पण एकटेपणाचा धक्का त्याला अजून पचवता आलेला नसतो.कोर्डोबाच्या आठवणीने त्याला अनेकदा रडू फुटतं.आपण जगलो-वाचलोच तर कोर्डोबाच्या आईला कसं तोंड दाखवणार याची चिंताही त्याला सतत खात असते.आपला नेहमीचा उत्साह,खंबीरपणा,जिवावरच्या संकटातही जागी असणारी विनोदबुद्धी आपल्याला सोडून चालली की काय अशी शंका त्याला येऊ लागते.


पण तसं होत नाही.अल्वरेंगा लवकरच याही दुःखातून बाहेर पडतो,एकटेपणाला सरावतो;एवढंच नव्हे,तर त्याचा आनंदही घ्यायला लागतो.एकटं असण्याचे काही फायदे असल्याचंही त्याच्या लक्षात येऊ लागतं.मिळणाऱ्या अन्नपाण्याचे दोन भाग करण्याची आता गरज नसते.शिवाय कोर्डोबाला समजावत राहण्यात जी शक्ती खर्च होत असते तीही आता वाचते. त्या बोटीवर त्याचं त्याचं असं एक जग तयार होतं.


या प्रवासात समुद्रातलं एक वेगळंच जग त्याच्यासमोर उलगडत असतं.पट्टीचा मच्छीमार असूनही त्याला आजवर ते कधीही बघायला मिळालेलं नसतं.


आकाशातले ग्रह-तारे त्याला नव्याने दिसू लागतात. चंद्राच्या कलांसोबत त्याचं जगणं जोडलं जातं.कधी एखादा महाकाय देवमासा त्याला दिसतो,तर कधी एखादा अनोखा पक्षी.शार्कची फौज तर कायमच त्याच्या बोटीच्या चहुबाजूंनी घोंघावत असते.

एकदा त्याला बोटीपासून पंचवीस फुटांवर एक मोठ्या माशासारखा आकार वाहून जाताना दिसतो.त्याला लगडलेले मासे आणि वरून उडणारे पक्षी यामुळे तो मेलेला मासा असावा असं त्याला वाटतं.त्याची उत्सुकता एवढी वाढते की मागचा-पुढचा विचार न करता तो समुद्रात उडी टाकतो.पोहायला लागल्यावर त्याच्या लक्षात येतं,की आपल्या शरीरात समुद्रामध्ये पोहण्याची ताकद उरलेली नाही आणि स्नायूंना व्यायामही राहिलेला नाही.तो कसाबसा पोहत त्या गोष्टीपर्यंत जातो.जवळ गेल्यावर लक्षात येतं की तो मासा वगैरे नसून थर्माकोलचा मोठा तुकडा आहे.त्या तुकड्याचा उपयोग होईल,असा विचार करून तो तुकडा घेऊन परत बोटीकडे जायला निघतो,पण आपण बोटीपर्यंत पोहोचू की नाही याची त्याला खात्री वाटेनाशी होते.आपण अशी अविचारी उडी कशी काय घेतली याचं त्याला आश्चर्य वाटतं.वाटेत शार्कनी हल्ला केला तर काय,याचाही विचार त्याने उडी मारताना केलेला नसतो. अखेरीस कसाबसा तो बोटीत येऊन चढतो आणि सुटकेचा निःश्वास टाकतो.पाच महिने उलटून गेल्यावर पहिल्यांदा सुटकेची खरीखुरी आशा तयार होते. अल्वरेंगा आइसबॉक्समध्ये झोपलेला असताना त्याला मोठमोठ्यांदा संगीत वाजत असल्याचा आवाज ऐकू येतो.उठून बघतो तर एक भली मोठी क्रूझ शेजारून चाललेली असते.अल्वरेंगा खच्चून ओरडतो,दिसेल ती वस्तू बोटीवर आपटून आवाज करतो,वस्तू फेकून मारतो;पण कशाचाच उपयोग होत नाही.ते प्रचंड धूड अल्वरेंगाची दखलही न घेता तिथून निघून जातं.अल्वरेंगा त्याकडे अविश्वासाने बघतच राहतो.एखादी बोट जवळ आली की आपली सुटका नक्की,असं अल्वरेंगाला आतापर्यंत वाटत असतं,तो भ्रम आता दूर होतो.बोट जवळ आली तरी तिला आपण दिसूच असं नाही,हा नवाच हृदयात धडकी भरवणारा शोध त्याला लागतो.त्याची उरलीसुरली आशाही संपून जाते.आता किनाऱ्याला लागलो तरच आपण वाचणार,हे अल्वरेंगाला कळून चुकतं.थोडक्यात,याचा अर्थ असा की,आता बचावण्याची शक्यता फारच कमी आहे! आपण समुद्रात नेमके कुठे आहोत,इथून सगळ्यात जवळचा किनारा कुठे आहे, आपण त्याच दिशेने चाललो आहोत की नाही,कशाचाच त्याला पत्ता नसतो. अचानक त्याला जाणवतं की आपण मरणाचे दमलेलो आहोत.आपल्या मनातली ऊर्जाही संपत चालली आहे. किती तरी काळ तो निराशेच्या गर्तेत पडून राहतो.त्या खोल अंधारातून त्याला बाहेर काढते ती त्याची मुलगी. आता १३ वर्षांची झालेली त्याची मुलगी सतत त्याच्या डोळ्यांसमोर येत असते.आपण तिला सोडून पळून गेल्याबद्दल तिची माफी मागण्यासाठी तरी आपण जगलंच पाहिजे,असं तो स्वतःला सांगत राहतो.


सहा महिने उलटतात.तीच बोट,तेच रूटिन,तोच एकटा प्रवासी.अल्वरेंगाला आता केबिन फिवरचा त्रास होऊ लागलेला असतो बोटीवर अडकून पडल्यामुळे होणारा क्लॅस्ट्रोफोबिया.त्यावरही अल्वरेंगा उपाय शोधून काढतो.


आपल्या आसपासच्या समुद्राची त्याला आता नीट ओळख झालेली असते.शार्क कधी येतात,कधी लांब असतात हे त्याला कळू लागलेलं असतं.शार्क आसपास नाहीत असं पाहून थोड्या थोड्या दिवसांनी तो समुद्रात उतरायला सुरुवात करतो.त्या दोन-पाच मिनिटांच्या पोहण्यामुळे त्याला जो काही आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो. सुटकेची इच्छा कितीही तीव्र असली तरी या एकान्तातल्या आयुष्याचीही वेगळी मजा आहे असं अल्वरेंगाला जाणवतं.  आसपास कोणीही माणसं नाहीत,त्यामुळे नातेसंबंधांची कटकट नाही,चुका नाहीत की आपल्या हातून काही पाप घडेल याची भीती नाही.फक्त आपण आणि आपण..एकदा अल्वरेंगा आइसबॉक्समध्ये झोपला असताना अचानक त्याच्या बोटीला धक्के बसू लागतात.त्याचं मन उसळी खातं.बोट किनाऱ्याला लागली की काय ?पण उठून पाहतो तर एक देवमासा त्याच्या बोटीला खेटून चाललेला असतो.नेहमीच्या माशांपेक्षा तो किती तरी मोठा असला तरी ते एक पिल्लू असतं.हे धूड आपली बोट उलटवणार तर नाही ना अशी त्याला शंका येते. पण तो मासा फक्त बोटीच्या आसपास फिरत राहतो.


तो अल्वरेंगाला त्रासही देत नाही आणि तिथून निघूनही जात नाही.दिवसरात्र तो त्याच्या बोटीसोबतच पोहू लागतो.थोड्या दिवसांतच अल्वरेंगाला त्याची सोबत आवडू लागते.तो त्या व्हेलच्या बच्च्याशी गप्पा मारू लागतो.मनात साचलेल्या गोष्टी त्याला सांगू लागतो. जमिनीवरचे-समुद्रावरचे स्वतःचे अनुभव ऐकवू लागतो. त्याच्यामुळे अल्वरेंगाचं एकटेपणाचं दुःख किती तरी कमी होतं.अशी सोबत असेल तर आपण कितीही दिवस समुद्रात काढू शकतो असं अल्वरेंगाला वाटतं. पण हा पाहुणा एक दिवस आला तसा निघून जातो आणि अल्वरेंगा पुन्हा एकटा पडतो.

कुणाशी तरी बोलायला हवं,या ऊर्मीतून तो खाण्यासाठी पकडलेल्या एका पक्ष्याशीच गप्पा मारू लागतो.त्याला न मारता त्याला पाळीव पक्षी बनवतो.


एक वर्ष उलटतं.अल्वरेंगा अजूनही जिवंत असतो. समुद्रातल्या या पर्यावरणात रोज होणारे बदल बघत राहणं हेच आता आपलं कायमचं आयुष्य आहे की काय,असं त्याला वाटू लागलेलं असतं.काही दिवसांनी अचानक समुद्रातले मासे कमी होऊ लागतात,पक्षी कमी होतात.त्याच्याकडचा अन्नसाठा झपाट्याने संपत जातो. त्याने खाण्यासाठी मारून ठेवलेले सगळे पक्षी संपतात, तेव्हा तो नाइलाजाने आपल्या पाळीव पक्ष्याला, पांचोला मारून खाण्याची वेळ त्याच्यावर येते.थोड्या दिवसांनी पिण्याचं पाणीही संपतं.काही दिवस पुन्हा एकदा उपासमार सहन करण्याची वेळ अल्वरेंगावर येते. पण तेही दिवस कसेबसे जातात.त्यातही अल्वरेंगा तग धरून राहतो.पुन्हा पाऊस पडतो.पुन्हा मासे दिसू लागतात.आधीपेक्षा मोठ्या आकाराचे पक्षी अल्वरेंगाच्या बोटीवर येऊन विसावतात.हा बदल म्हणजे जमीन जवळ आल्याची खूण की समुद्रात आणखी आत शिरल्याची ? अल्वरेंगाला ते कळण्याचा काही मार्गच नसतो.एके दिवशी अल्वरेंगाला एक जहाज आपल्याच दिशेने येताना दिसतं.एवढंच नव्हे,तर डेकवरची माणसं आपल्याकडेच बघत असल्याचंही त्याच्या लक्षात येतं. 


तो आनंदाने वेडापिसा होतो.आता आपली सुटका होणारच,आता काही अडथळा येऊ शकत नाही,असं म्हणत तो त्या माणसांच्या दिशेने हात करतो.ती माणसंही त्याला हात करतात.आता कोणत्याही क्षणी जीवरक्षक बोटी पाण्यात उतरतील,या आशेने अल्वरेंगा वाट बघत असतो;पण घडतं भलतंच.ती माणसं तशीच 'अच्छा' करत असताना बोट त्याच्यापासून दूर निघून जाते.बहुतेक अल्वरेंगा मासेमारीसाठी समुद्रात आला असावा असं त्यांना वाटत असावं.अल्वरेंगाला ही निराशा सहन करणं अशक्य होतं.इतके दिवस आपण काय काय म्हणून सहन केलं नाही! दरवेळी निराशा गिळून आपण पुढच्या संधीची वाट पाहत राहिलो. आणि आता संधी इतक्या जवळ येऊनही आपल्याला हुलकावणी का देते आहे हे त्याला कळत नाही.या घटनेने अचानक अल्वरेंगाचा जगण्यातला रस संपून जातो.खाण-पिणं सोडून तो नुसता पडून राहू लागतो. आपण कोर्डोबाला जसं हळूहळू संपत जाताना पाहिलं तसंच स्वतःलाही पाहण्याची वेळ आपल्यावर येणार असं त्याला वाटू लागतं.प्रत्येकाच्या मरणाची सुरुवात वेगळी अनोखी असणार असं अल्वरेंगाला वाटत असतं.स्वतःच्या मरणाबद्दल त्याला उत्सुकताही असते.कोर्डोबाच्या मरणाची सुरुवात त्याच्या पोटापासून झालेली असते


अल्वरेंगाला जाणवतं,आपले गुडघ्यापासून खालचे पाय बधिर होत चालले आहेत.वरून पाऊस कोसळत असतानाही उठून आडोशाला बसण्याची इच्छाही अल्वरेंगाला होत नाही.पक्षी बोटीवर त्याच्या शेजारी येऊन बसतात,तरीही तो त्यांना पकडायला जात नाही की त्याच्या अंगावर बसून त्याला चोची मारणाऱ्या पक्ष्यांना हाकलत नाही.आपण एक मृतदेहच आहोत असं त्याला वाटू लागतं.पण आता त्याला जाणवतं की आपण मृत्यूसाठी तयार आहोत.या समुद्रात एक वर्ष आपण टिकून राहिलो हेही कमी नाही.आपलं हे कर्तृत्व कुणाला कळलं नाही तरी बेहत्तर,पण त्यामुळे आपण स्वतःवर जाम खूष आहोत.आता कधीही मेलो तरी सुखाने मरू,असं म्हणत तो जीवनेच्छा सोडून देतो..


.. पण नशिबात काही वेगळंच लिहिलेलं असतं.एके संध्याकाळी त्याला जागा येते तर दूरवर प्रकाशच प्रकाश दिसतो.ते जहाज नक्कीच नसतं.एवढे दिवे म्हणजे हे नक्कीच एखादं गाव असणार.हा भास नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी तो पुन्हा काही वेळाने त्या दिशेला पाहतो.अजूनही दिवे चकाकतच असतात.तो किनारा असतो हे नक्की.पण बोट किनाऱ्यापर्यंत नेणार कशी ? आता नशीबच आपली बोट तिकडे नेऊ शकतं.. त्यामुळे त्याचा विचार न करता अल्वरेंगा पडून राहतो. आणखी काही दिवस जातात.एके सकाळी अल्वरेंगा डोकं वर काढतो,तर समोर नारळाच्या झाडांनी व्यापलेलं बेट असतं.अल्वरेंगाच्या छातीचे ठोके वाढू लागतात. नदी असती तर वडी मारून पोहत जाता आला असत इतका किनारा जवळ असतो;पण अल्वरेंगाकडे तेवढी शक्ती नसते आणि शार्कच्या हल्ल्याची भीतीही. पण आता मात्र केवळ वाट बघत राहणं त्याला असह्य होतं. या अवस्थेवर मात करण्यासाठी तो बोटीवर आहे- नाही ते सगळं खायला सुरुवात करतो. पोट तुडुंब भरल्यावरही न थांबता खात राहतो. अखेर बोट इतकी जवळ येते की आता तो त्या पाण्यात उभाही राहू शकत असतो.बोटीतून बाहेर पडून अल्वरेंगा चालत किनाऱ्यापर्यंत येतो.आपण चालू शकतो हेही त्याला विसरायला झालेलं असतं.आता आयुष्य म्हणजे बोटीच्या पंचवीस फुटांतली धडपड न राहता आपण मुक्त झालो आहोत, या आनंदाने तो तिथेच कोसळतो. त्याला जाग येते तेव्हा दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते.या बेटावर माणसं राहतात की ते निर्मनुष्य आहे की इथे नरभक्षक आदिमानव राहतात याची अल्वरेंगाला कल्पना नसते.पण इथे कुणीही राहत नसलं तरीही मी आनंदाने इथे जगेन,असा विचार त्याच्या मनात येतो.पण तशी वेळ येत नाही.थोड्याच वेळात बेटावर राहणाऱ्या एका आदिवासी कुटुंबाला तो सापडतो.तारीख असते ३० जानेवारी २०१४.एल सॅल्वडोरपासून तब्बल १०,००० किलोमीटर भरकटत अखेर ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला असलेल्या मार्शल आयलंड्स बेटसमूहामधल्या एका छोट्या बेटावर अल्वरेंगा येऊन पोहोचलेला असतो.तग धरून राहण्यासाठी समोर येणाऱ्या संकटांशी अन् बदलांशी जुळवून घेण्याची माणसाची शक्ती किती कमालीची असते हे दाखवून देणाऱ्या अल्वरेंगाचं नाव इतिहासात कायमचं नोंदवलं गेलेलं असतं.






१३/१२/२५

समुद्राच्या लाटांवर एक वर्ष / A year on the waves of the sea

अल्वरेंगा मात्र अजून हिंमत हरलेला नसतो. लवकरच एखादं बचाव दल आपली सुटका करेल किंवा एखादं मोठं जहाज आपल्याला पाहील.मागील लेखापासून पुढे…


अशी त्याला आशा असते.अखेर आठवड्याभराने वादळ शांत होतं.त्यानंतर दोन टोकांच्या भावना अल्वरेंगा आणि कोर्डोबाला व्यापून असतात. एकीकडे वादळापासून सुटका झाल्याचा आनंद आणि दुसरीकडे अथांग समुद्रात एकटेच अडकून पडल्याची भीती.आता जे समोर येईल त्याला धीराने तोंड देणं एवढंच हातात असतं.जवळून एखादं मोठं जहाज गेलं तर त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी काय करायचं याचा अल्वरेंगा विचार करून ठेवतो.दिवसभरात एखादं तरी जहाज जवळून जाईल अशी त्याला खात्री असते.दोन दिवस वाट पाहिल्यावर आणि अनेकदा चुकीचे इशारे मिळून निराशा झाल्यावर अखेर लांबवर एक जहाज त्यांच्या नजरेच्या टप्प्यात येतं,पण दुर्दैवाने ते बोटीच्या दिशेने येत नसतं.

कितीही प्रयत्न करूनही त्या जहाजावरच्या लोकांचं लक्ष वेधून घेणं या दोघांना शक्य होत नाही.पहिल्यांदाच अल्वरेंगाच्या पोटात भीतीने गोळा येतो.आता पुढे काय ? जीपीएस-रेडिओ-मोटार आणि खाण्या-पिण्याचा साठा यातलं काहीच साथीला नसताना समुद्राच्या मध्यात भिरकावलं जाण्याचा अर्थ काय हे त्याला चांगलं माहिती असतं.बोट उलटी होण्याचा अवकाश,शार्क्सच्या झुंडी एका क्षणात आपला चट्टामट्टा करून टाकतील याची त्याला खात्री असते.आणि बोटीत असूनही उपयोग काय ?


वादळ थांबल्यावर दुसरे धोके समोर उभे ठाकतात. उन्हाचा जबर तडाखा या दोघांना भाजून काढायला सुरुवात करतो.त्यापासून वाचण्यासाठी शक्य तितका वेळ आइसबॉक्समध्ये घालवायचा असं हे दोघं ठरवतात.पाण्याने वेढलेल्या बोटीमध्ये पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही शिल्लक नसतो. दोघांच्याही घशाला शोष पडलेला असतो.आवंढा गिळणंही अशक्य झालेलं असतं.पण तरीही अल्वरेंगा कोर्डोबाची समजूत काढतो,की थोडा धीर धर.लवकरच पाऊस पडेल आणि आपली तहान भागेल.तोपर्यंत अल्वरेंगा मासे पकडण्याच्या प्रयत्नाला लागतो.समुद्रात टाकून द्याव्या लागलेल्या प्रचंड मासळीच्या विचाराने त्याचा जीव हळहळतो. खायला मिळालं नाही तर शरीर चरबी जाळायला सुरुवात करतं आणि तग धरून राहतं असा अल्वरेंगाचा आजवरचा अनुभव असतो,पण त्यासाठी शरीराला पुरेसं पाणी मिळण्याची गरज असते.पाऊस त्यांना सतत हुलकावणी देत असतो. अनेकदा आकाशात ढग जमा होतात,अंधारून येतं; पण पाऊस पडत नाही.तहान-भूक दोघांनाही असह्य होते.कोर्डोबा निपचित पडून राहतो,तर अल्वरेंगा स्वतःची नखं कुरतडत नखाचा कणन् कण पोटात ढकलतो.एकदा नखं कुरतडताना त्याच्या मनात येतं,

स्वतःचंच बोट कापून खाल्लं तर? नाही तरी करंगळीचा उपयोग काय असतो ? भुकेने त्याच्या मनाचा ताबा घेतलेला असतो;पण सुदैवाने वेळीच तो भानावर येतो.करंगळी कापून पोट तर भरणार नाहीच,उलट रक्तस्रावाने आपण मरून जाऊ,हे त्याच्या लक्षात येतं.पण हा विचार डोक्यात आल्यामुळे त्याला पुढच्या धोक्यांची जाणीव होते.आपलं मन स्थिर ठेवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे हे त्याला जाणवतं.


अल्वरेंगा हातावर हात धरून बसून राहणारा माणूस नसतो.थोड्याच वेळात त्याला मासे पकडण्याची एक युक्ती सापडते.बोटीच्या जवळून सतत शार्क फिरत असतात.

त्यामुळे समुद्रात उतरणं तर लांबच, हातही जास्त काळ समुद्रात ठेवणं शक्य नसतं.पण अल्वरेंगा बोटीला चिकटून बोटीचं एखादं उपकरण असल्यासारखाच हात स्थिर ठेवून थांबून राहतो. त्याच्या हाताला घासून मासे पोहत असतात. आपल्या मुठीच्या टप्प्यात आले की मूठ बंद करायची आणि मासे पकडायचे,अशी पद्धत तो शोधून काढतो.मासे मिळू लागतात.जवळ आग पेटवायला काहीही साधन नसल्यामुळे दोघंही कच्चे मासे खाऊ लागतात.अजूनही पावसाचा पत्ता नसतो.त्यामुळे शेवटी अल्वरेंगा स्वतःची लघवी प्यायला सुरुवात करतो.कोर्डोबालाही तो त्यासाठी राजी करतो.

हळूहळू दोघांचं एक रूटिन बसतं. सकाळी लवकर मासे पकडायचे,दिवसभर उन्हापासून वाचण्यासाठी आइसबॉक्समध्ये बसून राहायचं आणि संध्याकाळी पुन्हा बॉक्सबाहेर पडून मासे पकडायचे.बोटीच्या आसपास अनेकदा कचरा टाकलेली प्लास्टिकची पुडकीही वाहत येत असतात.कधी कधी त्यात खाण्याचे उरलेसुरले पदार्थ असतात,तर कधी सॉफ्टड्रिंकच्या संपलेल्या बाटल्या.अशा बाटल्यांमध्ये उरलेला सॉफ्टड्रिंकचा एखादा थेंब जिभेवर टाकणं हेही दोघांसाठी स्वर्गसुख ठरतं.दहा दिवस उलटून जातात तरीही पाऊस येत नाही.पाण्याच्या कमतरतेमुळे दोघंही कासावीस झालेले असतात. 


डीहायड्रेशनचे भलभलते परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ लागतात.श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. घशाला जखमा होतात.अल्वरेंगाला त्यावर एक उपाय सापडतो.समुद्राच्या या भागात प्रचंड कासवं असतात.मध्य अमेरिकेत सगळीकडे कासवाचं मांस आवडीने खाल्लं जातं.पण,अल्वरेंगा विचार करतो, की कासवाचं रक्त पिऊन तहान भागवली तर ? थोडा वेळ प्रयत्न केल्यावर एक कासव त्याच्या हाताला लागतं.

त्याच्या मासांचे तुकडे वाळवत टाकून अल्वरेंगा खरोखरच त्याचं रक्त पितो. कोर्डोबाला ते दृश्य बघूनही चांगलाच धक्का बसतो. रक्त पिणं म्हणजे पाप,असं त्याला वाटत असतं. 


अल्वरेंगाने परिस्थितीचं गांभीर्य समजावूनही तो काही केल्या रक्त प्यायला तयार होत नाही. अल्वरेंगाच्या आग्रहावरून तो कसाबसा मांस खाऊ लागतो,पण पाणी न प्यायल्यामुळे त्याची तब्येत खालावत जाते ती जातेच.


.. आणि अखेर पंधरा दिवसांनी अचानक पाऊस कोसळतो.दोघंही आनंदाने नाचू लागतात. बोटीवरच्या सगळ्या बाटल्या कॅन-भांडी ते पाण्याने भरून ठेवतात.

पावसाचं पाणी थेट तोंडात घेऊन मनसोक्त तहान भागवल्यावर मात्र अल्वरेंगा एक नियम तयार करतो-पाऊस थांबल्यावर दिवसातून फक्त तीन कप पाणी प्यायचं.पाऊस पुन्हा कधी पडेल याची शाश्वती नसल्यामुळे काटसकर करणं आवश्यक असतं.एक महिना उलटायला येतो. समुद्रावर एकट्याने काढलेला एवढा काळ कोणत्याही माणसाला वेड लावायला पुरेसा असतो. कोर्डोबालाही सतत नैराश्याचे झटके येत असतात. कधी तो घरच्या आठवणींनी व्याकूळ होत असतो, तर कधी ही असहाय अवस्था सहन न होऊन बोटीतून उडी मारण्याची इच्छा त्याच्यात उचंबळून येत असते.आपल्या तरुण सोबत्याची मनःस्थिती सांभाळणं हेही अल्वरेंगासाठी एक मुख्य काम होऊन बसतं.त्यासाठी तो अनेक क्लृप्त्या शोधून काढतो.कधी कधी कोर्डोबा पडल्या पडल्या ओरडतो,"मला संत्री खावीशी वाटताहेत." अल्वरेंगा म्हणतो,"मी दुकानात चाललोच आहे. येताना घेऊन येतो.

"तेव्हापासून दुकानातल्या अशा फेऱ्या रोजच्याच होऊन जातात.त्यांच्या काल्पनिक विश्वात हळूहळू दुकानंच नव्हे,तर इतरही अनेक गोष्टी दाखल होतात.प्रत्यक्ष आयुष्यात त्यांच्याकडे जे नसतं ते या जगात अवतरतं.लवकरच अल्वरेंगाच्या लक्षात येतं,की कोर्डोबाच्याच नव्हे,तर आपल्याही मानसिक स्वास्थ्यासाठी ते गरजेचं आहे.अर्थात काल्पनिक जगात वावरताना अल्वरेंगाला वास्तवाचा विसर पडत नाही. आपल्याकडे भरपूर खाणं असायला पाहिजे,या इच्छेने तो झपाटलेला असतो.त्यातूनच त्याला आणखी एका खाद्याचा शोध लागतो.त्यांच्या बोटीवरून अनेक पक्षी उडत असतात.बोटीवरचं उघडं पाणी या पक्ष्यांच्या विष्ठेने खराब होऊ नये म्हणून त्यांना हाकलत राहणं हे अल्वरेंगाचं एक कामच असतं.पण,एकदा एक पक्षी बोटीच्या काठावर येऊन बसतो तेव्हा त्याला सुचतं,की या पक्ष्यांना पकडण्याचा प्रयत्न का करू नये? बरेच टक्केटोणपे खाल्ल्यावर अखेर एक पक्षी अल्वरेंगाच्या हाताला लागतो.लवकरच तो पक्षी पकडण्यातच नव्हे,तर आइसबॉक्समध्ये बसल्या बसल्या केवळ आवाजावरून पक्षी कोणता आहे, तो केवढा आहे हे ओळखण्यात तो तरबेज होऊन जातो.दिवस उलटत असतात.बोटीवर ना घड्याळ असतं ना फोन,नेमके किती दिवस उलटले हे अल्वरेंगा चंद्राच्या कलेवरून मोजत असतो.त्या दिवशी त्याच्या हिशोबानुसार ख्रिसमसच्या आदली संध्याकाळ असते.त्यानिमित्त दोघंही एक वेगळा पक्षी मारून खास जेवण करत असतात.पण जेवता जेवता अचानक कोडोंबा कळवळतो.त्याच्या पोटातून कळ येते.

तोंडातून फेस यायला लागतो. पोट बिघडतं.ते कोडोंबा खात असलेल्या पक्ष्याची आतडी तपासतात,तर त्यात त्यांना एक साप सापडतो.कोर्डोबा मनाने घेतो, की 'सापाचं विष माझ्या शरीरात पसरायला सुरुवात झाली असणार. आता मी मरणार.'अल्वरेंगाही थोडा घाबरतोच; पण नशिबाने तसं काही घडत नाही.दोन दिवस उलट्या-जुलाब झाल्यावर कोडोंबाच्या तब्येतीला आराम पडतो,पण त्यानंतर पक्ष्यांचं मांस खायचं कोर्डोबा साफ नाकारतो.दीड महिना उलटतो.पुन्हा एकदा त्यांची बोट एका छोट्या वादळात सापडते, पण वादळासोबतच पाऊसही आल्याने दोघांना तक्रार करायला जागा नसते.बोटीवरचा कमी झालेला पाणीसाठा पुन्हा भरून निघतो.पाणी प्यायल्यामुळे डीहायड्रेशन कमी झालं की त्या दोघांचं बोलणंही वाढत असतं.या गप्पांमध्ये जशा काल्पनिक विश्वातल्या सफरी असतात तशाच गतायुष्यातल्या चुकांची उपरतीही असते.गेली सात-आठ वर्षं घरापासून लांब असलेल्या अल्वरेंगाच्या मनात आई-वडिलांना अंतर दिल्याचा, मुलीला सोडून आल्याचा अपराध भाव असतो. एरवी देवाबिवाला फारसा न मानणारा अल्वरेंगा कोर्डोबामुळे किमान प्रार्थना म्हणताना डोळे मिटू लागलेला असतो;पण तरीही कोर्डोबाचा मुख्य भर जसा प्रार्थनेवर असतो, तसा अल्वरेंगाचा भर स्वतःच्या सकारात्मकतेवर आणि यातून बाहेर पडण्याचे किंवा आहे तो काळ अधिक सुकर करण्याचे उपाय शोधण्यावर असतो.जशी परिस्थिती बदलेल तसा तो त्यात स्वतःला जुळवून घेत असतो.कोर्डोबा मात्र पुढे पुढे खचतच जातो.पक्षी खाणं त्याने सोडलेलंच असतं,पण हळूहळू मासे खाणंही तो कमी करून टाकतो.एके दिवशी अचानक तो अल्वरेंगाला विचारतो,"मी मेल्यावर तू मला खाशील का?"अल्वरेंगा त्याची चेष्टा करतो, "तुझ्या अंगात आता मांस कुठे राहिलंय ? तुला खाऊन मला काय मिळणार?" अल्वरेंगा त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो,की खात राहिलास तर तू मरणार नाहीस;पण त्याला ते पटत नाही.एकदा कोडोंबाच्या मनात येतं,


राहिलेला भाग शेवटच्या तिसऱ्या भागामध्ये..


११/१२/२५

समुद्राच्या लाटांवर एक वर्ष / A year on the waves of the sea


जोस सॅल्वडोर अल्वरेंगा


एक होडी,खाली समुद्र आणि वर आकाश एवढ्यावर खोल समुद्रात फेकला गेलेला माणूस एकट्याने किती काळ तग धरू शकतो? माणसाची सहनशक्ती किती कमालीची असते याचं आश्चर्यकारक दर्शन घडवणारी मध्य अमेरिकेतल्या जोस सॅल्वडोर अल्वरेंगा या मच्छीमाराची ही कहाणी.


▶ ही गोष्ट आहे २०१२ सालची.मेक्सिकोतल्या कोस्टा अझूल नावाच्या छोट्या गावातल्या मच्छीमार वस्तीतली.जोस सॅल्वडोर अल्वरेंगा हा मूळचा मेक्सिकोच्या शेजारी असलेल्या मध्य अमेरिकेतल्याच एल सॅल्वडोर देशातला मच्छीमार. त्याच्या गावातल्या रोजच्या भांडणांना आणि मारामारीला वैतागून तो मेक्सिकोतल्या कोस्टा अझूलमध्ये स्थिरावलेला असतो.आई-वडील, प्रेयसी आणि तिच्यापासून झालेली मुलगी या सगळ्यांना मागे ठेवून.खरं तर एल सॅल्वडोरसारख्या देशातून बाहेर पडणारी माणसं सहसा अशा गरीबड्या गावांमध्ये थांबत नाहीत.ती मेक्सिको पार करून अमेरिकेत जाण्याच्या मागे असतात.पण अल्वरेंगाचं प्रकरण वेगळं असतं.त्याला मुख्य गावापेक्षा मच्छीमार वस्तीशी जास्त देणं-घेणं असतं आणिजमिनीवरच्या व्यवहारांपेक्षा प्रशांत महासागराची ओढ अधिक असते.


वयाच्या दहाव्या वर्षीपासून अल्वरेंगा मासेमारीचंच काम करत आलेला असतो.त्याच्याइतका तरबेज मच्छीमार त्या वस्तीत दुसरा नसतो.मनमोकळा स्वभाव,सर्वांना मदत करण्याची तयारी आणि मच्छीमारीतलं कसब यामुळे तो लवकरच कोस्टा अझूलच्या मच्छीमार वस्तीत लोकप्रिय होतो.त्याला आपल्या बोटीवर ओढण्यासाठी मालकांची चढाओढ सुरू असते;पण अल्वरेंगाला ना पैशांचा मोह असतो ना कसली महत्त्वाकांक्षा. मासेमारीसाठी समुद्रात झोकून देणं आणि परतल्यावर मित्रांसोबत खाणं-पिणं,मौज करणं एवढंच त्याचं आयुष्य असतं.साऱ्या वस्तीप्रमाणेच आपल्या बोटमालकांचाही तो मित्र होऊन जातो.


१७ नोव्हेंबर २०१२.वस्तीत कुठल्याशा पार्टीची तयारी सुरू असते.वादळवाऱ्याचे दिवस असतात,त्यामुळे बहुतेक मच्छीमार समुद्र शांत व्हायची वाट पाहत किनाऱ्यावर पार्टीच्या प्लॅनिंगमध्ये मश्गुल असतात. अल्वरेंगा मात्र अशा छोट्या-मोठ्या वादळांना घाबरून जमिनीवर थांबणारा नसतो.बोटीवरचा त्याचा नेहमीचा पार्टनर या वेळी काही कामामुळे त्याच्यासोबत येणार नसतो;पण त्यामुळे जाणं रद्द न करता तो नवा पार्टनर शोधतो,बोटीचं हवं-नको बघतो आणि पंचवीस फुटी मोटारबोट पाण्यात घालतो.त्याचा हा नवा पार्टनर कोडोंबा नावाचा नवखा तरुण मुलगा असतो.त्याला ना मच्छीमारीचा फारसा अनुभव असतो ना समुद्रात झोकून देण्याचा पिंड.पण एक दिवसाचा तर प्रश्न,असं म्हणून अल्वरेंगा त्याला सोबत नेतो.वादळ सुरूच असतं; पण अल्वरेंगाला त्याची सवय असते.त्यांची बोट आत नेहमीच्या ठिकाणी पोहोचल्यावर दोघंही प्रचंड जाळं समुद्रात टाकायला सुरुवात करतात.


रात्री आठच्या सुमारास जाळं टाकून होतं.आता निवांतपणे बिडी ओढत मासे जाळ्यात अडकण्याची वाट बघत थांबून राहायचं एवढंच काम.रात्रभर मासळी पकडायची आणि सकाळी पुन्हा किनाऱ्याच्या दिशेने मोहरा वळवायचा,हा त्याचा नेहमीचा दिनक्रम.छोट्या-मोठ्या वादळांनी आजवर हा नेम कधीही चुकलेला नसतो.पण जसजशी रात्र वाढत जाते तसा वादळाचा जोर वाढतो.हे वादळ नेहमीपेक्षा ताकदीचं आहे हे अल्वरेंगाच्या लक्षात येतं.थोडा वेळ वाट पाहिल्यावर तो जाळं काढून परतण्याचा निर्णय घेतो.तो आणि कोर्डोबा जाळं ओढू लागतात.निम्मं जाळं हातात येतं तेव्हाच त्यांच्या लक्षात येतं,की या वेळी आपल्याला जबरदस्त मासळी हाती गावली आहे.तोवर अर्धा टन मासे त्यांनी बोटीच्या आइसबॉक्समध्ये रिकामे केलेले असतात.आता वादळाचा तडाखा आणखी वाढतो.मुसळधार पाऊस कोसळू लागतो.बोटीत पाणी साठू लागतं. बोट प्रचंड हेलकावे खाऊ लागते.ती उलटू नये यासाठी अल्वरेंगाला आपलं सगळं कसब अन् ताकद पणाला लावावी लागते.नवखा कोर्डोबा तर कमालीचा घाबरून जातो.अल्वरेंगा त्याला पाणी बाहेर काढण्याच्या कामाला लावतो;पण कितीही पाणी उपसलं तरी बोट पाण्याने भरतच चाललेली असते.बोट स्थिर ठेवणं,जाळं आत ओढणं आणि पाणी बाहेर टाकणं,सगळं एकाच वेळी करणं अशक्य असतं.त्यामुळे अल्वरेंगा तातडीने एक टोकाचा निर्णय घेतो- जाळं कापून टाकायचं आणि बोट माघारी वळवायची.कुठल्याही मच्छीमारासाठी जाळं कापण्याचा निर्णय अगदी शेवटचा असतो. तशीच वेळ आल्याशिवाय हजारो डॉलर्स किमतीचं आणि ज्यावर आपलं पोट अवलंबून आहे ते जाळं कापण्याचा निर्णय कुणी घेत नाही.अल्वरेंगा तर नाहीच नाही.पण त्याच्या मते आता ती वेळ आलेली असते.तो फार विचार न करता जाळं कापून टाकतो आणि कंपासच्या साह्याने पूर्वेकडची किनाऱ्याची दिशा पकडतो.हे थोडं अघटित घडलं खरं,पण आता लवकरच या वादळातून सहीसलामत बाहेर पडून मित्रांसोबत चिकन तंगडी हाणत असू,असा विचार करून अल्वरेंगा बोट हाकण्यावर लक्ष केंद्रित करतो.


नोव्हेंबरमध्ये तसाही समुद्र रासवट असतो;पण आजचं प्रकरण साधंसुधं नाही हे तोवर त्यांच्या लक्षात आलेलं असतं.तब्बल दहा-दहा फुटी लाटा एखाद्या सर्किंग बोर्डप्रमाणे त्यांची बोट वर उचलून पुन्हा खाली टाकत असतात.

अल्वरेंगाच्या जागी आणखी कोणी असतं तर बोट दहा मिनिटांत उलटली असती हे नक्की.बोटीच्या हेलकाव्यांमुळे कोर्डोबाला एका जागी स्थिर राहता येत नसतं. त्यामुळे पोटात ढवळून तो सतत ओकत असतो, रडत असतो आणि जमेल तसं बोटीतलं पाणी बाहेर काढत असतो.मात्र,अल्वरेंगा म्हणजे समुद्रावरच वाढलेला जीव असल्यामुळे तो त्या वादळाचा स्वभाव समजून घेत त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. 'प्रत्येक वादळाचा एक पॅटर्न असतो. जणू मोर्स कोडच. तो समजून घेतला की वादळातून तरून जाता येतं', अशी अल्वरेंगाची अनुभवातून आलेली थिअरी असते. ती त्याला इथेही उपयोगी पडते.


पहाट होते.अल्वरेंगाचा कंपास सांगत असतो की ते योग्य दिशेने चालले आहेत.सगळं काही सुरळीत झालं तर पाच-सहा तासांत किनाऱ्याला पोहोचू असा त्याचा अंदाज असतो... आणि नेमकी तेव्हाच बोटीची मोटार आचके द्यायला सुरुवात करते. सुरुवातीला विचित्र घरघर ऐकू येते आणि थोड्याच वेळात मोटार बंदच पडते.आता मात्र अल्वरेंगालाही धोक्याची जाणीव होते.किनारा जवळ असला तरी एवढ्या वादळात,मोटार बंद पडलेल्या अवस्थेत आणि हातात कोणतंही वल्हं नसताना किनाऱ्यापर्यंत पोहोचणार कसं?बोट वारं नेईल त्या दिशेने भरकटत जाण्याला पर्यायच नाही.अल्वरेंगा तातडीने रेडिओ उचलतो आणि किनाऱ्यावर बोटीच्या मालकाला संदेश पाठवतो:"विली,आमची मोटार बंद पडली आहे.आम्ही किनाऱ्यापासून फार लांब नाही,पण वादळ खूप जोरात आहे."नशिबाने बोटीचा मालक विली रेडिओजवळच बसलेला असतो.तो लगेचच उत्तर देतो,"तुझं नक्की ठिकाण सांग,लगेच मदत घेऊन येतो." पण अल्वरेंगाचा जीपीएस बंद पडलेला असतो.तो विलीला ते सांगतो,"आमची पुरती वाट लागली आहे.लवकर या,नाही तर.." किनाऱ्यावरच्या लोकांनी ऐकलेले अल्वरेंगाचे हे शेवटचे शब्द ठरतात.


अल्वरेंगाला भीती असते त्यानुसारच वादळी वाऱ्यांमुळे बोट किनाऱ्यापासून दूर भिरकावली जात असते.मोटार बंद असताना बोटीचा तोल सावरण्यासाठीही त्याला जिवाचं रान करावं लागत असतं.पण आता आपले साथीदार थोड्याच वेळात आपली सुटका करणार याची खात्री दोघांनाही असते,पण तोवर तरी बोट तग धरेल का याची अल्वरेंगाला भीती वाटू लागते.शेवटी तो आणखी एक कठोर निर्णय घेतो - बोटीतली सगळी मासळी समुद्रात फेकून देण्याचा.ते केल्यावर तरी बोट थोडी स्थिर आणि पाण्याच्या वर राहील असा त्याचा अंदाज असतो.जास्त विचार न करता दोघं मिळून मासळी बाहेर फेकायला सुरुवात करतात.एवढे प्रचंड मासे फेकून द्यायलाही त्यांना तास लागतो. त्याच्या अंदाजानुसार बोटीचे हेलकावे काहीसे कमी होतात;पण तेवढ्यात त्यांना दुसरा धक्का बसतो. बोटीतला रेडिओही बंद पडतो.बचाव दलाशी संपर्क साधण्याचा मार्ग पूर्ण बंद होतो आणि वादळ तर बोटीला झपाट्याने आत समुद्रात ओढत असतं. इतका वेळ कोर्डोबाला समजावणाऱ्या अल्वरेंगालाही रडू फुटावं अशी परिस्थिती आता आलेली असते.


इकडे अल्वरेंगाच्या बोटीचा मालक विली आणि इतर काही मित्रमंडळी तातडीने बोटी समुद्रात घालतात;पण बराच वेळ शोध घेऊनही त्यांना अल्वरेंगाचा पत्ता लागत नाही.वादळाचं अक्राळविक्राळ रूप पाहता जास्त आत बोटी घालणंही शक्य नसतं.सलग दोन दिवस शक्य तितका सगळा परिसर हे लोक धुंडाळतात,सरकारी मदतीने विमानाने पाहणी केली जाते;पण अल्वरेंगाची बोट गायब असते.एरवी कोणत्याही मच्छीमार बोटीसाठी दोन दिवस शोधाशोध करण्याची पद्धत असते,तरीही माणूस सापडला नाही तर तो मेला असं गृहीत धरलं जात असतं; पण अल्वरेंगाच्या बाबतीत मात्र अपवाद घडतो. त्याच्यासारख्या कसबी नाविकाची बोट उलटेल यावर कुणाचाच विश्वास बसत नाही. साऱ्यांचं अल्वरेंगावरचं प्रेमही कदाचित त्याला कारणीभूत असतं. त्यामुळे वादळ थंडावल्यावर थोड्या दिवसांनी पुन्हा शोधमोहिमा काढल्या जातात; पण व्यर्थ ! समुद्राने जणू अल्वरेंगा आणि कोर्डोबाला गिळून टाकलेलं असतं. अखेर नाइलाजाने शोध थांबवला जातो.अल्वरेंगाच्या मित्रांच्या मनात मात्र कुठे तरी आशा असते,की तो इतक्या सहजासहजी हार मानणं शक्य नाही.तो नक्कीच जिवंत असणार.


.. त्यांचा विश्वास अनाठायी नसतो.सहा दिवस उलटून गेलेले असतात,पण अल्वरेंगा आणि कोर्डोबा दोघंही जिवंत असतात.एवढ्या वादळात, मुसळधार पावसात आणि कडाक्याच्या थंडीत हे दोघं कसा टिकाव धरू शकतात हे एक आश्चर्यच. मासळी बाहेर फेकल्यावर रिकाम्या झालेल्या आइसबॉक्समध्ये शरीराची मुटकुळी करून एकमेकांना चिकटून ते दोघं पडून राहिलेले असतात.बोटीतलं पाणी उपसून उपसून कोर्डोबा अर्धमेला झालेला असतो.त्याचं मनोधैर्य तर पार रसातळाला गेलेलं असतं.'आता आपण नक्कीच मरणार.आपल्या नशिबात अतिशय वेदनादायी मृत्यू लिहिलेला आहे',असा जप कोडोंबा सतत करत असतो. ल्वरेंगा मात्र अजून हिंमत हरलेला नसतो. लवकरच एखादं बचाव दल आपली सुटका करेल किंवा एखादं मोठं जहाज आपल्याला पाहील. 


(मृत्यू पाहिलेली माणसं,मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या,गौरी कानेटकर,समकालीन प्रकाशन)


 नोंद - सदरचा हा लेख सलग तीन भागात प्रकाशित केला जाईल,त्यातील हा पहिला भाग.





९/१२/२५

यूरोप व आशिया यांमधील दवा : मार्को पोलो / Medicine in Europe and Asia:Marco Polo

डान्टेचा मृत्यू आपणास चौदाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात आणून सोडतो.तेराशे वर्षे चाललेले युरोपातील राष्ट्रांचे सुसंस्कृत होण्याचे दुबळे प्रयत्न आपण पाहत आलो.ते प्रयत्न पाहून कीव येते.शहरे उभारीत आहेत व धुळीस मिळवीत आहेत;चित्रे रंगवीत आहेत,तलवारी परजीत आहेत,संगमरवरी पुतळे खोदीत -आहेत; माणसांच्या कत्तली करीत आहेत;मंदिरे बांधीत आहेत, काव्ये व गीते रचीत आहेत;आपल्या बांधवांना ठार मारीत आहेत,असे प्रकार आपणास या शतकात दिसतात.गॅलिलीच्या ज्यू ख्रिस्ताचा तो शांत व सुंदर धर्म त्यांनीपण मानवांचा छळ करण्याचे साधन म्हणून तो वापरला.मानवप्राणी पशुकोटीतून मानवकोटीत यायला एक कोटी वर्षे लागली.पण चौदाव्या शतकाच्या आरंभास हा मानव कसा दिसतो ? अद्यापि त्याच्यामध्ये नव्वद टक्के पशुता,तर केवळ दहाच टक्के मानवता दिसून येते.आपण थोडा वेळ ग्रोपातील श्वेतवर्णीयांना सोडून जरा दूर आशियातील पीतवर्णीयांकडे जाऊ या व खिस्ताच्या आगमनापासून तो डान्टेच्या निधनापर्यंतच्या चौदा शतकांचा या पीतवर्णीयांनी कसा उपयोग केला ते पाहू.!


तिकडे युरोप सरंजामशाहीच्या रानटीपणात बुडत असता,

अधःपतित होत असता,इकडे चीन सुधारणेच्या व संस्कृतीच्या शिखरावर चढत होते.युरोपला रानटी टोळ्यांच्या स्वाऱ्यांपासून त्रास झाला,तसा चीनलाही झाला. पण युरोपप्रमाणे चीन कोलमडले नाही. चीनमध्ये सरंजामशाही जवळजवळ नव्हतीच. युरोपातील श्वेतवर्णीय लोकांत जसे परस्पर लढणारे शेकडो पंथ व भेद निर्माण झाले,तसे चीनमध्ये झाले नाही.युरोपातील संपत्ती,संस्कृती ज्ञान व सौंदर्य मध्ययुगातील युद्धांनी धुळीत जात असता इकडे चीनमधील संपत्ती,संस्कृती व सौंदर्य ही अविरत झगड्यांमुळे नष्ट झाली नाहीत;जिवंत राहिली. 


ग्रीक संस्कृती व रोमन संस्कृती जवळजवळ हजार वर्षांत जणू नष्ट होऊन गेल्या;पण चिनी संस्कृती मात्र कधीच मेली नाही,एक दिवसही दृष्टिआड झाली नाही. दुसऱ्या शतकापासून चौथ्या शतकापर्यंत चिनी चित्रकारांनी जगातील अत्यंत रमणीय अशी निसर्गाची चित्रे रंगविली आहेत.त्या तीन शतकांतील अपूर्व व अप्रतिम अशी चिनी चित्रे,सुंदर काव्ये व भव्य शिल्पे यांना जगात तुलना नाही.आजही अमर सौंदर्याचे नमुने म्हणून त्यांच्याकडे बोट दाखविता येईल.सहाव्या शतकात चिनी लोकांनी लाकडी ठसे निर्मून छापण्याची कला शोधून काढली.त्या काळात चिनी लोक गॅस व दगडी कोळसे वापरीत असे आढळते;पण युरोपातील लोक मात्र या गोष्टी वापरण्यास कित्येक शतकांनंतर शिकले.सहाव्या शतकातच चिनी लोकांस बंदुकीची दारू माहीत होती.पण शांतताप्रिय चिनी लोकांनी या शोधाचा उपयोग स्वार्थासाठी मात्र कधीही करून घेतला नाही.सातवे शतक म्हणजे चिनी संस्कृतीचे सुवर्णयुग, कला,बुद्धी,नीती,सर्वच बाबतीत कन्फ्यूशियसचे वारसदार साऱ्या जगाच्या कितीतरी पुढे होते.


 इ.स.६२८ मध्ये मुसलमानी धर्मप्रचारक चीनमध्ये आले.त्यानंतर सातच वर्षांनी ख्रिश्चन मिशनरीही आले. त्या वेळेस टाई-त्संग हा चीनचा सम्राट होता.या सम्राटाने आपला कन्फ्यूशियसचा धर्म त्यांच्यापुढे मांडून तीन धर्माचा तिरंगी झगडा माजविण्याऐवजी परधर्मीयांना मोठ्या सन्मानाने दरबारात आणवून न्यू टेस्टामेंट व कुराण यांची चिनी भाषेत भाषांतरे करवून घेतली आणि नंतर त्या धर्मग्रंथात काय आहे,ते स्वतः पाहिले व परीक्षिले,कन्फ्यूशियसने कित्येक शतकांपूर्वी सांगितले होते तेच त्याही धर्मात आहे,असे त्याला आढळले.कन्फ्यूशियसचा धर्म सोडून ख्रिस्त किंवा महंमद यांचा धर्म स्वीकारावा असेही त्याला वाटले नाही,किंवा स्वतःचा धर्म या दोन्ही धर्मांहून श्रेष्ठ आहे हे दाखविण्यासाठी तिकडे ख्रिश्चन व मुसलमान यांना वाटत होती,तशी युद्धे करण्याचीही जरुरी त्याला वाटली नाही.ईश्वराकडे जाण्याचे नाना मार्ग असू शकतील आणि कोणताही मार्ग पत्करला तरी तो देवाकडे नेणारा असेल,तर ठीकच आहे असे टाई-त्सुंग याला वाटले. म्हणून त्याने मुसलमानांना मशिदी बांधण्यास, ख्रिश्चनांना चर्चेस बांधण्यास व दोघांनाही चिनी लोकांत धर्मप्रचार करण्यासही खुशाल परवानगी दिली ! केवळ धर्मवेडेपणाने त्यांनी रक्तपात मात्र करू नये,एवढाच त्याचा कटाक्ष होता.


चिनी संस्कृतीचे विहंगमावलोकन करताना टाईत्संगची सहिष्णुता ख्रिश्चन सम्राट शार्लमन याच्या असहिष्णुतेशी तोलून पाहावी,असे मनात येते.शार्लमन एका दिवसात साडेचार हजार सॅक्सनांना ते ख्रिस्ती होईनात,म्हणून ठार करतो! क्षणभर थांबून या दोन गोष्टींची तुलना करावी असे वाटते,नाही ?


मध्ययुगात चीन संस्कृतीच्या शिखरावर होते.तेराव्या शतकात त्यांची थोडा वेळ जराशी पिछेहाट झाली खरी; पण तीही क्षणभरच.या सुमारास मध्य आशियातील डोंगरपठारावर राहणारे भटके मोंगोलियन चीनवर स्वाऱ्या करू लागले.त्यांचे हूण व तुर्क यांच्याशी थोडेफार संबंध होते.या मेंगोलियनांनी अल्पावधीत पॅसिफिक महासागरातून रशियातील नीपर नदीपर्यंतचा प्रदेश व्यापून टाकला ! चेंगीझखान हा त्यांचा अत्यंत प्रबळ असा पुढारी होता.त्याच्या विद्युन्मय नेतृत्वाखाली थोड्याच अवधीत मेंगोलियनांनी एवढे मोठे साम्राज्य मिळविले की,त्याच्यासमोर अलेक्झांडरचे साम्राज्यही मुलाचे खेळणे वाटावे,पोरखेळ वाटावा.अलेक्झांडरची बेडर निर्भयता,हॅनिबॉलची सहनशीलता,

आशियातील प्राचीन विजेत्यांची अल्लड वृत्ती,तसाच त्यांचा साधेपणा हे सारे गुण चेंगीझच्या ठायी होते.त्याचा आहार म्हणजे घोडीचे मांस असे,त्याचा प्रासाद म्हणजे तंबू असे,त्याचे सिंहासन म्हणजे घोड्याचे जीन असे.राज्य चालविण्यापेक्षा जिंकून घेणे त्याला आवडे;पण इतर जगज्जेत्यांप्रमाणे त्याच्या ठायी सूडबुद्धी नव्हती, रानवटपणा नव्हता.


वेल्स लिहितो, "चेंगीझखानाच्या कारकिर्दीत,त्याच्या साम्राज्यात सर्व आशियाभर संपूर्ण धार्मिक सहिष्णुता होती." पराभूत राष्ट्रांवर आपला रानटीपणा लादण्याऐवजी पराभूतांच्या श्रेष्ठ संस्कृतीतच तो स्वतः रंगला;त्या संस्कृतीनेच त्याला जिंकले,स्वतःमध्ये मिळवून घेतले.त्याने चीन देश भौगोलिकदृष्ट्या जिंकला; पण चीनने त्याला सांस्कृतिकदृष्ट्या जिंकले.एखाद्या महासागरावर मेघांनी वर्षाव करावा तद्वत् मोंगोलियन आले;पण ते चिनी जनतेच्या महासागरात विलीन झाले व त्या सर्वांचे एक सुसंवादी राष्ट्र बनले. 


ग्रीसची व रोमची संस्कृती व्हेंडॉल व गाँध यांनी नष्ट केली,पण मोंगोलियनांनी तसे केले नाही.त्यांनी चिनी संस्कृती तर नष्ट नाहीच केली;पण उलट स्वतःच ती स्वीकारली.कुब्लाईखान हा चेंगीझचा नातू.कुब्लाई हा चीनच्या सांस्कृतिक,ज्ञानोपासक व कलोपासक परंपरेचा ऋणी आहे.स्वतःच्या रानटी पूर्वजांच्या चालीरीतींपासून त्याला काहीही मिळाले नाही.त्याचे मन व त्याची ही चिनी संकृतीवरच पोसली गेली.


या कुब्लाईखानच्या दरबारात राहिलेल्या मार्को पोलो च्याद्वारा आशियातील आश्चर्यकारक संस्कृतीशी युरोप परिचित झाले.मार्को पोलो कुब्लाईकडे का आला व राहिला? त्याचे कार्य आर्थिक व धार्मिक असे द्विविध होते.युरोप चीनशी व्यापार सुरू करू इच्छित होते; आणि पोप चीनला ख्रिश्चनधर्मी करू इच्छित होता. मार्को पोलो हा व्हेनिसचा रहिवासी,त्याचे वडील व चुलते चीनशी व्यापार करीत.वडिलांचे नाव निकोलो पोलो व चुलत्याचे मॅथ्यू किंवा मफ्फेओ पोलो.चिनी सम्राट कुब्लाईखान याने या दोघा युरोपियन व्यापाऱ्यांस आपल्या दरबारी बोलावले.त्याने त्या वेळेपर्यंत युरोपियन ख्रिश्चन व्यापारी पाहिला नव्हता.ख्रिश्चन व्यापारी हा कसा काय प्राणी असतो,हे त्याला पाहायचे होते.हे दोन्ही व्हेनिशियन व्यापारी त्याच्या दरबारी आले. कुब्लाईला ते आवडले.निकोलो मोठा हुशार;पण जरा काळसर रंगाचा होता.तो हिऱ्यांचा तद्वतच तलवारीचा पारखी होता.त्याचा भाऊ मफ्फेओ उंच व धिप्पाड होता.त्याची दाढी लाल रंगाची होती.तो घोड्यांचा तद्वतच स्त्रियांचाही पारखी होता.त्या दोघांचाही असंस्कृत व रंगेल स्वभाव,वाटेल तेव्हा देवाशपथ म्हणण्याची त्यांची सवय व मोकळी वृत्ती पाहून सम्राटाला गंमत वाटली.त्याने त्यांच्याशी व्यापारी चर्चा केली,तीवरून ते चांगलेच हुशार आहेत असे त्याला आढळून आले.त्याने त्यांच्याशी धर्म व राजकारण यांचीही चर्चा केली,तेव्हा त्या बाबतीत मात्र ते मूर्ख व अडाणी असल्याचे दिसून आले.

दोघांनीही सम्राटाला ख्रिश्चन करण्याची पराकाष्ठा केली.साऱ्याच मोंगोलियनांना ख्रिश्चन करावे अशी पोपची इच्छा होती.


कुब्लाईखान त्या दोघांना म्हणाला,"आपण काय बोलतो हे ज्याला नीट समजते असा कोणी ख्रिश्चन धर्मी आला, तर त्याच्याशी मी चर्चा करीन व ख्रिश्चन धर्म काय आहे ते पाहीन.म्हणून तुम्ही पोपकडे परत जा;व ख्रिश्चन धर्माचे शंभर उपदेशक इकडे पाठवायला त्याला सांगा. ते सुसंस्कृत,सर्व ललितकलांशी परिचित व नीट वादविवाद्कुशल असावेत.सर्व मूर्तिपूजकांस तद्वतच इतरांसही ख्रिस्ताचा कायदाच सर्वोत्कृष्ट आहे,हे त्यांना पटवून देता आले पाहिजे." निकोलो व मॅफ्फेओ पोपकडे जाण्यास निघाले.पण ते युरोपला पोहोचण्यापूर्वीच पोप मेला होता व कॅथॉलिक चर्चमध्ये मतभेद माजले होते,त्यामुळे दोन वर्षांपर्यंत नवीन पोपचीही निवड झालीच नव्हती.चिनी सम्राटाची इच्छा ऐकताच नव्या पोपने शंभर सुसंस्कृत धर्मतज्ज्ञ पाठविण्याऐवजी साधू डॉमिनिक याने स्थापलेल्या संप्रदायांतील दोन मूर्ख डोमिनिकना पाठविले.साधू डॉमिनिक हा स्पेनमधला सेंट फ्रेंन्सिसचा समकालीन संत होता.सेंट डॉमनिक याचा खाक्या सेंट फ्रेंन्सिसपेक्षा अगदी निराळा होता.तो लढाऊ वृत्तीचा होता,संकुचित ख्रिश्चन धर्माचा पुत्र होता.जिभेने लोकांना एखादी गोष्ट पटवून देता येत नसे,तेव्हा तो तलवार हाती घेई.तो एकदा नास्तिकांना म्हणाला, "तुम्ही ख्रिश्चन धर्मात आपण होऊन न याल,तर तुम्हाला त्यात हाकून नेण्यात येईल.कितीतरी वर्षे मी तुम्हाला उपदेश करीत आहे,गोड शब्दांनी सांगत आहे,तुमची मनधरणी करीत आहे,डोळ्यांत पाणी आणून तुमचे मन वळवू पाहत आहे.आमच्या स्पॅनिश भाषेत म्हण आहे,की जिथे गोड शब्दांनी काम होत नाही, तिथे ठोसे यशस्वी होतात; आशीर्वाद विफल झाले तरी आघात मात्र सफल होतात. अर्थात,आम्ही राजे,महाराजे,पोप,धर्मगुरू,सारे तुमच्याविरुद्ध उठवू.ते फौजा घेऊन तुमच्या देशावर चालून येतील व प्रार्थना निरुपयोगी ठरल्या,तिथे प्रहार विजयी होतील."


'मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद-सानेगुरुजी, मधुश्री पब्लिकेशन'


अशा वृत्तीचे ते दोन डेमिनिकन ख्रिश्चन वीर निकोलो व मफ्फेओ यांच्याबरोबर कुब्लाईला 'ख्रिस्ताचा धर्म कन्फ्यूशियसच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे.' हे पटवून देण्यासाठी आले.त्या दोघांप्रमाणेच आपला मुलगा मार्को यालाही निकोलोने आपल्याबरोबर आणले होते. मार्को ऐन उमेदीत होता.त्याला धर्माची आवड होती, तशीच व्यापाराचीही हौस होती.त्याला बरोबर नेले,तर कुब्लाई चांगला ख्रिश्चन होईल,मार्कोही चांगला व्यापारी होईल व चर्चच्या फायद्याप्रमाणेच स्वतःचा स्वार्थही साधेल,असे निकोलो व मफ्फेओ या दोघांनाही वाटले.या वेळेस ते व्हेनिसपासून चीनपर्यंत खुष्कीने गेले.हा प्रवास दीर्घ,कठीण आणि धोक्याचा होता.पर्वत ओलांडायचे,वाळवंटे उल्लंघायची,याला कंटाळून ते दोघे मिशनरी परत गेले;पण मार्को,त्याचे वडील व त्याचे चुलते हे तिघे मात्र संकटास न जुमानता पुढेपुढे चालले, ते जेरुसलेम येथे थांबले; व तेथील ख्रिस्ताच्या समाधीपुढील नंदादीपातील तेल त्यांनी बरोबर घेतले. कारण त्या तेलाने सारे रोग बरे होतात,अशी समजूत होती.त्या मोंगोलियन सम्राटाचा हृदयपालट करायला

आपल्यापाशी धर्मोपदेशक नसले,तरी निदान हे तेल तरी आहे अशी आशा तर त्यांना होतीच;पण शिवाय मार्का तरुण,देखणा व गोड वाणीचा असल्यामुळे तो शंभर शहाण्यांची उणीव भरून काढील असे त्यांना वाटत होते.मार्को कब्लाईला चुकीच्या धर्मापासून परावृत्त करील अशी श्रद्धा,असा विश्वास त्यांना होता.पण त्या पोलोची ही समजूत म्हणजे हास्यास्पद अहंकारावाचून दुसरे काय होते? व्यापारात यशस्वी होत असल्यामुळे आपण जे जे हाती घेऊ, त्यात यशच मिळेल असे त्यांना वाटे.माकोंच्या मदतीने आपण केवळ आपल्या पेट्याच सोन्याच्या नाण्यांनी भरू असे नव्हे,तर स्वर्गही कोट्यवधी चिनी-ख्रिश्चनांनी भरून टाकू अशी अहंकारी आशा करीत ते येत होते.


साडेतीन वर्षे प्रवास करून ते चीनला पोहोचले. कुब्लाईखानाच्या दरबारी ते सोळा वर्षे राहिले. त्यांनी लाखो रुपये मिळविले; पण एकाही माणसास ख्रिश्चन करून स्वर्गात पाठविण्याचे काम त्यास करता आले नाही.


पाश्चात्त्य संस्कृतीचा परिणाम तर कुब्लाईखानावर झालाच नाही;पण उलट कुब्लाईनेच पौर्वात्य संस्कृतीचा खोल ठसा माकोंवर उठविला.मार्को युरोपियन व ख्रिश्चन होता तरी,कुब्लाईने त्याला एक बडा अधिकारी म्हणून नेमले. तेराव्या शतकातील चिनी आजच्या युरोपियनांपेक्षाही उदार व विशाल दृष्टीचे होते.१९३५ साली एखाद्या कन्फ्यूशियस किंवा बौद्ध धर्माच्या चिनी माणसाला इंग्लंडमध्ये महत्त्वाची सनदी नोकरी मिळणे कितपत संभवनीय वाटते ? कल्पना करा.


मार्को पोलो व्हेनिसला परतला,तेव्हा व्हेनिस व जिनोआ यांच्या दरम्यान चाललेल्या आरमारी लढाईत त्याने भाग घेतला.ही लढाई १२९८ साली झाली.जिनोईजनी मार्कोला कैद केले.तुरुंगात वेळ घालविण्यासाठी व बरोबरच्या कैद्यांची करमणूक व्हावी म्हणून तो आपला पूर्वेकडील वृत्तांत रस्टिसिआनो नामक एका लेखकाला सांगून लिहवून घेऊ लागला.'मार्को पोलोचे प्रवासवृत्त' या नावाने रस्टिसिआनोने तो वृत्तांत पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला.हे पुस्तक चौदाव्या शतकातील फार खपणाऱ्या पुस्तकांपैकी एक होते.मार्को जरा अतिशयोक्ती करणारा होता.तो प्रवासी व्यापारी व हिंडताफिरता विक्रेता होता व असे लोक कसे बोलतात, कायकाय गप्पा मारतात हे सर्वांस माहीतच आहे.लाखो हिरेमाणके,लाखो मैल सुपीक जमीन,लाखो सोन्याची नाणी,आश्चर्यकारक स्त्री-पुरुष,इत्यादी नानाविध गोष्टींविषयी तो अतिशयोक्तीने बोलतो व लिहितो. त्याच्या या अतिशयोक्तीपूर्ण लेखनपद्धतीमुळे लोक त्याला 'लाखोंनी लिहिणारा मार्को,लक्षावधी मार्को' असे थट्टेने म्हणत.आधीच मार्कोची अतिशयोक्ति व तीत आणखी रस्टिसिआनोच्या अलंकाराची भर पडताच अशी एक नवलपूर्ण कथा जन्मास आली की, ती वाचताना आपण एखाद्या जादूगाराच्या सृष्टीत किंवा पऱ्यांच्या अथवा गंधर्वांच्या नगरीतच आहोत असे वाटते;पण ही अतिशयोक्ती व हे अलंकार वगळताही मार्को पोलोचे हे पुस्तक उत्कृष्ट आहे यात शंकाच नाही. ते इतिहासयुगात नवयुग निर्माण करणारे आहे. स्वतःच्या संस्कृतीहून वेगळ्या दुसऱ्याही संस्कृती आहेत, आपल्या देशाशिवाय दुसरे देशही आहेत,असे या ग्रंथाने युरोपियनांस शिकविले व त्यांची दृष्टी या अन्य संस्कृतींकडे व देशांकडे वळविली.या पुस्तकाने मध्ययुगातील झापड पडलेल्या मनाला जागृत केले.जागृत करणाऱ्या अनेक कारणांपैकी मार्को पोलोचे प्रवासवृत्त हे एक महत्त्वाचे कारण आहे.या ग्रंथामुळे मध्ययुगातील युरोपीय मनासमोरचे क्षितिज विस्तृत झाले व त्याला पूर्व व पश्चिम यांमध्ये विचारांची व वस्तूंची अधिक उत्साहाने देवघेव व्हावी;व व्यापारी आणि संस्कृती संबंध वाढावेत असे आतून वाटू लागले.जग अधिक मोठे झाले,जगाचा अधिक परिचय झाला, मानवजात अधिक जवळ आली, पूर्वे कडे जाण्यासअधिक सोपे व जवळचे रस्ते शोधून काढावेत असे युरोपियनांस वाटू लागले व या प्रयत्नांतूनच अमेरिका त्यांना एकदम अचानक सापडली

.युरोपियनांनी चिनी लोकांची बंदुकीची दारू घेतली.चिनी लोकांनी ती शोधून काढली,पण ती केवळ शोभेसाठी व मुलांच्या खेळासाठी वापरली. युरोपियनांनी ती युरोपात नेली व तिच्यापासून मरणाचे प्रभावी साधन तयार करून तिचा युरोपीय युद्धांत प्रचार केला.


एक महत्वाची नोंद...


आमचे मार्गदर्शक  मल्हार लोखंडे सर यांच्याकडून आलेली


विचारच तयार होत असताना मनंच तिथे अज्ञान पूर्व असते. तेव्हा हे घडतं . ई. पॉल टॉरेंसच्या मते...वेगवेगळ्या चिंतन स्थितीतून विचारांची निर्मिती होते तेव्हा ते विचार -नवीन व मौलिक, विचारांचा प्रवाह, विचारा- विचारांच मदत कार्य-लवचिकता,  विचारांचे वास्तव आणि विचारांचा विस्तार,

*********************

ग्राहम वालेस 

समस्या एकटीकरण,

अव चेतन मन, परीक्षणपूर्वक स्थितीत जन्मजात वातावरण चिंतन व विचार स्थिती प्राप्त होते तेव्हा...

जन्मजात वातावरण,

मानवाच्या उजव्या बुद्धीतील कलात्मक कल्पना जागृत होतात,तेव्हा जाणीवपूर्वक क्षमता विचारांची जबाबदारी घेतात व त्या आत्मविश्वासपूर्वक स्वतंत्र विचारांना जन्म देतात तेव्हा ते विचार अज्ञानाचे ज्ञानात रूपांतर करते. तेथेच सृजनता घडते....जे.पी गिल्फोर्ड

असे त्यांचेही मत टाॅरेंस सोबत जुळते....



७/१२/२५

पक्षिगान / birdsong

पक्ष्यांच्या सौंदर्याचं रहस्य मानवाला ऋग्वेदकालापासून वाटत आलं आहे.'परमेश्वररूपी सुंदर पक्ष्याचे गूढरम्य रूप ज्या कोणास ठाऊक असेल त्याने ते मला सांगावे.' अशा अर्थाची एक सुंदर ऋचा ऋग्वेदात आहे. परंतु हे गूढरम्य रूप महाकवी कालिदासाला अंशतःउलगडले असावे.शकुंतलेच्या अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना तो म्हणतो,"मनुष्यकुळात अशा रूपाचा संभव होणे कसे शक्य आहे ? अशी तेजस्वी ज्योती जमिनीतून कशी उगवेल ? सौंदर्यातूनच सौंदर्य जन्माला येते." शकुंत पक्ष्याने जिचा लहानपणी सांभाळ केला अशा त्या स्वर्गकन्येला पक्ष्याचे सुंदर रूप लाभले होते.


पशूना रंग लाभले असले तरी ते फक्त त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी असतात.परंतु पक्ष्याचे रंग-रूप पाहिले की त्या अपार्थिव सौंदर्याचा हेवा वाटतो.त्यांच्यात दिसून येणारी रंगारूपाची विविधता इतरत्र दुर्मीळ आहे. 


ऋतुमानाप्रमाणे बदलणारे त्यांचे रंग किती अद्भुत सुंदर असतात ! वसंत व हेमंतातील त्यांचा पेहराव,प्रणय कालातील त्यांचे मुलायम रेशमी अवगुंठन,दूरच्या प्रवासासाठी लागणारे कोट व घागरा आणि इतर वेळचा साधा-सोज्वळ पोशाख.सुंदर पाखरांना कोणती गोष्ट शोभत नाही ?


आकाश जसे इंद्रधनुष्याच्या रंगाने शोभते,तसेच वनश्री पक्षिरूपी इंद्रजालाने गूढ वाटते.त्यांच्या रंगाची किमया अद्भुतरम्य आहे.पक्षी हे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न आहे.सृष्टीतील अलौकिक वर्ण त्याने पक्ष्यांना मुक्त हस्ताने बहाल केले आहेत.हिरव्या वनश्रीतून विद्युत् गतीने निळ्या रेषा ओढणारा खंड्या,निळ्या आकाशाचा भार पेलवत उडणारे निळे चास,फुललेल्या पिवळ्या जर्द बहावा वृक्षाशी स्पर्धा करणारे हरिद्र,शिरीष पुष्पासारखे कोमल हारित,पाचूच्या पूजापात्रातील मोत्याच्या शिंपल्याप्रमाणे शोभणारी कमळाच्या पानावरील बगळी,रंगीबेरंगी पोशाख केलेल्या सुंदर मुलींच्या घोळक्याप्रमाणे वाटणाऱ्या देखण्या तेजस्वी सैरा-गोल्ड फिच-पक्ष्यांचा थवा,नभश्रीच्या कंठातील पाचूचा व माणकांचा कंठाच ओघळत आहे अशी वाटणारी पोपटांची आकाशातून उतरणारी रांग, एखाद्या गौरांगीप्रमाणे दिसणारे चक्रवाक,मत्त चांदणे पिऊन अरण्याकडे पाहात पाहात जाणाऱ्या गुलाबी-बदामी चकोर पक्ष्यांचा समूह,हिमाच्छादित शिखराची आठवण करून देणाऱ्या तुषार तित्तिरांचा थवा,

कर्पूरगौर वर्णाचे शाही बुलबुल,रत्नाचे सौंदर्य लाभलेला पाचू कवडा,मुहे खोऱ्याचे वैभव असलेले पारवे,एखाद्या रूपवती नागकन्येप्रमाणे फूत्कार टाकणारे सुंदर पंखांचे हुदहुद,उंच पर्वतातील पठारावरील गवताच्या निळ्या फुलांच्या मखमली गालिचांवरून हारीने चालणाऱ्या रूपवती शामल कोकणी लावा,काळ्या पांढऱ्या जुन्या पद्धतीच्या पोशाखातील करकोचे,

उन्हाळ्यातील मावळत्या दिशेप्रमाणे दिसणारे धूसर वर्णांचे कपोत,वर्षाऋतूतील सूर्यास्ताप्रमाणे दिसणारे सुंदर पंखांचे तित्तिर,पहाटेच्या ताऱ्यांचा वर्ण असलेले कलविंक पक्षी,

जलाशयावर विहार करणाऱ्या रोहित पक्ष्यांचा क्षणोक्षणी बदलत असणारा व गुलाबी दुपट्याप्रमाणे दिसणारा दाट थवा पाहून निसर्गाच्या अत्यद्भुत किमयेची प्रचीती येते.


एखाद्या शापभ्रष्ट परीप्रमाणे हिमालयात राहणाऱ्या जीवजीवक पक्ष्यांच्या पिसाऱ्याला इंद्रधनुष्याच्या रंगाची उपमा द्यावी इतके ते सुंदर व मनोहर असतात.


फुले पाहिली की मला पाखरांची आठवण होते;आणि पक्षी दिसले की रानफुलांचे स्मरण होते. कुर्गच्या घनदाट किर्र जंगलातून जाताना सूर्याचे किरणही दृष्टीला पडत नसत.रंगीबेरंगी पक्षी मोठ्या चपळतेने उडताना दिसत.त्या अंधुक प्रकाशात ह्या थरथरणाऱ्या ज्योती आहेत असे वाटे.कोठून तरी येणाऱ्या देदीप्यमान, तेजःपुंज दिव्याच्या ज्योतीसारखे क्षणार्धात दिवा मालवल्याप्रमाणे नाहीसे होत,आणि तिथला अंधार मात्र वाढलेला असे.गंधर्व स्त्रियांचे रूप मुळातच अलौकिक ! त्यांना देखील पक्ष्यांचे रूप घेण्याचा मोह आवरत नसे.पक्षी हे अलौकिक सौंदर्य लाभलेल्या स्त्रियांचेप्रतीक आहे. 


अगस्ति ऋषींची पत्नी लोपामुद्रा हिला लोपा-सी गल-पक्ष्याचे रूप लाभले होते.मिस तू ही प्राचीन चिनी साहित्यातील लावण्यमयी स्त्री.तिच्या सुदर मानेला उबदार मुलायम अशा अलबॅस्टर पक्ष्यांची उपमा दिली ती यथोचित वाटते.निळावंती त्यांच्या भाषेलाही रंगाचीच उपमा दिली आहे.


सामगान अतींद्रिय ज्ञान व त्यांचा मनोहर पिसारा यांनी जरी पक्ष्यांच्या सौंदर्याला रहस्याचा आविष्कार होत असला तरी त्यांची व्यक्त होत असलेली गूढतम चारुता इथच थांबत नाही.ती त्यांच्या प्रसवकाळात गूढ आचरणाच्या पडद्या

आडून घरट्याच्या रूपाने डोकावत असते.विणीच्या काळाइतका समृद्धीचा-सौंदर्याचा काळ निसर्गात नाही! हे समृद्धीचे सौंदर्य चैत्राच्या नव्या पालवी बरोबर येते.ते पाना-फुला-फळाप्रमाणे बहरत जाते.


कुठल्याही प्राण्याला पक्ष्यांच्या घरटी बांधण्याच्या कुशलतेशी बरोबरी करता आली नाही,इतकी ती देखणी असतात.याला अपवाद आहेत घारी-गिधाडांच्या कुलातील हिंस्र पक्ष्यांची घरटी.एखाद्या सुंदर वनश्रीत बेढब लष्करी तळ उभारावा ना तसं ह्या शिकारी,युद्धपिपासू पक्ष्यांची खोपी पाहून वाटते. तुषाराच्छादित पर्वतातील सहा-सात पांढुरकी घरकुलं शिलाखंडावरील एखाद्या पक्ष्याच्या घरट्यासारखी रमणीय दिसतात,तर कच्छच्या रणातील रोहितपक्ष्यांच्या खोपी आकाशातील कुणा एका गंधर्वनगरीची आठवण करून देतात.

काबूल-कंदाहारच्या विस्तीर्ण जलाशयाकाठी पाहिलेली पक्ष्यांची शेकडो लक्षावधी घरटी बाबरसारख्या शूर वीराच्या स्मृतीतील फुले बनून राहिली.तिबेटात घराच्या छपरावर,मठा-मंदिरावर चक्रवाक पक्ष्यांची युगुले घरटी बांधून तिथल्या लोकांच्या अहिंसा व धर्मपरायणतेची आठवण करून देतात.एरवी कावळ्याचा आवाज किती कर्कश ! पण ज्यांनी घरट्यात बसलेल्या कावळीचा आवाज ऐकला असेल तो त्या आवाजाने विचलित झाल्याशिवाय राहणार नाही. केवढा अद्भुत स्वर तिच्या कंठातून स्रवतो ? एखाद्या हरिद्र पक्ष्याच्या आर्द्र स्वरासारखा.हिमालयात पॉपलर,विलो व चिनारच्या पुरातन वृक्षांवर तसेच पर्वताच्या शिखरावर अनेक चास पक्षी घरटी करतात.देदीप्यमान निळ्या पंखांचे हे पक्षी घरट्याकडे गूढ स्थळी ठेवलेल्या आपल्या पिलांकडे झेप घेत उडत असता वाटते की ही निळी पाखरे जणू निळ्या गगनाचा भारच घेऊन उडत आहेत.आपल्या छातीच्या पिसात पिलासाठी पाणी साठवून वैराण वालुकामय प्रदेशातून शेकडो मैल उडत घरट्याकडे जाणारा भट तित्तिराचा थवा सांजसकाळ कुणी पाहिला आहे काय ? मोठे विस्मयजनक दृश्य असते ते !


पक्ष्यांची घरटी अद्भुत व आनंददायी सौंदर्याचा जणू निधीच आहे.जी आपल्या प्राचीन ऋषिमुनींच्या,संत,कवी व तत्त्वज्ञान्यांच्या चिंतनाचा विषय न होतील तरच नवल!


ऋग्वेदात या निधीचे मोठे मार्मिक वर्णन केले आहे.हे वरुणा,घरट्याकडे झेप घेणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे माझ्या साऱ्या कामना धनप्राप्तीस्तव तुझ्याकडे धाव घेत आहेत.या समृद्धीबरोबर गूढताही नांदते.घरट्यामधील अंड्यातून नुकत्याच उबविलेल्या पिलांची व सोमाची तुलना केली आहे,ते मोठे लक्षणीय आहे.'पक्ष्यांच्या पिलाप्रमाणे गूढ स्थळी ठेवलेला,निधीप्रमाणे मौल्यवान, स्वर्गाहून आणलेला आणि दगडात झाकलेला सोम इंद्राने प्राप्त केला.'


'प्राणिमात्राच्या संगोपनाचा आदर्श पक्ष्यांची घरटीच आहेत.इतकेच काय यज्ञासनासारखे पवित्र आसन देखील पक्ष्यांच्या घरट्याप्रमाणेच मृदू आहे.'घरट्यातील पक्ष्यांची पिले चारा घेऊन येणाऱ्या आपल्या मातापित्यांची किती आतुरतेने वाट पाहतात याची तुलना सोम प्राशन करण्यापूर्वी स्तवन करणाऱ्या भक्तजनांच्या प्रतीक्षेशी केली आहे.'हे इंद्रा,उबदार घरट्यातील पक्ष्यांप्रमाणे दधी व दुग्धमिश्रित सोमयुक्त निवासस्थानातील भक्तजन तुझे स्तवन करीत आहेत.'


शत्रू दूर जातात ते पुन्हा परत येण्याकरिता हे अनादी सत्य सांगताना म्हटले आहे,'हे वज्रहस्त इंद्रा,पक्ष्यांना घराबाहेर काढणाऱ्या सूर्याप्रमाणे त्रासदायक शत्रूना तू दूर हाकलतोस.'


सुगरण पक्ष्याचे घरटे सर्वांना परिचित आहे.परंतु यजुर्वेदात त्याचे सुंदर वर्णन केले आहे.'नम्रतेसाठी लव्हाळ्याकडे पहा व कारागिरीसाठी सुगरण पक्ष्यांकडे पहा.'


जीवनातील जे जे गूढ,मृदू,ऋजू,मौल्यवान,सुंदर व सर्जनशील होते ते सारे पक्ष्यांच्या घरट्याभोवती गुंफण्याइतकी सौंदर्य व समृद्धीची दृष्टी प्राचीनांकडे होती हे केवढे आश्चर्य ! जीवनावरील आत्यंतिक प्रेमाचे प्रतीक घरटे आहे.


उषा पक्ष्यांचे दिव्य संगीत घेऊन येते.सारे आकाश वनोपवने पक्ष्यांच्या नित्य नवीन,आगळ्या सुस्वर गीतांनी भरून जातात.

हेमंतात पहाटेपूर्वीच्या काळोखात आकाशमार्गाने वेगात जाणाऱ्या वन्य बदकांच्या अकस्मात येणाऱ्या स्वरांची विलक्षण मोहिनी पडते.पावसाळ्यात लावा पक्ष्यांमुळे खूप बहार येते.त्यांचे प्रणयगीत साऱ्या दऱ्याखोऱ्यांत सप्त सुरांसारखे भरून जाते.

माझ्यापासून अगदी जवळ वृक्षाच्या बुध्यावर उभी राहून लाविया गात होती.अर्ध्याअधिक फर्लांगावरून अनेक नर तिला साद देत होते.त्यांचे ते प्रीतीचे अवर्णनीय सामगान उच्च स्वराला पोहोचले तेव्हा ते कानाला मोठे गोड वाटले.


जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,प्रकाशक-साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी, नागपूर


सुतार पक्ष्याच्या चंद्रमौळी कोटरातून मावळतीकडील मृग-व्याधाचा तारकापुंज मंद प्रकाशताना दिसत होता.तो पक्षी अरण्यभर डम् डम् डमरू वाजवत एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर संचार करीत होता.


सुंदर व आरस्पानी जलाशयाचा काठ 'विलो' वृक्षांनी रेखिला आहे.जणू गंधर्व नगरीतल्या नाजूक कटीच्या अप्सराच त्या.मंद वायुलहरीबरोबर त्यावर हिरव्या पाचूचे नाजूक तरंग उठत आहेत.पिवळेजर्द हरिद्राव पक्षी लवचिक फांद्यांतून सुस्वर गात आहेत, पाठशिवणीचा खेळ खेळत आहेत.त्यांचे लोभस व देखणे प्रतिबिंब पाण्यात पडले आहे.हरित लाटेवर विरलेले त्यांचे स्वर अंतःकरणाच्या सीमा अमर्याद करून टाकतात.प्रभातसमयी न्हाऊन नटलेल्या सुंदर युवतीचे दर्शन व्हावे तसे हारिताकडे पाहून वाटते. गोजिरवाणी, सुंदर व शिरीष पुष्पासारखी कोमल अशी ही पाखरे गुंजन करू लागली की अस्फुट ओठ उघडलेल्या सुतनूची आठवण होते.आता ती कुठले गीत गाणार ? गत स्मृतीतील कुठली विराणी छेडणार ?


या त्यांच्या अनुनय गीतांत गिरिगव्हरातून येणाऱ्या श्यामा व पल्लवपुच्छाचेही स्वर मिळालेले असतात.


धिटुकल्या रानचिमण्या,वनातील भाट पक्षी,बुलबुल, दयाळ जरा उशिराने जागे होतात.त्यांना माणसाच्या बंदुकीची व उनाड पोरांच्या गलोलीची भीती वाटत नाही.स्वभावतःभीरू असलेली ती पाखरे एखाद्या घरंदाज गायकाप्रमाणे अरुणोदयापूर्वीच आपली हजेरी लावून वनोपवनात अदृश्य होतात.


आता शाही बुलबुल इथं नाही.ह्या कर्पूरगौर स्वर्गीय पक्ष्याने हिमालयातील अद्भुत स्वर स्वतःबरोबर आणले होते.ते आगळे सूर विसरलेल्या कवितेतील अर्ध्यामुर्ध्या आठवणाऱ्या चरणाप्रमाणे माझ्या मनात येरझारा घालू लागतात.त्यांनी माझ्या जीवनातील दिवस आणि रात्री चिरसंपन्न केल्या आहेत.


संध्या तित्तिर पक्ष्याच्या सुंदर पंखांचे लेणे लेवून येते.दूर पर्वतावरील पारदर्शक धुक्यात दऱ्याखोरी,वनश्री,नदी, ओहोळ आणि गाव लपेटला आहे.किलिकिल्किलीच्या उच्च स्वराने तित्तिर जणू थोड्याच वेळात काळोखात परिणत होणाऱ्या ह्या मनोहर दृश्याला निरोप देत आहे.


"ईश्वरा,तू चराचरी व्यापून राहिला आहेस!"