शंकरसारखी वल्ली यशाने आयुष्यात पाहिली नाही आणि त्याची खात्री होती की,अन्यही कुणी पाहिली नसेल.सहा फुटांवर उंची,
धिप्पाड बांधा,डोक्यावर कधीही न विंचरलेले कुरळे केस,असा करवंदी रंगाचा शंकर नेहमीच कधीकाळी पांढरा असलेला मळका पायजमा नि त्याहून मळका असलेला गुडघ्यापर्यंत लांबीचा शर्ट ह्या वेशात असे.गणपतीचे दहा दिवस यशाच्या गावी रात्री प्रत्येक गल्लीत पाचेक मिनिटांची नाटुकली गल्लीतलीच मंडळी सादर करीत.ह्या प्रकाराला 'सोंग' म्हणत.लोक घोळक्या घोळक्यांनी ही सोंगं बघायला गावभर फिरत.थोडीशी गर्दी जमायला लागली की,पडदा बाजूला होई नि 'सोंग' चालू होई. अशा सोंगाच्या वेळी शंकरला फार डिमांड असे.तंट्या भिल्लाचा किंवा एखाद्या राक्षसपार्टीचा रोल शंकर मेकपशिवायदेखील करू शकला असता.
मेकप केलेला शंकर आरडाओरडा करत दाणदाण पावलं आपटत स्टेजवर जो धांगडधिंगा करी त्याने पोरसोरंच काय पण बाया
बापड्याही घाबरून जात.बरेचसे लोक शंकरचा रोल पाहायला पंधरा मिनिटांनी होणाऱ्या पुढच्या प्रयोगासाठी थांबत.
महाहजरजबाबी शंकर राकट आणि रासवट ग्रामीण संस्कृतीचा एक इरसाल नमुना होता.तो पेशाने न्हावी होता.यशाच्या मोठ्या भावाचा अशोकचा खास मित्र होता.अशोक पहिल्यांदा शिकायला नि नंतर नोकरीला मुंबईला जाऊन कित्येक वर्ष झाली पण शंकर वाड्यावर दररोज काही हवं-नको बघायला म्हणून चक्कर मारून
जायचा.एक दिवस जरी त्याची फेरी चुकली तरी घरच्या सगळ्यांना चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं,शंकर घरी आलेला दिसला की,
यशादेखील खेळ मध्येच सोडून घराकडे पळायचा.मैफल रंगवण्यात शंकर वस्ताद होता. गावातल्या सगळ्या भल्याबुऱ्या बातम्यांचा त्याच्याकडे स्टॉक असायचा आणि त्या तो स्वतःच्या टीकाटिपणी सह खुमासदारपणे सांगायचा.पिक्चरची स्टोरी छोट्या छोट्या तपशिलासह तर सांगायचाच
पण त्याला समजलेले डायरेक्शनचे पॉइंट्ससुद्धा तो सांगत असे.
संगीतातलं मात्र त्याला फारसं गम्य नव्हतं. पिक्चरमधल्या गाण्यांची तो 'गानी पन लई भारी हैत' अशा एका वाक्यात बोळवण करायचा.तीन तासांची पिक्चरची स्टोरी सांगायला त्याला साडेतीन तास लागायचे.
यशाच्या घाटावरल्या गावात मासे मिळणं दुर्मीळच.पण एकदा शंकरला ते कुठूनसे मिळाले.यशाची थोरली बहीण मीरा तेव्हा जेमतेम सहावीत होती. ती शंकरला म्हणाली,"शंकरभाऊ,मी नॉनव्हेज कधीच खाल्लं नाही. मला मासे खायची फार इच्छा आहे." शंकरने तिला संध्याकाळी येऊन आपल्या घरी घेऊन जायचं कबूल केलं.त्या दिवशी नेमका रविवार होता.दर रविवारी वाड्याच्या बाहेरच्या ओट्यावर संध्याकाळ पासून ब्रीजचा अड्डा बसायचा.बापू आणि गावातली प्रतिष्ठित मंडळी ब्रीज खेळायला लागली की,त्यांना वेळेचं भान राहत नसे.त्या दिवशी जेवण आटोपून रात्री आठच्या सुमारास दत्त मंदिराच्या बाजूने गल्लीत आत शिरत असलेल्या मीराला बापूंनी पाहिलं.वाड्यात मांसमच्छी वर्ज्य असल्याने शंकरकडच्या जेवणाचा बापूंना पत्ताच नव्हता.
दिवेलागणीच्या आत लहान मुलांनी घरात असलं पाहिजे असा दंडकच होता. त्यामुळे थोड्याशा रागातच बापूंनी मीराला 'कुठे गेली होतीस?' म्हणून विचारलं.शंकरने आधी पढवलं होतं तरी घाबरून मीराने 'शंकरभाऊकडे मासे खायला गेले होते'असं सांगून टाकलं !
'मासे' शब्द ऐकताच ओट्यावर भूकंप झाला !
जानवी थरारली !!
शेंड्यांना झिणझिण्या आल्या !!!
बापूंचेही डोळे विस्फारले.
पन्नास वर्षांपूर्वीच्या ग्रामीण भागात वाड्यावरच्या मुलीच्या तोंडून मासे ऐकून वातावरण स्तब्ध-क्षुब्ध झालं ! मीरा काही तरी गोंधळ घालेल ह्याची कल्पना असल्याने मागून लगबगीने आलेला शंकर पुढे येऊन म्हणाला,"बापू,आमच्याकडे कुमारिकेला पुरणाचे मासे करून घालण्याचा कुळधर्म असतो म्हणून माईंना विचारून मीराला घेऊन गेलो होतो."
बापूंनी सुटकेचा निःश्वास सोडलेला सगळ्या गल्लीने ऐकला.केस कापण्यासोबत शंकर बँडसुद्धा वाजवत असे.बँडवादनात क्लॅरोनेट वाजवणाऱ्याने मुख्य ओळ वाजवल्यावर मागून कोरस वाजवणाऱ्यांपैकी शंकर एक असायचा.पितळेचं ते वाद्य ओठांशी लावून गाल फुगवून वाजवणारा शंकर बघायला सगळ्या मुलांना फार मजा वाटायची. लोक म्हणत,"शंकर वाद्य ओठांना लावून नुसते गाल फुगवतो.बँड वाजवण्याचा त्रास घेतच नाही!"क्लॅरोनेट वाजवणाऱ्या माणसाच्या कानावरपण ही गोष्ट गेली.त्याने शंकरशी भांडण केलं.अन् त्यात तो शंकरला काही वावगं बोलून गेला.शंकर त्यावेळी उलट काहीच बोलला नाही.पण त्याने गल्लीतल्या लहान मुलांना बोलावून त्यांच्याशी काही कानगोष्टी केल्या. पुढच्या वेळी वरातीत क्लॅरोनेट वाजवणारा सुरेश ऐटीत बँडपथकाच्या सर्वात पुढे गल्लीत शिरताना वानरसेनेने पाहिला.त्या वानरसेनेत एका वानराच्या भूमिकेत यशासुद्धा होता.बँडचा आवाज लांबूनच ऐकून मुलं तयारीत राहिली.
गल्लीच्या मध्यभागाच्या चौकात वरात थांबली. वरातीतली हौशी माणसं नाचू लागली.त्यांच्यावरून नोटा ओवाळून बँडवाल्यांना देण्याची चुरस लागली.मुलांनी काल रात्री शंकरने त्यांना आणून दिलेल्या गाभुळ्या चिंचांचे आकडे खिशातून बाहेर काढले आणि सुरेशच्या पुढे ते नाचवत,त्याला दाखवत चवीने मिटक्या मारत खायला सुरुवात केली.सुरेशच्या तोंडाला पाणी सुटलं.
क्लॅरोनेटमधून 'फुर्रर्र ऽऽऽ' असा विचित्र आवाज येऊ लागला.बँड थांबला.साहजिकच नाचणाऱ्यांच्या रंगाचा बेरंग झाला.तोपर्यंत मुलं कुणी मारुतीच्या पारावरच्या झाडामागे तर कुणी देवळाच्या आडोशाला जाऊन लपली.वरातीतल्या लोकांना ती दिसली नाहीत पण सुरेशला ती चिंचा खाताना दिसत असल्याने त्याला नीट वाजवता येत नव्हतं.पाचेक मिनिटं हा तमाशा झाल्यावर मुलांनी चिंचा फेकून दिल्या आणि ती सगळी साळसुदासारखी ओट्यावर येऊन उभी राहिली.
क्लॅरोनेट आणि नाच परत सुरू झाले.वरात पुढे गेली. दोन गल्ल्या सोडून बालाजी गल्लीच्या चौकात वरात गेली तर तिथली वानरसेना अशीच कामाला लागली. तेव्हा सुरेशला ह्या सगळ्याचा कर्ताकरविता कोण असावा त्याचा अंदाज आला.नंतर सुरेशने वाईटवंगाळ बोललेल्या शब्दांसाठी शंकरची माफी मागितली. शंकरनेही त्याला माफ केलं.पुढे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र झाले.एकदा घरी गप्पांचा अड्डा चांगलाच रंगला होता.अर्थात त्याचा केंद्रबिंदू शंकरच होता.गप्पांचे विषय गाडीने ट्रॅक बदलावा तसे ह्या विषयावरून त्या विषयावर जात होते.
होता होता विषय 'अंगात येणं' ह्या विषयावर येऊन ठेपला.त्या काळात परदेशीपुऱ्यातली कमळाबाई फारच प्रसिद्ध झाली होती.काळीसावळी पण तरतरीत कमळाबाई टिळकचौकात भरणाऱ्या भाजीबाजारात भाजी विकण्याचा व्यवसाय करत होती.मात्र नवरात्रातले नऊ दिवस आणि वर्षातल्या प्रत्येक शुक्रवारी तिच्या घरी तोबा गर्दी जमत असे.लोक त्यावेळी तिच्या घराला 'देवीचा दरबार' म्हणत.आजूबाजूला धूप लावल्याने वातावरण मंत्रमुग्ध झाल्यासारखं होई.त्यात कमळाबाईचे भक्त एका बाजूला बसून देवीची भजनं म्हणत.दरबार ठासून भरल्यावर कमळाबाई न्हाऊन मोकळे सोडलेले लांबसडक केस मोर -
पिसाऱ्यासारखे मिरवत मळवट भरलेल्या कपाळाने,अर्धवट मिटल्या डोळ्यांनी दरबारात प्रवेश करी.मग बराच वेळ 'देवीचं खेळणं' म्हणजे नाचणं होई आणि मग लोकांच्या प्रश्नांना कमळाबाई उत्तरं देई.सुमारे दोन तासांनी ती अंग टाकून धाडकन् खाली पडे.भक्तगण देवीची आरती करीत. थोड्या वेळाने कमळाबाई शुद्धीवर येई.
गावातल्या जवळजवळ सगळ्यांनीच कुणी भक्तिभावाने, कुणी करमणूक म्हणून, कुणी उत्सुकता म्हणून तर,कुणी टिंगलटवाळी करायची म्हणून कमळाबाईच्या दरबारात कधी ना कधी हजेरी लावली होती.शंकरच्या गप्पा ऐकायला मारवाडी कुटुंबातल्या काही मुली-मुलंपण आली होती.त्यातली सजनबाई भक्तिभावाने म्हणाली,
"कमलाबाईचं अंगात येणं मात्र खरं आहे बरं का, शंकरभाऊ."
शंकर म्हणाला, "असं कुणाच्याही अंगात यायला देवीला काय कामधंदे आहेत का नाही ? सरळ देवळात जावं नि नमस्कार करावा." बोलता बोलता मंडळीत दोन तट पडले.एका ग्रुपचं म्हणणं कमळाबाईच्या अंगात येणं खरं आहे त्यामुळेच ती अंगात आल्यावर एवढी तेजस्वी दिसते.तर, दुसऱ्या ग्रपुचा ह्या अंगात येण्यावर विश्वास नव्हता.बरेचसे लोक तटस्थ आणि गोंधळलेले होते. ( गावगोत,माधव सावरगांकर,अष्टगंध प्रकाशन )
"शंकर,तुला काय वाटतं?" माईंनी विचारलं.
शंकर म्हणाला,"माई,अहो हे सगळं थोतांड आहे.हवं असेल तर मी ते कमळीच्या तोंडूनच वदवून घेईन आणि नंतर काय झालं ते तुम्हाला सांगेन !"
ठरल्याप्रमाणे एका शुक्रवारी कमळाबाईच्या दरबारात शंकर गेला.एका कोपऱ्यात शांतपणे जाऊन बसला. कमळाबाईने दरबारात प्रवेश करताच शंकरला पाहिलं होतं.'हा इब्लिस माणूस आज इथे कशाला आला?' असा एकीकडे विचार करत करत तिने
प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम पूर्ण केला.त्यानंतर तिला नमस्कार करण्यासाठी एकच झुंबड उडाली.शंकरही त्या गर्दीत सामील झाला.कमळाबाईचं अर्धवट मिटल्या डोळ्यांनी त्याच्याकडे लक्ष होतंच.शंकर नमस्कारासाठी खाली वाकला.डोकं वर उचलताना त्याने कमळाबाईच्या कमरेचा पैशांनी भरलेला कसा सफाईने खसकन् ओढून घेतला.कमळाबाईच्या ते लगेच लक्षात आलं.पण त्या वेळी शंकरला हटकणं तिला शक्य नव्हतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी घरच्या देवाची पूजा आटोपून शंकर दुकानात जाण्याच्या तयारीत असताना कमळाबाई शंकरच्या घरी आली.म्हणाली,"शंकरभाऊ, माझा काल घेतलेला पैशाचा कसा दे!"
"कसा ? कसला कसा? अन् मी कधी घेतला? अन् मी घेतलेला तुला कसं समजलं ? अन् समजलं तर तू कालच का नाही बोललीस ? तेव्हा तर तू कमळी नव्हतीस ना ? देवीला अशा पैशांच्या गोष्टींत काय इंटरेस्ट ? आणि अंगातून देवी उतरल्यावर तुला त्या वेळेचं कसं काय समजलं ?"
कमळाबाई शंकरच्या प्रश्नांच्या सरबत्तीने हैराण झाली. कुणालाही न सांगण्याच्या शर्तीवर तिने कबूल केलं की, लहानथोरांकडून महत्त्व मिळावं म्हणून ती हे नाटक करत होती.
अपुरे…!