फक्त वाड्यातल्या माईंना सांगेन इतर कुणालाच सांगणार नाही'असं सांगून शंकरने तिचा कसा होता तसा तिला परत करत तिची बोळवण केली.
यशाच्या गावात पाण्याचा मोठा दुष्काळ.शेटजींच्या पूर्वजांनी गावाबाहेर बांधलेल्या तलावातलं पाणी आटून तलाव आता कोरडा झाला की,गावातल्या विहिरी आणि आडही आटायचे.त्यामुळे वर्षभर वाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या आडाचं पाणी कमी होऊन खारं व्हायचं.मग पिण्याच्या पाण्याचे हाल व्हायचे.
पाण्याच्या ह्या त्रासामुळे वार्षिक परीक्षा आटोपल्यावर माई-बापू मुलांना दोन महिन्यांसाठी ठाण्याला थोरल्या अशोककडे घेऊन जात.कधी कधी मंदा-मुक्ताच्या परीक्षा बापू शाळेतल्या मास्तरांना सांगून लवकर आटोपून घेत असत.
मुलांचं ठाण्याला जाणं म्हणजे मोठीच प्रोसेस असायची. नेहमीच्या सवयीप्रमाणे माई भाजणी-मेतकूट-सातूच्या पिठापासून सगळं बरोबर घ्यायच्या.कपड्यांचे-अंथरुणा-पांघरुणाचे जड डागही असत.अशावेळी शंकरचा रोल खूप महत्त्वाचा असायचा.पॅकिंगचं काम शंकर करायचा.बापूंच्या ओसरीवरच्या सतरंजीत बरंचसं सामान 'होल्डऑल' सारखं बांधून शंकर ते चहाटाने घट्ट बांधायचा.
हे करताना वळकटीवर बसून ताकदीने चाट बांधणारा घामाघूम शंकर पाहून यशाला नेहमी तालमीतल्या हौद्यात झटापट करणाऱ्या पहिलवानांची आठवण होत असे.जाण्याचा दिवस ठरला की,बापू शंकरला दररोज वेळेवर येण्याची आठवण करून द्यायचे.स्टेशन गावापासून साडेचार मैल दूर होतं.सगळं सामान बाबूच्या तांग्यात बसवून त्यावर आडणीवरच्या शंखासारखं मुलांना बसवायचं काम बाबू तांगेवाल्याच्या मदतीने शंकरच करी.
एका वर्षी नेहमीप्रमाणे मंडळी ठाण्याला जायला निघाली.शंकर पोहचवायला म्हणून आलाच होता.त्याने त्याची सायकल दुरुस्तीला टाकल्याने तो भाड्याची सायकल घेऊन स्टेशनपर्यंत आला होता.माई शंकरला सहज म्हणाल्या,"अरे शंकर,इथे तू होतास म्हणून बरं झालं.आता मनमाडला मात्र आमची फार धावपळ होणार!"
"तर मग मनमाडपर्यंत येतो ना!" म्हणत शंकर गाडीत चढलादेखील.तो असल्यामुळे मनमाडला सगळ्यांचाच गाडीत प्रवेश सुखकर झाला.सगळ्यांना चढवत असताना शंकर अजून गाडीतच होता.त्यामुळे 'लवकर उतर,शंकरभाऊ,लवकर उतर' असा मुलांनी एकच गिल्ला केला.शंकर मात्र शांत होता.
म्हणाला,"आता मी ठाण्यापर्यंत येतो म्हणजे सामान उतरवायला तुम्हाला त्रास होणार नाही!"
शंकरचं बोलणं ऐकून बच्चेकंपनी खूश झाली.विशेषतः यशा.
त्याच्या गप्पांमुळे भुसावळ पॅसेंजरचा तो कंटाळवाणा प्रवास आता सुखकर होणार होता आणि झालंही तसंच.गप्पांची मैफल जमली.
आजूबाजूचे सहप्रवासीही शंकरचं बोलणं उत्सुकतेने ऐकत होते. विषयांवर विषय निघत गेला अन् शंकरने वाड्यातल्या मारवाडी भाडेकरूंची गंमत सांगायला घेतली.
वाड्यात राहणारं हे मारवाडी कुटुंब किमान पंचवीस जणांचं भक्कम कुटुंब होतं.चार भाऊ आणि त्यांची कुटुंबं गुण्यागोविंदाने राहत होती.त्यांची स्वतःची एकूण मुलंच दहाबारा होती.त्याशिवाय शिकायला म्हणून खेडेगावातून आलेली नातेवाईक मुलं वेगळीच. शंकरकडे केस कापायला म्हणून त्यांची फेरी महिन्यादोनमहिन्यांनी व्हायची.सगळ्या मुलांच्या कटिंगचा कार्यक्रम एकाच दिवशी व्हायचा.ह्या कुटुंबाचं गावात किराणामालाचं सगळ्यात मोठं दुकान होतं. चारी भाऊ त्यांच्या त्यांच्या सवडीनुसार गल्ल्यावर बसून मग कटिंग करायला येत.
दुसऱ्या दिवशी शंकर त्यांच्या किराणामालाच्या दुकानात चक्कर मारी.
"बाबाजी,कालच्या कटिंगचे पैसे ?"
बाबाजींनी डोकी तासलेली मुलं काल पाहिलेली असत. ते गल्ल्यातून शंकरला पैसे काढून देत.दोनचार तासांनी शंकर परत जाई.तोवर गल्ल्यावर दुसरा भाऊ बसलेला असे.
"मामाजी, कटिंगचे पैसे?"
गल्ल्यावर बसलेल्या भावाकडूनही शंकर पैसे घेई. एवढ्या मोठ्या दुकानाच्या पैशातून थोडे आपल्याला मिळाले तर त्यांना काय फरक पडतो अशी परत वर मखलाशी !
शंकरच्या गप्पा चालू असताना कोपऱ्यावरच्या दरवाजातून तिकिट-तपासनीस डब्यात शिरला.त्याला पाहून माई-बापूंसह सगळेच हादरले.कारण शंकरने आयुष्यात रेल्वेचं तिकीट काढलं नव्हतं.आताही नाही, हे सगळ्यांनाच ठाऊक होतं.
शंकर मात्र एकदम शांत होता.पण त्याचा एक डोळा तिकिट तपासनिसाच्या हालचालीवर होता.कारण तीनचार बेंचपलीकडे एका पंचवीसेक वर्षांच्या तरुणाला त्याने विदाऊट तिकीट पकडल्यावर शंकर विजेसारखा उठला.त्या तरुणाची कॉलर धरून त्याला उठवलं आणि दोनचार फटके दिले ठेवून.हे करताना त्याच्या तोंडाचा पट्टा जोरजोरात चालू होताच.
"हरामखोर साले.फुकटचा प्रवास करतात.लाजा वाटत नाहीत ह्यांना ! रेल्वेची सेवा पाहिजे पण त्याचे पैसे द्यायला नकोत.
सरकारने कुठून आणायचे ? एक प्रकारचे देशद्रोहीच आहेत हे!"
असं म्हणत शंकरने आणखी एक दणका त्याच्या पाठीत घातला.धिप्पाड शंकरचं हे रौद्ररूप पाहून त्या तरुणाबरोबरच तिकिट तपासनीसही गांगरला.तोच शंकरकडे त्या तरुणासाठी रदबदली करायला लागला.
"अहो,शांत व्हा.पुढच्या स्टेशनवर उतरेल तो आणि ह्यापुढे तिकीट काढून प्रवास करील.हो की नाही रे ?"
त्या तरुणानेही होकारार्थी मान हलवली.शंकर स्वतःच्या जागेवर येऊन बसला तरी तणतणतच होता. माई-बापूंसह सगळे त्याच्याकडे हतबुद्ध होऊन बघत होते.तिकिट-तपासनिसाने त्या सगळ्यांची तिकिटं तपासली पण शंकरला काही तिकीट विचारलं नाही. उलट त्याच्याकडे छान सुहास्य नजरेने बघत त्याला राम राम करून तो पुढे सरकला.
ठाणं आल्यावर शंकरने सामानासकट सगळ्यांना सुखरूप अशोकच्या हवाली केलं.अशोकच्या आग्रहास्तव त्याच्या घरी तो चार दिवस राहिला.त्याने भाड्याने घेतलेली सायकल गावच्या स्टेशनवरच राहिली होती.तिची मुलांनाच चिंता,
त्याबद्दल त्याला छेडलं तर म्हणाला,"एवढ्या छोट्याशा गोष्टीबद्दल विचार करून आजची मजा किरकिरी करायची नसते !अर्थात तिकीट नसताना रेल्वेत समोरून तिकिट तपासनीस येणं हेदेखील त्याला किरकोळ वाटतं तर भाड्याच्या सायकलचं काय ! ती तर खरंच फारच क्षुल्लक गोष्ट वाटत असणार त्याला.
शंकर ठाण्याला असताना अशोक आणि त्याच्या दोन लहान बहिणी उषा आणि विजू ह्यांनीसुद्धा ऑफिसला दांडी मारली होती.हे सगळे लहानपणचे सवंगडी.शंकर आल्यामुळे त्यांच्या रूटीनमध्येही त्यांना जरा चेंज झाला होता.एकदा माईंनी जेवताना त्याला वाढायचा आग्रह केला.त्यावरून गोष्ट निघाली.
शंकर सांगू लागला -
शंकरचा बालाजी नावाचा मामेभाऊ गावातच राहत होता.शंकरच्याच दुकानात कामही करत होता आणि बँडपथकात ड्रमदेखील वाजवत होता.बालाजी काही वर्ष मुंबईला राहिला होता. त्याला त्याच्या वागण्या-बोलण्यातून तसं दाखवून द्यायला आवडायचं.तसा त्याचा नेहमी प्रयत्न असायचा.
एकदा एका खेड्यात एका खूप मोठ्या बागाईतदाराच्या मुलाचं लग्न होतं.शंकर आणि बालाजी ज्या बँडपार्टीत होते त्यांना लग्न वाजवण्याची सुपारी मिळाली होती. त्या गावात जाताना बालाजी सगळ्यांसमोर थोड्याशा आढ्यतेने म्हणाला,
"असं श्रीमंतांच्या घरचं लग्न वाजवायचं म्हणजे माझ्यापुढे धर्मसंकट उभं राहतं.कारण मला गोड पदार्थ अजिबात आवडत नाहीत आणि जबरदस्तीने खावे लागले तर मळमळायला लागतं."
शंकरने ही गोष्ट लक्षात ठेवली.अर्थात बालाजी गोड पदार्थ आवडीने खातो हे शंकरला माहीत होतं.पण तो त्यावेळी मुद्दामच काही बोलला नाही.ठरल्याप्रमाणे बँडपथक लग्नाला गेलं.लग्नात आणि वरातीत बँड वाजवून झाल्यावर व्याह्यांच्या पंक्तीनंतर बँडपथकातली मंडळी जेवायला बसली.बँडवाल्यांवर खूश झालेले यजमान स्वतः जातीने वाढप्यांवर देखरेख करत होते. जेवणाचा बेत मोठा नामी होता.पंचपक्वान्नं होती. जिल्ह्यातले नामांकित आचारी स्वैपाकाला बोलावलेले होते.पंक्तीत मुद्दाम शंकर बालाजीच्या शेजारी बसला. एक एक वाढपी येऊन वाढायला लागला.पाकाने भरलेले मोठ्ठाले गुलाबजाम घेऊन वाढपी आला.ते पाहून बालाजीच्या तोंडाला चांगलंच पाणी सुटलं.वाढपी जवळ आला आणि शंकर स्वतःचं पान सोडून बालाजीच्या पानावर जवळजवळ आडवाच झाला आणि "अहो,ह्याला नका वाडू,हयाला त्रास होतो..." असं कळवळून सांगू लागला.
यजमान जवळ येऊन म्हणाले, "अहो,एक तरी चवीसाठी घेऊ द्या..." "अजिबात नको.गोड खाल्ल्यानंतर ह्याला मळमळतं.परत जेवण झाल्यावर आम्हाला एसटीने निघायचंय.प्रवासात त्रास नको व्हायला."
मिष्टात्र घेऊन येणाऱ्या प्रत्येक वाढप्याच्या वेळी शंकरने असाच प्रकार केला.
बालाजीच्या पानात भाजीपोळीशिवाय काहीच दिसेना. सगळ्यांची जेवणं होत आली.शेवटी बालाजीचा संयम संपला.तो शंकरच्या कानात अजीजीने म्हणाला,
"शंकरभाऊ,मला गोड आवडतं.आता वाढप्यांना थांबवू नको.त्या दिवशी हुशारी दाखवायला म्हणून तसं बोललो..."
त्यानंतर मात्र शंकरने वाढप्यांना अडवलं नाही. बालाजीला गोड खाऊ दिलं.
शंकर ठाण्याला असताना गप्पांच्या ओघात हरीचा विषय निघाला.हरी यशाच्या नात्यातलाच होता आणि ठाण्यातच राहत होता.साधारण अशोकच्याच वयाचा असल्याने तो गप्पा मारायला घरी येत असे.हरी स्वभावाने चांगला होता.पण त्याला कुठलीही गोष्ट जरा वाढवून-चढवून सांगायची खोड होती.अशोक हरीचा उल्लेख 'नव्याण्णवबादी' असा करायचा.म्हणजे हरीच्या नव्याण्णव गोष्टी आपण बाद धरायच्या आणि एकच गोष्ट खरी मानायची.
हरी आपण कसे शूर आहोत,कधीच कुणाला कसे घाबरत नाही,प्रसंगावधानी तर कसे नंबर एकचे आहोत हे छाती फुगवून सांगत असे.हरी मूळचा नासिकचा. तिथे त्याच्या हातून एक अतिशय किरकोळ गुन्हा झाला होता.एवढी एक गोष्ट माहीत असणं शंकरला पुरेशी होती.तो अशोकला म्हणाला,
"आज रात्री आपण हरीकडे जाऊ या.मी त्याच्या सगळ्या फुशारक्या बाहेर काढतो!"
रात्री शंकर,अशोक,उषा आणि विजू हरीच्या खोलीवर गेले.त्या तिघांना बाहेरच उभं करून शंकर एकटाच आत गेला.आत जाताच शंकरने हरीची गचांडी पकडून थोडी हिसडली आणि तो आवाज चढवून म्हणाला,
"नासिकला गुन्हा करून इथे येऊन लपून बसलास काय? पोलीस म्हणजे कोण वाटले ?आमचे हात फार लांब असतात.आमच्या पंजातून कुणीच सुटू शकत नाही!"असं म्हणून शंकरने आपल्या राकट हाताने हरीचं मनगट गच्च पकडलं.
ह्या अचानक हल्ल्याने हरी बावचळला.तो शंकरला ओळखत नव्हता.खराच पोलीस आपल्या दारावर आला आहे असं वाटून तो चांगलाच घाबरला.अगदी रडकुंडीला येऊन गयावया करायला लागला.
"शेजाऱ्यांना पोलीस आले म्हणून कळेल,हळू बोला हो..." म्हणून विनवण्या करायला लागला.तेव्हा शंकरने त्या तिघांना हाक मारून आत बोलावलं.तेव्हापासून हरीने ह्या तिघांपुढे कधीही बढाया मारल्या नाहीत.
यशाच्या गावाजवळच अनकाईचा किल्ला आहे.गडावर जागृत शंकराचं देवस्थान आहे.श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी तिथे मोठी जत्रा भरते.यशा पाचसहा वर्षांचा असतानाची गोष्ट.गल्लीतल्या बरोबरीच्या सगळ्या मुलांनी घरच्यांच्याबरोबर कधी ना कधी अनकाईच्या यात्रेला हजेरी लावलेली होती.एकटा यशाच राहिला होता.ना त्याने अनकाई पाहिली ना अनकाईची जत्रा. त्यामुळे मुलं त्याच्यासमोर मुद्दामच यात्रेचं रसभरीत वर्णन करीत.तसतशी अनकाईला जाण्याची यशाच्या मनातली आस वाढत असे.
एका श्रावणी सोमवारी शंकर अनकाईला जाणार असल्याचं समजल्यावर यशा त्याच्यामागे लागला. सुरुवातीला शंकरबरोबर पाठवायला माई तयारच नव्हत्या.
"शंकर,तू सतरा पिंपळावरचा मुंजा ! तुला पावलापावलावर ओळखीचे लोक भेटणार.तुझं यशाकडे लक्ष राहणार नाही.त्यात यशापण थोडासा वांड.त्यामुळे तुझ्याबरोबर पोराला पाठवायला माझं मन काही धजावत नाही..."
"माई,तुम्ही काही काळजी करू नका.मी यशाला फुलासारखा जपेन." अशी शंकरने माईंना पुन्हा पुन्हा खात्री दिल्यानंतर अखेर माई यशाला शंकरबरोबर पाठवायला राजी झाल्या.
सकाळी सकाळी यशा,शंकर आणि बालाजी एसटीने अनकाईला निघाले.जाताना उत्साहाच्या भरात यशा त्या दोघांबरोबर झपाझप चालत होता.मात्र गडावर जाईपर्यंत तो थकून गेला.वरती गेल्यावर देवाचं दर्शन घेतलं आणि मग शंकर-बालाजीबरोबर तो उत्साहाने यात्रेत भटकला.खाली जायची वेळ झाली तोपर्यंत दुपारचं ऊन खूप चढलं होतं.आता यशाला एक पाऊल उचलणंही जड जाऊ लागलं.त्याने शंकरभाऊला सांगितलं,
भाऊ,मला अजिबात चालवत नाही आता..."
शंकरने क्षणभर विचार केला आणि म्हणाला,
"यशा,आता ह्यापुढं गड उतरेपर्यंत तू एकही सबुद बोलायचा नाहीस.कुनी काही विचारलं तरी उत्तर द्यायचं नाहीस.समजलं ?"
यशाने मुकाटपणे मान हलवली.शंकरने खाली उतरण्याच्या वाटेवर एका गर्दीच्या ठिकाणी यशाला आणलं आणि दिलं सोडून.थोडा बाजूला जाऊन तो जरा मोठ्यानेच बालाजीला म्हणाला,
"पोरगं हरवलेलं दिसतंय... बरोबर कुनी नाही..." एवढं बोलून तो आणि बालाजी बाजूला जाऊन उभे राहिले. यशाभोवती घो घो माणसं जमली.लोक नाव काय, कुठला वगैरे प्रश्न विचारत होते पण यशा मुक्यासारखा गप्प उभा होता.बायाबापड्या यशाच्या अलाबला काढू लागल्या.
'मुकं दिसतंय गं बाई पोर...'
'चांगल्या घरचं दिसतंय लेकरू...'
'आता काय करावं...'
'त्याची मायपण त्याला शोधत असेल...'
असे विविध उद्गार ऐकून यशाला आपोआपच रडू यायला लागलं.आजूबाजूच्या मंडळींनी यशाचं तोंड आणि खिसे गुडदाणी,रेवड्या,गुडीशेव ह्यांनी भरून टाकले.एसटी स्टँड जवळच्या पोलीस स्टेशनवर यशाला घेऊन जायचं ठरलं.आजूबाजूच्या बाप्यांनी यशाला खांद्यावर घेतलं अन् हातोहात गडाखाली आणलं.एसटी स्टँड जवळ आल्यावर इकडे तिकडे बघत असलेला शंकर पुढे आला आणि म्हणाला,
"ह्या पोराला मी वळखतो.माझ्या बाजूच्याच गल्लीत ह्याचं घर हाय."
यशाला ज्यांनी उचलून आणलं होतं त्यांनी 'ह्या माणसाला ओळखतोस का ?' म्हणून यशाला विचारलं. यशाने मान हलवून होकार दिला.शंकरने यशाला सोबत घेतलं.मध्ये इतकी वर्षं गेली... शंकरही गेला.पण त्या दिवशी यशाला मुक्याचं सोंग करायला सांगणाऱ्या शंकरच्या आठवणीने आज यशाचे शब्द संपतात आणि यशा मुका होतो !
समाप्त….।