* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: डिसेंबर 2025

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३१/१२/२५

शंकर  / Shankar

फक्त वाड्यातल्या माईंना सांगेन इतर कुणालाच सांगणार नाही'असं सांगून शंकरने तिचा कसा होता तसा तिला परत करत तिची बोळवण केली.


यशाच्या गावात पाण्याचा मोठा दुष्काळ.शेटजींच्या पूर्वजांनी गावाबाहेर बांधलेल्या तलावातलं पाणी आटून तलाव आता कोरडा झाला की,गावातल्या विहिरी आणि आडही आटायचे.त्यामुळे वर्षभर वाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या आडाचं पाणी कमी होऊन खारं व्हायचं.मग पिण्याच्या पाण्याचे हाल व्हायचे.

पाण्याच्या ह्या त्रासामुळे वार्षिक परीक्षा आटोपल्यावर माई-बापू मुलांना दोन महिन्यांसाठी ठाण्याला थोरल्या अशोककडे घेऊन जात.कधी कधी मंदा-मुक्ताच्या परीक्षा बापू शाळेतल्या मास्तरांना सांगून लवकर आटोपून घेत असत.


मुलांचं ठाण्याला जाणं म्हणजे मोठीच प्रोसेस असायची. नेहमीच्या सवयीप्रमाणे माई भाजणी-मेतकूट-सातूच्या पिठापासून सगळं बरोबर घ्यायच्या.कपड्यांचे-अंथरुणा-पांघरुणाचे जड डागही असत.अशावेळी शंकरचा रोल खूप महत्त्वाचा असायचा.पॅकिंगचं काम शंकर करायचा.बापूंच्या ओसरीवरच्या सतरंजीत बरंचसं सामान 'होल्डऑल' सारखं बांधून शंकर ते चहाटाने घट्ट बांधायचा.

हे करताना वळकटीवर बसून ताकदीने चाट बांधणारा घामाघूम शंकर पाहून यशाला नेहमी तालमीतल्या हौद्यात झटापट करणाऱ्या पहिलवानांची आठवण होत असे.जाण्याचा दिवस ठरला की,बापू शंकरला दररोज वेळेवर येण्याची आठवण करून द्यायचे.स्टेशन गावापासून साडेचार मैल दूर होतं.सगळं सामान बाबूच्या तांग्यात बसवून त्यावर आडणीवरच्या शंखासारखं मुलांना बसवायचं काम बाबू तांगेवाल्याच्या मदतीने शंकरच करी.


एका वर्षी नेहमीप्रमाणे मंडळी ठाण्याला जायला निघाली.शंकर पोहचवायला म्हणून आलाच होता.त्याने त्याची सायकल दुरुस्तीला टाकल्याने तो भाड्याची सायकल घेऊन स्टेशनपर्यंत आला होता.माई शंकरला सहज म्हणाल्या,"अरे शंकर,इथे तू होतास म्हणून बरं झालं.आता मनमाडला मात्र आमची फार धावपळ होणार!"


"तर मग मनमाडपर्यंत येतो ना!" म्हणत शंकर गाडीत चढलादेखील.तो असल्यामुळे मनमाडला सगळ्यांचाच गाडीत प्रवेश सुखकर झाला.सगळ्यांना चढवत असताना शंकर अजून गाडीतच होता.त्यामुळे 'लवकर उतर,शंकरभाऊ,लवकर उतर' असा मुलांनी एकच गिल्ला केला.शंकर मात्र शांत होता.

म्हणाला,"आता मी ठाण्यापर्यंत येतो म्हणजे सामान उतरवायला तुम्हाला त्रास होणार नाही!"


शंकरचं बोलणं ऐकून बच्चेकंपनी खूश झाली.विशेषतः यशा.

त्याच्या गप्पांमुळे भुसावळ पॅसेंजरचा तो कंटाळवाणा प्रवास आता सुखकर होणार होता आणि झालंही तसंच.गप्पांची मैफल जमली.

आजूबाजूचे सहप्रवासीही शंकरचं बोलणं उत्सुकतेने ऐकत होते. विषयांवर विषय निघत गेला अन् शंकरने वाड्यातल्या मारवाडी भाडेकरूंची गंमत सांगायला घेतली.


वाड्यात राहणारं हे मारवाडी कुटुंब किमान पंचवीस जणांचं भक्कम कुटुंब होतं.चार भाऊ आणि त्यांची कुटुंबं गुण्यागोविंदाने राहत होती.त्यांची स्वतःची एकूण मुलंच दहाबारा होती.त्याशिवाय शिकायला म्हणून खेडेगावातून आलेली नातेवाईक मुलं वेगळीच. शंकरकडे केस कापायला म्हणून त्यांची फेरी महिन्यादोनमहिन्यांनी व्हायची.सगळ्या मुलांच्या कटिंगचा कार्यक्रम एकाच दिवशी व्हायचा.ह्या कुटुंबाचं गावात किराणामालाचं सगळ्यात मोठं दुकान होतं. चारी भाऊ त्यांच्या त्यांच्या सवडीनुसार गल्ल्यावर बसून मग कटिंग करायला येत.


दुसऱ्या दिवशी शंकर त्यांच्या किराणामालाच्या दुकानात चक्कर मारी.


"बाबाजी,कालच्या कटिंगचे पैसे ?"


बाबाजींनी डोकी तासलेली मुलं काल पाहिलेली असत. ते गल्ल्यातून शंकरला पैसे काढून देत.दोनचार तासांनी शंकर परत जाई.तोवर गल्ल्यावर दुसरा भाऊ बसलेला असे.


"मामाजी, कटिंगचे पैसे?"


गल्ल्यावर बसलेल्या भावाकडूनही शंकर पैसे घेई. एवढ्या मोठ्या दुकानाच्या पैशातून थोडे आपल्याला मिळाले तर त्यांना काय फरक पडतो अशी परत वर मखलाशी !


शंकरच्या गप्पा चालू असताना कोपऱ्यावरच्या दरवाजातून तिकिट-तपासनीस डब्यात शिरला.त्याला पाहून माई-बापूंसह सगळेच हादरले.कारण शंकरने आयुष्यात रेल्वेचं तिकीट काढलं नव्हतं.आताही नाही, हे सगळ्यांनाच ठाऊक होतं.

शंकर मात्र एकदम शांत होता.पण त्याचा एक डोळा तिकिट तपासनिसाच्या हालचालीवर होता.कारण तीनचार बेंचपलीकडे एका पंचवीसेक वर्षांच्या तरुणाला त्याने विदाऊट तिकीट पकडल्यावर शंकर विजेसारखा उठला.त्या तरुणाची कॉलर धरून त्याला उठवलं आणि दोनचार फटके दिले ठेवून.हे करताना त्याच्या तोंडाचा पट्टा जोरजोरात चालू होताच.


"हरामखोर साले.फुकटचा प्रवास करतात.लाजा वाटत नाहीत ह्यांना ! रेल्वेची सेवा पाहिजे पण त्याचे पैसे द्यायला नकोत.

सरकारने कुठून आणायचे ? एक प्रकारचे देशद्रोहीच आहेत हे!"


असं म्हणत शंकरने आणखी एक दणका त्याच्या पाठीत घातला.धिप्पाड शंकरचं हे रौद्ररूप पाहून त्या तरुणाबरोबरच तिकिट तपासनीसही गांगरला.तोच शंकरकडे त्या तरुणासाठी रदबदली करायला लागला.


"अहो,शांत व्हा.पुढच्या स्टेशनवर उतरेल तो आणि ह्यापुढे तिकीट काढून प्रवास करील.हो की नाही रे ?"


त्या तरुणानेही होकारार्थी मान हलवली.शंकर स्वतःच्या जागेवर येऊन बसला तरी तणतणतच होता. माई-बापूंसह सगळे त्याच्याकडे हतबुद्ध होऊन बघत होते.तिकिट-तपासनिसाने त्या सगळ्यांची तिकिटं तपासली पण शंकरला काही तिकीट विचारलं नाही. उलट त्याच्याकडे छान सुहास्य नजरेने बघत त्याला राम राम करून तो पुढे सरकला.


ठाणं आल्यावर शंकरने सामानासकट सगळ्यांना सुखरूप अशोकच्या हवाली केलं.अशोकच्या आग्रहास्तव त्याच्या घरी तो चार दिवस राहिला.त्याने भाड्याने घेतलेली सायकल गावच्या स्टेशनवरच राहिली होती.तिची मुलांनाच चिंता,

त्याबद्दल त्याला छेडलं तर म्हणाला,"एवढ्या छोट्याशा गोष्टीबद्दल विचार करून आजची मजा किरकिरी करायची नसते !अर्थात तिकीट नसताना रेल्वेत समोरून तिकिट तपासनीस येणं हेदेखील त्याला किरकोळ वाटतं तर भाड्याच्या सायकलचं काय ! ती तर खरंच फारच क्षुल्लक गोष्ट वाटत असणार त्याला.


शंकर ठाण्याला असताना अशोक आणि त्याच्या दोन लहान बहिणी उषा आणि विजू ह्यांनीसुद्धा ऑफिसला दांडी मारली होती.हे सगळे लहानपणचे सवंगडी.शंकर आल्यामुळे त्यांच्या रूटीनमध्येही त्यांना जरा चेंज झाला होता.एकदा माईंनी जेवताना त्याला वाढायचा आग्रह केला.त्यावरून गोष्ट निघाली.


शंकर सांगू लागला -


शंकरचा बालाजी नावाचा मामेभाऊ गावातच राहत होता.शंकरच्याच दुकानात कामही करत होता आणि बँडपथकात ड्रमदेखील वाजवत होता.बालाजी काही वर्ष मुंबईला राहिला होता. त्याला त्याच्या वागण्या-बोलण्यातून तसं दाखवून द्यायला आवडायचं.तसा त्याचा नेहमी प्रयत्न असायचा.


एकदा एका खेड्यात एका खूप मोठ्या बागाईतदाराच्या मुलाचं लग्न होतं.शंकर आणि बालाजी ज्या बँडपार्टीत होते त्यांना लग्न वाजवण्याची सुपारी मिळाली होती. त्या गावात जाताना बालाजी सगळ्यांसमोर थोड्याशा आढ्यतेने म्हणाला,


"असं श्रीमंतांच्या घरचं लग्न वाजवायचं म्हणजे माझ्यापुढे धर्मसंकट उभं राहतं.कारण मला गोड पदार्थ अजिबात आवडत नाहीत आणि जबरदस्तीने खावे लागले तर मळमळायला लागतं."


शंकरने ही गोष्ट लक्षात ठेवली.अर्थात बालाजी गोड पदार्थ आवडीने खातो हे शंकरला माहीत होतं.पण तो त्यावेळी मुद्दामच काही बोलला नाही.ठरल्याप्रमाणे बँडपथक लग्नाला गेलं.लग्नात आणि वरातीत बँड वाजवून झाल्यावर व्याह्यांच्या पंक्तीनंतर बँडपथकातली मंडळी जेवायला बसली.बँडवाल्यांवर खूश झालेले यजमान स्वतः जातीने वाढप्यांवर देखरेख करत होते. जेवणाचा बेत मोठा नामी होता.पंचपक्वान्नं होती. जिल्ह्यातले नामांकित आचारी स्वैपाकाला बोलावलेले होते.पंक्तीत मुद्दाम शंकर बालाजीच्या शेजारी बसला. एक एक वाढपी येऊन वाढायला लागला.पाकाने भरलेले मोठ्ठाले गुलाबजाम घेऊन वाढपी आला.ते पाहून बालाजीच्या तोंडाला चांगलंच पाणी सुटलं.वाढपी जवळ आला आणि शंकर स्वतःचं पान सोडून बालाजीच्या पानावर जवळजवळ आडवाच झाला आणि "अहो,ह्याला नका वाडू,हयाला त्रास होतो..." असं कळवळून सांगू लागला.


यजमान जवळ येऊन म्हणाले, "अहो,एक तरी चवीसाठी घेऊ द्या..." "अजिबात नको.गोड खाल्ल्यानंतर ह्याला मळमळतं.परत जेवण झाल्यावर आम्हाला एसटीने निघायचंय.प्रवासात त्रास नको व्हायला."


मिष्टात्र घेऊन येणाऱ्या प्रत्येक वाढप्याच्या वेळी शंकरने असाच प्रकार केला.


बालाजीच्या पानात भाजीपोळीशिवाय काहीच दिसेना. सगळ्यांची जेवणं होत आली.शेवटी बालाजीचा संयम संपला.तो शंकरच्या कानात अजीजीने म्हणाला,


"शंकरभाऊ,मला गोड आवडतं.आता वाढप्यांना थांबवू नको.त्या दिवशी हुशारी दाखवायला म्हणून तसं बोललो..."


त्यानंतर मात्र शंकरने वाढप्यांना अडवलं नाही. बालाजीला गोड खाऊ दिलं.


शंकर ठाण्याला असताना गप्पांच्या ओघात हरीचा विषय निघाला.हरी यशाच्या नात्यातलाच होता आणि ठाण्यातच राहत होता.साधारण अशोकच्याच वयाचा असल्याने तो गप्पा मारायला घरी येत असे.हरी स्वभावाने चांगला होता.पण त्याला कुठलीही गोष्ट जरा वाढवून-चढवून सांगायची खोड होती.अशोक हरीचा उल्लेख 'नव्याण्णवबादी' असा करायचा.म्हणजे हरीच्या नव्याण्णव गोष्टी आपण बाद धरायच्या आणि एकच गोष्ट खरी मानायची.


हरी आपण कसे शूर आहोत,कधीच कुणाला कसे घाबरत नाही,प्रसंगावधानी तर कसे नंबर एकचे आहोत हे छाती फुगवून सांगत असे.हरी मूळचा नासिकचा. तिथे त्याच्या हातून एक अतिशय किरकोळ गुन्हा झाला होता.एवढी एक गोष्ट माहीत असणं शंकरला पुरेशी होती.तो अशोकला म्हणाला,


"आज रात्री आपण हरीकडे जाऊ या.मी त्याच्या सगळ्या फुशारक्या बाहेर काढतो!"


रात्री शंकर,अशोक,उषा आणि विजू हरीच्या खोलीवर गेले.त्या तिघांना बाहेरच उभं करून शंकर एकटाच आत गेला.आत जाताच शंकरने हरीची गचांडी पकडून थोडी हिसडली आणि तो आवाज चढवून म्हणाला,


"नासिकला गुन्हा करून इथे येऊन लपून बसलास काय? पोलीस म्हणजे कोण वाटले ?आमचे हात फार लांब असतात.आमच्या पंजातून कुणीच सुटू शकत नाही!"असं म्हणून शंकरने आपल्या राकट हाताने हरीचं मनगट गच्च पकडलं.


ह्या अचानक हल्ल्याने हरी बावचळला.तो शंकरला ओळखत नव्हता.खराच पोलीस आपल्या दारावर आला आहे असं वाटून तो चांगलाच घाबरला.अगदी रडकुंडीला येऊन गयावया करायला लागला.


"शेजाऱ्यांना पोलीस आले म्हणून कळेल,हळू बोला हो..." म्हणून विनवण्या करायला लागला.तेव्हा शंकरने त्या तिघांना हाक मारून आत बोलावलं.तेव्हापासून हरीने ह्या तिघांपुढे कधीही बढाया मारल्या नाहीत.


यशाच्या गावाजवळच अनकाईचा किल्ला आहे.गडावर जागृत शंकराचं देवस्थान आहे.श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी तिथे मोठी जत्रा भरते.यशा पाचसहा वर्षांचा असतानाची गोष्ट.गल्लीतल्या बरोबरीच्या सगळ्या मुलांनी घरच्यांच्याबरोबर कधी ना कधी अनकाईच्या यात्रेला हजेरी लावलेली होती.एकटा यशाच राहिला होता.ना त्याने अनकाई पाहिली ना अनकाईची जत्रा. त्यामुळे मुलं त्याच्यासमोर मुद्दामच यात्रेचं रसभरीत वर्णन करीत.तसतशी अनकाईला जाण्याची यशाच्या मनातली आस वाढत असे.


एका श्रावणी सोमवारी शंकर अनकाईला जाणार असल्याचं समजल्यावर यशा त्याच्यामागे लागला. सुरुवातीला शंकरबरोबर पाठवायला माई तयारच नव्हत्या.


"शंकर,तू सतरा पिंपळावरचा मुंजा ! तुला पावलापावलावर ओळखीचे लोक भेटणार.तुझं यशाकडे लक्ष राहणार नाही.त्यात यशापण थोडासा वांड.त्यामुळे तुझ्याबरोबर पोराला पाठवायला माझं मन काही धजावत नाही..."


"माई,तुम्ही काही काळजी करू नका.मी यशाला फुलासारखा जपेन." अशी शंकरने माईंना पुन्हा पुन्हा खात्री दिल्यानंतर अखेर माई यशाला शंकरबरोबर पाठवायला राजी झाल्या.


सकाळी सकाळी यशा,शंकर आणि बालाजी एसटीने अनकाईला निघाले.जाताना उत्साहाच्या भरात यशा त्या दोघांबरोबर झपाझप चालत होता.मात्र गडावर जाईपर्यंत तो थकून गेला.वरती गेल्यावर देवाचं दर्शन घेतलं आणि मग शंकर-बालाजीबरोबर तो उत्साहाने यात्रेत भटकला.खाली जायची वेळ झाली तोपर्यंत दुपारचं ऊन खूप चढलं होतं.आता यशाला एक पाऊल उचलणंही जड जाऊ लागलं.त्याने शंकरभाऊला सांगितलं,


भाऊ,मला अजिबात चालवत नाही आता..."


शंकरने क्षणभर विचार केला आणि म्हणाला,


"यशा,आता ह्यापुढं गड उतरेपर्यंत तू एकही सबुद बोलायचा नाहीस.कुनी काही विचारलं तरी उत्तर द्यायचं नाहीस.समजलं ?"


यशाने मुकाटपणे मान हलवली.शंकरने खाली उतरण्याच्या वाटेवर एका गर्दीच्या ठिकाणी यशाला आणलं आणि दिलं सोडून.थोडा बाजूला जाऊन तो जरा मोठ्यानेच बालाजीला म्हणाला,


"पोरगं हरवलेलं दिसतंय... बरोबर कुनी नाही..." एवढं बोलून तो आणि बालाजी बाजूला जाऊन उभे राहिले. यशाभोवती घो घो माणसं जमली.लोक नाव काय, कुठला वगैरे प्रश्न विचारत होते पण यशा मुक्यासारखा गप्प उभा होता.बायाबापड्या यशाच्या अलाबला काढू लागल्या.


'मुकं दिसतंय गं बाई पोर...'


'चांगल्या घरचं दिसतंय लेकरू...'


'आता काय करावं...'


'त्याची मायपण त्याला शोधत असेल...'


असे विविध उद्‌गार ऐकून यशाला आपोआपच रडू यायला लागलं.आजूबाजूच्या मंडळींनी यशाचं तोंड आणि खिसे गुडदाणी,रेवड्या,गुडीशेव ह्यांनी भरून टाकले.एसटी स्टँड जवळच्या पोलीस स्टेशनवर यशाला घेऊन जायचं ठरलं.आजूबाजूच्या बाप्यांनी यशाला खांद्यावर घेतलं अन् हातोहात गडाखाली आणलं.एसटी स्टँड जवळ आल्यावर इकडे तिकडे बघत असलेला शंकर पुढे आला आणि म्हणाला,


"ह्या पोराला मी वळखतो.माझ्या बाजूच्याच गल्लीत ह्याचं घर हाय."


यशाला ज्यांनी उचलून आणलं होतं त्यांनी 'ह्या माणसाला ओळखतोस का ?' म्हणून यशाला विचारलं. यशाने मान हलवून होकार दिला.शंकरने यशाला सोबत घेतलं.मध्ये इतकी वर्षं गेली... शंकरही गेला.पण त्या दिवशी यशाला मुक्याचं सोंग करायला सांगणाऱ्या शंकरच्या आठवणीने आज यशाचे शब्द संपतात आणि यशा मुका होतो !


समाप्त….।

२९/१२/२५

शंकर  / Shankar

शंकरसारखी वल्ली यशाने आयुष्यात पाहिली नाही आणि त्याची खात्री होती की,अन्यही कुणी पाहिली नसेल.सहा फुटांवर उंची,

धिप्पाड बांधा,डोक्यावर कधीही न विंचरलेले कुरळे केस,असा करवंदी रंगाचा शंकर नेहमीच कधीकाळी पांढरा असलेला मळका पायजमा नि त्याहून मळका असलेला गुडघ्यापर्यंत लांबीचा शर्ट ह्या वेशात असे.गणपतीचे दहा दिवस यशाच्या गावी रात्री प्रत्येक गल्लीत पाचेक मिनिटांची नाटुकली गल्लीतलीच मंडळी सादर करीत.ह्या प्रकाराला 'सोंग' म्हणत.लोक घोळक्या घोळक्यांनी ही सोंगं बघायला गावभर फिरत.थोडीशी गर्दी जमायला लागली की,पडदा बाजूला होई नि 'सोंग' चालू होई. अशा सोंगाच्या वेळी शंकरला फार डिमांड असे.तंट्या भिल्लाचा किंवा एखाद्या राक्षसपार्टीचा रोल शंकर मेकपशिवायदेखील करू शकला असता.

मेकप केलेला शंकर आरडाओरडा करत दाणदाण पावलं आपटत स्टेजवर जो धांगडधिंगा करी त्याने पोरसोरंच काय पण बाया

बापड्याही घाबरून जात.बरेचसे लोक शंकरचा रोल पाहायला पंधरा मिनिटांनी होणाऱ्या पुढच्या प्रयोगासाठी थांबत.


महाहजरजबाबी शंकर राकट आणि रासवट ग्रामीण संस्कृतीचा एक इरसाल नमुना होता.तो पेशाने न्हावी होता.यशाच्या मोठ्या भावाचा अशोकचा खास मित्र होता.अशोक पहिल्यांदा शिकायला नि नंतर नोकरीला मुंबईला जाऊन कित्येक वर्ष झाली पण शंकर वाड्यावर दररोज काही हवं-नको बघायला म्हणून चक्कर मारून

जायचा.एक दिवस जरी त्याची फेरी चुकली तरी घरच्या सगळ्यांना चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं,शंकर घरी आलेला दिसला की,

यशादेखील खेळ मध्येच सोडून घराकडे पळायचा.मैफल रंगवण्यात शंकर वस्ताद होता. गावातल्या सगळ्या भल्याबुऱ्या बातम्यांचा त्याच्याकडे स्टॉक असायचा आणि त्या तो स्वतःच्या टीकाटिपणी सह खुमासदारपणे सांगायचा.पिक्चरची स्टोरी छोट्या छोट्या तपशिलासह तर सांगायचाच


पण त्याला समजलेले डायरेक्शनचे पॉइंट्ससुद्धा तो सांगत असे.

संगीतातलं मात्र त्याला फारसं गम्य नव्हतं. पिक्चरमधल्या गाण्यांची तो 'गानी पन लई भारी हैत' अशा एका वाक्यात बोळवण करायचा.तीन तासांची पिक्चरची स्टोरी सांगायला त्याला साडेतीन तास लागायचे.


यशाच्या घाटावरल्या गावात मासे मिळणं दुर्मीळच.पण एकदा शंकरला ते कुठूनसे मिळाले.यशाची थोरली बहीण मीरा तेव्हा जेमतेम सहावीत होती. ती शंकरला म्हणाली,"शंकरभाऊ,मी नॉनव्हेज कधीच खाल्लं नाही. मला मासे खायची फार इच्छा आहे." शंकरने तिला संध्याकाळी येऊन आपल्या घरी घेऊन जायचं कबूल केलं.त्या दिवशी नेमका रविवार होता.दर रविवारी वाड्याच्या बाहेरच्या ओट्यावर संध्याकाळ पासून ब्रीजचा अड्डा बसायचा.बापू आणि गावातली प्रतिष्ठित मंडळी ब्रीज खेळायला लागली की,त्यांना वेळेचं भान राहत नसे.त्या दिवशी जेवण आटोपून रात्री आठच्या सुमारास दत्त मंदिराच्या बाजूने गल्लीत आत शिरत असलेल्या मीराला बापूंनी पाहिलं.वाड्यात मांसमच्छी वर्ज्य असल्याने शंकरकडच्या जेवणाचा बापूंना पत्ताच नव्हता.

दिवेलागणीच्या आत लहान मुलांनी घरात असलं पाहिजे असा दंडकच होता. त्यामुळे थोड्याशा रागातच बापूंनी मीराला 'कुठे गेली होतीस?' म्हणून विचारलं.शंकरने आधी पढवलं होतं तरी घाबरून मीराने 'शंकरभाऊकडे मासे खायला गेले होते'असं सांगून टाकलं !


'मासे' शब्द ऐकताच ओट्यावर भूकंप झाला !


जानवी थरारली !!


शेंड्यांना झिणझिण्या आल्या !!!


बापूंचेही डोळे विस्फारले.


पन्नास वर्षांपूर्वीच्या ग्रामीण भागात वाड्यावरच्या मुलीच्या तोंडून मासे ऐकून वातावरण स्तब्ध-क्षुब्ध झालं ! मीरा काही तरी गोंधळ घालेल ह्याची कल्पना असल्याने मागून लगबगीने आलेला शंकर पुढे येऊन म्हणाला,"बापू,आमच्याकडे कुमारिकेला पुरणाचे मासे करून घालण्याचा कुळधर्म असतो म्हणून माईंना विचारून मीराला घेऊन गेलो होतो."


बापूंनी सुटकेचा निःश्वास सोडलेला सगळ्या गल्लीने ऐकला.केस कापण्यासोबत शंकर बँडसुद्धा वाजवत असे.बँडवादनात क्लॅरोनेट वाजवणाऱ्याने मुख्य ओळ वाजवल्यावर मागून कोरस वाजवणाऱ्यांपैकी शंकर एक असायचा.पितळेचं ते वाद्य ओठांशी लावून गाल फुगवून वाजवणारा शंकर बघायला सगळ्या मुलांना फार मजा वाटायची. लोक म्हणत,"शंकर वाद्य ओठांना लावून नुसते गाल फुगवतो.बँड वाजवण्याचा त्रास घेतच नाही!"क्लॅरोनेट वाजवणाऱ्या माणसाच्या कानावरपण ही गोष्ट गेली.त्याने शंकरशी भांडण केलं.अन् त्यात तो शंकरला काही वावगं बोलून गेला.शंकर त्यावेळी उलट काहीच बोलला नाही.पण त्याने गल्लीतल्या लहान मुलांना बोलावून त्यांच्याशी काही कानगोष्टी केल्या. पुढच्या वेळी वरातीत क्लॅरोनेट वाजवणारा सुरेश ऐटीत बँडपथकाच्या सर्वात पुढे गल्लीत शिरताना वानरसेनेने पाहिला.त्या वानरसेनेत एका वानराच्या भूमिकेत यशासुद्धा होता.बँडचा आवाज लांबूनच ऐकून मुलं तयारीत राहिली.


गल्लीच्या मध्यभागाच्या चौकात वरात थांबली. वरातीतली हौशी माणसं नाचू लागली.त्यांच्यावरून नोटा ओवाळून बँडवाल्यांना देण्याची चुरस लागली.मुलांनी काल रात्री शंकरने त्यांना आणून दिलेल्या गाभुळ्या चिंचांचे आकडे खिशातून बाहेर काढले आणि सुरेशच्या पुढे ते नाचवत,त्याला दाखवत चवीने मिटक्या मारत खायला सुरुवात केली.सुरेशच्या तोंडाला पाणी सुटलं.


क्लॅरोनेटमधून 'फुर्रर्र ऽऽऽ' असा विचित्र आवाज येऊ लागला.बँड थांबला.साहजिकच नाचणाऱ्यांच्या रंगाचा बेरंग झाला.तोपर्यंत मुलं कुणी मारुतीच्या पारावरच्या झाडामागे तर कुणी देवळाच्या आडोशाला जाऊन लपली.वरातीतल्या लोकांना ती दिसली नाहीत पण सुरेशला ती चिंचा खाताना दिसत असल्याने त्याला नीट वाजवता येत नव्हतं.पाचेक मिनिटं हा तमाशा झाल्यावर मुलांनी चिंचा फेकून दिल्या आणि ती सगळी साळसुदासारखी ओट्यावर येऊन उभी राहिली.


क्लॅरोनेट आणि नाच परत सुरू झाले.वरात पुढे गेली. दोन गल्ल्या सोडून बालाजी गल्लीच्या चौकात वरात गेली तर तिथली वानरसेना अशीच कामाला लागली. तेव्हा सुरेशला ह्या सगळ्याचा कर्ताकरविता कोण असावा त्याचा अंदाज आला.नंतर सुरेशने वाईटवंगाळ बोललेल्या शब्दांसाठी शंकरची माफी मागितली. शंकरनेही त्याला माफ केलं.पुढे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र झाले.एकदा घरी गप्पांचा अड्डा चांगलाच रंगला होता.अर्थात त्याचा केंद्रबिंदू शंकरच होता.गप्पांचे विषय गाडीने ट्रॅक बदलावा तसे ह्या विषयावरून त्या विषयावर जात होते. 


होता होता विषय 'अंगात येणं' ह्या विषयावर येऊन ठेपला.त्या काळात परदेशीपुऱ्यातली कमळाबाई फारच प्रसिद्ध झाली होती.काळीसावळी पण तरतरीत कमळाबाई टिळकचौकात भरणाऱ्या भाजीबाजारात भाजी विकण्याचा व्यवसाय करत होती.मात्र नवरात्रातले नऊ दिवस आणि वर्षातल्या प्रत्येक शुक्रवारी तिच्या घरी तोबा गर्दी जमत असे.लोक त्यावेळी तिच्या घराला 'देवीचा दरबार' म्हणत.आजूबाजूला धूप लावल्याने वातावरण मंत्रमुग्ध झाल्यासारखं होई.त्यात कमळाबाईचे भक्त एका बाजूला बसून देवीची भजनं म्हणत.दरबार ठासून भरल्यावर कमळाबाई न्हाऊन मोकळे सोडलेले लांबसडक केस मोर -

पिसाऱ्यासारखे मिरवत मळवट भरलेल्या कपाळाने,अर्धवट मिटल्या डोळ्यांनी दरबारात प्रवेश करी.मग बराच वेळ 'देवीचं खेळणं' म्हणजे नाचणं होई आणि मग लोकांच्या प्रश्नांना कमळाबाई उत्तरं देई.सुमारे दोन तासांनी ती अंग टाकून धाडकन् खाली पडे.भक्तगण देवीची आरती करीत. थोड्या वेळाने कमळाबाई शुद्धीवर येई.


गावातल्या जवळजवळ सगळ्यांनीच कुणी भक्तिभावाने, कुणी करमणूक म्हणून, कुणी उत्सुकता म्हणून तर,कुणी टिंगलटवाळी करायची म्हणून कमळाबाईच्या दरबारात कधी ना कधी हजेरी लावली होती.शंकरच्या गप्पा ऐकायला मारवाडी कुटुंबातल्या काही मुली-मुलंपण आली होती.त्यातली सजनबाई भक्तिभावाने म्हणाली,


"कमलाबाईचं अंगात येणं मात्र खरं आहे बरं का, शंकरभाऊ."


शंकर म्हणाला, "असं कुणाच्याही अंगात यायला देवीला काय कामधंदे आहेत का नाही ? सरळ देवळात जावं नि नमस्कार करावा." बोलता बोलता मंडळीत दोन तट पडले.एका ग्रुपचं म्हणणं कमळाबाईच्या अंगात येणं खरं आहे त्यामुळेच ती अंगात आल्यावर एवढी तेजस्वी दिसते.तर, दुसऱ्या ग्रपुचा ह्या अंगात येण्यावर विश्वास नव्हता.बरेचसे लोक तटस्थ आणि गोंधळलेले होते. ( गावगोत,माधव सावरगांकर,अष्टगंध प्रकाशन )


"शंकर,तुला काय वाटतं?" माईंनी विचारलं.


शंकर म्हणाला,"माई,अहो हे सगळं थोतांड आहे.हवं असेल तर मी ते कमळीच्या तोंडूनच वदवून घेईन आणि नंतर काय झालं ते तुम्हाला सांगेन !"


ठरल्याप्रमाणे एका शुक्रवारी कमळाबाईच्या दरबारात शंकर गेला.एका कोपऱ्यात शांतपणे जाऊन बसला. कमळाबाईने दरबारात प्रवेश करताच शंकरला पाहिलं होतं.'हा इब्लिस माणूस आज इथे कशाला आला?' असा एकीकडे विचार करत करत तिने


प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम पूर्ण केला.त्यानंतर तिला नमस्कार करण्यासाठी एकच झुंबड उडाली.शंकरही त्या गर्दीत सामील झाला.कमळाबाईचं अर्धवट मिटल्या डोळ्यांनी त्याच्याकडे लक्ष होतंच.शंकर नमस्कारासाठी खाली वाकला.डोकं वर उचलताना त्याने कमळाबाईच्या कमरेचा पैशांनी भरलेला कसा सफाईने खसकन् ओढून घेतला.कमळाबाईच्या ते लगेच लक्षात आलं.पण त्या वेळी शंकरला हटकणं तिला शक्य नव्हतं.


दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी घरच्या देवाची पूजा आटोपून शंकर दुकानात जाण्याच्या तयारीत असताना कमळाबाई शंकरच्या घरी आली.म्हणाली,"शंकरभाऊ, माझा काल घेतलेला पैशाचा कसा दे!"


"कसा ? कसला कसा? अन् मी कधी घेतला? अन् मी घेतलेला तुला कसं समजलं ? अन् समजलं तर तू कालच का नाही बोललीस ? तेव्हा तर तू कमळी नव्हतीस ना ? देवीला अशा पैशांच्या गोष्टींत काय इंटरेस्ट ? आणि अंगातून देवी उतरल्यावर तुला त्या वेळेचं कसं काय समजलं ?"


कमळाबाई शंकरच्या प्रश्नांच्या सरबत्तीने हैराण झाली. कुणालाही न सांगण्याच्या शर्तीवर तिने कबूल केलं की, लहानथोरांकडून महत्त्व मिळावं म्हणून ती हे नाटक करत होती.   


अपुरे…!



२७/१२/२५

राणी मेली ! The queen is dead !

एक कामकरी मुंगी मेली,फार कशाला,हजार कामकरी मुंग्या मेल्या तरी वारूळ जिवंत राहील,स्वतःला दुरुस्त करत राहील,म्हणूनच तर वारुळाला महाप्राणी म्हणायचं.राणीचं अंडी देणं थांबलं,तर मात्र ते पुन्हा मार्गी लावावं लागतंच,नाहीतर वारूळ मरतं.


आणि आता वीस वर्षांनंतर ती वेळ आली होती. वारुळाच्या आयुष्यातली सर्वांत मोठी आपत्ती होती, राणीचा मृत्यू.पण राणी मेली आहे याची खात्री होईपर्यंत कामकरी मुंग्या काही करू शकत नव्हत्या.काहीतरी बिनसलं आहे,हे त्यांना कळत होतं.पण बिघाडाच्या खुणा अजून पुसट होत्या.त्यांना प्रश्न किती मोठा, मूलभूत आहे,ते कळत नव्हतं.वारूळ नेहमीच्या गडबडीनं,

नेमकेपणानं वागत राहिलं.आपलं तारू भरकटून किनाऱ्यावरच्या खडकांकडे जात आहे,हे त्यांना उमगलं नव्हतं.गडबडीची वागणूक सुरूच राहण्याचं मूळ होत मुंग्यांच्या एकमेकींना संदेश

देण्याच्या पद्धतीत.त्या बहतांश आयुष्य जमिनीखालच्या अंधारात काढायच्या,त्यामुळे डोळ्यांनी पाहणं त्यांना दुय्यम महत्त्वाचं होतं.त्या एकमेकींशी आवाजानं तोंडानं बोलू शकत नव्हत्या.

आपण माणस दृष्टीने दाखवलेल्या चित्रांचा विचार करतो;कानांनी ऐकलेल्या आवाजांचा विचार करतो.मुग्या मुख्यतः वास आणि चवींमुळे विचार करतात.त्यांना वास येतात,चवी समजतात.चित्र 'दिसत' नाहीत,आवाज ऐकू येत नाहीत.त्यांच्या मेंदूना मुख्यतः फेरोमोन्स नावाच्या रसायनांनीच माहिती मिळते. त्या रसायनांच्या वासांमधून,चवींमधून मुंग्यांच्या मनांमध्ये कोणती चित्रं बनतात,त्या चित्रांचा अर्थ मुंग्या कशा लावतात,हे सगळं आपल्याला समजू शकत नाही. आपल्याला त्यांची संदेश घेण्यादेण्याची कल्पना नीटपणे करता येतच नाही.कसं सांगतात त्या,"तिकडे अन्न आहे, चला घेऊन येऊ या."असं? रसायनांच्या कोणत्या मिश्र-वासाने,मिश्र चवीनं,"घाई करा, शत्रू येतो आहे!" असं सांगतात त्या? आपल्याला ही वास-चवींची ज्ञानेंद्रियं नाहीत.आपल्याला मुंग्यांची धावपळ,

लगबग सगळी शांत,निःशब्द वाटते.प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात वास-चवींच्या संदेशांचा गोंगाट सुरू असतो,आपल्या आकलनापलीकडचा.डझनभर फेरोमोन्सच्या मिश्रणांमधून ही 'बोलाचाली' सुरू असते.राणीच्या शरीरातून निघणाऱ्या फेरोमोन्सचा मुंग्यांच्या भाषेत अर्थ असतो,


"इकडे या.माझ्यापाशी या. मला स्वच्छ ठेवा.मला जेवू घाला.माझ्या शरीरातनं जी द्रव्यं मिळतील,ती तुमच्या बहिणींशी वाटून घ्या." आणि कामकरी मुंग्यांनी ही आज्ञा ऐकली.त्या आपल्या जिभांनी राणीला चाटत राहिल्या.त्या चाटण्याचे अंश इतर मुंग्यांमध्ये वाटत राहिल्या.


प्रत्येक मुंगीच्या पोटाच्या पुढच्या भागात हे आज्ञा देणारे फेरोमोन्स गेले.त्यांच्या अन्नात ते आज्ञा-फेरोमोन्स मिसळले गेले.प्रत्येक मुंगी तिला भेटणाऱ्या मुंग्यांचे वास घेत असते.तिची शिंगं म्हणजे आपलं नाक,समजा. एका मुंगीनं दुसऱ्या मुंगीला शिंगांनी चाचपलं,की दुसरीचा वास पहिलीला कळतो.भरपूर जेवलेल्या,पोट भरलेल्या मुंगीचा वास सांगतो,"हा वास घे.उपाशी असशील,तुला भूक लागली असेल,तर हे खा."आणि जर पुढ्यातल्या मुंगीनं जीभ बाहेर काढली,तर पोट भरलेली मुंगी त्या भुकेलीच्या जिभेवर थोडंसं अन्न ओकते.पक्षी आपल्या पिल्लांना असेच घास भरवतात.


याच प्रकारान इतर माहितीचीही देवाणघेवाण वारुळातल्या मुंग्यांमध्ये सुरू असते.माणसांच्या शरीराचे अवयवही एकमेकांशी अशा हॉर्मोन नावाच्या रसायनांनी 'बोलत'असतात.एकूण वारूळ हा एक महाप्राणी सर्व मुंग्या या त्या महाप्राण्याचे अवयव.ते अवयव फेरोमोन्स वापरून 'बोलतात', मुंग्यांच्या मेंदूना ती रासायनिक भाषा समजते.सूचना, विनंत्या,आज्ञा,सगळं रसायनांमधून वाहत जाते.


पायवाट-वारुळाजवळ एकदा एका पक्ष्यानं एक नाकतोडा पकडला.पक्षी नाकतोडा चोचीत धरून घरट्याकडे जात असताना त्याचे काही तुकडे खाली जमिनीवर पडले.मिनीटभरात एका कामकरी मुंगीला ते नाकतोड्याचे तुकडे सापडले.ती नाहीतरी असलं अन्न शोधतच फिरत होती.अन्न मिळाल्याबरोबर पूर्वीपासून घडत आलेली एक घटनांची साखळी घडू लागली. मुंगीनं नाकतोड्याची चव घेतली,आणि ती वारुळाच्या दाराकडे पळत सुटली.रस्ताभर ती अधूनमधून आपलं पोट जमिनीवर टेकवायची.

यातून जमिनीला थोडंसं रसायन लागायचं,आणि अन्नापासून वारुळापर्यंतची वाट रेखली जायची.वारुळात शिरल्यावर मुंगी घाईघाईनं इतर मुंग्यांना भेटायला लागली,तोंडाजवळ तोंड न्यायला लागली.तिनं असं केलं,की नव्या मुंगीला नाकतोड्याचा वासही मिळायचा,आणि त्याच्यापर्यंत पोचायच्या वाटेचाही वास मिळायचा.सूचना असायची,"अन्न आहे, मला सापडलेलं.चला,मी रेखलेल्या वाटेनं जा,आणि अन्न कमावून आणा!"


लवकरच मूळ मुंगीची सूचना मिळालेल्या मुंग्यांचा घोळका नाकतोड्याकडे धावत सुटायचा.नाकतोड्याचा एखादा कण उचलून त्या माघारी वारुळाकडे धावल्या. त्याही पोट जमिनीला टेकवत होत्या,आणि अन्नाची वाट जास्त स्पष्ट करत सांगत होत्या,"मदतीला या.भरपूर अन्न आहे,या वाटेवर!" मुंग्यांचा एक घोळका नाकतोड्याचा एक पाय वारुळाकडे ओढायला लागला, सगळ्या मिळून काम करत होत्या.एक चिमणी काय गडबड चालली आहे ते पाहायला आली.तिनं नाकतोड्याच्या पायाला टोच मारली.सगळ्या मुंग्या विखुरल्या.आता त्यांच्या जबड्याजवळच्या एका ग्रंथीतून वेगळंच रसायन हवेत पसरलं,"धोका! मोठा धोका! पळा ! इथून दूर जा!" पायवाट-वारुळातले सगळे संवाद असे चालायचे,आणि त्या संवादांमधून कामं व्हायची. कधीकधी फेरोमोन्सच्या गंध-चवींसोबत स्पर्शातूनही संदेश दिले-घेतले जायचे.रसायनांची प्रमाणं, रसायनांची मिश्रणं यांमधून शब्द,वाक्यं घडायची. रसायन कुठे सोडलं जातं आहे,कोण सोडतं आहे, यालाही अर्थ असायचा.असं शब्दभांडार वाढत जायचं. वारुळाची भाषा समृद्ध व्हायची.


"ये, मी तुला चाटून स्वच्छ करते."


"कामाला लाग,त्या इतरांसारखी."


"मी या प्रकारची आहे,या स्थितीत आहे."


"चला,इथे रसायन पसरू या,आणि इतरांना सांगू या, की हा आमचा प्रांत आहे."


"सैनिक कमी पडताहेत.जरा बालगृहात जास्त सैनिक वाढवा."


"सैनिक फार होताहेत.जरा बालगृहात सैनिक कमी करा."


"नवी राणी व्हायला कोण धडपडतं आहे?"


सर्व मुंग्या फेरोमोन्सच्या ढगांमध्ये,प्रवाहांमध्ये वावरत असायच्या,आणि त्यातून संदेश घेत असताना स्वतःही त्यात संदेश सोडत असायच्या.काही संदेश फार दूरही जात नसत,आणि फार वेळही टिकत नसत.उदाहरण म्हणून "धोका!" हा संदेश घ्या.

एखाद्या जागी धोका असला तरी सगळ्या वारुळाला न घाबरवता,

फार वेळ जवळपासच्यांना न घाबरवता तो संदेश विरून जायचा. उलट्या टोकाला कामकरी मुंग्यांनी राणीशी कसं वागावं याबाबतचे संदेश सावकाशपणे दूरवर पसरायचे आणि जवळपास कायम टिकून राहायचे.राणी मेल्यानंतरही कामकरी मुंग्यांना ते जाणवायला वेळ लागला,कारण राणीचं प्रेतही राणीबाबतचे संदेश देतच राहिलं.राणीचं अस्तित्व पायवाट वारुळाच्या फेरोमोन्समध्ये सर्वत्र विणलं गेलं होतं.सगळ्या मुंग्यांच्या शरीरांमध्ये राणीचे फेरोमोन्स होते.ती वारुळाची खूणच होती म्हणा. मुंग्यांच्या शरीरांवर पातळसा मेणचट थर असायचा, राणीच्या फेरोमोन्सनी भरलेला.एखादी भेटणारी मुंगी आपल्या वारुळातली की बाहेरची,हे त्या वासानं तत्काळ कळायचं.दोन मुंग्या भेटल्या रे भेटल्या,की झपाट्यानं एकमेकींच्या अंगांवरून शिंगं फिरवायच्या. माणसांच्या डोळ्यांना दिसायचंही नाही,इतक्या वेगानं हे चाचपणं घडायचं,आणि उत्तर यायचं, "आपली" किंवा "परकी".भेटलेली मुंगी आपली असेल,तर सुखानं आपल्या कामाला लागायचं,किंवा तिला कुरवाळून दोस्ती दाखवायची.पण जर वेगळ्या वारुळातली मुंगी असेल,तर पळ तरी काढायचा,नाहीतर मारामारी तरी करायची.

बोलणं नाही,चालचलणुकीत वैशिष्ट्यं नाहीत. त्याची गरज नाही.वास पुरेसा आहे,


आपलं-परकं ठरवायला.वारुळाला सांधून ठेवणार, महाप्राणी बनवणार,ते राणीचे फेरोमोन्सचे वास.सगळी ओळख शुद्ध रासायनिक,ती जर हरवली,तर वारूळ विस्कटणार.आपसात भांडणं होणार,बाहेरच्यांना हल्ले करायला वाव मिळणार,शत्रू येऊन सहज एकेक मुंगीला खाऊन टाकणार.राणीच्या प्रेतातून बाहेर पडणारे फेरोमोन्स कमी होत गेले.तिचा वास मंदावत गेला. तिच्या शरीरातले काही भाग खाल्ले गेले इतर भाग वारुळाच्या प्रेतागारात नेले गेले.


राणी मेल्याच्या तिसऱ्या दिवशी तिच्यातून उमटणारी वारुळाची ओळख पटेनाशी झाली.नेहमीच्या वासांसोबत एक कुजण्याचा वास यायला लागला. राणीची स्तब्धता,हालचाल थांबणं,काहीच महत्त्वाचं नव्हतं.ती पाठीवर झोपून पाय हवेत असते तरी कामकरी मुंग्यांना फरक पडला नसता.तिचा रंग बदलून लाल,निळा,चंदेरी,सोनेरी झाल्यानंही फरक पडला नसता.मृत्यूचा वासच राणीच्या मृत्यूची बातमी कामकऱ्यांना देऊ शकत होता, इतर काही नाही.मृत्यूचा वास


माणसाच्या विष्ठेचा वास,सडक्या मासळीचा दुर्गंध,हे सगळे मुंग्यांच्या ओळखीचे असतात.इतरही विषारी पदार्थांचे वास मुंग्या ओळखतात,आणि ते ज्या जागी भेटतात तिथून त्या दूर पळतात.

मृत्यूचा वास मात्र फक्त चरबीचं विघटन होताना येणारं ओलेइक आम्ल आणि त्याचे क्षार यांच्याशी मुंग्यांच्या मनांत जोडलेला असतो. माणसांना हे वास बिनमहत्त्वाचे वाटतात. मुंग्यांना मात्र ते वास सांगतात,"मृत!" आणि जर मेलेली मुंगी आपल्या वारुळातली असेल तर मुंग्या त्या प्रेताची विल्हेवाट लावतात.


राणीच्या मृत्यूनंतर आठवड्याभरानं हा मृत्यूचा वास मुंग्यांना जाणवू लागला.त्यांच्या राणीचं प्रेत चाटण्यानं प्रेताचे तुकडे पडू लागले.एकेक करून ओलेइक आम्लाच्या,त्याच्या क्षारांच्या वासानं लदबदलेले तुकडे कामकरी मुंग्या राणी-दालनाबाहेर नेऊ लागल्या. काहीही क्रियाकर्म नाही.विधी नाहीत.पूजा नाहीत. शोकसभा नाहीत. केवळ ओलेइक वासांचे तुकडे घेऊन प्रेतागाराकडे जाणाऱ्या मुंग्यांमुळे वारूळभर बातमी पसरली,"राणी मेली!" प्रेतागार काही विशेष नव्हतं. अगदी राणीसाठीसुद्धा खास काही सोय नव्हती.मुख्य वारुळाच्या कडेनं एक दालन.


जिथे वाटेल त्या गोष्टी टाकल्या जात,येवढंच.अळ्यांचे कोष,अन्नातला न खाण्यासारखा भाग,अगदी राणीचेही अंश.प्रेतागार म्हणजे उकिरडा.


तर राणीचे अवशेष वाहून नेणाऱ्या मुंग्यांनी या प्रेतागाराजवळ जाऊन तिथल्या खास कामकरी मुंग्यांना ते अवशेष दिले.

प्रेतागारातल्या मुंग्या सतत तिथल्या वस्तू रचत असायच्या.उपयुक्त गोष्टी खायच्या,आणि इतर सारं नीट रचून ठेवायच्या.वारुळातल्या इतर मुंग्या त्यांच्याशी फार संबंध ठेवत नसत.


वारुळातली सगळी कामं अशा श्रमविभागणीवर उभारली जायची.यातून परोपकार आपोआपच उपजायचा.प्रत्येक मुंगी वारुळासाठी काहीतरी त्यागायची.काहीतरी सोय स्वतःला नाकारून वारुळाचं भलं करायची.यातला सगळ्यांत मोठा त्याग म्हणजे कोणत्याच मुंगीला पिल्लं देता येत नसत;विशेषतः राणी जिवंत आणि निरोगी असेपर्यंत.त्या सगळ्या विशिष्ट कामं करायच्या,ओझी वाहणं,शत्रूशी लढणं,एक ना दोन.काही कामं तर धोकादायक असायची.ती करणाऱ्या मुंग्या लवकरच मरणार,याची खात्री असायची.तरीही मुंग्या तसली कामं करायच्या. व्यक्तींना,

सुट्या मुंग्यांना महत्त्वच नसे.फक्त वारूळ महत्त्वाचं.तो महाप्राणी जगत राहणंच महत्त्वाचं;हे प्रत्येक मुंगीच्या मेंदूच्या रचनेतच ठसलेलं असायचं. एखादी मुंगी मेल्यानं वारूळ जरासं कमकुवत व्हायचं, हे खरं.पण हे नुकसान भरून काढणं सोपं असायचं. एका नव्या कोषातून एक नवी मुंगी बाहेर पडली,की झालं काम.पण एखादी मुंगी स्वार्थीपणानं वागली, तर? तिनं आपल्या कामापेक्षा आपल्या खाण्यापिण्याला महत्त्व दिलं,तर? तर संपूर्ण वारुळाची रचना बिघडून वारुळाचं जगणंच कठीण व्हायचं.त्यापेक्षा त्या मुंगीनं सभ्यपणे,मुकाट्यानं वारुळासाठी मरणं जास्त चांगलं.


सगळ्या मुंग्यांच्या सगळ्या वागणुकीचा हा पाया होता. आपण क्षीण झालो,दुबळे झालो,अपंग झालो,तर वारुळावर ओझं न टाकता दूर जाणे,प्रसंगी मरून जाणं! या स्वार्थ

त्यागामुळेच पायवाट वारूळ यशस्वी ठरलं होतं.सगळ्या मुंग्या सदासर्वदा कामांत असणं, आजारी,जखमी

मुंग्यांनी सेवेची अपेक्षा न ठेवता वारुळाच्या परिघावरच्या दालनांमध्ये जाऊन बसणं, सगळी नेहमीची वागणूक.

जखमींमध्ये खूपदा सर्वांत शूर सैनिक मुंग्या असायच्या.

कामकरी मुंग्या तर आजारी पडल्या,की वारूळच सोडून जात,की आपल्यामुळे इतरांमध्ये काही संसर्गजन्य रोग पसरू नये.म्हाताऱ्या मुंग्याही निरोगी असल्या तरी वारुळाच्या कडेला जायच्या,की आपलं आयुष्य संपत आलं आहे. त्या अन्न शोधत दूरवर भटकायच्या.हे एरवी धोकादायक काम त्या सहज करायच्या.वारुळाच्या रक्षणासाठी लढाईची वेळ आली,तर वयस्क सैनिक जास्त जोमानं पुढे व्हायचे,की आपण मेलो तरी वारूळ सुरक्षित राहील.माणसं आणि मुंग्यांमधला हा मोठा फरक आहे. माणसं तरुण पुरुषांना लढायला पाठवतात,तर मुंग्यांमध्ये म्हाताऱ्या 'बाया' लढायला जातात !


पण वारुळाचं जननेंद्रिय फक्त राणी मुंगी हेच होतं. वारुळातल्या सगळ्या मुंग्या,नवी वारुळं घडवू शकणाऱ्या नर-माद्या; सगळी एकट्या राणीची प्रजा होती.तिनं जगावं,पिल्लं देत राहावं,यासाठीच वारुळातल्या सर्व कामकरी मुंग्या,सैनिक मुंग्या स्वार्थत्याग करत होत्या.यापुढे पायवाट वारुळाचं जगणं-मरणं एकाच गोष्टीवर अवलंबून होतं.राणी मुंगीची जागा घेईल अशी नवी राणी मिळून स्थिरावेपर्यंत बसून राहणं.नवे जन्म सुरू होईपर्यंत टिकण्यासाठी सगळी कौशल्यं,सगळी ताकद,सगळ्या क्षमता वापरून काहीतरी जमणं आवश्यक होतं. (समाप्त )



२५/१२/२५

राणी मेली ! The queen is dead !

पायवाट संपून जंगल सुरू होतं तिथे एक वारूळ होतं. त्यातली राणी मुंगी मेली,वारुळातल्या सगळ्या मुंग्यांची आई.राणी मुंगी मेली, हे बरेच दिवस कुणाला कळलंच नाही. तिला ना ताप आला,ना तिनं आचके दिले. आसपासच्या आपल्या कामकरी मुलींचा "जाते गं!" असा निरोपही तिनं घेतला नाही.नेहमीसारखी ती राणी-दालनाच्या जमिनीवर पहुडली होती.पाय,शिंगं सैलावून पडली होती.आणि तशीच मेली.काही वेगळं दिसलं,जाणवलं नाही.जिवंत राणी मुंगीची आता हुबेहूब मूर्ती झाली होती.कामकरी मुंग्यांना काहीतरी भयंकर घडलं आहे,हे कळलं नाही.सारं काही आलबेल आहे, असा भ्रम होत राहिला.


हा भ्रम झाला,कारण कीटकांचा सांगाडा त्यांच्या शरीराच्या बाहेर असतो.माणसांमध्ये किंवा कणा असलेल्या इतर प्राण्यांमध्ये हाडांचा कडक सांगाडा शरीरात असतो,आणि स्नायू, मज्जा, रक्तवाहिन्या वगैरे मऊ भाग सांगाड्याभोवती बाहेरच्या भागाला असतो.कीटकांमध्ये मात्र सांगाडा बाहेर,इतर मऊ भाग आत,

असं असतं.कणा असलेले प्राणी मेले,की मऊ भाग सडायला लागतो.सगळ्यांना सडणं दिसत असतं.कीटकांचे मऊ भाग सडून तंतू आणि गुठळ्यांचा गुंताच उरतो;पण तो सांगाड्याच्या आत असतो.बाहेरून सांगाडाच दिसत राहतो,जशाच्या तसा.एखादा सरदार मरूनही बाहेरचा चिलखती पोशाख दिसावा,तसं होतं.


राणी मुंगीच्या शरीराचा वासही बदलला नाही.नेहमीचेच गंध येत राहिले,जणू काही राणी मुगी म्हणत होती,"मी तुमच्यातच आहे!" राणी मुंगी शांत,स्तब्ध होती खरी, पण ती नेहमीच तशी असायची.

ती ना स्वतः काही काम करायची,ना इतरांना "हे करा,ते करा" असे हुकूम सोडायची.तिच्यात सगळी कामकरी मुंग्याची काम करायला लागणारी बुद्धी होती.प्रत्यक्षात मात्र ती नुसती अन्न खात, अंडी देत बसलेली असायची.


दहाएक कोटी वर्षांपूर्वी राणी-मुंगीच्या प्रजातीच्या मुंग्या नसायच्या.'प्रजाती' म्हणजे प्रकार म्हणू या.माणसं ही एक प्रजाती,कुत्रे ही एक प्रजाती,वडाची झाडं एक प्रजाती,अशा लक्षावधी प्रजाती आहेत.पण दहाएक कोटी वर्षांपूर्वी आपल्या पायवाट-वारुळातल्यासारख्या मुंग्या नसायच्या.त्या वेळी गांधीलमाश्या असायच्या; आजही असतात तशा.मग यातल्या काही गांधीलमाश्यांमध्ये काही बदल झाले,आणि आजच्या सामाजिक मुंग्यांचे वंश सुरू झाले.त्या प्राचीन मुंग्या-माश्यांच्या

मज्जासंस्थेत आणि ज्ञानेंद्रियांमध्ये त्यांनी कसं वागावं ते नोंदलेलं असायचं.त्या मुंग्या माश्या नेमक्या त्या नोंदींप्रमाणे वागायच्या.

नोंदलेल्या क्रमानं कामं करायच्या.आजच्या मुंग्या-माश्याही हुबेहूब तशाच नोंदींप्रमाणे वागतात.अशा वागणुकीला 'मूळ प्रवृत्ती' म्हणतात.तर पूर्वजांसारखंच वागणं,म्हणजे मूळ प्रवृत्तीनुसार वागणं.तर आपण पायवाट-वारूळ कसं घडलं,त्यात कोण कोण कसं कसं वागलं, हे पाहू.


नवं वारूळ घडायला सुरुवात होते ते काही मुंग्यांनी जुनं वारूळ,

जन्म-वारूळ सोडण्यापासूनं.तर आपली राणी मुंगी अशी 'माहेर' सोडून बाहेर पडली.तिनं आपले चार नाजूक,पारदर्शक पंख पसरले आणि हवेत झेप घेतली. त्या वेळी खरं तर तिला 'राणी मुंगी' म्हणणं बरोबर नाही.ती होती 'राजकुमारी'.ती एकटीच हवेत झेपावली नाही,तर इतर अनेक राजकुमारीही झेपावल्या.आणि सोबत होते अनेक नर,राजपुत्र.


एका नरानं आपल्या राजकुमारीला दोन पायांनी पकडलं,आणि दोघेही गिरक्या मारत जमिनीवर उतरले. आता नरानं राजकुमारीला मागच्या पायांनीही धरलं, आणि तिच्याशी संभोग केला.जेमतेम पाचच मिनिटांमध्ये संभोग पूर्ण झाला.नराचं सगळं वीर्य राजकुमारीत शिरलं. तिनं ते एका पोटातल्या पिशवीत भरून घेतलं,आणि धडपडून स्वतःला नराच्या मिठीतून सोडवून घेतलं.


तिच्या वीर्य-पिशवीतला प्रत्येक शुक्राणू तिच्याइतकाच जगू शकत होता.आयुष्यभर ती पिशवीतले शुक्राणू वापरून अंडी देत राहणार होती.नराचं आयुष्य मात्र संपत आलं होत.काही मिनिटांत तो मरणार होता.नराचं सगळंच आयुष्य परावलंबी राहिलेलं,

झाडांवरच्या बांडगुळांसारखं.नाजूक जीव.राणी मुगीन नर-अंडं दिल, की कामकरी मुंग्या ते दुसरीकडे नेऊन ठेवणार.अंडं उबल,की तांदळाच्या दाण्याच्या आकाराची अळी निघणार.सगळ्या कामकरी मुंग्या त्या अळीच्या बहिणी. त्या तोडातून अन्न आणून अळीच्या तोंडात ओतायच्या. असं होत होत अळीची पूर्ण वाढ झाली,की शरीराभोवती एक पातळ,मेणचट कोष तयार व्हायचा. या कोषात मऊ सांगाडा घडायचा,पूर्ण कीटकाचा.पुढे डोकं,

डोक्याला दोन डोळे,दोन शिंगं,एक नीटसा न घडलेला जबडा,फक्त बहिणींनी दिलेलं अन्नच खाऊ शकणारा.डोक्यामागे धड आणि धडामागे पोट.सगळ्या कीटकाला मिळून चार पंख आणि सहा पाय,शरीराच्या दोन्ही बाजूंना तीन-तीन.आतल्या भागात सारे अवयव. मुख्य म्हणजे एक मोठं लिंग.मेंदू मात्र कणभरच. मेंदूतल्या सूचनाही थोड्याशाच.योग्य वेळी उडायचं. राजकुमारीला गाठायचं.

पकडायचं.संभोग करायचा,की नराचं काम संपलं.तर कोषात पूर्ण वाढ झाली,की कामकरी माश्या कोष खाऊन टाकून नराला मोकळं करायच्या.नंतर नुसतं वाट पाहणं.


बहिणींनी आणलेलं खाणं,आणि संभोग-उड्डाणाची सूचना येण्याची वाट पाहणं.नर म्हणजे एक शुक्राणू राजकुमारींपर्यंत पोचवणारा अग्निबाण.सूचना मिळाली रे मिळाली,की उडायचं आणि संभोगातून शुक्राणू पोचवायचे.मग मेंदूकडून संदेश येतो,"झालं काम ! पण परत वारुळाकडे मात्र मुळीच जायचं नाही आहे!"


ना अन्न शोधायचं कौशल्य,ना अन्न खाण्याचं.जरा उकाडा वाढला की शरीरातलं पाणी सुकून मरायचं.इतर कोणती मुंगी भेटली,

कोणता कीटक भेटला,तर तो तुकडे करून नराला खाऊन टाकणार.कीडमुंगीच कशाला,पक्षी,सरडे,सापसुरळ्या सारे काम संपवून जमिनीवर रांगणाऱ्या नराला खाण्याला तयारच असतात.

हा धोका राजकुमारीलाही असतोच.ती नरांइतकी हतबल नसते.

मेंदू मोठा असतो आणि शरीर बळकट.पण तिलाही वीर्यसाठा घेतल्यानंतर उघड्यावर वावरणं धोक्याचं असतं.तिला जमिनीखाली जायची, आडोसा गाठायची घाई असते.


पण आता पंखांची अडचण व्हायला लागते. मग ती मधले दोन पाय उचलते,आणि पंख जिथे शरीराला जोडलेले असतात तिथे रेटा देऊन पंख मोडून टाकते.हे करण्यानं तिला ना दुःख होत,ना शरीराला इजा होत. छत्रीधारी सैनिकानं उडी मारून जमिनीवर पोचल्यानंतर पॅराशूट सोडून द्यावा;तसं हे राजकुमारीच पंख मोडणं. नाहीतरी पंखांमध्ये मज्जा आणि रक्तवाहिन्या नसतातच. ते केवळ 'चायटिन' नावाच्या पदार्थांचे पडदे असतात, अधूनमधून चायटिनच्याच काड्यांनी मजबूत केलेले. तर राजकुमारी आता निरुपयोगी असलेले हे पंख टाकून देते.आपल्या राणी-मुंगीनंही पंख मोडले,आणि वारुळाकरता जागा शोधायला सुरुवात केली.


('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


लवकरच तिला चांगली जागा सापडली.गवताच्या पुंजक्यांमध्ये एक मोकळी जागा होती.आपल्याला ती टीचभर वाटली असती,

पण मुंग्यांच्या दृष्टीनं ती एका मोठ्या मैदानासारखी होती.तिथे वारूळ घडवलं,तर वीसेक वर्ष ती त्यात राहू शकणार होती.जागा मिळाल्याबरोबर राजकुमारीनं तिथल्या मातीत उभं बीळ खोदायला सुरुवात केली.झपाट्यानं आणि नेमकेपणानं खोदकाम सुरू झालं.लवकरच बीळ राजकुमारीच्या लांबीइतकं खोल झालं.आता ती थेट उघड्यावर नव्हती, पण धोका संपला नव्हता.

आणखी खोल जाणं आवश्यक होतं.बीळ किती खोल झालं याचा अंदाज राजकुमारीला जायला यायला लागणाऱ्या वेळेवरून यायचा.पुरेसं खोल गेल्यावर तिनं एक मोठं दालन घडवायला सुरुवात केली.मूळ बिळाच्या तिप्पट व्यासाचं होतं,हे दालन.

अजूनही इतर मुंग्या आणि कीटक यांनी बिळात यायचा धोका होता,पण आता त्यांना राजकुमारीच्या दंशाला आणि चावण्याला तोंड द्यावं लागणार होतं.मोठं काम झालं होतं. 


जन्म-वारूळ सोडून उड्डाण करणाऱ्या राजकुमारींपैकी फार तर एखादा टक्का राजकुमारी दिवसाअखेरीला बीळ-दालनात पोचतात इतर नव्याण्णव टक्के कोणत्या ना कोणत्या भक्षकाला बळी पडतात,किंवा त्यांना नरच भेटत नाही.पण येवढ्यानंही राजकुमारी वारूळ घडवेल याची खात्री देता येत नव्हती.बीळ-दालन घडवणाऱ्या राजकुमारींपैकीही साधारणपणे एखादा टक्काच पुढे वारूळ घडवण्यात यशस्वी होतात,तर नव्याण्णव टक्क्यांना ते जमत नाही.म्हणजे शेवटी जन्म-वारूळ सोडणाऱ्या दहा हजार राजकुमारींपैकी एखादीच नवं वारूळ घडवू शकते दहा हजारांपैकी शंभरांनाच बीळ-दालन घडवता येत,आणि त्यांच्यातली एखादीच नवं वारूळ घडवते !


बीळ-दालन घडल्यावर पहिल्यांदा राजकुमारी बारीक अंड्यांचा एक लहानसा गुच्छ जनते.ही अंडी सतत स्वच्छ करावी लागतात,

नाहीतर मातीतले जिवाणू आणि बुरश्या यांची त्यांना लागण होऊन अंडी मरतात. राजकुमारी सतत अंडी चाटत राहते.यामुळे तिच्या लाळेचा एक पातळ थर सर्व अंड्यांवर चढवला जातो.


राजकुमारीची लाळ औषधी असते.जिवाणू,बुरशी यांना ती मारक असते.एखाद्या जिवाणूला जरी अंड्यांमध्ये शिरता आलं,तरी वेगानं प्रजनन होऊन लाखो जिवाणू तयार होऊन अंडी संपवून टाकू शकतात;म्हणजे आता राजकुमारीला इतर मुंग्या,कीटक,पक्षी,सरडे यांच्यापासून स्वतःला वाचवायचं असतं;आणि सोबतच जिवाणू,

बुरशीपासून अंडीही वाचवायची असतात. मूळ उड्डाण करणाऱ्यां

पैकी काही राजकुमारी बीळ-दालनं घडवतात;पण प्रत्येक राजकुमारी सुटी, एकटी असते.त्या एकमेकींना मुळीच मदत करत नाहीत.अंड्यांमधून घडलेल्या कामकरी मुंग्याही मदतीला नसतात.

मूळच्या जन्म-वारुळातल्या मुंग्या राजकुमारींना मदत करत नाहीत.एकदा का जन्म-वारूळ सुटलं,की स्वतःचं वारूळ घडू लागेपर्यंत प्रत्येक राजकुमारी संपूर्णपणे एकटी,एकाकी असते.


अंडी तर दिली;पण ती नीटपणे शुक्राणूंनी फळली असतातच असं नाही.आणि न फळलेल्या अंड्यांमधून मुंग्या घडत नाहीत.

बरं,शुक्राणूही चांगले,निर्दोष हवेत. सदोष शुक्राणूंनी फळलेल्या अंड्यांमधून निरोगी,सशक्त मुंग्या घडत नाहीत.पण पायवाट संपते तिथल्या वारुळाच्या राजकुमारीच्या बाबतीत सगळं काही नीट घडून आलं,आणि पहिल्या अंड्यातून पहिली बारीक अळी बाहेर पडली.राजकुमारीच्या डोक्याच्या भागात एक मोठी ग्रंथी होती.या ग्रंथीतून खूप पोषक अन्न राजकुमारीच्या तोंडात यायचं.

राजकुमारीच्या मागच्या, पोटाच्या भागातल्या चरबीपासून हे अन्न घडायचं. त्यासाठी पंख हलवणारे स्नायू उपयोगी पडायचे.तर हे अन्न राजकुमारी अळीला भरवू लागली.


असं करत,केवळ स्वतःच्या अंगातली द्रव्यं वापरत राजकुमारीनं दहाबारा मुंग्या घडवल्या.त्या सगळ्या माद्या होत्या.लहानखुऱ्या होत्या.दुबळ्या होत्या.त्या तशा असणंच गरजेचं होतं.मोठ्या,सशक्त मुंग्या केवळ राजकुमारीच्या शरीरातून घडवल्या असत्या,तर त्यांची संख्या अगदीच थोडी राहिली असती.इतक्या कमी मुंग्यांना नवजात वारूळ घडवताच आलं नसतं.


लहान होत्या, दुबळ्या होत्या,कमी होत्या,पण सगळ्या कामकरी होत्या.त्यांच्या मेंदूंमध्ये अन्न शोधायची,अन्न वारुळात आणायची,

राजकुमारीची काळजी घेण्याची कौशल्यं होती.या सगळ्या कौशल्यांची मूळ-प्रवृत्ती होती.आणि या सुरुवातीच्या मुंग्यांनी वारूळ घडू लागलं.आता राजकुमारी,राजकन्या या नावाऐवजी 'राणी' हे नाव आपल्या मूळ मुंगीसाठी योग्य ठरलं असतं,कारण तिनं वारूळ घडवायला सुरुवात केली होती.प्रजा घडवायला सुरुवात केली होती.काही मुंग्या अन्न शोधून आणू लागल्या होत्या.काही वारूळ वाढवत होत्या.काही राणीची सेवा करत होत्या. त्यांनी ही सगळी कामं नीटनेटकी करण्यावरच वारूळ घडणं अवलंबून होतं.या पुढच्या कामांमध्ये त्यांना राणीची मदत नव्हती.उलट राणीलाच मदतीची नितांत गरज होती.तिनं बीळ-दालन खोदलं होतं.. स्वतःचं शरीर वापरत कामकरी मुलींना कामाला लावलं होतं.आता ती थकून,भागून,भुकेली होऊन बसली होती.तिचं शरीर म्हणजे एक चायटिनचं कवच,आणि त्यात जेमतेम जगणारी अवयवांची व्यवस्था,येवढंच उरलं होतं.


पण पहिल्या पिढीच्या कामकरी मुंग्या वारुळाबाहेर पडून अन्न शोधत होत्या.त्यांना एक मेलेला डास सापडला.एका सुरवंटानं टाकलेली कात मिळाली.एक नुकताच जन्मलेला कोळी हाती लागला.हे सगळं अन्न त्या स्वतः खात होत्या,आणि राणीला भरवत होत्या. राणीचं वजन वाढायला लागलं.ती जराशी सशक्त झाली.

नंतरच्या पिढ्यांच्या मुंग्याही मोठ्या आणि दमदार होत्या,कारण त्या नुसतं राणीच्या शरीरातलं अन्न खात नव्हत्या.बाहेरच्या अन्नानं जोमदार झालेल्या मुंग्या उभ्या बिळापासून अनेक आडवे बोगदे खणू लागल्या.हळूहळू बोगद्यांचं आणि दालनांचं एक जंजाळ घडलं,ज्यात अनेक मुंग्या नेहमी वावरत असायच्या.वर जमिनीवर खोदलेल्या मातीचा ढिगारा झाल्यानं जंजाळाचं छतही मजबूत झालं,आणि सूर्याची ऊबही वारुळाला मिळू लागली.आता वारूळ शत्रूपासून सुरक्षित किल्ल्यासारखं झालं होतं.जसजसा काळ जात गेला,तसतशी राणी बिळाच्या नवनवीन,खोलात खोल भागाकडे सरकत गेली.बाहेरच्या धोकादायक जगापासून दूर राहणं तिच्या दृष्टीनं गरजेचं होतं,कारण आता ती एकच काम करत होती - पिल्लं देण्याचं.सगळ्या वारुळाची जननी तीच. 


वारुळाचं वर्धमान,वाढणारं टोकही तीच.पिल्लं वाढवायची जबाबदारी आधी जन्मलेल्या कामकरी मुंग्यांनी घेतली होती.नवी पिल्लं म्हणजे कामकरी मुंग्यांच्या बहिणीच.आता कामकरी मुंग्याच राणीचे हातपाय झाल्या,जबडा झाल्या.हळूहळू तर तिचा मेंदूही झाल्या,तिची बुद्धीही झाल्या.त्या छान,एकजुटीनं, एकत्रपणे सगळी कामं करायच्या.आपापल्या स्वार्थाची पर्वा न करता वारुळाची कामं वारुळाचं हित पाहात करायच्या.वारुळाचा सुट्या कीटकांमध्ये विखुरलेला एक 'महाप्राणी' झाला.


वारुळाची वाढ पूर्ण व्हायला दोन वर्ष लागली.आता वारुळात दहा हजारांपेक्षा जास्त कामकरी मुंग्या होत्या. त्यानंतरच्या वर्षी वारुळानं राणीमार्फत नरांना आणि राजकुमारींना जन्माला घातलं.या नरांनी,राजकुमारींनी संभोग -उड्डाणं केली.काही नवी वारुळं जन्माला आली. आता राणी सरासरीनं दर पंधरा मिनिटांनी एक अंडं देत होती.वारुळाच्या तळाशी,सर्वांत खोल दालनात राणी जडशीळ,सुस्त पडलेली असायची;जमिनीत पाच फूट खोलीवर.

माणसांच्या मापानं वारूळ दोनशे मजले भूमिगत होतं,चारशे मुंग्यांइतकं खोल.आणि जमिनीवर आणखी पन्नास मजले उंचीचा मातीचा ढीग होता.


राणी या लहानशा संस्कृतीचं नेतृत्व सांभाळत नव्हती; पण संस्कृतीची वाढ,त्या वाढीचा जोम,हे मात्र राणीच पुरवत होती.

वारूळ टिकेल की नाही टिकणार,यशस्वी होईल की पराभूत,

या प्रश्नांची उत्तरं मात्र राणीप्रमाणेच ठरू शकत होती.आपल्या वीस गर्भाशयांमधून घड्याळाच्या नियमितपणे तिनं अंडी घालत राहणं,हे वारुळाच्या हृदयाचं स्पंदन होतं.सगळे कामकरी ते स्पंदन चालू राहावं म्हणूनच झटत होते.अंडी देणारं स्पंदन जोमानं,

सातत्यानं चालू राहणं,म्हणजे वारूळ टिकणं.वारूळ नीट घडवणं,

स्वच्छ ठेवणं,जीव धोक्यात घालून बाहेरून अन्न कमावून आणणं,

वारुळाच्या महाद्वाराच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी मरणही पत्करणं, सगळं काही राणी आणि तिच्या स्वार्थत्यागी प्रजेसाठीच ती प्रजा करत असते.  अपुर्ण…