* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

९/१/२३

सर्वांना समजून घेण्याचा अर्थ आहे. सर्वांना क्षमा करणे.'

" ऐक बेटा! मला तुला काही सांगायचंय.तू गाढ झोपेत आहेस.तुझा इवलासा हात तुझ्या सुकुमार गालाखाली दबलाय आणि तुझ्या घामाने भरलेल्या कपाळावर कुरळे केस विखुरले आहेत.मी तुझ्या खोलीत गुपचुप शिरलो आहे एकटाच,नुकताच मी जेव्हा लायब्ररीत वर्तमानपत्र वाचत होतो तेव्हा मला खूप पश्चात्ताप झाला.म्हणूनच मी अर्ध्या रात्री तुझ्याजवळ उभा आहे,एखाद्या अपराध्यासारखा!


ज्या गोष्टींबद्दल मी विचार करीत होतो त्या अशा आहेत बेटा.मी आज तुझ्यावर खूप रागावलो. जेव्हा तू शाळेत जायला तयार होत होतास तेव्हा मी तुझ्यावर खूप चिडलो.तू टॉवेलऐवजी पडद्याला हात पुसले होतेस.तुझे जोडे घाणेरडे होते,यावरूनसुध्दा मी तुला रागावलो.तू जमिनीवर इकडे तिकडे पसारा करून ठेवला होतास,त्यावरूनसुध्दा मी तुला खूप वेडंवाकडं बोललो.


नाश्ता करताना मी तुझ्या एका मागोमाग एक चुका दाखवत गेलो.तू टेबलावर खाणं सोडून दिले होतेस.खाताना तू मचमच आवाज करीत होतास.टेबलावर तू हाताची कोपरं टेकवली होतीस.तू ब्रेडवर खूप सारे लोणी चोपडले होतेस.एवढेच नव्हे,तर मी ऑफिसमध्ये जात होतो आणि तू खेळायला जात होतास तेव्हा तू वळून हात हलवून "बाय बाय,डॅडी "

म्हणाला होतास अन् मी भुवया उडवून तुला टोकले होते,'तुझी कॉलर नीट कर.


संध्याकाळीदेखील मी हेच सगळे केले. ऑफिसातून परतल्यावर तू मातीत मित्रांबरोबर खेळत होतास हे मी पाहिले.तुझे कपडे मळलेले होते,तुझ्या मोज्यांना भोके पडली होती.मी तुला पकडून घेऊन गेलो आणि तुझ्या मित्रांसमोर 'मोजे महाग आहेत.जेव्हा तुला विकत घ्यावे लागतील तेव्हा तुला त्याची किंमत कळेल'असं म्हणून तुला अपमानित केले.जरा विचार करा, एक बाप आपल्या मुलाचे मन यापेक्षा अधिक कसे दुखावू शकेल ?


तुला आठवतेय का,जेव्हा मी लायब्ररीत वाचन करत होतो तेव्हा तू माझ्या खोलीत रात्री आला होतास,एखाद्या घाबरलेल्या हरणाच्या पाडसासारखा,तुला किती दुःख झाले आहे हे तुझ्या डोळ्यांवरून कळून येते होते आणि मी वर्तमानपत्रावरून तुझ्याकडे बघत माझ्या वाचनात व्यत्यय आणल्याबद्दल आता काय हवंय,कधी तरी आरामात बसू दे मला!' असं म्हणत तुला झिडकारुन टाकले होते.त्या वेळी तू दारातच थबकला होतास.


तू काहीही न बोलता,फक्त लाडात येऊन माझ्या गळ्यात हात घालून माझे चुंबन घेऊन "गुड नाइट" म्हणून निघून गेला होतास.


तुझ्या छोट्या छोट्या हातांच्या मिठीवरून असे कळून येत होते की तुझ्या अंत:करणात ईश्वराने प्रेमाचे असे फूल लावले आहे जे इतक्या उपेक्षेनंतरही मरगळले नाही... मग तू जिन्यावर खट-खट आवाज करीत निघून गेलास.


तर बेटा,या घटनेनंतर थोड्याच वेळाने माझ्या हातून वर्तमानपत्र गळून पडले आणि मला खूपच हताश वाटू लागले.हे मला काय होत आहे? दोष काढण्याची,धाकदपटशा दाखवण्याची सवय होत चालली होती मला,आपल्या मुलाच्या बालिश चुकांचे हे बक्षीस मी त्याला देत होतो.असं नाही 


बेटा,की मी तुझ्यावर प्रेम करीत नाही,पण मी एका लहान मुलाकडून आवश्यकतेपेक्षा जास्त अपेक्षा करत होतो.मी तुझं वागणं आपल्या वयाच्या तराजूनं तोलून बघत होतो.


तू इतका लोभस आहेस,इतका चांगला आणि 


खरंच,तुझे छोटेसे हृदय इतके विशाल आहे जशी की पर्वतांच्या मागून उगवणारी पहाटच! 


तुझी महानता यावरूनच दिसून येते की दिवसभर वडिलांकडून बोलणी खाऊनही त्यांना रात्री गुड नाइट किस द्यायला तू आलास. आजच्या रात्री इतर काहीच महत्त्वाचे नाही बेटा. मी या अंधारात तुझ्या उशाशी आलोय आणि इथे गुडघे टेकून शरमिंदा होऊन बसलोय.


हा एक कमकुवत पश्चात्ताप आहे.मला माहीत आहे की जर मी तुला जागं करून हे सगळं सांगितलं तर कदाचित तुला हे काहीच समजणार नाही.पण उद्यापासून मी नक्कीच तुझा लाडका बाबा बनून दाखवेन.मी तुझ्याबरोबर खेळेन,तुझ्या मजेदार गोष्टी मन लावून ऐकेन,तुझ्यासह खळखळून हसेन आणि तुझ्या दुःखात सहभागी होईन.यापुढे जेव्हा कधी मी तुला रागवायला तोंड उघडेन,त्याआधीच मी माझी जीभ दातांखाली दाबून धरेन.मी एखाद्या मंत्रासारखं असं वारंवार म्हणेन, "तो तर अगदी छोटासा आहे... छोटासा मुलगा !"


मला याचे दुःख होते की मी तुला मुलगा नव्हे तर मोठा माणूस समजलो होतो.पण आज जेव्हा मी तुला पाय पोटाशी घेऊन झोपलेला,थकलेला पाहतोय तेव्हा बेटा,मला असं वाटत आहे की तू अजून छोटाच तर आहेस! कालपर्यंत तू आपल्या आईच्या कुशीत होतास,तिच्या खांद्यावर डोकं ठेवून होतास.मी तुझ्याकडून किती अवास्तव अपेक्षा केली होती,किती तरी जास्त !


लोकांवर टीका करण्यापेक्षा आम्ही त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा.आम्ही हे शोधून काढायला हवे की ते जे काही करतात ते का बरे करतात.हे टीका करण्यापेक्षा अधिक रोचक आणि लाभदायक होईल.एवढेच नव्हे,तर त्यामुळे सहानुभूती,सहनशक्ती आणि दयाळूपणाचे वातावरण निर्माण होईल.सर्वांना

समजून घेण्याचा अर्थ आहे सर्वांना क्षमा करणे.'


डॉ.जॉन्सननी म्हटलंय,

"ईश्वर स्वतःमानवाच्या मृत्यूआधी त्याचा निर्णय घेत नाही." 

तर मग तुम्ही आणि मी असे करणारे कोण ?"

फादर फरगेट्स

(प्रत्येक पित्याने हे लक्षात ठेवावे) - 

डब्लू.लिव्हिंगस्टोन लार्नेड


मंजुल पब्लिशिंग हाऊस

मित्र जोडा-डेल कार्नेगी मधून..

७/१/२३

तुम्ही स्वतःमधलं काही देऊन टाकता तेव्हा तुम्ही खरं दिलेलं असतं…'दान'

मग एक श्रीमंत सावकार म्हणाला,'दानाविषयी आम्हाला काही सांग.' त्यावर अल् मुस्तफा बोलू लागला :


तुमच्या धनदौलतीतलं तुम्ही देता तेव्हा तुम्ही काहीच दिलं नाही,असं होतं.तुम्ही स्वतःमधलं काही देऊन टाकता तेव्हा तुम्ही खरं दिलेलं असतं.कारण तुमची दौलत म्हणजे काय असतं? तर,आज ना उद्या गरज पडेल त्यावेळी ताब्यात असाव्यात अशा वस्तूंचा तुम्ही परिग्रह केलेला असतो.त्या संचयामागे त्यांना गमावण्याचं भय असतं.


'उद्या',म्हणजे तरी काय? पवित्र दिव्यनगरीच्या यात्रेकरूंना वाळवंटात सोबत करीत असलेला एखादा अतिशहाणा कुत्रा वाळूखाली हाडकं पुरून ठेवत चालला तर भविष्यात त्याचा निर्वाह होईल काय ?


एखाद्या गरजेचं भय ही देखील नड आणि गरजच की!तुमची विहीर भरलेली असताना तहानेचं भय तुम्हाला पडेल तर तुमची तहान शमेल कशी? प्रचंड धनदौलतीतला नगण्य हिस्सा काहीजण दानार्थ देतात,त्यांना नावलौकिक हवा असतो.त्यांच्या या छुप्या वासनेनं त्यांचं दान निःसत्त्व होऊन जातं.


काहीजण परिग्रहशून्य असतात,तरी जवळचं सर्व काही देऊन बसतात.त्यांची जीवनावर आणि विश्वंभर चैतन्यावर श्रद्धा असते.त्यांची तिजोरी कधीच रिती पडत नाही.कित्येकांना दान करण्यानं आनंद होतो.आनंदात त्यांचा परितोष असतो.


काहींना दान करताना दुःख होतं.त्या दुःखात नवजीवनाची दीक्षा असते.काहीजण असे असतात की देताना दुःख होत आहे याचीही त्यांना जाणीव नसते,की आनंद मिळवावा ही धडपड नसते.आपण पुण्यकृत्य करीत आहोत,याचीही त्यांना वार्ता नसते.


दूरच्या डोंगरदरीत मर्टल् ची शुभ्र फुलं अवकाशात आपला परिमळ विखुरतात,तशी ती माणसं असतात.त्यांच्या हातांमधून ईश्वराची वाणी ऐकू येते.त्यांच्या डोळ्यांतून तो या धरणीवर स्मित करीत वावरतो.


कुणी याचना केली असता दान द्यावं हे चांगलंच, पण अ-याचकालाही उमजून द्यावं हे अधिक चांगलं.मुक्तहस्तांनी खैरात करणाऱ्याला,दान न करताच आपल्याकडून कुणी काही घेतलं तर फार आनंद होतो..


तसं बघितलंत तर देण्याला हात आखडावा असं आपल्यापाशी काय असतं?


 आपलं ज्याला म्हणतो ते सर्वच्या सर्व एके दिवशी विसर्जित होणार असतं.म्हणून म्हणतो की द्यायचं ते आताच द्या.तुमच्या वारसदारांना ती संधी

कशासाठी ?


तुमच्या नेहमी बोलण्यात येतं:दान देईन,पण केवळ पात्र असणाऱ्याला.तुमच्या फळबागेतली झाडं असं कधी म्हणतात काय? तुमच्या कुरणांवर चरणारे मेंढ्यांचे कळप असं कधी म्हणतात काय ?


सर्वस्व - दान हे त्यांचं जीवन असतं.दान आखडून धरावं यात मृत्यू असतो.


दिवसाचा प्रकाश आणि रात्रीची विश्रांती ज्याला बहाल झाली आहे,तो कोणीही असो,तुमच्या दानाला पात्र समजा.


या जीवन-महासागराचे घोट घेण्यास जो पात्र आहे तो तुमच्या ओहोळातून प्याला भरून घेण्यास योग्य नसेल काय ?


ज्या धीरानं,विश्वासानं आणि उदारपणानं दान स्वीकारलं जातं,ते खरं तर मेजवानीनंतरच्या मुखशुद्धीहून फार थोर असतं काय ?


माणसांनी आपलं अंतःकरण उघडून ठेवावं, स्वाभिमान उचकटून दाखवावाअसे तुम्ही कोण आहात ?त्यांची योग्यता आणि त्यांची अस्मिता उघडीनागडी पाहावी अशी तुमची कोणती पात्रता?दान देण्यास किंवा दानाचा बटवडा करण्यास तरी आपण पात्र आहोत का,याची पारख करा.


खरं तर,चैतन्य ज्याच्या स्वाधीन होतं तेही चैतन्यच असतं.दान देतो म्हणवणारे तुम्ही,दानाचे फार तर साक्षी असता.


बंधुजनहो बंधु तुम्ही सर्वचजण दान ग्रहण करणारे आहात.घेतलेल्या दानाला उपकार समजून ओझं मानू नका.मानाल तर,स्वतःच्या आणि दानकर्त्याच्या जिवाला जोखडाखाली घालाल.


दानकर्त्यानं दिलेल्या दानावर तुम्ही दोघेही एकजुटीनं उभे व्हा... दोन्ही पंख उघडून आकाशगामी व्हा...


घेतलेलं दान कर्ज आहे असं सारखं समजत राहणं म्हणजे दात्याच्या औदार्याविषयी शंका घेणं होय.मुक्त हातांनी प्रदान करणारी धरणी त्याची आई आहे आणि ईश्वर त्याचा पिता आहे,हे विसरू नका.


खलील जिब्रान यांच्या 'द प्रॉफेट या पुस्तकातून..


६/१/२३

एक छोटी गोष्ट संताची.. बरचं काही सांगणारी..!

माझ्या तरुणपणातले दिवस होते.डोंगरापल्याडच्या

शांत वनराईत भटकताना एका संतपुरुषाची भेट झाली.बोलता बोलता आमच्या संभाषणात सद्गुणाविषयी काही बोलणं निघालं.तेवढ्यात डगरीवरून एक पुंड लुटारू लंगडत,धापा टाकत येताना आम्हाला दिसला.आम्ही होतो तिथं तो आला.त्या संत पुरुषासमोर गुडघे टेकून म्हणाला,"महाराज,माझ्या जिवाची बेचैनी शांत करा.माझी पापं मला छळत आहेत."


संतपुरुष म्हणाला,"माझी पापंदेखील मला छळत आहेत.'पुंड म्हणाला,"महाराज,मी चोर आहे,दरोडेखोर आहे.'


संतपुरुष उत्तरला,"मीही तसाच आहे रे.'


चोर बोलला,"मी खुनी आहे.कित्येकांची हत्या मी केली आहे.त्यांच वाहून गेलेलं रक्त माझ्या कानांत घोंगावत आहे.'


संतपुरुष म्हणाला,"मीसुद्धा तसाच खुनी आहे आणि पुष्कळांची हत्या माझ्या मानगुटीवर बसलेली आहे.'


पुंड म्हणाला,'सांगता येणार नाहीत इतके गुन्हे मी केले आहेत.संतपुरुष म्हणाला, 'माझं तरी काय? मीही तसाच गुन्हेगार आहे.'


इतकं झाल्यावर तो लुटारू उभा राहून संतपुरुषाकडे टक लावून पाहू लागला.त्याच्या नजरेत काही वेगळंच पाणी दिसत होतं.आमच्यापासून तो निघाला आणि उड्या टाकीत डोंगर उतरून गेला.


संतपुरुषाकडे वळून मी म्हणालो,


"न केलेल्या हत्यांचे आणि गुन्ह्यांचे आरोप तुम्ही स्वतःवर का ओढवून घेतलेत?जाताना तो कसा गेला ते बघितलंत ना?तुमच्या बोलण्यावर त्याचा मुळीच विश्वास बसला नाही.'


"खरंच आहे.माझ्यावर विश्वास नसेना का,पण जाताना त्याची बेचैनी पुष्कळ कमी झाली होती."


त्या क्षणी,दूर अंतरावरून त्या लुटारूच्या तोंडून निघणाऱ्या गाण्याच्या लकेरी आमच्या कानी आल्या.त्यांच्या पडसादांनी त्या दरीत उल्हास भरून आला.


खलील जिब्रान यांच्या द प्रॉफेट या पुस्तकातून 

'संत' भावानुवाद - त्र्यं.वि.सरदेशमुख

मधुश्री पब्लिकेशन



४/१/२३

" तुमच्याकडे अगदी मर्यादित वेळ आहे, म्हणूनच दुसऱ्या कोणाचं आयुष्य जगत तो फुकट घालवू नका." " स्टीव्ह जॉब्ज "

..वरील वाक्याची सत्यता पटवून देणारी कथा नुकतीच वाचणात आली.


सून फोनवर आईशी बोलत होती,"आई मी काय सांगू,आजकाल शिळ्या कढीला पण उत आलाय !सासरेबुवा निवृत्त झाल्यापासून,


दोघेही गार्डनमध्ये एखाद्या फिल्मी जोडप्यासारखे दिवसभर झोपाळ्यावर बसलेले असतात.आपल्या पिकल्या केसांकडे बघून तरी वागायचं त्यांनी ! अजूनही स्वतःला पंचवीशीतलेच समजतात.


तेवढ्यात उदास मनाने सासूबाई स्वयंपाकघरात शिरल्या.त्यांनी हे सर्व ऐकले होते,पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी शांतपणे चहा बनवला आणि सुनेलाही तिच्या खोलीत जाऊन दिला. 


नवऱ्यासाठी चहा घेऊन जाताना सुनेने पाहिलं अन् पुन्हा तोंड वेडंवाकडं केलं.पण त्यांनी तिच्याकडे दुर्लक्षच केलं.


पती निवृत्त झाल्यापासून हा आता त्यांचा रोजचाच दिनक्रम झाला होता.त्यांच्या इच्छेनुसार ती रोज चांगले चांगले कपडे घालून गार्डनमध्येच आपला बराचसा वेळ घालवायची.


आयुष्यभर त्यांनी फक्त मुलासाठीच खस्ता खाल्ल्या होत्या. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी,ते दोघेही एकत्र वेळ घालवायचे.


अन्नपूर्णा भवन… दोन मजली बंगलेवजा घर अशोक आणि प्रभा यांचे आजीवन स्वप्न होते. घराच्या समोर असलेल्या बागेत प्रभाबाईंनी बेल,जास्वंदी,चाफा,मोगरा अशी कितीतरी फुलझाडे लावली होती.एका छोट्या टाकीत छानशी कमळेही फुलली होती.हिवाळ्यात त्या तेथे भाज्यांचीही लागवड करत.स्वयंपाकघरासाठी लागणारी ताजी कोथिंबीर,पुदिना,मेथी तिथलीच असायची!


पण इतकी वर्षे कामाच्या गडबडीत अशोकजींना त्या जागेचा कधीच आनंद घेता आला नाही.पण आता मात्र त्यांचा सगळा मोकळा वेळ तिथेच जात असे.खरं तर त्या जागेत एक छानसं टुमदार घर दोघांसाठी बनवायचं म्हणून ती अतिरिक्त जागा त्यांनी घेतली होती.पण आता ते शक्य नव्हतं. प्रभाबाईंना तिथे एक झोपाळा हवा होता तो त्यांनी आणला.आता त्यांचा बराचसा वेळ त्या झोपाळ्यावर गप्पा मारण्यातच जायचा.


आता पती-पत्नी दोघांनाही आरामाचे क्षण जगायचे होते.त्यांच्या घरात सर्व आवश्यक सोयीसुविधाही होत्या,तरीही सूनेला त्यांचं हे दिवसभर झोपाळ्यावर बसणं खटकायचं.अगोदर दिवसभर तिच्यासोबत असलेल्या सासूबाई आता त्यांच्या पतीला थोडा अधिक वेळ देऊ लागल्या होत्या.


त्यांना टोमणे मारायची एकही संधी ती सोडत नसे.एकदा त्यांना त्या जागेतून हटवण्यासाठी तिने एक युक्ती केली.


"आपण मोठी कार का खरेदी करत नाही ... नवीन"


"कल्पना चांगली आहे,पण ठेवायची कुठे? आपल्याकडे फक्त एकच गॅरेज आहे." नवीन थोड्या चिंतेच्या स्वरात म्हणाला.


"जागा का नाही,ती बाग आहे ना ! जिथे आजकाल दोन लव्हबर्ड्स बसतात!"


"तू जरा जास्तच बोलतेस!" म्हणत नविनने तिला फटकारले खरे,पण त्यानेही याबाबत बाबांशी बोलायचे ठरवले होते.


दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो वडिलांकडे गेला आणि म्हणाला,"बाबा! मला आणि सोनमला मोठी कार घ्यायची आहे."


"पण बेटा,मोठी गाडी आधीच घरात आहे,मग तू ती ठेवणार कुठे?"


"या बागेतच नवं गॅरेज बांधायचा विचार करतोय मी सोनम काही बघणार नाही आणि आई तरी अजून किती दिवस काळजी घेईल ? त्यापेक्षा ही झाडे तोडणे चांगले होईल."


प्रभाबाईंच्या छातीत ते ऐकून धस्स झालं ! रागावर नियंत्रण ठेवत बाबा म्हणाले,"मला तुझ्या आईशी बोलावं लागेल,मला थोडा वेळ दे."


"काय पप्पा ... आईला काय विचारायचे .. या जागेचा काय उपयोग ?",नवीन जरा चिडूनच म्हणाला. 


"तुम्ही दोघेही दिवसभर कुठलाही विचार न करता,चार लोकांचा विचार न करता इथे बसता.आता सोनम सुद्धा घरात आहे,लहान मुलंही आहेत.पण तुम्ही मात्र दोघेही दिवसभर झोपाळ्यावर डुलता."


आतून सोनमची बडबड चालूच होती.


नवीन आणि सोनमने त्या संध्याकाळी बाहेरून जेवण मागवले.पण ते जेवण काही केल्या या दोघांच्याही घशाखाली उतरले नाही.इच्छाच नव्हती कसली.दोघेही रात्रभर जागेचं होते!


पण सकाळी त्याबद्दल विचार करताना,बाबांच्या ओठांवर एक स्मित उमटले.त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच चहा बनवला.पण खूप निराश झालेल्या प्रभाताई त्या दिवशी झाडांना पाणी देण्यासाठी बाहेर पडल्या नाहीत, किंवा कोणाशीही बोलल्या नाहीत.


दिवसभर सर्वकाही सामान्य होते,पण संध्याकाळी,'घर भाड्याने देणे आहे' असा बोर्ड घराबाहेर लटकलेला पाहून नवीनने गोंधळलेल्या आवाजात बाबांना विचारले,"पप्पा, घर मोठे आहे हे मान्य,पण हे काय"?


"पुढच्या महिन्यात माझ्या स्टाफमधले मिस्टर गुप्ते सेवानिवृत्त होत आहेत,ते या घरात राहतील",त्यांनी शांतपणे उत्तर दिले.


"पण कुठे?"


"तुमच्या भागात",अशोकजींनी साध्या 

आवाजात उत्तर दिले.


"आणि आम्ही?"


"तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल इतके सक्षम तर मी तुम्हाला बनवलेच आहे.दोन तीन महिन्यांत तुम्ही दुसरा फ्लॅट पाहा किंवा कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी जा,जिथे तुम्ही तुमच्या वयाच्या लोकांबरोबर राहू शकाल !


आम्ही दोघेही आमच्या वयाच्या लोकांमध्ये राहू.तुमच्या आईचं संपूर्ण आयुष्य तुम्हा सर्वांची काळजी घेण्यात गेले.आता तुमच्याकडून शहाणपणाचे धडे शिकणे एवढंच बाकी होतं."


"बाबा,मला असे म्हणायचे नव्हते," नवीन हात जोडत म्हणाला.


"नाही बेटा,तुझ्या पिढीने आम्हालाही व्यावहारिक होण्याचा धडा दिला आहे.जर आम्ही दोघे तुम्हा दोघांना एकत्र पाहून आनंदीत होऊ शकतो तर मग तुम्हाला आमच्यापासून त्रास का होतो?हे घर तुझ्या आईने बांधले आहे, हे झाड,ही फुले तुमच्यासाठी भोगलेल्या अनंत कष्टांचे साक्षीदार आहेत,म्हणून मी कोणालाही तिचा हक्काचा कोपरा हिसकावण्याचा अधिकार देणार नाही."


"बाबा, तुम्ही गंभीर झालात",नवीनचा आवाज आता हळवा झाला होता.


"नाही बेटा ... तुझ्या आईने आजवर खूप त्याग करून,खूप दुःख सहन करून मला पाठिंबा दिला.आज तिच्या कृपेने माझ्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही.म्हणूनच फक्त हा कोपराच नाही,संपूर्ण घर तिचे ऋणी आहे.तुमच्यापेक्षा तिचा या घरावर अधिक हक्क आहे.


आमची मुलं असल्याचा फायदा जरूर घ्या.पण जर देव मंदिरात जोडीने शोभून दिसतात तर आईवडील का दिसू नये?


मानवी भावभावना संवेदना जपणाऱ्या सर्वांना मनस्वी समर्पित…


लेखक - अनामिक 

  

२/१/२३

आणि हा आपला टायटॅनिक सोबतचा शेवटचा प्रवास…!

२ तासांनी ५८ मैलावर असलेलं कुनार्डचं कार्फाथिया जहाज हे मात्र निरोप मिळाल्याबरोबर मदतीला धावलं आणि ७०५ जणांना वाचण्यात त्यांना यश मिळालं. बाकी प्रवाशांनी मात्र टायटॅनिकबरोबरच जलसमाधी घेतली होती.दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर समुद्रात भयंकर दृश्य दिसत होतं.समुद्रातल्या थंडगार पाण्यात हजारो शवांचा सडा पडला होता.जवळपास १५०० जणांचा मृत्यू झाला होता.काहींचा जहाजाचे भाग अंगावर पडून मृत्यू झाला होता,तर काहींचा बुडून.पण अनेकांचा समुद्राच्या पाण्यान गारठून मृत्यू झाला होता. अनेकांच्या हाती जहाजातल्या सामानाच्या फळ्या लागल्या होत्या.


याच फळ्यांबरोबर तरंगत गारठून गेलेली शवं पसरलेली होती.विशेष म्हणजे ही शवं गोळा करतानाही गरीब-श्रीमंत असा भेदभाव झाला होता.


झालं असं :


टायटॅनिकमधून मृत्युमुखी पडलेल्या लोकांची शवं घेऊन येण्यासाठी काही बोटींना पाठवलं गेलं.पण तिथं इतकी शवं होती की त्या शवांना गोळा करता करता या बोटींमधला अन्न आणि इंधनपुरवठा संपतो की काय अशी भीती वाटायला लागली.शेवटी श्रीमंतांच्या शवांची ओळख पटणं शक्य असल्यानं आणि त्यांची ओळख पटणं त्यांच्या संपत्तीच्या वारसदारांसाठी अत्यावश्यक असल्यानं त्या टीमनं फक्त फर्स्ट क्लासच्या प्रवाशांचीच शवं गोळा करण्याचा निर्णय घेतला होता.


टायटॅनिकमधल्या प्रवाशांबरोबरच त्यातल्या अनेक अधिकाऱ्यांचाही यात मृत्यू झाला.


कॅप्टन स्मिथची ही शेवटची सफर होती. यानंतर तो निवृत्त होणार होता.दैवदुर्विलास बघा,ती त्याची खरोखरच शेवटची सफर ठरली! पण शेवटपर्यंत त्यानं आपली जबाबदारी निभावली.त्यानं अनेकांचे जीव वाचवण्यात मदत केली.पण त्याचा जीव मात्र त्यानं गमावला. 


टायटॅनिकचा मुख्य डिझाइनर अँड्र्यूज हाही यातून प्रवास करत होता.त्याचं कुटुंबही त्याच्याबरोबर होतं.या सगळ्याचा त्याला जबरदस्त धक्का बसला होता.आपल्या बायकोला लाइफ बोटमध्ये जबरदस्ती बसवून तो स्मोकिंग रूममध्ये गेला. आयुष्यातलं एक मोठं स्वप्न उद्ध्वस्त होत होतं. त्याच्या भावना गारठल्या होत्या.त्या रूममधल्या एका पेंटिंगकडे तो एकटक बघत उभा राहिला आणि जहाजाबरोबर त्यानंही जलसमाधी घेतली. टायटॅनिकमध्ये इस्मेही होता.त्याच्यासाठी खरंतर हा मोठा धक्का होता.त्यानंही अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता.जहाजातल्या प्रत्येकाला आपला मृत्यू समोर दिसत होता. काही जण वाचण्याची धडपड करत होते,तर काही मात्र शांतपणे आपल्या मृत्यूला सामोरं जायची तयारी करत होते.काही जण लोकांना वाचवण्याचा प्रयत्नही करत होते.याच यादीतलं एक नाव म्हणजे विल्यम स्टेड !


तेव्हाच्या लाइफ बोट्सच्या संख्येच्या नियमांविरुद्ध याआधीच अनेक तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले होते.'गॅझेट' या वर्तमानपत्राचा पत्रकार विल्यम स्टेड यानंही हा प्रश्न उपस्थित केला होता.त्यानं १८८८ साली याच वर्तमानपत्रात एका काल्पनिक अपघाताचं वर्णन केलं होतं.मोठमोठ्या बोटींवर लाइफ बोट्स जर पुरेशा प्रमाणात नसतील आणि ती बोट किंवा जहाज जर अँटलांटिक समुद्रात बुडालं तर काय कहर माजेल अशा आशयाची त्यानं एक गोष्ट रंगवली होती.ती काल्पनिक असली,तरी त्यात लाइफ बोट्सविषयीचा नियम किती तोकडा आहे याची जाणीव करून द्यायचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाची बाब म्हणजे त्याची ही भीती टायटॅनिकच्या अपघातामुळे लवकरच खरी ठरली.विशेष म्हणजे खुद्द स्टेडही टायटॅनिकमधून प्रवास करत होता.त्यानं अनेक स्त्रिया आणि लहान मुलं यांना लाइफ बोटमध्ये मदतही केली होती.


सगळ्या जीवरक्षक नौका गेल्यावर स्टेड शांतपणे टायटॅनिकच्या प्रथम दर्जाच्या धूम्रपान करायची परवानगी असलेल्या कक्षामध्ये गेला.तिथं एका खुर्चीत शांतपणे बसून "पुस्तक वाचायला" सुरुवात केली.काही मिनिटांतच त्यानं धडपडत एका जीवरक्षक नौकेला धरून ठेवायचा प्रयत्न केला, पण भयानक गारठ्यामुळे त्याच्या पायांमधली शक्ती गेली आणि त्यालाही जलसमाधी मिळाली!


स्टेडसारखे काही प्रवासी मदतीला धावले

स्वतःहून सदस्यांच्या क्रू होते.त्यातलीच एक होती.


" मला हे पुस्तक वाचत असताना या प्रवासातील आश्चर्यकारक घडलेला हा प्रसंग मनहेलावून सोडणारा होता. वमी ही अचंबित झालो."


'अनसिंकेबल मॉली ब्राऊन!' मागरिट ब्राऊन असं तिचं खरं नाव होतं.


जहाजावरच्या इतक्या गोंधळातही ती अत्यंत शांत होती.लोकांना बोटीत चढायला मदत करणं,लोकांना आणि क्रू सदस्यांना धीर देणं तिनं अत्यंत जबाबदारीनं पार पाडलं.खरंतर तीही एक प्रवासीच होती.तरीही तिनं हे सगळं केलं. इतकंच नाही,तर शेवटची बोट निघतानाही ती त्यात बसायला शेवटी तिला जबरदस्तीनं त्यात बसायला लावलं.तरी तिचं सगळं लक्ष जहाजामधल्या प्रवाशांकडे होतं.आपण जहाजाकडे परत जाऊ आणि ज्यांना वाचवणं शक्य आहे त्यांना वाचवू असं तिचं म्हणणं होतं. पण कोणी बोट फिरवायला तयारच झालं नाही. शेवटी तिनं स्वत: सुकाणू हातात घेतला.पुढे काय झालं याबद्दल अनेक मतांतरं आहेत. पण तिनं केलेल्या या धाडसामुळे तिला

 'दि अनसिंकेबल मॉली ब्राऊन' असं नाव पडलं. ती स्वत:फर्स्ट क्लासची प्रवासी असूनही तिनं सेकंड क्लास आणि थर्ड क्लास प्रवाशांसाठी न्याय मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यासाठी तिनं एक समितीही स्थापन केली. विशेष म्हणजे 'कॅलिफोर्नियन' चा त्या दिवशीचा कॅप्टन आर्थर हेन्री रॉस्ट्रोन याचा तिनं सत्कारही केला होता.'न बुडणारं जहाज बुडालंच कसं?', 'प्रवाशांना वाचवण्यात कंपनीला यश का आलं नाही?' अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रवाशांच्या नातेमंडळींना आणि सगळ्या जनतेला हवी होती.या सगळ्या घटनाक्रमातून अनेक धक्कादायक बाबीही समोर आल्या. एरवी मे महिन्यात वाहत येणारे हिमनग,त्या वर्षी मात्र एप्रिलमध्ये दिसायला लागले होते.त्यांचं प्रमाणही एरवीपेक्षा जास्त होतं.टायटॅनिकच्या पुढे प्रवास करणाऱ्या अनेक जहाजांना ते दिसतही होते. 'टायटॅनिकच्या मार्गात हिमनग आहेत' याची कल्पना देणारे आणि टायटॅनिकच्या कॅप्टनला सावध करणारे अनेक संदेश टायटॅनिकच्या टेलिग्राफ ऑपरेटर्सना सतत मिळत होते.पण ते टायटॅनिकच्या कॅप्टनपर्यंत पोहोचलेच नाहीत! 'कॅलिफोर्नियन'लाही असे संदेश मिळाले होते आणि या संदेशांमुळे त्यांनी आहे तिथंच थांबायचा निर्णय घेतला होता. पण टायटॅनिकनं मात्र आपला प्रवास थांबवला नाही.विशेष म्हणजे टायटॅनिकला 'कॅलिफोर्नियन' ही सावध करायचा प्रयत्न केला होता.पण त्या वेळी ड्युटीवर असलेला फिलिप नावाचा ऑपरेटर प्रवाशांचे संदेश देण्याघेण्यात व्यस्त असल्यामुळे 'कॅलिफोर्नियन' ऑपरेटरवर चक्क ओरडला होता.या संदेशाचं गांभीर्य तेव्हा जाणवलं नाही याचं आणखीन एक कारण म्हणजे त्या संदेशाची सुरुवात 'एम.एस. जी. 'नं केलेली नव्हती. जहाजाच्या कॅप्टनसाठीचे संदेश हे 'एम.एस.जी' म्हणजेच 'मास्टर्स सर्व्हिस ग्राम' या अक्षरांनी करणं महत्त्वाचं असायचं.त्यामुळेच हा संदेश उगाचच वायफळ संदेश आहे असं वाटल्यामुळेच फिलिपला तो संदेश कॅप्टनला देण्याची गरज वाटली नाही.जेव्हा टायटॅनिक अडचणीत सापडलं,तेव्हा मात्र फिलिपनं 'कॅलिफोर्नियन'ला बरेच एस.ओ.एस. (S.O.S.) सिग्नल्स पाठवले होते. ज्या टेहळणी खांबावरून ते हिमनग दिसले,तिथं बायनोक्युलर्सच नव्हते.रात्रीची वेळ असल्यामुळे समुद्रही शांत होता.त्यामुळे ते हिमनग दृष्टिपथात येईपर्यंत उशीर झाला होता. लाइफ बोट्सची संख्या तर कमी होतीच,पण त्या 


पाण्यात उतरवायच्या कशा याबद्दलचं प्रशिक्षण आणि तालीम दिली गेली नव्हती.टायटॅनिक बेलफास्टहून निघायच्या आदल्या दिवशी ते होणार होतं, पण ते प्रशिक्षण चक्क रद्द केलं गेलं. 


एकूण या अपघातानंतर अनेक वर्षांनी या जहाजाचे अवशेष मिळाले.संपूर्णपणे गंज चढलेल्या अवस्थेतही हे जहाज आपल्या सौंदर्याचा पुरावा देत होतं.या अवशेषांमध्ये चीज तसंच वाइनच्या बाटल्याही सापडल्या होत्या.


जेम्स कॅमेरून या अमेरिकन दिग्दर्शकानं या अपघातावर १९९७ साली 'टायटॅनिक या नावाचा सुंदर चित्रपट बनवला होता.यातल्या काही गोष्टी काल्पनिक असल्या तरी बऱ्याच गोष्टी अभ्यासपूर्वक चितारल्या होत्या.विशेषत: अपघात आणि अपघातानंतरची भयानकता दाखवण्यात आणि त्याचा प्रेक्षकांवर आघात करण्यात कॅमेरून यशस्वी ठरला. 


ऑलिम्पिक आणि ब्रिटॅनिक या जहाजांचं पुढे काय झालं? ही दोन्ही जहाजंही आकाराने मोठीच होती.टायटॅनिकच्या आधी ऑलिम्पिकनं समुद्रात सेवा द्यायला सुरुवात केली होती.एक अपघात सोडला तर या जहाजानं यशस्वी सेवा दिली.१९३० साली हे जहाज स्क्रॅप केलं गेलं. ब्रिटॅनिक हे टायटॅनिकपेक्षाही देखणं बनवायचा निर्णय टायटॅनिक बनवतानाच घेतला गेला होता. त्यात टायटॅनिकपेक्षा जास्त सुविधाही असणार होत्या.पण नेमकं पहिलं महायुद्ध  सुरू झाले आणि ब्रिटॅनिकमध्ये चक्क हॉस्पिटल बनवावं लागलं.जिथं कोरीव खांब उभे राहणार होते, जिथं मऊ गालिचे अंधरले जाणार होते,जिथली सजावट एखाद्या राजमहालाला लाजवेल अशी केली जाणार होती तिथं सैनिकांच्या जखमा बऱ्या करायला हॉस्पिटलच्या खाटा आणि औषधं ठेवली गेली.ब्रिटॅनिक जर ठरल्याप्रमाणे तयार झालं असतं,सगळं सुरळीत झालं असतं तर कदाचित ब्रिटॅनिकचं नाव 'पाण्यात तरंगणारा आलिशान राजमहाल' असं कोरलं गेलं असतं! विशेष म्हणजे ब्रिटॅनिकाचा अंतही टायटॅनिकसारखाच झाला.तीही बुडाली.पण शत्रूशी लढता लढता !!


गंमत म्हणजे या तिन्ही जहाजांच्या अपघातातून एक महिला दरवेळी बचावली होती.तिला


 'मिस अनसिंकेबल' असंच नाव पडलं होतं. व्हायोलेट जेसोप (Violet Jessop) असं या महिलेचं नाव होतं. 


यातल्या दोन जहाजांवर ती स्टीवर्ड म्हणून आणि तिसऱ्या जहाजावर नर्स म्हणून कामाला होती. लहानपणापासूनच ती अनेकदा मरता मरता वाचली होती.१९१० साली वयाच्या २१व्या वर्षी ती व्हाईट स्टार कंपनीत स्टीवर्ड म्हणून कामाला लागली.१९११ साली ऑलिम्पिक जहाजावर तिची नेमणूक झाली.२० सप्टेंबर १९११ रोजी हे जहाज बंदरावरून निघालं तेव्हा काही अंतरावरच त्याची ब्रिटिश युद्धनौकेशी टक्कर झाली.ऑलिम्पिकचं नुकसान झालं असलं तरी ते सगळ्या प्रवाशांना सहीसलामत घेऊन बंदरावर परतू शकलं होतं.त्यानंतर तिची टायटॅनिकमध्ये नेमणूक झाली.लाइफ बोट्समध्ये बसवायचं काम चालू असताना तिच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. टायटॅनिकमध्ये काहीजण इंग्लिश भाषक नव्हते, त्यामुळे इंग्लिशमध्ये दिल्या गेलेल्या सूचना त्यांना समजणं शक्य नव्हतं.अशांना खाणाखुणा करून सूचना सांगणं आणि त्याचं पालन होतं आहे की नाही हे पाहणं ही तिची जबाबदारी होती. शेवटची लाइफ बोट निघताना तिलाही त्यात बसण्याची सूचना दिली गेली.ती बसत असतानाच तिच्या हातात एक लहान बाळ दिलं गेलं.जहाजात सगळा कल्लोळ माजला होता. त्यामुळे कोणाचं कोण कुठं आहे याचं भान कुणालाच नव्हतं.याच भानगडीत कुणाचं तरी हे बाळ एका क्रू मेंबरच्या हाती लागलं. त्या बाळाचे आईवडील शोधत बसण्यासाठी वेळ नव्हता. म्हणून त्यानं ते बाळ सरळ जेसोपकडे सोपवलं. त्याचं पुढे काय याचा विचार कुणाच्याच मनाला शिवला नव्हता. कारण जीव वाचणं हा एकमेव उद्देश होता. तोही वाचेल की नाही याची अजूनही शाश्वती नव्हतीच. कॅलिफोर्नियननं या सगळ्यांना आपल्या जहाजात घेतलं.तेव्हाही हे बाळ जोसेपच्या मांडीवर होतं.सगळ्यांनाच मानसिक धक्का बसलेला होता.तशीच जोसेपही धक्क्यात होती.शून्यात बघत असतानाच एक बाई अचानक आली आणि जेसोपच्या मांडीवरचं बाळ घेऊन झटकन निघून गेली. 'ती बाई या बाळाची आई असेल का? आणि असलीच तर तिनं एक चकार शब्द उच्चारायचेही कष्ट कसे घेतले नाहीत?' असा विचार तिच्या मनात चमकून गेला.पण सगळ्यांची मनोवस्था बिकट होती. म्हणून जेसोप तो प्रसंग विसरून गेली.


दोनदा जीव जाता जाता वाचला असला तरी जेसोप डगमगली नाही.'ब्रिटॅनिका' या आता हॉस्पिटल झालेल्या जहाजात ती कामाला लागली.२१ नोव्हेंबर १९१६ रोजी जहाजात अचनाक धमाका झाला आणि अवघ्या ५७ मिनिटांत या जहाजानं जलसमाधी घेतली.यात ३० जण ठार झाले.पण जेसोप याही वेळी बचावली.ती आणि काही जण लाइफ बोटीत चढले.पण अचानक जहाजाचा प्रोपेलर त्या लाइफ बोटीवर आदळणार असल्याचं लक्षात आल्यावर तिनं लाइफ बोटीमधून उडी मारली. तरीही तिच्या डोक्यावर प्रोपेलरचा एक भाग आदळला आणि ती जबर जखमी झाली.जखम गंभीर असूनही ती त्यातून बचावली आणि नंतर आणखीनही जहाजांवर आपली सेवा दिली. निवृत्त झाल्यावर एका लहानशा खेड्यात तिनं आपलं उर्वरित आयुष्य शांतपणे घालवत असतानाच तिला एकदा एक फोन आला.'मीच ते बाळ' असं समोरच्यानं तिला सांगितलं.काही विचारायच्या आतच तो फोन कट झाला.तिला तो मुलगा भेटायलाही आला आणि त्यानं तिला आपल्या आईच्या वतीनं धन्यवाद दिल्याचाही काही जण दावा करतात.काही असो,पण तिच्या हातून एका जिवाला जीवनदान मिळालं होतं हे नक्की.मृत्यूला सतत हुलकावण्या देणाऱ्या या 'मिस अनसिंकेबल'चा वयाच्या ८३ व्या वर्षी अखेर मृत्यू झाला तो हृदयविकारामुळे! 


'अनसिंकेबल्स'च्या यादीत एक नाव घेतलं जातं. ते नाव म्हणजे ह्यु विलियम्स (Hugh Williams)! याची खात्रीशीर माहिती उपलब्ध नसली तरी हा योगायोग फारच मजेशीर आहे. १६६४ साली वेल्स जवळच्या समुद्रात एक बोट बुडाली होती.त्यात जवळपास ८१ प्रवासी ठार झाले होते,तर काही जण बचावले होते. वाचलेल्यांपैकी एकाचं नाव होतं-ह्यु विलियम्स. 


जवळपास १०० वर्षांनी त्याच ठिकाणी आणखीन एक बोट बुडाली.त्यात ६० जण ठार झाले.बचावलेल्यांपैकी एकाचं नाव होतं ह्यु विलियम्स. १८२० सालीही त्याच ठिकाणी आणखीन एक बोट बुडाली. त्यातही बचावलेल्यांपैकी एकाचं नाव ह्यु विलियम्स होतं !! जागा आणि वाचणाऱ्याचं नाव यांच्या या योगायोगाला काय म्हणावं?


उत्क्रांत होण्यामध्ये माणूस घडवण्यामध्ये या पुस्तकांचे 'असणं ' अतिशय महत्त्वपूर्ण आहे.वाचलेली पुस्तके,न वाचलेली पुस्तके हया पुस्तकांच्या निर्मिती मागे सर्वांचे,लेखकांचे प्रकाशकांचे मनस्वी आभार! आपण सर्वंजण या पुस्तकांचे ऋणी असलो पाहिजे.पुस्तकांचे उपकार सदैव आपल्यावरती राहतील..


'प्रवास' या पुस्तकातील २९.१२.२०२२ मधील टायटॅनिक या कथेतील ही शेवटची कथा..