* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३१/७/२३

चंपावतची नरभक्षक … भाग १

दहशत नरभक्षक बिबट्याची २९.७.२०२३ या लेखामध्ये बिबट्या व बिबळ्या या दोन शब्दांचा उपयोग केला आहे.

आमच्या कंपनीतील नेहमीच मनापासून वाचणारे राकेश सावंत साहेब यांना बिबट्या का बिबळ्या हा प्रश्न पडला.

.( हाच प्रश्न हा ब्लॉग मला भेट म्हणून देणारे विष्णू गाडेकर पाटील तरुण शास्त्रज्ञ यांनाही पडला होता.)

हा प्रश्न अनेकांना पडू शकतो.


त्यासंदर्भात थोडस मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे) या पुस्तकात बिबळ्या हा शब्द आहे.ही कथा अजून भरपूर शिल्लक आहे.ती लिहिली जाईलच.


नरभक्षकाच्या मागावर केनथ अँडरसन,अनुवाद संजय बापट या पुस्तकात बिबट्या हा शब्द वापरला आहे.


कुमाऊंचे नरभक्षक जिम कॉर्बेट,अनुवाद वैशाली चिटणीस,डायमंड पब्लिकेशन्स या पुस्तकात बिबट्या हा शब्द वापरला आहे.म्हणजेच बिबट्या व बिबळ्या दोन्ही एकच आहेत.


( ह्या फक्त अजरामर शिकार कथा नाहीत,तर बरचं काही शिकवून जाणाऱ्या आहेत.याची कृपया नोंद घ्यावी.)


नवीन गोष्ट सुरू..।


मी एडी नॉवेल्स बरोबर मलानी इथं शिकारीला गेलो असताना त्या परिसरामधल्या एका वाघिणीबद्दल ऐकलं.

तिलाच नंतर 'चंपावतची नरभक्षक' या नावाने ओळखलं जायला लागलं.


संयुक्त प्रांतामधले सर्वोत्तम शिकारी म्हणून एडी नावाजले गेले होते.त्यांच्याकडे शिकारकथांचा कधीही न संपणारा खजिनाच होता!खरंतर ज्यांच्याकडे आयुष्यामधल्या सगळ्या सर्वोत्तम गोष्टी असतात,अशा मोजक्या आणि भाग्यवान लोकांपैकी ते एक होते. 'नेमकेपणा' आणि 'अचूकपणा' यांत त्यांच्या रायफलसारखी दुसरी रायफल नव्हती.! त्यांचा एक भाऊ भारतामधला उत्तम नेमबाज होता,तर दुसरा भारतीय लष्करात होता आणि उत्तम टेनिस खेळायचा.जगातला उत्तम शिकारी असलेल्या त्यांच्या मेहुण्याची चंपावतच्या या नरभक्षक वाघाला मारण्यासाठी सरकारने नेमणूक केली असल्याचं त्यांनी मला सांगितलं,तेव्हाच या वाघाचे फारच थोडे दिवस उरले असल्याचं निश्चित झालं होतं.


त्यानंतर चार वर्षांनी मी नैनितालला भेट दिली, तेव्हा काही अनाकलनीय कारणांमुळे चंपावतचा तो नरभक्षक वाघ मारला गेला नसल्याचं आणि त्याचं असणं ही सरकारसाठी एक मोठीच डोकेदुखी होऊन बसली असल्याचं समजलं. त्याला मारणाऱ्यासाठी इनाम जाहीर केलं गेलं होतं,काही खास शिकारी नेमले गेले होते आणि अलमोरा डेपोमधून काही गुरख्यांच्या पलटणीही पाठवल्या गेल्या होत्या.या सगळ्या उपाययोजना करून

सुद्धा त्या नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात बळी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढतच चालली होती.


नंतर समजलं की,तो वाघ नव्हता;वाघीण होती.ती नेपाळहून कुमाऊँमध्ये आली,तेव्हा पूर्णतः नरभक्षक झाली होती.नेपाळमध्ये तिने २०० माणसांचा जीव घेतला होता.त्यानंतर सशस्त्र नेपाळ्यांच्या एका पथकाने तिला तिथून हुसकवून लावलं होतं.गेली चार वर्ष तिचं कुमाऊँमध्ये वास्तव्य होतं.इथं तिने आणखी २३४ माणसांचे बळी घेतले होते.


मी नैनितालला पोहोचतो न पोहोचतो तोच, बर्थोड हे नैनितालचे उपायुक्त मला भेटायला आले.तेव्हा मला ही सगळी परिस्थिती समजली.नंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू

झाला.आता ते हल्दवानीमध्ये कुठेतरी चिरनिद्रा घेत आहेत.बर्थोड यांचं व्यक्तिमत्त्वच असं होतं की,त्यांना ओळखणारे सगळेच जण त्यांच्यावर प्रेम करत आणि त्यांना मान देत.या नरभक्षक वाघिणीचा त्यांच्या अखत्यारीतल्या जिल्ह्यामधल्या लोकांना किती उपद्रव होत होता,तिच्यामुळे त्यांची चिंता कशी वाढली होती,हे त्यांनी मला सांगितलं होतं.त्यामुळे तिने घेतलेल्या पुढच्या नरबळीची बातमी यायच्या आत मी तातडीने चंपावतकडे कूच करणार असल्याचं वचन त्यांनी माझ्याकडून घेतलं,

तेव्हा त्याचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही.मी त्यांना दोन अटी घातल्या.पहिली,या वाघिणीला मारण्यासाठी सरकारने जाहीर केलेलं इनाम रद्द केलं जावं.दुसरी,तिला मारण्यासाठी नेमलेले खास शिकारी,अलमोराहून मागवलेले गुरखे यांना परत बोलवलं जावं.यामागच्या माझ्या कारणांच स्पष्टीकरण देण्याची खरं म्हणजे गरज नाही.असा इनाम घेणारा शिकारी म्हणून आपल्याला ओळखलं जावं,हे कुणाही अस्सल शिकाऱ्याला आवडणार नाही,याची मला खात्री आहे आणि एकाच वाघाच्या मागावर जास्त लोक असतील,तर त्यांना अपघाताने एकमेकांची गोळी लागण्याचा धोका नाकारता येत नाही.ते टाळणं आवश्यक होतं.माझ्या या अटी मान्य केल्या गेल्या आणि आठवड्याभरा नंतर एका भल्या सकाळी बर्थोड मला भेटायला आले.दाबिधुरा आणि धुनघाट यांच्या दरम्यान असलेल्या पाली या गावामधल्या एका स्त्रीचा त्या नरभक्षक वाघिणीने बळी घेतला असल्याची बातमी रात्री त्यांच्याकडे आली असल्याचं त्यांनी मला सांगितलं.


कधीतरी अशी बातमी येणार असल्याची आणि आपल्याला ताबडतोब निघावं लागणार असल्याची जाणीव असल्यामुळे मी सहा जणांना माझ्याबरोबर येण्यासाठी सांगून ठेवलं होतं. माझं सामान साहित्य वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पहिल्याच दिवशी नाश्ता करून निघाल्यानंतर आम्ही धारीच्या दिशेने १७ मैलांचं अंतर पार केलं.दुसऱ्या दिवशी आमचा नाश्ता मोर्नोला,तर रात्रीचा मुक्काम दाबिधुरा इथं पडला.तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही पाली इथं पोहोचलो,तेव्हा नरभक्षक वाघिणीने त्या स्त्रीचा बळी घेतल्याच्या घटनेला पाच दिवस होऊन गेले होते.त्या गावामधले स्त्री-पुरुष आणि मुलं असे मिळून पन्नासेक जण भयंकर दहशती

खाली होते.मी त्या गावात पोहोचलो,तेव्हा सूर्य वर असला,तरी सगळं गाव घरंदारं बंद करून बसलं होतं.माझ्या माणसांनी गावाच्याच आवारात चूल पेटवली आणि मी तिथेच चहा घेत बसलो.तेव्हा कुठे एका घराचं दार अगदी सावधपणे उघडलं गेलं आणि घाबरलेल्या लोकांनी बाहेर यायला सुरुवात केली.आदले पाच दिवस लोकांनी त्यांच्या घराचं दारदेखील उघडलं नसल्याचं त्यांनी मला सांगितलं.त्यांच्या अंगणाची,परिसराची अवस्था,म्हणजे अस्वच्छता बघून ते खरं बोलत असल्याचं लक्षात येत होतं.त्यांच्याकडचा अन्नसाठा संपत आला होता.नरभक्षक वाघिणीला मारलं नसतं किंवा तिथून पळवून लावलं नसतं,तर लोकांची उपासमार झाली असती.वाघीण अजूनही त्याच परिसरात होती,हे उघड होतं.सलग तीन रात्री लोकांना घरांपासून साधारण १०० यार्ड अंतरावरच्या परिसरातून तिची गुरगुर ऐकू येत होती,

डरकाळ्या ऐकू येत होत्या.विशेषतः आम्ही पोहोचलो,त्या दिवशी गावाच्या खालच्या अंगाला असलेल्या शेतात लोकांना ती दिसली होती.गावच्या प्रमुखाने आम्हाला राहण्यासाठी अगदी आनंदाने एक खोली देऊ केली.पण आम्ही आठ जण होतो आणि त्या खोलीचं दार ज्या दिशेला उघडत होतं,ती परसाकडची बाजू होती.त्यामुळे मी उघड्यावरच रात्र घालवायचा निर्णय घेतला.


रात्रीच्या जेवणानंतर काम करायचं असल्यामुळे उपलब्ध अन्नघटकांमधून पटकन तयार होतील, असे पदार्थ माझ्या माणसांनी तयार केले.त्यानंतर ती त्या सुरक्षित खोलीत जाऊन बसली.मी रस्त्याच्याच बाजूला असलेल्या एका झाडाला पाठ टेकून बसलो.गावकऱ्यांनी सांगितलं होतं की,या रस्त्यावरून रात्री फेरफटका मारायची तिला सवय होती.वाघिणीने मला पाहण्याआधी मी तिला पाहिलं

असतं,तर मला तिला मारण्याची संधी मिळण्याची शक्यता असल्याचं चंद्र पूर्ण वर आला,तेव्हा मला वाटत होतं.शिकारीची वाट बघत मी जंगलात कितीतरी रात्री घालवल्या होत्या,पण अशा पद्धतीनेनरभक्षकाची वाट

बघण्याची माझी पहिलीच वेळ होती. समोरचा रस्ता चंद्रप्रकाशात उजळून निघाला होता,पण रस्त्याच्या डाव्या-उजव्या बाजूला असलेल्या झाडांच्या सावल्या त्यावर पसरल्या होत्या.जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या आणि त्यांच्या सावल्या हलायला लागल्या,तसे डझनभर वाघ मला माझ्या दिशेने येताना दिसू लागले.त्या नरभक्षक वाघिणीच्या तावडीत स्वत:हून जाण्याचा मला भयंकर पश्चात्ताप व्हायला लागला.गावात परत जायचं धैर्यदेखील माझ्यात उरलं नव्हतं आणि स्वतःहून हातात घेतलेलं काम पूर्ण करण्याचीही भीती वाटायला लागली होती.

थंडीबरोबरच भीतीने माझे दात एकमेकांवर आपटून वाजायला लागले होते,पण रात्रभर मी तिथे तसाच बसून राहिलो.समोर दिसणाऱ्या बर्फाच्छादित पहाटेचे राखाडी रंग दिसायला लागले,तसा मी शरीराजवळ घेतलेल्या माझ्या दोन गुडघ्यांमध्ये डोके खुपसून झोपून गेलो.

तासाभरानंतर माझी माणसे आली तेव्हा मी त्याच स्थितीत गाढ झोपलेलो होतो.मी वाघिणीचा आवाजही ऐकला नव्हता की दुसरं काहीही पाहिले नव्हतं.आम्ही गावात परतलो.वाघिणीने जिथं जिथं माणसांना मारलं होतं त्या त्या ठिकाणी गावकऱ्यांनी मला घेऊन जावं म्हणून मी प्रयत्न केले,पण त्यासाठी कुणीच तयार होईना.


रात्रभर बाहेर राहूनही मी वाघिणीपासून बचावलो असल्याने ते आश्चर्यचकित झालेले दिसत होते.वाघिणीने माणसं मारलेल्या जागांच्या दिशा त्यांनी मला त्यांच्या आवारातूनच दाखवल्या.मी तिथे जाण्यासाठी कारणीभूत ठरलेली शेवटची हत्या गावाच्या पश्चिमेला असलेल्या डोंगरावर झाली होती.साधारण २० महिला आणि मुली गायीगुरांसाठी ओक वृक्षाची पानं गोळा करत असताना त्यांच्यामधलीच एक दुर्दैवी महिला मारली गेली होती.त्या वेळी तिथे असलेल्या सगळ्याच जणी मला माहिती देण्यास उत्सुक होत्या. त्या सगळ्या जणी मध्यान्ह होण्याच्या दोन तास आधी घराबाहेर पडल्या होत्या, साधारण अर्धा मैल गेल्यानंतर झाडांवर चढून त्यांनी पाने तोडली होती.जिचा बळी गेला होता, तिच्यासह आणखी दोघींनी घळीच्या बाजूला असलेल एक झाड निवडलं होतं.नंतर मी पाहणी केली.तेव्हा ती घळ चार फूट खोल आणि दहा ते अकरा फूट रुंद असल्याचं मला आढळून आलं. आवश्यक तेवढी सगळी पानं तोडल्यानंतर ती महिला झाडावरून खाली उतरत असतानाच मागच्या पायांवर उभं राहून वाघिणीने तिचे दोन्ही पाय पकडले होते.तोपर्यंत तिला कुणीच पाहिलं नव्हतं.त्यानंतर त्या महिलेचा फांदीला धरलेला हात सुटला होता आणि ती दरीत घसरत गेली होती.वाघिणीने तिचे दोन्ही पाय सोडून दिले होते.ती उठण्याचा प्रयत्न करत असताना वाघिणीने तिचं नरडं पकडलं होतं.त्या महिलेला घेऊन तो दरीच्या पलीकडच्या दाट झाडाझुडपांमध्ये नाहीशी झाली होती.


बाकीच्या दोघी जणी तिथूनच अवघ्या काही फुटांवर,

झाडावर होत्या.त्यांच्यासमोरच हा सगळा प्रकार घडला होता.बळी पडलेल्या त्या महिलेला घेऊन वाघीण दिसेनाशी झाल्यावर भयंकर घाबरलेल्या त्या महिला कशाबशा धावत-पळत गावात आल्या होत्या.दुपारच्या जेवणासाठी पुरुषमंडळी नुकतीच घरी आली होती,मग सगळे जण एकत्र जमले.कुणी ड्रम घेऊन आला,तर कुणी धातूची भांडी घेऊन आला.थोडक्यात,ज्यापासून आवाज निर्माण होईल,अशा वस्तू घेऊन प्रत्येक जण आला. सगळी तयारी करून,पुरुष पुढे आणि महिला मागे अशा पद्धतीने ते त्या महिलेला शोधण्यासाठी निघाले.वाघिणीने ज्या घळीपाशी त्या महिलेला मारलं होतं,तिथे ते पोहोचले. 'आता पुढे काय करायचं?' या महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेमध्ये साधारण ३० यार्डावरच्या झाडाझुडपांतून आलेल्या डरकाळीने व्यत्यय आणला.ती डरकाळी ऐकून त्यांच्यातला एक जण मागे वळला आणि गावाच्या दिशेने सैरावैरा धावत सुटला.

त्याच्यामागून सगळेच धावत सुटले.दमून थांबल्यावर थोडा श्वास घेत त्यांच्यातल्या प्रत्येकाने 'माझ्याआधी तूच धावायला सुरुवात केलीस आणि सगळा गोंधळ झाला' असे एकमेकांवर आरोप केले.


प्रत्येक जण धैर्यवान असल्याचा प्रत्येकाचा दावा असल्याचा आणि कुणीच घाबरलेलं नव्हतं,तर वेळ न घालवता परत जाण्याचा आणि त्या महिलेची सुटका करण्याचा मुद्दा उपस्थित होईपर्यंत सगळ्यांची मोठमोठ्याने भांडणं होत राहिली.मग तिथे परत जायची सूचना स्वीकारली गेली.सगळ्यांनी घळीपर्यंत जाण्याचा आणि घाबरून धावत परत येण्याचा प्रकार तीन वेळा झाला.तिसऱ्या वेळी ते गेले,तेव्हा त्यांच्यापैकी एकाने बंदूक चालवली आणि वाघीण डरकाळी फोडत बाहेर आली.त्यानंतर मात्र शहाणपणाचा विचार करत त्या महिलेची सुटका करण्याचा प्रयत्न सोडून देण्यात आला. "त्या बंदूक चालवणाऱ्या माणसाने हवेत बार काढण्याऐवजी झाडाझुडपांत का काढला नाही?" या मी विचारलेल्या प्रश्नावर तो म्हणाला की,"वाघीण आधीच खूप चिडलेली होती.तिला चुकून गोळी लागली असती,तर तिने मला नक्कीच ठार मारलं असतं"


वाघिणीचे काही ठसेबिसे दिसण्याच्या अपेक्षेने त्या दिवशी सकाळी मी जवळजवळ तीन तास गावाभोवती फेऱ्या मारत घालवले.असं फिरत असताना 'आत्ताच तिची गाठ पडते की काय' अशी भीतीही मला वाटत होती.दरीमध्ये खूप झाडं होती.अंधार असलेल्या एका ठिकाणी झुडपांभोवती फिरत असताना वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांचा एक थवा अचानक आवाज करत उडाला आणि 'आपलं हृदय बंद पडतंय की काय!' असं मला वाटलं.अर्थात,तसं काही घडलं नाही.


माझ्या माणसांनी जेवायला बसण्यासाठी अक्रोडाच्या झाडाखालची जागा साफसूफ करून घेतली होती.

नाश्त्यानंतर गावाच्या प्रमुखाने मला गव्हाच्या पिकाच्या कापणीचं काम करणाऱ्या लोकांना संरक्षण पुरवण्याची विनंती केली.लोक अतिशय घाबरलेले असल्याचं त्याने मला सांगितलं.ते घरातून बाहेरच पडायला तयार नव्हते.

त्यामुळे मी थांबलो असतो,तरच कापणी होणार होती;

अन्यथा होणार नव्हती.अर्ध्या तासानंतर माझ्या माणसांच्या मागे सगळं गाव गव्हाच्या कापणीसाठी बाहेर पडलं आणि मी रायफल घेऊन त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहिलो.संध्याकाळपर्यंत पाच मोठमोठ्या शेतांमधून गहू कापून जमा करण्यात आला. घरांजवळ असलेले दोन पट्टे बाकी ठेवण्यात आले होते.तिथलं काम करून घेण्यात काही अडचण येणार नसल्याचं गावच्या प्रमुखाने मला सांगितलं.त्याबरोबरच गावाची बरीच स्वच्छताही झाली आणि खास मला वापरण्यासाठी दुसरी एक खोलीदेखील देण्यात आली.तिला एक दार होत,पण हवा खेळती राहण्याची काहीच सोय नव्हती.मग दार उघडं ठेवून मी तिथे काही काटेरी झुडप टाकली.त्यामुळे वाघीण माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नव्हती.तसंच दार उघडं ठेवून मी झोपलो असतो,तर मला चांगला वाराही मिळणार होता.आदल्या दिवशी न मिळालेल्या झोपेचा कोटा मी अशा पद्धतीने पूर्ण करून घेतला.


माझ्या उपस्थितीमुळे लोकांमध्ये जणू प्राण फुंकला जायला सुरुवात झाली.त्यामुळे त्यांनी जरा जास्तच मोकळेपणाने वावरायला सुरुवात केली.असं असलं,तरी मला ज्या गोष्टीचं जास्त महत्त्व वाटत होतं,त्या माझ्या 'मला सगळं जंगल दाखवा' या विनंतीचा त्यांनी पुनर्विचार करण्याइतपत त्यांचा विश्वास मी अजूनही जिंकू शकलो नव्हतो.आसपासच्या मैलोगणिक परिसराचा अगदी प्रत्येक फूट या लोकांना परिचित होता आणि त्यांची इच्छा असती,त्यांना वाटलं असतं,तर वाघिणीला शोधण्याचा नेमका परिसर किंवा तिच्या पावलांचे ठसे बघायला मिळण्यची शक्यता असणाऱ्या नेमक्या जागा ते मला सांगू शकले असते.पण ती नरभक्षक वाघीण तरुण होती की वयस्कर ही माहिती अजूनपर्यंत मिळालेली नव्हती.

तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या माहितीचा उपयोग झाला असता,असं वाटत होतं.तिचे ठसे अभ्यासून ही माहिती मिळवता आली असती.


त्या दिवशी सकाळचा चहा झाल्यानंतर मी गावकऱ्यांना विचारलं, "माझ्या माणसांसाठी मांसाहारी जेवण हवं आहे,तर मला घोरूलची (पहाडी बोकड ) शिकार कुठे करता येईल ?" ते गाव पूर्व-पश्चिम पसरलेल्या एका डोगररांगेच्या कडेवर वसलेलं होतं.मी खालच्या बाजूला ज्या रस्त्यावर रात्र घालवली होती,तिथे उत्तरेकडे असलेल्या उतारावर,गवताळ भागात भरपूर घोरूल सापडले असते,असं मला सांगण्यात आलं.मला ती जागा दाखवण्यासाठी अनेक जण स्वेच्छेने यायला तयार झाले.त्यांचा प्रतिसाद पाहून झालेला आनंद व्यक्त न करता मी त्यांच्यामधून तीन जणांची निवड केली. "तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिथे खरोखरच घोरूल सापडले,तर माझ्या माणसांसाठी एक आणि गावासाठी दोन घोरूलांची शिकार करून आणेन" असंही मी गावच्या प्रमुखाला सांगितलं.तो रस्ता ओलांडून आम्ही पुढे गेलो आणि त्या डोंगरांमधून खाली उतरलो.अर्थात,आमच्या डावी-उजवीकडे आमचं एकदम बारीक लक्ष होतं,पण आम्हाला वाघसदृश काहीच दिसलं नाही.दरीमध्ये अर्धा मैल खाली उतरल्यानंतर दोन उतार जिथे एकत्र येतात,

अशा ठिकाणी उजवीकडे,उतारावर भरपूर खडकाळ आणि गवताळ जागा दिसत होती.मी तिथे थोडा वेळ बसून उताराचं निरीक्षण करायला सुरुवात केली. माझ्यामागे एक पाईन वृक्ष होता.त्याला मी टेकून बसलो.

समोर असलेल्या डोंगरात उंचावरची हालचाल माझ्या डोळ्यांनी टिपली.पुन्हा तीच हालचाल जाणवली,तेव्हा मी नीट बघितलं,तर एक घोरूल आपले कान हलवत उभं होतं.ते गवतामध्ये उभं होतं आणि त्याचं फक्त डोकंच तेवढं मला दिसत होतं.माझ्याबरोबरच्या माणसांना ही हालचाल दिसली नव्हती.त्यांनी नीट लक्ष देऊन बघायला सुरुवात केल्यावर त्याचं डोकं हलणं थांबलं.आसपासच्या वातावरणात त्याचा रंग असा मिसळून गेला होता की,

आता त्याला त्या सगळ्यांमधून शोधणं शक्य नव्हतं.ते नेमकं कुठे होतं,याची कल्पना देऊन मी त्यांना खाली बसायला सांगितलं आणि माझ्या हालचालींचं निरक्षण करायला सांगितलं. माझ्याकडे मार्टिनी हेन्री ही जुनी रायफल होती.(कुमाऊंचे नरभक्षक जिम कॉर्बेट,अनुवाद - वैशाली चिटणीस,डायमंड पब्लिकेशन्स)अतिशय अचूक नेम लागण्यासाठी ती प्रसिद्ध होती.आमच्यामधलं अंतर साधारणपणे २०० यार्डाचं होतं.खाली झोपून,जमिनीवर आलेल्या पाईन वृक्षाच्या मुळांवर मी माझी रायफल ठेवली,काळजीपूर्वक नेम धरला आणि गोळी झाडली.


काडतुसांमधल्या काळ्या पावडरीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे मला काही दिसत नव्हतं.माझा नेम बहुधा एखाद्या खडकावर किंवा पालापाचोळ्यावर लागला असल्याचं माझ्या माणसांनी मला सांगितलं.त्याच जागेवर बसून मी रायफलमध्ये पुन्हा बार भरला.मी आधी ज्या जागेवर नेम धरला होता,त्याच्या खाली,गवतात मला हालचाल दिसत होती.तिथेच मला घोरूलचा पार्श्वभाग दिसला.ते गवतातून पूर्ण बाहेर आलं आणि त्याने डोंगरउतारावरून खाली गडगडत यायला सुरुवात केली.

अर्ध्यावर खाली आल्यावर ते घनदाट गवतात दिसेनासं झालं. त्याच्या या धडपडीमुळे गवतात पडलेल्या दोन घोरूलांना सावधगिरीचा इशारा मिळाला आणि त्या गवतातून बाहेर येऊन ती वर,डोंगराच्या दिशेने धावायला लागली.आता ती अधिक जवळच्या टप्प्यात होती.

माझ्यासमोरच्या पानांमधून मी नीट लक्ष केंद्रित केलं.त्या दोघांपैकी आकाराने मोठ्या असलेल्या घोरूलाचा वेग कमी व्हायची वाट बघायला लागलो.तो कमी होताच,मी त्याच्या पाठीत गोळी झाडली.त्याबरोबर दुसऱ्या घोरूलाने त्याने तिरपं वळून डोंगराच्या दिशेने धावायला सुरुवात केली, तेव्हा मी त्याच्यावर गोळी झाडली.


कथा अजून संपलेली नाही. ( जिम कॉर्बेट याच्यांकडे कोणत्याही जंगलात जाण्याचा विशिष्ट असा अपवादात्मक परवाना होता.) संवादातून मला समजलेली माहिती.



२९/७/२३

दहशत नरभक्षक बिबट्याची भाग २

प्रत्येक वळण काळजीपूर्वक पार केलं.शेवटी मैलभर अंतरावर मात्र त्याने रस्ता सोडला होता व एका जंगलवाटेने दाट जंगलात निघून गेला होता.या ठिकाणाहून शंभर यार्डावर एक लागवड न केलेलं शेत होतं आणि त्याच्या मध्यावर काटेरी कुंपण दिसत होतं.

आपल्या शेतात शेळ्यामेंढ्या घेऊन येणाऱ्या फिरस्त्यांनी मुद्दाम यावं व त्यांच्या लेंड्यांनी आपलं शेत खतावलं जावं म्हणूनच शेतमालकांनंच हे कुंपण घालून ठेवलेलं होतं.आदल्या दिवशी त्या दिशेने आलेल्या शेळ्या -

मेंढ्यांच्या कळपाचा मुक्काम या कुंपणाच्या आतच होता.


त्या कळपाचा मालक अगदी रापलेला,टणक म्हातारा होता आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच कळत होतं की किमान चाळीस-पन्नास वर्षतरी तो विविध मालांची ने-आण ह्या मार्गावरून करत असावा.कुंपणाचं एक काटेरी झुडूप बाजूला काढून तो बाहेर पडतच होता तेवढ्यात मी तिथे आलो.मी त्याला बिबळ्याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला की,"मी जनावर तर पाहिलं नाही पण झुंजूमुंजू होण्याच्या सुमारास त्याच्या दोन कुत्र्यांनी मात्र आवाज दिला होता आणि काही मिनिटानंतर रस्त्याच्या वरच्या अंगाला एक भेकर भुंकलं होतं.' "


त्याचा एक बोकड विकत देण्याबद्दल मी त्याला विचारल्यावर त्याने मला कारण विचारलं. बिबळ्याला आमिष म्हणून बांधण्यासाठी पाहिजे असं सांगितल्यावर तो कुंपणाच्या बाहेर आला, झुडूप जागच्या जागी ठेवून दिलं,मी दिलेली सिगारेट घेतली अन् रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसला.


बराच वेळ आमचं दोघांचंही धूम्रपान चालू होतं. तरी माझा प्रश्न अनुत्तरीतच राहिला होता.शेवटी त्याने बोलायला सुरूवात केली."माझं गाव ब्रदीनाथच्या जवळच आहे.

तिथून येत असताना वाटेतच मी एका साहेबाबद्दल ऐकलं होतं.तर तो साहेब तुम्हीच दिसताय.पण इतक्या दुरून तंगडतोड करत इथे एका वायफळ कामासाठी तुम्ही आलात म्हणून वाईट वाटतं.इथल्या इतक्या माणसांच्या मृत्यूला कारणीभूत असलेलं हे जे काही आहे ती एक 'सैतानी शक्ती' आहे.हे कुठलंही जनावर नाही की जे तुमच्या बंदुकीच्या गोळीने मरेल किंवा इतरांनी आधीच प्रयत्न केलेल्या कोणत्याही मार्गाने मरेल.माझं म्हणणं तुम्हाला पटावं म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि तोवर आपण ही दुसरी सिगरेट ओढू या! ही गोष्ट मला माझ्या बापाने सांगितली होती आणि सर्वांना माहीत आहे की तो कधीही खोटं बोलायचा नाही.


" त्यावेळी माझा बाप एकदम जवान होता आणि माझा तर अजून जन्मच झाला नव्हता.सध्या इथल्या लोकांना त्रास देण्याऱ्या अशाच एका दुष्टात्म्याने आमच्या गावात वास्तव्य केलं होतं. सर्वजण त्याला बिबट्याच समजत होते.बाया, पोरं माणसं सतत मारली जात होती,आणि इथे सध्या जे होतंय तेच तेव्हाही होत होतं,त्याला मारण्यासाठी सर्व परीने प्रयत्न झाले,सापळे लावले गेले,मोठमोठ्या शिकाऱ्यांनी मचाणावर बसून बिबळ्या समजून बंदुका झाडल्या,पण जेव्हा एवढे प्रयत्नही फोल ठरले तेव्हा मात्र लोकांच्या मनात जबरदस्त भीती बसली. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत घराबाहेर पडण्याचीच कोणाची छाती होत नव्हती.'


" सर्व उपाय थकले तेव्हा माझ्या बापाच्या गावच्या मुखियाने आसपासच्या सर्व गावातल्या मुखियांची या संबंधात निर्णय घेण्यासाठी पंचायत बोलावली.सर्व जण जमल्यावर पंचांनी सांगितलं की या नरभक्षक बिबळ्यापासून संरक्षण म्हणून काही नवीन उपाययोजना करण्यासाठी पंचायत बोलावली आहे.आदल्या रात्री बिबळ्याने मारलेल्या आपल्या नातवाचा दहनविधी उरकून स्मशानघाटावरून नुकताच परतलेला एक म्हातारा उठला आणि म्हणाला, "अगदी शेजारी झोपलेल्या माझ्या नातवाला घरात शिरून उचलून घेऊन जाणारा हा बिबळ्या म्हणजे साधा बिबळ्या नाही,तर आपल्या

सारख्या हाडामासांचा एक माणूस आहे आणि तो रक्तामांसाची इच्छा झाल्यावर बिबळ्याचे रूप घेतोय.इतर कोणत्याही उपायाने तो खतम होणार नाही.फक्त आग हे शेवटचं अस्त्र उरलंय." त्याच्या म्हणण्यानुसार त्याला पडक्या देवळाजवळच्या झोपडीत राहणाऱ्या साधूचा संशय येत होता.


" हे ऐकल्यानंतर सर्व बाजूने कुजबूज व आरडाओरडा सुरू झाला.काहींचं म्हणणं पडलं की नातू दगावल्यामुळे म्हाताऱ्याचं डोकं बिघडलंय तर काहींना त्याचं पटतही होतं.ज्यांना त्याचं म्हणणं थोडं पटत होतं त्यांनी सर्वांना आठवण करून दिली की हे बळी जायला सुरुवात होण्याच्या सुमारासच हा साधू गावात राहायला आला होता.आणि जेव्हा एखादा बळी जात असे त्याच्या दुसऱ्या दिवशी हा साधू त्याची खाट भर उन्हात टाकून दिवसभर झोपलेला दिसायचा. "


"कुजबूज शांत झाल्यावर आणि बरीच उलटसुलट चर्चा झाल्यानंतर शेवटी पंचायत अशा निर्णयावर आली की लगेच कोणतीही कारवाई करू नये पण यापुढे त्या साधूच्या सर्व हालचालींवर बारीक नजर ठेवावी.जमलेल्या लोकांमधून लगेचच टेहळणीसाठी तीन पथकं बनवली गेली.सर्व बळी विशिष्ट अंतरानेच पडत असल्याने पुढचा बळी जाण्याचा जो अपेक्षित दिवस होता त्या पूर्वीच पहिल्या गटाने टेहळणी करायला सुरुवात करायची होती.


"पहिला व दुसरा गट टेहळणी करत असताना साधूने झोपडी सोडली नाही.माझा बाप तिसऱ्या गटात होता.

अंधार पडण्याच्या सुमारास त्यांनी आपापल्या जागा घेतल्या.लवकरच झोपडीचा दरवाजा उघडला गेला,साधू बाहेर पडला आणि अंधारात गुडूप झाला.काही तासानंतर दूरवर डोंगरावरच्या कोळसेवाल्याच्या घराच्या दिशेकडून एक किंकाळी ऐकायला आली व नंतर सर्व काही शांत झालं.पार्टीतल्या एकानेही रात्रभर डोळे मिटले नाहीत आणि जेव्हा तांबडं फुटलं तेव्हा त्यांनी साधूला घाईघाईने झोपडीकडे येताना पाहिलं... त्याच्या हातातून व तोंडातून रक्त गळत होतं!"


"साधू झोपडीत शिरला आणि त्याने दरवाजा लावून घेतला.हे सर्वजण झोपडीजवळ गेले साखळी कोयंड्यात अडकवून तो बाहेरून बंद करून घेतला व त्यानंतर प्रत्येक जण त्याच्या त्याच्या गंजीकडे गेला.येताना प्रत्येकाने गवताच्या काही पेंढ्या आणल्या.त्यादिवशी सूर्य उगवण्याच्या सुमारास त्या झोपडीच्या जागी राखेशिवाय काहीही उरलं नव्हतं.त्या दिवसा पासून नरबळी घडण्याचे प्रकार बंद झाले."


"अजून तरी इकडे असलेल्या कोणत्याही साधूवर कोणाचा संशय निर्माण झालेला नाही पण जेव्हा तसं होईल तेव्हा माझ्या बापाच्या काळात जी उपाययोजना केली गेली ती माझ्याही काळात केली जाईल.पण तो दिवस येईपर्यंत गढवाली जनतेला त्यांच्या वाटेचे भोग भोगलेच पाहिजेत."


"आता तुम्ही मला बोकड विकत देण्याबद्दल विचारलंत.

तर साहेब माझ्याकडे जास्तीचा एकही बोकड नाही.पण माझी गोष्ट ऐकल्यानंतरही तुम्ही म्हणत असाल तर बांधण्यासाठी म्हणून मी माझा एक मेंढा उसना देतो.जर तो मारला गेला तर तुम्ही मला पैसे द्यायचे पण जिता राह्यला आपल्यात कोणताही व्यवहार होणार नाही. आजचा दिवस व रात्र मी इकडे आहे.उद्या 'भूतियां'ची चांदणी उगवण्याच्या वेळेला मला निघालंच पाहिजे."


त्या दिवशी संध्याकाळी मी परतलो तेव्हा त्या ओझीवाल्या मित्राने आनंदाने मला पाहिजे तो मेंढा दिला.बिबळ्याला दोन रात्री पुरेल एवढा मोठा! त्याला मी सकाळी बिबळ्याने जिथे यात्रामार्ग सोडून जंगलाची वाट पकडली होती तिथे बांधला.


दुसऱ्या दिवशी मी लवकरच उठलो.बंगल्याबाहेर पडताना परत एकदा व्हरांड्याखालीच मला त्याचे पगमार्कस दिसले.फाटकापाशी त्या पगमार्कसचं निरीक्षण केल्यावर कळलं की तो बिबळ्या काल रात्री गुलाबराईच्या दिशेनेच

आला होता आणि रुद्रप्रयाग बाजाराच्या दिशेने निघून गेला होता.याचा अर्थ त्याला माणूसच पाहिजे होता.मला नंतर कळलं की त्याने तो मेंढा मारला होता पण त्याला थोडं सुद्धा खाल्ल नव्हतं.


"परत घरी जा साहेब आणि तुमचा वेळ व पैसा वाचवा" हा त्या म्हाताऱ्याचा निरोपाचा सल्ला होता.लगेच त्याने त्याच्या कळपासाठी खुणेची शिट्टी वाजवली आणि तो हरिद्वारच्या दिशेने निघून गेला.


अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी रुद्रप्रयागजवळ घडली होती.पण सुदैवाने तिचा शेवट इतका वाईट झाला नाही.

आपल्या नातलगांच्या आणि मित्रांच्या मृत्यूमुळे माथी भडकलेल्या एका जमावाने दासजल पट्टी जवळच्या 'कोठगी' गावात एका साधूला पकडलं.त्यांनाही असा संशय होता की या सर्व नरबळींमागे माणसांपैकीच कोणाचा तरी हात आहे.सुदैवाने त्या जमावाचा राग त्या साधूवर निघण्याच्या आत गढ़वालचा तेव्हाचा डेप्युटी कमिशनर फिलीप मेसन तिथे आला.त्याचा कॅम्प जवळच होता.त्याला एकूण वातावरणाचा अंदाज आला आणि चांगला अनुभवी प्रशासक असल्याने त्याने एक शक्कल लढवली.तो म्हणाला की खरा गुन्हेगार सापडलाय याबद्दल त्याची खात्री आहे पण एखाद्या माणसाला देहदंड देण्याअगोदर त्याचा गुन्हा सिद्ध व्हायला पाह्यजे.तेव्हा त्या साधूला नजरकैदेत ठेवावं.हे सर्व जमावाला मान्य होतं.पुढचे सात दिवस व रात्र त्याला पोलिसांच्या आणि जमावांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं.आठव्या दिवशी पहारेकरी व इतर टेहळे यांची अदलाबदल होत असतानाच बातमी मिळाली की तिथून काही मैल दूर एका गावात घरात घुसून बिबळ्याने एक माणूस उचलून नेलाय.


मग मात्र जमावाने साधूला सोडून द्यायला विरोध केला नाही.'या वेळेला चुकीचा माणूस पकडला गेला असेल,पण पुढच्या वेळी ही चूक होणार नाही.' असं समाधान करून घेऊन साधूला जिवानिशी सोडण्यात आलं.


गढ़वाल भागात अशा नरबळींसाठी जसं 'साधू' ना जबाबदार धरलं जातं तसे नैनिताल - अल्मोडा भागात 'बोख्सर ना धरलं जातं.हे बोख्सर फूटहिल्सच्या पायथ्याच्या 'तराई' या गवताळ पट्ट्यात वास्तव्य करून असतात आणि प्रामुख्याने शिकारी करून पोटं भरतात.


साधू रक्तमांसाला चटावल्यामुळे असं करतात तर बोख्सर हे बळीच्या अंगावरच्या दागिन्यांसाठी व मूल्यवान वस्तूंसाठी नरबळी घेतात असा समज आहे.


नरभक्षकांकडून जास्त प्रमाणात नेहमी स्त्रियांचे बळी जातात हे खरंय पण त्याची निश्चित अशी काही कारणं आहेत.!


हे सर्व समज भीतीतून किंवा अगतिकेतून येतात. मीही अतिशय कल्पनातीत अशा एकांतात नरभक्षकांसाठी पुलांवर,पायवाटांवर,आमिष म्हणून बांधलेल्या गाऱ्यांवर किंवा नरबळीशेजारी रात्री रात्री जागून काढल्या आहेत.

एकदा तर सलग वीस रात्री- तेव्हा भीतीमुळे मलाही भास व्हायचे की धड जनावराचं पण तोंड सैतानाचं असलेला,

नरभक्षक मला जवळून कुठूनतरी लपून पहातोय,माझ्या मूर्ख खटपटींकडे पहात आतल्या आत सैतानी हास्य करतोय आणि मला एकदा तरी बेसावध अवस्थेत गाठून माझ्या गळ्यात त्याचे दात रुतवण्याचं स्वप्न रंगवत जिभल्या चाटतोय!


आता तुम्ही असा प्रश्न विचाराल की इतके सर्व नरबळी जात असताना सरकार काय करत होतं? पण एकूण दहा आठवडे रुद्रप्रयाग परिसरात घालवल्यानंतर आणि त्या भागातल्या प्रत्येक गावाला भेट दिल्यानंतर मी एवढं नक्की सांगू शकतो की शासनाने त्यांच्या यंत्रणेला जेवढं शक्य होतं ते सर्व केलं होतं.बक्षिसं जाहीर केली गेली (स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार रु. १०,००० व दोन गावांचं इनाम' अशी बक्षीसं होती) निवडक शिकारी घसघशीत मानधन देऊन बोलावले गेले,(आणि परत यश मिळालं तर बक्षीसं होतीच !) आधीच असलेल्या चार हजार लायसेन्सेसशिवाय तीनशे लायसेन्सेस फक्त नरभक्षकाच्या शिकारीसाठी दिली गेली. लॅन्सडाऊनच्या गढवाल रेजिमेंटच्या सैनिकांना रजेवर गावी जाताना रायफली घेऊन जाण्याची परवानगी दिली गेली किंवा त्यांच्या ऑफिसर्सनी त्यांना बंदूका देऊ केल्या,देशभराच्या शिकाऱ्यांना प्रेसमधून आवाहन केलं गेलं,आमिष म्हणून बोकड बांधून 'ड्रॉप डोअर' पद्धतीचे सापळे लावले गेले,

सर्व गावांच्या पटवाऱ्यांना नरबळीमध्ये टाकण्यासाठी विषाच्या कॅपसूल्स दिल्या गेल्या आणि बऱ्याच सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या नोकऱ्या सांभाळून उरणारा वेळ नरभक्षकाच्या शिकारीसाठी घालवला.


ह्या सर्व उपाययोजनांचा एकत्रित परिणाम काय? तर बंदुकीच्या गोळीमुळे बिबळ्याच्या मागच्या डाव्या पायाच्या गादीला झालेली छोटी जखम आणि सरकारी दफ्तरात केली गेलेली विषाबाबतची खालीलप्रमाणे नोंद...


'विषाचा योग्य तो परिणाम होण्याऐवजी या बिबळ्याच्या शरीरात भिनलेल्या विषामुळे बिबळ्या उत्तेजित झाल्याचे व विष पचवल्याचे आढळले आहे.'


नरभक्षकाला मारण्यासाठी जे काही प्रयत्न झाले त्या संबंधीच्या तीन महत्त्वाच्या नोंदी मी मुद्दाम इथे देतोय....


पहिली नोंद :प्रेसमधील आवाहनामुळे दोन तरुण ब्रिटिश अधिकारी १९३२ साली रुद्रप्रयागला आले.अलकनंदा नदी ओलांडण्यासाठी नरभक्षक रुद्रप्रयागमधील झुलत्या पुलाचा वापर करतो असा अंदाज त्यांनी कोणत्या आधारावर काढला ते माहीत नाही पण त्यांनी त्यांचे सर्व प्रयत्न त्या पुलावरच केंद्रित करायचं ठरवलं.पुलाच्या दोन्ही बाजूच्या तीरावर टॉवर्स बांधले होते.त्यातूनच पुलाला आधार देणाऱ्या केबल्स जात असत. एक शिकारी उजव्या तर एक शिकारी डाव्या टॉवरवर बसला.जवळजवळ दोन महिने टॉवरवर अशाप्रकारे पहारा दिल्यानंतर एका रात्री डाव्या तीरावरच्या टॉवरवर बसलेल्या शिकाऱ्याने बिबळ्याला कमानीतून पुलावर येताना पाह्यलं. त्याला पुलाच्या मध्यावर येऊ दिल्यावर त्याने फायर केलं.त्यासरशी तो बिबळ्या वेगाने पूल ओलांडत असताना उजव्या टॉवरवर बसलेल्याने त्याच्या रिव्हॉल्व्हरचे सहाच्या सहा चेंबर्स रिकामे केले.दुसऱ्या दिवशी सकाळी पुलावर आणि पुलापलीकडच्या डोंगरावरच्या पायवाटेवर रक्ताचे माग मिळाले.त्यामुळे हा शोध जारी ठेवला गेला त्यानंतर जवळजवळ ६ महिने नरभक्षकाकडून एकही माणूस मारला गेला नाही.ते सातही शॉट ऐकलेल्या आणि नंतरच्या शोध मोहिमेमध्ये भाग घेतलेल्या माणसांनी ही घटना मला नंतर सविस्तर सांगितली.सर्वांना असं वाटलं होतं की पहिली गोळी त्याच्या पाठीत घुसली असावी आणि नंतरच्या सहा गोळ्यांपैकी एक डोक्यात लागली असावी.म्हणूनच इतका सातत्याने शोध घेतला गेला होता रक्ताच्या मागाबद्दल मला जी माहिती दिली गेली त्यावरून माझं मत असं पडलं की त्या बिबळ्याच्या धडावर किंवा डोक्यावर गोळी लागलीच नसणार.कारण फक्त पायाला झालेल्या जखमांमुळेच त्या प्रकारचा रक्ताचा माग मिळू शकतो. नंतर... म्हणजे खूप नंतर समाधानाची बाब अशी की माझा कयास खरा ठरला... डाव्या तीरावरून मारलेल्या गोळीने फक्त मागच्या डाव्या पावलाच्या गादीचा टवका उडाला होता तर उजव्या टॉवरवरून मारलेले सर्वच्या सर्व शॉट्स चुकले होते.


दुसरी नोंद : ' ड्रॉप डोअर' प्रकारच्या सापळ्यामध्ये जवळजवळ २० बिबळे सापडून ठार झाल्यानंतर शेवटी एक असा बिबळ्या अडकला की तो नरभक्षकच असणार याबद्दल सर्वांची खात्री होती.नरभक्षकाने मारलेल्या माणसांचे अतृप्त आत्मे आपल्याला भुतं बनून त्रास देतील या भीतीने एकही हिंदू माणूस बिबळ्याला मारायला तयार होत नव्हता.शेवटी एका भारतीय ख्रिश्चनाला बोलावणं पाठवलं गेलं.हा माणूस ३० मैलावरच्या एका गावात राहायचा आणि तो इकडे पोचायच्या आत त्या सापळ्यातून तो बिबळ्या निसटला आणि पसार झाला.


तिसरी नोंद : एका माणसाला मारल्यानंतर हा बिबळ्या जंगलाच्या एका विशिष्ट पट्ट्यात भक्ष्य ठेऊन जवळच लपून बसला होता.बळीचे अवशेष शोधण्यासाठी निघालेल्या शोधपथकाला दुसऱ्या दिवशी तो बिबळ्या जंगलातून बाहेर पडताना दिसला.थोड्याशा पाठलगानंतर तो एका गुहेत शिरताना आढळला.त्या सर्वांनी गुहेचं तोंड मोठमोठ्या दगडांनी व काटेरी झुडूपांनी बंद करून टाकलं.दरदिवशी वाढत्या संख्येने लोक त्या गुहेला भेट देऊ लागले.पाचव्या दिवशी जवळजवळ पाचशे माणसं तिथे जमलेली असताना एक माणूस तिथं आला.त्या माणसाचं नाव मला सांगितलं गेलं नाही.पण ही त्या भागातली 'वजनदार' असामी होती असं सांगितलं गेलं..


पुढची हकीकत गावकऱ्यांच्याच शब्दात ऐका "हा माणूस बोलला की त्या गुहेत बिबळ्या वगैरे काही नाहीच,असं म्हणून त्याने काटेरी झुडपं हलवली आणि त्याचक्षणी बिबळ्या अचानक गुहेतून बाहेर पडला आणि त्या पाचशे माणसांमधून वाट काढत सटकून निघून गेला. "


खरंतर या तिन्ही घटना हा बिबळ्या नरभक्षक बनल्यानंतर लगेचच घडल्या होत्या.जर पुलावरचा नेम अचूक ठरला असता सापळ्यात अडकलेला असताना त्याला गोळी घातली गेली असती किंवा तो गुहेतच कायमचा जेरबंद केला असता तर गढवालच्या जनतेला इतकी किंमत चुकवायला लागली नसती.


२७ जुलै २०२३ या लेखातील पुढील भाग..


२७/७/२३

दहशत नरभक्षक बिबट्याची

दहशत,भीती हे शब्द आपण दररोज साध्या - साध्या बाबतीत इतके सर्रास वापरतो की कधी कधी जेव्हा खरंच त्याचा आवाका मोठा असेल तेव्हा तेवढ्याच शब्दांत सांगून त्याचा खराखुरा अर्थबोध होत नाही.त्यामुळेच जवळपास पाचशे चौ.मैल पहाडी मुलखात राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने,आणि दरवर्षी चारधाम यात्रेला येणाऱ्या साठ हजार यात्रेकरूंच्या दृष्टीने,नरभक्षकाने घातलेली ही दहशत नक्की कशी होती याची मला तुम्हाला कल्पना द्यायची आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला अशाही काही घटना सांगणार आहे की ह्या दहशतीचं कारणंही तुम्हाला समजेल.


रुद्रप्रयागच्या नरभक्षकाने लादलेल्या 'कर्फ्यू' एवढं इतर कोणत्याही कर्फ्यूचं काटेकोरपणे पालन आजवर झालं नसेल! दिवसभर त्या भागातलं सर्व जनजीवन नेहमी प्रमाणेच चालू राहायचं;पुरुषमाणसं लांबवरच्या बाजाराला,शेजारच्या गावी मित्रांकडे,पाहुण्यांकडे जायची, बायकामाणसं डोंगरावर वैरणीसाठी तसेच शाकारणीसाठी गवत कापायला जायची;पोरं शाळेत किंवा गुरं-बकऱ्या वळायला आणि सरपण आणायला रानात जायची व उन्हाळा असेल तेव्हा छोटे मोठे घोळके करून बद्रीनाथ-केदारनाथकडे जाताना दिसायची.


पश्चिम क्षितिजाकडे सूर्य जरा कलायला लागला आणि सावल्या मोठमोठ्या व्हायला लागल्या की मात्र या सर्वांच्या वागणुकीत अचानकपणे लक्षणीय असा बदल दिसायला लागायचा.बाजाराकडे,गावाकडे गेलेली पुरुषमाणसं लगबगीने परतताना दिसायची.डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका धडपडत डोंगर उतरायला लागायच्या.शाळेतून येताना रेंगाळणाऱ्या,गुरं घेऊन रानातून परतायला उशीर झालेल्या पोरांना त्यांच्या आया हाका मारमारून बोलवायला लागायच्या आणि यात्रेकरूंना वाटेत भेटणारी माणसं 'लवकर मुक्कामावर जा' असं सांगायला लागायची.


अंधार पडला रे पडला की एकप्रकारची अमंगळ शांतता,

स्तब्धता आख्ख्या इलाख्यात पसरायची, अक्षरशः एकही हालचाल नाही की शब्द नाही.! सर्वच्या सर्वजण दरवाजे बंद करून अंधाऱ्या घरात स्वतःला कोंडून घ्यायचे.

काहीवेळेला तर एखादा जास्तीचा दरवाजा काढून संरक्षणात दुप्पट वाढ करण्यात यायची.कोणाच्या घरात किंवा दुकानात आसरा न मिळालेले यात्रेकरू,यात्रेकरूं-

साठी बांधलेल्या गवती छपरांच्या पिलग्रिम शेल्टर्समध्ये दाटीवाटीने झोपायचे.


सगळेच्या सगळे,घरातले किंवा झोपड्यांतले, नरभक्षकाच्या भीतीने चिडीचीप बसायचे.सतत आठ वर्ष गढवालच्या पहाडी जनतेसाठी व यात्रेकरूंसाठी 'दहशत' ह्या शब्दाचा अर्थ हा असा होता! आता ही एवढी दहशत बसायची कारणं व स्पष्टीकरण देण्यासाठी मी तुम्हाला काही घटना सांगतो.


एका गावात चाळीस शेळ्यांची राखण करण्यासाठी एका माणसाने एक चौदा वर्षांचा अनाथ मुलगा कामाला ठेवला होता.हा अस्पृश्य जातीचा होता.दररोज संध्याकाळी शेळ्या घेऊन गावात परत आल्यावर त्याला जेवण दिलं जाई व त्यानंतर एका छोट्या खोलीत चाळीस शेळ्यांसह बंद केलं जाई.एका एकमजली इमारतीच्या तळ -

मजल्यावर मालकाच्या घराच्या बरोबर खाली ही खोली होती.झोपल्यावर शेळ्या अंगावर येऊ नयेत म्हणून त्या मुलाने खोलीचा एक कोपरा पाहून मध्ये लाकूड आडवं टाकून स्वतःला झोपण्यासाठी जागा केली होती.


त्या खोलीला एकही खिडकी नव्हती आणि फक्त एकच दरवाजा होता.सर्व शेळ्या व तो मुलगा खोलीत गेल्यावर त्यांचा मालक दरवाजा बंद करायचा.दरवाजाला बसवलेल्या साखळीची शेवटची कडी दरवाजाच्या चौकटीतल्या कोयंड्यात घातल्यावर,निघू नये म्हणून त्यात लाकडाचा अडसर सरकवून खोली सुरक्षित केली जात असे.खबरदारीचा जास्तीचा उपाय म्हणून तो पोरगाही दरवाजाला आतून एक जड धोंडा लावत असे.


ज्या रात्री त्या पोराचा बळी गेला त्या रात्रीही त्याच पद्धतीने खोली बंद केली गेली होती असं त्या मालकाचं म्हणणं आहे आणि एकूणच भीतीचं,दहशतीचं वातावरण बघता त्यात तथ्य असावं.दरवाजावर उमटलेल्या नख्यांच्या ओरखड्यांवरून सुद्धा हे ध्यानात येत होतं. दरवाजा नख्यांनी ओरबाडून तोडण्याच्या प्रयत्नात केव्हातरी तो लाकडाचा अडसर कडीतून निघाला असावा आणि त्यानंतर फक्त दरवाजा ढकलायचंच बाकी राह्यलं.


चाळीस बकऱ्या आणि त्यात लाकूड आडवं टाकून झोपायला केलेली जागा यातून खरंतर बाहेरून येणाऱ्या कोणत्याही जनावराला हालचाल करायला जागा उरण्याची शक्यता नव्हती.त्यामुळे हा बिबळ्या बकऱ्यांच्या पाठीवरून झेप घेऊन पोरापर्यंत पोचला की बकऱ्यांच्या पायाखालून सरपटत गेला याचा फक्त अंदाजच करणं आपल्या हातात उरतं. (कारण या क्षणापर्यंत साहजिकच सर्व बकऱ्या घाबरून उभ्या राह्यल्या असणार)


दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतानाचा बिबळ्याचा आवाज,तो खोलीत शिरल्यावर बकऱ्यांच बेंबाटणं पोराला ऐकू आलं नाही, त्याची झोप मोडली नाही आणि तो मदतीसाठी ओरडला नाही असं गृहीत धरण्याशिवाय गत्यंतर नाही.


मुलाला त्या कोपऱ्यात मारून,उचलल्यानंतर बिबळ्या खोलीबाहेर पडला ( तोपर्यंत सर्व बकऱ्या खोलीबाहेर पळाल्या होत्या.) आणि डोंगर उतरून काही अंतर गेला.

त्यानंतर उतारावरची एक दोन सोपानशेतं ओलांडून दगडगोट्यांनी भरलेल्या एका घळीत घेऊन गेला.काही तासांनी उजेड पडल्यावर इथेच त्याच्या मालकाला त्या पोराचे अवशेष सापडले.


यात अविश्वसनीय वाटणारी गोष्ट म्हणजे एकाही बकरीला साधा ओरखडासुद्धा उमटला नव्हता!


एक माणूस त्याच्या शेजाऱ्याकडे जरा निवांतपणे हुक्का प्यायला आला होता.ही खोली इंग्रजी 'एल' आकाराची होती.तिचा बाहेरचा दरवाजा त्यांच्या बसल्या जागेवरून दिसत नव्हता.ते दोघं हुक्का पेटवून भिंतीला टेकून आरामात धूर काढत बसले होते.त्या दिवसापर्यंत त्या गावात एकही बळी गेला नसल्याने त्यांनी दरवाजा घट्ट लावण्याची काळजी घेतली नव्हती.हळूहळू अंधार पडला.

एक दोन दम मारून मालकाने तो हुक्का आपल्या मित्राच्या हातात दिला पण नेमका तो त्याच्या हातातून निसटून खाली पडला आणि तंबाखू व जळते निखारे इकडे तिकडे पसरले.


"जरा सांभाळून... नाहीतर कांबळ्याला आग लावशील" असं काहीबाही बडबडत तो माणूस निखारे गोळा करण्यासाठी खाली वाकला आणि त्याचं तोंड दरवाजासमोर आलं.चंद्र नुकताच मावळत होता आणि त्या प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर त्याला त्याच्या शेजाऱ्याला तोंडात घेऊन जाणारा बिबळ्या दिसला.


काही दिवसानंतर ही घटना मला परत सांगताना तो माणूस म्हणतो, "मी खरं सांगतोय साहेब, हा माझा शेजारी माझ्यापासून हाताच्या अंतरावर होता तरीही साधा श्वास घेण्याचासुद्धा आवाज मला आला नाही... त्याला मारताना,ओढून नेताना बिबळ्याचासुद्धा काहीही आवाज नाही! मी त्याक्षणी काहीही करू शकत नव्हतो, बिबळ्या दरवाजाबाहेर जाईपर्यंत मी थांबलो नंतर सरपटत जाऊन पटकन दरवाजा लावून घट्ट बंद करून टाकला.' 


गावच्या मुखियाची बायको जरा आजारी होती आणि तिची शुश्रूषा करण्यासाठी तिने त्या रात्री गावातल्या दोन बायकांना घरी बोलावलं होतं. त्या घराला दोन खोल्या होत्या व बाहेरच्या खोलीला दोन दरवाजे होते.एक बाहेर अंगणात उघडणारा तर एक आतल्या खोलीत उघडणारा. बाहेरच्या खोलीला एक खिडकी होती,ती जमिनीपासून चार फूट उंचीवर होती.या खिडकीत त्या बाईसाठी पिण्याच्या पाण्याचं मोठं पितळी भांडं ठेवलं होतं.

बाहेरच्या खोलीत उघडणारा दरवाजा सोडला तर आतल्या खोलीला एकही,खिडकी नव्हती.बाहेरचा दरवाजा घट्ट लावला होता,पण दोन खोल्यांमधला दरवाजा साहजिकच उघडा ठेवलेला होता.


आतल्या खोलीत त्या आजारी बाईला मध्ये ठेवून दोन्ही बायका जमीनीवरच झोपल्या होत्या. बाहेरच्या खोलीत त्या खिडकीजवळच पलंगावर तिचा नवरा झोपला होता.

शेजारीच जमीनीवर त्याने कंदील ठेवला होता.आणि तेलाची बचत व्हावी म्हणून,शेजारच्या खोलीत त्याचा जेमतेम उजेड पडेल इतपत त्याची वात छोटी करून ठेवली होती.


मध्यरात्रीच्या सुमारास सर्वजण झोपलेले असतानाच हा बिबळ्या बाहेरच्या खोलीच्या खिडकीतून घरात शिरला.(पण हे करताना त्याने पाण्याचं मोठं भांडं कसं टाळलं हे आश्चर्यच आहे.) आत आल्यावर तो पलंगाच्या शेजारून पुढे आतल्या खोलीत शिरला.बाईला उचलून परत जाताना मात्र या जास्तीच्या ओझ्यामुळे ते पाण्याचं भांडं खाली पडलं व त्याच्या आवाजामुळे सर्वांना जाग आली.


जेव्हा कंदिलाची वात मोठी केली गेली तेव्हा कंदिलाच्या प्रकाशात त्यांना ती बाई खिडकीखाली मुटकुळं होऊन पडलेली दिसली, तिच्या गळ्यावर सुळ्यांचे चार मोठे व्रण होते. शुश्रूषेसाठी तिथे आलेल्या बायकांपैकी एकीचा नवरा मला ही हकीगत सांगताना म्हणतो, "मुखियाची बायको खूपच आजारी होती साहेब आणि फार दिवसांची सोबत नव्हती.बिबळ्याने तिलाच निवडलं हे नशीब.


दोन गुजर लोक त्यांचा तीस म्हशींचा कळप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन चालले होते.ते एकमेकांचे भाऊच होते व त्यांच्यातल्या मोठ्या भावाची बारा वर्षांची मुलगी त्यांच्या बरोबर होती.हे दोघे या भागात पहिल्यांदाच आले होते आणि एकतर त्यांच्या कानावर नरभक्षकाबद्दल काही आलं नसावं किंवा जास्त शक्यता ही आहे की सुरक्षिततेसाठी म्हशींवर त्यांचा भरवसा असावा.जवळजवळ आठ हजार फूट उंचीवर पायवाटेला लागूनच एक छोटी सपाट जागा होती आणि त्याच्याखाली कोयत्याच्या आकाराचं डोंगर उतरणीवरचं छोटंसं शेत होतं.हे शेत साधारण पाव एकराचं असावं व बराच काळ त्यावर काही लागवड झाली नसावी. त्या दोघांनी रात्रीच्या मुक्कामासाठी ही जागा निवडली.

जवळच्या जंगलातून त्यांनी काही लाकडं तोडून आणली आणि त्याचे खुंट शेतात खोलवर ठोकून त्यांनी म्हशींना रांगेत बांधून टाकलं.त्यानंतर त्या मुलीने बनवलेलं जेवण उरकून तिघांनी शेत आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या त्या सपाट जमीनीवर कांबळं अंथरलं आणि सर्वजण झोपी गेले.ती रात्र अंधारी होती. पहाटेपहाटे म्हशींच्या घंटामुळे आणि हंबरण्यामुळे त्या दोघांना जाग आली.इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर त्यांना लगेच लक्षात आलं की आसपास वाघ-बिबळ्या आहे.त्यांनी कंदील पेटवला आणि म्हशींना शांत करण्यासाठी, त्याप्रमाणे एखादीने हिसके देऊन दावे तोडलेत का हे बघण्यासाठी शेतातून त्या म्हशींमधून एक चक्कर मारली.फक्त काही मिनिटांसाठीच ते त्यांच्या झोपण्याच्या जागेवरून गैरहजर होते पण परत आल्यानंतर त्यांना दिसलं की जाताना झोपलेली ती मुलगी आता गायब आहे आणि ज्या कांबळ्यावर ते झोपले होते त्यावर रक्ताचे मोठे मोठे शिंतोडे आहेत.


दिवस उजाडल्यावर त्या भावाभावांनी रक्ताचा माग काढला.हा माग म्हशी बांधलेल्या ठिकाणा शेजारून शेत ओलांडून काही पावलं डोंगर उतारावर गेला होता.इथेच बिबळ्याने त्याचं भक्ष्य खाल्लेलं त्यांना आढळलं.


"माझा भाऊ अगदी अशुभ नक्षत्रावर जन्माला आला असणार साहेब.त्याला मुलगा नाही.ह्या त्याच्या मुलीचं लवकरच लग्न होणार होतं आणि तिच्याकडून

आपल्याला वारस मिळेल हे त्याचं स्वप्न होतं.बिबळ्याने नेमक तिलाच नेलं." तो दुर्दैवी गुजर सांगत होता.


मी अशा कित्येक घटना एकामागोमाग एक सांगू शकतो. प्रत्येक घटनेचा शेवट दुःखदच आहे पण मला वाटतं या गढ़वाली लोकांना इतकी दहशत का होती हे कळावं इतपत मी तुमच्याशी बोललो आहे.त्याचबरोबर हेही लक्षात घ्यावं लागेल की हे पहाड़ी लोक शूर असले तरी श्रद्धाळू असतात. त्यामुळे प्रत्यक्ष नरभक्षकाच्या भीतीपेक्षा त्यांच्यावर अमानवी शक्तींच्या भीतीचाही पगडा असणंही नैसर्गिक आहे.याबद्दलचं छोटंसं उदाहरण.


एक दिवस पहाटे पहाटेच मी रुद्रप्रयाग इन्स्पेक्शन बंगल्याच्या बाहेर पडलो आणि जसं व्हरांड्याबाहेर पाऊल टाकलं तसं खाली, माणसांच्या पावलांनी मऊ झालेल्या मातीवर मला नरभक्षकाच्या पावलांचे ठसे दिसले.ठसे एकदम ताजे होते आणि त्यावरून हे दिसत होतं की बिबळ्यानेही माझ्या काही मिनिटंच अगोदर व्हरांड्याबाहेर पाऊल टाकलं होतं ! बंगल्यावरची भेट अयशस्वी ठरल्यानंतर तो पन्नास पावलां वरच्या यात्रामार्गाकडे गेला होता.बंगला व रस्त्यामधला पन्नास पावलांचा रस्ता खडकाळ असल्याने तिथे कोणतेही माग दिसत नव्हते पण फाटकाशी पोचल्यानंतर मला गुलाबराईच्या दिशेने जाणारे ताजे पगमार्कस दिसले.

आदल्या दिवशी संध्याकाळी शेळ्यामेंढ्यांचा खूप मोठा कळप त्या दिशेने गेला होता आणि त्यांच्या खुरांनी मऊ वस्त्रगाळ झालेल्या मातीवर बिबळ्याचे पगमार्कस नुकत्याच पडलेल्या हिमावर दिसावेत इतके स्पष्ट दिसत होते..


त्या क्षणापर्यंत मला या पगमार्कसची चांगलीच ओळख झाली होती व इतर शंभर बिंबळ्यांमधूनही मी त्याला वेगळं काढू शकलो असतो.


शिकार करणाऱ्या जनावरांच्या पायांच्या ठशांवरून (पगमार्कस्वरून) खूप काही शिकता येतं.उदाहरणार्थ त्याचं लिंग,वय,आकार वगैरे! सर्वप्रथम जेव्हा मी ह्या बिबळ्याचे पगमार्क्स पाह्यले तेव्हाच मला कळलं होतं की हा एक आकाराने बराच मोठा,प्रौढ वयाचा नर बिबळ्या आहे.आता या ठशांवरून समजत होतं की तो माझ्यापासून काही मिनिटंच पुढे आहे आणि सावकाश पण नेहमीच्या स्थिर गतीनं चालतोय.


इतक्या सकाळी ह्या रस्त्यावर अजिबात वर्दळ नव्हती.हा रस्ता पुढे छोट्या मोठ्या असंख्य घळी ओलांडून वाकडा तिकडा गेला होता.स्वतःची संपूर्ण निशाचर सवय हा बिबळ्या या वेळी कदाचित मोडेल या आशेने मी..


९.जुलै.२०२३ या लेखमालेतील पुढील भाग

उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..

२५/७/२३

निर्माता शेक्सपियर भाग २

या नाटकात टिमॉन हा एकच सिनिक नाही. अपेमॅन्टस नावाचा तत्त्वज्ञानीही सिनिकच आहे.मानवजातीचा मूर्खपणा पाहून तोही नाक मुरडतो;पण टिमॉनची दुःखी विषण्ण कटुता व अपेमॅन्टसचा उपहासात्मक चावटपणा यात फरक आहे.मानव मानवाशी माणुसकी विसरून वागतो,हे पाहून टिमॉनला जीवन अशक्य होते. पण तेच दृश्य पाहून अपेमॅन्टस उपहासाने हसतो.त्याला जणू सैतानी आनंद वाटतो.टिमॉन हे जग नाहीसे करून ज्यात प्रेमळ मित्र असतील,असे नवे जग निर्मू पाहतो. पण अपेमॅन्टस जगाला नावे ठेवतो,जग सुधारू इच्छित नाही.

अथेन्समधील एक सरदार त्याला "किती वाजले? किती समय आहे?"असे विचारतो.तेव्हा तो उत्तर देतो,

"प्रामाणिक असण्याचा हा समय आहे." पण आजूबाजूला जरासे प्रामाणिक जग दिसले तर मग जगाची टिंगल कशी करता येईल ? 'जग वाईट असावे. म्हणजे गंमत पाहता येईल.' अशी अपेमॅन्टसची वृत्ती आहे.मित्रांची कृतघ्नता पाहून टिमॉनला मरणान्तिक यातना होतात,प्राणांतिक वेदना वाटतात,अपेमॅन्टसला ती मोठ्याने हसण्याची संधी वाटते! एकाच नाटकात टिमॉन व अपेमॅन्टस यांची पात्रे रंगविणारा फारच सूक्ष्मदर्शी असला पाहिजे.त्याला स्वभावदर्शन फारच सूक्ष्म साधले आहे.बारीकसारीक छटा दाखविणे फार कठीण असते.

पण शेक्सपिअर स्वभावदर्शनात अद्वितीय आहे.

टिमॉनशिवाय अपेमॅन्टसला पूर्णता नाही,अपेमॅन्टसशिवाय टिमॉनला पूर्णता नाही.दोघांच्याद्वारे मिळून जगातील अन्यायाला शेक्सपिअर उत्तर देत आहे.जगाचा उपहास करणारा शेक्सपिअर या दोघांच्या डोळ्यांनी बघून उत्तर देत आहे. 'हॅम्लेट'मध्ये व्यवहारी माणसाचे,संसारी शेक्सपिअरचे,रामरगाड्यात पडलेल्या शेक्सपिअरचे जगाला उत्तर आहे.त्याच प्रश्नाला जगातील अन्यायाला त्याने उत्तर दिले आहे. जगातील नीचता पाहून टिमॉन आत्महत्या करतो.अपेमॅन्टस हसतो,पण हॅम्लेट काय करतो? तो खुनाचा सूड घेऊ पाहतो.हॅम्लेट टिमॉनपेक्षा कमी भावनाप्रधान आहे,पण अपेमॅन्टसपेक्षा अधिक उदार वृत्तीचा आहे. तो जगातील अन्यायाला शासन करू पाहतो.जुन्या करारातील 'डोळ्यास डोळा', 'दातास दात', 'प्राणास प्राण', 'जशास तसे' हा न्याय त्याला पसंत पडतो.

जगातील अन्याय पाहून हॅम्लेटच्या मनावर जशी प्रतिक्रिया होते.तशीच सर्वसामान्य माणसाच्या मनावर होते.


टिमॉनप्रमाणे तो जगापासून पळून जात नाही किंवा अपेमॅन्टसप्रमाणे जगाचा उपहासही करीत नाही.तो विचार करीत बसतो.या सर्व जगाचा अर्थ काय याची मीमांसा करीत बसतो.पण शेवटी त्याच्या भावना जेव्हा पराकोटीला पोहोचतात,तेव्हा तो प्रहार करतो.मात्र तो प्रहार दुष्ट कृत्यांवर नसून दुष्ट कृत्य करणाऱ्यांवर असतो आणि असे करीत असता तो आपल्या शत्रूचा व स्वतःचाही नाश करून घेतो.


'सूड घेणे हेच जणू जीवनाचे उदात्त ध्येय'असे हॅम्लेटला वाटते.या सूड घेण्याच्या पवित्र कर्माच्या आड त्याच्या मते ऑफेलियाचेही प्रेम येता कामा नये.हॅम्लेटचे जग एकंदरीत जंगलीच आहे.जरी तिथे तत्त्वज्ञानाचे विचार व सुंदर सुंदर वाक्ये ऐकावयाला आली तरी सूडभावना हेच परमोच्च नीतितत्त्व म्हणून येथे पूजिले जात आहे असे दिसते.हॅम्लेट नाटकातले सारं काव्य दूर केल्यास ते अत्यंत विद्रूप वाटेल.त्यात थोडीही उदात्तता आढळणार नाही.हॅम्लेट हा एक तरुण व सुंदर राजपुत्र असतो.त्याची बुद्धी गमावून बसतो.पित्याचे भूत आपणास खुनाचा सूड घेण्यास सांगत आहे.असे त्याला वाटते व त्याचे डोके फिरते.तो मातेची निंदा करतो व ज्या मुलीशी तो लग्न करणार असतो,तिला दूर लोटून देतो.ती निराश होऊन आत्महत्या करते.तो तिच्या भावाला व बापाला ठार मारतो.नंतर आईला मारून तो स्वतः ही मरतो आणि हे सर्व कशासाठी ? तर भुताला दिलेल्या सूड घेण्याच्या वचनाच्या पूर्ततेसाठी! सूडाच्या एका गोष्टीसाठी ही सारी दुःखपरंपरा ओढवून आणणे वेडेपणाचे वाटते.एका सूडासाठी केवढी ही जबर किंमत! या नाटकाचे 'दारू प्यायलेल्या रानवटाने लिहिलेले नाटक' असे वर्णन व्हॉल्टेअरने केले आहे ते बरोबर वाटू लागते.सारे मानवी जीवन मानवी जीवनाचे हे सारे नाटकसुद्धा एका दारुड्यानेच लिहिले आहे असेच जणू आपणासही वाटू लागते.

पण शेक्सपिअर जीवनाकडे फार संकुचित दृष्टीने पाहतो असे म्हणणाऱ्या संकुचित दृष्टीच्या टीकाकाराचे हे मत आहे.शेक्सपिअरच्या प्रज्ञेचा व प्रतिभेचा केवळ एक किरण हॅम्लेटमध्ये दिसतो.मानवी जीवनातल्या अनंत गोष्टींतील सूड ही केवळ एक गोष्ट आहे.त्याप्रमाणेच हॅम्लेटमध्ये शेक्सपिअरच्या अनंत विचारसृष्टीतील एकच गोष्ट दिसते.ते त्याचे वा जगाचे संपूर्ण दर्शन नव्हे. शेक्सपिअर हा जादूगार आहे.तो निसर्गाचे पूर्णपणे अनुकरण करू शकतो.त्याने हॅम्लेटला स्वतःच्या संपूर्ण तत्त्वज्ञानाची मूर्ती बनविलेले नाही.हॅम्लेटद्वारा स्वत:च्या बुद्धीचा फक्त एक भाग त्याने दाखवला.अनंत पात्रांद्वारा त्याने आपले तत्त्वज्ञान मांडले आहे.सृष्टी आपले स्वरूप विविधतेने प्रकट करते.कोठे एक रंग, कोठे दुसरा,कोठे हा गंध,कोठे तो.तसेच या कविकुलगुरूचे आहे.त्याच्या नाटकी पोतडीत हॅम्लेटमधल्या विचारांपेक्षा अधिक उदात्त विचार भरलेले आहेत.निसर्ग कन्फ्यूशियसला प्रकट करतो.तद्वतच हॅम्लेटलाही निर्मितो.पण जगाचे पृथक्करण करताकरता,प्रयोग करताकरता, निसर्गाला व शेक्सपिअरला सुडापेक्षाअधिक उदात्त व सुंदर असे काहीतरी दाखवायचे असते. हे जे काहीतरी अधिक सुंदर व अधिक उदात्त आहे,ते आपणाला 'टेंपेस्ट'मध्ये पाहण्यास मिळेल.


'अथेन्सचा नागरिक टिमॉन' या नाटकात शेक्सपिअर जगातील अन्यायाला उपहासाने उत्तर देतो.हॅम्लेटमध्ये जगातील अन्यायाची परतफेड सुडाने करण्यात आली आहे.पण टेंपेस्टमध्ये अन्यायाची परतफेड क्षमेने करण्यात आली आहे.टिमॉन व हॅम्लेट यांच्याप्रमाणेच प्रॉस्पेरोही दुःखातून व वेदनांतून गेलेला आहे. पण दुःखाने तो संतापत नाही तर उलट अधिकच प्रेमळ होतो.त्याच्या हृदयात अधिकच सहानुभूती उत्पन्न होते.ज्यांनी त्याच्यावर आपत्ती आणलेली असते,त्यांच्याबद्दलही त्याला प्रेम व सहानुभूती वाटते.तो जगाला शिव्याशाप देत नाही.जगाचा उपहासही करीत नाही.तर आपल्या मुलांच्या खोड्या पाहून बाप जसा लाडिकपणे हसतो, तसा प्रॉस्पेरो हसतो.

टेंपेस्टमध्ये उपहास व तिरस्कार यांचा त्याग करून जरा अधिक उदात्त वातावरणात शेक्सपिअर एखाद्या हृदयशून्य देवाप्रमाणेच मानवाची क्षुद्रता आणि संकुचितता पाहून मिस्कीलपणे हसतो.तो एखाद्या राजाला सिंहासनावरून खाली खेचतों व 'हा तुझा डामडोल,ही तुझी ऐट सर्व नष्ट होऊन किडे तुला खाऊन टाकणार आहेत.त्या किड्यांना मासे खातील व ते मासे एखाद्या भिकाऱ्याच्या पोटात जातील.' असे त्याला सांगतो.पण टेंपेस्टमध्ये जरा रागवायचे झाले,तरी तो रागही सौम्य व सुंदर आहे.या नाटकात कडवट व विषमय उपहासाचे उत्कट करुणेत पर्यवसान झाले आहे.


आता आपण टेंपेस्टमधील कथा जरा पाहू या. प्रॉस्पेरो हा मिलनचा ड्यूक.तो हद्दपार केला जातो.तो आपल्या मुलीसह एका जादूच्या बेटावर राहतो.तिचे नाव मिरान्दा.

त्याच्या भावानेच त्याला मिलनमधून घालवून दिलेले असते.भावाचे नाव न्टोनिओ.नेपल्सचा राजा अलोन्सो याच्या मदतीने तो भावाला हाकलून देतो.प्रॉस्पेरो व त्याची तीन वर्षांची मुलगी यांना गलबतात बसवून तो ते समुद्रात सोडून देतो.हे गलबत सुदैवाने या मंतरलेल्या बेटाला येऊन लागते.तिथे प्रॉस्पेरो मुलीला शिकविण्यात व मंत्रतंत्राचा अभ्यास करण्यात वेळ घालवतो. एरियल नामक एक विद्याधर असतो व कॅलिबन नामक एक राक्षस असतो. त्या दोघांना वश करून तो त्यांना आपली सेवा करावयास लावतो.एके दिवशी एक गलबत त्या बेटाच्या बाजूने जात असते.गलबतात एका लग्न समारंभाची मंडळी असतात,ट्यूनिसहून ही मंडळी इटलीस परत येत असतात.या मंडळीत राजा अलोन्सो व ॲन्टोनिओ हे असतात.यांनी प्रॉस्पेरोला हद्दपार केलेले असते.राजाचा भाऊ सेबॅस्टियन व मुलगा फर्डिनंड हेही त्यांच्याबरोबर असतात.


प्रॉस्पेरो आपल्या मंत्रसामर्थ्यानि समुद्रावर एक वादळ उठवतो.ते गलबत वादळातून जात असता या मंतरलेल्या बेटाला येऊन लागते.प्रॉस्पेरो एरियलला सर्व उतारूंना वाचवण्यास सांगतो. पण वाचवल्यावर त्यांना बेटावर चारी दिशांना अलग अलग करण्याची सूचना देतो.फर्डिनंड बापापासून वियुक्त होतो व बाप मेला असे वाटून शून्य मनाने भटकत भटकत प्रॉस्पेरोच्या गुहेकडे येतो.वस्तुतः तो तिकडे जादूमुळे खेचला गेलेला असतो.मिरान्दाची व त्याची तिथे दृष्टिभेट होऊन दोघांचे परस्परांवर प्रेम जडते.

एक शब्दही उच्चारला जाण्यापूर्वी हृदये दिली घेतली जातात.


पण बेटाच्या दुसऱ्या एका भागावर सेबॅस्टियनने व ॲन्टोनिओ राजाचा खून करण्याचे कारस्थान करीत असतात.तर कॅलिबन व गलबतातून आलेले काही दारूडे खलाशी प्रॉस्पेरोचा खून करू पाहतात.हे बेट मंतरलेले असल्याचे त्यांना माहीत नसते.हे पाहुणे ज्या जगातून आलेले असतात त्या जगातील अनीतिविषयक प्रचार व मूर्खपणा येथेही करू लागतात.तेव्हा सर्वज्ञ व सर्वशक्तिमान प्रॉस्पेरो त्यांचे सारे रानवट बेत हाणून पाडतो.राजाला व त्याच्याबरोबरच्या लोकांना त्यांनी केलेल्या अन्यायाबद्दल शासन करावे असे प्रॉस्पेरोला प्रथम वाटते.पण एरियल दैवी विचारांचा असल्यामुळे तो प्रॉस्पेरोला अधिक थोर दृष्टी देतो व सांगतो, "राजा, त्याचा भाऊ आणि तुझा भाऊ सारेच दुःखी व त्रस्त आहेत.

त्यांच्या दुःखाचा पेला काठोकाठ भरलेला आहे.त्यांना काय करावे हे समजेनासे झाले आहे.तुझ्या जादूचा त्यांच्यावर फार परिणाम झाला आहे.तू त्यांना पाहशील तर तुझेही हृदय विरघळेल.तुझ्या भावना अधिक कोमल होतील." यावर प्रॉस्पेरो विचारतो,"विद्याधरा,तुला खरेच का असे वाटते?" एरियल उत्तर देतो, "मी मनुष्य असतो,तर माझे हृदय विरघळले असते.माझ्या भावना कोमल झाल्या असत्या." तेव्हा प्रॉस्पेरो म्हणतो, "तू अतिमानूष आहेस.

जणू वायुरूप आहेस.तरीही जर तुला त्यांच्याविषयी इतकी सहानुभूती वाटते,तर मग मी मानव असल्यामुळे, त्यांच्याच जातीचा असल्यामुळे,मला का बरे वाटणार नाही? त्यांच्याप्रमाणेच मीही सुख-दुःखे भोगतो,मलाही वासनाविकार आहेत.मग मला माझ्या मानवबंधूविषयी तुला वाटतात,त्यापेक्षा अधिक प्रेम व दया नको का वाटायला ? त्यांनी केलेले दुष्ट अन्याय आठवून माझे हृदय जरी प्रक्षुब्ध होते.तरी माझ्यातल्या दैवी भागाने,उदात्त भावनेने मी आपला क्रोध जिंकीन व दैवी भागाशीच एकरूप होईन.एरियल,जा.त्यांना मुक्त कर."


टिमॉनने सिनेटरांजवळ काढलेले उद्गार व प्रॉस्पेरोचे हे एरियलजवळचे उद्गार त्यांची तुलना करा.म्हणजे मानवी अन्यायाकडे मानवी दृष्टीने पाहणे व अमानुष दृष्टीने पाहणे यातील फरक लक्षात येईल.


प्रॉस्पेरो अती मानुष आहे.शेक्सपिअरने किंवा सृष्टीने निर्मिलेला अत्यंत निर्दोष व सर्वांगपरिपूर्ण असा मानवी स्वभावाचा नमुना म्हणजे प्रॉस्पेरो. हा शेक्सपिअरच्या सृष्टीतील कन्फ्यूशियस होय. हृदयात अपरंपार करुणा व सहानुभूती असल्यामुळे नव्हे;तर त्याची बुद्धी त्याला 'क्षमा करणे चांगले' असे सांगते.म्हणून तो क्षमा करतो. ज्या जगात राहणे प्रॉस्पेरोस प्राप्त होते,त्या जगात भांडणे व द्वेष,मत्सर,महत्त्वाकांक्षा व वासनाविकार,फसवणुकी व अन्याय,वंचना व स्पर्धा,पश्चात्ताप व सूड यांचा सर्वत्र सुळसुळाट आहे! पण प्रॉस्पेरोसचे मन या जगातून अधिक उंच पातळीवर जाऊन,या क्षुद्र धुळीपलीकडे जाऊन विचार करू लागते.तो जीवनाची कठोरपणे निंदा करीत नाही.तो स्मित करतो व जरासा दुःखी असा साक्षी होऊनच जणू राहतो. त्या मंतरलेल्या बेटावर मिरांदाला आपल्या पित्याहून वेगळी आणखी माणसे दिसतात,तेव्हा ती आश्चर्यचकित होते.पिता वगळल्यास अन्य मानवप्राणी तिने आतापर्यंत पाहिला नव्हता. नवीन माणसे दिसताच ती एकदम उगारते, "काय आनंद! अहो, केवढे आश्चर्य! किती सुंदर ही मानवजात! किती सुंदर व उमदे हे जग. ज्यात अशी सुंदर माणसे राहतात!" पण प्रॉस्पेरो मुलीचा उत्साह व आनंद पाहून उत्तर देतो, "तुला हे जग नवीन दिसत असल्यामुळे असे वाटत आहे!" अनुभवाने त्याला माहीत झालेले असते की,या जगातील प्रत्येक प्राणी जन्मजात सैतान आहे. या सैतानांना कितीही उपदेश केला तरी तो 'पालथ्या घड्यावर पाणी' या न्यायाने फुकटच जातो. त्याचा कोणाही माणसावर विश्वास नसतो,तरी तो सर्वांगसुंदर प्रेम करतो. शेक्सपिअरने निर्मिलेल्या पात्रांपैकी प्रॉस्पेरो हे सर्वोत्कृष्ट आहे.एवढेच नव्हे,तर खुद्द शेक्सपिअरच जणू परमोच्च स्थितीतील प्रॉस्पोरोच्या रूपाने अवतरला आहे असे वाटते. प्रॉस्पेरोप्रमाणेच खुद्द शेक्सपिअरही एक जादूगारच आहे.

त्याने आपल्या जादूने या जगात पऱ्या,यक्ष,गंधर्व,किन्नर इत्यादी नाना प्रकार निर्मिले आहेत.भुतेखेते,माणसे वगैरे सर्व काही त्याने निर्मिले आहे.त्याने आपल्या जादूने मध्यान्हीच्या सूर्याला मंद केले आहे.तुफानी वाऱ्यांना हाक मारली आहे.खालचा निळा समुद्र व वरचे निळे आकाश यांच्या दरम्यान महायुद्ध पेटवून ठेवले आहे.पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वत्र रणांगण पेटवून ठेवले आहे.

शेक्सपिअरचा हुकूम होताच आत्मे जागृत होऊन थडग्यातून बाहेर पडतात.थडग्यांची दारे उघडतात! महान जादूगार! 


सर्जनाची परमोच्च स्थिती अनुभवून प्रॉस्पेरोप्रमाणेच शेक्सपिअरही मग आपली जादू गुंडाळून ठेवतो.

टेंपेस्टमध्ये परमोच्च कला प्रकटवून तो आपली जादूची कांडी मोडून टाकतो व आपली जादूची पोतडी गुंडाळून ठेवून नाट्यसृष्टीची रजा घेतो.मथ्थड डोक्याच्या मानवांना उपदेश पाजून,त्यांची टिंगल करून, त्यांचा उपहास करून दमल्यावर आता तो केवळ कौतुकापुरता साक्षी म्हणून दुरून गंमत पाहत राहतो.शेक्सपिअर अज्ञातच मेला! त्याची अगाध बुद्धिमत्ता,त्याची अद्वितीय प्रतिभा जगाला कळल्या नाहीत,पण जगाच्या स्तुतीची त्याला तरी कोठे पर्वा होती ?


२१.जुलै.२०२३ या लेखातील शेवटचा भाग..

२३/७/२३

हृदयस्पर्शी जगायला सांगणारी गोष्ट

बाहेर थोडा काळोख पडायला सुरुवात झाली होती कुंपणाच्या लोखंडी दरवाजा जवळून मला कोणीतरी बोलवत होते.कोण असेल बरे या उत्सुकतेने मी बाहेर गेलो.एक वयस्कर माणूस दरवाजाबाहेर उभा होता चुरगळलेले कपडे आणि हातातील पिशवी बघून तो खूप दूरवरून प्रवास करून आल्यासारखे वाटत होते. 


हातातील कागद बघून त्याने विचारले, "बाबू हा पत्ता आनंद आठवा रस्ता आहे का ?" होय मीच आनंद मी उत्तरलो. 


त्याचे ओठ थोडेसे थरथरले कोरड्या ओठावरून त्यांनी जीभ फिरवली व स्वतः जवळील पत्र माझ्याकडे देऊन ते म्हणाले,"बाबू मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे आपल्या गावाकडून आलो तुझ्या वडिलांनी मला हे पत्र दिले आणि तुझी मदत मागायला सांगितले आहे".


"माझ्या वडिलांनी" मी  पुटपुटलो आणि उत्सुकतेने पत्र वाचू लागलो.


प्रिय आनंद,अनेक आशीर्वाद हे पत्र घेऊन येणारी व्यक्ती माझा मित्र आहे त्याचे नाव रमय्या खूप कष्टाळू आहे.

काही दिवसापूर्वी त्याचा एकुलता एक मुलगा एका अपघातात मृत्यू पावला.नुकसानभरपाईसाठी तो सर्वत्र धावाधाव करतोय.आताच्या परिस्थितीत खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी त्याला त्याची अत्यंत गरज आहे.

मी सोबत पोलिस पंचनामा आणि ईतर सर्व कागदपत्रे पाठवीत आहे.भरपाईची अंतिम रक्कम तुम्हाला कंपनीच्या मुख्य कार्यालयात मिळेल असे त्याला सांगितले गेले आहे.त्याची हैदराबादला येण्याची पहिलीच वेळ आहे आणि तो तेथे अनोळखी आहे.मला खात्री आहे की तू त्याला मदत करू शकशील तुझी काळजी घे,आणि शक्य तेवढ्या लवकर आम्हाला भेटायला ये ..


तुझे प्रिय बाबा. .


मी पत्र वाचत असताना रामय्या मला न्याहाळत होता क्षणभर विचार केला,आणि त्यांना आत बोलावले त्यांना पाणी देऊन त्यांनी काही खाल्लेले आहे का याची चौकशी केली."नाही, प्रवास थोडासा लांबला त्यांमुळे मी फक्त बरोबर आणलेली दोन केळी खाल्ली",रामय्या म्हणाले.


आत जाऊन मी चार डोसे तयार केले,आणि लोणच्या-

बरोबर त्यांना देऊन म्हटले,"तुम्ही खाऊन घ्या". मी बाहेर जाऊन काही फोन केले.मी परत आलो तोपर्यंत त्यांनी डोसे संपवले होते व हातात काही कागद घेऊन ते बसले होते. त्यांच्या हातात त्यांच्या मृत मुलाचा फोटो होता बहुतेक २२ वर्षांचा असावा माझे डोळे पाणावले. 


"हा माझा एकुलता एक मुलगा याच्या आधी जन्मलेले सर्वजण काही ना काही कारणाने देवाघरी गेले,त्याचे नाव महेश.तो चांगला शिकला आणि त्याला चांगली नोकरी मिळाली. मी सर्व अडचणींवर मात करीन आणि तुमची चांगली काळजी घेईन असे तो म्हणाला होता. त्या अमंगल दिवशी त्याला रस्ता ओलांडताना अपघात झाला आणि त्यातच जागच्या जागीच त्याचा मृत्यू झाला.

मुलाच्या मृत्यूची भरपाई म्हणून पैसे स्वीकारायला सुरुवातीला आम्ही नाखूष होतो,परंतु दिवसेंदिवस आम्ही दोघीही थकत चाललो आहोत,तुझे वडील मला म्हणाले तू हैदराबादला जा आणि त्यांनी मला हे बरोबर पत्र दिले,

ठीक आहे आता फार उशीर झालाय तुम्ही आराम करा.

असे सांगून मी देखील झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तयार झालो. कॉफी पिऊन बाहेर पडलो.वाटेतच थोडसं खाल्लं आणी ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचलो.


"आनंद आता मी सर्व काम करीन तू तुझ्या ऑफिसला जा,रामय्या म्हणाले. "काही हरकत नाही मी आज रजा घेतली आहे.",मी उत्तरलो. त्यांच्याबरोबर राहून मी त्यांना भरपाईची सर्व रक्कम मिळवून दिली."मी तुझा खूप खूप आभारी आहे माझी पत्नी घरी एकटीच आहे, त्यामुळे मी लगेच परत जातोय."रामय्या म्हणाले. "चला मी तुम्हाला बस स्टैंड वर सोडतो.",मी त्यांना बस स्टँडवर आणले बसचे तिकीट काढून दिले प्रवासासाठी बरोबर काही फळे घेऊन दिली.त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी कृतज्ञता दाटून आली होती. 


ते म्हणाले, "आनंद बाबू तुम्ही माझ्यासाठी रजा घेऊन मला खूप मदत केली.घरी गेल्यावर मी तुमच्या वडिलांना भेटून हे सर्व सांगीन व त्यांचेही आभार मानीन." 


मी त्यांचे हात हातात घेतले आणि म्हणालो, "मी तुमच्या मित्राचा मुलगा आनंद नाही. माझे नाव अरविंद आहे.काल तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला होतात.त्या आनंदचे घर अजून दोन किलोमीटर लांब होते.तुम्ही आधीच खुप थकला होतात.तुम्हाला सत्य सांगायचे माझ्या जीवावर आले.मी पत्रावरील आनंद च्या नंबरवर फोन केला चौकशी केली.आनंदच्या पत्नीने सांगितले. की तो काही कामानिमित्त शहराबाहेर गेला आहे. मी तुमच्या मित्राला फोन करून हे सर्व सांगितले खूप दुःखी झाले.जेव्हा मी त्यांना सर्व मदतीचे आश्वासन दिले तेव्हा त्यांना बरे वाटले.

तुमचे नुकसान हे कधीही न भरून येणारे आहे.परंतु मला वाटले मी तुम्हाला मदत करावी,आणि मी ती केली.यामुळे मला फार समाधान लाभले." 


बस सुटताना रामय्या यांनी माझे हात आपल्या हातात धरले,त्यांचे डोळे कृतज्ञतेने पाणावलेले होते."परमेश्वर तुझे भले करो" त्यांचे निघतानाचे शब्द होते.


मी वर आकाशाकडे पाहिले.मला वाटले माझे वडील तिथेच कुठे तरी असले पाहिजेत. "बाबा तुम्ही रामय्याच्या रूपात माझा उत्कर्ष पाहायला आला होतात,का? मला पत्र पाठवून तुम्ही माझी परीक्षा घेत होतात का मी मदत करतोय की नाही हे पाहत होतात ? तुमच्या सारख्या थोर पुरुषाचा मुलगा म्हणून जन्म घेऊन मी माझे कर्तव्य बजावले आहे तुम्हाला आनंद झालाय ना ?" 

आनंदाश्रूंनी माझे डोळे भरून गेले .


दुसऱ्यांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवा.वाट आपोआप सापडेल.


अनामिक


परवाच कामावर निघालो होतो.पावसाने फार वाट बघायला लालली.व एकदाचा वाजत गाजत आला.

अखंडपणे पाऊस पडत होता.त्या पावसामध्ये एक व्यक्ती एका गाडीतून उतरली.कामावर जाण्यास उशीर झाला होता.मेनन रिंग कंपनीच्या पुढे त्यांना जावे लागणार होते,वेळ झालाच होता.मला काय वाटले कोणास ठाऊक मी त्यांना पाहून कोणत्याही पूर्वपरवानगी शिवाय गाडी थांबवली,बसा म्हणालो.काही क्षण गेले व ते म्हणाले,

धन्यवाद देवासारखे धावून आलात.मी म्हणालो आपण अगोदर माणूस बनूया देव ही फार पुढची गोष्ट आहे.


जो माणूस 'अधिक' चांगले होण्यासाठीचे प्रयत्न थांबवितो तो माणूस 'चांगले' होणे देखील थांबवितो.ऑलिव्हर क्रॉमवेल - ब्रिटिश राजकारणी व सैनिक (1599-1558)


ते म्हणाले माझी गाडी बंद पडली आहे.दुरुस्ती

साठी मिस्त्री जवळ लावून आलो आहे.मी 'दररोज' कुणीही हात केला तरी त्या मानसाला गाडीवरून घेवून जातो.मी त्यांचे आभार मानले. व हे चांगुलपणाचे काम नेहमीच करा,असे सांगितले.तुम्ही जे काम करता त्या कामाची प्रतिक्रिया म्हणजेच मी तुम्हाला हात न करताही गाडीवरुन घेवून आले.कारण मी 'दररोज' कुणालाही गाडीवर घेत नाही. कारण घर जवळच आहे.या कारणाने पण तुम्हाला पाहून तुम्हाला पाहून गाडीवर घ्यावे.हे मला मनापासून वाटले.हाच तुमचा चांगुलपणा सो .. लगे..रहो.!


कंपनीच्या गेटबाहेर गाडी थांबवून त्यांना उतरले.गाडी पार्किंगमध्ये लावली.मनापासून या गोष्टींचे चिंतन करतच होतो.तेवढ्यात लिओ टॉल्स्टॉय न चुकता म्हणालेत.


जर तुम्हाला वेदना होत असतील तर तुम्ही जिवंत आहात.जर तुम्हाला इतर लोकांच्या वेदना जाणवत असतील तर तुम्ही माणूस आहात.


विजय कृष्णात गायकवाड