* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२/१२/२३

मध्ययुगातलं बायॉलॉजी.. Biology in the Middle Ages..

मध्ययुगात ख्रिश्चन धर्मानं बराच जोर धरला होता.जिथे जिथे ख्रिश्चन गेले तिथे तिथे त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार केला.ग्रीसमध्ये आयोनियनांनी विज्ञानाचा पाया घातला होता.त्याला ख्रिश्चनांचा विरोध नव्हता,पण विश्वाची निर्मिती किंवा त्यातल्या सजीवांची निर्मिती यांची मुळं आपण शोधू नयेत असं त्यांचं मत होतं.त्यांच्या मते हे म्हणजे देवाच्या कामात माणसानं ढवळाढवळ करण्यासारखंच होतं.आणि नेमका हाच म्हणजे निसर्गाचे नियम शोधण्याचा घाट ग्रीकांनी घातला होता. 

आणि आता सगळीकडेच ख्रिश्चनधर्मीयांचं वर्चस्व होतं.

त्यामुळे विशुद्ध जीवशास्त्राचा (बायॉलॉजी) अभ्यास करणं दुरापास्तच झालं होतं.त्यामुळे हे विश्व आणि माणूस कसे निर्माण झाले याचे नियम प्रयोग करून शोधण्यापेक्षा बायबलमध्ये शोधावेत असं त्यांना वाटत होतं! निसर्गाचे नियम देव आणि त्याचे देवदूत असलेले संत यांनाच कळतात आणि त्यांनाच त्यात बदल करण्याचे अधिकार आहेत.आपण माणसांनी ते शोधायचा विचार करू नये अशी ख्रिश्चनांची समजूत होती.या सगळ्या वातावरणामुळे एकूणच विज्ञानाची,कलांची आणि सगळ्या समाजाचीच प्रगती खुंटली होती.यामुळेच या काळाला 'डार्क एजेस' म्हणतात.पण याही काळात काही विद्वानांनी आहे ते ज्ञान जतन करायचा प्रयत्न केला,हे विशेष! अर्थात,या काळात सगळीकडेच अंधकार होता असं नाही. अरब प्रांतात अनेक प्रकारचे अभ्यास या काळात चालू होते.अरबांनी मुहम्मद पैगंबरांच्या नेतृत्वाखाली इस्लाम धर्म स्वीकारला होता. आणि ते अरब पेनिन्सुलाच्या बाहेर आले आणि नैऋत्य आशिया आणि उत्तर आफ्रिका या भागांत वस्ती करायला लागले. इ.स. ७३० मध्ये, मुहम्मदांच्या काळाच्या एक शतकानंतर मुस्लिम अशा ठिकाणी पोहोचले,की त्यांच्या पूर्वेला कॉन्स्टॅन्टिनोपल आणि पश्चिमेला फ्रान्स होता. त्यामुळे त्यांना ख्रिश्चनांपासून कायमच धोका होता.

पण उलट त्यांनी गेलन आणि ॲरिस्टॉटल यांनी केलेल्या लिखाणाचं अरेबिक भाषेत भाषांतर करून पाश्चिमात्यांना पाठबळच दिलं.ते फक्त भाषांतर करूनच थांबले नाहीत तर त्यांनी त्या काळी उपलब्ध असलेल्या जवळपास सगळ्या वैज्ञानिक आणि वैद्यकीय ज्ञानाचा अभ्यास केला आणि त्यावर टीकात्मक लेखनही केलं! यापैकी सगळ्यात महत्त्वाचा बायॉलॉजिस्ट दहाव्या-अकराव्या शतकात होऊन गेलेला अबु अली अल हुसेन इब्न सिना (९८०-१०३७) हा होता.पाश्चिमात्यांनी त्याचंही नाव लॅटिनाइझ केलं.आज आपण सगळेच त्याला 'अविसेना' म्हणून ओळखतो! अविसेनाचा जन्म आताच्या पर्शियामध्ये झाला.अविसेनानं एकूण तब्बल ४५० पुस्तकं लिहिली.आता त्यापैकी फक्त २४० च उपलब्ध आहेत.

त्यापैकी १५० तत्त्वज्ञानावरची आहेत आणि ४० हिप्पोक्रॅट्स,ॲरिस्टॉटल आणि सेल्सस यांच्या वैद्यकीय थिअरीजवर लिहिलेली पुस्तकं आहेत.बाकीची पुस्तकं गणित, खगोलशास्त्र,झूऑलॉजी,बॉटनी,मेटाफिजिक्स, भौतिकशास्त्र,संगीत आणि काव्य या विषयांवर लिहिलेली आहेत.त्यानं वयाच्या फक्त २१व्या वर्षी लिहायला सुरुवात केली होती!


अविसेना हा लहानपणापासूनच अत्यंत अभ्यासप्रिय आणि मेहनती होता.वयाच्या दहाव्या वर्षीच त्याचं संपूर्ण कुराण पाठ झालं होतं! त्यानंतर तो ॲरिस्टॉटलच्या मेटॅफिजिक्स म्हणजे अध्यात्माकडे वळला.पण या वयात अध्यात्म ते काय कळणार? त्यालाही ॲरिस्टॉटलच्या मेटाफिजिक्समधल्या आध्यात्मिक संकल्पना कळायच्या नाहीत.मग तो रात्रभर त्या पुनःपुन्हा वाचायचा.एक वेळ अशी आली होती,की त्याचं संपूर्ण पुस्तक पाठ झालं, पण त्यातल्या संकल्पनांचे अर्थच त्याला कळत नव्हते.मग शेवटी हताश होऊन तो मशिदीत जाऊन बसला आणि मला का कळत नाही, मला वाचलेलं समजू दे,माझ्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश पडू दे अशी प्रार्थना तो ओंजळ पसरून अल्लाकडे करत राहिला. रात्रभर अशी प्रार्थना करता करता सकाळ उजाडल्यावर तो घरी जायला निघाला.तेव्हा त्याला रस्त्यावरच्या एका पुस्तकांच्या दुकानात ॲरिस्टॉटलचं मेटाफिजिक्स सोप्या भाषेत सांगणारं पुस्तक चक्क रद्दीच्या भावात मिळालं ! आपल्यासाठी मौल्यवान असलेलं असं पुस्तक अगदीच फुटकळ किमतीला विकत मिळाल्यानं त्याला इतका आनंद झाला,की त्यानं आपल्या खिशात असलेल्या बाकीच्या सगळ्या पैशाचं अन्न खरेदी करून गोरगरिबांना दान करून आपला आनंद साजरा केला! या वेळी अविसेनाचं वय फक्त पंधरा वर्ष होतं! या वयातली अविसेनाची ज्ञानाची लालसा आणि सामाजिक जाणीव पाहून त्याचं कौतुक वाटतं.ॲरिस्टॉटलचं मेटाफिजिक्स समजून घेतल्यानंतर त्यानं आपला मोर्चा वैद्यकाकडे वळवला.गंमत म्हणजे वैद्यकशास्त्र त्याला चक्क मेटाफिजिक्स आणि गणितापेक्षाही सोपं वाटलं.त्यामुळे त्यानं ते लगेचच आत्मसात केलं,आणि तो रोग्यांवर उपचारही करायला लागला.अनेकदा गोरगरिबांवर उपचार करताना त्याला त्यांची दया यायची.त्यामुळे तो त्यांच्याकडून कसलीही फी घ्यायचा नाही.उपचार करताना अविसेनानं मानवी शरीरशास्त्राचा अभ्यासही केला.आणि स्वतःचं संशोधनही केलं होतं,त्यातूनच त्यानं प्रचंड मोठं ग्रंथभांडारच निर्माण केलं.त्याचं 'बुक ऑफ हिलिंग' आणि 'कॅनन ऑफ मेडिसीन' हे दोन ग्रंथ जवळपास १७व्या शतकापर्यंत अरेबिक वैद्यकशास्त्रात संदर्भग्रंथ म्हणून वापरले जात होते.


वयाच्या ५७ व्या वर्षीं अविसेनाच्या पोटात कॉलिक्स झाले. त्यावर त्यानं स्वतःच औषधी काढ्याचे डोस एनिमा म्हणून घ्यायचे ठरवले. हे औषध स्वतः अविसेनानंच तयार केलं होतं. पण या औषधामध्ये एनिमा देणाऱ्या मदतनिसानं चुकून किंवा हेतुपुरस्सरविष मिसळलं.आणि त्यातच अविसेनाचा रमादानाच्या पवित्र महिन्यात मृत्यू झाला. अविसेनाच्या मागे त्यानं लिहून ठेवलेल्या वैद्यकाचं आणि इतर ज्ञानाचं प्रचंड भांडार मात्र डार्क एजेसमधला अंधार बाजूला सारायला पुढच्या पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखं मार्ग दाखवत उभं राहिलं.याचाच प्रभाव अरबांच्या पुढच्या पिढीतल्या एका वैज्ञानिकावर होणार होता.तो म्हणजे इब्न अल नफीस हा होता.माणसाच्या शरीरात मुळात रक्त तयार कसं होतं आणि मग ते कसं वापरलं जातं यासंबंधीचा अभ्यास वैद्यकशास्त्रात अनेकांनी केला.यातूनच रक्त माणसाच्या शरीरातल्या अनेक कामांसाठी वापरलं गेल्यानंतर अशुद्ध होतं हेही संशोधकांच्या लक्षात आलं.याबद्दल इब्न अल्-नफीस (१२१३-१२८८) यानं आपल्या हृदयाचं काम कसं चालतं या प्रक्रियेवर अगदी सुरुवातीला अभ्यास केलेला होता. इब्न-अल-नफीसचं पूर्ण नाव वाचायचं असेल तर जरा श्वास रोखूनच घरावा लागतो : 


अला अल-दिन अबू अल हसन अली इब्न अबि-हज्म अल-कार्शी अल- दिमाश्की ! 


नशिबानं याऐवजी त्याला इब्न अल्-नफीस या नावानं संबोधलं तरी पुरतं! सीरियातल्या दमास्कसमध्ये जन्मलेला आणि इजिप्तच्या कैरोमध्ये नंतर काम केलेला इब्न-अल्-नफीस हा काय काय असावा? फिजिशियन, शरीररचनातज्ज्ञ (म्हणजे ॲनॅटॉमिस्ट), शरीरक्रियातज्ज्ञ (म्हणजे फिजियॉलॉजिस्ट), शल्यविशारद (म्हणजे सर्जन),डोळ्यांच्या विकारांचा तज्ज्ञ,संपूर्ण कुराण तोंडपाठ असल्यामुळे हफीझ या मुस्लिमांमध्ये सन्मानानं घेतलं जाणारं नाव मिळवणारा इस्लाम जीवनशैलीचा पूर्ण तपशील तोंडपाठ असल्यानं मुस्लिमांमध्ये हडिथ स्कॉलर मानला जाणारा, सुन्त्री पंथातल्या आचरणासंबंधीचा वकील आणि न्यायाधीश,इस्लामिक विचारवंत, तर्क शास्त्रात प्रवीण,कादंबरीकार, मानसोपचारतज्ज्ञ,

समाजकार्य करणारा, शास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक, खगोलशास्त्रज्ञ, अंतराळाविषयीच्या माहितीत प्रवीण असलेला, भविष्यवेत्ता,भूगर्भशास्त्रज्ञ,भाषाशास्त्रज्ञ, व्याकरणतज्ज्ञ आणि इतिहासकारसुद्धा! हुश्श! अशा लोकांबद्दल वाचलं की खरंच कमाल वाटते. खरं तर इब्न अल नफीसच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचाच अभ्यास करायला हवा. पण आपण सध्या फक्त त्यानं बायॉलॉजीत

काय केलं ते पाहू,आपल्या शरीरात असलेली पल्मनरी सर्क्युलेशन नावाची यंत्रणा दूषित रक्त शुद्ध करायच्या कामात मदत करते.या यंत्रणेचा खोलात जाऊन अभ्यास करण्यात इब्न अल्-नफीसचा मोठा वाटा होता.आजारी माणसाला बरं करण्यासाठी त्याच्यावर औषधांचे प्रयोग करून बघावेत असं त्याला वाटे.तसंच माणसाच्या मृत्यूनंतर त्यामागचं कारण शोधण्यासाठी त्याचं शरीरविच्छेदन केलं जावं असं त्या काळात सनसनाटी वाटावं असं मत त्यानं मांडलं होतं.आपली अन्नपचन प्रक्रिया नीट राहते ती चयापचय प्रक्रियेमुळे (मेटॅबॉलिझममुळे).या प्रक्रियेत आपण खाल्लेल्या अन्नाचं नीट विघटन होऊन त्याचं आपल्या शरीराचं काम नीट चालण्यासाठीच्या ऊर्जेत होत असतं. या प्रक्रियेचं विस्तारानं वर्णन प्रथमच केलं ते इब्न-अल्-नफीसनंच..


 माणसाच्या शरीररचनेशी संबंधित असलेल्या आधीच्या अनेक अर्धवट माहितीवर आधारलेल्या चुकीच्या संकल्पना त्यानं मोडीत काढल्या.तसंच त्यानं धार्मिक विषयांवरही भरपूर लिखाण केलं. पण या लिखाणामागचा उद्देश मुख्यत्वे विज्ञान आणि त्याचा रोजच्या आयुष्यातला वापर यांची सांगड घालणं हा होता.त्यासाठी त्यानं मग विज्ञानकथाही लिहिल्या.त्या काळी साध्यासुध्या आजारांवर उपाय म्हणून वाइन प्यावी असा सल्ला काही वैद्य देत असत.पण इब्न अल्-नफीसनं त्यावर कडाडून टीका केली. यामागे त्याचे वैज्ञानिक आणि धार्मिक असे दोन्ही विचार कारणीभूत होते.गेलननं माणसाच्या नाडीविषयीही चुकीची माहिती लिहून ठेवली होती.माणसाच्या हृदयातलं शुद्ध रक्त शरीराच्या इतर अवयवांकडे नेणाऱ्या रोहिण्यांमधली नाडीसारखी गती असणारी प्रक्रिया ही सतत सुरूच असते आणि या रोहिण्यांची हालचाल ही आपोआप,म्हणजे नैसर्गिकरीत्याच होत असते असं गेलनचं मत होतं. हे म्हणणं खोडून काढत इब्न-अल्-नफीसनं म्हटलं,की या नैसर्गिक प्रक्रियेबरोबरच हृदयानं या रोहिणीकडे रक्त पाठवल्यामुळेही हे होत असतं.म्हणजेच हृदय जेव्हा फुगतं तेव्हा रोहिण्यांचा आकार निमुळता होतो,आणि हृदयानं रक्त बाहेर टाकलं की ते छोटं होतं आणि रोहिण्या फुगतात.म्हणजेच हृदय आणि रोहिण्या एकाच वेळी फुगतात आणि निमुळत्या होतात हा गेलननं पसरवलेला गैरसमजही इब्न अल्-नफीसनं दुरुस्त केला. याउलट जेव्हा त्यांच्यापैकी एक जण फुगतो तेव्हा दुसरा निमुळता होतो हा वैद्यकशास्त्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा शोध त्यानं लावला.तसंच आपल्या नाडीच्या ठोक्यांचं महत्त्व काय असतं हेही त्याला या अभ्यासातून उमगलं.आपली नाडी सुरू असते याचाच अर्थ आपलं हृदय आपल्या शरीरातल्या इतर अवयवांकडे एखाद्या पंपानं पाणी उपसून शेतात फवारावं तसं रक्त जणू फवारतच असतं,हा अतिशय मोलाचा शोध त्यानं लावला.जितके ठोके जास्त तितका आपल्या हृदयावरचा ताण जास्त आणि म्हणून आपलं हृदय तितकंच धोक्याच्या प्रवासाकडे चाललं आहे असं समजावं हा विचार त्यातूनच आला.माणसाच्या हृदयाखाली हाडं असतात असंही गेलननं लिहून ठेवलं होतं.तेही इब्न-अल्-नफीसनं चुकीचं असल्याचं सिद्ध करून दाखवलं.त्याशिवाय माणसाच्या शरीरातल्या अनेक अवयवांबद्दल गेलननं लिहून ठेवलेले गैरसमज त्यानं दूर केले.माणसाच्या शरीरात महत्त्वाचे म्हणावे असे एकंदर ५२९ स्नायू असतात असा अंदाज इब्न-अल्-नफीसनं बांधला होता.१२३६ साली इब्न-अल्-नफीसनं कैरोचा रस्ता पकडला.तिथं त्यानं सुरुवातीला अल-नसरी नावाच्या इस्पितळात नोकरी केली.तिथून तो अल्-मन्सुरी इस्पितळात गेला आणि तिथला प्रमुख डॉक्टर बनला.

१२४२ साली वयाच्या २९ व्या वर्षी त्यानं शरीरशास्त्राशी संबंधित अनेक नव्या गोष्टींची माहिती देणारं पुस्तक लिहिलं. पुढच्या दोन वर्षांमध्ये त्यानं वैद्यकशास्त्राशी संबंधित असलेल्या आपल्या ग्रंथाचे चक्क ४३ खंड पूर्ण करून छापलेसुद्धा! पुढच्या काही दशकांमध्ये त्यानं या विषयातली उरलेली सगळी माहिती पूर्ण करण्यासाठी टिपणं काढली.ती सगळीच्या सगळी एकत्र छापली असती तर इब्न-अल्-नफीसच्या ग्रंथाचे एकूण तब्बल ३०० खंड बाजारात आले असते!पण त्याच्या हयातीत यातले आधीचे ४३ आणि आणखी ३७ असे ८०च खंड प्रकाशित होऊ शकले. तरीही बराच काळ त्याचा हा ग्रंथ म्हणजे वैद्यकशास्त्रातला सगळ्यात परिपूर्ण कोष मानला जाई.या ग्रंथाची भन्नाट विक्री झाल्यामुळे इब्न-अ-नफीस श्रीमंत झाला होता. मिइन्न-अल-नफीसच्या काही थिअरीज मात्र एकदम भन्नाट होत्या. 

स्त्रीच्याशरीरात गर्भ कसा अंकुरतो याविषयी त्यानं गेलनवर केलेली टीकाही गंमतशीरच होती। स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही शरीरात वीर्य असतं असं इब्न अल्-नफीस म्हणे.तसंच वीर्यात गतिशील तसंच स्थिर राहणारी अशी दोन प्रकारची वेगवेगळी बीजं असतात असं गेलनला वाटायचं.तसंच स्त्रीच्या वीर्याच्या तुलनेत पुरुषाच्या वीर्यात क्रियाशील बीज मात्र जास्त प्रमाणात असतात असं गेलननं लिहिलं होतं. इब्न-अल्-नफीसनं मात्र गेलनचं हे मत चुकीचं असल्याचं सांगितलं.त्यानं याबाबतीत लिहून ठेवलेलं वर्णन गंमतशीर होतं : स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही वीर्यात फक्त स्थिर बीजंच असतात.गतिशील बीजं अजिबातच नसतात, पण जेव्हा पुरुषाचं गरम वीर्य स्त्रीच्या शरीरात जातं तेव्हा स्त्रीच्या वीर्याचा थंडावा या वीर्यांना एकमेकांमध्ये मिसळून जायला मदत करतो. आणि या मिश्रणातून पुढे काय घडणार हे फक्त देवच ठरवू शकतो.त्याला वाटेल त्या प्रकारे मग यातून स्त्रीच्या शरीरात गर्भ तयार होतो,आणि त्याला पुढे अवयव वगैरे फुटतात...अर्थात,हे नेमकं कसं घडतं ते देव नव्हे तर पुढे येणारे वैज्ञानिकच सांगणार होते! इब्न-अल-नफीसनं माणसाचा जीव आणि आत्मा या गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत अशा अर्थाचीही विधानं केली होती.ॲरिस्टॉटलच्या मते माणसाचा आत्मा नावाची गोष्ट माणसाच्या हृदयात असते.पण हे मत चुकीचं ठरवत माणसाचा आत्मा ही कुणा एका किंवा काही ठरावीक अवयवांची मक्तेदारी नसून,तो शरीरातल्या सगळ्याच अवयवांचा मिळून बनलेला असतो असं मत इब्न अल्-नफीसनं व्यक्त केलं!तसंच माणसाच्या मेंदूचं तापमान हे त्याच्या हृदयाच्या तापमानापेक्षा कमी असतं असंही इब्न-अल्-नफीसला वाटे.तसंच आपलं हृदय आपल्या हालचाली,संवेदना,आणि विचारशक्ती या गोष्टी नियंत्रित करतं हा तोपर्यंतचा चुकीचा समजही खोडून काढत प्रत्यक्षात आपला मेंदू या गोष्टी करत असतो हा महत्त्वाचा विचारही त्यानं रुजवला.


या सगळ्याखेरीज त्याची काही मतं धार्मिक दुराग्रहानं भारलेलीही असत.उदाहरणार्थ,काही मुस्लिम माणसांना दारू प्यायचं व्यसन असल्यामुळे आणि काहींचे समलिंगी संबंध असल्यामुळे इस्लामिक देशांवर शत्रूची आक्रमणं झाली असं विचित्र मत त्यानं मांडलं होतं.पण याबरोबरच त्याची काही मतं आजही लागू पडतील अशी आहेत.

उदाहरणार्थ,माणसाची प्रकृती नीट राहावी म्हणून औषधं घेत बसण्यापेक्षा आहारावर नियंत्रण ठेवणं जास्त गरजेचं आहे असं त्यानं म्हणून ठेवलं होतं.गंमत म्हणजे इब्न-अल्-नफीसनं प्रदूषणा

विषयीही प्रबंध लिहिले होते! याचाच अर्थ त्या काळीही प्रदूषण तरी असलं पाहिजे किंवा इब्न अल्-नफीसची दूरदृष्टी तरी तीक्ष्ण असली पाहिजे.


इब्न-अल्-नफीस सतत फिरतीवर असे.शेवटी त्यानं हमादानमध्ये स्थायिक व्हायचं ठरवलं, तिथल्या आजारी राजाला त्यानं बरं केल्यामुळे त्याची तिथला पंतप्रधान म्हणून नेमणूक झाली. पण तिथल्या सैनिकांनी या निर्णयाला विरोध केला आणि इब्न-अल्- नफीसची त्या पदावरून तत्काळ हकालपट्टी होऊन त्याला थेट तुरुंगात टाकलं गेलं! पण सुदैवानं आता तिथला राजपुत्र आजारी पडला.त्यामुळे इब्न-अल्-नफीसला पुन्हा तुरुंगातून राजवाड्यात स्थान मिळालं! नंतर राजा वारल्यावर त्यानं ते गाव सोडून पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात केली.

जेव्हा तो खूपच दगदग करतोय आणि त्याचा त्याच्या तब्येतीवर दुष्परिणाम होईल असं त्याच्या मित्रांनी त्याला सुचवलं.. तेव्हा त्यानं 'मोठं पण एकसुरी आयुष्य जगण्यापेक्षा मी छोटं पण बहुआयामी आयुष्य जगणं पसंत करेन' असं उत्तर दिलं!


तो काळ म्हणजे सीरिया आणि इजिप्त यांच्यामध्ये सुरू असलेल्या धुमश्चक्रीचा होता. तत्कालीन समजुतींप्रमाणे इब्न अल्-नफीसच्या मते हे सगळं मुस्लिम लोकांनी अधर्माचं वर्तन केल्यामुळे होत होतं.दुर्दैवानं या लढायांमध्ये विज्ञान विषयाची अनेक उत्तमोत्तम पुस्तकं बेचिराख झाली.त्यामुळे खचून न जाता इब्न अल्-नफीस आणि अन्य मुस्लिम संशोधकांनी नव्यानं काही पुस्तकं लिहिली.त्यामुळे विज्ञानाची वाढ खुंटली नाही आणि या बाबतीतल्या इतिहासातल्या नोंदीही बऱ्यापैकी बचावल्या.

१२६० ते १२७७ या काळात त्यानं सुल्तान बेबर्सचा खासगी वैद्य ही राजकीय पातळीवरची भूमिका बजावली. १२८८ सालच्या अखेरीला इब्न अल्-नफीस जग सोडून गेला,त्यापूर्वी त्यानं आपल्यामागे आपलं घर, वाचनालय आणि इस्पितळ या गोष्टी मन्सुरिया नावाच्या इस्पितळाला दान केल्या जाव्यात असं लिहून ठेवलं होतं.आज जरी इब्न-अल्-नफीसचे काही विचार मजेशीरच नव्हे तर वेडगळसुद्धा वाटत असले तरी कित्येक शतकांपूर्वीच्या काळात त्यानं वैद्यकीय बाबतींमध्ये इतका खोलात विचार केला, हे त्याचं खूप मोठं योगदानच म्हटलं पाहिजे !


त्या काळापर्यंत पश्चिम युरोपातल्या या लाटेनं पुन्हा वेगळं वळण घेतलं होतं.ख्रिश्चन सैन्यानं सिसिली जिंकून घेतलं होतं.या आधीची दोन शतकं इथे मुस्लिमांनी राज्य केलं होतं आणि आता अकराव्या शतकात ख्रिश्चन सैन्यानं निअर ईस्टमधल्या धर्मयोद्ध्यांचा ताबा घ्यायला सुरुवात केली होती.पण गंमत म्हणजे आक्रमण करून जिंकून घ्यायच्या नादात अरब प्रांतामध्ये आलेल्या ख्रिश्चनांना इथले मुस्लिमही पुढारलेले आहेत हे लक्षात आलं.आणि ते फक्त हुशारच नाहीत तर कित्येक बाबतींत आपल्या

पेक्षाही पुढारलेले आहेत असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मात्र युरोपियनांनी अरबांचं ज्ञान आपल्या भाषेत उतरवून घ्यायला सुरुवात केली. हे ज्ञान मूळच्या ग्रीक पुस्तकांतूनच अरब भाषेत आलं होतं आणि अरबांनी ते जपून ठेवलं होतं.हे भाषांतर करायचं महत्त्वाचं काम करणाऱ्यांपैकी इटलीचा गेरार्ड ऑफ क्रिमोना (१११४ ते ११८७) हा सगळ्यात महत्त्वाचा भाषांतरकार होता. त्यानं हिप्पोक्रॅट्स, गेलन आणि ॲरिस्टॉटल यांचं लिखाण लॅटिनमध्ये भाषांतरित केलं.तेराव्या शतकातला अल्बर्ट्स मॅग्नस हा जर्मन धर्मगुरू तर ॲरिस्टॉटलच्या पुनरुज्जीवित झालेल्या ज्ञानाच्या प्रेमातच पडला. त्यानं हे ज्ञान पुढे चालवायचा वसाच घेतला आणि त्यानं चक्क ॲरिस्टॉटलची शिकवण अनेकांना द्यायला सुरुवात केली. त्यातूनच अक्किनाज नावाचा अल्बर्ट्सचा एक विद्यार्थी ॲरिस्टॉटलच्या विचारांनी भारावूनच गेला होता.आणि आता जे काही देवधर्म चाललंय ते सोडून आपण विज्ञानाच्या मार्गानं खऱ्या ज्ञानाचा मार्ग स्वीकारायला हवा आणि तेच मनुष्यजातीच्या कल्याणाचं आहे.आणि यातूनच विज्ञानाला पुन्हा तार्किक,जडवादी दृष्टीनं पाहण्याचा पाया रचला गेला.


१५.०९.२३ या लेखमालेतील पुढील भाग

३०/११/२३

पहिल्यांदा स्वतःची चूक कबूल करा.. First admit your mistake..

माझी पुतणी जोसेफिन कार्नेगी ही न्यू यॉर्कला सेक्रेटरीचे काम करण्यासाठी माझ्याकडे आली. ती अवघी एकोणीस वर्षांची होती आणि तीन वर्षांआधी तिने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.एखाद्या व्यवसायासंबंधीचा तिचा अनुभव तर खूपच कमी होता,जवळजवळ नव्हताच! आणि सध्या ती पश्चिम सुएझमधील एक उत्तम सेक्रेटरी म्हणून ओळखली जाते;पण आधी परिस्थिती तशी वाईट होती.तिच्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणणे अत्यंत आवश्यक होते. एक दिवस मी तिला वाईट बोलणार होतो;पण मी जरा स्वतःला सावरले आणि मनाशी विचार केला की,'जरा थांब डेल कार्नेगी! थांब! तुझे वय हे जोसेफिनच्या जवळजवळ दुप्पट आहे.या तुझ्या व्यवसायाचा तिच्यापेक्षा कितीतरी पट अधिक अनुभव तुला आहे,त्यामुळे ती आत्ताच तुझ्या दृष्टिकोनातून सर्वकाही पाहू शकेल,समजू शकेल हे खरेच शक्य आहे का?आज तू तुझ्या कामात तरबेज आहेस;पण जेव्हा तू एकोणीस वर्षांचा होतास,तेव्हा कसा होतास हे तूच जरा आठव,त्या वयामध्ये किती मूर्खपणा व किती चुका तू स्वतः केल्या होत्यास ते जरा नीट आठव.त्या वेळेची आठवण ठेव.ते आठवताना बरेच प्रसंग तुझ्याभोवती आठवणींचा फेर धरतील.'आणि अशा प्रकारे भूतकाळ आठवून मी प्रामाणिकपणे आणि निःपक्षपातीपणे स्वतःच्या मनाशी कबूलच करून टाकले की,'जोसेफिनचा एकोणिसाव्या वर्षी सुरू असलेला हा प्रयत्न, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने उत्तम आहे.'आणि खरंतर मला हे सांगायला सुद्धा लाज वाटते की, मी जोसेफिनशी त्या वेळी चार कौतुकाचे शब्दसुद्धा बोलत नव्हतो.


मग नंतर जेव्हा जेव्हा जोसेफिनच्या चुका मला दिसत आणि त्या तिला दाखवायची आवश्यकता असेल,तेव्हा मी तिला जरा वेगळ्या प्रकारे म्हणे की, 'जोसेफिन, तू थोडी चुकली आहेस;पण खरा सांगायचे तर देवाशप्पथ ही तुझी चूक मी केलेल्या चुकांएवढी वाईट नाही.एक आहे,तू या गोष्टी काही जन्मजात शिकून आली नाहीस.या आणि इतर काही गोष्टी या अनुभवातूनच शिकायच्या असतात.

तुझ्या वयाचा मी असताना जसा होतो त्यापेक्षा तू तर खूपच बरी वाटते आहेस.मी स्वतः खूप गंभीर चुका केल्या आहेत, त्यामुळे तुला किंवा इतर कोणालाही दोषी ठरवण्याचा माझा प्रयत्न आणि अट्टहास नाही; पण असे वाटत नाही का की,तू यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने हे काम केले असतेस,तर जरा बरे झाले असते ?'


दुसऱ्यांच्या चुकांचा पाढा वाचण्याआधी जर एखाद्याने सुरुवातीलाच हे कबूल केले की,त्याने स्वतःसुद्धा बऱ्याच चुका केल्या आहेत,तर लोकांना त्यांचे दोष त्या व्यक्तीकडून ऐकणे तसे सोपे जाते.


कॅनडामधील ब्रेंडन येथे इ.जी.डिलिस्टोन नावाचा एक इंजिनिअर होता.त्याच्याकडे काम करणाऱ्या नवीन सेक्रेटरीबद्दल तो फारसा खूश नव्हता.जी पत्रे तो सेक्रेटरीला तोंडी सांगून टाइप करायला देत असे ती पूर्ण टाइप झाली की,त्यातील प्रत्येक पानावर दोन किंवा तीन चुका हमखास असायच्या.जेव्हा ती पत्रे त्याच्या टेबलावर सहीसाठी येत तेव्हा हे लक्षात येत असे.मि. डिलिस्टोनने ही परिस्थिती कौशल्यपूर्ण पद्धतीने हाताळली.ती अशी,


बहुतांश इंजिनिअर्सप्रमाणेच इंग्लिश भाषेवर माझे पूर्ण प्रभुत्व वगैरे नव्हते आणि इंग्रजी स्पेलिंग लिहिण्याच्या बाबतीमध्येही तसा मी बिनचूक नव्हतो.गेल्या अनेक वर्षांपासून काही विशिष्ट शब्दांच्या स्पेलिंगमध्ये माझ्या चुका होतात.ते सर्व शब्द मी एका वहीत लिहून ठेवून, ती वही सदैव माझ्या ड्रॉवरमध्ये मी ठेवतो. माझ्या हे लक्षात आले की,या नव्या सेक्रेटरीला तिच्या चुका दाखवून किंवा डिक्शनरी वापरायला देऊन हा प्रश्न सुटणार नाही.मग जरा वेगळी युक्ती करण्याचे मी ठरवले.चूक झाल्यानंतर जेव्हा पुढील काही पत्र मी तिला टाइप करण्यास सांगत होतो,त्या वेळीच माझ्या लक्षात येत गेले,की त्यामध्ये काही चुका होत आहेत.मग मी स्वतःच टायपिस्टबरोबर बसलो आणि म्हणालो की,मला का कोण जाणे,पण हा शब्द थोडा खटकतो आहे.या अशा शब्दाच्या स्पेलिंगच्या बाबतीत मला नेहमीच जरा गोंधळायला होते. (मग तो शब्द ज्या ठिकाणी किंवा ज्या पानावर आहे ते पान काढतो.) हे बघ हं! हा तो शब्द.शब्दांच्या स्पेलिंगच्या बाबतीत मी जरा जास्तच सावध असतो,कारण आपली ही पत्रे वाचून लोक आपले व्यक्तिमत्त्व ठरवतात. शिवाय स्पेलिंगच्या अशा साध्या चुका दिसल्या की आपली व्यावसायिक प्रतिष्ठाही जरा कमी होते.मला हे समजले नाही की,तिनेसुद्धा मी ठेवत असे तशी अडखळणाऱ्या शब्दांची वही केली की आणखी वेगळे काही केले;परंतु तेव्हापासून तिचा चुका करण्याचा वेग जाणवण्याइतपत मंदावला.इ.स.१९०९ मध्ये एका सभ्य,सुसंस्कृत राजकुमारास बर्नहार्ड व्हॉन बुलॉला तर हे शिकण्याचीच तीव्र गरज पडली.


त्या वेळी व्हॉन बुलॉ हा जर्मनीचा इंपेरियल चान्सिलर होता आणि विल्हेम (दुसरा) सिंहासनावर बसलेला होता.

विल्हेम खूपच गरम डोक्याचा, उर्मट आणि शेवटचा कैसर होता.त्याने अशा बढाया मारल्या होत्या की,आर्मी आणि नेव्हीच्या स्थापनेमध्ये त्याने खूप मोलाची कामगिरी केली आहे आणि त्या कामामध्ये त्याचा सिंहाचा वाटा आहे.नंतर एक आश्चर्यकारक आणि तशी विचित्रच घटना घडली.

कैसरने खूप अविश्वसनीय आणि अतिरंजित गोष्टी सांगितल्या.अशा गोष्टी की,ज्यामुळे फक्त देशच नाही,तर सगळ्या जगालाच आश्चर्याचा धक्का बसला.हे कमी पडले म्हणून कैसरने सार्वजनिक ठिकाणी अगदी जाहीरपणे त्याच्या मूर्खपणाच्या आणि मीपणाच्या पोकळ बढाया मारल्या.या गोष्टी त्याने,जेव्हा तो इंग्लंडला राजकीय पाहुणा म्हणून गेला होता तेव्हा केल्या.यावरचढ म्हणजे हे सगळे प्रकार त्याने 'डेली टेलिग्राफ' या वृत्तपत्रात छापण्याची शाही परवानगीसुद्धा दिली. 


उदाहरणार्थ,त्याने हे जाहीर केले की,तोच फक्त एकटा असा जर्मन आहे की,ज्याला इंग्लंड आपला मित्र वाटतो.दुसरी गोष्ट म्हणजे जपानवर हल्ला करण्या

करिताच नेव्हीला त्याने अजून बळकट केले होते.तिसरे म्हणजे की,त्यानेच इंग्लंडला रशिया आणि फ्रान्स यांच्यासमोर गुडघे टेकण्यापासून वाचवले होते आणि साउथ आफ्रिकेतील बोअर्सचा पराभव करण्यासाठीचा सर्व आराखडा त्याचाच होता आणि त्यामुळेच इंग्लंडला यश मिळाले.हे आणि आणखी असे बरेच काही!शंभर वर्षांच्या शांततामय काळामध्ये त्या वेळेपर्यंत कुठल्याही युरोपियन राजाच्या तोंडातून अशा प्रकारचे विपरीत,

विचित्र आणि बेताल शब्द बाहेर पडले नव्हते. मधमाश्यांच्या एखाद्या पोळ्यातून घोंघावणाऱ्या माश्या एकदम बाहेर पडाव्यात तसेच काहीसे घडले.इंग्लंड क्रोधीत झाले.जर्मन मुत्सद्दी संतापून लालेलाल झाले.

अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये कैसर पार बावचळला आणि त्याने व्हॉन बुलॉला सुचवले की,आता या सगळ्याची जबाबदारी त्याने स्वतःवर घ्यावी.कैसरने इच्छा केली की, व्हॉन बुलॉने हे जाहीर करावे की,त्यानेच राजाला असे सर्व बोलण्याचा आणि करण्याचा सल्ला दिला आणि म्हणून सगळी जबाबदारी ही बुलॉची असावी.


व्हॉन बुलॉने या प्रकाराला विरोध केला आणि तो म्हणाला, "महाराज, जर्मनी काय किंवा इंग्लंड काय,मी राजाला हा सल्ला देऊ शकेन यावर कोणाचा विश्वास तरी बसेल का?" ज्या वेळी व्हॉन बुलॉच्या तोंडातून हे वाक्य बाहेर पडले, तेव्हा त्याच्या डोक्यात एक धोक्याची घंटा ठणाणली आणि आपण एक फार गंभीर चूक केली आहे,

हे त्याला जाणवले.हे ऐकून कैसर उसळलाच.कैसर म्हणाला, "मी तुला गाढव वाटलो का? तुझे असे म्हणणे आहे की ज्या चुका तू करू शकत नाहीस,त्या मी केल्या आहेत?" व्हॅन बुलॉच्या एक मात्र लक्षात आले की,असे बोलण्यापूर्वी त्याने राजाची निदान थोडीतरी स्तुती करायला हवी होती; पण आता त्याला उशीर झाला होता.

नंतर थोडा विचार करून केलेली ही चूक सुधारण्यासाठी त्याने एक चांगली गोष्ट केली.ती म्हणजे या प्रकारच्या टीकेनंतर त्याने आता कैसरची स्तुती करण्यास प्रारंभ केला आणि चमत्कार झाला.


आता तो प्रेमाने आणि आदरपूर्वक कैसरला म्हणाला, "महाराज, मी तुम्हाला असे सुचवणे हे तर माझ्या अकलेच्या बाहेरचे काम आहे.सर्व बाबतीत आपण माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहात.अर्थातच मिलिटरी आणि नेव्ही या क्षेत्रांतला अधिकार तर फक्त आणि फक्त आपलाच आहे. हे एवढेच नाही,तर नैसर्गिक शास्त्रसुद्धा तुम्ही जाणता.महाराज,आपण जेव्हा बॅरोमीटर, वायरलेस टेलिग्राफी,राँटजेन रेज या सगळ्याबद्दल बोलता तेव्हा मी किती अडाणी आहे,याची मला जाणीव होते आणि लाजही वाटते.कारण शास्त्र शाखेशी माझा कसलाच संबंध नाही.रसायनशास्त्र,पदार्थविज्ञान हे तर मला कधी समजणारच नाही असे वाटते; पण ऐतिहासिक ज्ञान त्यामानाने जरा बरे आहे आणि राज्यशास्त्राचा माझा अभ्यासही दांडगा आहे आणि मुत्सद्देगिरी मला चांगली जमते."हे ऐकून कैसरचा चेहरा उजळला.व्हॉन बुलॉने त्याची जी स्तुती केली होती,त्यामुळे त्याला अभिमान वाटला.व्हॉन बुलॉने त्याला उच्च पदाला नेऊन ठेवले होते आणि त्याच्यासमोर तो नतमस्तक झाला होता. या अशा परिस्थितीमध्ये कैसरने कसलीही चूक माफ केली असती.तो त्याला उत्साहाने म्हणाला,"मी तुला म्हटले होतेच की,आपण दोघे एकमेकांची कमतरता भरून काढू शकतो.आता आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहू,नक्कीच राहू!"


कैसरने व्हॉन बुलॉचा हात हातात घेऊन अभिवादन केले.एकदा नाही तर बऱ्याच वेळा.नंतर दिवसभर तो खूप खुशीत होता इतका की,एकदा तर मूठ आवळून ओरडून तो म्हणाला की, जर कोणी व्हॉन बुलॉच्या विरुद्ध माझ्याकडे काही कागाळी केली,तर मी त्याच्या नाकावर ठोसा मारीन.


व्हॉन बुलॉने वेळेवर स्वतःला सावरले; पण तो एक हुशार आणि मुत्सद्दी व्यक्ती असूनसुद्धा ही चूक केली होती.त्याने स्वतःचे दोष सांगूनच बाकी विषयाला सुरुवात करायला हवी होती.स्वतःकडे थोड्या प्रमाणात कमीपणा घेऊन समोरच्या व्यक्तीचे गोडवे गायल्याने आणि स्तुतीची काही वाक्ये बोलल्याने संतापी,अपमानित कैसरसुद्धा जिगरी दोस्त बनतो,तर विचार करा की,नम्रपणा आणि स्तुती आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये काय जादू करेल... योग्य पद्धतीने जर त्याचा अवलंब केला, तर मानवी संबंधात खरोखर चमत्कार घडतील.


आम्ही जरी आमची चूक सुधारू शकलो नाही तरी आपली स्वतःची चूक कबूल करून समोरच्याची वागणूक बदलण्यात मदत मिळते.(डेल कार्नेगी-मित्र जोडा- मंजुल पब्लिशिंग हाऊस-अनु- कृपा कुलकर्णी )


याचा प्रत्यय आम्हाला टिमोनियम,मेरीलँडच्या क्लरेंस यांच्या उदाहरणामार्फत येतो.क्लॅरेंसच्या लक्षात आलं की त्याचा पंधरा वर्षीय मुलगा डेविड सिगारेट ओढू लागला आहे.क्लरेंसने आम्हाला सांगितले, "उघड आहे की त्याचं सिगारेट ओढणं मला आवडलं नव्हतं.पण त्याची आई अन् मी दोघेही सिगारेट ओढत होतो. याप्रकारे आम्ही प्रत्येक वेळी त्याच्यासमोर एक वाईट उदाहरण ठेवत होतो.मी डेव्हिडला सांगितलं की मी त्याच्या वयात सिगारेट ओढण्यास सुरुवात केली होती आणि निकोटीनसमोर मीसुद्धा हरलो आहे.आता ती सोडणं माझ्यासाठी अशक्य आहे.मी त्याला सांगितलं,सिगारेट ओढण्यामुळेच मला कफचा इतका त्रास होत होता आणि मी त्याला हेसुद्धा सांगितलं की त्याने स्वतःच मला सिगारेट सोडण्याबद्दल अनेक वेळा सल्ला दिलाय.


"मी त्याला सिगारेट सोडण्यावर फार मोठे भाषण दिले नाही,त्याच्या धोक्यांबद्दल कुठला इशारा दिला नाही आणि त्याला सिगारेट ओढायला मनाईसुद्धा केली नाही.मी त्याला फक्त सांगितलं की मला सिगारेट ओढायची सवय कशी लागली आणि त्यामुळे मला किती नुकसान झेलावं लागलं."त्याने याबाबतीत काही वेळ विचार केला आणि मग निर्णय घेतला की तो कॉलेज पूर्ण होईपर्यंत सिगारेट ओढणार नाही. या गोष्टीला अनेक वर्षे होऊन गेलीत, पण डेव्हिडने अजूनही सिगारेटला हात लावला नाही.

भविष्यातही तो सिगारेट ओढणार नाही.


"या चर्चेनंतर मीसुद्धा सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या परिवाराच्या मदतीने त्यात यशस्वी झालो."


एक चांगला नेता या सिध्दान्ताचं पालन करतो.


कुणावर टीका करण्याआधी आपल्या चुका कबूल करा.

२८/११/२३

तत्त्वज्ञानी सम्राट मार्कस ऑरेलियस Philosopher Emperor Marcus Aurelius

रोमच्या पहिल्या आठ सम्राटांपैकी पाचांचे खून झाले! या आठानंतरच्या सम्राटांपैकी पुष्कळसे मारेकऱ्यांकडून मारले गेले! खरोखर रोमन साम्राज्याचा साराच इतिहास कट,कारस्थाने,खून,लुटालुटी,आक्रमणे,,डाकुगिऱ्या,लंपटता व विश्वासघात यांनी भरलेला आहे.आक्रमण करीत जाण्याचे रोमनांना जणू काय बाळकडूच मिळत असे. 'स्वार्थ व आपण' यांची शिकवण त्यांना जणू आईच्या दुधाबरोबरच मिळे.'प्रत्येक जण स्वतःसाठी;जो मागे रेंगाळेल त्याला सैतान धरील',ही म्हणच जणू त्यांच्या धर्माची शिकवण होती! रोमन राजसत्ता तद्वतच प्रत्येक रोमन व्यक्तीही आपल्या बंधूना धूळ चारून,त्यांच्या आशा,त्यांचे मनोरथ किंबहुना त्यांचे देहही धुळीस मिळवून स्वतः पुढे येण्याची खटपट करीत असे.रोम इतर देशांना त्याप्रमाणेच रोमन माणूस इतरांना - स्वकीयांनाही लुटूनच पुढे आला पाहिजे,असा जणू नियमच होता!प्रत्येक जण पुढारी होण्याची खटपट करी.अशा विषारी व मारक वातावरणात वाढणारे सम्राट पुढे भलेबुरे करण्याची सर्व सत्ता हाती येताच साधी माणुसकीही गमावून बसत;यात काय आश्चर्य?

ते रानटी पशुंप्रमाणे वा दैत्यांप्रमाणे वागत;यात काय नवल? फारच थोड्या सम्राटांनी शांततेचे व विवेकाचे जीवन जगण्याचा यत्न केला.पण आक्रमक पिसाटांच्या दुनियेत त्यांचेही काही चालत नसे.अशा विवेकी सम्राटांविरुद्ध महत्त्वाकांक्षेने वेडे झालेले सारे माथेफिरू उभे राहत.मूर्खपणाचे राष्ट्रीय धोरण चालविल्यामुळे भोगावी लागणारी फळे मग अशा चांगल्या राजांच्याही वाट्यास येत. 


गादीवर येताच त्यांना सर्वत्र कटाचे व कारस्थानाचे दूषित वातावरणच दिसे.सर्वत्र संशय व धोका! आपल्या पूर्वीच्या सम्राटांनी सुरू केलेल्या पण त्यांच्या हयातीत न संपलेल्या युद्धांना या विवेकी सम्राटांनाही तोंड द्यावे लागे. पूर्वीच्या सम्राटांनी उत्पन्न केलेली भांडणे व युद्धे यातून शांती व सलोखा निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडे,ती युद्धे यशस्वी करावी लागत.ती भांडणे निभावून न्यावी लागत. सम्राट म्हणून त्यांच्या नावाने नवी द्वाही फिरताच पूर्वजांच्या मूर्खपणाशी व अपराधांशीही ते बांधले जात.त्या अपराधी व सदोष धोरणाच्या शृंखला त्यांनाही जखडून टाकीत.


'सुखी' म्हणून संबोधिले जाणारे रोमचे सम्राट रोमन गुलामांपेक्षाही अधिक दुःखी असत.अशा या रोमन सम्राटांपैकीच शहाणा;पण अती दुःखी सम्राट म्हणजे मार्कस ऑरेलियस.


मार्कस ऑरेलियस हा सम्राट अँन्टोनिनसचा मानलेला दत्तक मुलगा.तो वयाच्या अकराव्या वर्षापासूनच स्टोइक पंथाच्या सहनशील तत्त्वज्ञानाकडे ओढला गेला.स्टोईक यतिधर्मी होते.ते दुःख दैवी मानून त्याची पूजा करीत.दुःख भोगावे लागले तरच ते स्वतःला सुखी व भाग्यवान समजत.आत्मा बलवान व्हावा,मन खंबीर व्हावे म्हणून ते कठीण फळ्यांवर झोपत, खाली काही अंथरीतही नसत.ते एक जाडेभरडे वस्त्र अंगावर घेत,ते अंगाला खुपे.तरुण मार्कस ऑरेलियसही अशा हठयोगाचे आचरण करू लागला.पुढे जेव्हा मन व बुद्धी ही परिपक्व झाली,तेव्हा त्याने या मूर्खपणाच्या बाह्य गोष्टींचा व देखाव्यांचा त्याग केला.पण त्या पंथाच्या तत्त्वज्ञानातील मुख्य गाभा मात्र त्याने कधीही सोडला नाही. सम्राट अँन्टोनिनस व मार्कसची आई या दोघांनीही त्याला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी उत्तेजन दिले व त्या काळातील अत्यंत नामांकित आचार्य त्याच्या अभ्यासासाठी ठेवले. त्यांच्या योग्य देखरेखीखाली व मार्गदर्शनाखाली त्याने केवळ तत्वज्ञानातच प्रगती केली असे नव्हे,तर काव्य,इतिहास व ललितकला यांचाही चांगला अभ्यास केला.

तो स्वभावतःच विद्याप्रिय होता.


मनाचा विकास होत असता तो अत्यंत सुखी होता.

पुढारीपणा त्याच्या ठायी नव्हता.एक अज्ञात तत्त्वज्ञानी म्हणून राहावे,अशीच त्याची इच्छा होती.पण देवाची इच्छा त्याने सम्राट,वैभवशाली राजाधिराज व्हावे,अशी होती.तो आपल्या वयाच्या तिसाव्या वर्षी (इ.स.१६१

मध्ये) सम्राट झाला.प्लेटो ज्याची वाट पाहत होता,तो राजर्षी शेवटी सिंहासनावर आला. 


पण प्लेटोचे स्वप्न प्रत्यक्षात येणे अद्यापि फार दूर होते.

प्लेटोच्या रिपब्लिकमधील तत्त्वज्ञानी राजाला सज्जन व सुसंस्कृत लोकांच्या राष्ट्रावर राज्य करायचे असे;पण मार्कस ऑरेलियसला मूर्ख व गुंड बहुजन समाज असलेल्या राष्ट्रावर राज्य करायचे होते.


इतिहासाच्या चलच्चित्रपटात मार्कस आपल्या डोळ्यां -

पुढून जातो,तेव्हा त्याच्या ठिकाणी आपणास दोन व्यक्ती दिसतात.तो म्हणजे प्राचीन काळचा डॉ.जेकिल वा मि.हाईड होय.रात्रीच्या प्रशांत वेळी तो स्वतःचे हृदय संशोधन करणारा भावनाप्रधान कवी व ज्ञानोपासक दिसतो.हे जग अधिक चांगले कसे होईल,येथे सुखी लोक कसे नांदू लागतील याविषयीचे आपले विचार तो मांडी व त्यातून योजना निर्मी,पण दिवसा मात्र तो शस्त्रास्त्रांच्या खणखणाटात रोमन विजयासाठी बाहेर पडे.शरण जायचे नाही व दया दाखवायची नाही या रोमन तत्त्वांप्रमाणे विजयी सेनानी म्हणून धावपळ करताना व दौडा मारताना तो दिसतो.


मार्कस ऑरेलियस याच्या या द्विविध स्वरूपाचे त्याच्यातील सौम्य कवी व कठोर योद्धा या दोघांचेही थोडे दर्शन आपण घेऊ या.


मार्कस ऑरेलियस हा भला माणूस होता.पण त्याला संगत मात्र भली मिळाली नाही.तो दुष्ट संगतीत सापडलेला सुष्ट होता.


त्याने आपली डायरी लिहिली आहे.ती त्याची चिंतनिका होती.प्राचीन काळातील ते एक उत्कृष्ट पुस्तक आहे. आपण कसे व्हावे व कोणती तत्त्वे आचरणात आणावीत,याबाबतचे आपले सर्व विचार त्याने या चिंतनिकेत लिहिले आहेत. 


पण काय करावे हे कळले,तरी तसे करणे मात्र तितकेसे सोपे नसते.प्रत्यक्ष प्रसंग येताच त्याला तत्त्वांचा विसर पडतो;तत्त्वांप्रमाणे वागण्याची हिंमत होत नाही.

त्याला पुरेसे नीतिधैर्यच नसते. "मार्कस ऑरलियस या नात्याने रोमच माझे शहर व माझा देश असले,तरी मानव या दृष्टीने सारे जगच माझा देश आहे,"असे त्याने चिंतनिकेत लिहिले असले,तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र आपण जगाचे नागरिक आहोत याचे स्मरण त्याला राहत नाही,आपल्या रोमनपणाची जाणीव त्याच्या ठायी बलवत्तर होते. 


वास्तविक,तो युद्धाचा द्वेष्टा आहे.तो लिहितो, "माशी पकडता आली की कोळी नाचू लागतो, ससा सापडला की माणसाला आनंद होतो,थोडे मासे जाळ्यात अडकले की कोळ्याला हर्ष होतो, डुक्कर किंवा अस्वल मारता आले की शिकायला आनंद होतो,तर युद्धात कैदी पकडले की लढवय्यास आनंद होतो (Sarmatian Prisoners). पण या साऱ्यांच्या मनातले तत्त्वज्ञान पाहिले तर सारे एकजात डाकूच नाहीत का ठरत?" पण असे लिहिणाऱ्या मार्कसच्याच कारकिर्दीचा बराचसा भाग मात्र युद्धे लढण्यातच गेला,शत्रूना पकडण्यात व ठार मारण्यातच खर्ची पडला! 


न्यायापेक्षा रणकीर्तीचीच चाड आपणास अधिक असल्याबद्दल वाईट वाटून तो आपल्या चिंतनिकेत आपल्या दुबळेपणाबद्दल स्वत:वर कोरडे उडवितो; "सम्राट म्हणून जर जीवनातील उदारता तुला दाखविता येत नसेल तर जा, कोपऱ्यात जाऊन बस;व तिथे निर्दोष व निर्मळ जीवन जग;व तिथेही जीवनाची उदारता वा उदात्तता तुला दाखविता येत नसेल,तर या जगातून चालता हो...असे निघून जाणेदेखील तुझ्याने घडले,तर ते एक अत्यंत स्तुत्य असे सत्कृत्यच होईल."त्याने असे लिहिण्याचे धैर्य दाखविले तरी,सम्राट झाल्यामुळे उदात्तता दाखविता येत नव्हती; तरी त्याला सत्तात्याग वा प्राणत्याग करण्याचे धैर्य मात्र दाखविता आले नाही.मार्कसवर आपणाला दुबळेपणाचा आरोप करता येईल; पण जाणुनबुजून केलेल्या दुष्टतेचा आरोप मात्र मुळीच करता येणार नाही. 


रॅम्से मॅक्डोनाल्डप्रमाणेच,तो शांततेच्या काळात व शांत वृत्तीच्या माणसांत वावरण्यास योग्य होता.

आजच्या ब्रिटिश साम्राज्याप्रमाणे त्या काळचे रोमन साम्राज्यही संकटात होते. पुष्कळशा वसाहतीत बंडे माजली होती.मार्कसची इच्छा नसूनही सम्राटपदावर असल्यामुळे त्याला बंडखोरांविरुद्ध चालून जावे लागले,त्यांची बंडे मोडावी लागली,आपल्या ध्येयाशी विसंगत धोरण पत्करावे लागले. मानवजातीच्या स्वातंत्र्यापेक्षा 'रोम जगाची अधिराज्ञी आहे' यावर त्याची अधिक श्रद्धा होती व सिंहासनावर आपण राहावे,याची त्याला अधिक तळमळ लागली होती.मार्कसच्या बाबतीत अखेरचा निकाल देण्यापूर्वी आपण स्वतः त्याच्या स्थितीत जाऊन पाहिले पाहिजे. आज आपण ब्रिटिश सत्तेचे प्रमुख चालक असतो तर आपणांपैकी कित्येकांना हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याचे धैर्य दाखविता आले असते? मार्कसचीही नेमकी अशीच स्थिती होती. अर्थातच मार्कस जर बुद्ध असता तर तो वेगळ्या रीतीने वागला असता.पण तो बुद्ध नव्हता.जगाचे भले करावे म्हणून बुद्धाने राज्यत्याग केला.मार्कसने राज्यपदासाठी भले करण्याचे सोडून दिले.हिंदुस्थानने जगाला 'शांती देणारे महापुरुष' दिले. रोम 'जास्तीत

जास्त तत्त्वज्ञानी योद्धा' निर्माण करू शकले." 


मार्कस प्रथम रोमन सम्राट होता व नंतर मानवजातीवर प्रेम करणारा होता हे नीट ध्यानात धरले तर मग आपणास त्याने ख्रिश्चनांचा छळ का केला हे समजू शकेल,थोडी कमी-जास्त माणसे मारली गेली म्हणून वैतागण्याइतका वा विरक्त होण्याइतका कच्चा शिपाई तो नव्हता. शिपाईगिरी त्याच्या रक्तात अधिक भिनलेली होती.ख्रिश्चन लोक रोमन देवदेवतांविरुद्ध बोलत,नवीन राज्य येणार वगैरे भविष्यकथा सांगत. साहजिकच रोमन राज्याला यात धोका आहे असे वाटे.ख्रिश्चनांचे प्रमुख पुढारी ठार मारून त्यांना दडपून ठेवणे हे 'राज्याचे पालनकर्ते' या नात्याने आपले कर्तव्य आहे,असे मार्कसला वाटे. बंड मोडून तो पुन्हा आपल्या हस्तिदंती तत्त्वज्ञान मंदिरात येई तेव्हा तो लिही, "मी दुसऱ्यांना हेतुपुरस्सर वा उगीचच दुःख दिलेले नाही." त्याच्या या लिहिण्यात दंभ नसून सत्यता असावी असे वाटते.


दैवदुर्विलास हा की,मार्कस हा सत्याची तळमळ असणारा माणूस होता.कृत्रिमता वा दंभ त्याच्या ठायी मुळीच नव्हता.स्वत:च्या राष्ट्राची सुरक्षितता किंवा प्रतिष्ठा धोक्यात असता तो सीझरच्या अहंमन्यतेने शासन करी;पण स्वतःचा जीव धोक्यात असताना मात्र तो एखाद्या संताच्या उदारतेने क्षमा करी! त्याचा अँव्हिडिअस कॅशियस नामक एक सेनापती होता.

त्याने त्याला मारण्याचा कट केल्याचे त्याला कळले तेव्हा कॅशियसविरुद्ध काहीही करण्याचे नाकारून तो म्हणाला, "तो दोषी व अपराधी असेल तर आपल्या कृतकर्माचे फळ तो भोगील." कट फसला व कॅशियसचाच कोणीतरी खून केला.मित्रांनीच नव्हे; तर राणी फॉस्टिना हिनेही कॅशियसच्या घराण्यातल्या सर्वांना ठार करावे असे परोपरीने विनविले,निदान स्वतःच्या रक्षणासाठी तरी ही गोष्ट करण्याबद्दल विनविले; पण मार्कसने त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. तो म्हणाला, "पित्याच्या पापासाठी मुलाबाळांनी शासन का बरे भोगावे? त्यांचा काय अपराध ? कटात सामील होण्याबद्दल कॅशियसने अनेक प्रमुख रोमन नागरिकांना लिहिलेल्या पत्रांचे भेंडोळे त्याच्यापुढे टाकण्यात आले.

तो गड्डा पाहून त्याने काय केले असेल? एक शब्द न बोलता त्याने ती सारी पत्रे 'अग्नेय स्वाहा' केली व नंतर पुन्हा चिलखत चढवून तो दुसऱ्या एका युद्धावर जाण्यासाठी,रक्तपातासाठी तयार झाला, एकाच वेळी सम्राट व सामान्य मानव म्हणून तो जगू इच्छित होता.

त्यासाठी त्याची धडपड चालू होती.पण त्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.त्यामुळे त्याच्या जीवनातील आनंद गेला व त्याच्या जागी निराशा आली. 


तो जगाविषयी व एकंदर जीवनाच्या मूल्यांविषयी तिरस्काराने बोलू लागला,कशातच काही अर्थ नाही असे म्हणू लागला.उमर खय्याम किंवा कोहेलेथे याप्रमाणेच कित्येक शतकांपूर्वी बोलताना तोही आपणास दिसतो.तो लिहितो - "ही दुनिया म्हणजे केवळ वाफ आहे.हा संसार निःसार आहे.येथे सदैव झगडे व मारामाऱ्याच आढळणार,आपण या जगात क्षणाचे पाहुणे आहोत.मरणोत्तर कीर्ती ! पण तिचे आपणास काय होय? क्षणभर कीर्ती मिळते.पुन्हा सारे विसरूनही जातात.या मानवी जीवनात हा काळ म्हणजे एक क्षण एक बिंदू.सारे क्षणिक आहे,चंचल आहे,बदलते आहे.आपली प्रजाही दुबळी आहे.अंतर्दृष्टी फार मंद असते.वस्तूंचे अंतरंग कळत नाही.हे शरीर तर सडणारे आहे.आत्मा म्हणजे वायूची एक क्षणिक झुळूक! दैवात काय असते हे कळत नाही,कीर्ती मिळते त्यातही काही अर्थ नसतो.लोक विचार न करताच टाळ्या वाजवितात,

स्तुती करतात.आणि आपण मेल्यावर स्मरण कशाचे करायचे ? पोकळ,शून्य वस्तू, तिचे ?" हे सारे जीवन बाह्य अवडंबर आहे.हे सारेच क्षणिक देखावे,बुडबुडे आहेत.मार्कस ऑरेलियस,त्याचे वैभव,त्याच्या महत्त्वाकांक्षा,त्याची युद्धे,त्याचे विजय,त्याचे यश,सारे सारे पोकळ व निःसार आहे.अनंत बुडबुड्यांतले हेही बुडबुडे! पण त्याचे स्टोइक वळण त्याला धीर देई.

आपल्या नशिबी आलेले पोकळ राजवैभव तो सहन करी. "जे वाट्यास आलेले आहे,ते दैवाने दिलेले आहे. ते अपरिहार्य आहे.ते सहन करा."असे स्टोइक तत्त्वज्ञान सांगते.आपण देवाच्या हातांतली बाहुली आहोत,आपले जीवन त्याच्या इच्छेसाठी आहे,आपल्या मनःपूर्तीसाठी नाही.तो लिहितो,"माझे काय व्हावे,माझ्या नशिबी काय यावे,याचा विचार देवांनी केलाच असेल;व तोच योग्य असणार.त्यांनी खास माझ्या बाबतीत जरी विचार केला नसेल तरी या विश्वाच्या सर्वसाधारण कल्याणाची चिंता त्यांनी केलीच असेल.यासाठी या विश्वसंसारात जे माझ्या नशिबी येईल ते विश्वयोजनेनुसार आहे असे समजून मी आनंदाने सहन केलेच पाहिजे,त्यातच समाधान मानले पाहिजे. 


माझ्या बाबतीत जे जे घडत आहे,ते ते अनंत काळापासून तसे योजिलेलेच आहे."आपल्या आत्म्याच्या खिन्न आदशांत,बघून मार्कस स्वतःची पुढीलप्रमाणे कानउघाडणी करतो; "घाबरू नको.नशिबाने जे ताट वाढून ठेविले आहे ते गोड करून घे.जे दैवाने दिले आहे.त्याच्याशी जमवून घे.दैवाला तुझ्या जीवनाचे वस्त्र जसे विणायचे असेल,तसे विणू दे.तेच तू अंगावर घे.देवांना चांगले कळते,अधिक कळते,सर्वांत जास्त समजते." पण त्याच्या तत्त्वज्ञानाने त्याचे समाधान झाले नाही.त्याच्या जीवनात खोल निराशा होती. त्याची महत्त्वाकांक्षा शेवटपर्यंत अपुरीच राहिली.त्याला हवे होते शांती-समाधान,पण मिळाला पोकळ मोठेपणा


त्याला वैभव लाभले,शांती लाभ झाला नाही.आपल्या अप्राप्य ध्येयाकडे तो एखाद्या भणंग भिकाऱ्याप्रमाणे पाहत राही व अर्धवट धार्मिक अशा शब्दजंजाळात - शाब्दिक धुक्यात -तो आपले ध्येय अदृश्य करून टाकी.त्या अर्धवट धार्मिक शब्दांवर तरी त्याचा पूर्ण भरंवसा कोठे होता ?


इ.स. १८०चा हिवाळा आला. मार्कस एकोणसाठ वर्षांचा झाला होता.उत्तरेस जर्मनांशी लढताना त्या कडक थंडीत त्याची प्रकृती बिघडली,त्याचे सारे शरीर जणू गोठले,गारठून गेले! घरी रोमकडे परतण्यापूर्वीच तो मेला.. त्याची कारकीर्द अयशस्वी झाली.त्याचे जीवन अपयशी होते;ते पाहून फार वाईट वाटते. (मानवजातीची कथा,हेन्री थॉमस))


त्याच्या मनात असलेल्या उदात्ततेनुसार तो वागता,तर तो महापुरुष झाला असता.पण अखेर तो कोण झाला?धंदेवाईक सैनिकांच्या शहरातला एक विजयी सेनापती,इतक्याच नात्याने तो शिल्लक राहिला.त्याने मिळविलेल्या विजयातूनच पुढच्या युद्धाचे बीजारोपण झाले व त्यातच शेवटी रोमचा नाश झाला. 


माकडातून उत्क्रांत होत होत प्राणी जन्माला यायला जवळजवळ चार कोटी वर्षे लागली. त्याला ताठ उभे राहता यायला व दगडधोंड्यांनी आपले भक्ष्य मारून खाता यायला आणखी तीन लक्ष वर्षे लागली.पुढे आणखी पन्नास हजार वर्षे गेली आणि त्याला तांब्याचा शोध लागला. मारण्याची,संहाराची अधिक प्रभावी हत्यारे तो बनवू लागला.त्यानंतर दोन हजार वर्षांनी त्याला लोखंड सापडले.हिंसेची साधने अधिकच प्रखर अशी तयार झाली.मारण्याच्या पद्धतीत अधिक कौशल्य आले.लोखंडाच्या शोधानंतर पाच हजार वर्षांनी डायनामाइटचा शोध लागला.त्यानंतर कित्येक शतकांनी त्याने पाणबुड्या बांधल्या व विमाने बांधली,आणि दुसऱ्या प्राण्यांचा संहार करण्याची त्याची संशोधक बुद्धी पूर्णतेस पोहचली,मानवाच्या मत्थड मेंदूला 'हिंसा म्हणजे मूर्खपणा आहे'.ही गोष्ट कळायला आणखी पन्नास हजार वर्षे लागतील.संहार करण्यापेक्षा हितकर व उपयोगी अशा दुसऱ्या उद्योगात वेळ दवडणे अधिक चांगले,ही गोष्ट तेव्हा त्याच्या लक्षात येईल.


मनुष्य अगदी मत्थड प्राणी आहे.फारच हळूहळू त्याची प्रगती होत आली आहे;.आणि जी काही थोडीफार प्रगती झाली, तीही सारखी अखंड होत आली असेही नाही.कधी प्रगती तर कधी अधोगती,

असे सारखे चालले आहे.उंचावरून कितीदा तरी हा प्राणी खाली घसरला आहे;वर चढून पुन्हा कितीदा तो खाली पडला आहे.





२६/११/२३

सतत आठवणारी भाऊबीज A brother who remembers constantly

म्हातारी....


बरोबर दोन वर्षांपूर्वी दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या दिवशी घडलेला हा प्रसंग... आज आठवण्याचे कारण म्हणजे मागील दिवाळीत ती नव्हती... या दिवाळीत सुद्धा नव्हती आणि पुढेही कधी नसणार...!


ती मला भेटली होती साधारण चार वर्षांपूर्वी.... 

वय असावं साधारण साठीच्या आसपास...

ती तिच्या यजमानांसह अंगाचं मुटकुळं करून पुण्यातल्या नामांकित रस्त्याच्या फुटपाथला एका कडेला शून्यात नजर लावून बघत बसलेली असायची...

येता जाता मी तीला पाहायचो...मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचो पण ती कधी दाद द्यायची नाही.... 


तीला अंधुक दिसायचं... जवळपास नाहीच...


वयाच्या मानाने तिचे यजमान बऱ्यापैकी धडधाकट दिसायचे,परंतु ती मात्र पूर्णतः खचलेली.... वयापेक्षा पंधरा-वीस वर्षांनी जास्त आहे असं वाटायचं.... 


मी तिच्या यजमानांची मैत्री करण्याचा प्रयत्न केला,परंतु त्यांनीही दाद दिली नाही मला याचं काहीच कारण कळत नव्हतं.... 


असंच वर्ष निघून गेलं...


पावसाळा सुरू झाला,एके दिवशी त्या रस्त्याने जात होतो,माझ्या अंगावर रेनकोट होता.... सहज फूटपाथ कडे लक्ष गेलं,ते दोघे भिजत होते... पावसापासून लपण्याचा प्रयत्न करत होते.... !


सगळ्यांनीच छळलं होतं.... पाऊस बरा यांना सोडेल?


खूप वाईट वाटलं..परंतु ते दोघेही सहकार्य करायला तयार नव्हते... मी तरी काय करणार ? 

तरीही एके दिवशी जुन्या बाजारात गेलो आणि तिथून प्लास्टिकची मोठीच्या मोठी ताडपत्री आणि सुतळी विकत आणली.... पाऊस  धो धो कोसळत होता... ते भिजत होतेच...ते ज्या ठिकाणी बसले होते तिथे जाऊन मग त्यांच्याशी काहीही न बोलता या टोकापासून ते त्या टोकापर्यंत प्लास्टिक ची ताडपत्री टाकून छत होईल असा काहीतरी देशी जुगाड केला.... 


तिला दिसत नव्हते...तिने शेजारी बसलेल्या नवऱ्याला विचारले एवढ्या जोरात पाऊस पडत होता अचानक कसा थांबला ? 


यजमानांनी तीच्या कानात काहीतरी सांगितले. 


मी छत टाकून निघणार इतक्यात त्या आजीने मला हाक मारली.... ए बाबा... हिकडं ये....


मी छता खाली गेलो,' मला म्हणाली तू हायस तरी कोण?  आनी आमच्या मागं का लागला हायस? तुला काय पाहिजेन.... जगू दे ना बाबा हित तरी सुखानं...


घरातून बाहेर पडलेले हे दोघे....


जगाने यांना,या ना त्या कारणाने खुप फसवले होते,आता मीही त्यांना असाच फसवणार असा त्यांचा गैरसमज झाला होता....


अनेकांनी यांना धोका दिला होता....


खरंच,विश्वास किंमती असेलही पण धोका खूप महाग असतो...!


पुढे तासभर मी त्यांच्याशी बोलत होतो,मी नेमकं काय करतो आणि कशासाठी हे त्यांना समजेल अशा भाषेत यांना समजावून सांगितलं.... माझ्याकडून तुमची काहीही फसवणूक होणार नाही झाली तर मदतच होईल याची मी त्यांना खात्री दिली...!


मी निघालो जाताना या वेळी तिच्या चेहऱ्यावर हसू होतं... यानंतर अनेक वेळा मी तिच्या त्या तात्पुरत्या उभारलेल्या छताखाली जायचो,जाताना प्रत्येक वेळी संसाराला उपयोगी होईल अशी काहीतरी वस्तू घेऊन जायचो.... बघता बघता दोन माणसांना स्वयंपाक करून खाता येईल  आणि जगता येईल अशा सर्व गोष्टी घेऊन दिल्या.


तीचं मत आता माझ्याविषयी बदलत चाललं... मी तीला फसवणार नाही,याची तीची खात्री झाल्यावर त्या कुटुंबाबरोबर माझा स्नेह जुळला....


यानंतर तीला माझ्या गाडीवर बसवून तीन ते चार वेळा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. ऑपरेशन केली आणि ... शेवटी एकदाचं तिला दिसायला लागलं.... 


एका पायान ती अधू  होती.... तीला मग एक  व्हीलचेअर पण घेवून दिली....


आता नाती घट्ट झाली होती....


मी तीला गमतीने,प्रेमाने नेहमी "ए म्हातारे" असं म्हणूनच हाक मारायचो.तीला बाकी कशाचा नाही,पण म्हातारी म्हटल्याचा राग यायचा, बस एवढ्या एकाच गोष्टीने ती चिडायची....


दरवेळी ती मला म्हणायची, ' म्हातारे नको ना म्हणू.... ताई म्हणत जा की मला'


मी तिचं ऐकायचो नाही..... मी तीला ए म्हातारेच म्हणायचो आणि मग ती तोंडाचा पट्टा सुरु करायची,तोंडातून शिव्या यायच्या,मला मस्त गंमत वाटायची..  


वर अजून म्हणायचो,'म्हातारीच तर आहेस.... तुला काय ताई म्हणायचं गं ?'  यावर  चिडून ती चप्पल दाखवायची....


लोक फूटपाथवर राहणाऱ्या या दोघांना शर्ट-पॅंट साड्या पैसे असं बरच काही द्यायचे.... 


दर भाऊबीज आणि रक्षाबंधनाला मात्र मला ती बोलावून घ्यायची आणि ओवाळून झाल्यानंतर तीला भिकेमध्ये  मिळालेल्या शर्ट पॅन्ट बूट अशा अनेक वस्तू ती मला भेट म्हणून द्यायची....बोचक्यातले शर्ट काढून मला ते होतील की नाही हे ती  माझ्या अंगाला लावून बघायची.... तीला मिळालेले फाटके बूट..... त्यातल्या त्यात चांगले निवडून ती मला द्यायची आणि घालून बघ म्हणून आग्रह करायची.... 'होतील गं दे मी घालतो असं म्हणून,'गुपचूप मी त्या  गोष्टी घ्यायचो.... 


'व्वा...मला असाच शर्ट हवा होता' असं मी तीला म्हणालो की तिचा चेहरा उजळून जायचा....


'मला असाच बूट हवा होता आणि तू नेमका  आज तू तसाच दिलास' म्हटलं की तिला आभाळ ठेंगणं व्हायचं.... 


भीक म्हणून तिला मिळालेल्या गोष्टी ती मला द्यायची आणि मी त्या वस्तू बहिणीने दिल्या आहेत म्हणून सांभाळून ठेवायचो ....


'शर्ट आणि बूट घाल बरं का..... न्हायी बसला तर फूडल्या बारीला देते' हे पण ती आठवणीने सांगायची... 


अशा प्रेमानं मिळालेल्या अनेक गोष्टींचा मी संग्रह केला आहे.... 


ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी अशा वस्तूंची    संग्रहालयं उभारली....आठवणीसाठी स्मारक बांधली...खूप नंतर कळलं..... स्मारक बांधायला आणि संग्रहालय उभं करायला पैसा लागतच नाही....


स्मारक तयार करायचं असतं मनात आणि संग्रहालय उभं करायचं असतं हृदयात....! 

मिळालेल्या वस्तूला किंमत असेलही, नसेलही, देणाऱ्याच्या भावनेला मात्र मोल नसतं...भावनांचं हे स्मारक बांधून उरात घेऊन मिरवायचं असतं...! 


तू डॉक्टर मी अडाणी,तू जरा बऱ्या घरातला मी रस्त्यावर राहणारी,असा काही भेद-भाव ती माझ्या बाबतीत करत नसे.... तीला मी म्हणजे तीच्या कुटुंबाचाच  एक भाग वाटतो.. ती तिच्यात आणि माझ्यात काहीही फरक करत नाही....ती मला तिच्याच सारखा समजते.... तिने मला तिच्याच सारखं समजणं,हा मी माझा विजय मानतो.


मी म्हणजे तूच आहे आणि तू म्हणजे मीच आहे, हे ती समजत होती आणि मी अनुभवत होतो...अद्वैत ही संकल्पना नुसती वाचली होती तीच्या मुळे मला अनुभवायला मिळाली.


लोक बाहेर सर म्हणतात,हि मला मूडद्या म्हणते...


एरव्ही,आपणास कधी वेळ असतो ? कधी आपणास फोन करू ? लोकांचे असे नम्रतेने मेसेज येतात...


ती मात्र बेधडक रात्री बारा वाजता फोन करते,' मुडद्या मेलास का जिवंत हायेस ? भयनीची काय आटवण हाय का नाय ? म्हणत ठेवणीतल्या शिव्या देते.... 


मी हसत तीला म्हणतो,बहीण कसली तू कैदाशीन आहेस,हडळ आहेस म्हातारे ... 


मग काय .... यानंतर आणखी स्पेशल शिव्या सुरू होतात आणि मी तिने उधळलेल्या या फुलांच्या सुगंधाचा आस्वाद घेतो.... 


त्यात बहिणीच्या मायेचा आस्वाद असतो.... ! 


वजन फुलाचं होत असेलही.... सुगंधाचं करता येत नाही....


अगरबत्ती किलोत मोजत असतील सुद्धा,परंतु त्या अगरबत्ती पासून निघालेल्या सुगंधी वलयाचं वजन कशात करावं मी ....? 


ती तशीच होती काटेरी फणसासारखी... बहिण म्हणून ती करत असलेली "माया" मोजायला माझ्याकडे कोणताही तराजू नाही.... 


तीला छत टाकून तात्पुरता निवारा करून दिला होता, त्या झोपड्याला तीने घर म्हणून रूप दिलं होतं.मी त्यात जगण्यासाठी आवश्यक अशा सर्व वस्तू तिला घेऊन दिल्या होत्या.लोक भीक देत होते,त्यात तिची गुजराण होत होती,परंतु माझी बहीण,भीक मागून जगत आहे, हा माझा अपमान होता...


आणि म्हणून त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती....एकदा तीला म्हणालो,'अशी भीक घेण्यापेक्षा 'चार पैशे' कमव... काहीतरी धंदा आपण सुरू करू....' ती म्हणाली होती,' मुडद्या भांडवल काय माजा मेलेला बाप घाललं काय....? '


मी म्हणालो होतो,'नाही ना,तुझा जिवंत असलेला भाऊ भांडवल  घाललं .... '


यावर तिने पदराला पुसलेले डोळे मला अजून आठवतात.... 


यानंतर मी तीला पाच ते दहा विक्री योग्य वस्तू विकत आणून दिल्या होत्या आणि तीला म्हणालो,'बघ हळूहळू हा व्यवसाय सुरु कर.'


तीने माझं ऐकलं....  मी ज्या वस्तू दिल्या होत्या त्या वस्तू ओळीने तीने त्या फूटपाथ वरच्या तिच्या घरात मांडून ठेवल्या...... व्हीलचेयर घेऊन ती आता घराबाहेर बसू लागली.... येणार्‍या-जाणार्‍या लोकांना वस्तू घेण्याचा आग्रह करू लागली.... व्यवसाय हळूहळू वाढत गेला.मी दिलेल्या पाच दहा वस्तूंची संख्या वाढवत तीने ती दोनशे-तीनशेच्या वर नेली.आता वस्तू ठेवायला घर पुरेना... हे कर्तुत्व तिचं होतं ....!


तीला मी फक्त एक हात दिला होता,तीने या संधीचे सोनं केलं.... ती आकाशात  भरारी  घेत  होती....!


कोणतंही काम करण्याच्या पलीकडे गेलेला एक अपंग माणूस रोज तीच्या दारावर यायचा.... या ताईने त्याला रोज दोन वेळचं जेवण द्यायला सुरुवात केली. 


स्वतःला जाणवते ती वेदना पण जेव्हा दुसऱ्याची वेदना जाणवायला सुरुवात होते ती म्हणजे संवेदना....!


तीने त्याची वेदना जाणून त्या अपंग व्यक्तीला हात दिला होता....आपण उठून उभे राहिल्यावर दुसऱ्याला सुद्धा मदतीचा हात द्यावा..... कुठून आला असेल हा विचार तिच्या मनात...? 


मी तिला मनोमन नमस्कार करायचो.


ती मला नेहमी म्हणायची,'एवढ्या लोकांचं करतोस,याचं पण पांग फेड बाबा,या अधू पोरासाठी पण कायतरी कर.... ' कालांतराने या व्यक्तीवर सुद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार केले,तो आता स्वतःच्या पायावर चालतो, यानंतर त्याला एका आश्रमात नोकरी मिळवून दिली आहे. त्याचं सर्व छान झालं,या सर्व गोष्टींचा सर्वात जास्त आनंद कुणाला झाला असेल,तर तीला...!


दुसर्‍याच्या आनंदात आपलं सुख मानणं, म्हणजे खऱ्या अर्थाने मोठं होणं .... बाकी नुसतंच वय वाढण्यानं कुणी मोठा  होतं नसतो....!


मोठं होणं म्हणजे maturity येणं....!

किती कॅरेटचं सोनं घातलंय यापेक्षा किती मूल्यांचं कॅरेक्टर आहे हे समजणं म्हणजे maturity....!

चुका  शोधायला मेंदू लागतो.... पण माफ करायला हृदय.... हे समजणं म्हणजे maturity....!


.... अशाच एके दिवशी शिव्या देत फोन करत मला तिने घर बघायला बोलवलं.... तिथे तिने अनंत वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या, ते पाहून माझे डोळे दिपून गेले....कृतज्ञतेने म्हणाली,'ही भरभराट तुज्यामुळं झाली बाबा'खरंच तिची भरभराट झाली होती.... पण केवळ वस्तूंची संख्या वाढली म्हणून तीला भरभराट म्हणायचं का ? मुळीच नाही.....


काळ्याकुट्ट अंधारात मिणमिणता का होईना पण दुसऱ्याच्या घरात एक दिवा लावणे म्हणजे भरभराट.... सर्वकाही संपलेलं असतानासुद्धा उठून उभं राहण्याची इच्छा मनात बाळगणे म्हणजे भरभराट… पाय नसतानाही आकाशात भरारी घ्यायचं वेड मनात बाळगणं म्हणजे भरभराट...


चार वर्ष मी या कुटुंबासोबत आहे...


स्वतःचा विकास करत असताना,या सर्व प्रवासात तीने रस्त्यावरच्या आणखी एका व्यक्तीला हात दिला होता.... याचंच मला जास्त अप्रूप  !


दिवसेंदिवस ती उन्नती करत होती... रस्त्यावर व्यवसाय करताना तिला अनंत अडचणी सुद्धा येत होत्या परंतु त्यातून ती मार्ग काढत होती... 


फुंकर मारल्याने दिवा विझतो..... अगरबत्ती नाही....!

जो दुसऱ्याला सुगंध  देतो तो कसा विझेल....?


रस्त्यावरची निराधार भिक्षेकरी ते आताची सक्षम कष्टकरी असा हा तिचा प्रवास.... मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे.... नव्हे अनुभवलाय....


स्वतःला भूक लागते तेव्हा खाणं म्हणजे प्रकृती, दुसऱ्याचं ओढून घेऊन खाणं म्हणजे विकृती, पण स्वतःला भूक लागलेली असताना,आपल्या घासातला घास काढून दुसऱ्याला देणं ही झाली संस्कृती....!


ती शिकली नाही,तीची भाषा ओबड-धोबड आहे....पण तरीही माझ्यासाठी ती सुसंस्कृतच आहे...! 


या दिवाळीत तिने मला पुन्हा शिव्या देऊन भाऊबीजेला घरी बोलावलं....


भाऊबीजेच्या दिवशी तीने फुटपाथवर तीच्या घरासमोर रस्त्यावरच एक चटई अंथरली.... तिथे तिने मला साग्रसंगीत ओवाळले...मी तिला ओवाळणी दिली.


तीने मला पेढा भरवला आणि पेढ्याचा बॉक्स माझ्या हाती दिला.... पेढ्याचा बॉक्स वरच भागवते म्हातारे... मला वाटलं जेवायला बोलवशील...', मी हसत  म्हणालो.


'म्हातारी म्हणू नगो ' तिरक्या डोळ्यानं माझ्याकडे बघत,हातातलं ताट ठेवता ठेवता ती गुरगुरली. 


'बघितलं तर म्हातारी आणि मला म्हणते ताई म्हण...' मुद्दाम मी तिला उचकवलं .... आता पुढं काय होणार हे मला  माहित होतं...


'म्हातारी कुणाला म्हणतो रे मुडद्या... ' म्हणत तीने पायातली चप्पल काढून माझी ओवाळणी केली होती....

एका भावाला प्रेमळ बहिणीच्या या मायेच्या चपलीपेक्षा आणखी जास्त काय हवं ....?


माझ्या आईच्या वयाची ती बाई,आता तिचा आशीर्वाद घ्यावा आणि निघावं म्हणून उठलो. 


तिच्या पाया पडत म्हणालो,'तुला म्हातारे म्हटलेलं आवडत नाही,तुला मी ताई म्हणावं अशी तुझी इच्छा आहे....परंतु खरं सांगू का ताई पेक्षा तुला मी आई म्हणणं जास्त योग्य आहे....!' तीच्या भावूक झालेल्या चेहऱ्यावर आता प्रश्नचिन्ह होतं...


तीला म्हणालो,'अगं तू स्वतः अपंग, त्यात तू स्वतः रस्त्यावर राहत होतीस,मात्र जेव्हा स्वतः सावरलीस

,तेव्हा तू एका अपंग माणसाला वर्षभर सांभाळलंस हे सारं काही एक आईच करू शकते ना ....


आता तीच्या डोळ्यात पाणी होतं.... ती म्हणाली,'पाय नसत्यात तवा त्याचं दुःख काय आस्त हे मला म्हाईत हाय,रस्त्यावर कुत्र्यावानी निराधार म्हणून उनात पावसात पडणं म्हंजी काय आस्तंय हे सुदा मला म्हाईत हाय,मला तू आदार देऊन पायावर हुबी केलीस .... डोक्यावर छत टाकलस .... पोटातली भूक भागवलीस....  तू माजा कुनीही नसताना माज्या साटी तू हे केलंस... मी तुजी आई नसताना तू माजा पोरगा झालास....


म्हणलं,चला बीन बाळंतपनाचं या वयात आपल्याला बी पोरगं झालंय.... तर संबळु या अपंग  पोराला.... आपुन बी या वयात आई हुन बगु.... मी आय झाले आन ह्यो बाप......'  तीने नवऱ्याकडे  बोट दाखवत म्हटले....!


आता डोळ्यात पाणी माझ्या होतं....!

म्हटलं, 'म्हातारे तू लय मोटी झालीस.... '


यावेळी "म्हातारी" म्हटल्यावर ती चिडली नाही, उलट गालातल्या गालात हसली.... 


हसत ती झोपडीत गेली आणि चार-पाच बोचकी उचकटली... त्यातून एक शर्ट काढला .... एक साडी घेतली आणि मला म्हणाली, 'दिवाळीला ह्यो शर्ट घालशील का ? तू घिवून जा,नाय बसला तर सांग मला आणि मनीषाला ही साडी पन दे... तीला म्हणावं साडीतच ब्लाउज पीस पन हाय....' 


हा "भरजरी पोशाख" मी घेतला.... 


गाडीला किक मारली आणि तीला हात जोडून मनोमन नमस्कार करत म्हणालो,'जातो मी माई...'


ती म्हणाली,' ए मुडद्या,जातो म्हणू न्हायी.... येतो म्हणावं.... आनी हो.... माई आणि ताई म्हणायची थेरं करू नगोस, मला आपली म्हातारीच म्हन....मी तुजी म्हातारीच हाय....! मी माझ्या या म्हातारीला मनोमन नमस्कार करून शर्ट आणि साडी घेऊन निघालो.... 


आज जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मी होतो..! 


डाॕ.अभिजीत सोनवणे,भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर

डाॕक्टर फाॕर बेगर्स,१३ नोव्हेंबर २०२१