* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२०/११/२४

स्वातंत्र्योत्तर विकासनीती / Post-Independence Development Policy


स्वातंत्र्य मिळाले.विकासाची दिशा काय असावी याची चर्चा सुरू झाली.सोव्हिएट रशियाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून नियोजनबद्ध औद्योगिक विकासाची कास धरावी अशी जवाहरलाल नेहरूंची भूमिका होती.ह्या साऱ्या प्रक्रियेत महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्याच्या,आजूबाजूच्या निसर्गाशी संतुलन सांभाळणाऱ्या, स्वयंपूर्ण शेतीप्रधान समाजाच्या कल्पना बाजूला सारल्या गेल्या.मानवाने आपल्या गरजा अवास्तव भडकू देऊ नयेत,निसर्गाचे दोहन काळजीपूर्वक करावे,हे महात्मा गांर्धीचे जीवनविषयक तत्त्वज्ञानही अमान्य करण्यात आले. १९४९ साली आरंभी ह्या प्रक्रियेत महात्मा गांधींचे सहकारी अर्थतज्ज्ञ जे सी कुमारप्पा ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते.


पहिल्या बैठकीसाठी ते एका टांग्यात बसून सभास्थानी पोचले. इथे फक्त मोटार गाड्या सोडतो,टांग्यांना प्रवेश नाही म्हणून खाली उतरवण्यात आले.ते नेहरूंना म्हणाले,हे काय चालले आहे? नक्कीच ह्या देशात बैलगाड्या, टांग्यांना रस्ते वापरण्याचा मोटार गाड्यांइतकाच अधिकार नाही का? नेहरू उत्तरले,आहे हो,पण मोटारगाड्यांपासून अपघात होण्याचा धोका आहे, म्हणून कुठे कुठे बैलगाड्या,टांग्यांवर निर्बंध आणावे लागतात.कुमारप्पा उत्तरले,जर मोटार गाड्या हे खतरनाक वाहन असेल,तर त्यांच्यावर निर्बंध आणावे, ज्यांना धोक्यात पाडले जाते त्या बैलगाड्या,टांग्यांवर नाही.कुमारप्पांचा गांधींसारखा विज्ञान - तंत्रज्ञान यांत्रिकीकरणाला विरोध नव्हता. परंतु,त्यांचे म्हणणे होते की,भारतात भांडवलही मुबलक नाही,आणि लोकसंख्येच्या मानाने नैसर्गिक संसाधनेही तुटपुंजी आहेत.तेव्हा आपल्या विकासाचा भर आपली मुबलक मानवी संसाधने काळजीपूर्वक वापरण्यावर असावा.ह्यासाठी आपल्या जनसंपत्तीला विकासनीतीचा केन्द्रबिंदू बनवावे.त्यांचा आधार असलेली स्थानिक नैसर्गिक संसाधने कार्यक्षमतेने वापरत त्यांना समाधानकारक रोजगार निर्माण करणारा आर्थिक विकास हाच खरा अहिंसक आर्थिक विकास ठरेल.त्या दिशेने स्वतंत्र भारतात काहीतरी नावीन्यपूर्ण करून दाखवावे.पण त्यांची भूमिका पूर्णपणे नाकारली गेली, आणि अखेर कुमारप्पा नियोजन प्रक्रियेतून बाहेर पडले.


हे साहजिक होते,कारण कुमारप्पांनी सुचविलेल्या दिशेने जाण्यात देशातील प्रभावी आर्थिक हितसंबंधांना काहीच लाभांश नव्हता.

त्या जागी तथाकथित समाजवादी समाजरचनेतून झपाट्याने औद्योगिक प्रगतिपथावर वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरू झाला.

पण ह्या समाजवादात खऱ्याखुऱ्या सामाजिक,आर्थिक समतेचा पाठपुरावा करण्याचा इरादा बिलकूलच नव्हता.ह्या बेगडी समाजवादाचा अर्थ होता,लोकांच्या पैशाने, लोकांच्या जमिनी बळकावून,लोकांना निसर्गापासून आणखीनच दूर ढकलून ही सारी संसाधने सत्तेवर आता कब्जा केलेल्या वर्गांना अगदी स्वस्तात उपलब्ध करून देणे.कुमारप्पांच्या भाषेत हिंसक अर्थव्यवस्थेची घडी बसवणे.यातून नैसर्गिक संसाधनांच्या वापराची जी एक पद्धत बसवली गेली तिला राज्यशास्त्रात नाव दिले आहे,आयर्न ट्रायँगल.आपण मराठीत म्हणू शकू दुष्ट त्रिकूट.ह्या त्रिकूटाचे तीन घटक आहेत :पहिले म्हणजे लाभ लुटणारे : उद्योगपती,सधन शेतकरी,आणि संघटित क्षेत्रातील नोकरदार;दुसरे म्हणजे ह्या सर्व व्यवस्थेबद्दल निर्णय घेणारे राजकारणी,आणि तिसरे म्हणजे ही व्यवस्था अंमलात आणणारी नोकरशाही.ह्यांच्या हातमिळवणीतून नैसर्गिक संसाधने सत्ताधारी वर्गाच्या वेगवेगळ्या घटकांना प्रचंड सवलती देऊन पुरवण्याची व्यवस्था केली गेली.ह्या गैरव्यवस्थेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे निसर्गसंपत्तीची नासाडी.ह्याचे दुष्परिणाम शेवटी सगळ्यांनाच भोगावे लागणार,पण सत्ताधारी वर्ग बऱ्याच प्रमाणात आपला बचाव करून घेतात.दुष्परिणाम ताबडतोब भोगायला लागतात बहुजनांना;ग्रामीण भागातील भूमिहीनांना व अल्पभूधारकांना,मच्छिमारांना,पशुपालकांना,

बुरुडकाम करणाऱ्यांना,आदिवासींना व यातूनच उठून शहरांत येऊन झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या जनतेला.


ह्या त्रिकूटाच्या कार्यनीतीचे एक उदाहरण आहे पुण्याजवळच्या मुळशी खोऱ्याच्या दक्षिणेच्या अंबी खोऱ्यातल्या पानशेत धरणाची कहाणी.स्वातंत्र्यानंतर शहरांना,शेतीला पाणी पुरवण्यासाठी,

वीजनिर्मितीसाठी धरणे बांधण्याचा सपाटा सुरू झाला.या धरणांना पंडित नेहरूंनी आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे मानले.ही देवळे बांधली जात होती - डोंगराळ,वृक्षाच्छादित प्रदेशात.या धरणांच्या निमित्ताने तेथे पहिले रस्ते बांधले गेले. अशातले हे पानशेत धरण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणारे भरपूर पावसाचे पाणी गोळा करून पुणे शहराला व शहराच्या पूर्वेला पर्जन्यछायेच्या प्रदेशात उसाच्या मळेवाल्यांना,सहकारी साखर कारखाने पळवणाऱ्या राजकारण्यांना पुरवते.त्याअगोदर पानशेत धरणात बुडालेल्या अंबी खोऱ्यात आणि त्याचे पाणलोट क्षेत्र असलेल्या डोंगर उतारांवर स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या.

नदीच्या चिंचोळ्या खोऱ्यात ते भातशेती करायचे,आणि डोंगर उतारावर फिरती शेती.दोन-तीन वर्षे नाचणी,सावा,तीळ पिकवून मग दहा-पंधरा वर्षे पडीत टाकायची अशी पद्धत होती.पण शेती करताना ते आंबा,हिरडा सांभाळून ठेवायचे. डोंगराच्या अगदी वरच्या चढांवर सरकारी राखीव जंगल होते.ज्यांची जमीन बुडली,त्यांचे पुनर्वसन पूर्वेच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात होणार होते.धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली.रस्ते झाले,गाड्या फिरू लागल्या आणि आतापर्यंत कधीही जास्त रोख पैसा न पाहिलेल्या शेतकऱ्यांना एक नवे जग सामोरे आले. १९५५-६० च्या दरम्यान पुण्यात लाकडी कोळशाला प्रचंड मागणी होती.हे वखारवाले,धरण बांधणारे इंजिनिअर,वनविभागाचे कर्मचारी एकदिलाने अंबी खोऱ्यातली वनसंपत्ती लुटायला तुटून पडले.धरण पुरे झाल्या- झाल्या १९७१ साली मी त्या भागात अनेक दिवस गावा-गावांत मुक्काम केला,लोकांशी बोललो. तोवर काही देवराया सोडल्या तर सारे डोंगर उघडे बोडके झाले होते.लोक सांगायचे की धरणाचे इंजिनिअर वखारवाल्यांबरोबर गावोगाव फिरले.तुम्ही आता हालणारच असे लोकांना सांगत पिढ्यान् पिढ्या जतन केलेली हिरडाआंब्याची मोठ-मोठी झाडे विकायला प्रोत्साहन देत.एक एक झाड आठ आण्याला अशा दरांनी विकून त्यांचा कोळसा केला गेला.वरच्या राखीव जंगलातही,लोकांच्या सांगण्याप्रमाणे प्रचंड भ्रष्टाचार होऊन जंगल साफ झाले.शेवटी विस्थापितांचे नीट पुनर्वसन झालेच नाही.त्यातले बहुतांश लोक आता उघड्या- बोडक्या झालेल्या,माती धुपून गेलेल्या डोंगरांवर सरकून उपजीविका करत आहेत.एकसष्ट साली घाईघाईने पाणी साठवल्यावर एकदा फुटून पुण्याचे भरपूर नुकसान केलेल्या ह्या धरणातून भरपूर सवलतीने पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा उपभोग पुण्याचे उद्योग,संघटित क्षेत्रातील नोकरदार,पुण्याच्या पूर्वेच्या मुलखातील सधन शेतकरी घेत आहेत.अर्थात याचे फायदे लुटणाऱ्या वर्गातून आजचे शासकीय अधिकारी, राजकीय पुढारी आले आहेत.आणखी अशाच अनेक प्रकल्पांना राबवत आहेत.ह्या सगळ्यांनी पाण्याबरोबरच स्वस्त लाकडी कोळसा आपल्या चुलीत जाळला.त्या व्यापारात आपले खिसे भरून घेतले.ह्यातून स्थानिक लोकांचे तर नुकसान झालेच,पण वन संपत्तीची, जल संपत्तीची प्रचंड हानी झाली.


डोंगर उतारांवर मातीची मोठी धूप होऊन धरण झपाट्याने गाळाने भरले.


ह्या पानशेतच्या धरणफुटीचा किस्साही बघण्याजोगा आहे.हे धरण फुटले तेव्हा मी पण पुण्यात होतो. काहीही पूर्वसूचनेशिवाय पुण्यात पोचलेला ह्या धरणातल्या पाण्याचा लोंढा पाहिला होता.

ह्या लोंढ्याने अधिकृत आकड्यांप्रमाणे निदान एकोणतीस जण मृत्यू पावले,सव्वीस हजार कुटुंबांचे सामानसुमान वाहून गेले,

छत्तीसशे दुकानांतील मालाची नासधूस झाली, बेचाळीस हजार पोती धान्य कुजून गेले.सर्वांना माहिती होते की पानशेतच्या धरणाला धोका होता.एकसष्ट सालच्या बारा जुलैला उजाडता-उजाडता धरणाला भगदाड पडले.हा पाण्याचा लोंढा पुण्यात पोचायला अडीच-तीन तास लागले.मग दुपारी खडकवासल्याचेही धरण फुटले;लोंढा आणखीच वाढला.आता पानशेतच्या, खडकवासल्याच्या इंजिनिअरांजवळ टेलिफोन होता, लष्कराच्या लोकांपाशी बिनतारी संदेश देण्याचीही सुविधा होती.तरी लोकांना ह्या दोनही धरणफुटीची धोक्याची सूचना कशी दिली गेली नाही? तेव्हाही गूढ होते.मी अलीकडे माझ्या चांगल्या परिवयाच्या, हा प्रसंग अनुभवलेल्या मुरब्बी अधिकाऱ्यांशी, इंजिनिअरांशी बोललो.कुणापाशीच काही उत्तर नाही.


मला वाटते याचे उत्तर पंचवीसशे वर्षांपूर्वीच दिले गेले आहे - ताओ-ते-चिंग ह्या राज्यकर्त्यास मार्गदर्शन करणाऱ्या चिनी ग्रंथात : सत्ताधीशा याचि मार्गे तु जावे । जनांना न काही कधी जाणु द्यावे ।। सुजाण प्रजा पार उधळे नि बाधे। अजाण प्रजा हाकणे काम साधे ।। म्हणोनी सदा वास्तवा छपवावे । खोटेपणाने नटावे, थटावे ।। जगभर आजपावेतो सगळेच राज्यकर्ते आपापल्या परीने ह्या उपदेशाचे पालन करताहेत. आपल्याकडून प्रजेला अंधारात ठेवून, खोटी नाटी आश्वासने देत,गलथानपणा,भ्रष्टाचार पचवताहेत.


पाश्चात्त्यांच्या परिसर चळवळी


मध्ययुगीन युरोपावर एकीकडून नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर,त्यातून झालेला वनांचा,वन्य जीवांचा विध्वंस,तर दुसरीकडून प्लेगच्या भीषण साथी आणि वाढती थंडी अशी संकटे येत असताना विज्ञान आणि विज्ञानाधारित तंत्रज्ञानाच्या बळावर त्यांनी जगावर घट्ट पकड बसवली.अमेरिका - ऑस्ट्रेलियात मूलवासीयांना खच्ची करून नवयुरोप वसवले.तिथली मुबलक सुपीक जमीन,वन व खनिज संपत्ती आपल्या काबूत आणली, ती आफ्रिकेतील गुलामांच्या श्रमांवर वाढवली.पण जोडीला युरोपाच्या परिसराचा नाश रोखून तो पुनश्च सुस्थितीत आणण्यास सुरुवात केली. 


स्वित्झर्लंडसारख्या डोंगराळ देशात १८६० पर्यंत जंगल जवळजवळ पूर्ण नष्ट झाले होते.यामुळे प्रचंड दरडी कोसळून हाहाकार होऊ लागला,तेव्हा लोकजागृती होऊन त्यांनी पुनश्च अरण्य वाढवायला सुरुवात केली. आज स्वित्झर्लंडची वनश्री विशेष सुस्थितीत आहे.पण ही संपूर्णतः गावसमाजांच्या मालकीची आहे.सरकारी वनखात्याच्या नाही.


अमेरिकेत गोऱ्या लोकांनी प्रथम पाऊल ठेवले,तेव्हा तेथे सायबेरियातून आलेले रेड इंडियन मूलवासी निदान दहा हजार वर्षे राहात होते.त्यांची मोठ-मोठी माया-इन्कांसारखी राज्ये होती.

साहित्य,कला,संस्कृती होती.याच्या जोडीलाच वन्य पशुपक्ष्यांचे वैपुल्य होते.अनेक निसर्गरम्य स्थळे त्यांनी सांस्कृतिक-धार्मिक श्रद्धेतून जतन करून ठेवली होती.गोऱ्यांनी बंदुकीच्या बळावर या साऱ्या संस्कृतीचा,समाजाचा,जीवसृष्टीचा नायनाट केला.माया समाजातील विद्वानांचे पुस्तक न् पुस्तक हुडकून नष्ट केले,हरेक पंडिताची हत्या केली.तसेच उत्तर अमेरिकेतील कुरणांवर बागडणारे लक्षावधी बायसन-गोवंशातील पशू नष्टप्राय केले. ह्या बायसनची बेफाम शिकार करताना इतके मांस मिळायचे की त्यातली सर्वात स्वादिष्ट म्हणून केवळ जीभ खाऊन बाकीचे कलेवर तसेच कुजत टाकून दिले जायचे.हे निसर्ग व मानवी जीवनाच्या विनाशाचे युगकर्म पूर्ण होत आल्यावर,संपूर्ण अमेरिकी खंडावर गोऱ्यांची वस्ती पसरल्यावर,म्हणजेच आरंभानंतर तब्बल अडीच-तीनशे वर्षांनी अमेरिकी वसाहतवद्यांना निसर्ग रक्षणाच्या कल्पना सुचायला लागल्या.त्यातून यलोस्टोनसारखी राष्ट्रीय उद्याने निर्माण झाली.ही राष्ट्रीय उद्याने पाश्चात्त्य जगतातल्या परिसर चळवळींतले एक महत्त्वाचे पाऊल मानली जातात.यलोस्टोन राष्ट्रीय उद्यान हे मूळ रेड इन्डियनांनी जतन केलेले निसर्गरम्य स्थळ होते. जेव्हा ते राष्ट्रीय उद्यान बनवले,तेव्हा तिथल्या जिवंत राहिलेल्या उरल्यासुरल्या मूलवासीयांना हाकलून देऊन ते गोऱ्या हौशी पर्यटकांच्या मनोरंजनाचे स्थळ बनवण्याची त्यांची इच्छा होती.तेव्हा त्यांनी मांडणी केली की राष्ट्रीय उद्यानात मानवाचा हस्तक्षेप मुळीच नको.मूलवासी रेड इन्डियनांच्या शतकानुशतकांच्या हस्तक्षेपातूनच यलोस्टोन समूर्त झाले होते हे सोईस्करपणे डोळ्याआड करून.ही अगदी चुकीची चौकट भारतातील आपल्या लोकांना शत्रू ठरवणाऱ्या वनविभागाच्या शासनाने व त्यांच्याबरोबर वन्यजीव संरक्षणाच्या कामात सहभागी झालेल्या राजे-महाराजांनीही स्वीकारली.इंग्लंड- अमेरिकेकडे डोळे लावून बसलेल्या भारतीय सुशिक्षित,शहरी, मध्यमवर्गानही हाच आदर्श मानला.हे आहे भारतात आज प्रभावी असलेल्या लोकविन्मुख पर्यावरणवादाचे मूळ.युरोपीयांची,व नव्याने विज्ञान व विज्ञानाधारित तंत्रज्ञान आत्मसात करून घेतलेल्या जपान सारख्या देशांतील आशिया आफ्रिकेचे शोषण कोणी,किती करायचे ह्या स्पर्धेतून पहिली व दुसरी महायुद्धे झाली. ह्यातल्या दुसऱ्या महायुद्धात आशियाच्या घनदाट,दमट जंगलात लढताना हिवतापाशी आणि विषमज्वराशी मुकाबला करण्यासाठी डी डी टी हे कीटकनाशक फारच प्रभावी आहे,हे १९३९ साली पॉल म्युलर ह्या स्विस रसायनशास्त्रज्ञाने दाखवून दिले.त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला,आणि ह्या शोधाबद्दल म्युलरला १९४८ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला.दुसऱ्या महायुद्धानंतर शेतीसाठीही उपयुक्त असे एक कीटकनाशक म्हणून डी डी टीचा जगभर वापर होऊ लागला.पण डी डी टी हे फार चिवट रसायन आहे.ते पर्यावरणात खूप काळ टिकून राहते. त्याने प्रभावित किडे खाल्लेल्या पक्ष्यांच्या शरीरात साठत राहते.ह्याचे एकूणच जीवसृष्टीवर खूप दुष्परिणाम होतात. हे लक्षात येऊन राशेल कार्सन ह्या जीवशास्त्रज्ञाने 'सायलन्ट स्प्रिन्ग' अथवा पक्ष्यांचा गळा आवळलेला वसंत ऋतू ह्या नावाचे सुप्रसिद्ध पुस्तक लिहिले.ह्या पुस्तकामुळे पाश्चात्त्य जगतात पर्यावरणाच्या समस्यांबद्दल लोकांच्यात खूप जाणीव निर्माण झाली व ह्या जाणिवेतून १९७२ साली डी डी टी वर बंदी आणण्यात आली, दुसरेही अनेक कायदे करण्यात आले.अगदी ह्याच कालावधीत १९५५ ते १९७५ अशी तब्बल वीस वर्षे आशियावर पाश्चात्त्यांची पकड ठेवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून व्हिएटनामचे युद्ध झाले.एका बाजूने अमेरिकेत जीवसृष्टीला धोकादायक अशा रसायनांविरोधी पावले उचलली जात होती,तर दुसरीकडे व्हिएटनामच्या युद्धात व्हिएटनामच्या घनदाट वर्षावनांवर पानगळ करणाऱ्या रसायनांचे फवारे उडवले जात होते.म्हणजे मग ह्या निष्पर्ण,सुकू लागलेल्या,जगातल्या जैवविविधतेचे एक सर्वात महत्त्वाचे साठे आटू लागलेल्या,जंगलाच्या मुलखात व्हिएटकाँगचे सैन्य लवकर नजरेस येईल. (वारुळ पुराण,माधव गाडगीळ,

ई.ओ.विल्सन,संक्षिप्त अनुवाद नंदा खरे,मनोविकास प्रकाशन,)


व्हिएटनाममधले जैविक युद्ध लपून छपून चालले होते, आणि हार्वर्डचे एक वनस्पतिशास्त्रज्ञ अमेरिकी सैन्याबरोबर जैविक युद्धासाठी चुपचाप संशोधन करत होते.हार्वर्डचे बहुतांश विद्यार्थी युद्धाच्या विरोधात होते. त्यांच्यातल्या चळवळ्यांनी हे उपद्व्याप उघड्यावर आणून हार्वर्डच्या बेगडी उदारमतवादावर टीकेची झोड उठवली होती.आणि विल्सन ? एका बाजूने ते साऱ्या जैवविविधतेला जपा म्हणून जोरात प्रतिपादन करत होते,तर दुसऱ्या बाजूने ते अमेरिकेच्या आक्रमणाचे समर्थक होते.

अमेरिकेतल्या डी डी टी वरच्या बंदीचे उदाहरण वापरत अनेकदा आर्थिक समृद्धी आणि पर्यावरणाची जपणूक ह्यांबद्दल एक समीकरण मांडले जाते.जशी अमेरिकेची आर्थिक भरभराट झाली,तशी तिथे पर्यावरणाची जपणूक सुरू झाली.भारतासारख्या देशातही भरपूर आर्थिक विकास झाला की यथाकाल पर्यावरणाची जपणूक सुरू होईल.तोवर पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत आर्थिक विकास साधणे श्रेयस्कर आहे अशी ही विचारसरणी आहे.पण हे विवेचन अमेरिकेचा प्रभाव सर्व जगभर आहे हा महत्त्वाचा मुद्दा सोईस्करपणे डोळ्याआड करत आहे.


कदाचित अमेरिका आपल्या परिसरातले पर्यावरण जपत असेल, पण ह्या आर्थिक भरभराटीनंतरही तो देश बेमुर्वतखोरपणे जगात इतरत्र पर्यावरणाचा विध्वंस करत आहे.अगदी ह्या शतकातही इराकवर तिथल्या तेल साठ्यांवरची आपली पकड कायम ठेवण्यासाठी खोटा-नाटा प्रचार करत युद्ध लादले.त्या युद्धात तेल जळून,समुद्रात पसरून पर्यावरणाची जबरदस्त नासाडी केली. तेव्हा आर्थिक समृद्धी आणि पर्यावरणाची जपणूक ह्या दोहोंत काहीही साधे समीकरण मांडणे फसवे आहे.

१८/११/२४

महत्व मतदानाचं,आवाहन याचकांचं/Importance of voting,Appeal of petitioner...!!!

दावणीला बांधलेला बैल,जवा दावं तोडून,वारं भरल्यागत,गावातनं मोकाट पळत सुटतो,त्यावेळी शंभर जणांना धडका देत तो विध्वंसच घडवतो... ! या बैलाला वेळीच आवर घातला... चुचकारत योग्य दिशा दाखवली... चारापाणी घातला ... याच्याशी प्रेमाने वागलं... की आपण म्हणू ते काम तो चुटकीसरशी करतो..! 


मग ती शेतातली नांगरणी असो,पाणी शेंदणं असो, बैलगाडीला जुंपून घेणं असो किंवा आणखी काही... ! 


पाण्याचंही तसंच... 


कशाही वाहणाऱ्या पाण्याला प्रेमानं थोपवून धरलं; की ह्येच पाणी भिंती आड गप गुमान धरण म्हणून हुबं ऱ्हातंय... प्रेमानं चुचकारून पायपात घातलं की घरात नळ म्हणून वाहतंय... पात्यावर गरागरा फिरून वीज बी तयार करतंय... 


अय बाळा... आरं हिकडं बग... आरं तकडं न्हवं ल्येकरा ... हिकडं बग... हिकडं रं... हांग आशी ... फलीकडल्या गल्लीत आपली साळू आजी ऱ्हाती... तिला कोनच  न्हाय रं... आत्ताच मका पेरलाय तिनं... अर्ध्या गुंट्याचं वावार हाय तिचं.... एक चक्कर मारून जरा मक्याची तहान भागवून यी की...इतक्या प्रेमाने पाण्याला सांगितल्यावर,हेच पाणी झुळू झुळू वाहत,शिट्टी वाजवत,मंग त्या मक्याला भेटायला जातंय... बोळक्या तोंडाची साळु आजी तोंडाला पदर लावून मंग आशीं हासती... अन डोळ्यात आस्तंय पाणी... हो पुन्हा पाणीच... ! 


अस्ताव्यस्त वाहणाऱ्या या पाण्याला मात्र दिशा दाखवून,त्याचा योग्य वापर करून घेतला नाही;तर पूर ठरलेला... विध्वंस हा ठरलेलाच आहे... ! 


सांगायचा मुद्दा हा की मस्तावलेला बैल असो किंवा अस्ताव्यस्त वाहणारं पाणी...! त्यांना आवरून - सावरून योग्य दिशा दाखवून, त्यांच्यातल्या जबरदस्त ताकदीचा उपयोग करून घेता यायला हवा... ! 


आमचा भिक्षेकरी - याचक समाज.... याचीही ताकद खूप जबरदस्त आहे... !


या सर्वांनी जर एकत्र येऊन ठरवलं... तर उभा डोंगर,ते आडवा करतील...!


बुलडोझर ला सुध्दा जे काम दोन दिवसांत जमणार नाही,ते काम हे लोक एकत्र आले तर दोन तासात करतील... ! गेल्या दहा वर्षापासून मी आणि मनीषा यांच्या या जबरदस्त ताकतीचा उपयोग विधायक कामांसाठी करुन घेत आहोत.... ! 


यांच्या ताकदीचा उपयोग;आम्ही यांच्याच विकासासाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी करण्याचा प्रयत्न करत आहोत... ! 


पुण्यातील सार्वजनिक भाग,भीक मागणाऱ्या आज्या / मावश्या यांच्या टीममार्फत (खराटा पलटण - Community Cleanliness Team)  स्वच्छ करून घेणे असो की,


वैद्यकीय दृष्टीने फिट असणाऱ्या भिक्षेकर्यांकडून रक्तदान करून घेणे असो.... 


जे काही करतो आहोत;ते समाजानं यांना दिलेलं दान काही अंशी फेडण्यासाठी...


अर्थात् याचं श्रेय माझं किंवा डॉ.मनीषाचं नाही...  एकट्या दुकट्याचं कामच नव्हे हे... आपण सर्व साथीला आहात म्हणून हे शक्य होत आहे. 


'It's not "Me"... It's "We"...!!!'


तर,दान या शब्दावरून आठवलं,सध्या मतदानाचं वारं वाहत आहे... ! ज्यांना मतदानाचे अधिकार आहेत,असे अनेक सुजाण नागरिक मतदान करतच आहेत,मात्र काही लोक; मतदानादिवशी ऑफिसला / कामावर दिलेली सुट्टी हि vacation समजून,मतदान न करता फिरायला जातात. 


काही लोक जरा गर्दी कमी हुदे... थोडं ऊन कमी होऊ दे... म्हणत म्हणत मतदान करायचंच विसरून जातात...! 


अशा लोकांचं प्रबोधन कसे करता येईल ? असा विचार मनात आला आणि मला माझ्या मागे उभ्या असलेल्या ताकदीची आठवण झाली....! 


तर,आज शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी आम्ही पुण्यातील वर्दळीच्या ठिकाणी आमच्या किमान १०० याचकांना एकत्र केलं आणि "चला आपण सर्वजण मतदान करूया"अशा अर्थाचे  हातात बोर्ड दिले .... ! 


भिक्षेकर्‍यांना आम्ही रस्त्यात आणि चौका - चौकात हे बोर्ड घेऊन उभं केलं... आम्हाला जमेल त्या पद्धतीने आम्ही मतदानाचं महत्त्व आणि मतदान करण्याची विनंती समाजाला केली...  ! 


सांगतंय कोण... ? अडाणी भिक्षेकरी... ! 


ऐकणार का ... ? सुशिक्षित गावकरी... ?? 


असो; आम्ही प्रयत्न करतोय... बैलाला आवरण्याचा आणि पाण्याला सावरण्याचा.... ! 


यात अंध अपंग वृद्ध याचक या सर्वांनी सहभाग घेतला... मी या सर्वांचा ऋणी आहे !!!


मला माहित आहे,आमच्या या उपक्रमामुळे एका रात्रीत फार काही दिवे पेटणार नाहीत...पण एखादी पणती लावायला काय हरकत आहे ? 


बघू... जे सुचेल ते आपल्या सर्वांच्या साथीने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतोय...


शेवटी एक माहीत आहे... 


कोशिश करने वालों की हार नही होती... !!!


शुक्रवार दिनांक १५  नोव्हेंबर २०२४


ऑक्टोबर महिन्याचा लेखाजोखा..


सर्वप्रथम आपणास दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा !!


या महिन्यात घटस्थापना,दसरा,कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी यासारख्या सणांची रेलचेल होती... ! 


या महिन्यात ज्या घटना घडल्या;त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा आणखी एक वेगळा दृष्टिकोन निर्माण झाला...! 


वाघ आणि हरिण दोघेही जीव खाऊन पळत असतात... एक भूक भागवण्यासाठी आणि दुसरा जीव वाचवण्यासाठी...!!! 


हातात पैसा नसतो,तेव्हा पोटात दुखते;कारण भूक सहन होत नाही.... खूप पैसा असतो,तेव्हाही पोटात दुखते; कारण अपचन सहन होत नाही... 


पैसा नसताना वणवण फिरावे लागते अन्न मिळवण्यासाठी...  पैसा असतानाही वणवण फिरावे लागते... अन्न जिरवण्यासाठी ...  


बीज उगवताना आवाज येत नाही... झाड मोडले तर मात्र प्रचंड आवाज होतो...


आवाज विनाशाला असतो,निर्मितीला नाही...!!! 


किती विरोधाभास आहे .... ! 


जगण्यातले विरोधाभास,जगणं शिकवून जातात...! 


पुनर्वसन- फुटपाथ वर पडून असलेली एक ताई...  थोड्यावेळात ती जाणार,हे गृहीत धरून तिच्या घरातल्या लोकांनी बाकीची सर्व तयारी सुरू केली होती... अक्षरशः तिरडी सुद्धा मागवली होती...! 


मी सहज पाहिलं,हि तिरडी म्हणजे अर्धी कापलेली शिडी होती... मधले एक दोन बांबू फक्त निखळले होते... गंमत काय,की शिडी उभी ठेवली तर तीला "शिडी" म्हणतात; त्यावरून वर चढता येते... हिच बांबू निखळलेली शिडी जर आडवी ठेवली तर तिला "तिरडी" म्हणतात...त्यावरून सुद्धा वर जाता येते,पण कायमचे ... 


पुन्हा विरोधाभास !!! 


जाणाऱ्या या ताईला ऍडमिट केले,ती बरी झाली... अगदी खरं सांगायचं तर;ती जगली यावर माझा सुद्धा विश्वास बसेना....! यानंतर तिच्या इच्छेनुसार,तीला खेळणी विकायचा व्यवसाय सुरू करून दिला...! 


काँग्रेस भवन पुणे येथे ती खेळणे विकते...!


ती तर जगलीच परंतु आता कुटुंबाला जगवते आहे !  


असाच दुसरा माणूस...रस्त्यावर पडून होता, यालाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.... पूर्णतः बरा झाला.... आता याला हात गाडी देऊन अनेक वस्तू विक्री करण्यासाठी दिल्या आहेत. 


येरवडा येथे याने व्यवसाय सुरू केला आहे. 


याच्या घरात सर्व लोक आहेत तरीही काही ना काही परिस्थितीमुळे याला घरातल्या लोकांनी दूर लोटले आहे...! एकदा मी त्याला छेडले,त्याला म्हणालो,घरातल्यांची आठवण येत नाही का रे तुला? तुला त्यांनी भेटायला यावं असं तुला वाटत नाही का ? तू त्यांची वाट कधी बघत असतोस  की नाही ?' 


तो माझ्याकडे पहात हसत म्हणाला, सर वाट हरवलेल्या लोकांची पहायची असते....  ज्यांनी स्वतःहून वाटच बदललेली आहे... त्यांची वाट कशी पहायची ?'चुकून दरवाजा बंद झाला असेल तर तो उघडता तरी येतो... आतल्या माणसाने आपल्यासाठी तो कायमचा बंदच करून ठेवला असेल तर तो दरवाजा कसा उघडावा ? 


आणि उघडला तरी उपयोग काय ? जबरदस्तीच्या नात्यात पूर्वीसारखा गोडवा थोडाच राहणार आहे..??? 


अंगावर शहारे आले माझ्या,हे ऐकून .. !


माझ्याशी बोलल्यानंतर चेहरा तिकडे करून तो डोळे पुसत होता... 


मी त्याला हळुवारपणे म्हणालो काय झालं रे ? 


तो म्हणाला, काही नाही सर डोळ्यात काहीतरी गेले वाटतं.... !' हं... खरंच आहे बाळा .. सध्या प्रदूषण खूप वाढलं आहे ....हवेत आणि नात्यातही... ! 


घटस्थापना - 


पहिली आई, दुसरी आज्जी , तिसरी मावशी,चौथी आत्या,पाचवी बहीण,सहावी पत्नी, सातवी *मुलगी, आठवी सून,नववी नात...हिच आहेत आपल्या आयुष्यातील देवीची नऊ रूपे...!!!*


या नऊ देवींची आम्ही "माऊली" म्हणून पूजन केले आणि नवीन साडी चोळी दिली... ! 


"तू आहेस गं माऊली, म्हणून मी आहे,तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही, तू मायेनं भरलेला "घट"* आहेस आणि आयुष्यभर मी माझ्या मनात तो "स्थापन" करूनच जगणार आहे... हाच माझा भाव... "भक्ती" म्हणून स्वीकार कर गं माऊली,असं म्हणून आम्ही घटस्थापना केली... !!! 


या निमित्ताने आम्ही कुमारी पूजन केले...  रस्त्यावरील वृद्ध मायमाऊलींना साड्या दिला...! 


त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले... ! 


चंदनाचा टिळा आपण जेव्हा दुसऱ्याच्या कपाळावर लावतो, तेव्हा आपलीच बोटं सुगंधित होतात... 


आपण स्वतःसाठी घेतो तो आनंद आणि दुसऱ्याला देतो ते समाधान... !!! 


या समाधानी चेहऱ्यांची बेरीज कशी करावी...? 


जर कोणाला करता आलीच,तर यातून जे सार मिळेल,तितकंच आपलं आयुष्य समजावे ..!!! 


- चादर आणि पणत्या -  येणाऱ्या थंडीचे दिवस लक्षात घेऊन आम्ही आपल्या लोकांना सोलापुरी चादर द्यायचे ठरवले.


डॉ.श्री अनिल पटेल,यवतमाळ यांनी आम्हाला सोलापुरी चादर दिल्या,सौ जयश्रीताई नेटके या माझ्या छोट्या बहिणीने स्वतः तयार करून पणत्या दिल्या.अनेक लोकांना आम्ही या पणत्या विकायला दिल्या.... ज्यांच्या अंगावर काहीही नव्हते अशा लोकांच्या अंगावर आम्ही मशिदीत न जाता सुद्धा चादर चढवली....! 


देवासमोर उभे राहून आपण काय मागतो,यापेक्षा देवाकडे पाठ असताना,आपण काय देतो हे जास्त महत्त्वाचं असतं... ! 


हि खरी प्रार्थना... !!! 


प्रार्थना करण्यासाठी दोन हात एकत्र जोडावे लागतात... दोन हात एकत्र करूनच नमाज पढता येतो .... प्रेयर करण्यासाठी सुद्धा दोन हातच लागतात.


हेच दोन हात एकत्र येऊन सेवा करतात...त्यावेळी आपोआप प्रार्थना होते,नमाज पढला जातो,प्रेयर सुद्धा तिथेच होते...! 


तळागाळातल्या लोकांना आपण सर्वजण मदत करत आहात... 


आपण खऱ्या अर्थाने प्रार्थना,नमाज आणि प्रेयर जगत आहात..!!! 


आम्ही नतमस्तक आहोत आपल्यापुढे... !!! 


- उटणे - डॉ.मनीषा ही आयुर्वेद पारंगत आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा उटणे तयार केले... या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून आपण भीक मागणाऱ्या मुलांचे शिक्षण करत आहोत.... म्हणुन लोकांना हे उटणे विकत घेण्यासंबंधात आवाहन केले... ! 


केवळ पंधरा दिवसात ५००० उटण्याच्या ऑर्डर आल्या... 


आमची झोळी कमी पडली... आपले दातृत्व नाही...!!! 


आपल्या या प्रेमाची तुलना मी कशाशी करू ??? 


गुण माहित असताना एखाद्याला जवळ करणं हा स्वार्थ.... 


परंतु दोष माहित असताना सुद्धा एखाद्याला साथ देणं हे प्रेम... !!! 


गुण आणि दोषांसकट आपण मला स्वीकारलं आहे... हे फक्त एक आईच करू शकते... 


आपणा सर्वांना सुद्धा मी आईच्याच भूमिकेत स्वीकारलं आहे...


प्रणाम माऊली !!! 


- खराटा पलटण


आम्ही आमच्या खराटा पलटणच्या माध्यमातून तळजाई टेकडी स्वच्छ केली.खराटा पलटण म्हणजे ज्या आज्यांना भीक मागायची नाही,अशा आज्ज्यांना आम्ही एकत्र केलं आहे,त्यांना युनिफॉर्म दिला आहे या आज्ज्यांच्या मार्फत आम्ही सर्वजण मिळून एखादा सार्वजनिक भाग झाडून पुसून स्वच्छ करतो आणि त्या बदल्यात त्यांना पगार किंवा शिधा देतो.  


तळजाई टेकडी स्वच्छ केल्यानंतर,सद्गुरु श्री शंकर महाराज समाधी ट्रस्ट,चे श्री प्रतापराव भोसले यांनी माझ्या सर्व याचकांना दहा किलो साखर दिली, आम्ही यावेळी या सर्वांना चादरी आणि फराळाचे वाटप केले.महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष, आदरणीय श्री.शेखरजी मुंदडा,राज्यमंत्री हे आमच्या याचक समाजाला भेटायला आले आणि स्वहस्ते त्यांनी हजारो याचकांना दिवाळीनिमित्त फराळ दिला. आदरणीय मुंदडा साहेब मला म्हणाले अभिजीत मी तुला कशी मदत करू ? 


मी म्हणालो,आमचा याचक समाज म्हणजे सहावं बोट आहे... असून फायदा नाही नसून तोटा नाही...! परंतु हि फार मोठी ताकद आहे... 


या ताकदीचा जर उपयोग करून घ्यायचा असेल; तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायला लागेल आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जर आणायचं असेल तर त्यांना काहीतरी ओळखपत्र देऊन त्यांच्या शिक्षण आणि नोकरी च्या वाटा मोकळ्या केल्या पाहिजेत.


अत्यंत भावुकपणे माझ्या खांद्यावर हात ठेवून,  याबाबत मी नक्की काहीतरी भरीव करेन असं त्यांनी मला वचन दिलं. 


त्यांच्या या "वजनदार" शब्दांनी,माझ्या मनावरचा "भार" थोडा हलका झाला...! 


वैद्यकीय


या महिन्यात रस्त्यावर असहायपणे पडलेल्या अनेकांवर रस्त्यावरच उपचार केले. 


ज्या गोष्टी रस्त्यावर जमत नाहीत, उदा.एक्सीडेंट मुळे हात मोडणे,पाय मोडणे,डोके फुटणे अशांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन उपचार केले आहेत. 


बरे झाल्यानंतर,भीक मागणे सोडून,काम करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करत आहे.रस्त्यावरच याचकांच्या रक्त लघवी तपासण्या करत आहे.सर्दी पासून कॅन्सर पर्यंत रस्त्यावरच ट्रीटमेंट देत आहे. 


अनेक वैद्यकीय साधने त्यांना देत आहे. 


अनेक वृद्ध याचकांच्या पायात चपला नाहीत,याचं मला नेहमीच वाईट वाटतं.इथून पुढे वैद्यकीय साधनांबरोबरच चपला सुद्धा विकत घेऊन सोबत ठेवणार आहे.*


असो....


जगणं हरलेल्या माणसांसाठी आपल्या सर्वांच्या मदतीने मला जे शक्य आहे ते करतो आहे.यासाठी आपणा सर्वांचेच हात उधार घेतले आहेत, अन्यथा माझ्या दोन हातांनी हे शक्य झालं नसतं...! 


हरणं मिठासारखं खारट असेलही...नव्हे असतंच... पण आयुष्याला चव त्यामुळेच येते ! 


ज्याने कधी हरणं अनुभवलं नाही;त्याला जिंकण्याची गोडी कशी समजेल ? 


आज हरलेली ही माणसं,उद्या नक्की जिंकतील... कारण सोबतीला तुम्ही सर्वजण आहात... !!! 


घड्याळ ही कधीतरी बंद पडतं... मागं पडतं पण म्हणून ते लगेच फेकून द्यायचं नसतं... कधी चावी द्यायचे असते ... कधी सेल बदलायचे असतात....


माझी हि चावी आणि सेल आपणच आहात....!!!


म्हणूनच या महिन्याचा लेखा जोखा आपणा सर्वांना सविनय सादर !!! 


१ नोव्हेंबर २०२४


डॉ.अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे

डॉक्टर फॉर बेगर्स


१६/११/२४

देवदूताची पावलं Footsteps of an angel

मुंबईतील फ्रेंच ब्रिजजवळ चित्रकार आलमेलकरांचं 'नूतन कलामंदिर' आहे.त्या कलामंदिराचे ते गेली तीस वर्षे प्राचार्य होते.उपजीविकेचं साधन म्हणून ते वर्षभर मुला-मुलींना व श्रीमंत प्रौढांना चित्रकलेचे पाठ देत. तिथंच त्यांच्या अभ्यासिकेत बसून ते एकांती कलेची साधना करीत.कला एक प्रकारची पूजा असते,अशीच त्यांची भावना होती.कुणा अज्ञात आध्यात्मिक जीवनप्रवाहातून त्यांना कलेची प्रेरणा मिळाली होती.नाहीतर तिला एवढी विश्वमान्यता मिळाली नसती.परंतु त्या चित्रातील रेषा व रंगरूपाचं सौंदर्य मात्र त्यांचं म्हणून विशेष आहे.ते संत कलाकार होते.


वर्षभर मुंबईत राहिल्यावर आलमेलकरांना वाटे की, जीवनातलं सत्य आपल्यात कमी कमी होत आहे. कारण मुंबईच्या जीवनात त्यांना सत्य कुठंच दिसत नसे. तिथलं सारं जीवन कृत्रिम.म्हणून खरं सत्याचं जीवन कुठं असेल,तर ते भारतात फक्त त्यांना आदिवासींच्या जीवनात दिसून येई.ते सत्य शोधण्यासाठी एखादी नेसत्या शुभ्र कापडाची जोडी आणि स्केचिंगसाठी लागणारे भरपूर कागद घेऊन दरवर्षी हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात आदिवासींच्या टोळ्याटोळ्यांत जाऊन तिथं ते राहत असत.कधी जीप मिळे तर कधी ट्रक.कधी मोटारसायकल,तर कधी खेचर.नाहीतर पदयात्रा. एखाद्या भाविक यात्रेकरूसारखे ते आदिवासींत राहत असत.ही स्थळं त्यांची धर्मस्थळं होती.


तिथं ते त्यांच्यातील एक होऊन जात.ते त्यांचं जवळून निरीक्षण करीत.रेखाटनं करीत.त्यांना बहुतेक आदिवासींच्या बोलीभाषा अवगत होत्या.त्या त्या भाषेत त्यांच्याशी ते बोलत असत.त्यांचे कपडे ते अंगात घालत असत.त्यांची लोकगीतंही ते गात असत.

त्यांचा आवाज चांगला होता.गीतं गात गात त्यांच्याबरोबर ते नृत्यही करू लागत.त्यामुळं त्यांच्यातील परकेपणा निघून जाई.


रात्री आगटीभोवती गप्पा मारीत बसले की ते नकला करीत.


आणि असा आपला झालेला पाहुणा काही दिवस राहून निघून जाताना आदिवासी स्त्री-पुरुषांच्या डोळ्यांत विरहाची आसवं येताना मी पाहिली आहेत.अन् आलमेलकरही साश्रुनयनांनी त्यांचा निरोप घेत.


तणमोराच्या शोधात फासपारध्यांशी माझे तीन महिन्यांचे संबंध आले.ते अननुभूत होते.त्या पार्श्वभूमीवर मला वाटलं की,

आलमेलकरांना पारधी व त्यांच्या बेड्यांची रेखाटनं काढायला बोलवावे.नेहमीप्रमाणं ते दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये नागपूरला आले होते. वाटलं, एक दिवस त्यांना पारध्यांच्या बेड्यावर घेऊन जावं.नागपूर-अमरावती रस्त्यावर ७०-७५ किलोमीटरवर कारंजा आहे.तेथून सारवाडीचा बेडा ७-८ किलोमीटर आत माळरानावर आहे.नागपूरचे सहायक वनसंरक्षक भूपेंद्र नागपुरे यांच्या जीपमधून निघालो.बरोबर कोंढाळीचे फॉरेस्ट रेंजर रत्नाकर जाधवही होते. निघायला उशीर झालेला.रस्ता कच्चा, दगड- गोट्यांनी भरलेला.वाटेतल्या पुलियाचे पाईप फुटलेले.आता पावसाळा संपल्यामुळं धूळही झालेली.हिवाळ्याचे दिवस.

धानकटाईचा हंगाम चालू होता.शेतांतून पेरलेला गहू-हरभरा वाढत होता.आल्हाददायक वातावरण होतं. आम्ही सरळ सारवाडी गाठली अन् भर दुपारच्या वेळी जीप बेड्याजवळ उभी राहिली.


आलमेलकर पुढं चालले होते.आम्ही त्यांच्या मागोमाग. आमच्या अपेक्षेप्रमाणं सुरवातीला त्या बेड्यातील स्त्रियांनी कावा-बावा केले.पारधी स्त्रिया मोठ्या धैर्याच्या असतात.मध्यम उंची,सावळा रंग,सरळ नासिका, तेजःपुंज डोळे,साठी उलटली तरी डोक्यावर काळेभोर केस,केसांचा उलटा भांग चोपून काढलेला,रुंद कपाळ, मोत्यासारखी शुभ्र दंतपंक्ती,अंगात पांढरा शुभ्र पोशाख-पायजामा,

पैरण.पायांत कोल्हापुरी चप्पल. निरागसपणे स्मित करीत आलमेलकरांनी जेव्हा स्केचिंगला सुरवात केली तेव्हा म्हातारा मुखिया आमच्याजवळ आला.नेहमीप्रमाणं पुरुषांनी देखील आपसात झगडे केले नाहीत.त्यानं सर्वांना शांत राहण्यास सांगितलं.विलक्षण शांत वातावरण झालं. आलमेलकरांच्या व्यक्तिमत्त्वानं ते प्रभावित झाल्यासारखे वाटले.


स्केचिंग करताना त्यांना एका झोपडीच्या दारासमोर भुईमुगाच्या आणि तुरीच्या शेंगा वाळत घातलेल्या दिसल्या.मूठभर शेंगा त्यांनी पारध्याकडून मागून घेतल्या अन् खिशात घालून ते त्या खाऊ लागले.खाताखाता स्केचिंग करू लागले.अन् एकदम तिथं खेळीमेळीचं व आत्मीयतेचं वातावरण निर्माण झालं.आपण होऊन मुखियानं स्त्रियांना रेखाटनासाठी समोर उभं राहण्यास सांगितलं.

मुखियानं बिनदुधाचा चहा दिला.आलमेलकर दोन दोन कप भरभरून तो प्याले.आम्ही मात्र संकोचानं अर्धाअधिक कप प्यालो.मुखियानं शिकारीच्या पद्धतीविषयी माहिती सांगितली.

जाळे,फासे,वाघुरे व भाले ही शिकारीची आयुधं दाखविली.मी मनात म्हणालो,हे सारं कसं घडतंय,मनासारखं.कसं शक्य आहे? ससे कसे पकडायचे,मोर-तणमोर जाळ्यात कसे धरायचे,डुकरांना भाल्यांनी कसं लोळवायचं,मुखिया व तिथल्या तरुणांनी सर्व प्रकारच्या शिकारींचं प्रात्यक्षिक करून दाखविलं.आलमेलकर रेखाटनामागून रेखाटनं काढीत होते.रेषा मोठ्या सफाईदार,एकेरी व बारीक. चार-पाच उभ्या-आडव्या रेषा मारल्या की,त्या रेषेतून माणसं जिवंत होत.मध्येच ते मुखियाकडं पाहून म्हणाले,

मुखियाजी,सकाळी आम्ही थोडा नास्ता केला होता.आता मात्र कडकडीत भूक लागलीय आम्हाला जेवण पाहिजे.


अशी विनंती अनपेक्षित होती.तो म्हणाला,आम्ही केलेलं जेवण तुम्ही खाणार?


का नाही? तुम्ही माणसं नाहीत का?


मुखियानं फर्मान सोडलं.तशा तीन दगडांच्या चुली पेटल्या.उडदाची डाळ मडक्यातून शिजायला टाकली. दुसऱ्या चुलीवर तवा ठेवला गेला.अल्युमिनियमच्या परातीत जोंधळ्याचं पांढरं पीठ लाजवंती मळू लागली. भाकऱ्या भाजू लागली.आलमेलकर हातात थाळी घेऊन पलंगावर बसले.उडदाची डाळ,भाकरी,हिरव्या मिरच्या ताटात घेतल्या अन् ते जेवू लागले.आमचा गुरुवार आहे म्हणून आम्ही सर्वांनी जेवायचं टाळलं.पारध्याच्या घरी जेवण करण्याची कल्पनाच आम्हाला करवत नव्हती, पण आलमेलकर अगदी मनःपूर्वक जेवले.दिवस मावळतीला ढळला.सकाळपासून शिकारीला गेलेले तरुण बाप्ये शिकार घेऊन परतले.खांद्याला लावलेल्या झोळीत लावा,बटेर,तितर व भट तितर होते. त्या बाप्यांत एक चैतूपारधी होता.असेल २५-३० वर्षांचा.उंच,सावळा.

डोक्यावरचे काळेभोर केस मानेवर रुळत असलेले.अंगात शर्ट नाही.पिळदार घोटदार शरीर. गुडघ्यापर्यंत धोतर.अनवाणी.तो एखाद्या आदिमानवासारखा वाटला.इतका तेजस्वी पारधी माझ्या पाहण्यात नव्हता.त्याचे डोळे तर खूप सुंदर होते.


आलमेलकर त्याच्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहत म्हणाले, ✓ "चितमपल्लीजी,अजिंठ्याच्या चित्रातील एखादा पुरुष पुन्हा इथं जिवंत होऊन आला असावा,असं वाटतं.अन् स्वगत म्हणाले,युगानुयुगं मी तुलाच चितारतोय.अजिंठ्यातील 

चित्रं काढताना मीच तर होतो.


त्यांचं ध्यान लागलं होतं.


आलमेलकरांच्या चित्रांतील व्यक्तींच्या डोळ्यांत खास वैशिष्ट्य असतं.चैतूच्या हातात झापा होता.झापा कापडाचा असतो.तो ढालीसारखा एका हातानं पुढं धरायचा.त्यातून पाहायला डोळ्यांच्या आकाराची दोन छिद्रं असतात.चैतू चालू लागला की,झापातून दिसतात फक्त दोन डोळे अन् खाली दोन अनवाणी पावलं. पायांचा आवाज न करता चालायचं.चालता चालता गुरं हाकावीत तसं लावा- तितरांना फाशाकडं खेदायचं. मोठ्या कौशल्याचं असतं हे सारं.आलमेलकरांनी ध्यानमग्न होऊन चैतूचं चित्र रेखाटलं.अनेक कोनांतून त्याला साकार केलं.समोरून,

पाठीमागून,आजूबाजूनं. त्या चित्राकडं पाहून तिथल्या तरुण मुलींना प्रथमच वाटलं की,चैतू खरोखरीच किती रुबाबदार वाटतो!


पारध्यांच्या किशोरी आणि तरुण मुलींच्या चेहऱ्यावर केवढं तेज असतं.त्या रूपवान असतात.रेखीव अवयव, रापलेला गोरा रंग,हसरा चेहरा,गिजरे डोळे.जणू कुणी शापित यक्षकन्याच उभ्या असाव्यात असं वाटतं. 


रेखाटनं काढताना त्या किती हसायच्या.मला हिमालयातील 'लाफिंग थ्रश' च्या थव्याच्या आवाजाची आठवण झाली.किती विभ्रमविलास.अवर्णनीय असा आनंद आलमेलकरांच्या चेहऱ्यावर होता.ते माझ्याकडे पाहत म्हणाले,साहेब,गेल्या तीस वर्षांतील हा एक नवीन विषय.तणमोराच्या शोधात असताना पारधी स्त्रियांचं आज दिसलेलं सौंदर्य यापूर्वी कधी माझ्या लक्षात आलं नव्हतं.मी मंत्रमुग्ध झालो.नेहमी रणरागिणीचं रूप धारण करणाऱ्या या तरुणींमधलं सुकुमार मार्दव मला आलमेलकर चित्र काढत असताना दिसलं.अन् मला खरोखरच त्या राजपूत कुलातील असल्याची खात्री पटली.पारधी म्हणजे मला मृगया,मदिरा आणि मृगनयनांचं मूर्तिमंत प्रतीक वाटलं.


तिन्हीसांजा झाल्या.आम्हाला परतायला हवं होतं.आम्ही निघायच्या तयारीला लागलो.आलमेलकरांनी शंभरावर रेखाटनं काढली होती.रेखाटनं पाहताना पारध्यांना आपण चित्रासारखे सुंदर असल्याची भावना झाली अन् त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व चैतन्य दिसू लागलं.जाताना आलमेलकरांनी दहा दहाच्या पाच नोटा मुखियाच्या हाती ठेवल्या भेट म्हणून.पण मुखिया घ्यायला तयार नव्हता.मोठ्या मिनतवारीनं त्यानं त्या जवळ ठेवल्या.

स्त्रियांनी मात्र नापसंती व्यक्त केली.


जीपकडं जाताना पाहिलं,दोन्ही बाजूंनी स्त्री-पुरुषांनी फेर धरला होता.मुखिया आलमेलकरांच्या मागं मागं चालतोय,हे दृश्य मला अपरिचित होतं.आलमेलकर बेड्यातील साऱ्या स्त्री-पुरुषांना राम राम करीत चालले होते.मुखिया चेहऱ्यावर स्मित आणून आलमेलकरांना म्हणाला,ज्याला ईश्वराचं दर्शन झालेलं असतं,तोच माणूस बेड्यात येऊन आमचं स्वागत स्वीकारतो.हे ऐकताच आलमेलकर म्हणाले,माझा ईश्वर मी आज यांच्यात पाहिला.

नागपूरला परतताना आलमेलकर चित्रप्रदर्शनाचे संकल्प सांगत होते.बरं का साहेब,इथून परत गेलो की,जहांगीर आर्ट गॅलरीतील पुढच्या प्रदर्शनाच्या तयारीला लागीन. गतवर्षी 'नवेगावबांधचे पक्षी' हा विषय होता. यंदा 'पारधी' हा विषय अन् त्यातील एक कलाकृती श्रेष्ठ असेल!"


"कुठली?" मी.


चैतू पारध्याची.झापामागचे दोन डोळे.केवढे तेजस्वी व चैतन्यमय.खरं म्हणजे देवानं चैतूला दोनच गोष्टी बहाल केल्या आहेत."


"त्या कुठल्या?"


"दोन डोळे- पाखरांना पाहायला.दोन पावलं - भटकायला."


घरी परतायला रात्र झाली.दुसऱ्या दिवशी सकाळीच आलमेलकर भामरागडकडे निघून गेले.


आलमेलकरांची मुंबईहून पत्रं येत.त्यांत ते चित्रांची प्रगती कुठवर आली ते लिहीत. 'तणमोराच्या शोधात' या माझ्या ग्रंथासाठी ते चित्रं काढणार होते.डिसेंबरची ती काळरात्र.शब्दांचं धन,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सिताबर्डी नागपूर


देवदूताची वेळ.बाहेर कुत्री ओ ओ ओ असं ओरडून सांगत होती.तो पाहा आला.तो पाहा आला. आभाळातून देवदूत खाली उतरून लोकांची दारं ठोठावीत आहे,तर बाहेर कुणीच नाही.


रोज पहाटे उठून दार उघडं ठेवून लिहीत बसण्याची माझी सवय,पण त्या रात्री जी उचकी लागली,ती पार पहाटे पहाटेपर्यंत.त्यानंतर ती थांबली.अन् माझा क्षणभर डोळा लागला,तर दार वाजलं.


आलमेलकर नेहमी म्हणायचे,जो जागा सो पाया। सोया सो खोया.'अन् सकाळच्या बातम्या सुधा नरवणे सांगत होत्या - काल रात्री प्रसिद्ध चित्रकार आलमेलकरांचं हृदयविकारानं निधन झालं." ही अनपेक्षित बातमी ऐकून मला धक्काच बसला.मी मनात म्हणालो,आज पहाटे देवदूतांच्या वेळी आलमेलकर आले होते तर ! त्यांनी दार वाजविलं.हाक मारली अन् आपलं दार मात्र उघडं नव्हतं.


चैतूची श्रेष्ठ कलाकृती पूर्ण करायच्या आतच आलमेलकरांनी आपले डोळे कायमचे मिटले होते.त्यांची भटकी पावलं विसावली होती.मला मुखियाच्या तोंडचं वाक्य पुन्हा आठवलं.


"ज्याला ईश्वराचं दर्शन झालेलं असतं, तोच माणूस बेड्यात येऊन आमचं स्वागत स्वीकारतो."


नोंदणीय प्रतिक्रिया….।।


प्रिय मित्र विजयजी,


तुमचे लेख म्हणजे एक चैतन्यदायी अनुभव आहे. तुमच्या ब्लॉगच्या प्रवासाचा आढावा घेताना तुम्ही मांडलेले विचार प्रत्येक लेखकाला प्रेरणा देतील. "स्वतःसाठी लिहिण्याची" तुमची भावना लेखनाच्या प्रामाणिकतेचे खरे प्रतीक आहे.लेखकासाठी वाचकांचा प्रतिसाद हा महत्त्वाचा असतोच,पण वाचनाच्या माध्यमातून स्वतःच्या विचारांना अधिक ठाम करण्याचा तुमचा दृष्टिकोन खूप प्रेरक आहे.www.vijaygaikawad.com या ब्लॉगसाठी तुम्ही दाखवलेली निष्ठा आणि त्याला मिळालेला प्रतिसाद हेच तुमच्या मेहनतीचे फळ आहे.कॅलिफोर्नियासारख्या आंतरराष्ट्रीय स्थळांवरून सातत्याने मिळणारे वाचक आणि ब्लॉगच्या इंग्रजी वाचनासाठी असलेला ४८% चा मोठा टक्का हे तुम्ही उभे केलेल्या संवादाच्या व्यासपीठाचे वैशिष्ट्य आहे.


तुमच्या ब्लॉगने वाचकांना केवळ माहिती दिली नाही, तर त्यांना विचारप्रवृत्त केले आहे.ब्लॉग हे केवळ शब्दांचे माध्यम नसून ते वाचक आणि लेखक यांच्यातील अदृश्य बंध आहे,हे तुम्ही सिद्ध केले आहे.तुमचा लेख वाचून अभिमान वाटतो की मी तुमच्या या यशाचा एक छोटासा भाग आहे. 


www.vijaygaikawad.com हा ब्लॉग डिझाईन करताना माझ्यासाठीही हा अनुभव खूप खास होता. ब्लॉग सुरू करण्यापासून तो ३२,०००+ वाचकांपर्यंत पोहोचला,ही जिद्द आणि जडणघडण तुमच्या मेहनतीचा आणि दृढ संकल्पाचा उत्तम नमुना आहे.


तुमचे भविष्य आणखी यशस्वी होवो,तुमची लेखणी अधिकाधिक वाचकांना प्रेरणा देत राहो, आणि तुमचा ब्लॉग नवनवीन उंची गाठत राहो,अशी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत.


तुमचा मित्र, - विष्णू गाडेकर


प्रिय मित्र विजयजी,


तुमचा लेख वाचताना मन अगदी भारावून गेले.१३३ भाषांमध्ये उपलब्ध असलेला आणि ३२,०००+ वाचकांचा टप्पा ओलांडलेला तुमचा ब्लॉग म्हणजे लेखन क्षेत्रातील एक अद्वितीय यश आहे.

तुम्ही मांडलेले विचार आणि त्यामागचा दृष्टिकोन खरोखरच प्रेरणादायी आहेत.जरी एक वाचक असला तरी त्याच्यासाठी लिहीन,आणि कोणीही नसल्यास स्वतःसाठी लिहीन,या तुमच्या विचारांनी तुमच्या लेखनाविषयीची निष्ठा आणि प्रामाणिकता अधोरेखित केली आहे.


तुमच्या ब्लॉगच्या यशाचा प्रवास हा एका लेखकाने आपल्या मेहनतीने आणि दृढ विश्वासाने साध्य केलेल्या यशाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.कॅलिफोर्निया सारख्या ठिकाणांहून सातत्याने वाचक मिळत असल्याची गोष्ट तुमच्या लेखणीच्या जागतिक प्रभावाची साक्ष देते. इंग्रजी भाषेतून ४८% वाचला जाणारा हा ब्लॉग आणि १,९८५ नियमित वाचक हे तुमच्या मेहनतीचे आणि वाचकांशी असलेल्या नात्याचे फलित आहे.


तुम्ही माझ्या योगदानाचा उल्लेख करून जो दिलखुलास आभारप्रदर्शन केले, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. www.vijaygaikawad.com हा ब्लॉग तयार करताना तुमच्यासाठी काहीतरी खास करायची संधी मिळाली,याचा मला खूप आनंद आहे.आज तो ब्लॉग इतक्या उंचीवर पोहोचला आहे, हे पाहून समाधान वाटते.तुमच्या लेखनातून निर्माण होणारे विचार आणि प्रेरणा वाचकांच्या मनात दीर्घकाळ टिकून राहणार,यात शंका नाही.तुमच्या ब्लॉगने केवळ माहिती दिली नाही, तर विचारांची एक नवीन दिशा दिली आहे.वाचक आणि लेखक यांच्यातील एक भावनिक बंध तुमच्या लेखणीने साधला आहे.तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा. तुमची लेखणी असाच प्रभाव कायम राखो, तुमचा ब्लॉग अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचो,आणि तुम्ही नवनवीन उंची गाठत राहा, अशी मनापासून इच्छा आहे.


तुमचा स्नेही - विष्णू गाडेकर