* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

६/१२/२४

आपलं आस्तित्व / Your existence

नोव्हेंबर महिन्याचा लेखाजोखा...!!!


November महिना सरला... ! 


संपुर्ण 12 महिन्यात एव्हढा एकच महिना आहे जो No ने सुरू होतो... !  


पण हा,No दरवेळी नकारात्मकता घेऊन येतो असं नाही.... ! 


No चा बोर्ड,जर्रा फिरवला तर तो "On" होतो... 


No म्हणजे... No worries.. 

No म्हणजे... No Guilt 

No म्हणजे... No Hate

No म्हणजे... No Expectations 

No म्हणजे... No Selfishness 

No म्हणजे... No hard feelings ! 


असो, 


परवा एका जुन्या मित्राचा फोन येऊन गेला सहज बोलताना तो म्हणाला की नुकताच त्याचा वाढदिवस झाला..सगळे विचारतात तोच कॉमन प्रश्न मी त्याला विचारला आता तुझं वय किती झालं? 


त्याने वय सांगितलं...! 


मनात आलं,आपण जन्माला आल्यानंतर आजपर्यंत जे काही जगलो,त्याला वय म्हणून आपण गृहीत धरतो;परंतु त्या अगोदरचे आईच्या सहवासातले नऊ महिने कोणीच का गृहीत धरत नाहीत ? 


आकड्यात सांगायचं झालं,तर जन्मानंतर आपण आजपर्यंत जे जगलो,ते अधिक नऊ महिने हे आपलं आकड्यातलं वय... ! 


खरंतर वय वाढल्याने माणूस मोठा होतच नाही,तो मोठा होतो मॅच्युरिटी वाढल्याने... !!! 


दुसऱ्याची प्रगती पाहतानाही आनंद होणं म्हणजे मॅच्युरिटी...


ज्याचा काल संध्याकाळी अस्त झाला आहे,त्याचा आज सकाळी उदय पाहणे यात आनंद वाटणे म्हणजे मॅच्युरिटी... !


स्वतःला वेदना झाल्यानंतर तर सगळेच रडतात; परंतु दुसऱ्याची वेदना पाहून आपल्या डोळ्यात पाणी येणं म्हणजे संवेदना...वेदना आणि संवेदने मधला फरक कळणं म्हणजे मॅच्युरिटी... 


जन्माला येताना निसर्गतःशरीरात २७० हाडं असतात... माणसाचं वय वाढलं की हिच हाडं आतल्या आत जुळून २०६ होतात... 


वाढत्या वयाबरोबर अपेक्षांची संख्या सुद्धा आपण हळूहळू कमी करायला हवी...थोडं आपणही, हाडांप्रमाणेच; जुळवुन घ्यायला शिकायला हवं... हेच तर निसर्गाला सांगायचं नसेल यातून ? 


आपण जिवंत असताना सोबत घेऊन चालतो ते आपलं आस्तित्व...! 


आयुष्य जगत असताना; दुसऱ्याला आपण किती दिलं आणि दुसऱ्याकडून किती घेतलं याच्या बेरीज आणि वजाबाकी करून;मृत्यूनंतर जे शिल्लक राहतं,ते आपलं व्यक्तिमत्व...!!


फरक फक्त दृष्टिकोनाचा !


शाळेच्या चार भिंतीत काटकोन,त्रिकोण, लघुकोन आणि चौकोन सर्व कोन शिकवतात...


पण दृष्टिकोन शिकण्यासाठी आयुष्यातल्या बिन भिंतीच्या शाळेत अनुभवच घ्यावे लागतात... ! 


शेवटी अनुभव म्हणजे तरी काय ? 


बरोबर येण्यासाठी,आपण सतत केलेल्या चुकांना दिलेलं गोंडस नाव,म्हणजे अनुभव... !!! 


असो या महिन्यातल्या चुका - अनुभव, कोन -दृष्टिकोन,

वेदना - संवेदना,अस्तित्व - व्यक्तिमत्व या सर्व शब्दांचा अनुभव पुन्हा एकदा या महिन्यात आपल्यामुळे घेता आला,आणि म्हणून या महिन्याचा हा लेखाजोखा आपणास सविनय सादर !


- वेदना - संवेदना…!!


रस्त्यावर लहान मुली सोबत राहणारी एक ताई. कधी फुगे विकून कधी भीक मागून गुजराण करायची.एका गुरुवारी शंकर महाराज मठाकडे गेलो,तेव्हा कळलं,मुलीच्या आईला एका चार चाकी गाडीने उडवलं आणि तिचा जागीच अंत झाला. 


खूप हळहळ वाटली आणि बारा तेरा वर्षाच्या या मुलीचं आता कसं होणार ? अशी चिंता वाटली. 


तिथं मागायला बसणाऱ्या आज्या आणि मावश्यांकडे मी ही चिंता व्यक्त केली.त्यातली एक प्रौढ मावशी पुढे आली आणि म्हणाली,काई काळजी करू नगा डाक्टर,या पोरीला समजायला लागल्यापासनं ती मला मावशी म्हंती... आता हीजी आई मेली,मावशी म्हणून काय हीला उगड्यावर ठीवू का ? मी जिवंत हाय तवर हीचां सांबाळ मीच करणार...!'


या प्रौढ मावशीला आपण फुलं विकण्याचा व्यवसाय सुरू करून दिला आहे.हिला सुद्धा कोणीही नाही.खूप वर्षांपूर्वी नवऱ्याचा अंत झाला... एक मूल होतं,ते कसल्याशा आजाराने लहानपणीच गेलं... 


मी तिला म्हणालो,अग पण फुलांच्या व्यवसायात थोडेफार पैसे मिळतात... त्यात अजून एका व्यक्तीचा भार तुला झेपेल का ?' 


'काय डाक्टर... आईला लेकरांचा भार वाटला आस्ता तर,कोंच्याच आईनं लेकराला नऊ म्हैने पोटात घिवून मिरवलं नसतं...एकांदा घास मी कमी खाईन,त्यात काय ? आनी कमी जास्तीला तुम्ही हाईतच की... माझ्या पाठीत धपाटा घालत ती हसत बोलली... !'  


'तसं नाही गं,कुठल्यातरी संस्थेत मी मुलीची व्यवस्था केली असती...'


'डाक्टर आविष्यात एकदा आई झाले,तवा पोरगं देवानं न्हेलं... आता पुन्ना आई व्हायची येळ आली, तवा पोरगी तुम्ही न्हेनार... 


मंजी मी फकस्त बाई म्हनून जगायचं ...मला बी मी मरायच्या आदी एकदा तरी "आई" हुंद्या की...! 


माझ्या डोळ्यात खरोखर पाणी तरळलं... !


आपण खड्ड्यातून बाहेर आल्यावर दुसऱ्याला सुद्धा बाहेर येण्यासाठी हात द्यायचा...हे सतत मी माझ्या लोकांवर बिंबवत असतो. 


आज या माऊलीने हा विचार खरोखर अंमलात आणला. 


आईच्या पदराला खिसा नसतो,पण आई द्यायची कधीच थांबत नाही... 


ती कधीच कुठेही दूर जात नाही...मनातल्या तळ कप्प्यात... ती कुठेतरी, "आभाळ" म्हणून भरून राहत असते.. 


हो आभाळच...!!! 


कवयित्री शांताबाई शेळके म्हणतात,ज्या ढगांमध्ये पाणी भरलेलं असतं ते "आभाळ"... आणि ज्यात पाणी नसतं... कोरडं असतं ते "आकाश"...! 


आभाळ आणि आकाश यामध्ये फरक असतो ...!!! 


विज्ञान सांगतं,माणूस जगतो श्वासावर ... रक्तावर.... पाण्यावर... 


लेकरांचे श्वास,रक्त आणि पाणी,स्वतःच्या नसानसात भरून आई "आभाळ" होते,कायम लेकरांसाठी "धड-पड" करत असते...  छातीच्या डाव्या बाजूला नेहमी "धड - धड" होत असते... विज्ञान त्याला हृदय म्हणतं... ! 


डॉक्टर असूनही,छाती ठोकून सांगतो माऊली,हि "धड - धड"... त्या हृदयाची नसतेच... हि "धड - पड" असते, त्या आभाळाची... "आई" नावाच्या हृदयाची ... !!! 


'काका,मावशीनं मला चिमटा काडला,तीला सांगा ना ...'  पोरीनं खांद्याला हलवून मला भानावर आणलं...!


आता ती मुलगी;त्या मावशी सह थट्टा मस्करी करण्यात मश्गुल होती... !


मुलीला कसं सांगू ? तुला पदरात घेऊन ....तुझी आई होऊन... स्वतःला ती आयुष्यभर चिमटा काढत राहणार आहे... ! 


"एका प्रौढ महिलेने,दिला बारा वर्षाच्या मुलीला जन्म... !!!"*


हि "डिलिव्हरी" नॉर्मल नव्हती...सिझेरियन सुद्धा नव्हतं... 


हा होता फक्त मातृत्वाचा सोहळा !!!


लोक तीला याचक म्हणतात... 


आज बघता बघता ती आई म्हणून "आभाळच" होऊन गेली... 


घेता हात,आज देता झाला... 


तीचे हेच हात,मी माझ्या कपाळाला लावले आणि त्यानंतर माझं कपाळ तिच्या पायावर टेकवलं... नतमस्तक झालो... 


माझ्यासारखा एक कफल्लक,आईला दुसरं देऊच काय शकतो... ??? 


(मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी तुम्हा सर्वांच्या साक्षीने आपण घेत आहोत)


प्रसंग दोन :


याच महिन्यात एका भीक मागणाऱ्या मुलाला छोटासा व्यवसाय टाकून दिला.... 


व्यवसाय म्हणजे काय तर,ज्या मंदिराच्या बाहेर तो भीक मागतो,त्याच मंदिराच्या बाहेर भक्तांच्या कपाळावर त्याने आखीव रेखीव असा मस्त उभा - आडवा गंध / ओम / त्रिशूळ काढायचा...त्यांना आरसा दाखवायचा...


भक्त मग खुश होऊन २ /५ /१० /२० /५०रूपये त्यांना जसे जमेल तसे पैसे देतील... ! 


हा खूप साधा सोपा व्यवसाय मी माझ्या अनेक याचकांना टाकून दिला आहे... 


यात माझी इन्वेस्टमेंट किती ? फार तर २०० ते ३०० रुपयांची.... 


अष्टगंध आणि काळा बुक्का विकत घेणे... 

तो ठेवण्यासाठी एक चांगला कप्पा असलेला स्टीलचा डब्बा देणे... 


यात पैशाची इन्व्हेस्टमेंट जास्त नसते..! 


पण भीक मागू नका रे...हे साधं सोपं काम करा रे आणि सन्मानाने जगा रे ;  हे सांगायला मला साधारण माझ्या आयुष्यातले बारा ते पंधरा महिने द्यावे लागतात...  हि मात्र माझी इन्वेस्टमेंट...!


मी काही कुठला जहागीरदार नाही,संस्थानाचा संस्थानिक नाही,कारखानदार नाही,कंपनीचा मालक नाही,हातात कसलीही सत्ता नाही... मी तरी नोकऱ्या कुठून निर्माण करू ? 


आणि म्हणून मी लोकांच्या अंगात असलेले अंगभूत कौशल्य,समाजातल्या रूढी - परंपरा, पारंपारिक सण आणि श्रद्धा यांचा वापर चांगल्या कामासाठी करून व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! 


दिवाळी आली,पणत्या विकायला द्या...


 दसरा आला,झेंडूची फुल विकायला द्या...


 गुढीपाडवा आला,साखरेच्या गाठी विकायला द्या... 


संक्रांत आली,तिळगुळ विकायला द्या... 


रंगपंचमी आली,रंग किंवा पिचकारी विकायला द्या...


आता नवीन वर्ष येईल,कॅलेंडर आणि छोट्या डायऱ्या विकायला द्या... 


असे काहीतरी मार्ग शोधतो आहे; 


अर्थात तुम्हा सर्वांच्या साथीने.... !!! 


असो... 


तर असं काम दिलेल्या या मुलाचा मला एका अनोळखी नंबर वरून कॉल आला.तो म्हणाला,'सर तुम्ही उद्या कुठे आहात ?' 


'मी उद्या अमुक अमुक ठिकाणी आहे... का रे...?'


'सर माझी जी पहिली कमाई झाली;त्यातून मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं आहे...' 


मला थोडा राग आला...


'दोन पैसे मिळाले,त्यात लगेच गिफ्ट वाटायला लागलास...? 


'मूर्खा,तुला काय सांगितलं होतं ? दिवसभरात जे पैसे मिळतील त्यातले ४० टक्के खर्च करायचे;पण ६० टक्के वाचवायचे... काय सांगितलं होतं तुला ?'  


'४०:६० गणित लगेच विसरलास का... ? एक तर आपले खायचे वांदे... त्यातून,जरा पैसे मिळाले की लगेच कुणालातरी गिफ्ट द्यायचं... !' 


'मला तुझं कोणतंही गिफ्ट नको आहे...पैसे वाचवायची अक्कल येत नाही,तोपर्यंत मला भेटू नकोस'... मी तूसड्यागत बोललो...


' ऐका ना सर...' तो बोलतच होता 


'तू जरा बावळट आहेस का रे... ? ठेव फोन आणि काम कर .... मला उद्या भेटायची काही गरज नाही...!' 


मी रागाने बोलून गेलो... 


एकदा व्यवसाय टाकून दिला की,माझे याचक लोक पैसे कसेही वापर करतात,उडवून टाकतात...बचत करा म्हणून सांगूनही बचत करत नाहीत आणि या गोष्टीचा मला राग आहे,आणि म्हणून बापाच्या भूमिकेतून मी त्याला रागावलो.! 


मी फोन ठेवणार एवढ्यात तो म्हणाला,'उगीच कोणालातरी नाही गिफ्ट देत सर,मला वडील नाहीत...वडील जेव्हा जिवंत होते तेव्हा ते मला म्हणायचे;तू जेव्हा कमावशील तेव्हा मला काहीतरी छोटसं गिफ्ट दे...'


'आज ते नाहीत,म्हणून वडील समजून तुम्हालाच देतो आहे सर,प्लीज घ्या ना.... !' 


आता या वाक्यावर कोणीही विरघळून जाईल... 


पण तरीही कोरडेपणाने मी त्याला म्हणालो,'ठीक आहे,ये उद्या...' 


कारण कष्टाने मिळालेले पैसे फालतू गिफ्टवर खर्च करणे मला मान्य नव्हते... ! 


तो दुसऱ्या दिवशी दबकत दबकत आला...!


'खिशातून एक पुरचुंडी काढून मला म्हणाला,'सर हेच माझं गिफ्ट आहे...'


मी खोलून पाहिलं.... ती शेंगदाण्याची पुडी होती... आत खारे शेंगदाणे होते...


मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं...'काय आहे हे ?' 


सर माझ्या वडिलांना भाजलेले,खारे शेंगदाणे खूप आवडायचे... मी असा वाया गेलेला... बाबांच्या कोणत्याही अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही...


बाबा म्हणायचे,'तुझ्याकडून फार काही अपेक्षाच नाहीत रे नालायका .... स्वतःच्या कमाईतून चार शेंगदाणे जरी मला तू खाऊ घातलेस,तरी मी शांततेत मरेन...!' 


'एके दिवशी बाबा गेले... !' 


'बाबांच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही सर '


'मी मागे नालायक उरलो सर ...' 


जातांना ते चार शेंगदाणे माझ्यावर उधार ठेवून गेले...!' 


'स्वतःच्या कमाईतून,आज तेच शेंगदाणे घेऊन आलो आहे... सर तुम्ही खा ना...'  तो काकुळतीने बोलला... 


काय बोलू मी यावर ? मला सुचेना....!


पुडी उघडून मी हे शेंगदाणे तोंडात टाकले... 


तो गळ्यात पडून हमसून हमसून रडला... 


आज "पिंडाला कावळा" शिवला होता... !!!


जिवंत असतानाही आज मी त्याचा मेलेला बाप झालो... !!! 


सांगण्यासारखं आणखी खूप आहे....


पण लांबलेला लेख आणखी लांबेल,या भीतीने मी बऱ्याच गोष्टी लिहीत नाही... 


माहेरी आलेल्या लेकीला;आई बापाला काय सांगू आणि काय नको असं होतं... तसंच माझं सुद्धा होतं... म्हणून लेख लांबतो... .


आईबाप आहातच ...आता लेक समजून पदरात घ्या.. ! 


८० वर्षाची एक आजी....  तीचा मुलगा आणि सून काम मिळत नाही म्हणून घरात आहेत..दिवसभरात आजीला जी भिक मिळते त्यात घर चालतं.... 


 मी या सून आणि मुलाला भेटलो... 


सुनेला शिवणकाम येतं..सुनेला म्हटलं,'तुला जर शिलाई मशीन दिलं तर काम करशील का ?  आणि काम केलं तर म्हातारीला घरात आणशील का ? 


आजीला भीक मागू द्यायची नाही,या अटीवर सुनेला शिलाई मशीन दिलं आहे... 


आज सून काम करत आहे आणि आजी घरात आहे.... !


येत्या काही दिवसात तिच्या मुलाला सुद्धा काम देणार आहोत....!


अजुनही खूप काही सांगायचं आहे... 


मी तरी किती लिहू आणि तुम्ही तरी किती वाचणार ? 


थोडक्यात सांगायचं,तर नवीन वर्ष आता येईल, याचक मंडळींना आता कॅलेंडर विकायला देणार आहे... 


आज्या आणि मावश्या यांची खराटा पलटण नावाची टीम तयार करून त्यांच्याकडून स्वच्छता करून घेऊन त्यांना गरम कपडे,स्वेटर,सत्कारात मला मिळालेल्या शाली, ब्लॅंकेट दिल्या आहेत... स्वच्छता झाल्यानंतर पंधरा दिवस पुरेल इतका किराणा दिला आहे...


अन्नपूर्णा या प्रकल्पाच्या माध्यमातून,भीक मागणाऱ्या कुटुंबांकडूनच जेवण तयार करून घेऊन ते आम्ही विकत घेत आहोत आणि रस्त्यावर किंवा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरीब रुग्णांना जेवणाचे डबे देत आहोत. 


रस्त्यावर असहायपणे पडलेल्या लोकांवर रस्त्यावरच उपचार करत आहोत... काहींना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत आहोत... जगण्या आणि जगवण्याचा खेळ मांडत आहोत... 


जे दुसऱ्याच्या आधाराशिवाय उभे राहू शकत नाहीत अशांना काठ्या कुबड्या Walker देऊन त्यांचा आधार बनण्याचा प्रयत्न करत आहोत...


अनेक लोक अनवाणी आहेत,त्यांना या महिन्यापासून चप्पल देणार आहोत... 


सध्याच्या थंडीच्या काळात उघड्या नागड्या पोरांच्या अंगावर चादर चढवत आहोत... आणि म्हणून दर्गाहवर चादर चढवायला आमच्याकडे चादर उरतच नाही...


आम्ही अशिक्षित आहोत,परंतु सुशिक्षित लोकांना या महिन्यात मतदान करा म्हणून आम्ही सांगितलं...


मंदिरातून बाहेर येऊन,रस्त्यावर देवी आमची परीक्षा घेते... आपण केलेल्या मदतीमधून आम्ही रस्त्यावरच्या माऊलींना साड्या अर्पण करत आहोत... 


खुद्द देवीच रस्त्यावर दर्शन देऊन आशीर्वाद देते आणि म्हणून मग कोणत्याही मंदिरात जायची गरज उरत नाही... !!! 


या महिन्यात अजून सुद्धा खूप काही झालं आहे.... 


सांगेन पुढे कधीतरी... 


लांबलेला लेखाजोखा तुमच्या पायाशी सविनय सादर ! 


०१ डिसेंबर २०२४


डॉ अभिजीत सोनवणे

डॉक्टर फॉर बेगर्स


४/१२/२४

३.७ श्वसन - 3.7 Respiration

जॉन मेयो (John Mayow) (१६४१-१६७९) यानं ऑक्सफर्डमध्येच शिक्षण घेतलं आणि पुढे तो १६६६ मध्ये बॉइलच्या हाताखाली काम करायला लागला. त्यानं त्याच्या आधी सगळ्यांनी केलेल्या कामाचा अभ्यास करून संपूर्ण श्वसन कसं चालतं यावरचं सगळं संशोधन एकत्र करून श्वसनाची संपूर्ण प्रक्रिया कशी चालते हे समजावून सांगितलं.हे समजावण्यासाठी मेयो एक प्रयोग करून दाखवायचा.खोलगट ताटलीसारख्या भांड्यात तो आधी पाणी घ्यायचा.त्यात तो एक मेणबत्ती पेटवून उभी करून ठेवायचा किंवा कधीकधी एखादा लहानसा प्राणीही ठेवायचा.आता त्या मेणबत्तीवर किंवा प्राण्यावर तो एककाचा ग्लास उपडा ठेवायचा.अर्थातच, थोड्या वेळानं त्यातली मेणबत्ती विझून जायची किंवा प्राणी ठेवला असेल तर तो मरून जायचा.

आणि ग्लासमध्ये असलेल्या पाण्याची पातळी थोडीशी वाढायची.

शिवाय,मेणबत्ती विझल्यानंतर किंवा तो प्राणी मेल्यानंतरही त्या ग्लासमध्ये बरीचशी हवा अजूनही शिल्लक असायची.यावरून त्यानं असा निष्कर्ष काढला की हवेमध्ये ज्वलनाला आणि जीवनाला आवश्यक असे काही कण असतात की जे हवेतून वेगळे होऊन रक्तात मिसळले जातात आणि हे काम फुफ्फुसं करतात.

आणि हेच श्वसनाचं (रेस्पिरेशनचं) काम असावं.त्याला त्यानं हवेतले क्षार (एरियल सॉल्ट्स) असं नावही दिलं होतं. आणि हवेचा काही भाग कमी झाल्यामुळे ती जागा पाण्यानं घेतली होती,म्हणूनच पाण्याची पातळी वाढली होती.आता मेयो खरं तर ऑक्सिजनच्या शोधाच्या जवळ आला होता आणि तेवढ्यात त्यानं संशोधन सोडून दिलं आणि तो वैद्यकीय व्यवसायाकडे वळला.


या काळात प्रयोग आणि निरीक्षणं करून मग निष्कर्ष काढण्यावर अजून कोणी भर दिला असेल तर तो जोसेफ ब्लॅकनं (१७२८-१७९९).त्या काळच्या रीतीप्रमाणे भाषा आणि तत्त्वज्ञान हे आधी शिकावे लागत आणि मग आपल्याला हवे ते विषय शिकता येत.त्यानुसार भाषा,तत्त्वज्ञान आणि वैद्यकशास्त्र शिकल्यानंतर तो रसायनशास्त्राकडे वळला.

जगातला पहिला रेफ्रीजरेटर बनवणारा 'कलन' हा त्याला रसायनशास्त्र शिकवे.त्यानंतर ब्लॅकनं हेल्मोंटनं आधीच शोधून काढलेल्या कार्बन डाय ऑक्साइडचा अभ्यास केला.हवा ही कार्बन डाय ऑक्साइडसकट अनेक वायूंचं मिश्रण असल्याचंही त्यानं ताडलं.आपण श्वास सोडताना कार्बन डाय ऑक्साइड सोडतो आणि या वायूत धरल्यास ज्योत जळू शकत नाही,हेही ब्लॅकनंच १७५० च्या दशकात मांडलं.ब्लॅक खूपच सुंदर शिकवे. शिकवताना तो प्रयोग करून दाखवत असे.त्यामुळे त्याची लेक्चर्सही विद्यार्थ्यांना मेजवानीच असायची.


सतराव्या शतकाच्या शेवटी फ्लॉजिस्टॉनची काहीशी विचित्रच थिअरी प्रसिद्ध होती.कोणत्याही जळणाऱ्या पदार्थात 'फ्लॉजिस्टॉन' असतं,असं ही थिअरी सांगत होती.

पदार्थ जळायला लागला की त्यातून फ्लॉजिस्टॉन बाहेर पडतं आणि हवा ते शोषून घेते.मग बंद डब्यात किंवा खोलीत एखादी ज्योत का विझते असं विचारल्यावर बंद खोलीत

ल्या हवेची फ्लॉजिस्टॉन शोषून घेण्याची क्षमता अपुरी पडते असंही थिअरी समर्थन करत होती.


ऑक्सिजनचा शोध अठराव्या शतकात खरं तर जोसेफ प्रिस्टलेनं (१७३३-१८०४) लावला. १७७४ मध्ये त्यानं पारा तापवल्यानंतर त्यातून कोणता तरी वेगळाच वायू बाहेर निघाला,तो त्यानं एका भांड्यात गोळा केला.त्यातून त्या वायूमुळे मेणबत्ती जोमानं जळत असलेली आणि हवा काढून घेतलेल्या खोलीतल्या प्राण्यालाही या नव्या वायूनं जीवन मिळाल्यासारखं होतं हे त्यानं पाहिलं.या वायूला त्यानं 'डीफ्लॉजिलेटेड एअर'असं नाव दिलं.

त्यानंतर प्रिस्टले रसायनशास्त्रात फारच मोठी कामगिरी बजावणार होता,पण त्या आधी त्यानं विजेचा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ हा महत्त्वाचा नियम मांडला होता.तो आपल्या नोट्स पेन्सिलनं काढत असे.त्या काळी पेन्सिलनं लिहिलेलं खोडण्यासाठी शिळ्या पावाचा तुकडा वापरत होते. एकदा पावाऐवजी त्यानं चुकून शेजारीच पडलेल्या रबराच्या चेंडूनंच खोडलं तर काय आश्चर्य,ते जास्त स्वच्छ खोडलं गेलं.त्यातून जाता जाता त्यानं खोडरबरचा शोध लावला ! शिवाय,त्यानं कार्बन डाय ऑक्साइड पाण्यात मिसळून सोडा वॉटरही तयार केलं होतं.असे त्याचे सगळे उद्योग चालू असताना तो एकदा पॅरिसमध्ये अँटोनी लेव्हायजेला भेटला आणि जेवताना गप्पा मारताना सहजच त्यानं आपणही 'डीफ्लॉजिलेटेड' एअर वेगळी केली असल्याचं सांगितलं.


 पण लिव्हायजेनं ही फ्लॉजिस्टॉनची थिअरी मान्य तर केली नाहीच,पण याशिवाय त्यानं हवा हीच 


'व्हायटल एअर' आणि 'अझोट' (म्हणजे फ्रेंचमध्ये जीवन नसलेली) या घटकांची बनलेली असते असं मत मांडलं.

त्यातल्या 'व्हायटल एअर'ला त्यानं 'ऑक्सिजन' म्हणजे आम्ल तयार करणारी आणि 'अझोटला', 'नायट्रोजन' म्हणजे 'जीवन नसलेली' असं नाव दिलं होतं. (हे फ्रेंच अर्थ आहेत.) 


लेव्हायजेनं माणूस श्वसन करतो म्हणजे एक वायू आत घेतो आणि दुसरा बाहेर सोडतो हे अनेक प्रयोग करून पडताळून पाहिलं होतं.

त्याच वर्षी १७९४ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीला विरोध केल्यामुळे प्रिस्टलेला अंगावरच्या कपड्यांनिशी पेनिन्सिल्व्हिह्याला जावं लागलं आणि लेव्हायजेला त्याच्या पूर्वीच्या राज्यात अमानुषपणे कर गोळा करण्याच्या कामामुळे गिलोटिनवर जावं लागलं !


कोणताही सजीव हवा आत घेतो आणि बाहेर सोडतो त्या श्वसनप्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत 'रेस्पिरेशन' म्हणतात.

सजीवाच्या शरीरातली प्रत्येक पेशी ही वायूंची देवाणघेवाण करते त्या प्रक्रियेलाही 'रेस्पिरेशन' म्हणतात.प्रत्येक सजीवाला अन्नातून ऊर्जा मिळते.अन्नाची जेव्हा ऑक्सिजनबरोबर रासायनिक क्रिया होते (ऑक्सिडेशन) तेव्हाच त्या अन्नातली ऊर्जा वापरण्यासाठी उपलब्ध होते आणि ऊर्जा वापरल्यावर सजीवाच्या शरीरात कार्बन डाय ऑक्साइड तयार होतो आणि हा कार्बन डाय ऑक्साइड श्वसनाद्वारे बाहेर टाकला जातो.थोडक्यात,रेस्पिरेशन म्हणजे कोणताही सजीव आणि त्याच्या भोवतालच्या वातावरणात होणारी वायूंची देवाणघेवाणच असते.


प्रत्येक प्राण्यात ही प्रक्रिया वेगवेगळ्या त-हेनं होते. काही प्राणी त्वचेद्वारे श्वसन करतात.तर काही प्राणी पाण्यातला ऑक्सिजन शोषून घेतात.काही प्राण्यांना फुफ्फुसं असतात,तर काही प्राण्यांना गिल्स म्हणजे कल्ले असतात.काही प्राणी आपल्या त्वचेद्वारे श्वसन करतात.त्यांना 'क्युटेनिअस रेस्पिरेशन' म्हणतात.हे श्वसन पाण्यात राहणाऱ्या स्पाँजेससारख्या प्राण्यांमध्ये होतं.पाण्याचा प्रवाह जितका वेगवान आणि थंड, तितका त्या पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन जास्त असतो. त्यामुळे थंड आणि प्रवाही पाण्यात राहणं जलचरांना सोपं जातं. पाण्यात राहणारे फ्लॅटवर्क्स आपल्या त्वचेनं श्वसन करतात. त्यांच्या शरीरात हा ऑक्सिजन वाहून नेणारी सर्क्युलेटरी सिस्टिमही नसते.


बऱ्याचशा प्रकारचे बेडूक आपल्या त्वचेनं श्वसन करतात,पण बेडकांमध्ये फुफ्फुसंही असतात.आता तर आपल्याला बॉर्बियन या फुफ्फुसाशिवायचा (लंगलेस)बेडकाची जात सापडली आहे.ते थंड पाण्याच्या प्रवाहात राहतात.उभयचर प्राण्यांनी (अँफिबियन) जवळपास ३० कोटी वर्षांपूर्वी खरी फुफ्फुसं निर्माण केली असं उत्क्रांतीचा अभ्यास करणारे वैज्ञानिक सांगतात.


कीटकांसारख्या जमिनीवर राहणाऱ्या इनव्हर्टिब्रेट्स (अपृष्ठवंशीय प्राणी) मध्ये संपूर्ण शरीरातच हवा वाहून नेणाऱ्या नलिकांचं जाळं असतं आणि या नलिका शरीरातल्या लहान लहान छिद्रांमध्ये उघडतात.त्यांना स्पायरॅकल्स म्हणतात.हे श्वसन त्या प्राण्यांच्या हालचालीनुसार आणि हवेच्या प्रवाहानुसार डिफ्युजनद्वारे होत असतं.आपल्या शरीरात येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या हवेवर या प्राण्यांचा काहीही ताबा नसतो.बऱ्याचशा कोळ्यांमध्ये (स्पायडर्समध्ये) पुस्तकाच्या एकावर एक ठेवलेल्या पानांप्रमाणे लंग्ज असतात.त्यात हवेतला ऑक्सिजन आपोआप डिफ्युज होऊ शकतो.अशी स्पायरॅकल्स कीटकांच्या अळ्यांच्या शरीराच्या डाव्या आणि उजव्या बाजूंवर स्पष्टपणे पाहायला मिळतात.ही स्पायरॅकल्स गरज पडेल तशी चालू किंवा बंद होऊ शकतात.त्यामुळे त्यांच्या शरीरातून पाणी बाहेर जात नाही.


कल्ल्यांनी होणारं श्वसन…!


पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये वायूंची देवाण-घेवाण होण्यासाठी गील्स म्हणजेच कल्ले असतात.लंग फिश याला अपवाद आहे.गील्समध्ये जास्तीतजास्त ऑक्सिजन शोषून घेऊन कार्बन डाय ऑक्साइड बाहेर टाकण्यासाठी अनेक शाखांनी बनलेल्या पृष्ठभागासारख्या रचना असतात.काही प्राण्यांमध्ये वल्ह्यांसारखे फिन्सही असतात.तेही गील्ससारखंच काम करतात.माशांमध्ये गील्स हे श्वसनाचं आणि उत्सर्जनाचं अशी दोन्ही कामं करणारे अवयव असतात.काही जलचरांमध्ये एक्सटर्नल गिल्स असतात तर काहींमध्ये इंटर्नल गिल्स असतात. एक्सटर्नल गिल्समध्ये या गिल्समधून पाणी आत शिरतं आणि त्यातला ऑक्सिजन शोषला गेला की कार्बन डाय ऑक्साइड पुन्हा गिल्समधूनच बाहेर टाकला जातो.तर इंटर्नल गिल्समधून जलचर तोंडावाटे पाणी आत घेतात आणि त्यातला ऑक्सिजन वापरून झाल्यानंतर ते पाणी गिल्सद्वारे बाहेर टाकतात असा वन-वे प्रवास असतो.तर व्हर्टिब्रेट (पृष्ठवंशी) प्राण्यांमध्ये फुफ्फुसावाटे ऑक्सिजन घेतला जातो.

साधारणपणे,व्हर्टिब्रेट्समध्ये हृदयाच्या दोन्ही बाजूंना दोन लंग्ज असतात.त्यांना विंड पाइप (ट्रकिया),रेस्पिरेटरी स्नायू आणि डायफ्रेंमचा पडदा असे अवयव असतात.


तर प्रोटोझुआसारखे एकपेशीय प्राणी आपल्या सगळ्या शरीरावरूनच श्वसन करतात. तर अळ्यांसारखे असणारे पाण्यातले प्राणी आपलं शरीर लांब आणि सपाट करतात आणि आपल्या त्वचेद्वारे श्वसन करतात.तर स्पाँजेससारखे सच्छिद्र प्राणी चक्क पाण्याच्या लाटेवर अवलंबून असतात.लाटेच्या प्रवाहानं त्यांच्या शरीरात पाणी येत- जात राहतं आणि त्यातून ते श्वसन करतात.या प्राण्यांच्या श्वसनाच्या पेशी त्यांच्या त्वचेलगतच असतात.


आता एकोणिसाव्या शतकात ऑक्सिजनचा शोध लागून शंभर वर्षं झाल्यानंतर माणसाला श्वसनाबद्दल असलेलं ज्ञान असं होतं श्वसनाद्वारे माणूस ऑक्सिजन शरीराच्या आत घेतो.माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन गरजेचा असतो.फुफ्फुसातल्या हवेच्या लहान लहान पिशव्यांमधून म्हणजेच वायुकोशांतून (अल्व्हिओलायमधून) ऑक्सिजन रक्तनलिकांमध्ये (कॅपिलरीजमध्ये) येतो.आणि तिथून तो शरीरात वापरला जातो.पेशीच्या पातळीवर हे वायूचं देवाणघेवाणच असतं.पण आता माणूस आपोआप श्वास घेत राहतो की श्वास घेण्यासाठी त्याला काही शक्ती वापरावी लागते हे शोधायचं होतं.माणूस आपोआप श्वास घेत असेल तर हवेतला ऑक्सिजन आपोआपच फुफ्फुसात येऊन रक्तात मिसळायला हवा.म्हणजेच पेशीच्या पातळीवरही आपोआप होणारी देवाण-घेवाण असेल.यालाच पॅसिव्ह डिफ्युजन म्हणतात.पण जर श्वासोच्छ्वास करताना माणसाला काही ऊर्जा खर्च करावी लागत असेल तर ते पेशीच्या पातळीवर क्टिव्ह ट्रान्सपोर्ट असेल.शेवटी हे ऑक्सिजनचं क्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन होतं की पॅसिव्ह डिफ्युजन होतं हे शोधायचं होतं.ख्रिश्चन बोहर (Christian Bohr) यानं ऑक्सिजनचं फुफ्फुसातून रक्तात क्टिव्ह 'सिक्रिशन' (स्रवण) होतं असं सांगितलं होतं.त्यानंतर त्यानं आपल्या हाताखाली असलेल्या ऑगस्ट क्रोग (August Krogh) या तरुण फिजिओलॉजिस्टला या 'ऑक्सिजन सिक्रिशन'वर अजून संशोधन करायला सांगितलं.त्यानं आपली बायको मेरी (Marie Krogh) हिलाही या संशोधनामध्ये घेतलं आणि त्यातून त्यांनी ऑक्सिजनचं 'क्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन' होत नसून 'पॅसिव्ह डिफ्युजन' होतं असा शेवटी निष्कर्ष काढला.


या सगळ्या प्रयोगांमधून माणसानं आपल्याला सुरुवातीला प्रचंड गूढ वाटणारं श्वासोच्छ्वासाचं कोडं अथक प्रयत्नांतून अखेर सोडवलं होतं.पण तरीही अजूनही फुफ्फुस आणि हृदय यांना होणाऱ्या विकारांबद्दल फारसं संशोधन करता येत नव्हतं.कारण कोणत्याही विकारांचा आणि शरीरात झालेल्या बिघाडांचा अभ्यास करायचा म्हटला तर त्यासाठी मृत शरीराचं विच्छेदन (डिसेक्शन) करणं आवश्यक होतं. पण हृदय किंवा फुफ्फुस यांचा अभ्यास मृत शरीराचं विच्छेदन करून करणं शक्य नव्हतं.कारण माणूस मरतो तेव्हा त्याचं हृदय आणि श्वसन थांबलेलं असतं.मग अभ्यास तरी कसा करणार ? थोडक्यात,हा अभ्यास जिवंत माणसांवरच करणं आवश्यक होतं.त्यासाठी हृदयाच्या ठोक्यांचा आणि फुफ्फुस वर-खाली होण्याचा आवाज ऐकावा लागणार होता.ही अडचण रेने लेनेस (Rene Laennec) (१७८१-१८२६) या अतिशय दयाळू फ्रेंच डॉक्टरच्या लक्षात आली.तो फुफ्फुसांचा तज्ज्ञ होता.

पुरुषांच्या छातीवर आपला कान टेकवून आवाज ऐकणं त्याला सहज शक्य होतं,पण जेव्हा जाडजूड बायका तपासायला यायच्या तेव्हा मात्र त्याची पंचाईत व्हायची.त्यानं लहान मुलांना मोकळ्या पाइपमधून कानगोष्टी खेळताना पाहिलं होतं.शिवाय, तो चांगला बासरीही वाजवायचा.त्यातून त्याला छातीचा आणि फुफ्फुसांचा आवाज ऐकण्यासाठी लाकडी पाइपसारखं उपकरण करायची युक्ती सुचली.त्यानं तसं उपकरण तयारही केलं आणि ते खूप यशस्वीही झालं. त्याला त्यानं सुरुवातीला याला 'ला सिलिंड्रा' म्हणजे पोकळ पाइप असं नाव दिलं होतं.त्यातून त्यानं फुफ्फुसाच्या अनेक आजारांचं निदान केलं.त्यामुळे त्याला फुफ्फुसाच्या रोगांच्या इलाजाचा म्हणजेच 'पल्मनॉलॉजी'चा (pulmonology) फादर असं म्हणतात आणि त्यानं तयार केलेलं उपकरण आजही सगळेच डॉक्टर्स स्टेथॉस्कोप म्हणून वापरतात !


०२.१२.२४ या लेखातील शेवटचा भाग….!

२/१२/२४

३.७ श्वसन - 3.7 Respiration

आपण श्वास घेतो म्हणजे नाकावाटे हवा आपल्या शरीरात घेतो आणि त्यातला ऑक्सिजन वापरतो आणि कार्बन डाय ऑक्साइड असलेली हवा बाहेर टाकतो,हे आज आपल्याला माहीत आहे.पण हे माहीत करून घ्यायला अक्षरशःशेकडो वर्षं संशोधन करावं लागलं आहे.पण गंमत म्हणजे त्या संशोधनापेक्षा त्याआधी श्वसनाबद्दल माणसाच्या काय काय भन्नाट कल्पना होत्या,त्या पाहिल्या की हसावं की रडावं तेच कळत नाही.माणूस श्वास का घेतो हे माणसाला फार पूर्वीपासून पडलेलं एक गूढ कोडंच होतं.श्वासाचा,हृदयाचा आणि आत्म्याचा काहीतरी संबंध आहे हे पुरातन इजिप्त आणि भारतातल्या आध्यात्मिक संस्कृतींमध्ये सांगितलं होतं.ग्रीकमध्ये होमरच्या काळात माणसाच्या आत साचे आणि थायमस असे दोन आत्मे असतात असं समजलं जायचं.

माणूस जन्मल्या जन्मल्या श्वास घेतो आणि मृत्यू झाला की श्वास घेत नाही यावरून एक जुनी ग्रीक कल्पना अशी होती,की पहिल्या श्वासाद्वारे माणूस आपल्या आत्म्यालाच आत घेतो आणि अखेरच्या श्वासासोबत बाहेर टाकतो.यालाच चिनी वैद्यकामध्ये की (qi), ग्रीक वैद्यकामध्ये न्यूमा (pnuema) आणि आयुर्वेदामध्ये 'प्राण' असं म्हटलेलं आहे.


हिप्पोक्रॅट्सनं (ख्रिस्तपूर्व ४६०-३७०) कॉसच्या बेटावर एक वैद्यक महाविद्यालय सुरू केलं होतं.तिथे तो विद्यार्थ्यांना इतर सगळ्याच रोगांबरोबर छातीचे रोग आणि आजार यांविषयी शिकवायचा.त्या वेळी रोग्याची तपासणी करताना तो त्याच्या छातीतून येणारा आवाज आणि छातीतून बाहेर पडलेला कफ यांचंही परीक्षण करायचा.पण गमतीचा भाग म्हणजे श्वसनाचा आणि फुफ्फुसांचा काही संबंध असेल असं त्याला वाटत नव्हतं !


एम्पेडोक्लेस (ख्रिस्तपूर्व ४९०-४३०) हा सिसिलीमधला डॉक्टर,तत्त्वज्ञ आणि कवी होता.त्याच्या मते जग हे माती,हवा,

पाणी आणि अग्नी या चार तत्त्वाचं बनलेलं असतं आणि प्रत्येक वस्तूला लहान लहान छिद्रं असतात.त्या छिद्रांतून ही चार तत्त्वं ये-जा करत असतात असं त्याचं मत होतं.या पदार्थांच्या हालचाली आकर्षण आणि प्रतिकर्षणामुळे होतात असंही त्यानं सांगितलं होतं.माणसाच्या त्वचेद्वारे श्वसन झाल्यामुळे हवा आणि इतर पदार्थांची देवाणघेवाण होते त्यामुळे त्वचेलगतचं रक्त थंड होतं,असं त्याचं मत होतं आणि तसंच नाकाद्वारे आत घेतलेली हवा शरीराच्या आतल्या अवयवांना थंड करते हेही त्यानं पुढे सांगितलं होतं.ॲकॅडमी ऑफ अथेन्सची उभारणी करणाऱ्या प्लेटोनं तर तीन आत्म्यांची कल्पना मांडली होती.पहिला आत्मा हा मेंदूत असतो.

हा आत्मा माणसाला सारासार विवेकबुद्धी देतो.दुसरा आत्मा हृदयात राहतो.तो श्वासापासून निर्माण झालेला असतो आणि तो माणसाला धैर्य देतो.तिसरा आत्मा शरीराच्या खालच्या भागात राहतो तो आहारापासून बनलेला असतो आणि त्याचं स्थान हे यकृतात (लिव्हरमध्ये) असतं.प्लेटोच्या मतानुसार शरीराच्या आतला अग्नी आतल्या गरम हवेला नाक आणि तोंडाद्वारे बाहेर सोडतो.त्या बाहेर सोडलेल्या हवेच्या दाबामुळे बाहेरची थंड हवा त्वचेद्वारे आत घेतली जाते.पुन्हा शरीराच्या आतल्या अग्नीमुळे आतली हवा गरम होते,ती बाहेर सोडली जाते आणि पुन्हा बाहेरची थंड हवा आत घेतली जाते आणि हे चक्र असंच चालू राहतं.प्लेटो आणि इतर वैज्ञानिक माणूस त्वचेद्वारे श्वसन करतो असं म्हणत होते,कारण त्यांनी पूर्वीच जलचर प्राण्यांना त्वचेद्वारे श्वसन करतात हे पाहिलेलं असल्यामुळे माणूसही त्वचेनंच श्वसन करतो हे गृहीतच धरलं होतं.पण अजूनही माणूस श्वसन नेमकं का करतो हे कुणाला कळलेलंच नव्हतं.


प्लेटोचा शिष्य आणि अलेक्झांडरचा गुरू ॲरिस्टॉटल (ख्रिस्तपूर्व ३८४-३२२) यानं हृदयात उष्णता निर्माण होते असं मानलं होतं.त्या काळी माणसाचं विच्छेदन (डिसेक्शन) करायला बंदी होती, पण फक्त प्राण्यांचं विच्छेदन आणि निरीक्षण करून त्यानं हृदयाला डावा आणि उजवा असे दोन भाग असतात असं सांगितलं होतं.त्या वेळी फक्त हवा आत जाते आणि हवाच बाहेर पडते असाच समज होता. अर्थात,ते योग्यही होतं,कारण हवेत नेमके काय घटक असतात हे त्या काळी माहीतच नव्हतं.त्यामुळे हवाही शरीरातली उष्णता कमी करायलाच वापरली जाते असा समज होता.गंमत म्हणजे,पण शरीरात इतकी उष्णता सतत तयार का होत असते ? आणि ती कमी करायची गरज का असते? हे मात्र कुठंही सांगितलेलं नाही! यात अजूनही काही समज होते. फुफ्फुसं जेव्हा थंड होतात,तेव्हा ते आकुंचित होतात आणि हवा बाहेर सोडतात.त्या हालचालीमुळेच छाती मागे-पुढे होत असते.त्या वेळी स्नायूही थंडीपासून आणि जखमेपासून संरक्षण करतात असा समज होता. स्नायूंचा फुफ्फुसाच्या किंवा इतर कोणत्याही हालचालींशी काही संबंध असतो हे त्या काळी माहीतच नव्हतं.शेवटी अलेक्झांडरच्या राज्याचा अंत झाला. त्या काळानंतर अलेक्झांड्रिया हे प्रमुख सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र झालं होतं. त्याच दरम्यान ख्रिस्तपूर्व ३२२ अलेक्झांड्रियामध्ये एक विद्यापीठ स्थापन झालं. तिथं मात्र ॲनॅटॉमी आणि फिजिऑलॉजी यांची चांगलीच प्रगती झाली.याचं कारण त्या वेळी तिथं मृत आणि जिवंत अशा दोन्ही प्राण्यांची चिरफाड करून अभ्यास करायची परवानगी होती.त्यातून मेंदू हा मज्जासंस्थेचा मुख्य अवयव असतो आणि स्नायूंमुळे हालचाली शक्य होतात असं लक्षात आलं होतं.त्याच दरम्यान रक्तवाहिन्यांबद्दलही ज्ञान वाढायला लागलं होतं.त्या काळी रक्तवाहिन्यांमधल्या शिरा (veins) आणि धमन्या (arteries) यांचा काहीही संबंध नाही असं वाटत होतं.शिरा आणि धमन्या या कुठंही एकमेकींना जोडलेल्या नसून त्या मेंदूपासून निघून संपूर्ण शरीरभर पसरलेल्या आहेत असं वाटायचं. त्यांना सगळ्या शरीरातून हृदयाकडे अशुद्ध रक्त घेऊन जाणारी महत्त्वाची शिर (व्हेनाकॅव्हा) आणि हृदयाकडून शुद्ध रक्त सगळ्या अवयवांकडे घेऊन जाणारी महत्त्वाची धमनी (ॲओर्टा) याही सापडल्या होत्या.


त्या काळी यकृतात (लिव्हर) रक्त तयार होतं आणि ते मग संपूर्ण शरीरात पाठवलं जातं अशीही एक धारणा होती.हवा असलेलं रक्त हे गळा,फुफ्फुसं,हृदय आणि आर्टरीज या अवयवांत असतं असंही त्या काळी वाटत होतं.


ख्रिस्तपूर्व ३०० च्या दरम्यान अलेक्झांड्रिया स्कूल ऑफ ॲनॅटॉमी आणि मेडिसीनची घुरा हिरोफिलसच्या (Herophilus) (ख्रिस्तपूर्व ३३५ ते २८०) खांद्यावर आली.हृदयाला झडपा (व्हॉल्व्हज ऑफ हार्ट) असतात ते त्यानंच शोधून काढलं होतं. त्याच्या परीनं त्यानं हृदयाच्या झडपांचा आणि श्वसनाचा संबंध लावला होता.नाकाद्वारे आत घेतलेली हवा फुफ्फुसात येते आणि तिथून ती हृदयात येते आणि हृदयाद्वारे हवा सगळ्या अवयवांना पुरवली जाते असं त्याला वाटायचं.त्याचबरोबर ती हवा सगळ्या अवयवांकडून पुन्हा हृदयात येते,तिथून ती पुन्हा फुफ्फुसात येते आणि नाकावाटे बाहेर टाकली जाते. थोडक्यात,एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक चालू असते,असं त्याला वाटत होतं. फुफ्फुसातून हवा येते-जाते,

नाकातून ही हवा आत बाहेर होते,पण इथे गोची अशी होती,की हृदयाकडून इतर अवयवांकडे वाहणारं रक्त हे हृदयाच्या झडपा एकमार्गी असल्यामुळे इतर अवयवांकडून हृदयाकडे रक्त पुन्हा मागे कसं येत असेल हा प्रश्न त्याला सोडवता आला नाही.पण हा सगळा तर्क त्यानं त्या काळी कोणत्याही प्रगत तंत्राशिवाय लावला होता,त्यामुळे त्या काळीही मोठीच प्रगती म्हणावी लागेल.कारण किमान हवा असलेलं रक्त अवयवांकडे जातं आणि अवयवांकडून ते पुन्हा हृदयात येऊन त्यातून हवा बाहेर टाकली जाते इतकं तरी त्याला समजलं होतं.त्याच्या आधीचे लोक हे हृदय आणि हवा हे शरीर थंड करतात असं म्हणत होते,ही समजूत त्यानं खोडून काढली होती.त्याच्याच बरोबर काम करणाऱ्या आणि त्याच्यापेक्षा ३१ वर्षांनी लहान असणाऱ्या इरॅसिस्ट्रॅटस (Erasistratus) यानं डायफ्रेम हा स्नायूंचा पडदा श्वासोच्छ्वासाला कारणीभूत असतो असं सांगितलं.हे तर अरिस्टॉटलच्या अगदी विरुद्ध होतं.


इॉसिस्ट्रसनं हवेतून माणूस फक्त न्यूमा (pneuma) नावाचा हवेतला माणसाला आवश्यक असलेला घटक आत घेतो आणि आर्टरीजमध्ये फक्त हा न्यूमाच असतो, रक्त वगैरे काही नसतं असा काहीसा विचित्रच सिद्धान्त त्यानं मांडला होता.पण मग माणसाला इजा झाली की त्याच्या आर्टरीजमधून रक्त का येतं? असा प्रश्न विचारल्यावर लहान आर्टरीज लहान व्हेन्सला जोडलेल्या असतात आणि जखम झाली की त्यातून रक्त येतं असाही काहीसा विचित्र वाटणारा युक्तिवादही त्यानं मांडला होता.त्यात लहान आर्टरीज या कॅपिलरीजद्वारे लहान व्हेन्सला जोडलेल्या असतात हे आता आपल्याला माहीत आहे.त्यामुळे हे काही प्रमाणात बरोबर होतं.तर आर्टरीला जखम झाली तरी व्हेनमधून रक्त येतं हे त्याचं विधान मात्र चुकीचं होतं. कधीकधी चुकून बरोबर उत्तर यावं तसं अनेक चुकीच्या तर्कामधून तो कधीकधी बरोबर निष्कर्षही काढत होता असं यावरून दिसतं.


त्यानंतर अलेक्झांड्रियामध्ये चाललेल्या या मेडिसीनच्या नाट्यामध्ये गेलनचं आगमन झालं.गेलनचा जन्म इ. स. १२९ मध्ये पार्गेमॉन (Pergamon) या ग्रीक शहरात झाला.

अलेक्झांड्रियामध्ये त्यानं तत्त्वज्ञान आणि वैद्यकशास्त्र यांचा अभ्यास केला.नंतर रोमचा राज्यकर्ता मार्कस् ऑरेलियस यानं बोलावल्यावर त्यानं तिथं आपली वैद्यकशास्त्राची प्रॅक्टिस केली.त्या काळी माणसांचं शवविच्छेदन (डिसेक्शन) करायला बंदी होती. त्यामुळे त्यानं प्राण्यांवरच अनेक प्रयोग केले आणि प्राण्यांचं डिसेक्शनही केलं.त्यातून केलेली निरीक्षणं त्यानं लिहून ठेवली आहेत.त्या काळी त्याचं काम त्या काळाच्या बरंच पुढारलेलं असल्यामुळे गेलनला अनेक शत्रूही निर्माण झाले.हा अभ्यास करताना गेलननं श्वसननलिकेचं आणि छातीमधल्या डायक्रॅमच्या स्नायूंचं व्यवस्थित वर्णन करून ठेवलं आहे.विशेष म्हणजे त्याच वेळी त्यानं गळ्यात उगम पावून फुफ्फुस आणि हृदयाकडे जाणाऱ्या फ्रेनिक नर्व्ह चंही छान वर्णन करून ठेवलं आहे.त्या काळी हे करणं म्हणजे खरंच खूप मोठं काम होतं.फ्रेन या ग्रीक शब्दावरून या नर्व्हला 'फ्रेनिक नर्व्ह' असं नाव मिळालं आहे.फ्रेन म्हणजे डायफ्रेंम.हे पटवून देताना त्यानं प्रेक्षकांसमोर जिवंत डुकराचं डिसेक्शन (विच्छेदन) केलं होतं.


गेलननं आधीचीच इरॅसिस्ट्रसची डबल व्हॅस्क्युलर सिस्टिम म्हणजेच धमन्या (आर्टरीज) आणि शिरा (व्हेन्स) असलेली सिस्टिम मान्य केली होती.पण इरॅसिस्ट्रसच्या विरुद्ध आर्टरीजमध्ये सुद्धा रक्त असतं असं गेलनच्या लक्षात आलं होतं.


गेलन रोममध्ये वारला.गेलननं केलेल्या कामावर पुढे हजार वर्ष काही संशोधनच झालं नाही.मध्ययुगापर्यंत माणसाच्या शरीराचं विच्छेदन (डिसेक्शन) करायला मान्यता नव्हती.त्यामुळे गेलनचं लिखाण पुढची अनेक वर्षं त्यात काहीही बदल न होतात तसच सगळ्या जगभर पसरत राहिलं.१३ व्या शतकाच्या शेवटी शेवटी युरोपमधल्या विद्यापीठांमध्ये माणसाच्या शरीराचं डिसेक्शन करायला परवानगी मिळाली.त्यानंतरच शरीरविज्ञानाची खरी प्रगती झाली. १२४३ मध्ये अरब वैज्ञानिक इब्न अल् नफिस यानं पल्मनरी सर्क्युलेशनचा शोध लावला होता.पल्मनरी सर्क्युलेशन म्हणजे हृदयाकडून अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे येतं आणि फुफ्फुसात ते शुद्ध होऊन पुन्हा हृदयाकडे पाठवलं जाणं.पण रक्त नेमकं शुद्ध कसं होतं हे मात्र त्याला सांगता आलं नव्हतं. पंधराव्या शतकात लिओनार्डो दा विंची यानं फुफ्फुसांना झाडाच्या फांद्यांची उपमा देऊन त्यांचं तपशीलवार चित्र काढलं होतं.त्यात त्यानं फुफ्फुसाचं आणि त्याच्या स्नायूंचंही चित्र काढलं होतं.माणसाचा आवाजही गळ्यातल्या स्नायूंच्या आकुंचन- प्रसरणानं निर्माण होतो हे त्याच्या लक्षात आलं होतं.


१६२८ साली विल्यम हार्वेनं रक्ताभिसरणाविषयी सिद्धान्त आधीच मांडून ठेवले होते.माल्पिघी त्यामुळे भारावून गेला होता.पण हार्वेच्या थिअरीमध्ये एक मोठी उणीव अजून राहिली होती.धमन्यातून (आर्टरीज) शुद्ध रक्त वाहतं,नंतर ते रक्त अशुद्ध होतं आणि मग ते शिरांतून (व्हेन्स) वाहायला लागतं,हे त्यानं सांगितलं होतं.पण हे रक्त धमन्यांतून शिरांमध्ये कसं जातं? थोडक्यात,धमन्या आणि शिरा यांना कोण जोडतं? हा प्रश्न अजून सुटायचाच होता. इ.स.१६६० ते १६६१ च्या दरम्यान माल्पिधीनं सूक्ष्मदर्शकांखाली निरीक्षणं करून कॅपिलरीज म्हणजे केशवाहिन्यांचा शोध लावला आणि हे कोडं सोडवलं.

सजीव,अच्चुत गोडबोले, अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन


माल्पिघीनं त्या काळी नव्यानंच शोध लागलेल्या कंपाऊंड मायक्रोस्कोपनं पल्मनरी अल्व्हीओलाय म्हणजे वायुकोश (फुफ्फुसातल्या हवेच्या लहान लहान पिशव्या) शोधून काढल्या.त्याचं त्यानं झकास वर्णन करून ठेवलं आहे.


माल्पिघीला अल्व्हीओलाय आणि कॅपिलरीज यांची रचना जरी मायक्रोस्कोपच्या साहाय्यानं कळली असली तरी त्यांचं नेमकं कार्य समजलं नव्हतं.यामुळे रक्तात ऑक्सिजन कसा मिसळला जातो हे त्याला समजलेलं नव्हतं.


सतराव्या शतकात वैज्ञानिकांना माणसाच्या शरीरात श्वसन आणि रक्ताभिसरण कसं होतं हे समजलं होतं, पण या गोष्टी नेमक्या का होतात याचं कोडं मात्र सुटलं नव्हतं.याचं कारण त्या काळी लोकांना हवेत वेगवेगळे वायू असतात हेच माहीत नव्हतं,त्यामुळे माणूस फक्त हवा आत घेतो आणि हवाच बाहेर सोडतो असं वाटणं साहजिकच होतं.आणि असं असेल तर मग हा उपद्व्याप करायचा तरी कशाला? असं वाटणं त्या काळी साहजिकच होतं.पण मेलेला माणूस श्वासोच्छ्वास करून हवा आतबाहेर करत नाही आणि काही कारणांनी श्वास कोंडला की माणूस मरतो हे त्यांनी पाहिलं होतं.त्यामुळे जिवंत राहण्यासाठी हवा अत्यंत गरजेची असावी हेही त्यांना कळत होतं.मग ही हवा आत घेणं ठीक होतं,पण मग तीच हवा माणूस बाहेर का सोडतो ? की माणूस हवेतले काही नेमके घटक आत घेतो आणि नको असलेले बाहेर टाकतो ?


आणि मग या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी वैज्ञानिक हवेतल्या वेगवेगळ्या घटकांचा शोध घ्यायला लागले.


१६४४ मध्ये इव्हांगुलिस्ता टोरिसेली (Evangelista Torricelli) यानं पहिल्यांदाच पाऱ्याचा बॅरोमीटर तयार केला.त्यामुळे चक्क पहिल्यांदाच हवेलाही वजन असतं आणि आपण हवेचं वजन मोजू शकतो हे माणसाच्या लक्षात आलं.

आपले हे निष्कर्ष त्यानं आपण हवेच्या समुद्राच्या तळाशी चक्क पोहत असतो...अशा त-हेनं लिहून त्या काळी खळबळच माजवून दिली होती.

 

याच दरम्यान इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डमध्ये दोन वेगवेगळ्या गटांनी एकत्र येऊन 'नवं प्रयोगात्मक तत्त्वज्ञान' (New Experimental Philosophy) निर्माण करायचं ठरवलं.

त्यातूनच मग १६६२ मध्ये 'रॉयल सोसायटी'ची स्थापना झाली.रॉयल सोसायटीमध्ये विज्ञानात होणाऱ्या नवनवीन शोधांना मान्यता दिली जायची,त्यावर चर्चा व्हायच्या आणि असं बरंच काही चालायचं.पण त्या काळी विज्ञान 'सायन्स' हा शब्द प्रचलित नसल्यामुळे विज्ञानालाही 'नॅचरल फिलॉसॉफी' म्हणजे 'नैसर्गिक तत्त्वज्ञान'च म्हटलं जाई. त्यामुळेच प्रयोगात्मक विज्ञानाला त्यांनी प्रयोगात्मक तत्त्वज्ञान म्हटलं होतं.


पुढे रॉबर्ट बॉइलनं (१६२७-१६९१) हवेचा पंप तयार केला.तो वापरून त्यानं अनेक प्रयोग केले.त्यातच एका प्रयोगात त्यानं एका खोलीतली सगळी हवाही काढून घेतली.त्यामुळे तिथं जळत असलेला दिवाही विझतो असं त्याच्या लक्षात आलं.हाच प्रयोग त्यानं खोलीत जिवंत प्राणी ठेवूनही करून पाहिला.त्यातून हवा काढून घेतल्यावर जिवंत प्राणीही मरतो असं त्याच्या लक्षात आलं.या सगळ्या प्रयोगांवरून प्राण्यांना जगण्यासाठी आणि ज्वलनासाठीही हवा गरजेची असते असा निष्कर्ष त्यानं काढला.पण यापुढे त्यानं काहीच प्रयोग केले नाहीत.


त्यानंतर १६६० च्या दरम्यान रॉबर्ट हुकनं (१६३५-१७०३) एका कुत्र्यावर ओपन चेस्ट सर्जरी केली.त्यात त्यानं लोहाराच्या भात्यासारखा प्राण्याच्या शरीरात हवा भरायचा भाता वापरला होता.तो भाता त्यानं कुत्र्याच्या घशातल्या श्वसननलिकेला जोडला आणि त्यानं त्या कुत्र्याच्या फुफ्फुसाच्या आवरणावर (Pleura) अनेक छिद्रं केली आणि त्या भात्यातून त्यानं कुत्र्याच्या श्वसननलिकेत हवा भरली.त्यातून त्यानं रॉयल सोसायटीमध्ये हे दाखवून दिलं की फुफ्फुसातून जरी हवा जाऊ दिली तरी प्राणी मरत नाही.पण त्याला जर हवेचा पुरवठाच बंद झाला तर मात्र प्राणी मरतो.त्याच गटातल्या जॉन लॉक (John Locke १६३२-१७०४) नावाच्या दुसऱ्या एका वैज्ञानिकानं रक्तात हवा मिसळली गेली की ती जीवनासाठी जास्त उपयुक्त होत असावी असं एक गृहीतक मांडलं. रक्तातली हवा शरीरानं काढून घेतली आणि वापरली की ते रक्त पुन्हा फुफ्फुस आणि हृदयाकडे नवीन हवा भरून घेण्यासाठी पाठवलं जातं हेही त्याच्या लक्षात आलं होतं.पण गंमत बघा! त्यातूनच रक्तामध्ये हवा फुफ्फुसामध्ये मिसळली जाते या निष्कर्षापर्यंत आला असतानाही पुढे संशोधन करायचं सोडून तो वैद्यकीय सेवेकडे वळला.( उर्वरित भाग पुढील लेखामध्ये )