* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१८/३/२५

एरिख् फॉन डॅनिकेन / Erich von Daniken

३० सप्टेंबर, १८७८ रोजी निर्णय झाला की आवाजाची दिशा…शिल्लक भाग पुढे सुरु…!


न ओळखता येईल अशा त-हेने बोलण्याचा हा फारच सुंदर प्रयोग होता म्हणून.माणसाचा आवाज कोणत्याही धातूतून काढणे ही केवळ अशक्य गोष्ट आहे.या विद्वानांना फक्त एकच गोष्ट माहिती नव्हती.अमेरिकेत या शोधाचे पेटंट १९ फेब्रुवारी १८७८ रोजीच एडिसनला देण्यात आले होते.


२६ फेब्रुवारी,१८६१ रोजी लाइपझिग येथे योहान फिलीप रीस याने टेलिफोनचे पहिले प्रात्यक्षिक दाखवले.१८६४ मध्ये फ्रैंकफुर्ट येथे शास्त्रज्ञांच्या परिषदेत त्याने त्याचा उपयोग दाखवला.त्यावेळी त्याला वाक्येच्या वाक्ये मात्र प्रक्षेपित करता आली नाहीत. तरीही हा शोध किती क्रांतीकारक ठरेल हे लक्षात यावे इतका तो निश्चितच यशस्वी झाला होता.पण त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले.


१८७२ मध्ये सर्व संशोधनांचा इतिहास म्युनिखमध्ये लिहिला गेला त्यात रीसचा उल्लेखही नव्हता. 'टेलिफोन' या त्यानेच तयार केलेल्या शब्दाचाही त्यात उल्लेख नव्हता.सर्व जण त्याचे संशोधन कायमचे विसरूनही गेले असते पण त्याच वर्षी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल याने टेलिफोनचे सुधारलेले उपकरण शोधले आणि 'टेलिफोनचा जनक' म्हणून जगात त्याची कायमची नोंद झाली.


रीस हा कंगाल अवस्थेत दोन वर्षांनी मरण पावला. त्याच्या शोधाचा उपयोग त्याला कधीच झाला नाही. प्रत्येक टेलिफोनमागे फक्त एक पेन्स एवढी रॉयल्टी त्याला मिळाली असती तरी तो जगातला एक श्रीमंत माणूस बनला असता.


गिलोटीनवर मरण पावलेला लव्हायझ्ये सायन्स अकॅडमीचा एक संचालक, खजिनदार व बँक मॅनेजरही होता.याशिवाय आधुनिक रसायनशास्त्राचा तो जनक समजला जातो.त्याने शेकडो वर्षे खऱ्या वाटत असलेल्या समजुती खोट्या पाडल्या.हवेचे वेगवेगळे घटक कोणते ते सांगून,पाणीसुद्धा आणखी ज्याचे घटक पाडता येत नाही असा पदार्थ (Element) नसून दोन घटकांच्या सहाय्याने बनलेला पदार्थ (Compoun) आहे असे त्याने जाहीर करून टाकले.या त्याच्या 'उद्धटपणामुळे' एका सदस्याने खवळूनच सायन्स अकॅडमीच्या सभेत सांगितले की,मूलद्रव्ये २००० वर्षांपूर्वीच शोधली गेली आहेत.प्रत्येक शतकात शास्त्रज्ञांनी त्यांची फेरतपासणी केली आहे.लव्हायझ्ये आता पाणी आणि वायू हे निरनिराळे घटक बनून झालेले पदार्थ आहेत असे सांगायला लागला तर आजपर्यंतचे सर्व संशोधन मातीमोल ठरेल.लोकांचा संधोधनावरचा विश्वासच ढळेल.


वाफेवर चालणारे पहिले इंजिन जॉर्ज स्टीफन्सन याने १८१४ मध्ये बांधले;पण या शोधाचे दूरगामी परिणाम लक्षात यायला राजकीय नेत्यांनासुद्धा ७ वर्षे लागली. पार्लमेंटमध्ये नवीन रेल्वे बांधण्याच्या प्रस्तावावर त्याला कुणी बोलूच देईना.

वाफेचे इंजिन रेल्वेमार्गावरील घरांना आगी लावील,त्या आवाजाने लोक वेडे होतील,रेल्वे मार्गावरील जमिनींची किंमत कमी होईल असे अनेक मुद्दे निर्माण करण्यात आले.

पण काही वेळा अनेक शास्त्रज्ञ आपल्या सहकाऱ्याचा एखादा शोध मातीमोल ठरवत असताना राजकीय नेते मात्र अशा शोधांनी होणारी क्रांती,होणारे परिवर्तन लक्षात घेऊ शकतात. १८२१ मध्ये पार्लमेंटने ३६ विरुद्ध ३५ मतांनी लिव्हरपूल ते मॅन्चेस्टर हा मार्ग बांधायला परवानगी दिली; तरीही आता अनर्थ माजायची वेळ आली आहे असे इतर शास्त्रज्ञ म्हणतच राहिले.


अगदी विद्वान असे सायन्स अकॅडमीचे सदस्य सुद्धा काही वेळा अगदी आश्चर्यकारक चुका करतात.ज्या रूढींचा वर्षानुवर्षे पगडा बसलेला असतो,त्यांचा त्याग तेसुद्धा करू शकत नाहीत.

क्रांतिकारक शोधांच्या जनकांना फार मोठे अपमान सहन करावे लागतात. त्यांच्या मृत्यूनंतरच त्यांच्या शोधाचे महत्त्व जगाला समजते अशी अनंत उदाहरणे आहेत.


पण मांडलेल्या सिद्धान्तांची दृष्य फळे पाहू शकलेला व ते सिद्धांत प्रत्यक्षात उतरलेले पाहिलेला एक शास्त्रज्ञ म्हणजे 'अंतराळ युगाचा जनक' म्हणून मानला गेलेला हर्मन ओबेर्थ!


१९१७ मध्येच हर्मन ओबेर्थ याने १० टन वजन अंतराळात नेऊ शकेल अशा २५ मीटर लांबीच्या आणि ५ मीटर व्यासाच्या अग्निबाणाचा आराखडा बनवला. ऑक्सिजन आणि अल्कोहोल यांचे मिश्रण इंधन म्हणून वापरले जाईल असेही तो म्हणाला आणि तात्काळ इतर शास्त्रज्ञांच्या कुचेष्टेचा विषय ठरला.असा अग्निबाण कधीच आकाशात उडणे शक्य नाही असे टीकाकार सर्वांच्या कानीकपाळी ओरडत राहिले.


१९२३ मध्ये Rockets to Planetary Space आणि १९२९ मध्ये Ways to Spaceships' Travel's अशी अगदी भविष्यसूचक पुस्तके त्याने लिहिली.आता त्याच्यावरची टीका अगदी जहरी बनली होती.माणसाचे अस्तित्वच नष्ट होण्याची जेव्हा पाळी येईल तेव्हाच अंतराळप्रवास बहुतेक शक्य होईल असे अनेकांनी प्रतिपादन केले.ओबेर्थने मात्र कधीच कुणाची पर्वा केली नाही.आज आता अग्निबाण या विषयावर जास्त काही सांगण्याची आवश्यकताच दिसत नाही. त्याच्या सिद्धांतावर आधारलेली त्याची सर्व भविष्ये खरी ठरत आहेत.मानव जातही काही नष्ट झालेली नाही.

आता त्याच्यावर अफाट टीका करणाऱ्यांचा शब्दही ऐकू येत नाही.त्याच्या सिद्धांताचे यश बघण्याचे भाग्य ओबेर्थला लाभले ही आनंददायक घटना आहे.असे नशीब फार थोड्यांच्या वाट्याला आले आहे.


हा सर्व इतिहास लक्षात घेऊन आपल्या सिद्धांतालाही कडाक्याचा विरोध होणार याची डॅनिकेन यांना पूर्ण कल्पना आहे.प्रचलित समजुतींच्या संपूर्णतःविरोधी विचार कोणी मांडला तर जगाची उपजत प्रवृत्ती अशा विचाराला थारा न देण्याचीच असते हे त्यांनाही माहीत आहे.पण ते म्हणतात,काही काही गोष्टींबद्दलची मते मानवाला बदलायला लागली नाहीत का? पृथ्वी गोल आहे किंवा ती सूर्याभोवती फिरते असे ६०० वर्षांपूर्वी जे म्हणत होते त्यांची गणना वेडगळ लोकांतच व्हायची.वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यावरसुद्धा लिव्हरपूल ते मॅन्चेस्टर हा पहिला रेल्वेमार्ग बांधायला वर्षे विरोध होत होता. टेलिफोनवरून जगातील एका भागातून दुसऱ्या भागाशी संपर्क साधता येईल या गोष्टीवर तरी किती जणांचा विश्वास होता? आणि या सर्व गोष्टींबद्दल आज काय परिस्थिती आहे?


म्हणूनच ते म्हणतात की माझा सिद्धांत चुकीचा वाटत असेल तर मी मांडलेल्या सर्व गोष्टींना पर्यायी स्पष्टीकरण द्या.दुर्लक्ष करून मी सांगितलेल्या गोष्टींचे अस्तित्व नाहीसे होणार नाही.हल्लीचे युग विज्ञानयुग आहे.तेव्हा तंत्रज्ञ लोकच मी सांगितलेल्या अनेक मुद्द्यांच्या शक्याशक्यतेची शहानिशा समर्थपणे करू शकतील. तेव्हा इतिहासकार,उत्खनन शास्त्रज्ञ या सर्वांनी सर्व शास्त्रातील तंत्रज्ञांचा सल्ला घेऊन मानवी इतिहासाकडे पुन्हा नजर टाकायला हवी आणि आवश्यक असेल तर तो इतिहास संपूर्ण बदलायला हवा.


इजिप्तच्या अगदी पुराणकालीन चित्रलिपीतील तीन कोरीव शब्दांचा अर्थ आता लागला आहे.'मला उडायचे आहे.' या भाषांतराबद्दल इजिप्तचे तज्ञ जास्त काही बोलायला तयार नाहीत.ते भाषांतर त्यांनीच केलेले असूनही!


१८९८ मध्ये सक्करजवळील एका थडग्यात एक प्रतिकृती सापडली.त्याच्यावर पक्षी अशी चिठ्ठी डकवून कैरो येथील म्युझियममध्ये ती ठेवली गेली.पुरी सत्तर वर्षे! पुराणकालीन इतर शेकडो वस्तुंमधला हा एक पक्षी.१९६९ मध्ये डॉ.खलील मेसिया यानी हा पक्षी पाहिला.त्यांची नजर खिळली ती त्याच्या सरळ पंखांवर, उंच आणि सरळ शेपटीवर.त्यानी त्या पक्षाचे नीट निरीक्षण केले.त्याच्यावर काहीतरी कोरलेले होते.त्या अक्षरांचा अर्थ होता 'अमॉनची भेट !'


अमॉन कोण होता? इजिप्तचा वायुदेव ! डॉ.खलील यांचे कुतूहल चाळवले गेले.परिणाम?


आज तो 'पक्षी नाही तर विमानाची प्रतिकृती आहे' हे सर्वमान्य आहे.


तज्ञांनी तपासणी करून अशा त-हेने बांधलेले विमान उडू शकेल याची खात्री करून घेतली आहे.


या घटनेनंतर इजिप्शियन सरकारने एक तज्ञ समिती नेमून म्युझियममधील सर्वच 'पक्ष्यांच्या' प्रतिकृतींचा नव्याने अभ्यास केला.१२ जानेवारी,१९७२ रोजी प्राचीन इजिप्तच्या विमानांच्या प्रतिकृतींचे पहिले प्रदर्शन भरविण्यात आले.त्यात १४ पक्षी आता मांडून ठेवण्यात आले आहेत.विमानांच्या प्रतिकृती म्हणून!


जोसेफ ब्लुमरिच हा हंटस्व्हिले,अलाबामा येथील अमेरिकेतील राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेचा (नासा) एक तंत्रज्ञ.


अग्निबाण तंत्राबद्दलची अनेक पेटंटस् त्याच्या नावावर आहेत.

सॅटर्न आणि अपोलो रॉकेटस्स् वरील त्याच्या असाधारण कामगिरीबद्दल खास पदक देऊन अमेरिकन सरकारने त्याचा गौरवही केला आहे.लेखकाचे पहिले पुस्तक वाचल्यावर तो खवळला पण हाडाचा तंत्रज्ञ असल्याने त्याने पुराव्यानिशी लेखकाचे म्हणणे खोडून काढायचे ठरविले.बायबल विकत घेऊन त्याने इझिकेलची प्रवास वर्णने वाचायला सुरुवात केली.ती वाचता वाचता त्यात तो इतका रंगला की त्याने त्या वर्णनांप्रमाणे आराखडे बनवले,आलेख काढले,गणिते केली आणि तो अशा निर्णयाला पोहोचला की इझिकेलची अंतराळयाने अगदी शक्य कोटीतील आहेत.फक्त विज्ञानातील तेवढा टप्पा गाठायला आपल्याला अजूनही ५०-६० वर्षे आहेत.इझिकेलने वर्णन केलेल्या अंतराळयानाचा संबंध पृथ्वीभोवती भ्रमण करणाऱ्या अंतराळयानाशी होता; असाही निष्कर्ष त्याने काढला आहे.अपोलो ११ हे मुख्य यान चंद्राभोवती फिरत होते आणि चंद्रयानातून नील आर्मस्ट्राँग आणि एडविन आल्ड्रीन चंद्रावर उतरले तसाच हा प्रकार.थक्क करणारी गोष्ट ही की २५०० वर्षांपूर्वी हे सर्व घडले होते.यानंतर ब्लुमरिच याने स्वतःच एक 'इझिकेलची अंतराळयाने' (The Space-ships of Ezekiel) नावाचे एक पुस्तक लिहिले व त्यात त्याच्या संशोधनाचे निष्कर्ष मांडले. 


डॅनिकेनचे म्हणणे खोडून टाकायला निघालेल्या ब्लुमरिच याने त्याच्या म्हणण्यात खरोखरच तथ्य आहे असाच निर्वाळा द्यावा ही आश्चर्याची गोष्ट नाही? आणि हल्लीच्या युगात प्राचीन काळातील न समजणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावण्यासाठी तंत्रज्ञांची मदत घ्यावी,असे जे डॅनिकेन म्हणतात त्यालाच पुष्टी देणारी ही गोष्ट नाही का? अमेरिकन विमानतंत्रज्ञ जॉन ॲन्डरसन याच्या बाबतीत हेच घडले आहे.पालेन्क येथील शिलाचित्राचा अभ्यास करून त्याने त्याच्या प्रत्येक रेषेचा अर्थ लावून सिध्द केले आहे की,ते अंतराळयान खरोखर उडू शकेल म्हणून.डॉ.मेसन यांची मते,ब्लुमरिच,ॲन्डरसन यांचा पाठिंबा,इजिप्तमधील प्राचीन विमाने या सर्व गोष्टी डॅनिकेन यांचा सिद्धांत बरोबर आहे असेच दर्शवितात. 


डॅनिकेन यांचा सिद्धान्त हा असा आहे :


अज्ञात अशा पौराणिक काळात कोणत्या तरी बुद्धिमान जमातीत अंतराळात युद्धसंग्राम झाला.पराभूत जमातीतल्या काही जणांनी अंतराळयानात बसून पळ काढला.जिंकलेली जमात कशा त-हेने विचार करील याची पूर्ण कल्पना त्यांना होती.म्हणून पळून गेल्यावर ज्या ग्रहांवर वस्ती करणे त्यांना सहज शक्य होते अशा ग्रहांवर ते उतरलेच नाही.त्यांनी पृथ्वी हा ग्रह शोधला.त्यावरची परिस्थिती त्यांच्या पूर्वीच्या ग्रहाशी मिळतीजुळती होती.या नवीन वातावरणाचा सराव होण्यासाठी ते अनेक वर्षे पृथ्वीवर गॅसचे मुखवटे घालूनच वावरले.म्हणूनच जगातल्या गुहांत मुखवटे शिरस्त्राणे आणि इतर उपकरणे असलेले 'देव' आज आपल्याला दिसतात.


त्यांचा शोध करून संपूर्ण विनाश करण्याचा प्रयत्न जेते करणारच.

या भीतीने त्यांनी प्रथम जमिनीखाली शेकडो फूट खोल राहण्या

साठी प्रचंड विवरे खणली.हजारो मैल लांबीचे रस्ते बांधले.

पाठलागावर असणाऱ्या जेत्यांना फसविण्यासाठी त्यांनी आपल्या सूर्यमालेतील पाचव्या ग्रहावर अंतराळस्थानके बांधली,ट्रान्समिटर्स उभारले.या त्यांच्या सापळ्यात जेते लोक बरोबर अडकले आणि कसलाही विचार न करता तो ग्रह त्यांनी उद्ध्वस्त करून टाकला.आज आपल्या सूर्यमालेकडे नजर टाकली तर आजच्या चौथ्या आणि पाचव्या ग्रहातील,म्हणजेच मंगळ आणि गुरू यांच्यातील ३० कोटी मैलांचे अंतर अगदी अनैसर्गिक वाटते.पण ती जागा रिकामी नाही. लाखो दगड या ठिकाणी सूर्याभोवती फिरतात आणि याला आपण म्हणतो लघुग्रहांचा पट्टा! (Planetoid Belt) अगदी प्रथमपासून आपल्या खगोलशास्त्रज्ञांना वाटत आहे की मंगळ आणि गुरू यांच्यात एक ग्रह निश्चित असायला हवा होता पण तो उद्ध्वस्त झाला कसा? तो उध्वस्त झाला नाही,केला गेला!


तो ग्रह उध्वस्त झाल्यावर पराभूत जमातीची आता नावनिशाणी शिल्लक नाही अशी जेत्यांची खात्री पटली आणि ते आपली अंतराळयाने घेऊन स्वतःच्या ग्रहावर परत गेले.आपल्या ग्रहमालेतील या पाचव्या ग्रहाच्या नाशामुळे सूर्यमालेतील सर्वच ग्रहांचा समतोल काही काळ ढळला.पृथ्वीचा आस थोडा तिरपा झाला.


सर्वत्र महापूर आले.


त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून पराभूत बुद्धिमान जमात बाहेर आली.त्यावेळच्या पृथ्वीवरील आदिमानवांवर त्यांनी प्रयोग केले;त्यांच्यासारखीच बुद्धिमान जमात निर्माण करण्याच्या हेतूने!


मानवाच्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीचा विचार केला तर मानवाच्या बुद्धीची वाढ अगदी अचानक झाली आहे.या अफाट काळाचा विचार करता तो एका रात्रीत घडलेला चमत्कार वाटतो.डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे गोरीला आणि चिम्पांझीसारख्या माकडांपासून मानवाची उत्पत्ती झाली हे मान्य केले तरी एकाएकी बुद्धी प्रगल्भ होऊन माकडाचा मानव बनण्यात या परग्रहवासियांचा हात आहे.आता याच परग्रहवासियांना पृथ्वीवरील जमाती 'देव' मानायला लागल्या.पण पृथ्वीवरील बुद्धिमान जमातींची प्रगती तशी फार हळुहळू होत होती आणि काही वेळा संतापून या देवांनी,ज्यांनी ज्यांनी घालून दिलेले नियम पाळले नाहीत त्यांचा संहार घडवून आणला.याच्यात आपण काही अनैतिक गोष्ट करीत आहोत असे 'देवांना' मुळीच वाटत नव्हते.त्यांच्याप्रमाणे बुद्धिमान जमात निर्माण करणे एवढेच ते त्यांचे कर्तव्य मानीत होते.त्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट ते निष्ठुरपणाने बाजूला सारीत होते.


पण यावेळेपर्यंत प्रथम उतरलेले अंतराळवीर शिल्लक नव्हते,तर त्यांची पुढची पिढी होती.देवपुत्रांची! आणि ते नाश करायला निघाले की पृथ्वीवरील जमाती घाबरून जात होत्या.या देवांच्या भीतीनेच पृथ्वीवरील जमातींनीही आता लपण्यासाठी जमिनी

खाली जागा शोधायला सुरुवात केली.इक्वेडोर आणि पेरू या देशातल्या सारखीच पण तितक्या उत्कृष्ट आयुधांनी न केलेली बांधकामे सॅन ऑगस्टीन (कोलंबिया) चोलुला (मेक्सिको) अशा ठिकाणी सापडली आहेत ती याचमुळे.निदान पहिले 'देव' जे उतरले त्यांची डॅनिकेनची कथा ही अशी आहे.खुलासा हा असा आहे.पण शेवटी डॅनिकेन यांचा सिद्धांत बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या ग्रहांवर आपल्याहून प्रगत संस्कृतीचे अस्तित्व सिद्ध करायला पाहिजे,त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे आणि त्यासाठी अंतराळात पाऊल ठेवायला पाहिजे.त्या दृष्टीने पावले टाकायला आपण खरी म्हणजे कधीच सुरुवात केली आहे.


१६.०१.२५ या लेखातील शेवटचा भाग...





१६/३/२५

एरिख् फॉन डॅनिकेन / Erich von Daniken

आपल्या अज्ञात इतिहासाच्या काळ्या कालखंडात परग्रहांवरील अंतराळवीरांनी भेटी दिल्या होत्या आणि त्यांनाच आपण देव मानायला लागलो या क्रांतिकारक सिद्धांताचे जनक आहेत एरिख् फॉन डॅनिकेन.ज्यांचा अजिबात अर्थ लागत नव्हता अशा हजारो गोष्टींचा विचार करून त्यांनी मानव जातीच्या इतिहासाबाबत एक आगळाच सिद्धांत जगासमोर मांडला आहे.आपण किती वेगळा विचार मांडत आहोत याची जाणीव असल्यामुळेच की काय या त्यांच्या सिद्धांतासाठी त्यांनी अफाट परिश्रम घेतले आहेत.

त्यांच्या पहिल्या पुस्तकाची पूर्वतयारी करायला त्यांना तब्बल दहा वर्षे लागली. 


अमेरिका,कॅनडा,मेक्सिको,पेरू,ब्राझिल,बोलिव्हिया, इराक,

इजिप्त,इटली,दक्षिण अमेरिका,ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड,जपान इत्यादि सर्व खंडांतील कित्येक देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत.त्यांनी मांडलेले कित्येक पुरावे जिथे जाणेसुद्धा मुष्कील अशा दुर्गम पहाडांवर,गुहांत आहेत.मेक्सिकोमधील पालेन्क येथील पिरॅमिडच्या एका फरशीचे फोटो घेण्यासाठी त्यांना मेक्सिकन सरकारकडे आठ वेळा अर्ज करावा लागला


त्यानंतर त्यांना कशीबशी परवानगी मिळाली. ती सुद्धा फक्त अर्ध्या तासापुरती ! बोलिव्हियातील टिआहुआन्को या शहरात पोहोचण्यासाठी पेरू या देशातील कुझको शहरातून निघाल्यावर कित्येक दिवस बोटीने व रेल्वेने प्रवास करावा लागतो.१३००० फूट उंचीवरील या शहराच्या आसपास मैलोंमैल लोकवस्ती नाही.

पेरू व शेजारच्या इक्वेडोर या देशातील भूगर्भाखालील रस्त्यांचे जाळे शोधण्यासाठी त्यांना कित्येक दिवस तिथल्या रानटी लोकात राहून त्यांचा विश्वास संपादन करावा लागला,कारण आत जाण्याचा योग्य मार्ग त्यांनाच माहीत होता.त्यांच्या संशोधनामागे अपरिमित श्रम आणि कष्ट आहेत यात शंकाच नाही...


या सिद्धांतावर पुरावे मांडण्यासाठी त्यांनी आजपर्यंत डझनभर तरी पुस्तके लिहिली आहेत.हे पुस्तक मुख्यतः त्यांच्या पहिल्या आणि अत्यंत गाजलेल्या Chariots of the Gods या पुस्तकावर आधारित आहे.


लेखकाप्रमाणेच कित्येक वर्षांपूर्वी डॉ.मॉरीस जेसप (मृत्यू १९५९) यांनीही अशाच त तऱ्हेचु मते व्यक्त केली होती.ते एक नाणावलेले खगोलशास्त्रज्ञ व त्या काळातील 'चन्द्र' या विषयावरचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जात.दक्षिण अमेरिकेतील पेरू,बोलिव्हिया आणि इतर देशातील माया,इंका व त्यांच्या आधींच्याही


अज्ञात संस्कृतीची भव्य बांधकामे आणि वीस काय,दोनशेच काय पण दोन हजार टन वजनांचे दगड खाणींपासून शेकडो मैलांवर आणून,लीलया डोंगराच्या कड्यांवर सुद्धा चढवून त्यावर केलेली कोरीव कामे पाहिल्यावर त्यांनी म्हटले होते की ही बांधकामे,'वजनरहित' अवस्थेत या प्रचंड शिळा आकाशातून अंतराळयानांच्या सहाय्याने उचलून आणून व एकमेकांवर चढवून केली असावीत.


मग हेच तंत्र पिरॅमिड बांधताना वापरले असेल काय?

या शतकात आपल्याला आलेला या गोष्टींचा अनुभव काय आहे?


इजिप्तच्या दुसरा रामेसिस या राजाने नाईलच्या किनाऱ्यावर अबू सिम्बेल येथे दोन देवळे बांधली.या देवळांच्या प्रवेशद्वाराशीच त्याचे स्वतःचेच ६० फूट उंचीचे चार प्रचंड पुतळे होते.अस्वान धरण बांधल्यावर ही देवळे धरणाच्या पाण्याखाली बुडून जाणार होती. ऐतिहासिक महत्त्वाच्या या कलाकृती वाचवण्यासाठी ही देवळे त्यांच्या सध्याच्या जागेपासून १८० फूट उंच हलवण्यासाठी जगातील प्रगत औद्योगिक राष्ट्रांनी कंबर कसली.अद्ययावत यंत्रसामुग्री आणली गेली पण पुतळे मात्र शेवटी उभे-आडवे कापूनच वर न्यावे लागले आणि पुन्हा जोडावे लागले.कारण या पुतळ्यांचे वजन पेलू शकतील अशा क्रेन्स अस्तित्वात नाहीत.ते पुतळे 'हलवण्यासाठी' आणलेली यंत्रसामुग्री पाहिल्यावर प्रथम विचार मनात येतो तो इजिप्शियन लोकांनी आजचे आधुनिक तंत्रज्ञान नसताना हे पुतळे कोरले तरी कसे? 


हे पुतळे निदान तिथल्या जागेवरच्या खडकांतून कोरलेले आहेत पण थेबेसजवळील मेमनॉन येथील ६०० टन वजनाच्या पुतळ्यांचे काय? किंवा बालबेक येथील २००० टन वजनाच्या ६०-६० फूट लांबीच्या शिलांचे काय? त्या कशा वाहून नेल्या? कापल्या कशा? लाकडी रोलर्सचे मूर्खपणाचे स्पष्टीकरण किती दिवस पुरणार? मग डॉ.जेसप म्हणतात तसाच प्रकार असेल आणि हे ज्ञान असणारी प्रगत संस्कृती पृथ्वीवर अस्तित्वात नसेल तर परग्रहांवरील अंतराळवीरांचेच हे काम असेल काय?


भूपृष्ठावर सापडणारी बांधकामे सोडून भूगर्भात ७५० फूट खोल,हजारो मैल लांबीच्या रस्त्यांचे जाळेच दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि इक्वेडोर या देशांखाली आढळून आले आहे.

भूगर्भातील हे रस्ते कुठपर्यंत पोहोचतात हे आजही माहीत नाही.रस्त्याचे प्रत्येक वळण अगदी काटकोनात आहे.भिंती व छते अगदी गुळगुळीत आहेत.इतकी गुळगुळीत की कित्येक ठिकाणी पॉलीश केल्याप्रमाणे ती चकाकतात.


वृक्षारोपणासाठी दोन फूट लांबी,रूंदी,उंचीचे खड्डे खणावे लागले तरी किती माती वर निघते याची कल्पना प्रत्येकाला कधी ना कधी आली असेल पण बोगद्यांचे एवढे प्रचंड जाळे जमिनीखाली असून त्याची कल्पना येणारे जमिनीवर काहीच कसे नाही?


 या ठिकाणी एका प्रचंड हॉलमध्ये फक्त एक मिलीमीटर जाड,३ फूट २ इंच लांब आणि १ फूट ७ इंच रुंद असे शेकडो पत्रे सापडले आहेत.त्यावरील चिन्हांचा आणि लिखाणाचा अर्थ आपण अजून लावू शकलेलो नाही.


तुर्कस्थानमधील डेरिन्कुय या ठिकाणी अशी तेरा मजली बांधकामे जमिनीखाली आढळली आहेत. म्हणजे आजपर्यंत तरी आपण तेराच मजले खालपर्यंत खणत गेलो आहोत.विहिरी,खेळती हवा त्याचप्रमाणे पळून जाण्यासाठी वेगवेगळे मार्गही इथे आढळतात. तुर्कस्तानमध्ये अशी चौदा शहरे माहिती आहेत.एके काळी १०-१२ लाख लोक तरी वर्षांनुवर्षे त्यात राहत होते असा अंदाज आहे.यांना लागणारा अन्नपुरवठा कसा होत होता? कुठून होत होता? कोण करीत होते ?


आपण कॉमिक्स पुस्तकात 'मोल' नावाच्या जमिनीखालून प्रवास करणाऱ्या यंत्राबद्दल कित्येक वर्षे वाचत आहोत.रॉकेटसारखे दिसणारे असे यंत्र आता अमेरिकेने खरोखरच बनवले आहे.उष्णता निर्माण करून,खडकसुद्धा वितळवून ते बोगदे खणत पुढे जाते. दगड,माती वगैरे काही वर काढायचा प्रश्नच येत नाही.


या अशाच पण आणखीही अद्ययावत यंत्रांच्या सहाय्याने पेरू,इक्वेडोर,तुर्कस्तान येथील ही भूगर्भातील कामे केली गेली होती का? ज्या जमातींना अंतराळ प्रवासाचे ज्ञान हजारो वर्षांपूर्वी होते त्यांना तरी ही गोष्ट अशक्य नसावी.उडत्या तबकड्या हा डॉ.मॉरिस जेसप यांचा त्यांच्या मृत्यूपर्यंत संशोधनाचा विषय होता.या विषयावर त्यांनी एक पुस्तकही लिहिले होते.उडत्या तबकड्या कोणत्या शक्तींवर चालतात याचे त्यांना गूढ होते.या उडत्या तबकड्या जे इंधन वापरतात,त्याची माहिती आपल्या हजारो वर्षापूर्वीच्या काळात कुणाला तरी होती व हीच परग्रहांवरील जमात देव म्हणून गणली जाऊ लागली,हाच धक्कादायक विचार त्यांनीही मांडला होता.


हे इंधन शोधून काढीपर्यंत आपण अंतराळ प्रवासाचा विचार प्रत्यक्षात आणूच शकत नाही.आजपर्यंत आपण बांधलेली सर्व अंतराळयाने आणि तयार होत असलेल्या नवीन आराखड्यांप्रमाणे नजिकच्या भविष्यकाळात बांधली जाणारी अंतराळयाने अग्निबाणांच्या आकाराचीच आहेत.दोन गोष्टींमुळे याच आकाराची अंतराळयाने बांधणे आपल्याला भाग पडत आहे.एक म्हणजे शक्तीमान प्रॉपल्शन युनिटस् आपल्याकडे नाहीत आणि दुसरी म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर पडण्यासाठी हवेच्या घर्षणाचा कमीत कमी त्रास होईल असाच आकार असणे आवश्यक आहे.

दुसऱ्या सूर्यमालांवर प्रवास करायचा झाला तर अशी वाहने निरुपयोगी आहेत कारण त्यातून वर्षानुवर्षे प्रवास करावा लागणार आहे.एकदा अंतराळात शिरलो की कोणत्याही आकाराचे अंतराळयान खरे म्हणजे चालू शकेल कारण तिथे हवेच्या घर्षणाचा प्रश्नच नाही.


हवाच नाही तर घर्षण कुठून? आपले 'ईगल' हे चन्द्रयान खोक्याच्या आकाराचे होतेच की! थोडक्यात,पृथ्वीवरील वातावरणासारख्या वातावरणाला तोंड देण्याचा प्रश्न येत नसेल तर तिथे कमीत कमी घर्षण होईल अशाच तऱ्हेची अंतराळयाने बांधण्याचा विचार करण्याचे कारणच नाही.छोट्या अंतराळयानात अंग चोरून बसावे लागते.हलावे लागते.सगळी यंत्रे एकावर एक रचावी लागतात.एखाद्या कोपऱ्यात रॉकेटस् सोडण्याची साधनसामुग्री ठेवावी लागते.


अंतराळावर स्वारी करण्यासाठी आत्ताची द्रवरूप इंधनेसुद्धा उपयोगी नाहीत.ती वापरून जादा इंधनाचा साठा,

अंतराळयात्रिकांच्या खोल्या,इतर यंत्रसामुग्री अंतराळात वाहून नेताच येणे शक्य नाही.त्यासाठी अणुशक्ती किंवा फोटॉन रॉकेटस् असल्या गोष्टींचा वापर करावा लागेल.अशी अंतराळयाने प्रकाशवेगानेच उडू शकतील आणि इंधनाचा अमर्याद काळापर्यंत पुरवठा होत राहील.


अशा त-हेची प्रचंड अंतराळयाने बांधण्यासाठी पृथ्वीभोवती फिरणारे एक प्रचंड स्थानक बांधावे लागेल.एकेक भाग पृथ्वीवरून अंतराळात उडवायचा आणि एकामागोमाग एक भाग जोडत जायचे. पेन्सिलच्या आकारांची अंतराळयाने ‌बांधण्याचे मग कारणच नाही.अंतराळवीरांना आणखी एक प्रश्न सोडवावा लागेल.गुरुत्वाकर्षण! अंतराळात गुरुत्वाकर्षण नसतेच आणि वर्षानुवर्षे चालणाऱ्या प्रवासासाठी अंतराळवीरांना गुरुत्वाकर्षणाची आवश्यकता आहेच.मग गुरुत्वाकर्षण निर्माण करावे लागेल.पाण्याने भारलेली बादली जर जोरजोरात फिरवली तर त्यातून पाण्याचा एक थेंबसुद्धा सांडत नाही.पाणी तळाशी किंवा डोक्यावर असेल तेव्हा, छताशी म्हणू या,अगदी चिकटून राहते.केन्द्रप्रसारी बलामुळे (Centifugal Force) एक प्रकारचे गुरुत्वाकर्षणच निर्माण होते.अंतराळयानांच्या बाबतीतही हे करावे लागेल आणि त्यासाठी त्यांचा आकार गोलाकार आणि तबकड्यांसारखा वगैरेच असावा लागेल.मग अंतराळवीरांना मॅग्नेटिक बूट घालण्याची, पक्ष्यांप्रमाणे हवेतले अन्न पकडण्याची वगैरे आवश्यकताच राहणार नाही.ते नेहमीसारखेच या अंतराळयानात वावरतील.


आज हे जे आपण सर्व विचार करतो आहोत तेच प्राचीन काळातील देवांनी केले आहेत.चमकणाऱ्या अंडाकृती वाहनातून,गोलाकार यानातून प्रवास करणारे देव सर्व ठिकाणी सापडले आहेत.सुमेरियन सील्सवर गोलाकार यानांवर बसलेले,

चेंडूवर बसून उडणारे देव नेहमीच दिसतात.ॲझटेक लोकांचा सूर्यदेव गोलाकार अंतराळयानात बसून त्यातल्या यंत्रांशी खटखट करताना दिसतो.मग या सर्व देवांनी जर अगदी आपल्यासारखाच विचार करून त्या काळात अंतराळयाने बांधली असतील आणि अंतराळप्रवास केला असेल तर ते देव नसून परग्रहांवरील अंतराळवीरच होते याबद्दल शंका का यावी ?आपल्या सिद्धान्ताला कडक विरोध होणार हे लेखक गृहित धरून आहे.तो म्हणतो,त्याचे एक सोडा पण जागतिक कीर्ती मिळालेल्या संशोधकांनासुद्धा इतर लोकांकडून विरोध झालाच नाही किंवा इतर शास्त्रज्ञांकडूनही टवाळकी झालीच नव्हती असा भाग थोडाच आहे?


थॉमस अल्वा एडिसनच्या नावावर जगात अडीच हजार पेटंटस् तरी आहेत.त्याला त्याच्या फोनोग्राफच्या शोधाबद्दल इतर शास्त्रज्ञांकडून आलेला अनुभव सांगण्यासारखा आहे.


एडिसनच्या विनंतीनुसार मौसेल या शास्त्रज्ञाने एडिसनच्या फोनोग्राफचे प्रात्यक्षिक ११ मार्च १८७८ रोजी पॅरीसमध्ये सायन्स अकॅडमीसमोर करावयाचे ठरविले.ते प्रात्यक्षिक पाहिल्यावर एक शास्त्रज्ञ रागावून उठला आणि म्हणाला, 'आमची काय फसवणूक चालवली आहे? हा तर शुद्ध शब्दभ्रमाचा प्रकार आहे.' या प्रकाराची चौकशीच केली गेली आणि हा सर्व बनवाबनवीचा प्रकार आहे असे ठरले.३० सप्टेंबर, १८७८ रोजी निर्णय झाला की आवाजाची दिशा…


राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..

१४/३/२५

हरपलेले ज्ञान / Lost knowledge..!

ज्या प्राचीन भारताच्या लखलखत्या,वैभवशाली खजिन्याविषयी आपण बोलतोय,तो ज्ञानाचा खजिना नेमका गेला कुठे..? हे अत्यंत अमूल्य असे प्राचीन ज्ञान कुठे हरवले..? अनेक गोष्टी आपण भारतीयांनी सर्वप्रथम शोधल्या असे आपण म्हणतो,त्या गोष्टी नेमक्या कुठे विखरून गेल्या..? असे प्रश्न अनेक जण विचारतात.असे प्रश्न समोर येणे स्वाभाविकच आहे.एके काळी अत्यंत समृद्ध असलेला आपला देश इतका गरीब कसा काय झाला..? त्या प्राचीन ज्ञानाचा काहीच उपयोग झाला नाही का..? असेही प्रश्न समोर येतात.


काहीजण तर खवचटपणे असेही म्हणतात की,'जगात एखादा नवीन शोध लागला की,प्राचीन भारताची ही अभिमानी मंडळी ताबडतोब उसळी मारून समोर येतात आणि म्हणतात की,हा शोध तर भारतीयांनी फार आधीच लावला होता...!'


असे अनेक प्रश्न आणि अनेक आरोप... मग खरी वस्तुस्थिती काय आहे..?


पहिली गोष्ट ही की,त्या काळात आपला देश हा संपत्तीने आणि संस्कृतीने सर्वांत समृद्ध असलेला देश होता. आणि ही माहिती जगभर होती.म्हणूनच जगज्जेत्या म्हणवल्या जाणाऱ्या सिकंदरला (अलेक्झांडरला) अगदी लहानपणापासून वाटत होतं की,भारताला जिंकून घ्यावं.अकराव्या शतकापासून भारतावर आक्रमण करणाऱ्या मुसलमान आक्रमकांना भुरळ पडली होती ती भारताच्या वैभवाची.


भारताला जाण्यासाठी म्हणून निघालेला कोलंबस अमेरिकेला पोहोचला,तर वास्को-डी-गामा,मार्को पोलो या लोकांना भारताचे प्रचंड आकर्षण होते.


थोडक्यात,आपल्यासारख्या समृद्ध देशाबद्दल जगाला कुतूहल असणे स्वाभाविकच होते.आणि ही समृद्धी आपण आपल्या ज्ञानाच्या बळावर मिळवलेली होती.( भारतीय ज्ञानाचा खजिना,

प्रशांत पोळ,स्नेहल प्रकाशन )


हे ज्ञान कशा स्वरूपात आपल्या देशात जतन करून ठेवलं होतं..? त्या काळात छपाईचे तंत्रज्ञान अवगत नसल्याने ग्रंथ नकलून घेत.ते ग्रंथ लिहिणे,अर्थात नकलून घेणे,हा एक सोहळाच असायचा.

रामायण, गीता,महाभारत,वेद,उपनिषदे यांसारखे ग्रंथ नकलून घेण्यास महिनोन् महिने लागत.अगदी व्युत्पन्न शास्त्र्यांच्या घरीही फारसे ग्रंथ किंवा पोथ्या नसत.


हे ग्रंथ किंवा पोथ्या ठेवण्याच्या जागा म्हणजे विद्यापीठं, गुरुकुल आश्रम,मठं,देवस्थानं आणि मंदिरं.या ठिकाणी हे ग्रंथ अगदी भक्तिभावाने आणि व्यवस्थित ठेवलेले असायचे.


विद्यापीठांमध्ये मोठमोठी ग्रंथालयं होती.नालंदाच्या ग्रंथालयाबद्दल इतिहासात तुटक,तुटक माहिती आढळते.मात्र निश्चित आणि भरभक्कम पुरावा मिळाला तो हिंदीचे प्रसिद्ध लेखक आणि संशोधक राहुल सांकृत्यायन (१८९३ - १९६३) यांना.हे बौद्ध धर्माचे अभ्यासक होते.बौद्ध धर्माच्या प्राचीन ग्रंथांसाठी यांनी तिबेटपासून श्रीलंकेपर्यंत अनेक प्रवास केले.तिबेटला तर ते अनेकदा गेले.त्या काळात तिबेटवर चीनचे आक्रमण झालेले नव्हते.तिबेटच्या तत्कालीन सरकारने त्यांना विशिष्ट अतिथीचा दर्जा दिलेला होता आणि त्यांना कोणत्याही बौद्ध मंदिरात जाण्याचा मुक्त परवाना होता.राहुल सांकृत्यायननी याचा चांगला उपयोग करून घेतला.पाली आणि संस्कृत भाषेतले अनेक प्राचीन ग्रंथ त्यांनी वाचले आणि त्यांतले बरेचसे भारतातही आणले. याच प्रवासात मध्य तिबेटच्या एका बौद्ध आश्रमात त्यांना एक महत्त्वाचा ग्रंथ मिळाला.


बाराव्या,तेराव्या शतकांतील तिबेटी भिख्खू,'धर्मस्वामी' (मूळ नाव चागलोत्सावा. ११९७ - १२६४) ने लिहिलेला हा ग्रंथ.हा धर्मस्वामी सन १२३० च्या सुमारास नालंदाला भेट द्यायला गेला.बख्तियार खिलजीने ११९३ मध्ये नालंदाला उद्ध्वस्त केले होते.त्यामुळे नालंदाचे ग्रंथालय आणि नंतरचा तो विध्वंस डोळ्यांनी बघितलेली माणसं तिथं होती.त्या उद्ध्वस्त नालंदाच्या परिसरात फक्त सत्तर विद्यार्थी,'राहुल श्रीभद्र' ह्या ऐंशी वर्षांच्या बौद्ध शिक्षकाकडे विद्याध्ययन घेत होती.आणि या सर्वांची काळजी घेत होता,जयदेव नावाचा एक ब्राम्हण.या सर्वांशी बोलून धर्मस्वामीने जे चित्र नालंदाचे उभे केले आहे,ते भव्य आणि समृद्ध अशा विद्यापीठाचे आहे.दहा हजार विद्यार्थी,दोन हजार शिक्षक आणि संशोधक असलेले हे विद्यापीठ होते.


विद्यापीठाचे ग्रंथालय देखील विद्यापीठासारखेच प्रचंड होते. 'धर्मगंगा' नाव असलेल्या ह्या ग्रंथालय परिसरात तीन मोठमोठ्या इमारती होत्या.त्यांची नावं होती - रत्नसागर,रत्नोदधी आणि रत्नगंजका.यांतल्या रत्नोदधी ह्या नऊ मजल्याच्या (होय,नऊ मजल्याच्या. धर्मस्वामीने तसा उल्लेख त्याच्या पुस्तकात केला आहे.आणि ह्यूएनत्संग सकट काही चिनी प्रवासी-विद्यार्थ्यांनीही नऊ मजली उंच इमारतीचा उल्लेख केलाय.) इमारतीत अनेक प्राचीन (त्या काळातील प्राचीन.अर्थात त्या काळापूर्वी दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीचे.अर्थातच ख्रिस्तपूर्व एक हजार वर्षांचे) ग्रंथ सुरक्षितपणे ठेवण्यात आलेले होते.या दुर्मीळ ग्रंथांपैकी 'प्रज्ञापर मिता सूत्र' या ग्रंथाचा उल्लेख धर्मस्वामी करतोय.प्राचीन चिनी संशोधक झुआन झांग हा ह्या ग्रंथालयासंदर्भात लिहितो -'हा संपूर्ण ग्रंथालय परिसर, विटेच्या भिंतींनी बंदिस्त होता.या परिसराला एकच मोठे दार होते, जे उघडल्यावर आत आठ मोठमोठी दालनं दिसायची.ह्या ग्रंथालयात किती ग्रंथ असतील..? अक्षरशः अगणित.हजारो.कदाचित लाखो पण.आणि ग्रंथ म्हणजे हस्तलिखितं.भूर्जपत्रांवर,ताम्रपत्रांवर आणि कागदांवरही लिहिलेली.दुर्मीळ,प्राचीन अशी ही अमाप ग्रंथसंपदा.


बख्तियार खिलजी ह्या क्रूरकर्त्यानं ही सारी ग्रंथसंपदा जाळली.

आणि हे सर्व ग्रंथभांडार जाळून नष्ट करायला त्याला तीन महिन्यांपेक्षाही जास्त वेळ लागला..!


कोण होता हा बख्तियार खिलजी..?


'इख्तीयारुद्दिन मुहम्मद बिन बख्तियार खिलजी' या लांबलचक नावाचा हा प्राणी आताच्या दक्षिण अफगाणिस्तानातल्या 'गर्मसीर' ह्या लहानशा गावातला एक टोळीप्रमुख.पुढे हा कुतुबुद्दीन ऐबकच्या सैन्यात सेनापती झाला आणि दिल्ली बळकावल्यावर ऐबकाने त्याला बिहार आणि बंगाल जिंकायला पाठवले.


११९३ मध्ये याने नालंदा विद्यापीठाचा विध्वंस केला आणि विद्यापीठातील अत्यंत दुर्मिळ असा ग्रंथसंग्रह जाळून टाकला.सतत तीन महिने त्याचं सैन्य ग्रंथालयातून पुस्तकं आणून आगीत टाकत होतं. पण तरीही पुस्तकं उरतच होती.इतका विशाल ग्रंथसंग्रह होता तो.बख्तियार खिलजीनं फक्त नालंदाचं ग्रंथभांडारच नाही जाळलं,तर बंगाल मधल्या विक्रमशिला आणि उड्डयनपूर या विद्यापीठांनाही जाळून उद्ध्वस्त केलं.तिथलाही असाच मोठा ग्रंथसंग्रह नष्ट केला गेला.दुर्दैवाने हा क्रूरकर्मा बख्तियार खिलजी आज 'बांगला देशचा' राष्ट्रीय नायक आहे..!


नालंदा विश्वविद्यालय हे त्या काळातील सर्वांत मोठं विद्यापीठ असल्याने त्याला नष्ट करण्याची,त्यातील पुस्तक जाळून टाकण्याची बातमी इतिहासकारांनी नोंदवून घेतली.मात्र आपल्या खंडप्राय असलेल्या विशाल देशात अशी अनेक लहान-मोठी विद्यापीठं आणि कितीतरी गुरुकुलं होती.पुढच्या दोनशे-तीनशे वर्षांच्या काळात या ठिकाणची ग्रंथसंपत्ती ही,मुस्लीम आक्रमकांद्वारे अशाच प्रकारे नष्ट करण्यात आली.


बाराव्या शतकानंतर, भारतात विद्यापीठं नष्ट झाल्याने वेगवेगळ्या विषयांवर होत असलेले संशोधनाचे प्रकल्प बंद पडले. भारतीय ज्ञानाचा हा ओघच थांबला. उच्च स्तरावरचं ज्ञान घेणं आणि देणं, नुसतं कठीणच नाही, तर अशक्य झालं. ग्रंथांची निर्मिती थांबली. आणि म्हणूनच अगदी अपवाद वगळता, बाराव्या शतकानंतर लिहिलेले महत्वाचे अथवा मौलिक ग्रंथ आढळत नाहीत.


अकराव्या शतकात,माळव्याचा राजा भोज याने संकलित केलेला 'समरांगण सूत्रधार' हा महत्त्वाचा ग्रंथ.यात ८३ अध्याय असून अनेक विषयांसंबंधी लिहिलेले आहे.पुढे अठराव्या शतकात जगन्नाथ पंडिताने 'सिद्धांत कौस्तुभ' हा खगोलशास्त्रावरचा ग्रंथ लिहिला आहे.पण हे तसे अपवादच.आपलं प्रचंड मोठं ज्ञानभांडार मुस्लीम आक्रमकांनी नष्ट केल्या-मुळे ज्ञानाचा जिवंत आणि खळाळता प्रवाह आटला. थांबला.त्यातूनही जे तुरळक ग्रंथ शिल्लक होते,ते इंग्रजांनी आणि इतर युरोपियनांनी आपापल्या देशात नेले.खगोलशास्त्रावरील 'नारदीय सिद्धांता'चा ग्रंथ आज भारतात उपलब्धच नाही.अर्थात त्याचे कोणतेही हस्तलिखित आपल्याजवळ नाही.


मात्र बर्लिनच्या प्राचीन ग्रंथसंग्रहालयात हा ग्रंथ (त्याच्या मूळ हस्तलिखित स्वरूपात) उपलब्ध आहे.(Webar Catalogue no.862). खगोलशास्त्रावरचाच 'धर्मत्तारा पुराणातील' सोम चंद्र सिद्धान्तावरील ग्रंथ भारतात मिळतच नाही.त्याचे हस्तलिखित बर्लिनच्या संग्रहालयात आहे (Webar Catalogue no.840). प्राचीन खगोलशास्त्रात 'वसिष्ठ सिद्धांत' महत्त्वाचा मानला जातो.या सिद्धांताचे उल्लेख अनेक ठिकाणी येतात.या ग्रंथाचेही हस्तलिखित भारतात उपलब्ध नाही. 


ते आहे - इंग्लंडमधल्या मेकेंजी संग्रहालयाच्या विल्सन कॅटेलॉग मध्ये १२१ व्या क्रमांकावर..! आर्यभटाचे 'आर्यअष्टकशतः' आणि 'दशगीतिका' हे दोन्ही दुर्मीळ ग्रंथ बर्लिनच्या वेबर कॅटेलॉगमध्ये ८३४ व्या क्रमांकावर उपलब्ध आहेत.एकुणात काय,तर ग्रंथांच्या रूपात असलेलं आपलं बरंचसं ज्ञान मुसलमान आक्रमकांनी नष्ट केलं,उद्ध्वस्त केलं.जे काही ग्रंथ शिल्लक राहिले,त्यांना इंग्रजी शासनाच्या काळात इंग्रज,डच,फ्रेंच आणि जर्मन संशोधकांनी युरोपला नेलं.मग ज्ञानाचा साठा आपल्याजवळ राहील तरी कुठून..?


आपली हिंदू परंपरा ही वाचिक आहे.आणि ह्या परंपरेमुळेच आपले अनेक ग्रंथ,पुराणे,उपनिषदं,वेद इत्यादी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाचिक स्वरूपात हस्तांतरित होत राहिले.

मात्र शाहजहा आणि औरंगजेबाच्या काळात,ज्या क्रौर्याने आणि बर्बर्तेने मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांना मारण्यात आले, त्यामुळे ही वाचिक परंपराही पुढे काहीशी क्षीण झाली...! मात्र इतकं सारं होऊनही आज जे ज्ञान आपल्यासमोर आहे,ते प्रचंड आहे.अद्भुत आहे. 


विलक्षण आहे.'सिरी भूवलय' सारखा ग्रंथ आजही आपण पूर्ण वाचू शकलेलो नाही.आजही दिल्लीचा 'लोह स्तंभ' कशामुळे गंजत नाही,हे कोडं आपण सोडवू शकलेलो नाही.

'अग्र भागवताच्या' अदृश्य शाईचे रहस्य आजही आपण उकलू शकलेलो नाही..थोडक्यात काय, तर आपल्या प्राचीन ज्ञानाचा शोध घेण्याचा हा अद्भुतरम्य प्रवास असाच चिरंतन चालू राहील असे वाटते..!



१२/३/२५

आव्हान द्या / Challenge

जर अजून काही कामाला येणार नसेल तर हे करा.


चार्ल्स श्वाबचा एक मिल मॅनेजर होता.ज्याच्या मिलमध्येमजूर पुरसे उत्पादन करत नव्हते.श्वाबने मॅनेजरला विचारले,"असं का आहे की, तुमच्यासारखा सक्षम मॅनेजर असूनसुद्धा इथे पुरेसं उत्पादन होत नाहीये?" मॅनेजरने उत्तर दिले," मी नाही जाणत.मी मजुरांना समजावलं,प्रोत्साहित केलं,त्यांना लालूचपण दाखवली,मी त्यांना घाबरवलं-धमकावलं,

नोकरीवरून काढून टाकायची भीतीपण दाखवली;पण काही फायदा झाला नाही. ते कोणत्याही प्रकारे पुरेसं उत्पादन नाही करत." चर्चा संध्याकाळी होत होती आणि रात्रपाळीचे लोक कामावर येणार होते.श्वाबनी मॅनेजरकडून खडूचा तुकडा मागवला.मग त्याने आपल्या जवळ उभ्या असलेल्या मजुराला विचारलं,"आज तुमच्या शिफ्टने किती हिट्स केल्या?

'सहा' काही न सांगता श्वाबने खडूने फरशीवर मोठ्या अक्षरात लिहिले 'सहा' आणि तो गेला.(मित्र जोडा आणि प्रभावशाली बना.डेल कार्नेगी, मंजुल प्रकाशन)



जेव्हा रात्रपाळीचे लोक कामावर आले तेव्हा त्यांनी '६' लिहिलेलं बघितलं आणि विचारलं,याचा काय अर्थ आहे.


दिवसपाळीच्या लोकांनी सांगितले,"आज मोठे साहेब आले होते.त्यांनी आम्हाला विचारलं की, आमच्या शिफ्टने किती हिट्स केल्या? आम्ही त्यांना सांगितले,की आम्ही सहा हिट्स केल्यात. त्यांनी याच जमिनीवर तो आकडा लिहिला." दुसऱ्या दिवशीच्या सकाळी जेव्हा श्वाब परत मिलमध्ये आले,तेव्हा रात्रपाळीच्या शिफ्टने '६'ला मिटवून त्याच्या जागेवर मोठ्या अक्षरामध्ये '७' लिहिलं होतं.


जेव्हा दिवसपाळीचे लोक दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर आले,तेव्हा त्यांनी बघितलं की,फरशीवर मोठ्या अक्षरात '७' लिहिलं आहे.अच्छा,ते नाइट शिफ्टवाले समजत आहेत की,ते आमच्यापेक्षा जास्त योग्य आहेत.त्यांना धडा शिकवावाच लागेल. दिवस पाळीच्या लोकांनी उत्साहाने काम केले आणि जेव्हा ते घरी जाऊ लागले तर जाता जाता त्यांनी मोठ्या अक्षरात लिहून टाकलं '१०'. काम खूप वेगात होऊ लागलं.


काही काळानंतर ज्या मिलचं उत्पादन मर्यादेच्या उत्पादनापेक्षा खूप कमी होतं,त्याच्यात दुसऱ्या मिलपेक्षा जास्त उत्पादन होऊ लागलं.


या घटनेमुळे आम्हाला काय शिकवण मिळते? श्वाब म्हणतो की,काम करून घेण्याची एक पद्धत आहे. चढाओढीला प्रेरित करणे.पैसे कमवण्याची हीन चढाओढ असा अर्थ इथे अपेक्षित नाही,तर श्रेष्ठ होण्याच्या आकांक्षेशी आहे.


श्रेष्ठ होण्याची आकांक्षा ! आव्हान! उत्साही लोकांना प्रेरित करण्याचा अचूक मार्ग ! आव्हानाशिवाय थियोडोर रुजवेल्ट कधी अमेरिकेचे राष्ट्रपती बनू शकले नसते.क्युबाहून परत आल्यानंतर त्यांना न्यू यॉर्क स्टेटच्या गव्हर्नर पदाचा उमेदवार बनवलं गेलं.विपक्ष पार्टीने हे शोधून काढले की,ते या राज्याचे वैध नागरिक नव्हते. यावर रुजवेल्ट घाबरून गेले आणि आपलं नाव परत घेण्या बाबतीत विचार करू लागले,तेव्हा न्यू यॉर्कच्या अमेरिकन सीनेटर थॉमस कॉलियर फ्लॅटने त्याच्या समोर आव्हान ठेवलं.थियोडोर रुजवेल्टच्या समोर अचानक येऊन त्यांनी आपल्या जोरदार आवाजात म्हटले,"काय सान जुआन हिलचा हिरो डरपोक आहे.भित्रा आहे?" रुजवेल्टने मैदान सोडलं नाही आणि बाकी इतिहास आहे.एका आव्हानाने फक्त त्याचं जीवनच बदलले नाही तर त्याच्या देशाच्या भविष्यावर खूप जास्त प्रभाव पडला.


प्राचीन ग्रीसमध्ये किंग्जगार्डचं आदर्श वाक्य होतं,'भितात सगळेच;

परंतु बहादूर लोक आपल्या भीतीला एका बाजूला ठेवतात आणि पुढे जातात. अनेक वेळा तर ते मरून जातात; परंतु जीत नेहमी त्यांचीच होते.'आपल्या भीतीला जिंकण्याच्या संधीपेक्षा मोठं आव्हान आणखीन काय असू शकते ?


जेव्हा अल स्मिथ न्यू यॉर्कचे गव्हर्नर होते,तेव्हा त्यांनी पण आव्हान देण्याची युक्ती केली.त्या वेळेस सगळ्यात कुख्यात सिंग सिंग जेलमध्ये कोणी वॉर्डन नव्हता.जेलच्या भिंतींना घेऊन अनेक अफवा आणि स्कँडल हवेत पसरवल्या जात होत्या. स्मिथला सिंग सिंगच्या वॉर्डच्या रूपात एका दमदार माणसाची गरज होती.एका लोहपुरुषाची;परंतु कोण? त्यांनी न्यू हैम्प्टनच्या लुइस आर.लॉजला बोलावलं.


"सिंग सिंगच्या वॉर्डन बनण्याच्या बाबतीत तुमचा काय विचार आहे?" त्यांनी स्मित हास्य करत लुइसला विचारलं,लुइस अवाक झाला.सिंग सिंगच्या संकटाची त्याला जाणीव होती.

एक राजनैतिक नेमणूक होती आणि राजनेत्यांच्या मूडवर निर्भर करीत होती.खूप वॉर्डन आले होते आणि येऊन गेले होते.त्यामधून एक तर तीन आठवड्यांपर्यंतच टिकू शकला होता.त्याला आपल्या करियरबाबत चिंता होणं अगदी स्वाभाविक होतं.हे संकट ओढावून घ्यायचं ?


स्मिथने तो मागे पुढे पाहत होता ते पाहिलं.तो आपल्या खुर्चीच्या मागे टेकला आणि हसला," हे बघ तरुण माणसा,मी तुला दोष देत नाही की तुला भीती वाटतेय.काम खूप कठीण आहे.तिथे जाण्याकरता आणि टिकून राहण्याकरता एका खूपच दमदार माणसाची गरज आहे." म्हणून तो गेला आणि तो तिथे टिकला;तिथेच राहून तो त्याच्या वेळेचा एक प्रसिद्ध वॉर्डन बनला.त्याचं पुस्तक '२०,००० इयर्स इन सिंग सिंग'च्या लाखो प्रती खपल्या.रेडिओ बातम्यांनी आणि जेलच्या त्याच्या गोष्टींना डझनवारी सिनेमांना प्रेरित केले. अपराध्यांचे 'मानवीयकरणा'चे त्याचे उपाय जेल क्षेत्रात चमत्कारात गणले गेले.महान फायरस्टोन टायर अँड टायर कंपनीचे संस्थापक हार्वे एस. फायरस्टोनने सांगितले आहे,"मी हे नाही मानत की पगार आणि केवळ पगारामुळेच चांगल्या लोकांना आपल्या कंपनीत आणू शकतो किंवा त्यांना तिथे ठेवलं जाऊ शकतं.

मला वाटतं की,खरं आकर्षण तर कामाचं स्वरूप आहे." 


महान बिहेव्हियरल साइंटिस्ट फ्रेडरिक हर्जबर्ग या गोष्टीशी सहमत आहेत. त्यांनी हजारो लोकांच्या काम करण्याच्या दृष्टिकोनांचे बारकाईने अध्ययन केले, ज्यात फॅक्ट्रीच्या मजुरांना घेऊन सिनियर एक्झिक्युटीव्हपण होते. तुम्हाला काय वाटतं की, त्यांच्या शोधात कोणतं तत्त्वं सगळ्यात प्रेरक राहिलं असेल. त्यांच्या कामाची कोणती बाजू त्यांना सगळ्यात अधिक आनंद देत होती? पैसा? कामाचं चांगलं वातावरण? सुविधा? नाही,यापैकी काहीच नाही. ते सगळ्यात मोठे तत्त्व ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळते ते होतं कामाची प्रवृत्ती. जर काम वेधक आणि आव्हानात्मक आहे, तर लोक ते काम करायला प्रेरित होतील आणि चांगल्या त-हेने करायला प्रोत्साहित होतील.


हेच प्रत्येक सफल व्यक्ती पसंत करते.आव्हान,आत्म -

अभिव्यक्तीची संधी,ती संधी ज्यामुळे तो आपली किंमत,

आपली श्रेष्ठता सिद्ध करू शकेल. जिंकून दाखवू शकेल.या कारणामुळेच तर चढाओढ इतकी लोकप्रिय आहे.श्रेष्ठ होण्याची आकांक्षा महत्त्वपूर्ण होण्याची आकांक्षा.