आपल्या अज्ञात इतिहासाच्या काळ्या कालखंडात परग्रहांवरील अंतराळवीरांनी भेटी दिल्या होत्या आणि त्यांनाच आपण देव मानायला लागलो या क्रांतिकारक सिद्धांताचे जनक आहेत एरिख् फॉन डॅनिकेन.ज्यांचा अजिबात अर्थ लागत नव्हता अशा हजारो गोष्टींचा विचार करून त्यांनी मानव जातीच्या इतिहासाबाबत एक आगळाच सिद्धांत जगासमोर मांडला आहे.आपण किती वेगळा विचार मांडत आहोत याची जाणीव असल्यामुळेच की काय या त्यांच्या सिद्धांतासाठी त्यांनी अफाट परिश्रम घेतले आहेत.
त्यांच्या पहिल्या पुस्तकाची पूर्वतयारी करायला त्यांना तब्बल दहा वर्षे लागली.
अमेरिका,कॅनडा,मेक्सिको,पेरू,ब्राझिल,बोलिव्हिया, इराक,
इजिप्त,इटली,दक्षिण अमेरिका,ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड,जपान इत्यादि सर्व खंडांतील कित्येक देशांना त्यांनी भेटी दिल्या आहेत.त्यांनी मांडलेले कित्येक पुरावे जिथे जाणेसुद्धा मुष्कील अशा दुर्गम पहाडांवर,गुहांत आहेत.मेक्सिकोमधील पालेन्क येथील पिरॅमिडच्या एका फरशीचे फोटो घेण्यासाठी त्यांना मेक्सिकन सरकारकडे आठ वेळा अर्ज करावा लागला.
त्यानंतर त्यांना कशीबशी परवानगी मिळाली. ती सुद्धा फक्त अर्ध्या तासापुरती ! बोलिव्हियातील टिआहुआन्को या शहरात पोहोचण्यासाठी पेरू या देशातील कुझको शहरातून निघाल्यावर कित्येक दिवस बोटीने व रेल्वेने प्रवास करावा लागतो.१३००० फूट उंचीवरील या शहराच्या आसपास मैलोंमैल लोकवस्ती नाही.
पेरू व शेजारच्या इक्वेडोर या देशातील भूगर्भाखालील रस्त्यांचे जाळे शोधण्यासाठी त्यांना कित्येक दिवस तिथल्या रानटी लोकात राहून त्यांचा विश्वास संपादन करावा लागला,कारण आत जाण्याचा योग्य मार्ग त्यांनाच माहीत होता.त्यांच्या संशोधनामागे अपरिमित श्रम आणि कष्ट आहेत यात शंकाच नाही...
या सिद्धांतावर पुरावे मांडण्यासाठी त्यांनी आजपर्यंत डझनभर तरी पुस्तके लिहिली आहेत.हे पुस्तक मुख्यतः त्यांच्या पहिल्या आणि अत्यंत गाजलेल्या Chariots of the Gods या पुस्तकावर आधारित आहे.
लेखकाप्रमाणेच कित्येक वर्षांपूर्वी डॉ.मॉरीस जेसप (मृत्यू १९५९) यांनीही अशाच त तऱ्हेचु मते व्यक्त केली होती.ते एक नाणावलेले खगोलशास्त्रज्ञ व त्या काळातील 'चन्द्र' या विषयावरचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जात.दक्षिण अमेरिकेतील पेरू,बोलिव्हिया आणि इतर देशातील माया,इंका व त्यांच्या आधींच्याही
अज्ञात संस्कृतीची भव्य बांधकामे आणि वीस काय,दोनशेच काय पण दोन हजार टन वजनांचे दगड खाणींपासून शेकडो मैलांवर आणून,लीलया डोंगराच्या कड्यांवर सुद्धा चढवून त्यावर केलेली कोरीव कामे पाहिल्यावर त्यांनी म्हटले होते की ही बांधकामे,'वजनरहित' अवस्थेत या प्रचंड शिळा आकाशातून अंतराळयानांच्या सहाय्याने उचलून आणून व एकमेकांवर चढवून केली असावीत.
मग हेच तंत्र पिरॅमिड बांधताना वापरले असेल काय?
या शतकात आपल्याला आलेला या गोष्टींचा अनुभव काय आहे?
इजिप्तच्या दुसरा रामेसिस या राजाने नाईलच्या किनाऱ्यावर अबू सिम्बेल येथे दोन देवळे बांधली.या देवळांच्या प्रवेशद्वाराशीच त्याचे स्वतःचेच ६० फूट उंचीचे चार प्रचंड पुतळे होते.अस्वान धरण बांधल्यावर ही देवळे धरणाच्या पाण्याखाली बुडून जाणार होती. ऐतिहासिक महत्त्वाच्या या कलाकृती वाचवण्यासाठी ही देवळे त्यांच्या सध्याच्या जागेपासून १८० फूट उंच हलवण्यासाठी जगातील प्रगत औद्योगिक राष्ट्रांनी कंबर कसली.अद्ययावत यंत्रसामुग्री आणली गेली पण पुतळे मात्र शेवटी उभे-आडवे कापूनच वर न्यावे लागले आणि पुन्हा जोडावे लागले.कारण या पुतळ्यांचे वजन पेलू शकतील अशा क्रेन्स अस्तित्वात नाहीत.ते पुतळे 'हलवण्यासाठी' आणलेली यंत्रसामुग्री पाहिल्यावर प्रथम विचार मनात येतो तो इजिप्शियन लोकांनी आजचे आधुनिक तंत्रज्ञान नसताना हे पुतळे कोरले तरी कसे?
हे पुतळे निदान तिथल्या जागेवरच्या खडकांतून कोरलेले आहेत पण थेबेसजवळील मेमनॉन येथील ६०० टन वजनाच्या पुतळ्यांचे काय? किंवा बालबेक येथील २००० टन वजनाच्या ६०-६० फूट लांबीच्या शिलांचे काय? त्या कशा वाहून नेल्या? कापल्या कशा? लाकडी रोलर्सचे मूर्खपणाचे स्पष्टीकरण किती दिवस पुरणार? मग डॉ.जेसप म्हणतात तसाच प्रकार असेल आणि हे ज्ञान असणारी प्रगत संस्कृती पृथ्वीवर अस्तित्वात नसेल तर परग्रहांवरील अंतराळवीरांचेच हे काम असेल काय?
भूपृष्ठावर सापडणारी बांधकामे सोडून भूगर्भात ७५० फूट खोल,हजारो मैल लांबीच्या रस्त्यांचे जाळेच दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि इक्वेडोर या देशांखाली आढळून आले आहे.
भूगर्भातील हे रस्ते कुठपर्यंत पोहोचतात हे आजही माहीत नाही.रस्त्याचे प्रत्येक वळण अगदी काटकोनात आहे.भिंती व छते अगदी गुळगुळीत आहेत.इतकी गुळगुळीत की कित्येक ठिकाणी पॉलीश केल्याप्रमाणे ती चकाकतात.
वृक्षारोपणासाठी दोन फूट लांबी,रूंदी,उंचीचे खड्डे खणावे लागले तरी किती माती वर निघते याची कल्पना प्रत्येकाला कधी ना कधी आली असेल पण बोगद्यांचे एवढे प्रचंड जाळे जमिनीखाली असून त्याची कल्पना येणारे जमिनीवर काहीच कसे नाही?
या ठिकाणी एका प्रचंड हॉलमध्ये फक्त एक मिलीमीटर जाड,३ फूट २ इंच लांब आणि १ फूट ७ इंच रुंद असे शेकडो पत्रे सापडले आहेत.त्यावरील चिन्हांचा आणि लिखाणाचा अर्थ आपण अजून लावू शकलेलो नाही.
तुर्कस्थानमधील डेरिन्कुय या ठिकाणी अशी तेरा मजली बांधकामे जमिनीखाली आढळली आहेत. म्हणजे आजपर्यंत तरी आपण तेराच मजले खालपर्यंत खणत गेलो आहोत.विहिरी,खेळती हवा त्याचप्रमाणे पळून जाण्यासाठी वेगवेगळे मार्गही इथे आढळतात. तुर्कस्तानमध्ये अशी चौदा शहरे माहिती आहेत.एके काळी १०-१२ लाख लोक तरी वर्षांनुवर्षे त्यात राहत होते असा अंदाज आहे.यांना लागणारा अन्नपुरवठा कसा होत होता? कुठून होत होता? कोण करीत होते ?
आपण कॉमिक्स पुस्तकात 'मोल' नावाच्या जमिनीखालून प्रवास करणाऱ्या यंत्राबद्दल कित्येक वर्षे वाचत आहोत.रॉकेटसारखे दिसणारे असे यंत्र आता अमेरिकेने खरोखरच बनवले आहे.उष्णता निर्माण करून,खडकसुद्धा वितळवून ते बोगदे खणत पुढे जाते. दगड,माती वगैरे काही वर काढायचा प्रश्नच येत नाही.
या अशाच पण आणखीही अद्ययावत यंत्रांच्या सहाय्याने पेरू,इक्वेडोर,तुर्कस्तान येथील ही भूगर्भातील कामे केली गेली होती का? ज्या जमातींना अंतराळ प्रवासाचे ज्ञान हजारो वर्षांपूर्वी होते त्यांना तरी ही गोष्ट अशक्य नसावी.उडत्या तबकड्या हा डॉ.मॉरिस जेसप यांचा त्यांच्या मृत्यूपर्यंत संशोधनाचा विषय होता.या विषयावर त्यांनी एक पुस्तकही लिहिले होते.उडत्या तबकड्या कोणत्या शक्तींवर चालतात याचे त्यांना गूढ होते.या उडत्या तबकड्या जे इंधन वापरतात,त्याची माहिती आपल्या हजारो वर्षापूर्वीच्या काळात कुणाला तरी होती व हीच परग्रहांवरील जमात देव म्हणून गणली जाऊ लागली,हाच धक्कादायक विचार त्यांनीही मांडला होता.
हे इंधन शोधून काढीपर्यंत आपण अंतराळ प्रवासाचा विचार प्रत्यक्षात आणूच शकत नाही.आजपर्यंत आपण बांधलेली सर्व अंतराळयाने आणि तयार होत असलेल्या नवीन आराखड्यांप्रमाणे नजिकच्या भविष्यकाळात बांधली जाणारी अंतराळयाने अग्निबाणांच्या आकाराचीच आहेत.दोन गोष्टींमुळे याच आकाराची अंतराळयाने बांधणे आपल्याला भाग पडत आहे.एक म्हणजे शक्तीमान प्रॉपल्शन युनिटस् आपल्याकडे नाहीत आणि दुसरी म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर पडण्यासाठी हवेच्या घर्षणाचा कमीत कमी त्रास होईल असाच आकार असणे आवश्यक आहे.
दुसऱ्या सूर्यमालांवर प्रवास करायचा झाला तर अशी वाहने निरुपयोगी आहेत कारण त्यातून वर्षानुवर्षे प्रवास करावा लागणार आहे.एकदा अंतराळात शिरलो की कोणत्याही आकाराचे अंतराळयान खरे म्हणजे चालू शकेल कारण तिथे हवेच्या घर्षणाचा प्रश्नच नाही.
हवाच नाही तर घर्षण कुठून? आपले 'ईगल' हे चन्द्रयान खोक्याच्या आकाराचे होतेच की! थोडक्यात,पृथ्वीवरील वातावरणासारख्या वातावरणाला तोंड देण्याचा प्रश्न येत नसेल तर तिथे कमीत कमी घर्षण होईल अशाच तऱ्हेची अंतराळयाने बांधण्याचा विचार करण्याचे कारणच नाही.छोट्या अंतराळयानात अंग चोरून बसावे लागते.हलावे लागते.सगळी यंत्रे एकावर एक रचावी लागतात.एखाद्या कोपऱ्यात रॉकेटस् सोडण्याची साधनसामुग्री ठेवावी लागते.
अंतराळावर स्वारी करण्यासाठी आत्ताची द्रवरूप इंधनेसुद्धा उपयोगी नाहीत.ती वापरून जादा इंधनाचा साठा,
अंतराळयात्रिकांच्या खोल्या,इतर यंत्रसामुग्री अंतराळात वाहून नेताच येणे शक्य नाही.त्यासाठी अणुशक्ती किंवा फोटॉन रॉकेटस् असल्या गोष्टींचा वापर करावा लागेल.अशी अंतराळयाने प्रकाशवेगानेच उडू शकतील आणि इंधनाचा अमर्याद काळापर्यंत पुरवठा होत राहील.
अशा त-हेची प्रचंड अंतराळयाने बांधण्यासाठी पृथ्वीभोवती फिरणारे एक प्रचंड स्थानक बांधावे लागेल.एकेक भाग पृथ्वीवरून अंतराळात उडवायचा आणि एकामागोमाग एक भाग जोडत जायचे. पेन्सिलच्या आकारांची अंतराळयाने बांधण्याचे मग कारणच नाही.अंतराळवीरांना आणखी एक प्रश्न सोडवावा लागेल.गुरुत्वाकर्षण! अंतराळात गुरुत्वाकर्षण नसतेच आणि वर्षानुवर्षे चालणाऱ्या प्रवासासाठी अंतराळवीरांना गुरुत्वाकर्षणाची आवश्यकता आहेच.मग गुरुत्वाकर्षण निर्माण करावे लागेल.पाण्याने भारलेली बादली जर जोरजोरात फिरवली तर त्यातून पाण्याचा एक थेंबसुद्धा सांडत नाही.पाणी तळाशी किंवा डोक्यावर असेल तेव्हा, छताशी म्हणू या,अगदी चिकटून राहते.केन्द्रप्रसारी बलामुळे (Centifugal Force) एक प्रकारचे गुरुत्वाकर्षणच निर्माण होते.अंतराळयानांच्या बाबतीतही हे करावे लागेल आणि त्यासाठी त्यांचा आकार गोलाकार आणि तबकड्यांसारखा वगैरेच असावा लागेल.मग अंतराळवीरांना मॅग्नेटिक बूट घालण्याची, पक्ष्यांप्रमाणे हवेतले अन्न पकडण्याची वगैरे आवश्यकताच राहणार नाही.ते नेहमीसारखेच या अंतराळयानात वावरतील.
आज हे जे आपण सर्व विचार करतो आहोत तेच प्राचीन काळातील देवांनी केले आहेत.चमकणाऱ्या अंडाकृती वाहनातून,गोलाकार यानातून प्रवास करणारे देव सर्व ठिकाणी सापडले आहेत.सुमेरियन सील्सवर गोलाकार यानांवर बसलेले,
चेंडूवर बसून उडणारे देव नेहमीच दिसतात.ॲझटेक लोकांचा सूर्यदेव गोलाकार अंतराळयानात बसून त्यातल्या यंत्रांशी खटखट करताना दिसतो.मग या सर्व देवांनी जर अगदी आपल्यासारखाच विचार करून त्या काळात अंतराळयाने बांधली असतील आणि अंतराळप्रवास केला असेल तर ते देव नसून परग्रहांवरील अंतराळवीरच होते याबद्दल शंका का यावी ?आपल्या सिद्धान्ताला कडक विरोध होणार हे लेखक गृहित धरून आहे.तो म्हणतो,त्याचे एक सोडा पण जागतिक कीर्ती मिळालेल्या संशोधकांनासुद्धा इतर लोकांकडून विरोध झालाच नाही किंवा इतर शास्त्रज्ञांकडूनही टवाळकी झालीच नव्हती असा भाग थोडाच आहे?
थॉमस अल्वा एडिसनच्या नावावर जगात अडीच हजार पेटंटस् तरी आहेत.त्याला त्याच्या फोनोग्राफच्या शोधाबद्दल इतर शास्त्रज्ञांकडून आलेला अनुभव सांगण्यासारखा आहे.
एडिसनच्या विनंतीनुसार मौसेल या शास्त्रज्ञाने एडिसनच्या फोनोग्राफचे प्रात्यक्षिक ११ मार्च १८७८ रोजी पॅरीसमध्ये सायन्स अकॅडमीसमोर करावयाचे ठरविले.ते प्रात्यक्षिक पाहिल्यावर एक शास्त्रज्ञ रागावून उठला आणि म्हणाला, 'आमची काय फसवणूक चालवली आहे? हा तर शुद्ध शब्दभ्रमाचा प्रकार आहे.' या प्रकाराची चौकशीच केली गेली आणि हा सर्व बनवाबनवीचा प्रकार आहे असे ठरले.३० सप्टेंबर, १८७८ रोजी निर्णय झाला की आवाजाची दिशा…
राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..