* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२३/१२/२२

येमेडोड्डीचा नरभक्षक.. थरारक शिकार कथा.. भाग - ३

तरी त्या त्रासदायक अवस्थेत मी सूर्य मावळेपर्यंत थांबलो.त्यानंतरचाही पुढचा संपूर्ण आठवडा मी रोज तसाच काढला,परंतु वाघ त्या परिसरात आल्याचं किंवा कोणी त्याला पाहिल्याचं कुठूनही ऐकायला आलं नाही.

त्या दरम्यान एक मात्र झालं,माझ्या नजरेच्या टप्प्यातलं प्रत्येक झुडूप,तसंच वाघ माझ्यावर हल्ला करायला आला,

तर तो कुठल्या वाटांनी येऊ शकतो,त्या वाटांवरून लपतछपत येण्यासाठी तो कुठल्या आडोशांचा वापर करू शकतो,याचा एक तपशीलवार नकाशा माझ्या डोक्यात फिट्ट बसला.


पहिला आठवडा असा वाया गेल्यानंतर या रटाळ,

कंटाळवाण्या कामात थोडा विरंगुळा, म्हणून मी बिरुरच्या रेल्वेस्टेशनवरच्या पुस्तकाच्या दुकानातून काही हलकीफुलकी पुस्तकं विकत घेऊन आलो.पुस्तक वाचत तो ओंडका आपटताना मी माझे कान मात्र उघडे ठेवले होते.अशाप्रकारे दुसराही आठवडा उलटला,पण वाघाची कुठलीही चाहूल लागली नाही..


आता माझा वैताग वाढू लागला होता आणि एकाच जागी जास्त हालचाल न करता बसून काढल्यानं मी कंटाळलोही होतो.एखादी अजून चांगली काही योजना आखता येईल का,याचा विचार करत मी माझं डोकं बरंच खाजवलं,पण मी करत होतो त्यापेक्षा वेगळं मला काहीही सुचलं नाही.वाघाच्या या भागातल्या आधीच्या फेरीला तीन महिने उलटून गेले होते आणि चौथा महिना सुरू झाला होता.वाघानं आखलेली कार्यक्रमपत्रिका बदलली नसली,तर तो कुठल्याही वेळेस इथे येणं अपेक्षित होतं.

माझं आणि चिकमंगळूर जिल्ह्याच्या डेप्युटी कमिशनरचं असं ठरलं होतं,की त्याच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात कुठेही मानवी बळी पडला,तर त्यानं ती खबर त्याच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत किंवा जमेल मला तातडीनं पोहोचवायची.त्या काळात अशी तातडीची बातमी पोहोचवण्यासाठी रनर असायचे.दोनच दिवसांत चिकमंगळूर ते साक्रेपटना रस्त्यावरच्या एका वस्तीवर वाघानं माणूस मारल्याची बातमी मला रनरनं दिली.त्या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी रनर परत आला.त्यानं दिलेल्या खबरीनुसार, आयरनकेरे तलावाच्या उत्तरेच्या तीरावर वाघानं एका गुराख्याला मारलं होतं.

होगारेहळ्ळीपासून नऊ मैलांवरच्या मडक तलावापासून हे ठिकाण पाच मैलांवर होतं.


आत्तापर्यंत आलेल्या या खबरी समाधानकारक होत्या.म्हणजे वाघ आपल्या ठरावीक मार्गानं पुढे येत होता आणि शेवटचा बळी पडल्याची बातमी मला मिळाली,त्याच्या दोन दिवस आधी तो इथून चौदा मैलांवर होता,म्हणजे या कालावधीत तो आता होगारेहळ्ळीच्या आसपास असणं अपेक्षित होतं किंवा आलेलाही असणं शक्य होतं.शिवाय त्यानं शेवटचं खाणं खाल्ल्याला तीन दिवस होत होते,त्यामुळे आता तो नवा बळी मिळवायला नक्कीच आतुर असणार होता.


त्या संध्याकाळी मी मुदलागिरी गौडाला, नरभक्षक वाघ या परिसरात दाखल झाल्यामुळे, होगारेहळ्ळी आणि आसपास राहणाऱ्या लोकांनी,नारळी-पोफळीच्या बागा आणि खुरट्या झुडुपांच्या जंगलापासून काहीही करून दूर राहावं,असा इशारा द्यायला सांगितलं.


दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा जरा जास्तच लवकर मी माझी नेहमीची जागा घेतली,मात्र या वेळेला मी वाचायला पुस्तक आणलं नव्हतं.ह्या वेळेला जमेल तेवढ्या जोरात तो ओंडका आपटून आवाज करायचा,खोकला काढायचा आणि झाडावर जमेल तेवढी हालचाल करायची, जेणेकरून मला त्या वाघाचं लक्ष माझ्याकडे वेधून घेता येईल असा मी विचार केला होता.त्या दिवशी काही झालं नाही.संध्याकाळी गावात परत येताना अचानक हल्ला झाला,तर त्याला तोंड द्यायला मी अत्यंत सावध होतो.असे दोन दिवस गेले,पण काहीच घडलं नाही किंवा कुठेतरी अजून एखादा बळी पडल्याचीही काही बातमी आली नाही.


हा वाघ होगारखान डोंगरातल्या जंगलात निघून गेला की काय?की होगारेहळ्ळीला वळसा घालून वायव्येला लिंगडहळ्ळी,किंवा पश्चिमेला सांतावेरीच्या दिशेला गेला?मला शंका येऊ लागली.


सध्या हवा जरा गरम होती आणि सप्तमी अष्टमी असल्यानं चंद्र अर्ध्यावर असणार होता,त्यामुळे मी पुढचे दोन दिवस दुपारी आणि रात्रीही झाडावरच बसायचं ठरवलं.वाघ रात्रीही माझ्याकडे आकर्षित होईल,अशी मला आशा होती.आधीचे पंधरा दिवस मी अत्यंत तणावग्रस्त अवस्थेत झाडावर बसून काढले होते,पण माझ्या हाती काही लागलं नव्हतं.मला त्याचा शीणही जाणवत होता,पण हाती घेतलेलं कार्य तडीस न्यायचं मी ठरवलं होतं.


दुसऱ्या दिवशी दुपारी मी परत माझी जागा घेतली.ह्या वेळेस मी अशा अवघडलेल्या अवस्थेत रात्र काढायला आवश्यक,म्हणून माझं रात्रीचं जेवण,गरम चहानं भरलेला थर्मास,एक ब्लॅकेट,टॉर्च,पाण्याची बाटली अशा छोट्या मोठ्या गोष्टी आणल्या होत्याच,परंतु रात्री झोप लागू नये म्हणून बेंझेड्रिनच्या गोळ्याही बरोबर ठेवल्या होत्या.


ओंडका आपटण्याचं काम मी जे दुपारी सुरू केलं,ते रात्री पार उशिरापर्यंत चालू ठेवलं.एका शृंगी घुबडाचा घुत्कार आणि लांब कुठेतरी एक जंगली मेंढी ओरडल्याचा आवाज सोडला,तर सारं जंगल त्या रात्री जरा जास्तच शांत होतं.


दीड वाजता चंद्र मावळला.गडद अंधार पडला आणि गारठाही वाढला.तीनच्या सुमारास माझ्या डोळ्यावर झापड येऊ लागली,म्हणून मी बेंझेड्रिनच्या दोन गोळ्या घेतल्या.


अर्ध्या तासानंतर झुडुपात थोडी खसफस झाली आणि पाठोपाठ तरसाच्या हसण्याचा हलका,पण कर्कश्श आवाज आला.एकतर त्यानं मला पाहिलं होतं किंवा त्याला माझा वास आला होता.काही का असेना,ते लपतछपत अंधारात नाहीसं झालं..


पुन्हा एकदा शांतता पसरली ती पहाटेपर्यंत अबाधित राहिली.त्यानंतर मात्र रानकोंबडे बांग देऊन उगवत्या सूर्याचं स्वागत करू लागले.मी अत्यंत सावधगिरीन झाडावरून खाली उतरलो,कसाबसा होगारेहळीला परत आलो आणि चार तास झोप काढली.


सकाळी अकरा वाजता मी पुन्हा एकदा झाडावर होतो.मी इतका थकलो होतो,की मला हे असे फार काळ चालू ठेवता येणं अवघड होतं.गरम दुपार नेहमीसारखी काही न घडता गेली. तांबट पक्ष्याचा 'टोक टोक' आवाज व कोकिळेची 'कुहू कुहू' एवढेच आवाज येत होते.संध्याकाळ जवळ येऊ लागली,तसे गवतातले किडे टिपणारे तितर पक्षी 'कुकुर्रक कुकुर्रक' करू लागले,जसा सूर्य होगारखान पर्वताच्या मागे बुडाला,मोरांनी 'मियाउ मियाउ म्हणत त्याला निरोप दिला.


आता रात्रीच्या पक्ष्यांनी ताबा घेतला आणि ते आकाशात घिरट्या घालत शीळ घालू लागले.दहा वाजून थोडाच वेळ झाला असेल,चितळ 'अय्याव ! अय्याव ! आवाजात सातत्यानं ओरडून धोक्याचा इशारा देऊ लागले.


एक शिकारी जनावर शिकारीला निघालं होतं आणि हा सदैव सावध हरणांना एक तर त्याचा वास आला होता किंवा त्यांनी त्याला पाहिलं होतं.तो एक साधा वाघ होता का नरभक्षक वाघ होता का एखादा बिबळ्या होता,हे कळणं आवश्यक होतं.मी आता जरा जास्त उत्साहाने तो ओंडका आपटून आवाज करू लागलो.. फक्त हे लाकूडतोडे एवढ्या रात्री जंगलात कसे?'अशी शंका त्या वाघाला येणार नाही,अशी मला आशा होती.


मिनिटांमागून मिनिटं जात होती आणि अचानक पॉक पॉक व्हियाँक!" असा धोक्याचा इशारा देत एक नर सांबर अर्ध्या मैलापेक्षा कमी अंतरावरून ओरडलं आणि नंतर होगारखानच्या दिशेने पुढे गेलं,त्यानंतर स्मशानशांतता पसरली एकीकडे तो ओंडका आपटत मी त्या अर्धवट चंद्रप्रकाशात नजरेच्या टप्प्यात येणारं प्रत्येक झुडूप बारकाईनं न्याहाळत होतो आणि वाघ कुठून झाडाकडे येईल व त्याला असलेल्या लपायच्या जागा,याचा अंदाज बांधत होतो.कुठेही काहीही हलत नव्हतं. त्या सांबराच्या ओरडण्यानंतर एकही आवाज आलेला नव्हता.


आता कुठल्याही क्षणी काहीतरी घडणार आहे, अशी एक विचित्र भावना मला सारखी होत होती.माझ्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे, असंही वाटत होतं;परंतु एखादा बारीकसाही आवाज नव्हता.तो ओंडका आपटत,मी जरा खोकलो,थोडा इकडे तिकडे हललो,शेवटी तर मी चक्क उभा राहून खाकरत थुंकलो.तरी काहीच नाही.आणि अचानक तो आला.जादू व्हावी,तसा एक भला मोठा राखाडी आकार जेमतेम दहा यार्डावर असलेल्या झुडुपाआडून प्रकट होऊन, पंख असल्यासारखा,मी बसलेल्या झाडाच्या बुंध्यावर झेप घेत माझ्या खालच्या फांदीच्या दुबेळक्याशी आला.


एक भलंमोठं डोकं माझ्या खालच्या बाजूला फक्त तीन याडांवर अवतीर्ण झालं.मी टॉर्चचं बटण दाबलं आणि त्या प्रकाशात चमकणाऱ्या दोन डोळ्यांच्या मधोमध गोळी झाडली.त्या धमाक्यानं वाघ एक भलीमोठी डरकाळी फोडत मागे जमिनीवर पडला.मी दुसरी गोळी झाडली. पुन्हा एक डरकाळी फोडून तो गायब झाला. शंभर यार्ड अंतरावरून मला 'हर्रफ' असा एक आवाज ऐकू आला,

मग मात्र शांतता पसरली.


मी झाडलेल्या दोन्ही गोळ्या वाघाला नक्की लागल्या होत्या,किमान दुसऱ्या गोळीनं तरी तो मला मारता यायला हवा होता.मात्र मला एवढी खात्री होती,की तो जबर जखमी झाला आहे आणि तो फार दूर जाऊ शकणार नाही.उरलेली रात्र मी डुलक्या मारल्या आणि वाघामागे कशाप्रकारे जाता येईल,हे ठरवायला होगारेहळ्ळीला सकाळी परत आलो..


आल्यावर मी एक छोटीशी झोप काढली,उठून गरमगरम चहा,टोस्ट व बेकनचा नाश्ता करेपर्यंत मुदलागिरी गौडानं कमाल केली.वाघ ज्या झुडुपांमध्ये असायची शक्यता होती,त्या झुडुपांतून आपल्या म्हशी हाकलत नेण्यासाठी त्यानं म्हशींच्या कळपाच्या एका मालकाला तयार केलं होतं.म्हशी जवळ आल्या म्हणजे वाघ आपल्या लपलेल्या जागेतून बाहेर आला असता.


सकाळी नऊ वाजता मी,मुदलागिरी गौडा,दोन वाटाडे,पंधरा म्हशींचा कळप आणि त्याचा मालक,मी जिथे बसायचो,त्या झाडाशी आलो. मी आधी झाडावर चढून,वाघ कुठे दिसतोय का हे पाहिलं पण मला काहीही दिसलं नाही.मी खाली उतरताना झाडाच्या खोडावर,मी झाडलेली पहिली गोळी वाघाच्या चेहऱ्याला किंवा डोक्याला लागून उडालेले रक्ताचे थेंब मला दिसले.खाली उतरल्यावर,तो तिथून ज्या झुडुपामागून गेला,तिथून माग काढताना मात्र, भरपूर रक्त सांडलेलं आम्हाला दिसलं,म्हणजे माझी दुसरी गोळीही वर्मी लागलेली होती.वाघ गेलेल्या दिशेनं आम्ही त्या म्हशींना पांगवून त्यांची एक सैलसर आडवी रांग केली.मी त्या म्हशींच्या मागे चालत होतो.ते दोन वाटाडे माझ्यामागे चालत होते.मुदलागिरी व त्या कळपाचा मालक मी बसायचो त्या झाडावर बसले.आम्ही साधारण दोनशे यार्ड गेलो असू. आम्हाला एक जोरदार गुरगुराट ऐकू आला.म्हशी जागीच थांबल्या आणि मान खाली करत, ज्या दिशेनं आवाज आला,त्या दिशेला शिंगं रोखून त्या उभ्या राहिल्या.


माझ्या थोडं डाव्या बाजूला एक झाड होतं.मी एका वाटाड्याला त्यावर चढून वाघ कुठे दिसतोय का हे बघायला सांगितलं.त्यानं वर चढून पाहिलं आणि खुणेनंच काही दिसत नसल्याचं सांगितलं.दरम्यान,म्हशी थोड्या मागे हटल्या होत्या आणि हाकलूनही पुढे जायला तयार नव्हत्या.त्या म्हशींना तिथेच सोडून मी आणि उरलेला वाटाड्या मागे मुदलागिरीकडे आलो.मी त्याला जाऊन गावातली चारपाच कुत्री घेऊन यायला सांगितलं.तो निघाला लगेचच,पण त्याला परत यायला चांगला दीड तास लागला आणि त्याच्याबरोबर फक्त दोन कुत्री होती. तेवढीच तो मिळवू शकला होता.आम्ही त्या कुत्र्यांना म्हशींवर सोडलं.कुत्री मागे लागली, म्हणून त्या म्हशी पंचवीस एक यार्ड पुढे गेल्या असतील,लगेचच वाघानं भयानक गुरगुराट केला.म्हशी जागीच थांबल्या आणि कुत्री जोरजोरात भुंकू लागली.


मी हळूहळू सर्वात पुढे असलेल्या दोन म्हशींच्या मागे गेलो आणि त्यांच्या पायांमधून मी झुडुपांत लपलेला वाघ दृष्टीस पडतोय का हे बघायचा प्रयत्न केला;पण मला काहीच दिसलं नाही.मी एका म्हशीला पुढे जायला ढोसलं,पण ती गर्रकन माझ्याच दिशेनं वळली.तिच्या लांबलचक अणकुचीदार शिंगांपासून मी थोडक्यात बचावलो.मी अत्यंत बिकट परिस्थितीत सापडलो होतो.माझ्या समोर कुठेतरी तो जखमी वाघ होता,की जो कुठल्याही क्षणी माझ्यावर हल्ला करू शकत होता;तर दुसरीकडे माझ्या आजूबाजूला अस्वस्थ म्हशी होत्या,ज्या कधीही उचकून एकत्र येऊन,माझ्यावर चालून आल्या असत्या आणि जरी त्यांचा मोहरा बाहेर आलेल्या वाघाकडे वळला असता,तरी मी त्यांच्या मार्गात आलो असतो.मी काही पावलं मागे आलो आणि त्या झाडावर बसलेल्या वाटाड्याला खाली उतरायला सांगितलं.त्याच्या व दुसऱ्या वाटाड्याच्या मदतीनं म्हशींच्या पलीकडे जिथून तो वाघ गुरगुरला होता,त्या झुडुपांवर आम्ही दगड फेकायला सुरुवात केली.त्याबरोबर लगेचच तो वाघ पुन्हा गुरगुरू लागला,पण तो लपलेल्या जागेतून बाहेर काही येत नव्हता आणि तिथून निघूनही जात नव्हता.


याचा अर्थ तो चांगलाच जखमी होता आणि तिथून निघून जाता येत नाही,अशी त्याची अवस्था असावी.


यापुढे दगडफेक करून काही फायदा नव्हता. म्हशींना तिथेच सोडून मी ते दोन वाटाडे आणि ती दोन कुत्री बरोबर घेऊन एक भलामोठा वळसा घातला आणि वाघाच्या साधारण तीनशे यार्ड मागच्या बाजूला पोहोचलो.तिथून पुढे मात्र आम्ही अतिशय सावकाश पुढे जाऊ लागलो. माझ्या सूचनेनुसार,वाटेतल्या प्रत्येक झाडावर किंवा उंच जागेवरून तो वाघ दृष्टीस पडतोय का, हे आम्ही पाहात होतो.असे आम्ही सुमारे दोनशे यार्ड अंतर कापले असेल,तेव्हा एका झाडाच्या फांदीवर चढलेला वाटाड्या,त्याला काहीतरी दिसल्याच्या खुणा करू लागला.शेवटी खाली उतरून त्यानं माझ्या कानात फुसफुसत,सुमारे पन्नास यार्डावरच्या झुडुपात,एक पांढरी, तपकिरी रंगाची वस्तू दिसते आहे असं सांगितलं. त्या पलीकडे अजून पन्नास यार्डांवर त्या म्हशी होत्या.


वाटाड्याला ज्या फांदीवरून काहीतरी दिसलं होतं,त्या फांदीवर मी त्याला घेऊन चढलो.त्यानं एका झुडुपाकडे बोट दाखवलं.आधी मला काहीच दिसलं नाही,पण नंतर मात्र मलाही काहीतरी पांढरं तपकिरी दिसलं.मी नेम धरला आणि गोळी झाडली.ही गोळी कुठून आली, याबद्दल वाघाच्या मनात गोंधळ उडाला आणि डरकाळ्या फोडत त्यानं समोरच्या म्हशींवर हल्ला चढवला.सर्वात जवळच्या म्हशीवर त्यानं उडी घेतली.बाकीच्या म्हशी एकत्र आल्या. आपली शिंगं रोखत त्या वाघावर चालून गेल्या. वाघ त्या म्हशीच्या पाठीवर बसून जोरजोरात गुरगुरत होता.


मी झाडावर असल्यानं,मला समोरचं दृश्य अगदी स्पष्ट दिसत होतं,पण मी झाडलेली गोळी त्या म्हशीला किंवा आजूबाजूनं पुढे येणाऱ्या म्हशींपैकी एखादीला लागायची शक्यता होती..


बाकीच्या सर्व म्हशी आता तिथे दाटीवाटीनं शिंगं रोखून पुढे आल्या.आपल्याला उद्भवलेला धोका लक्षात येऊन वाघानं त्या म्हशीवरून उडी मारली आणि पंचवीस एक यार्ड अंतरावरच्या एका झुडुपाआड तो दडला.म्हशींकडे लक्ष ठेवून बसलेला वाघ मला स्पष्ट दिसत होता.माझी गोळी वाघाच्या डाव्या खांद्यामागे घुसली आणि वाघाचा खेळ खलास झाला.


वाघाची नंतर तपासणी केली,तेव्हा मला कळलं,आदल्या रात्री झाडलेल्या गोळ्यांमधली पहिली गोळी डोळ्याच्या दोन इंच खाली लागून तिथल्या हाडाच्या चिंधड्या उडाल्या होत्या. माझी दुसरी गोळी त्याच्या पोटातून आरपार गेली होती,पोटाला पडलेल्या छिद्रातून त्याची आतडी लोंबत होती.माझ्या तिसऱ्या गोळीनं थेट त्याच्या हृदयाचा वेध घेतला होता.कार शिकाऱ्यांनी झाडलेली गोळी लागून त्याचा जबडा मोडला होता आणि तो नीट जुळून आला नव्हता, त्यामुळे त्याला नैसर्गिक खाद्य मिळवायला जबड्याचा वापर करता येत नव्हता. त्याचा परिणाम म्हणून तो नरभक्षक झाला होता.


जी म्हैस त्याच्या ताकदवान पंज्यांनी जखमी झाली होती,तिच्या मालकाला मी नुकसानभरपाई दिली;पण मला खात्री आहे की, 


थोड्याच दिवसांत ती बरी होऊन हिंडू फिरू लागेल,कारण म्हशी मुळातच तब्येतीनं ठणठणीत असतात.


अशाप्रकारे येमेडोड्डीच्या नरभक्षकाची कारकीर्द संपुष्टात आली आणि सर्व जिल्हा भयमुक्त झाला परंतु हे सर्वांनी समजून घायला हवे की, परिणामांची काहीही पर्वा न करता अत्यंत बेजबाबदारपणे वागलेल्या या कार शिकाऱ्यांमुळे एकोणतीस निरपराध लोकांचा बळी गेला होता.


 कथा पुर्ण झाली.मनस्वी धन्यवाद 

नरभक्षकाच्या मागावर - केनेथ अँडरसन

अनुवाद - संजय बापट

२१/१२/२२

येमेडोड्डीचा नरभक्षक.. थरारक शिकार कथा.. भाग - २

पुढे जेव्हा रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात झाली,तसा बिबळ्या सरपटत घाणेरी आणि इतर काटेरी झुडुपांच्या भरगच्च गचपणात शिरला होता.आम्ही रांगत किंवा सरपटत गेल्याशिवाय त्यात शिरणं अशक्य होतं. रानडुकरांच्या जा-ये करण्यानं तयार झालेली एक चिंचोळी वाट या गचपणातून जात होती. बिबळ्याही याच वाटेनं गेला होता,कारण या वाटेवर आम्हाला बरंच रक्त सांडलेलं आढळलं.


आम्ही वाकून त्याच वाटेनं जाऊ लागलो.माझी ४०५ विंचेस्टर रायफल कुठल्याही क्षणी गोळी झाडायला सज्ज होती व ती मी माझ्यापुढे धरून बिबळ्याच्या मागावर रांगत चाललो होतो.डाव्या उजव्या बाजूनं किंवा मागून हल्ला झाल्यास बचाव करायला आल्फी माझ्यामागून येत होता. असे आम्ही सत्तर-पंचाहत्तर यार्ड गेलो असू,पुढे वाटेला एक वळण होतं.


कुठलीही पूर्वसूचना नाही,आवाज नाही,धोक्याचा इशारा नाही,अचानक एका क्षणी त्या वळणावर दबा धरून बसलेला बिबळ्या माझ्यावर झडप घालायला झेपावत आला आणि तो जेव्हा आला,तेव्हा तो माझ्यापासून रायफलच्या नळीची जेवढी लांबी असते तेवढ्या अंतरावर होता.ती जागा एवढी चिंचोळी होती आणि अंतर एवढं कमी होतं, की नेम चुकणं केवळ अशक्य होतं.मी झाडलेली गोळी त्याच्या कवटी आणि मेंदूला भेदून आरपार गेली आणि तो माझ्या रायफलच्या नळीच्या पुढच्या टोकाशी मरून पडला.


आम्ही पुढचे दहा दिवस बिरूरला राहिलो. त्या दहा दिवसांत फक्त एक गाय मारली गेली,तीही सातव्या दिवशी दुपारी,येमेडोड्डीपासून सहा मैलांवर.ती बातमी आम्हाला कळून आम्ही तिथे पोहोचेपर्यंत तिचा फडशा पाडला होता,कारण गाईला झाकून ठेवण्याची तसदी कोणीही घेतली नव्हती.ते उरले सुरले अवशेष जिथून दिसू शकतील,असं एक झाड सुमारे चाळीस यार्डावर होतं.

आल्फी त्या झाडाच्या दुबेळक्यात मध्यरात्र उलटून जाईपर्यंत बसला,पण वाघ काही आला नाही.त्यापुढे मात्र काहीच घडलं नाही.अकराव्या दिवशी सकाळी आम्ही बंगलोरला परत गेलो.


त्यानंतर काही दिवसांनी एका अंधाऱ्या रात्री लिंगडहल्ली - बिरूर रस्त्यावरून ज्यांना आम्ही 'कारशिकारी' म्हणतो,

अशी एक चौकडी निघाली.यांना कारशिकारी म्हणायचं कारण, यांना जंगलाचं सौंदर्य,सावजाचा माग काढण्यातला थरार,मोठ्या प्राण्यांच्या शिकारीचं शास्त्र यात काडीमात्रही रस नसतो आणि त्याची पर्वाही नसते.हे रात्री कार काढून निघतात, यांच्याकडे स्पॉटलाईट असतात.ते या स्पॉटलाईटचे झोत टाकत जंगलरस्त्यानं फिरतात आणि या प्रकाशझोतात जो कोणी प्राणी दिसेल किंवा ज्या कोणाचे डोळे चमकलेले दिसतील, त्याला बंदुकीच्या गोळ्या झाडून मारायचं असा त्यांचा एकमेव छंद असतो.ते जनावर नर आहे का मादी,वयानं लहान आहे का मोठं,ते गोळी लागून जखमी झालंय का मेलंय - या कुठल्याही गोष्टीचा त्यांना विधिनिषेध नसतो आणि ते त्याची खात्री करायचीही तसदी घेत नाहीत.किंबहुना कारमधून फिरताना मध्ये कुठेही ते खाली उतरून जमिनीवर पायही ठेवत नाहीत.हे वर्तन सर्व नियमांच्या विरुद्ध आहे;परंतु अशा घटना घडतात,ही वस्तुस्थिती आहे.


तर झालं असं,की हे कारशिकारी रात्री निघाले. बिरूरपासून चारेकमैल अंतरावर स्पॉटलाईटच्या प्रकाशझोतात त्यांना रस्त्याच्या कडेच्या बांधावरून वर येणाऱ्या एका वाघाचे डोळे चमकलेले दिसले. दोन गोळ्या झाडल्याचा आवाज घुमला.तो वाघ उडी मारून नाहीसा झाला.त्याच्या जबड्याच्या खालच्या बाजूला गोळी लागली होती,


दुसरीचा मात्र नेम चुकला होता.ह्या कारशिकाऱ्यांनी थांबून,आपण झाडलेल्या गोळ्यांचं काय झालं,याचा काहीही तपास केला नाही हे वेगळं सांगायची गरज नाही. जखमी वाघाचा माग काढावा,जमलं तर त्याला मारून वेदनामुक्त करावं,असा विचारही ह्या लोकांच्या मनात आला नाही.


त्या जखमी झालेल्या वाघानं दोन महिने तरी अत्यंत वेदना सोसल्या असाव्यात आणि जखम भरून येताना त्याचा जबडा वेडावाकडा जुळून आला असावा,ज्यामुळे तो त्याचं नैसर्गिक खाद्य मिळवू शकला नसावा आणि त्याची उपासमार झाली असावी.


त्यानंतर साधारण तीन महिन्यांनी जंगलात चरणाऱ्या शेळ्यामेंढ्यांच्या कळपाजवळ अतिशय सावधगिरी बाळगत दबक्या पावलांनी जाऊन एका वाघानं एका धष्टपुष्ट शेळीवर झडप घातली.वाघ जनावराला मारताना त्याची मान मोडतात,तसं न करता त्यानं त्या शेळीला पुढच्या पंजाचा एक जोरदार तडाखा दिला होता.नेमका  गुराखी जवळच होता.त्यानं धाडसानं आपल्या हातातली काठी त्या वाघाला फेकून मारली.ती त्या वाघाला ओझरती लागली,त्यामुळे चिडून वाघ त्या गुराख्यावर धावून आला.त्याच्या पंज्याच्या एका फटक्यात त्या माणसाच्या डोक्यावरची त्वचा संपूर्ण फाटली.घाबरून व वेदनेनं त्यानं फोडलेली किंकाळी वाघाच्या पंज्याच्या दुसऱ्या तडाख्यानं बंदच झाली,कारण एखादं अंडं फुटावं तसा त्याच्या कवटीचा चेंदामेंदा झाला होता.


तो माणूस खाली कोसळला.आता वाघापुढे दोन बळी होते.एक ती शेळी व दुसरा माणूस त्या वाघाची व्दिधा मनःस्थिती झाली.त्यानं फुटलेल्या कवटीतून वाहणारं रक्त चाटून पाहिलं,जणू तो चवीचवीतला फरक तपासून पाहात होता.नंतर त्यानं त्या शेळीच्या मानेला धरून तिला उचललं व तो जंगलातल्या झुडुपांकडे जाऊ लागला.पण अचानक काय झालं कोण जाणे,आपल्या तोंडातली शेळी खाली टाकून तो वळला आणि त्या गुराख्याच्या खांद्याला तोंडात धरून तो जंगलात निघून गेला.


येमेडीच्या नरभक्षकाची भीतिदायक कारकीर्द सुरू झाली.त्यानंतर साधारण अडीचशे चौरस मैल परिसरात पडलेले बळी हे या वाघाच्या खात्यावर मांडले गेले.

बिरूर,लिंगडहळ्ळीहून उत्तरेकडे भागवतकट्टे,तिथून पश्चिमेला बाबा बुडान पर्वतरांगेतील सांतावेरी,तिथून खाली दक्षिणेस आयरन कोटे तलाव आणि बिरूर एवढी या भीतीग्रस्त परिसराची व्याप्ती होती.


एकापाठोपाठ एक सातत्यानं माणसं मारली जाऊ लागली.हे बळी पडण्यात एक सुसूत्रता होती,ती म्हणजे ते ठरावीक वाटांवर पडत होते व प्रत्येकजण जबड्यानं चावा घेतल्यानं न मरता पंज्याच्या जबरदस्त तडाख्यानं मारला गेला होता.तसेच मारले गेलेल्यांच्या प्रेताची तपासणी केल्यावर असं दिसलं,की सर्व प्रेतांवरचं मांस वाघानं आपल्या ताकदवान पंजांच्या नखांनी ओरबाडून काढून खाल्लं होतं.याचा निष्कर्ष असा निघत होता,की 


वाघाच्या खालच्या जबड्याला दुखापत झाल्यानं त्याला त्याचा वापर करता येत नव्हता.


या नरभक्षकाचं आगमन झालं आणि पूर्वी,मी येमेडोड्डी व लिंगडहळ्ळीला गाईगुरं मारणाऱ्या एका जवान वाघाचा उल्लेख केला होता,त्या वाघाचा उपद्रव एकदमच थांबला.

हा तोच वाघ होता,जो नरभक्षक झाला होता,असं मानायला जागा होती.कारशिकाऱ्यांनी केलेला उपद् व्याप

बरेच दिवस कोणाला माहीत नव्हता;परंतु त्यातल्या एकानं आपण बिरूर लिंगडहळ्ळी रस्त्यावर एका - वाघावर गोळी झाडून त्याला जखमी केल्याची गोष्ट,मोठी फुशारकी मिरवत सांगितली आणि सर्व चित्र स्पष्ट झालं.


या वाघाचा संचार साचेबद्ध मार्गावरून होता.मी वर सांगितलेल्या ठिकाणांच्या आजूबाजूला असलेल्या खेडेगावातली आणि वस्त्यांवरची माणसं हा सातत्यानं मारायचा.वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या वाचून,

माझ्याकडे असलेल्या या भागाच्या नकाशावर,वाघाच्या हालचाली कुठे व कशा होतायत ते,आणि त्यानं माणसं मारलेल्या ठिकाणांची नावं व तारखा यांची नोंद ठेवायला मी सुरुवात केली...


या सर्व परिसराच्या केंद्रस्थानी 'होगारखान' नावानं ओळखला जाणारा आणि साधारण ४५०० फूट उंच असलेला डोंगर होता.याच्या पायथ्याशी असलेल्या टेकड्या घनदाट जंगलानं भरलेल्या होत्या.इथे मनुष्यवस्ती जवळजवळ नव्हती.माझ्या अंदाजानं,याच भागात या वाघाचं वास्तव्य होतं आणि इथूनच तो मनुष्यवस्तीत येऊन सातत्यानं मनुष्यबळी घ्यायचा.माझ्या नकाशावरच्या नोंदींवरून असं दिसत होतं,की साधारण दर तीन महिन्यांनी,त्याची आधीच्या ठिकाणी परत फेरी व्हायची.या वाघानं घेतलेल्या बळींची संख्या आता सत्तावीसवर पोहोचली होती.


या वाघाला मारायला मी होगारेहळ्ळी नावाच्या खेड्यात मुक्काम करायचं ठरवलं.हे खेडं बिरूर आणि लिंगडहळ्ळीच्या मध्यावर होतं आणि होगारखान डोंगराच्या पायथापासून जेमतेम साडेतीन मैलांवर होतं.हा भाग खुरट्या झुडुपांनी व्यापलेला होता.मी हे ठिकाण निवडायची दोन कारणं होती.एक म्हणजे हा परिसर व इथलं जंगल माझ्या पूर्ण परिचयाचं होतं आणि इथले रहिवासीही माझ्या परिचयाचे असल्यानं त्यांच्याकडून मला बऱ्यापैकी सहकार्य मिळेल, अशी मला आशा होती,या वाघाचं वास्तव्य होगारखान डोंगराच्या पायथ्याला असावं,याची मला खात्री होती.आणि सर्वात महत्त्वाचं कारण हे,की वाघाची पुढची फेरी सुरू झाली,की इथे हमखास बळी घेतला जायचा.


या वाघाचा फेरा साधारण तीन महिन्यांनंतर पुन्हा या गावातून जाईल,अशा अंदाजानं,त्याच्या सहा आठवडे आधी,मी त्या गावात दाखल झालो.त्यामुळे मला लोकांशी संवाद साधायला मिळाला.एवढे बळी कुठे व कसे पडले,

याची माहिती तर मला मिळालीच;परंतु तो पुन्हा या भागात जेव्हा येईल,तेव्हा काय योजना करावी, हेही ठरवायला वेळ मिळाला.


होगारेहळ्ळी हे गाव जुनं होतं.इथे मजबूत बांधणीची दोन सुरेख पुरातन मंदिरं होती.गाव तसं मोठं होतं,परंतु लोकवस्ती मात्र फार नव्हती. इथली घरं इथेच मिळणाऱ्या,

लालसर रंगाच्या दगडात बांधलेली होती.याच्या दक्षिणेकडे विस्तीर्ण असा एक सुंदर तलाव होता.त्यात पाणपक्षी आणि बदकं मुबलक प्रमाणात होती. या गावाच्या आग्नेयेला नारळी आणि पोफळीच्या बागा होत्या.इथली जमीन जरा खोलगट होती आणि या बागांमुळे ती कायम ओलसर असायची.इथल्या पोफळींचे सरळसोट शेलाटे बुंधे त्यावर वाढलेल्या नागवेलींनी पूर्णपणे वेढून टाकले होते.संपूर्ण भारतात लोक जी पानं खातात,ती ह्या नागवेलीची पानं असतात,ह्या पानांना चुना लावून त्यात कात आणि सुपारी घालून ती खाल्ली जातात.


गावाच्या पूर्व व उत्तर दिशांना काही भाताची शेतं आणि कोरडवाहू जमिनी होत्या.पश्चिम आणि वायव्य दिशांना मात्र होगारखानच्या दिशेनं जाणारं खुरट्या झुडुपांचं दाट रान होतं.


तुम्हाला आता लक्षात आलं असेलच,की या खुरट्या झुडुपांच्या रानातच सर्वात जास्त बळी पडले होते.दोन बळी नारळी-पोफळीच्या बागांमध्ये पडले होते.बाकीचा सर्वसाधारण उजाड भाग मात्र हा वाघ कटाक्षानं टाळायचा. जेव्हापासून हे बळी पडू लागले,तेव्हापासून गावकरी अंधार पडायच्या आत घरात जाऊन दारं बंद करायची खबरदारी घेऊ लागल्यानं आता बळी दुपारी पडू लागले होते.गावाच्या वेशीच्या आसपास बरेचदा वाघाचे ठसे आढळले होते,पण पक्की बांधलेली घरं व मजबूत लाकडी दारांमुळे तो कुठल्याही घरात निदान आत्तापर्यंत तरी शिरू शकला नव्हता..


एकंदर परिस्थिती लक्षात घेता वाघाला मारण्यासाठी काही योजना बनवणं अवघड होतं आणि मला हे माहिती होतं,की वाघानं इथे एखादा माणूस मारला,की पुढचे तीनचार महिने तो होगारेहळ्ळीला परत येणार नव्हता आणि त्यानंतर,कुठेतरी अजून एखादा माणूस मारला जाईपर्यंत ह्या वाघाचा ठावठिकाणा समजणं केवळ अशक्य होतं.


आता मला एकच पर्याय सुचत होता, खरंच सांगतो,तो मला अजिबात रुचलेला नव्हता,तो पर्याय म्हणजे मीच आमिष म्हणून वाघाला आकर्षित - करायला बसायचं !


मला होगारेहळ्ळीला येऊन एक आठवडा होऊन गेला होता. मी वाघांबद्दल मिळेल तेवढी सर्व माहिती घेतली होती. जिथे जिथे बळी पडले,त्या सर्व जागी मी स्वतः जाऊन कशा पद्धतीनं आणि परिस्थितीत हे बळी पडले,हे जाणून घेतलं.आता तो नरभक्षक कधीही इथे येणं अपेक्षित होतं आणि ताबडतोब काहीतरी ठरवणं आवश्यक होतं. 


खुरटी झुडुपं असलेल्या परिसरात सर्वात जास्त बळी जे पडले होते,ते एकतर लाकूडतोडे होते किंवा गुराखी होते.या परिसरात बिबळ्यानं एखाददुसरी गाय मारली होती,पण या वाघानं एकाही गुराला साधा ओरखडाही काढला नव्हता.तेव्हा मला जी कल्पना सुचली, ्ती एवढी कमाल होती,की मी स्वतःचीच पाठ थोपटली.मी त्या परिसराच्या अर्धा मैल आत एका झाडावर पंधराएक फूट उंचीवर,जिथे वाघाची उडी पोहोचणार नाही,अशा एका फांदीवर एक खुर्ची चढवून बसवली.त्यानंतर मी एक सहा फूट लांबीचा आणि तीन इंच व्यासाचा एक लाकडाचा ओंडका घेतला,त्याच्या एका टोकाला एक मजबूत दोर बांधून मी तो वरच्या एका फांदीला असा लटकावला,की त्याचं खालचं टोक हे माझ्या खालच्या एका फांदीपर्यंत येईल.नंतर मी त्या दोराच्या दुसऱ्या टोकाचा फास करून तो माझ्या बुटाच्या पुढच्या भागात अडकवला.आता मी खुर्चीत रायफल घेऊन आरामात बसून माझं पाऊल वरखाली केलं,की तो ओंडका वर उचलला जाऊन खालच्या फांदीवर आपटणार होता आणि रानात लाकडं तोडताना लाकूडतोड्यांचा जसा आवाज येतो, तसा आवाज होणार होता.ही दोरी मी थोडी लांबच ठेवली होती,याचं कारण,पाऊल दमलं, तर मी ती हातानं खालीवर ओढून आवाज करू शकलो असतो.दुसरं म्हणजे ती दोरी जरा जास्त वर ओढून खाली केली,तर तो ओंडका जोरानं फांदीवर आपटून मोठा आवाज आला असता. मला ऊन लागू नये,म्हणून माझ्या डोक्यावरच्या फांद्याच मी जरा डोक्यावर ओढून घेतल्या.


आता मला आखडून बसायची काहीच आवश्यकता नव्हती.मी आरामात बसून खाऊपिऊ शकणार होतो,धूम्रपान करू शकणार होतो आणि खोकलो तरी चालणार होतं,कारण मी आमिष म्हणूनच बसलो होतो. वाघ जवळपास आला,तर माझ्याकडून झालेल्या आवाजानं तो निश्चितच माझ्याकडे आकर्षित होऊन लपतछपत माझ्यावर हल्ला करणार होता आणि मलाही तेच हवं होतं..


होगारेहळ्ळीचा सरपंच मुदलागिरी गौडानं मला पूर्ण सहकार्य केलं.मी त्याला माझी योजना समजावून सांगितली आणि हेही बजावून सांगितलं,की ज्या दिवसापासून मी माझी योजना अमलात आणून झाडावरच्या खुर्चीत बसायला सुरुवात करीन,त्या दिवसापासून त्या नारळीपोफळीच्या बागांमध्ये किंवा खुरट्या झुडुपांच्या रानात कोणीही फिरकता कामा नये. त्यानंही मला भरवसा दिला,"ही जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवलेली आहे,आता ती अंमलात आणायचं काम माझं." वाघाला त्या परिसरात कोणी आढळलंच नसतं,तर तो माझ्याकडे आकृष्ट होण्याची शक्यता वाढली असती.त्या सरपंचानं दवंडी पिटून सर्व गावकऱ्यांना ही गोष्ट कळवली आणि वेळप्रसंगी दमदाटी करूनही, दुपारनंतर त्या खुरट्या झुडुपांच्या रानात,दोन तीन आठवडे फिरकायचं नाही,अशी सक्त ताकीद त्यानं गावकऱ्यांना आणि आसपासच्या परिसरातल्या लोकांनाही दिली.


तिथल्या गुरांना तीन आठवडे चरता येईल एवढं गवत गावाच्या जवळपास होतं,एवढ्या काळात वाघ येईल अशी मला आशा होती,वाघाचा फेरा इथे येण्याची शक्यता असल्याचा आगाऊ इशारा गावकऱ्यांनाही मिळाला होता.आता हे दोन-तीन आठवडे कुठेही बाहेर न जाता आळसात घालवायचे,म्हणून गावकरीही मनातून खूश झाले.मी होगारेहळ्ळीला आल्यापासून बरोबर दहाव्या दिवशी दुपारी बाराच्या आत पाण्याची बाटली,थोडे सँडविच,माझा ओढायचा पाईप आणि अर्थातच माझी ४०५ विंचेस्टर रायफल घेऊन मी झाडावर बैठक मारली.तो माझा पहिला दिवस.थोड्याच वेळात पाऊल वरखाली करून तो ओंडका आपटत राहणं नुसतंच कंटाळवाणंच नाही,तर थकवणारंही होतं,हे मला चांगलंच कळलं.त्यात भरीस भर म्हणून दुपारच्या कडक उन्हात चहूबाजूला त्या झुडपांच्या दाट जंगलाकडे बघताना माझे डोळेही शिणले.


उर्वरीत कथा पुढील भागात.. ( अपुर्ण ) 


नरभक्षकाच्या मागावर - केनेथ अँडरसन

अनुवाद - संजय बापट

१९/१२/२२

येमेडोड्डीचा नरभक्षक.. थरारक शिकार कथा..

म्हैसूर प्रांतातल्या कडूर जिल्ह्यामध्ये,येमेडोड्डीचं जंगल येतं.'बाबाबुडान' नावानं ओळखल्या जाणाऱ्या साडेसहा हजार फूट उंच पर्वतराजीच्या पूर्वेकडे पसरलेल्या डोंगररांगा या येमेडोड्डीच्या जंगलाच्या सभोवती आहेत.याच्या सीमेवर 'मडुक' नावाचं चहुबाजूंनी जंगलानं वेढलेलं एक अतिशय सुंदर सरोवर आहे.या सरोवरापासून पाण्याचा एक अरुंद पाट निघून,तेवढ्याच अरुंद जंगलवाटेसोबत ईशान्येकडे दहा मैल जाऊन, बिरूर नावाच्या एका छोट्या शहराच्या उत्तरेला तीन मैलांवरच्या एका छोट्या तलावाला मिळतो.


ह्या सर्व परिसरात वन्य प्राण्यांचं अस्तित्व खूप मोठ्या प्रमाणावर आहे,इथे गाईगुरांचे कळपही बरेच आहेत.

त्यांना सकाळी चरायला नेऊन संध्याकाळी परत आणलं जातं.असं असल्यावर इथे भरपूर वाघ नसतील, तरच नवल. इथे मुबलक आढळणारी रानडुकरं,सांबर व चितळ हे खरं वाघाचं मुख्य खाद्य,परंतु शिकारीपेक्षा गुरांना मारणं सोपं असल्यानं हे वाघ कालांतरानं गुरांची शिकार करू लागतात,आणि वाघ गुरं मारणारच,म्हणून गुराखीही फारशा गांभीर्यानं त्याची दखल घेत नसत.


 दररोज एखादी तरी गाय किंवा बैल मारला जायचा.

बिबळे वासरं,शेळ्या आणि गावातली कुत्री मारायचे.बिरूर गावातली ही नित्याचीच बाब होती.


वाघांपेक्षा बिबळे संख्येने कमी होते व वाघांच्या भीतीनं,ते वाघांचं वास्तव्य असलेल्या ठिकाणी न राहता,सहसा गावाच्या वेशीच्या आसपासच असायचे.


१९४६ च्या सुरुवातीला एक लहान नर वाघ इथे दिसू लागला.संध्याकाळी गाईगुरं परत येताना, बिरूरच्या वेशीवरच,त्यानं वासरं,शेळ्या,मेंढ्या उचलायला सुरुवात केली.


वाघ जनावरं मारताना त्यांची मान मोडतात,

कधीकधी मोठ्या आकाराचे बिबळे,ज्यांना स्थानिक भाषेत 'तेंदू' म्हणून ओळखलं जातं,तेही याच पद्धतीनं शिकार करतात,त्यामुळे हे काम बिबळ्याचंच असावं असा समज होता परंतु एकदा एका जवान गाईला मारताना त्याला एका गुराख्यानं पाहिलं आणि तो वाघच असल्याचं स्पष्ट झालं.


हा वाघ कुठल्याही देशी किंवा विदेशी शिकाऱ्याच्या गोळीला बळी न पडता झपाट्यानं वाढत गेला,

त्याचबरोबर तो अधिकच धाडसी आणि धूर्त बनला.

पुढच्या अठरा महिन्यांत त्यानं दर आठवड्याला दोन किंवा कधीकधी तीन गुरं मारली.हा तिथल्या गुराख्यांची मोठी डोकेदुखी होऊन बसला होता.


ह्या वाघाच्या उपद्रवाच्या बऱ्याच बातम्या माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या.१९४८ सालच्या अखेरीस माझा मित्र आल्फी रॉबर्टसन लवकरच इंग्लंडला परत जाणार होता.

त्याला भारतातील एक आठवण म्हणून वाघाचं एखादं कातडं मिळालं तर हवं होतं.आम्ही बिरूरला काही दिवस राहिलो,तर त्या उपद्रवी वाघालाही मारता येईल आणि आल्फीला कातडंपण मिळेल असा विचार करून मी मित्रांबरोबर - येमेडोड्डीला जायचं ठरवलं.


बंगलोरहून आम्ही निघालो.आम्हाला १३४ मैल अंतर जायचं होतं.त्या दिवशी नेमका मला ऑफीसमधून निघायला वेळ लागला आणि आम्ही संध्याकाळी उशिरा निघालो.रस्ते बरेच खराब होते.बंगलोरपासून ८६ मैलांवर तिपतूर इथे आमच्या गाडीला एक अपघात झाला. आम्ही माझ्या मित्राच्या गाडीनं जात होतो, गाडीही तोच चालवत होता.एका सपाटशा दगडावरून गाडीचं चाक गेलं,ते दगडाच्या पुढच्या भागावरून जाताना त्याचा मागचा भाग उचलला गेला आणि गाडीच्या मागच्या बाजूला असलेल्या पेट्रोलच्या टाकीवर तो खाड्कन आपटून टाकीला चांगली नऊ इंचांची चीर गेली. टाकीतलं आठ गॅलन पेट्रोल गळून रस्त्यावर सांडलं आणि गाडी जागेवर बंद पडली. आमच्याजवळ जादाचं पेट्रोल नव्हतं,पण प्रायमस स्टोव्ह होता आणि त्याला लागणाऱ्या पॅराफिन तेलाच्या दोन बाटल्या होत्या,शिवाय फुटपंपही होता.आम्ही त्या पंपाच्या नळीचं एक टोक एका बाटलीत घातलं, तोंडानं दुसऱ्या टोकातून तेल ओढून घेत ते कॉरबुरेटरला जोडलं व गाडी चालू करून तिपतूरमध्ये पोहोचलो.तिथे किरकोळ दुरुस्ती करणारा एकच माणूस होता.त्याला आम्ही उठवलं.एका घराबाहेर आम्हाला एक पॅराफिनचा रिकामा डबा मिळाला.त्या डब्याच्या पत्र्यानं त्या पेट्रोलच्या टाकीची चीर आम्ही झाकून दुरुस्त करून घेतली.तिपतूरच्या एकमेव पेट्रोलपंपापर्यंत गाडी ढकलत नेल्यावर आम्हाला कळलं,की तिथलं पेट्रोल संपलं आहे आणि नवीन साठा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत येईल.आम्ही चांगलेच अडकलो होतो.दुसरा पंप सोळा मैलांवरच्या आर्सीकेरी गावात होता.तिथपर्यंत जाण्यापुरतं पेट्रोल मागायला आम्ही एकदोन ट्रक ड्राइव्हरनाही उठवलं.त्यांना अवाच्यासवा पैसेही देऊ केले, पण "आमच्याही गाड्यांमधलं पेट्रोलही संपलंय आणि आम्ही पण उद्या येणाऱ्या पेट्रोलच्या गाडीची वाट बघतोय," असं त्यांनी आम्हाला सांगितलं.


आता मात्र आम्ही आमची सदसद्विवेकबुद्धी, चांगुलपणा गुंडाळून ठेवला.आम्ही तो मघाचचा डबा आणि एक रबरी नळी घेतली आणि तिपतुरच्या निद्रिस्त रस्त्यांवरून लपतछपत निघालो.एका गल्लीत आम्हाला एक फोर्ड गाडी उभी दिसली.त्या गाडीचा मालक जागा झाल्यास त्याच्यावर नजर ठेवायला मी आल्फीला सांगितलं आणि आवाज न करता हळूच त्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडलं. रबरी नळीचं एक टोक टाकीत घालून दुसऱ्या टोकातून तोंडानं पेट्रोल ओढून मी ते माझ्या मांडीत धरलेल्या डब्यात जमा केलं.असं पुन्हा एकदा करून जमा झालेलं पेट्रोल घेऊन आम्ही घाईनं गाडीशी आलो.पेट्रोल आणि उरलेलं पॅराफिन एकत्र करून आम्ही गाडी सुरू केली आणि आसंकिरीला आलो.


या सगळ्या गोंधळामुळे बिरूरला पोचायला आम्हाला सकाळचे साडेसात वाजले.गावातून आम्ही जंगलाच्या दिशेनं साधारण दोन मैल गेलो असू,रस्त्याच्या कडेला लागून असलेल्या एका मोकळ्या जागेत आम्हाला बरीच गिधाडं जमलेली दिसली.माझा मित्र फोटो काढू लागला, तोपर्यंत मी ती गिधाडं जमण्याचं कारण बघायला गाडीतून उतरलो.एक तरुण बैल तिथे मरून पडला होता.


त्याच्या गळ्यावरच्या सुळ्यांच्या खुणा बघून,हे काम बिबळ्याचं आहे,हे स्पष्ट होतं.त्याच्या मानेचे मणके मोडलेले असते,तर तो वाघानं घेतलेला बळी आहे,असं नक्की झालं कारण 


वाघांची जनावर मारायची पद्धत तशी असते.

दुसरं म्हणजे बैलाच्या पोटाकडचा भाग खाल्लेला होता आणि आतडी तशीच आत होती.म्हणजे बैलाला बिबळ्यानंच मारलं होतं.वाघ स्वच्छतेचे भोक्ते असतात.खाणं सुरू करायच्या आधी ते जनावराच्या पोटातील घाण खाण्यात मिसळू नये म्हणून,त्याचा मागचा भाग फाडून त्याची आतडी काढून ती दहाएक फूट अंतरावर नेऊन ठेवतात.


इतक्या लगेच आमचं नशीब उघडलं,म्हणून आम्ही खूश झालो.गिधाडांपासून संरक्षण करण्यासाठी रस्त्याच्या कडेच्या झुडुपांमधून आम्ही काही फांद्या तोडून तो मेलेला बैल झाकला आणि त्या झुडुपांमध्येच आम्हाला लपून बसता येईल,अशी एक छान जागा तयार केली. आता संध्याकाळी हा बिबळ्या नक्की सापडेल आणि गाडीमुळे रात्री झालेल्या त्रासाची भरपाई होईल,या विचारानं आल्फीलाही बरं वाटलं.


तिथून काही अंतरावर जाऊन आम्ही खाल्लं. रात्री जागरण करायचं असल्यानं झोप काढली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही त्या मेलेल्या बैलाशी आणि आम्ही केलेल्या लपणाशी आलो. त्या बैलावर झाकून ठेवलेल्या फांद्या आम्ही बाजूला केल्या.आल्फी रायफल,

टॉर्च,पाण्याची बाटली आणि ब्लॅकेट घेऊन लपणात शिरला.मी गाडी घेऊन बिरूरला परत जायच्या बेतात होतो, तेवढ्यात एक गुराखी धापा टाकत तिथे आला आणि अर्ध्या तासापूर्वी,मैलभरापेक्षा कमी अंतरावर,

वाघानं आपली दुभती गाय मारल्याची खबर त्यानं दिली.


वाघाला मारून त्याचं कातडं मिळवायचं,का बिबळ्याला मारून त्याचं - हा निर्णय मी आल्फीवर सोपवला.आम्ही केलेली तयारी बघता बिबळ्याला नक्की मारता येणार होतं,वाघाला मारता येईलच याची खात्री नव्हती;परंतु आल्फीनं वाघाला मारायचं ठरवलं.आम्ही लपण करायला वापरलेलं सर्व साहित्य काढून गाडीत भरलं आणि वेगानं गाडी चालवत निघालो. जाताना त्या गुराख्यालाही आम्ही सोबत घेतलं. त्यानं सांगितलेल्या ठिकाणी गाडी थांबवून आम्ही गाडीतलं लपणाचं सर्व साहित्य बरोबर घेतलं आणि गाय जिथे मारली होती,तिथे चालत निघालो.


आम्हाला फार लांब जायला लागलं नाही. जेमतेम तीन फर्लांगावर ती मेलेली गाय पडली होती.तिची मान मोडली होती आणि नाकातून अजूनही फेसाचे बुडबुडे येत होते.गुराख्यामुळे किंवा गाईंबरोबर जवळच चरत असलेल्या म्हशींमुळे असेल,वाघ एक लचकाही न तोडता निघून गेला होता.


सहा वाजले होते व झपाट्यानं अंधार पडू लागला होता.दुर्दैवानं जवळपास एकही झाड किंवा लपून बसता येईल अशी जागा नव्हती. आमच्यापुढे दोनच पर्याय होते.एकतर गाईला इथंच सोडून परत जायचं,नाहीतर जमिनीवरच कुठेतरी बसून,वाघ परत येईल,तेव्हा त्याच्यावर गोळी झाडायची जोखीम पत्करायची.


आल्फीला काहीही करून इथेच थांबायचं होतं. शेवटी आम्ही गुराख्याच्या मदतीनं आजूबाजूच्या काही फांद्या व आमच्याजवळचं साहित्य घेऊन एक ओबडधोबड लपण तयार केलं आणि साडेसहा वाजता आम्ही सगळेच त्यात घुसलो.


आता जवळजवळ पूर्ण अंधार पडत आला होता. पंधरा मिनिटांतच पंचवीस यार्डावरची ती मेलेली गाय दिसेनाशी झाली.अमावस्येची अंधारी रात्र होती.चांदण्यांच्या मंद प्रकाशात आम्हाला अगदी जवळचंच,जरा जरा दिसत होतं;पण गाय मात्र दृष्टीस पडत नव्हती.


एक तास गेला आणि साधारण अर्ध्या मैलावरून एका कोल्ह्याची कोल्हेकुई ऐकू आली.तो विचित्र आवाजात ओरडत होता.कोल्हे सहसा टोळीनं गावाच्या किंवा शहराच्या वेशीजवळ आढळतात. रात्री ते वस्तीत शिरून,काही खायला मिळतंय का,हे बघतात.रात्री होणारी त्यांची कोल्हेकुई सर्व भारतीयांना ओळखीची आहे.


असा एकटा फिरणारा कोल्हा मात्र,जरा वेगळ्या आवाजात ओरडतो.अशा एकट्या कोल्ह्याबाबत बरंच काही लिहिलं गेलं आहे आणि बरेच काही समज,आख्यायिका,अंधश्रध्दा आहेत.यातल्या दोन महत्त्वाच्या समजांपैकी एक म्हणजे - हा कोल्हा वाघ किंवा बिबळ्या,जास्त करून वाघाबरोबर असतो तो आपल्या विचित्र ओरडण्यानं वाघाला शिकार कुठे असेल,याची जाणीव करून देतो व त्याचा मोबदला म्हणून, वाघाचं खाणं झाल्यावर,त्यातला वाटा मिळवतो.


 दुसरा समज म्हणजे - एका ठरावीक वाघाबरोबरच हा जोडी जमवतो.त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर राहात तो आपल्या खाण्याची सोय करतो.यातलं काहीही खरं असलं तरी, एका कोल्ह्याची कोल्हेकुई म्हणजे वाघ किंवा बिबळ्या जवळपास असल्याचं चिन्ह आहे,हा अनुभव मी भारतातल्या अनेक जंगलांमध्ये घेतला आहे.


म्हणून त्या रात्री तो कोल्हा ज्या पद्धतीनं ओरडला,

त्यावरून आम्हाला गाईला मारणाऱ्या वाघाची वर्दी मिळाली.त्यानंतर दहाच मिनिटं गेली असतील,त्या गाईच्या पलीकडच्या बाजूनं 'ओऊंघ' 'ओऊंघ' असा वाघाच्या ओरडण्याचा आवाज आला. वाघ खरंच आला होता. मी आल्फच्या मांडीला हलकेच ढोसले,पण तोही तयारच होता.थोडा वेळ गेला आणि झुडुपात किंचित खसफस झाली. त्यापाठोपाठ एक धप्पसा व काहीतरी ओढल्याचा आवाज आला. 

 आल्फीने टॉर्चचे बटण दाबले,परंतु सभोवतालच्या अंधारात दुर्दैवानं टॉर्चचा प्रकाशझोत मेलेल्या गाईवर नेमका पडायच्या ऐवजी गाईच्या डावीकडे पडला.तेवढा इशारा त्या वाघाला पुरेसा होता.गुरगुर करत एका क्षणात तो उडी मारून झाडीत नाहीसा झाला.


वाघ आता परत येणार नव्हता आणि तिथे थांबणं व्यर्थ होतं,हे माहीत असूनही आम्ही तासभर तिथे थांबलो.

त्यानंतर मैलभर अंतरावरच्या डोंगराच्या माथ्यावरून आम्हाला वाघाच्या ओरडण्याचा अस्पष्टसा आवाज आला. आम्ही जरा निराश होऊन आवराआवर केली आणि गाडीपाशी आलो,तर आल्फीला गाडीची किल्लीच सापडेना.ती सापडेपर्यंत रात्रीची लिंगडहळ्ळीहून बिरूरला जाणारी बस आम्हाला ओलांडून पुढे गेली.

आम्ही तिच्यामागोमाग जात बिबळ्याला मारण्यासाठी जे लपण केलं होतं, तिथपर्यंत आलो.तेव्हा,समोर आम्हाला जे दृश्य दिसलं,ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. बसच्या दिव्यांच्या उजेडात,आपण मारलेल्या बैलाला खात बसलेल्या बिबळ्याचे डोळे चमकत होते.बसच्या ड्रायव्हरनं ते पाहून करकचून ब्रेक मारत बस थांबवली.


बस थांबताना उडालेल्या धुरळ्यात मी आणि आल्फी गाडीतून खाली उतरून धावत बसच्या पुढे आलो.

आम्हाला तो बिबळ्या पलीकडचं शेत अर्ध ओलांडून जाताना दिसला.आल्फीनं गोळी झाडली. बिबळ्या जोरात 'गर्रर्र' आवाज करत हवेत उसळला आणि अतिशय वेगानं ते शेत ओलांडत नाहीसा झाला.


आम्ही चूक केली होती,पण आता त्याचा विचार करून काही फायदा नव्हता... आम्ही आल्फीला खाली उतरवून बसच्या मागोमाग गाडी घेऊन तिथून निघून जायला हवं होतं.दोन्ही गाड्या निघून गेल्याचं पाहून काही मिनिटातच तो बिबळ्या भक्ष्यावर परत आला असता आणि सहजपणे आल्फीच्या गोळीला बळी पडला असता.खरंतर माझ्याकडूनच योग्य सल्ला दिला गेला नव्हता आणि आता बिबळ्याही जखमी होऊन पळाला होता.ते अत्यंत धोकादायक होतं.


जे घडून गेलं,त्याचा जास्त विचार न करता आम्ही बिरूरला टूरिस्ट बंगल्यावर परत आलो. सकाळी उठून आम्ही परत त्या ठिकाणी गेलो.जरा आजूबाजूला हिंडून पाहिल्यावर आम्हाला एक पुसटसा रक्ताचा माग सापडला.


शेत संपून झुडुपांचं गचपण सुरू झालं,तसा रक्ताचा माग जास्त स्पष्टपणे दिसू लागला.पण आता आमच्यापुढे एक वेगळीच समस्या उभी राहिली.बिबळ्याच्या एका बगलेत गोळी लागली होती,त्यातून रक्त वाहू लागायला थोडा वेळ लागल्यानं सुरुवातीचा माग अस्पष्ट होता.


उर्वरीत कथा पुढील भागात.. ( अपुर्ण )


नरभक्षकाच्या मागावर - केनेथ अँडरसन

अनुवाद - संजय बापट


१७/१२/२२

अहो ! कसली पेनं विकताय ?

"हे पेन मी विकत घेतले,पण हे चालत नाही."

"त्याला मी काय करणार? "अहो,तुम्ही मालक आहात ना या दुकानाचे?मग हे पेन चालत नाही तर ती तुमची जबाबदारी नाही?"


"पेनबाबत कोणतीही गॅरंटी नाही हे मी तुम्हाला कालच सांगितले होते."

 "ते बरोबर आहे हो,पण म्हणून काय एकाच दिवसात…?"

"त्याला इलाज नाही. कारण पेन ही अशीच असतात."

"काय राव... मग कशाला विकताय असली पेनं?" 


ज्या काळामध्ये पहिल्यांदा पेन ही वस्तू बाजारात आली त्यावेळेस अशीच परिस्थिती होती.पेनं विक्रेत्याचे आणि ग्राहकाचे असेच संभाषण होत असे.अशाच एका दुकानामध्ये जॉर्ज नोकरीला होता. तो होता हिशेब वगैरे लिहायला.पण मधून मधून त्याला गिन्हाईकही बघावे लागे.कधी कधी तर गिन्हाईक अगदी तावातावाने येत असे.अशा वेळेस जॉर्ज ते पेन त्याला काही प्रमाणात दुरुस्त करून देत असे.खरं तर जॉर्जता हा छंद जडला होता. तो आपल्या फावल्या वेळेत खराब झालेली पेनं दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असे. हे करता करता त्याला त्यातील काही त्रुटी आढळल्याही होत्या.त्यामुळे त्याला ही पेनं दुरुस्त करता येवू लागली होती. जॉर्जच्या या छंदामुळे लोकदेखील त्या दुकानातूनच पेन खरेदी करू लागले होते. कारण इतरत्र पेन खराब झाल्यास दुरुस्त करण्याची कोणतीही सोय नव्हती.


बघता बघता जॉर्जच्या मालकाचे दुकानही चांगले चालू लागले.आणि जॉर्जने पेन दुरुस्त करण्यामध्ये प्रावीणाही मिळवले.आता जॉर्जला पेनमध्ये कोणकोणत्या त्रुटी राहिल्या आहेत,हे पूर्णपणे कळले होते त्यामुळे त्याच्या मनामध्ये असे आले की आपण जाऊन पेन निर्माण करणाऱ्या कंपनीलाच ही गोष्ट सांगायची आणि जर त्यांनी मान्य केले तर त्यांच्याच कंपनीमध्ये नोकरीही मागायची.जॉर्ज या गोष्टीवर विचार करू लागला आणि एके दिवशी त्याच्या मनामध्ये एक वेगळाच विचार आला. आपल्याला आढळलेल्या सर्वं त्रुटी पेन निर्मात्यांना सांगण्याऐवजी आपणच जर उत्तम दर्जाचे पेन तयार करू शकलो तर ? या एका कल्पनेने जॉर्जची झोपच उडाली.आपण एक उत्तम दर्जाचे पेन निर्माण करू शकू हा त्याच्याजवळ विश्वास होता.पण त्यासाठी लागणारे भांडवल नव्हते.


पण जॉर्जने ठरविले की,आपण ही जोखीम घ्यायची.तो त्या दृष्टीने तयारीला लागला आणि स्वतःच्या आडनावाची 'पार्कर' कंपनी त्याने काढली.बघता बघता 'पार्कर' पेन जगप्रसिद्ध झाले आणि जॉर्ज पार्कर नावारूपाला आला. 


काय,एका सामान्य माणसाची ही गगनभरारी अचंबित करून टाकते ना? अहो,ही भरारी घेण्याची क्षमता तुमच्या-आमच्यातही आहे बरं का.पण आपण खरंच गांभीर्याने त्याकडे पाहत नाही.आता या जॉर्ज पार्करकडे असे कोणते गुण होते असे तुम्हाला वाटते?पहिली गोष्ट म्हणजे केवळ कामापुरते काम न करता अधिक काहीतरी करण्याची वृत्ती आणि मानसिकता असणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या वृत्तीलाच इंग्रजीमध्ये Initiative असे म्हणतात. 'इनीशिएटिव्ह' म्हणजे स्वत:हून स्वयंस्फूर्तीतून एखादी गोष्ट करण्याची वृत्ती.ही वृत्ती जॉर्जमध्ये होती.म्हणून त्याला कोणीही न सांगता त्याने आपण पेन दुरुस्त करू शकू काय,याचा विचार केला.जॉर्जकडे दुसरा महत्त्वाचा गुण होता आणि तो म्हणजे लोकांना काहीतरी उत्तम द्यायचे. अलीकडे आपली मानसिकता बदलत चालली आहे.म्हणूनच लोक पैसे मिळविण्यासाठी काहीही करतात.त्यामध्ये वेळप्रसंगी दुसऱ्याला फसवावे लागले तरी चालेल अशी वृत्ती ठेवतात. पण अशाप्रकारची वृत्ती काही कामाची नाही. कारण अशा वृत्तीचे लोक फार काळ टिकू शकत नाहीत.म्हणून जे लोक स्वतःच्या कामापासून ते आपण दुसऱ्याला देत असलेल्या गोष्टीपर्यंत दर्जाचा विचार करतात.त्यांना कधीही अपयश येत नाही.


पार्करमध्ये असलेला तिसरा महत्त्वाचा गुण म्हणजे जोखीम घेण्याची वृत्ती.या पुस्तकामध्ये हा गुण अनेक ध्येयवेड्यांमध्ये आपल्याला आढळून येईल.जर जॉर्जने त्याचा फॉर्म्युला एखाद्या पेन विक्रेत्याला विकला असता तर कदाचित त्याला त्यासाठी पैसेही मिळाले असते आणि त्या कंपनीमध्ये नोकरीही.पण जॉर्जने तसे केले नाही.कारण त्याला त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये विश्वास होता आणि त्यामुळेच आपण आपल्याजवळ काही नसतानाही हे सुधारित पेन स्वतःच तयार करूया,अशी जोखीम तो घेऊ शकला.


अर्थात जॉर्जमधील गुण आपल्यामध्ये विकसित करण्यासाठी आपल्याला काही पेन दुरुस्त करण्याचे तंत्रच अवगत व्हायला पाहिजे असे नाही.आपण जे काम करतो त्यापेक्षा अधिक आणि वेगळे आपण करू शकतो काय,हे शोधले पाहिजे. एखाद्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने त्याचे काम संपल्यावर जर समजा,

ॲक्युप्रेशरही पद्धती शिकायची ठरविली आणि जर त्यामध्ये तो तज्ज्ञ झाला तर लोक त्याच्याकडे आपोआप येऊ लागतील. 

अर्थात हे एक साधे उदाहरण मी तुम्हाला दिले. जर तुमच्यामध्ये नवीन काहीतरी करण्याची ऊर्मी असेल तर निश्चितपणे तुम्हाला काहीतरी शोधून काढता येऊ शकेल.त्याचप्रमाणे जॉर्जमध्ये असणारा दर्जादेखील तुम्ही तुमच्या कामामध्ये आणू शकता.


भरारी ध्येयवेड्यांची - डॉ.प्रदीप पवार

१५/१२/२२

गॅलिलेई गॅलिलिओ Galilei Galileo (१८ फेब्रु.१५६४ - ८ जाने.१६४२)

केप्लरचा समकालीन असलेला गॅलिलेई गॅलिलिओ एक बंडखोर वैज्ञानिक म्हणूनच उदयास आला.आधुनिक विज्ञानाचा तसेच प्रयोगशील विज्ञानाचा प्रणेता म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते.


सूर्याभोवती पृथ्वी फिरते या कोपर्निकसच्या सिद्धांताचा पाठपुरावा गॅलिलिओने केला.त्यासाठी त्याने जो त्रास सहन केला तो कोपर्निकसच्या वाट्याला आला नाही.कारण कोपर्निकसचे पुस्तक तो मृत्यूशय्येवर असताना प्रसिद्ध झाले.त्यामुळे नंतरच्या वादाला त्याला तोंड द्यावे लागले नाही. 


गॅलिलिओ केवळ कोपर्निकसच्या सिद्धांताचा पाठपुरावा करून थांबला नाही,तर धर्माधिष्ठीत दृष्टिकोनातून आलेल्या विचारांना निरीक्षण आणि प्रयोगाच्या आधारे त्याने तपासायला सुरुवात केली.बहुसंख्य धर्माधिष्ठीत विचार इसवीसनापूर्वी होऊन गेलेल्या महान तत्त्ववेत्त्या ॲरिस्टॉटलचे होते.


ॲरिस्टॉटलच्या विचारपद्धतीमध्ये निरीक्षण आणि तर्काला वाव होता पण प्रयोगाला अजिबात स्थान नव्हते.नेमका हाच धागा पकडून गॅलिलिओने विश्वाबद्दलच्या परंपरेच्या ज्ञानाला अक्षरशः तडे दिले.


१८ फेब्रु.१५६४ रोजी इटलीतील पिसा येथे जन्मलेल्या या वैज्ञानिकाने पिसा विद्यापीठामध्ये वैद्यकीय अभ्यास सुरू केला.याच विद्यापीठात वयाच्या सव्वीसाव्या वर्षी गणिताचा अध्यापक म्हणून नंतर तो रुजूही झाला.१५९२ मध्ये त्याने पदुआ विद्यापीठात नोकरी पत्करली.पदुआ विद्यापीठात असताना तापमान मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचा अर्थात थर्मामीटरचा त्याने शोध लावला.


(गॅलिलिओ बहुसंख्यांकांना 'दुर्बिणीचा शोध लावणारा'अशी चुकीची माहिती आहे.त्याने थर्मामीटरचा शोध लावला हे माहीतच नाही.)


हॉलंडमधील चष्मे बनवणाऱ्या हॅन्स लिपरशेंनी दोन भिंगे एकासमोर एक धरून पाहिले असता दूरच्या वस्तू जवळ दिसू लागल्या.या भिंगांना त्यांनी नळकांड्यात बसवले आणि जगातील पहिल्या दुर्बिणीचा शोध सन १६०८ मध्ये लागला.जो लिपरशे यांनी आपल्या नावे केला. या दुर्बिणीचा वापर प्रामुख्याने जहाजावर दूरचे पाहण्यासाठी आणि युद्धाच्या वेळेस शत्रूसैनिकांची हालचाल पाहण्यासाठी केला जाऊ लागला.


गॅलिलिओला दुर्बिणीच्या शोधाची बातमी कळाल्यानंतर त्याने स्वतःची दुर्बिण तयार करायला सुरुवात केली आणि १६०९ मध्ये स्वतःची एक दुर्बिण विकसित केली.आपली दुर्बिण पृथ्वीवरच्या वस्तू पाहण्यापेक्षा त्याने आकाशाकडे रोखली.आकाशात दिसणारा सर्वात मोठा गोल,चंद्र त्याने आपल्या दुर्बिणीच्या क्षेत्रात घेतला.चंद्राचे निरीक्षण करायला त्याने सुरुवात केली.आणि काय आश्चर्य ! उघड्या डोळ्यांनी अत्यंत सुंदर आणि मोहक दिसणाऱ्या चंद्राचा पृष्ठभाग त्याला खडबडीत दिसला.चंद्रावरील खड्डयांचे,डोंगर दऱ्यांचे निरीक्षण त्याने वारंवार केले.चंद्राच्या निरीक्षणातून जे दिसले त्याची रेखाटने त्याने काढली.आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फोटोग्राफी केली तर चंद्रावर दिसणारे खड्डे आणि गॅलिलिओचे रेखाचित्र प्रचंड साम्य दर्शविते. 


यावरून गॅलिलिओची निरीक्षणक्षमता किती प्रगल्भ होती याची प्रचिती येते.आकाशात चांदण्यांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सुंदर दिसणारा चंद्र ओबडधोबड आहे.ही कल्पना धर्माधिष्ठीत विचारसरणीला मान्य होण्यासारखी नव्हती.पण वस्तुस्थिती मात्र तशीच होती.


गॅलिलिओने नंतर आपली दुर्बिण गुरू ग्रहाकडे रोखली.दि. ७ ते २४ जाने.१६१० अखेर गुरू ग्रहाचे त्याने निरीक्षण केले.सुरुवातीला त्याला गुरुभोवती तीन चांदण्या दिसल्या.त्या चांदण्या रोज आपली जागा बदलत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.दरम्यान १४ तारखेनंतर चौथी चांदणी त्याच्या दृष्टीपथात आली. या सर्व चांदण्या गुरू ग्रहाभोवती फिरत असल्याचे त्याचे निरीक्षण सांगत होते.गॅलिलिओने त्यांना गुरूचे उपग्रह म्हणून संबोधले.


गुरूच्या या चार उपग्रहांचा शोध गॅलिलिओने लावला.म्हणूनच गुरुच्या या चार उपग्रहांना 'गॅलिलियन उपग्रह' असे नाव मिळाले.आयो, युरोपा, गैनिमीड आणि कॅलिस्टो हेच ते गुरूचे सर्वात मोठे चार उपग्रह.


आज आधुनिक तंत्रज्ञानाने मानवाला ज्ञात असलेले जवळजवळ ६३ उपग्रह गुरूला आहेत. म्हणजे ६३ चंद्र गुरू ग्रहाला आहेत.पृथ्वीला एकच उपग्रह की जो चंद्राच्या रुपाने फिरत आहे.पृथ्वीला एकच चंद्र आहे म्हणून तर संकष्टी महिन्यातून एकदा येते.आपण जर गुरू ग्रहावर असतो तर महिन्यातून ६३ संकष्ट्या कराव्या लागल्या असत्या.एक संकष्टी सोडेपर्यंत दुसरी आणि दुसरी सोडेपर्यंत तिसरी अशा ६३ संकष्टया.आपण तरी एवढ्या संकष्ट्या केल्या असत्या का?याचा एकविसाव्या शतकात करणार नाही तर केव्हा करणार? संकष्टी सोडण्याच्या वेळेस चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला ओवाळून जेवतात.चंद्राचा उगवण्याचा आणि जेवणाचा काय संबंध? इतर दिवशी चंद्र उगवत नाही का ?चंद्र रात्री १२ वाजता उगवत असता तर जेवायचे थांबला असता का ? या प्रश्नांची उत्तरे आपण शोधायची नाही तर काय युरोपियन देशांनी ? गॅलिलिओ यानाने सन १९८९ रोजी गुरू ग्रहाच्या दिशेने मार्गक्रमण केले.सन १९९५ रोजी गुरू ग्रहाभोवती फिरून गॅलिलिओ यानाने त्या महान खगोल वैज्ञानिकाला सलाम ठोकला.. 


नंतर गॅलिलिओने शुक्र ग्रहाच्या निरीक्षणाला सुरुवात केली.दुर्बिणीतून शुक्राला पाहिल्यावर चंद्रासारख्याच कला त्याला दिसल्या.शुक्राच्या कलांचे निरीक्षण केल्यावर गॅलिलिओच्या लक्षात आले की शुक्र सुद्धा सूर्याभोवती फिरत असला पाहिजे.


गॅलिलिओने आपली दुर्बिण नंतर तळपणाऱ्या सूर्याकडे रोखायला सुद्धा मागेपुढे पाहिले नाही.निरीक्षणाची आवड निर्माण झाल्यानंतर व्यक्ती ध्येयाने प्रेरित होऊन कशी काम करत राहते याचे गॅलिलिओ हे एक उत्तम उदाहरण आहे. 


दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केल्यानंतर त्याला सूर्याच्या पृष्ठभागावर काळे डाग असल्याचे दिसले.


ज्या सूर्याला धर्माने देवत्व बहाल केलेले होते,त्या सूर्यावर काळे डाग आहेत हे सांगणे किती धाडसाचे असेल याची कल्पना करा.गॅलिलिओने ते जाहीरपणे सांगायचे धाडस केले.आजही एकविसाव्या शतकात सत्य सांगायचे धाडस आपण किती करतो याचे आत्मपरिक्षण केले तर गॅलिलिओच्या महानतेची कल्पना येते.


प्रस्थापित समजुतींना त्याने फारच मोठा धक्का या सर्व निरीक्षणाच्या माध्यमातून दिलेला होता.निरीक्षणे कशी करायची असतात याचा परिपाठच गॅलिलिओने नंतरच्या वैज्ञानिक जगताला घालून दिलेला होता.


खगोलातील या सर्व निरीक्षणावर आधारित 'दि स्टारी मेसेंजर' (The Starry Messenger) हे पुस्तक गॅलिलिओने मार्च १६१० मध्ये प्रसिद्ध केले.या पुस्तकाच्या प्रतीसुद्धा हातोहात खपल्या. या पुस्तकामुळे खगोलशास्त्राला मोठी चालना मिळाली.गॅलिलिओ प्रसिद्धीच्या झोतात आला.गॅलिलिओची व्याख्याने ऐकण्यास ठिकठिकाणी प्रचंड गर्दी होऊ लागली.


गॅलिलिओ केवळ खगोलाची निरीक्षणे करून थांबला नाही तर त्याने इतर दैनंदिन व्यवहारातही आपली कल्पनाशक्ती वापरली.तो ज्यावेळेस चर्चमध्ये प्रार्थनेला जात असे त्यावेळेस त्याला तिथे एक झुंबर हलत असलेले दिसे.हलत असलेल्या झुंबरावरून त्याच्या लक्षात आले की झुंबराला एका ठिकाणापासून त्याच ठिकाणी परत येण्यासाठी लागणारा कालावधी सारखाच आहे.घरातील दिवा त्याने त्याच पद्धतीने पाहिला आणि निरीक्षणे नोंदवली.दिव्याचा दोलनकाळ हा दिव्याच्या वस्तुमानावर नसून त्याच्या लांबीवर अवलंबून आहे,हा निष्कर्ष त्याने काढला.ज्या काळात वेळ मोजण्यासाठी घड्याळासारखे साधन उपलब्ध नव्हते त्या काळात त्याने लंबकाच्या घड्याळाचे तत्त्व शोधून काढले


त्यानंतर हायजीन या शास्त्रज्ञाने लंबकाची घड्याळे शोधून काढली.लंबकाची घड्याळे १९९० पर्यंत घराघरामध्ये टांगलेली असायची. 


म्हणजे गॅलिलिओ घराघरात पोहोचला होता. फक्त त्याच्या विचारांनी लोकांच्या मनात घर केलं नाही हाच काय तो फरक.


इटलीमधील चर्चमध्ये टांगलेला लँप ऑफ गॅलिलिओ आजही त्या महान वैज्ञानिक तत्त्वाची आठवण करून देत आहे.


तर्क लढवून निष्कर्ष काढण्याच्या प्रचलित असलेल्या ॲरिस्टॉटलच्या पद्धतीला गॅलिलिओने प्रयोगाच्या रूपाने छेद दिला.वैज्ञानिक दृष्टिकोनातील प्रयोगाचे महत्त्व सांगणाऱ्या पिसाच्या झुकत्या मनोऱ्यावरील त्याचा प्रयोग सर्वसामान्यांना अचंबित करणारा ठरला.


ॲरिस्टॉटलसहीत सर्वसामान्यांची अशी धारणा होती की,समान उंचीवरून दोन वेगवेगळ्या वजनाच्या वस्तू खाली सोडल्या तर जास्त वजनदार वस्तू लवकर जमिनीवर पोहचेल.गॅलिलिओने या विचाराचा छडा लावायचे ठरवले.


इटलीतील पिसाच्या झुकत्या मनोऱ्यावर तो गेला.एका मदतनीसाच्या जवळ त्याने दोन वेगवेगळ्या वजनांच्या वस्तू दिल्या आणि इटलीवासियांना मनोऱ्याखाली जमायला सांगितले.इशारा मिळताच दोन्ही वस्तू मदतनीसाने एकाच वेळी सोडल्या.ॲरिस्टॉटलला चूक ठरवत गॅलिलिओने प्रयोगाच्या सहाय्याने स्वतःचे विधान प्रचलित केले


'असमान वजनांच्या वस्तूंना खाली येण्यासाठी लागणारा वेळ सारखाच असतो.' 


प्रयोगाचे महत्त्व हे निर्विवाद आहे.प्रयोगच सत्याचा पुरावा देऊ शकतात हे गॅलिलिओने सिद्ध करून दाखवले.

वैज्ञानिक दृष्टिकोनातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य गॅलिलिओने अधोरेखित केले.गॅलिलिओने नंतर खाली पडणाऱ्या वस्तूंचा वेग क्रमशः वाढत जातो हेही सिद्ध करून दाखविले.


या संशोधनाबरोबरच ज्या वादात गॅलिलिओला धर्मपीठाकडे जावे लागले तो वाद होता टॉलेमीचा पृथ्वीकेंद्रित आणि कोपर्निकसचा सूर्यकेंद्रित सिद्धांत यांच्या दरम्यानचा.सन १६१३ पासून गॅलिलिओने कोपर्निकसच्या सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कार करायला सुरुवात केली. ठिकठिकाणी तो या विषयावर भाषणे देत सुटला.


७ फेब्रु.१६१४ ला एका धर्मगुरूने रोमच्या कार्डिनल मिलिनोला पत्र लिहिले.'पृथ्वी स्थिर नाही'असे धर्मविरोधी वक्तव्य गॅलिलिओ करतो अशी तक्रार त्याने केली. 


बायबल या धर्मग्रंथात ज्या गोष्टीला अधिष्ठान प्राप्त झालेले होते,त्या टॉलेमीच्या पृथ्वीकेंद्रित सिद्धांताला गॅलिलिओ विरोध करत होता.धर्माला ही बाब निश्चितच खटकणारी होती.धर्मसंस्थेला ही बाब ढवळाढवळ वाटली.१६१६ मध्ये गॅलिलिओला ख्रिश्चन धर्मगुरू पोपनी धमकी दिली आणि सांगितले की सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कार करू नकोस.धमकी मिळूनसुद्धा गॅलिलिओने जाहीर सभांमध्ये सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कार सुरुच ठेवलेला होता.सन १६३२ मध्ये त्याने 'सूर्यकेंद्रित सिद्धांत आणि पृथ्वीकेंद्रित सिद्धांत या दोन सिद्धांतामधील द्वंद्व' (Dialogue concerning the two chief world systems) या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. सदर पुस्तकामध्ये त्याने सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कार केलेला होता.


हे लिखित स्वरुपातील विचार धर्माला सहन झाले नाहीत.


गॅलिलिओला धर्माच्या न्यायालयापुढे बोलविण्यात आले.७ सप्टें.१६३२ ला प्रकृती ठीक नसल्यामुळे तो १५ फेब्रु. १६३३ ला न्यायालयापुढे हजर झाला.गॅलिलिओला बाजू मांडण्याची संधी न्यायालयाने मोठ्या उदार अंतःकरणाने दिली.बहुतेक त्यांचा न्याय आधीच ठरलेला असावा.न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आणि त्याच्या सर्व साहित्यावर बंदी घालण्याचा हुकूम दिला.कालांतराने त्याला तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली.त्रास असहाय्य झाल्यावर आणि इतर संशोधनासाठी वेळ मिळावा या हेतूने गॅलिलिओ दोन पावले मागे सरकला.त्याने धर्माची आणि पर्यायाने धर्मगुरू पोप यांची गुडघे टेकून माफी मागितली. 'मी चुकलो' अशी कबुलीही त्याच्याकडून वदवून घेण्यात आली.पण हा बंडखोर शास्त्रज्ञ स्वतःशीच पुटपुटला 'तरी ती (पृथ्वी) फिरतेच.'


सन १९९२ ला ख्रिश्चन धर्मगुरू पोप जॉन पॉल द्वितीय यांनी गॅलिलिओ प्रकरणाची छाननी करण्यास सुरुवात केली.अर्थात सूर्याभोवती पृथ्वी फिरते हे एव्हाना सिद्धही झालेले होते.अखेर पोपनी गॅलिलिओ संदर्भात धर्माने केलेली चूक मान्य केली.आणि ३१ ऑक्टो. १९९२ रोजी पोप जॉन पाल द्वितीय यांनी गॅलिलिओला चर्च दिलेल्या अन्यायी वागणुकीसंदर्भात संपूर्ण जगाची माफी मागितली. 


गॅलिलिओचा मृत्यू झाला १६४२ साली.चर्चने माफी मागितली १९९२ साली.म्हणजे गॅलिलिओच्या मृत्यूनंतर ३५० वर्षानंतर त्याची माफी मागितली.असा न्याय असतो धर्मसंस्थेचा ! सत्य सांगितले अथवा वस्तुस्थिती निदर्शनास आणल्यानंतर कौतुक करण्याऐवजी शिक्षा दिली जाते आणि सत्य सांगणाऱ्याच्या मृत्यूनंतर ३५० वर्षानंतर चुकीच्या शिक्षेबद्दल माफी पण मागितली जाते.असा न्याय आपल्याला चालेल का? असा न्याय असतो धर्मसंस्थेचा ! धर्माधिष्ठीत विचारप्रणालीचा !!


एका अर्थाने ख्रिश्चन धर्म बरा असे मी म्हणतो.कारण गॅलिलिओच्या मृत्यूनंतर ३५० वर्षानंतर का होईना त्यांनी जगाची माफी मागितली.उशीरा का होईना त्यांना शहाणपण सुचले. 


परंतु भारतीय समाजामध्ये ज्या थोर विभूतींनी, समाजसुधारकांनी माणसाला माणसात आणले, माणूसकीने वागवण्यास सांगितले,त्यांची माफी आमच्या धर्माने आणि धर्माच्या वारसदारांनी आजही मागितलेली नाही.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केवळ ते शूद्र आहेत म्हणून नाकारला.बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणाऱ्या म.फुलेंच्या अंगावर मारेकरी घातले.स्त्रियांना शिकवणाऱ्या सावित्रीबाईंच्या अंगावर शेण,चिखल फेकले,अवहेलना केली. शाहू महाराजांनी दीन-दलितांना मानाची पदे दिली म्हणून त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या उच्च विद्याविभूषित समाजसुधारकाची केवळ ते शूद्र होते म्हणून कुचेष्टा केली.


या सर्वच महामानवांनी सुचविलेल्या सुधारणा आज सर्वमान्य झाल्या आहेत.मात्र त्यांच्या धर्माने आजतागायत त्यांची माफी मागितलेली नाही.


गॅलिलिओवर झालेल्या अन्यायाचे प्रायश्चित्त म्हणून सध्याचे धर्मगुरू पोप बेनेडिक्ट यांनी गॅलिलिओचा पुतळा २००८ मध्ये चर्चच्या भिंतीमध्ये उभा केलेला आहे. 


आमच्या धर्माला प्रायश्चित म्हणून असे किती पुतळे बसवावे लागतील याची गणतीच न केलेली बरी. 


१६३२ साली गॅलिलिओचे डोळे गेले. दुर्बिणीतून सूर्याची निरीक्षणे केल्यावर हा परिणाम झालेला असणं स्वाभाविक आहे.वैज्ञानिक स्वतःच्या ऐहिक सुखासाठी न झटता समाजासाठी झटत असतो.हे आजच्या स्वकेंद्रित झालेल्या समाजाने लक्षात घेणे गरजेचे आहे.

खगोलवैज्ञानिकांसाठी फार मोठा वैज्ञानिक इतिहास मागे ठेवून ८ जाने. १६४२ रोजी या महान वैज्ञानिकाची प्राणज्योत मालवली.


इतिहास,विज्ञानाचा,खगोलाचा अथवा सामाजिक असो,त्या इतिहासाकडून प्रेरणा घेऊन पुढे प्रगती करायला शिकले पाहिजे.पण प्रामुख्याने महाराष्ट्राच्या इतिहासाचे वारंवार विकृतीकरण धर्माच्या माध्यमातून केले जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मुस्लिमद्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे. माणसामाणसांमध्ये,धर्माधर्मामध्ये, जाती-जातींमध्ये अंतर वाढवण्यात काही विघ्नसंतोषी व्यक्ती आणि संघटना काम करत आहेत.त्यांच्या अतिरंजीत भूलथापांना तरुण वर्ग बळी पडतो आणि दंगली करण्यास उद्युक्त होतो. इतिहास हा प्रेरणा घेण्यासाठी असतो,दंगली घडविण्यासाठी नसतो.


गॅलिलिओला शिक्षा केली म्हणून आज कोणी चर्चविरोधात आंदोलने करत नाहीत.हे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी विचारात घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास वाचला पाहिजे.ते खरोखर मुस्लिमद्वेष्टे होते का? त्यांचा आरमारप्रमुख दौलतखान, तोफखानाप्रमुख इब्राहीमखान,विश्वासू नोकर मदारी म्हेतर,हिरोजी फर्जंद,वकील काजी हैदर,हेरप्रमुख बहिर्जी नाईक असे सर्व जातीधर्मातील सवंगडी त्यांच्यासाठी जीवावर उदार होते.शिवाजी महाराजांचे राज्य धर्माधिष्ठीत कधीच नव्हते.


युरोपमध्ये गॅलिलिओनंतर प्रबोधनाच्या चळवळीने जोर पकडला आणि युरोप आज एकविसाव्या शतकामध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतरांच्या पुढे प्रचंड वेगाने गेलेला आहे.आम्ही मात्र आजही इतिहासाच्या विकृतीकरणामध्ये गुंग आहोत.


माणसामाणसांतील अंतर वाढवत आहोत.एक माणूस म्हणून,एक भारतीय म्हणून वैचारिक प्रगल्भपणा आत्मसात करणे गरजेचे आहे.त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागणे आपणा सर्वांच्याच फायद्याचे आहे.


१३ डिसेंबर २०२२ या लेखामधील पुढील व शेवटचा भाग.. धन्यवाद


समाप्ती…!