* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१९/२/२३

अमेरिका न शोधणारा कोलंबस…!

१४४२ च्या जुलै महिन्यात ज्यू स्पेनमधून हाकलले गेले.त्याच वर्षांच्या ऑक्टोबर महिन्यात कोलंबसने अमेरिका शोधून काढली;पण शोधून काढली असे म्हणण्याऐवजी त्याने पुन्हा शोधून काढली असे म्हणणे अधिक सोयीचे होईल. 


कारण पाचशे वर्षांपूर्वीच अमेरिका लीफ एरिक्सन याने शोधून काढली होती.तो मोठा धाडसी दर्यावर्दी होता. (Viking Captain होता.) ज्याला आज आपण 'नोव्हास्कोशिया' म्हणतो,त्याच्या किनाऱ्यावर त्याचे गलबत वादळाने जाऊन लागले होते.त्या देशात खूप द्राक्षे आढळल्यामुळे त्याने त्याला 'व्हाईनलँड' असे नाव दिले.


तो तिथे सर्व हिवाळाभर राहिला.परत घरी आल्यावर त्याने आईसलँडमधील काही पिल्प्रिम फादरांना अमेरिकेत जाण्यास आग्रहाने सांगितले. इ.स. १००३ मधील ही गोष्ट.ही वसाहत वसविली गेली;पण तेथील इंडियन लोकांच्या वैरभावामुळे ती मोडली.आणि हे भटके यात्रेकरू पुन्हा स्वदेशी परत आले.


 नॉर्समन लोकांच्या प्राचीन बखरीतून लीफ एरिक्सन व हे दर्यावर्दी लोक यांचे हे पराक्रम वर्णिले आहेत...


तरुणपणी कोलंबस आइसलंडमध्ये गेला होता.पेरू देशाचे प्रोफेसर लुई उल्लेआ म्हणतात की, "कोलंबस त्या वेळी ग्रीनलँडपर्यंत गेला होता.अमेरिकेच्या जमिनीवरही त्याने त्यावेळी पाय ठेवले असावेत.या त्याच्या जलपर्यटनाचा उद्देशच केवळ चाचेगिरी हा होता.प्रोफ़ेसरसाहेबांचा हा अंदाज बरोबर असेल तर कोलंबसाची १४९२ मधील ती सुप्रसिद्ध अमेरिकन सफर पहिली नसून दुसरी असली पाहिजे."


पण हा सारा तर्क आहे.कारण का कोणास माहीत,पण कोलंबस स्वत:च्या पूर्वचरित्राविषयी फारसे कधी सांगत नसे.म्हणून त्याच्या पूर्वचरित्रातील रिकामे भाग भरून काढण्यासाठी अनेक दंतकथा निर्मिल्या गेल्या.

इतिहासकारांनी कोलंबसविषयी लिहिलेले सर्व जर आपण खरे मानू लागलो,तर निरनिराळ्या प्रकारचे शंभर तरी परस्परविरोधी कोलंबस आपणास पाहावे लागतील! त्याचा जन्म अनेक शहरी करावा लागेल,त्याला ज्यू,स्पॅनियर्ड,इटालियन म्हणावे लागेल;कधी त्याला विद्वान म्हणावे लागेल,तर काहीच्या मतानुसार त्याला अगदी 'ढ' म्हणावे लागेल;कोणी म्हणतात की,तो 'सरदारपुत्र होता, तर कोणी म्हणतात,तो एका खानावळवाल्याचा मुलगा होता.कोणी त्याला 'ध्येयवादी' मानतात, तर कोणी त्याला दांभिक ' म्हणतात.कोणी त्याला कविहृदयाचा 'गूढवादी' म्हणतात,तर कोणी त्याला भावनाशून्य धंदेवाला समजतात. कोणी त्याला 'देशभक्त' म्हणतात,तर कोणी त्याला 'देशद्रोही' म्हणतात;कोणी तो अत्यंत दारिद्रयात मेला असे म्हणतात,तर कोणी म्हणतात की,मरणकाली तो संपत्तीत लोळत होता ! कोणी त्याला उत्कृष्ट व कुशल नावाडी म्हणतात,तर कोणी म्हणतात की,त्याला नौकानयनविद्येचा गंधही नव्हता !.


स्वतःच्या आयुष्याच्या ज्या भागाविषयी कोलंबस मौन पाळतो,तो भाग आपणही सोडून देऊ या. अज्ञात भूतकालाच्या धुक्यातून पुढे आलेला असा तो आपणास कुठे बरे दिसतो ? पोर्तुगाल देशाचा राजा दुसरा जॉन याच्याकडे तो गेला असता अटलांटिक महासागरामधून एक मोठी सफर योजावी व तिचा प्रमुख म्हणून आपणास नेमावे,असे तो राजास सांगत होता.राजाचे मन तो असा सफरीसाठी वळवीत होता.


त्या काळात पोर्तुगीज लोक दर्यावर्दी म्हणून जगप्रसिद्ध होते.व्हेनिसचे तसेच जिनोआचे व्यापारी जवळच्या भूमध्यसमुद्रात व्यापार करीत असता पोर्तुगीज लोक अज्ञात व अगाध अशा अटलांटिक महासागरात धाडसाने शिरत होते! आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने तसेच दूर मदिरा व कॅनरी बेटांपर्यंत ते जात.


काही धाडसी पोर्तुगीज दक्षिण आफ्रिकेस वळसा घालून हिंदुस्थानला पोहोचू पाहत होते. १४९३ मध्ये तुर्कांनी कॉन्स्टॅटिनोपल घेऊन युरोपचा आशियातील अतिपूर्वेकडील देशांजवळचा खुष्कीचा मार्ग तोडून टाकल्यामुळे युरोपियन व्यापाऱ्यांना जलमार्ग शोधून काढणे भाग झाले.


आणि या सुमारास तो अज्ञात साहसी ख्रिस्तोफर कोलंबस पुढे आला व म्हणाला,"नीट पश्चिमेकडे जाऊन मी पूर्वकडचा रस्ता शोधून काढतो.पृथ्वी वाटोळी आहे आणि ज्यांच्याविषयी आपण इतके ऐकतो ते पूर्वेकडचे राजे आपल्या पायाखाली पाताळात आहेत.मला जर माणसे व गलबते मिळतील,तर मार्को पोलोने स्वप्नातसुद्धा कधी पाहिली नसेल इतकी संपत्ती मी पोर्तुगालमध्ये आणीन आणि पैशाहूनही अधिक महत्त्वाची किंवा निदान तितक्याच महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे मी साऱ्या हिंदूंना पोर्तुगीज राजाच्या नावाने ख्रिश्चन करीन."


हे ऐकून जॉन राजाच्या तोंडाला पाणी सुटले. कारण स्वार्थ व धर्मप्रसार या दोन्ही गोष्टी साधणार होत्या.पृथ्वी वाटोळी आहे ही गोष्ट काही कोलंबसानेच प्रथम नाही सांगितली.

ख्रिस्त पूर्व.चौथ्या शतकातला ॲरिस्टॉटल म्हणतो, 


"पृथ्वी वाटोळी आहे असे पूर्वीपासून बरेचजण म्हणत आले आहेत."

ॲरिस्टॉटलच्याही काळी ही गोष्ट - हा शोध - जुनाच होता. 


मध्ययुगात या बाबतीत मोठमोठे पंडित वाद करीत असत.जॉन राजाच्या दरबारात येण्यापूर्वी कोलंबसानेही ही गोष्ट पुष्कळदा चर्चेत ऐकली असेल.जॉन राजाने इटलीतील प्रसिद्ध ज्योतिर्विद टॉस्क्नेली याला पत्र लिहून 'युरोप व हिंदुस्थान यांच्यातला सर्वांत जवळचा रस्ता कोणता?'असे विचारले होते,ही गोष्ट तर प्रसिद्धच आहे.टॉस्क्लेलीने उत्तर दिले,"पृथ्वी नि:संशय वाटोळी आहे.अर्थातच अटलांटिक ओलांडून पश्चिमेकडे जाता जाताच हिंदुस्थानचा रस्ता सापडेल." तो पुढे म्हणतो; "पण या देशांना मी पश्चिमेकडे म्हणतो,याचे आश्चर्य वाटू देऊ नये. कारण,जे समुद्रमार्गाने सारखे पश्चिमेकडे जात राहतील,त्यांना हे प्रदेश साहजिकच पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला आढळतील."


टॉस्क्नेलीचे हे निश्चित मत कळल्यावर जॉनने कोलंबसास न समजू देता आधीच एक तुकडी पाठवून देण्याचा प्रयत्न केला.कारण,कोलंबस पोर्तुगीज नव्हता व एका विदेशी माणसाकडे या टोळीचे प्रमुखत्व जावे ही गोष्ट जॉन राजास नको होती.पण जॉन राजाने पाठविलेल्या तुकडीतील खलाशांनी बंड केले,त्यामुळे त्या तुकडीच्या कप्तानाला परत यावे लागले.


जॉन राजाचा हा लपंडाव पाहून कोलंबस चिडला,विटला व स्पेनच्या राजाकडे गेला.या वेळेस स्पेनच्या गादीवर फर्डिनंडइझँबेला ही होती.ती कोलंबसाच्या म्हणण्याकडे लक्ष देईनात.त्यांचे लक्ष मुसलमानांबरोबरच्या लढायांत होते.ज्यूविरुद्ध चाललेल्या दुष्ट कारवायांत ती मग्न होती.त्यामुळे कोलंबसच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यास त्यांचे मन तयार नव्हते.

कोलंबसाने निराश होऊन आपला भाऊ बार्थो लोमो यास इंग्लंडचा राजा सातवा हेन्री याच्याकडे पाठविले.तो स्वत: ही फ्रान्सच्या राजाकडे जाणार होता;पण इतक्यात अकस्मात १४९२च्या वसंत ऋतूत स्पेनच्या दरबारातून त्याला मदत मिळाली.पश्चिम युरोपातील मुसलमानांच्या हातचे शेवटचे मजबूत ठाणे ग्रॅनाडा हे स्पॅनिशांच्या हाती पडले.ज्यू लोक देशातून हाकलले गेले होते व जग आता ख्रिश्चन धर्मीयांसाठी सुरक्षित झाले होते.अर्थातच, कोलंबसाच्या योजना ऐकायला फर्डिनंड व इझँबेला यांना आता फुरसत होती.हिंदूंना फसवून ख्रिश्चन करण्याची,तशीच त्यांना लुटण्याची कोलंबसाची योजनाही त्या स्वार्थी व रानटी राजाराणींना पसंत पडली.

राजाराणीचे उत्तेजन मिळाले.पॅलास शहरातल्या काही श्रीमंत व्यापाऱ्यांनी मदत केली आणि तीन लहान गलबते घेऊन कोलंबस आपल्या ऐतिहासिक सफरीवर निघाला. 


त्या दिवशी शुक्रवार होता,ऑगस्टची तिसरी तारीख होती.त्याच्याबरोबर अठ्याऐंशी खलाशी होते.ते बहुतेक कैदी व कायदेबाह्य असे लोक होते.कोणीही प्रतिष्ठित नावाडी कोलंबसाच्या साहसात सामील व्हायला तयार नव्हते.कारण,आपण असेच पुढे गेल्यास पृथ्वीवरून खाली एकदम खोल खड्ड्यात पडू असे त्यांना वाटे.


पर्यटन सुरू झाले;प्रवासात रोमांचकारी प्रसंग फारसे नव्हते;हवा चांगली होती;खलाशांनीही बंड वगैरे काही केले नाही.ते समाधानात होते. महासागराच्या पलीकडे अपरंपार संपत्ती मिळेल या आशेने ते उत्साही होते.काही रसवेल्हाळ इतिहासकारांनी खलाशांनी कोलंबसाविरुद्ध बंड केले वगैरे कल्पित कथा दिल्या आहेत.पण तसे काही एक झाले नाही.ऑक्टोबरची नववी तारीख उजाडली.त्या दिवशी मंगळवार होता.त्या दिवशी रात्रभर डोक्यावरून पक्षी जाताना त्यांना दिसले व दुसरे दिवशी पाण्यावर तरंगत येणारी एक झाडाची फांदी दिसली. ऑक्टोबरच्या अकराव्या तारखेला उजाडता-उजाडता ते एका बेटावर उतरले.हे बेट जपानच्या बाह्य सीमेवर असावे असा कोलंबसाचा तर्क होता.पण फ्लॉरिडाच्या दक्षिणेस असणाऱ्या वेस्ट इंडिज बेटांपैकी ते एक होते.पृथ्वी वाटोळी आहे हा त्याचा तर्क खरा ठरला.पण पृथ्वीचा आकार त्याने फारच लहान कल्पिला होता.जिथे अमेरिका आहे तिथे हिंदुस्थान,जपान वगैरे पूर्वकडचे देश असतील असे त्याला वाटले.


मरेपर्यंत कोलंबसाची अशीच समजूत होती की आपण एखादे नवीन खंड शोधलेले नसून आशियालाच जाऊन पोहोचलो.


कोलंबस अज्ञात प्रदेशाच्या शोधास का प्रवृत्त झाला? त्याची महत्वा द्विविध होती;धनार्जनाची व विधर्मीयांस स्वधर्मात आणण्याची वेस्ट इंडिज बेट उतरल्यावर आपल्या दोन्ही महत्त्वाकांक्षा आता सफळ होणार असे त्याला वाटले.ऑक्टोबरच्या बाराव्या तारखेस तो आपल्या रोजनिशीत लिहितो,"हे इंडियन चांगले ख्रिश्चन होतील,चांगले गुलाम होतील." या लोकांना सहज फसविता येते हे पाहून तो आनंदला. शतो लिहितो,"या लोकांना ख्रिश्चनधर्मी करून त्यांचा उद्धार करावा अशी इच्छा मला होती;पण त्यांना बळजबरीने ख्रिश्चन धर्म देण्यापेक्षा प्रेमाने ख्रिश्चन करून घ्यावे असे मला वाटते.त्यांचा सद्भाव, विश्वास लाभावा म्हणून मी त्यांना लाल टोप्या दिल्या,काचेचे मणी दिले.फुटलेल्या आरशांचे तुकडे व फुटलेल्या चिनी मातीच्या भांड्याचे तुकडे घेऊन ते सोने देत.एका टाकाऊ पट्ट्याबद्दल एका खलाशास अडीच कॅस्टेलान्स वजनाचे सोने मिळाले तेव्हा ही फसवणूक असावी असे कोलंबसाला प्रथम वाटले व हा असमान व्यापार,ही विषम देवघेद बंद करण्याचे त्याने ठरविले.पण असे वाटण्याच्या मुळाशी न्यायबुद्धी नव्हती,तर इंडियनांचा विश्वास संपादून व त्यांची सदिच्छा मिळवून मग त्यांना गोडीगुलाबीन ख्रिश्चन करता यावे;व नीट लुटता यावे,असा त्याचा डाव होता.त्याने राजाला लिहिले,"एकदा यांचा विश्वास मला संपादन करू द्या,की मग यांना सहज ख्रिश्चनधर्मी करता येईल व जिंकता येईल.'


इंडियनांना ख्रिश्चन करणे व नंतर धनकनकसंपन्न होणे या दोन इच्छा त्याच्या मनात होत्या.या दोन गोष्टी त्याच्या रोजनिशीतील उताऱ्यांत निरनिराळ्या वेळी पुन्हा दिसतात.इंडियनांमुळे स्वर्गाला आध्यात्मिक फायदा मिळेल व आपणाला ऐहिक वैभव मिळेल,या दोन गोष्टी पुन्हा पुन्हा त्या रोजनिशीत लिहिलेल्या आहेत. तो नि:संकोचपणे राजाला लिहितो,"ही बेटे चीन व हिंदुस्थान यांच्या उंबरठ्यात आहेत.या दोन्ही देशांत अगणित संपत्ती आहे.हिरे-माणिके,मोती व सोने यांना तर अंतच नाही! तुम्हाला हवे असेल तितके सोने मी आणून देईन.तुम्हाला हवे असतील तितके गुलाम गलबतांत भरून पाठवीन." तो पुढे लिहितो,"या गोष्टीचा साऱ्या ख्रिश्चनधर्मी राष्ट्रांस आनंद वाटला पाहिजे.त्यांनी महोत्सव करावेत,प्रभूचे आभार मानावेत.लाखो लोकांना आपणास आपल्या धर्मात घेता येईल. केवढी उदात्त गोष्टी ! ही जी कृतकृत्यता,तीबद्दल प्रभूचे आभार..


अशा रीतीने कोलंबस पौर्वात्यांना सक्तीने व प्रेमाने ख्रिश्चन धर्मी व गुलाम करण्यासाठी निघाला होता पण ती गोष्ट दूरच राहून 'अमेरिकेचा संशोधक' ही पदवी त्याला आकस्मित मिळून गेली.


कोलंबस काही बाबतींत मोठा मनुष्य होता यात शंकाच नाही.विज्ञानाच्या बाबतीत तो आपल्या काळाच्या फार पुढे होता.त्याचे धैर्य व त्याची चिकाटी ही अतुलनीय होती.तो स्वप्नसृष्टीत वावरणारा एक अज्ञात मनुष्य होता.पण आपले स्वप्न प्रत्यक्ष सृष्टीत आणले जावे म्हणून त्याने राजाचे मन वळविले.अज्ञात महासागराच्या पृष्ठावर साहसाचे नवीन महाकाव्य लिहिणारा तो महाकवी होता.तो धर्मांध,संकुचित,डामडौली, स्वार्थी व अहंकारी होता.दैवाचे वैभव व सुवर्णाचा लखलखाट या दोन गोष्टींसाठी त्याने आपले सारे जीवन वाहिले होते;पण त्याचीच कसोटी लावून पाहिले तर त्याचे जीवन विफल झाले,असेच म्हणावे लागेल.त्याला परधर्मीयांस ख्रिश्चन धर्म देता आला नाही की स्पेनमध्ये सोनेही आणता आले नाही..स्पॅनिश लोकांनी इंडियनांस वाईट रीतीने वागविले.इंडियनांनीही त्यांना त्याच प्रकारे उत्तर दिले.त्यांनी जशास तसे केले.एका हातात क्रॉस व एका हातत चाबूक घेऊन येणाऱ्या या पाहुण्यांविषयी इंडियनांना विश्वास वाटेना.स्पेनमध्ये थोडे दिवस राहून कोलंबस वेस्ट इंडिज बेटांत परत आला,तेव्हा मागे ठेवलेल्या शिबंदीतील एकही मनुष्य जिवंत नाही,असे त्याला आढळून आले!


अमेरिकेत तो एकंदर चारदा आला.तो पुन्हापुन्हा सोने व हिरेमाणके शोधीत होता.पण त्याचा सारा शोध फुकट गेला.राजा फर्डिनंड अधीर झाला. कोलंबस खूप सोने आणून देईल अशी राजाची अपेक्षा होती.पण प्रत्यक्ष सोने मिळण्याऐवजी सोन्याची फक्त अभिवचनेच मिळत.

वस्तुस्थिती काय आहे,सोन्याच्या मार्गात कोणते विघ्न आहे हे पाहण्यासाठी राजाने बोबॅडिला नावाचा एक दरबारी सरदार पाठवला.बोबॅडिला आला व बेटांचे संशोधन केल्यावर त्याला असे आढळून आले,की जो प्रदेश कोलंबसाने शोधला होता, तो भिकार होता.

कोलंबसाने अपराध केला होता.त्याने राजाला फसविले होते.म्हणून त्या सरदाराने कोलंबसाला कैद करून फर्डिनंड राजासमोर कैदी म्हणून उभे केले.त्याचे हे करणे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्पॅनिश न्यायनीतीचा जो प्रकार होता,त्याला अनुरूपच होते.


कोलंबस अज्ञात जन्मला व अज्ञातपणेच मेला. त्याने जगाला नवीन खंड दिले:जगाने त्याला शृंखला लेववून कृतज्ञता दाखविली ! त्याच्या शोधाचे महत्त्व त्या काळी कोणालाही समजले नाही.


इ.स.१५०३मध्ये अमेरिगो व्हेस्पुस्सी नामक इटॅलियन साहसिकाने 'नवीन जग' म्हणून एक वृत्तांत प्रसिद्ध केला.हे नवीन जग आपण १४९७ मध्ये शोधले असे तो म्हणतो.पण ती सारी असत्यकथा होती.

तथापि,त्याच वेळेस एक जर्मन प्रोफेसर जगाचा भूगोल छापीत होता,त्यात त्याने या नव्या खंडाला 'अमेरिका' असे नाव दिले.अमेरिगोने जे खोटेच सांगितले,ते खरे मानून त्याचेच नाव या नव्या खंडाला त्या जर्मन प्रोफेसराने दिले.


इतिहासातला हा केवढा विरोध आहे की,ज्याने खरोखरच प्रथम इ.स.१००० मध्ये अमेरिका शोधली त्याचे नावही कोणास माहीत नाही ! ज्याने पुन्हा दुसऱ्यांदा (१४९२मध्ये) ती शोधली त्याला अमेरिकेचा पहिला शोधक मानण्यात येते!!आणि ज्याने मुळीच काही न करता सन १४९७ साली आपण अमेरिका शोधली अशी नुसती थाप मारली,त्याचे नाव त्या नव्या जगास मिळून अमर झाले!!! घोडचुका करणारी आपली ही मानवजात खरोखरच्या कर्तृत्वाबद्दल मानसन्मान कसे वाटत असते,याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.


मानवजातीची कथा - हेन्री थॉमस

अनुवाद - सानेगुरुजी

मधुश्री पब्लिकेशन - शरद अष्टेकर

१७/२/२३

विचारांची तटबंदी तोडून बाहेर पडा !

विचार,विचार आणि विचार! प्रत्येक क्षणाला व गोष्टीला जी माणसे विचारांनीच उत्तर देतात, अशी माणसे वास्तवाचे नेमके आकलन करू शकत नाहीत. ती सदैव भासचित्रात वा खोट्या कल्पनेत जगत राहतात आणि म्हणूनच सदैव अडचणीत येतात.


- अँलन वॅट्स


होल्डन कॉलफिल्ड हे लेखक जे.डी.सॅलिंजर

कादंबरीतील एक पात्र आहे.आपल्याच विश्वात ही व्यक्तिरेखा विलक्षण गुंग असते. अवतीभोवतीच्या जगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी मॅनहाटनच्या रस्त्यावरून हिंडणारा तरूण - होल्डन कॉलफिल्ड ! 


उतावीळपणा,भीती,आणि लाज या तीन गोष्टींतून असमाधान आपल्याला घेरून टाकत असते.खरे तर,हे तिन्ही पाहुणे न बोलवताच आपल्या घरी येत असतात.दुःखातून वा समस्येतून बाहेर पडण्यासाठी आपण सदैव उतावीळ होत असतो.


जे. डी. सॅलिंजर या लेखकाच्या 'द कॅचेस ऑफ राय' या कादंबरीचा नायक शाळेच्या वातावरणात गुदमरलेला आहे.मोठे होण्याची भीती त्याच्या मनात दडलेली आहे.मुळात सॅलिंजर हा लेखक न्यूनगंड आणि अपरिपक्वता यांनी ग्रासलेला होता आणि हे त्याच्या आत्मचरित्रावरून लगेच लक्षात येते.


जॉन फॅन्टेच्या 'बंदिनी' कादंबरीतील अँरटूरो गर्बिअल बंदिनी ही मुख्य व्यक्तिरेखा देखील अल्टर ईगोने ग्रासलेली आहे.या पात्राला मोठा लेखक बनायचे आहे. त्या प्रयत्नात तो भेटणाऱ्या प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसतो.


प्रचंड अहंकार आणि असुरक्षिततेच्या तीव्रतम भावनांवर मात करण्यासाठी जॉन फँटेला प्रचंड झुंजावे लागले. त्याच्या मार्गात सर्वत्र धुके पसरले होते.त्यातून तो नैराश्यात गेला. या निराशेच्या भरात त्याने आपल्या लेखनाचे सर्व हक्क एका प्रकाशकाला नगण्य भावात विकले. पुढे त्याचा त्याला पश्चात्ताप झाला.मुख्य म्हणजे, आयुष्याच्या शेवटी तो आपल्या न्यूनगंडातून बाहेर पडला.


वॉकर पर्सीच्या आपल्या 'मुव्ही गोर' या कादंबरीचा नायक चित्रपटांचा शौकिन असतो. खोट्या कल्पनाचित्रात भासचित्रात रमणारा नायक वास्तवतेपासून फारकत घेऊन,आपल्याच कोशात स्वतःला गुरफटून घेतो.


वरील सर्व पात्रे ही न्यूनगंडाने ग्रासलेली आणि एकसूरी आयुष्य जगणारी आहेत.ते आपल्या विचारचक्रातून बाहेर पडूच शकत नाही.अर्थात या कादंबऱ्यांच्या लेखकांनी आपल्या अहंगंडावर वा न्यूनगंडावर तारुण्यात जर मात केली असती, तर त्यांच्या कलाकृतींनी अगदी वेगळे वळण घेतले असते.


बालकलाकार शेर्ली टेंपल हिने आपल्या आत्मचरित्रात,

आपल्या आयुष्याचा सच्चा वृत्तांत लिहिला आहे.आयुष्यात तिची झालेली फसवणूक,तिची झालेली चुकीची ऑपरेशन्स, तिच्यावर झालेला लैंगिक अत्याचार,या साऱ्या गोष्टींचा साद्यन्त वृत्तांत,तिच्या या आत्मचरित्रात आहे.इतकेच नव्हे तर,तिला अनेक क्षणी न्यूनगंडानी ग्रासल्याचेही तिने लिहिले आहे. त्यामुळे त्या अपराधीगंडामुळे ती स्वतःला घरात कोंडून घेत असे!


तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवता न आल्यास तुमच्यात अपराधीपणाची भावना आकाराला येते.

अपराधीपणाची भावना ही अहंकाराचाच एक भाग आहे.ती अहंकाराशी केवळ संबंधितच आहे असे नाही तर ती अहंकाराच्या आत आहे. वाढत्या वयात व्यक्तीला अनेक समस्यांना प्रश्नांना सामोरे जावे लागते.


कधी कधी आयुष्य हीच समस्या बनते.त्यातून मग अधीरपणा आणि नैराश्य वाढीस लागते. 


प्लेटो म्हणतो:काही माणसे ही आपल्या विचाराच्या भोवऱ्यातच अडकलेली असल्यामुळेच पुढे ती न्यूनगंडानी ग्रासली जातात.


अहंगडमध्ये आपल्यातला 'मी' सतत पुढे जात, स्वतःला मिरवायला बघतो.त्यात प्रदर्शनाचा मोठा भाग असतो.'मी'ला मिरविणे,सतत 'मी'चे कर्तृत्त्व व कौतुक,

मोठेपणाचा हव्यास या गोष्टी अहंगडात येतात,तर न्यूनगंडातला 'मी' मात्र सतत मागे मागे आपल्या स्वतःच्या कोशात राहण्याचा प्रयत्न करतो.सतत स्वतःला दोष देत राहणे,कमी लेखणे तसेच स्वतःला झाकून ठेवणे, स्वतःला व्यक्त करण्यास घाबरणे... या सारख्या गोष्टी न्यूनगंडात येतात. 


एक आत्मसंतुष्ट नेतृत्त्व म्हणून सिव्हिल वॉर जनरल जॉर्ज मॅकलीन यांचा नेहमीच उल्लेख केला जातो.स्वतःच्या कल्पनाविश्वात जॉर्ज मग्न राहिल्यामुळे तो आपल्या भूमिकेवर व धोरणांवर नेहमी खूष रहायचा! यातही प्रत्यक्ष नेतृत्त्व करण्याची वेळ जेव्हा त्याच्यावर आली,तेव्हा त्याच्या गाडीची चाके चिखलात रुतून बसली. एकूणच,आपल्या विचारांची तटबंदी तोडून बाहेर पडत,प्रत्यक्ष कृती त्याच्या हातून कधी घडली नाही.

परिणामतः त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.


जॉर्जला वाटायचे की,आपल्या शत्रूचे सैन्यबळ वाढत चाललेले आहे.खरे तर तसे काहीही नव्हते.वस्तुतः तीन वेळा त्याला शत्रूवर मात करण्याची संधी लाभली होती,पण तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही.दुसरे असे की, राजकीय विरोधक आपल्याविरुद्ध कट-कारस्थाने करीत असल्याचे जॉर्जला सतत वाटायचे! हे विरोधक एक दिवस आपल्यावर मोठ्या आक्रमकतेने आक्रमण करतील,असे त्याला वाटायचे! वास्तविक तसे काही नव्हते! हे सारे त्याच्या कल्पनांचेच खेळ होते.


भ्रम-भामकता,खोटी स्वप्ने यात रमणाऱ्या जॉर्जला वाटायचे की,एक परिपूर्ण नियोजन आणि एक निर्णायकी मोहिम आपल्याला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी आहे.आपली मोहिम यशस्वी होऊन आपण मोठा विजय प्राप्त केला आहे,अशी स्वप्ने त्याला पडत असत! असा विजय प्राप्त केल्याबद्दल तो स्वतःचेच अभिनंदन करायचा! आपल्या धारणा,खोट्या कल्पना-विचार यात जॉर्ज इतका अडकला होता की,प्रत्यक्ष कृती त्याने कधीच केली नाही. इतकेच नाही तर, वाट्याला जर अपयश आले, तर त्याचे खापर तो आपल्या सहकार्यांवर

काढत असे कोणा वरिष्ठानी जाब विचारला,तर तो एखाद्या चिडखोर मुलाप्रमाणे चिढायचा, आकांडतांडव करायचा! त्याच्या भ्रमिष्ठ वर्तनाला सारेच होते.धरसोड वृत्तीमुळे जॉर्ज आपल्या आयुष्यात कधी यशस्वी होऊ नाही.


जार्ज मॅकलीनचा अहंकार विराट असल्याचा उल्लेख इतिहासकारांनी केला आहे.त्याचा फाजिल आत्मविश्वास अगदी हास्यास्पद ठरला, स्वतःच्या कर्तृत्वाचे खोटे रिपोर्टस तयार केले होते.अर्थात पुढे ते सारे उघडकीस आल्यामुळे जॉर्जची मोठी नाचक्की झाली.


आपण कोणीतरी असामान्य आहोत,आपले कर्तृत्त्व देदिप्यमान असून आपण विलक्षण बुद्धिमान आहोत,असा अनेकांचा गोड गैरसमज असतो.त्यामुळे अशी माणसे अनेकदा तोंडावर आपटतात.तसे पाहता आपण सारे जण हे नैराश्य,उदासीनता,अधीरता,संशय,नपुंसकता, दुःख,वेदना,लहरीपणा,क्रोधविवशता यांनी या ना त्या प्रकारे ग्रासलेले असती.इतकेच नाही तर, आपण सारे वय वाढल्यानंतरही पौंगडावस्थेतील तरुणाप्रमाणे वागत राहतो.अर्थात याला काही अपवाद असू शकतात.


पौगंडावस्थेतील शारीरिक बदलांमुळे मुलामुलींच्या मनाची अवस्था चमत्कारिक होते, तर काही वेळा ती गोंधळून व घाबरून जातात. पालकांशी त्यांची जवळीक कमी होऊन त्यांच्यात समवयीन,समविचारी व भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षण वाढू शकते.स्वतःचे व्यक्तिमत्त्व आकर्षक ठेवण्याकडे कल वाढू लागतो.काही मुलामुलींच्या चेहऱ्यावर विशिष्ट पुळ्या (तारुण्यपीटिका) उठू लागतात.मुलींमध्ये त्याचे प्रमाण अधिक असते.त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा गंड निर्माण होऊ शकतो.आपल्या आवडीनिवडीवर पालकांनी लादलेली बंधने व शिस्त बहुधा या वयात मुलेमुली झुगारून देऊ शकतात.


सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व नैतिक अशा विषयांवर चर्चा होऊन मुलेमुली स्वतःची मते धीटपणे मांडायला लागतात.त्यांची कामाची व अभ्यासाची क्षमता वाढते,मात्र काही वेळा या वयातील मुलामुलींमध्ये भावनिक तणाव, आईवडिलांशी वाद,चिडचिडेपणा व नैराश्य अशी लक्षणे दिसून येतात. परिणामी काही वेळा नकारात्मक विचारांमुळे उद्धटपणा,हिंसक वृत्ती, व्यसनाधीनता,

न्यूनगंड,लैंगिक व्याधी,अस्थिरता इ.परिणाम दिसून येतात.


काही माणसे ही रस्त्याने चालत असताना अद्भुत कल्पना रम्य कल्पनात गुंगलेली आढळतात. कानात हेडफोन घालून आपल्याच विश्वात गुंग असतात.

अवतीभवती काय घडते आहे याचे त्यांना थेंबभर देखील भान नसते.भोवताली घडणाऱ्या गोष्टीत सहभागी न होता ते आपल्या डोक्यातील विचार चक्रात कैद होऊन गेलेली असतात.परिणामतः कमालीचे मुडी,संशयी, भयगरस्थाने आणि सामान्यता यांनी वेढलेली राहतात.



जनरल मार्शल यांना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डायरी लिहिण्याची विनंती अनेकांनी विनंती केली होती,पण त्यांनी ती नम्रपणे नाकारली होती.डायरी लिहिणे हे एकप्रकारे, आपण किती मूलगामी व महत्वाचे काम करीत आहोत,आपले कर्तृत्त्व,आपल्या भूमिका, आपली तत्त्वे,विजयाकडे व शिखराकडे जाणारी आपली वाटचाल,वाट्याला आलेल्या वेदनेवर सहजपणे आपण कशी मात केली... या आणि अशा गोष्टींचे नोंदणीकरणच असते. प्रत्यक्षात त्याचा तसा उपयोग नसतो. कोणीही आपल्या पराभवाची,नैराश्याची,वैगुण्याची तसेच आपल्यातील अहंगडाची वा न्यूनगंडाची कहाणी मांडत नाही,अहंगंडाला ठेच लागून आपण कसे शहाणे व समंजस झालो,असे कोणीही लिहिताना मला तरी दिसले नाही.


भ्रामक कल्पनांचे खेळ आपल्याला सर्वांनाशाच्या दरीत लोटू शकतात.म्हणूनच आपण भासचित्रातून वा खोट्या कल्पनातून वेळीच बाहेर पडले पाहिजे.स्वतःचे नेमके आकलन करून घेत वास्तवतेचा आपण सन्मान केला पाहिजे.अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टीत सहभागी व्हा!

आकलनातील वैभव व समंजसपणा

दिवसागणिक वाढवत न्यायला हवा!स्वच्छ मोकळेपणासह संपूर्ण वर्तमानात जगणे,

यासाठी मोठे ध्येय लागते.तेही मोठ्या निर्मितीक्षमतेने शहाणपणात वाटचाल करत राहणे,नेहमीच मूल्यवान ठरते.


इगो इज द् एनिमी - रॉयन हॉलिडे

या पुस्तकातून सन्मानाने

गोयल प्रकाशन 

१५/२/२३

आपलं अद्वितीय आयुर्वेद..!

हायडलबर्ग हे जर्मनीतलं तसं लहानसं गाव. अवघ्या दीड लाख लोकवस्तीचं.मात्र हायडलबर्ग प्रसिद्ध आहे ते शिक्षणाचं माहेरघर म्हणूनही.युरोपातलं पहिलं विद्यापीठ याच शहरात सुरू झालं,सन १३८६ मध्ये.


या हायडलबर्ग शहरात,शहराजवळच,एका पर्वतीसारख्या टेकडीवर बांधलेला किल्ला आहे.या किल्ल्याला 'हायडलबर्ग कासल' किंवा 'श्लोस' म्हणूनही ओळखले जाते.(जर्मनीत किल्ल्याला 'कासल' किंवा 'श्लोस' म्हटलं जातं). तेराव्या शतकात बांधलेला हा किल्ला व्यवस्थित देखरेखीखाली आहे.आणि म्हणूनच पर्यटकांच्या आकर्षणाचं एक मोठं केंद्रही आहे.या किल्ल्याच्या एका भागात एक नितांतसुंदर संग्रहालय आहे 'अपोथीकरी म्युझियम' किंवा 'औषधांचं संग्रहालय.'अत्यंत कलात्मक पद्धतीने,नीट- नेटक्या स्वरूपात,सुबक अशा बरण्यांमधून आणि बाटल्यांमधून,आकृत्या, पुतळे आणि जुन्या यंत्रांमधून त्यांनी औषधनिर्मितीचा इतिहास जिवंतपणे समोर उभा केला आहे.जर्मनीतला हा औषधांचा इतिहास उण्यापुऱ्या आठशे / नऊशे वर्षांचा.मात्र त्यांच्या मते जगातील औषधशास्त्राचे अग्रणी जर्मनच आहेत.


या संग्रहालयात अगदी लाजेकाजेस्तव भारताचा उल्लेख करण्यात आलेला आहे.आणि तोही असा की,'वास्को-डी-गामाच्या भारतभेटीनंतर भारतातल्या जडी-बुटींच्या औषधांची ओळख युरोपला झाली.'


गेल्या महिन्यात मी या हायडलबर्गच्या किल्ल्यातल्या औषधी संग्रहालयाला भेट द्यायला गेलो होतो,तेव्हा तिथे आसपासच्या कुठल्यातरी शाळेतली मुलं आली होती.चौथी-पाचवीतली ती पोरं,त्या संग्रहालयात बागडत होती,चिवचिवत होती.मात्र ती पोरं फार सूक्ष्मतेने प्रत्येक गोष्ट बघत होती,आपापसात जोरजोरात चर्चा करत होती.आणि गंमत म्हणजे प्रत्येकाच्या हातात कागद होता आणि ती पोर त्या कागदावर काही तरी लिहीत होती.जरा विचारल्यावर कळलं की, ही सहल म्हणजे त्या मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि त्या मुलाना ह्या संग्रहालयाच्या भेटीवर नोट्स काढायच्या .ह्या नोट्सच्या आधारावर त्यांची युनिट टेस्ट होणार आहे.खरं सांगतो,माझ्या काळजात लक्कन काही तरी हाललं...! आपल्या देशात असं होऊ शकेल.. ?


ती मुलं काय मत घेऊन बाहेर पडतील.. ? की जगामधे औषधांच्या / चिकित्साशास्त्राच्या क्षेत्रात (फक्त एक हजार वर्षांचा या संबंधात इतिहास असलेली) 'जर्मनी' सर्वांत पुढे आहे.भारत तर त्यांच्या खिजगणतीतही नसेल..! आणि आपण इतके कर्मदरिद्री की,तीन हजार वर्षांचा चिकित्साशास्त्राचा,औषधी विज्ञानाचा खणखणीत इतिहास असणारे आपण....... यातलं काहीही आपल्या नवीन पिढीला दाखवू शकत नाही..!!


साऱ्या जगाला जेव्हा चिकित्सा,मेडिसिन, अपोथिके,फार्मेसी यांसारखे शब्दही माहीत नव्हते,

त्या काळात,म्हणजे इसवी सनाच्या सातशे वर्षं आधी,जगातील पहिल्या (तक्षशीला) विद्यापीठात चिकित्साशास्त्र नावाचा सुव्यवस्थित विभाग होता..! इसवी सनाच्या सहाशे वर्षं आधी सुश्रुताने 'सुश्रुत संहिता' हा चिकित्साशास्त्रावरचा परिपूर्ण ग्रंथ लिहिला होता.सुश्रुत हा जगातील पहिला ज्ञात 'शल्य चिकित्सक (सर्जन) आहे. ह्या शल्य चिकित्सेसाठी तो १२५ प्रकारची उपकरणे वापरायचा.या सर्व उपकरणांची यादी सुद्धा त्याने दिली आहे.सुश्रुताने ३०० प्रकारच्या वेगवेगळ्या 'शल्य चिकित्सा' (ऑपरेशन्स) केल्याचे लिहून ठेवले आहे.

अगदी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे सुद्धा त्याने सविस्तर वर्णन केले आहे.लक्षात घ्या,हे सारे पावणेतीन हजार वर्षांच्या आधीचे आहे..! युरोपसकट साऱ्या जगाला या शब्दांची तोंडओळख होण्याच्या किती तरी आधीचे !


आजच्या विद्यार्थ्यांना तर जाऊच द्या,पण जाणत्या पिढीला तरी यातलं कितीसं माहीत आहे..?


चिकिस्ताशास्त्राच्या प्राचीनतेसंदर्भात तीन प्रकारच्या प्रणालींचा विचार केला जातो -


१. भारतीय चिकित्सापद्धती-प्रामुख्याने आयुर्वेद

२. इजिप्शियन प्रणाली

३.ग्रीक प्रणाली


यातील इजिप्शियन चिकित्सा प्रणालीचा मूळ पुरुष मानला जातो.इसवी सनापूर्वी सत्तावीसशे वर्षं हा त्याचा कार्यकाळ मानला जातो.अर्थात आजपासून सुमारे पावणेपाच हजार वर्षं जुना मात्र शास्त्रशुद्ध रीत्या रोगांचे निवारण आणि त्या प्रकारची औषधांची रचना त्या काळात उपलब्ध नव्हती.प्रामुख्याने वाईट शक्तींपासून (भुता-खेतांपासून) वाचविण्यासाठी काही औषधं वापरण्यावर भर होता.यातील इजिप्शियन प्रणालीत,पिरामिडमध्ये 'ममीज' ठेवण्याचं शास्त्र त्यांना माहीत असल्याने प्राचीन मानलं जातं.या प्रणालीत 'इमहोटेप'(Imhotep) हा अनेक विषयांत पारंगत असलेला गृहस्थ,इजिप्शियन चिकिस्ता प्रणालीचा मूळ पुरुष मानला जातो.अर्थात आज पासून सुमारे पावणे चार हजार वर्षे जुना.मात्र शास्त्रशुद्धरीत्या रोगांचे निवारण आणि त्या प्रकारची औषधांची रचना त्या काळात उपलब्ध नव्हती.प्रामुख्याने वाईट शक्तींपासून (भूता-खेतांपासून) वाचवण्यासाठी काही औषध वापरण्यावर भर होता.


ग्रीक चिकित्सा प्रणाली ही देखील बरीच जुनी.आजचे डॉक्टर्स ज्या 'हिप्पोक्रेट' च्या नावाने,व्यवसाय सुरू करण्याआधी,शपथ घेतात,तो हिप्पोक्रेट हा ग्रीसचाच.सुश्रुतच्या सुमारे दीडशे वर्षं नंतरचा,ह्या हिप्पोक्रेटच्या काळात भारतात चिकित्साशास्त्र विकसित स्वरूपात वापरले जात होते.ख्रिस्तपूर्व सातव्या-आठव्या शतकांत तक्षशीला विद्यापीठातील चिकित्साशास्त्राचा अभ्यासक्रम शिकायला अनेक देशांचे विद्यार्थी येत होते.आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की,हिप्पोक्रेटच्या लेखांमधे सुश्रुत संहितेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.


पुढे येशू ख्रिस्ताच्या काळात 'केलसस' (-ulus Cornelius Celsus- ख्रिस्तपूर्व २५ ते ख्रिस्तानंतर ५० वर्षे) ने चिकित्साशास्त्रासंबंधी 'डीमेडीसिना'हा आठ भागांचा मोठा ग्रंथ लिहिला.यात सातव्या भागात काही शस्त्रक्रियांची माहिती दिलेली आहे.आणि गंमत म्हणजे यात वर्णन केलेल्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची माहिती ही या ग्रंथाच्या सहाशे वर्षं आधी सुश्रुतने लिहिलेल्या 'सुश्रुत संहिता' मधील मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रियेच्या माहितीशी तंतोतंत जुळणारी आहे..!


मुळात भारतात आयुर्वेदाची सुरुवात कोठून झाली हे कोणालाच ठामपणे सांगता यायचं नाही.ऋग्वेदात आणि अथर्ववेदात यासंबंधी उल्लेख सापडतात.अथर्ववेदात तर चिकित्साशास्त्रासंबंधी अनेक टिपण्या आढळतात.आणि म्हणूनच आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद समजले जाते.आता अथर्ववेदाचा निश्चित कालखंड कोणता..? कठीण आहे सांगणं.कोणी ख्रिस्तपूर्व १२०० वर्षे सांगतात,तर कोणी ख्रिस्तपूर्व १८०० वर्षे.


आणि या ग्रंथामधूनही 'आयुर्वेद' हा नवीन शोधलेला प्रकार आहे,असं जाणवत नाहीच. त्या काळात असलेल्या ज्ञानाला अथर्ववेदासारखा ग्रंथ शब्दबद्ध करतोय असंच दिसतंय.याचाच अर्थ,आपली चिकित्सा पद्धत ही अतिप्राचीन आहे.


मुळात आयुर्वेद हे अत्यंत सुव्यवस्थितपणे रचलेलं चिकित्सा / आरोग्य शास्त्र आहे.चरक आणि सुश्रुतांच्या परंपरेला त्यांच्या शिष्यांनी पुढे नेलं.पुढे इसवी सनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतातील वाग्भटांनी चरक,सुश्रुत आणि कश्यप यांच्या ग्रंथांना एकत्र करून,त्यांच्या आधाराने एक ग्रंथ लिहिला.त्यालाच 'अष्टांग हृदय' असे म्हटले जाते.


यातील रोग / विकारांवर अधिक काम करून आठव्या शतकात वैद्य माधव ऋषी यांनी 'निदान ग्रंथ' लिहिला.या ग्रंथाची ७९ प्रकरणं आहेत, ज्यात रोग,त्यांची लक्षणं आणि त्यावरील उपचार याबाबत सखोल विवेचन केलेले आहे.यानंतर 'भावप्रकाश','योग रत्नाकर' हे ग्रंथ तयार झाले. शारंगधरांनी औषधनिर्मितीच्या प्रक्रियेसंबंधी बरेच लिहिले.पुढे अकराव्या शतकात मुस्लीम आक्रांतांची आक्रमणं सुरू झाल्यानंतर भारतातही आयुर्वेदाची परंपरा क्षीण झाली.


मात्र आज जगात इजिप्शियन चिकित्सा पद्धती अस्तित्वात नाही.ग्रीक चिकित्सा पद्धत (यूनानी) काही प्रमाणात आहे.मात्र त्यातील 'शुद्ध युनानी' औषधं किती,हा प्रश्नच आहे.जगात आज बोलबाला आहे तो अँलोपॅथिक (ऍलोपॅथिक)पद्धतीचा,जी साधारण आठशे / नऊशे वर्षांपासून विकसित होत आलेली आहे.होमियोपेथी तर अगदी अलीकडची.१७९० मध्ये जर्मनीत सुरु झालेली.


या सर्व पार्श्वभूमीवर किमान तीन / चार हजार वर्षं जुनी असणारी आणि आजही जगभर प्रचंड मागणी असणारी 'आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती' ही अद्वितीय ठरते.फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही,हेच काय ते दुःख आहे..!


१४ फेब्रुवारी २०२३ लेखाचा पुढील भाग..


१३/२/२३

आपले प्रगत धातुशास्त्र..!

आपल्या भारतात,जिथे जिथे प्राचीन सभ्यतेचे पुरावे मिळाले आहेत (म्हणजे नालंदा,हडप्पा,

मोहनजोदडो,लोथल,तक्षशिला,धोलावीरा, सुरकोटडा,दायमाबाग, कालीबंगण), त्या सर्व ठिकाणी मिळालेल्या लोखंड,तांबे,चांदी,शिसे इत्यादी धातूंची शुद्धता ही ९५% ते ९९% आहे. हे कसं शक्य झालं असेल..? आजपासून चार,साडेचार हजार वर्षांपूर्वी धातूंना अशा शुद्ध स्वरूपात परिष्कृत करण्याचे तंत्रज्ञान आपल्याजवळ कुठून आले असेल,असा प्रश्न पडतो.


भारताला पूर्वीच्या काळात 'सुजलाम सुफलाम..' म्हटले जायचे.अत्यंत संपन्न असा आपला देश होता.पूर्वी आपल्या देशातून सोन्या-चांदीचा धूर निघायचा असं आपण शाळेत शिकलोय. अर्थातच आपल्या देशात सोनं- नाणं भरपूर होतं हे निश्चित.


विजयनगर साम्राज्याच्या उत्कर्षाच्या काळात हम्पीच्या बाजारपेठेत सोनं-चांदीही भाजीपाल्यासारखी विकली जायची,असं अनेक विदेशी प्रवाशांनी नोंदवून ठेवलंय.


त्याच्या थोड्या आधीच्या काळात आपण गेलो तर अल्लाउद्दीन खिलजीनं देवगिरीवर जेव्हा पहिलं आक्रमण केलं तेव्हा पराभूत झालेल्या रामदेव रायानं त्याला काहीशे मण शुद्ध सोनं दिलं.


याचाच अर्थ,अगदी प्राचीन काळापासून आपल्या देशात सोनं,चांदी,तांबे,जस्त वगैरे धातू माहीत तर होतेच,शिवाय प्रक्रिया पण केली जात होती.


गंमत म्हणजे जगातील अत्यंत प्राचीन अशी, आजही वापरात असणारी सोन्याची खाण भारतात आहे,हे किती लोकांना माहीत असेल..?


ती खाण आहे,'हड्डी' नावाची.कर्नाटकच्या उत्तर-पूर्वभागात असलेली ही खाण रायचूर जिल्ह्यात आहे.


सन १९५५ मधे ऑस्ट्रेलियाच्या डॉ.राफ्टरने या खाणीत सापडलेल्या दोन लाकडांचे कार्बनडेटिंग केल्यावर ही खाण सुमारे दोन हजार वर्ष जुनी असल्याचे समजले.मात्र कदाचित ही खाण यापेक्षाही जुनी असू शकेल. आजही ही खाण 'हड्डी गोल्डमाईन्स लिमिटेड' या नावाने सोन्याचे उत्खनन करते.


या खाणीचे वैशिष्ट्य सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी, ही खाण २,३०० फूट खोल खोदली गेलेली आहे.आता हे उत्खनन कसं केलं असेल.. ? तर शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे की,'फायर सेटिंग' पद्धतीने हे खाणकाम करण्यात आलं.अर्थात आतील खडक,लाकडांच्या अग्रीद्वारे गरम करायचे अन् एकदम त्यांच्यावर पाणी टाकून ते थंड करायचे.या प्रक्रियेतून मोठमोठ्या खडकांना भेगा पडतात आणि ते फुटतात.याच खाणीत ६५० फूट खोल जागेवर प्राचीन असा ऊर्ध्वाधर शाफ्ट सापडला,जो खाणकाम क्षेत्रातलं आपलं प्राचीन कौशल्य दाखवतोय.


पण सोनंच कशाला..? लोखंड मिळवण्यासाठी लागणाऱ्या भट्ट्या आणि त्यांचं तंत्रज्ञान त्या काळात विपुल स्वरूपात उपलब्ध होतं.याच लेखमालेत 'लोहस्तंभ' ह्या लेखात आपण दिल्लीतील कुतुब मिनारजवळील लोहस्तंभाविषयी चर्चा केली होती.आज किमान दीड-दोन हजार वर्षं झाली त्या लोहस्तंभाला,पण आजही ते तसूभरही गंजलेले नाही.आणि आज एकविसाव्या शतकातल्या वैज्ञानिकांनाही, स्वभावतःगंज न लागणार लोखंड कसं तयार केलं असेल याचं आश्चर्य वाटतं.


या लोहस्तंभासारखीच पूर्णपणे तांब्यात बनलेली बुद्धमूर्ती आहे ७ फूट उंच.ही मूर्ती चौथ्या शतकातील असून सध्या लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात ठेवलेली आहे.बिहारमधे मिळालेल्या ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे यातील तांब हे खराब होत नाही.ते तसंच लखलखीत राहतं.


गंगेच्या खोऱ्यात नुकतेच राकेश तिवारी ह्या पुरातत्त्ववेत्त्याने काही उत्खनन केले.त्यात त्यांना आढळून आले की इसवी सनापूर्वी किमान २८०० वर्षांपासून भारताला परिष्कृत लोखंड तयार करण्याचे तंत्रज्ञान अवगत होते.अर्थात यापुर्वीपासूनही असू शकेल.पण साधारण ४,८०० वर्षांपूर्वीचे तर पुरावे सापडले आहेत.


याचप्रमाणे छत्तीसगढमधील 'मल्हार' येथे काही वर्षांपूर्वी जे उत्खनन झाले त्यात किंवा उत्तर प्रदेशातल्या दादुपूर,'राजा नाला का टिला' आणि लहुरोदवा येथील उत्खननात इसवी सनाच्या १,८०० ते १,२०० वर्षांपूर्वीचे लोखंड आणि तांब्याचे शुद्ध स्वरूपातले अनेक पात्र आणि वस्तू सापडल्या आहेत.


इसवी सनाच्या तीनशे वर्षांपूर्वी,लोखंड/ पोलाद हे अत्यंत परिष्कृत स्वरूपात तयार करणाऱ्या अनेक भट्ट्या दक्षिण भारतात सापडल्या आहेत.ह्या भट्ट्यांना इंग्रजांनी क्रुसिबल टेक्निक (Crucible Technique) हे नाव,पुढे जाऊन दिले.या पद्धतीत शुद्ध स्वरूपातील घडीव लोखंड,कोळसा काच,ही सर्व सामग्री मूस पात्रात घेऊन त्या पात्राला इतकी उष्णता देतात की लोखंड वितळतं आणि कार्बनला शोषून घेतं. ह्या उच्च कार्बन लोखंडाला,नंतर अरबी लढवैय्ये, 'फौलाद' म्हणू लागले.


वाग्भटाने लिहिलेल्या 'रसरत्न समुच्चय' ह्या ग्रंथात धातुकर्मासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या भट्ट्ट्यांची वर्णनं दिलेली आहेत.महागजपुट, गजपुट,वराहपुट,कुक्कुटपुट आणि कपोतपुट भट्ट्यांची वर्णनं आहेत.यात टाकल्या जाणाऱ्या शेणाच्या गवऱ्याची संख्या आणि त्या अनुपातात निर्माण होणाऱ्या तापमानाचा उल्लेख यात आहे. उदाहरणार्थ,


महागजपुट भट्टीसाठी २,००० गवऱ्या तर कमी तापमानावर चालणाऱ्या कपोतपुटसाठी फक्त ८ गवऱ्यांची आवश्यकता असायची.


आजच्या आधुनिक फर्नेसच्या काळात कोणालाही ह्या गवऱ्यांवर आधारित भट्ट्या म्हणजे अतिशय जुनाट आणि आउटडेटेड संकल्पना वाटेल.पण अशाच भट्ट्यांमधून त्या काळात लोहस्तंभासारख्या ज्या अनेक वस्तू तयार झाल्या,त्या अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरूनही आजच्या वैज्ञानिकांना तयार करणं शक्य झालेलं नाही.


त्या काळच्या भट्ट्यांद्वारे निर्माण होणारी उष्णता मोजण्याचे प्रयोग आधुनिक काळात झाले.अगदी ग्रंथात लिहिल्याप्रमाणे भट्ट्या तयार केल्या गेल्या आणि त्यातून निर्माण झालेली उष्णता मोजण्यात आली.ती ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणेच निघाली..! 


९,००० हून अधिक उष्णतेसाठी वाग्भटाने चार प्रकारच्या भट्ट्याचं वर्णन केलेलं आहे -


१. अंगारकोष्टी, २. पातालकोष्टी, ३. गोरकोष्टी आणि

४. मूषकोष्टी


यांतील पातालकोष्टीचं वर्णन हे धातुशास्त्रात उपयोगात येणाऱ्या अत्याधुनिक 'पिट फर्नेस' बरोबर साम्य असणारं आहे.


विभिन्न धातूंना वितळवण्यासाठी भारद्वाजमुनींनी 'बृहद् विमान शास्त्र' नावाच्या ग्रंथात ५३२ प्रकारच्या लोहाराच्या भात्यांसारख्या रचनेचे वर्णन केले आहे.इतिहासात ज्या दमिश्कच्या तलवारी जगप्रसिद्ध होत्या,त्यांचे लोखंड हे भारतातून जायचे.भारतात अत्यंत शुद्ध जस्त आणि तांबं निर्माण व्हायचं,असं अनेक विदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेलं आहे.


तांब्याचा वापर भारतात अत्यंत प्राचीन काळापासून केला जातोय.भारतात इसवी सनाच्या तीन-चारशे वर्षांपूर्वी तांब्याचा वापर होत असल्याचे पुरावे सापडले आहेत.हडप्पन काळातील तांब्याची भांडी मोहनजोदडोसहित अनेक ठिकाणच्या उत्खननात आढळली आहेत.आज पाकिस्तानात असलेल्या बलुचिस्तान प्रांतात प्राचीन काळी,तांब्याच्या अनेक खाणी असल्याचे उल्लेख आणि पुरावे सापडले आहेत. राजस्थानात खेत्री येथेही प्राचीन काळात तांब्याच्या खाणी असल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात.


जस्त (झिंक) हा पदार्थ भारतात शोधला गेला, हे सुद्धा आपल्यापैकी किती जणांना माहीत असेल..? इसवी सनापूर्वी नवव्या शतकात राजस्थानात जस्त वापरात असल्याचे पुरावे मिळाले आहेत.याहूनही महत्त्वाचं म्हणजे. इतिहासाला आजपर्यंत ज्ञात असलेली,जस्ताची सर्वांत प्राचीन खाणही भारतात राजस्थानात आहे...!


जस्ताची ही प्राचीन खाण 'जावर' ह्या गावात आहे.

उदयपूरपासून ४० असं किलोमीटर अंतरावर असलेली ही खाण आजही जस्ताचं उत्पादन करते.सध्या 'हिंदुस्थान झिंक लिमिटेड' तर्फे येथे जस्ताचं उत्खनन केलं जातं.. म्हणतात की,इसवी सनापूर्वी सहाव्या शतकात ही जावरची जस्ताची खाण काम करत होती.तसे पुरावे मिळाले आहेत.


जस्त तयार करण्याचा विधीही अत्यंत कौशल्याचा,जटील आणि तांत्रिक स्वरूपाचा होता.भारतीयांनी या प्रक्रियेत प्रावीण्य मिळवले होते. पुढे 'रसरत्नाकर' लिहिणाऱ्या नागार्जुन ने जस्त तयार करण्याचा विधी विस्तृत स्वरूपात दिलेला आहे. आसवन (डिस्टीलेशन), द्रावण (लिक्विफिकेशन) इत्यादी विधींचाही उल्लेख त्याने केलेला आढळतो.


या विधीमधे खाणीतून काढलेल्या जस्ताच्या अयस्काला अत्यंत उच्च तापमानावर (१००० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त) वितळवतात. या प्रक्रियेतून निघालेल्या वाफेचे आसवन (डिस्टीलेशन) करतात.त्यांना थंड करतात आणि ह्या प्रक्रियेतून घनरूपात जस्त (झिंक) तयार होत जाते.


यूरोपला सन १७४० पर्यंत जस्त (झिंक) ह्या खनिज धातूच्या उत्पादनाची काहीही माहिती नव्हती.ब्रिस्टोलमधे व्यापारिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या जस्ताची उत्पादनप्रक्रिया ही भारतातल्या 'जावर' प्रक्रियेसारखीच होती. अर्थात भारतात होणारे जस्ताचे उत्पादन बघूनच युरोपने,त्याच पद्धतीने, त्याचे उत्पादन सुरू केले असे म्हणावे लागेल.


एकूणात काय,तर भारतातल्या धातुशास्त्राने जगाच्या औद्योगीकरणात फार मोठी भर घातली आहे.सन १००० च्या आसपास,जेव्हा भारत हा वैश्विक स्तरावर उद्योग जगताचा बादशहा होता, तेव्हा विभिन्न धातूंनी बनलेल्या वस्तूंची निर्यात फार मोठ्या प्रमाणावर होत होती.


विशेषतः जस्त आणि हायकार्बन स्टीलमधे तर आपण जगाच्या खूपच पुढे होतो आणि त्या विषयातले तंत्रज्ञान जगाला देत होतो..!


आपल्या धातुशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हे इतके लक्षात ठेवले तरी पुरे..!!


११ फेब्रुवारी २०२३ या लेखातील भाग…

११/२/२३

आपले प्राचीन 'जलव्यवस्थापन'💧

प्राचीन काळी आपल्या देशात पाण्याचं व्यवस्थापन उत्कृष्ट होतं आणि म्हणूनच आपला देश

'सुजलाम सुफलाम' होता..!


पाण्याचं हे नियोजन किती चांगलं असावं.. ? तर जगातले पहिले ज्ञात आणि सध्याही वापरात असलेले धरण हे भारतात आहे,हे आपल्यापैकी किती लोकांना माहीत असेल..? इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात,चोल राजा करिकलन याने बांधलेला 'अनईकट्ट' अथवा इंग्रजांच्या भाषेत 'ग्रांड अनिकट' (Grand Anicut) किंवा आजच्या बोलीभाषेत 'कलानाई बांध' हा तो बांध आहे.गेली अठराशे वर्षं वापरात असलेला..!!


आजकालच्या धरणांना जिथे तीस-पस्तीस वर्षांत भेगा पडतात तिथे अठराशे वर्षं सतत एखादे धरण वापरात असणं,हे एक अद्भुत आश्चर्य आहे..! नदीच्या मुख्य पात्रात बांधलेला हा बांध किंवा हे धरण ३२९ मीटर्स लांब आणि २० मीटर्स रुंद आहे. त्रिचनापल्लीपासून फक्त १५ किलोमीटर्स दूर असलेला हा बांध,कावेरी नदीच्या डेल्टा प्रदेशात उभारलेला आहे. इंग्रजांनी या धरणावर इंग्रजी संस्कार करण्याचा प्रयत्न केला होता.अत्यंत ओबड-धोबड खडकांनी बांधलेले हे धरण बघून असे निश्चित वाटते की,त्या काळात धरणे बांधण्याचे शास्त्र चांगले विकसित झाले असावे.हे धरण प्रायोगिक तत्त्वावर बांधलेले वाटत नाही,तर कुशल आणि अनुभवी व्यक्तींनी नदीच्या मुख्य प्रवाहात बांधलेले अनुभवसिद्ध धरण वाटते.याचाच अर्थ, आपल्या देशात धरणे बांधण्याचे,म्हणजेच 'जलव्यवस्थापनाचे' शास्त्र फार- फार जुने असावे.अर्थात नंतर झालेल्या विदेशी आक्रमणांमुळे ह्या प्राचीन शास्त्राचे पुरावे नष्ट झाले आणि उरले ते इतिहासात डोकावणारे कलानाई धरणांसारखे गवाक्ष..!


जगाच्या इतिहासात बघितलं तर अत्यंत प्राचीन अशी धरणे बांधल्याचे उल्लेख आढळतात. नाईल नदीवर कोशेश येथे इसवी सनाच्या २९०० वर्षे आधी बांधलेले १५ मीटर उंचीचे धरण जगातील सर्वांत जुने धरण मानण्यात येते.पण आज ते अस्तित्वात नाही.किंबहुना अर्वाचीन इतिहासकारांनी त्या धरणाला पाहिलेलेच नाही. त्याचे फक्त उल्लेख आढळतात.


इजिप्तमधे इसवी सनापूर्वी २७०० वर्षच्या सुमाराला नाईल नदीवर बांधलेल्या धरणाचे काही अवशेष आजही बघायला मिळतात. साद-अल- कफारा असं त्याचं नंतर नामकरण करण्यात आलं.कैरोपासून तीस किलोमीटर अंतरावर बांधलेले हे धरण,बांधल्यानंतर काही दिवसांतच कोसळले.त्यामुळे पुढे अनेक शतकं इजिप्तच्या लोकांनी धरणे बांधण्याची हिम्मतच केली नाही.चीनमधेही इसवी सनापूर्वी २२८० वर्षांपूर्वीच्या धरणांचे उल्लेख सापडतात.मात्र प्रत्यक्षात वापरात असलेलं इतकं जुनं एकही धरण जगभरात आढळत नाही.


भारतात मात्र कलानाई धरणाच्या नंतर बांधलेली आणि वापरात असलेली धरणे आढळतात. इसवी सन ५०० ते १३०० मधे दक्षिणेतल्या पल्लव राजांनी बांधलेल्या अनेक मातीच्या धरणांपैकी काही आजही वापरात आहेत.ते सन १०११ ते १०३७ ह्या काळात तामिळनाडूमधे बांधलेले वीरनाम धरण हे याचे उदाहरण आहे.


जलव्यवस्थापनेच्या संदर्भात बांधलेल्या अनेक रचना आजही अस्तित्वात आहेत.पूर्वी गुजरातची राजधानी असलेल्या 'पाटण' येथे बांधलेली 'रानी का वाव' ही विहीर (राजेशाही बारव) आता युनेस्कोच्या संरक्षित स्मारकांच्या यादीत गेली आहे.भूगर्भातील पाण्याला नीट खेळवण्याचे आणि साठवण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. इसवी सन १०२२ ते १०६३ या काळात बांधण्यात आलेली ही सातमजली विहीर आजही सुस्थितीत आहे.सोळंकी राजवंशाच्या राणी उदयमती यांनी आपले पती भीमदेव यांच्या स्मरणार्थ ही विहीर बांधली होती.म्हणूनच हिचे नाव 'रानी का वाव' अर्थात 'राणीची विहीर' असे पडले.हाच काळ होता,जेव्हा सोमनाथवर महमूद गजनीने आक्रमण केले होते.विहीर बांधल्यानंतर काही वर्षांनी गुजरात हे पूर्णपणे मुस्लीम शासकांच्या ताब्यात गेलं.त्यामुळे पुढे जवळपास सातशे वर्षं ही राजेशाही विहीर चिखलाच्या गाळात दुर्लक्षित होती...!


अर्थात भूमिगत पाण्याच्या व्यवस्थापनाची माहिती आपल्याला फार पूर्वी पासून होती,हे निश्चित.

पंचमहाभूतांच्या मंदिरांसंबंधी या आधीच्या लेखात,याच लेखमालेत,उल्लेख आलेला आहे.त्यातील 'जल' संबंधीचे उल्लेख आणि जलव्यवस्था- पनाची माहिती फार प्राचीन काळापासून आपल्याला होती याचे अनेक पुरावे आपल्या समोर आहेत.ऋग्वेदात,यजुर्वेदात आपल्याला पाण्याच्या नियोजनासंबंधी अनेक सूक्ते आढळतात.धुळ्याच्या श्री.मुकुंद धाराशिवकरांनी यावर विपुल आणि अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे.त्यांनीच प्राचीन जलव्यवस्थापनासंबंधी गो.ग.जोशी यांचाही उल्लेख केला आहे.तारापूरमधे ज्येष्ठ अभियंता असलेल्या जोशी यांचा प्राचीन शास्त्रासंबंधी चांगला व्यासंग होता.


स्थापत्यवेद हा अथर्ववेदाचा उपवेद समजला जातो.दुर्दैवाने त्याची एकही प्रत भारतात उपलब्ध नाही.युरोपमधील ग्रंथालयात याच्या काही प्रती आढळतात.यातील परिशिष्टांमधे तडाग विधी (जलाशयनिर्मिती) ची संपूर्ण माहिती दिलेली आहे.


मुकुंद धाराशिवकरांनी आणखी एका ग्रंथाचा उल्लेख केलाय,ज्याचे नाव दुर्दैवाने उपलब्ध नाही आणि शेवटचे पान नसल्याने तो कोणी लिहिलाय,हे देखील कळत नाही.अथ जलाशया प्रारम्यते... ह्या ओळीने सुरू होणाऱ्या ह्या ग्रंथात भिंत बांधून जलाशय कसा निर्माण करावा याचे सविस्तर वर्णन आहे. हा ग्रंथ २८०० वर्षांपूर्वीचा आहे.


कृषी पाराशर,कश्यप कृषी सूक्त,सहाव्या शतकात लिहिलेल्या 'सहदेव भाळकी' इत्यादी ग्रंथांत पाण्याची साठवण,पाण्याचे वाटप, पावसाचे अनुमान,जलाशय निर्मिती यांवर बरीच आणि सविस्तर माहिती आढळते..


द शिल्पशास्त्र आणि भृगु शिल्पशास्त्र यांत सागरातील किल्ले,नदीतील नारद किल्ले यांसारख्या विषयांपासून ते पाण्याची साठवण, पाण्याचे वाटप आणि पाण्याचा निचरा यावर सखोल विवेचन आढळते.भृगु शिल्पशास्त्रात पाण्याचे दहा गुणधर्म सांगितले आहेत.मात्र पाराशर मुनींनी पाण्याला एकोणीस गुणधर्म असल्याचे प्रतिपादन केले आहे.


पाण्यासंदर्भात वेदांमधे आणि विविध पुराणांमधे अनेक उल्लेख येतात.विशिष्ट परिस्थितीत पाण्याचे नियोजन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती मिळते.


सन २००७ मधे योजना आयोगाने 'ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट अँड ओनरशिप' हा रिपोर्ट तज्ज्ञ लोकांद्वारे लिहून प्रकाशित केला.नेटवरदेखील हा उपलब्ध आहे.मोन्टेक सिंह अहलुवालियांची प्रस्तावना ह्या रिपोर्टला आहे.या रिपोर्टच्या सुरुवातीलाच ऋग्वेदातील पाण्यासंबंधीची एक ऋचा वापरली आहे -


The waters of sky, 

the waters of rivers,

and water in the well,

whose source is the ocean, 

may all these sacred waters protect me.


नंतर रिपोर्ट लिहिण्याची सुरुवात करताना प्राचीन भारतीय शास्त्रानुसार जलव्यवस्थापन हे किती शास्त्रशुद्ध होतं,याचं विवेचन केलं आहे..!


मात्र जलव्यवस्थापनासंबंधी अत्यंत विस्तृत विवेचन केलंय 'वराहमिहिर' ने याचे राहणे उज्जैनला होते.तेव्हा उज्जैनचे महाराजा होते, 


'सम्राट विक्रमादित्य' वराहमिहिरने सन ५०५ च्या सुमारास विविध विषयांवरील अभ्यासाला सुरुवात केली आणि सन ५८७ मधे तो वारला. याचाच अर्थ,जवळपास ऐंशी वर्ष वराह मिहिराने ज्ञानसाधनेत खर्च केले.


वराहमिहिराचे प्रमुख कार्य म्हणजे त्याने लिहिलेला 'बृहत्संहिता' नावाचा ज्ञानकोश.या कोशात उदकार्गल (पाण्याची साठवण) नावाचा ५४ क्रमांकाचा अध्याय आहे.१२५ श्लोकांच्या ह्या अध्यायात वराहमिहिरांनी जी माहिती दिली आहे,ती अद्भूत आहे,अक्षरशः थक्क करणारी आहे.


भूगर्भामधे पाण्याचा शोध कसा घेता येऊ शकतो,यासंबंधीचे श्लोक आहेत,जे आजही आपल्याला चकित करतात.वराहमिहिराने जमिनीच्या आतील पाणी शोधताना मुख्यतः 


तीन गोष्टींच्या निरीक्षणावर भर दिलेला आहे. त्यात त्या भागात उपलब्ध असलेली झाडं, झाडांजवळ असलेली वारुळे,त्या वारुळाची दिशा,त्यात राहणारा प्राणी आणि तिथल्या जमिनीचा रंग,पोत आणि तिची चव यांचा समावेश आहे..! या निरीक्षणांच्या आधारे जमिनीच्या आतील पाणी नक्की शोधता येईल असे त्याचे म्हणणे आहे


लक्षात घ्या,दीड हजार वर्षांच्याही आधी,काहीही आधुनिक संसाधने माहीत नसताना,वराहमिहिर हे ठाम प्रतिपादन करतोय..!!


मात्र हे सर्व करताना वराहमिहिराने आजच्या वैज्ञानिकांसारख्या नोंदी करून ठेवल्या,ज्या महत्त्वपूर्ण आहेत.त्याने पंचावन्न वृक्ष व वनस्पतींचा अभ्यास करून मांडणी केली आहे. त्याचप्रमाणे त्याने मातीचे वर्गीकरण देखील विस्ताराने केले आहे.ह्या सर्व निरीक्षणांचे निकषही त्याने मांडून ठेवले आहेत. त्यांतील काही -


१. भरपूर फांद्या तेलकट साल असलेले ठेंगणे झाड असेल तर पाणी आढळते.


२. उन्हाळ्यात जमिनीतून वाफा येताना दिसल्या तर पृष्ठभागाजवळ पाणी असते.


३. झाडाची एकच फांदी जमिनीकडे झुकलेली असेल तर तिच्या खालील भागात पाणी आढळते.


४. जेव्हा जमीन गरम झालेली असते तेव्हा एखाद्याच ठिकाणी ती थंड लागली तर तिथे पाणी असते.


५. काटेरी झाडांचे काटे बोथटलेले असतील तर हमखास पाणी मिळते....


वगैरे,अशी अनेक निरीक्षणे त्याने नोंदवलेली आहेत. खरी गंमत तर पुढेच आहे.


वराहमिहिराचे हे प्रतिपादन खरं की खोटं,हे ठरविण्यासाठी आंध्र प्रदेशातल्या तिरुपतीमधल्या श्रीवेंकटेश्वर (एस.व्ही.) विद्यापीठाने सुमारे पंधरा-सोळा वर्षांपूर्वी प्रत्यक्ष विहिरी खोदून पाहायचे ठरविले.वराहमिहिराच्या निरीक्षणानुसार पाणी मिळण्यास योग्य ठरतील अशा जागा निवडल्या आणि सुमारे ३०० बोअर घेतले.

(बोअरवेल खणल्या) आश्चर्य म्हणजे ९५% ठिकाणी पाणी लागले.


अर्थात वराहमिहिराचे निरीक्षण योग्य होते हे सिद्ध झाले.मात्र पुढे दुर्दैवाने हा प्रकल्प सरकारी लालफीतशाहीत अडकला आणि तो लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही..!


पाण्याच्या व्यवस्थापनाची अनेक उदाहरणं आपल्याला इंग्रजाचे शासन येण्याच्या आधीपर्यंत ठिकठिकाणी दिसतात.अगदी उत्तर पेशवाईत औरंगाबाद येथे बांधलेले 'थत्ते नहर' असो, की पुण्याला पेशव्यांच्या काळात केलेली पाणीपुरवठ्याची रचना असो.बऱ्हाणपूरला आजही अस्तित्वात असलेली,पाचशे वर्षांपूर्वीची पाणी वाहून नेण्याची रचना असो,की पंढरपूर-अकलूज रस्त्यावरील वेळापूर गावात सातवाहन कालीन बांधलेली बारव असो. 'समरांगण सूत्रधार' ह्या ग्रंथाच्या आधाराने राजा भोजने बांधलेला भोपाळचा मोठा तलाव असो... अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.


गढा-मंडला (जबलपूर संभाग) आणि चंद्रपूर या भागात प्राचीन काळापासून गोंडांचं राज्य होतं. अगदी मुगलांना,आदिलशाहीला किंवा कुतुबशाहीला सुद्धा त्यांना जिंकता आलं नव्हतं. मात्र तरीही आपल्या देशात हा प्रदेश म्हणजे मागासलेला मानला गेला.अर्थात खरं चित्र तसं नव्हतं.एक खूप सुरेख हिंदी पुस्तक आहे- 'गोंडकालीन जल-व्यवस्थापन'यात सुमारे पाचशे ते आठशे वर्षांपूर्वी गोंड साम्राज्यात किती उत्कृष्टपणे पाण्याचं नियोजन केलं होतं याचं वर्णन आहे.या नियोजनाचा फायदा म्हणजे कुठल्याही दुष्काळाची किंवा अवर्षणाची झळ ह्या गोंड प्रदेशाला कधीही लागली नाही.


आमच्या जबलपूर शहरात गोंड राणी दुर्गावतीच्या काळात (अर्थात पाचशे वर्षांपूर्वी) 'बावनताल आणि बहात्तर तलैय्या' बांधले गेले (तलैय्या- लहान तलाव).हे तलाव नुसतेच खोदून बांधले गेले नव्हते,तर जमिनीच्या 'कंटूर' प्रमाणे त्यांची रचना आहे.काही तलाव तर आतून एक-दुसऱ्याशी जोडले गेलेले आहेत.आज त्यांतले अनेक बुजले असूनही उरलेल्या तलावांमुळे जबलपूरमधे,अगदी आजही पाण्याची पातळी बऱ्यापैकी चांगली आहे आणि येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नाही.मग त्या काळात पाण्याची,शेतीची आणि निसर्गाची काय समृद्धी असेल..!!


याचाच अर्थ,पाण्याचे महत्त्व,पाण्याचा शोध आणि पाण्याचे नियोजन याचे संपूर्ण विकसित तंत्रज्ञान आपल्याजवळ होते.काही हजार वर्षांपासून आपण ते प्रभावी पद्धतीने वापरत होतो.आणि म्हणूनच आपला देश खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होता..!


मात्र आपल्यापैकी अनेकांच्या मनावर इंग्रजांचे असे जबरदस्त गारुड आहे की अनेकांना आज ही असे वाटते की आपल्या देशात पाण्याचे महत्त्व ओळखले ते इंग्रजांनी.आपल्याला धरणे बांधायला शिकवले ते इंग्रजांनी..!


दुर्दैवाने आपण आपलं प्राचीन जलव्यवस्थापन विसरलो अन् आज पाण्यासाठी आपण त्राही-त्राही करतोय,१४४ कलमं लावतोय,युद्ध खेळतोय..!!


आपल्यालाच आपल्या समृद्ध ज्ञानाचा,वारशाचा आणि तंत्रज्ञानाचा विसर पडला तर हे असं होणं अटळ आहे..!!


९ डिसेंबर २०२३ ला लेखातील पुढील भाग..