* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जानेवारी 2024

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३१/१/२४

जेरिमिया पहिला युद्धविरोधी… Jeremiah the first anti-war...


मूसाच्या मृत्यूनंतर काही शतकांनी आपण जगाचे आपण दर्शन घेऊ या.संस्कृती व सुधारणांच्या दिशेने मानव-कुटुंबाने काही पावले टाकलेली आपणास दिसतील.

ते पहा फोनिशियन लोक,व्यापाराची व सत्तेची त्यांना फार हाव,मोठमोठी लांब- रूंद गलबते त्यांनी बांधली.

समुद्रावरून जाताना सुरवंटाप्रमाणे ती दिसत.भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याभोवती कितीतरी भराभराटलेली नवीन शहरे त्यांनी वसविली;गजबजलेल्या वसाहती निर्मिल्या. भूमध्य समुद्र म्हणजे बहरलेल्या बागेतील जणू एक लहानसे तळे, असे वाटू लागले,फोनिशियन लोक अती धूर्त,त्यांना प्रामाणिकपणा ठाऊक नव्हता,

सद्सद्विवेकबुद्धी त्यांना माहीत नव्हती. नफेबाजी हाच त्यांचा धर्म व भरलेली तिजोरी हे त्यांचे ध्येय.परंतु त्यांनी नवीन लिपी शोधून काढली.इजिप्शियनांची ती चित्रचिन्हालिपी किंवा सुमारियनांची ती शरलिपी-त्या साध्या नव्हत्या,फार घोटाळ्याच्या व अवजड अशा त्या लिप्या होत्या.फोनिशियन लोक व्यापारी व व्यवहारी,त्यांना सुटसुटीत व झपझप लिहिता येईल अशी लिपी हवी होती.त्यांनी लिपी सोपी केली व अक्षरे बावीसच केली.हीच लिपी थोड्याफार फरकाने आजच्या बहुतेक सुधारलेल्या देशांतून सुरू आहे.


फोनिशियन लोक दर्यावर्दी व्यापार करीत होते. आशियातील कला व हत्यारे ते युरोपात आणत होते.

आफ्रिकेतील राष्ट्रांना देत होते.त्याच वेळेस खुष्कीने व्यापार करणारे कारवानांचे तांडे चीनमधील रेशीम व चिनी मातीची भांडी आणून त्यांऐवजी मध्य आफ्रिकेतील हस्तिदंत,स्पेन व ब्रिटनमधून जस्त,तसेच इतर देशांतून लोखंड, तांबे,पितळ,सोन्या-चांदीचे नक्षीदार दागिने, मसाले,मौल्यवान हिरेमाणके वगैरे घेऊन जात.हे कारवान पर्शिया व अरबस्तान यातील वाळवंटातून प्रवास करीत येत.तो जो पहिला वानरसदृश क्षुद्र मानव,त्याचे वंशज आता मोठ्यामोठ्या शहरांतून राहायला शिकले होते.सुंदर सुंदर वस्तूंनी स्वतःची शरीरे शृंगारावीत;स्वतःची घरे शोभवावीत,आपली मंदिरे भूषवावीत असे त्यांना वाटू लागले होते. चाकांचा व रथांचा शोध लागला होता.

रानटी घोडा माणसाळविण्यात आला होता.आता आपण वाऱ्यालाही मागे टाकू,असे मानवांना वाटू लागले.

संस्कृतीची परम सीमा आपण गाठली, असे त्यांना वाटले.मिळविण्यासारखे आता जणू काही राहिले नाही.

इजिप्तमधील ज्यूंचे ते महानिर्याण,सालोमनचे मंदिर,

टोजनयुद्ध व होमराची महाकाव्ये या गोष्टी आता फार जुन्या झाल्या,असे त्यांना वाटू लागले.मध्ययुगातील ती धर्मयुद्धे जशी आज जुनी पुरानी वाटतात, तसेच त्या लोकांना त्या प्राचीन युद्धांविषयी वाटे.


इजिप्त,असीरिया व बाबिलोन यांच्यात 'ज्यूंना आधी कोण गिळंकृत करतो',याची जणू आता स्पर्धा चालली होती.आणि सिथियन,इराणी व मीडीस हे इजिप्त,

असीरिया व बाबिलोन यांना गिळंकृत करू पाहात होते,पहिला मान मिळविण्यासाठी धडपडत होते.


ख्रिस्तशकापूर्वीच्या सातव्या शतकाच्या अंती आपण उभे आहोत.पृथ्वीवरची बलाढ्य राष्ट्रे एकमेकांचा निःपात करण्यात निमग्न आहेत असे येथे दिसत आहे.आणि अशा वेळेस पॅलेस्टाईनमधील एका लहान गावात एक तरुण वाढत होता.या साऱ्या लढाया म्हणजे मूर्खपणा आहे,असे तो म्हणू लागला होता.युद्धपराङ्‌मुख अशा त्या नवशांतिवाद्याचे नाव काय? त्या तरुणाचे नाव जेरिमिया…!


जेरिमियाच्या जीवनकथेभोवतालच्या सर्व कल्पनारम्य कथा आपण दूर करू या.


अर्वाचीन मानसशास्त्राच्या कठोर प्रकाशात हे जीवन अभ्यासू या.या जीवनातील भव्यता तोंडात बोट घालायला लावते,हा महात्मा आजही जिवंत असता,

तर आजच्या काळाच्या हजारो वर्षे तो पुढे आहे,असे म्हणावे लागले असते.अत्याचार शांतपणे सहन करा,

असे तो सांगे.त्याचा हा धीरोदात्त संदेश आजही बधिर कानांवरच पडेल,उपड्या घड्यावर पाणी ठरेल.

आजच्या या सुधारलेल्या विसाव्या शतकातही ती शिकवण झेपणार नाही,पचणार नाही. 


मग स्वत:च्या काळात तो एक वेडा मनुष्य म्हणून ठरला,यात आश्चर्य ते काय? 


त्याच्या समकालीनांनी त्याला वेडा म्हणूनच वागविले.खेड्यातील एक धर्मोपाध्यायाचा तो मुलगा होता.बापाचा धंदा त्याने पुढे चालवावा या हेतूने त्याला धर्माचे शिक्षण देण्यात आले होते.लहानपणी त्याने देशभर पसरलेल्या ज्या धर्मोपदेशकां विषयी पुष्कळसे ऐकले असेल,ते ज्यू प्रेषित मोठे चमत्कारिक व जहाल मताचे असतात,असे त्याने ऐकले.भटाभिक्षुकांना त्या प्रेषितांचा उपयोग नसे.ते प्रेषित म्हणजे भिकारडे जीव.गिरिकंदरांत ते राहात;कंदमुळे खात;ते बहुतकरून गरिबीत जन्मलेले असत. शेतकऱ्यांपैकी असत.कधी कधी ते गवतसुद्धा खात.फुले,मध यांवरही जगत.ईश्वराची इच्छा काय,ते आम्हीच फक्त सांगू शकू.असे लोकांना ते ओरडून ओरडून सांगत.जेरिमियाचा पिता एक अहंकारी उपाध्याय होता.

त्याचे नाव हिल्किया. त्या ज्यू प्रेषितांचे वरीलप्रमाणे चित्र त्याने आपल्या मुलासमोर अनेकदा रंगविले असेल. सुशिक्षित पॅलेस्टाईन मनुष्य अशा भिकारड्या फकिरांना आपल्या घरी कधी बोलावील,हे शक्य नव्हते.त्या ज्यू धर्मप्रेषितांचे विचार चमत्कारिक असत.एवढेच नव्हे; तर ते विचार ज्या भाषेत व ज्या पद्धतीने ते मांडीत,ती भाषा व ती पद्धतीही मोठी चमत्कारिक असे.


त्यांची वागणूकही विचित्र असे.उदाहरणार्थ,इसैआ जेरुसलेमच्या रस्त्यांतून दिगंबर फिरे.'या शहराने जे अपरंपार पाप केले आहे त्याचे प्रायश्चित म्हणून सर्व नगरवासियांना उघडे व्हावे लागेल;त्यांच्या अंगावर चिंधीही राहणार नाही,'हे पटविण्यासाठी तो तसा नग्न होऊन हिंडे.दुसरा एक प्रेषित,स्वतःची भाकरी खाण्यापूर्वी तो ती अपवित्र करी,मलीन करी व म्हणे,ईश्वर या राष्ट्राला असेच धुळीस मिळविणार आहे.यामुळे हे असले विचित्र प्रेषित उपहासास्पद होत असत.विशेषतः प्रतिष्ठित वर्ग तर या अवलियांची खूपच टिंगल करी.परंतु जेरिमिया जसाजसा वयाने मोठा होऊ लागला,तसतशी त्याला नवीन दृष्टी आली. वेड्याप्रमाणे दिसणाऱ्या त्या ज्यू प्रेषितांकडे तो निराळ्या दृष्टीने पाहू लागला.हे प्रेषित नेहमी गरिबांची बाजू घेतात, छळकांची बाजू न घेता छळल्या जाणाऱ्यांची घेतात,ही गोष्ट जेरिमियाच्या ध्यानात आली.


त्या प्रेषितांना न्यायाची तहान होती.जगात न्याय असावा, म्हणून ते तडफडत असत.त्यांचे धैर्य असामान्य असे.

राजाच्या राजवाड्यात शिरून प्रत्यक्ष त्याच्या तोंडावर त्याच्या जुलमांविषयी ते जळजळीतपणे बोलत.त्याची कानउघाडणी करीत.भय त्यांना माहीत नसे.

मंदिरातील पूजाविधींचे पोकळ अवडंबर त्यांना मुळीच खपत नसे.या दिखाऊ अवडंबराविरुद्ध त्यांचे बंड असे.ईश्वराला तुमच्या पूजाअर्चाची,तुमच्या प्रार्थनांची व यज्ञांची जरूर नाही असे ते उद्घोषित,

तुम्ही न्यायाने वागावे व सर्वांवर प्रेम करावे,तुम्ही दयाळू व मायाळू असावे,हीच ईश्वराची इच्छा आहे;प्रभू एवढेच तुमच्यापासून अपेक्षितो,असे ते सांगत.जेरिमियाला आणखी एक गोष्ट दिसून आली ती ही,की या धर्मप्रेषितांना शांतीचा ध्यास होता.ते धर्माचे प्रेषित निःशंकपणे पुढील भविष्यवाणी बोलत."असा एक दिवस येईल,की ज्या वेळेस तुम्ही तुमच्या तलवारी मोडून त्यांचे नांगर बनवाल;भाले मोडून त्यांचे विळे कराल;शेतीची व बगिच्यांची हत्यारे,अवजारे बनवाल."असे बोलणे म्हणजे साधी गोष्ट नव्हती. ती एक धीरोदात्त अशी गोष्ट होती.अती मंगल व गंभीर अशी ती वाणी असे.परंतु ते शांतीचे उपनिषद कोण ऐकणार? "एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राविरुद्ध कधीही तलवार उपसू नये, कोणत्याही राष्ट्राने युद्ध कसे करावे,ते अतःपर शिकू नये."ही त्यांची शिकवण.थोर उदात्त शिकवण.पुरेत आता युद्धे;पुरेत हेवेदावे;पुरेत द्वेषमत्सर;आता हल्ले नाहीत;वेढे नाहीत; रक्तपात नकोत;दुष्काळ नकोत;दुर्भिक्ष्य नको; रोग नकोत,साथी नकोत;हे त्या धर्मप्रेषितांचे निश्चित ध्येय होते.यासाठी त्यांना जगायचे होते. यासाठी मरायचे होते.जेरिमियाला स्पष्टपणे वाटे की,हे प्रेषित खरोखर दैवी प्रेरणेने संस्फूर्त झालेले आहेत.एक दिवस स्वतः

जेरिमियाही असाच संस्फूर्त कशावरून होणार नाही ? जसजसा तो या विचारांकडे अधिकाधिक लक्ष देऊ लागला,तसतसा तो जरा वेड्यापिश्यासारखा वागू लागला.त्याला स्वप्ने पडत.त्याला नाना दृश्ये दिसत.अद्भुत साक्षात्कार घडत.ईश्वर आपणास नवीन दर्शने घडवीत आहे;नवीन दृष्टी देत आहे, असे त्याला वाटू लागले.

ईश्वराची ही इच्छा जेरुसेलमच्या रहिवाश्यांना नीट समजावून सांगितली पाहिजे,असे त्याला वाटू लागले.दैवी उन्मादाने तो जणू मस्त झाला.थोर कवी,जहाल विचारसरणीचे क्रांतिकारक लोकनायक दिव्य प्रेरणेने असेच वेडे होत असतात.जेरिमिया प्रभुमत्त व शांतिमत्त झाला.प्रथमप्रथम तो लहानसहान वाईट गोष्टींविषयी बोले.बारीकसारीक गोष्टींवर तो टीका करी.आपले देशबांधव दुसऱ्या बलाढ्य राष्ट्रांचे कौतुक करीत आहेत,

असे त्याने पाहिले.त्या बलाढ्य राष्ट्रांप्रमाणे आपले राष्ट्र बलाढ्य व्हावे,असे त्याच्या देशबांधवांना वाटत होते.

जेरिमिया त्यांना म्हणाला,"दुसऱ्यांचे अनुकरण करू नका. स्वतःशी सत्यनिष्ठ रहा."पूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांप्रमाणे तोही लोकांची,क्षुद्र गोष्टीविषयीच्या त्यांच्या आसक्तीसाठी खरडपट्टी काढी.राजाला त्याच्या जुलमाविषयी स्पष्ट शब्दांत तो सांगे. एकदा तेथील मुख्य मंदिरात महोत्सव होता. मोठमोठे अधिकारी उपस्थित होते.स्वतः राजाही तिथे हजर होता.इतक्यात एकदम तो तरुण जेरिमिया तिथे आला.त्याचे केस पिंजारलेले होते;डोळे जणू तेजाने पेटलेले होते;तो एखाद्या उन्मताप्रमाणे हातवारे करीत होता;तो एकदम तेथील समारंभात घुसला व तेथील प्रार्थनांना त्याने अडथळा आणला.समजा,आत चर्चमध्ये प्रार्थना चाललेली असावी;आणि एखाद्या समाजसत्तावादी माणसाने तिथे येऊन धर्मावर तोंडमुख घ्यावे.मग तिथे किती गडबड व प्रक्षोभ होईल,त्याची कल्पना आपण करू शकतो.तोच प्रकार जरा अधिक तीव्रतेने तिथे झाला.ते धर्मोपाध्याय रागावले.राजा संतापला,इतर भक्तगणांना सात्त्विक चीड आली.काही वेळाने सारे स्तब्ध होते.जेरिमिया त्यांच्यावर वाग्बाणांचा वर्षाव करीत होता."चोऱ्या करता,खून करता, व्यभिचार करता;आणि ही सर्व पापे करून येथे माझ्यासमोर येऊन उभे राहता? हे माझ्या नावाने स्थापिलेले मंदिर,येथे का चोरांचा मेळावा जमावा? हे मंदिर की,चोरांच्या अड्ड्यांची जागा? तुम्ही असत्यवादी,लफंगे,खुनी आहात.मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सारे पापी आहात. 


पक्ष्यांचे घरटे जसे पिला-पाखरांनी गजबजलेले असते,तशी तुमची घरे पापांनी व वंचनांनी भरलेली आहेत.तुम्ही धष्टपुष्ट झाला आहात,लठ्ठ झाला आहात, धनकनकसंपन्न असे मान्यवर झाला आहात.परंतु अनाथ व पोरके तुमच्या नावाने खडे फोडीत असतात.जे गरीब आहेत,ज्यांना पदोपदी वाण आहे,असे सारे लोक तुम्ही पापात्मे आहात,

धर्ममर्यादांचे उल्लघंन करणारे आहात,याला साक्षी आहेत." "म्हणून प्रभूसमोर तुमचा नक्षा उतरवला गेलाच पाहिजे.तुमचा गर्व धुळीस मिळाला पाहिजे. वाळवंटातील एखाद्या प्रेताप्रमाणे हे तुमचे शहर होईल.उत्तरेकडून लांडगे येतील.आणि तुम्हाला फाडून खातील." (मानवजातीची कथा,हेन्री थॉमस, अनु-साने गुरुजी) 


अशी ही मर्मातिक टीका व निंदा कोण कोठवर सहन करणार? ते सारे धर्मपूजक जेरिमियाच्या अंगावर धावून आले. 'ठार करा याला', असे सारे ओरडले.राजा शांत होता.त्याने जेरिमियाच्या बचावासाठी काही केले नाही.

जमावाने मन मानेल तसे वागावे असे जणू तो सुचवत होता त्यांच्या इच्छेच्या आड तो नव्हता.


इतिहासातील पहिला युद्धविरोधी वीर जेरिमिया


राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..

२९/१/२४

आयुष्य एक पुस्तक-Life is a book..!

माणूस हा परिस्थितीचे अपत्य नसून परिस्थिती माणसाचे अपत्य असते.-बेंजामिन डिझरेली


मानवी आयुष्यात काही घटना प्रसंग माणसाला परत परत विचार करायला भाग पाडतात.तो घटना आणि प्रसंग काहीतरी नवीन शिकवणारा असेल तर तो 'जिवंत' विचार रात्र दिवस माणसाचा पाठलाग करतो. त्याला काही चैनच पडत नाही.


असाच एक प्रसंग मला विचार करण्याचे काम देवून गेला.

तो २६ जानेवारी २०२४ रोजी घडला. निमित्त होते.'मॅट्रिक फेल' विजय पुस्तकांच्या विश्वात' लोकमत या वृत्तपत्रात आलेला माझा लेख (वृत्तपत्र हे ज्ञानाचे स्तोत्र असते.) दुसऱ्या दिवशी मी नियमाप्रमाणे कामावरती गेलो त्या दिवशी हा लेख वाचून 'शिवप्रसाद कात्रे' कोल्हापूर वय ७१ वर्ष यांनी मला फोन केला पण कंपनीमध्ये फोन वापरायची परवानगी नसल्या कारणाने माझा फोन आठ तास बंद अवस्थेत असतो.मग त्यांनी शोधा शोध करून हा लेख लिहिणारे 'भरत बुटाले'यांना फोन लावून विचारले की मी विजय ला फोन लावत आहे.पण त्यांचा फोन बंद लागतो आहे.आपण दोघेजण त्यांना भेटायला जाऊ लेख खूपच छान लिहिला आहे.आणि सध्याच्या या जगामध्ये अशी लोक आपल्या आसपास आहेत याचंच आश्चर्य वाटतं आहे,आपण जाऊ लवकरच…. सायंकाळी मला  भरत बुटाले साहेबांचा फोन आला,व त्यांनी घडलेली घटना मला सांगितली.संध्याकाळी पाच नंतर त्यांचा तुम्हाला फोन येईल असं त्यांनी मला सांगितलं.


त्या दिवशी फोन आला नाही म्हणून मी त्यांच्याकडून त्यांचा नंबर घेतला व त्यांना फोन केला.त्यांनी मला मी टोप मध्ये कुठे राहतो,कुठे काम करतो ही विचारपुस केली.व भेटू असे म्हणाले.२६ जानेवारी दिवशी सुट्टी होती.

त्यांचा मला फोन आला मी भेटायला येतो म्हणून मी म्हणालो हो,यावेळी मी पुरुषोत्तम अग्रवाल यांचे कबीर कबीर पुस्तक वाचत होतो.वाट पाहत होतो त्यांच्या येण्याची आणि त्यांचा फोन आला. त्यांना मी सामोरा गेलो.त्यांना पाहिल्यानंतर 


खलील जिब्रान यांनी द प्रॉफेट या पुस्तकांत म्हटलेलं वाक्य आठवलं झाडाचं एक जरी पान सुकून पिवळं झालं तरी त्यामागे समग्र वृक्षाचं मौन जाणतेपण उभं असतं." 


मानवी जीवनातील सुखदुःखाच्या खाच खळग्यांनी भरलेलं तरीही समृद्ध आयुष्य जगलेले व्यक्तिमत्व माझ्यासमोर उभं होत.घरी घेऊन आलो आणि आमच्यात सुरू झाला एक जिता जागता संवाद …!


त्यांना वर्षाकाठी काही ठराविक रक्कम मिळते त्यामध्ये संपूर्ण वर्षं ते काटकसरीने जगतात. त्यामध्ये मोबाईल रिचार्ज,चार चाकी गाडीचा पेट्रोल खर्च,महिन्याचे किराणा व इतर संसारिक खर्च महिन्यासाठी आठ ते नऊ हजार रुपये एवढीच मर्यादा आहे.मग त्यांनी सांगितला आपला जीवनक्रम जगण्याचा,माझ्याकडे चार चाकी गाडी आहे.

म्हणून मला सर्वजण हा 'मोठा' माणूस आहे,याला काय कमी आहे,असं म्हणतात.हो माझ्याकडे मोठी गाडी आहे.

पण मी फक्त महिन्याला २०० किलोमीटर प्रवास करू शकतो.त्याच्यावर एक किलोमीटर सुद्धा नाही.

'ना'ईलाजाची चौकट आहे.मनात फार असणं आणि ते प्रत्यक्षात होणं यात खूप अंतर असतं.जर मला एखाद्या महिन्यात जास्त किलोमीटर प्रवास करायचा असेल तर मी अगोदरच्या महिन्यात कमी प्रवास करून ते पेट्रोल वाचवतो.व ते शिल्लक राहिलेले पेट्रोल पुढच्या महिन्यातील जास्तीच्या प्रवासासाठी वापरतो.पण तरीही मी मनमौजी आयुष्य जगतो.कमी पण जास्तीच ते व्यक्तीत्व मला खूपच आशावादी आणि आनंदी वाटले. नाईलाजाची चौकट असून सुद्धा आनंदी व समृद्धी आयुष्य जगता येतं हे मी शिकत होतो.


व्हाट्सअपचा आपण विचार न करता करत असणारा वापर आलेला कोणताही लेख अथवा संदेश न वाचता न समजून घेता फक्त पाठवण्याची स्पर्धा लागलेल्या स्पर्धेतील आपण एक स्पर्धक आहोत हेही आपल्याला कळेना झालं आहे.एका महत्वपूर्ण गंभीर असणाऱ्या संदेशामध्ये आपण इमोजी चा वापर करतो. जास्तीत जास्त इमोजी चा वापर करावाच असा काही लिखित नियम नाही.या इमोजी मुळे काय होतं,कळत न कळत आपल्याकडून चुकीची इमोजी त्या ठिकाणी टाकली जाते.

त्यामुळे त्या संदेशातील महत्त्वाचा गाभा व गर्भित अर्थ नष्ट होतो आणि त्याचं रूपांतर एका विनोदात होतं हे आपल्या गावीही नसतं. किती सरळ साधं तत्वज्ञान आहे की माणसांनी कसं काटेकोरपणे जगायला हवं.हे सर्व मी मन लावून श्रवण करत होतो.एक पुस्तक स्वतःहून मला पुस्तक समजावून सांगत आहे असं वाटत होतं.हे सांगत असताना त्यांनी एक घडलेला जिवंत प्रसंग सांगितला आणि माझ्या अंगावर सरर्कन काटा आला.तर तो घडलेला प्रसंग असा होता.जो त्यांना त्यांच्या कोल्हापुरातील काही मित्रांनी सांगितलेला होता.


एक हरीण आपल्या पाडसासोबत खेळत होतं त्यांच खेळणं म्हणजे निसर्ग समजून घेणं,जीवन जगताना कोणते नियम पाळणं याचं ज्ञान घेणं.खेळता खेळता हे पिल्ल एका कड्यावरून दहा-पंधरा फुट खाली पडलं,

तिथून काही अंतरावरच वाहनांची वर्दळ होती.त्यामुळे त्या आईला काहीच करता येत नव्हतं त्यामुळे आपल्या जीवाचं काहीतरी बर वाईट होईल.एखादं वाहन आपल्याला धडकेल यामुळे ती आई थोड्या दूर अंतरावर एका झाडाजवळ उभी होती,व कोणी तरी मदत करेल या आशेने डोळ्यात प्राण आणून ती वाट पाहत होती.बराच वेळ निघून गेला आणि संवेदनशील असणाऱ्या एका माणसाला ही आई दिसली.आणि त्याने गाडीतून उतरून आसपास बघितले.आणि त्याला हरीण का थांबले आहे?याचे उत्तर मिळालं तिच पिल्लू काही अंतरावर सुरक्षित होतं.थोडसं खरचटलं होतं.त्याला वर काढण्यासाठी दोरीची आवश्यकता होती पण त्याच्याजवळ दोरी नव्हती.त्याने मनापासून मदत करायचे ठरवल्यामुळे,त्याने मदतीसाठी हात केला आणि दोरी गाडीत असणाऱ्या एका दुसऱ्या गाडीवाल्याने गाडी थांबवली आणि त्या दोघांनी मिळून दोरी टाकून त्या पाडसाला वरती काढलं. हे सर्व ती हरीण आई पाहत होती.पिल्लाला वर काढल्यानंतर ते हरिण जवळ आले तिने पिल्लाकडे बघितलं त्या पिल्लानं आणि त्या हरिण असणाऱ्या आईने त्या दोघा उपकार करत्या लोकांच्या पायावरती डोकं ठेवून त्यांचे मनापासून आभार मानले.त्याचं ते हे अलौकिक कृत्य पाहून त्या दोघा लोकांच्या डोळ्यातही अश्रू आले.एका गाडीत त्या दोघांना घेऊन काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका घरवजा दवाखाना असणाऱ्या घरात त्या पाडसाच्या जखमेवरती औषध उपचार करून त्या दोघांना परत त्यांच्या मुळ ठिकाणी आणून सोडलं.ही घटना घडून बरेच दिवस झाले.काही कालावधी निघून गेल्यानंतर विसरण्याच्या सवयी नुसार ही घटना त्या उपचार करणाऱ्या माणसाकडून विसरली गेली.पण दुसऱ्या बाजूला ही घटना विसरली गेली नव्हती.बऱ्याच दिवसानंतर सकाळी त्या माणसाच्या दारावरती टकटक झाली.ती झालेली टकटक ही विचार करायला लावणारी होती.त्या व्यक्तीने दरवाजा उघडला आणि समोर पाहतो तर काय त्या माणसाचा विश्वास बसेना कारण त्याच्या अंगणामध्ये दहा ते पंधरा हरणांचा कळप उभा होता आणि त्या कळपाच्या पुढे खरचटलं म्हणून उपचार केलेले पाडस आणि त्याची आई होती. जणू काही ती सर्व सांगत होती की तुम्ही आमच्यावर जी दया दाखवली,आमच्यावर प्रेम केलं.व आमच्यावर वेळीच उपचार केले त्याबद्दल आम्ही आमच्या संपूर्ण कळपाच्या वतीने आपले व आपल्या माणुसकीचे आभार व धन्यवाद द्यायला एकत्रित आलेलो आहोत.हे पाहून त्या व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रू अखंडपणे वाहत होते.गोष्ट अजून संपलेले नाही.थोडं थांबा दोन मिनिटे डोळे बंद करा.आणि वर घडलेली घटना बंद डोळ्यासमोर पहा,तुम्हाला जो अनुभव येईल जी संवेदना येईल ती संवेदना,तो अनुभव म्हणजेच जगणं असतं.सर्वच माणसांनी जर ठरवून थोडं थोडं चांगलं वागलं तर एक दिवस संपूर्ण मानव जात चांगली बनेल.

युव्हाल नोआ हरारी यांनी सेपियन्स या पुस्तकात नोंद केली आहे.ती पुढीलप्रमाणे विज्ञानाच्या इतिवृत्तामध्ये सगळ्यांत प्राणघातक जात जर कोणती असेल तर ती आहे 'माणूस' ही नोंद त्या हरणांनी वाचलेली नाही.पण त्या हरणांच्या मदतीने आपण ती नोंद हळूहळू पुसू शकतो.निसर्ग,प्राणी पक्षी यांच्यासोबत जर आपण जात राहिलो. यांना जर समजून घेत गेलो.त्यांच्या संवेदना समजून त्यांना जर आपण दयाळूपणे वागवले.तर

कधीतरी भविष्यातील एखाद्या पुस्तकांमध्ये एक नोंद असेल ती पुढील प्रमाणे विज्ञानाच्या इतिवृत्तामध्ये सगळ्यात प्रेमळ जात कोणती असेल तर ती 'माणूस' यासाठी या क्षणापासून आपल्याला चांगला माणूस म्हणून जगायचं आहे.आता प्रश्न असा पडतो की खरचटलेलं पाडस आणि त्याच्यासोबत गेलेली आई ही गाडीतून गेले होते.मग तो हरणाचा कळप अचूकपणे कसा काय त्या उपचार करणाऱ्या उपकार करत्या माणसाच्या घरासमोर गेला.चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात,पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात.- सेंट ऑगस्टाइन ( ३५४ - ४३०) धर्मशास्त्र अभ्यासक आणि कॅथोलिक बिशप धर्मोपदेशक यांनी म्हटलेलं आहे.त्यांनी सांगितलेली गोष्ट संपली.

आणि इथूनच पुढे सुरू झाला माझा विचार करण्याचा प्रवास सुरू..! 'शिवप्रसाद कात्रे' हे त्या दिवशी आपल्या ८६ वर्षाच्या मित्राला भेटायला पेठवडगावंला गेले होते.

येताना मला भेटले यांच्या भेटीमुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणखी निकोप झाला.त्यांचे आभार व धन्यवाद…! शेवटी निसर्गामध्ये झाडाच्या फांदी वरती आपल्या घरट्यात पक्षी जे गाणं गातो.ते गाणं आनंदाचं गाणं असतं,तर दुसरीकडे सिमेंटच्या घरामध्ये पिंजऱ्यात असणारा पक्षी जे गाणं गातो ते गाणं असतं 'ना'ईलाजाचं..हिप्पोक्रेट्स यांनी फार अगोदरच सांगितले आहे."दोन गोष्टींची सवय लावा,

मदत करण्याची किंवा किमान,कोणतीही हानी न करण्याची…!" 


मला 'मॅट्रिक फेल' विजय पुस्तकांच्या विश्वात' या लेखापर्यंत घेवून जाण्यासाठी प्रयत्न करणारे डॉ.दिपक शेटे,माझी धर्मपत्नी सौ.मेघा गायकवाड,त्याचबरोबर माधव गव्हाणे (सॉक्रेटिस) यांचे आभार व धन्यवाद.

२७/१/२४

मानवी शरीराचे विच्छेदन.. Dissection of the human body

मध्ययुगाच्या शेवटी शेवटी इटलीमध्ये पुन्हा मानवी शरीराचं विच्छेदन करायला सुरुवात झाली.खरं तर ही सुरुवात भलत्याच गरजेपोटी झाली होती.त्या काळी इटलीमधली सालेर्नो आणि बोलोना ही विद्यापीठं गाजत होती.तिथे अनेकदा संशयास्पद मृत्यू झालेल्या केसेस सोडवण्यासाठी यायच्या.त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला हे कदाचित पोस्टमार्टेम केल्यानंतर योग्यप्रकारे कळू शकेल आणि त्यातून पीडित व्यक्तीला योग्य न्याय आणि गुन्हेगाराला योग्य शिक्षा मिळेल असं वाटायला लागलं.यामुळे मग कायद्याच्या या गरजेपोटी मानवी शवविच्छेदनाला (डिसेक्शनला / पोस्टमार्टेमला) परवानगी मिळाली.


अशा त-हेनं डिसेक्शनला परवानगी मिळाली तरी स्वतंत्र संशोधनाला अजूनही परवानगी नव्हती.त्या वेळची डिसेक्शन्स ही फक्त गेलन, ॲरिस्टॉटल आणि अविसेना यांनी मांडलेली तत्त्वं पुन्हा शिकण्यासाठीच केली जायची.

त्या काळचे शिक्षकही यांचीच पुस्तकं वाचून शिकलेले होते. आणि ते पुन्हा तेच शिकवण्यात धन्यता मानत होते.

त्यामुळे ज्या चुका या लोकांनी केल्या होत्या त्या न सुधारता चक्क अनेक पिढ्या तशाच चालत राहिल्या! ज्या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा ब्लॅक बॉइलसारख्या ज्या गोष्टी शरीरात कुठे दिसतच नाहीत त्यावर तसाच विश्वास ठेवला गेला त्या तपासायला किंवा सुधारायला अनेक शतकं कुणी धजावलंच नाही!याला थोडासा छेद देण्याचा प्रयत्न मोंडिनो दे लुझी (१२७५-१३२६) यानं केला होता.त्यानं स्वतः डिसेक्शन करून आणि काही आधीच्या पुस्तकांतून वाचून असं स्वतःचं ॲनॅटॉमीवरचं एक पुस्तक लिहिलं.ते त्या काळी गाजलंही.त्यातून त्याला 'रिस्टोअरर ऑफ ॲनॅटॉमी'

अशी पदवीही मिळाली होती.पण त्यानंही या पुस्तकात अनेक गोष्टी आधीच्या पुस्तकांतल्याच जशाच्या तशा छापल्यामुळे आधीच्या पुस्तकांतल्या काही चुकाही तशाच त्याच्या याही पुस्तकात पुन्हा आल्या.त्यामुळेच त्यानं या चुका पूर्णपणे टाळून बायॉलॉजीला नवं रूप दिलं असं म्हणता येणार नाही.पण या वेळेपर्यंत डिसेक्शन करून मानवी शरीराचा अभ्यास सुरू झाला हेच काय कमी म्हणायचं ? मोंडिनो दे लुझी याला खरं तर मध्ययुगातल्या अंधारात दीप घेऊन उभारलेला वाट दाखवणारा मार्गदर्शकच म्हणावा लागेल.

कारण मोंडिनोच्या उल्लेखाशिवाय ॲनॅटॉमीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही.मोंडिनो हा इटलीमधला प्रसिद्ध डॉक्टर,ॲनॅटॉमिस्ट आणि बोलोना विद्यापीठात सर्जरीचा प्रोफेसर होता. त्यानं ॲनॅटॉमीचं ज्ञान पुनरुज्जीवित केलं,

असं त्याच्या समर्थकांना वाटतं.त्यामुळे त्यांनी त्याला रिस्टोअरर ऑफ ॲनॅटॉमी अशी पदवीच दिली होती.काही ठिकाणी तर 'लिओनार्दो दा विंची' याच्यावरही मोंडिनोचा प्रभाव पडला होता असा उल्लेख आहे.पण काही लोकांना मात्र मोंडिनोनं प्रत्यक्ष डिसेक्शन अगदी कमी वेळा केलं असं वाटतं.अर्थात,हे म्हणणंही योग्य वाटावं असा तो काळ होता. कारण त्या काळी माणसाचं अभ्यासासाठी डिसेक्शन करायला परवानगीच नव्हती त्याकाळी फक्त खून झालेल्या लोकांचे डिसेक्शन करायलाच परवानगी होती.त्यामुळे ॲनॅटॉमीच्या अभ्यासावर फारच मर्यादा येत होती.त्यामुळे मोंडिनोनं कमी डिसेक्शन्स केली असावीत हाही कयास योग्यच आहे.


मोंडिनोबद्दल आणखीही एक गोष्ट सांगितली जाते.जेव्हा मानवी शरीराचं डिसेक्शन करायचं असेल तेव्हा तो एक सार्वजनिकरीत्या होणारा कार्यक्रमच असायचा.तेव्हा मोंडिनो स्टेजवरच्या एका खुर्चीत हातात गेलनचं पुस्तक घेऊन बसायचा आणि गेलनच्या पुस्तकाचा काही भाग मोठ्यानं वाचायचा.त्याचा एक सहायक प्रत्यक्ष डिसेक्शन्स करायचा आणि दुसरा मोंडिनो वर्णन करत असलेला भाग हातातल्या रुळानं दाखवायचा.अशा प्रकारे गेलननं सांगितलेल्या ॲनॅटॉमीचाच पुन्हा अभ्यास करणं किंवा गेलनची शिकवण ताडून पाहणं असा हा कार्यक्रम चालायचा.यात अर्थातच मोंडिनोला गेलनच्या चुकाही दिसल्या होत्या.पण गेलनविरुद्ध बोलणं किंवा लिहिणं म्हणजे त्या काळी पाठीवर मोठा दगड घेऊन प्रवाहाच्या अगदी उलट पोहण्यासारखंच होतं.तरीही मोंडिनोनं हे धाडस केलं.मोंडिनोनं 'अनाथॉमिया' (Anathomia) हे अनॅटॉमीवरचं पुस्तक लिहिलं.पण त्यानं उघड उघड गेलन आणि त्या आधीच्या वैज्ञानिकांविरुद्ध फार जास्त लिहिलं नाही.त्यामुळे त्याच्या पुस्तकात तीन प्रकारच्या चुका झाल्या होत्या.पहिली म्हणजे गेलन आणि आधीच्या लोकांच्या चुका जशाच्या तशा त्याच्या लिखाणात उतरल्या होत्या.दुसरी प्रकार म्हणजे गेलनला जे म्हणायचंय त्याचा मोंडिनोनं अनेकदा चुकीचा अर्थ काढल्यामुळे झालेल्या चुका आणि तिसरी प्रकार म्हणजे मोंडिनोनं गेलन आणि ॲरिस्टॉटल या दोघांना जे म्हणायचं आहे त्याचा सुवर्णमध्य काढायचा प्रयत्न केला,त्यात झालेल्या गफलती! अशा प्रकारच्या चुका होऊनही मॉडिनो गाजला ते त्याच्या स्वतः डिसेक्शन करून शोधून काढायच्या प्रयत्नामुळे.मोंडिनोमुळे प्रयोगात्मक बायॉलॉजीला पुन्हा नव्यानं सुरुवात झाली ही फार महत्त्वाची पायरी होती.


आता इटलीमध्ये बायॉलॉजी या विज्ञान शाखेचा पुन्हा नव्यानं अभ्यास सुरू झाला होता याला दोन कारणं होती,एक म्हणजे युरोपियन लोक मुळातच चुळबुळ्या आणि शोधक वृत्तीचे होते आणि आता ॲरिस्टॉटल आणि गेलन अशा पूर्वी होऊन गेलेल्या वैज्ञानिकांचं काम पुन्हा हाती लागल्यामुळे बायॉलॉजीवरच्या अभ्यासानं पुन्हा वेग घ्यायला सुरुवात केली होती.फक्त बायॉलॉजीच नाही तर या काळात जवळपास सगळ्याच कला,साहित्य,संगीत आणि विज्ञान या क्षेत्रात नव्यानं प्रगती व्हायला लागली होती.या काळाला २.२ पुनरुत्थान (रेनायसान्स) म्हणतात.त्यातच गंमत म्हणजे चित्रकारही बायॉलॉजीचा अभ्यास करायला लागले होते! (या मध्ये लिओनार्दो दा विंची यांनी काढलेले रेखाटन सुद्धा आहे.) रेनायसान्समध्ये चित्रकलाही नव्यानं बहरत होती.याच काळात कलाकार दोनमितीय कागदावर तीनमितीय चित्र कसं दाखवायचं हे शिकत होते.त्यासाठी ते मानवी शरीराचा बाह्याकार आणि आतली हाडं आणि स्नायू यांची रचना अभ्यासत होते.या सगळ्याचा परिपाक म्हणजे रेनायसान्समध्ये बहरलेले लिओनादों दा विंची,मायकेल अँजेलो, बेलिनी,एल ग्रिको,राफाएल असे जगप्रसिद्ध चित्रकार!आताच्या फायटर प्लेन्सना राफाएल हे नाव याच राफाएल या चित्रकारामुळे दिलं गेलंय..! 

त्यामुळे हे चित्रकारही चक्क हौशी ॲनॅटॉमिस्ट झाले होते! लिओनार्दो दा विंचीनं (१४५२ ते १५१९) अनेक डिसेक्शन्स करून मानवी शरीराचा अभ्यास केला होता.

त्यानं प्राण्यांचीही डिसेक्शन्स केली होती.यात महत्त्वाची गोष्ट अशी,की ॲनॉटॉमिस्टना कोणताही प्राणी किंवा माणूस यांच्या शरीराचं डिसेक्शन केलं,की त्यातल्या अवयवांचं ज्ञान व्हायचं,पण ते त्यांना जे दिसतंय ते इतरांना दाखवू शकायचे नाहीत. पण लिओनार्दो दा विंची किंवा इतर चित्रकारांना मात्र समोर दिसतंय त्या प्राण्याच्या किंवा माणसाच्या अंतर्गत रचनेचं हुबेहूब चित्र काढण्याचं कसब लाभलं होतं.त्यामुळे याचा फायदा चित्रकार आणि बायॉलॉजिस्ट्स या दोघांना तसेच चित्रकला आणि बायॉलॉजी या दोन्ही क्षेत्रांना झाला.


यातून लिओनार्दोनं माणसाचे डोळे आणि हात हे अवयव कसे काम करतात याचा सखोल अभ्यास केला आणि ते चक्क लिहून आणि  चित्र काढून ठेवलं.शिवाय,तो विमानही तयार करायच्या खटपटीत होता.त्यामुळे यंत्र,पक्षी, पंख यांचाही त्यानं अभ्यास केला होता.

त्यानं झाडाच्या जीवनचक्राचाही अभ्यास करून त्याची रेखाटनं काढली होती.पण दुर्दैवानं या गोष्टींचा विज्ञानाला त्या काळात काहीही फायदा झाला नाही,कारण त्यानं या गोष्टी आपल्या डायऱ्यांमध्ये सांकेतिक भाषेत लिहून ठेवल्या होत्या! ही सांकेतिक भाषा आता आता आधुनिक काळात आपल्याला काही प्रमाणात उकलली आहे.


ॲनॅटॉमी विकसित होत गेली तशीच नॅचरल हिस्ट्रीही विकसित होत गेली.पंधरावं शतकच मुळी नवनव्या गोष्टींच्या शोधांचं आणि एक्स्प्लोरेशनचं होतं.या काळात युरोपियन लोकांना आफ्रिका,अमेरिका आणि भारत या देशांचा शोध लागत होता.या ठिकाणची माणसं, त्यांची संस्कृती,आचार-विचार,या ठिकाणचे आधी न पाहिलेले प्राणी-पक्षी वनस्पती या सगळ्याच गोष्टींचा नव्यानं शोध लागत होता.सोळाव्या शतकातला इटालियन बॉटनिस्ट (वनस्पतिशास्त्रज्ञ) प्रॉस्पेरो अल्पिनी (१५५३-१६१७) हा खरं तर काही काळ इटलीतल्या पडुआ विद्यापीठात डॉक्टर आणि बॉटनिकल गार्डनचा प्रमुख व्यवस्थापक होता. थोडक्यात,तो आजच्या काळात असता तर बॉटनी डिपार्टमेंटचा एचओडी असला असता. यानंतर प्रॉस्पेरो अल्पिनी हा इजिप्तमधल्या कैरोमध्ये राजदूत म्हणून चार वर्षं गेला होता. कैरोमध्ये असताना त्याला पाम आणि खजूर या झाडांचा अभ्यास करायला मिळाला.या झाडांमध्ये नर झाड आणि मादी झाड अशी दोन वेगवेगळी झाडं असतात याची त्याला पहिल्यांदाच कल्पना आली! (आपल्याकडे पपईमध्ये नर आणि मादी अशी वेगवेगळी झाडं असतात.) नर पामच्या आणि मादी पामच्या फांद्या एकमेकींमध्ये मिसळतात तेव्हाच या झाडांना फळं धरतात किंवा यांना फळं धरण्यासाठी माणसानं एका फुलाचे पराग दुसऱ्या झाडाच्या फुलावर शिंपडावे लागतात,असं त्यानं लिहून ठेवलं आहे. 


याआधी थिओफ्रॉस्ट्सनं जवळपास दोन हजार वर्षांपूर्वीच हे सांगून ठेवलं होतं.पण हे सगळं ज्ञान मधल्या काळात लुप्त झालं होतं आणि आता झाडं ही नपुंसकलिंगी असतात असंच सगळे मानत होते.

पुढे वनस्पतींचं वर्गीकरण करताना हे तत्त्व कार्ल लिनियसला फार उपयोगी पडणार होतं.त्यामुळे आल्याच्या गटातल्या वनस्पतींना त्यानं अल्पिनीच्या सन्मानार्थ 'अल्पिनिया' हे नाव दिलं.यानंतर या अल्पिनीनंच कॉफीचं झाड आणि केळी पहिल्यांदा युरोपात नेली.कॉफी आणि केळी यांचं युरोपीय भाषांत वर्णन करणारा तो पहिलाच होता.त्यानंतर तिकडेही कॉफी हे पेय आधी औषध म्हणून आणि नंतर रिफ्रेशिंग पेय म्हणून प्रसिद्ध झालं.


त्यानं 'दे प्लांटिस इजिप्ती लायबर' (De Plantis Aegypti liber) हे इजिप्तमधल्या वनस्पतींवर पुस्तक लिहिलं.त्यात त्यानं इजिप्तमध्ये सापडणाऱ्या अनेक वनस्पतींची युरोपियनांना पहिल्यांदाच ओळख करून दिली.सजीवांच्या अभ्यासानं आता जवळपास कळसच गाठला होता.स्विस निसर्ग अभ्यासक कोनार्ड फॉन जेस्नर (Konard Von Gesner) (१५१६-१५६५) यानं त्यावेळी उपलब्ध असलेल्या सजीवांची जवळपास सगळीच माहिती संकलित केली.याला तर आजच्या भाषेत 'ह्यूमन सर्च इंजिन' किंवा 'गुगल' म्हटलं तरी कमीच पडेल इतकं मोठं काम त्यानं करून ठेवलं आहे.याला 'स्विस प्लिनी' असंच म्हटलं जातं.

कोनार्डचा जन्म १५ मार्च १५१६ या दिवशी स्वित्झर्लंडमधल्या झुरिच इथं अत्यंत गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच तो फार हुशार होता.त्याची तल्लख बुद्धी त्याच्या वडिलांना आणि शिक्षकांना लक्षात आल्यावर त्यांनी कोनार्डला नातेवाइकांपैकीच एका काकांकडे पाठवलं.ते काका औषधी वनस्पतींपासून वेगवेगळी औषधं तयार करायचे.इथेच त्याला वनस्पतींबद्दल प्रेम निर्माण झालं.त्यांनी आपल्या ओळखीनं थोड्याच काळात त्याला मोठ्या विद्यापीठात

अभ्यासासाठी पाठवलं.तिथेही त्यानं लवकरच अनेक भाषा शिकून घेतल्याशिवाय थिओलॉजी आणि वैद्यकाचाही अभ्यास केला.पण त्याचा कल मात्र वेगवेगळ्या ठिकाणी फिरून वेगवेगळे प्राणी आणि कोनार्ड फॉन जेस्नर वनस्पतींचे नमुने गोळा करून त्यांची माहिती संकलित करून ठेवणं याकडे होता.तो सजीवांचं निरीक्षण आणि अभ्यास करण्यात खूप वेळ घालवायचा. शिक्षणासाठी कोनार्ड अनेक गावं आणि अनेक विद्यापीठं फिरला.जिथं जाईल तिथून तो सगळंच शिकून यायचा आणि मुख्य म्हणजे तिथली माणसं जोडून यायचा आणि नंतरही त्या लोकांशी पत्रव्यवहार आणि संपर्क ठेवून असायचा! दुर्दैवानं त्याच्या वयाच्या १७ व्या वर्षीच त्याचे वडील काफीच्या लढाईत मारले गेले.आता पुन्हा शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. तेव्हा पुन्हा त्याच्या लहानपणचे झुरिचमधले एक शिक्षक पुढे आले आणि त्यांनी कोनार्डचं पालकत्व स्वीकारलं.त्यांनी कोनार्डच्या शिक्षणासाठी मदत केली.दुसऱ्या एका शिक्षकानं त्याला राहायला जागा दिली आणि अन्नपाण्याची व्यवस्था लावून दिली.नंतर तीन वर्षांनी त्यानं स्ट्रासबर्ग विद्यापीठात प्रवेश घेतला.तिथे तो हिब्रू भाषा शिकला.वयाच्या १९ व्या वर्षी त्याचं तितक्याच गरीब घरातल्या मुलीशी लग्न झालं. दुर्दैवानं त्याचे सासरे त्याला काहीही हुंडा देऊ शकले नाहीत.या वेळेपर्यंत त्यानं आपली एक ग्रीकोलॅटिन डिक्शनरी (शब्दकोश) प्रकाशित केली होती.त्याच्या जोरावर आणि काही मित्रांच्या मदतीनं बर्नमध्ये नव्यानंच सुरू झालेल्या एका विद्यापीठात एक तुटपुंज्या पगाराची नोकरी पत्करली.दारिद्र्याचे असे दशावतार चालू असतानाच एकीकडे त्याचं वेगवेगळ्या विषयांवरचं चौफेर वाचन,अभ्यास आणि संशोधन चालूच होतं.अर्थात,(सजीव, अच्युत गोडबोले अमृता देशपांडे)

वनस्पतिशास्त्रावर तर त्याचं जिवापाड प्रेम होतं.

तीन वर्ष बर्नमध्ये शिकवल्यानंतर कोनार्ड जेस्नर ब्रसेलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेला आणि १५४१ मध्ये डॉक्टर होऊन बाहेर पडला ! त्यानंतर त्यानं पुढे आयुष्यभर पोटापाण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय केला.परिस्थिती थोडी सुधारल्यावर त्यानं पुन्हा अनेक देश आणि अनेक प्रदेश पालथे घालायला सुरुवात केली.त्यात डोंगरदऱ्या,पर्वत आणि बर्फाच्छादित प्रदेशही होते.

जमिनीवरच्या वनस्पती आणि प्राणी तर तो गोळा करून अभ्यास करायचाच,पण बर्फाच्या नद्यांखाली लपलेले प्राणी आणि वनस्पतीही त्यानं शोधून त्यांची माहिती जमा करून ठेवली.अर्थात,हे काम सोपं नव्हतंच.हे करताना त्यानं माणसाला पूर्वी माहीत नसलेल्या अनेक वनस्पती आणि प्राणी यांची माहिती जमा केली आणि ती व्यवस्थित संकलित करून प्रकाशित केली. अनेक गोष्टी पहिल्यांदाच करणारा तो भन्नाट एक्सप्लोरर होता.त्यानं तपकिरी उंदीर, प्रयोगात वापरले जाणारे गिनीपिग्ज,तुर्की कोंबडा (टर्की),'सिलसिला' या सिनेमात आपण बघतो ती ट्युलिप्सची फुलं, माणसाच्या शरीरातला लालसर रंगाचा अडिपोज टिश्यू अशा एकमेकांशी दूरवरही संबंध नसलेल्या गोष्टी पहिल्यांदाच शोधून काढल्या ! शिवाय, युरोपियनांना तंबाखूचे परिणाम सांगणारा हा पहिलाच असामी होता.खरं तर इतकं करून थांबला असता तरी आज त्याचं नाव अजरामर झालं असतं.

पण त्यानं पुढे तर अजस्र म्हणता येईल असंच काम केलं. यानंतर त्यानं 'बिब्लिओथिका'(Bibliotheca) नावाचं आतापर्यंत होऊन गेलेल्या सगळ्या लेखकांची नावं आणि त्यांची संक्षिप्त माहिती सांगणारं पुस्तक लिहिलं.१५४५ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकात त्यानं जवळपास चार हजार पुस्तकं आणि शेकडो लेखकांची माहिती जमा करून लिहिली होती. यावरूनच त्याला लेखनाची,

लेखकांची आणि ज्ञानाची किती कळकळ होती ते कळतं.०४.१२.२३ या लेखातील पुढील भाग..




२५/१/२४

एक प्राणप्रतिष्ठापना… A Prana Pratishtanam...

काही वेळा काही लोकांच्या आयुष्यात हे असं का घडलं असावं ? याचं खूप डोकेफोड करून सुद्धा उत्तर मिळत नाही... ! एखादा ढाण्या वाघ पिंजऱ्यात बंद असतो... 

या वाघात धम्मक असते,तरीही बंदिस्त पिंजऱ्यात त्याला जेरबंद केलं जातं... तो अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत असतो...! आणि कोणीही चिडूक मीडुक मग बाहेरून त्याला खडे मारत किंवा काठीने ढोसत असतं....


एखाद्या गरुडाला पिंजऱ्यात बंद करून ठेवतात... आकाशातला राजा हा .... पिंजऱ्यात बंद असतो आणि पिंजऱ्या बाहेरून मग कावळे सुद्धा याच्यावर शिरजोर होतात... ! कोणत्या परिस्थितीमुळे किंवा चुकीमुळे,त्यांची अशी ही अवस्था झाली असेल काही कळत नाही...! जे सध्या पिंजऱ्यात बंद आहेत,असे अनेक वाघ आणि गरुड मला या महिन्यात रस्त्यावर भेटले... ! 


काही जणांसाठी हा पिंजरा म्हणजे 'परिस्थिती'

असते..काहींसाठी 'त्यांच्या घरातलेच लोक'आणि काहींसाठी मात्र त्यांच्याच हातून'नकळत झालेल्या चुका "..! 


अशाच पिंजऱ्यात अडकलेले हे तीन जण...


यापैकी एक आहे महाराष्ट्राबाहेरचा,याचं बऱ्यापैकी शिक्षण झालंय,अतिशय उत्तम इंग्लिश बोलतो... इतर दोघे महाराष्ट्रातले...


उद्भवलेल्या परिस्थितीमुळे म्हणा,घरातल्या लोकांमुळे म्हणा किंवा स्वतःच्या चुकांमुळे म्हणा... परंतु आज हे रस्त्याकडेला जीवन जगत आहेत दुसऱ्यांच्या दयेवर...! 


यांपैकी दोघांच्या पायाला अति गंभीर जखमा आहेत,एकाला तर पाय कापायचा सल्ला मिळाला... ! 


थोडफार जे उरलंय ते हि कापुन टाका,हा सल्ला पचवायला त्याच्याच जन्माला जायला हवं...!

ट्रीटमेण्ट घ्यायला पैसे नाहीत,आणि सहनही होत नाही,अशा अवस्थेत रस्त्याबाजुला थंडीत मुकाट पडून राहायचं...! 


वेदनेचा आणि असहाय्यतेचा कळस आहे हा...


कळस नेहमी मंदिरावरच शोभून दिसतो... परंतु वेदनेचा कळस,माणसाच्या डोक्यावर बसला की तो माणूस भेसुर दिसतो...! 


तिसऱ्याची कहाणी थोड्याफार फरकाने अशीच...


वाघाच्या डोळ्यात वेदनेचं पाणी पाहिलंय का कुणी ? 


आई दुखतंय गं ... म्हणून जमिनीवर गडाबडा लोळणारा वाघ पाहिलाय का कुणी ? 


पंख तुटलेला गरुड सरपटत आपल्याजवळ केविलवाणे पणे येताना पाहिलाय का कोणी ? 


हे पाहणं सुद्धा खूप वेदनादायी असतं... !!! 


वेगवेगळ्या वेळी,वेगवेगळ्या स्थळी,माझी या तिघांशी भेट झाली... तिघांचेही पिंजरे उघडून;आधी जखमांवर फुंकर मारली,त्यानंतर मलमपट्टी केली... मनाला उभारी येईल असं बोलत गेलो…कुणी असो नसो,मी आहे तुमच्यासोबत हे त्यांच्या मनावर बिंबवत गेलो....! शेवटी स्वतःच्या पायावर तिघांना आत्मविश्वासाने उभं रहायला आज जानेवारी २०२४ उजाडावा लागला...! 


मारलेल्या फुंकरीने तीन विझणारे निखारे पुन्हा उजळले...! 


इथं,मला माझी चुलीवर स्वयंपाक करणारी आजी आठवते... 


चुल विझली विझली,म्हणता म्हणता,

जिवाचा आकांत करून म्हातारी,इकडून तिकडून लुगडं सावरत,फुंकर मारायची,चुलीतल्या विझणाऱ्या लाकडांना ती इकडे तिकडे अशी हलवायची, जणू त्यांना जागं करण्याचा प्रयत्न करायची…!


फुंकर मारताना धूर व्हायचा,हा धुर तिच्या नाका तोंडात जायचा,तिला ठसका लागायचा, आजूबाजूची राख डोळ्यात जायची,एका हाताने पदर घेऊन ती डोळे पुसत राहायची,पण फुंकर मारणं थांबवायची नाही..... लाकडं पेटेपर्यंत म्हातारी मागं हटायची नाही....


एकदा का मात्र चुल पुन्हा ढाण ढाण पेटली,की पदराने डोळे पुसत,गालातल्या गालात ती विजयी वीराप्रमाणे हसायची... यावेळी चेहऱ्यावरची प्रत्येक सुरकुती न सुरकुती उल्हसित व्हायची.... ! 


चूल पेटली... त्यात एवढा कसला आनंद ??? 

हे त्यावेळी मला न उलगडलेलं कोडं...


आज कळतंय,ते समाधान चूल पेटवण्याचं नव्हतं.हे समाधान होतं;विझणाऱ्या कुणाला

तरी पुन्हा पेटून उठताना पाहण्याचं...!!! 


आज हे तिघेही वैद्यकीय दृष्ट्या पायावर उभे आहेत... 


पण नुसतंच पायावर उभं राहणं महत्त्वाचं नसतं... महत्त्वाचं असतं ते पुन्हा चालायला सुरुवात करणं...आणि आपण चालताना,वाटेत पडलेल्या दुसऱ्या कुणालातरी उभं राहायला मदत करून,सगळ्यांनी मिळून एकत्र धावणं....! 


आयुष्याची हिच तर खरी वारी... ! 


दुसऱ्याला उठवून पळायचे,म्हणजे स्वतःच्या पायात धमक हवी...मनगटात जोर हवा... 


या तिघांनाही आता स्वतंत्र व्यवसाय टाकून दिले आहेत. 


एकाला इमिटेशन ज्वेलरी घेऊन दिली आहे, वजन काटा घेऊन दिला आहे,ज्या रस्त्यावर, जिथे तो निपचीत पडला होता,तिथेच तो आता ज्वेलरी विकतो...वजन काट्यावर लोक वजन करून त्याला पैसे देतात....माझ्यासाठी तो स्वतःच आता एक दागिना झाला आहे...! 


चर्मकारीचे सामान घेऊन,दुसरा आता पुढील आठवड्यात,बूट पॉलिश करून,चपलांबरोबर स्वतःच्या फाटलेल्या आयुष्याला सुद्धा टाके घालून फाटकं आयुष्य सावरेल. 


तिसऱ्याला आज २२ जानेवारी २०२४ रोजी एक हात गाडी घेऊन दिली आहे.भंगार गोळा करून, विक्री करण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला आहे.समाजातील कित्येक जण अडगळीत पडलेल्या आपल्या आईबापांना,भंगार समजून उकिरड्यावर फेकतात…

आम्ही ते उचलतो.या अर्थाने मी ही एक भंगारवालाच की...! 


माझ्या या मुलाला भंगार गोळा करताना,असे कोणाचे आई-वडील सापडू नयेत इतकीच माझी प्रार्थना... ! परवा त्यांच्या बोलण्यात आलं,'आम्हाला उठवून कुणीतरी उभं केलं, आयुष्यात इथून पुढे आमच्या परीने आम्ही सुद्धा कोणालातरी मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू'.माझ्यासाठी हा आनंदाचा परमोच्च क्षण होता... !!! 


दिवा पेटवणे हि झाली प्रकृती.... परंतु दिव्याने दिवा पेटवणे हि झाली संस्कृती...! 


आज २२ जानेवारी २०२४ उजाडला...


सकाळपासूनच मंगलमय वाद्यांचे सूर कानावर पडत होते... तिकडे एक नगरी सजली होती, इकडेही एक नगर सजले होते... तिकडे हर्ष आणि उल्हास होता,

तसाच इकडेही हर्ष आणि उल्हास होता... तिकडे प्राणप्रतिष्ठापना होत होती आणि इकडेही वेगळ्या पद्धतीने आमची प्राणप्रतिष्ठापना झाली होती...!


दिनांक २२ जानेवारी २०२४


डॉ.अभिजीत सोनवणे,डॉक्टर फॉर बेगर्स

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर..!