* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जुलै 2025

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३१/७/२५

पक्ष्यांच्या जन्माचे गुढ / The mystery of bird birth

आपल्या पिलांना भरवत पक्षी दिवसादिवसांनी त्यांना वाढवत असतात.परंतु मौज कशी ते पहा.चातक व पावशा हे कोकिळ कुळातील पक्षी मात्र आपली अंडी कसाई-खाटिक-पक्षी व सात बहिणीच्या घरट्यात घालतात.ते मोठे चतुर असतात. एका घरट्यात एकच अंडे ठेवतात.
कसाई पक्षी केवढे क्रूर- पण देवाची करणी पहा.हा खाटिक पक्षी पावशा पक्ष्याच्या पिलाच्या रूपाने जगत असतो.सात बहिणी चातकाच्या पिलावर मायेची पाखर घालतात.कटुकर्कश कोल्हाळ माजविणाऱ्या पक्ष्यांत ह्या सुस्वर गाणाऱ्या,अरण्यातील भाटाचा जन्म व्हावा हा केवढा चमत्कार.

हा सृष्टीतील चमत्कार घडताना स्वयंभू जलाशयाचा प्रकाश आसमंतात पडलेला असतो.वरून धो-धो पाणी वर्षत असते.इतर वेळी सारी झाडेझुडपे मेघांच्या प्रावरणात लपलेली असतात.या पक्ष्यांच्या घरट्यांवर हिरव्या-निळ्या दाट पानांचे छत्र उभे असते.टिटवी क्षणाक्षणाला धोक्याची सूचना देत असते.कोतवाल पक्ष्यांचा जागता पहारा असतो.

पळसाची सारी झाडे-झुडपे सातसाईंच्या रूपाने बोलू लागतात.एक-दोन-तीन अशी एकामागून एक सहा-सात उदी-भुऱ्या रंगाची,मैनेच्या आकाराची,लांब शेपटीची ही पाखरं झाडाखाली उतरू लागत,चक्-चक् करीत,किलबिल करीत आणि एकाएकी कोल्हाळाने सारे रान उठून जाई.जमिनीवरून पुन्हा जडपणे उडत,दुसऱ्या झुडपात शिरून दिसेनासे होत.

एकदा एक जोडी एकमेकांना बिलगून फांदीवर बसली होती.ओली पिसे फुलवून,पिसातून चोची फिरवत,एका तालात शेपटी वरखाली हलवत,एकमेकांच्या पंखांत-चोचीत हळुवार चोच घालीत चक् चक् आवाज करीत. गोंडी भाषेत त्यांना खेवा म्हणतात.खेव म्हणजे आलिंगन.

फार वर्षांपूर्वी त्या एकत्र राहणाऱ्या सात पाखरांचे मोठे गूढ वाटे.सातच का ?.सहा का नाही? मग सातवा कोण? नंतर कळले की,त्यात चारपाच त्यांची पिले असतात.एकूण ती क्वचितच सात असतात.परंतु सात ही संख्या भारतीयांना फार प्रिय.परंतु इंग्रजांनीदेखील आपलेच अनुकरण केले.तेही ह्या पक्ष्यांना 'सेव्हन सिस्टर्स' म्हणतात.ती सारी पिले विलक्षण स्वरात केकाटायची.कोकणात तर त्यांना कोकाट्या-जंगल बँबलर म्हणतात.

परंतु त्या दिवशी त्यांच्या केकाटण्याला चातकाचे एक शावकही साथ देत होते.डोक्यावर नुकतीच फुटू लागणारी शेंडी-पंखावर पांढरा शुभ्र ठिपका.किंचित लांब शेपटी,शेपटीवरचे पांढरे ठिपके मात्र दिसत नव्हते. नंतर क्षीण स्वरात पी-पीचा आवाज करीत त्या व्रात्य पिलांपासून दूर एका फांदीवर जाऊन बसले.
बराच वेळ त्याचे पी-पी-पी चालले होते.शेवटी त्या पिलांच्या आईला दूर बसलेल्या त्या अजाण पक्ष्याची कीव येऊन तिने त्याच्या चोचीत चारा भरला.पंख थरथरवत पी-पी-पी करीत चोच वासून त्याने तो चाराघेतला. बाकीच्या पोरांनी पुन्हा एकदा केकाटत तिच्याभोवती गदारोळ घातला.ती कावून जी उडाली तशी ती पिले तिच्या मागोमाग पळसाच्या झुडपात दिसेनाशी झाली.चातकाचा परिचय झाला तो कालिदासाच्या काव्यातील चातक व्रताने.त्याच्या दर्शनाला मी उत्सुक असूनही तो कधी फारसा दिसायचा नाही.समोर नवेगावचे विस्तीर्ण जलाशय त्याच्या काठची सुंदर वनराजी.त्या बांधावरून फिरत असताना एकमेकांचा पाठलाग करीत असलेले चातक दिसले.केवढे देखणे रूप त्यांना लाभले होते.लांब काळ्याशार शेपटीवरचे पांढरे शुभ्र ठिपके.ते उडताना मोठे अलौकिक वाटायचे. या त्यांच्या वैशिष्ट्यांवरूनच त्यांची ओळख पटावयाची. इतर वेळी ते बांधावरच्या मोहावर बसलेले असायचे तर कधी आंब्यातून मधुर आवाजात गायचे.पिंपळाच्या मंद सळसळणाऱ्या पानांना संथ गतीत साथ द्यायचे. जलाशयावरील लाटा किनाऱ्यावर आंदुळायच्या.त्या आनंदकल्लोळात पियु-पियु-पी-पी-पियु-पी-पी-पियु मोठे अद्भुत वाटायचे.


आकाशातील मेघांची छाया जलाशयात पडून तो जलाशय अधिकच गहिरा-खोल-निळा विस्मयजनक दिसायचा.वर पाण्याने भरलेले ढग आहेत.खाली विस्तीर्ण जलाशय आहे.तरी चातक तहानेलाच आहे.
त्यांचा पियु-पियूचा नाद अरण्यात भरला आहे.
देवाने त्यांची प्रार्थना ऐकली वाटते.नंतरच्या काही दिवसांत सतत वर्षाव होत होता. तुडुंब भरलेल्या जलाशयाचे पाणी बांधावरून वाहू लागले.रामटेकवर आले ते आफ्रिकेतून.तेथून मेघदूताबरोबर येणाऱ्या या पक्ष्यांची वीण इथे नवेगाव बांधावर होते.

सात बहिणीचे घरटे हेरून चातकाची मादी त्यात एखादे अंडे ठेवते.कदाचित सात बहिणीचे एखादे अंडे बाहेरही टाकून देत असावी.भारतीय साहित्यात अलौकिकत्व पावलेल्या ह्या पक्ष्यांची प्रजनन भूमी इथं या बांधावरच आहे.

कसाई पक्ष्यांची श्रीक्-श्रीक् तर कधी चीर्-चीर् चाललेली असावयाची.बुलबुलाएवढे लांब शेपटीचे, माथ्यावर काळी पट्टी असलेले हे पक्षी एखाद्या पापाचे ओझे वाहून न्यावे तसे जडपणे इकडून तिकडे झाडांच्या शेंड्यावरून उडताना दिसत.तरुशिखरावर बसून त्यांची श्रीक्-श्रीक् चाले.त्यांची पिलेही आता जाणती झाली होती.चिमणीएवढी-करड्या,उदी रंगाची,कुशीत किंचित ठिपके असलेली ही पिले कित्येकदा स्वतंत्रपणे चरताना दिसत.सारा परिवार एकत्र आला की कसला विलक्षण कोल्हाळ करायची.पंख थरारून,अंगाचा कंप करीत 

आपल्या मातापित्यांकडून चारा मागावयाची.परंतु त्यांना पोटच्या पिलाकडे पाह्यला कुठला वेळ ! त्यांचा सारा वेळ पावश्याच्या पिलाला भरविण्यात जाई.पावश्याची मादी मोठी चतुर.प्रत्येक घरट्यात ती एकच अंडे घाली.तिची इतर सारी पिले बांधावरच मोठी होत होती.इतर साऱ्या पिलांची भूक घेऊन तिप्पट आकाराचे पावश्याचे हे पिलू तिच्या कुशीत जन्माला आले होते.दिवसभराचा सारा वेळ ह्या खादाड पिलाला भरविण्यात जाई.एरवी दुसऱ्या पक्ष्यांची अंडी,पिले निर्दयपणे खाणाऱ्या या खाटकाला ही कुठून दया आली ?

आकाशात ढग आले आहेत अधूनमधून रिमझिम पाऊस येतो.बांबूची वने आता सुस्नात होऊन त्यांना वैडूर्य मण्यांचे सौंदर्य प्राप्त झाले आहे.आकाशाला भिडणाऱ्या उंचच उंच सुसरीच्या पाठीसारखी साल असलेले ऐन वृक्षात लपलेले पपिया-पावशा-गात आहेत.दिव्याने दिवा लावावा तसा त्यांच्या आवाजाने सर्वत्र आवाज लागत होता.गव्याचा मागोवा घेत भटकत असताना त्या खोऱ्यात पपियाचा आवाज भरून राहिला होता.चंद्राच्या आड दाट व पाण्याने भरलेले ढग आल्यावर धड अंधार ना प्रकाश असे झावळे झावळे झाले आहे.अशा या रात्रीच्या वेळी पपिया पिया कहा है, पिया कहा है अशा स्वरात गाऊ लागतो.एखाद्या दर्दभरी रागासारखे ते गाणे मनाची बेचैनी वाढविणारे-मनाला अनामिक हुरहूर लावणारे असते.(जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,प्रकाशक मकरंद भास्कर कुलकर्णी,साहित्य प्रसार केंद्र, सिताबर्डी)


लहानपणी नंदीवाला घरापुढे येऊन गुबू गुबू गुबू वाजवत उभा राही.तोच तो आवाज.आता सूर्योदयापूर्वी भारद्वाज पक्षी करीत असलेल्या आवाजाने मी जागा होई. अनेकदा मी लपतछपत हा विलक्षण आवाज तो काढतो कसा हे पाहण्याचा प्रयत्न करीत असता मान खाली वर हलवून चोचीचा जवळच्या फांदीवर स्पर्श करीत त्या अद्भुत ध्वनिलहरी बाहेर येत.चोच कधी उघडलेली मी पाहिली नाही.बंद चोचीतून तो कसा आवाज काढत असावा,याचे आश्चर्य वाटे.ते अद्भुत स्वर कंठातून कसे बाहेर येत,हे समजत नसे.कधी कधी तो वानरासारखा हुप्प-हुप्प-हुप्प आवाज काढी.त्या दूर खोल दरीत त्याचा आवाज भरून राही.

पण आज आणखी वेगळ्याच आवाजाची किमया त्याने दाखविली.खकु-खकु चक्-चक् असा पळसाच्या दाट पानातून आवाज येत होता.येणारा आवाज आगळा वाटल्याने मी त्या आवाजाचा मागोवा घेतघेत जवळ जाताच तो अकस्मात पंख फडफडवत वेगाने उंच सागाच्या सुकलेल्या डहाळीवर जाऊन बसला.
दुसरे बसले खालच्या फांदीवर.मधूनच ती चीर-चीरचा आवाज करी तर नर खकु खकुचा स्वर काढी.त्याने जीवजीवक पक्ष्याच्या शेपटीप्रमाणे असलेल्या पुच्छाची पिसे एखाद्या सुंदर जपानी युवतीच्या हातातील नाजूक-मुलायम पंख्यासारखी पसरली होती.पंखांची तपकिरी वर्णाची पिसे हळुवारपणे उन्हात पसरून तो त्या पिसांत चोच घालत होता.त्याच वेळी त्याच्या आवाजाची किमया ऐकू येत होती.तो मादीचा अनुनय करीत होता.इतक्यात त्यांचे सागाच्या रुंद पानात ते बांधत असलेले घरटे दिसले.

गूढ आणि अद्भुत असे. सौराष्ट्र व कर्नाटक देशात ह्या पक्ष्यांच्या घरट्याविषयी गूढ लोककथा आहेत.ह्या पक्ष्यांच्या घरट्यातील मुलायम अस्तर संजीवनी काड्यांनी केलेले असते.त्या खोप्यातील काड्या जलप्रवाहात फेकल्या की इतर काड्या प्रवाहाबरोबर वाहून जातात.मात्र संजीवनी काड्या प्रवाहाविरुद्ध वाहू लागतात.ह्या अलौकिक कथेचा उगम कसा झाला हे माहीत नाही.विष्णुपुराणात भारद्वाज मुनींच्या जन्मकथेत ह्या पक्ष्यांचा संबंध असल्याने त्याच्या घरट्याबद्दलही हा प्रवाद असावा असे वाटते.ह्या पक्ष्याचे दर्शनही चास पक्ष्याप्रमाणे शुभ मानले जाते.

२९/७/२५

‘जावा मॅन'चा शोधकर्ता’-’Inventor of Java Man’

पाडांगच्या आजूबाजूच्या भूप्रदेशात फारसे पुराजीव मिळण्याची शक्यता नाही हे कळल्यावर युजीनने सुमात्राच्या राज्यपालांना आर.सी.जोएसनना निखळलेल्या मानवी दुव्याचं महत्त्व सांगणारं एक पत्र पाठवलं.त्यांनी त्याला मदत करायचं आश्वासन दिलं. त्याचबरोबर,युजीनची बदली पाजाकोंबोच्या पठारी प्रदेशात करावी,असं त्याच्या वरिष्ठांना कळवलं. पाजाकोंबो ही एक छोटी छावणी होती.त्यामुळे युजीनला पुराजीव शोधायला भरपूर वेळ उपलब्ध होता. इथेच त्यांच्या मुलाचा जन्म झाला.अ‍ॅना मात्र तिथे कंटाळली.कारण तिथे इतर कुठलीही युरोपीय स्त्री नव्हती.युजीन मात्र खुषीत होता.कारण लिडाअडयेर इथे त्याला बरेच पुराजीव सापडू लागले होते.त्यात बरेचसे कपींचेही होते.


त्यामुळे लवकरच मानवी अवशेषही सापडणारच याबद्दल युजीनला खात्री वाटू लागली होती.दरम्यान,युजीनचा एके काळचा सहकारी आणि मित्र मॅक्स वेबर एका शास्त्रीय मोहिमेवर पूर्वेकडील डच वसाहतींमध्ये येऊन गेला होता.त्याने डच प्रशासनाला युजीनच्या संशोधनाचं महत्त्व पटवून दिलं.त्यामुळे हॉलंड सरकारने आदेश काढला, की डच वसाहतींच्या प्रशासनाने युजीनला संशोधनासाठी त्याच्या पगाराव्यतिरिक्त दरमहा २५० गिल्डर द्यावे.दुसरीकडे,द्युबुआ कुटुंबीय अधूनमधून हिवतापाने आजारी पडायला लागले होते.युजीन तर सतत रानावनात फिरत असल्याने एकदा मृत्यूचं दार ठोठावून परतला होता.पाडांग पठारावरचे आदिवासीजन त्याच्या मोहिमांकडे संशयाने पाहू लागले होते.आपल्याला सुमात्रा बेटावर आता नवं यश मिळणं शक्य नाही असं युजीनला वाटू लागल्याने त्याने राज्यपालांना विनंती करून जावा बेटावर बदली करून घेतली होती.२४ नोव्हेंबर १८९० या दिवशी युजीनला बेडोइंग ब्रोयबस इथे मानवी जबड्याच्या खालच्या बाजूचा काही अंश मिळाला.मे १८९२मधे ट्रिनिल नावाच्या खेड्याजवळ युजीनने उत्खनन सुरू केलं.तिथे खणता खणता एका मजुराची कुदळ एका झाडावर आदळली. प्रत्यक्षात ते आदिमानवाच्या मांडीचं हाड असावं असं युजीनला खात्रीपूर्वक वाटत होतं.त्याला जावा बेटावर आदिमानवी स्त्रीचे तीन मानवी जीवाश्म मिळाले होते.


संशोधनाच्या कामात हळूहळू अपेक्षित गोष्टी हाती लागत असताना एकीकडे युजीनच्या संसाराची मात्र वाताहत व्हायला सुरुवात झाली होती.३० ऑगस्ट १८९३ ला अ‍ॅना तिसऱ्यांदा बाळंत झाली,पण ती मुलगी मृतावस्थेत जन्मली.अ‍ॅना तो मृतदेह कवटाळून बसली. ती मुलगी जिवंत आहे,असं ती सर्वांना सांगत होती.तो मृतदेह पुरल्यानंतर ती भ्रमिष्ट बनली. रात्री जंगलातून वाऱ्याचा आवाज येऊ लागला की 'माझी मुलगी मला बोलावते आहे' असं म्हणत ती बंगल्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असे.तिला त्यामुळे कोंडून ठेवणं भाग पडू लागलं. यूजीन आणि त्याच्या दोन मुलांवरही यामुळे एक विचित्र सावट पसरलं.या सावटाची छाया दूर करण्यासाठी मग एका स्थानिक मांत्रिकाची मदत घेण्यात आली.युजीन आणि अ‍ॅना हे आता आपापल्या वेगळ्याच विश्वात वावरू लागले.त्यांच्यातलं पती-पत्नीचं नातं संपलं होतं.युजीनने 'पिथेकैथ्रॉपस इरेक्टस' ऊर्फ हरवलेल्या दुव्यासंबंधीचा आपला प्रबंध लिहून पूर्ण केला.प्रबंधाच्या प्रती त्याने तत्कालीन प्रमुख पुराजीव शास्त्रज्ञांकडे पाठवून दिल्या. जगभरातून त्याच्यावर स्तुतीचा वर्षाव झाला. १८९४ अखेर त्याला भारतास भेट देण्याचं आमंत्रण मिळालं.


भेटीदरम्यान कलकत्त्याच्या वस्तुसंग्रहालयातील भारतीय जीवाश्मांचा साठा बघण्याची परवानगीही मिळाली.अ‍ॅना व मुलांना जावामधेच ठेवून युजीन भारत भेटीवर निघाला.

जानेवारीच्या मध्यास तो कलकत्त्याला पोहोचला.फ्रँक फिन आणि अ‍ॅलन अल्कॉक या संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याचं स्वागत केलं.


या संग्रहालयात तेव्हा थॉमस हॉलंड,मॉल यांच्यासारखे भूशास्त्रज्ञही काम करत होते.त्यांना युजीन भेटल्यामुळे आनंद झाला.आपल्या संशोधनाची कीर्ती भारतात आणि युरोपात पसरली आहे हे युजीनला प्रथमच कळत होतं.तो जवळजवळ सहा महिने भारतात राहिला.त्यादरम्यान तो शिवालिक टेकड्यांमध्ये पोहोचला.भारतातच त्याला 'नेचर' या वैज्ञानिक नियतकालिकाने त्याच्या प्रबंधाचं केलेलं परीक्षण वाचायला मिळालं.त्या वेळी अंदमान बेटावरच्या काही आदिवासींना कलकत्त्यात आणण्यात आलं होतं,तेही त्याला पाहायला मिळालं.युजीन भारतात असताना त्याचा मित्र आणि उत्खननातील सहकारी अ‍ॅनडाम प्रेंटीस याचे आणि अ‍ॅनाचे संबंध असल्याची कुणकुण त्याच्या कानावर आली होती.तो डच ईस्ट इंडियात परतला तेव्हा संशयाचं धुकं दाट झालेलं होतं;पण प्रत्यक्षात तसं काही नव्हतं.तरीही युजीन परत हॉलंडला जायला निघाला तेव्हा प्रेंटीसने त्याला प्रत्यक्ष भेटून निरोप घेण्याचं टाळलं.आपल्या एखाद्या शब्दाचा नाही तर वाक्याचाही युजीनकडून गैरअर्थ लावला जाईल अशी त्याला भीती वाटत होती.त्याने युजीनला एक पत्र लिहून तो मुद्दा स्पष्ट केला आणि पत्रातूनच त्याचा निरोप घेतला.


अ‍ॅनाला नवऱ्याने आपल्यावर अनाठायी संशय घेतल्याचा जो राग आला होता तो पुढे कधीच कमी झाला नाही.त्यातून त्यांच्यातला दुरावा आणखी वाढला. त्यांच्या परतीच्या प्रवासातल्या एका घटनेमुळे या दुराव्यात भरच पडली.त्यात ना युजीनची चूक होती ना अ‍ॅनाची.झालं असं,की परतीच्या प्रवासात युजीनने गोळा केलेले सर्व महत्त्वाचे जीवाश्म त्यांच्या केबिनमध्ये इतर सामानासोबतच ठेवण्यात आलेले होते.जहाज हिंदी महासागरातून सुवेझच्या दिशेने निघालेलं असताना एका जबरदस्त सागरी तुफानात सापडलं.प्रचंड पाऊस पडत होता.वादळाचा जोर,लाटांची उंची आणि जहाजाचे हेलकावे वाढत होते.अखेरीस प्रवाशांनी जीवरक्षक नौकामध्ये जाऊन बसावं,असं कप्तानाने फर्मान काढलं.अजून या नौका सागरात उतरवायचा निर्णय झाला नव्हता;तरी असं केल्याने उतारूंना तयारी करायला वेळ मिळाला असता.हळूहळू सर्व उतारू आवश्यक तेवढं सामान घेऊन त्या नौकांमध्ये येऊन बसले.

त्यात द्युबुआ कुटुंबाचाही समावेश होता.अचानक युजीन त्या जीवरक्षक नौकेतून उडी मारून जहाजावरच्या आपल्या केबिनकडे पळाला.निदान पिथेकँथ्रॉपसचे अवशेष त्याला वाचवणं आवश्यक वाटत होतं.त्याच्या आयुष्याच्या धडपडीचं ते सार होतं.ते या जहाजाबरोबर सागरतळी गेलं असतं तर त्याचे सर्व परिश्रम खरोखरच पाण्यात जाणार होते.तो का पळाला ते अ‍ॅनाच्या लक्षात आलं.बायको-मुलांपेक्षाही युजीनला 'जावा मॅन'चे जीवाश्म महत्त्वाचे वाटत होते.अ‍ॅनाने त्या अनोख्या बेटांवर कसे दिवस काढले याच्याशी त्याला काहीही देणंघेणं नव्हतं.तो उत्खननाला गेला असताना स्थानिकांच्या साहाय्याने तिने काढलेल्या खस्तांना त्याच्या लेखी किंमत नव्हती.त्याच्या दृष्टीने काही लाख वर्षांपूर्वी मेलेल्या त्या स्त्रीची हाडं त्याला फार महत्त्वाची वाटत होती.

थोड्याच वेळात ते जीवाश्म असलेली पेटी छातीशी कवटाळून युजीन परतला आणि अ‍ॅनाला म्हणाला,"अ‍ॅना मला काही झालं तर तू मुलांची काळजी घे.मला या जीवाश्मांची चिंता आहे." तो पट्टीचा पोहणारा होता.जीवरक्षक नौकेला काही झालं असतं तर तो आपले ते लाडके जीवाश्म वाचवायचा प्रयत्न करणारा होता.अ‍ॅना मुलांना जवळ घेऊन निमूट बसून राहिली.तिच्या डोळ्यांत अश्रू होते.युजीनला ते लक्षात येतीलच याची तिला खात्री नव्हती.हे सागरी वादळ शमलं;कप्तानाने सर्व उतारूंना केबिनमध्ये जायचा आदेश दिला.युजीनने ते जीवाश्म परत सुखरूप केबिनमध्ये ठेवले.सागरी वादळ शमलं,पण एक प्रचंड विध्वंसक वादळ अ‍ॅनाच्या मनात थैमान घालू लागलं. युजीनला त्याचा पत्ताच नव्हता.द्युबुआ कुटुंब 'द नेदरलँड्स'ची राजधानी 'द हेग' इथे राहू लागलं.इथेही त्यांना शांतता लाभली नाही. त्यालाही 'जावा मॅन'ची हाडंच कारणीभूत होती.युजीनने आणलेले जीवाश्म अत्यल्प आहेत,त्यावरून 'हरवलेला दुवा' सापडला असं म्हणणं योग्य होणार नाही,असं काही विरोधक म्हणत होते;तर रुडॉल्फ व्हर्चेसारखे काही संशोधक ही हाडं माणसाचीच आहेत हेच मान्य करायला तयार नव्हते.सुदैवाने लेआँस-पीएर मॅनुव्रिएसारखे काही शास्त्रज्ञ युजीनच्या बाजूचे होते. या वादात घर लावणं, घरखर्च भागवणं, मुलांच्या शिक्षणाची सोय करणं या बाबींकडे लक्ष द्यायला युजीनला वेळच नव्हता.


दुसरीकडे,घरी त्याच्या कार्याचं महत्त्व समजेल अशी कुणीही व्यक्ती नव्हती.आठ वर्षांपूर्वी निघताना त्याचं वडिलांशी भांडण झालं होतं.वडिलांना अभिमान वाटेल असा शोध आपण लावल्याने परतल्यावर ते मागचा राग विसरतील असं त्याला वाटत होतं;पण त्याचे वडील आता हयात नव्हते.युजीनने आपल्यामुलाचा,जाँचा प्रतिरूप म्हणून वापर करून एक पुतळा तयार केला होता.

त्याच्या चेहरेपट्टीत आणि शरीरयष्टीत हवा तसा बदल करून हा पिथेकैथ्रॉपॉसचा पुतळा त्याने इ.स. १९०० मधल्या पॅरिस इथल्या प्रदर्शनात पाठवला.जाँला तो पुतळा यूजीनचाच आहे असं वाटायचं.तसं तो इतरांना सांगतही असे.


शालेय शिक्षण संपताच युजीनच्या मुलांनी उच्च वसाहतींमध्ये जायचं ठरवलं.त्यांना लगेच नोकऱ्याही मिळाल्या.त्यांना निरोप देताना युजीन म्हणाला,"तुम्ही ज्या भागात जाताय त्या भागातल्या प्राण्यांच्या कवट्या मला पाठवा.सध्या मी कवट्यांच्या आकारावर संशोधन करतोय." मुलांनीही पुढच्या काळात वडिलांची आज्ञा शिरोधार्ह मानली.युजीन द्युबुआ विसाव्या शतकात ४० वर्षं जगला.या काळात त्याने बरंच संशोधन केलं. त्याच्या संशोधनाशी खेळ करणाऱ्यांशी आणि त्याचं संशोधन खोटं ठरवणाऱ्यांशी झगडण्यातच त्याला बहुतेक काळ खर्च करावा लागला.अनेकांनी त्याच्या संशोधनाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.पहिल्या महायुद्धकाळात भूशास्त्र आणि मानवशास्त्राकडे कुणीच फारसं लक्ष दिलं नाही.नंतरच्या काळात वयोमानामुळे युजीनची वाद घालण्याची क्षमता ओहोटीस लागली. नवी पोरं लबाड्या करतात,हे त्याने दाखवूनही उपयोग नव्हता.तो एकटा एकटा राहू लागला.दुसरीकडे फॉन कोएनिग्जवाल्ड, वायडेनरिख आणि बोनर्ट हे मानसशास्त्रज्ञ म्हणतील तेच सत्य,असं युरोपात म्हटलं जाऊ लागलं.नोव्हेंबर १९४० मध्ये युजीनने या तिघांमुळे मानवशास्त्राचं नुकसान होतंय,असं लिहिलं खरं;पण युद्धाच्या धामधुमीत त्याच्याकडे कुणाचं लक्ष जाणार ?


१६ डिसेंबर १९४० या दिवशी डॉयुजीन द्युबुआचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आणि मानवी वंशाचा दुवा शोधणारा हा अवलिया शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला.


२७.०७.२५ या लेखातील दुसरा शेवटचा भाग..

२७/७/२५

जावा मॅन'चा शोधकर्ता’-’Inventor of Java Man’

उत्क्रांती आणि मानवशास्त्राच्या संशोधनक्षेत्रात डार्विन-वॉलेसनंतर नाव येतं ते डॉ.युजीन धुबुआचं. १९ व्या शतकाच्या अखेरीस त्याने उत्खननांतून लावलेल्या एका क्रांतिकारी शोधाने त्याचं नाव या क्षेत्रात अजरामर झालं.

वैयक्तिक पातळीवर मात्र या संशोधनाची त्याला फार मोठी किंमत मोजावी लागली.त्याच्या खडतर प्रवासाबद्दल...


▶ डॉ.युजीन द्युबुआ हे नाव मानवशास्त्राच्या इतिहासात प्रसिद्ध आहे ते त्यांनी लावलेल्या एका शोधामुळे.कपी (एप) आणि मानव यांच्यातील हरवलेल्या दुव्याचा हा शोध 'जावा मॅन' म्हणून प्रसिद्ध आहे.लहानपणापासूनच युजीननी हा दुवा शोधण्याचं वेड बाळगलं होतं.त्यासाठी त्यांनी अपार मेहनत आणि धडपड केली.युजीन यांनी आपलं ध्येय गाठण्यासाठी अपरंपार त्याग केले.युजीन द्युबुआचा जन्म २८ जानेवारी १८५८ चा.हे वर्ष विज्ञानातल्या एका महत्त्वाच्या कालखंडातलं आहे. त्याच वर्षी डार्विन-वॉलेस यांनी उत्क्रांतिवाद मांडला. त्याआधी दोन वर्षं,म्हणजे १८५६ साली जर्मनीत निअँडर खोऱ्यात काही मानवी अवशेष मिळाले होते.हाच निअँडरथल मानव.या शोधामुळे उत्क्रांतीच्या वादाची तीव्रता वाढीस लागली होती.पुढे डार्विननी १८७१ साली 'डिसेंट ऑफ मॅन' हा ग्रंथ प्रसिद्ध करून आपल्या 'ओरिजिन ऑफ स्पेसीज' या ग्रंथाने पेटवलेल्या वणव्यात तेल ओतलं.अशा काळात युजीन द्युबुआचा जन्म झाला.त्या वेळी हा मुलगा मानवशास्त्रात आणि उत्क्रांतिवादात संशोधनपूर्वक भर टाकेल असं कुणालाही वाटलं नसेल.


युजीनचे वडील जाँ जोसेफ बाल्थाझार द्युबुआ आजच्या भाषेत बोलायचं तर वैद् होते.ते पारंपरिक ज्ञान वापरून औषधं देत.ते बऱ्यापैकी लोकप्रिय असावेत,कारण ते हॉलंडच्या दक्षिण भागातल्या आयस्डेन या खेड्याचे नगरपाल म्हणून काम करत होते.तिथेच युजीनचा जन्म झाला होता.त्याच्या वडिलांच्या मेयरपदास कधीही कुणी आव्हान दिलेलं नव्हतं.त्यांच्या घराण्याचं बोधवाक्य 'सरळ आणि सामुग्रीची वर्तणूक' अशा अर्थाचं होतं. हे घराणं सनातनी आणि धार्मिक वृत्तीचं होतं. 


युजीन वैद्यकीय शिक्षण घेत असताना डार्विनच्या विचारांचा परिणाम होऊन निरीश्वरवादी आणि कट्टर नास्तिक बनला.तेव्हा त्याच्या धाकट्या भावाचं आणि त्याचं कडाक्याचं भांडण झालं होतं;पण त्याच्या आई-वडिलांना आपला मुलगा यौवनोन्मादात बहकलाय आणि तो काही काळाने ताळ्यावर येईल अशी आशा वाटत होती.वैद्यकात पदवी मिळवल्यानंतर युजीन एका मुलीकडे आकृष्ट झाला;पण त्या मुलीने एका चिनी वैद्यक विद्यार्थ्यांशी लग्न ठरवलं.त्याने युजीनला काहीसं नैराश्य आलं आणि तो अ‍ॅना गट्ठरीडा लोयेंगाशी लग्न ठरवून मोकळा झाला.अ‍ॅना ही साधीसुधी मुलगी होती. ती अतिशय सुंदर दिसायची.तिची वृत्ती खेळकर होती. मात्र,तिला कसलीही महत्त्वाकांक्षा नव्हती. 


नवऱ्याबरोबर राहावं,मौजमजा करावी,संसार फुलवावा आणि घर सजवावं यापलीकडे तिच्या मनात कसलेही विचार येत नसत.तिच्या दृष्टीने युजीनचं संशोधन हा त्याला बढती मिळण्यासाठीचा एक आवश्यक भाग होता.


युजीन दहा वर्षांचा असताना प्रथम डार्विनच्या विचारांशी त्याचा परिचय झाला.त्या वेळी कार्ल व्होग्ट या ख्यातनाम जर्मन जीवशास्त्रज्ञाने युरोपभर एक व्याख्यान दौरा काढला होता.डार्विन-वॉलेस उत्क्रांतिवाद जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता.त्या व्याख्यानाचा वृत्तान्त दुसऱ्या दिवशी युजीनने त्यांच्या बागेतल्या आपल्या एका आवडत्या वृक्षाच्या फांदीवर बसून वाचला होता.त्या काळात उत्क्रांतिवादाने युरोपला ढवळून काढलं होतं.त्यामुळे शाळकरी पोरांनादेखील त्याची तोंडओळख झालेली होती.व्होग्टने सादर केलेले पुरावे दहा वर्षांच्या युजीनला कितपत कळले असतील हे सांगणं तसं अवघड आहे; पण डार्विनच्या विचारांनी आणि उत्क्रांतीच्या बाजूच्या पुराव्यांनी तो प्रभावित झाला हे निश्चित.व्होग्टच्या व्याख्यानाच्या त्या एका वृत्तपत्रीय बातमीने युजीनच्या पुढील आयुष्याची दिशा ठरली,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.युजीनने यामुळेच उच्च शिक्षणासाठी विज्ञानशाखेची निवड केली. 


वैद्यकाची पदवी घेतल्यानंतर त्याने उत्क्रांतीकडे लक्ष वळवलं.त्याच सुमारास,म्हणजे जुलै १८८७ मध्ये मॅक्स लोहेस्ट या बेल्जियन भूशास्त्रज्ञाने आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने बेल्जियममधल्या 'स्पी' या गावाजवळ निअँडरथल मानवाचे दोन सांगाडे उघड केले.या शोधांवरून फार वाद झाला.त्याने एकीकडे युजीन फार अस्वस्थ झाला.आपण वैद्यकातील पदवी घेऊन चूक केली,आता डार्विनच्या सिद्धांताचा अभ्यास आपण कसा करणार,एप व मानव यांतला हरवलेला दुवा शोधायचं वयाच्या दहाव्या वर्षांपासून जपलेलं आपलं स्वप्न केव्हा पूर्ण करणार,या विचारांनी त्याला चैन पडेना.याच काळात त्याने हैकेलचं 'हिस्टरी ऑफ क्रिएशन' हे पुस्तक वाचायला घेतलं.त्यातला एक मुद्दा त्याला फारच आवडला - मानव आणि इतर प्राण्यांमधील महत्त्वाचा फरक म्हणजे स्वरयंत्र.जर मानवाला स्वरयंत्र कसं प्राप्त झालं हा प्रश्न सुटला तर मानवी उत्क्रांतीचं कोडं सहज उलगडता येईल,असं हैकेलचं म्हणणं होतं..


युजीनने सस्तन प्राण्यांच्या घशातील अस्थींवर याआधीच संशोधन सुरू केलं होतं.माशांच्या श्वसन कल्ल्यांमध्ये सुधारणा होत होत एके काळी पाण्यातून ऑक्सिजन वेगळा करणारी यंत्रणा मानवात ध्वनी निर्माण करू लागली,या निष्कर्षाप्रत तो आला होता. 


त्याने हा सिद्धांत मांडण्यापूर्वी त्याचे प्राध्यापक आणि वरिष्ठ सहकारी मॅक्स फुरब्रिंगर यांच्याकडे तपासायला म्हणून दिला.

तेव्हा फुरब्रिंगरनी ती कल्पना त्याआधीच व्याख्यानांमधून मांडल्याचा दावा केला.ते ऐकल्यावर 'माझ्या प्रबंधात अधिक सुधारणा करायला हव्यात' असं सांगून युजीनने प्रबंध परत घेतला आणि तो वेळकाढूपणा करू लागला.फुरब्रिंगर आपल्या संशोधनावर आज ना उद्या डल्ला मारणार याची जाणीव झाल्यावर युजीनने विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा द्यायचं ठरवलं;पण त्यापूर्वी त्याने खूप विचार केला. त्याच्यावर आता बायको आणि मुलीची जबाबदारी होती.तरीही,आपण जर एप आणि मानव यांच्यातील हरवलेला दुवा शोधून काढला तर आपल्याला कीर्ती मिळेल आणि फुरब्रिंगरच्या दडपणास आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकू असं त्याला वाटू लागलं.


हा दुवा कसा आणि कुठे सापडेल यावरही युजीनने खूप विचार केला होता.हा दुवा सापडत नाही याचं कारण या क्षेत्रातल्या संशोधकांनी त्याचा शोध घेण्याचा पद्धतशीर प्रयत्न केलेला नाही अशी त्याची खात्री पटलेली होती.निअँडरथल मानव खूपच उत्क्रांत होता; तो जवळ जवळ माणूसच होता;यामुळेच पूर्वीच्या काळी कुठल्या तरी विकाराने हाडांमध्ये विकृती निर्माण झालेल्या माणसांचे हे सांगाडे असावेत,असं मत त्या काळात प्रचलित होऊ लागलं होतं.काही शास्त्रज्ञ याला विरोध करत असत.त्यांच्यामते निअंडरथल मानव हा आजच्या मानवाचा पूर्वज असला तरी त्याच्यात आणि आधुनिक मानवात फारसा दुरावा नव्हता. (आता निअँडरथल मानव ही मानवी वंशवृक्षाची आपल्या

सारखीच एक प्रगत शाखा होती आणि ३० ते ३६ हजार वर्षांपूर्वी ती नष्ट झाली असं मानण्यात येतं.)


इतरांनी पद्धतशीरपणे प्रयत्न केला नाही,त्यामुळे त्यांना योग्य ठिकाणी शोध करता आला नाही,असं युजीनला वाटलं खरं;

पण त्याला तरी योग्य ठिकाण कसं सापडणार होतं ? तो डार्विनभक्त होता हे आपण पाहिलंच. 'डिसेंट ऑफ मॅन' या ग्रंथात डार्विननी पहिला मानव विषुववृत्तीय पर्जन्यारण्यात अस्तित्वात आला असावा,अशी शक्यता वर्तवलेली होती.

त्यामुळे युरोपमध्ये शोध घेणाऱ्या संशोधकांना मानवाचं मूळ सापडणं शक्य नाही असं युजीनला वाटू लागलं होतं. डार्विन यांच्या मते चिंपांझी आणि गोरिला सापडतात त्या आफ्रिकेच्या विषुववृत्तीय भागामध्ये माणसाचा शोध घेतला गेला तर ते अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता होती.

युजीनला हे म्हणणं तत्त्वतः मान्य असलं,तरी आफ्रिकेत शोध घेऊ नये असं त्याला वाटत होतं.याला एक वेगळंच कारण होतं.चिंपांझी आणि गोरिलांमध्ये नर हा मादीपेक्षा आकाराने जवळजवळ दुप्पट मोठा असतो.त्याचे सुळे खूप तीक्ष्ण आणि लांब असतात. तसंच चेहऱ्याची अतिशयोक्त वाढ झाल्याने या नरांचे चेहरे खूप बटबटीत दिसतात.कुठल्याही प्रचलित आदिम मानव जमातींमध्ये निसर्गाने स्त्री-पुरुष यांच्यामध्ये इतका भेदभाव केलेला नाही,असं युजीनचं म्हणणं होतं. त्यामुळे मानवी पूर्वजांचा शोध घेण्यासाठी आफ्रिकेत जाण्यास तो तितकासा उत्सुक नव्हता. 


त्या काळात रिचर्ड लिडेकर या ब्रिटिश पुराजीव शास्त्रज्ञाला हिमालयातील शिवालिक टेकड्यांमध्ये काही अवशेष मिळाले होते.यांत एपसारखे प्राणी होते. यांना सुरुवातीस 'ट्रॉग्लोडायटिस सिव्हालेन्सिस' असं नाव देण्यात आलं होतं; पण त्यांचं एपशी असलेलं साम्य,तरीही आधुनिक कपींमध्ये आणि त्यांच्यामधे असलेला फरक स्पष्ट व्हावा म्हणून लिडेकरनी त्यांचं नाव 'अँथ्रपोपिथेकस सिव्हालेन्सिस' असं बदललं होतं. म्हणजे 'मानवाप्रमाणे दिसणारे शिवालिकमधील कपी.' मात्र,त्या काळात नेदरलँड आणि ब्रिटन यांचं सख्य नव्हतं.युजीन डच असल्याने ब्रिटिश वसाहत असलेल्या भारतात त्याला मोकळेपणाने वावरता येईल याची खात्री देता येत नव्हती.


याच वेळी डच ईस्ट इंडिजमध्ये (म्हणजे आताचा इंडोनेशिया) कपींचे अवशेष मिळू लागले होते. या भूप्रदेशात विषुववृत्तीय अभयारण्य होतं.तिथे युजीन द्युबुआ मोकळेपणाने वावरू शकणार होता.याच सुमारास कार्ल मार्टिनने रादेन साल्हेला सापडलेल्या मानवी अवशेषात आणि भारतात सापडलेल्या अवशेषात साम्य होतं.दोन्ही अवशेष एक लाख वर्षांपूर्वीचे होते,आणि यामुळे १८७६ साली आल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी प्रसिद्ध केलेल्या 'द जिओग्राफिकल डिस्ट्रिब्युशन ऑफ अ‍ॅनिमल्स' या ग्रंथातील माहितीची सत्यता पडताळून पाहता येत होती.वॉलेसनी नकाशावर जावा बेटाच्या पूर्वेस एक रेषा आखली.या रेषेच्या पश्चिमेकडे जावा-बाली बेटांपासून ते भारतापर्यंत एकमेकांशी साम्य असलेले सस्तन प्राणी सापडतात,तर या रेषेच्या पूर्वेस ऑस्ट्रेलियातील शिशुधानी प्राण्यांशी साम्य असलेले प्राणी सापडतात.ही वॉलेस रेषा बाली आणि लोंबोक या दोन बेटांच्या मधून जाते. 

याचा अर्थ डच ईस्ट इंडिजमध्ये सुमात्रापर्यंत मानवासह इतर सस्तन प्राण्यांचे अवशेष असणार हे यूजीनच्या लक्षात आलं आणि तो लष्करी वैद्यकीय अधिकारी होण्याचा निर्णय घेऊन पत्नी व मुलीसह जावाला जाण्यास निघाला.त्यासाठी त्याने चालू नोकरीतलं वरिष्ठ व्याख्यातापद आणि काही वर्षांत प्राध्यापक बनण्याची खात्री,यावर पाणी सोडायचं ठरवलं.


(हटके भटके,निरंजन घाटे,अज्ञाताचा शोध घेत फिरणाऱ्या अवलियांच्या कहाण्या,समकालीन प्रकाशन)


युजीनच्या या निर्णयाला त्याच्या वडिलांचा आणि मित्रमंडळींचा विरोध होता; पण अ‍ॅनाने मात्र लगेच जावाला जायची तयारी सुरू केली होती.युजीन फुरनिंगरचा निरोप घ्यायला गेला.त्या विभागातील त्याचे इतर सहकारीही त्या वेळी उपस्थित होते.

सर्वांनीच युजीनचं मन वळवायचा प्रयत्न केला;पण अत्यंत 


धीरोदात्तपणे युजीन म्हणाला,"तुम्ही निवृत्त झाल्यावर मी प्राध्यापकपद भूषवणार आहे,हे मला मान्य असलं तरी डच ईस्ट इंडिजमध्ये जाऊन निखळलेला मानवी दुवा मीच शोधायला हवा असं मला वाटतं.इथे राहून प्राण्यांची आणि माणसांची शवं तपासणं,त्यांचं विच्छेदन करणं,त्यावर शोधनिबंध लिहिणं आणि प्राध्यापक बनणं अवघड नाही हे मला मान्य आहे;पण त्यात कसलंच आव्हान नाही." फुरब्रिंगरनी त्याचा राजीनामा स्वीकारला.द्युबुआ कुटुंबाचा डच ईस्ट इंडिजचा प्रवास सुरू झाला तेव्हा त्यांची मुलगी युजिनी सात महिन्यांची होती आणि अ‍ॅनाला पुन्हा दिवस गेलेले होते. 


गर्भारपणातल्या उलट्या आणि बोट लागणं यामुळे प्रवासात अ‍ॅनाचे फार हाल झाले. युजीन मात्र ठणठणीत होता.तो माले भाषा शिकत होता.तसा तो भाषातज्ज्ञही होताच.तो इंग्रजी,फ्रेंच,

लॅटिन,ग्रीक आणि जर्मन भाषा मातृभाषेइतक्याच सफाईने लिहू व बोलू शकत होता. त्यात आता मालेची भर पडली.


११ डिसेंबर १८८७ ला द्युबुआ कुटुंब सुमात्रा बेटावरील पाडांग बंदरात उतरलं.पाश्चात्त्यांना पहिल्यांदा जेव्हा आशियाई भूप्रदेशाचं दर्शन घडतं तेव्हा आवाज,धूळ आणि अस्वच्छता यामुळे ते अस्वस्थ होतात.द्युबुआ कुटुंबही याला अपवाद नव्हतं.त्यातच अ‍ॅना छोट्या युजिनीचं संगोपन आणि येणारं बाळंतपण यामुळे रडकुंडीस आली.बरं,नवरा आपल्या वैद्यकीय कर्तव्यांमुळे सतत कामात गुंतलेला आणि सुटीदिवशी पुरातन हाडांच्या शोधात फिरणारा.मुलीला स्थानिकांवर सोपवताना अ‍ॅनाचा जीव वरखाली व्हायचा.विषुववृत्तीय पर्जन्यारण्याच्या प्रदेशात पाश्चात्त्यांचा सर्वांत मोठा शत्रू म्हणजे हिवताप.त्याच्याशीही सामना करणं भागच होतं.द्युबुआ प्रथम सुमात्रा बेटावर आले तेव्हा पावसाळा चालू होता.इतका जबरदस्त पाऊस आणि असं कुंद, बाष्पभारित वातावरण त्यांनी यापूर्वी कधीच अनुभवलेलं नव्हतं.शिवाय चिखल हादेखील त्यांच्या दृष्टीने एक नवाच अनुभव ठरला होता.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!

२५/७/२५

बेडूक-बाबा / frog-daddy

बोट वाळूला टेकली.

२३.०७.२५ या लेखातील लेख पुढे सुरु….

आणि मुलांनी उतरून तिला आणखी आत ओढलं, धक्क्याकडे.मुलानी वर पाहिलं,तर पुढ्यात चार पावलांवर बेडूक-बाबा !

सहा फुटापेक्षा उंच.चेहरा,शरीर रोडसर.वय चाळीसच्या आसपास, पण चेहरा उन्हातान्हानं रापल्यामळे पन्नाशीचा दिसणारा. 

डोळे,तोंडाजवळ खोल घळ्या पडल्यासारखा, काळवंडलेला चेहरा.मेकॅनिकसारखे ओव्हरॉल्स अंगावर.खांद्यापासून पँटला आधार देणारे पट्टे. भरपूर खिसे.पुसट,धुवट,फिकट निळं डेनिम कापड. फिकट तपकिरी शर्ट,पूर्ण बाह्यांचा.
काहीतरी लिहिलेली बेसबॉल खेळताना घालतात तसली टोपी.केसांचा मागे लोंबणारा बुचडा आणि नीटनेटकी दाढी.

पायांत काही नाही,आणि हातात बंदूक,दोन पोरांवर रोखलेली. "काय हवं आहे,इथं ?" मोठ्यानं खेकसला.

"सर! आम्ही बॉय स्काऊट्स आहोत.आम्हाला ही ट्रिप घ्यायला सांगितली,म्हणून तुम्हाला भेटायला आलो." जूनियर सफाईनं खोटं बोलला.

बेडूक-बाबाच्या चेहऱ्यावरचा निर्लेप भाव तसाच राहिला.बंदूक मात्र खाली केली.मग बंदुकीने नदीकडे जा,चालते व्हा,असं दाखवलं.रॅफला काहीतरी सुचलं, "काय छान जागा आहे,सर, तुमची ! झाडं, फुलं,फुलपाखरं,पक्षी.आम्हाला जाताना दिसलं सगळं."

अर्धा मिनीट बेडूक-बाबा गप्प राहिला.मग मोठ्यानं म्हणाला, "हो ना! म्हणून तर कोणी इकडे आला, तर उडवून टाकतो मी!"

जूनियरनं नव्यानं प्रयत्न केला

"जातो सर,आम्ही.पण एकदा ओल्ड बेन दिसेल का? जगातला सगळ्यात मोठा मगर आहे,
म्हणतात,बारा फूट!"

"चौदा." आता बंदूक जमिनीकडे रोखलेली होती, आणि आवाज नेहमीचा,सौम्य झाला होता. जूनियरला बेडूक-बाबाची नस सापडली होती–ओल्ड बेन् चा पालक असण्याचा गर्व ! 

"चौदा फूट.पूर्वी आणखीन मोठ्या मगरीही असायच्या इथे.मारून टाकल्या सगळ्या.पण ओल्ड बेन् नाही दिसणार तुम्हाला.फक्त रात्रीच बाहेर पडतो तो.आणि इथे माझ्या आसपासच राहतो.मी सांभाळतो त्याला.खाऊ घालतो - कॅ‌फिश आणि बेडकं."

या भागात सगळ्यांना माहीत होती बेडूक-बाबाची पद्धत.एक ट्रकचा हेडलाइट घेऊन रात्री बेडूक-बाबा बेडकं पकडायचा.पोटोमो धक्क्याजवळच्या पेट्रोल पंपावर बेडकांच्या तंगड्या विकायचा.
पायीच यायचा,बोटीनं नाही.बेडकांच्या तंगड्या विकून आलेल्या पैशांनी खरेदी करायचा–तीही न बोलता. दोनचार मिनिटांचे सौदे सगळे,की निघाला.सगळे दुकानदार,त्यांची गिऱ्हाइकं बिचकून असायचे. घाबरायचे.

पुन्हा बेडूकबाबा गप्प झाला.जूनियरनं त्याला खूष करायचा शेवटचा एक प्रयत्न करायचं ठरवलं. "आम्ही निघतोच आहोत,पण तुम्ही चिकोबी अजगर पाहिला आहे का हो कधी?"

बेडूकबाबाची नजर पोरांवरच होती,पण काहीतरी जरासं बदललं होतं.त्यानं ओठ हलवले आणि त्यांवर जीभ फिरवली.म्हणाला, "पाहिलाही असेल, आणि नसेलही." एवढं बोलायची सवय नसावी. जरा दम खाऊन म्हणाला,

"काहीतरी भलंथोरलं दिसतं,अंधार पडताना. ऐकूही येतं.मगर नक्कीच नाही आहे.स्टर्जन मासाही नाही,माणसाएवढं.उडी मारतं पाण्याबाहेर.मोठा मोरी-मासा असेल.समुद्रातनं उलटा वर आलेला.मोठ्या,नव्या ओंडक्याएवढा.
नसेलही.एवढ्या मोठ्या मोऱ्या उड्या नाही मारत.पाण्याखालूनच हल्ला करतात."

रॅफला माहीत होतं,मोरी मासे गोड्या पाण्यात येतात,आणि माणसांवर हल्लेही करतात. जूनियरचा मात्र विश्वास नव्हता.

बेडूक-बाबाची नजर दूर,नदीवर गेली.स्वतःशीच बोलल्यासारखा तो म्हणाला,"काहीतरी पाहिलं आहे. काहीतरी ऐकलं आहे."

पोरं गप्प होती,पुढे काहीतरी ऐकायला उत्सुक होती.पण बेडूक-बाबा मूळ स्वभावावर आला होता,घुमा आणि घाबरवणारा.

जा!" "आता चालते व्हा.पुन्हा तुमच्यापैकी कोणी इकडे दिसला,तर पस्तावाल.

दोघं मागे मागे चालत बोटीकडे गेले.माना खाली, दबकत, दुबकत, "हो सर ! हो सर!" म्हणत बोटीत शिरले,आणि पोटोमो धक्क्याची वाट धरली.

धक्का गाठल्यावर बोट जमिनीवर ओढून खांबाला बांधली,आणि दोघं पुलाजवळच्या एका प्रचंड ओक वृक्षाजवळ जाऊन बसले.नॅप् सॅकमध्ये रॅफच्या आईनं दिलेलं खायचं सामान होतं.दाण्याची चटणी आणि स्ट्रॉबेरी जॅम लावलेली सँडविचेस होती. सफरचंदं आणि हर्शीच्या चॉकलेटचे बार होते.

खाऊन झाल्यावर दोघे पोटोमो रोडनं निघाले.रेल्वे लाईन गाठून उलटं नदीपार गेले.कधी स्लीपर्सवर चालत,तर कधी दाट जंगलातून वाट काढत. सत्तावीस नंबरचा रस्ता गाठून क्लेव्हिल्ला घरी पोचले.दुसऱ्या दिवशी जाऊन सायकली परत आणायचं ठरलं–आणि आजच्या दिवसातलं कोणालाही,काहीही, कधीही सांगायचं नाही,अशी दोघांनी शपथ घेतली.घरी कळलं असतं,तर पुन्हा कधी फिरायला जायची परवानगी मिळालीच नसती ! थकले होते दोघेही,पण खूष होते.

रात्री जेवताना रॅफनं चिकन,भेंडी आणि कॉर्नब्रेडवर चांगला हात मारला.आईनं विचारलं,
नोकोबीच्या सहलीबद्दल."ठीक!" रॅफ म्हणाला. "पण जूनियरला निसर्गाबद्दल फार माहीत नाही आहे. सापांना घाबरतो तो".

पुढच्या काही दिवसांमध्ये दोघांनी मित्रांपुढे ती सहल वाढवून,फुगवून सांगितली.दोघेही आपापलं शौर्य सांगायला विसरले नाहीत.बोट चोरल्याचं मात्र दोघांनी दोनतीन खास मित्रांनाच सांगितलं !

—-- समाप्त 

२३/७/२५

बेडूक-बाबा / frog-daddy

लेबर डेच्या सुट्टीला अजून दोन आठवडे होते.रॅफेल सेमीज कोडी ऊर्फ रॉफ आणि त्याचा चुलतभाऊ जूनियर,हे दोघं रॉक्सीज आईस्क्रीम पॅलेसमध्ये बसले होते.दोघंही बदाम आईस्क्रीम खात होते,बटरस्कॉच सायरपनं झाकलेलं,आणि वर अक्रोडांचे तुकडे घातलेलं.मेक्सिकोच्या आखातावरून कुंद,दमट आलेली हवा फ्लॉरिडा पॅन्हॅडलच्या उष्णतेनं आणिकच जड झाली होती.गाव होतं क्लेव्हिल्,अ‍ॅलाबामा.पावसाची आशा जागवतीलसे ढगही नव्हते आकाशात.आईस्क्रीम पॅलेसमध्ये शिरणारा प्रत्येक जण अंगाला घामानं चिकटलेले कपडे सोडवत बसलेला असायचा.


"काय गरमी आहे!" एक पातळसा सूट पेहेरलेला माणूस आत येत म्हणाला.


"हो! आग्या मुंग्यांपेक्षा गरम !" एक शेतकरी हसत उत्तरला.


जूनियर आणि रॅफेलला उन्ह-उकाड्याचा धाक नव्हता. जूनियरला तर चिकोबी नदीतला महाकाय अजगर पाहायची इच्छा होती.गेल्या शतकभरात शेकडो स्थानिक लोकांनी चिकोबीच्या डोहात काहीतरी गूढ, अजस्र,सापासारखा जीव पाहिला होता म्हणे.मोठी प्रसिद्ध दंतकथा होती ही,त्या भागातली.


रॅफ नाराज होता. "ए! माझे आईबाबा मारतील मला. त्यांना वाटतं की तू मला बहकवतोस."


('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


असं. मग तर झालं?" जूनियरपाशी रॅफच्या अडचणींना उत्तरं होती."आपण त्यांना सांगू नोकोबी तलावात मासे पकडायला जातो आहोत,


दोन दिवसांनी सकाळी आठला जूनियर आला.दोन्ही मुलांनी रॅफच्या आईला भरघोस आश्वासनं दिली,अमुक करू आणि तमुक करणार नाही,अशी.मग दोघही सायकली घेऊन बाहेर पडले.गावाच्या वायव्येला जायचं होतं.फार वाहतूक नव्हती.दोन टोमॅटो लादलेल्या ट्रक्स फक्त भेटल्या,गावाकडे जाणाऱ्या.जॉन्सनच्या शेताजवळ दोघांनी सायकली झुडपांत लपवल्या आणि ते जंगलकडेच्या ओढ्यात उतरले.बुटांच्या लेसेस बांधून गळ्यात अडकवल्या.पँटी गुडघ्यांपर्यंत दुमडल्या.छान वाटत होतं,बारीक खड्यांवरनं वाहणाऱ्या थंड,स्वच्छ पाण्यात.ओढ्यासोबत दोघं चिकोबी नदीला भेटायला जात होते.छोटेछोटे मासे किनाऱ्याजवळच्या गवतात लपायला पळत होते.एक चिखलातलं कासव पाठीवरचं शेवाळ सांभाळत दगडासारखं बसलं होतं.एक बारका साप झाडाच्या फांदीवरनं पाण्यात उडी मारून पळून गेला.एक लाल खांदे असलेली घार कर्कश ओरडत उडाली. "घरटी बांधायचा मोसम संपलाय." रॅफ म्हणाला. त्याच्या ओळखीची होती या जंगल-ओढ्याची प्रजा.मैलाभरात ओढा रुंदावला व गुडघ्यांपेक्षा खोल झाला.जवळ कॅट्टेल पाणगवत होतं.


पाण-ओक,सायप्रेस वगैरे नेहमीचे वृक्ष होते,विरळ पसरलेले.मुलं ओढ्यातला चिखल टाळून चालत होती. "दलदल सांभाळ!" जूनियर म्हणाला.रॅफेल त्याच्या मागून चालायला लागला.काही गडबड झालीच,तर जूनियर आधी अडकेल !


लवकरच खुद्द चिकोबी नदी आली.संथ,सुस्त वाहणारी. सकाळच्या उन्हात हिरवी निळी,चंदेरी लाटा असलेली. पाण्यातल्या काड्या संथपणे चालणाऱ्या माणसाच्या वेगानं वाहत होत्या.मध्येच किनाऱ्याची जमीन उंच चढत गेली.उंचीवरच्या झाडांवरून कळत होतं,की मोठ्यात मोठे पूरही तिथे पोचत नव्हते.या टेकाडाच्या नदीकडच्या बाजूला तेज उतार होता,झाडी नसलेला आणि पिवळट मातीचा.इतर तीन बाजूंचे उतार मात्र जास्त सपाटसर होते.या टेकाडाजवळ 'तमालपत्रा'च्या झाडांना बांधून ठेवलेल्या पाचसहा होड्या होत्या.झाडी उंच होती. म्हणजे पाणी चढलं तरी बांध्यांना काही न होता होड्या पाण्यावर तरंगल्या असत्या.या भागात पाणी चढणं-उतरणं नेहमीचं होतं,आणि बांधायची पद्धतही सगळ्यांच्या ओळखीची होती.


जूनियर एका बोटीजवळ जाऊन तिला बांधणारा दोर सोडू लागला.तिच्यात दोन वल्ही आणि बसायला फळीही होती.


"कुणाची रे?" रॅफनं विचारलं. "कुणास ठाऊक." जूनियर गाठ सोडत म्हणाला.रॅफनं त्याच्या हातावर हात ठेवला. "ए! चोरायची नाही आहे, बोट!" "चोरतं कोण आहे ? उसनी घेतो आहोत,आपण पोटोमो धक्क्यावर ठेवून देऊ.नेहमीच करतात असं,सगळे जण." खरं तर जूनियरच्या या बोलण्यावर रॅफचा विश्वास नव्हता. पोटोमोपासून इतक्या वर प्रवाहाच्या उलटं वल्हवत आणणं अवघड होतं.पण बोटीच्या मागे आऊटबोर्ड मोटर बसवायला जागा होती,आणि आणि मजा येत होती! खुद्द चिकोबी नदी जवळ होती,आणि एखादे वेळी तो अजगरही आसपासच होता !


रॅफ जूनियरपेक्षा लहान होता,आणि "मला ह्यानं भरीला पाडलं" म्हणणं सोपं होतं. मग जूनियरनं काय तो बचाव दिला असता.


जूनियरनं बोट सोडवली,आणि चिखलातून ओढत, ढकलत दोघांनी ती प्रवाहात नेली.आता दोघही उड्या मारून चढले.बोटीत,किनाऱ्याला धरून धरून ते प्रवाहासोबत वल्हवत होते.संपूर्ण नदीवर इतर एकही बोट नव्हती,ना खाली जाणारी,ना वर जाणारी.


"नेहमी दोनतीन जण तरी मासे पकडताना दिसतात." जूनियर म्हणाला. "बाबांनी आणलं होतं मला आणि ताईला एकदा."


"आश्चर्यच आहे,आज कोणी नाही हे.किती छान जागा आहे! मासेही भरपूर असणार." रॅफ म्हणाला.


"चिखल ! चिखलाला कंटाळतात सगळे जण.बहुतेक लोक चिकोबी टाळून दक्षिणेला एस्कांबिया नदीत जातात.तिच्यावर धक्के वगैरेही जास्त आहेत."


रॅफ नदीकडेचं जंगल पाहत होता.चांगलं दाट होतं. एका मासेमाराचं झोपडं दिसलं,तेही रिकामं.एका झाडाच्या फांदीला एक दोर बांधला होता."पोरं लटकून, झोके घेऊन उड्या मारतात पाण्यात." जूनियर म्हणाला.


ओंडक्यांवर दोनतीन कासवं बसली होती,उन्हं खात. बोट जवळ आल्यावर पाण्यात शिरली.


एक साप किनाऱ्याकडे पोहत गेला.किनाऱ्याच्या वाळूत एक निळसर बगळा माशांची वाट पाहत ध्यानस्थ उभा होता.दोन बदकं सरळ रेषेत उडत गेली,नदीच्या खालच्या भागाकडे.एक गिधाड उष्ण हवेसोबत चकरा मारत उंच,उंच जात होतं.ठिपक्यासारखं दिसेल इतकं उंच गेलं ते.


दोन लांब दुहेरी शेपट्यांचे घारींसारखे पक्षी नदीपलीकडच्या झाडीवर विहरत होते. "स्वॉलोटेल घारी असतील त्या!" रॅफ म्हणाला. "मी पहिल्यांदाच पाहतो आहे. झाडांवरचे साप खातात त्या."


जूनियर,रॅफ,दोघंही वर पक्षी पाहत होते,पण खरं लक्ष होतं नदीकडे,चिकोबीचा अजगर दिसायच्या आशेनं. दिवसाढवळ्या दिसणं कठीण होतं,पण तरी आशा असतेच ना! आणि एकाएकी दार उघडावं तसं कडेचं जंगल उघडलं.वाळूच्या पट्ट्यावर धक्क्याला बांधलेली एक लहानशी बोट होती.मागे एक पायवाट,पन्नास पावलं आतल्या एका घराकडे जाणारी.रंगवलेलं नव्हतं घर.लाकडी आणि टिनाचं छत असलेलं.एका बाजूच्या फळ्या ताज्या दिसत होत्या,नव्यानं ठोकलेल्या.जोतं तीन पायऱ्या उंच होतं.एक लहानसा व्हरांडा.दारालगत एक खिडकी.तिच्यावर बोट वाळूत टेकली,


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…

२१/७/२५

कार्बन-डाय-ऑक्साईडची पोकळी / Carbon dioxide cavity

निसर्गाची चक्रीयता दर्शविणाऱ्या कोणत्याही चित्रात झाडं मुख्यस्थानी असतात.त्यांच्यामुळे परिसंस्था संतुलित होत असल्याचे जाणवते.
प्रकाश संश्लेषणातून हायड्रोकार्बनची निर्मिती होते,ज्यामुळे झाडांची वाढ होऊ शकते.
खोड,फांद्या आणि मुळातून झाडे त्यांच्या आयुष्यात सुमारे बावीस टन कार्बन-डाय-ऑक्साईड साठवून ठेवू शकतात.झाड वठले की बुरशी आणि सूक्ष्मजीवांमुळे विघटन प्रक्रिया चालू होते आणि पुन्हा हा तेवढाच बावीस टन कार्बन-डाय-ऑक्साईड वातावरणात हरितगृह वायू (ग्रीन हाऊस गॅस) म्हणून सोडला जातो. 

या कारणामुळे हवामान बदलाच्या कारणांमध्ये लाकूड जाळण्याचे योगदान नाही,असे तटस्थ असल्याचे मानले जाते. 

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न
अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर
 मनोविकास प्रकाशन

हा वायू सूक्ष्मजीवांकडून उत्सर्जित झाला काय किंवा घरातल्या शेकोटीतून निघाला काय,दोन्ही सारखेच आहे.पण शेकोटीपेक्षा जंगलातील प्रक्रिया खूपच क्लिष्ट असते.जंगल हे एक कार्बन-डाय-
ऑक्साईडची पोकळी (व्हॅक्यूम) आहे,असे म्हणता येईल.इथे वातावरणातून कार्बन-डाय-ऑक्साईडचे शोषण सतत चालू असते आणि त्याचा साठा झाडातून केला जातो.वठलेल्या झाडातून थोड्याफार प्रमाणात हा वायू पुन्हा वातावरणात गेला तरी बहुतांश भाग हा त्या परिसंस्थेतच बंदिस्त राहतो.वठलेल्या झाडाच्या खोडाचा भुगा होईपर्यंत ते करतडले जाते.आणि उरलासुरला जैविक माल पावसामुळे जमिनीत जिरतो. 

जमिनीत खोलीप्रमाणे तापमान घटत जाते त्यामुळे हा माल जसजसा खाली जातो तसतशी विघटन प्रक्रिया जवळ जवळ थांबून जाते.आणि उर्वरित कार्बन-डाय-ऑक्साईड शेकडो वर्ष जैविक मालाच्या रूपाने मातीत बंदिस्त होतो.लाखो वर्षाने त्या एकवटलेल्या जैविक मालाचा दगडी कोळसा होणार असतो.आज उत्खनन केली जात असलेली खनिज इंधने ही सुमारे तीनशे दशलक्ष वर्षांपूवींची वठवलेली झाडे आहेत.त्या काळात आजच्या झाडांपेक्षा ती वेगळी दिसत असे.
सहा फुटापर्यंत खोडाचा घेर आणि शंभर फुटी उंच असलेली वनस्पती फर्न किंवा हॉर्स टेलसारखी दिसत असे.बहुतेक झाडे दलदलीमध्ये वाढत होती आणि वठली की पाण्यात पडून राहायची.त्यामुळे त्यांची कुजण्याची प्रक्रिया अतिशय संथ होती.

हजारो वर्षांनी कुजून रूपांतरित झालेल्या जैविक मालाचा जाड थर,त्याला 'पीट' म्हणतात,होत असे व त्यावर दगडाची खडी जमून ते दाबले जात असत.
याचा परिणाम म्हणजे पीटचे रूपांतर कोळशात होत असे.याचा अर्थ आजचे वीजप्रकल्प जीवाश्मयुक्त झाडे जाळून वीजनिर्मिती करीत आहेत. 

या प्रकल्पांतून उत्सर्जित होणारा कार्बन डाय-
ऑक्साईड आपण आजच्या झाडांना त्यांच्या पूर्वजांप्रमाणेच मुक्तपणे शोषू दिला तर किती छान होईल नाही का? मग त्याचा साठा मातीतच होत जाईल.आज कोळसा होण्याची प्रक्रिया जवळजवळ बंद पडली आहे,कारण मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करून लाकडाचा औद्योगिक वापर केला जातो.पण यामुळे मातीवर उबदार सूर्यप्रकाश पडतो आणि सूक्ष्मजीवांना खोलपर्यंत जैविक मालाचे विघटन करता येते.पूर्वी जमिनीत खोलवर जो कार्बन-डाय-
ऑक्साईड बंदिस्त होऊन त्याचा पुढे कोळसा बनायचा,तो कार्बन-डाय-ऑक्साईड आता विघटनामुळे पुन्हा हवेत सोडला जातोय.जितकी वृक्षतोड होते तितका कार्बन-डाय-ऑक्साईड वातावरणात सोडला जातो आणि कार्बन-डाय-
ऑक्साईडचे जितके उत्सर्जन घरातल्या शेकोटीतून होते तितकेच जंगलांमधल्या जमिनीवरून होऊ लागले आहे.त्यामुळे आपल्या भागातील जमिनीखालचे कार्बन साठे ज्या गतीने वाढले त्याच गतीने घटत आहेत. 

तरीही जंगलातून चालताना तुम्हाला कोळसा निर्मिती प्रक्रियेची प्राथमिक अवस्था दिसून येईल. जमिनीत थोडं खोदलं तर फिकट रंगाचा थर लागेल.इथपर्यंत वरच्या भागाच्या मातीत भरपूर कार्बन साठवलेला असतो.आणि या अवस्थेत जंगलाला राहू दिलं तर कोळसा वायू आणि खनिज तेल उत्पादनाची सुरुवात होते. अभयारण्य आणि सुरक्षित जंगलातून हे असंच चालू असतं.युरोपमध्ये रोमन आणि सेल्ट राज्य असतानाही जंगलतोड चालू होती,त्यामुळे आपल्या जगलातून आज जो जैविक मालाचा अभाव आहे, हा फक्त अर्वाचीन वृक्षतोडीमुळे नाही.

सर्व वनस्पती आपले आवडते खाद्य अशाप्रकारे वातावरणातून सतत काढून घेत असतात,असं करणं हे मूर्खपणा नाही का? समुद्रातील शैवाल (अल्गी) सुद्धा वातावरणातला कार्बन-डाय-ऑक्साईड काढून टाकतात.आणि इथेही कार्बन-डाय-ऑक्साईड त्यांच्या मृत्यूनंतर समुद्राच्या तळाशी जातो आणि तिथे कार्बनचे पदार्थ तयार होतात.लाखो वर्ष या प्रक्रियेतून,जलचरांचे मृतदेहातून आणि प्रवाळांनी उत्सर्जित केलेल्या कॅल्शियम कार्बोनेटमधून वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईडचा प्रचंड मोठा साठा समुद्रामध्ये आहे.भूशास्त्रातील कार्बोनिफेरस युगामध्ये कोळशाची निर्मिती चालू झाली तेव्हा वातावरणात कार्बन-डाय-ऑक्साईडचे प्रमाण आजच्यापेक्षा नऊ पट जास्त होते.यानंतर प्राचीन जंगलांमधून आणि इतर काही प्रक्रियेतून हे प्रमाण कमी झाले पण तरीही ते आजच्यापेक्षा तिप्पट होते. 

वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईड संपून जाईपर्यंत जंगल परिसंस्थांची कार्बन साठवण्याची प्रक्रिया चालू राहील का?आज उपभोगाच्या संस्कृतीमुळे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची काहीच गरज नाही.कारण पृथ्वीवरील कार्बन-डाय-ऑक्साईड शोषण आणि उत्पादातील फरक आपणच उलटवला आहे.इथले सर्व कार्बन साठे आपणच संपवत आहोत.खनिज तेल,वायू आणि कोळशाचा ऊर्जेसाठी आणि उब देण्यासाठी अति वापर होत आहे.त्यातून पृथ्वीचा कार्बन साठा पुन्हा प्रचंड प्रमाणात वातावरणात जात आहे.हे हवामान बदलाच्या पथ्यावर पडते,कारण हरितगृह वायूंना आपण पुन्हा वातावरणात सोडून त्यांची एका प्रकारे सुटका करीत आहोत.पण एवढी घाई करू नका. 

आज वातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईडमुळे जंगलांना अधिक पोषण मिळत आहे हे काही प्रमाणात खरं आहे.हल्ली जंगलातील जैविक मालाच्या मापनात असे दिसते की,झाडांची वाढ पूर्वीपेक्षा अधिक वेगाने होत आहे.

लाकूड उत्पादनाच्या आकडेवारीत आज आपल्याला बदल करावा लागतो,कारण काही दशकांपूर्वीपेक्षा आजचे प्रमाण एक तृतीयांशने वाढलेले दिसते.हो का? पण जर तुम्ही झाड असाल तर संथ वाढ होणे हेच योग्य असते.शेतीमध्ये वापरात असलेल्या खतांच्या अतिरिक्त नत्रामुळे भरभर वाढ होते,ती झाडांच्या आरोग्याला पूरक नाही.म्हणून कमी कार्बन-डाय-ऑक्साईडमुळे झालेली संथ वाढ हाच झाडांसाठी दीर्घायुष्याचा मार्ग आहे मी जंगल व्यवस्थापन विज्ञानाचे शिक्षण घेत असताना असे शिकलो की,वयस्कर झाडांपेक्षा लहान वयाच्या झाडांची वाढ अधिक वेगाने होते.हे आजही खरे आहे आणि यामुळेच जंगले भरभर पुनरुज्जीवित होतात.
पुनरुज्जीवित ? पण याचा अर्थ जुनी झाडे काढून त्या जागी नवीन लागवड करणे.जंगल मालकांची संघटना आणि व्यावसायिक लागवड करणाऱ्या प्रतिनिधींच्या मते असे केल्यानेच लाकडामध्ये योग्य प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्साईड साठवला जातो.साधारण साठ ते एकशे वीस वर्ष झाली की झाडाची कार्बन साठा करण्याची क्षमता कमी होत जाते, पण प्रजातीप्रमाणे हे बदलते.मग ते झाड या वयानंतर लाकडासाठी तोडले जाण्यास योग्य ठरवले जाते, कारण ते आता वृद्ध झालं.चिरतरुण अवस्थेची मानवी कल्पना आपण झाडांना तर लावली नाही? 

कारण खरंतर एकशे वीस वर्षांच्या झाडाचे मानवी जीवनकालावधीच्या तुलनेत जेमतेम शाळकरी वय संपत आलेले असते.पण ही जुनी वैज्ञानिक गृहितकं एका ताज्या अभ्यासाच्या आधारे पूर्णपणे चुकीची ठरली असल्याचे दिसते.
जगातील अनेक राष्ट्रांच्या शास्त्रज्ञांनी एका संशोधनात विविध खंडातील सात लाख वृक्षांचा अभ्यास केला.यातून आश्चर्यकारक गोष्ट समोर आली ती म्हणजे,झाड वयस्कर झालं म्हणजे ते अशक्त,नाजूक आणि असमर्थ झालंय असं अजिबात नाही,उलट जितकं झाड वयस्कर तितकी त्याची वाढ वेगाने होते.

तीन फुटाहून अधिक घेर असलेल्या झाडात त्यांच्या अर्धा घेर असलेल्या झाडापेक्षा तिप्पट वेगाने जैविक मालाचे उत्पादन होते. उलट त्यांच्यामध्ये तरुण झाडांपेक्षा अधिक ऊर्जा आणि उत्पादन क्षमता असते.आपल्या दृष्टीने हवामान बदल रोखण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.या अभ्यासानंतर नवीन लागवड करून जंगलांचे पुनरुज्जीवन करण्याची पद्धत बरोबर नाही,असे सांगितले गेले पाहिजे.फार फार तर असे म्हणता येईल की झाडांचे वय वाढते तसे त्यांच्या लाकडाचे मूल्य कमी होत जाते.वयस्कर झाडांच्या खोडातून बुरशी धरण्याची शक्यता वाढते आणि विघटन प्रक्रिया सुरू होऊ शकते.

पण यामुळे झाडाच्या वाढीचा वेग मात्र जराही कमी होत नाही.हवामान बदलाच्या लढाईत शस्त्र म्हणून झाडांचा वापर करायचा असेल तर त्यांना वयस्कर होऊ देणं,हेच इष्ट आहे. निसर्गसंवर्धन करणाऱ्या संस्था हेच मागत आहेत.

१९/७/२५

चांदणी रात / moonlit night

निसर्गशिबिराच्या राहुट्या नदीपासून दोन किलोमीटर दूरवर उभ्या होत्या.आठ ते सोळा वयोमान असलेल्या वीस मुलामुलींनी त्या शिबिरात भाग घेतला होता.हे सारे जण पहिल्यांदाच जंगलात आले होते.या जंगलाच्या दर्शनानं ते भारावून गेले होते.एका राहुटीत रमेश व सुरेश ही जुळी भावंडं रात्री झोपली होती.
मध्यरात्रीनंतर रमेशला जाग आली.त्यानं राहुटीची समोरची कनात उघडली. बाहेर जिकडेतिकडे चंद्राचा प्रकाश पडला होता. समोरचं घनदाट जंगल,पऱ्यांचं वास्तव्य असलेल्या एखाद्या किल्ल्यासारखं दिसत होतं.साग,धावडा, साजा,बिजा इत्यादी झाडांचे सरळसोट बुंधे एखाद्या खांबाप्रमाणे दिसत होते.

झुडपांवर चंद्रप्रकाशाचे कवडसे पडल्यामुळे तिथे प्रकाशाची नाजूक नक्षी उमटलेली होती.दोन झाडांच्या बुंध्यांना जोडलेल्या देवकोळ्याच्या अजस्त्र जाळीत पडलेले दवाचे थेंब रत्नांसारखे चमकत होते.या साऱ्या दृश्यामुळे रमेशला जणू रानभूल झाली.

तो अंथरुणावरून उठला.पायांत बूट घातले.
हातात कोयता घेतला व त्यानं पाऊलवाटेनं जंगलाची वाट धरली.त्याच्या हालचालीनं सुरेशलाही जाग आली होती.तो देखील रमेशच्या मागून जाऊ लागला.या सात-आठ दिवसांच्या मुक्कामात जंगलातून येणाऱ्या पशुपक्ष्यांच्या आवाजांची ओळख त्याला झाली होती.त्या रात्री रमेश अंथरुणावर पडल्या पडल्या त्याचे डोळे मिटू लागले.तेव्हा एखाद्या अंगाईगीताप्रमाणे पखमांजराचा आवाज येऊ लागला.तेव्हा त्याला कधी झोप लागली हे कळलंदेखील नव्हतं.

आता जंगलातील पाऊलवाटेनं जात असता कांचनमृगाचा टाहो ऐकू येत होता.मध्येच सांबर ओरडे.नदीकडे जाणाऱ्या या वाटेवर झाडांची कमान उभी होती.अंजिरी रंगाच्या सावल्यात चांदीची नाणी पसरावीत तसे चंद्रप्रकाशाचे कवडसे दिसत होते चांदण्या रात्री जंगल कधीच शांत नसतं.सारं वातावरण अद्भुत अशा संगीतानं भरलं होतं.चांदीच्या घंटेसारखी हळुवार किणकिण ऐकू येत होती.

रातकिड्याचं संगीत ऐकू येत होतं.झाडांच्या ढोलीतील वृक्षमंडूक गात होते.मध्येच रानपिंगळ्याचा आवाज येई.प्रत्येक झाडाची वृक्षदेवता असते.ती त्या झाडाचं संरक्षण करते. त्याचं संगोपन करते.अशा सात झाडांवरच्या वृक्षदेवतांनी पाहिलं की,दोन अजाण व निष्पाप बालकं नदीकडे जात आहेत.या जंगलात अशा रात्री त्यांना पावलोपावली धोका होता.त्या सात देवतांनी त्या बालकांवर पाखरमाया धरली.त्या बालकांच्या नकळत त्या देवता एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जात होत्या.बालकांनी भीतीनं वर पाहिलं, तर फक्त पानापानांतून सळसळ ऐकू येत होती.ती नदीकिनारी पोचली.नदीचं वाळवंटी पात्र दिसत होतं.त्यातून चांदीच्या पाटाप्रमाणे रुंद पात्रातून नदीचा संथ प्रवाह वाहत होता.पात्रात अधूनमधून मोठमोठ्या काळ्या शिळा विखुरल्या होत्या. इतक्यात चंदेरी वर्णाची एक मासोळी उंच उडी घेऊन किनाऱ्यावर पडली.काठावर उभ्या असलेल्या झाडांच्या काळ्यानिळ्या सावल्या पाण्यावर पडल्या होत्या.नदीतून संथ वाहणाऱ्या पाण्याचं गूढ गुंजन ऐकू येत होतं.ती पुढे पाऊल टाकणार इतक्यात कुठूनतरी आवाज आला,"पुढे जाऊ नका!" आश्चर्यचकित होऊन त्यांनी वर,
खाली अन् समोर पाहिलं.त्यांना तो आवाज त्यांच्या आईच्या आवाजासारखा वाटला. 

त्यांना वाटलं,आपण स्वप्नात तर नाही ना! क्षणातच ती नदी अन् तिच्या काठचं जंगल जणू जिवंत झाल्यासारखं वाटलं.

निळावंती - मारुती चितमपल्ली - साहित्य प्रसार केंद्र सिताबर्डी नागपूर

एवढ्यात काळे,पिवळे वेटोळे पट्टे असलेला रंगीबेरंगी रिबिनीसारखा साप त्यांना दिसला.तो झुडपातून नदीकडे चालला होता.त्यानं आपल्या द्विजिभा बाहेर काढल्या.पाण्याला स्पर्श करून काही थेंब तोंडात घेतले अन् अंधाराची वाट धरली. मोठ्या शिळेखाली बसलेला बेडूक टुणकन उडी मारून त्यांच्या दिशेने आला व पायाजवळ आदळला.तो बेडूक आपल्या मोठ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहू लागला.बेडूक दिसायला गलेलठ्ठ व कुरूप असला तरी त्याचे डोळे मात्र सुंदर होते. त्यात सोनेरी चमक होती.
नंतर तो टुणटुण उड्या मारत चंदेरी वाळूतून जंगलकाठच्या अंधारात गुडूप झाला.इतक्यात एका हुदळ्याच्या मादीनं पाण्यातल्या एका शिळेवर उडी घेतली.एक दीर्घ शीळ मारताच पलीकडच्या काठावर असलेल्या पिलांनी तिच्याकडे धाव घेतली.ती अवखळ पोरं पाण्यातून डुंबत डुंबत आईकडे आली. 

नदीच्या काठावर उतरती दरड होती.आई व तिची दोन पिलं त्या उतरत्या दरडीचा उपयोग घसरगुंडी
सारखा करून बराच वेळ खेळत होती. असे प्राणी त्यांनी प्राणिसंग्रहालयात पाहिले होते.

जंगलातील सगरीवरून एक भेकर थांबत थांबत येत होतं.त्याचे टपोरे डोळे चंद्रप्रकाशात चमकत होते.मध्येच ते आपले कान आवाजाचा कानोसा घेण्यासाठी चारी दिशांनी खालीवर फिरवत होतं. बऱ्याच वेळानं ते पाणी पिण्यासाठी आलं.त्याच्या मुखातून ओघळणारी पाण्याची धार एखाद्या चांदीच्या तारेसारखी चमकत होती.नाकपुड्या फेंदारून त्यानं आजूबाजूच्या आवाजाचा कानोसा घेतला.रमेश व सुरेश कितीतरी वेळ अगदी स्तब्धपणे उभे राहून त्याच्याकडे बघत होते. येणाऱ्या वासामुळे त्या भेकराला त्यांची चाहूल लागली.अगदी कुत्रं भुंकावं तसं ते ओरडलं आणि क्षणार्धात आलं तसं जंगलात नाहीसं झालं.हुदळ्या आणि भेकर निघून गेल्यावर ते दोघे नदीची दरड चढून जिथे वळण होतं तिथे आले.तिथल्या कळकाच्या बेटातील काही कळक ओणवून नदीच्या पाण्याला स्पर्श करीत होते.

ते दोघे नदीच्या वाळवंटाकडे पाहत होते.इतक्यात कोल्ह्याएवढा एक प्राणी त्यांच्या दिशेने येत असलेला त्यांना दिसला.त्यांनी प्राणिसंग्रहालयात पाहिलेल्या चांदी अस्वलासारखा तो दिसत होता.
काळा रंग आणि पाठीवरून पांढरा पट्टा पार तोंडापर्यंत गेलेला. त्याच्या मागून आणखी एक चांदी अस्वल व तिची दोन पिलं येताना दिसली.हे सारं कुटुंब नदीच्या पात्रातील वाळूवर आल्यावर डोकं जमिनीवर टेकवून कोलांट्या मारण्याचा खेळ खेळू लागलं. क्षणभर दोघांना आश्चर्य वाटलं.जनावरंदेखील माणसासारखीच खेळतात तर ! नंतर ते सारं कुटुंब जंगलात निघून गेलं.

रमेश जागच्याजागी स्तब्ध उभा राहिला.सहा फूट लांबीचा एक साप वळणं घेत पाण्याकडे जात होता.त्याचं शेपूट निमुळतं होतं.तोंड पसरट होतं. त्याला कसलीतरी चाहूल लागली तसा त्यानं फणा उगारला.तेव्हा रमेशला कळलं,की तो नाग आहे.

 तो भयंकर विषारी असतो,हे त्याला ऐकून माहीत होतं. बराच वेळ तो फुसफुसत होता.दंश करण्याची त्याची इच्छा नव्हती.काही वेळानं त्या दोघांच्या बाजूनं वळसा देऊन तो नदीकडे निघून गेला.ते नदीच्या उंच दरडीवर उभे राहून समोर पाहत होते.नदीचं पात्र चांदण्यात चमकत होतं.पलीकडे घनदाट जंगलाची भिंत उभी होती.नवीन पालवी फुटलेल्या पिंपळ वृक्षाची पानं सोन्यासारखी चमकत होती.वीस-पंचवीस फुटांवर झुडपाच्या जाळीतून बिबट्या डोकावला.

तो पिवळसर रंगाचा असून त्याच्या सर्वांगावर काळे ठिपके होते.तो झुडपातून बाहेर आला तसं त्याचं सर्वांग चांदण्यात चमकू लागलं.तो त्या मुलांसमोर उभा राहिला. 

शिबिरातील वनाधिकाऱ्यानं त्यांना सांगितलं होतं की,वाघ किंवा बिबट्या दिसला की घाबरून पळू नका.एखाद्या झाडाच्या आडोशानं स्तब्ध,शांतपणे उभे राहा.अशी रानटी जनावरं त्यांच्या वाटेला गेल्याशिवाय कोणावर हल्ला करीत नाहीत.

बिबट्यानं एक पाऊल उचललं.पुन्हा जमिनीवर टेकवलं.एकदा इकडेतिकडे नजर टाकली.शेपटी इकडून तिकडे हालवली.एक डरकाळी फोडली. तसे ते दोघे गर्भगळीत झाले.त्यांची हृदयं वेगानं धडकू लागली.त्यांचं एकएक स्पंदन घड्याळाच्या टिक्ऽटिक्ऽऽ प्रमाणे ऐकू येत होते.

इतक्यात एक चमत्कार घडला.निमुळते पंख असलेल्या सात वृक्षदेवतांनी त्या मुलांच्या भोवती फेर धरला.त्यांना कळेना की या कोण आहेत.त्या दिसायला पऱ्यांसारख्या दिसत होत्या.बिबट्या त्यांना ओळखत होता.अनेक वेळा त्यानं या देवतांना पाहिलं होतं.तो त्यांच्याकडे पाहत होता. शेपटी इकडून तिकडे हालवत होता.

कितीतरी तास ते दोघे देवतांच्या फेऱ्यात होते. शेवटी बिबट्यानं तिथून काढता पाय घेतला. नदीकाठच्या जंगलातून चालत असताना मध्येच तो मागे तोंड वळवून पाहत असे.एकदम त्यानं झुडपात उडी घेतली व तो दिसेनासा झाला.

त्या सात वृक्षदेवता त्यांना म्हणाल्या, "चला मुलांनो, आता परतू या." पहाटे ते दोघे आपल्या राहुटीत प्रवेश करून झोपी गेले.त्यांच्याविषयी कोणालाच काही कळलं नाही. कारण त्यांच्या सांगण्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता.