झाडांना तापमान,आर्द्रता आणि प्रादेशिक हवामानातील अचानक मोठे बदल हे पसंत नसतात.पण यातून त्यांची सुटकाही नसते,मोठी झाडे पण त्यांच्या तावडीतून सुटत नाहीत.झाडांना कधीतरी एकदा हवामानावर नियंत्रण ठेवता येऊ शकत असेल का,असा विचार तुमच्या मनात कधी आला का? याची प्रचिती मला जर्मनीच्या बांबर्ग गावाजवळच्या कोरड्या,वाळूयुक्त आणि नापीक जमिनीत वसलेल्या एका जंगलात आली.
इथे फक्त पाईनचे वृक्ष तग धरू शकतील असे मत वनतज्ज्ञांनी एकेकाळी मांडलं होतं.केवळ एकसुरी लागवड होऊ नये म्हणून काही बीच वृक्षही मध्ये मध्ये लावले गेले.पाईनच्या सूचीपर्णी पानगळीत तयार होणारे आम्ल बीचच्या पालवीमुळे शमेल,हा त्यामागचा उद्देश.लाकडासाठी पानझडी वृक्षांचा वापर करण्याचा विचार केला नव्हता,त्यांच्याकडे सेवा देणारं झाड म्हणून पाहिलं जात होतं. पण बीच वृक्षांना अशी दुय्यम भूमिका घेण्यात रस नव्हता.काही दशकातच त्यांनी आपला रंग दाखवला.बीच वृक्षांच्या वार्षिक पानगळीबरोबर तयार झालेल्या अल्कलाईन क्षारीय जैविक मालाची भर मातीत पडली.यामुळे मातीत अधिक आर्द्रता साठवली जाऊ लागली.
त्याचबरोबर जंगलातील वातावरण अधिक दमट होत गेले कारण बीचच्या रुंद पानांमुळे हवेचा वेग कमी झाला.संथ हवा म्हणजे कमी बाष्पीभवन, पाणी मुबलक मिळाल्यामुळे बीचची वाढ वेगाने झाली आणि पाईनपेक्षा ते जास्त उंची गाठू शकले. हे सगळं होत असताना जंगलाची जमीन आणि सूक्ष्म हवामान बदलत गेले आणि सूचीपर्णी वृक्षांपेक्षा पानझडी झाडांना अधिक योग्य झाले. झाडे आपल्या आजूबाजूचे वातावरण सोयीस्कररीत्या कसे बदलू शकतात,याचे हे उत्तम उदाहरण आहे.वनरक्षक म्हणतात की, जंगल आपल्याला हवा तसा अधिवास तयार करतात.
वर म्हटल्याप्रमाणे वाऱ्याला शांत करणे हे झाडांना नक्कीच जमते,पण पाण्याच्या नियोजनाचे काय? जंगलातल्या मातीवर घनदाट झाडी असल्यामुळे ती उष्ण वाऱ्यांपासून सुरक्षित राहते आणि पाण्याचे नियोजन शक्य होते.आकेन मधील आरडब्ल्यूटीएचच्या विद्यार्थ्यांनी माझ्या जंगलात एक अभ्यास केला.नियमित छटाई केल्या जाणाऱ्या सूचीपर्णी लागवड क्षेत्रातील आणि नैसर्गिकरीत्या वाढू दिलेल्या रुंदपर्णी बीच वृक्षांच्या क्षेत्रातील तापमानात त्यांना मोठा फरक दिसला. 
ऑगस्टमधील एका अतिशय उष्ण दिवशी सूचीपर्णी जंगलातील पारा ९८ अंश फॅरेनहाईटला पोहोचला होता.त्या दिवशी पानझडी वृक्षांच्या क्षेत्रात सूचीपर्णी क्षेत्रापेक्षा सुमारे पन्नास अंश तापमान कमी होते.तिथे जास्त जैविक माल असल्यामुळे गारवा होता आणि त्यामुळे बाष्पीभवन कमी झाले होते.जंगलात जितके जास्त जिवंत किंवा वठलेले लाकूड असेल तितका जमिनीवर जैविक मालाचा जास्त थर असतो.आणि त्यात जास्त पाणी टिकते. बाष्पीभवनामुळे वातावरण गार पडते आणि गारव्यामुळे बाष्पीभवन कमी होते. हे वेगळ्या पद्धतीने मांडायचे तर सुदृढ जंगलाला उन्हाळ्यात आपल्यासारखाच घाम येतो आणि आपल्यावर होतो तोच परिणाम इथेही होतो.
तुम्हाला एखाद्या घराकडे बघून झाडाला येणारा घाम दिसू शकतो.घराशेजारी ख्रिसमसचे झाड लावलेले आपल्याला सहज दिसून येते.ते विकत घेताना अनेकदा त्याच्या मुळापाशी असलेला गोळा तसाच असतो.ते अगदी घराजवळ लावलेले झाड कालांतराने मालकाच्या अपेक्षेपेक्षा जास्तच वाढत जाते.काही वेळा त्याच्या फांद्या छपरावर जातात आणि अशा परिस्थितीत घरावर त्यांच्या घामाचे डाग स्पष्टपणे दिसतात.ते आपल्या काखेतसुद्धा नकोसे असतात तर घरावर उमटलेले डाग आणखीच खराब दिसतात.झाडांना इतका घाम येतो की,शेजारी असलेल्या भिंतीवर किंवा कौलांवर बुरशी आणि शेवाळं जमू लागतं.
अशामुळे पावसाच्या पाण्याला अडथळा होतो आणि सुटून आलेल्या शेवाळ्यामुळे पन्हाळी तंबून राहतात. 
सतत ओले राहिल्यामुळे घरावरचे प्लास्टर निघून येते.पण जे लोक आपली गाडी झाडाखाली लावतात त्यांना मात्र त्याचा फायदा होतो.प्रचंड थंडी असली की इतरांना त्यांच्या काचेवरून बर्फ काढावा लागतो मात्र झाडाखाली लावलेल्या गाड्यांना तो त्रास होत नाही.झाड जवळ लावून घराला त्रास होतो ही बाब सोडली,तर त्यांच्यामुळे सूक्ष्म हवामान कसे नियंत्रित राहते,याबद्दल फार कुतूहल वाटते.विचार करा,सशक्त जंगलात याचा केवढा परिणाम होत असेल !
(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,
अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)
ज्यांना घाम खूप येतो त्यांना पाणीही बरंच प्यावं लागतं.पावसामध्ये झाडं पाणी पिताना दिसून येतात.मी पावसात जंगलाची फेरी मारायला सूचवणार नाही कारण अनेकदा तेव्हा वादळही असतं.पण जर तुम्ही कामानिमित्त बाहेर असाल तर तुम्हाला हे पाहता येईल.बहुतेकदा बीच वृक्ष आपली तहान शमवताना दिसतात.इतर पानझडी वृक्षासारख्या त्यांच्या फांद्या वरच्या दिशेला वळलेल्या असतात किंवा खालीही झुकतात. 
सूर्यप्रकाश आणि पाऊस पकडायला त्यांचा वरचा डेरा वेळोवेळी उघडतो.पावसाचे पाणी हजारो, शेकडो पानांवरून,फांद्यावरून वाहू लागते. फांद्यांवरून ओघळणारे हे पावसाचे पाणी खोडाकडे येऊन मिळते आणि खोडावरून जमिनीकडे जाताना छोट्या नदीचेच जणू रूप घेते. जेव्हा ते बुंध्याच्या खालच्या भागापर्यंत पोहोचते तेव्हा त्याचा वेग भरपूर वाढलेला असतो.त्यामुळे जमिनीपर्यंत आल्यावर ते फेसाळते.अशा रचनेमुळे मुसळधार पावसात झाडं शे-दोनशे गॅलन पाणी आपल्या मुळांकडे वळवू शकतात.मुळांच्या भोवती पाण्याचा साठा केला जातो आणि कोरड्या परिस्थितीत याचा उपयोग होतो.
स्प्रूस आणि फर वृक्ष मात्र असं करू शकत नाहीत.चतुर फर बीच वृक्षात मिसळून जातात पण स्प्रूस मात्र आपल्याच घोळक्यात असल्यामुळे तहानलेले राहतात.स्प्रूसचा डेरा छत्रीसारखा असतो म्हणून आपण त्या खाली उभे राहिलोच तर पाऊस लागणार नाही.पण यामुळे मुळांनाही पाऊस लागत नाही.एका स्क्वेअर यार्डात अडीच गॅलन पर्यंत पाऊस पडला (हा बऱ्यापैकी पाऊस आहे) तरी पाणी स्प्रूसच्या सुईसारख्या पानांवर आणि फांद्यांवर राहते.ढग जाऊन ऊन पडलं की पानं कोरडी होतात आणि सर्व आर्द्रता निघून जाते.पण स्प्रूस असं का करत असतील,याचं सोपं उत्तर म्हणजे त्यांना दुष्काळासाठी स्वतःला अजून अनुकूल करता आलेले नाही.
स्प्रूस थंड हवेच्या ठिकाणी मजेत असतात. तिथल्या गारव्यामुळे जमिनीतलं पाणी वाळून जात नाही.त्यांना आल्प्सचा प्रदेश आवडतो कारण तिथे भरपूर पाऊस होतो आणि दुष्काळ कधीही पडत नाही.पण तिथं बर्फ जोरदार पडतो.त्यामुळे त्यांच्या फांद्या आडव्या आणि थोड्या खाली झुकलेल्या असतात.यामुळे त्या एकमेकाचा आधार घेत जमलेल्या बर्फाचे वजन पेलू शकतात तसेच
बर्फ खाली पडायलाही मदत होते.पण कोरड्या हवेत किंवा खालच्या भागात या थंड प्रदेशातील अनुकूलनाचा काहीही उपयोग होत नाही.मध्य युरोप मधील बहुतांश सूचीपर्णी जंगले ही एकेकाळी लागवड केलेली आहेत.आपल्याला साजेशा ठिकाणी लोक झाडं लावत असतात.
अशा ठिकाणी सूचीपर्णी झाड नेहमीच तहानलेली असतात.त्यांची पानं एक-तृतीयांश पाऊस अडवून,शोषून घेऊन नंतर त्याचे बाष्पीभवन करून ती वाफ पुन्हा वातावरणात सोडण्याच्या कामात असतात. पानझडी जंगल एकूण पावसाच्या फक्त १५ टक्के पाऊस अडवतात म्हणजेच त्यांना सूचीपर्णी जंगलांपेक्षा १५ टक्के जास्त पाणी मिळते.