* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१७/६/२३

सत्याचे प्रयोग - मोहनदास करमचंद गांधी (१९२७)

गांधीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधार्थ व्यतीत केलं.म्हणूनच त्यांनी आपल्या आत्मकथेचं नाव 'सत्याचे प्रयोग' असे ठरवलं. सुरुवातीला ते 'परमेश्वर सत्य आहे' असं म्हणत, नंतर मात्र त्यांनी 'सत्य हाच परमेश्वर' असं ठामपणे म्हटलं.त्यांच्या या आत्मकथेत अहिंसेचं तत्त्वज्ञान मांडलं.अहिंसेचं पालन करण्यासाठी प्रचंड श्रद्धा आणि धैर्य आवश्यक असल्याचं ते म्हणत असत.'सत्याचे प्रयोग' ही गांधीजींची आत्मकथा वाचायला अतिशय ओघवती,साधी आणि रोचक असून तिच्यात एका व्यक्तीचं अतिशय प्रांजलपणे केलेलं पारदर्शी कथन आहे.



या भूतलावर गांधींसारखा हाडामांसाचा मनुष्य खरोखरच होऊन गेला आहे,यावर भावी पिढ्या विश्वासही ठेवणार नाहीत.'असं विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईननं म्हटलं होतं आणि हे उद्गार किती खरे आहेत याची प्रचीती वारंवार येत राहते.


मोहनदास करमचंद गांधी यांना अख्खं जग महात्मा,तर भारतातही राष्ट्रपिता या विशेषणांनी ओळखतं.बॅरिस्टर झालेला एक तरुण,देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसेच्या मार्गानं लढा देतो हे चित्र जगासाठी अद्भुत तर होतंच, पण एखाद्या चमत्कारासारखंही होतं.गांधीजींचा आयुष्याचा पट बघताना तो किती मोठा आणि व्यापक आहे हे जाणवतं.गांधीजी कळण्यासाठी ते समजून घेत घेत प्रवास करावा लागतो. 


गांधीजींच्या राजकीय,सामाजिक प्रवासाबरोबरच त्यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रवास जाणून घेण्याविषयीची उत्सुकता वाढते.त्यासाठी 'सत्याचे प्रयोग' ही त्यांची आत्मकथा वाचलीच पाहिजे.या आत्मकथेच्या प्रतींची विक्री ५० लाखांच्या वर झाली आहे.


१९४४ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी सगळ्यात पहिल्यांदा गांधीजींना 'राष्ट्रपिता' या उपाधीनं संबोधलं.


देशातले लोक त्यांना 'बापू' अशी प्रेमानं हाक मारत.

रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना 'महात्मा'असं म्हटलं.

२ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिवस भारतात गांधी जयंती म्हणून,तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.


१९२५ ते १९२९ या काळात 'नवजीवन' या साप्ताहिकात गांधींजींनी लेख प्रसिद्ध केले.'यंग इंडिया' नावाच्या इंग्रजी आवृत्तीतून याच लेखांचं भाषांतर प्रकाशित होत असे.

नंतर हे सर्व लेख 'सत्याचे प्रयोग' या पुस्तकरूपात प्रकाशित करण्यात आले.'सत्याचे प्रयोग' या पुस्तकात गांधीजींचा बालपणापासून १९२१ पर्यंतचा प्रवास चित्रित केला आहे.यात आपलं लहानपण आणि अनेक आठवणी,बालविवाह,आपल्या आई-वडिलांबरोबर आणि पत्नीबरोबर असलेलं नातं,शिक्षणानिमित्त इंग्लंडचा प्रवास,दक्षिण आफ्रिकेतलं वास्तव्य आणि तिथलं सामाजिक काम,धर्माविषयीचं त्यांचं मत,भारतात परत येणं आणि सामाजिक आणि राजकीय कार्यातला त्यांचा सहभाग वगैरे मुद्दे यात येतात.पहिल्यांदा 'सत्याचे प्रयोग' हे पुस्तकरूपात १९४८ साली अमेरिकेत 'पब्लिक अफेअर्स प्रेस ऑफ वॉशिंग्टन डीसी इथे प्रकाशित झालं. मूळ गुजराती भाषेत असलेले  हे पुस्तक महादेव देसाई यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केलं.यातला काही भाग महादेव देसाई यांचे मित्र आणि सहकारी प्यारेल नैय्यर यांनी भाषांतरित केला. सुरुवातीला या पुस्तकाची किंमत अवघी रुपया इतकी होती.त्या वेळी गुजराती आवृत्तीच्या ५० हजार प्रती विकल्या गेल्या होत्या.


गांधीजींचे जवळचे सहकारी आणि स्नेही यांच्या आग्रहामुळेच 'सत्याचे प्रयोग' किंवा 'आत्मकथा' प्रत्यक्षात साकारली गेली.एखादी आत्मकथा जेव्हा लिहिली जाते

,तेव्हा अनेक लोक तिला प्रमाण मानून स्वतः कसं वागायच हे ठरवत असतात.अशा वेळी त्यांची दिशाभूल झाली तर? अशी शंका एका स्नेहान गांधीजींजवळ बोलून दाखवली.त्या वेळी आत्मकथेच्या नावानं आपण आपल्या आयुष्यात केलेले सत्याचे प्रयोग याबद्दल आपण लिहू या असं गांधीजींनी ठरवलं.आपले प्रयोग हे पूर्णपणे अचूक आहेत,असा दावा गांधीजींनी कधीही केला नाही.

आपण आपलं तटस्थपणे आत्मपरीक्षण करून एक एक भावना तपासून आपल्याला जे काय सांगायचं आहे तेच मांडल आहे,असं गांधीजींनी म्हटलं आहे.तसंच आपले लिखाण प्रमाणभूत मानू नये;आपल्या प्रयोगांना दृष्टांतरूप मानून इतरांनी आपापले प्रयोग त्याच्या क्षमतेनुरूप करावेत,असंही त्यांनी सांगितलं.


'सत्याचे प्रयोग' या पुस्तकातल्या पहिल्या भागात लहानपणी लपूनछपून मांसाहार करणं,धूम्रपान करणं,मद्य पिण दागिन्यांची चोरी करणं अशा अनेक गोष्टींबद्दल गांधीजींनी लिहिलं आहे.त्या वयात हरिश्चंद्राच्या नाटकाचा त्यांच्या मनावर परिणाम झाला.दुसरा प्रभाव हा 'श्रावण पितृभक्ती' या नाटकाचा त्यांच्या मनावर झाला. श्रावणबाळाचं आपल्या आई-वडिलांवर असलेलं प्रेम आणि भक्ती बघून त्यांचं अंतःकरण भरून आलं.वयाच्या तेराव्या वर्षी कस्तुरबाशी झालेलं लग्न,त्यांच्याबरोबरचं असलेलं त्यांचं नातं, वडिलांचा मृत्यू आणि त्या वेळी त्यांच्या मनाला लागलेला एक प्रसंग,परदेशी प्रवास,

बॅरिस्टर होणं या सगळ्या गोष्टी पुस्तकाच्या पहिल्या खंडात गांधीजींनी मांडल्या आहेत.


पुस्तकाच्या दुसऱ्या भागात किंवा खंडात गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतल्या प्रवासाविषयी आणि तिथल्या परिस्थितीविषयी लिहिलं आहे. दक्षिण आफ्रिकेत त्यांना रेल्वेमधून ते केवळ काळे आहेत म्हणून धक्के मारून खाली उतरवण्यात आलं होतं.या घटनेचा त्यांचा मनावर खूप परिणाम झाला.त्यांच्यावर लिओ टॉलस्टॉय या विचारवंताचा खूप प्रभाव पडला.


तिसऱ्या भागात १८९६ साली गांधीजी आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतरचा काळ चित्रित करण्यात आला आहे. १९०१ मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्यावर गोपाळ कृष्ण गोखले यांचा मोठा प्रभाव पडला.१९०१ ते १९०६ या काळात गांधीजींनी ब्रह्मचर्य पालन या आपल्या प्रयोगाला वैयक्तिक आयुष्यात महत्त्वाचं स्थान दिलं.


पुस्तकाच्या चवथ्या भागात पहिल्या महायुद्धाची परिस्थिती दाखवत गांधीजींचा त्या काळातला प्रवास,

स्वातंत्र्याविषयीचा विचार,तुरुंगवास अशा गोष्टींबद्दल बोललं गेलंय.शाकाहार,मातीचे आणि पाण्याचे प्रयोग,

इंग्रजांशी झालेली ओळख,प्लेग,सत्याग्रहाची सुरुवात,

उपवास,शिक्षणविषयक विचार,याबद्दल या भागात गांधीजींनी लिहिलं आहे.


पाचव्या भागात तुरुंगवास,पुण्यातला गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबरोबरचा प्रसंग, शांतिनिकेतन,आश्रमाची स्थापना,अहिंसा, सत्याग्रह,'नवजीवन' आणि 'यंग इंडिया',

राष्ट्रीय सभेत प्रवेश,खादी,चरखा,पहिल्या महायुद्धाची समाप्ती,स्वातंत्र्य मिळवण्याचा निर्धार याविषयी गांधीजींनी लिहिलेलं आहे.


गांधीजींनी आपलं संपूर्ण आयुष्य सत्याच्या शोधार्थ व्यतीत केलं.म्हणूनच त्यांच्या आपल्या आत्मकथेचं नाव 'सत्याचे प्रयोग' असंच आहे. सुरुवातीला ते परमेश्वर सत्य आहेत,असं म्हणत. नंतर मात्र त्यांनी सत्य हाच परमेश्वर,

असं ठामपणे म्हटलं.त्यांच्या या आत्मकथेत अहिंसेचं तत्त्वज्ञान मांडलं आहे.


अहिंसेचं पालन करण्यासाठी प्रचंड श्रद्धा आणि धैर्य आवश्यक असल्याचं ते म्हणत असत. 


'सत्याचे प्रयोग' ही गांधीजींची आत्मकथा वाचायला अतिशय ओघवती,साधी आणि रोचक असून त्यात एका व्यक्तीचं अतिशय प्रांजलपणे केलेलं पारदर्शी कथन आहे.

गांधीजींचं आयुष्य आणि त्यांच्या संकल्पना यांच्या -

बद्दलचा अत्यंत महत्त्वाचा असा हा दस्तावेजदेखील आहे.


गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ या दिवशी गुजरात राज्याच्या काठियावाडजवळ पोरबंदर इथे करमचंद गांधी आणि पुतळीबाई गांधी या दांपत्याच्या पोटी झाला.

वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचं लग्न कस्तुरबा यांच्याशी झालं प्राथमिक शिक्षण राजकोट इथे झाल्यानंतर १८८७ साली गांधीजींनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.त्यानंतर ते इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले.१८९१ साली म्हणजे सुमारे चार वर्षांनी ते आपला कायद्याचा अभ्यास पूर्ण करून भारतात परतले.त्यांनी वकिली सुरू केली,पण वकिलीत त्यांना फारसं यश मिळालं नाही.गांधीजी आणि कस्तुरबा या दांपत्याला हरिलाल,मणिलाल,रामदास आणि देवदास अशी चार मुलं होती.


लहान असताना गांधीजी स्वभावानं अत्यंत लाजाळू आणि भिडस्त होते.त्यांना व्यायाम आणि खेळ यांचा खूप कंटाळा होता आणि ते या गोष्टी टाळत असत.मात्र त्यांनी व्यायामाचा शिक्षणाशी काय संबंध असतो याविषयीची आपली मतं किती चुकीची होती हे मान्य केलं. शारीरिक शिक्षणाला मानसिक शिक्षणाबरोबरच शिक्षणात महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे,असं त्यांनी म्हटलं.


चांगलं हस्ताक्षर असलं पाहिजे,असाही गांधीजींचा आग्रह असे.गांधीजींचं स्वतःचं अक्षर सुवाच्य नसल्याची खंत त्यांना होती.शिक्षणामध्ये चांगलं हस्ताक्षर असण्याची गरज नाही,ही आपली लहानपणाची समजूत किती चुकीची होती हेही त्यांनी पुढे नमूद केलं.चांगलं अक्षर हे विद्येचं आवश्यक अंग असून मुलांनी आधी रेखाचित्रं काढावीत आणि मग अक्षरं गिरवायला शिकावीत,असं त्यांनी म्हटलं.


शिक्षणामध्ये मातृभाषेशिवाय हिंदी ही राष्ट्रभाषा,तसंच संस्कृत,फारसी,अरबी आणि इंग्रजी भाषाही असायला हव्यात,असं ते म्हणत.शिकत असताना धर्माचं योग्य शिक्षण मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.धर्म म्हणजे आत्मभान,धर्म म्हणजे आत्मज्ञान,असं त्यांनी धर्माबद्दल म्हटलं.


लहानपणी बिड्यांची थोटकं चोरून पिणं आणि ती मिळाली नाहीत तर बिड्यांसाठी पैशांची चोरी करणं हेही उद्योग आपण केल्याचं गांधीजींनी लिहिलं आहे.या गोष्टी मिळवण्याबाबतीत आपण परावलंबी आहोत आणि म्हणून आपण आत्महत्या केली पाहिजे असंही त्यांनी ठरवलं. धोतऱ्याच्या बिया खाल्ल्या तर माणूस मरतो, असं ऐकल्यामुळे त्यांनी काही बियादेखील खाल्ल्या.


आत्महत्येच नियोजन करणं सोपं,पण प्रत्यक्षात

ती अमलात आणणं कठीण काम असल्याच लक्षात आल्यावर त्यांनी तो विचार सोडून दिला.


पैसे चोरल्याची सवयदेखील त्यांनी अशीच सोडली.

आपल्या वडिलांजवळ चिठ्ठी लिहून त्यांनी माफी मागितली आणि पुन्हा कधीही अस करायचं नाही याचा निश्चय केला.स्वतःच्या चुकांकडे अलिप्तपणे,

तटस्थपणे पाहणं आणि त्या चुका दुरुस्त करणं हे सातत्यान केल्यामुळेच ते महात्मा झाले.सत्य आणि अहिंसा हीच त्यांची दोन शस्त्रं होती.


गांधीजींनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा प्रसंग खूप प्रामाणिकपणे कथन केला आहे.गांधीजींचे वडील भगंदराच्या (फिस्तुला,मूळव्याधीसारखा त्रास) विकाराने अंथरुणाला खिळून होते.अनेक वैद्यांचे उपाय सुरू होते.

डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता,पण वैद्यांनी मात्र त्यांचं उतारवय लक्षात घेऊन शस्त्रक्रिया करू नये, असा सल्ला दिला होता,गांधीजी आपल्या वडिलांचे पाय चेपत असत आणि त्यांची सेवा करत असत.त्याच वेळी कस्तुरबांना दिवस गेले होते. वडिलांचे पाय चेपत असतानाही गांधीजींच्या मनात कामवासनेचेच विचार असत. कधी एकदा आपण पत्नीकडे शयनगृहात जातो असं त्यांना वाटत असे.ज्या रात्री गांधीजींचे वडील वारले,त्या वेळी रात्री साडेदहा-अकराच्या

गांधीजींच्या काकांनी 'तू जा झोपायला,मी त्यांच्याकडे बघतो,असं म्हटल आणि गांधीजी खुशीतच आपल्या शयनकक्षात पोहोचले. कस्तुरबा गाढ झोपेत असतानाही त्यांनी त्यांना उठवलं.कस्तुरबांच्या गरोदरपणाच्या त्या परिस्थितीमध्ये दोघांमधले संबंध खरं तर त्याज्य होते,पण तरीही गांधीजींना त्याशिवाय काहीही सुचायच नाही.तशा परिस्थितीत गांधीजींना आपले वडील गेल्याची बातमी नोकराने दिली. वडिलांच्या अखेरच्या क्षणीही आपल्या मनात कामवासनेनं घर केलं होतं याची खंत त्यांना कायमच तीव्रतेनं वाटत राहिली.


गांधीजी अनेक नियम फक्त स्वतःलाच लागू करत नसत,

तर अनेकदा ते आपल्या जवळच्यांवरही लादत असत.

त्यांना ते मान्य आहेत किंवा नाहीत याचा विचारही ते करत नसत.एकदा कस्तुरबांनी त्यांना खादीची साडी ही वजनानं खूप जड असून आपल्याला काम करताना ती सांभाळणं कठीण होत असल्याचं सांगितलं.त्यांना अशा जड साडीपेक्षा वजनाने हलकी साड़ी जिने काम करणं सुसह्य होईल अशी हवी होती;पण गांधीजींनी समोरच्या व्यक्तीची अडचण समजून घेण्याऐवजी कस्तुरबांना चक्क 'तू आजपासून स्वयंपाक करू नकोस,असं सांगितलं.

आपल्या पत्नीविषयी गांधीजींची संशयी वृत्ती सुरुवातीच्या काळात खूपच मोठ्या प्रमाणात होती.तसंच हट्टी स्वभावामुळे ते आपल्यातल्या कमकुवतपणाचा राग कस्तुरबावर काढत.


शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्यासाठी गांधीजींना अनेक अडथळ्यांशी सामना करावा लागला. जातसभा बोलावण्यात आली आणि त्यात आजवर कोणीही मोढ वाणी परदेशी गेलेला नव्हता.त्यांनी आपल्या धर्मात समुद्र ओलांडून जाण्यास मनाई असल्याचं सांगितलं.तसंच परदेशी मांसाहार वगैरे करावा लागत असल्यानं धर्माचं पालन होणार नाही हेही सांगितलं;पण आपण विद्याभ्यास करायला जाणार असून आपण मांसाहारापासून दूर राहू असं गांधीजींनी सांगितलं,पण तरीही जातीच्या लोकांना गांधीजींचं उत्तर आवडलं नाही.आपल्या जाण्याच्या निर्णयावर गांधीजी ठाम असल्याचं पाहून त्यांनी चिडून गांधीजींना जातीतून (जग बदलणारे ग्रंथ,दीपा देशमुख,) बहिष्कृत करण्यात येईल,असे सांगितलं इतकंच नाही,तर परदेशी जाण्यासाठी जो कोणी त्यांना पैशांची किंवा इतर मदत करेल त्याला दंड करण्यात येईल,असा ठराव केला.

त्या ठरावाचा गांधीजींवर कुठलाही परिणाम झाला नाही. त्यांनी त्या सर्व अडथळ्यांवर मात करून १८८८ मध्ये मुंबई बंदर सोडलं.


१८९० मध्ये गांधीजी पॅरिसमध्ये गेले.तिथे त्यांनी अनेक स्थळांना भेट दिली.प्रसिद्ध अशा आयफेल टॉवरलाही त्यांनी भेट दिली.गंमत म्हणजे त्यांनी आयफेल टॉवरबद्दल खूपच मजेशीर विधान केली.खरं तर त्यांनी आयफेल टॉवरची उंची,प्रशंसा,टीका सगळं काही ऐकलं होतं,


पण आयफेल टॉवरची निंदा करणाऱ्यांमध्ये लिओ टॉलस्टॉय हाही होता टॉलस्टॉयनं म्हटलं होतं,'आयफेल टॉवर हे माणसाच्या ज्ञानाचं नसून मूर्खपणाचं लक्षणं आहे.या जगात तंबाखूचं व्यसन सगळ्यात वाईट आहे.

बिडी पिणाऱ्याची अक्कल नको ते काम करायला प्रवृत्त होते आणि तो हवेत इमले बांधू लागतो.त्याप्रमाणेच आयफेल टॉवर हा अशाच व्यसनाचा परिणाम आहे गांधीजींना टॉलस्टायचं म्हणणं पटलं आणि त्यांनाही

आयफेल टॉवरमध्ये यत्किंचितही सौंदर्य दिसले नाही.


राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..

१५/६/२३

कागदमाशांची कहाणी

हाल्डेन - हॅमिल्टन यांनी आप्त निवडीच्या सिद्धान्तात मांडणी केल्याप्रमाणे रक्ताच्या नात्यांवर अनेक प्राणिजातींत जिव्हाळ्याचे संबंध पोसलेले आहेत.

माकडिणी आपल्या पोटाला लटकलेल्या पिल्लांना जिवापाड सांभाळतात. मधमाशा तर आपल्या बहिणी-भाचरांना वाचवण्यासाठी प्राणार्पण करायला तयार असतात.पण प्राणिसमाज निव्वळ नात्यागोत्यांच्या संबंधांवरच उभारलेले आहेत असे नाही.


उत्क्रान्तीच्या ओघात मुंग्या,मधमाशा या प्रगत संघप्रिय कीटांच्या संघजीवनाची सुरुवात कागदमाशा ह्या गांधिलमाशांच्या एका वंशापासून झाली.कागदमाशा या आहेत वनस्पतींचे धागे सोलून आणून त्यांचे पोळे बनवून जथ्याने राहणाऱ्या संघजीवनाच्या अगदी प्राथमिक पायरीवरच्या गांधिलमाशा.मधमाशांत, मुंग्यांत एकच फळलेली राणी नव्या संघाची सुरुवात करते.ही राणी नंतर तिला साहाय्य करणाऱ्या कामकरी,सैनिक मुलींपेक्षा रंग-रूप-आकाराने खूपच वेगळी असते.पण कागदमाशांची संघस्थापना होते एकसारख्या एक,फळलेल्या आणि म्हणून अंडी घालायला साऱ्या समर्थ असलेल्या मूठभर माद्या एकत्र येऊन.त्या बहिणी-बहिणी असू शकतात,पण नेहमीच असतात असेही नाही.अशा कदाचित काहीही नाते-गोते नसलेल्या चमूतल्या एकीलाच राणी बनता येते.

एकटीच पिल्लावळ निर्माण करते.इथे आप्त निवडीचा सिद्धान्त लागू होत नाही.मग निसर्गनिवडीत हे कसे साधते? असे दिसते–एकेकट्या कागदमाशीने स्वतःच्याच

बळावर पोळे बांधून पिल्ले वाढवायला पाहिले तर ती - यशस्वी होऊ शकत नाही.पण चार-पाच जणींनी 'परस्परा करू सहाय्य,एकीतच आहे बळ' म्हटले तर त्यांच्या हाती यश पडण्याची शक्यता खूप वाढते.ह्या अनेकदा अगदी मर्यादित संख्येच्या,पाच- दहा फळलेल्या कागदमाशांच्या समूहात सगळ्या माशा एकमेकींना नीट ओळखून असतात,एकमेकींचे सामर्थ्य रेटारेटी करत जोखतात,आणि मग कोणा एकीला सगळी अंडी घालणारी राणी बनू देतात.ज्या प्रारंभी राणी बनू शकत नाहीत,त्यांनाही आशा असते की कदाचित प्रथम यशस्वी झालेली राणी कमकुवत झाली,काही अपघाताला बळी पडली, तर आपल्याला राणी बनण्याची संधी मिळेल. अशा घटना अनेकदा घडतातही.असे होऊन वेगवेगळ्या राण्यांची पिल्ले त्या संघात सामील झाली तर तीही काही एकमेकांची भावडे नसणार.तेव्हा काही अंशी स्वतःच्याच भावंडांना मदत करण्याच्या जोडीला इतरही काहीही नाते नसलेल्या जातभाई - जातबहिणींशी ते मनापासून हातमिळवणी करतात.स्वतःला कधी ना कधी संधी मिळेल अशा जबर आशेच्या जोरावर…


तांबुसमाशी आणि वाघमाशी या दोघीही दोन प्रकारच्या कागदमाशा आहेत.दोन्ही जाती मांसाहारी आहेत.किडे,कोळी मारून खातात. तांबुसमाशा असतात इंचभर लांब,सडपातळ. वाघमाशा आहेत दुपटीने मोठ्या,

जाडजूड,पोटावर वाघासारखे काळे पिवळे पट्टे मिरवणाऱ्या.त्यांच्या प्रचंड पोळ्यांत हजारो जणी राहतात;आसपासच्या - किड्या-मकोड्यांची बेहद्द शिकार करतात.त्यांचे आवडते खाद्य आहे तांबुसमाशांच्या अळ्या.. निसर्गाच्या अजब रहाटगाडग्यातून प्रेम आणि द्वेष,ममता आणि क्रूरता,अगदी सहजगत्या,एकामागून एक कशा वर येत राहतात.तांबुसमाशा वाघमाशा यांच्या संघर्षातून निसर्गाची निवड कशी मायेचे - क्रौर्यात रूपांतर करू शकते याची एक विलक्षण घटना मी स्वतः डोळ्यांनी पाहिली आहे.


मी काही वर्षांपूर्वी आमचे चार वर्षे बंद करून ठेवलेले घर उघडले.त्या बंदिस्तीत तांबुसमाशांना छान निवारा मिळाला होता.जागोजागी,सांदी-कोपऱ्यात,फडताळांत त्यांची पोळी होती. काहींवर चार-पाच,तर काहींवर सत्तर-ऐंशी जणींचे तांडे होते.तांबुसमाशा डंख मारू शकतात,

तेव्हा कोणीही त्यांची पोळी झटक्यात काढून टाकली असती.पण समाजप्रिय कीटकांच्या माझ्या प्रेमापोटी मी बहुतेक सारी पोळी राखून ठेवली.निरीक्षणाला सगळ्यात सोयीचे होते गच्चीच्या कोपऱ्यातले एक पोळे. तासन्तास न्याहाळत त्याच्या नोंदी ठेवायला लागलो.पोळ्यात किती षट्कोनी दालने आहेत, त्या उघड्या दालनांत किती अंडी,

किती अळ्या आहेत,किती दालनांना झाकण घालून कोश बनताहेत,किती प्रौढ माशा खपताहेत,शिकार करून आणून एकमेकींना,अळ्यांना भरवताहेत, नवी दालने बांधताहेत.सारे नाटक पाहण्यात रंगून गेलो.सहा महिने त्या गच्चीवरच्या पोळ्याची भरभराट होत राहिली.बघता-बघता प्रौढ माशांच्या पाचापासून पंचाहत्तर झाल्या.अन् मग एक दिवस अवतरली एक वाघमाशी.सगळ्या तांबुसमाशा बिचकून पोळ्याच्या कडे कडेला गप्प उभ्या राहिल्या.वाघमाशी सावकाश एक-एक अळी,कोशाचे छप्पर फोडून आतली माशी खात राहिली.निम्मी - शिम्मी दालने रिकामी करून उडून गेली.आता मात्र त्या पोळ्याला अवकळा आली.नवी अंडी घातली जात होती,अळ्या वाढत होत्या.


त्या पिल्लांना त्यांच्या बहिणी,मावशा चारत होत्या,

अंजारून- गोंजारून साफ करत होत्या. काही अळ्या कोशावस्थेत प्रवेश करत होत्या. पण दर चार-पाच दिवसांनी वाघमाशी आपली हजेरी लावत होती.बहुतांश चिल्ला-पिल्लांना फस्त करून जात होती.असे बारा-तेरा आठवडे गेले.प्रौढांची संख्या रोडावत जाऊन विसावर आली.पण ताबुसमाशानी अजून हाय खाल्ली नव्हती.

मनापासून वंशवेलीला खतपाणी घालण्याचे काम चालू होते.


अन् एक दिवस माझ्या डोळ्यासमोर सारे चित्र बदलले.दर चार-पाच दिवसांनी येऊन डल्ला मारून जाणारी वाघमाशी नुकतीच हजेरी लावून गेली होती.ती वैरीण गेली,आणि तांबुसमाशांची काहीतरी खलबते सुरू झाली.

गांधिलमाशा एकमेकींना सतत नानाविध रासायनिक संदेश देत असतात.तेव्हा हा सवाद झाला असणार वासांच्या भाषेत.मला पूर्ण अगम्य.पण अखेर निर्णय झाला.असावा की आता गाशा गुंडाळून दुसरीकडे जायलाच पाहिजे.अशा प्रौढ माशा एकदा उडून गेल्या की त्यांनी मागे सोडलेली चिल्ली-पिल्ली जगण्याची सुतराम शक्यता नाही. इतके दिवस निसर्गप्रेरणेतून त्या या अर्भकांची काळजी घेत होत्या.त्यांच्यातल्या अनेक माशा कुंवार राहून आपल्या बहिणी- भाचरांना,किंवा केवळ इष्टमैत्रिणीच्या संततीला सांभाळत होत्या. निसर्गाच्या लेखी ह्या वात्सल्याला मोल होते.


पण,आता पिल्लांना तसेच हकनाक सोडून जाणे ह्या हिशोबात बसत नव्हते.एवीतेवी त्या पिल्लांचे दिवस भरलेच होते.त्याऐवजी त्यांना खाल्ले तर नवी वसाहत स्थापन करायला गांधिलमाशांना तेवढीच अधिक शक्ती मिळणार होती.आता येणाऱ्या कठीण परिस्थितीत त्या तगून राहतील, नवे पोळे बांधू शकतील,पुन्हा वंशवेली फुलवू शकतील ही शक्यता अधिक बळकट होणार होती.तेव्हा ज्या पिल्लांना अर्ध्या तासापूर्वी अंजारले- गोंजारले,भरवले जात होते,त्यांचाच आता फडशा पाडणे हा निसर्गचक्रात शहाणपणा ठरत होता.अन् मी डोळे विस्फारून बघता बघता तांबुसमाशा,अगदी वाघमाशी इतक्याच जोषाने, आपल्याच रक्ताची कच्ची बच्ची खायला लागल्या.इतके दिवस एका - वेळी मोजक्या माशा पोळे सोडून जायच्या,त्यांच्यातल्या कोणी ना कोणी नेहमीच पिल्लांना सांभाळत थांबायच्या.पण आता सारी दालने रिकामी झाली,तशा साऱ्याच्या साऱ्या,एकदम उडून गेल्या.पुन्हा कधीच न परतण्यासाठी.


ही शोकांतिका माझ्या मनाला चटका लावून गेली.पण त्याबरोबरच मला काय होते आहे हे उमगल्याचे समाधान होते.खरा ज्ञानानंद कधी होतो?एखादी चक्रावून टाकणारी,

आगळी घटना घडते,आणि आपण तिचा अर्थ लावू शकतो


तेव्हा चार्ल्स डार्विनने समजावले आहे की उत्क्रान्तीच्या ओघात जीवांचे आनुवंशिक गुणविशेष सतत पारखले जात असतात.त्या गुणांच्या धारकांना स्वतःचे,किंवा आपल्या रक्ताच्या नातेवाइकांचे संरक्षण व वंशवर्धन करण्यात ते किती मदत करतात,ह्या निकषावर. निसर्गाच्या सुपात जीवरूपी दाण्यांची अहर्निश पाखडणी सुरू असते.या पाखडणीत त्यांच्यावर कधी कधी प्रेम चिकटते;तसेच कधी कधी क्रौर्यही !


१७ मे २०२३ या लेखमालेतील पुढील लेख..



१३/६/२३

देवांचे स्वर्गीय देदीप्यमान रथ

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुराणवस्तू संशोधनात एक अत्यंत खळबळजनक शोध लागला.तो म्हणजे बारा मृत्तिकापत्रांवर लिहिलेल्या गिलगामेशच्या अप्रतिम महाकाव्याचा.अक्काडियन भाषेत लिहिलेले हे महाकाव्य असीरियन राजा असुरबानिपालच्या पौराणिक ग्रंथसंग्रहालयात मिळाले.


गिलगामेशच्या महाकाव्याचा उगम सुमेरियन संस्कृतीत झाला ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. तेच रहस्यमय सुमेरियन लोक,कुठून आले ते कळत नाही.पण १५ आकडी संख्या आणि खगोलशास्त्राच्या अफाट ज्ञानाचा वारसा जगाला देऊन गेले.गिलगामेशच्या महाकाव्याचा मुख्य धागा आणि बायबलमधील विश्वाची उत्पत्ती हा भाग अगदी समान आहे.


पहिल्या मृत्तिकापत्रात विजयी गिलगामेशने बांधलेल्या राजेशाही प्रासादाचे वर्णन आहे. गिलगामेश म्हणजे देव आणि मानव यांचा संगमच ! दोन तृतीयांश देवाचा अंश आणि एक तृतीयांश मानवाचा अंश.महाकाव्याच्या सुरुवातीलाच देव आणि मानव यांच्या संयोगाचा

उल्लेख पुन्हा आलाच आहे.याचा प्रासाद उरूक येथे होता.सभोवती तटबंदी आणि पहारेकरीही असत. येणारे यात्रेकरू त्यांच्याकडे पाहूनच भयभीत होत.त्यांची अफाट ताकद त्यांच्याकडे पाहताच ध्यानात येत असे.


दुसऱ्या मृत्तिकापत्रात अरूरू या स्वर्गीय देवतेने निर्माण केलेल्या एन्किडूचा उल्लेख आहे पण हा एन्किडू तसा विचित्रच प्राणी होता.त्याच्या सर्वांगावर केस होते.तो जनावरांच्या कातड्यांची वस्त्रे घालायचा,शेतातले गवतच खायचा आणि एकूण गुराढोरातच असायचा.एन्किडूबद्दल ऐकल्यावर गिलगामेश सुचवतो की त्याला एखाद्या सुंदर स्त्रीच्या पाशात गुंतवावा म्हणजे तो आपोआप इतर प्राण्यांचा नाद सोडेल म्हणून आणि एन्किडू सहा दिवस आणि सहा रात्री एका सुंदरीबरोबर काढतोही.


तिसऱ्या मृत्तिकापत्रात दूरवरून धुळीच्या ढगातून प्रचंड गडगडाट करीत आणि धरणी हलवत येणाऱ्या सूर्यदेवाचे वर्णन आहे.सूर्यदेव आपल्या पंखात आणि नखात एन्किडूला पकडतो आणि वेगाने आकाशात झेप घेतो.

त्यावेळी एन्किडूला आपल्या शरीरावर सूर्यदेवाचे वजन शिशाच्या गोळ्याप्रमाणे जड जड वाढल्यासारखे वाटते.


आज आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध दिशेने अंतराळात उडताना गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून अंतराळवीर अंतराळयानातून पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाईपर्यंत त्यांच्या शरीरावर गुरुत्वाकर्षणाने किती वजनाचा दाब येतो हे आधीच मोजता येते आणि त्याप्रमाणे संरक्षक व्यवस्था करता येते.पण या दाबाची माहिती हजारो वर्षांपूर्वी कुणाला होती? जुन्या लेखकांची प्रगल्भ कल्पनाशक्ती,भाषांतरकर्ते व प्रती काढणारे यांनी घातलेली भर सोडून देऊ या.पण या जुन्या वृत्तांतात ठराविक वेगाने आकाशात जायला लागल्यावर शरीराचे वजन शिशासारखे जड होईल ही माहिती आली कशी हे आश्चर्यच आहे.ही गोष्ट कल्पनेला ताण देऊन लिहिली असणे.अशक्य आहे.कोणी तरी खरा अनुभव घेतला असल्याशिवाय असे लिहिता येणे कधीही शक्य नाही.


पाचव्या मृत्तिकापत्राप्रमाणे गिलगामेश आणि एन्किडू देवाच्या शोधासाठी निघतात.ज्या मनोऱ्यात इर्निसीस ही देवता राहत असते तो लांबवरूनच झगमगताना दिसत असे.ते देवांच्या राहण्याच्या ठिकाणी पोहोचतात तर गर्जनेसारखा आवाज येतो 'परत फिरा! कोणत्याही मर्त्य मानवाने आमच्याकडे पाहिले तर तो जिवंत राहणार नाही. '


सातव्या मृत्तिकापत्रात अंतराळ प्रवासाचा पहिला उल्लेख आहे.एन्किडू याने स्वतः केलेल्या अंतराळ प्रवासाचे ते वर्णन आहे.गरुडाने एन्किडूला आपल्या नखात घट्ट पकडून हा प्रवास घडवला होता.घडलेला वृत्तांत जवळ

जवळ शब्दश: असा आहे.तो मला म्हणाला, 'आता खाली जमिनीकडे बघ. जमीन कशी दिसते? समुद्र बघ.तो कसा दिसतो? जमीन टेकडीसारखी तर समुद्र एखाद्या सरोवरासारखा वाटत होता.आणखी चार तास भ्रमण केल्यावर तो पुन्हा म्हणाला,खाली जमिनीकडे बघ.कशी दिसते? समुद्राकडे बघ, कसा दिसतो? जमीन एखाद्या बागेसारखी आणि समुद्र बागेत काम करणाऱ्या माळ्याने काढलेल्या पाण्याच्या पाटासारखा वाटत होता. आणखी चार तास भ्रमण करून खूप उंच गेल्यावर तो म्हणाला, खाली जमिनीकडे बघ. आता ती कशी वाटते तुला? समुद्राकडे बघ.तो कसा भासतो आता? जमीन आता लापशीसारखी तर समुद्र पाण्याच्या उघड्या टाकीसारखा वाटत होता. '


खूप उंचीवरून पाहिलेल्या पृथ्वीचे वर्णन आपले अंतराळवीर आज अगदी याच शब्दात करतात. वेगवेगळ्या उंचीवरून कोणी तरी खरोखर पृथ्वी बघितली असल्याशिवाय अशा तऱ्हेचे वर्णन करता येणे शक्य नाही.

हा वृत्तांत इतका अचूक असल्यानेच केवळ कल्पनेने तो लिहिला असणे अशक्य आहे.


आणि त्याच मृत्तिकापत्रात एक दरवाजाच माणसासारखा बोलतो,असा उल्लेख आल्यावर तिथे लाऊडस्पीकर -

शिवाय दुसऱ्या कशाचाही उल्लेख असणे शक्य नाही हे आपल्याला कळते.


आणि मग ज्या एन्किडूने खूप उंचीवरून पृथ्वी बघून तिचे अचूक वर्णन केलेले असते.तो एन्किडू अत्यंत रहस्यमय अशा रोगाने मरण पावतो.आपल्या अचूक वर्णन मित्राच्या मरणाचे गिलगामेशला फार दुःख होते.अंतराळातील कुठल्या तरी विषारी प्राण्याच्या फुत्कारानेच आपला मित्र मरण पावला आहे आणि नंतर आपलीच पाळी येणार आहे असे गिलगामेशला वाटायला लागते.नवव्या मृत्तिकापत्रात या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे.गिलगामेश ठरवतो की आता देवाचीच गाठ घ्यायची नाहीतर आपला मृत्यू अटळ आहे.अखंड प्रवास करीत तो दोन पर्वतांशी येतो.त्या दोन पर्वतांनीच स्वर्ग पेलून धरलेला असतो.

त्यांच्यामध्ये सूर्यद्वारही दिसत असते.पण तिथले दोन पहारेकरी त्याला अडवतात.त्यांच्याशी तो खूप हुज्जत घालतो. शेवटी त्याला ते आत सोडतात.नाही म्हटले तरी गिलगामेशमध्ये दोन तृतियांश तरी देवाचा अंश असतोच.

गिलगामेश शेवटी एका सागर किनाऱ्यावर येतो.देव सागरापलिकडे राहत असतो आणि देवाशिवाय कोणाचेही वाहन या सागरावरून जात नसते.


त्यावेळी गिलगामेशला दोन वेळेला देव गंभीर परिणामांची धमकी देतो आणि सांगतो 'अरे गिलगामेश! तू जे अमरत्व शोधत आहेस ते तू तुला कधीच मिळणार नाही.देवाने मानव निर्माण केला.तेव्हा त्याचे मरणही लिहून ठेवले

आहे.अमरत्व देवाने स्वतःकडेच राखून ठेवले आहे.'


पण देवाला भेटण्याचा गिलगामेशचा निर्धार अटळ

असतो.अनेक संकटांना तोंड देत तो सागर पार करून जातोच आणि शेवटी त्याची आणि मानवाच्या निर्मात्याची गाठ पडते.त्यांची गाठ पडल्यावर गिलगामेशला कळते की त्या दोघात तसा काहीच फरक नाही.देव त्याच्यासारखाच उंच आणि धिप्पाड असतो.पिता-पुत्र शोभावेत असेच ते दोघे दिसत असतात.


देव त्याला स्वतःच्या आयुष्याबद्दल माहिती देतो. 'मी' म्हणून एक वचनात.आत्यंतिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो गिलगामेशला झालेल्या महान जलप्रलयाचीही माहिती देतो.देवांनी नोहाला या जलप्रलयाची आगाऊ सूचना कशी दिली होती, त्याने बोट कशी बांधली,त्यात सर्व तऱ्हेचे प्राणी, नातेवाईक,स्त्रिया,मुले,प्रत्येक जातीचा कारागीर यांना कसे घेतले हे तो सर्व सांगतो.तुफान वादळ आणि पाऊस,काळाकुट्ट अंधार,पूर,ज्यांना तो वाचवू शकत नव्हता.त्यांच्या किंकाळ्या, जगण्याची धडपड हे सर्व वर्णन त्यात इतके अप्रतिम आहे की वाचायला घेतल्यावर खाली ठेववत नाही.


पूर ओसरला की नाही हे कळण्यासाठी आधी एक गिधाड सोडणे आणि मग कबूतर सोडणे अशी गोष्ट गिलगामेशच्या महाकाव्यात आहे, तशीच ती बायबलमध्येही आहे.गिलगामेशच्या महाकाव्यातील जलप्रलयाचे वर्णन आणि बायबलमधील वर्णन यात फारच साम्य आहे ही गोष्ट विद्वान लोक मान्य करतात.

नवलाची गोष्ट म्हणजे आपण वेगवेगळे देव लक्षात घेतो आहोत. हा प्रकार विलक्षण नाही का?


गिलगामेशच्या महाकाव्यातील हे वर्णन त्या संहारातून वाचलेल्या माणसानेच केले आहे,ती चक्षुर्वैसत्य हकिगत आहे यात शंकाच नाही. याच्या उलट बायबलमधील वर्णन हा दुसऱ्याने सांगितलेला वृत्तांत आहे.


हजारो वर्षांपूर्वी प्राचीन पूर्वेत अचानकपणे जलप्रलयाने थैमान घातले होते,हे ऐतिहासिक सत्य आहे,सिद्ध झालेली गोष्ट आहे. महाप्रलयातून वाचण्यासाठी मुख्यतः लाकडाचा वापर करून बांधलेल्या बोटीचे अवशेष कमीत कमी ६००० वर्षांनी सापडतील ही गोष्ट खरी म्हणजे अशक्य असली तरी बाबिलोनियातील मृत्तिकापत्रे या बोटीचे अवशेष कुठे सापडतील याच्या स्पष्ट खाणाखुणा सांगतात. त्याचप्रमाणे अरारत पर्वतावर संशोधकांना ज्या जागी पुरानंतर बोट लागली असेल असा संशय होता त्याच ठिकाणी लाकडाचे तीन तुकडेही सापडले होते.


आजच्या विज्ञान युगाच्या दृष्टीने विचार केला तर गिलगामेशच्या महाकाव्यात अशा कित्येक गोष्टींचा समावेश आहे की अत्यंत प्रगल्भ बुद्धीच्या हुशार माणसालाही मृत्तिकापत्रे लिहिली गेली;त्या काळात या गोष्टींची माहिती असणे सर्वस्वी अशक्य आहे.ज्यांनी या महाकाव्याच्या फक्त प्रतीच काढल्या किंवा भाषांतर केले त्यांनीही अशा गोष्टींची नंतर त्या महाकाव्यात भर घातली असेल असे म्हणता येत नाही. कारण सरळ आहे.ते त्यांच्या आवाक्याबाहेरचे काम होते.


पण आजपर्यंत आपण समजत आहोत त्याप्रमाणे गिलगामेशच्या महाकाव्याचा उगम समजा प्राचीन पूर्वेत झालाच नसला आणि टिआहुआन्को येथे झाला असला तर? गिलगामेशच्या वंशजांनी दक्षिण अमेरिकेतून येताना ते महाकाव्यही बरोबर आणले असले तर? या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर अनेक गोष्टींचा उलगडा होतो.सूर्यद्वाराचा उल्लेख,सागर पार करून जाणे आणि सुमेरियन संस्कृतीचा अचानक उगम या गोष्टींचा शोध मग नक्कीच लागतो.त्याच भागातील बाबिलोनियन संस्कृती ही सुमेरियन लोकांच्या नंतरची आहे. त्यांच्या बहुतेक सर्व निर्मितीचा उगम सुमेरियन संस्कृतीतच आहे ही गोष्टही वादातीत आहे. गिलगामेशच्या महाकाव्याचा प्रवास मग सुमेरिया,बाबिलोनिया,इजिप्त असाच होऊ शकतो.

इजिप्शियन संस्कृती अत्यंत पुढारलेली होती.फॅरोह राजांची ग्रंथालये प्रचंड होती आणि त्यांनी सर्व जुन्या गुप्त ज्ञानाचा साठा जतन करून ठेवला होता.मोजेस इजिप्तच्या राजदरबारातच लहानाचा मोठा झाला.या ग्रंथालयांचा उपयोग त्याने हक्काने केला असणार.अशा दृष्टीने विचार केला तर गिलगामेशच्या महाकाव्यातील जलप्रलयाचा वृत्तांत मूळ वृत्तांत ठरतो,खरा वृत्तांत ठरतो, बायबलमधला नव्हे!आणि या टप्प्यापर्यंत विचार करीत आलो तर प्राचीन इतिहासाचे संशोधन नीट का होत नाही.

याची खरी मेख इथेच असावी असा संशय घ्यायला निश्चित जागा मिळते.प्राचीन काळाबद्दलच्या संशोधनाची परिस्थिती तरी कशी आहे? आजपर्यंत सांगण्यात आलेल्या इतिहासामध्ये अनेक कालखंडांची माहिती मिळतच नाही.त्या काळात 'अशक्य' अशा गोष्टींचे अस्तित्व कसे होते याचे उत्तर मिळत नाही.साचेबंद पद्धतीने केलेले कोणतेही संशोधन एकही नवीन गोष्ट सांगू शकत नाही,कोणत्याही नवीन गोष्टीवर प्रकाश पाडू शकत नाही. तेच तेच विचार,त्याच त्याच संशोधनाच्या पद्धती कुचकामी ठरत आहेत;कारण कोणत्याही तऱ्हेची नवीन कल्पना,नवीन तर्क,नवीन सिद्धान्त या गोष्टींना थाराच मिळत नाही.प्राचीन पूर्वेबाबतच्या संशोधनाच्या अनेक संधी आजपर्यंत वाया गेल्या कारण बायबलसारख्या अति पवित्र ग्रंथात सांगितलेल्या गोष्टींबद्दल वेगळ्या तऱ्हेचे विचार उघडपणे मांडण्याची कुणाचीच प्राज्ञा नव्हती.


एकोणिसाव्या विसाव्या शतकातील विद्वानांनी अनेक जुन्या समजुती आणि रूढी यांच्यातून आपली मुक्तता करून घेतली.तरी बायबलमध्ये म्हटले की मनावर येणाऱ्या शेकडो वर्षांच्या मानसिक दडपणातून त्यांचीसुद्धा सुटका झाली नाही.


बायबल संबंधात कुठलाही प्रश्न निर्माण करण्याचे,

विचारण्याचे धैर्य त्यांनाही झाले नाही.याचमुळे प्राचीन काळाबद्दलचे कुठलेही संशोधन बायबलपर्यंत पोहोचले की तिथेच त्याला पूर्णविराम मिळत होता.पुढल्या संशोधनात बायबलच्या काही भागांबद्दल तरी अविश्वास दाखविणे अपरिहार्य ठरत होते आणि हीच गोष्ट कुणाला जमत नव्हती.


पण अगदी धार्मिक ख्रिस्ती विद्वानांना सुद्धा कधी जाणीव झाली नसेल की सर्वज्ञ,सर्वसंचारक देवाच्या प्रतिमेस विसंगत अशा गोष्टी बायबलमध्ये आहेत म्हणून?अगदी कर्मठ, बायबलवर संपूर्ण विश्वास ठेवणाऱ्या माणसाला प्राचीन काळातील आपल्या पूर्वजांना आधुनिक तंत्रज्ञान कुणी दिले,स्वच्छतेचे,समाजसुधारणेचे प्राथमिक नियम कोणी घालून दिले,मानव जातीचा विनाश एकदा कोणी घडवून आणला, या प्रश्नांबद्दल आणि त्यांच्या उत्तरांबद्दल कधीच कुतूहल निर्माण झाले नसेल?


अशा तऱ्हेचा विचार करण्याने खरे म्हणजे आपल्यावर नास्तिकपणाचा शिक्का बसण्याचे मुळीच कारण नाही.

आपल्या भूतकाळातील सर्व प्रश्नांची उत्तरे ज्या क्षणी मिळतील त्या क्षणापासून दुसरे कुठले नाव देता येत नाही म्हणून आपण 'देव' मानतो ते 'काही तरी' अनंत काळापर्यंत अस्तित्वात राहणारच आहे.


ज्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अंतराळयानासारख्या वाहनाची जरुरी लागत होती,प्राचीन मागासलेल्या स्त्रियांशी संबंध ठेवून ज्याने नवीन प्रजा निर्माण केली,जो आपला मुखवटा कधीही दूर करून स्वतःचा चेहरा दाखवायला तयार नव्हता असा देव तरी नक्कीच अस्तित्वात होता या सिद्धांताला 'पुरावा' देणारी,दुजोरा देणारी एक तरी गोष्ट आहे का? मुळीच नाही.


देव कुणाला कुठल्या स्वरूपात दर्शन देईल आणि कुणाचा नक्षा कसा उतरवील हे सांगता येत नाही,हे ब्रह्मज्ञानी आणि धर्मज्ञानी लोकांचे उत्तर मूळ मुद्दा डावलणारे आहे.म्हणूनच या उत्तराने आपले समाधान होऊ शकत नाही. काही वर्षांतच मानव कुठल्या तरी ग्रहावर पाय ठेवील.त्या ठिकाणी ओळखता येईल असे एखादेच खडकावर कोरलेले चित्र,अज्ञात, बुद्धिमान जमातीचे अस्तित्व दर्शवणारी एखादीच खूण,एखादीच भव्य,प्राचीन वास्तू मिळाली तर आपल्या सर्व धर्मांचा पायाच ढासळून पडेल आणि आपल्या भूतकाळाच्या इतिहासाबद्दल अपरिमित गोंधळ माजेल.असा फक्त एकच शोध मानवाचा सर्व इतिहासच संपूर्णपणे बदलण्याइतका क्रांतिकारक ठरेल.


नवनवीन सत्यांकडे डोळेझाक करूनही भविष्यकाळातील नव्या-जुन्या विचारांचा संघर्ष आता टळू शकणार नाही.आपण नास्तिक असण्याचे कारण नाही.

पण म्हणून काय सर्व खुळचट गोष्टींवर अगदी भोळसटपणे अंधविश्वास ठेवायचा? प्रत्येक धर्माची काही वैशिष्ट्ये आहेत आणि त्याचमुळे त्या धर्माचे विचार त्या वैशिष्ट्यांभोवती घुटमळतात.हे अपरिहार्यपणे घडत आहे.


आजच्या अंतराळ युगात आपली बौद्धिक कसोटी लागण्याचा दिवस जवळ येत आहे आणि त्याच दिवशी सर्व ब्रह्मज्ञान व्यर्थ ठरेल. आतापर्यंतचे मानवाच्या प्राचीन इतिहासाबद्दलचे चित्र कसे आहे याबद्दलचा आपला सिद्धान्त काय म्हणतो?


नक्की सांगता येत नाही अशा आपल्या प्राचीन इतिहासकाळात एका अज्ञात अंतराळयानाने पृथ्वीचा शोध लावला.पृथ्वीवर जीवन निर्माण होण्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टी उपलब्ध आहेत याची जाणीवही त्या अज्ञात अंतराळवीरांना अभ्यासपूर्वक विचार केल्यावर झाली.


अर्थात,त्यावेळी मानवसदृश प्राणी अस्तित्वात नव्हता तर काही वेगळ्या तऱ्हेच्या प्राण्यांचेच अस्तित्व होते.अशा या जमातीतील स्त्रियात त्यांनी कृत्रिम गर्भधारणा केली व ते निघून गेले. हजारो वर्षांनी ते परत आले त्यावेळी त्यांना विखुरलेल्या मानवसदृश प्राण्यांचे अस्तित्व आढळायला लागले होते.पुनः पुन्हा तसेच प्रयोग करून या अंतराळवीरांनी समाजव्यवस्थेची दीक्षा देण्याइतका बुद्धिमान मानवसदृश प्राणी शेवटी या पृथ्वीवर निर्माण केला.तरीही त्यावेळी तो जंगली प्राण्यांत गणना व्हावी इतपतच होता. इतर जनावरांशी संबंध ठेवून त्याची पिछेहाट होऊ नये व त्याचे प्रगतीचे पाऊल मागे हटू नये या हेतूने त्यांनी अशा इतर प्राण्यांचा एक नाश तरी केला किंवा त्यांची इतरत्र तरी रवानगी केली.मानवाच्या प्रगतीला कोणताही धोका निर्माण होऊ नये याची ते सतत काळजी घेत राहिले.


मग पहिला समाज अस्तित्वात आला,पहिले कुशल कारागीर निर्माण झाले.काहींनी गुहेत चित्रे रंगवली,

काहींनी मातीची भांडी तयार करण्याची कला आत्मसात केली,तर कोणी बांधकामांना हात घालण्याचा प्रयत्न सुरू केला.


या पहिल्या जमातींना अंतराळवीरांबद्दल अगदी जबर लोकविलक्षण असा आदर होता.ते कुठल्या तरी अज्ञात ठिकाणाहून येत होते आणि परत जात होते.

अंतराळयानातून,दैदिप्यमान रथातून संचार करणाऱ्या या अज्ञात अंतराळवीरांनाच पृथ्वीवरील जमातींनी देव मानले.कोणत्या गूढ, रहस्यमय कारणाने ते कळत नाही.

पण आपले ज्ञान पृथ्वीवरील जमातींना द्यायची इच्छा त्या अंतराळवीरांना निश्चित होती.अंतराळवीरांनी त्यांनी निर्माण केलेल्या प्रजेचे सर्व वाईट गोष्टींपासून संरक्षण केले.या समाजाची सुधारणा व्हावी हा त्यांचा कायमचा प्रयत्न होता.जेव्हा जेव्हा चांगला मानव निर्माण करण्याच्या प्रयत्नात विचित्र,अनैसर्गिक नमुने जन्माला आले,त्यांचे प्रयत्न फसले,तेव्हा त्यांचा तात्काळ नाश करण्यात आला.


हा सिद्धान्तही अनेक तर्कावरच आधारित आहे हे मान्य आहे आणि तसा सबळ पुरावा नसल्याने तो संपूर्ण सत्य नसेलही.पण निरनिराळ्या धर्मांच्या सिद्धांतांच्या छायेखाली निरनिराळ्या धर्मांचे लोक सुखाने हजारो वर्षे वावरताना पाहिल्यावर देव हे परग्रहांवरील अंतराळवीरच होते या सिद्धान्ताला तशी थोडी यशाची आशा दिसते.


प्रत्येक धर्म 'सत्य' हे त्याच धर्माच्या शिकवणुकीत आहे असे प्रतिपादन करतो. ईश्वराचा साक्षात्कार घडवून आणणारे तत्त्वज्ञानी, धर्मज्ञ,त्यांच्या गुरुंची,त्यांच्या शिकवणीची भलावण करीत असतात.खरे 'सत्य' त्यांनाच उमगले आहे या गोष्टीवर त्यांचा दृढ विश्वास असतो.

अर्थातच प्रत्येक धर्माला त्याचा इतिहास, त्याचे देव,देवांची वचने,देवांचे प्रेषित आहेत, धर्मगुरू आहेत.खरे म्हणजे कोणत्याही एका धर्माच्या शिकवणुकीतूनच फक्त सत्याचा शोध लागणार आहे ही वृत्ती संपूर्ण पक्षपाती आहे.

आणि तरीही लहानपणापासून आपल्या प्रत्येकाच्या मनावर बिंबवली गेली आहे. तरीसुद्धा पिढ्यान्पिढ्या सत्य फक्त आपल्यालाच गवसले आहे यावर पूर्ण विश्वासाने त्या जगल्या आहेत,जगत आहेत.


पण सत्य ही काही आपण 'पकडू' शकू अशी गोष्ट नाही.आपण त्यावर फक्त विश्वास ठेवू शकतो.


जुनी प्राचीन शहरे,खेडी वगैरे पुराणवस्तू संशोधकांनी शोधून काढली की आपल्याला कळत असतो तिथल्या लोकांचा इतिहास.ही खरी गोष्ट आहे.मेसापोटेमियात बायबलसंबंधी हेच घडत आहे.पण त्यामुळे असे सिद्ध होत नाही की बायबलमधला धर्म हाच त्यांचा धर्म होता किंवा बायबलमधला देवच त्यांचाही देव होता म्हणून! त्यांचा देव एखादा अंतराळवीरच असण्याची शक्यता आहे.


जगात सर्वत्र चाललेल्या उत्खननात जुन्या आख्यायिका त्या त्या काळातील वस्तुस्थिती खरी ठरवीत आहेत.पण एक तरी ख्रिस्ती माणूस खात्रीपूर्वक सांगू शकेल का ? की पेरूमध्ये उत्खननात मिळालेल्या अवशेषांमुळे इंका लोकांच्या आधीच्या ऐतिहासिक काळातील देव हाच ख्रिश्चनांचा एकमेव देव ठरत आहे म्हणून ?


केवळ आजपर्यंतच्या धर्माच्या चौकटीत बसत नाहीत,पिढ्यानपिढ्या ठेवलेल्या अंधविश्वासाला तडा जातो म्हणून कोणत्याही नवीन विचार प्रवाहाकडे दुर्लक्ष करून सत्य कधीच उजेडात येणार नाही.


आपल्या पूर्वजांच्या कारकीर्दीत अंतराळ प्रवास ही कल्पना,हा प्रश्न कधी उद्भवलाच नव्हता. त्याचमुळे त्यांच्याही प्राचीन काळातील पूर्वजांच्या मनात कोणत्या तरी परग्रहावरील अंतराळवीरांनी आपल्याला भेटी दिल्या होत्या असाच विचार निर्माण होण्याची सुतराम शक्यता नव्हती.गेल्या उद्भवलाच नव्हता. त्याचमुळे त्यांच्याही प्राचीन काळातील पूर्वजांच्या मनात कोणत्या तरी परग्रहावरील अंतराळवीरांनी आपल्याला भेटी दिल्या होत्या असाच विचार निर्माण होण्याची सुतराम शक्यता नव्हती. गेल्या ४० वर्षांत आपण जे ज्ञान प्राप्त करून घेतले आहे,जे अनुभव आपण स्वतः घेत आहोत, त्यामुळेच आपल्या मनात असे विचार येत आहेत ही गोष्ट खरी आहे.


समजा की मानवाच्या दुर्दैवाने अणुयुद्ध झालेच आणि आपल्या सर्व संस्कृती नष्ट झाल्या म्हणून. पाच हजार वर्षांनंतरच्या पुराणवस्तू संशोधकांना न्यूयॉर्क येथील स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याचे अवशेष मिळाले.तर आपण आज करीत आहोत तसाच विचार तेही करतील.

पुतळ्याच्या हातातील मशाल बघून त्यांना वाटेल की ती कोणी अग्निदेवता आहे म्हणून! किंवा स्वातंत्र्य देवतेच्या डोक्याभोवतालचे किरण पाहून त्यांना वाटेल की कोणत्या तरी सूर्योपासक लोकांची ती देवता आहे म्हणून! कोणत्याही धर्माशी किंवा कोणत्याही पंथाशी संबंध नसलेला भव्य असा स्वातंत्र्य देवतेचा तो पुतळा होता,ही कल्पना मात्र त्यांच्या मनात येईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.


आजपर्यंतच्या धार्मिक शिकवणीवर अंधविश्वास ठेवून भूतकाळातील सत्य बाहेर येऊ शकत नाही.ज्या धोपटमार्गाने आपण विचार करीत होतो त्या मार्गाचा त्याग करण्याचे,जुन्या सर्व गोष्टी सत्यच आहेत हे आंधळेपणाने खरे न मानता आवश्यक तिथे त्यांच्याही बाबतीत संशय दाखविण्याचे धैर्य आता तरी आपल्यात निर्माण व्हायला पाहिजे.डोळे आणि कान बंद ठेवून, बुद्धी गहाण ठेवून कोणत्याही नवीन कल्पना या पाखंडी आहेत,मूर्खपणाच्या आहेत हेच पुनः पुन्हा म्हणत राहून अंतिम सत्याचा शोध लागणार नाही.आणि आजच्या युगात ही गोष्ट आपल्याला परवडणारी नाही.


विचार करा ! पन्नास वर्षांपूर्वी चंद्रावर माणूस उतरेल ही कल्पना करणाऱ्या माणसाला जग वेडेच म्हणत होते की ! 


२ मार्च २०२३ या लेखमालेतील पुढील लेख


११/६/२३

१.२ पाश्चिमात्य वैद्यक : ग्रीस

ख्रिस्तपूर्व काही शतकांच्या दरम्यान भारतात आयुर्वेदानं चांगलीच प्रगती केली होती.पण याच वेळी पाश्चिमात्य देशांमध्ये आणि नंतरच्या काळात काही प्रमाणात भारतामध्येही सगळं विश्व हे सर्वशक्तिमान देवाच्या इच्छेनुसार आणि नियंत्रणानुसार चालतं ही समजूत मूळ धरायला लागली होती.त्यामुळे माणूस समोर दिसणाऱ्या जिवंत गोष्टींचं निरीक्षण करण्याऐवजी ध्यानधारणा,

भक्ती आणि उपासनेतून न दिसणाऱ्या अज्ञात देवाचा शोध घेत होता.या गोष्टींमध्ये सगळ्याच धर्मांतले धर्मगुरू,

साधू,संत आणि भोंदू बाबा आघाडीवर होते आणि सर्वसामान्य माणसांनी त्यांनी दाखवून दिलेल्या वाटेवरूनच जाणं अपेक्षित होतं.यामुळेच मग जो माणूस विज्ञानाची कास धरेल त्याला वाळीत टाकलं जाणं स्वाभाविकच होतं. त्यावेळच्या कायद्यानुसार विज्ञानवादी लोक पापी होते. त्यामुळे साहजिकच कोणत्याही गोष्टीचा असा अभ्यास करणारे लोक आणि त्यांच्या अभ्यासातून आलेली निरीक्षणं आणि निष्कर्ष कुणीही जपून ठेवायचा प्रयत्न केला नाही.


याला अपवाद म्हणजे प्राचीन ग्रीक लोकांनी हे बदलायचा प्रयत्न केला.ग्रीक लोक मुळातच कुतूहल असणारे,

बडबडे,वाद-चर्चा करणारे, हुशार,चुळबुळे आणि हे कधीकधी असंबद्ध वाटावेत असे होते! ग्रीकांमध्येही अनेक धार्मिक रूढी, परंपरा आणि अनेक देवदेवता होत्या. गंमत म्हणजे जगातल्या सगळ्याच धर्मांत अनेक खुळचट परंपरा आणि अंधश्रद्धा असूनही जगातल्या प्रत्येकच माणसाला आपलाच धर्म योग्य,लॉजिकल आणि प्रगत वाटतो! हिंदूंमध्ये देवीच्या कोपामुळे देवी हा रोग होतो.अशी समजूत होती तशीच ग्रीकांमध्ये अपोलो नावाच्या देवतेच्या कोपामुळे माणसाला रोग होतात अशी धारणा होती! त्यामुळे त्या त्या देवतेची पूजाअर्चा केल्यानं, तिला नैवेद्य दिल्यानं किंवा बळी चढवल्यानं रोग बरा होतो अशा अनेक समजुती जनमानसात घट्ट रुजल्या होत्या.


विशेष म्हणजे अशा पार्श्वभूमीवर त्याही काळात ग्रीकांमध्ये काही चांगले तत्त्ववेत्ते निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि हळूहळू हे चित्र बदलायला लागलं.


 ख्रिस्तपूर्व ६०० मध्ये त्या काळातल्या आयोनियामध्ये म्हणजेच आताच्या तुर्कीमध्ये येणाऱ्या एजियन बेटांच्या भागांत अनेक तत्त्वज्ञ होऊन गेले.या लोकांनी अंधश्रद्धेचा पगडा झुगारून निखळ ज्ञान जगापुढे आणण्याचा मार्ग स्वीकारला.या सगळ्याची सुरुवात थेल्स या तत्त्वज्ञापासून होते.


थेल्स ऑफ मिलेट्स हा ख्रिस्तपूर्व सातव्या आणि सहाव्या शतकात होऊन गेलेला गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होता.आजच्या तुर्कस्तानात तो राहात होता. त्याला वेगवेगळ्या वस्तू स्वतः तयार करून पाहायला आवडायच्या, त्यानं त्या काळी सूर्यग्रहणाचं आधीच भाकीत केलं होतं.हे जग कशाचं बनलेलं आहे? याचं उत्तर दैवी गोष्टींत नाही तर निसर्गनियमांमध्ये शोधा असा वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारा पाश्चिमात्य जगात तो पहिलाच तत्त्वज्ञ होता. आज आपल्याला या विचारामध्ये प्रचंड महत्त्वाचं काही वाटणारही नाही.पण या अचाट विश्वात फेकल्या गेलेल्या माणसानं पहिल्यांदाच भूतंखेतं, देवदेवता वगैरेंपेक्षा कारणमीमांसेनं या विश्वाच्या अस्तित्वाचा अर्थ लावायचा प्रयत्न केला होता हे त्या काळी खूपच धाडसाचं आणि विद्वत्तेचं होतं. ख्रिस्तपूर्व ५४६ साली भरलेले ऑलिम्पिक्स गेम्स बघताना त्याचा मृत्यू झाला.यानंतर ३० च वर्षांनी इथेच पायथॅगोरसचा जन्म झाला. त्यानंतर ३०० वर्षांनी युक्लिडचा जन्म झाला.


 थेल्सला ग्रीक परंपरेतला पहिला तत्त्वज्ञ म्हटलं जातं.दुर्दैवानं थेल्सनं स्वतः लिहिलेलं काहीही साहित्य आज उपलब्ध नाही.


प्रत्येक गोष्ट ही कोणत्या देवतेच्या इच्छेनुसार न होता कोणत्यातरी विशिष्ट कारणामुळे होते हे या ग्रीक तत्त्वज्ञांनी मांडलं आणि इथूनच विज्ञानाच्या पायाभरणीला सुरुवात झाली.यातूनच हे विश्व कसं निर्माण झालं?दिवस आणि रात्र कसे निर्माण होतात ? गतीला नियम आहेत का? अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न सुरू झाला.या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करणारे हे पहिले काही ग्रीक तत्त्वज्ञ आणि त्यांनी केलेलं बरंचसं काम आज नामशेष झालंय. यापैकी काही लोकांची नावं आणि त्यांची काही मध्यवर्ती तत्त्वं इतिहासाला ज्ञात आहेत. यापैकी रॅशनॅलिझम (तर्कसंगतता) हे एक तत्त्व आहे. विश्व कसं चालतं याची आपण कारणमीमांसा करू शकतो असं तत्त्व नॅशनॅलिझममध्ये मांडलं आहे. त्या वेळी अस्तित्वात असलेली रोमन साम्राज्यंही नष्ट झाली,पण या तत्त्वज्ञांची नावं आणि शिकवण आजही पुनरुच्चारित केली जात. 


आयोनिया


आयोनियामध्ये असा एक माणूस होता, की ज्यानं प्राण्याच्या उपयोगापेक्षा प्राण्याच्या शरीराच्या आत नेमकं काय असतं आणि कोणता अवयव कसा काम करतो हे शोधण्यासाठी पहिल्यांदाच एक प्राणी काळजीपूर्वक कापला आणि त्यानं त्या प्राण्याचं निरीक्षण करायला सुरुवात केली.याच क्षणी कत्तलेचं रूपांतर शरीरविच्छेदनात (डिसेक्शन) आणि त्या माणसाचं रूपांतर पहिल्या बायॉलॉजिस्टमध्ये झालं.

आणि त्याच वेळी रॅशनॅलिझमनं पहिल्यांदा बायॉलॉजीत प्रवेश केला! आयोनियामधल्या या माणसाचं नाव होतं,अल्केमॉन!


ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या या अल्केमॉननं प्राण्याच्या डोळ्यांतल्या नव्हेजचं वर्णन करून ठेवलं आहे.त्यानं अंड्यात वाढणाऱ्या कोंबडीच्या पिलाचं निरीक्षण करून त्याबद्दल लिहून ठेवलं आहे. यामुळेच तो अॅनॅटॉमीचा आणि एंब्रियॉलॉजीचा पहिला विद्यार्थी मानला जातो. अल्केमॉननं कानापासून घशाला जोडणाऱ्या बारीक नळीचंही (युस्टेशियन ट्यूब) वर्णन करून ठेवलं आहे.याचा शोध तर सोळाव्या शतकातल्या बार्टोलोमियो युस्टॅशी यानं लावला असं आपल्याला माहीत असतं. पण खरं तर अनेक वर्ष अल्केमॉनचं हे ज्ञान हरवलं होतं आणि ते तब्बल दोन हजार वर्षांनी पुन्हा सापडलं !


तरीही तर्कसंगत (नॅशनॅलिस्टिक) बायॉलॉजीची सुरुवात खऱ्या अर्थानं केली ती हिप्पोक्रॅट्सनं. हिप्पोक्रॅट्सचा जन्म ख्रिस्तपूर्व ४६० मध्ये ग्रीसमधल्या कॉस बेटावर झाला.कॉसच्या बेटावर अस्क्लेपियस नावाच्या ग्रीक आरोग्यदेवतेचं मंदिर होतं. त्या काळचं ते मंदिर म्हणजे आजच्या मेडिकल कॉलेजसारखंच होतं. आणि तिथं शिकणारे प्रिस्ट्स हे आजच्यासारखे वैद्यकीय ज्ञान घेऊन बाहेर पडणारे डॉक्टर्सच असायचे!


यात हिप्पोक्रॅट्सनं मोलाची भर घातली. त्या वेळच्या अस्क्लेपियस मंदिराला हिप्पोक्रॅट्सनं खूप मोठ्या सन्मानपूर्वक पदावर नेऊन पोहोचवलं. पण हे करताना त्यानं अंधश्रद्धा किंवा देवभोळा ढोंगीपणा बाजूला सारून पूर्णपणे तार्किक दृष्टिकोन निर्माण केला. हिप्पोक्रॅट्सच्या मते निरोगी माणसाच्या शरीरात सगळे अवयव सुसंगतपणे वागत असतात.पण जेव्हा माणूस आजारी पडतो तेव्हा हा समतोल ढासळलेला असतो. त्या वेळी अशा माणसाला शुद्ध हवा,साधं सात्त्विक अन्न आणि विश्रांती हे सगळं देऊन त्याच्या शरीरातला ढासळलेला समतोल पुन्हा पूर्वपातळीवर आणणं हे वैद्यकाचं काम आहे असं हिप्पोक्रॅट्सचं म्हणणं होतं. ख्रिस्तपूर्व ४०० दरम्यान त्यानं 'ऑन द सॅक्रिड 'डिसीज' नावाचं पुस्तक लिहिलं. त्यात त्यानं 'कोणताही रोग होण्याशी देवदेवतांचा किंवा भूताखेतांचा काहीही संबंध नसतो. रोग होण्याला काहीतरी कारण नक्कीच असतं आणि प्रत्येक रोगाला काहीतरी उपचारही असलेच पाहिजेत' ठासून सांगितलं आहे.अर्थात,अनेक रोगांची कारणं आणि त्यावरचे उपाय त्या वेळी माहीत नसले तरी त्याही रोगांच्या उपचारावर हेच तत्त्व लागू पडतं हे त्यानं ठासून सांगितलं आहे.


थोडक्यात, त्यानं 'आपलं शरीर स्वतःच स्वतःला बरं करायचा प्रयत्न करत असतं आणि आपण त्या शरीराला बरं होण्यासाठी योग्य वातावरण निर्माण केलं पाहिजे' असं सुचवलं. हिप्पोक्रॅट्सनं नंतर स्वतःच एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं. त्याच्या मृत्यूनंतरही ते अनेक शतकं चालू राहिलं. गंमत म्हणजे त्या काळातल्या डॉक्टर्सवर हिप्पोक्रॅट्सचा इतका प्रभाव होता, की त्याच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी किंवा शतकांनी

इतरांनी लिहिलेल्या कागदपत्रांवर आणि पुस्तकांवरही त्याचंच नाव घातलं गेलं होतं ! 


आज प्रत्येकाला वैद्यकाची पदवी मिळते तेव्हा जी हिप्पोक्रॅट्स ओथ (शपथ) घ्यावी लागते तीही मुळी हिप्पोक्रॅट्सनं लिहिलेलीच नाहीये! त्याच्या मृत्यूनंतर ती किमान सहा शतकांनी ती लिहिली गेली असं लक्षात आलंय.गेल्या हजारो वर्षांमध्ये त्या शपथेत अनेक बदल झालेले असले,तरी आजही प्रत्येक डॉक्टरला या व्यवसायात पडण्यापूर्वी ही शपथ घ्यावी लागते. 


त्या मूळच्या शपथेचा सारांश असा : मी अपोलो देवतेची शपथ घेऊन सांगतो, की मी माझ्या वैद्यकीय व्यवसायाशी अतिशय प्रामाणिक राहीन. तसंच मी हे काम करत असताना ज्या ज्या लोकांशी माझा संबंध येईल त्या सर्वांशी मी सहानुभूतीनं वागेन. मी भ्रष्टाचार करणार नाही.मी माझ्या ज्ञानाचा वापर फक्त आजारी माणसांना बरं करण्यासाठी करेन.मी कुणालाही कधीही विषारी औषध देणार नाही.मी कुठल्याही स्त्रीला तिच्या गर्भाचा नाश होण्यासाठी कधीही कुठलंही औषध देणार नाही.मी रुग्णांच्या खासगी बाबींविषयी किंवा त्यांच्या आजारांविषयी दुसऱ्यांशी उगीच चर्चा करणार नाही.मी कोणत्याही घरात गेलो तर तिथे मी रुग्णाला बरं करण्याचा सर्वतोपरीनं प्रयत्न करेन.मी जाणूनबुजून काहीही वेडंवाकडं करणार नाही.


हिप्पोक्रॅट्सच्या नावावर इतकं लिखाण प्रसिद्ध झालं,की ते सगळं काम त्यानं एकट्यानं केलेलं असणं शक्यच नाही असं अनेकांचं मत आहे. किंबहुना त्यातला बराच भाग त्याचे विद्यार्थी आणि हिप्पोक्रॅट्सचे समकालीन असलेल्या समविचारी डॉक्टर्सनी लिहिलेला असला पाहिजे, असं म्हटलं जातं.त्याच्या नावावर इतकं लिखाण प्रसिद्ध आहे,की हिप्पोक्रॅट्सनं एकट्यानं ते करायला १०४ वर्ष लागली असती ! 


हिप्पोक्रॅट्स नावाचे सात जण एकाच कुटुंबात होते आणि त्या सगळ्यांनी मिळून हे काम केलेलं होतं असाही एक समज आहे! 


हिप्पोक्रॅट्स किती साली वारला याविषयीही गोंधळ आहे.काहीजणांच्या मते तो वयाच्या ८३ व्या वर्षी वारला,तर काही जणांच्या मते वयाच्या ९० व्या वर्षी.काही जण तर तो १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचा असताना वारला असं मानतात.


दुसरी गोष्ट म्हणजे हे लिखाण हिपोक्रॅटसनंच लिहिलं असावं असं लिखाण चक्क एपिलेप्सी, म्हणजे फिट्स किंवा अपस्मार या आजाराबाबत बद्दल सापडतं.या आजारात रुग्णाचा स्वतःच्या स्नायूंवरचा ताबा जातो आणि बघणाऱ्याला विचित्र वाटावेत असे झटके रुग्णाला यायला लागतात. यात हा रुग्ण स्वतःच्या इच्छेन अशा हालचाली करत नाहीये हे स्पष्ट कळतं.मग अशा वेळी हे नक्की भूतबाधा किंवा तशाचकसल्यातरी दैवी गोष्टीचा

परिणाम असावा यावर त्या वेळच्या कुणाचाही विश्वास बसला असता.शिवाय हा मेंदूचा किंवा नव्र्व्हस सिस्टिमचा आजार असावा असे त्या काळी कुणालाही कळणं शक्यच नव्हतं.


अशा परिस्थितीत हिप्पोक्रॅट्सनं लिहिलेलं वर्णन,

त्यातला तर्क आणि सुसंगतपणा पाहिला की हिप्पोक्रॅट्स खरोखरच विज्ञानाच्या वाटेवरचा पहिल्या काही वाटसरूंमधला एक होता याची खात्रीच पटत जाते. 


या सगळ्यामुळे एखाद्याला आधुनिक बायॉलॉजीची सुरुवात कधी झाली याबद्दल एकच माणूस,एकच पुस्तक आणि एकच तारीख हवी असेल तर त्याचं उत्तर ख्रिस्तपूर्व ४०० मध्ये हिप्पोक्रॅट्सनं लिहिलेलं 'ऑन द सॅक्रिड डिसीज' हे असेल.! त्यामुळेच इतिहासात हिप्पोक्रॅट्सचा उल्लेख अनेकदा वैद्यकशास्त्राचा जनक म्हणून केला जातो.


हिप्पोक्रॅट्सच्या मते माणसाच्या विचारांचे तीन भाग पाडता येतात.वैचारिक गोष्टी माणसाच्या मेंदूत घडतात,

आत्मा माणसाच्या हृदयात असतो आणि विविध प्रकारच्या संवेदना आणि जाणिवा माणसाच्या यकृतात असतात.हिप्पोक्रॅट्सच्या अगोदर ख्रिस्तपूर्व ४९० ते ४३० मधल्या एम्पेडोकल्सनं म्हणून ठेवलं होतं,की जगातल्या सगळ्या गोष्टी आग,हवा,जमीन आणि पाणी या चार मूळ घटकांपासून बनलेल्या असतात.मग ती गोष्ट कुठलीही असू द्या,अगदी दगडासारखी साधी वस्तू असो की माणसाच्या शरीरासारखी विलक्षण क्लिष्ट बाब! अर्थातच, नंतर यात काही तथ्य नाही हे कळणार होतं.पण ते कळायला अनेक शतकांचा कालावधी पार करणं भाग असणार होतं.


एखाद्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला त्या रुग्णाविषयी सगळी माहिती असली पाहिजे असं हिप्पोक्रॅट्सला वाटे.त्याच्या खाण्याच्या सवयी,तो राहतो तिथला परिसर,तो कुठे आणि काय काम करतो,वगैरे. ही खरंच महत्त्वाची कल्पना होती.आणि हे हिप्पोक्रॅट्सला त्या काळी सुचणं हेही खरंच ग्रेट होतं! पण त्या काळी ज्ञानाला मर्यादा होत्या.उदाहरणार्थ,


ज्या भागात मलेरियाची साथ यायची तिथं बहुधा ओलसर भाग असे आणि त्यात अनेक छोट्या छोट्या वनस्पती उगवलेल्या असायच्या,हे कळायचं. पण तिथं डासांची वाढ जास्त सुकर होते हे मात्र हिप्पोक्रॅट्सला उमगलेलं नव्हतं.त्यामुळे वनस्पती आणि रोग यांचाच काहीतरी संबंध असला पाहिजे असं त्याला वाटे!


 त्यातून गोंधळ म्हणजे हिप्पोक्रॅट्सचा ज्योतिषावर गाढ विश्वास होता.सूर्य,चंद्र,तारे आणि ग्रह यांच्या फिरण्याचा वगैरे मानवी आरोग्यावर खूप परिणाम होतो असं त्याला वाटे. किंबहुना ज्या डॉक्टरचा ज्योतिषावर विश्वास नाही त्याला डॉक्टर मानताच कामा नये,असं तो म्हणे.पण त्याचबरोबर धार्मिकतेचा आणि देवाचा आरोग्याशी काहीही संबंध नसतो असंही त्याला वाटे.त्या काळात त्याला असं वाटणं हे जबरदस्तच होतं।


हिप्पोक्रॅट्सचा ह्युमरिझम नावाच्या संकल्पनेवर दृढ विश्वास होता. या संकल्पनेनुसार माणसाच्या यकृतात चार प्रकारचे द्रव किंवा रस निर्माण होत असतात.त्यांचे रंग वेगवेगळे असतात. त्यांच्यापैकी रक्त हे लाल द्रव माणसाला जिवंत बनवतं.पिवळं द्रव माणसाला शूर बनवतं.काळं द्रव माणसाला उदास बनवतं.पिवळा किंवा हिरवा कफ माणसाला मंद करून सोडतो. प्रत्येक माणसाच्या शरीरात हे चारही द्रव असतात,आणि त्यांच्या मिश्रणानुसार माणसाचा स्वभाव आणि त्याचं आरोग्य या गोष्टी ठरतात. जेव्हा हे चार द्रव योग्य प्रमाणात मिसळलेले असतात तेव्हा माणसाचं सगळं ठीकठाक सुरू असतं.पण जेव्हा त्यांचं प्रमाण बिघडतं तेव्हा माणूस आजारी पडतो.

आज हे सगळं वाचून आपल्याला गंमत वाटली तरी हजारो वर्ष ही ह्युमरिझमची संकल्पना अतिशय लोकप्रिय होती.!


११ जानेवारी २०२३ लेखमालेतील पुढील लेख..