* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१/१/२४

रशिया सुधारणारा पीटर दि ग्रेट Peter the Great reformer of Russia

सतराव्या शतकात रशिया अत्यंत मागासलेला देश होता.इंग्लंड,फ्रान्स,जर्मनी वगैरे पश्चिमेकडील देश सुसंस्कृत रानटीपणाच्या दशेला जाऊन पोहोचले होते.पण रशियाचा रानटीपणा मात्र अजूनही ओबडधोबडच होता. त्याला पॉलिश मिळाले नव्हते.रशियातील स्लाव्ह लोक मूळचे मध्य आशियातले.ते तेथून युरोपात आले.

चेंगीझखानाने त्यांना एकदा जिंकले होते. कॉन्स्टॅटिनोपलच्या मिशनऱ्यांनी त्यांना रोमन कॅथॉलिक बनविले होते.असे हे स्लाव्ह शेकडो वर्षे अज्ञानी,दुबळे व दंतकथा आणि नाना रूढी यांनी भारलेले होते.


१४६३ साली तार्तर रशियातून घालविले गेले.पण त्यामुळे रशियनांची स्थिती सुधारली असे नाही.तार्तरहुकूमशहाच्या जागी स्लाव्ह हुकूमशहा आला.मॉस्कॉव्हाचा (मॉस्को) ग्रँड ड्यूक तिसरा इव्हान आपणास रशियाचा उद्धारकर्ता म्हणवीत असे.पण रशियनांना आगीतून निघून फुफाट्यात पडल्याप्रमाणे झाले. त्याच्या नातवाने प्रथम सीझर-झार- ही पदवी घेतली.त्याचेही नाव इव्हानच होते.त्याला 'भयंकर-इव्हान दि टेरिबल' म्हणत.त्याने तर अधिकच जुलूम केला व प्रजेला केवळ गुलाम केले.तार्तरांची हुकूमत होती,तोपर्यंत शेतकऱ्यांना थोडे तरी स्वातंत्र्य होते.पण झारांच्या सुलतानशाहीत त्यांची स्थिती केवळ गुरांढोरांप्रमाणे झाली.डुकरे,गाई,बैल शेतावर असतात.

तसेच हे शेतकरीही तिथे राहत व राबत. त्यांना कशाचीही सत्ता नव्हती.रशिया आता जणू एक जंगी वसाहतच बनला.लाखो मजूर व एकच धनी.झार जमीनदारांना व सरदारांना फटके मारी,जमीनदार व सरदार शेतकऱ्यांवर कोरडे उडवी आणि सर्वांच्या वर आकाशात भीषण असा परमेश्वर होता.झारविरुद्ध बंड करणाऱ्यांना व चर्चची अवज्ञा करणाऱ्यांना गाठाळ चाबकाने फोडून काढावयाला तो परमेश्वर बसलेला होता. जणू भीषण अशी कोसॅकचीच मूर्ती !


झारांच्या अहंकाराची बरोबरी त्यांचे अज्ञानच करू शके.अहंकार भरपूर व अज्ञानही भरपूर, ते केवळ निरक्षर टोणपे होते.ते व्यसनी,व्यभिचारी,विलासी होते.ते आपल्या प्रजेसमोर आपल्या वैभवाचे प्रदर्शन करीत. राजवाड्यात डुकरे पाळीत.मोठमोठ्या मेजवान्यांच्या वेळी ते खुशाल टेबलावरील कपड्यांवर नाक शिंकरीत व आपल्या पाटलोणीस बोटे पुशीत ! ते गणवेश करीत, तेव्हा त्यावर शेकडो पदके लावीत.पण त्यांच्या शरीरांना कित्येक दिवसांत स्नान माहीत नसे.प्रवासात असत तेव्हा ते एखाद्या खाणावळीत उतरत व एखाद्या मोलकरणी

जवळ चारचौघांत गैरवर्तन करीत.ते दैवी सामर्थ्याचा आव आणीत व भुतांची भाषा वापरीत.नवीनच मिळालेल्या सत्तेने ते जणू मत्त झाले होते.ते दारू प्यायलेल्या जंगली माणसांप्रमाणे वागत.त्यांना चालरीत माहीत नसे. सद् भिरुची ठाऊक नसे.रशियाची राजधानी मॉस्को येथे होती.झारमध्ये वैभव व वेडेपणा,सत्ता व पशुता यांचे मिश्रण होते. त्याचप्रमाणे मॉस्को राजधानी सौंदर्य व चिखल यांनी युक्त होती.मॉस्कोकडे येणारे रस्ते फक्त हिवाळ्यात जरा बरे असत.कारण त्या वेळी चिखल गोटून घट्ट असे.मॉस्कोभोवती दुर्गम जंगले होती.ते दुरून अरबी भाषेतील गोष्टींमधल्या एखाद्या शहराप्रमाणे दिसे.दुरून दोन हजार घुमट व क्रॉस दिसत.ते तांब्याने मढवलेले असत व सूर्यप्रकाशात लखलखत. लाल,हिरव्या व पांढऱ्या इमारतीच्या मस्तकांवर दोन हजार घुमटांचा व क्रॉसांचा जणू काही भव्य मुकुटच आहे असे दुरून भासे.पण राजधानीत पाऊल टाकताच ही माया नष्ट होई व मॉस्को एक प्रचंड व अस्ताव्यस्त बसलेले खेडेगावच आहे असे वाटे.रस्ते रुंद होते.पण त्यावरून जाणाऱ्यांना ढोपर-ढोपर चिखलातून जावे लागे. दारुडे व भिकारी यांची सर्वत्र मुंग्याप्रमाणे गर्दी असे,बुजबुजाट असे.

सार्वजनिक स्नानगृहांपाशी दिगंबर स्त्री-पुरुषांची ही गर्दी असे.एवढेच नव्हे,गलिच्छ गोष्टी बोलत.या राजधानीतील हवा जणू गुदमरून सोडी,धूर,दारूचा वास,घाणीची दुर्गंधी, खाद्यपेयांचा घमघमाट अशा संमिश्र वासाने भरलेली हवा नाकाने हूंगणे,आत घेणे हे मोठे दिव्यच असे.भटकणारी डुकरे,झिंगलेले शिपाई रस्त्यांतून लोळताना दिसत व त्यांना जरा कोणाचा अडथळा झाला,तर ते ताबडतोब ठोसे द्यायला तयार असत.आरंभीच्या झारांच्या काळात रशियाची अशी दुर्दशा होती.पण सतराव्या शतकाच्या अखेरीस झार पीटर अलेक्झीविच याने या प्रचंडकाय रशियन राक्षसाला आपल्या मजबूत हातांनी झोपेतून जागे केले व त्याला पश्चिम युरोपच्या सुधारणेकडे किलकिल्या डोळ्यांनी पाहावयास लावले.झार फिओडोर हा पीटरचा भाऊ.तो स्पायनोझाच्या मरणानंतर पाच वर्षांनी म्हणजे १६८२ साली मरण पावला.तेव्हा पीटर दहा वर्षांचा होता.पीटरचा सोळा वर्षांचा इव्हान नावाचा एक दुबळा भाऊ होता.पीटर व इव्हान हे दोघे संयुक्त राजे निवडले गेले.पण दोघेही लहान असल्यामुळे त्यांची बहीण सोफिया राज्यकारभार पाही.ती महत्त्वाकांक्षी असल्यामुळे तिने पीटरला मॉस्कोच्या उपनगरात पाठवले व सिंहासनाचा कब्जा घेतला.तिच्या मनात त्याला आपल्या मार्गातून कायमचे दूर करायचे होते. पण तिने त्याला तूर्त तात्पुरते दूर केले.पीटर पंधरा वर्षांचा होईतो त्याला लिहा-वाचावयासही येत नव्हते व बोटे मोडूनही दहापर्यंत आकडे मोजता येत नव्हते.पण त्याला मोडतोड करण्याचा नाद फार होता.हातांनी काही तरी करीत राहण्याची व खेळातील गलबते बांधण्याची त्याला आवड होती.

बालवीर जमवून तो लुटपुटीच्या लढायाही खेळे.हेच बालवीर पुढे रशियन सैन्याचा कणा बनले.यातून रशियन सेना उभी राहिली.


आरंभीच्या झारांच्या काळात परकीयांना मॉस्कोत राहण्यास बंदी होती.त्यांना मॉस्कोच्या उपनगरात राहावे लागे.पीटरची व या परकीयांची गाठ पडे व त्यांच्याविषयी त्याला प्रेम वाटे. त्याला त्या परकीयांनी जीवनाची एक नवीनच तऱ्हा दाखवली.ती त्याला अधिक रसमय वाटल्यामुळे त्याचे मन तिच्याकडे ओढले गेले.

डच गलबते बांधणारे,साहसी इंग्रज प्रवासी, इटालियन न्हावी,स्कॉच व्यापारी,पॅरिसमधील नबाब,जर्मन पंतोजी,

डॅनिश वेश्या या सर्वांशी तो परिचय करून घेऊ लागला.

पीटर सुशिक्षित नव्हता.पण या सर्वसंग्राहक वातावरणात त्याची दृष्टी मोठी होऊ लागली.तो जणू जगाचा नागरिक बनू लागला.त्याचे जिज्ञासू मन जे जे मिळे,ते ते घेई. त्याच्याशी संबंध आलेल्या परकीय स्त्री-पुरुषांचे काही गुण व बरेचसे दुर्गुणही त्याने घेतले. पश्चिम युरोपातील मोठमोठ्या राजांविषयी अनेक कथा त्याच्या कानी आल्या व आपणही त्यांच्याप्रमाणे व्हावे, असे त्याला वाटू लागले.सतराव्या वर्षी त्याने गोष्टी केल्या.

स्वतःचे लग्न व बहीण सोफिया हिची हकालपट्टी.

एवढ्याशा वयात आपण होऊन मुले या गोष्टी करीत नाहीत.त्याचा अर्धवट भाऊ इव्हान पुढे लवकरच मेला व पीटर रशियाचा एकमेव सत्ताधीश झाला.उपनगरातील विदेशी मित्रमंडळींच्या संगतीत राहण्यास गेला,तेव्हा सरदारांनी व दरबारी लोकांनी नाके मुरडली.पीटर

धष्टपुष्ट,रानवट व दांडगट होता.त्याचे शरीर खूप विकसित झाले होते.पण मन अविकसितच राहिले.तो रंगाने काळसर असून सहा फूट साडेसहा इंच उंच होता.त्याचे ओठ जाड होते. अशा या अगडबंब व धिप्पाड माणसाची वृत्ती उत्कट होती.त्याला स्वतःचे काहीही सोडू नये असे वाटे.जीवनात त्याला काहीच गंभीर वाटत नसे.सारे जग जणू त्याचे खेळणे झाले होते.त्याला गलबते बांधण्याची फार हौस होती. तो सांगे, 'मला पीटर दि कार्पेटर म्हणा.' राजदंड हाती मिरविण्यापेक्षा घण हातात घेऊन काम करणे त्याला अधिक आवडे.

लहानपणी त्याने अल्प प्रमाणावर सैन्य उभारले होते.

आता गलबते बांधून आरमाराचाही पाया घालावा,असे त्याच्या मनात आले.त्याची बालवृत्ती जन्मभर टिकली.

आरमार बांधण्यास प्रारंभ करतेवेळी त्याच्याजवळ फार मोठ्या योजना होत्या,असे नाही.त्याची ती गलबते म्हणजे त्याची करमणूक होती.आपल्या बालवीरांना नकली बंदुका देऊन त्याने खेळातील शिपाई बनवले होते.तद्वतच हेही.पण गलबते हवी असतील,तर समुद्र हवा हे लवकरच त्याच्या लक्षात आले.लहान मुलगा मनात येईल ते करू पाहतो तद्वत पीटर लगेच काळ्या समुद्राकडे आपले बुभुक्षित डोळे फेकू लागला.दक्षिणेकडे काळा समुद्र होता व पश्चिमेकडे बाल्टिक समुद्र होता.काळ्या समुद्रात प्रवेश मिळावा म्हणून सैन्य घेऊन त्याने तुर्कोंवर स्वारी केली.पण अझोव्ह येथे त्याचा पराजय झाला.तरी मॉस्कोला परत येऊन आपण मोठा जय मिळवला अशी बढाई तो प्रजेपुढे मारू लागला. त्याने दारूकाम सोडून विजयोत्सव केला. दारूकाम त्याला फार आवडे.त्याच्या करमणुकीचे प्रकार मुलांच्या करमणुकीच्या प्रकारांसारखेच असत.बाल्टिक किनारा मिळवण्यासाठी त्याने स्वीडनच्या बाराव्या चार्लस राजाशी लढाई सुरू केली.ती बरीच वर्षे चालली.

त्याच्या आयुष्याचा बराचसा भाग त्यात गेला.पण दारूकाम सोडणे व इतर करमणुकी यांच्याआड हे युद्ध येत नव्हते आणि तिकडे रणांगणावर शिपाई मेले म्हणून त्याला त्याचे काय वाटणार होते? मरणाऱ्यांची जागा घेण्यास दुसरे भरपूर होते.पण लढाईचे काही झाले तरी, एक दिवसही दारूकाम सुटले नाही किंवा इतर करमणुकी झाल्या नाहीत,तर मात्र तो दिवस फुकट गेला असे त्याला वाटे.चार्लसशी युद्ध चालू असता त्याचे लक्ष दुसऱ्या एका गंमतीकडे गेले. आरमार व लष्कर निर्माण केल्यावर नवीन रशिया निर्माण करण्याचे त्याच्या मनाने घेतले. तो आपली निरनिराळी खेळणी घेई व पुन्हापुन्हा वेगवेगळ्या रीतींनी रची व मांडी.वस्तू असतील तशाच ठेवणे त्याला आवडत नसे.त्याने इतर खेळण्यांत फेरबदल केला तद्वत रशियालाही नवा आकार,नवे रंगरूप देण्याचे त्याच्या मनाने घेतले.मॉस्कोच्या उपनगरातील परकीयांविषयी त्याला आदर वाटे.म्हणून त्याने सारा रशिया परकीयांनी भरून टाकण्याचे ठरवले.


रशियाला युरोपच्या पातळीवर आणण्याच्या कामी पश्चिम युरोपचा अभ्यास करणे अवश्य होते.म्हणून तो हॉलंड,

फ्रान्स,जर्मनी,इंग्लंड वगैरे देशांत गेला व पश्चिमेकडील संस्कृतीचे काही कपडे घेऊन आला.नवीन कपड्यांनी भरलेले एक कपाटही त्याने बरोबर आणले.आपण आणलेल्या कपड्यांसारखेच कपडे प्रजेने वापरावेत,

आपण शिकून आलेल्या चालीरितींसारख्या चालीरीती प्रजेने सुरू कराव्यात अशा उद्योगाला तो लागला.

शिपायांना कात्र्या देऊन रस्त्यांवरून जाणाऱ्या दाढाळ शेतकऱ्यांच्या दाढ्या त्याने कापायला अगर उपटायला सांगितले.त्याने स्वतः सरदारांचे व दरबारी लोकांचे कपडे फाडून टाकले व पश्चिमेकडचे फॅशनेबल कपडे त्यांनी वापरावेत, असा अट्टाहास चालवला.झारने चालवलेल्या या सुधारणा पाहून रशियन पोप रागावला. रशियातील धर्मगुरू स्वतःला जनतेचा बाप म्हणवीत असे.त्याच्या मताप्रमाणे मानव ईश्वराची प्रतिकृती असल्यामुळे त्यांनी ईश्वराप्रमाणे लांब दाढ्या ठेवल्याच पाहिजेत व लांब चुण्यांचे झगे घातलेच पाहिजेत. रशियन धर्मगुरूने त्यामुळे असे फर्मान काढले की,सर्व धार्मिक लोकांनी राजाचा हुकूम अमान्य करून दाढ्या,निदान हनुवटीवर तरी ठेवाव्यात. नाही तर एखाद्या पेटीत तरी आपली दाढी राखून ठेवावी.म्हणजे मरताना ती आपल्याबरोबर नेता येईल.दाढीवरील या धार्मिक चर्चेला गंभीर स्वरूप आले.पीटरने पोपविरुद्ध बंड केले.व तो स्वतःच धर्माचा मुख्य झाला.पण पीटरच्या इतर सुधारणा काही इतक्या पोरकट नव्हत्या.काही

तर खरोखरच महत्त्वाच्या होत्या.त्याने सीनेट नेमले,राज्याचे आठ भाग केले,रस्ते बांधले,कालवे खणले,शाळा काढल्या,विद्यापीठे स्थापिली,दवाखाने काढले,नाटकगृहे बांधली, नवीन धंदे निर्मिले.

नाटकगृहे तयार झाली की नाटकेही निर्माण होऊ लागतील असे त्याला वाटले.ज्या नाटकात त्याची स्तुती असे त्या नाटकांसाठी ही नाट्यगृहे होती.हे सारे अंतःस्फूर्तीने त्याच्या मनात येई म्हणून तो करीत असे.

जीवनाशी त्याच्या चाललेल्या खेळातलाच तो एक भाग होता.तो जे काही करी त्यात योजना नसे,पद्धत नसे,विचार नसे,योजनेशिवाय काम करणे हीच त्याची योजना.दुसऱ्या देशात पाहिलेले जे जे त्याला आवडे ते ते तो ताबडतोब आपल्या देशात आणी.त्याचे अशिक्षित पण जिज्ञासू मन सारखे प्रयोग करीत असे.हॉलंडमध्ये एक दंतवैद्य दात काढीत आहे असे आढळले,तेव्हा पीटरने रशियात परत येताच स्वतःच दात काढण्यास सुरुवात केली.एका शस्त्रक्रियातज्ज्ञाने केलेले ऑपरेशन त्याने पाहिले व लगेच स्वतःही तसेच एक ऑपरेशन करण्याची लहर त्याला आली. अर्थातच,त्याचा रोगी मेला हे काय सांगावयास पाहिजे ? कुटुंबीयांची नुकसानभरपाई त्या रोग्याच्या प्रेतयात्रेस स्वतः हजर राहून त्याने केली.त्याला गलबतांचा नाद नित्य असल्यामुळे शेवटी त्याने बाल्टिक समुद्रकाठाच्या दलदलीच्या प्रदेशात एक शहर बसवले व त्याला सेंट पीटर्सबर्ग असे जर्मन नाव दिले.आपल्या परसात असल्याप्रमाणे येथे आरमार राहील,असे त्याला वाटले.हे शहर सुंदर करण्यासाठी त्याने चौदाव्या लुईच्या दरबारातून काही कलावंत व कारागीर मागवून घेतले.पण हे शहर बांधता बांधता एक लक्ष तीस हजार लोक मेले.

आपला देश सुसंस्कृत करण्यासाठी तो जन्मभर धडपडला.पण स्वतः मात्र रानटीच राहिला.फ्रेंच दरबरातील रीतिरिवाज रशियात सुरू करावेत असा त्याचा हट्ट होता.त्याने आपल्या गुरूजींची पाठ वेताने फोडली.तो तत्त्वज्ञानी लोकांशी चर्चा करी व शेतकऱ्यांच्या अंगावर दारू ओतून त्यांना काडी लावून देई. त्याने अनाथांसाठी अनाथालये स्थापिली;पण स्वतःचा मुलगा अलेक्सिस याला आज्ञाभंगासाठी मरेपर्यंत झोडपले.

शरीररचनाशास्त्राचा तो अभ्यासक असल्यामुळे त्याने पुढील विक्षिप्त प्रकार केला.त्याच्या एका वेश्येने झारिनाची निंदा केल्याबद्दल त्याने तिला शिरच्छेदाची शिक्षा दिली.तिचा वध झाल्यावर तिचे डोके मागून घेऊन जमलेल्या लोकांना मानेमधील स्नायू व शिरा दाखवून त्याने शरीररचनेवर एक व्याख्यान झोडले! त्याला आपल्या प्रजेच्या मुंडक्यांशी खेळण्याचे वेडच होते.एकदा त्याने एकाच वेळेस बारा हजार बंडखोर सैनिकांची धडे शिरापासून वेगळी केली.मानवजातीची कथा-हेन्री थॉमस,

सानेगुरुजी,झारीना व्याभिचारिणी आहे हे कळल्यावर त्याने तिच्या प्रियकराचे डोके कापले व ते अल्कोहोलमध्ये बुडवून तिच्या टेबलावर जणू फ्लॉवरपॉट म्हणून ठेवले.तो झारिनाचाही शिरच्छेद करणार होता.पण इतक्यात स्वतःच आजारी पडून तो त्रेपन्नाव्या वर्षी (१७२५ साली) मेला.तेव्हा रस्त्यातील लोक एकमेकांना म्हणू लागले,"मांजर मेले,आता उंदीर त्याला पुरतील." फ्रेडरिक दि ग्रेट लिहितो,'हा पीटर म्हणजे एक शौर्यधैर्यसंपन्न पिशाच्चच होते.मानवजातीचे सारे दोष त्याच्या अंगी होते पण गुण मात्र फारच थोडे होते.

शांतताकाळी दुष्ट,युद्धकाळी दुबळा,परकीयांनी प्रशंसिलेला,प्रजेने तिरस्कारिलेला हा राजा मूर्ख;पण दैवशाली होता.सम्राटाला आपली नियंत्रित सत्ता जितकी चालविता येणे शक्य होते,तितकी त्याने चालविली.' मानवजातीची त्याला पर्वा नसे.तो जे काही करी, ते स्वत:च्या सुखासाठी म्हणून करी.पण त्याने केलेल्या अनेक खेळांत प्रजा साक्षर करणे हाही एक खेळ होता व त्यामुळे न कळत का होईना त्याने स्वतःचे डेथ-वॉरंटच लिहिले! कारण,ज्ञानाचा आरंभ म्हणजेच अनियंत्रित सत्तेचा अंत.सेंटपीटर्सबर्गचा हा हडेलहप्पी हुकूमशहाच पुढील रशियन राज्यक्रांतीचा आजोबा होय.

२८ नोव्हेंबर २३ या लेखमालेतील पुढील भाग..

३०/१२/२३

पाणघोड्याची गुंगी.. The hum of the hippopotamus..

वन्य पशूची चिकित्सा करण्याचं काम तसं खूप आकर्षक,

मनोरंजक असतं.पशुचिकित्सकासमोर बऱ्याच वेळा त्याला आव्हान करणाऱ्या केसेस उभ्या राहतात.क्वचित केव्हातरी एखाद्या प्राण्याचा सामान्य वाटणारा आजार असं काहीतरी नाजूक स्वरूप धारण करतो,की मग त्याला वाचवण्याकरता अतिशय वेगानं हालचाली नि इलाज करावे लागतात.प्राण्यांच्या इलाजांव्यतिरिक्त पशु

चिकित्सकासमोर कधीकधी मोठ्या बिकट समस्या पण उभ्या राहतात.त्या समस्यांशीही त्याला मग सामना करावा लागतो.या संदर्भात गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलेल्या एका पाणघोड्याची हिप्पोपोटेमसची विलक्षण केस मला प्रकर्षानं आठवते.एक दिवस तिसऱ्या प्रहरी मँचेस्टरच्या प्राणिसंग्रहालयात हर्क्युलिस नावाच्या एका पाणघोड्याचं आगमन झालं.जाड आणि मजबूत पोलादी गज असलेल्या एका बऱ्याच मोठ्या आणि भक्कम पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून या स्वारीला लंडनहून पाठवण्यात आलं होतं. पाणघोडा हे मोठं जबरदस्त जनावर असतं. त्याच्याशी कोणत्याही प्रकारची सलगी अगर चेष्टामस्कारी करता येत नाही.हा भयंकर प्राणी अतिशय वेगानं मुसंडी मारून हल्ला करतो; इतकंच नव्हे तर हा फार वाईट प्रकारे चावतो देखील!एखाद्या प्रचंड रणगाड्याप्रमाणे तो चाल करू येतो आणि रणगाड्याप्रमाणेच त्यालाही थोपवणं अशक्य असतं.त्याची मुसंडी जबरदस्त असते.हक्युर्लसनं बोटीच्या प्रवासादरम्यान काही दंगामस्ती करू नये म्हणून लंडनहून त्याची रवानगी करण्यापूर्वी त्याला 'फॅन्सीक्लायडीन' या गुंगीच्या औषधाचं इंजेक्शन टोचण्यात आलं होतं.पूर्ण शुद्धीवर असलेल्या स्थितीत त्यानं बोटीवर जर काही उत्पात केला असता,तर तो केव्हाही हितावह ठरला नसता.म्हणून खबरदारी म्हणून त्याला गुंगीचं औषध टोचण्यात आलं होतं.प्राणिसंग्रहालयात पोहोचल्यानंतर, पिंजऱ्यातून बाहेर काढण्यापूर्वीही त्याला याच औषधाचा आणखी एक डोस टोचावा,अशी सूचनाही लंडनहून आली होती.ज्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून हर्क्युलिसला पाठवण्यात आलं होतं त्या पिंजऱ्याच्या वरच्या मोकळ्या भागावर मी चढलो.निसर्गतः टणक कातडी असलेल्या त्या अवाढव्य प्राण्याकडे मी नजर टाकली. ते जनावर अगदी शांतपणे उभं होतं.कदाचित त्याला मी गुंगीच्या इंजेक्शनचा दुसरा डोस दिलाही नसता,पण त्यापूर्वी एखाद्या पाणघोड्याला पिंजऱ्यातून बाहेर काढण्याचा अनुभव मी घेतलेला नव्हता.न जाणो लंडनहून आलेल्या सूचनेबरहुकूमगुंगीच्या इंजेक्शनचा दुसरा डोस न देता मी त्याला पिंजऱ्याबाहेर काढलं;आणित्याने जर धिंगाणा घातला तर? याच विचारामुळं उगाच धोका नको म्हणून मी

फॅन्सी क्लायडीनचा एक डोस इंजेक्शनमध्ये भरून घेतला.सिरिंजवर मी एक अतिशय मजबूत अशी सुई बसवली,कारण हे इंजेक्शन पाणघोड्याच्या कातडीत द्यायचं होतं.मग पिंजऱ्याच्या गजांमधून हात आत घालून हर्क्युलिसच्या कुल्ल्यावर विवक्षित ठिकाणी इंजेक्शनची सुई मी जोरानं खुपसली आणि सिरिंजचा दट्टया दाबला.थोड्याच वेळात औषधाचा योग्य तो परिणाम झाला.हर्क्युलिसचे कान निर्जीवपणे खाली पडले; आणि त्याच्या प्रचंड मोठ्या जबड्यामधून लाळ टपकू लागली.


मग मी त्याला पिंजऱ्यातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.ज्या हौदवजा तलावात पाणघोड्याला सोडण्यात येणार होतं,त्या तलावासमोरच हर्क्युलिसचा पिंजरा ठेवलेला हेता.पिंजऱ्याचं पाठचं दार तलावाकडे तौंड करून होतं.त्या दाराची कडी काढून ते उघडण्यात आलं.हर्क्युलिसनं मागे मागे चालत बाहेर पडावं आणि कुणावर हल्ला करू नये असा यामागचा उद्देश होता;परंतु उलट्या चालीनं बाहेर पडायची हर्क्युलिसची तयारी नव्हती.मग पिंजऱ्याचं दार तलावाच्या दिशेनं फिरवून अगदी सावधपणे आम्ही त्याच्या पिंजऱ्याचं दार उघडलं आणि एका बाजूला उभे राहून काय होतं ते पाहू लागलो.

हर्क्युलिसनं आपल्या मोठमोठ्या नाकपुड्या फेंदारून बेपर्वाईनं जोरानं वास घेतलं आणि आपल्या नव्या घराचा धोडासा अंदाज घेतला.झोपेमुळं- गुंगीमुळं जड झालेल्या आपल्या पापण्या फडफडवून त्यानं प्रयत्नपूर्वक समोर पाहिलं आणि त्याच्या नजरेला गरम पाण्यानं भरलेला मोठा तलाव समोर दिसला. चमकदार निर्मळ पाणी असलेल्या त्या तलावाच्या पृष्ठभागावरून हलक्या वाफा निघत होत्या.अर्धवट निद्रित अवस्थेत हर्क्युलिस आपल्या पिंजऱ्यामधून बाहेर पडला आणि हळूहळू पावलं टाकत डुलत डुलत स्वारी तलावाच्या काठाशी पोहोचली.तोंड खाली करून,नाकपुड्या फेंदारून तलावांतल्या पाण्याचा त्यानं वास घेतला.काही क्षण हुंगल्यासारखं केलं.तलावाचं पाणी बहुधा त्याला पसंत पडलं असावं;आणि म्हणूनच की काय अगदी हळुवारपणे तो तलावाच्या त्या स्वच्छ पाण्यात हर्क्युलिसला शांतपणे शिरताना पाहून आम्हाला समाधान वाटलं.हर्क्युलिस पोहत तलावाच्या मध्यभागी गेला;आणि मग एखादी जडशीळ शिळा पाण्याखाली जावी त्याप्रमाणे त्याचा प्रचंड देह अचानक उभाच्या उभा तळाशी गेला! गुंगीच्या औषधामुळे त्याला झोप लागली असावी आणि त्यामुळे शरीरावरलं नियंत्रण सुटून तो पाण्याखाली गेला होता.काही मिनिटं उलटली,पण तो वर आला नाही.त्याला मी फॅन्सीक्लायडीनचा दुसरा डोस दिलेला होता आणि मग तलावाच्या उष्ण पाण्यात सोडलं होतं. उष्ण पाण्यामुळे गुंगीच्या त्या औषधाचा प्रभाव मोठाच भयंकर सिद्ध झाला.पूर्ण शुद्धीवर असताना पाणघोडा पाण्याच्या पृष्ठभागाखाली कित्येक मिनिटं श्वास रोखून पाहू शकतो; परंतु श्वासोच्छ्वास करण्याची वेळ येते तेव्हा त्याला पाण्याच्या पृष्ठभागावर यावंच लागतं, पण अर्धवट बेशुद्ध अवस्थेत हर्क्युलिस पाण्याच्या तळाशी गेला होता.त्या स्थितीत त्याचा श्वास अडला असेल हा भयानक विचार माझ्या मनात आला;आणि मी विलक्षण हादरलो.

भयाची एक थंड शिरशिरी माझ्या सर्वांगात सरसरत गेली.गुंगीच्या औषधामुळे आलेल्या बेहोषीमुळे जर हर्क्युलिसला पाण्याच्या पृष्ठभागावर येण्याचं भान राहिलं नाही,तर गुदमरून पाण्याच्या तळाशीच त्याला मृत्यू येईल. हा भयंकर विचार माझं काळीज पोखरू लागला.बाजूला उभ्या असलेल्या प्राणिसंग्रहालयाच्या पाहून मी मोठ्यांदा ओरडलो, 'लवकर जा! आणि काही मजबूत दोरखंड घेऊन या! जल्दीऽऽ!' प्राणिसंग्रहालयाचे रखवालदार धावतच दोरखंड घेऊन आले. हर्क्युलिस जिथे बुडाला होता,तिथे पाण्याच्या पृष्ठभागावर हवेचे बुडबुडे वर येत होते.मग एक मिनिटही वाया न घालवता मी आणि प्राणिसंग्रहालयाचा प्रमुख रखवालदार मॅट केली.आम्ही दोघांनी कपडे काढले;आणि जांघियावर आम्ही दोघं तलावात उतरलो.तलावाच्या पाण्यात डुब्या घेत आम्ही तलावाच्या तळाशी पोहोचलो.


रखवालदाराने दिलेले दोर आम्ही आमच्या बरोबर घेतलेलेच होते. पाण्याखाली वापरण्याचे गॉगल्स लावल्याविना दोरखंडांनी हर्क्युलिसला बांधणं हे काही सोपं काम नव्हतं.आम्ही पाण्याच्या तळाशी उभ्या असलेल्या त्या पाणघोड्याजवळ पोहोचलो. गुंगीमुळे त्याला झकास झोप लागलेली होती. त्याच्या फेंदारलेल्या नाकपुड्यांमधून उच्छ्वासाची हवा बाहेर पडत असल्यामुळे हवेचे मोठमोठे बुडबुडे पाण्यातून वर जात होते.मी हर्क्युलिसच्या मागल्या दोन पायांखालून दोरखंड घालत तो त्याच्या दोन्ही बाजूंनी वर आणला; आणि त्याच्या कमरेवर गाठी मारल्या.मॅट केलीनं त्याच्या पुढल्या दोन पायांखालून - छातीवरून दोरखंड घेऊन त्याच्या खांद्यावर गाठी मारल्या. पाण्यात जास्त वेळ दम काढता येत नसल्यामुळे पाण्याबाहेर येऊन नि पाण्यात दोन-तीनदा डुब्या घेऊन हर्क्युलिसला मजबूतपणे बांधण्याचं काम आम्ही पूर्ण केलं आणि त्याला बांधलेल्या दोरांची टोकं घेऊन तलावाबाहेर आलो.दरम्यान प्राणिसंग्रहालयाच्या नोकरांनी कप्प्यांचे चार स्टँड त्या तलावाच्या काठावर आणून ठेवले होते.दोन तलावाच्या एका बाजूला तर दोन दुसऱ्या बाजूला मग त्या कप्प्यांवरून आम्ही आणलेले चारही दोर त्यांनी वर घेतले आणि मग चार टोकांकडून ते चारही दोर ते जोर लावून हळूहळू वर ओढू लागले.त्या वजनदार पाणघोड्याला पाण्यातून वर खेचणं म्हणजे सोपं का काम होतं? पण काही मिनिटांत प्रेमदेवता व्हीनस पाण्यातून बाहेर यावी त्याप्रमाणे हर्क्युलिस महाशयांचा देह पाण्यातून हळूहळू वर आला.प्राणी मित्रांच्या जगात -विजय देवधर,चंद्रकला प्रकाशन पाणघोड्याची शारीरिक बनावट अशी असते,की त्याला धरायचं झालं,तर कोणत्याही बाजूनं नीट पकडता येत नाही;आणि म्हणूनच हर्क्युलिसला तलावातून बाहेर आणणं अशक्य होतं.म्हणून मग आम्ही तो शुद्धीवर येईपर्यंत त्याला तलावाच्या पाण्याच्या पृष्ठभागावरच तरंगत ठेवण्याचं ठरवलं. तो शुद्धीवर आल्यानंतर आम्हाला त्याच्या निकट जाता येणार नव्हतं,म्हणून त्याच्या पुढल्या व मागल्या पायांखालून दोन नवे दोर आडवे घालून ते कप्प्यांवरून घेऊन तलावाच्या बाजूला फरशीवर असलेल्या हुकांना आम्ही बांधले.मग अगोदर तो पाण्याखाली असताना त्याच्या शरीरावर बांधलेले दोर सोडवून घेतले. नव्या दोरांमुळे हर्क्युलिसचं शरीर तर पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत राहिलं;परंतु त्याचं जड तोंड पाण्यात लोंबकळू लागलं.म्हणून मग त्याच्या तोंडाभोवती एक मोठा टॉवेल गुंडाळून त्याची वर गाठ मारून वरून लोंबकळत राहील अशा एका हुकामध्ये तो टॉवेल अडकवून टाकला.अशा प्रकारे एक प्रकारचा झूला करून त्यात आम्ही हर्क्युलिस महाराजांच्या मस्तकाची स्थापना केली.आता त्याचा जबडा आणि नाक पाण्याच्या बाहेर अधांतरी स्थितीत राहिलं.दाढदुखीनं हैराण झालेल्या एखाद्या माणसानं आपल्या तोंडाभोवती मफलर गुंडाळून बसावं असाच काहीसा हर्क्युलिसचा अवतार आता दिसत होता.पण त्याची ही सगळी व्यवस्था लावता लावता आम्हाला मात्र अक्षरशःघाम फुटला होता.काहीही असो,पण गुंगीच्या औषधाच्या अंमलाखाली गुदमरून मरण्यापासून आम्ही त्याला वाचवलं होतं.दोरखंडांच्या झोपाळ्यावर पाण्यात तरंगत आता स्वारी स्वस्थपणे श्वासोच्छ्वास करत होती.अद्याप त्याची गुंगी पूर्णपणे उतरली नव्हती.काही तास उलटले.


हर्क्युलिसवरला गुंगीच्या औषधाचा अंमल हळूहळू ओसरू लागला.थोड्याच वेळात तो पूर्णपणे शुद्धीवर आला.दोरखंडांनी आपल्याला पाण्याच्या पृष्ठभागावर का टांगून ठेवलं आहे,हे काही त्याच्या लक्षात येईना.त्यातून सुटण्याकरता तो जोरानं धडपड करू लागला.तो आता पूर्ण शुद्धीवर आला असून,आता स्वतःची काळजी घेण्याइतपत सावध झाला आहे,अशी आमची खात्री पटली;आणि दोरखंडांच्या झोपाळ्यातून त्याची सुटका करायचं आम्ही ठरवलं.प्रथम त्याच्या डोक्यावरचा लोखंडी हुक वरून थोडा सैल करून,खाली सोडून त्याच्या जबड्या भोवतालचा टॉवेल काढून घेतला.जबडा मोकळा होताच हर्क्युलिसनं आपलं तोंड पाण्यात घुसळलं.मग कप्प्यांवरले दोन बाजूंचे दोर आम्ही सोडले आणि दुसऱ्या बाजूंनी ते ओढून घेतले. पोटाखालचे दोरखंड मोकळे होताच हर्क्युलिसनं आपलं सबंध अंग घुसळलं;आणि तो झटदिशी तलावाच्या तळाशी गेला.आपला भला मोठा जबडा पाण्याच्या वर आणत फुर्रऽऽफुर्रऽऽ करत त्यानं पाणी उडवलं;आणि मग आपल्या भल्या मोठ्या नाकपुड्या फेंदारून त्यानं दीर्घ श्वास घेतला.ते पाहून आम्ही सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.त्याच्या बाबतीतला धोका आता टळला होता.थोड्याच दिवसांमध्ये हर्क्युलिस पाणघोडा प्राणिसंग्रहालयात चांगला रुळला.त्याला आपला तलाव भारी आवडू लागला.त्याला ज्या तलावात ठेवलं होतं,त्या तलावात पाण्यात जगणाऱ्या हिरव्यागार वेलवनस्पती सोडलेल्या होत्या, तलावात काही कृत्रिम झरेही सोडण्यात आले होते.तलावात काही ठिकाणी काँक्रीटची कृत्रिम बेटं तयार केलेली होती.ज्या उष्णदेशीय प्रदेशातून हर्क्युलिस आलेला होता,तसलंच वातावरण इथं निर्माण करण्यात आलं होतं. त्यामुळे हर्क्युलिस अगदी खूश झाला;आणि मौजेनं त्या तलावात राहू लागला.पण त्याच्या आगमनाचा इतर काही प्राण्यांना उपद्रव होऊ लागला.कारण,ज्या तलावात हर्क्युलिसला ठेवण्यात आलं होतं,त्याच तलावात इतरही काही प्राणी राहत होते.अमेरिकेत आढळणारे टार्पोर नावाचे सस्तन प्राणी, कॅपिबारा नावाचे उंदरासारखे एक विशिष्ट प्रकारचे प्राणी,पाणबदकं आणि अन्य जातीचे पाण्यात राहणारे पक्षी त्या तलावात वस्ती करून होते आणि हर्क्युलिस याच गोष्टीचा फायदा उठवू लागला.तलावाच्या कुठल्याही भागात तो दडून बसत असे;आणि मोका मिळताच जो समोर दिसेल तो कुठलाही प्राणी तो झडप घालून पकडत असे आणि गट्ट करून टाकत असे.मी बऱ्याच ठिकाणी पाणघोड्यांना वेली, वनस्पती आणि पाणकंद खाऊन जगताना पाहिलेलं आहे; पण आमच्या प्राणिसंग्रहालयात आलेल्या हर्क्युलिस पाणघोड्याचा नूर काही वेगळाच होता.शाकाहाराबरोबरच त्याला मांसाहाराचाही जबरदस्त शौक होता !

२८/१२/२३

असा ही एक आक्क्या Such is the case

पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रशासकीय हद्द आमच्या पार्कच्या मागे चिखली गावाजवळच्या साने वस्तीजवळ संपत होती.त्यापुढे देहू आणि आळंदी ही भक्ति संप्रदायातली गावं जोडणाऱ्या रस्त्यावर टाळगाव चिखली नावाचं गाव आहे. पुष्पक विमानातून सदेह वैकुंठाकडे निघालेल्या संत तुकाराम महाराजांचे आवडते टाळ त्यांच्या हातातून निसटले आणि या गावात पडले. म्हणून या गावाचं नाव टाळगाव चिखली पडलं अशी आख्यायिका आहे.


या गावात एकदा एक मजबूत बांध्याचं बॉनेट जातीचं तरणंबांड माकड आलं.गावात साक्षात हनुमान आला म्हणून जनसामान्यांपासून ते पाटील-सरपंचापर्यंत सगळेच सुखावले.त्या मारुतीरायालाही दररोज नैवेद्य मिळू लागल्याने त्याने आपला पुढचा प्रवास रद्द करून गावातच मुक्काम ठोकला.चिखलीमध्ये ते चांगलं रमलं. सुरुवातीला सगळ्यांनाच या माकडाचं कौतुक होतं;पण लवकरच त्याच्या मर्कटलीला सुरू झाल्या आणि गावकरी वैतागू लागले.एकदा ते गावातल्या शाळेत जाऊन पोहोचलं.एका मुलाला धक्का देऊन त्याच्या हातातली जिलेबी पळवली.दुसऱ्या दिवशी एका मुलीच्या हातातला साबुदाणा खिचडीचा डबा हिसकावायचा प्रयत्न केला,पण मुलीनेही दोन्ही हातांनी तो घट्ट धरून ठेवला.त्यामुळे माकडाने तिच्या हाताचा चावा घेतला आणि डब्यासकट खिचडी पळवली. तिसऱ्या दिवशी गावातल्या केळ्यांच्या हातगाडीवर उडी मारून दोन-चार केळी मटकावली.

चिडलेल्या केळीवाल्याने त्याला मारण्यासाठी दगड उचलल्यावर माकडाने त्याच्या गालाचा चावा घेऊन धूम ठोकली. जाताना केळीचे दोन-चार घडही जमिनीवर फेकले.एकदा गावातला बेवडा रात्री तर्र होऊन एका देवळात झोपला होता.काही वेळात हे माकड महाशय सरळ त्याच्या कुशीत जाऊन झोपले.दारुड्याला जाग आली आणि तो कुशीवर वळला.त्याची ही हालचाल माकडाला आवडली नसावी.माकड चिडून गुरकावलं. रात्रभर बेवडा माकडाला घाबरून एकाच प्रस्थतीत गुमान बसून राहिला.एका भटक्या कुत्र्यालाही या माकडाने चांगला प्रसाद दिला. त्वेषाने भुंकणाऱ्या त्या कुत्र्याचा कान एका हाताने उचलून दुसऱ्या हाताने त्याच्या थोबाडीत मारून ते पसार झालं.


मारूतीरायाच्या आगमनामुळे आनंदी झालेल्या लोकांनी प्रशासनाकडे तक्रारी करायला सुरुवात केली.

आमच्याकडेही अनेक तक्रारी आल्या. आम्ही एक- दोनदा गावात जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्नही केला;पण त्या हुशार माकडाने दरवेळी आम्हाला चकवलं.अशातच या माकडाने आणखी एक उपद्व्याप केला आणि त्यामुळे तो अलगद आमच्या तावडीत सापडला. चिखलीतल्या एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारं कुटुंब बाहेरच्या खोलीत झोपलं होतं. कामावर जाण्यासाठी घरातले काका लवकर उठले.त्यांनी चहाचं आधण गॅसवर ठेवलं.चहा उकळू लागला.शेजारच्या छपरावरून हे माकड त्यांच्या हालचाली पाहत होतं.त्या काकांनी चहा कपांमध्ये ओतला आणि ते घरच्यांना उठवायला बाहेरच्या खोलीत आले.तेवढी संधी साधून माकड खिडकीतून स्वयंपाकघरात शिरलं आणि अधाश्यासारखं चहा पिऊ लागलं.त्या काकांनी हे दृश्य पाहिलं.मात्र,त्यांनी प्रसंगावधान राखून स्वयंपाकघराचं दार बंद करून घेतलं आणि गॅलरीमधून धावत जाऊन बाहेरच्या बाजूने खिडकीही लावून घेतली.सगळ्या गावाला दिवसरात्र त्रास देणारं माकड स्वतःच्या हावरटपणामुळे आणि या काकांच्या प्रसंगावधानामुळे ट्रॅप झालं होतं.आम्हाला निरोप मिळाल्यावर नेवाळे आणि आमचे वॉचमन बोराटेअण्णा माकड पकडण्यासाठीची मोठी रिंग स्टिक घेऊन माझ्या स्कूटरवरून तिकडे रवाना झाले आणि तासाभरात माकडासहित ट्रिपलसीट पार्कला परतले.

रात्री-अपरात्री नागरिकांनी आणून दिलेल्या प्राणी-पक्ष्यांसाठी तात्पुरती सोय म्हणून माझ्या बंगल्याच्या आवारात काही पिंजरे ठेवलेले होते,त्यापैकी एका मजबूत पिंजऱ्यात या धिप्पाड माकडाची रवानगी केली.रात्रभर तो घशातून आख्याऽऽऽ आख्याऽऽऽ असा आवाज काढत होता.त्यामुळे त्याचं नावच आक्क्या पडलं.ही रिंग स्टिक म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.रिंग स्टिक म्हणजे एखादा लहानखुरा प्राणी विनासायास पकडण्यासाठी अत्यंत सोपं असं बेसिक साधन.ही एक साधी रिंग असते.तिला एक थोडासा लांबट पाइप हँडल म्हणून जोडलेला असतो.त्या रिंगभोवती एखादी दणकट पिशवी किंवा पोत्याचं तोंड कायमस्वरूपी शिवून टाकलं की झाली रिंग स्टिक तयार.बॅडमिंटनच्या जुन्या रॅकेटपासूनही बेसिक रिंग स्टिक तयार होऊ शकते.माकड पकडण्यासाठी हे सर्वांत चागलं साधन आक्क्या येण्याआधीच आम्ही पार्कच्या एका कोपऱ्यात दीड एकर जागेवर मंकी हिलची उभारणी सुरू केली होती.आम्हाला आज ना उद्या पार्कवर माकडं आणायची होतीच.त्याचा विचार करून हे काम सुरू केलं होतं.रस्तारुंदीमुळे कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या परिसरातून काढून आणलेल्या दोन पिंपळ,एक वर्ड आणि आणि एका उंबराच्या झाडाचं इथे पुनर्रोपण केलं होतं.त्या चारही वृक्षांनी आमच्याकडे आल्यावर बाळसं धरलं आणि नव्या मातीत ते नव्या जोमाने वाढू लागले. या मंकी हिलमध्ये सभोवताली १५ फूट रुंदीचा 'वेट मोट' तयार केला.'वेट मोट' म्हणजे पाण्याच्या खंदकाने चारही बाजूने वेढलेली जागा.खंदकाची खोली फार तर तीन फूटच! पण त्यापुढे सुमारे पंधरा फूट उंचीची भिंत बांधून काढली.बाहेरील प्रेक्षकांना मात्र तीन फूट भिंतीवरून मंकी हिलवरील माकडांच्या कसरती पाहता येतील अशी सोय केली.चारही झाडांच्या फांद्यांना मजबूत सुती दोरखंड बांधून एकमेकांना जोडले.त्यामुळे प्रेक्षकांना मंकी जंपिंग,रिव्हर क्रॉसिंग अशा अनेक माकडलीला नेहमीच पाहायला मिळतील अशी आमची अपेक्षा होती. 'वेट मोट' मध्ये एका वेळी सुमारे सहा लाख लिटर पाणी मावू शकत होतं.त्या पाण्याचा पुनर्वापर बागेसाठी केला जाईल अशी योजना होती.त्यासाठी आम्ही रेन गन आणि पाच एचपीची मोटारही बसवून घेतली.अशा रीतीने मर्कट परिवारासाठी तयारी तर जय्यत झाली होती.आता हा परिवार तिथे दाखल होण्याचीच खोटी होती.पण गंमत अशी,की आक्क्याला तिथे सोडलं आणि काही दिवसांतच आमच्याकडे गौरी नावाची एक मादी दाखल झाली.

पिंपरी- चिंचवड शहरात एका घरात ती वाढलेली होती. मोठी झाल्यावर सांभाळणं अवघड झालं म्हणून त्यांनी तिला आमच्याकडे आणून सोडली. आक्क्याची आणि तिची जोडी चांगली जुळली. मंकी हिलच्या प्रशस्त आवारात काही दिवस हे दोघं राजा-राणीच वावरत होते.


थोड्या दिवसांनी शहरात आणखी एक माकड दिसल्याचा कॉल आला.एम.आय.डी.सी.च्या वॉटर प्लॅटमध्ये एक लहानखुरं माकड कुठून तरी भटकत आलं होतं.संपत पुलावळे नावाच्या आमच्या कीपरने त्याला पकडून आणलं,म्हणून त्याचंही नाव आम्ही 'संपत' ठेवलं! आक्क्या आणि गौरी त्याला कसं स्वीकारतात हा आमच्यापुढे प्रश्नच होता.कारण माकड हा टोळीत राहणारा प्राणी आहे.ही टोळीही वैशिष्ट्यपूर्ण असते.

त्यात सत्तेची उतरंड असते. ती मान्य असेल तरच ते माकड टोळीत टिकतं. आक्क्या हा तसा आक्रमक होता.त्याने संपतला डेप्युटी म्हणून स्वीकारलं,आणि संपतनेही ते स्थान मान्य केलं.


काही दिवसांनी पिंपरी परिसरात आम्हाला आणखी एक माकडीण मिळाली.तीही संपतसारखी लहानखुरी.

आमच्याकडे सर्वप्रथम आलेल्या राणीची आठवण म्हणून तिचं नावही राणीच ठेवलं ठेवलं.त्यानंतर दाखल झाली ती राजी.आम्हाला निगडी गावठाणात सापडलेली माकडीण,

अशा रीतीने आमचं मंकीहिल नव्या कुटुंबासह स्थिरावलं.

आक्क्या कुटुंबप्रमुख,गौरी त्याची पट्टराणी संपत डेप्युटी,

राणी आणि राजी सेकंड आणि थर्ड इन रो।


माकडांचे मंकी-हिलवरचे दिवस मजेत चालले होते.त्यांना दररोज पाच-सहा किलो मिश्र भाजी आणि फळं लागायची, कोबी,फ्लॉवर,लाल भोपळा,टोमॅटो,काकडी,

मका आणि पालेभाज्या असं सगळं काही असे त्यात.

संपत पुलावळे दिवसभर मंकी हिलवर थांबून माकडांना लोकांनी खायला देऊ नये याची काळजी घेत असे.पण तरी त्याची नजर चुकवून लोक फुटाणे, खारे दाणे,

बॉबी,शेव,चिवडा असं काही ना काही आत टाकतच.

माकडंही चवीने ते मटकावत. महिन्यातून दोन वेळा आम्ही मंकी हिलची संपूर्ण स्वच्छता करत असू.ही स्वच्छता म्हणजे मोठा कार्यक्रमच असायचा.आमच्याकडे वीस फुटी मोठी लोखंडी शिडी होती.ती शिडी आम्ही खंदकावरून आत जाण्यासाठी वापरत असू. माकडांना चुचकारून,खाणं दाखवून,प्रसंगी धमकावून इनडोअर सेक्शनमध्ये ट्रॅप केलं जाई. मग आम्ही सर्वजण झाडू,खराटे,बादल्या,विळे,खुरपी,बांबू,तारा,पक्कड,झाडाच्या फांद्या कापायची कात्री अशी अवजारं घेऊन अंतराळवीरांच्या थाटात स्प्रिंगसारख्या वर-खाली हलणाऱ्या शिडीवरून एक-एक पाऊल धीराने टाकत पंधरा फुटांचा पाण्याचा खंदक ओलांडून मंकी हिलवर जात असू.एकदा सकाळी आत गेलं की थेट दुपारी जेवायलाच बाहेर.जेवण उरकून पुन्हा मंकी हिल.कधी कधी संध्याकाळी मंकी हिलवर बसूनच वडापाव पार्टी व्हायची.हे काम कधी दोन,तर कधी तीन दिवसही चालायचं.आतलं गवत,वाळलेली पानं काढणं, लोकांनी टाकलेलं प्लास्टिक आणि इतर कचरा साफ करणं,

पाण्यावर तरंगणारी घाण,पानं वगैरे काढणं,वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्या छाटणं, तुटलेले दोरखंड नव्याने बांधणं असं काम चाले. हा पाक्षिक कार्यक्रम उरकल्यावर मंकी हिल पुन्हा एकदा नव्यासारखं चकाकू लागे.सोयरे वनचरे - अनिल खैर,समकालीन प्रकाशन


एकदा संध्याकाळी निगडीच्या जकात नाक्यावरून कॉल आला.जकात भरायला थांबलेल्या एका गाडीच्या नंबर प्लेटला एक माकड कुत्रं बांधण्याच्या साखळीने बांधून कोणीतरी पसार झालं होतं.संध्याकाळची वेळ होती.

आम्ही तिथे पोहोचलो,तेव्हा ते माकड खूपच चिडलेलं होतं.जवळ गेलं की दात विचकून अंगावर धावून येत होतं.त्याने आम्हाला चांगलं तासभर झुलवलं.शेवटी रिंग स्टिकमध्ये पकडून पार्कला परतलो.त्याचं नाव आम्ही ठेवलं पांडू,पांडू मंकी हिलवर आला तेव्हा आमचं माकडांच कुटुंब तिथे सेटल झालेलं होतं.त्यामुळे आता त्याला ही जुनी मंडळी कसं स्वीकारतात याची मला उत्सुकता होती.पांडूला आधी दोन दिवस इनडोअर सेक्शनमधल्या क्वारंटाइनमध्ये ठेवलं.सगळी माकडं सतत इनडोअरमध्ये ये-जा करू लागली.नव्या पाहुण्याची ओळख करून घेऊ लागली.आक्क्याही नव्या मेंबरला भेटला. त्याला पाहून पांडू थोडासा दबला;पण आक्क्याने शांतपणे आपला उजवा हात पिंजऱ्याच्या गजातून पांडूच्या डोक्यावर ठेवला.जणू तो पांडूला अभय देत होता आणि त्याला कुटुंबात स्वीकारल्याचं सांगत होता.क्वारंटाइन पीरियड संपल्यावर पिंजऱ्याचं दार उघडून आम्ही पांडूला मंकी हिलवर मुक्त केलं.पांडूने संपूर्ण परिसराचा फिरून अंदाज घेतला.दरम्यान,आक्क्याने पिंपळाच्या झाडावरच्या आपल्या नेहमीच्या जागेवर बसून फांद्या गदागदा हलवल्या आणि आपणच ग्रूप लीडर असल्याचं दाखवून दिलं.पांडूसकट सर्वांनी ते मान्य केलं.मंकी हिलवर पांडू चांगल्यापैकी रुळू लागला.आक्क्याची नजर चुकवून तो मध्येच राणी किंवा राजीशी घसट करायचा.संपतपेक्षा तो आकाराने मोठा होता.त्याची ताकदही संपतपेक्षा जास्त होती.त्यामुळे राणी आणि राजीलाही हा नवा धाडसी सवंगडी मित्र आणि प्रियकर म्हणून आवडू लागला.हा प्रकार संपतला अजिबात सहन झाला नाही;पण पांडूशी खुल्लमखुल्ला वैर घेणं त्याला परवडणारं नव्हतं. तो नाराजी दाखवायचा,पण करू काही शकायचा नाही.

हळूहळू पांडू टोळीमध्ये दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचला.हे स्थानांतर पाहणं मजेचं होतं.जंगलच्या कायद्याबद्दल खूप काही शिकवणारंही.आक्क्याच्या मान्यतेने कीपरकडून मिळालेल्या खाद्याचं इन्स्पेक्शन पांडू करायला लागला.पांडूचा 'ओके' मिळाल्यावर सर्वांत आधी आक्क्या खाऊन घेत असे.तो आधी लाल भोपळ्याच्या बिया कडाकड चावून खायचा. त्यानंतर केळी,डाळिंब,सफरचंद,मक्याचं कणीस, काकडी,टोमॅटो आणि शेवटी पालक,मेथी, कोथिंबीर अशा पालेभाज्या.

इतर डेझर्ट खाऊन पोट भरल्यावर तो पिंपळावरच्या त्याच्या जागी बसून ख्ख्याँक ख्व्याँक असं ओरडत झोके घ्यायचा.त्यानंतर त्याची पट्टराणी गौरी जेवून घेत असे.

पांडू मंकी हिलवर येण्यापूर्वी गौरीपाठोपाठ उरलेल्या सगळ्यांचं एकत्र वनभोजन होत असे;पण पांडू आल्यापासून गौरीचं जेवण झाल्यावर तो जेवायला लागला. आपलं जेवण आटपून तो आक्क्या आणि गौरी बसलेल्या पातळीच्या खाली वडाच्या झाडावर जाऊन बसायचा.संपत,राणी आणि राजी मात्र कायमच उंबराच्या झाडावर अगदी जमिनीलगत वावरत असत.पांडूने त्या तिघांच्याही वरची पोझिशन स्वतःच्या उपजत गुणांनी मिळवली. आक्क्याची त्याबाबत काही तक्रार नव्हती.

संपत मात्र या प्रकारामुळे प्रचंड अस्वस्थ झाला होता. एक तर पांडूने त्याचं दोन नंबरचं स्थान तर पटकवलं होतंच,

पण आक्क्याचा डोळा चुकवून तो राजी किंवा राणीला एखाद्या फांदीआड किंवा टेकाडामागे भेटू लागला होता.

त्यामुळे आज ना उद्या संपत त्याला आडवा जाणार असं आम्हाला वाटू लागलं होतं. - आणि तसंच झालं.एकदा दुपारी जेवण उरकून सर्व माकडं आराम करत होती.

कोणाचं लक्ष नाही असं पाहून पांडू हलकेच झाडावरून उतरून टेकाडामागे गेला. राजीही त्याच्या पाठोपाठ गेली.झोपेचं सोंग घेत संपत हा सर्व प्रकार पाहत होता.

पांडू आणि राजीची प्रणयक्रीडा सुरू असतानाच संपत हळूच त्यांच्याजवळ पोचला आणि ची.. ची.. ची. असं किंचाळत खोट्या आविर्भावात पांडूपासून लांब पळू लागला.त्यामुळे राजी सोडून सर्वांनाच वाटलं की पांडूने संपतला हाणलं.झालं! टोळीचा म्होरक्या आक्क्यानेही त्वरित दखल घेतली आणि वीस-बावीस फुटांवरून सरळ पांडूपुढेच उडी घेतली.आक्क्याचे डोळे आग ओकत होते. मानेभोवतालच्या आयाळीचे केस रागाने विस्फारले गेले होते.त्याने पांडूवर जबरदस्त चाल केली.ती पांडूला झेपणं शक्य नव्हतं.आपण लढाई हरणार हे माहीत असूनही पांडूने उत्कृष्ट डाव टाकले;परंतु आक्क्याच्या ताकदीपुढे तो कमी पडू लागला.आक्क्याने त्याचं मानगुट पकडून त्याला थेट मंकी हिलच्या खंदकातच लोळवला.हा अपमान आणि पराभव पांडूला सहन झाला नाही.

आक्क्याच्या चाव्याने तो जखमी झाला होता,थंडगार पाण्यात पडून काकडलाही होता;पण तरीही बहुधा बुद्धीने सावध असावा.मंकी हिलच्या बाहेर असणाऱ्या बोगनवेलीच्या झाडाची एक फांदी आत झुकली होती.

पांडूने सर्व शक्तीनिशी त्या फांदीवर उडी घेतली आणि क्षणार्धात तो मंकी हिलवरून पळून गेला.आम्ही अतिशय कल्पकतेने उभारलेल्या मंकी हिलवरून पळून जाणं तसं सोपं नव्हतं.पण त्या वेळी आमच्या पार्कचे माळीबुवा नेमके दीर्घ रजेवर असल्याने बाहेरच्या फांद्या छाटायचं राहून गेलं होतं.हुशारीने तेवढी संधी साधून पांडू पसार झाला.आम्हाला सगळ्यांनाच त्याचं वाईट वाटलं.खूष झाला तो फक्त संपत !


३०.०८.२३ या लेखमालेतील पुढील लेख

२६/१२/२३

प्रत्येक सुधारण्याची स्तुती करा.. Praise every improvement..

पीट बार्लो माझा जुना मित्र होता.तो सर्कसमध्ये काम करत असे.त्याने आपलं पूर्ण जीवन सर्कस अन् मनोरंजक शो करण्यात घालवलं होतं. जेव्हा पीट नवीन कुत्र्यांना प्रशिक्षण देत असे, तेव्हा मला ते दृष्य पाहायला आवडत असे.मी बघत असे की जेव्हा कुत्र्यात थोडी सुधारणा झाली,की पीट त्याची पाठ थोपटायचा,त्याची स्तुती करायचा आणि त्याला मासाचा तुकडा द्यायचा.ही काही नवी गोष्ट नव्हती.जनावरांना प्रशिक्षित करणारे लोक पूर्व कालापासून याच तंत्राचा वापर करत आले आहेत.


मला नवल वाटतं की आम्ही कुत्र्यांना बदलवणाऱ्या याच कॉमनसेंसच्या तंत्राचा वापर माणसांना बदलायला का करीत नाही.आम्ही चाबकाच्या भितीऐवजी कौतुकाचा वापर का करीत नाही? आम्ही टीकेऐवजी प्रशंसेचा उपयोग का करीत नाही ? आम्हाला थोड्याशा सुधारणे

साठीसुद्धा स्तुतीचा वापर करायला हवा. यामुळे समोरच्या व्यक्तीला सुधारण्यात प्रोत्साहन व प्रेरणा मिळते.आपलं पुस्तक 'आय हॅवन्ट मच, बेबी बट आय ॲम ऑल आय गॉट यात मनोवैज्ञानिक जेस लायर लिहितात,"स्तुती मानवाच्या मनासाठी सूर्याच्या सुखद प्रकाशासारखी असते.त्याविना त्याच्या व्यक्तित्वाचं फूल फुलत नाही.

तरीही आपल्यापैकी बहुतांश लोक इतर

लोकांबरोबरच्या आपल्या व्यवहारात निंदेच्या बोचऱ्या हवेला उत्तेजन देतात आणि आपल्या सहकाऱ्यांना प्रशंसेच्या ऊबेपासून वंचित ठेवतात."


मी जेव्हा आपल्या आयुष्यात मागे वळून पाहतो, तेव्हा मला असं आढळतं की प्रशंसेच्या काही शब्दांनी माझं भविष्य पूर्ण बदलून दिलं होतं. तुम्ही हीच गोष्ट आपल्या जीवनाबाबत नाही का म्हणू शकणार? इतिहासात अशी अनेक उदाहरणं आहेत,ज्यामुळे प्रशंसेच्या जादूच्या छडीने कुणाचं जीवनच बदलून गेलं.उदाहरणार्थ, अनेक वर्षांपूर्वी दहा वर्षाचा एक मुलगा नेपल्सच्या एका फॅक्टरीत काम करत होता.तो एक गायक होऊ इच्छित होता,पण त्याच्या संगीत शिक्षकाने त्याच्या उत्साहावर पाणी घालत म्हटले,

,"तू कधीच गायक बनू शकत नाही.तुझ्या आवाजात काही दम नाही.असं वाटतं की जणू हवेने शहरं खाली पडताहेत." पण,त्या मुलाच्या आईने,जी एक गरीब शेतकरी होती,तिने आपल्या मुलाला कवटाळले.त्याची स्तुती केली आणि त्याला म्हटलं,तिला ठाऊक आहे की तो एक गायक बनू शकतो आणि त्याच्यात सुधारणा होते आहे.एवढंच नाही तर आपल्या मुलाच्या संगीत प्रशिक्षणाचे पैसे जमवायला तिने अनवाणी राहणं पसंत केलं.गरीब मातेने कौतुक केल्याने आणि प्रोत्साहनामुळे त्या मुलाचं जीवन बदलून गेलं.त्याचं नाव एनरिको कैसरो होतं आणि तो आपल्या काळचा सर्वांत मोठा व प्रसिध्द ऑपेरा गायक झाला.


एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला लंडनचा एक युवक लेखक बनू इच्छित होता.पण त्याला असं भासत होतं की प्रत्येक गोष्ट त्याच्या विरोधात होती. तो फक्त चारच वर्षं शाळेत गेला होता.त्याचे वडील कर्ज न चुकवल्यामुळे जेलमध्ये गेले होते आणि तो अनेकदा उपाशी राहत असे.

शेवटी,त्याला उंदरांचा सुळसुळाट असलेल्या एका गोदामात बाटल्यांवर लेबल लावण्याचं काम मिळालं.

लंडनच्या झोपडपट्टी व गटाराच्या वातावरणातून आलेल्या अजून दोन मुलांबरोबर तो रात्री गोदामात झोपी जात असे. त्याला आपल्या लेखनाच्या क्षमतेवर इतका कमी विश्वास होता,की त्यानं आपली हस्तलिखिताची पहिली प्रत रात्रीच्या अंधारात टपालाच्या पेटीत गुपचुपपणे टाकली होती,जेणेकरून त्याची कुणी टर न उडवो.

एकामागोमाग एक त्याच्या कथा नाकारल्या गेल्या.शेवटी मात्र तो महान दिवस उजाडला जेव्हा त्याची एक कथा स्वीकारली गेली.हे खरं आहे की त्याला तिच्यासाठी एकही पैसा मोबदला म्हणून मिळाला नाही,पण एका संपादकाने त्याची स्तुती केली.एका संपादकाने त्याला मान दिला.तो इतका रोमांचित झाला होता की रस्त्यांवर तो आनंदाने बागडत फिरत होता आणि त्याच्या गालांवरून आनंदाश्रू ओघळत होते.आपल्या कथेला मिळालेल्या प्रशंसेमुळे,सन्मानामुळे त्याचं जीवनच बदलून गेलं.कारण त्याला जर हे प्रोत्साहन मिळालं नसतं तर तो आयुष्यभर त्या उंदरांनी भरलेल्या गोदामात बाटल्यांना लेबलं लावत बसला असता.तुम्ही कदाचित त्या युवकाचं नाव ऐकलं असेल.त्याचं नाव होतं चार्ल्स डिकन्स.


लंडनचाच आणखी एक किशोर ड्राय गुड्स स्टोअरमध्ये कारकून होता.त्याला पहाटे पाच वाजता उठावं लागत असे,दुकानात झाडू मारावा लागत असे आणि रोज चौदा तास अतिशय काबाडकष्ट करावे लागत.दोन वर्षे हे बेकार काम करून करून तो कंटाळून गेला होता.एक दिवशी तो सकाळी उठला आणि नाइलाजाने वाट न बघता,पंधरा मैल चालत जाऊन आपल्या आईला भेटायला गेला,जी हाऊसकीपरचं काम करीत होती.तो अतिशय दुःखी होता.त्याने आईला आपली दुःखद कहाणी सुनावली.तो रडत होता.त्यानं हेही सांगितलं की त्या दुकानात त्याला अजून काही काळ काम करावं लागलं तर तो आत्महत्या करेल.मग त्याने आपल्या जुन्या शाळा शिक्षिकेला एक दीर्घ आणि दुःखद पत्र लिहिलं.त्या पत्रात त्याने लिहिलं होतं की त्याचं हृदय विदीर्ण झालंय आणि आता तो जगू इच्छित नाही.त्याच्या जुन्या शिक्षिकेने त्याची स्तुती केली अन् त्याला आश्वस्त केलं की तो खरोखरंच बुध्दिमान आहे आणि चांगल्या जीवनाचा हक्कदार आहे.तिने त्याला शाळा शिक्षकाचे काम देण्याचा प्रस्तावही दिला.


या प्रशंसेनं त्या मुलाचे भविष्यच बदलून गेले आणि त्यामुळे इंग्रजी साहित्यावर अमीट प्रभाव पडला.कारण नंतर याच किशोरानं अनेक उत्तम पुस्तकं लिहिली आणि आपल्या लेखणीच्या जोरावर लाखो-करोडो डॉलर्स कमावले.तुम्ही कदाचित या लेखकाचंही नाव ऐकलं असेल. त्याचं नाव होतं एच.जी. वेल्स.


टीकेऐवजी प्रशंसा ही बी.एस.स्किनरच्या शिक्षणाची मूळ अवधारणा होती.या महान समकालीन मनोवैज्ञानिकाने जनावरे व मानवांवर केलेल्या प्रयोगांनी हे सिध्द केलं की जेव्हा टीका कमी अन् प्रशंसा अधिक असते तेव्हा लोकांना चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते आणि दुर्लक्षामुळे चांगली कामं कोमेजून जातात.


रॉकी माउंट,नॉर्थ कॅरोलिनाचे जॉन रिंगेल्सपॉनी आपल्या मुलांवर हाच प्रयोग करून पाहिला.जसं बहुतांश परिवारांमध्ये होतं,तसं या परिवारामध्येसुध्दा मुलांशी संवाद फक्त त्यांच्यावर ओरडतानाच होतो आणि अशा बहुतांश वेळी अशा प्रकारानंतर मुलं सुधारण्याऐवजी बिघडतातच.या समस्येला सोडवायचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता.मिस्टर रिंगेल्सपॉने या स्थितीला सुधारायला आमच्या अभ्यासक्रमात शिकलेल्या सिध्दान्तांना पाळण्याचा निश्चय केला.


त्यांनी सांगितलं - "आम्ही त्यांच्या चुकांवर बोट ठेवण्याऐवजी त्यांची स्तुती करण्याचा निर्णय घेतला.हे सोपं नव्हतं कारण ते अनेकदा गडबडीचं काम करीत.

आम्हाला स्तुती करण्यालायक काम शोधायला कठीण गेलं. आम्ही अशा गोष्टी शोधून काढल्या आणि एक दोन दिवसातच त्यांच्या खोड्या कमी झाल्या.जी घोट्याळ्याची कामे ते करत होते,तीसुद्धा कमी झाली.नंतर आणखी काही चुका कमी झाल्या.ते आमच्या प्रशंसेच्या लायक बनण्याचा प्रयत्न करीत होते.ते योग्य कामे करण्यासाठी खूप मेहनत करीत होते.आम्हा दोघांनाही यावर विश्वास बसत नव्हता.उघडच आहे की असं खूप काळ चाललं नाही,पण एकदा त्यांच्यात हा बदल घडून आल्यावर त्यांचा सामान्य व्यवहार जसा विकसित झाला,तो आधीपेक्षा सरस होता.आता आम्हाला त्यांच्यावर ओरडण्याची,रागावण्याची गरज नव्हती.मुलं चुकीची कामं करण्याऐवजी योग्य कामं करीत होती.कारण मुलांकडून झालेल्या चुकांवर टीका करण्यापेक्षा त्यांच्यात झालेल्या किंचित का होईना,सुधारणेची प्रशंसा केली गेली."


हेच तत्त्व नोकरीतसुध्दा उपयुक्त ठरतं.वुडलँँड हिल्स इथल्या कीथ रोपरने या सिध्दान्ताला आपल्या कंपनीत एका परिस्थितीत आजमावून पाहिलं.त्याच्या प्रिंट शॉपमध्ये एक असं काम आलं जे अतिशय चांगल्या प्रतीचं होतं.ज्या प्रिंटरने ते काम केलं होतं त्याच्याकडे एक नवीन कर्मचारी आला होता,ज्याला नोकरी सांभाळणं कठीण झालं होतं.त्याचा वरिष्ठ त्याच्या नकारात्मक वागणुकीमुळे त्रस्त होता आणि गंभीरतेनं त्याला नोकरीतून काढून टाकायचा विचार करीत होता.जेव्हा मिस्टर रोपरला या स्थितीबद्दल सांगितलं गेलं तेव्हा ते स्वतःत प्रिंट शॉपमध्ये गेले आणि त्या तरुणाशी बोलले.ते म्हणाले की त्याचं काम बघून ते एवढे खुश झाले आहेत आणि त्यांनी हेसुद्धा सांगितलं की मागच्या काही काळापासून त्यांच्या दुकानात होणाऱ्या कामांपैकी हे काम उत्कृष्ट होतं.त्यांनी हे स्पष्ट केलं की त्याचं काम का श्रेष्ठ होतं आणि कंपनीसाठी त्या तरुणाचं योगदान किती महत्त्वाचं होतं.तुम्हाला असं वाटतं का,की यामुळे कंपनीसाठी त्या तरुण प्रिंटरच्या वागणुकीत बदल घडून आला? काहीच दिवसात चमत्कार झाला.त्याने आपल्या अनेक सहकाऱ्यांना या चर्चेबद्दल सांगितलं आणि म्हटलं की कंपनीत कुणी तरी आहे जो चांगल्या कामाची कदर करतो.त्या दिवसानंतर तो एक प्रामाणिक आणि समर्पित कर्मचारी आहे. मिस्टर रोपरने त्या युवकाशी लबाडी करून असं नाही म्हटलं, "तुझं काम चांगलं आहे." त्यांनी स्पष्टपणे त्याचं काम का चांगलं आहे हे त्याला सांगितलं.क्षुद्र,लबाड बोलण्याऐवजी काही विशेष गुणांबद्दल स्तुती केली गेली होती,म्हणून ही स्तुती त्या युवकासाठी अर्थपूर्ण झाली होती. प्रत्येकास स्तुती आवडते,पण ही स्तुती जेव्हा एखाद्या खास गुणाला घेऊन केली जाते तेव्हा आम्हाला कळतं की,स्तुती प्रामाणिक आहे, समोरचा आम्हाला मूर्ख बनवत नाही आहे किंवा आम्हाला फक्त खुश करायला बोलत नाही आहे. 


लक्षात ठेवा,आम्ही सगळेच प्रशंसा आणि सन्मानाचे भुकेले आहोत आणि ते मिळवायला काहीही करू शकतो.पण आम्हाला कुणालाच खोटी स्तुती केलेली आवडत नाही.कुणालाच लबाडी आवडत नाही.या पुस्तकातले सिद्धान्त तेव्हाच परिणामकारक ठरतील जेव्हा तुम्ही खऱ्या दिलाने आपलं म्हणणं सांगाल.मी तुम्हाला लबाडी करण्याच्या युक्त्या सांगत नाहीये,जीवन नवीन तन्हेने जगायचा सिध्दान्त शिकवतोय.तुम्ही लोकांना बदलण्याबद्दल विचार करताय का? जर तुम्ही आणि मी लोकांना प्रेरित करू शकू,ज्यांच्या संपर्कात आम्ही राहतो,तर आम्हाला हे कळून येईल की त्यांच्यात किती शक्यता,किती खजिने सुप्तावस्थेत आहेत. आम्ही त्यांना बदलण्यापेक्षा अधिक काहीतरी करू शकतो.

आम्ही अक्षरशः त्यांचा कायापालट करू शकतो.

अतिशयोक्ती? तर मग विलियम जेम्सचे बुध्दिमत्तापूर्ण शब्द ऐका,जे अमेरिकेचे सर्वश्रेष्ठ मनोवैज्ञानिक व दार्शनिकांपैकी एक आहेत : (डेल कार्नेगी-मित्र जोडा- मंजुल पब्लिशिंग हाऊस-अनु- कृपा कुलकर्णी )


'आम्ही जे होऊ शकतो,त्याच्या तुलनेत आम्ही फक्त अर्धेच जागृत झालेले असतो.आम्ही आपल्या क्षमतांचा फार कमी भागच वापरू शकतो.आम्ही आपल्या शारीरिक व मानसिक योग्यतांचा खूप लहानसा हिस्सा उपयोगात आणतो.मानव आपल्या संभावना पूर्ण कामात आणत नाही.त्याच्यापाशी खूपशा अशा क्षमता आणि शक्ती असतात,ज्यांचा उपयोग करण्यात तो सर्वसाधारणतः असफल ठरतो.'होय,तुमच्यातसुध्दा अशी बलस्थानं आणि क्षमता आहेत ज्यांचा उपयोग करण्यात तुम्ही सर्वसाधारणपणे असफल असता.ज्या शक्तींचा तुम्ही पूर्णपणे उपयोग करीत नाही आहात,त्यापैकी एक आहे लोकांची स्तुती करण्याची आणि त्यांना प्रेरित करण्याची जादूई क्षमता.ज्यामुळे त्यांच्यातल्या शक्यतांचे दोहन केले जाईल.


टीकेच्या तुषारांनी योग्यता कोमेजून जाते,पण प्रोत्साहनाचं खतपाणी मिळाल्यावर ती बहरास येते.थोड्याशा सुधारण्याची सुद्धा स्तुती करा आणि प्रत्येक सुधारण्याची स्तुती करा. दिलखुलास मुक्त कंठानी स्तुती करा.


१६.१२.२३ या लेखमालेतील पुढील भाग..

२४/१२/२३

मी थोडक्यात बचावलो.. I narrowly escaped..

माझा हा ब्रिजवरचा पहारा चालू असतानाच्या काळात इबॉटसन आणि त्याची पत्नी जीन पौरीवरून रुद्रप्रयागला आले.बंगल्यात इतक्या जणांची सोय होणं शक्य नसल्याने मी माझा बाडबिस्तरा आवरला आणि यात्रामार्गाच्या पलीकडे डोंगरावर थोडं उंचावर माझा चाळीस पौडांचा तंबू ठोकला.ज्या जनावराने आसपासच्या सर्व गावात कित्येक दरवाजांवर ओरखडे काढून दरवाजे फोडण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यापासून संरक्षण देण्यासाठी तसा हा तंबू अगदीच असमर्थ होता म्हणून मी आणि माझी माणसं त्या तंबूच्या भावती काटेरी कुंपण घालण्याच्या कामाला लागलो.या जागेवर सावली धरणारं एक भलं थोरलं पियरचं झाड तिथे उभं होतं.त्याच्या फांद्या आमच्यामध्ये येत असल्याने मी माझ्या माणसांना ते तोडायला सांगितलं.झाड अर्धवट तोडल्यावर माझ्या लक्षात आलं की दिवसा ऐन उन्हाच्या काळात आम्हाला सावलीच मिळणार नव्हती.त्यामुळे मी माझ्या माणसांना सांगितलं की सगळं झाड तोडण्याऐवजी फक्त मध्ये येत असलेल्या फांद्याच तोडा.तंबूवर पंचेचाळीस अंशाचा कोन करून झुकलेलं हे झाड कुंपणाच्या पलीकडे होतं.रात्री जेवणं झाल्यावर कुंपणाच्या प्रवेशद्वारामध्ये काटेरी झुडूपं बसवताना अचानक माझ्या लक्षात आलं की जर बिबळ्या झाडावर चढून तंबूवर आलेल्या फांद्यावर आला तर त्याला तंबूत शिरणं सहज शक्य होतं.पण रात्र बरीच झाली होती आणि आत्ता लगेच तरी काहीच करता येण्यासारखं नव्हतं.आजची एक रात्र जर बिबळ्याने आम्हाला सूट दिली तर उद्या मी ते काम करू शकणार होतो.आम्ही एकूण आठ जण होतो.माझ्या माणसांसाठी माझ्याकडे तंबू नव्हते.माझा विचार होता की ते इन्स्पेक्शन बंगल्याच्या आउटहाऊसमध्ये इबॉटसनच्या माणसांबरोबर झोपतील.पण याला त्यांनी नकार दिला.त्यांचं म्हणणं असं की तंबूत जेवढा मला धोका आहे तेवढाच त्यांना असू शकतो.माझा आचारी (त्या रात्री मला कळलं की तो खूप घोरायचा) हाताच्या अंतरावर माझ्या शेजारी झोपला होता व त्याच्या पलीकडे एकमेकांना चिकटून मी नैनितालहून आणलेले सहा गढवाली नोकर झोपले होते.आमच्या संरक्षणव्यवस्थेतील कच्चा दुवा म्हणजे ते झाड होतं... मी त्याचाच विचार करत झोपेच्या अधीन झालो. त्या रात्री स्वच्छ चंद्रप्रकाश होता. जवळजवळ मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मला बिबळ्या झाडावर चढतानाचा आवाज ऐकायला आला. माझ्या बेडवरची भरलेली रायफल उचलून मी चटकन उठलो आणि काटेकुटे लागू नयेत म्हणून पायात स्लीपर्स सरकवल्या.तेवढ्यात अर्धवट तोडलेल्या झाडाच्या दिशेने फांद्या तुटल्याचा जोरदार आवाज आला आणि लगेचच माझा आचारी 'बाघ बाघ' असा ओरडला.दोन ढांगांमध्ये मी तंबूच्या बाहेर आलो पण वळून रायफल रोखेपर्यंत तो बिबळ्या बांधावरून उतारा वरच्या एका शेतात दिसेनासा झाला. हे शेत साधारण चाळीस यार्ड रुंद होतं आणि ते लागवडीखाली नव्हतं.त्या कुंपणाच्या प्रवेशद्वारामधलं झुडुप उचकटून मी त्या शेताकडे धावलो आणि तिथे उभं राहून समोरची, झाडं-झुडपाचं जंगल माजलेली आणि मोठाले खडक असलेली संपूर्ण टेकडी नजरेखालून घातली.पण दूर डोंगरावरून आलेल्या एका कोल्ह्याच्या अलार्म कॉलवरून मला कळलं की सावज आता रेंजच्या बाहेर गेलंय!


आचाऱ्याने मला नंतर सांगितलं की तो उताणा झोपला असताना त्याला फांदी तुटल्याचा आवाज आला आणि जसे त्याने डोळे उघडले तसं त्याने झडप घालण्याच्या पवित्र्यात असलेल्या बिबळ्याच्या डोळ्यातच पाहिलं! दुसऱ्याच दिवशी आम्ही ते झाड संपूर्ण तोडून टाकलं आणि कुंपण मजबूत केलं.त्यानंतर काही आठवडे आम्ही तिथे मुक्काम करूनही आमची झोपमोड कधीच झाली नाही.


जिन ट्रॅप ..


आसपासच्या गावातून बिबळ्याने दरवाजे फोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या काही बातम्या आणि पायवाटांवरचे त्याचे पगमार्कस यावरून समजत होतं की तो आसपासच कुठेतरी आहे.इबॉटसन आल्यानंतर काही दिवसातच आम्हाला रुद्रप्रयागपासून दोन मैल अंतरावरच्या एका गावातून बिबळ्याने एक गाय मारल्याची खबर मिळाली.मी त्या दिवशी गवताच्या गंजीवर बसून ज्या ठिकाणी रात्र जागून काढली त्या ठिकाणापासून अर्धा मैलावर हे गाव होतं.गावात आल्यानंतर आम्हाला दिसलं की बिबळ्याने एका छोट्या घराचा दरवाजा तोडून आत बांधलेल्या काही गायींपैकी एक गाय मारली होती आणि दरवाजातून बाहेर नेता न आल्याने तिथेच सोडून देऊन थोडंफार मांस खाऊन गेला होता.हे एका खोलीचं घर गावाच्या मध्यभागीच होतं.जरा निरीक्षण केल्यानंतर कळलं की शेजारच्याच घराच्या भिंतीला थोडं भगदाड पाडलं तर आम्हाला भक्ष्य दिसू शकणार होतं.या घराच्या मालकाचीच ती गाय असल्याने, आमची योजना त्याने आनंदाने मान्य केली. बरोबर आणलेली सॅण्डविचेस खाऊन,वर मस्तपैकी चहा ढोसून झाल्यावर आम्ही त्या घरात जागा घेतली.आम्ही ती संपूर्ण रात्र जागून काढली पण बिबळ्या काही आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला गावकऱ्यांनी गाव फिरवून आणलं आणि गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या घरांमध्ये शिरायच्या प्रयत्नात दारं खिडक्यांवर बिबळ्याने उमटवलेले ओरखडे दाखवले.त्यातल्या त्यात एका दरवाजावर सर्वात जास्त आणि खोल नख्यांच्या खुणा होत्या; हाच तो दरवाजा... जो तोडून त्या अनाथ मुलाचा बळी गेला होता.एकदोन दिवसांनी अजून एक खबर आली की बंगल्यापासून काही अंतरावर डोंगरावरच्या एका गावात बिबळ्याने अजून एक गाय मारली आहे.

यावेळीही त्याने एका घरात गाय मारली होती आणि तिला दरवाजापर्यंतच ओढून नेऊन काही भाग खाल्ला होता. दरवाजाच्या बरोबर समोर फक्त दहा यार्डावर गवताची एक सोळा फूट उंचीची गंजी नीट रचून जमीनीपासून दोन फूट उंच एका मोठ्या लाकडी फलाटावर ठेवली होती.

आम्हाला खबर सकाळी अगदी लवकर मिळाली होती त्यामुळे तयारीला संपूर्ण दिवस मिळत होता आणि आम्ही जे 'मचाण' त्या दिवशी बांधलं ते आजपर्यंत बांधल्या गेलेल्या मचाणांमध्ये सर्वात चांगलंच नव्हे तर,सर्वात कलात्मकही होतं.


सर्वात आधी आम्ही ती पूर्ण गंजी सोडवली आणि फलाटाच्या चारही बाजूंनी बांबू ठोकले. याच बांबूच्या आधाराने,खालच्या फलाटाच्या दोन फूटावर दुसरा एक फलाट तयार केला.नंतर गंजी परत रचून दोन इंच मेशवायर नेट गंजीभोवती पांघरली;फक्त खालचा प्लॅटफॉर्म व जमीन यांच्यामधली जागाच मोकळी सोडली. त्यानंतर जाळीच्या भोकांमधून गवतकाडी घालून पसरून ठेवली आणि आता ही गंजी अगदी पूर्वीसारखी दिसायला लागली.हे काम इतकं बेमालूम झालं होतं की दोन दिवस गावात नसलेला त्या गंजीचा दुसरा भागीदार जेव्हा तिथे आला तेव्हा वर बांधलेला दुसरा प्लॅटफॉर्म दाखवेपर्यंत त्याचा विश्वासच बसत नव्हता की ह्या गंजीवर काही काम झालेलं आहे.सूर्यास्ताच्या सुमारास मोकळ्या ठेवलेल्या जागेतून सरपटत आम्ही आमच्या 'मचाणा'त शिरलो आणि मागचं प्रवेशद्वार बंद करून टाकलं.इबॉटसन माझ्यापेक्षा थोडा बुटका आहे त्यामुळे त्याने वरच्या प्लॅटफॉर्मवर जागा घेतली. त्यानंतर आम्ही दोघांनी आमच्या समोरच्या गवतात बंदुकांसाठी एक बीळ पाडलं.एकदा बिबळ्या आल्यानंतर एकमेकांशी कोणताही संपर्क ठेवणं शक्य नसल्यामुळे आम्ही ठरवून टाकलं की ज्याला प्रथम बिबळ्या दिसेल त्याने शॉट घ्यावा.रात्री टिपूर चांदणं असल्याने आम्हाला दोघांनाही शूटिंग लाईटची गरज नव्हती.रात्रीची जेवणं झाल्यानंतर सर्व काही चिडीचिप झालं आणि साधारण दहा वाजण्याच्या सुमारास आमच्या मागच्या डोंगरावरून बिबळ्या येत असलेला मला ऐकायला आला.गंजीजवळ आल्यावर तो एकदोन क्षण स्तब्ध उभा राह्यला आणि नंतर मी बसलेल्या प्लॅटफॉर्मच्या खालून सरपटत यायला सुरुवात केली.माझ्याबरोबर खाली... त्याचं डोकं व माझी बैठक यामध्ये फक्त लाकडाच्या फळीच्या जाडी एवढंच अंतर उरलेलं असताना तो परत थांबला... आणि परत एकदा सरपटत पुढे जायला सुरुवात केली.आता अगदी एक दोन सेकंद... की त्याचं डोकं प्लॅटफॉर्मच्या बाहेर येणार आणि मला तीन-चार फूटावरचा शॉट मिळणार अशी मी अपेक्षा करत असतानाच माझ्या वरच्या प्लॅटफॉर्मचा मोठ्ठा आवाज झाला आणि त्याचक्षणी बिबळ्या उजव्या बाजूने बाहेर सटकला व आलेल्या मार्गाने पसार झाला.मी आत असल्याने मला तो एकदाही दिसला नव्हता.पायात पेटके आल्याने इबॉटसनने थोडी जागा बदलण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नातच तो आवाज झाला होता.या घटनेची भीती घेतल्याने बिबळ्याने ते भक्ष्य कायमचं सोडून दिलं आणि दुसऱ्या रात्री तो परत आला नाही.दोन दिवसानंतर रुद्रप्रयाग बाजाराच्या वरच्या अंगाला तीनशे चारशे यार्डावर आणखी एक गाय मारली गेली.या गायीचा मालक एका खोलीच्या घरात राहत होता.इकडच्या तिकडच्या लाकडी फळ्या वापरून केलेल्या पार्टीशनने त्याने त्या खोलीचे स्वयंपाकघर व बैठकीची खोली असे दोन भाग पाडले होते.तो माणूस त्या दिवशी स्वयंपाकघराचं दार बंद करायला विसरला होता.रात्री स्वयंपाकघरातून आलेल्या आवाजाने तो जागा झाला तर त्याला चंद्रप्रकाशात भिंतीच्या लाकडी फळ्यांच्या फटीमधून बिबळ्या दिसला.तो एकामागोमाग एक फळी उचकटायचा प्रयत्न करत होता आणि इकडे हा माणूस घामाघूम होऊन थरथरत होता. शेवटी काही जमत नाहीये असं बघून बिबळ्याने नाद सोडला व घराशेजारच्या गोठ्यात गव्हाणीमध्ये चरत असलेल्या गायींपैकी एकीला त्याने मारलं,दावे तोडले आणि चांगला ताव मारल्यावर तिला काही अंतर ओढून नेऊन तिथेच सोडून दिलं.गाय जिथे पडली होती त्याच्याजवळ डोंगराच्या अगदी कडेला एक बऱ्यापैकी मोठं झाड होतं व त्याच्या फांद्यावर एक मोठी गंजी रचून ठेवली होती.याच नैसर्गिक मचाणावर बसायचं आम्ही ठरवलं.या झाडापासून खाली सरळ दोनशे-तीनशे फूट कडाच होता.नरभक्षकाला मारण्यात मदत करण्यासाठी काही दिवसांपूर्वी शासनाने

आमच्यासाठी एक जिनट्रॅप पाठवला होता.पाच फूट लांब आणि चाळीस किलो वजनाचा हा सापळा म्हणजे एक भीतीदायक प्रकरण होतं. तीन इंची लोखंडी दात असलेल्या या सापळ्याचा जबडा दोन ताकदवान स्प्रिंगमुळे बंद होत असे व या स्प्रिंग दाबून ठेवण्यासाठी दोन दोन माणसं लागत.गायीला तिथे टाकल्यानंतर बिबळ्या पायवाटेवरून चाळीस यार्ड रूंदीच्या एका शेतामधून जाऊन एका तीन फूटी बांधांवरून उडी मारून पुढचं शेत ओलांडून गेला होता.ह्या शेताच्या पलीकडे दाट झुडपी जंगल असलेली टेकडी होती.वरच्या आणि खालच्या शेतांमधल्या या तीन फूटी बांधाच्या पायाशीच आम्ही हा सापळा लावला व त्याने बरोबर त्या सापळ्यावरच पाय ठेवावा म्हणून पायवाटेच्या दोन्ही बाजूला आम्ही काटेरी झुडुपांच्या फांद्या पसरून ठेवल्या.

सापळ्याच्या एका बाजूला अर्धा इंच जाडीची एक साखळी होती व त्याच्या टोकाला ३ इंच व्यासाची एक लोखंडाची कडी होती.आम्ही एक भक्कम लाकडी खुंट या कड्यातून घालून जमीनीत घट्ट ठोकून टाकला आणि सापळा जमीनीला पक्का जखडून ठेवला.


अशी सर्व साग्रसंगीत व्यवस्था झाल्यावर जीन इबॉटसन माझ्या माणसांबरोबर बंगल्यावर परतली नंतर मी आणि इबॉटसन झाडावर चढून गंजीवर बसलो.एक काठी आमच्यासमोर टांगून त्याच्यावरून काही गवत सोडून आम्ही चांगलं लपण तयार केलं.आता आम्ही आरामात वाट पहात बसलो.मनात खात्री होती की यावेळेला तरी बिबळ्या आमच्या जाळ्यात अडकणारच !

संध्याकाळी आभाळ गच्च भरून आलं.रात्री नऊपर्यंत तरी चंद्र उगवण्याची शक्यता नसल्याने आम्हाला इलेक्ट्रीक लाईटवरच अवलंबून राहावं लागणार होतं.हा शूटींग लाईट म्हणजे एक फारच अवघड प्रकरण होतं.पण यावेळी मीच शॉट घ्यावा असं इबॉटसनचं म्हणणं पडल्याने मी तो माझ्या रायफलला जोडला.अंधार पडला आणि साधारण अर्ध्या तासाने अचानक गायीच्या दिशेकडून आम्हाला एकापाठोपाठ एक अशा डरकाळ्या ऐकायला आल्या... शेवटी बिबळ्या सापळ्यात फसला होता. लाईट लावल्यावर मला दिसलं की पायाला लटकणारा ट्रॅप घेऊन तो बिबळ्या मागेमागे जातोय.मी घाईघाईतच माझ्या ०.४५० रायफलचा शॉट घेतला.ही बुलेट साखळीला लागली त्यामुळे त्या साखळीपासून ट्रॅप अलग झाला.आता जमीनीपासून ट्रॅप मोकळा झाल्याने बिबळ्याने पायाला लटकणाऱ्या ट्रॅपसकट मोठमोठ्या झेपा घेत शेत ओलांडलं... मागोमाग माझ्या डाव्या बॅरलमधली बुलेट व इबॉटसनच्या शॉटगनची दोन काडतुसं फायर केली गेली.पण हे सर्व नेम चुकले.माझ्या रायफलमध्ये बुलेट भरताना माझ्याकडून काहीतरी झालं असावं पण तो लाईट काही केल्या लागेना.बिबळ्याच्या डरकाळ्या आणि पाठोपाठ बंदुकांचे चार आवाज ऐकून रुद्रप्रयाग बाजारमधले तसेच आसपासच्या छोट्या गावांमधले लोक घरातून पाईनच्या मशाली घेऊन बाहेर पडले आणि चहू‌बाजूंनी त्या ठिकाणी येऊ लागले.जास्त जवळ येऊ नका असं ओरडून सांगण्याचा काहीही फायदा नव्हता कारण त्या सर्वांचा मिळून इतका गोंगाट होत होता की त्यांना आमच्या सूचनाही ऐकायला येणं अशक्य होतं.मी हातात रायफल असताना घाईघाईत झाडावरून उतरलो तर इबॉटसननेही पटकन् पेट्रोल लॅम्प पेटवला आणि पंप केला.हा लॅम्प आम्ही झाडावर आमच्याबरोबरच नेला होता. लांब दोराच्या सहाय्याने इबॉटसनने तो जमीनीवर सोडला व स्वतः उतरून मला येऊन मिळाला.त्यानंतर आम्ही दोघंही बिबळ्याच्या दिशेने जायला लागलो.शेताच्या मध्यभागी एक खडक वर आल्यामुळे उंचवटा तयार झाला होता.इबॉटसन हातातला कंदील उंच धरून आणि मी रायफल खांद्याला लावून त्या शेतातून चालत हळूहळू आम्ही त्या उंचवट्याच्या जवळ येऊ लागलो.उंचवट्याच्या पलीकडे एक खोलगट जागा होती आणि त्या खड्ड्यात आमच्याकडेच तोंड करून तो बिबळ्या गुरगुरत झेप घेण्याच्या तयारीत मुरून बसला होता.माझी बुलेट त्याच्या डोक्यात घुसते न घुसते तोच आम्हाला सर्व बाजूंनी माणसांचा वेढा पडला आणि ते लोक बिबळ्याच्या धडाभोवती अक्षरशः आनंदाने नाचायला लागले.


माझ्या समोरचं जनावर आकाराने खूपच मोठं होतं,आदल्या दिवशी त्याने पार्टिशन तोडून आतल्या माणसाचा बळी घ्यायचा प्रयत्न केला होता आणि डझनभर माणसं ज्या भागात मारली गेली होती तिथेच तोही मारला गेला होता;तो नरभक्षकच असणार अशी खात्री पटण्यासारखी सर्व कारणं होती तरीही मला आतून वाटत होतं की मी त्या बाईच्या प्रेताजवळ ज्या बिबळ्यासाठी रात्रभर जागलो होतो तो हा नव्हे! हे खरं होतं की एका अंधाऱ्या रात्री मी त्याची फक्त पुसटशी बाह्याकृती पाहिली होती पण तरीही मला आतून वाटतं होतं की बांबूला बांधलं जाणारं ते जनावर म्हणजे 'रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या' नव्हे.इबॉटसन पतीपत्नी,त्यांच्यामागे बिबळ्याचा मृतदेह बांबूला बांधून घेऊन जाणारी माणसं अशी आमची वरात रुद्रप्रयाग बाजारावरून बंगल्याकडे निघाली.त्या सर्वांमध्ये मी एकच माणूस असा होतो की ज्याचा 'रुद्रप्रयागचा नरभक्षक' संपलाय यावर विश्वास नव्हता. डोंगर उतरताना माझ्या मनात पूर्वी घडलेल्या एका घटनेबद्दल विचार येत होते. ही घटना मी लहान असताना आमच्या हिवाळी निवासस्थानापासून जवळच घडली होती व नंतर काही वर्षांनी 'Brave Deeds' (किंवा बहुतेक 'Bravest Deeds' असावं) या पुस्तकात तिचा उल्लेखही केला गेला होता.या घटनेचे दोन नायक होते.इंडियन सिव्हील सव्हींसचा स्मिटन व फॉरेस्ट डिपार्टमेंटचा ब्रेडवूड.

रेल्वेपूर्वीचा हा काळ होता.हे दोघं एका अंधाऱ्या वादळी रात्री मुरादाबादहून कालाढुंगीला डाकगाडीने चालले होते.रस्त्याच्या एका वळणावर त्यांच्या गाडीवर एका पिसाळलेल्या हत्तीने हल्ला केला.गाडीवान आणि दोन घोड्यांना ठार मारून त्याने गाडी उलथीपालथी करून टाकली.ब्रेडवूडकडे रायफल होती,ती केसमधून बाहेर काढून,जोडून लोड करत असताना स्मिटन गाडीवर चढला व त्याने सॉकेटमधून खेचून एक उरलासुरला दिवा मिळवला.अतिशय मंद प्रकाश देणारा हा दिवा हातात उंच धरून स्मिटन त्या हत्तीकडे चालत गेला आणि ब्रेडवूडला शॉट घ्यायला सोपं जावं म्हणून हत्तीच्या डोक्यावर प्रकाश पडेल असा धरला.मला हे मान्य आहे की पिसाळलेला हत्ती आणि बिबळ्या यात फरक आहे.पण... स्वतःच्या सुरक्षेसाठी संपूर्णपणे जोडीदारावर अवलंबून असताना जखमी व पिसाळलेल्या हत्तीला,मृत्यूची पर्वा न करता डोक्यावर कंदील धरून सामोरं जाणं,यासाठी निधडी छातीच हवी! गेल्या कित्येक वर्षात प्रथमच आज रुद्रप्रयाग बाजारातला प्रत्येक दरवाजा रात्र असूनही उघडा होता व बायकामुलं उंबरठ्यावर उभी होती.भोवती उभं राहून पोरांना नीट पाह्यला मिळावं म्हणून दर पावलागणिक बिबळ्याचं धूड जमीनीवर ठेवावं लागत असल्यानं आमची वाटचाल मंदगतीने चालू होती.

बाजाराचा रस्ता संपल्यावर सर्व माणसं गटागटानं घरी परतली आणि आमच्या माणसांनी विजयी वीराच्या थाटात बिबळ्याचं ते धूड बंगल्यावर आणलं.माझ्या कॅम्पवर येऊन हातपाय धुवून मी बंगल्यावर गेलो आणि मी व इबॉटसन तो बिबळ्या नरभक्षक असावा की नसावा यावर आपापली मतं मांडायला लागलो. शेवटी यातून काहीच निष्पन्न न निघाल्यामुळे आम्ही या निर्णयावर आलो की इबॉटसनला कामासाठी पौरीला जायचं असल्याने व मलाही इतक्या दिवसांच्या रुद्रप्रयागमधील वास्तव्यामुळे थकवा आल्याने दुसरा दिवस बिबळ्याची कातडी काढण्यात व वाळवण्यात घालवावा आणि तिसऱ्या दिवशी आपापल्या घरी निघावं. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून रात्रीपर्यंत त्या शेकडो माणसांनी आम्हाला बंगल्यावर येऊन भेट दिली व त्यातल्या बहुतेक लोकांनी तो नरभक्षकच आहे असं ठामपणे सांगितल्यामुळे इबॉटसन्सचंच म्हणणं खरं असल्याची त्यांना खात्री वाटू लागली.फक्त माझ्या विनंतीवरून दोन गोष्टी त्याने केल्या.'यापुढेही खबरदारीच्या उपाययोजना शिथिल करू नका' अशी सूचना त्याने सर्वांना दिली आणि शासनाला नरभक्षकाच्या शिकारीबद्दल लगेच टेलिग्राम करण्याचं टाळलं!


दुसऱ्या दिवशी पहाटेच प्रवासाला सुरुवात करायची असल्याने आम्ही सर्व लवकर झोपलो. सकाळी लवकर उठून 'छोटा हाजरी' (ब्रेकफास्ट) घेत असताना मला खाली रस्त्यावरून काही माणसांचे आवाज आले.


हे थोडंसं अनैसर्गिक वाटल्याने मी "आता यावेळी इथे काय करताय?" असं ओरडून विचारलं.मला पाहिल्यावर त्यातली चार माणसं डोंगर चढून थोडं वर आली आणि मला सांगितलं की त्यांच्या गावच्या पटवारीने त्यांना माझ्याचकडे एक महत्त्वाची खबर द्यायला पाठवलंय... चटवापिपल पुलापासून मैलभर अंतरावर अलकनंदाच्या पलीकडच्या बाजूला आणखी एका बाईचा बळी गेला होता! ०२.१२.२३ या लेखमालेतील पुढील लेख..