* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२७/१/२५

‘भूतान’अफलातून देश Bhutan' is a vast country

विश्वास आणि सहकार हे सामाजिक क्षमतांच्या भांडवलाचे प्रमुख घटक आहेत.विषमतेने ग्रासलेल्या समाजांत हे खालावत चालले आहेत.अमेरिकेच्या प्रभावाखाली आलेल्या देशांत हा ऱ्हास वेगाने झालेला दिसतो.विश्व बँकेचे प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून काम करताना स्टिग्लिट्झ जगभर फिरले.सोव्हिएट संघराज्याची शकले पडल्यावर त्या साऱ्या प्रदेशात सार्वजनिक मालमत्ता गिळंकृत करणाऱ्या धनिकांचा वर्ग वरचढ झाला व समाजातील परस्पर विश्वास आणि सहकार नष्टप्राय झाला.अशा उझबेकिस्तानात ग्रीन हाऊसेसमधील उत्पादन एके काळी महत्त्वाचे होते.पण आज झाडून साऱ्या ग्रीन हाऊसेसच्या काचा चोरल्या गेल्या आहेत,आणि हा उद्योग पूर्णपणे कोलमडला आहे. स्टिग्लिट्झ सांगतात,ह्याचे दुसरे टोक आहे वेगळ्या दिशेने प्रवास करण्याचा प्रयत्न करणारे भूतान.तेथे विश्वास आणि सहकार मोठ्या प्रमाणात शाबूत आहेत आणि म्हणूनच निसर्गही सुस्थितीत आहे.


तिबेटाला चिकटून,सिक्कीम-अरुणाचलच्या बेचक्यात पहुडलेला भूतान एक अफलातून देश आहे.भूतान जाहीर करतो की त्यांचे ध्येय आहे राष्ट्राला आनंदाचे उधाण आणण्याचे ! इतर देश खुशाल ग्रॉस नॅशनल प्रॉडक्टच्या मागे लागोत,आम्हाला हवाय ग्रॉस नॅशनल हॅपिनेस् ! इथल्या राजाने वीस वर्षांपूर्वी घोषणा केली - आपण आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना जगाला,मानवांना आणि जोडीने निसर्गाला उपकारक, आनंद फैलावणारी अशी एक आदर्श समाजरचना, शासनप्रणाली,अर्थव्यवस्था उभारून दाखवू या.ह्या आनंदयात्रेचे चार आधारस्तंभ असतील : पहिला - मनापासून आपल्या सुंदर पर्यावरणाचे संरक्षण,दुसरा स्वच्छ,

कार्यक्षम प्रशासन,तिसरा - एकमेकांना प्रफुल्लित करत स्वतः

आनंदाचा आस्वाद घ्यावा ही बुद्धाची शिकवण,आणि चौथा सामाजिक ऋणानुबंध सांभाळणारी आपली संस्कृती.हळूहळू सध्याची कालबाह्य राजेशाही खालसा करू या,आणि सर्वांना एक न्याय देणारी लोकशाही प्रस्थापित करू या.मग दोन वर्षांपूर्वी कोणीही ढकलत नसताना राजाने आपल्या हातातली सारी सत्ता खुल्या निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या हातात सोपवली.स्वतःचा राजमुकुट उतरवून युवराजाच्या डोक्यावर ठेवला. भूतानच्या नव्या संविधानाप्रमाणे लोकप्रतिनिधी राज्य चालवतातच,शिवाय जरूर पडल्यास सार्वमताने निर्णय घेण्याची तरतूद आहे.पर्यावरणाचे संरक्षण हा या सरकारच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.आता जग तापू लागल्यावर भूतानच्या हिमनद्या विरघळू लागल्या आहेत,त्याची मोठी काळजी आहे.या संदर्भात त्यांनी एक आंतरराष्ट्रीय चर्चा आयोजित केली होती.


भूतानचा पर्यावरण व वन मंत्री अध्यक्ष होता.लोकसभा सदस्य मनापासून भाग घेत होते.या निमित्ताने मला त्यांच्याबरोबर खुल्या दिलाने बोलायला मिळाले,खूप शिकायला मिळाले.भूतानातही खनिज संपत्ती आहे.भूतानातही लोभी मंडळी आहेतच. अशातले काही होते राणीच्या नात्यातले.त्यांनी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करून नासाडी सुरू केली होती.राजाला हे समजताच त्याने कडक कारवाई केली. आता भूतानात जे काय खाणकाम होते,ते अतिशय काळजीपूर्वक केले जाते.


वनसंपत्तीने समृद्ध भूतानचा पंचमांश भूभाग देवरायांनी झाकलेला आहे.ह्यात बौद्ध विहारांजवळची विशाल तपोवने आहेत,शिवाय आहेत गावा-गावांतल्या मातृदेवतांची पवित्र वने.सर्व भारतखंडभर हा निसर्गरक्षणाचा परंपरांचा ठेवा आहे.पण फक्त भूतानात त्यांचा मनापासून आदर केला जातो.मला भूतानातले सेरो,गोरल,भरल यासारखे रानबोकड पाहण्याची फार उत्कंठा होती.आमचे यजमान म्हणाले,अवश्य,उद्या जाऊ या टॅगो बौद्ध विहाराला.तिथल्या तपोवनात सहज पाहायला मिळतील गोरल,भेकर,काळी अस्वलं,

ब्लड फेजन्टसारखे रानकोंबडे.उत्साहात सकाळी निघालो. दोन्ही बाजूला डोंगर,झाडी,जिकडून तिकडून 'शैलस्तनातुनि लोटता गंगारुपी दुग्धामृत' अशा नितळ,खळखळणाऱ्या,फेसाळलेल्या पाण्याने भरलेले ओढे आणि दरीत झुळझुळणारी नदी.अखेर टॅन्गो डोंगराच्या पायथ्याला पोचलो.उभाच्या उभा, सिंहगडाच्या उंचीचा कडा,आणि वर कड्याला भिडलेला बौद्ध मठाचा भला मोठा दगडी वाडा.सबंध डोंगरभर ओक,पाइनचे मिश्र अरण्य,त्यात मधूनमधून डोकावणारे होडेडेन्ड्रॉन,पक्ष्यांची अखंड किलबिल.

नागमोडी पायवाट वर-वर चढत गेली आणि अचानक रानातून बाहेर येऊन एका कड्याशी थबकली.खालच्या धारेवर खडे होते मी ज्यांची आतुरतेने वाट पाहात होतो ते दोन ठेंगणेठुसके रानबोकड - गोरल ! अगदी बिनधास्त !


घसरगुंडीवरची शर्यत…!


गेल्या दोन दशकांत संगणकाच्या माऊसच्या एक टिचकीत अब्जावधी डॉलर जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हलवता येऊ लागले आहेत.ह्याचा फायदा घेऊन भांडवलाचा मुक्त संचार सुरू झाला आहे. हे आहे जागतिकीकरण.पैशाची खुली हालचाल. मालाची नाही,माणसांची नाही.ह्या भांडवलाला एकच ध्यास आहे - सारखे फुगत राहणे.त्यासाठी बेदरकारपणे लाटा-लाट,लुटा-लूट,फसवेगिरी,फुकटबाजी करत राहायची.जो देश अशा लाटा-लाटीला,लुटा-लुटीला, फसवेगिरीला,फुकटबाजीला जास्तीत जास्त वाव देईल तिथे धावायचे.एकदा कचाट्यात सापडले की त्या देशांतून एका क्षणात आमची सारी गुंतवणूक काढून घेऊ.मग बघा तुमची अर्थव्यवस्था कशी कोलमडेल अशा भीतीची तलवार त्या देशावर टांगून ठेवायची. 


त्यांना बजावायचे:पर्यावरणाचा विध्वंस होऊ द्या, श्रमिकांचे हक्क नष्ट करा.जोडीला अमेरिकेतही असे कायदे करून घेतले आहेत की परदेशात कमावलेल्या पैशावर अमेरिकेत ते पैसे परत आणले तरच कर भरावा लागतो.ह्यामुळे ह्या साऱ्या व्यवहारातून अमेरिकेतील बेरोजगारीही वाढते आहे.तिथलीही अर्थव्यवस्था बळकट होत नाही आहे.वर भारतासारख्या ज्या देशांत ही गुंतवणूक केली जाते त्यांच्यावर अतिशय वाईट दबाव असल्याने त्या देशा-देशांत कोण जास्त वेगाने घसरतो ह्याचीच चढाओढ लागली आहे.त्या देशांतील राज्यकर्ते भले सांगोत,परकीय गुंतवणुकीच्या आधारे आपण वर वर चढतोय.वास्तवात हे देश उडत नाही आहेत,चिखलात बुडताहेत.


टॉक्सिक मेमो…


भोपाळ,३ डिसेंबर १९८४ ची काळरात्र : युनियन कार्बाईडच्या कारखान्यातल्या टाकीचा सेफ्टी व्हाल्व जोरात उडून मेथिल आयसोसायनेटचे गरळ हवेत फैलावले... पुढच्या काही तासांमधे हजारो लोक मृत्युमुखी पडले,अन् लाखो लोकांना गंभीर इजा झाल्या.इतका हाहाकार झाला,तरी त्या रात्री व्यवस्थापकाने काहीच झाले नाही,असे सांगितले.आज ह्या जमखेवरची खपली पुन्हा निघाली आहे,आणि हरत-हेची चर्चा सुरू आहे.त्यातलाच एक विषय आहे, तिथली प्रदूषित भूमी.ही काही त्या रात्रीच्या अपघाताची निष्पत्ती नाही.जेव्हा १९६९ साली युनियन कार्बाइडचा कारखाना प्रथम सुरू झाला,तेव्हा त्यांना प्रदूषण काबूत आणण्याच्या प्रयत्नात आपला बक्कळ फायदा घटवण्याचे काहीच कारण दिसले नाही.त्यांचे ओतीत विखारी वातावरणी आग अगदी सुरुवातीपासून चालू होते,जहरी सांडपाणी अतिशय निष्काळजी

पणे साठवण्यात येत होते.आज ज्या टॉक्सिक वेस्टचे काय करायचे ही चर्चा सुरू आहे,ती आहे अपघातापूर्वीच्या पंधरा वर्षांतली खाशी कमाई.ह्यातून लोकांना हळूहळू विष भिनवत मारणे चालूच होते.त्याबद्दल काहीच जाणीव नव्हती,एवढेच.


लॅरी समर्स,क्लिन्टनच्या कारकिर्दीत अमेरिकेचे अर्थमंत्री होते.भोपाळ गॅस कांडानंतर भारतीयांनी लोकांच्या जिवाची किंमत कशी कवडीमोलाची ठरवली आहे,युनियन कार्बाइडला कसे वाऱ्यावर सोडून दिले आहे,हे पाहून विश्व बँकेचे प्रमुख अर्थशास्त्री म्हणून काम करत असताना ह्या धूर्त गृहस्थांनी १९९१ साली आपल्या सहकाऱ्यांसाठी एक कुविख्यात टॉक्सिक मेमो लिहिला : प्रदूषणाची किंमत मोजायची कशी ? आजाराने किंवा अकाली मृत्यूने समाजातील व्यक्तींचे सरासरी किती आर्थिक नुकसान होते यावरून.ह्या हिशोबाने,जिथे गरिबी जास्ती,

तिथे प्रदूषणापासून होणारी हानी सर्वात कमी.म्हणून समर्सनी सुचवले,की अशा देशांकडे खतरनाक प्रदूषणाचा ओघ वळवणे मोठे फायद्याचे अन् शहाणपणाचे आहे.


('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )


असे ते बेदरकारपणे का लिहू शकले ? याला आपणच जबाबदार नाही का? भोपाळची चर्चा उफाळल्यावर मला १९७३ सालचा एक अनुभव आठवला.सायन्स इन्स्टिट्यूटच्या परिसरातील कीटकनाशकांच्या प्रादुर्भावाचे अभ्यासक वसंतराजन् ह्यांच्या प्रयोगशाळेत आमच्या गप्पा चालल्या होत्या.अचानक एक सद्गृहस्थ पाण्याची बाटली हातात घेऊन धावत आले.म्हणाले, बेंगलुरूच्या पाणी पुरवठ्याच्या तलावाच्या पिछाडीच्या

ओढ्यात कीटकनाशकाची पोती नेणारा ट्रॅक्टर उलटून विष पसरले आहे.बातमी पसरते आहे;आम्हाला फोन येताहेत.ताबडतोब शहराचे पिण्याचे पाणी पूर्ण सुरक्षित आहे असे जाहीर करायलाच पाहिजे.हा पाण्याचा नमुना घे,आणि लागलीच प्रमाणपत्र दे पाण्याच्या शुद्धतेचे. वसंतराजन् म्हणाले,अहो थांबा.ह्या बाटलीतले पाणी कुठून आले,मला ठाऊक नाही.आपण अपघातस्थळी जाऊ या.तिथले,आसपासचे पाणी गोळा करू या.मग परीक्षा करू.

निकाल हाती यायला अर्धा दिवस लागेल. ते महोदय जे उसळले,

बोलायची सोय नाही.म्हणाले, आगाऊपणा बस करा.तुमचे सहकार्य नसेल,तर दुसरीकडून प्रमाणपत्र कसे मिळवायचे,हे मला नीट माहिती आहे.तुमच्या संस्थेचे नाव आहे,म्हणून इकडे आलो;पुन्हा पाय ठेवणार नाही.अशा थाटात, खऱ्या-खोट्याची चाड न बाळगता,आपल्या देशात परिसराची निगराणी चालू आहे.हे आपण मुकाट्याने, मुकी बिचारी कुणी हाका,अशी मेंढरे बनून का सहन करतो? अधूनमधून ह्याला आळा घालायचे चांगले प्रयत्न झालेही आहेत.नव्वदच्या दशकातल्या अशाच एका उपक्रमाचे नाव होते,पर्यावरण वाहिनी.भारतभर जिल्ह्या - जिल्ह्यांत अनेक जागरूक,जाणकार नागरिकांना ह्या उपक्रमाअंतर्गत सरकारी इन्स्पेक्टरांसारखे कारखान्यात जाऊन प्रदूषण नियंत्रण, वनप्रदेशात जाऊन बेकायदेशीर तोड तपासण्याचे, निरीक्षणांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांपुढे अहवाल सादर करण्याचे अधिकार दिले होते.मग जिल्हाधिकारी ह्याची पूर्ण पारदर्शकरीत्या चौकशी करवायचे.मी प्रत्यक्ष पाहिले की कर्नाटकातल्या अनेक जिल्ह्यांत ह्या देखभालीचा चांगला प्रभाव पडत होता.दुर्दैवाने,युनियन कार्बाईडचे भाईबंद असलेल्या भारतातील अगणित प्रदूषकांच्या दबावातून हा उपक्रम रद्द केला गेला.मला मनापासून वाटते की अन्डर्सन महोदयांना अवश्य पकडू या.पण आज खरी जरूर आहे,पर्यावरण वाहिनींसारखी पारदर्शक,सर्वसमावेशक देखरेखीची व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्याची.आज देशाच्या पर्यावरणाची जी हकनाक नासाडी सुरू आहे,ती आपण सर्वांनी मिळून काबूत आणण्याची !

२५/१/२५

खरचं धाडस करा.Be really brave.


सुसंस्कृत आणि सुसंवादी शब्दांमध्ये दिलेल्या 'नकारा' ची ताकद


" तुमच्या मनावर दडपण येतं,त्या वेळी तुमचं धाडस तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळ्याच प्रकारची झळाळी देतं." - अर्नेस्ट हेमिंग्वे


अशा प्रकारच्या अनेक उदाहरणांमधलं एक उदाहरण आहे रोझा पार्क यांच्या संदर्भातलं.माँटगोमेरी इथे जाणाऱ्या बसमधल्या वेगळ्या सीटस् पैकी एका सीटवर त्या बसल्या असताना त्यांना तिथून उठायला सांगण्यात आलं आणि अतिशय निश्चयी स्वरात त्यांनी उठण्यास नकार दिला,मात्र तो क्षण ऐतिहासिक ठरला.

त्यांच्या नकारानंतर तिथले अनेक लोक एकत्र आले आणि त्यांच्यातल्या एकत्रित बळाने नागरी हक्क चळवळीला चालना मिळाली.या प्रसंगाविषयी बोलताना पार्कस् म्हणाल्या," बस ड्रायव्हरने मला तिथे बसूनच राहिलेलं पाहिलं,आणि विचारलं,'तुम्ही उठून उभ्या राहणार आहात की नाही?'आणि मी शांत स्वरात त्याला म्हटलं, 'नाही,मी इथून उठणार नाहीये."


सर्वसाधारणपणे लोकांचा समज असतो त्याच्या उलट गोष्ट त्या वेळी घडली होती.त्यांच्याकडून बस ड्रायव्हरला जो नकार दिला गेला होता,त्यामागे त्यांचा खंबीर स्वभाव किंवा कणखर व्यक्तिमत्त्व नव्हतं.तशा त्या नव्हत्याच. 'माँटेगोमेरी चॅप्टर ऑफ द एन.ए.ए.सी.पी'च्या सचिवपदासाठी लोकांनी त्यांची निवड केली, त्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या,"मी तिथे एकमेव स्त्री होते आणि त्यांना सचिवपदावर कुणीतरी हवंच होतं.मी इतक्या भित्र्या स्वभावाची होते की,मला त्यांना नकार देणं जमलंच नाही."


खरं म्हणजे त्यांचा बसमधला त्या दिवशीचा निर्णय ठरला तो या निश्चयातून की त्या क्षणाला त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या उत्तराची निवड करायला हवी आहे.त्या म्हणाल्या, "बस ड्रायव्हरने मला माझ्या सीटवाड उठण्याचा हुकूम सोडला,त्या वेळी हिवाळ्यातल्या थंडगार रात्री अंगावर ऊबदार पांघरूण घ्यावं,तसं एक प्रकारचं निश्चयाचं पांघरूण माझ्या अंगावर कुणीतरी पसरून घातलंय,

अशीच भावना जागली होती माझ्या मनात." त्या वेळी त्यांना कल्पनासुद्धा नव्हती की त्यांच्या त्या एका निर्णयातून एक स्फुल्लिंग बाहेर पडणार आहे,आणि त्या वेळच्या तिथे सुरू झालेल्या चळवळीचे पडसाद जगभरात सर्वत्र उमटणार आहेत.पण त्या वेळी त्यांना एक गोष्ट मात्र पूर्णपणे माहीत होती.त्यांचं अंतर्मन त्यांना सांगत होतं की,त्या वेळी जरी त्यांना अटक केली जात होती,तरी इथून पुढे कधीही त्यांना अशा प्रकारच्या मानहानीला सामोरं जावं लागणार नाहीये.आणि अशी मानहानी टाळण्याच्या बदल्यात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला असता,तरी त्यासाठी त्यांच्या मनाची पूर्ण तयारी झालेली होती.

आणि हे तर खरंच होतं की,त्या वेळी तुरुंगात जाण्याचा धोका पत्करणं त्यांच्यासाठी गरजेचं होतं.एक गोष्ट जरी खरी असली की,रोझा पार्क सापडल्या होत्या तशा प्रकारच्या परिस्थितीत आपण सापडण्याची शक्यता (नशिबाने) अगदीच कमी आहे. पण तरीही आपण त्यांच्यापासून स्फूर्ती तर नक्कीच घेऊ शकतो.ज्या वेळी एखाद्या गोष्टीला ठाम नकार देण्याचं धाडस दाखवण्याची वेळ आपल्यावर येईल,त्या वेळी आपण त्याचं स्मरण करायला हवं.त्यांचं निश्चयाचं बळ आठवून बघायला हवं.


एखाद्या बिनमहत्त्वाच्या गोष्टीचा स्वीकार करायची वेळ सामाजिक दबावामुळे आपल्यावर येत असेल,तर अशा वेळी आपण स्वतःच्या भूमिकेवर भक्कम पाय रोवून उभं राहताना त्यांचं उदाहरण स्वतःच्या नजरेसमोर नक्कीच ठेवू शकतो.


धाडस करा..! इसेंशियलिझम,ग्रेग मॅकेऑन,

अनुवाद - संध्या रानडे,मायमिरर पब्लिंशिंग हाऊस..


तुम्हाला जे करावंसं वाटतंय ते तुमच्या दृष्टीने योग्य आहे,पण तरीही दुसरं कुणीतरी तुम्ही काय करायला हवंय,याबाबतीत तुमच्यावर दबाव आणतंय ! अशा वेळी तुमच्या मनावर आलेला ताण तुम्ही कधी अनुभवलाय ? एखाद्या गोष्टीबाबत तुमच्या अंतर्मनाने केलेला निश्चय आणि त्याच्याविरुद्ध तुम्हाला करावी लागणार असलेली कृती,यांच्यातला संघर्ष तुम्हाला कधी जाणवलाय ? 


एखाद्या गोष्टीला तुमचा ठाम नकार असतानाही केवळ संघर्ष नको,कुणाशी वाकडेपणा घ्यायला नको म्हणून तुम्ही कधी होकार देऊन मोकळे झाला आहात? कुणाला दुखवायला नको,कुणी नाराज व्हायला नको म्हणून तुमचे वरिष्ठ,सहकारी, मित्र,शेजारी,

किंवा कुटुंबीय यांनी दिलेलं निमंत्रण टाळताना तुम्ही मनातून खूप घाबरलेले असता? एक प्रकारची भीती तुमच्या मनात दडून बसलेली असते? असं काही घडलं असेल,तर अशा प्रकारे घाबरणारे तुम्ही काही एकटेच नाही आहात. मात्र अशा प्रकारच्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढताना गरजेचं असतं,ते धाडस.आवश्यक असतं ते चांगुलपणाने नकार देण्याचं कौशल्य.


एक आवश्यकतावादी व्यक्ती म्हणून स्वतःला उत्तम प्रकारे घडवण्यात या गोष्टी जेवढ्या गरजेच्या आहेत, तेवढ्याच त्या कठीणही आहेत.


इथे मी खरं तर तुम्हाला 'धाडस' या विषयावर धडे द्यायला बसलो नाहीये.पण 'आवश्यकतावाद' या विषयाच्या मी जितका अधिक खोलात शिरतो आहे, तितक्याच स्पष्टपणे अनावश्यक गोष्टींना दूर सारण्याच्या प्रक्रियेत धाडसाची भूमिका किती महत्त्वाची आहे,ते मला दिसून येतंय.अंगी धाडस नसेल,तर कमीत कमी पर्यायांचा शिस्तबद्ध पाठलाग करणं ही गोष्ट फक्त तोंडच्या गप्पा म्हणूनच उरेल.ते मग केवळ एखाद्या पार्टीत एकमेकांशी झालेलं संभाषण इतपतच ठरतं.ते वरवरचं,उथळ असतं.ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करणं किती गरजेचं असतं, असं काहीतरी बोलणारे लोक खूप असतात.पण तसं जगणं फार थोड्यांना जमतं.मी हे बोलतोय,ते कुणालाही झुकतं माप न देता आणि कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता बोलतोय ! नकार देण्याची आपल्या मनात असणारी भीती अकारण नक्कीच नसते.आपण एखादी सुवर्णसंधी गमावून तर बसणार नाही,ही काळजी सदैव आपल्या मनात ठाण मांडून बसलेली असते.आपण आपला सुखाचा जीव दुःखात तर घालणार नाही ना? आपण बसू पाहणारी घडी विस्कटून तर टाकणार नाही? मागे परतण्याचे सगळे दोर आपण कापून टाकतोय का ? आपण ज्यांच्यावर प्रेम करतोय, आपल्याला जे लोक आवडतात,आपण ज्यांचा आदर करतो, त्यांना निराश करण्याचा विचारही आपण करू शकत नाही.पण खरं म्हणजे यातली एकही गोष्ट आपल्याला वाईट व्यक्ती ठरवण्यासाठी कारणीभूत होऊ शकत नाही.माणूस म्हणून आपल्या सहजप्रवृत्तीचाच तो एक भाग असतो.पण कुणाला नकार देणं ही गोष्ट कितीही कठीण असली,तरी योग्य वेळी तुम्ही ते करू शकला नाहीत,तर कदाचित आयुष्यातलं खूप काही मोठं आणि महत्त्वाचं तुम्ही गमावून बसू शकता.


सिंथिया नावाच्या एका महिलेने मला एकदा एक गोष्ट सांगितली होती.सॅन फ्रान्सिस्कोला एकदा एक रात्र सिंथियाला घेऊन तिचे वडील बाहेर जाणार होते. सिंथिया त्या वेळी बारा वर्षांची होती. तिने आणि तिच्या वडिलांनी रात्री बाहेर जाऊन ती रात्र मजेत घालवण्यासाठी काही महिने बरेच काही बेत केले होते. अगदी एकेका मिनिटापर्यंत जराही वेळ वाया न घालवता त्यांच्या या कार्यक्रमाचं वेळापत्रक त्यांनी तयार करून ठेवलं होतं.त्यांनी तयार केलेल्या या प्रवासाच्या सर्व सविस्तर कार्यक्रमाविषयी सिंथियाने व्यवस्थित जाणून घेतलं होतं.संध्याकाळी साडेचारच्या सुमाराला मागच्या बाजूच्या खोलीतून बाहेर पडून वडील तिला भेटणार होते,आणि दुसरं कोणीही त्यांना भेटायच्या आत चटकन् तिथून बाहेर पडायचं असं ठरवलं होतं त्यांनी.चायनाटाऊनला जाण्यासाठी ते एक ट्रॉलीकार पकडून,त्या दोघांच्या आवडीचं चायनीज जेवण घेणार होते.एखाद्या दुकानातून तिथली एखादी वस्तू आठवणीदाखल खरेदी करायची,आजूबाजूला बघत बघत थोडा वेळ भटकायचं,एखादा छानसा सिनेमा बघायचा,आणि हॉटेलवर परत यायचं असं ठरलं होतं त्या दोघांचं ! तिथल्या पोहण्याच्या तलावात उडी मारून थोडा वेळ पोहायचं (तिचे वडील पोहण्याचा तलाव बंद असतानाही त्यात लपून छपून पोहण्यात तरबेज होते.) आणि त्यानंतर खोलीतच गरम गरम फज संडे मागवायचं,टी.व्ही.वरचे रात्री खूप उशिरापर्यंत चालणारे कार्यक्रम बघायचे,असा सगळा भरगच्च कार्यक्रम होता त्या दोघांचा.या कार्यक्रमातल्या एकूण एका गोष्टींची त्यांनी परत परत उजळणीही केली होती. या कार्यक्रमाची ते दोघंही अगदी आतुरतेने वाट बघत होते.वडिलांना त्यांचा एक मित्र ते कन्व्हेंशन सेंटरच्या बाहेर पडत होते तेव्हाच नेमका भेटला.तोपर्यंत त्यांनी आखलेला सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडणारच होता. हा त्यांचा एक जुना मित्र त्यांच्या व्यवसायाशीही निगडित होता.दोघं एकमेकांना बरेच वर्षांत भेटलेले नव्हते.त्या दोघांनी प्रेमाने एकमेकांना घट्ट मिठी मारली, ते सिंथिया बघत होती.त्या मित्राने म्हटलं,"तू आता आमच्या कंपनीबरोबर काम करतो आहेस,याचा मला खूप आनंद वाटतोय.लुईसला आणि मला हे कळलं,त्या वेळी आम्हाला दोघांनाही बरंच वाटलं.मला तुला आणि अर्थातच सिंथियालाही माशांच्या खूप छान जेवणासाठी व्हार्फमध्ये आमंत्रित करायचं आहे." सिंथियाच्या वडिलांनी ताबडतोब ते निमंत्रण स्वीकारून टाकलं. "बॉब......" ते त्याला म्हणाले, "तुला भेटून मलाही खूपच छान वाटतंय ! आणि व्हार्फमधल्या रात्रीच्या जेवणाची तुझी कल्पनाही मला खूपच आवडलीय."


सिंथिया कमालीची निराश झाली.तिने रंगवलेली ट्रॉलीतल्या सफरीची,आणि संडे आईस्क्रिमची सारी स्वप्नं क्षणार्धात हवेत विरून गेली होती.शिवाय मासे खाणं सिंथियाला मुळीच आवडत नसे.ते तर तिला खावे लागणारच होते,पण दोन प्रौढ व्यक्तींच्या बोलण्यात तिला काय रस असणार होता? ती तर कंटाळूनच जाणार होती. पण तेवढ्यात तिच्या वडिलांनी त्यांच्या त्या मित्राला म्हटलं," पण आज नको,कारण आजच्या रात्रीचा माझा आणि सिंथियाचा कार्यक्रम खूप आधीपासूनच ठरलाय.हो ना सिंथिया ? " बोलता बोलता त्यांनी सिंथियाकडे हळूच डोळा मिचकावून बघितलं आणि तिचा हात धरून,तिला घेऊन ते घाईघाईने तिथल्या दारातून बाहेर पडले.त्या रात्रीचा त्यांचा ठरलेला सगळा कार्यक्रम सुरळीत पार पडला आणि सिंथियासाठी सॅन फ्रान्सिस्कोमधली ती रात्र संस्मरणीय ठरली.


इथे एक गोष्ट मात्र आवर्जून सांगायची आहे की, सिंथियाचे वडील स्टीफन आर.कोव्हे हे व्यवस्थापन क्षेत्रातले मोठे विचारवंत होते. (The Seven Habits of Highly Effective People या पुस्तकाचे ते लेखकही आहेत.) सिंथियाने ही गोष्ट मला सांगितली, त्याच्या काही आठवडे आधीच त्यांचं निधन झालं होतं. त्यामुळे सॅन फ्रान्सिस्कोमधल्या त्यांच्या त्या रात्रीच्या कायम स्मरणात राहणाऱ्या आठवणी तिने मला सांगितल्या,त्या वेळी ती खूपच भावूक झाली होती.ती पुढे म्हणाली, " त्यांचा तो एक अगदी साधासा निर्णय माझ्याशी त्यांना कायमचं बांधून ठेवून गेला.कारण त्यांच्यासाठी मी सगळ्यात जास्त महत्त्वाची व्यक्ती आहे हे त्याच वेळी मला कळलं होतं ".


स्टीफन आर.कोव्हे हे त्यांच्या पिढीतले वाचकप्रिय आणि सन्माननीय लेखक आणि व्यावसायिक क्षेत्रातले विचारवंत होते.याशिवाय ते आवश्यकतावादीही होतेच. 'मुख्य गोष्ट ही आहे की,मुख्य गोष्ट ही मुख्य गोष्टच ठेवायला हवी.' अशासारखी आवश्यकतावादी तत्त्वं ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा जगभरातल्या राज्यांमधल्या प्रमुखांना नियमितपणे फक्त शिकवतच नसत,तर त्या तत्त्वांसहच ते जगतही होते.आणि अशाच एका क्षणी हे महत्त्वाचं तत्त्व मुलीसहसुद्धा ते जगले आणि आयुष्यभरासाठी जपावी अशी एक सुंदर आठवण त्यांनी त्या दोघांसाठीही निर्माण केली. एका दृष्टीने पाहिले,तर त्यांचा निर्णय अगदी योग्यच होता.पण तरीही त्यांच्या जागी असलेल्या दुसऱ्या कुणीही कदाचित मित्राचं निमंत्रण सहजपणे स्वीकारलं असतं.कारण त्यांना मित्राला नकार देणं एकप्रकारे उद्धटपणाचं वाटलं असतं.

आपण उगाचच मैत्रीला न जागण्याचा कृतघ्नपणा करतोय की काय,अशी भीतीही त्यांच्या मनात उत्पन्न झाली असती.जुन्या मित्राबरोबर जेवण घेण्याची कचितच मिळणारी ही संधी हातून सुटून जाईल असंही त्यांनी वाटून घेतलं असतं.त्या एका क्षणाला महत्त्वाचं काय आहे आणि क्षुल्लक काय आहे हे ठरवण्याचं धाडस दाखवणं लोकांना इतकं जड का जातं ? याचं एक अगदी सोपं उत्तर हे आहे की, महत्त्वाचं नेमकं काय आहे,याबाबत आपल्या मनात बरेचदा संभ्रम असतो.त्यामुळे अशा गोष्टी घडतात त्या वेळी आपली प्रतिकारशक्तीच दुबळी होते.मात्र त्याऐवजी आपलं मन अगदी निःसंदिग्ध असलं, तर आपल्या अंतर्मनातच कुठेतरी आपल्याकडे सर्व दिशेने येणाऱ्या अनावश्यक गोष्टींना लांबच थोपवून धरणारी एक शक्ती जागृत होते.



२३/१/२५

देव होणारा मनुष्य / Man Who Becomes God

सीझरही वेळ न गमावता इजिप्तकडे निघाला.तिथे पोहोचताच त्याला दिसलेली पहिली वस्तू म्हणजे भाल्याच्या टोकांवर असलेले पॉपचे शीर! इजिप्तमधील त्याच्या मित्रांनी त्याचा त्रास वाचविला.

जावयाला ठार मारण्याची त्याची चिंता संपली.जावयाच्या शिराची भेट इजिप्तमधील त्याच्या मित्रांनी त्याला दिली।


पॉपे मेला.पण त्यामुळे यादवी संपली असे मात्र नव्हे, जगाच्या नाना भागांत त्याचे अनेक मित्र,नाना प्रकारची कृष्णकृत्ये करीत होते;बंडाची भाषा बोलत होते.पण त्यांची खोड मोडण्यापूर्वी तो इजिप्तमध्येच टॉलेमीचे राजघराणे नीट व्यवस्थित करण्यासाठी थोडा थांबला. टॉलेमी वारला,तेव्हा त्याच्यामागे त्याच्याच नावाचा एक मुलगा होता व आर्सिनी आणि क्लिओपाट्रा नावाच्या दोन मुली होत्या.ही तिन्ही मुले सिंहासनासाठी झगडत होती.


क्लिओपाट्रा हिने सीझरची मदत मागितली.त्या वेळी सीझर चौपन्न वर्षांचा होता.त्याला टक्कल पडले होते व मधूनमधून फिट्सही येत असत.क्लिओपाट्रा तारुण्याच्या ऐन भरात होती! तिचे वय अवघे एकवीस वर्षांचे होते.सीझरने तिची विनंती एकदम मान्य केली व तिला इजिप्तची निःशत्रू राणी केले.


सीझर हा रोममधला अत्यंत हुशार व पाताळयंत्री मुत्सद्दी होता.पण तो जगातील अत्यंत हुशार अशा एका नारीच्या हातातील बाहुले बनला। रोमला परतून तेथील आपसातील यादवी बंद करण्याऐवजी तो इजिप्तमध्येच कित्येक महिने रेंगाळत राहिला.

क्लिओपाट्रा हिचे कोमल बंधन तोडणे,तिच्या मंत्रमुग्धतेतून मुक्त होणे, त्याला जड जात होते.आयुष्याच्या सायंकाळी आरंभिलेल्या त्या अनंगरंगात तो दंग आला! तिने त्याला नील नदीत नौकाविहार करण्यास चला,म्हणून विनविताच तो कबूल झाला.राजशाही नौका सिद्ध झाली.ती जणू तरता राजवाडाच होती! तिच्यावर नारिंगी व शेंदरी पडदे सोडण्यात आले होते नौकेचा नाळ सोन्याचा होता,

वल्ही चांदीची होती,पन्नास वल्हेवाले डुबुकडुबुक करीत वल्ही मारीत,तेव्हा त्यांची चांदीची टीके कशी चमकत ! पूर्वी कोणत्याही मर्त्य मनुष्याने अनुभविले नसेल अशा साम्राज्याच्या स्वप्नात तो स्वतःला विसरून गेला! तो मनात म्हणत होता,मी आता इटलीत जाईन,काल्पूर्नियाशी काडीमोड करीन, क्लिओपाट्रा हिला आणीन व मग देवाच्या दयेने आम्ही उभयता रोम,इजिप्त व सारी पृथ्वी यांचे स्वामी होऊ.मी पूर्वी धर्माचार्य असता केलेली देवाची सेवा देव थोडेच विसरतील? ते माझे स्वप्न पुरे करतीलच."


सीझर क्लिओपाट्रा हिच्या चाहुपाशात स्वप्नसृष्टीत रमला;

इजिप्तमधील सुंदरीच्या हातातल्या बांसऱ्यांवरील गीतवादन तो ऐकत होता.पण तिकडे पॉपचे मित्र काही स्वस्थ बसले नव्हते.

त्यांनी निरनिराळ्या रोमन प्रांतांत बंडाळ्या उभ्या केल्या.खुद्द रोम शहरही बंड करून उठले.सीझर वेळीच न उठल्यास व त्याने तिकडे लक्ष न दिल्यास त्याचेही डोके पॉपेच्या डोक्याप्रमाणेच भाल्याच्या टोकावर नाचविण्यात येण्याचा संभव दिसू लागला.

म्हणून त्याने मोठ्या नाखुशीने इजिप्तमधील मेजवान्या, सुखोपभोग व विलास आणि उंची वस्त्रे टाकून देऊन रणवेश (चिलखत व शिरस्त्राण) धारण केला.क्लिओपाट्रा हिच्या पोटात गर्भ वाढत होता. निघताना त्याने तिला 'बाळ जन्माला येताच मी तुला घेऊन जाईन'असे अभिवचन दिले.


सीझर एकदम रोमला गेला नाही.आपण इजिप्तमधील सुखोपभोगात रंगलो,दंग झालो याबद्दल त्याला लाज वाटत होती.त्याच्या मित्रांची व चाहत्यांची तो इजिप्तमधील रणांगणावर मोठमोठे विजय मिळवील अशी अपेक्षा होती.पण त्याने केवळ एकच विजय मिळविला.आणि तोही कोठे? तर इजिप्तच्या राणीच्या विलासमंदिरात ! क्लिओपाट्रा हिच्या सदिच्छांहून अधिक भरीव असे काहीतरी रोमला घेऊन जावे अशी त्याची मनीषा होती.म्हणून आशियामायनरमधील एका बंडखोर प्रांतावर पॉन्टवर त्याने स्वारी केली व फारशी तकलीफ न पडता तेथील बंडाचा मोड केला.नंतर आपण पूर्वीचेच प्रतापी सीझर आहोत हे रोमन जनतेला पटविण्यासाठी आपल्या विजयाचे वर्णन 'मी आलो,मी पाहिले आणि मी विजय मिळविला!' या तीन सुप्रसिद्ध गर्विष्ठ व अहंमन्यतापूर्ण वाक्यांत पाठविले.जणू मर्त्यांशी दोन शब्द बोलण्याची कृपा करणाऱ्या एखाद्या देवदूताचेच ते शब्द होते! तो रोमला यावयास सिद्ध झाला.त्याच्या आशियातील विजयाची वार्ता आधीच पोहोचली होती.ती ऐकून रोमन जनता वेडी झाली.तिने त्याचे भव्य स्वागत केले.आणखी दहा वर्षे आपणच हुकूमशहा राहणार असे घोषवून त्याने क्लिओपाट्रा हिला आणण्यासाठी लवाजमा व लष्कर पाठवून दिले. ती आपल्या बाळाला घेऊन आली.तिने त्याचे नाव 'सीरियन' म्हणजे 'छोटा सीझर' असे ठेवले होते. तिजबरोबर तिची बहीण आर्सिनो हीही आली होती; पण पाहुणी म्हणून नव्हे तर कैदी म्हणून.सीझरने आपल्या विजयी मिरवणुकीत त्या अभागिनीला शृंखला घालून रोमन लोकांसमोर मिरविले व मग ठार केले. क्लिओपाट्रा हिच्या मर्जीसाठी म्हणून त्याने हे नीचतम कृत्य केले.काल्पूर्विया हिच्याशी काडीमोड करण्याचे धैर्य त्याला झाले नाही.क्लिओपाटा हिच्यासाठी त्याने टायचर नदीच्या पैलतीरी भव्य प्रासाद बांधला व आपणास केवळ रोमची राजा-राणी म्हणून नव्हे; तर देवदेवता मानून जनतेने भजावे,पूजावे यासाठी दोघे कारस्थाने करू लागली.


सीझरने स्वतःचे एक मंदिर बांधिविले व त्यात आपले दोन पुतळे उभे केले.त्याची पूजाअर्चा करण्यासाठी व तिथे यज्ञयाग करण्यासाठी त्याने पुजारी नेमले व सीझरच्या नावे घेतलेले शपथ 'जोव्ह' देवाच्या नावे घेतलेल्या शपथेइतकीच पवित्र,असे फर्मान काढले. खेळाच्या निरनिराळ्या मिरवणुकी निघत,त्यात इतर देवदेवतांच्या चित्रांप्रमाणे आपलेही चित्र पाहिजे,असे त्याने आज्ञापिले.आणि हे जे आपले अमर मानसन्मान तो करून घेत असे,त्यात क्लिओपाट्राही सहभागी असे. 


'अजिंक्य देव,ज्यूपिटर ज्यूलियस' याच्या चित्राशेजारी किंवा पुतळ्याशेजारी 'व्हीनस देवतेची दिव्य बहीण क्लिओपाट्रा' हिला 'प्रेमदेवता व्हीनस हिची बहीण' म्हणून संबोधी.


देवत्वाचा मान स्वतःकडे घेण्याची सीझरची वृत्ती पृष्कळ रोमनांना आवडली नाही,त्यांना या गोष्टीचा राग आला. पण सीझरने देवत्व घेतल्याबद्दल त्यांना जितका राग आला,त्यापेक्षा जास्त राग तो रोमचा राजा होऊ पाहत होता,याबद्दलच त्यांना आला.त्याने आपल्यासाठी एक सुवर्णसिंहासन तयार करण्याची आज्ञा दिली व मुकुट धारण करण्यासाठी योग्य संधीची तो वाट पाहात बसला.ही संधी एका रोमन सणाच्या वेळी आली,असे त्याला वाटले.लोकांची नाडीपरीक्षा करण्यासाठी अर्धवट गमतीने व अर्धवट गंभीरपणे त्याने त्या दिवशीच्या उत्सवात मार्क ॲन्टोनी याला खेळात राजा करावे असे सुचविले.तद्नुसार ॲन्टोनी राजा झाला.खेळातलाच राजा;पण आजूबाजूच्या जनतेला राजाचा खेळ आवडला नाही.

सीझर दुरून सर्व पाहत होता.त्याने जाणले की,मुकुट धारण करण्याची वेळ अजून आली नाही.म्हणून त्याने तो बेत पुढे ढकलला व रोमन रिपब्लिकचे अनियंत्रित राजशाही रोमन साम्राज्यात परिवर्तन करण्याला परिपक्व वेळ अजून आली नाही,हे ओळखून वाट पाहण्याचे ठरविले.


दरम्यान स्पेनमध्ये पाँपेच्या इनायस व सेक्स्टस नामक दोघा मुलांनी रोमविरुद्ध म्हणजेच सीझरविरुद्ध बंड केले व ते दिवसेंदिवस वाढणार असे दिसू लागले.उपेक्षा करून चालण्यासारखे नव्हते,म्हणून सीझरला पुन्हा एकदा सैन्याचे आधिपत्य घेणे भाग पडले.त्याने स्पेनमधील पुंडावा मोडला व पाँपेच्या दोन्ही मुलांना ठार केले.सीझरने रोमला परत येताच आमरण हुकूमशाही जाहीर केली.त्याने याप्रसंगी अत्यंत भयंकर चूक केली. पॉपेच्या मुलांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ होणाऱ्या सार्वजनिक उत्सावांत तो स्वतःचा सत्कार करून घेणार होता.

त्याचा हा अहंकार अक्षम्य होता.क्षुद्रतेचे प्रदर्शन असह्य होते.रोमन लोकांनी आतापर्यंत खूप सहन केले. पण आपसांतील यादवीमुळे झालेल्या रोमनांच्याच कत्तलीप्रीत्यर्थ होणारा सत्कार समारंभ त्यांना असह्य वाटला.आपल्याच बांधवांचे रक्त सांडल्याबद्दल व शिरकाण केल्याबद्दल ऐट मारणे हे त्यांच्या मते माणुसकीला काळिमा फासणारे होते.


देव कधी चुकत नाही या विश्वासाने सीझर सत्कार समारंभाची योजना पुरी करण्याच्या खटाटोपास लागला.ख्रि. पू. ४४ सालच्या मार्चच्या पंधरा या तारखेस तो सिनेट हाऊसमध्ये आला तेव्हा तो अत्यंत आंनदी दिसत होता.कारण,रोमबाहेरील सर्व रोमन प्रांतांचा रोमन सम्राट म्हणून त्याची नेमणूक त्या दिवशी सिनेटरांकडून होणार होती.त्यानंतर खुद्द रोमचा सम्राट म्हणून त्याच्या नावाने द्वाही फिरण्यास कितीसा अवकाश होता? पण...!


हातांत मुकुट घेऊन सिनेटर आपल्या स्वागतार्थ पुढे येतील अशा आशेने सिनेटहाऊसमध्ये पाऊल टाकणाऱ्या सीझरला मुकुट प्रदानाऐवजी खंजिरांच्या तेवीस प्रहारांची सलामी मिळाली!


सीझरवर प्राणांतिक प्रहार करणाऱ्यांत त्याचे पुष्कळ जिव्हाळ्याचे स्नेहीही होते.त्यांतील एक प्रमुख कटवाला ब्रूटस हा आपलाच अनौरस पुत्र आहे असे सीझरला वाटण्यास भरपूर पुरावा होता.


इतिहासाच्या ग्रंथांमध्ये सीडारचे वर्णन 'एक थोर व मोठा मुत्सद्दी असे करण्यात येत असते.पण इतिहासकारांनी वाहिलेली स्तुतिसुमनांजली दूर करून सीझरचे खरे स्वरूप पाहिल्यास काय दिसेल? तो पक्का गुंड व खुनी, बुद्धिमान खुनी होता.तो प्रचंड प्रमाणावर कत्तली करण्याच्या योजना आखणारा कर्दनकाळ होता.तो वेडा पीर होता.त्याच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी एकट्या रोम शहराला एक लक्ष साठ हजार लोकांना मुकावे लागले!त्याचे जीवन म्हणजे रोमन लोकांना खरोखर शापच होता.पण तो मेला तरीही रोमन लोकांना हायसे वाटले नाही.सीझरचा खून होताच त्याची जागा बळकावण्यासाठी अनेक गुंड पुढे आले.रोमची मालकी मिळविण्यासाठी आपल्याच बांधवांच्या कत्तली करीत राहणे,पुष्कळ प्रमुख रोमन पुढाऱ्यांचा अनेक वर्षेपर्यंत एकच धंदा होता.


२१.०१.२५ या लेखातील शेवटचा भाग…!

२१/१/२५

देव होणारा मनुष्य / Man Who Becomes God

सिझर…!!


रोमनांनी कार्थेजची राखरांगोळी करून टाकली ! पण असला हा रानवटपणा त्यांच्या हातून चुकून झाला,असे समजण्याची मुळीच गरज नाही.व्यवस्थित रीतीने व विचारपूर्वक ठरविलेली अशी ती विध्वंसक योजना होती.आंतरराष्ट्रीय खुनाची व दुसऱ्यांचे देश बळकावण्याची ती उन्मत अशी साम्राज्यशाहीची राष्ट्रीय वृत्ती होती.रोमन सेनेचा एक भाग कार्थेजचे भस्म करीत असता,दुसरा भाग कॉरिथचा विनाश करण्यात गुंतला होता,तिसरा पूर्वेकडील देशांत रक्तपात करून साम्राज्यविस्तार करण्यात दंग होता व उरलेले सारे सैन्य उत्तरेकडे व पश्चिमेकडे रोमन सत्ता पसरविण्यात गुंतले होते.अशा रीतीने चोहो बाजूंनी साम्राज्याचा विस्तार होत असता खुद्द रोममध्ये काय आलले होते? राज्यसत्ता बळकावण्यासाठी तिथे सारखी भांडणे सुरू होती.रोज रोज कटकटी व काटाकाटी,रोज रोज दंगे व बंडे! जवळजवळ शंभर वर्षे पराक्रमी;पण हडेलहप्पी गुंडांनी रोमवर सत्ता चालविली.

मॅरियस,सल्ला,पॉप,सीझर, कॅशियस,ॲन्टोनी,ऑगस्टस,अशी ही नावे चमकताना आढळतात.प्रत्येक जण जनमताने श्रेष्ठ स्थानावर चढला.पण केवळ जनमताने मात्र श्रेष्ठ नव्हे;हुंदके, दगड,खंजीर यांच्या साह्याने त्यांची मते मिळवून ते सर्वश्रेष्ठ अधिकारी बनले. 


रोममधील प्रत्येक निवडणूक म्हणजे लढाईच असे. ज्याच्यामागे अधिक गुंड व पुंड,ज्यांच्या पाठीमागे अधिक मानकापू व गळेकापू,

तोच निवडणूक जिंकी, जो तो स्वतःसाठी,रिपब्लिकसाठी कोणीही नाही,असेच त्या दिवशी दिसे.मॅरियसपासून ऑगस्टपर्यंत सर्वांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांमुळे रोम शहर अखंड यादवीने त्रस्त झाले होते.सभ्य इतिहासकारांनी या प्रकारांना यादवी युद्धे हे नाव दिले असले,तरी खऱ्या अर्थाने ते रानटी खाटिकखान्याचेच प्रकार होते.अधूनमधून एकदा प्रामाणिक पुरुष जन्मला येई;

त्याला स्वतःपेक्षा रोमचे कल्याण अधिक महत्त्वाचे वाटे, स्वतःच्या फायद्यापेक्षा रिपब्लिकची चिंता अधिक असे. पण धंदेवाईक मुत्सद्दी व राजकारणी लोक अशा प्रामाणिक पुरुषाचा केव्हाच चेंदामेंदा करून टाकीत, त्याला केव्हाच उडवून देत ! टायबेरियस ग्रॅच्चसने जेव्हा गरिबांपासून बळकावलेल्या जमिनींची फेरवाटणी करण्याचा प्रयत्न केला.तेव्हा सीनेट हाऊसमध्येच त्याचा मुडदा पाडला गेला.त्याच्या डोक्यावर सोटे बसले व तो मेला.त्याचा भाऊ गायस ग्रॅच्चस तसलेच जनहिताचे कायदे करू लागताच त्याचीही तीच गत झाली.प्रामाणिक माणसांना राहण्याला रोम ही सुरक्षित जागा राहिली नव्हती.


दोघाही ग्रॅच्चस-बंधूंना अशा प्रकारे दूर करण्यात आले! त्यानंतर मॅरियस व सुल्ला या दोघांमध्ये रोमच्या नेतृत्वाविषयी स्पर्धा सुरू झाली.सुल्ला हा मॅरियसच्या सैन्यात लेफ्टनंट होता;पण आपण आपल्या सेनापतीपेक्षा अधिक पराक्रमी शिपाई व अधिक योग्यतेचे गृहस्थ आहोत,असे त्याला वाटे.तो बड्या घराण्यात जन्मलेला पॅट्रिशियन होता;मॅरियस गरीब वर्गातला अर्थात प्लिबियन होता.त्यांच्या भांडणाची साद्यंत हकिकत सांगत बसण्यात फारसा अर्थ नाही.त्यांचे परिणाम काय झाले,तेवढे पाहिले म्हणजे झाले.प्रथम मॅरियसच्या हाती सत्ता असता त्याने सुल्लाच्या बऱ्याच अनुयायांना ठार केले; पुढे सुल्लाच्या हाती सत्ता येताच त्याने मॅरियसचे पाच हजार मित्र यमसदनास पाठविले.


प्रत्येकाला वाटले, "जितं मया!" पण रोमला मात्र दोन पराभव सोसावे लागले.त्या दोघांचे आलटून पालटून विजय,पण मधल्यामध्ये रोमचे मात्र मरण! मॅरियस व सुल्ला यांच्यातील ही मारामारी पराकोटीला पोचली असता रोममध्ये तिच्याकडे लक्ष लावून पाहणारे तिघे तरुण होते.या यादवीत पुढे काय होते,इकडे त्यांचे डोळे सारखे लागलेले होते.रोमच्या नेतृत्वाखाली लढत असलेले ते दोघे जुने कसलेले वीर पाहून या तिघा तरुणाच्याही मनात महत्त्वाकांक्षा जागृत झाली व पुढे-मागे रोम आपल्या हाती यावे;आपणच रोमचे सर्वसत्ताधीश व्हावे म्हणून ते प्राणांचा जुगार खेळू लागले.त्या तीन तरुणांची नावे ऐका क्रॅशस,पॉप,सीझर.


सुल्लाने ठार मारलेल्या लोकांच्या लिलावात निघालेल्या इस्टेटी विकत घेऊन क्रॅशस अत्यंत श्रीमंत झाला.पॉपे सुल्लाच्या सैन्यात दाखल झाला व त्याच्या मरणोत्तर तो त्याच्या सेनेचा अधिपती झाला.त्याने रोमविरुद्ध पुन्हा बंड करून उठणारे स्पेनमधले व आफ्रिकेतील प्रांत पुन्हा जिंकून घेतले.तद्वतच पूर्वेकडीलही आर्मीनिया, सीरिया,कॅप्पाडोसिया,पॅलेस्टाईन,पॉन्टस,अरेबिया, फोनिशिया,पॅफ्लागोनिया,इत्यादी कितीतरी प्रदेश पादाक्रांत केले,लुटले,बेचिराख केले!परत येताना पॉपेने चार कोटी डॉलर संपत्ती लूट म्हणून बरोबर आणली होती."पैशाला कधीही घाण नसते"अशी रोमन लोकांत प्रचलित असलेली एक विशिष्ट म्हण आहे.पैसा कसाही मिळविला तरी तो पवित्रच ! पैसा कसा मिळविला ही गोष्ट महत्त्वाची नसून किती मिळविला,ही गोष्ट महत्त्वाची आहे.


 रोमन लोक क्रॅशस व पॉपे यांची पूजा करू लागले. रोमचे सर्वांत थोर दोन सुपुत्र अशी त्यांची ख्याती झाली. क्रॅशस व पॉपे.

परस्परांचा द्वेष करीत.शहराची सर्व भक्ती व प्रीती फक्त आपणासच मिळावी यासाठी ते हातघाईवर आले.त्यांची उघड लढाई होणार असे दिसू लागले.पण सीझरने मध्यस्थी केली व त्यांचे भांडण तात्पुरते थांबले.सीझरच्याही मनात स्वार्थी महत्त्वाकांक्षा होत्याच व त्यांच्या पूर्ततेसाठी कॅशसची संपत्ती व पाँपेचे वजन दोहोंचीही त्याला जरुरी होती.म्हणून त्या दोघांनी परस्परांशी न लढता एकत्र यावे,असे त्याने सुचविले. 


'जगाला लुटण्यासाठी आपण तिघे मिळून करार करू या,'असे त्याने सुचविल्यावरून 'पहिले त्रिकूट' या नावाने इतिहासात प्रसिद्ध पावलेला जगातील पहिला त्रिमूर्तीचा संघ स्थापन झाला.


या तिघांत सीझर वयाने सर्वांत लहान.पण सर्वांत समर्थ व साहसी होता.लहानपणी त्याला चाचेगिरी करणाऱ्या लुटांरूनी पळवून नेले असता तो मोठमोठ्याने कविता म्हणून त्या चोरांना त्रास देई व थट्टेने म्हणे,कोणीतरी खंडणी भरून मला सोडवील.पण मुक्त होताच मी सैन्य घेऊन परत येईन व तुम्हा सर्वांना क्रॉसवर चढवीन." त्याने हा शब्द पाळला.तो मागेपुढे पाहणारा नव्हता, तेजस्वी व साहसी होता.त्याचे देशबांधव त्याच्या कर्तृत्वाने चकित व भयभीत झाले.या वेळी तो फक्त वीस वर्षांचा होता;पण मुख्य धर्माचार्याच्या जागेवर त्याने सक्तीने स्वतःची निवड करून घेतली,तेव्हा त्याच्या हेतूंविषयी प्रसिद्ध वक्ता सिसरो याला व इतर पुष्कळांना शंका आली.राजसत्ता हाती घेण्याचा त्याच विचार असावा,असे त्यांना वाटले. सिसरो लिहितो, "त्याचे केस अत्यंत व्यवस्थित रीतीने विंचरलेले असतात.एका बोटाने तो नेहमी आपले केस नीट करीत असतो.असल्या माणसाच्या डोक्यात रोमन सरकार उलथून टाकण्याचा विचार येईल अशी कल्पानाही मी करू शकत नसे." पण सीझरच्या मनातील विचार आपणास नीट वाचता आले नाहीत असे पुढे सिसरोला आढळून आले..सीझर केवळ राजकीय महत्त्वाकांक्षा व राजसत्ता यांचाच नव्हे;तर प्रेमाचाही आचार्य होता.रोममधील कितीतरी तरुणींना त्याने मोह पाडला होता;आणि ही गोष्ट सर्वांना माहीत होती.त्याला 'प्रत्येक स्त्रीचा नवरा' अशी पदवी मिळाली होती! पण त्याने स्वतःच्या पत्नीचा मात्र त्याग केला होता.कारण,त्याच्याच एका मित्राने तिच्याजवळ प्रेमयाचना करण्याचा लाळघोटेपणा चालविला होता.आपली पत्नी आपल्या मित्राच्या प्रेमयाचनेला बळी पडली,असे समजावयाला त्याला काहीही कारण मिळाले नव्हते;तरीही त्याने तिचा त्याग केला.कारण,'सीझरची पत्नी संशयातीतच असली पाहिजे'असे तो म्हणे.कारकिर्दीच्या प्रारंभी त्याच्याजवळ पैसा नव्हता;पण दुसऱ्यांचे पैसे घेऊन तो खूप उदारपणा दाखवी.एकदा त्याला चाळीस-पन्नास लाख रूपये कर्ज झाले.क्रॅशसशी संधान बांधण्यात हे कर्ज फेडून टाकण्याला त्यांचे पैसे मिळावेत असा सीझरचा हेतू होता.


सीझर,पाँपे व क्रॅशस यांनी आपापल्या वर्चस्वाची तीन क्षेत्रे मुक्रर केली.एखाद्या खुसखुशीत भाकरीप्रमाणे त्यांनी जगाचे तीन तुकडे केले व सर्व जग आपसांत विभागून घेतले.सीझरने स्पेनचा कब्जा घेतला, क्रॅशसला आशियात पाठविण्यात आले,पाँपे रोममध्येच राहिला.पुढे लवकरच एका लढाईत कॅशस ठार झाला, तेव्हा एक ब्याद आपोआपच दूर झाली म्हणून सीझर व पाँपे यांना आनंद झाला.कारण,आता रोमवरील प्रभुत्वासाठी उघडपणे नीट लढता आले असते;तिसरा कोणी मध्ये पडण्याला उरला नव्हता.पण सीझरसमोर दुसरी एक अधिक मनोवेधक योजना सध्या होती.


अलेक्झांडरप्रमाणे त्यालाही जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा होतीच.आपल्या हयातीत माणसाला जगाचा किती भाग जिंकून घेता येतो हे पाहण्याचे त्याने ठरविले;व पाँपेशी अधिकच आत्मीयता जोडली.त्याने आपली जुलिया नामक मुलगी पाँपला दिली.आपण दिग्विजयावर असताना पाँपेने इकडे कपट कारस्थाने करून रोमचा कब्जा घेऊ नये,म्हणून त्याने ही योजना केली व नवीन अज्ञात प्रदेश जिंकण्यासाठी तो निघाला. तो स्पेनमधून फ्रान्समध्ये उतरला.फ्रान्सचे तेव्हाचे नाव गॉल होते.तिथे मोठमोठे विजय व खूप लूट मिळवून तो खाडी ओलांडून ब्रिटनमध्ये गेला.

पुष्कळांना ब्रिटन एक काल्पनिक देश वाटत असे.त्याचे शिपाई म्हणाले, "या खाडीपलीकडे देश नसेल;तेव्हा आम्हाला कोठेतरी अंधारात नेत आहात.तुम्ही आम्हास पृथ्वीच्या कडेला न्याल व तिथे अथांग खड्यात पडून आम्ही गडप होऊ." पण असल्या भ्याड व भोळसट कल्पनांमुळे न गांगरता त्यांकडे दुर्लक्ष करून तो निघाला व त्यांना खराखुरा देश दिसला.तिथेही पुन्हा नवीन विजय व नवीन लूट मिळेल असे मग सर्वांस वाटले.पण ब्रिटनवरील ही स्वारी निराशाजनक ठरली.प्ल्युटार्क लिहितो,'तिथे सीझरने ज्या अनेक लढाया केल्या,त्यामुळे शत्रूचे जरी पुष्कळ नुकसान झाले.तरी सीझरचाही फारसा फायदा झाला नाही.ब्रिटनमधील लोक अत्यंत दरिद्री होते.लुटून नेण्यासारखे त्यांच्याजवळ काहीही नव्हते.


सीझर परत गॉलमध्ये आला.फ्रान्सच त्याच्या लुटारू वृत्तीला व बुद्धीला अधिक योग्य होता.तो दहा वर्षे आसपास लूटमार करीत राहिला,हेल्वेटियन,बेल्जियन, जर्मन,ॲक्विटेनियन वगैरे लोकांना जिंकून त्याने यथेच्छ लुटले ! तो कुबेर बनला.त्याने आपले वैभव व आपली कीर्ती वाढविली.'सीझरच्या गॅलिक लढाया' हे पुस्तक बायबलखालोखाल शाळांमध्ये वाचले जाते;पण त्यांत सीझरने केलेल्या लुटालुटीच्या,वाटमाऱ्यांच्या व खुनांच्या रद्दी व रानवट गोष्टींशिवाय दुसरे काय आहे? असले भिकार व विषारी वाड् मय मुलांच्या हाती पडणे अयोग्य नव्हे काय ? असल्या रानवट प्रचारापासून आपण आपल्या मुलांचे रक्षण केले पाहिजे.अजूनही तसे करण्याची वेळ नाही का आली?


प्ल्युटार्कने एकाच वाक्यात फ्रान्समधील विजयांचे वर्णन केले आहे.तो लिहितो,दहा वर्षांहूनही कमी काळात त्याने आठशे शहरे जिंकली व तीनशे लहान लहान राज्यांना शरण यावयास लावले.या दहा वर्षांत तो ज्या ज्या लोकांशी लढला,त्या सर्वांची संख्या तीस लाख धरली,तर त्यांपैकी दहा लाख त्याने ठार मारले व आणखी दहा लाख कैद केले!"


याप्रमाणे इकडे सीझर गॉल लोकांच्या धुव्वा उडवीत असता,त्यांना पायाखाली चिरडून टाकीत असता, रोममधील त्याचे महत्त्व कमी व्हावे म्हणून पॉपे खटपट करीत होता.त्याच्या कृत्रिम मैत्रीतील शेवटचा दुवा तुटला;पाँपेची पत्नी (सीझरकी मुलगी जुलिया) बाळंतपणात मरण पावली.त्या दोघांत उघड वैर पेटले. आपणाली सर्वाधिकारी केले जावे,यासाठी पाँपे कारस्थाने करू लागला.

सीझरच्या कानी ही वार्ता पडताच तो झपाट्याने इटलीत आला.व स्वतःच्याच रोम शहरावर त्याने आपल्या सैन्यानिशी स्वारी केली रूबिकॉन नदी ओलांडून इटलीत शिरण्यापूर्वीच्या रात्री त्याला एक दुष्ट व अपवित्र स्वप्न पडले होते.सीझर रोमवर चालून येत आहे असे ऐकताच पाँपे पळाला, इतर अधिकारी,कॉन्सल्स,सिनेटर्स,सारे पळाले! 'कर्णधाराने सोडून दिलेल्या नावेच्या प्रमाणे रोमची स्थिती होती.'सीझर दरवाज्यातून आला व रोममध्ये अराजक आहे असे जाहीर करून शांतता व सुव्यवस्था टिकविण्यासाठी त्याने स्वतःला हुकूमशहा केले.त्यानंतर त्याने शहराची तिजोरी फोडली व तिच्यातील सार्वनिक पैशाचा उपयोग केला.आपल्या देशबांधवांसमोर केलेल्या सुंदर भाषणात तो म्हणाला,


"मी हे सारे तुमच्यासाठी करीत आहे व जर कोणी मला या लोककल्याणाच्या कार्यात विरोध करील,तर त्याला मी ताबडतोब यमसदनास पाठवीन."


रोममध्ये आपले आसन स्थिर करून व तिथे काही संरक्षक शिबंदी ठेवून तो पाँपेचा पाठलाग करीत निघाला.आपल्या शत्रूचा निःपात करण्यात तो इतका अधीर झाला होता की,तो अत्यंत वेगाने निघाला.त्याचे शिपाईही या अती धावपळीला कंटाळून जरा कुरूकुरू लागले.ते आपसांत म्हणत.सीझर आम्हाला थोडासा विसावा केव्हा व कोठे देणार? जरा तरी विसावा हा देईल का? आम्हा मानवांविषयी त्याला काही सहानुभूती नसेल वाटत तर न वाटो;पण निदान ही आमची चिलखते,हे आमचे पट्टे यांवर तरी त्याने करुणा नको का करायला? सीझरच्या या अघोरी महत्त्वाकांक्षेपेक्षा वर्षांनुवर्षे ज्या लढाया अखंड चालल्या आहेत,त्या लढतालढता ही आमची चिलखते झिजून गेली,ही आमची शिरस्त्राणे निस्त्राण झाली!"


पण रोमन सैन्याची शिस्त कडवी होती.शिस्तीत वाढलेले असल्यामुळे शिपाई पुन्हा शांत झाले,तक्रारी मिटल्या व ते सीझरबरोबर ग्रीसच्या उत्तरेकडील थेसिली भागात गेले.सीझरने पाँपेच्या जीर्ण-शीर्ण-विदीर्ण सेनेला गाठून पाँपेचा मोड केला.पाँपे पळाला;गलबतात बसून तो इजिप्तमध्ये निसटून गेला.


शिल्लक भाग दुसऱ्या लेखामध्ये…

१९/१/२५

औषधांशिवाय आरोग्य / Health without drugs

आंतरिक आरोग्याची कसोटी


आंतरिक आरोग्याकडे लक्ष देताना प्रश्न येतो की त्याचं मोजमाप कसं करायचं ?


शारीरिक क्षमता मोजण्यासाठी जसं आपण चपळता,

वेग,लवचिकता,तोल सांभाळता येणे, वजन उचलता येणे असे मापदंड वापरू शकतो, तसे आंतरिक आरोग्याचे मापदंड कोणते ?


यामध्ये काही महत्त्वाचे मापदंड हे मोजता येण्यासारखे आहेत.इतर काही मोजायला अवघड पण अनुभवाने नक्की सांगता येण्यासारखे आहेत - दिवसभर उत्साही वाटणे,शांत झोप लागणे, चिडचिड कमी होणे इत्यादि.


आता मोजता येण्यासारखे जे सर्वमान्य मापदंड आहेत ते बघू. [३] हे १८ वर्षांवरील सर्वांना लागू आहेत.


१. पोटाचा घेर :


पुरुषांसाठी हा ४० इंचापेक्षा कमी,आणि स्त्रियांमध्ये ३५ इंचापेक्षा कमी असावा.हा घेर नाभीपाशी (बेंबीपाशी) मोजायचा आहे आणि ते करताना श्वास ओढून पोट आत घ्यायचं नाही!(आणि मुद्दाम फुगवायचंही नाही.)

शिवाय,पोटाचा घेर म्हणजे पँट साईझ नाही.बेंबीपाशी मोजलेला घेर घ्यायचा.


तुम्हाला लक्षात येईल की लहान चणीच्या,कमी उंचीच्या माणसांमध्ये धोकादायक पातळीचा लठ्ठपणा असेल तरी पोटाचा घेर ४० इंचाच्या आत असू शकतो.त्यामुळे उंची हा घटक लक्षात घेतला पाहिजे. उदाहरणार्थ, सहा फूट उंचीच्या आणि पाच फूट उंचीच्या अशा दोन व्यक्तीसाठी हा मापदंड थोडासा वेगळा असला पाहिजे.


म्हणूनच,हा मापदंड जास्त चांगल्या पद्धतीने असा सांगता येतो,की पोटाचा घेर हा उंचीच्या निम्मा किंवा त्याहून कमी असावा.(स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठीही.)


उदाहरण म्हणून,जर कोणाची उंची ५ फूट ४ इंच असेल म्हणजे ६४ इंच असेल तर त्यांच्या पोटाचा घेर ६४ चा निम्मा म्हणजे ३२ इंच (किंवा त्यापेक्षा कमी) असावा.कोणी ५ फूट ८ इंच उंच असेल म्हणजे ६८ इंच उंच असेल तर पोटाचा घेर जास्तीत जास्त ३४ इंच असावा.


पोटाचा घेर हा आपल्या धडातला लठ्ठपणा (Cen- tral Obesity) दाखवतो.आपलं शरीर चरबी साठवताना दोन वेगवेगळ्या प्रकारे साठवतं. त्वचेखालील चरबी (Subcuta- neous Fat) आणि पोटाच्या आसपास,महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला साठवलेली चरबी (Visceral Fat).एका मर्यादेपलीकडे ही दुसऱ्या प्रकारची चरबी धोकादायक असते.ह्या चरबीचं घरच्या घरी करता येणारं सोपं मोजमाप म्हणजे पोटाचा घेर.


२. रक्तदाब :


साधारण स्थितीत मोजलेला रक्तदाब हा १३०/८५ पेक्षा कमी असावा.रक्तवाहिन्यांमधून वाहत असताना वाहिन्यांवर जो रक्ताचा दाब पडतो, तो म्हणजे रक्तदाब.हे दोन आकड्यांनी दर्शवलं जातं.


सिस्टॉलिक म्हणजे जेव्हा हृदयाचा ठोका पडतो आणि हृदय पंपाप्रमाणे शरीराकडे रक्त पाठवतं, तेव्हाचा रक्तदाब हा रक्तदाब १३० च्या खाली असावा.डायस्टॉलिक,म्हणजे हृदयाच्या दोन ठोक्यांच्या मधल्या काळात असलेला रक्तदाब,जो ८५ च्या खाली असावा.


१३०/८५ च्या वर रक्तदाब असेल तर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. (Hypertension) असं मानलं जातं.यातून आपल्याला काही शक्यता दिसतात उदा.हृदयावर ताण येतो आहे,

रक्तवाहिन्या काही अंशी आकुंचन पावल्या आहेत,रक्ताचा पातळपणा (Viscosity) योग्य नाही,इत्यादि. म्हणून रक्तदाब मोजणं महत्त्वाचं आहे.


जर रक्तदाब १००/७० पेक्षा कमी असेल, तर कमी रक्तदाबाचा त्रास आहे. (Hypotension) असं साधारणतः मानलं जातं.


३. रक्तातील साखर (ग्लुकोज) आणि इन्सुलिन :


तिसरा मापदंड म्हणजे ३ मापदंडांचा गट आहे. ते असे


ⅰ) उपाशीपोटी रक्तातील साखरेची (ग्लुकोज) पातळी १०० पेक्षा कमी असावी. [२४, २५, २६, २७]


ii) उपाशीपोटी रक्तातील इन्सुलिनची पातळी ६ पेक्षा कमी असावी.


iii) HbA1C हे ५.६ किंवा त्याहून कमी असावं.


मुळात आपल्याला बहुतेक कुठेच इन्सुलिनची पातळी मोजायचा सल्ला मिळत नाही.ह्यात भर म्हणजे,

रक्तचाचणीच्या अहवालात इन्सुलिन हे २४.९ इतक्या पातळीपर्यंत असलं तरी चालेल अशी मर्यादा दिलेली असते.वास्तविक,६ ही पातळी योग्य आहे आणि त्यामागच्या शास्त्रीय कारणांवर मी वेगळा लेख लिहिलेला आहे. [४१] अडचण अशी आहे की इन्सुलिनच्या अमुकपातळीला शरीरात काय होत असतं हे विश्लेषण रक्तचाचणी अहवालात नसतं.जे आपण या पुस्तकात पुढे बघणार आहोत.त्यामुळे रक्त चाचणी अहवालात दिलेली मर्यादा बघून गाफील न राहता ६ ही योग्य पातळी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.


हे तीन मापदंड जर योग्य असतील तर तुम्हाला मधुमेह नाही असं म्हणता येतं.तुमच्या लक्षात येईल की फक्त साखरेच्या पातळीवरून मधुमेह,न ठरवता,त्यात इन्सुलिनची पातळीही जर लक्षात घेतली,तर अधिक परिणामकारक निदान करता येतं.पुढे आणखी खोलात आपण याचं महत्त्व बघणार आहोत.इन्सुलिन एक महत्त्वाचं संप्रेरक (Hormone) आहे, जे शरीरभर अनेक कामं करतं.त्यातलंच एक काम म्हणजे रक्तातील अतिरिक्त साखर आपल्या विविध पेशींपर्यंत पोचवणं.ह्याने रक्तातील साखरेची पातळी मर्यादित राहते.

साखरेबरोबर इन्सुलिनची पातळीही मोजल्याने हे काम करताना किती इन्सुलिनची गरज भासते आहे हे कळतं,ज्याने अधिक चांगल्या पद्धतीने तपासणी आणि रोगनिदान करता येतं.


४. रक्तातील स्निग्ध पदार्थ : वाक्य १ः


चौथा मापदंड हा देखील ३ मापदंडांचा गट आहे. ते असे


i) HDL ज्याला आपण रूढार्थाने "चांगलं कोलेस्टेरॉल" म्हणतो,ते पुरुषांमध्ये ४५ पेक्षा जास्त आणि स्त्रियांमध्ये ५० पेक्षा जास्त असावं.


ii) Triglycerides (TG) जे रक्तातले एक प्रकारचे स्निग्ध पदार्थ असतात ते १५० पेक्षा कमी असावेत.


iii) TG : HDL हे गुणोत्तर (Ratio) २ पेक्षा कमी असावं.


ह्या चौथ्या मापदंडाचा जवळचा संबंध हृदयरोगाशी आहे.कोलेस्टेरॉल जास्त असल्यामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो असं विधान आपण अनेकदा ऐकतो.खरं तर,

हृदयरोगाच्या चर्चेमध्ये कोलेस्टेरॉल उगाचच बदनाम झालं आहे!


कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा रेणू आहे.आपल्या शरीरातल्या बहुतेक सर्व पेशींचं आवरण हे कोलेस्टेरॉलने बनलेलं असतं.शरीरातली अनेक महत्त्वाची संप्रेरकं (Hormones) बनवायला कोलेस्टेरॉल लागतं. उदा.टेस्टोस्टेरॉन.कोलेस्टेरॉल हे इतकं महत्त्वाचं आहे की आपण जर पुरेसं कोलेस्टेरॉल आहारातून घेतलं नाही,तर आपलं यकृत (Liver) शरीरात ते बनवू शकतं आणि त्याची उणीव भरून काढली जाते.✓


हृदयरोगासाठी कोलेस्टेरॉलला का दोषी धरलं गेलं, ते आपण पुढे पाहूच.


सध्या एवढं लक्षात ठेवूया की,TG:HDL हे गुणोत्तर हृदयविकाराच्या धोक्याचं सर्वोत्तम निदर्शक आहे. जर ते २ पेक्षा जास्त असेल,तर ते खाली आणणे ही प्राधान्याने करण्याची गोष्ट होऊन जाते.पुढे आपण ते खाली कसं आणायचं ते ही पाहणार आहोतच.


HDL हे कोलेस्टेरॉल नसून,खरं तर ते एक प्रथिन (प्रोटीन) आहे. HDL = High-Density Lipoprotein.तसंच LDL = Low-Density Lipoprotein.


कोलेस्टेरोल हा स्निग्ध पदार्थ आहे आणि आपलं रक्त हे ५०% पाणी आहे. त्यामुळे, रक्तामधून कोलेस्टेरोल स्वतः प्रवास करू शकत नाही. त्याला प्रथिनांमधून प्रवास करावा लागतोः ही प्रथिनं म्हणजेच HDL, LDL, इत्यादि. कोलेस्टेरोल हा प्रवासी आहे आणि HDL, LDL ह्या त्याला रक्तामधून घेऊन जाणाऱ्या बसगाड्या आहेत.


HDL ला "चांगलं कोलेस्टेरॉल" आणि LDL ला "वाईट कोलेस्टेरॉल" हे शब्द रूढ झाले आहेत.ते तितकेसे बरोबर नाहीत,हे तुमच्या लक्षात येऊ लागलं असेल.हृदयरोगाच्या कारणांची चर्चा करताना याबद्दल अजून गमती बघूयात.


आंतरिक आरोग्याचे ४ मापदंड आपण पाहिले. त्यामागची कारणं खोलात जाऊन बघितली पाहिजेत. त्यासाठी आधी आपल्या शरीरातल्या काही मूलभूत प्रक्रिया,संप्रेरकांचं काम थोडंसं समजावून घेऊया.


१७.०१.२५ या लेखातील दुसरा शेवटचा भाग..।