* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

९/११/२२

७ नोव्हेंबर २०२२ या लेखातील पुढील भाग..

'येथे कूपनलिका भरुन मिळते!' हे काहीतरी नवीन आहे.आणि हे करत असतात.राहुल बाकरे


बोअरवेल घेतली तेव्हा खूप पाणी होते. पण आता कोरडी ठाक पडली आहे.पाणी गेले कुठे?


आता पाऊसपाण्याचे दिवस सोडले,तर या कूपनलिकेला पाणी मिळणारच नाही का? कूपनलिकेचे पाणी आटले असले तरी धीर सोडू नका राहुल बाकरे यांना संपर्क करा. ते बोअरवेलची ॲन्जिओप्लास्टी करून बोअरवेलला पुन्हा पाणीपुरवठा होऊ लागेल हे पाहतील.


हो बोअरवेलची ॲन्जिओप्लास्टी.


जमिनीच्या पोटात खनिज तेलाचे साठे तंत्रज्ञानाने शोधण्याचे तंत्र मागच्या शतकात विकसित झाले.त्यातून जगातील अर्थकारण, राजकारण,जीवनमान बदलत गेले.उपग्रहांचा वापर,काँप्युटर,तसेच इतर विकसित होणाऱ्या विज्ञानाबरोबरच तेल शोधण्याचे तंत्र अधिक अधिक प्रगत होत गेले. त्याचे कुतूहल आपल्याला सतत वाटत राहिले आणि अजूनही वाटते आहे.पण विसावे शतक तेलाचे होते, एकविसावे शतक पाण्याचे आहे. जे जे तेलाबाबत घडलं तेच या शतकात पाण्याबाबत घडतंय न् अजूनही घडणार आहे.


तेलाच्या संशोधनासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान पाण्यासाठी जसेच्या तसे वापरले जात नसले तरी तितक्याच उच्च तांत्रिकतेने जमिनीतील पाणी कुठे,किती,कसे उपलब्ध आहे व त्याचा वापर कसा करून घेता येईल याची शास्त्रशुद्ध, तंत्रशुद्ध मांडणी करणाऱ्या ते पाणी प्रत्यक्षात तुमच्या बोअरवेलमध्ये भरून देण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या ज्याला ते बोअरवेलची 'अँजिओप्लास्टी' असे म्हणतात अशा राहुल बाकरे यांच्या पाणीविषयक काम आणि कर्तृत्वाची, त्यांच्या अनुभवाची व त्यांनी विकसित केलेल्या तंत्राची ही गोष्ट..!


गोष्टच पण ती साधी सरळ नाही. ती आहे चढउतारांनी भरलेली.


राहुलजींचा प्रवास तसा भारीच आहे,एका मोठ्या डोंगरावर चढून जायचे परत अचानक त्यावरून खाली उतरायचे आणि दुसरा डोंगर चढायला लागायचे,असे पाच-सहा डोंगर चढून उतरण्याचा त्यांचा प्रवास आता भूजलाच्या उपलब्धतेसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या वाटेवर वेगाने सुरू आहे. खूप सकारात्मक व अनेक अर्थांनी बदल देणारी भूजलाच्या नियोजनाबाबत व उपलब्धतेबाबत मोठे बदल घडवणारी ही वाटचाल सुरू आहे.


राहुल बाकरे ज्ञान प्रबोधिनीत शालेय शिक्षण घेउन पुण्याच्या एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. (मेकॅनिकल) झाले. त्यानंतर लगेच अमेरिकेतील एमआयटी या तंत्रशिक्षणासाठी जगातून सर्वाधिक पसंती असलेल्या विद्यापीठातून ऑटोमोबाईल विषयात एम.एस.पूर्ण केले. त्यावेळी त्यांचा विषय ऑटोमोबाईल आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित होता.हा पहिला डोंगर पूर्ण चढून झाल्यावर त्यांनी तो पूर्ण उतरुन त्यांचा मोर्चा जगात त्यावेळी प्रत्येक बुद्धिमान युवकांचे आकर्षण असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगकडे वळवला.आता त्याचा अभ्यास करून त्यात वाटचाल करायचे ठरले,तसे केलेही.मग त्यावर आधारित संगणकावर ऑनलाईन खेळांचे प्रस्थ त्या काळात बरेच वाढत होते,व त्या ऑनलाईन खेळांसाठी सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीत ते काम करू लागले.कंपनीचा कारभार मोठाच होता. वर्षाला सहाशे कोटी डॉलर्सची उलाढाल असलेल्या कंपनीत राहुल बाकरे त्या कंपनीच्या बिलिंग सॉफ्टवेअरवर काम करत होते,परत एक दिवस हाही डोंगर उतरायचं मनात आलं. हे सगळं भौतिक चंगळवादी जीवन,नुसते पैसे पैसे अशा विषयांच्या चर्चांनी राहुलजींचे तिथून मन उडाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या त्यांना अस्वस्थ करत होत्या.ज्ञान प्रबोधिनी संस्कार आठवू लागले.मनाला टोचू लागले, माझे ज्ञान सामान्य माणसासाठी हवे.माझे जीवन समाजासाठी हवे,माझ्या मातीतल्या माणसांसाठी हवे,ही भावना प्रबळ होऊ लागली.त्यामुळे हा ही डोंगर उतरायचा असा मनाचा निर्णय झाला. लगेच अमलातही आणला गेला.


समाजाचे काम करायचे म्हणजे गळ्यात शबनम, पायात स्लीपर आणि वाढलेल्या दाढी घेऊन समाजवाद आणि समाजकारणाचा तुणं तुणं वाजवत विरक्तीच्या आणि त्यागाच्या गप्पा करत आणि शेवटी अपयशाने सरकार व भांडवलदारांच्या माथ्यावर खापर फोडत व्याख्याने देणार्‍या समाजसेवकांची उदाहरणे डोळ्यासमोर ठेवूण चालायचे नव्हते.


अर्ध्यमची काम करण्याची साधारण पद्धत अशी होती की विविध ठिकाणाहून आलेल्या पाणी संदर्भातल्या कामांच्या मागणीच्या ठिकाणांना भेट देऊन तेथील लोकांना ही भेटणे.प्रत्यक्ष फिल्डवर भेटी देणे.सध्या ते लोक यावर कसा मार्ग काढत आहेत हे पाहणे.येथील पारंपरिक काही जलसंवर्धनाच्या व जलशुद्धीकरण त्यांच्या म्हणून काही पद्धती आहेत का हे पाहणे.अशी माहिती काढल्यावर पारंपरिक तंत्राला काही गोष्टींची भर घालून त्यांचे बळकटीकरण करायचे की नवीन तंत्रज्ञानावर आधारित पर्याय निवडायचे हा निर्णय करायचा.त्यातून त्या लोकांना या समस्या त्यांची कारणे व त्यांची पर्यायी उत्तरे याबाबत प्रशिक्षण देत त्यांच्यातच समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करायची हा पुढचा टप्पा.उदाहरणार्थ आमचे पाणी खूप जड आहे आणि लोक सारखे सारखे आजारी पडतात आम्हाला आर.ओ.प्लांट पाहिजे अशी मागणी आली तर लगेच आर.ओ. प्लांट देणे हे त्यावर उत्तर नाही. कारण दुर्गम भागात आर.ओ. प्लांटसाठी कायम वीज उपलब्ध असते का? त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोणी जवळपास उपलब्ध होईल का? किंवा स्थानिक लोकांना याबाबत काहीतरी माहिती आहे का? हे जाणणे महत्वाचे. अन्यथा लाखो रुपयांचे मशीन घेऊन त्याची देखभाल न झाल्यावर ते वर्षा-दोन वर्षात बंद पडते.ते तसेच नादुरुस्त राहून गंजून जाते. लोक परत तेच जड पाणी पीत राहतात. पैसेही वाया गेलेले अन् समस्याही संपली नाही अशी खूप उदाहरणे खूप विषयांबाबत आहे. भारतीय समाजाचा हा दोष किंवा मर्यादा आहे. हा सार्वत्रिक अनुभव आहे.याला म्हणूनच पर्याय आधी स्थानिक पारंपरिक ज्ञानाचा,व तो शोधण्याचा प्रयत्न राहुलजींचा असायचा.मग अशावेळी मटका गाळणी,विविध झाडांच्या बियांचा वापर,किंवा अशाच निसर्गात उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला.पण म्हणजे हे शक्य नसेल तर आर.ओ.प्लांट पण दिला, नाही असे नाही.पाणी जिरविण्याचे,जमिनीतील पाणी वाढवण्यासाठीचे विविध उपाय,बंधारे बांधणे, बोअर मारणे या आणि अशा विविध समस्यांवरच्या विविध उत्तरांचा ही अवलंब करण्यात आला.


विशेष काम झाले ते अर्सेनिक युक्त व फ्लोराइड युक्त पिण्याचे पाणी ज्या विभागात आहे त्या भागात!! अर्सेनिक युक्त व फ्लोराइड लोकांचे जीवनच उद्धस्त करतात.गंगेच्या खोऱ्यात ही समस्या खूप आहे. इथे पूर्वी पिण्याचे पाणी विहिरीतून व आडातून घेतले जायचे. त्यावेळी ही समस्या कमी होती कारण विहिरींची खोली फार नसायची. त्या खडकाच्या वरच्या थरात थोडेफार अर्सेनिक असते ते पाण्यात विरघळून विहिरीच्या पाण्यात वरच्या भागात यायचे.त्याचा हवेतील ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन ऑक्सिडेशन प्रक्रिया घडून त्याचा गाळ विहिरीत खाली बसायचा. विहिरीचे पाणी भरताना बादलीला झटका देत वरच्या भागाचे पाणी बाजूला करून खालचे पाणी भरले की त्यात आर्सेनिक जवळजवळ नसायचे. (ज्यांनी पूर्वी पाणी विहीरीतून शेंदलेय त्यांना याचा अनुभव नक्कीच असेल अशा प्रकारे पाणी भरण्याचा,हो मी दररोज पहाटे ५ वाजता या पध्दतीने आडातून पाणी काढतो.) पण पाण्याची मागणी वाढत गेली.बोअरवेलची संख्या त्याचबरोबर खोलीही वाढत गेली तशी ही समस्या वाढत गेली.खोलवरच्या खडकातील बॅक्टेरीया अर्सेनिकच्या खनिजाचे विघटन करतात.ते बोरवेलमधील पाण्यात मिसळते. हे पाणी प्यायले की अर्सेनिकची बाधा होते.तसेच जनावरे व गाई हे पाणी पितात,त्यामुळे त्यांच्या दुधात आर्सेनिक असते.इतकेच काय त्यांच्या शरिरातही अर्सेनिक जाते,ते शेणात उतरते. त्याच्या गोवऱ्या जाळण्याने स्वयंपाकघरातील धुरातून आर्सेनिक फुफ्फुसात जाते.बोअरवेलचे पाणी शेतीला दिलेले असते काही वेळा भाताच्या ओंब्या लोंबत असतात त्या पाण्यात भिजत राहतात तेव्हा ही रसायने तांदळात शोषली जातात व भातातून आर्सेनिक पोटात,म्हणजे आर्सेनिक वगळून पाणी शुद्ध करून प्यायले तरी इतर अनेक माध्यमातून ते शरीरात जातेच.


अर्सेनिकमुळे तोंडाचा,आतड्याचा,फुप्फुसाचा, गुदद्वाराचा, किडनीचा कर्करोग होऊ शकतो. खूप गंभीर प्रकरण आहे हे आणि भारतातल्या बारा राज्यात याचा प्रभाव आहे.पण कोणत्याही सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नाही.काही प्रमाणात स्थानिक उपाय व काही प्रमाणात तंत्रज्ञान वापरून ऊर्ध्वम फाउंडेशनने राहुल बाकरे यांच्या नेतृत्वाखाली पर्याय शोधण्याचे प्रयत्न केले.पण समस्येचा घेरा मोठा आहे. एक दोन व्यक्ती,संस्था यांना खूप मर्यादा येतात. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य समजलेल्या व त्यावर उपाय झाले पाहिजेत यासाठी हे माहीत असलेल्या लोकांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी म्हणून राहुल यांनी एक दबाव गट तयार केला आहे.अनेक तंत्रज्ञ व तत्सम बुद्धीवादी लोकांना एकत्र केलं त्यासाठी,असाच विषय फ्लुराईडचा ! याचे प्रमाण पाण्यात जास्त झाले की हाडे वेडीवाकडी होतात,स्नायू कमकुवत होतात,जबडा वेडावाकडा होतो, रक्तवाहिन्या कडक होतात.भयंकर समस्या ! महाराष्ट्रातील सतरा-अठरा जिल्ह्यात आणि भारतातील नऊ दहा राज्यांत ही समस्या आहे. त्यावर दोन-तीन चांगले उपाय अवलंबले गेले. पारंपारिक उपायांबरोबरच किंवा नैसर्गिक संसाधने वापरण्या बरोबरच नवीन तंत्रज्ञान ही अवलंबले जात होते.शेवग्याच्या बियांची भुकटी, नारळाची राख व इतर तत्सम वनस्पतीजन्य पदार्थाच्या राखेतून पाणी गाळून घेतले की त्याचे प्रमाण कमी होते.


कर्नाटकात काही ठिकाणी वेगळा प्रयोग केला गेला यावर उपाय म्हणून घराजवळ टाक्या बांधून पावसाच्या पाणी साठवून त्या पाण्याचा वापर करणे तसेच घरावरील व शेतातील पावसाचे पाणी एकत्र करून ते भुजलात मिसळून व त्यातून फ्लोराईडचे पाण्यातले प्रमाण कमी करणे उपाय केले तसेच नवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन फ्लोराईडमोठ्या प्रमाणात असलेले खडक शोधून काढून तिथे बोरवेल घेण्यास मनाई करण्यात आली. तसेच जिथे फ्लोराइड युक्त खडक नाहीत अशा जागा निवडून,जिथे पाणी जास्तीत जास्त जमिनीत जिरवता येते तिथे पाणी जिरवण्याची व्यवस्था वाढवली. (याला खडक शास्त्रात व पाणी व्यवस्थापन शास्त्रात रिचार्जिंग झोन असे म्हणतात. ग्राउंड वॉटर रिचार्ज करते म्हणून रिचार्ज झोन!)


देशातील काही ठिकाणी या समस्येवर उपाय म्हणून ॲक्टिव्हेटेड ॲल्युमिनियम पद्धतीचा वापर केला गेला तर काही ठिकाणी मातीत चांदीचे नॅनो पार्टिकल टाकून त्याचे मटका फिल्टर्स बनवणे व त्या मार्गाने पाण्यात पाण्यातील फ्लुराइडचे प्रमाण कमी केले. हे आणि असे अनेक उपाय राहुल यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यांचे व्यवस्थित दस्तऐवजीकरण (डॉक्युमेंटेशन) करून ठेवले आहे.त्यामुळे पुढे अनेकांना या पर्यायांचा बिनधोक वापर करता येईल.


या कामाबरोबरच जलनिस्सारण व आरोग्य विषयावरही राहुलजींचे अर्ध्यमच्या माध्यमातून काम चालू होते.अनेक शौचालये बांधली दुर्गम अतिदुर्गम न शहरी भागात,पण त्याहीपेक्षा दोन महत्त्वाची दिशादर्शक कामे या विषयात राहुलजींनी केली.एक म्हणजे ड्राय टॉयलेटची मोठ्या प्रमाणात यशस्वी उभारणी आणि दुसरं म्हणजे मानवी मूत्राचा शेतीत उपयोग.ही दोन्ही कामे पाणी व जलनिस्सारण विषयात काम करणाऱ्यांसाठी दिशादर्शक कामे आहेत.


आपल्याकडे २००५ साली त्सुनामी नंतर तामिळनाडूमध्ये पर्यावरणस्नेही सार्वजनिक शौचालय बांधले गेले.त्याच प्रकारचे ही शौचालये भारतात अनेक ठिकाणी अर्ध्यमने उभारली. मानवी मल,मूत्र व पाणी यांना वेगळं करण्यासाठी टॉयलेटच्या भांड्याला तीन वेगवेगळी छिद्र पाडली जातात. मूत्र व पाणी एकत्र आल्यास जिवाणूंची वाढ होते,मिथेन वायू तयार होऊन दुर्गंधी येते. त्यामुळे दुर्गंध नाहिसा केला व त्यात पाणी जाऊ दिले नाही तर याचा युरीया तयार होतो. हा युरीया महिनाभर टाकीत साठवून ठेवला जातो.मल दुसऱ्या टाकीत साठवलं जातं. सहा महिन्यात याचं उत्तम कंपोस्ट तयार होतं,त्याला आपल्याकडे सोनखत म्हणतात. या सगळ्या अशा प्रकारच्या शौचालयाला ड्राय टॉयलेट्स म्हणतात.


'निसर्गाने प्राण्यांचे मल व मूत्रविसर्जन वेगळे राहवे ही रचना केलेली आहे,पण इथेही आपण निसर्गाच्या विरोधात जातो शक्य तिथे ड्राय टॉयलेट्स करायलाच हवेत कारण 'एक थेंब मैला हजार लिटर पाणी प्रदूषित करतो असे राहुलजी ठामपणे सांगतात त्यांच्यातील हा ठामपणे मला जीवनात ताठ उभा राहायल सांगून गेला.


भूजलाच्या सध्या परिस्थिती बाबत काही थोडंस .... आजमितीला भारतभर ज्ञात असलेल्या साडेचार कोटी बोअरवेलमधून पाणी उपसले जाते.१३० कोटी जनतेपैकी ८० टक्के जनतेच्या गरजा भूजलातून भागवल्या जात आहेत. त्यामुळे बेसुमार उपसा सुरू आहे.


सत्तरच्या दशकातील जमिनीखाली विस तीस फुटांवर मिळणारे पाणी आता दोनशे फुटापर्यंत ही मिळत नाही.देशभर खोल बोरवेल्स मारण्याची स्पर्धा सुरु आहे.महाराष्ट्रात विशेषता मराठवाड्यात पाचशे,हजार अगदी-बाराशे फुटांपर्यंत खोल जात आहेत पाणी मिळवण्यासाठी,पंजाब,हरियाणा या पाच नद्यांच्या प्रदेशातही भूजल संपत चालले आहे. तिथे भाताचेही पीक ते लोक भूजलावर घेत आहेत.पाण्याचा किती हा अपव्यय,शास्त्रज्ञांनी कार्बन कालमापन पद्धतीवर आधारित भूजलाची वय सांगण्याची पद्धत विकसित केली आहे. दोनशे फुटांवर मिळणारे पाणी दोनशे वर्ष जुने असते.त्याला जमिनीपासून खाली मुरत मुरत दोनशे फुटांवर जाण्यासाठी दोनशे वर्ष लागले आहेत. तसेच ८०० फुटावरचे पाणी आठशे वर्षांपूर्वीचे आणि बाराशे फुटावरचे पाणी बाराशे वर्षांपूर्वीचे आहे. पण आपण त्याचा उपसा काही महिन्यातच करून टाकतो.उद्या हे संपणार आहे. किंबहुना आकडेवारी सांगते आहे,की निव्वळ महाराष्ट्रात द्रवर्षी चाळीस हजारापेक्षा अधिक बोरवेल आटल्यामुळे निकामी होत आहेत...


खरेतर लोकांना जागे करण्यासाठी दोन महत्वाच्या विषयावर जनजागरण करणे खूप महत्त्वाचे आहे.आभासी पाणी (Water foot print) व पाण्याची उत्पादकता (Productivity of Water),भारताचा पाणी वापर हा शेतीत सर्वात जास्त म्हणजे पावसापासून मिळणाऱ्या पाण्याच्या ८५ ते ९० टक्के पाणी शेतीला वापरले जाते. पण पाण्याच्या उत्पादकतेत आपण प्रचंड मागासलेले आहोत. युरोपातला शेतकरी एक हेक्टर जमिनीतून साडेतीन लाख रुपये कमावतो तर आपला शेतकरी हेक्टरी फक्त नऊ हजार रुपये कमावतो. ही आकडेवारी २०१५ ची आहे.


... अजून कर्तुत्वाच्या गाथा पुढे सुरू आहेत.थोड्या थोड्या भागात त्या क्रमशः प्रकाशित केल्या जातील.

७/११/२२

५ नोव्हेंबर २०२२ या लेखातील पुढील भाग..

१९९०-९१ सालची गोष्ट. मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या BESE कंपनीला मुंबई जवळच औष्णिक विद्युत केंद्र सुरू करायचे तेव्हा उहाणूला ते करायचे ठरले. तिथे ५०० (२x२५०) मेगावॉटचा प्रकल्प उभारायचा होता... औष्णिक विद्युत केंद्राला कूलिंग टॉवरसाठी खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागते... या केंद्रासाठी कुलिंग टॉवरला लागणारे पाणी दरदिवशी २०० लाख लिटर लागणार होते.एवढे पाणी फक्त उपलब्ध होणार.. आणि ते समुद्रातच सोडू शकणार. त्यामुळे अर्थातच समुद्राचे पाणी घ्यायचे ठरले. पण समुद्राच्या पाण्यात खूप मोठ्या प्रमाणात असलेले क्षार आणि त्यातही मुंबई जवळ असल्यामुळे मुंबईचे सर्व प्रदूषित पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळलेले.त्यामुळे एक तर खूप मोठ्या क्षमतेचे पाणी उपसण्याचे पंप लागणार होते.म्हणजे १,७०० एच.पी.चा एक तसे चार पंप,तसेच प्रदूषित व खाऱ्या पाण्यामुळे नेहमीचा पोलादापासून बनवलेल्या पंपाला गंज लागणे,झीज होणे व इतर केमिकल्समुळे पोलाद खराब होणे,यातून तो वरचेवर खराब,नादुरुस्त होणे हे झाले असते. याला उपाय म्हणून स्टेनलेस स्टीलचे सगळे पार्ट बनलेला पंप बसवायला हवा होता.पण स्टील पंपाची किंमत खूप जास्त होती. शिवाय आहे तेवढ्या क्षमतेचा पंप किर्लोस्कर कंपनी काय,भारतात कोणी बनवला नव्हता.... किंवा बनवतही नव्हते... त्यामुळे आयात करणे हाच पर्याय होता... आयात केली तरी त्याची खात्री देता येत नव्हती, या पंपाच्या उभारणीसाठी BESE ने टेंडर मागवले.मोठ्या किमतींच्या किंवा खूप कौशल्याच्या कामाचे टेंडरसाठी दोन तीन टप्पे असतात. पहिला टप्पा असतो, 'प्रिक्वलिफिकेशन' म्हणजे 'पूर्व पात्रता',यात तुम्ही हे काम कसे करणार आहात,यातील तुमचा अनुभव, तंत्रज्ञान काय असणार आहे... या आणि अशा अनेक गोष्टी चर्चिल्या जातात. किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीने हे टेंडर भरायचे ठरवले. त्यासाठी अभियंत्यांची एक टीम निवडली गेली. त्यात रविंद्रजी ही होते... त्यांच्यापेक्षा अनेक अनुभवी अभियंते पण टीममध्ये होतेच.या सर्वांनी मिळून एक नवीन कल्पना मांडली.स्टेनलेस स्टीलच्या पंप ऐवजी काँक्रीटची बॉडी असलेल्या पंप तयार केला तर? अशा प्रकारचे अगदीच मोजके पंप जगात काही ठिकाणी वापरले जात असल्याचे त्यांना वाचून माहिती होते.एक-दोघांनी कॉन्फरन्समध्ये ही हे ऐकले होते. मग या टीमने त्यावर पूर्ण अभ्यास केला. त्याविषयी पुर्ण तंत्रज्ञान त्याच्या खाचाखोचा,आर्थिक गणिते यावर भरपूर परिश्रम घेतले. आणि या निर्णयावर आले की... आपण हे काँक्रिट वोल्युट पंप करू शकतो.आणि हे करायचेच... आपण भारतातला पहिला काँक्रीट वोल्युट पंप बनवू आणि कामही मिळवू.पूर्व पात्रता मीटिंगमध्ये किर्लोस्करच्या टीमने काँक्रीट वोल्युट पंप आणि त्यावर आधारित सर्व कामाची उत्तम मांडणी व सादरीकरण केले. BESE च्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे शंका समाधान केले. ही कल्पना व तंत्रज्ञान पसंत पडले. पण त्यांनी काम करण्याचा अनुभव असलेल्या कंपनीला बरोबर घ्या अशी अट घातली. त्यासाठी मग एका फ्रेंच कंपनी बरोबर करार झाला. तंत्रज्ञान पुरवण्याबाबत आणि स्पर्धेतून किर्लोस्कर कंपनीला हे काम देण्यात आले. काँक्रीट वोल्युट पंप KBL पहिल्यांदा करत होते, त्यामुळे या टीमला धाकधूक होती.पण गेली अनेक वर्षे पंप बनविण्यातून आत्मविश्वास ही होता.या साईटवर काम सुरू करून पूर्णत्वाला नेण्यासाठीच्या टीममध्ये रविंद्रजी यांची नेमणूक झाली होती.


हा काँक्रीट वोल्युट पंप काय आहे?


पोलादाचा पंप समुद्राच्या किंवा प्रदूषित पाण्याने गंजतो. त्याला भरपूर सुट्या भागांनी जोडावे लागते तेही गंजतात, वारंवार बदलावे लागतात. तसेच त्याला व्हायब्रेशन्स ही खुप येतात. ते टाळणे जवळजवळ अशक्य आहे. गंजण्यावर पर्याय म्हणून स्टेनलेस स्टील किंवा तत्सम मिश्र धातूचे पंप बनवणे हा पर्याय असतो.पण तुलनेने ते खूप महाग पडतात. त्याबरोबर व्हायब्रेशन त्यांना ही टळत नाही.त्यातून दुरुस्ती व स्पेअर पार्टचा खर्च स्टेनलेस स्टीलमुळे आणखीनच महागडा होतो.तसेच पंप नादुरुस्त झाल्यावर काम बंद पडू नये म्हणून राखीव पंपांची ही सोय ठेवावी लागते.हा अधिकचा खर्च असतो. याला पर्याय पंपाचा गाभारा म्हणजे केसिंग म्हणूया, बॉडी म्हणूया,तो भाग पूर्ण काँक्रीटचा बनवायचा अशा प्रकारची ती रचना असते. पोलाद किंवा स्टेनलेस स्टील ऐवजी काँक्रीटची बॉडी असल्याने गंजणे होतच नाही. तसेच अनेक सुट्टया भागांना सुट्टी मिळते या रचनेमध्ये. हा पंप M २५ ग्रेडचे काँक्रीट वापरून केलेला असतो. अगदी भूकंपप्रवण किंवा अशीच खास गरज असेल तरच M ४० काँक्रीटचा असतो. (आपल्या सामान्य इमारतीसाठी वापरले जाणारे काँक्रीट M १५ ग्रेडचे असते) M २५ ग्रेडमध्ये M १५ पेक्षा सिमेंटचे प्रमाण अधिक असते.


हे कॉक्रिट वोल्युट पंप बनवताना खूप आव्हानात्मक असतो तो भाग म्हणजे त्याचा साचा बनवणे... इंजिनिअरिंगच्या भाषेत याला फॉर्मवर्क असे म्हणतात.त्या पंपाच्या काँक्रीटसाठीच्या साच्या बनवताना सर्व मापे मायक्रोनपर्यंत (म्हणजे मिलिमीटरचा दहावा भाग) तंतोतंत पाळावे लागतात.सर्व प्रक्रियेत हे साध्य करणे इंजीनियरिंग व फॉर्मवर्क करणारे कारागीर यांचा खूप कस लावणारे काम आहे. काँक्रीट पंपाचे आयुष्य कमीत कमी पन्नास वर्षे असते किंबहुना त्यापुढेही ते चालू शकतात. इतके मोठे पोलाद किंवा स्टेनलेस स्टीलचे पंप खूप थोड्या ठिकाणी बनवतात,त्याच्या बाकीच्या ॲक्सेसरीज बाबतही तेच,शिवाय,त्याचा आयात खर्च, वाहतुकीचा खर्च,वाहतुकीतील सुरक्षा, वेगवेगळे कर अशा सगळ्यांचा विचार करता काँक्रीट वोल्युट पंप सर्व बाजूंनी सरस आहे.


भारतातला हा सर्वात मोठा पंप असणार होता; ९० च्या दशकात आणि पहिलाच पंप असणार होता. काँक्रीट वोल्युट पंप हा पंप दर तासाला दोन कोटी साडेसात लाख लिटर पाणी खेचून २० मीटर उंचीवर नेऊन सोडतो. हा पंप आजही उत्तम चालू आहे.विनातक्रार ! हा पंप बसवण्याचे ठरल्यापासून त्याचे तंत्रज्ञान समजून घेणे; त्याचे प्रशिक्षण,त्यावरची साईटवरती प्रत्यक्ष काम करताना करावे लागणारे किरकोळ बदल, हे काम पूर्ण करून घेऊन प्रत्यक्ष पंप चालू करण्यापर्यंतची सर्व जोखीम व जबाबदारी टीमनी उचलली होती.पहिल्या पंपाची यशस्वी निर्मिती झाल्यावर पुढे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या कंपनीने हे पंप वापरता येईल का याबद्दल विचारणा केली. ही जगातली पाचव्या क्रमांकाची वीज निर्मिती करणारी कंपनी आहे. सर्व मिळून ही ६० हजार मेगावॉट इतकी वीज बनवते.भारताच्या गरजेच्या ४० टक्के वीज ही कंपनी बनवते. त्यांच्याकडे ही पहिल्या प्रकल्पात यशस्वी झाल्यावर अनेक प्रकल्पात एनटीपीसीने अधिक मोठ्या क्षमतेची ही कॉक्रीट वोल्युट पंप वापरले.अर्थातच ते सर्व किर्लोस्कर कंपनीने उभारले. पहिला पंप बसवून २७ वर्षे झाली. त्यांच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार नाही.


सौराष्ट्र सब कॅनॉल यशस्वी कहाणी 


या काँक्रीट वोल्युट पंपाची कीर्ती वाढत होती आणि यशस्वीताही... १९९४ मधली गोष्ट, पंडित नेहरूंनी कोनशिला बसवलेल्या आणि अनेक वर्षे काम चाललेल्या सरदार सरोवर धरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होत आले होते. त्या प्रकल्पाचे कॅनॉल बांधकाम सुरू होते. हा कॅनॉल सरदार सरोवरपासून सुरु होवून,पूर्ण गुजरात व राजस्थानातून तो जैसलपरपर्यंत जातो. त्याची लांबी ५४३ किलोमीटर आहे.याचा सब कॅनाल सौराष्ट्राला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधला आहे.आत्ताचा सौराष्ट्राचा भूभाग लाखो वर्षापूर्वी समुद्रातील एक बेट होते. पृथ्वीच्या पोटातील हालचालींमुळे पुढे हे बेट भारतीय उपखंडाला येऊन चिकटले. त्यामुळे सौराष्ट्राच्या रचना बशीसारखी आहे. सीमेवर उंचवटा व मध्यवर्ती भाग खोल गेला आहे. तीन कोटी लोकसंख्या असलेल्या सौराष्ट्रात पाऊस खूप कमी पडतो.सौराष्ट्रात कोणतीही नदी वाहत नाही. फक्त खोलगट भागात मध्यवर्ती ठिकाणी नळ सरोवर आहे. पण जमीन मात्र खूपच उपजाऊ. भुईमूंगाच्या उत्पन्नासाठी तर अतिउत्तम... पण पाणी नाही... त्याचबरोबर खाद्यतेल व्यापार सौराष्ट्रात मोठा! तेथील तेल व्यापारी आणि सौराष्ट्रातील राजकीय लॉबी गुजरातच्या राजकारणावर पकड ठेवून असते... त्यामुळे आर्थिक आणि राजकीय दृष्टीने सुद्धा सौराष्ट्राला पाणी पोहोचवणे सर्व विपरीत परिस्थितीत सुद्धा आवश्यक बनले होते. सरदार सरोवर ते सौराष्ट्रपर्यंत पाणी उताराने जाऊ शकत नाही अशी नैसर्गिक परिस्थिती आहे. त्या अर्थाने विपरीत परिस्थिती! पाणी सौराष्ट्राला पुरवायचे,पण कसे हे तंत्रज्ञ अभियंत्यांना हे मोठे आव्हान होते. त्यावर उत्तर शोधले होते ते असे कि,सरदार सरोवर ते गांधीनगर जवळ कडी गावापर्यंत पाणी उताराने आणले जाईल... हे पाणी उपसा जलसिंचन पद्धतीने पाच टप्प्यात सौराष्ट्रात पोचवायचे. प्रत्येक टप्प्यावर पाणी तलावात न सोडता कॅनॉलमध्ये सोडायचे. तेवढ्या काही अंतरात कॅनलची रुंदी व थोडी खोली वाढवायची. उपसा सिंचन योजना. त्यात पाणी पोहचवायचे आहे ७० किलोमीटर ह्या अंतरावर सत्तर मीटरवर चढवायचे आहे! चक्क दर सेकंदाला सहा लाख तीस हजार लिटर पाणी ७० मीटर उंचीपर्यंत पोचवायचे होते. खूप खूप आव्हानात्मक काम होते. यासाठी गुजरातच्या शासकीय अभियंते व प्रकल्प सल्लागार यांनी नेहमीचे हजारो पंप बसवण्यासंबंधी आराखडा बनवण्याचे चालले होते.पण किर्लोस्कर कंपनीने यात काम करायचे ठरवले.१०० सामान्य पंपाच्या जागी एकच कॉंक्रीट व्हॉल्यूट पंप बसवून हे काम करता येणे शक्य आहे. हे कंपनीच्या अभियंत्यांनी गुजरातच्या अभियंत्यांना व प्रशासनाला अशी कल्पना दिली. कंपनीच्या टीममध्ये रवींद्रजींना परत मध्यवर्ती भूमिका मिळाली. त्याची कारणे दोन तीन महत्त्वाची. म्हणजे काँक्रीट वोल्यूट पंपाची डिझाईन व उभारणी करण्याचा अनुभव आणि दुसरे म्हणजे रवींद्रजींना येत असलेली गुजराती भाषा, गुजराथमध्ये शिक्षण झाल्यामुळे अस्खलित आणि गुजराथ्यांच्या लहेजात! काही तांत्रिक आणि इंजिनिअरिंग सर्व सादरीकरण व पत्रव्यवहार गुजरातीतच करावा लागायचा... त्यामुळे तिथेही रविंद्रजी असायचे. असो. पुढे किर्लोस्कर कंपनीला हे काम मिळाले. 


या प्रकल्पाद्वारे पाणी आता पाच टप्प्यात उचलले गेले. प्रत्येक टप्प्यावर कॅनॉलची एक शाखा सिंचनाच्या पाण्यासाठी तर एक शाखा पिण्याच्या पाणी पुरवण्यासाठी काढण्यात आली. पिण्याच्या पाणी पुरवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकी चार पंप बसवण्यात आले. ज्याची पाणी घेण्याची क्षमता प्रतिसेकंद पाच हजार लिटर इतकी होती. म्हणजे प्रत्येक सेकंदाला चार पंप मिळून वीस हजार लिटर पाणी खेचत असतात. तर शेतीसाठी जी सिंचन आहे,त्यासाठी पहिल्या टप्प्यावर १९ पंप असे आहेत की,त्यांची प्रत्येकाची पाणी खेचण्याची क्षमता प्रत्येक सेकंदाला २० हजार लिटर आहे. (म्हणजे एकूण पाणी खेचण्याचा ३ लाख ८० हजार लिटर प्रति सेकंद) हे पाणी पुढे कॅनॉलमध्ये पडणार पुढे १२ किलोमीटर वाहात जाणार त्यातले काही पाणी ठिकठिकाणच्या फाट्यावरून सब कॅनॉलमध्ये जाणार व ते शेतीसाठी वापरले जाणार... तसेच दुसऱ्या टप्प्यावर १५ पंप तिसऱ्या टप्प्यावर १५ पंप चौथ्या टप्प्यावर ८ पंप व शेवटच्या टप्प्यावर ८ अशा प्रकारची रचना केली आहे.


काम वेगाने पूर्ण करून पहिल्या पंपिंग स्टेशनच्या सर्व टेस्टिंग पार पाडल्यानंतर २२ मार्च २००७ ला जागतिक जलदिनाला त्याचे उद्घाटन केले गेले.पाच हजारांपेक्षा अधिक लोक तिथे उत्सव साजरा करण्यासाठी जमले होते. रविंद्रजी व त्यांच्या टीमची गावकऱ्यांनी या निमित्ताने मिरवणूकही काढली... हे काम मिळाले तेव्हा किर्लोस्कर कुटुंबाने ह्या कामाबद्दल सर्व टीमचा घरी सत्कार समारंभ ठेवला. कौतुकही केले.... पाणी सौराष्ट्रात पोचले. ढोलीधजा धरणात पाणी पोहचले... बारा वर्षांनी धरणात पाणी आले होते... यापूर्वी तर धरण भरलेले पाहिल्याचे कुणालाच आठवतही नव्हते.... पण या पाण्याने मात्र ते पूर्ण भरले. या प्रकल्पामुळे सौराष्ट्राची खूप जमिन ओलीताखाली आली आहे.


ही कथा होती जळासी चालविता रवींद्र उलंगवार यांची या ठिकाणी हेन्री डेव्हिड थोरो यांचे वाक्य बरचं काही सांगून जाते.


'स्वतःच्या जीवनाचा स्तर स्वतःच्या मेहनतीने उंचावण्याची निर्विवाद योग्यता माणसाजवळ आहे. यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट मला माहीत नाही.'



लोकांना मदत पुरवणे हा परोपकाराचा भाग नसून तो त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे मिळणारी मदत व सुविधा या चांगल्या दर्जाच्या व त्यांचा आत्मसन्मान येणाऱ्या हव्यात आहे त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. असे महत्त्वाचे सूत्र सांगतात.


'आपत्तीतील आधार - ॲक्वाप्लसचे राहूल पाठक 


जगात कुठेही वादळ, महापूर, भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध, दंगली, समूहाची स्थलांतरे यासारखी मानवनिर्मित आपत्ती येतात,तेव्हा प्रचंड नुकसान होते. सर्वात जास्त समस्या उभी राहते पिण्याच्या पाण्याची... कारण अशा वेळी पाण्याचे सर्व स्त्रोत एक तर त्यांची मोडतोड झालेली असते किंवा त्याहीपेक्षा पाणी सर्वत्र घाण झालेले असते. मग लोक,स्थानिक यंत्रणा, शसरकार यांच्या माध्यमातून कुठेतरी आश्रय घेतात. या आपत्तीनंतर अधिक मोठी आपत्ती येते ती साथीच्या रोगांची! दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची साथ येऊन तेथील शेकडो-हजारो लोक रोगग्रस्त होतात.अशा वेळी जवळपास कुठेतरी उपलब्ध असलेले पाणी त्यांना पुरवले जात असते.तेही अपुरे असते,त्यात शुद्ध करण्यास वेळही नसतो,यंत्रणाही नसते. त्याबद्दल काही माहितीही नसते. अशा परिस्थितीत मिळेल ते पाणी मिळेल तसे द्यावे लागते. यातून अनेक लोक बळी पडतात,अधू होतात. समस्यांची मालिका सुरूच राहते. यासाठी आरोग्य यंत्रणा आणि इतर सरकारी यंत्रणेवर सुद्धा खूप ताण येतोच आणि यंत्रणा तोकडी पडते.तसेच त्यानंतर तो पाणीपुरवठा स्वच्छ व सुरळीत होण्यासाठी शहर असो वा गाव पुढील काही आठवडे कधीकधी महिने लागतात. ही आपत्तीनंतरची आपत्ती अधिक आव्हानात्मक असते.


पण आपत्ती व्यवस्थापनात लगेचच पाणी शुद्ध करून देणारे तंत्र मिळाले,सहज हाताळता येणारे उपकरण / यंत्र / संयंत्र मिळाले तर पुढच्या अनेक समस्या निर्माणच होणार नाहीत. याबद्दलचे विचार आणि कृती निदान भारतात तरी पहिल्यांदा कुणी केली असेल तर राहुल पाठक यांनी केली.ॲक्वाप्लस या कंपनीद्वारे आपत्तीग्रस्तांच्या समूहासाठी कुठेही घेऊन जाता येण्यासारखा,कुणालाही सहज जोडणी करता येऊ शकणारा आणि मुख्य म्हणजे कोणतीही किंवा इंधन न लागता मनुष्यबळावर सहज चालवणारा,तासाला सातशे लिटर ते पाच हजार लिटर पाणी शुद्ध करणारा मोबाईल फिल्टर त्यांनी सर्वप्रथम बनवला. त्या माध्यमातून पंधरा सोळा वर्षात कोट्यवधी आपदग्रस्तांना शुद्ध पाणी मिळण्याची सोय केली... मळलेल्या सोडाच कुठल्याशा पायवाटेवरूनही न चालता पहिल्यापासूनच स्वतःची वाट निर्माण करून त्याचा महामार्ग,राजमार्ग करणारे राहुल पाठक हे व्यक्तिमत्व इंग्रजीत याला आऊट ऑफ बॉक्स थिंकींग म्हणतात,तसं कायम विचार करणारे... पाण्यासारखं प्रवाही... खळखळणारं नितळ मन... प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाण्याची आणि काहीही करताना अत्युच्च गुणवत्तेची कास धरणारी ही व्यक्ती.... त्यांच्या कामाची सुरूवातच १९९४-९५ मध्ये झाली घरात वापरण्याच्या वॉटर फिल्टरच्या मार्केटिंगपासून ते अगदी ठरवून मार्केटिंग शिकले... तेही फिल्टरचे..!


पुढचा टप्पा ठरवलेला होताच,फिल्टर बनवण्याचा पुढे लवकरच फिल्टर बनवायला केली ही.पण घरातले फिल्टर न बनवता मोठे फिल्टर करायचे ठरवले.घरात सुरु वापरायचे फिल्टर आणि मोठ्या प्रमाणात पाणी शुध्द न् निर्जंतूक करणारे फिल्टर यांच्या तंत्रज्ञानात फरक होता.नुकतेच बाजारात मेम्ब्रेन फिल्टरचा वापर मोठ्या प्रमाणात या पाणी शुद्धीकरणासाठी होता. म्हणजे थोडक्यात मिनरल वॉटर बाटलीत मिळू लागलं होतं ना त्यावेळी त्या मिनरल वॉटर प्लांटमध्ये लागणारे फिटर्स ते पाठक बनवू लागले.


आता मग त्यातून इतर लोक हे फिल्टर बनवत आहेत ना, मग आपल्याला वेगळं काहीतरी केलं पाहिजे... हे वेगळे काहीतरी डोक्यात घेणे हा त्यांचा स्थायीभाव! आजही तो कायम डोकावतोच कुठेना कुठे.


तर वेगवेगळ्या काही ना काही करण्याच्या विचारांमध्ये त्यांनी या वॉटर फिल्ट्रेशन या क्षेत्रात दोन वाटा सुरू करून त्यांचा महामार्ग केला.


पहिली वाट निवडली मोबाईल वॉटर फिल्टर बनवायची..कुठेही घेऊन जाता येईल असा वॉटर फिल्टर. त्यांनी त्यादृष्टीने काम सुरू केले आणि तो बनवला देखील. अर्थातच मेम्ब्रेन फिल्टर !!


मेम्ब्रेन फिल्टर म्हणजे एक पातळ कागदासारखी दिसणारी गाळणी. याची छिद्र इतकी बारीक असतात की त्यातून बॅक्टेरिया पण जाऊ शकत नाही. इतकंच काय पण पाण्यातील क्षारांचे रेणू सुद्धा जाऊ शकत नाही इतकी सूक्ष्म छिद्र असलेली चाळणी म्हणजे मेंब्रन फिल्टर या फिल्टरमधे साधारण तीन प्रकार असतात. 


१) मायक्रोफिल्ट्रेशन ०.०२

मायक्रॉन यातून मातीचे कण व बॅक्टेरिया गाळले जातात.


 २) अल्ट्राफिल्टरेशन । मायक्रॉन यातून मातीचे कण,बॅक्टेरिया व व्हायरस गाळले जातात.


 ३) नॅनोफिल्ट्रेशन साईज ०.००१ मायक्रॉन यातून निवडक मिनरल्स गाळले जातात. 


४) रिव्हर्स ऑस्मॉसिस (आर.ओ.) यातून ९९ टक्के क्षार गाळले जातात. 


कुठल्याही आपत्तीत जमिनीवरचे पाणी दूषित होते, मुख्यतः त्यामुळे क्षारयुक्त पाण्याचा संबंध नसल्याने या मोबाइल फिल्टरमधे अल्ट्रा फिल्ट्रेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये २००५ मध्ये भूकंप झाला होता.त्यांच्या कंपनीने त्वरित तिकडे

संपर्क साधला तर तेथील सर्व आपत्ती व्यवस्थापन भारतीय लष्कर सांभाळत होते. पाठक त्यांच्यापर्यंत पोहोचले.आम्ही व आमची कंपनी आपल्याला मोबाईल फिल्टर देतो,दान करतो पण तो तिकडे वापरा अशी विनंती केल्यावर लष्करी अधिकारी शाशंक मनाने तयार झाले.कारण असा मोबाईल फिल्टर भारतात पहिल्यांदाच बनला होता... पहिल्यांदाच उपलब्ध होता. तो प्लांट भारत पाकिस्तानच्या सीमेवरील उरी येथे बसवला गेला जिथे भारतीय लष्कराचा तळ आहे.लष्करी तळाबरोबरच उरी व टंगधार गावातील व परिसरातील लोकांना शुद्ध निर्जंतुक पाणी आपत्तीनंतर उपलब्ध झाले. हा दोन गोष्टींसाठी पहिलाच अनुभव होता एक म्हणजे Aqua Plus कंपनीचा हा पहिलाच आपत्तीनंतर ताबडतोब प्रतिसाद आणि दुसरे म्हणजे पहिल्यांदाच मोबाईल फिल्टर्स वापरला जात होता. हा मोबाईल फिल्टर प्लांट तिथे उरीला बरेच दिवस होता.


दरम्यान अनेक संस्था तिथे उरीला आपत्ती व्यवस्थापनात लष्कराला मदत करत होत्या. पैकी REDR (Ragistered Engineers for Disaster Relief) ही व्यावसायिक अभियंत्यांची अशी संघटना जे आपत्तीत आपली व्यावसायिक स्वयंसेवक म्हणून सेवा देतात. या जगव्यापी आपत्ती व्यवस्थापनात प्रसिद्ध असलेल्या संस्थेच्या नजरेस हा फिल्टर आला. ही संस्था आपत्ती व्यवस्थापनात विविध कामे करते. पण मुख्यत्वे दोन प्रमुख कामे करते. 


१) आपदग्रस्तांना आपत्तीस तोंड देण्यास सक्षम करण्यासाठी विविध कौशल्य विकास उपक्रम आणि 


२) या व्यवस्थापनात उपयोगी ठरणाऱ्या विविध वस्तू,सेवा,संस्था,त्याला अर्थसहाय्य करणारे विविध घटक इत्यादी सर्व गोष्टींची माहिती मिळवते व त्यांची माहिती जगाला उपलब्ध करण्यासाठी नोंदी ठेवते.पूर्वी रजिस्टरच्या स्वरूपात तर आता पोर्टलच्या स्वरूपात नोंदी ठेवते. थोडक्यात सर्वंकष माहिती संकलन !!


त्यांनी REDR च्या माहिती यादीत हा फिल्टर नोंदवला. पुढे ती माहिती वॉटर अँड सॅनिटेशन यात काम करण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या OXFAM कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पहिली. त्यांनी लगेच फिल्टरची ऑर्डर दिली. त्यांनी ० ते ४,००० लिटर प्रति तास इतके शुद्ध पाणी देणाऱ्या फिल्टरची ही मागणी केली. ह्या राहुल पाठक यांच्या  Aqua Plus कंपनीने तो बनवला.


या यशाबद्दल राहुल पाठक सांगतात,जगात सर्वात अवघड काय आहे? तर सर्वात सोपी सुविधा निर्माण करणे.फिल्टरच्या बाबतीतही आम्ही ते करताना १२ ते १४ वर्षे सतत उत्तमोत्तम गोष्टींचा ध्यास घेतला आणि जागतिक दर्जाचा सर्वसामान्य उपयोग होणारा प्रॉडक्ट तयार झाला.


शिक्षक दार उघडून देतो. पण आत प्रवेश तुम्हालाच करावा लागतो.एक चायनीज म्हण..!


... अजून कर्तुत्वाच्या गाथा पुढे सुरू आहेत.थोड्या थोड्या भागात त्या क्रमशः प्रकाशित केल्या जातील.


विजय कृष्णात गायकवाड

५/११/२२

३ नोव्हेंबर २०२२ या लेखातील पुढील भाग..

पाण्याला नवजीवन देणारं दांपत्य संदीप जोशी व सायली जोशी यांचे चरित्र समजून घेत असताना,मला एक बोधकथा आठवली.


ज्यांचा सत्यावर विश्वास आहे ते साधे सरळ आणि महत्त्वाचे सत्य या बोध कथेत मांडले आहे.


 एक म्हातारा माणूस त्याच्या नातवाला म्हणतो - 


" माझ्या मनात सदैव एक लढा चाललेला असतो.या भयंकर लढाईत दोन लांडगे लढत असतात. त्यातला एक लांडगा असतो दुष्टस्वभावी म्हणजे संतापी,हावरा,मस्तरी,उध्दट आणि भ्याड,तर दुसरा असतो सुष्टस्वभावी म्हणजे शांत,प्रेमळ,विनम्र,उदार प्रामाणिक आणि विश्वासू ! हे दोन लांडगे तुझ्याही मनात आणि सर्वच माणसांच्या मनात लढत असतात."


क्षणभर विचार करुन नातवाने विचारलं, 

" त्यातला कुठला लांडगा जिंकणार ? "

त्यावर म्हातारा हसून म्हणाला,

 " तु ज्याला खाऊ घालशील तो जिंकणार..!


पाण्यामुळे जीवसृष्टी आहे. पाणी जीवन देते व तेच जीवन आहे. पण पाणी जेव्हा प्रदूषित होते, पाणी मृत होते,त्या मृत पाण्याला नवजीवन संदीप व सायली जोशी देतात. शअगदी काव्यमय आणि अद्भुत वाटावे असेच हे आहे. निसर्गालाच जागृत करून त्याच्याकडूनच प्रदूषण निर्मूलन करण्याची प्रक्रिया करवून घेण्याचे तंत्रज्ञान भारतात जोमाने सुरू करणारे जगभरात प्रसिद्ध पावलेले हे दांपत्य आहे.


ही महान कथा सुरू होते धुळ्यातील बंगल्यामधील एका खोलीत सुरु झालेल्या ऑफिसमध्ये आणि व्हाया पुणे ती देशापरदेशांतून प्रवास करून दिल्लीतील गंगा शुद्धीकरण मंत्रालयापर्यंत पोहोचते... पुन्हा तिथून निघून ती पसरतच आहे,भारतभर....


नदी टप्प्याटप्प्याने शुद्ध होत चालली आहे... त्यात जिवांची निर्मिती होताना दिसते आहे... तेव्हा हे पती-पत्नी सहजच म्हणतात 'आम्ही नदीला आई होताना पाहत भारावून गेलो होतो.'


कुठल्याही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदेपासून सर्वोच्च सरकारी ऑफिसला एक वाक्य ते नेहमी ऐकवणार...'माझ्या देशातल्या नद्या मला शुद्ध करायच्या आहेत,ते माझे जीवनध्येय आहे!!' संदीप जोशी आणि सायली जोशी यांनी बायो रेमेडियल पद्धतीने दूषित पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करण्याच्या प्रक्रिया अनेक ठिकाणी राबवल्या.


दूषित पाणी नैसर्गिक पद्धतीने आणि प्रक्रियेने शुद्ध करतात.नेहमीच्या ट्रीटमेंट प्लांटच्या फक्त पाच ते सात टक्के रकमेत,त्यातही त्याला ना कधी ऊर्जा लागते ना देखभाल खर्च ना मनुष्यबळ !! हिरो होंडाची जाहिरात आठवते ना 'फिल ईट फरगेट इट...' तसंच बॅक्टेरिया काम करतच राहतात...


संदीप जोशी ह्या धुळ्याच्या तरुणाने पुणे विद्यापीठातून परिसर विज्ञान (एनवायर्मेन्ट सायन्स) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्याच विषयात काम सुरू केले, तो काळ होता १९९१ चा,विविध कारखान्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे पारंपरिक पद्धतीचे इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटची प्रक्रिया व त्यांचे डिझाईन विकसित करणे असे काम सुरू केले होते. ते नोकरी करत असलेल्या सल्लागार कंपनीच्या वतीने अनेक खासगी कंपन्यांना डिझाईन देणे सुरू होते,पण त्यात त्यांना काही फार दम वाटत नव्हता. बऱ्याचदा करूनही या कामचलाऊ कामाविषयी त्यांना आस्था नव्हतीच. एक गोष्ट सतत अंतर्मनात बसली होती.... बायो रेमेडियल ट्रीटमेंट !! हीच शाश्वत प्रक्रिया व पद्धत आहे, आपण यातच काम करायचे.वेळ लागेल ही पद्धत लोकांना स्वीकारायला,पणआपण हेच करू..


विविध कंपन्यांशी संपर्क करून ते नेहमी सांगायचे,की आम्ही बीआरटी करून देऊ, कमी खर्चात प्रभावी उपाय होईल.दरम्यान १९९४ मध्ये त्यांनी एका आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिला शोधनिबंधही वाचला.त्याच वर्षी त्यांचे सायलीजींशी लग्न झाले. तशी ही दोन्ही कुटुंबे धुळ्यातील एकमेकांचे कौटुंबिक मित्रच, सायलीजीही मायक्रोबायोलॉजी गरवारे कॉलेज (पुणे) मधून झालेल्या... १९९४ ला एमएस्सी झाले आणि त्याच वर्षी त्यांचे लग्न झाले. दोघांचे शिक्षण एकमेकांना पूरक होते.


त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा धुळ्यातील बंगल्याच्या खोलीतून केला. ज्ञान हेच भांडवल!


जळगावला कल्याणी ब्रेकचे एक युनिट होते. तिथे संदीपजींचा मित्र होता नोकरीला त्याच्या ओळखीने प्लांट हेड एस. आर. कुलकर्णी यांच्यापर्यंत ही संकल्पना पोहोचली.त्यांनी, 'चला बघू तर खरं' म्हणून पहिली ऑर्डर संदीपजींच्या हातात दिली.ते युनिट होते,

इलेक्ट्रोप्लेटिंगचे,यात सांडपाणी खूपच दूषित तयार होते.यावरची दूषित पाण्यावरची पारंपरिक ट्रीटमेंट तर खूप महागडी असते.त्यामुळे पाणी शुद्ध करण्याच्या पाठीमागे कोणीच लागत नव्हते. (अन् आपल्या देशात तेव्हा व आताही कोणत्याही प्रदूषणाबाबत काही फिकीर बाळगायची रितच नाही.) काम केले त्या प्रदूषित पाण्यावर प्रक्रियेचे पहिल्याच व्यावसायिक कामात यशही मिळाले. इलेक्ट्रोप्लेटिंगच्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये मायक्रोब्ज जगू शकणार नाहीत,कारण त्याच्यात खूप हेवी मेटल असतात,अशी शंका असल्याने हा प्रयोग कितपत यशस्वी होतो,याबद्दल अनेकजण साशंकच होते.पण त्यांनी हा प्रयोग यशस्वी केला.जळगावच्या प्लांटमध्ये त्यांनी रोज तयार होणाऱ्या ६० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून दाखवली.ही यशस्विता झाल्यावर लगेच त्याच कंपनीच्या चाकणच्या प्लांटच्या प्रक्रियेचे काम मिळाले. मग काय 'पाऊले चालती पुण्याची वाट' चाकणचे कामही पूर्ण यशस्वी झाले. दोन्ही कामे खूप कमी पैशात झाली होती.कंपनीचे लोक काही काळ साशंक होते,पण हे दांपत्य निश्चिंत होते. 'बायोरिमिडील ट्रीटमेंट' चे हे पहिले पाऊल त्यांचेच... पाऊलवाट त्यांचीच... आणि गेल्या पंचवीस वर्षांच्या परिश्रमाने,साधनेने त्यांचा राज्य महामार्गही त्यांनीच केला.


या यशस्वीतेतून पुढे कामे मिळत गेली. बऱ्याचदा पुणे आणि बाहेरील विविध कंपन्यांचे सांडपाणी ते आपल्या पत्त्यावर मागवायचे, प्रयोगासाठी. हे कॅन पत्त्यावर त्यांच्या घरी आणि ऑफिसला पोहोचायचे कुरीयर,ट्रान्सपोर्टने हे सांडपाणी हीच संपत्ती,कारण ते प्रयोगाचे मटेरिअल.

त्यावर विविध प्रयोग सुरू,त्यातून त्यांनी अनेक प्रक्रिया व अनेक उत्तरे तयार केली. यातूनच एखादा शोधनिबंध तयार व्हायचा. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कारखान्यात कामे होत होती,पण अनेक कामे प्रदूषण मंडळाची मान्यता किंवा सरकार मान्यता या मुद्द्यांवर हातची जायची. खूप खंत वाटायची त्यांना.पण फिल्डवर यश आणि यशच मिळताना मात्र त्यांचा आत्मविश्वास वाढत होता.खरंतर त्यांनी भर दिला होता संशोधनावर,त्यांनी संस्था जी स्थापन केली तिचे नावच मुळी 'सृष्टी एन्व्हायरमेंटल रीसर्च इन्स्टिट्यूट',हिचे मुख्य ध्येय नैसर्गिक पद्धतीने सांडपाणी शुद्धीकरण! ट्रीटमेंट प्लांट व त्यातील रासायनिक प्रक्रिया यांना खूप मर्यादा आहेत व त्या खूप खर्चिक आहेत.त्यात ऊर्जेचा वापर मोठा असतो आणि इतके सगळे असूनही त्यातून बाहेर पडणारे पाणी तितकेसे निसर्गाला अनुकूल नसते.ते प्रदूषित राहते.याउलट 'सृष्टी' किंवा 'सेरी' प्रत्येक इकोसिस्टीमला तिच्या कमतरता भरून काढण्यासाठी तेथील परिस्थितीप्रमाणे उत्तरे शोधायची असतात,अशी संकल्पना मांडत होती. प्रत्येक ठिकाणी नव्याने शोध घेणे व त्या पद्धतीने तेथे पर्याय देणे हे त्यांना सांगायचे होते. पण सरकारदप्तरी याची माहिती असलेले लोक नव्हते व त्यांची नवीन ऐकून घेण्याची मानसिकता नव्हती. काही ऐकायचा किंवा समजून घेण्याचा त्यांना धीर नव्हता आणि इच्छा ही नव्हती. हे सर्व नवीन तंत्रज्ञान होते आणि यात प्रमाणीकरण (Standerdisation & Formulation) असे काही अजून झालेले नव्हते. राजमान्यता नसल्याने चांगला परिणाम मिळत असूनही बरेच इंडस्ट्रीतले लोक हे तंत्रज्ञान स्वीकारायला तयार नव्हते..


त्या काळात १९९८ मध्ये पुण्यात इलेक्ट्रोप्लेटिंगची जवळपास ८० छोटी मोठी युनिट्स होती. त्यांना अनेकांना प्रदूषण मंडळाच्या पाण्याविषयीच्या नोटिसा आल्या होत्या. त्यापैकी एका युनिटला 'सृष्टी'ने ट्रीटमेंट प्रोसेस उभी करून दिली.अगदी जळगावला मिळाले तसेच परिणाम मिळाले.सर्वांना दिसले की प्रक्रिया यशस्वी होते आहे. त्याला खर्च आला होता उणेपुरे पाच हजार रुपये !!


 सर्व इलेक्ट्रोप्लेटिंग युनिट मालकांचे ठरले, की हा प्रक्रिया प्लांट आपल्याकडे बसवायचा,सर्व बोलणी झाली. सर्व प्लांटला बी.आर.टी. बसवायचे ठरले.त्यांच्या असोसिएशनच्या वतीने बोलणी झाली,पण एमपीसीबीने सांगितले, की आम्ही ही ट्रीटमेंट मान्य करणार नाही. कारण ही आधी कुणी केलेली नाही.याचा पाया आम्हाला माहीत नाही. आमचा यावर विश्वास नाही. ऑर्डर रद्द! पुढे अनेक वर्षे हीच काय, कोणतीही ट्रीटमेंट सिस्टीम कुठल्याही इलेक्ट्रोप्लेटिंग प्लांटवर बसली नाही. उलट सर्वांचे वाढणारे अधिकाधिक दूषित सांडपाणी तसेच वाहत राहिले.


आपल्या भारतीय लोकांना आपल्या लोकांनी केलेल्या संशोधनावर विश्वास नसतो. त्यांना समजून घ्यायची तयारीही नाही. स्टार्टअप धोरण आले, तरीही लाल फिती काय किंवा खासगी क्षेत्र काय, विश्वास, प्रोत्साहन यांना थारा नाही. परकीय, इम्पोर्टेड ते चांगले, मग ती वस्तू असो की सेवा अन् तंत्रज्ञान असो की संशोधन, मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरीचे आजही आपण आणि आपली व्यवस्था शिकार ठरत आहोत. हाच अनुभव 'सृष्टी'ला २००६ मध्ये हैदराबाद येथील हुसेन सागर स्वच्छतेबाबतच्या कामातही आला. त्यांना त्यांची प्लांटची प्रोजेक्ट कॉस्ट अतिशय कमी,अनुभव पुरेसा, सादरीकरणही तांत्रिकदृष्ट्या श्रेष्ठ या सगळ्या गोष्टी जुळत असून ही त्यांना काम मिळाले नाही. उलट काम इस्रायली कंपनीला मिळाले. ज्यांच्याकडे याचा काहीही अनुभव नव्हता. तंत्रज्ञानाचा कोणताही खुलासा त्या कंपनीने केलेला नव्हता,उलट त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, की आमचा हा पहिला प्रकल्प आहे.पुन्हा परदेशी म्हणजे भारी आणि त्यात इस्राईल म्हणजे आणखी भारी... याच समजुतीतून 'सृष्टी'ऐवजी त्या परदेशी कंपनीला काम गेले होते.


या विषयातले तज्ज्ञ 'सृष्टी'च्या तंत्रज्ञानास मान्यता देत होते. आपल्याकडे अनेक कंपन्यांमध्ये प्लांट यशस्वी होत होते,पण सरकारी यंत्रणेकडून अधिकृत मान्यता मिळत नव्हती,ही सल सतत होती. अपूर्णता वाटत होती. तसेच ती व्यवसायाची व पर्यावरणाची गरज पण होती..


...आणि पुढील संवाद मन वेधून घेतो.'हो, इथे नदी खूप लाल होते आहे... पण नदी जिवंत होते आहे... नदीत मोयना (बुरशीचे नाव) येऊ लागले आहेत. मोयना हे त्या नदीतल्या माशांचे खाद्य आहे. आता मोयना आले म्हणजे लवकरच मासेही येतील.'पर्यावरण अभ्यासक खूप आनंदात आणि उत्साहात नदी जवळूनच ह्या गोष्टी सांगत होता.नदी जिवंत होऊ लागली आहे, ही त्याची ही सुरुवात होती. नदी आई बनताना आम्ही पाहत होतो, या काव्यभाषेत एका वाक्यात सगळ्या सगळ्या भावना येत होत्या.


किती हे काव्यमय... मला एकदम जीवसृष्टीची उत्पत्ती आठवली.एकपेशीय प्राणी.... त्यातून जिवाणू... त्यातून हरित द्रव्य तयार करणारा पहिला जिवाणू... त्यातून पहिली हरितद्रव्य निर्मिती... मग वनस्पती विश्व... मग प्राणी-विश्व सायलीजींनी हे सर्व एखादे सुंदर काव्य ऐकवावे तसं भावपूर्ण शब्दांत ऐकवलं. ही संवेदनशीलताच त्यांना कार्यप्रवृत्त करते हे जाणवतं. "ज्ञानेश्वरांनी संवेदनशील माणसाचं खूप उत्कट वर्णन केले आहे,ज्याला मुंगीच्या पायातल्या पैंजणाचा आवाज ऐकू येतो आणि फुलपाखराची उचकी दिसते तो संवेदनशील माणूस !! " इथे तर संदीप सायलीजींना जिवाणूंच्या संवेदना ऐकू येण्याचा सराव झालाय.त्या जिवाणूंच्या संवेदना मलाही भविष्यात ऐकू येतील असा विश्वास मात्र दृढ झाला.


पुढील उदाहरण वाचताना तर मानवी उत्क्रांतीचे रहस्य समजल्याचा आनंद झाला.


 प्रत्येक वॉटर बॉडीचे आपलं एक वैशिष्ट्य असतं तेही लक्षात घ्यावे लागते. उदाहरणार्थ कृष्णेचे पाणी खूप संथ असते,त्याचबरोबर त्याची खोली खुप असते. काही नद्यांमध्ये कठीण खडक असतात,तर काही नद्यांच्या तळाशी वाळूचे खूप खूप उंच थर असतात.असे वेगवेगळ्या टप्प्यांत आम्ही प्रवाहाचे निरीक्षण नोंदवतो.मोजमापे घेतो.यानंतर समजून घ्यावी लागते ती नदीची किंवा प्रवाहाची इकोसिस्टीम,प्रत्यक्ष जिथे प्रवाहावर काम करायचे,तेथील निसर्गच बरंच काही बोलत असतो.त्याचे निरीक्षण बारकाईने करून त्याचाही विचार ट्रीटमेंट करताना करावा लागतो. त्यांची खूप मदत होते.त्याची काही उदाहरणे देताना त्यांनी काही रंजक माहिती दिली. नदी किंवा प्रवाहाच्या काठावर दिसणाऱ्या पक्ष्यांवरून काही अनुमान काढले जाते. घार, कावळे,टिटव्या असे पक्षी बहुदा कुजलेले मांस खातात. त्यावरून तिथे मृत मासे मोठ्या संख्येने आहेत हे समजते... म्हणजे नदीची इकोसिस्टीम मृतावस्थेत आहे,असे अनुमान निघते. खंड्या, बगळा असे मासे खाणारे पक्षी असतील, तर काही प्रमाणात इकोसिस्टीम जिवंत आहे,असे समजण्यास हरकत नाही.आणखी एक उदाहरण पिंपळ, वड, उंबर, करंज व तत्सम वृक्ष या इकोसिस्टीममध्ये खूप कमी असतील किंवा नसतील,तर त्याचे कारण तिथे भारद्वाजासारखे पक्षी जास्त संख्येने आहेत.भारद्वाज पक्षी इतर लहान पक्ष्यांची अंडी खातात ज्या पक्ष्यांच्या विष्ठेतून वड,पिंपळ या वृक्षांच्या बीजाचे परिवहन होते. पक्षी नाहीत " म्हणून वृक्ष ही तुरळक असे ते निरीक्षण.जिथे जलपर्णी आहे, त्या पाण्यात फॉस्फेट,नायट्रेट व तत्सम रसायने आहेत. बेशरम, आळू, कर्दळी भरपूर प्रमाणात वाढलेली असेल, तर पाणी नक्की दूषित आहे. कारण ही पक्ष्यांशिवाय वाढणारी इकोसिस्टीम आहे, हे समजते. तर अशा प्रकारे हे बायोइंडिकेटर प्रवाहाबद्दलची बरीच समज वाढवतात. (मारुती चितमपल्ली यांचे लिखाण वाचताना जंगल समजत जाते, त्या विषयी प्रेम आणि तादात्म्य वाढत जाते.)


हे अभ्यासपूर्ण प्रकरण वाचताना मी सध्या मारुती चितमपल्ली यांचे 'चकवाचांदण' हे पुस्तक वाचत असल्याचे मला नैसर्गिकरीत्या समाधान मिळाले.


'पहिला आणि सर्वोत्कृष्ट विजय म्हणजे स्वतःला जिंकणे; स्वतः द्वारे जिंकले जाणे हे सगळ्यात अत्यंत लज्जास्पद आणि अधर्म आहे.' 


प्लेटोचा हा प्रदीर्घ अभ्यासपूर्ण विचार या पुस्तकाशी मला जोडून ठेवत होता.

स्वयंशिस्त लावल्यास अनेक अशक्य कामे सहज शक्य होतात.यासाठी चिकाटी,मेहनत व विश्वास महत्वाचा आहे.


शुभ्र तुरे फेसांचे,जीव घेणे ! 

संभाजी पठारे यांची स्टोरी

तुरे फेसांचे... ओढ्यालगतच्या झुडपांवर, नदीच्या किनाऱ्यावर,प्रवाहातल्या शुभ खडकांवर,खाडीच्या पाण्यावर शुभ्र तुरे फेसांचे, दुर्गंधी... पाण्याबरोबर शेतमळ्यात पसरली. शुभ्र तुरे फेसांचे जीवघेणे... नदी खाडीतील मासे गायब झालेले,असलाच चुकून एखादा मरून तरंगत येतो काठावर.काजू,आंबे,कोकम यांचा मोहर धरेना, शेतात गेलेले हे पाणी का संपवते हे पीक. नदीतील खडकांवरही धरू देत नाही शेवाळ जरासेही.शुभ्र तुरे फेसांचे धाक दाखवतात झाडेझुडपे,पशुपक्षी सगळ्यांच्याच जगण्याला,महाड परिसराला... पण तो आला, त्याने पाहिले, त्याने मनाशी ठरवले आणि इतरांना बरोबर घेत हे बदलवलंही... संभाजी पठारे यांनी महाड परिसरात औद्योगिक जलप्रदूषण रोखण्यासाठी कंबर कसली...


 सगळेच कारखाने आपले सांडपाणी जवळजवळ काहीही प्रक्रिया न करता बाहेर सोडून देत असत.पुढे सामायिक प्रक्रिया केंद्रातही हाच प्रकार आणि त्यातून बाहेर पडणारे पाणी तर अति भयानक ! तांत्रिक भाषेत सांगायचे,तर त्या पाण्यासाठी केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे COD हा तीन हजार इतका असायचा.म्हणजे नदीच्या शुद्ध पाण्यात हे सांडपाणी मिसळल्यावर तिच्याही पाण्याचा जवळ जवळ इतकाच COD होणार.


पाण्याच्या दूषितपणा मोजण्याची परिमाणे बरीच असली तरी सर्वात मुख्य दोन परिमाणे असतात. 

. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड.

 २. सीओडी - केमिकल ऑक्सिजन डिमांड


पाण्यातील सेंद्रिय (ऑर्गनिक) घटकांचे विघटन करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन पाण्यातील जीवाणू व इतर सूक्ष्म जीवाणूंच्या श्वसनासाठी हवा असतो.पाण्यात मुळात ऑक्सिजन विरघळलेला असतो.तो विरघळलेला ऑक्सिजन पाण्यातील माशांसहित सर्व जलचरांना श्वासोच्छ्वाससाठी आवश्यक असतो.पण जसजसे पाण्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढत जाते,तसतसे सेंद्रिय घटकांचे विघटन होऊन पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. इतकेच काय जलचरांना हवा असलेल्या प्रमाणात ऑक्सिजन येण्यासाठी पाण्याची ऑक्सिजनची मागणी वाढते (त्यालाच बीओडी असे म्हणतात) तो ऑक्सिजन या सेंद्रिय पदार्थांचे विघटन प्रक्रियेसाठी आवश्यक असतो. पाण्यात सोडण्यात येणाऱ्या मैल्यामुळे त्या सांडपाण्याचा बीओडी अधिक असतो. तसेच अशाच प्रकारे असेंद्रिय (Non Organic) पदार्थांच्या विघटनासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या मागणीला केमिकल ऑक्सिजन डिमांड असे म्हटले जाते.या दोन्ही प्रकारच्या ऑक्सिजनची मागणी जेवढी जास्त तेवढे पाणी अधिक प्रदूषित असते.सीओडी व बीओडी मोजण्यासाठी विविध रासायनिक प्रक्रिया आहेत. तसेच गेल्या अनेक वर्षापासून इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जात आहेत.


स्वतः २०००  मध्ये संभाजी पठारे १९८९ मध्ये केमिकल इंजिनिअर झालेले. २००४ पर्यंत दोन-तीन मोठ्या साखर कारखान्यातून विविध पदावर काम करून आलेले. तेथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला होता. सहकारातून खाजगी क्षेत्रात आलेले पठारे २००४ ला महाडमध्ये एका चांगल्या कंपनीत रुजू झाले. मुळात शेतकरी कुटुंबातला खेड्यातला जन्म. महाविद्यालयीन शिक्षण ही ग्रामीण भागातच, पहिली पंधरा वर्षे नोकरीही साखर कारखान्यात म्हणजेच ग्रामीण भागातच आणि शेतकऱ्यांशी संबंधित खूप संवेदनशील मनाचा हा माणूस हुशार आणि मेहनतीही.


२००४ मध्ये सामायिक सांडपाणी केंद्राच्या कार्यकारणीत ते दाखल झाले. पुढची सहा-सात वर्षे त्या कार्यकारिणीचे सदस्य राहिले. तेथील सर्व कामकाज पाहून ते अस्वस्थ होत होते. बऱ्याच वेळा नदीकाठच्या गावातून तक्रारी घेऊन लोक येत असून बऱ्याच वेळा त्यांना हतबलता जाणवायची,अपराधी वाटायचे. २०१० मध्ये या सांडपाणी केंद्राचे ते व्हाईस चेअरमन झाले. त्यांनी बऱ्याच कारखान्यांर्गत तसेच इंडस्ट्रियल एरिया व त्यांच्या प्रक्रिया केंद्रे याविषयी माहिती गोळा करणे सुरू केले.सर्वांशी संवाद वाढवला. दरम्यान ज्या कंपनीत काम करत होते,ती कंपनी यांना बढत्या देतच होती.सांडपाणी केंद्रावर ते सोडून कुणीही विचार करीत नव्हतं.कोण चुकतंय,कोण मुद्दाम करतोय किंवा कोणामुळे किती नुकसान होतं यावरही त्यांनी सखोल माहिती घ्यायला सुरुवात केली होतीच..


याच दरम्यान त्यांना एक कल्पना सुचली. ते स्वतः ज्या कंपनीत काम करत होते त्या कंपनीच्या सांडपाण्यातून काही प्रक्रिया केल्या तर त्यातून ॲसिटिक ॲसिड तयार होऊ शकत होते,हे ॲसिटीक ॲसिड व्यावसायिकदृष्ट्या उत्पन्न देणारे होते.ॲसिटिक ॲसिडचा प्लांट होता,पण तो पुर्ण क्षमतेने वापरला जात नव्हता.पठारेंनी तो सुरु केला. त्यातून कंपनीच्या उत्पन्नात भर पडली आणि त्यांच्या कारखान्यांच्या सांडपाण्यातील प्रदूषणाची पातळी भर खूप कमी झाली. नंतर कंपनीत शक्य त्या प्रकारे पाणी साठवण्याचे उपाय (उदा: बोरवेल रिचार्ज व रेनवॉटर हार्वेस्टिंग) अवलंबले. कंपनीतील प्रत्येक विभागानुसार पाण्याचे लेखापरीक्षण करून घेतले. विविध ठिकाणी पाणी वाचवण्याचे तंत्र अवलंबले गेले. त्यात मूळ रासायनिक प्रक्रियेतही काही बदल करायचे धोरण त्यांनी ठेवले. इतके झाल्यावर कंपनीच्या सांडपाण्यातही त्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्याची यंत्रणा सुरु केली.जलसंधारणाचे,पाणी वाचवण्याचे, रिसायकलिंग अशी जवळजवळ सर्व मॉडेल्स उभी केली आणि जलसंवर्धन संबंधित सर्व योजना राबवायला सुरुवात केली होती. त्यासाठी आधी कंपनीच्या व्यवस्थापनाला समजावून सांगणे,आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेणे, महत्त्व पटवणे हे त्यांनी सुरू केले होते.मग कधी निर्मितीप्रक्रियेत काही बदल करणे,काही नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे व त्याची कंपनीत अंमलबजावणी करणे हे प्रामुख्याने केले. तंत्रज्ञान व्यवहार आणि पाणीबचत या त्रिसूत्रीचा वापर,प्रयोग करत करत त्यांनी यशस्वी केला.


कारखाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प खरंतर का चालवत नाहीत? कारण पठारे त्यांच्या स्वतःच्या कंपनीतील विविध उपाययोजनेतून जो अभ्यास झाला त्याचे मुख्य फलित म्हणजे प्रक्रिया खर्चापेक्षा दंड - हप्ते हे कमी खर्चाचे असतात.सांडपाणी प्रक्रियेसाठी लागणारा खर्च खूप जास्त येतो,त्यापेक्षा दंड भरणे,यंत्रणेला हप्ते देणे असे त्या कंपन्यांना वाटते हे सोयीचे आहे. हा गैरसमज आहे हे सिद्ध झाले.कोणत्याही कारखान्याने थोडा जास्त भांडवली खर्च केला आणि नफ्यात घट किंवा उत्पादनाची वाढवलेली वाजवी किंमत यातून तो झालेला खर्च वसूल केला.तर सांडपाणी प्रक्रियेतून चांगले पाणी बाहेर टाकले जाणे शक्य आहे, हा धडा त्यांनी आपल्या कंपनीत सिद्ध केला. २०१० मध्ये त्यांना सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कार्यकारिणीचे उपाध्यक्ष करण्यात आले. पठारेंचा आग्रह सुरू होता की आमच्या कंपनीने ज्या काही उपाययोजना केल्या आहेत तशाच सगळ्यांनी आपापल्या कंपन्यांमध्ये कराव्या. नंतरच ते पाणी सामायिक प्रक्रिया केंद्रात सोडावे.पण फार कोणी मनावर घेत नव्हते. त्याच दरम्यान जगभरातील औद्योगिक वसाहतींचा प्रदूषणा संबंधात सर्वे करण्यात आला होता. त्या सर्वांमध्ये जगातील सर्वोच्च प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील पहिल्या तीसमध्ये महाड औद्योगिक वसाहतीचा नंबर आलेला होता. ही वसाहत 'थर्टी डर्टी' म्हणून कुप्रसिद्धीस आली. साहजिकच महाडमधील विविध रासायनिक कारखान्यांच्या पुढे नवीन समस्या उभ्या राहिल्या.जागतिक बाजारपेठेत येथील उत्पादनबाबत पीछेहाट व्हायला लागली. त्याचबरोबर भारत सरकारनेही एका नव्या कायद्याच्या आधारे महत्त्वाचा निर्णय असा दिला होता की,ज्या वसाहतींच्या सांडपाण्याबद्दल व हवाप्रदूषणाबाबत आजूबाजूच्या गावातील, वाड्या वस्त्यावरील त्यातील लोकांच्या तक्रारी आहेत, तेथील कारखान्यांच्या परवान्याबाबत, त्यांच्या विस्तारीकरणबाबतच्या परवानगीला पूर्ण थांबवण्याचे धोरण सरकारने जाहीर केले होते. यामुळे महाडमधील ज्या कंपन्यांना विस्तार करायचा होता त्यांचे घोडे अडले होते. वेगवेगळ्या कंपन्यांना विविध राजकीय पक्षांचे लोक आपापल्या परीने प्रदूषणाबाबत ब्लॅकमेलिंग करीत होतेच.त्यातून खंडणी वसूल करत होते.या सर्व पार्श्वभूमीवर पठारे यांच्या कंपनीस काहीही तोशीस नव्हती,कारण सर्व नियमात सुरू होते व नियमात करूनही उत्पादन खर्च आटोक्यात येत होता.त्यामुळे त्यांचे संचालक व व्यवस्थापन पठारेंवर बेहद्द खूष होती.


आता इतर कंपन्यांना त्यांची चूक उमगली.इतर सर्व कारखान्याच्या प्रतिनिधींनी पठारे यांना २०१४ मध्ये सामायिक सांडपाणी केंद्राच्या कार्यकारिणीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची गळ घातली. सुरुवातीला पठारे यांनी नकार दिला. परंतु पुढच्या बैठकीत परत आग्रह झाल्यावर ते त्यांच्या अटी व शर्तीवर अध्यक्ष होण्यास तयार झाले. मी सर्वांना सारखाच नियम लावीन. प्रत्येक कारखान्यातून ठरलेल्या मानांकनानुसारच सांडपाणी बाहेर सोडायला हवे.तसेच सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात ही सर्व प्रक्रिया शास्त्रीय व तांत्रिकतेच्या सर्व कसोट्या पाळूनच केली जाईल. त्यासाठीचा भांडवली व चालू प्रक्रियेसाठीचा खर्च सर्वांनी मिळून करावा लागेल. दरम्यान माझ्या परीने सर्व कारखान्यांना अंतर्गत सांडपाणी सुधारणासाठी मदतीला मी सदैव तयार आहे.


विस्कळीत बेशिस्त व आपमतलबी व्यवस्था बदलण्यासाठी व्यवस्थेत राहून स्वयंशिस्त व लोक समज वाढवून व्यवस्था सुनियोजीत,स्वयंप्रेरित, शिस्तीत काम करणारी व व्यापक समाजहिताची करता येते..! याचे जिवंत उदाहरण म्हणजेच संभाजी पठारे..!


... अजून कर्तुत्वाच्या गाथा पुढे सुरू आहेत.थोड्या थोड्या भागात त्या क्रमशः प्रकाशित केल्या जातील.


विजय कृष्णात गायकवाड





३/११/२२

१ नोव्हेंबर २०२२ या लेखातील पुढील भाग..

पाण्याचे प्रदूषण करणाऱ्या या सर्व घटकांवर मोहन कुलकर्णी यांनी त्यांच्या 'ऋतु बायोसिस' या कंपनीद्वारे काम केले आहे व ते प्रदूषण स्रोतांच्या सुरवातीलाच कसे 'कमीत कमी' पातळीवर आणता येतील हे साध्य करून दाखवले आहे.


त्यांनी वॉटरलेस युरिनल्सच्या माध्यमातून मानवी मूत्रामुळे होणारे प्रदूषण ९५ टक्क्याने कमी केले आहे. तर मानवी मैल्याचे वेगाने व नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात प्रमाणात विघटन करून ते ६० ते ७० टक्क्यांनी त्याचे आकारमान कमी करण्यास यश मिळवले आहे. तर घरातील व ऑफिसमधील सर्व स्वच्छतेसाठी लागणाऱ्या फिनॉल,ॲसिड यांना जैवतंत्रिक (बायो टेक्निकल) रसायन हा पर्याय देऊन त्यामुळे होणारे प्रदूषण ९० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात मजल मारली आहे. इतकंच नाही तर घनकचऱ्याच्या विघटनाच्या अशा प्रक्रिया विकसित केल्या आहेत की त्यातून कचऱ्याची दुर्गंधी जवळजवळ शून्यावर येते,आणि जरी विघटीत कचरा पाण्यात वाहून गेला तरी त्याचे विघटन प्रक्रिया यापूर्वी सुरू झालेली असते.त्यामुळे प्रवाहाचा केमिकल ऑक्सिजन डिमांड (COD) किंवा बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (BOD) हा फार मोठा असत नाही. म्हणजे प्रदूषणाच्या उगमा जवळच पाण्याचे प्रदूषण संपवायचे किंवा कमी करायचे.हे मोठ्या प्रमाणात सर्वत्र झाले तर प्रवाहांचे पाणी कमी प्रदूषित होईल आणि मग ट्रीटमेंट प्लांटवरील भारही कमी होईल. प्रवाह स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांचा सहभाग अशा प्रकारची पर्यायी रसायने किंवा विविध पर्याय दिल्यामुळे वाढू लागेल,घनकचरा व्यवस्थापन आटोक्यात येईल. थोडक्यात या सर्व गोष्टींमुळे पाणी प्रदूषणावर नियंत्रण येईल!


आणि विचार करणाऱ्या कोणत्याही माणसाला कळण्यासाठी भन्नाट नवनवीन प्रयोग सुरू केले.मोहन कुलकर्णी यांनी 'मुतारीवर' सुध्दा अनेक प्रयोग केले.व त्यातूनच 'ब्लू बॉल्स' तयार केले. यामध्ये ठासून भरलेत बॅक्टेरिया.. या बॅक्टेरियांचे खाद्य म्हणजे यूरिक ॲसिड,मुतारी मध्ये दुर्गंधी येते अमोनियाची,अमोनिया येतो यूरिक ॲसिडमधून आणि हे यूरिक ॲसिड येथे लघवीवाटे आपल्या शरीरातून,त्यांच्या या प्रयोगामुळे दुर्गंधीच्या मुळावरच घाव घातला गेला. बॅक्टेरिया हे युनिक ॲसिड खातात. ते संपवतात.त्यातून बॅक्टेरियांची संख्या वाढते. त्यांची वसाहत मुतारीच्या भांड्यात व त्या खालच्या पाईपमध्ये तयार होते.सततच्या वापराने या बॅक्टेरियाच्या कॉलनी थेट ड्रेनेज लाईनपर्यंत ही जातात.बॅक्टेरियांनी खाल्ल्यामुळे यूरिक ॲसिड शिल्लक राहत नाही तर तिथे अमोनियाची दुर्गंधी येईलच कशी...!


विचारालाही विचार करायला लावणारे हे विचारशील प्रयोग वाचून मानवी मन थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.


समाजाचे कल्याण साधताना,संशोधन आणि अभ्यास हे करताना लोकांच्या अज्ञानाचा नाही, तर आपल्या ज्ञानाचा फायदा करून घेऊन व्यवसाय करणे हे सर्वोत्तम उद्योजकाचे लक्ष असते,उद्योजकाचे साध्यही पवित्र आणि साधनाही पवित्र असायला हवी असा नवीनच 'माणुसकीचा' धडा मोहन कुलकर्णी यांनी दिला आहे.


'एक चांगले पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवते.' 


पुढील प्रकरण व वाचण्यासाठी पान उघडले. आणि 'ज्वालाग्राही पाणी' ही सुरुवात वाचूनच मी अवाक् झालो. प्रदीप पुरंदरे महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावरील सर्वत्र बहुचर्चित नाव हायड्रिलॉजी तज्ञ,जल व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक आणि पाणी विषयाचे अभ्यासक पंडित,ते जलव्यवस्थापर्यंत पोहोचले आहे. पाण्याला ज्वालाग्रही बनवणारे ते सत्याग्रही आहेत. त्यांचे कार्य ध्येय ( मिशन स्टेटमेंट ) आहे की 'जल व्यवस्थापन व्यवस्थेत प्रथम लोक सहभाग वाढवा, तिथे जनरेटा निर्माण करा,त्याआधी सिंचन व्यवस्था नीट अभ्यासा, त्याचे अस्त्र बनवून प्रकल्पस्तरावर परिणामकारक हस्तक्षेप करा पाणी वाया जाण्यापासून वाचवा..!


हे वाचल्यावर सर्वप्रथम मला पाणी हे मानवी जीवनात किती महत्त्वपूर्ण आहे. याचे मुल्य समजले.


'आकड्यात सैतान लपलेला असतो' म्हणजेच आकडेवारी बारकाईने अभ्यासली तर त्यातील बदमाशी,त्रुटी कळते,विरोधाभास कळतो, वरकरणी तसे काहीच वाटत नसले तरी ही अनास्था आणि अनागोंदी अशी असते.हे रहस्य सविस्तरपणे या पुस्तकात वाचल्यानंतर 


' होय, वादळांनी फितूर झालेल्या लाटांना न जुमानता उलट त्याच लाटांवर स्वार होऊन वादळाला सामोरं जाऊन मार्गक्रमण करत इच्छित किनारा गाठणे हेच जहाज निर्मितीचे उद्दिष्ट असतं !


या  उदात्त कर्तृत्ववान विचारांनी जीवनातील जीवंत वैचारिक क्रांतीची ओळख होईल हे मात्र नक्कीच..!


मी दररोज पाणी 'आडातून' खुप खोलवरुन वरती खेचून काढतो. या पाण्याच्या शोधात मला आतून खोलात जावं लागतं.


असेच फार काळापासून पाण्याच्या शोधात .. खोलात शंशाक देशपांडे आपल्या पुढे गेलेले आहेत.फक्त आपल्याकरीताच..!


आज सगळ्यात जास्त निकड आहे भूजलाच्या थेंबाथेंबाच्या नियोजनाची.'नितीआयोगा' चा अहवाल सांगतो, की बिहारमधील एक लाखापेक्षा अधिक बोरवेल बंद पडल्या आहेत. उत्तर प्रदेशातील ७७ हजारांपेक्षा अधिक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. महाराष्ट्राच्या ५२ टक्के जमिनीचे वाळवंटीकरण झाले आहे. म्हणजे तिथे पाणीच नसल्याने काहीच बोलू शकत नाहीये. भारतातल्या १५ हजार नद्यांपैकी साडेचार हजार नद्या कोरड्या पडल्या आहेत. ( ही अभ्यासपूर्ण लेखमाला प्रत्यक्ष पुस्तकात वाचत असताना 'मला अजूनही अभ्यास करायचा आहे याची सत्यता समजली.) सगळ्यांचा संबंध आहे,अमर्याद भूजलाचा उपसा आणि त्यातून आटलेले भूजल यांच्याशी,या पार्श्वभूमीवर भूजलाचा,ते साठवून ठेवणाऱ्या 'जलधर' असा या खडकाचा जलधारांच्या सीमा निश्चित करण्याच्या,त्यातील पाण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन करण्याच्या,स्वानुभवातून व स्वअध्ययनातून विकसित केलेल्या पद्धती, इतकंच काय,पूर्ण महाराष्ट्रासाठी एक हाती लिहिलेला भूजल कायदा हा पुढे केंद्र सरकारनेही स्वीकारला. हे आणि असेच भूजलासंबंधीचे मैलाचा दगड ठरतील अशी अनेक कामे डॉ. शशांक देशपांडे यांनी केली आहेत.


१९८५ ला शशांकजींनी व त्यांच्या दोन मित्रांनी खडकशास्त्र व हायड्रॉलॉजीतील संदर्भाचा वापर करून त्यासाठी एक छोटे यंत्र वापरून पाण्याची जागा दाखवण्याचा सल्ला देणारा व्यवसाय सुरू केला. गावे, जिल्हा परिषद व महाराष्ट्र सरकारने त्यांना यासाठी पहिले काम दिले. त्यांनी या यंत्राच्या आधाराने विविध ७० ठिकाणं दाखवली. त्यापैकी ५७ ठिकाणी भरपूर पाणी लागलं, म्हणजे ८० टक्के ठिकाणं बरोबर दाखवली होती. म्हणजे यांचं तंत्र,यंत्र आणि तर्क खूपच उपयोगी होता. पुढे लवकरच छत्तीसगड (तेव्हा ते मध्यप्रदेशात समाविष्ट होते) मधील रायपूर जिल्ह्याच्या शिवनी तालुक्यात काम मिळाले. खूप दुष्काळ होता. तिथे त्यावेळी बोरवेलसाठी एकूण शंभर ठिकाणं दाखवली होती, पैकी ९० ठिकाणं अचूक निघाली, जिथे भरपूर पाणी लागले. पाणी पाहण्याचे यंत्र म्हणजे इलेक्ट्रिकल कामात वापरले जाणारे मेगर किंवा रेसिस्टीविटी मीटर,कोणत्याही इलेक्ट्रिकल सर्किटमधील विद्युत प्रवाहाचा अवरोध मोजण्यासाठी याचा वापर करतात.जमिनीचा,त्यातील खडकांचा विद्युत वहनाला होणारा अवरोधही त्याने मोजता येतो. त्याचे काही शास्त्र व तंत्र आहे.जमिनीत विद्युत प्रवाह सोडला जातो आणि मेगरने त्याचा अवरोध मोजला जातो.जिथे खडकाला भेगा आहेत,पोकळी आहे अशी ठिकाणे यामुळे सापडतात.त्यांचे आकारमान इत्यादीही समजते. ते जमिनीपासून किती खोलवर आहे,हेही अनुमान काढता येते. त्यावर आधारितच हे मशीन जमिनीतले पाणी दाखवणारे मशीन म्हणून ओळखले जाते.


हे सर्व वाचत असताना एका वाक्याची प्रकर्षाने जाणीव झाली.


 ''तुम्ही एकाच नदीत पुन्हा पुन्हा पाऊल टाकू शकत नाहीत;तुम्ही एकदा पाऊल टाकलं की पुन्हा पाऊल टाकेपर्यंत तिचं स्वरूप बदललेलं असतं.'' - हेरॅक्लिटस' 


भारतीय संविधानाप्रमाणे प्रवाहातील पाण्यावर प्रवाह जिथून जिथून वाहतो तेथील सर्वांचा हक्क असतो. त्यामुळे गाव हे प्रमाण मानून हे काम केले जाते. मागच्या गावात पाणी अडवले जाते, तेव्हा त्या गावात येणाऱ्या एकूण पाण्याच्या ६५ टक्के पाणी त्या गावाला स्वतःसाठी अडवता येते, बाकी ३५ टक्के पाणी पुढे सोडावे लागते. हे नदीलाही लागू आहे. इतकेच काय, एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात जातानाही हाच नियम लागू आहे.हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं.!


जीवन जगत असताना असले पुस्तक सोबत असणे म्हणजे आपली सावलीच आपल्या सोबत असणे.हा अनुभव बरचं काही शिकवून गेला.


माहिती थेंबाची... थेंबाच्या थांबण्याची...! या प्रकरणाची सुरुवातच थांबण्यापासून होते. पळण्यापूर्वी आपल्याला कोठे थांबायचे आहे हे ठरवता आलं पाहिजे. थांबण्याची सीमारेषा म्हणजे सुनील गोरंटीवार यांचे साधक जीवन..


यह ॲप का जमाना है भाई... मोबाईल ॲप का! शेतीला काटेकोर पाणी देण्यासाठी मोबाईल ॲप! हे ॲप डाऊनलोड करा, शेतात जाऊन पिकाचा फोटो काढा,तो ॲपवर डाऊनलोड करा... विचारलेल्या दोन-तीन प्रश्नांची उत्तरे द्या... ॲप तुम्हाला सांगेल, तुमचा पंप किती वेळ सुरू ठेवायचा. हवे तितकेच पाणी शेतीला मिळते.... होय, हे जागतिक दर्जाचे संशोधन करून जलव्यवस्थापनात उच्च मानांकन मिळवणारे संशोधक म्हणजे डॉ. सुनील गोरंटीवार.गेली पस्तीस वर्षे सिंचन क्षेत्रात समृद्ध ज्ञान निर्मिती करणारा हा साधक आहे.


एक पाण्याचे गणित पाहू...


'भारी जमिनीत ठिबकने पाणी दिले की पडणारा थेंब जमिनीत आधी आडवा पसरतो मग हळूहळू तो खालच्या दिशेला जातो व मुळाभोवती तो बल्ब तयार करतो तो 'कांद्याच्या' आकारात पसरतो. तर हलक्या जमिनीत तो आडवा न पसरता खालच्या दिशेने सरळ प्रवास करतो तेव्हा तो गाजरासारखा आकार धरतो.'


 आपल्या भाषेत सुनील गोरंटीवार सोप्या भाषेत समजून सांगतात.


बाष्पर्णोत्सर्जन (Evapotranspiration) हा शब्द जड वाटत असला तरी तो शालेय जीवनात येऊन गेलेला असतो. तर मला जे आठवते ते सांगतो.आपण झाडाला पाणी देतो ते जमिनीत. जमिनीला दिलेल्या पाण्यापैकी सर्वच पाणी झाडाने शोषून घेईपर्यंत काही पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते उडून जाते ते बाष्पीभवन. तसचं झाडाने शोषलेल्या पाण्यापैकी ८५ ते ९० टक्के पाणी हे पानाच्या रंध्राद्वारे झाडाच्या बाहेर श्वासाद्वारे बाहेर टाकले जाते. 


(हे transpiration). जेमतेम ५ ते ७ टक्के पाणी अन्न बनवण्यासाठी वापरले जाते. झाडाचे स्वतःचे तापमान बाहेरील हवामान व तापमानाशी जुळवून घेण्यासाठी हे उत्सर्जन सुरू असते. हे दोन्ही मिळून बाष्पपर्णोत्सर्जन (Evapotranspiration)


तर ते सांगत होते की Evapotranspiration जेवढे अधिक तेवढी झाडाची वाढ जोमाने होते. उन्हाळ्यात झाडांना किंवा पिकांना पाणी जास्त लागते.तर हिवाळ्यात कमी तर पावसाळ्यात अगदीच कमी द्यावे लागते. त्याचे कारण हेच तर!


या ठिकाणी सॉक्रेटिसचा प्रसिद्ध विचार समोर उभा राहीला.


'मला फक्त एकच गोष्ट माहित आहे आणि तीही आहे की मला काहीच माहित नाही..!


माणसांनी नेहमी अभ्यास करत राहावे. वाचत जावे व स्वतःला घडवत राहावे. मला सर्व माहित आहे. असा भ्रम तयार झाल्यानंतर माणसाचा प्रवास जागीच थांबतो. तो जागीच थांबू नये म्हणून आपण अभ्यास करत राहिलं पाहिजे.


'शुध्द पाण्यासाठी ओझोन थेरपी' किरण गद्रे हे 'क्लोरीन पुराण' सांगतात.


मोठ्या प्रमाणात निर्जंतुक पाणी निर्मितीसाठी साधारण काही प्रकारच्या पद्धती वापरल्या जातात. क्लोरीनेशन,अल्ट्रावायलेट,ओझोनेशन, ब्रोमीन ॲसिड ट्रीटमेंट,चांदी व तांबे यांचे आयन, तसेच पोटॅशियम परमॅग्नेट,अल्ट्रासोनिकेशन इत्यादी..


आपल्याकडे पाणी निर्जंतुक करण्यासाठी सरसकट क्लोरीनेशनचा वापर होतो. पाणी गाळून त्यातील माती बाजुला करुन व तत्सम घटकांना पाण्यातून वेगळे केले जाते.. तुरटीचा वापर करून गरजेप्रमाणे क्लोरीनची मात्रा पाण्यात मिसळली जाते. पाणी थेट घराच्या नळाद्वारे आपण पाणी भरेपर्यंतच्या काळापर्यंत आणि नंतरही काही काळ काही प्रमाणात टिकून राहील इतक्या प्रमाणात क्लोरीनची मात्रा असते. यात पाणी निश्चितपणे निर्जंतुक होते. ही मात्रा पाच पीपीएम म्हणजे एका लिटरसाठी पाच मिलीग्राम इतकी असते व आपल्या नळाद्वारे भांड्यात पडेपर्यंत पाण्यातली मात्रा ०. १ ते १ पीपीएम इतकी कमी होत जाते.


पूर्ण अमेरिकेत २,००० हून अधिक वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये क्लोरीनेशन केले जात नाही. तिथे निर्जंतुकीकरणासाठी ओझोनचा वापर केला जातो. फ्रान्समधे तर १९०३ पासूनच ओझोन पाणी प्रक्रिया केंद्रात पाणी निर्जंतुकीकरणासाठी वापरायला सुरूवात झाली होती. हा जगातला पहिलाच ओझोनने पाणी शुध्दीकरण करण्याचा प्लांट होता. १९७० ते ८० पर्यंत जगात सर्वत्र क्लोरीनेशनने पाणी शुद्ध केले जात होते. पण पाण्यातील कोरीनेशनचा दुष्परिणाम यावर संशोधन सुरू झाले आणि हळूहळू मोठे क्लोरीनेशन पुराण बाहेर येऊ लागले.जसजसे हे क्लोरीन पुराण बाहेर येवू लागले तसतसा क्लोरीनचा वापर थांबवला गेला. मग सर्वाधिक सुरक्षित पर्याय ओझोनचा पुढे आला.


 पिण्याच्या पाण्यात निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीन मिसळला की पाण्यातील सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांशी क्लोरीनचा संयोग होतो. त्यातून शरीराला बाधक अशी अनेक रसायने तयार होतात. त्या घातक रसायनांमुळे मूत्राशय, गुदद्वार व आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. केस व कातडीवर परिणाम होतात. थायरॉईड ग्रंथीवरही परिणाम होतात. सर्व जीवनाश्यक खाण्यापिण्याचे व त्यातील औषधी घटकांचे घातक पदार्थात रूपांतर होते. जन्मतः बालकात व्यंग,अपंगत्व, श्वसनाचे रोग येण्याची शक्यता वाढते. हृदयाचे स्नायू व रक्तवाहिन्यांमध्ये काठीण्य निर्माण होते. क्लोरीनमुळे तयार झालेल्या पाण्यातील विविध रसायनांचा परिणाम थायरॉईड ग्रंथीवर होतो. त्यातून हार्मोन्सचा समतोल बिघडून त्याचे विकार वाढतात. हेही सिद्ध झाले आहे की पाण्यात क्लोरींनमुळे होणारी संयुगे हे आपल्याला नैसर्गिकरीत्या आवश्यक असलेल्या औषधी तत्वांचे रूपांतर कर्करोगयुक्त पदार्थ निर्मितीत करतात,की ज्यामुळे अगदी चहापासून भाज्या फळे मसाल्यांचे पदार्थ औषधी वनस्पती यांचे शरीरासाठी आवश्यक असणारी गुणधर्मच नष्ट होऊन जातात.


असेही सिद्ध केले आहे की पिण्याच्या पाण्यात क्लोरीनने जितका त्रास होऊ शकतो त्यापेक्षा जास्त धोका पोहण्याच्या तलावातील पाण्यातील क्लोरीनमुळे आहे असे आढळते. उदाहरणार्थ ज्यावेळी एखादा माणूस गरम पाण्याने शॉवरखाली अंघोळ करतो त्यावेळी त्याच्या त्वचेवरील रंध्रे मोकळी होतात. साधारण ४२ अंश तापमानाला क्लोरीनमुळे निर्माण झालेले क्लोरोफॉर्म,ट्राय हॅलो मिथेन हे पदार्थ त्या रंध्रामधून रक्तात भिनत जातात. तेथून ते फुफ्फुसात जातात. त्यातूनच श्वसनाचे विकार विशेषतः दमा वाढतो. तसेच स्विमिंग टँकमधल्या क्लोरीनमुळे केसांवरही अनिष्ट परिणाम होऊन ते रुक्ष, रंग विरहित होतात. डोक्याच्या त्वचेवर व शरीराच्या इतर त्वचेवर सुद्धा या पदार्थांचे घातक परिणाम होतात.


क्लोरीनमुळे जलवाहिन्यांच्या गंज प्रक्रियेला वेग येतो आणि त्यामुळे पाणीपुरवठा लाईन्स वरचेवर लिकेज होऊ लागतात.


क्लोरिन व ओझोनची बॅक्टेरिया बाबतची प्रक्रिया एकच आहे. क्लोरीन किंवा ओझोन बॅक्टेरियाची पेशी भित्तिका फोडून टाकतात व त्याच्या पेशीद्रव्याबरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन पेशी नष्ट होतात.


क्लोरीनचे तोटे आणि ओझोनचे फायदे सविस्तरपणे 'अभिनव जलनायक' या पुस्तकात वाचायला मिळतील.


मला वाटते आपण अशीच पुस्तके वाचली पाहिजेत.

जी तुमच्या हृदयावर खोलवर जखमा करतात...!

पुस्तक कसे पाहिजे?

 एखाद्या कुर्‍हाडीसारखे ज्याने आपल्यातील बर्फ वितळला पाहिजे.फ्रान्झ काफ्काचे अप्रतिम वाक्य जे पुस्तकातील अंतःकरण उलगडून सांगणारं आहे.

'अभिनव जलनायक' हे पुस्तक सुध्दा हेच सांगत आहे.हे पुस्तक काळाच्या पुढे आहे.


आता पाहू राघव खडककर यांचा जीवनपट 'मेम्ब्रेन सिस्टिमचे डॉक्टर' 

कारखान्याच्या सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न मोठा गंभीर आहे. या प्रदूषित पाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून यंत्रणा उभारलेली असते. या यंत्रणेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उत्तम डॉक्टर हवा असतो.असेच मेम्ब्रेन सिस्टीमचे डॉक्टर आहे राघव खडककर.


पाणी प्रदूषण ही जगातली सर्वात मोठी समस्या. जगाचे सगळ्यात जास्त नुकसान त्यामुळे होते. मुळात पृथ्वीवर जीवसृष्टी तयार झाली तीच मुळी पाणी असल्यामुळे..

त्यामुळे पाणी प्रश्न हा सर्व जीवसृष्टीचा आहे.पण दुर्दैवाने पाणी प्रदूषणाची चर्चा सामान्यपणे माणसाला भेडसावणारी समस्या म्हणूनच केली जाते. नुकसान आर्थिक बाबतीत अधिक आहे पण तुलनेत जलचर, उभयचर यांच्या प्रजातीच प्रदूषित पाण्यामुळे नष्ट होत आहेत. प्राण्यांपासून शेवाळ, प्रवाळ, पाण्यातील विविध सूक्ष्म आणि मोठे जीव अशा सर्व जीवसृष्टींना हानी पोहचते.


पाणी प्रदूषणाचा प्रश्न गहन गंभीर आहे, पण आजकाल मोठमोठ्या कारखान्यांमधून समाधानकारक गुणवत्तेचे सांडपाणी बाहेर सांडलेले दिसते,विविध तंत्रज्ञानातून उभारलेल्या मशिनरीमुळे हे शक्य होत आहे. या मशिनरीची उभारणी व देखभाल करणारी व्यक्ती किंवा संस्था यांच्यामुळे या पाण्याच्या गुणवत्तेत सातत्य ठेवता येणे शक्य होते.


असेच एक डॉक्टर आहेत राघव खडककर आणि त्यांची विपणन कंपनी. दिवसेंदिवस इंडस्ट्रीचा आकार,

आवाका,संख्याही खूप वाढते आहे. आपल्याला दैनंदिन जीवनात समोर असलेल्या कंपन्याच माहिती असतात. पण प्रत्यक्षात भरपूर मोठमोठ्या कंपन्या आणि त्यांची उत्पादने आपल्या नजरेच्या पलीकडे सुरू असतात. हा आवाका व आकार याबाबत सांगायचे झाले तर 'रोज दोन तीन कोटी लिटर पाणी ह्या इंडस्ट्रीज वापरतात', म्हणजे तितकेच सांडपाणी ही तयार करणाऱ्या अशा या अवाढव्य कंपन्या आपल्या देशात व जगात अनेक आहेत. खाण उद्योग,धातू उद्योग,टेक्स्टाईल, फार्मासिटिकल,

केमिकल,फर्टीलायझर, पेट्रोकेमिकल याबरोबरच पॉवर प्लांट देखील या आणि इतर क्षेत्रातल्या या कंपन्या आहेत. म्हणजे या सांडपाण्यामुळे किती मोठ्या प्रमाणात नदी, तलाव आणि समुद्राचे प्रदूषण होत असेल याची कल्पना येते.पण काही ठिकाणी दोन तीन प्रमुख गोष्टींमुळे हे प्रदूषण रोखले जात आहे. 


१) कंपन्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सतत उपलब्ध असणे हे खूप आव्हानात्मक आहे. 


२) मोजकेच पण प्रभावी पर्यावरणप्रेमी लोक व पर्यावरणप्रेमी प्रशासन यांनी माणूस,प्राणी, वनस्पती व जमीन या सर्वांच्या अस्तित्वाचा व भवितव्याचा विचार करून बनवलेले प्रदूषण व पर्यावरण विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी. 


३) या विषयात असलेले सजग कार्यकर्ते व जनसामान्यांचा नैतिक दबाव या कारखान्यांवर असणे,या सर्वांचा विचार या मोठ्या उद्योगांना करावाच लागतो, कारण त्यांच्या कारखान्यांचा नफा, उत्पादकता ही कारखाने चालू असल्यामध्येच आहे, त्यामुळे पर्यावरणीय कायदे व लोकांचा विरोध या मुद्दयावर तोटा किंवा उद्योग बंद पडणे हे यांना परवडणारे नसते. म्हणूनच प्रदूषित घटकांच्या प्रक्रियेवर काम करणे गेल्या दोन-तीन दशकांत खूप अग्रक्रमाचे ठरत आहे. म्हणूनच सांडपाणी प्रक्रिया व हवेचे प्रदूषण नियंत्रणासाठी कोट्यावधी रुपयांची यंत्रे आणि यंत्रणा काम करत असते. सांडपाणी प्रक्रियेत ई.टी.पी. (Effluent Treatment Plant) च्या वापराबरोबरच गेली काही दशके मेम्ब्रेन फिल्टर्सच्या माध्यमातून रिव्हर्स ऑस्मॉसिसने सांडपाणी शुद्ध केले जाते. साधे पाणी शुद्ध करण्यासाठी आर.ओ. फिल्टर मेम्ब्रेन आणि सांडपाणी शुद्धीकरणासाठीचे मेम्ब्रेन वेगवेगळे असतात. तसेच सांडपाणी प्रत्येक इंडस्ट्रीचे वेगळे वेगळे असल्याने मेम्ब्रेनची संख्या व त्यांचे प्रकार वेगळे असतात. या मेम्ब्रेनमधून सांडपाणी शुद्ध केले जाते. या एकेका मेम्ब्रेनची किंमत २२ ते २५ हजार रुपये असते.असे हजार-पंधराशे मेम्ब्रेनची एक सिस्टिम आणि अशा सात आठ किंवा जास्त ही सिस्टिम अशी ती मांडणी असते,यंत्रणा असते. म्हणजे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक या सांडपाणी प्रक्रियेत झालेली असते. तर यातल्या या मेम्ब्रेनचा अभ्यास,त्यांची योग्यता,त्यांचा वापर, त्यांच्या समस्या आणि त्यावर उत्तरे शोधण्याचे काम करते राघव खडककर यांची कंपनी.मेम्ब्रेन पाणी तंदुरुस्त ठेवते आणि मेम्ब्रेनला तंदुरुस्त राघवजी.म्हणजे प्रत्यक्ष पाण्याची आणि जलचरांची सेवाच की!


ही सेवा म्हणजे संपुर्ण मानवतेचीच सेवा या ठिकाणी नतमस्तक होऊन पुढे जाऊ..!


... अजून कर्तुत्वाच्या गाथा पुढे सुरू आहेत.थोड्या थोड्या भागात त्या क्रमशः प्रकाशित केल्या जातील.


विजय कृष्णात गायकवाड