* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१६/१/२३

कुतुबुद्दीन ऐबकाने हा मिनार बांधला.पुढे इल्तुतमिष आणि मोहम्मद तुघलकाने याचं बांधकाम पूर्ण केलं असं तिथे सापडलेले शिलालेख सांगतात.

लोहस्तंभ…


दक्षिण दिल्लीत आपण मेहरोलीच्या दिशेने जाऊ लागलो की,दुरूनच आपल्याला कुतुबमिनार दिसू लागतो.२३८ फूट उंच असलेला हा मिनार म्हणजे जवळपास २३ मजली उंच इमारत.पूर्ण जगात विटांनी बांधलेली ही सर्वोच्च वास्तू आहे. जगभरातले पर्यटकही मिनार बघायला येत असतात.


साधारण ९०० वर्षं जुनी असलेली ही इमारत युनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.आज जिथे हा मिनार उभा आहे,तिथे पूर्वी, म्हणजे पृथ्वीराज चौहानच्या काळात,त्याची राजधानी 'ढिल्लीका' ही होती. ह्या ढिल्लीकामधील लालकोट ह्या किल्लेवजा गढीला पाडून मोहम्मद घोरीच्या सेनापतीने, म्हणजे 


कुतुबुद्दीन ऐबकाने हा मिनार बांधला.पुढे इल्तुतमिष आणि मोहम्मद तुघलकाने याचं बांधकाम पूर्ण केलं असं तिथे सापडलेले शिलालेख सांगतात.


मात्र ह्या 'ढिल्लीका' च्या परिसरात,ह्या कुतुब मिनारपेक्षा कितीतरी जास्त विलक्षण गोष्ट अनेक शतकं उभी आहे.कुतुब मिनारपेक्षाही त्या गोष्टीचे महत्त्व अनेक पटींनी जास्त आहे.कुतुब मिनारला लागूनच,साधारण शंभर,दीडशे फूट अंतरावर एक लोहस्तंभ उभा आहे.कुतुब मिनारपेक्षा बराच लहान.फक्त ७.३५ मीटर्स किंवा २४.११ फूट उंच... कुतुब मिनारच्या एक दशांश..! पण हा स्तंभ कुतुब मिनारपेक्षा बराच जुना आहे. इसवी सन ४०० च्या आसपास बनलेला हा स्तंभ म्हणजे भारतीय ज्ञानाच्या रहस्याचा खजिना आहे.


ह्या लोहस्तंभात ९८% लोखंड आहे.इतकं लोखंड म्हणजे हमखास गंजण्याची शाश्वती.मात्र गेली सोळा-सतराशे वर्षं सतत उन्हा-पावसात उभं राहूनही ह्याला अजिबात गंज चढलेला नाही.विज्ञानाच्या दृष्टीने हे एक मोठं आश्चर्य आहे.आजच्या एकविसाव्या शतकातही,प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात,धातुशास्त्रात अनेक प्रयोग, शोध आणि संशोधनं होऊनही ९८% लोखंड असलेला स्तंभ,गंजल्यावाचून राहत नाही.त्या स्तंभावर एखादं 'कोटिंग' केलं तर तो स्तंभ फक्त काही काळ गंजल्यावाचून राहू शकतो.मग ह्या लोहस्तंभात असं काय वैशिष्ट्य आहे की, हा स्तंभ आजही जसाच्या तसा उभा आहे..?


आय.आय.टी.कानपूरच्या 'मटेरियल्स अँड मेटॅलर्जिकल इंजिनिअरिंग' विभागाचे प्रमुख प्रोफेसर आर.सुब्रमण्यम यांनी यावर बरंच काम केलेल आहे.इंटरनेटवरही त्यांचे ह्या विषयासंबंधी अनेक पेपर्स मिळतात.


प्रो.सुब्रमण्यम यांच्या मतानुसार लोह-फॉस्फरस संयुगाचा उपयोग इसवी सनाच्या चारशे वर्षांपूर्वी,म्हणजे अशोकाच्या काळात,भरपूर व्हायचा.आणि ह्या पद्धतीनेच हा लोहस्तंभ तयार करण्यात आलेला आहे.


प्रो. सुब्रमण्यम आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी ह्या स्तंभावर वेगवेगळे प्रयोग करून हे सिद्ध करून दाखवलंय.त्यांच्या म्हणण्यानुसार लोखंडाला गंजनिरोधन करण आजच्या तंत्रज्ञानापुढचं मोठं आव्हान आहे.बांधकाम व्यवसाय,मेकॅनिकलशी संबंधित उद्योग यात अशा गंजरोधक लोखंडाची आवश्यकता असते आणि त्यासाठी इपोक्सी कोटिंग,कॅडोडिक प्रोटेक्शन पद्धत इत्यादी वापरल्या जातात.मात्र या साऱ्या पद्धती गंज लागणं लांबवतात.पूर्णपणे थांबवत नाहीत. गंज लागू द्यायचा नसेल तर त्या लोखंडातच गंजरोधक थर निर्माण करण्याची क्षमता असली पाहिजे.आज एकविसाव्या शतकात असे लोखंड निर्माण होऊ शकलेले नाही जे स्वत:च असा गंजरोधक थर निर्माण करते..!


पण भारतात चौथ्या शतकात असे लोखंड निर्माण होत होते,आणि त्याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे दिल्लीचा लोहस्तंभ.हा लोहस्तंभ मुळात दिल्लीसाठी बनलेलाच नव्हता.

चंद्रगुप्त विक्रमादित्य या प्रसिद्ध राजाने इसवी सन ४०० च्या आसपास हा स्तंभ,मथुरेतील विष्णु मंदिराच्या बाहेर लावण्यासाठी बनवला होता.या स्तंभावर गरुडाची मूर्ती पूर्वी विराजित झाली असावी.त्यामुळे याला 'गरुडस्तंभ' असेही म्हटले जाते.


ह्याला आधार आहे,ह्या स्तंभावर ब्राम्ही लिपीत कोरलेला एक संस्कृत श्लोक.चंद्र नावाच्या राजाच्या स्तुतीने भरलेला हा श्लोक विष्णुमंदिरा समोरच्या ह्या स्तंभाचं महत्त्व सांगतो.चंद्र नावावरून आणि चौथ्या शतकात हा स्तंभ तयार केला गेला असावा असा विचार करून,चंद्रगुप्त विक्रमादित्याने हा स्तंभ बांधला असावा असा तर्क काढण्यात आला.या कोरलेल्या श्लोकाची शैली ही गुप्तकालीन वाटत असल्याने ह्या तर्काला बळकटी मिळते.मथुरेजवळ असलेल्या विष्णुपद ह्या पर्वतावरील विष्णु मंदिरासमोर बांधण्यासाठी हा स्तंभ तयार करण्यात आल्याची नोंद ह्या श्लोकात मिळते.


(मात्र अनेक इतिहासतज्ज्ञांचे मत असे नाही. त्यांच्या मते इसवी सनापूर्वी ९१२ मधे हा स्तंभ बनवण्यात आला आहे.)


७ मीटर उंच असलेला हा स्तंभ,५० सेंटीमीटर (म्हणजे साधारण पावणे दोन फूट) जमिनीखाली आहे.४१ सेंटीमीटरचा व्यास खाली तळाशी तर ३० सेंटीमीटरचा व्यास वर टोकाला आहे.पूर्वी, म्हणजे सन १९९७ पर्यंत,पर्यटक ह्या स्तंभाला पाठीमागून कवेत पकडण्याचा प्रयत्न करायचे. अशा प्रकारे स्तंभ कवेत आला तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जायचं.पण त्यामुळे स्तंभाच्या लोखंडाला ठोकणे,त्यावर कोरण्याचे प्रयत्न करणे असं सगळं व्हायला लागल्यामुळे सन १९९७ पासून आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने या स्तंभाभोवती एक संरक्षक फेन्सिंग उभारले.त्यामुळे आता ह्या लोहस्तंभाला प्रत्यक्ष स्पर्श करणं शक्य नाही.


इतिहासातून बाहेर निघालेला हा एकटाच लोहस्तंभ अपवाद म्हणून आपल्याला दिसतो का..? तर तसे नाही. इतरही काही ठिकाणी असे न गंजलेले लोहस्तंभ उभे राहिलेले दिसतात.


भारतात ही कला इसवी सनापूर्वी सहाशे,सातशे वर्षं (किंबहुना त्याही पूर्वी) होती असे अनेक पुरावे मिळालेले आहेत.सोनभद्र जिल्ह्यात राजा नाल-का-टीला,छत्तीसगडमधील मल्हार आणि पश्चिम बंगालमधील पांडुराजार धिबी व मंगलकोट ह्या जिल्ह्यांत उत्तम प्रतीच्या लोखंडाचे अनेक अवशेष सापडले आहेत.आणि हे सर्व पुरावे नि:संशयपणे हेच सांगताहेत की, लोखंडाचं धातुकर्म भारतात विकसित झालं. अत्यंत उच्च प्रतीचं लोखंड भारतात तयार व्हायचं, शअसं त्या काळातल्या विदेशी प्रवाशांनीही लिहिलेलं आढळतं.


भारतात त्या काळापासून लोखंड तयार करणारे विशिष्ट समूह आहेत.त्यांपैकी 'आगरिया लोहार' समाज हा आजही,कोणतीही आधुनिक यंत्र न वापरता,जमिनीतील खाणींमधून लोखंडाची माती गोळा करतो.मातीतून लोखंडाची दगडे वेचून त्या दगडांवर प्रक्रिया करतो आणि या सर्व प्रक्रियेतून शुद्ध लोखंड तयार करतो.लोखंड निर्माण करण्याची ही आगरिया लोहार समाजाची परंपरागत पद्धत आहे.


'आगरिया' हा शब्द 'आग' ह्या शब्दापासून तयार झाला आहे.लोखंडाच्या भट्टीचे काम म्हणजे आगीचे काम. म्हणूनच 'आगरिया' हा शब्द.मध्य प्रदेशातल्या मंडला,शहडोल,अनुपपूर आणि छत्तिसगढच्या बिलासपूर आणि सरगुजा ह्या जिल्ह्यांत हा समाज आढळतो.हा समाज म्हणजे गोंड समाजाचेच अंग समजले जाते. ह्या समाजात दोन पोट-जाती आहेत -'पथरिया' आणि 'खुंटीया' यापैकी लोखंडाची भट्टी तयार करताना जे दगडाचा उपयोग करतात,ते झाले पथरिया (पत्थर म्हणजे दगड) आणि जे भट्टी तयार करताना खुंटीचा वापर करतात,ते झाले खुटीया.आजही ह्या समाजाच्या उपजीविकेचे साधन हे लोखंड 'तयार' करून त्यापासून अवजारं आणि हत्यार तयार करण्याचं आहे. भोपाळच्या संगीत वर्मा ह्या दिग्दर्शकाने ह्या आगरिया लोकांवर एक वृत्तचित्र तयार केलं आहे.ह्या वृत्तचित्रात जंगलातल्या मातीतून लोखंडाचे दगड निवडण्या पासून तर लोखंडाची अवजारं तयार करण्यापर्यंत पूर्ण चित्रण केलेलं आहे.


म्हणजे दोन-अडीच हजार वर्षांपासूनची ही धातुशास्त्राची परंपरा,फक्त या जमातीत का होईना,झिरपत झिरपत शिल्लक राहिलेली आहे. मग राजाश्रय आणि लोकाश्रय असताना अडीच हजार वर्षांपूर्वी ह्या धातुशास्त्राच्या कलेचं स्वरूप कसं असेल..?

नुसत्या कल्पनेनंच मन थक्क होतं..!


१४ जानेवारी २०२३ मधील लेखातील पुढील भाग…

पुढील भागात पाहू-अदृश्य शाईचे रहस्य..

१४/१/२३

गुढरम्य इतिहासाची किलकिली झालेली कवाडं...!

'दा विंची कोड' आणि 'एंजल्स एंड डेमंस' सारख्या जगप्रसिद्ध कादंबऱ्या लिहिणाऱ्या डेन ब्राऊन यांनी 'द लॉस्ट सिंबल' नावाचे एक पुस्तक लिहिलेय.त्यात नायक प्रश्न विचारतो, 


'मानवजात ज्ञानाच्या मागे लागली आहे आणि अत्याधुनिक ज्ञान मिळवत चाललीय.ज्ञान मिळविण्याचा वेग प्रचंड वाढत चालला आहे. हा सर्व प्रवास,पुढील पन्नास-शंभर वर्षांत आपल्याला कुठे घेऊन जाईल..? आणखी कशा प्रकारचं ज्ञान मिळवू आपण ह्या प्रवासात..?'


नायकाला उत्तर मिळते,"हा ज्ञानाचा प्रवास जो पुढे चाललेला दिसतोय,तो मुळी पुढे पुढे जातच नाहीये.तर आपलं मागील ज्ञान शोधून काढण्याचा प्रयत्न आहे हा.आपल्या जवळ जुन्या ज्ञानाचं इतकं प्रचंड भांडार आहे की पुढे जात जात तेच आपल्याला मिळणार आहे..!"


पुढे मात्र डेन ब्राऊन लिहितो, 'हे जे प्राचीन ज्ञान आहे,ते भारत, ्चीन यांसारख्या ठिकाणीच मिळेल. विशेषतः भारतात हा अमूल्य खजिना दडलाय..!'


एखाद्या तत्त्वज्ञ व्यक्तीने असे म्हणणे ही एक बाब,आणि डेन ब्राऊन यासारख्या लोकप्रिय लेखकाने हे म्हणणे ही वेगळी बाब होते.आणि म्हणूनच मग त्या प्राचीन ज्ञानाचा धांडोळा घेत मागे वळून बघितलं की जी काही थोडीफार, शिल्लक राहिलेली,ज्ञानाची किरणं दिसतात,ती बघूनच थक्क व्हायला होतं. असं वाटतं, 'त्या काळात हे असं ज्ञान आपल्या पूर्वजांना होतं ?'


त्या अद्भुत ज्ञानाची कवाडे किलकिली करण्याचा हा लहानसा प्रयत्न. .


- प्रशांत पोळ


बाणस्तंभ…


इतिहास हा फार चकवणारा विषय आहे.आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अशा जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जाते.हे असं शक्य आहे का, याविषयी मनात गोंधळ उडतो.दीड हजार वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही.


गुजराथच्या सोमनाथ मंदिरापाशी आल्यावर आपली अशीच स्थिती होते.मुळात सोमनाथ इतिहासच विलक्षण.बारा ज्योतिर्लिंगांतील हे एक देखणं,वैभवशाली शिवलिंग.इतकं समृद्ध की, उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथकडे गेलं आणि अनेकवार सोमनाथ लुटल्या गेलं.सोनं,नाणं,चांदी,हिरे, माणकं, रत्नं... सर्व गाडे भरभरून नेलं.आणि इतकी संपत्ती लुटल्या जाऊनही दर वेळी सोमनाथचं शिवालय परत तशाच वैभवानं उभं राहायचं.


मात्र फक्त ह्या वैभवासाठी सोमनाथ महत्त्वाचं नाही.सोमनाथचं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे.विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करत असतो. आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागराने कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही.कोणत्याही वादळामुळे सोमनाथाचे गौरवशाली मंदिर कधी उद्ध्वस्त झाले नाही.


ह्या सोमनाथच्या मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे. हा 'बाणस्तंभ' म्हणून ओळखला जातो. हा केव्हापासून त्या ठिकाणी आहे, हे सांगणं अवघड आहे. इतिहासाचा धांडोळा घेत घेत मागे गेलो की,कुठेतरी सहाव्या शतकापाशी आपण पोहोचतो,जिथे ह्या बाणस्तंभाचा उल्लेख आढळतो.


पण म्हणजे हा सहाव्या शतकात उभारला गेलाय असं सिद्ध होत नाही.हा स्तंभ किती जुना आहे, याबद्दल नक्की सांगणं शक्य नाही. 


"हा बाणस्तंभ म्हणजे दिशादर्शक स्तंभ आहे.यावर एक बाण उभारलाय,आणि खाली लिहिलंय


'आसमुद्रान्त दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग' 


याचा अर्थ असा - या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही. अर्थात या मार्गात एकही जमिनीचा तुकडा नाही.


ज्या क्षणी सर्वप्रथम मी हा स्तंभ बघितला अन् हा शिलालेख वाचला,तो वाचून डोक्यात त्याचा अर्थ जाता क्षणीच अंगावर काटा उभा राहिला! हे। ज्ञान इतक्या पूर्वी आपल्याला होतं..? कसं शक्य आहे हे? आणि जर हे खरंच असेल तर किती समृद्धशाली ज्ञानाचा वैश्विक वारसा आपण बाळगतोय..!


संस्कृतमधे कोरलेल्या ह्या एका ओळीच्या अर्थामधे अनेक गूढ अर्थ सामावलेले आहेत.ह्या ओळीचा सरळ अर्थ आहे,


सोमनाथ मंदिराच्या त्या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत (म्हणजे अन्टार्क्टिक पर्यंत) एक सरळ रेघ ओढली तर मध्ये एकही भूखंड लागत नाही.


आता हे खरं कशावरून.. ? आजकालच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात हे शोधणं सोपं व्हावं. मात्र हे तितकंसं सोपं नाही.गुगल मॅप वरून बघितलं तर वरवर बघता भूखंड दिसत नाही.मात्र तो मोठा भूखंड.एखादा लहान भूखंड शोधायचा असेल तर त्या पूर्ण मार्गाला 'एन्लार्ज' करत करत पुढे जायचे.हे तसं किचकट काम.मात्र संयम ठेवून, चिकाटीने हळूहळू बघत गेलं की मार्गात एकही मोठा भूखंड,म्हणजे 10 Km X10Km चा, लागत नाही.


त्याखालचा भूखंड हा विशेष तंत्रज्ञानानेच शोधावा लागेल.थोडक्यात,तो संस्कृत श्लोक खरा आहे असं धरून चालू.


पण मूळ प्रश्न तसाच राहतो.अगदी सन ६०० मध्ये हा बाणस्तंभ उभारला असं जरी म्हटलं, तरी त्या काळात पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध आहे, हे ज्ञान कुठून मिळालं? बरं,दक्षिण गोलार्ध माहीत होता हे गृहीत धरलं तरी सोमनाथ मंदिरापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत गेलं की मध्ये कोठेही एकही भूखंड येत नाही,हे 'मॅपिंग' कोणी केलं ?सारंच अद्भुत..!


याचाच अर्थ,बाणस्तंभ उभारण्याच्या काळात, भारतीयांना पृथ्वी गोल आहे हे माहीत होतं आणि फक्त तितकंच नाही,तर ह्या पृथ्वीला दक्षिण ध्रुव आहे (म्हणजेच अर्थात उत्तर ध्रुवही आहेच), हे ज्ञानही होतं.हे कसं काय शक्य झालं? त्यासाठी पृथ्वीचा 'एरियल व्ह्यू' घेण्याचं काही साधन होतं का? नसल्यास पृथ्वीचा नकाशा त्या काळी अस्तित्वात होता का?


नकाशाशास्त्र (इंग्रजीत 'कार्टोग्राफी' - मूळ फ्रेंच भाषेतून उचललेला शब्द) हे फार प्राचीन शास्त्र.ख्रिस्तपूर्व सहा ते आठ हजार वर्षांपूर्वी गुहेत कोरलेल्या आकाशस्थ ताऱ्यांचे नकाशे मिळाले आहेत.मात्र पहिल्यांदा पृथ्वीचा नकाशा कोणी काढला,यावर एकमत नाही.भारतीय ज्ञानाचे पुरावें मिळाले नसल्याने 'एनेक्झीमेंडर' ह्या ग्रीक शास्त्रज्ञाकडे हा मान जातो.ख्रिस्तपूर्व ६११ ते ५४६ हा त्याचा कालखंड.मात्र त्याचा नकाशा हा अत्यंत ढोबळ आहे.त्या काळात जिथे जिथे ज्ञात मनुष्यवस्ती आहे,तो भाग या नकाशात दाखविण्यात आलेला आहे.या नकाशात उत्तर आणि दक्षिण ध्रुव दिसण्याचंही काही कारण नाही.


आजच्या वास्तविक जगाच्या जवळ जाणारा पृथ्वीचा नकाशा हेनरीक्स मार्टेलसने साधारण सन १४९० च्या आसपास केलेला आढळतो. असं म्हणतात,कोलंबसने ह्याच नकाशाचा आधार घेतलेला होता.


'पृथ्वी गोल आहे' हे मत युरोपातील काही शास्त्रज्ञांनी ख्रिस्तपूर्व काळा व्यक्त केलेले आढळते.एनेक्झीमेंडरने ख्रिस्तपूर्व ६०० वर्षांपूर्वी पृथ्वीला एका 'सिलेंडर'च्या स्वरूपात बघितले होते.ॲरिस्टॉटलनेही पृथ्वीला गोल म्हटलेले आहे.


मात्र भारताजवळ हे ज्ञान फार आधीपासून होते ह्याच्या अनेक खुणा मिळतात.


याच ज्ञानाच्या आधारावर सन ५०० च्या आसपास आर्यभट्टने फक्त पृथ्वी गोल आहे,हेच सांगितले नाही,तर पृथ्वीचा व्यास ४,९६७ योजने आहे (म्हणजे नवीन मापनाप्रमाणे ३९,९६८ कि. मी.) हे देखील ठासून सांगितले. 


आज सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पृथ्वीचा काढलेला व्यास ४०,०७५ कि.मी.आहे.अर्थात आर्यभट्टच्या आकलनात चूक होतेय ती फक्त ०.२६%. सोळाशे वर्षांपूर्वी आर्यभट्टजवळ हे ज्ञान आले कोठून..?


सन २००८ मधे जर्मन इतिहासतज्ज्ञ जोसेफ श्वार्टझबर्गने हे सिद्ध केले की, 


ख्रिस्तपूर्व दोन / अडीच हजार वर्षांपूर्वीपासून भारतात नकाशाशास्त्र अत्यंत विकसित होते.नगर रचनेचे नकाशे तर त्या काळात उपलब्ध होतेच,पण नौकानयनासाठी आवश्यक असे नकाशे असल्याचेही पुरावे आढळतात.


भारतात नौकानयन शास्त्र फार पूर्वीपासून विकसित होतं.संपूर्ण दक्षिण आशियात ज्या प्रकारे हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळतात, त्यानुसार भारताची जहाजं पार पूर्व टोकापर्यंत, म्हणजे जावा,सुमात्रा,यवद्वीप ओलांडून जापानपर्यंत समुद्रात विहार करत होती याचे भरभक्कम पुरावे मिळाले आहेत.१९५५ साली शोधण्यात आलेल्या गुजरातच्या लोथलमध्ये अडीच हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत.यात भारताच्या प्रगत नौकानयनाविषयी अनेक पुरावे दिसतात.


अर्थात सोमनाथ मंदिर उभारण्याच्या काळात दक्षिण ध्रुवापर्यंतचे दिशादर्शन त्या काळातील लोकांना असेल हे निश्चित.दुसरा अजून एक विचार समोर येतो की,दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत जमीन नसलेला समुद्र आहे हे नंतर शोधून काढण्यात आलं,की दक्षिण ध्रुवापासून जमीन नसलेल्या सरळ रेषेची सांगता भारतात जिथे होते,तिथे सोमनाथ हे ज्योतिर्लिंग उभारण्यात आलं..? त्या बाण-स्तंभावर लिहिलेल्या ओळीत उल्लेख केलेला आहे, ('आसमुद्रान्त दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग) तो ज्योतीमार्ग म्हणजे नेमकं काय..?


सध्या तरी हे गूढच आहे..!


पुढील भागात 'लोहस्तंभ' 

भारतीय ज्ञानाचा खजिना - प्रशांत पोळ

११/१/२३

आपणच वाट आणि आपणच वाटसरू अशी माणसाची अवस्था होती.

१.१ प्राचीन जग आणि भारतातलं आयुर्वेद..


बायॉलॉजी म्हणजेच जीवशास्त्र ही विज्ञानाची शाखा सजीवांचा अभ्यास करते. खरं तर ज्या क्षणी माणसाला आपल्या आजूबाजूचे दगड, माती,नद्या,समुद्र आणि पाणी या निर्जीव गोष्टी आणि हालचाल करणारे प्राणी,पक्षी,

वाढणाऱ्या वनस्पती आणि आपण स्वतः या सजीव गोष्टींमध्ये असलेल्या फरकाची जाणीव झाली, त्या क्षणी बायॉलॉजीचा जन्म झाला! 


अर्थात,हा काळ तसा फारच जुना म्हणावा लागेल.पण माणसाच्या मनात कायमच आपल्या भोवतालच्या गोष्टींबद्दल कुतूहल होतं,त्यामुळेच माणूस जीवनाच्या सगळ्याच गोष्टींमध्ये प्रगती करू शकला.


अश्मयुगातला माणूस जेव्हा स्वतःच उत्क्रांत होत होता,जंगली अवस्थेत होता,तेव्हा तो झाडाला लागलेली,जमिनीवर पडलेली किंवा पक्ष्यांनी प्राण्यांनी खाऊन उष्टी केलेली फळं-कंदमुळं,

बेरी,लहान किडे वेचून खायचा किंवा शिकार करून प्राणी आणि पक्षी यांना मारून खायचा.कोणती फळं चांगली लागतात,कोणती विषारी आहेत,कोणत्या प्राण्याची शिकार कशी करावी या गोष्टींचं ज्ञान तो तेव्हापासून आपल्या मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित करत राहिला.हेही खरं तर जीवशास्त्राचंच ज्ञान होतं.पण ते ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीनं घेतलं नव्हतं तर ते आपल्या उपयोगासाठी घेतलं होतं.गंमत म्हणजे आपण कोणत्याही विज्ञान शाखेचा इतिहास पाहिला तर त्यात माणसानं आधी उपयोगाकरता ज्ञान मिळवलं आणि नंतर त्यातल्या पायाभूत विज्ञानाचा शोध घेतला! म्हणजेच आधी चक्क अप्लाइड सायन्स आलं आणि नंतर फंडामेंटल सायन्स आलं!


बायॉलॉजीच्या बाबतीतही हेच झालं.सुरुवातीला माणसानं आपल्या भोवतीच्या वनस्पती आणि प्राणी यांचे उपयोग शोधले आणि नंतर त्यांच्याबद्दलचा अभ्यास केला.त्यामुळेच आधी वैद्यकशास्त्र,

औषधनिर्माणशास्त्र,आयुर्वेद,शेती आणि पशुपालन या गोष्टी आल्या आणि त्यानंतर वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र आले.


गंमत म्हणजे ज्या गोष्टी आज आपण विज्ञानात समाविष्ट करतो,त्या गोष्टींना पूर्वीच्या काळी विज्ञान म्हणतच नव्हते! माणसाच्या इतिहासातली अनेक शतकं बायॉलॉजीला विज्ञानाचा दर्जा नव्हता.बायॉलॉजी म्हणजेच जीवशास्त्र या विज्ञान शाखेचा अभ्यास खरं तर ख्रिस्तपूर्व काही हजार वर्षांपासून सुरू झाला होता.त्यात भारतातलं आयुर्वेद आणि ग्रीसमधलं नॅचरल सायन्स आघाडीवर होतं.पण बायॉलॉजी या शब्दाचा उगम व्हायला मात्र अठरावं शतक उजाडावं लागलं.त्याआधी बायॉलॉजीला नॅचरल हिस्ट्री,नॅचरल फिलॉसॉफी,नॅचरल थिऑलॉजी अशी अनेक नावं होती.


बायॉलॉजी हा शब्द सगळ्यात आधी..


फ्रेंच बायॉलॉजिस्ट जीन बाप्टिस्ट पिअरे अँटोनी दे मोनेत दे लॅमार्क Jean-Baptiste Pierre Antoine de Monet de Lamarck 


यानं अठराव्या शतकात वापरला.हा शब्द बायॉस म्हणजे सजीव आणि लॉगॉस म्हणजे अभ्यास या दोन ग्रीक शब्दांच्या जोडणीतून (संधीतून) आलेला आहे. 


लॅमार्कनंच आपल्या पुस्तकात पहिल्यांदा व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स यांच्यातला फरक दाखवून दिला.त्यानंतर मात्र १७९९ मध्ये थॉमस बेडॉस (Thomas Beddoes) यानं,१८०० मध्ये कार्ल फ्रेडरिक बर्दाच (Karl Friedrich Burdach)आणि मायकेल ख्रिस्तोफ हॅनोज़ (Michael Christoph Hanow's) यानं १७६६ मध्ये या तिघांनी हा शब्द - स्वतंत्रपणे आपापल्या पुस्तकांमध्ये वापरल्याचे उल्लेख आहेत.यानंतर मात्र सजीवांच्या अभ्यासासाठी सगळीकडेच 'बायॉलॉजी' हा शब्द वापरात यायला लागला.यानंतर बॉटनी आणि झूऑलॉजी या बायॉलॉजीच्या दोन महत्त्वाच्या शाखा मानल्या जायला लागल्या.


 एखादा रोग भूतपिशाच बाधा झाल्यानं होतो आणि देवाची उपासना केल्यावर बरा होतो ही अंधश्रद्धा दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीपासून जगात सगळीकडेच कित्येक शतकं कायम होती. 


त्यामुळे सुरुवातीला कोणत्याही गोष्टीचं कार्य-कारण-भाव समजण्यासाठी माणसानं वैज्ञानिक दृष्टिकोनानं बघण्याआधी सगळ्याच गोष्टींकडे धार्मिक आणि अंधश्रद्धेच्या चश्म्यातून पाहिलं होतं.चश्मा कसला झापडंच ती विज्ञानानं ही झापडे काढून टाकून माणसाला कारणमीमांसेची स्वच्छ दृष्टी दिली.


त्या काळी विज्ञानाचा अभ्यास करणंही तितकं सोपं नव्हतं.विज्ञानाचा अभ्यास करायचा म्हणजे काय शोधायचं आणि कसं शोधायचं हेही माणसालाच ठरवावं लागणार होतं.

आपणच वाट आणि आपणच वाटसरू 

अशी माणसाची अवस्था होती. 


त्या काळी मग माणूस वेगवेगळे जिवंत प्राणी, खाटकाच्या दुकानातले कत्तल केलेले मृत प्राणी किंवा धार्मिक स्थळी बळी दिलेल्या प्राण्यांचं निरीक्षण करायचा.अर्थात,अशी निरीक्षणंही पूर्णपणे अभ्यास करण्यासाठी केलेली नव्हती तर यातून आपल्याला त्या प्राण्याचा जास्त उपयोग कसा होईल आणि ते ज्ञान आपण आपल्या पुढच्या पिढीला कसं देऊ शकू या विचारांनीच केलेलं होतं.गंमत म्हणजे पूर्वीच्या काळी अनेक देशांमधले अँनॅटॉमिस्ट हे चक्क एखाद्या मेंढयाची कत्तल करून त्याच्या यकृताच्या आकारावरून त्या देशाच्या राजाचं आणि देशाचं भविष्य सांगणारे ज्योतिषी होते! शिवाय,अनेक देशांमध्ये सूर्याला प्राण्याचं किंवा चक माणसाचं हृदय अर्पण केल्यानं आपलं भलं होतं अशा प्रकारच्या अंधश्रद्धाही होत्याच.त्यातून अनेक देशांमध्ये युद्धं व्हायची तेव्हा माणसं मरायची,त्यांचे अवयव तुटायचे.अशा माणसांना मग त्या त्या काळचे वैद्य,हकीम किंवा डॉक्टर्स त्या वेळच्या ज्ञानानुसार उपचार करायचे.गंमत म्हणजे पिढ्यान् पिढ्या चालणाऱ्या अशा गोष्टींतूनच माणसाकडे आपल्या शरीरात कोणते अवयव असतात याची बरीचशी जमा होत गेली.उपयुक्त माहिती जमा होत गेली.


सदरची वाचणीय व ज्ञानात वाढ करणारी ही वैज्ञानिक माहिती सजीव या पुस्तकातील आहे.लेखक -अच्युत गोडबोले अमृता देशपांडे,प्रकाशक-मधुश्री पब्लिकेशन


आजपासून जवळपास ३००० वर्षापूर्वीची मृत शरीरं जपून ठेवण्याची इजिप्शियनांची कला पाहिली की थक्क व्हायला होतं.माणसाच्या शरीराचं सखोल ज्ञान असल्याशिवाय मृत शरीराची ममी तयार करणं शक्यच नव्हतं.काही ममीज तर इतक्या व्यवस्थित आहेत,की आजही आपण अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेली ती व्यक्ती कशी दिसत असावी याची स्पष्ट कल्पना करू शकतो! मृत शरीराची ममी बनवण्याचा हा कार्यक्रम तब्बल ७० दिवस चालायचा!आधी मृत शरीरातले काही अवयव आणि शरीरातलं जवळपास सगळं पाणी काढून टाकून नंतर त्या शरीरात मसाले भरून ते शरीर पुन्हा बंद केलं जायचं.यातूनच कोरडं असलेलं शरीर कुजत नाही हे माणूस त्याच वेळी शिकला होता..


बॅबिलॉनच्या काळात ख्रिस्तपूर्व १९२० मध्ये मेसोपोटेमियातल्या दगडांत कोरलेल्या हमुराबी कोडमध्येही वैद्यकशास्त्राबद्दल लिहिलेलं आढळून येतं.यातून त्या लोकांकडे मागच्या अनेक पिढ्यांतून माणसाच्या शरीराच्या निरीक्षणांतून चालत आलेलं उपयुक्त ज्ञान होतं असं लक्षात येतं.


विशेष म्हणजे या ज्ञानाची उपासना सगळ्यात आधी आपल्या भारतात सुरू झाली,ज्या वेळी इतर सगळ्या जगात विज्ञान तर सोडाच,पण वैज्ञानिक दृष्टिकोनही विकसित व्हायला अजून काही शतकं लागणार होती,त्यावेळी भारतात अनेक ज्ञान शाखा विज्ञानाच्या पायावर अढळपणे उभ्या होत्या.भारतात खूप पूर्वीपासूनच विज्ञानाची आणि गणिताची खूपच मोठी परंपरा होती.


ख्रिस्तपूर्व २८०० ते २५००च्या काळात

प्रचंड भरभराटीला आलेली मोहेंजोदडोची संस्कृती,तिथली सुनियोजित शहरं,तिथलं इंजिनिअरिंग,धातुकाम,वजन आणि औषधं हे सगळं थक्कच करणारं होतं.रावळपिंडीपासून ३२ किमी पश्चिमेला असलेल्या पेशावरजवळ ख्रिस्तपूर्व ११ व्या शतकात स्थापन झालेलं तक्षशिला विद्यापीठ,

त्यातला व्याकरणतज्ज्ञ पाणिनी,ख्रिस्तपूर्व ८ व्या शतकातला आयुर्वेदाचार्य अमेय,ख्रिस्तपूर्व ४ थ्या शतकातला तिथलाच अर्थतज्ज्ञ कौटिल्य,ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकापासून ते इ.स. ७०० पर्यंत चाललेलं नालंदा विद्यापीठ हे पाहून आपण चाटच पडतो. पाचव्या शतकातले आर्यभट्ट आणि वराहमिहीर, ७ व्या शतकातला ब्रह्मगुप्त,त्याच सुमारास भारतानं जगाला दिलेली शून्य (0) ची भेट आणि त्यानंतर झालेले महावीर (इ.स. ८५०),मंजुला (इ.स. ९३२),

श्रीपती (इ.स. १०२०) आणि भास्कराचार्य इ.स. (१११४) हे फार महान गणितज्ञ भारतात होऊन गेले आहेत.


याशिवाय आपल्याकडे वेगवेगळ्या विषयांवर आणि ज्ञानप्रवाहांवर जाहीर चर्चा व्हायच्या. अनेक राजांच्या दरबारात अशी हुशार मंडळी वादचर्चेसाठी लोकप्रिय असायची.इतर प्रांतातली हुशार मंडळीही या वादचर्चेसाठी मुद्दाम आदरानं बोलावली जायची आणि त्यांच्यात वादचर्चा व्हायच्या.त्यातून सगळ्यांनाच नव्यानं शोध लागलेलं ज्ञान (आजच्या भाषेत 'कटिंग एज' नॉलेज) मिळत होतं.या सगळ्या विज्ञानवादावर आणि वादचर्चेबद्दल चार्वाक आणि लोकायत यांच्या तत्त्वज्ञानाच्या लिखाणातून आपल्याला कळतं.


नोबेल पारितोषिक मिळवलेले भारताचे सुपुत्र अमर्त्य सेन यांनी आपल्या 'द अर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन' या पुस्तकात अतिशय रंजकपणे हे मांडलंय.त्यात त्यांनी पूर्वीच्या काळी भारतात संस्कृती,वेगवेगळ्या ज्ञानशाखा,समाजशास्त्र आणि औषधनिर्माणशास्त्र यांच्याबद्दलच्या वादचर्चा कशा चालायच्या हे रसाळपणे लिहिलंय.


क्रमशः

९/१/२३

सर्वांना समजून घेण्याचा अर्थ आहे. सर्वांना क्षमा करणे.'

" ऐक बेटा! मला तुला काही सांगायचंय.तू गाढ झोपेत आहेस.तुझा इवलासा हात तुझ्या सुकुमार गालाखाली दबलाय आणि तुझ्या घामाने भरलेल्या कपाळावर कुरळे केस विखुरले आहेत.मी तुझ्या खोलीत गुपचुप शिरलो आहे एकटाच,नुकताच मी जेव्हा लायब्ररीत वर्तमानपत्र वाचत होतो तेव्हा मला खूप पश्चात्ताप झाला.म्हणूनच मी अर्ध्या रात्री तुझ्याजवळ उभा आहे,एखाद्या अपराध्यासारखा!


ज्या गोष्टींबद्दल मी विचार करीत होतो त्या अशा आहेत बेटा.मी आज तुझ्यावर खूप रागावलो. जेव्हा तू शाळेत जायला तयार होत होतास तेव्हा मी तुझ्यावर खूप चिडलो.तू टॉवेलऐवजी पडद्याला हात पुसले होतेस.तुझे जोडे घाणेरडे होते,यावरूनसुध्दा मी तुला रागावलो.तू जमिनीवर इकडे तिकडे पसारा करून ठेवला होतास,त्यावरूनसुध्दा मी तुला खूप वेडंवाकडं बोललो.


नाश्ता करताना मी तुझ्या एका मागोमाग एक चुका दाखवत गेलो.तू टेबलावर खाणं सोडून दिले होतेस.खाताना तू मचमच आवाज करीत होतास.टेबलावर तू हाताची कोपरं टेकवली होतीस.तू ब्रेडवर खूप सारे लोणी चोपडले होतेस.एवढेच नव्हे,तर मी ऑफिसमध्ये जात होतो आणि तू खेळायला जात होतास तेव्हा तू वळून हात हलवून "बाय बाय,डॅडी "

म्हणाला होतास अन् मी भुवया उडवून तुला टोकले होते,'तुझी कॉलर नीट कर.


संध्याकाळीदेखील मी हेच सगळे केले. ऑफिसातून परतल्यावर तू मातीत मित्रांबरोबर खेळत होतास हे मी पाहिले.तुझे कपडे मळलेले होते,तुझ्या मोज्यांना भोके पडली होती.मी तुला पकडून घेऊन गेलो आणि तुझ्या मित्रांसमोर 'मोजे महाग आहेत.जेव्हा तुला विकत घ्यावे लागतील तेव्हा तुला त्याची किंमत कळेल'असं म्हणून तुला अपमानित केले.जरा विचार करा, एक बाप आपल्या मुलाचे मन यापेक्षा अधिक कसे दुखावू शकेल ?


तुला आठवतेय का,जेव्हा मी लायब्ररीत वाचन करत होतो तेव्हा तू माझ्या खोलीत रात्री आला होतास,एखाद्या घाबरलेल्या हरणाच्या पाडसासारखा,तुला किती दुःख झाले आहे हे तुझ्या डोळ्यांवरून कळून येते होते आणि मी वर्तमानपत्रावरून तुझ्याकडे बघत माझ्या वाचनात व्यत्यय आणल्याबद्दल आता काय हवंय,कधी तरी आरामात बसू दे मला!' असं म्हणत तुला झिडकारुन टाकले होते.त्या वेळी तू दारातच थबकला होतास.


तू काहीही न बोलता,फक्त लाडात येऊन माझ्या गळ्यात हात घालून माझे चुंबन घेऊन "गुड नाइट" म्हणून निघून गेला होतास.


तुझ्या छोट्या छोट्या हातांच्या मिठीवरून असे कळून येत होते की तुझ्या अंत:करणात ईश्वराने प्रेमाचे असे फूल लावले आहे जे इतक्या उपेक्षेनंतरही मरगळले नाही... मग तू जिन्यावर खट-खट आवाज करीत निघून गेलास.


तर बेटा,या घटनेनंतर थोड्याच वेळाने माझ्या हातून वर्तमानपत्र गळून पडले आणि मला खूपच हताश वाटू लागले.हे मला काय होत आहे? दोष काढण्याची,धाकदपटशा दाखवण्याची सवय होत चालली होती मला,आपल्या मुलाच्या बालिश चुकांचे हे बक्षीस मी त्याला देत होतो.असं नाही 


बेटा,की मी तुझ्यावर प्रेम करीत नाही,पण मी एका लहान मुलाकडून आवश्यकतेपेक्षा जास्त अपेक्षा करत होतो.मी तुझं वागणं आपल्या वयाच्या तराजूनं तोलून बघत होतो.


तू इतका लोभस आहेस,इतका चांगला आणि 


खरंच,तुझे छोटेसे हृदय इतके विशाल आहे जशी की पर्वतांच्या मागून उगवणारी पहाटच! 


तुझी महानता यावरूनच दिसून येते की दिवसभर वडिलांकडून बोलणी खाऊनही त्यांना रात्री गुड नाइट किस द्यायला तू आलास. आजच्या रात्री इतर काहीच महत्त्वाचे नाही बेटा. मी या अंधारात तुझ्या उशाशी आलोय आणि इथे गुडघे टेकून शरमिंदा होऊन बसलोय.


हा एक कमकुवत पश्चात्ताप आहे.मला माहीत आहे की जर मी तुला जागं करून हे सगळं सांगितलं तर कदाचित तुला हे काहीच समजणार नाही.पण उद्यापासून मी नक्कीच तुझा लाडका बाबा बनून दाखवेन.मी तुझ्याबरोबर खेळेन,तुझ्या मजेदार गोष्टी मन लावून ऐकेन,तुझ्यासह खळखळून हसेन आणि तुझ्या दुःखात सहभागी होईन.यापुढे जेव्हा कधी मी तुला रागवायला तोंड उघडेन,त्याआधीच मी माझी जीभ दातांखाली दाबून धरेन.मी एखाद्या मंत्रासारखं असं वारंवार म्हणेन, "तो तर अगदी छोटासा आहे... छोटासा मुलगा !"


मला याचे दुःख होते की मी तुला मुलगा नव्हे तर मोठा माणूस समजलो होतो.पण आज जेव्हा मी तुला पाय पोटाशी घेऊन झोपलेला,थकलेला पाहतोय तेव्हा बेटा,मला असं वाटत आहे की तू अजून छोटाच तर आहेस! कालपर्यंत तू आपल्या आईच्या कुशीत होतास,तिच्या खांद्यावर डोकं ठेवून होतास.मी तुझ्याकडून किती अवास्तव अपेक्षा केली होती,किती तरी जास्त !


लोकांवर टीका करण्यापेक्षा आम्ही त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा.आम्ही हे शोधून काढायला हवे की ते जे काही करतात ते का बरे करतात.हे टीका करण्यापेक्षा अधिक रोचक आणि लाभदायक होईल.एवढेच नव्हे,तर त्यामुळे सहानुभूती,सहनशक्ती आणि दयाळूपणाचे वातावरण निर्माण होईल.सर्वांना

समजून घेण्याचा अर्थ आहे सर्वांना क्षमा करणे.'


डॉ.जॉन्सननी म्हटलंय,

"ईश्वर स्वतःमानवाच्या मृत्यूआधी त्याचा निर्णय घेत नाही." 

तर मग तुम्ही आणि मी असे करणारे कोण ?"

फादर फरगेट्स

(प्रत्येक पित्याने हे लक्षात ठेवावे) - 

डब्लू.लिव्हिंगस्टोन लार्नेड


मंजुल पब्लिशिंग हाऊस

मित्र जोडा-डेल कार्नेगी मधून..

७/१/२३

तुम्ही स्वतःमधलं काही देऊन टाकता तेव्हा तुम्ही खरं दिलेलं असतं…'दान'

मग एक श्रीमंत सावकार म्हणाला,'दानाविषयी आम्हाला काही सांग.' त्यावर अल् मुस्तफा बोलू लागला :


तुमच्या धनदौलतीतलं तुम्ही देता तेव्हा तुम्ही काहीच दिलं नाही,असं होतं.तुम्ही स्वतःमधलं काही देऊन टाकता तेव्हा तुम्ही खरं दिलेलं असतं.कारण तुमची दौलत म्हणजे काय असतं? तर,आज ना उद्या गरज पडेल त्यावेळी ताब्यात असाव्यात अशा वस्तूंचा तुम्ही परिग्रह केलेला असतो.त्या संचयामागे त्यांना गमावण्याचं भय असतं.


'उद्या',म्हणजे तरी काय? पवित्र दिव्यनगरीच्या यात्रेकरूंना वाळवंटात सोबत करीत असलेला एखादा अतिशहाणा कुत्रा वाळूखाली हाडकं पुरून ठेवत चालला तर भविष्यात त्याचा निर्वाह होईल काय ?


एखाद्या गरजेचं भय ही देखील नड आणि गरजच की!तुमची विहीर भरलेली असताना तहानेचं भय तुम्हाला पडेल तर तुमची तहान शमेल कशी? प्रचंड धनदौलतीतला नगण्य हिस्सा काहीजण दानार्थ देतात,त्यांना नावलौकिक हवा असतो.त्यांच्या या छुप्या वासनेनं त्यांचं दान निःसत्त्व होऊन जातं.


काहीजण परिग्रहशून्य असतात,तरी जवळचं सर्व काही देऊन बसतात.त्यांची जीवनावर आणि विश्वंभर चैतन्यावर श्रद्धा असते.त्यांची तिजोरी कधीच रिती पडत नाही.कित्येकांना दान करण्यानं आनंद होतो.आनंदात त्यांचा परितोष असतो.


काहींना दान करताना दुःख होतं.त्या दुःखात नवजीवनाची दीक्षा असते.काहीजण असे असतात की देताना दुःख होत आहे याचीही त्यांना जाणीव नसते,की आनंद मिळवावा ही धडपड नसते.आपण पुण्यकृत्य करीत आहोत,याचीही त्यांना वार्ता नसते.


दूरच्या डोंगरदरीत मर्टल् ची शुभ्र फुलं अवकाशात आपला परिमळ विखुरतात,तशी ती माणसं असतात.त्यांच्या हातांमधून ईश्वराची वाणी ऐकू येते.त्यांच्या डोळ्यांतून तो या धरणीवर स्मित करीत वावरतो.


कुणी याचना केली असता दान द्यावं हे चांगलंच, पण अ-याचकालाही उमजून द्यावं हे अधिक चांगलं.मुक्तहस्तांनी खैरात करणाऱ्याला,दान न करताच आपल्याकडून कुणी काही घेतलं तर फार आनंद होतो..


तसं बघितलंत तर देण्याला हात आखडावा असं आपल्यापाशी काय असतं?


 आपलं ज्याला म्हणतो ते सर्वच्या सर्व एके दिवशी विसर्जित होणार असतं.म्हणून म्हणतो की द्यायचं ते आताच द्या.तुमच्या वारसदारांना ती संधी

कशासाठी ?


तुमच्या नेहमी बोलण्यात येतं:दान देईन,पण केवळ पात्र असणाऱ्याला.तुमच्या फळबागेतली झाडं असं कधी म्हणतात काय? तुमच्या कुरणांवर चरणारे मेंढ्यांचे कळप असं कधी म्हणतात काय ?


सर्वस्व - दान हे त्यांचं जीवन असतं.दान आखडून धरावं यात मृत्यू असतो.


दिवसाचा प्रकाश आणि रात्रीची विश्रांती ज्याला बहाल झाली आहे,तो कोणीही असो,तुमच्या दानाला पात्र समजा.


या जीवन-महासागराचे घोट घेण्यास जो पात्र आहे तो तुमच्या ओहोळातून प्याला भरून घेण्यास योग्य नसेल काय ?


ज्या धीरानं,विश्वासानं आणि उदारपणानं दान स्वीकारलं जातं,ते खरं तर मेजवानीनंतरच्या मुखशुद्धीहून फार थोर असतं काय ?


माणसांनी आपलं अंतःकरण उघडून ठेवावं, स्वाभिमान उचकटून दाखवावाअसे तुम्ही कोण आहात ?त्यांची योग्यता आणि त्यांची अस्मिता उघडीनागडी पाहावी अशी तुमची कोणती पात्रता?दान देण्यास किंवा दानाचा बटवडा करण्यास तरी आपण पात्र आहोत का,याची पारख करा.


खरं तर,चैतन्य ज्याच्या स्वाधीन होतं तेही चैतन्यच असतं.दान देतो म्हणवणारे तुम्ही,दानाचे फार तर साक्षी असता.


बंधुजनहो बंधु तुम्ही सर्वचजण दान ग्रहण करणारे आहात.घेतलेल्या दानाला उपकार समजून ओझं मानू नका.मानाल तर,स्वतःच्या आणि दानकर्त्याच्या जिवाला जोखडाखाली घालाल.


दानकर्त्यानं दिलेल्या दानावर तुम्ही दोघेही एकजुटीनं उभे व्हा... दोन्ही पंख उघडून आकाशगामी व्हा...


घेतलेलं दान कर्ज आहे असं सारखं समजत राहणं म्हणजे दात्याच्या औदार्याविषयी शंका घेणं होय.मुक्त हातांनी प्रदान करणारी धरणी त्याची आई आहे आणि ईश्वर त्याचा पिता आहे,हे विसरू नका.


खलील जिब्रान यांच्या 'द प्रॉफेट या पुस्तकातून..