* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२३/३/२४

तुम्ही हे करु शकता..You can do this..

अनेक वर्षाआधी फिलाडेल्फिया पेपर 'इव्हिनिंग बुलेटीन'च्या विरुद्ध एक धोकादायक अफवा पसरवली जात होती.या दुर्भावनापूर्ण अफवा वेगाने पसरवल्या जात होत्या.जाहिरात देणाऱ्यांना हे सांगितले जात होतं की,आता वाचक या पेपरात कमी रुची घेतात,कारण यामध्ये जाहिराती खूप असतात आणि वाचायची सामग्री खूपच कमी असते.अफवा दाबण्याकरिता तत्काळ काही करणं जरुरीचं होतं.परंतु कसं ? पेपरने अफवेला उत्तर या प्रकारांनी दिलं.बुलेटिनने एक दिवस सगळ्या प्रकारच्या बातम्यांना कापलं,त्याचं वर्गीकरण केलं आणि त्याचं पुस्तकाच्या रूपात प्रकाशन केलं.या पुस्तकाचं नाव ठेवले गेलं 'वन डे'. या पुस्तकात ३०० पानं होती.याचा आकार हार्डकव्हर पुस्तकाप्रमाणेच होता.जर याला पुस्तकाप्रमाणे विकलं तर याची किंमत काही डॉलर्स असायला हवी होती;परंतु पेपरने या सगळ्या बातम्या आणि लेख एकाच दिवसात छापले होते.यांची किंमत काही डॉलर्स नाही,तर फक्त काही सेंटच होती.पुस्तक छापल्यावर हे तथ्य नाटकीय रूपात समोर आले की,बुलेटिन आपल्या वाचकांकरिता खूपच जास्त रोचक माहिती छापतात.

यामुळे तथ्य जास्तच उठावदारपणे जास्तच खमंगपणे अधिक प्रभावी ढंगात समोर आलं.आकडे किंवा वायफळ गोष्टींनी या अफवेला इतक्या चांगल्या तऱ्हेने उत्तर दिलं गेलं नसतं.हे नाटकीयतेचं युग आहे.फक्त खरं बोलणंच पुरेसं नसतं.खऱ्याला नाट्यरूपाने आणि वेधक प्रकारे सादर करायला पाहिजे.सिनेमात होतं. टीव्हीत होतं आणि जर तुम्ही लोकांच लक्ष आकर्षित करू इच्छिता तर तुम्हालापण हेच करावं लागेल.विंडो डिस्प्लेचे विशेषज्ञ नाटकीय शक्तीला जाणतात.उदाहरणार्थ,एक नवीन उंदीरमार औषधाच्या निमित्ताने आपल्या डीलर्सला विंडो डिस्प्लेचं जे सामान दिलं त्यात दोन जिवंत उंदीरपण होते.ज्या आठवड्यात जिवंत उंदीर शोकेसमध्ये ठेवले गेले,विक्री इतर वेळेपेक्षा पाचपट जास्त वाढली.


टीव्हीवर येणाऱ्या जाहिराती बघा,ज्यात सामान विकण्यासाठी नाटकीय तंत्राचा प्रयोग केला जातो.एक दिवस संध्याकाळी आपल्या टीव्हीसमोर बसा आणि या गोष्टीकडे लक्ष द्या की,जाहिराती देणारे कोणत्या प्रकारे त्यांच्या प्रॉडक्टची जाहिरात करतात.तुम्हाला माहिती होईल की,एक अँटॅसीड औषध एका टेस्ट ट्यूबमध्ये ॲसिडचा रंग बदलून देते.जेव्हा की याचं प्रतिवादी औषध असं नाही करू शकत. साबण किंवा डिटर्जंटाचा एक ब्रँड मळलेल्या शर्टाला चमकदार पांढरा करतो.जेव्हा की, दुसऱ्या ब्रँडच्या सफाईमध्ये पिवळेपणा आहे. तुम्ही हेही पाहाल की,एक कार अनेक वेळा फिरते आणि वळते.जे केवळ सांगण्यापेक्षा कितीतरी चांगलं आहे.तुम्हाला सामान खरेदी करण्यात खूश असणारे प्रसन्न चेहरे दाखवले जातात.याचप्रकारे प्रेक्षकांच्या समोर फायद्याचे नाटकीय प्रदर्शन केलं जातं आणि याच कारणामुळे लोक त्या सामानाला खरेदी करायला प्रेरित होतात.तुम्ही आपले विचार बिझनेस किंवा जीवनाच्या कोणत्याही दुसऱ्या गोष्टींनाही नाटकीय पूर्ण रूपात सादर करू शकता.हे सोपं आहे.जिम ईमैन्स रिकमंड,व्हर्जिनियामध्ये एनसीआर (नॅशनल कॅश रजिस्टर) कंपनीचे सेल्समन आहेत.ते सांगतात की,त्यांनी नाटकीय प्रदर्शन करून कशा प्रकारे एकदा त्यांचा माल विकला.'मागच्या आठवड्यात मी शेजारच्या किराणा दुकानात गेलो आणि मी बघितलं की,तो आपल्या चेकआउट काउंटरवर जी कॅश रजिस्टर वापरत होता ते खूपच जुनं होतं.मी मालकाजवळ गेलो आणि त्याला म्हणालो जेव्हा जेव्हा तुमचा सामना ग्राहकांबरोबर होतो तेव्हा प्रत्येक वेळा तुम्ही काही शिक्के खाली पाडता.हे बोलत मी जमिनीवर काही पैसे खरंच फेकले. तत्काळ तो माझी गोष्ट लक्षपूर्वक ऐकायला लागला.खरंतर केवळ शब्दांनीपण त्यांचा इंटरेस्ट जागृत झाला असता;परंतु जमिनीवर पैशांच्या पडणाऱ्या आवाजाने त्याला पूर्णपणे बांधून टाकले होते.मी शेवटी त्याला त्याची सगळी जुनी मशिन्स बदलण्याची ऑर्डर घेण्यामध्ये सफल झालो.'हे घरगुती जीवनातपण कामास येते. जुन्या काळात जेव्हा कोणी प्रियकर आपल्या प्रेयसीसमोर प्रेम प्रस्ताव ठेवायचा,तर काय तो फक्त शब्दांच्या माध्यमानेच आपलं प्रेम व्यक्त करायचा? नाही! तो आपल्या गुडघ्यांवर खाली बसायचा.यावरून माहीत पडायचं की,तो खरंच गंभीर आहे.त्याची भावना खरी आणि प्रबळ आहे.आजकाल प्रेम प्रस्ताव ठेवण्याकरिता प्रेमी गुडघ्यांवर बसत नाही,तरी पण तो रोमँटिक वातावरण निर्माण करतो म्हणजे त्याचा प्रस्ताव स्वीकारला जाईल.


तुम्हाला जे हवं आहे,त्याची नाटकीय प्रस्तुती मुलांसमोरपण सफल होते.बर्मिधम,अलाबामाच्या जो. बी. फॅट ज्युनियरला मुलांकडून समस्या होत होती.त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आणि तीन वर्षांची मुलगी आपली खेळणी आवरत नव्हते.याकरता त्यांनी एक 'ट्रेन' बनवली.जोई (कॅप्टन कॅसी जोन्स) आपल्या तीन चाकी सायकलवर इंजिनिअर बनला.जेनेटची वॅगन जोडलेली होती आणि संध्याकाळी ती सगळे 'कोळसे' आपल्या वॅगनमध्ये ठेवत होती आणि मग तिचा भाऊ तिला पूर्ण खोलीभर फिरवत होता.या प्रकारे खोलीची सफाई होत होती,तीपण न लेक्चर देता,न वाद घालता,न धमकी देता. 

मिशावाका,इंडियानाची मेरी कॅथरीन वुल्फला आपल्या नोकरीत काही त्रास होता. याकरता तिने आपल्या बॉस बरोबर बोलायचं ठरवलं.सोमवारच्या सकाळी तिने त्यांची अपाँइटमेंट देण्याकरता म्हटलं; परंतु तिला सांगण्यात आलं की,ते खूपच व्यस्त होते आणि तिला त्या आठवड्यात दुसऱ्या कुठल्या दिवशी अपाँइटमेंट करता सेक्रेटरीबरोबर संपर्क करायला पाहिजे.सेक्रेटरीने सांगितले की, बॉसचं शेड्यूल खूप टाइट आहे;पण ती कशी तरी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करेल.मिस वुल्फने सांगितले की,यानंतर काय झालं.!


पूर्ण आठवडा मला त्यांच्याकडून उत्तरच आलं नाही.

जेव्हापण मी तिला विचारत होतो तेव्हा काही ना काही कारण ती सांगायची,की बॉस तिला का नाही भेटू शकत आहे.शुक्रवारच्या सकाळीही मला काही निश्चित उत्तर मिळालं नाही.मी खरंचं त्यांना भेटू इच्छित होते आणि वीकेंडच्या आधीच मला त्यांच्याशी आपल्या समस्यांबद्दल चर्चा करायची होती.याकरता मी स्वतःला विचारलं की,मी कोणत्या प्रकारे प्रयत्न करू ज्यामुळे ते मला भेटायला तयार होतील.शेवटी मी एक औपचारिक पत्र लिहिलं.

पत्रात मी लिहिलं की,मी त्यांची व्यस्तता समजू शकते; परंतु मला खूपच महत्त्वाच्या कामासाठी भेटायचं आहे.मी पत्राबरोबर स्वतःचा पत्ता लावलेला लिफाफापण ठेवून दिला.या लिफाफ्यात एक फॉर्मपण ठेवला.ज्याला ते स्वतः भरू शकत होते किंवा आपल्या सेक्रेटरीकडून भरवून मला पोस्ट करू शकले असते.फॉर्ममध्ये मी लिहिलं होतं...मिस वुल्फ,मी तुम्हांला या वेळी… वाजून…

मिनिटांनी…भेट देऊ … शकतो.(मित्र जोडा,डेल कार्नेगी)


मी ११ वाजता हे पत्र आपल्या बॉसला पाठवले आणि २ वाजता मी आपल्याला मेलबॉक्स चेक केला.तिथं माझा पत्ता लागलेला लिफाफा आला होता.त्यांनी स्वतःच माझा फॉर्म भरला होता आणि हे सुचवलं होतं की,ते मला त्याच दुपारी भेटू शकतील आणि मला माझी गोष्ट सांगण्या

करता दहा मिनिटांचा वेळ दिला होता. मी त्यांना भेटले आणि एका तासाहून जास्त वेळपर्यंत बसून माझी समस्या सोडवली.जर मी घटनेला नाटकीय ढंगांनी व्यक्त करून त्यांना हे नसतं पटवलं की,मी त्यांना खरंच भेटू इच्छिते तर बहुतेक मी अपॉइंटमेंटची आतापर्यंत वाट बघत बसले असते.जेम्स बी.बॉयन्टनला एक मोठा मार्केट रिपोर्ट द्यायचा होता.त्याच्या फर्मने आताच कोल्ड क्रिमच्या एका अग्रणी बँडचे गहन अध्ययन केले होते.या बाजारात स्पर्धेच्या बाबतीत डाटा लगेच हवा होता.संभाव्य ग्राहक जाहिरात जगतातला सगळ्यात मोठा आणि भयानक लोकांमधला एक होता आणि सुरू करायच्या आधीच त्याची पहिली युक्ती अपयशी ठरली.


मिस्टर बॉयन्टन सांगतात की,जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटायला गेलो,तर मी फालतूच्या वादात गुंतून गेलो.आम्ही शोधाच्या पद्धतीवर निरर्थक वाद घालत राहिलो.ते वादात हार मानायला तयार नव्हते.त्यांनी मला सांगितले की,मी चूक होतो आणि मी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की मी बरोबर होतो.शेवटी मी जिंकलो आणि मला समाधानपण मिळाले;परंतु माझा वेळ संपून गेला होता. इंटरव्ह्यू संपलेला होता आणि मी आपल्या कामात असफल झालो होतो.


दुसऱ्यांदा मी त्याला आकडे किंवा डाटाच्या जाळात नाही अडकवलं.जेव्हा मी या माणसाला भेटायला गेलो,तेव्हा मी गुणवत्तेला नाटकीय प्रकारे प्रस्तुत केले.जेव्हा मी त्याच्या ऑफिसमध्ये शिरलो तेव्हा तो फोनवर व्यस्त होता.जेव्हा त्याची चर्चा संपली तेव्हा मी आपली सुटकेस उघडली आणि कोल्ड क्रीमचे बत्तीस डबे काढून त्यांच्या टेबलावर ठेवून दिले.सगळ्याच कंपन्यांना तो जाणत होता.कारण ते सगळेच त्याच्या क्रीमचे प्रतिस्पर्धी होते.


प्रत्येक डब्यावर मी एक टॅग लावला.ज्यात आमच्या सर्व्हेचे परिणाम लिहिलेले होते आणि प्रत्येक टॅग आपली कहाणी संक्षिप्त आणि नाटकीय रूपाने सांगत होता.


मग काय झालं? वादाला काही जागाच उरली नव्हती? हे काही तरी नवीन होतं.काहीसं वेगळ होतं.त्यांनी कोल्ड क्रीमवर लागलेल्या पहिल्या टॅगला उचललं.टॅगवर लिहिलेल्या माहितीला वाचलं आणि त्याने सगळे टॅग वाचून टाकले. मित्रत्वाची चर्चा सुरू झाली.त्यांच्या नंतर त्याने काही प्रश्न विचारले.त्यांची जिज्ञासा वाढली. त्यांनी मला गुणांबद्दल सांगायला सुरुवातीला फक्त दहा मिनिटांचा वेळ दिला होता;परंतु दहा मिनिटे संपली.वीस मिनिटे संपली.चाळीस मिनिटं संपली आणि एका तासानंतरपण आम्ही बोलतच होतो.मी या वेळी गुणांना (तथ्यांना) प्रस्तुत करत होते.जे मी पहिल्यांदा केले होते;परंतु या वेळी मी नाटकीय रूपाचा सहारा घेतला होता.त्यामुळे कितीतरी जास्त फरक पडला.

२१/३/२४

ॲरिस्टॉटलचे आव्हान.. Aristotle's challenge..!!

१९.०३.२४ या लेखातील पुढील भाग.।


या पुस्तकातील मर्म इतक्या उशिराने प्राप्त होण्याचे कारण म्हणजे मानसिक जीवनातील भावनेच्या स्थानाकडे लक्ष देण्यात संशोधकांनी आश्चर्य वाटावे इतके दुर्लक्ष केले.त्यामुळे शास्त्रशुद्ध मानसशास्त्रासाठी भावनांच्या प्रांतात जाण्यासाठी प्रशस्त मार्गच उपलब्ध नव्हता.ही पोकळी भरून काढण्यासाठी स्वयंमदतीच्या पुस्तकांचा प्रवाह सुरू झाला.त्यांच्यात दिलेला सल्ला सद् हेतुपूर्ण असला तरी त्यात बरीच मोठी उणीव होती ती शास्त्रीय आधाराची.आता भावनेतील अत्यंतअतार्किकपणाबद्दल उठणाऱ्या तातडीच्या आणि गोंधळून टाकणाऱ्या प्रश्नांबद्दल शेवटी विज्ञान अधिकारवाणीने बोलू लागले आहे,मानवी हृदयाबद्दलच्या विवेचना इतकाच याविषयातील ज्ञानालाही नेमकेपणा आला आहे.अर्थात जे बुद्धिमत्तेबद्दल संकुचित दृष्टिकोन बाळगून वाद घालतात की,बुद्धिगुणांक अनुवंशाने ठरतो,जीवनातील अनुभव त्याला बदलू शकत नाहीत आणि आपली नियती मोठ्या प्रमाणात या गुणावरून ठरत असते, त्यांच्यासाठी या माहितीने आव्हाने उभी केली. त्यांच्या मतात ज्या अत्यंत आव्हानात्मक प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे तो म्हणजे आपण कोणता बदल करू शकतो.ज्यामुळे आपल्या मुलांना अधिक चांगले जीवन जगण्यात मदत होईल? ज्या परिस्थितीत भले भले बुद्धिवान धडपडतात तिथे सामान्य बुद्धीचा माणूस सहजतेने त्यातून पार पडतो,तेव्हा कोणते घटक आपला चमत्कार दाखवत असतात.याबद्दल माझे मत असे आहे की,हा फरक ज्या क्षमतेमुळे पडतो तिलाच या पुस्तकात भावनिक बुद्धिमत्ता म्हटले आहे,जिच्यात आत्मसंयम,उत्साह आणि चिकाटी आणि स्वतःला प्रेरित करण्याच्या क्षमतेचा समावेश होतो.आपण पाहणार आहोत की,मुलांना अनुवंशाने बुद्धिमत्तेच्या वारशाची कोणतीही लॉटरी लागली असली,तरी योग्य व चांगली संधी पुरवून त्यांना वरील गुण शिकवता येतात.या शक्यतेच्या पलीकडे एक नैतिक दडपण डोळे वटारून पाहत आहे.हा तो काळ आहे जेव्हा स्वार्थीपणा,हिंसा आणि कोतेपणामुळे आपल्या सामूहिक जीवनातील भलेपणाला कीड लागली आहे आणि त्यामुळे समाजजीवनरूपी वस्त्राची वीण गतीने उसवली जात आहे.इथे भावनिक बुद्धिमत्तेचा मुद्दा हा मृदू भावना,

चारित्र्य आणि नैतिक सहजप्रवृत्ती यांच्यातील दुव्यावर आधारित आहे. वाढते पुरावे मिळू लागले आहेत.


की,जीवनातील मूलभूत नैतिक दृष्टिकोन त्यांच्यात सामावलेल्या भावनिक क्षमतांमधून अंकुरित होत असतात. एखाद्यासाठी ऊर्मी हे भावनेचे माध्यम असू शकते;सगळ्या ऊर्मीच्या बीजस्थानी असते स्वतःला कृतीत व्यक्त करण्यासाठी उसळून उठणारी एखादी भावना.जे अशा तीव्र ऊमींना अधीन झालेले असतात म्हणजेच ज्यांच्यात आत्मसंयम नसतो,त्यांच्यात नैतिक विचारांची कमतरता दिसून येते.त्याच अर्थाने निःस्वार्थ परोपकार-भावनेच्या मुळाशी असलेले गुण म्हणजे समानुभूती,इतरांच्या मनातील भावनांचा वेध घेण्याची क्षमता.जिथे इतरांच्या गरजेची किंवा निराशेची काहीच जाणीव नसते तिथे इतरांची काळजी घेतली जात नाही आणि आजच्या काळात ज्याची सर्वांत जास्त गरज आहे असे नेमके दोन गुण म्हणजे आत्मसंयम आणि करुणा.


आपला प्रवास


भावनेबद्दल अधिक वैज्ञानिक मर्मदृष्टी पुरवणाऱ्या या पुस्तकातील प्रवासात मी तुमचा मार्गदर्शक बनणार आहे.आपल्या जीवनातील आणि आपल्या भोवतालच्या जगातील अत्यंत गोंधळात टाकणाऱ्या काही क्षणांना या यात्रेत मोठ्या प्रमाणात समजून घेता येईल.या प्रवासाचा अंतिम टप्पा म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि भावनांना बुद्धिमान कसे करावे हे समजून घेणे.

ज्याप्रमाणे भौतिकशास्त्रातील एखाद्या निरीक्षकाचे सुक्ष्मातिसूक्ष्म पातळीवरील निरीक्षणामुळे त्याच्या निरीक्षणाचा अर्थच बदलून जातो,तसाच काहीसा परिणाम या ज्ञानाचा होणार आहे, भावनेच्या क्षेत्राची काही प्रमाणात दखल घेता येईल.पुस्तकाच्या पहिल्या भागात मेंदूच्या भावनिक आराखड्याविषयी,रचनेविषयी नवीन शोधांवर प्रकाश टाकला आहे.हे शोध जीवनात जेव्हा आपल्या भावना सगळ्या तर्कशुद्ध विचारांवर कुरघोडी करतात अशा क्षणांविषयी आपल्या मनातील गोंधळ दूर करतात. त्यांच्यामुळे राग आणि भीतीच्या किंवा उत्कटता आणि आनंदाच्या क्षणांवर राज्य करणाऱ्या मेंदूच्या रचनेतील परस्परक्रिया समजून घेता येतील.ते समजले म्हणजे आपल्या विशुद्ध हेतूंच्या मुळाशी सुरुंग लावून त्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या आपल्या भावनिक सवयी आपण कशा शिकतो हे स्पष्ट होईल;तसेच आपल्या अत्यंत विघातक किंवा स्वतःला पराभूत करणाऱ्या भावनिक ऊर्मीना आवर घालण्यासाठी आपण काय करू शकतो हे समजेल.सर्वांत जास्त महत्त्वाचे म्हणजे या मेंदूविषयक माहितीमुळे आपल्या मुलांच्या भावनिक सवयींना वळण लावण्याची अमूल्य संधी हाती आली आहे.या प्रवासातील आपला दुसरा मुख्य टप्पा असेल तो हे पाहण्याचा की,मेंदूच्या या रचनेमुळे जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली मूलभूत उपजत क्षमता भावनिक बुद्धिमत्ता कशी कार्यान्वित होते.उदा.भावनावेगावर लगाम कसा घालावा,इतरांच्या मनातील खोलवरच्या भावना कशा वाचाव्यात,नातेसंबंधाना लाघवीपणे कसे हाताळावे वगैरे.थोडक्यात,ॲरिस्टॉटलने सांगितल्यानुसार,"योग्य माणसावर,योग्य प्रमाणात,योग्य वेळी,योग्य कारणाने आणि योग्य मार्गाने कसे रागवावे" हे समजेल. 


ज्या वाचकांना मज्जातंतूविषयक माहितीत रस नाही ते सरळ या भागाकडे वळू शकतात. 'बुद्धिमत्ता' म्हणजे काय हे सांगणारा हा विस्तारित नमुना जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या विशेष क्षमतांच्या केंद्रस्थानी भावनांना ठेवतो. तिसरा भाग तपासून पाहतो की,या क्षमतेमुळे काही अत्यंत महत्त्वाचे बदल कसे होतात,फरक कसा पडतो;या क्षमता आपले मूल्यवान नातेसंबंध कसे टिकवून ठेवू शकतात किंवा त्यांच्याअभावी नाते कसे बिघडू शकते,

आपण जिथे काम करतो तिथली बाजारमूल्ये,दडपणे आपल्या व्यावसायिक जीवनाला नवा आकार देत आहेत आणि अगदी व्यवसायिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्या भावनिक बुद्धिमत्तेकडून अभूतपूर्व वाटा वसूल करीत आहेत आणि सतत धूम्रपानमुळे जसा शारीरिक स्वास्थ्याला धोका निर्माण होतो तसाच धोका विषाक्त भावनांमुळे कसा निर्माण होतो,आपले स्वास्थ्य आणि निरामयतेचे रक्षण करण्यासाठी भावनिक संतुलनाची कशी मदत होते वगैरे.


आपल्याला मिळालेल्या आनुवंशिक वारशातून आपल्या

पैकी प्रत्येकाला विविध भावनांवर स्थिरावण्याची विविध बिंदूची एक शृंखला उपजतच लाभत असते.जी आपला स्वभाव निश्चित करते;पण भावनावस्थेत कार्य करणाऱ्या मेंदूच्या मज्जामंडळांची जुळवून घेण्याची क्षमता असाधारण असते.त्यामुळे आपला स्वभाव म्हणजे आपली नियती नव्हे.चौथ्या विभागात दाखवून दिले आहे की, आपण आपल्या लहानपणी घरात आणि शाळेत जे भावनिक धडे गिरवत असतो त्यावरून हे ठरत असते की,आपण भावनिक बुद्धिमत्तेच्या मूलभूत घटकांना आत्मसात करण्यात कितपत प्रावीण्य मिळवू शकू अथवा मिळवू शकणार नाही.याचा अर्थ असा की भविष्यात आपले जीवन नियंत्रित करणाऱ्या आवश्यक भावनिक सवयी लावून घेण्यासाठी बाल्यावस्था आणि किशोरावस्था हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो.


पाचव्या भागात याचा शोध घेतला गेला आहे की,जे परिपक्वता मिळवू शकत नाहीत आणि भावनिक प्रांतावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरतात त्यांच्यासाठी कोणकोणते धोके वाढून ठेवलेले असतात,भावनिक बुद्धिमत्तेच्या कमतरतेमुळे नैराश्य किंवा हिंसामय जीवनापासून,खाण्याविषयक विकृती आणि मादक द्रव्यांच्या आहारी जाण्यापर्यंत कित्येक धोक्यांची व्याप्ती कशी वाढत जाते.या भागात असे पुरावे देण्यात आले आहेत की,मुलांचा जीवनप्रवास योग्य मार्गाने व्हावा म्हणून प्रगत शाळांमधून मुलांना भावनिक आणि सामाजिक कौशल्ये कशी शिकवली जातात.या पुस्तकात कदाचित अस्वस्थ करणारी एकमेव माहिती दिली आहे जी पालक आणि शिक्षक यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात केलेल्या सर्वेक्षणातून मिळाली आहे.या सर्वेक्षणातून असे दिसून येते की,जागतिक पातळीवर वाढता कल दिसून आला आहे.


की,या पिढीतील मुलं मागच्या पिढीतील मुलांपेक्षा भावनिकदृष्ट्या अधिक त्रस्त आहेत. अधिक एकाकी आणि निराशाग्रस्त,अधिक रागीट आणि बेशिस्त,अधिक अस्वस्थ आणि चिंतेला अधिक बळी पडणारी,अधिक आवेगी आणि आक्रमक बनत चालली आहेत.


यावर काही उपाय असेल तर माझ्या मते तो हा आहे की,आपण आपल्या मुलांना जगण्यासाठी किती सज्ज करतो हे पाहणे.सध्या आपण आपल्या मुलांचे भावनिक शिक्षण केवळ योगायोगावर सोडून दिले आहे ज्याचे परिणाम खूपच भयानक असू शकतात.यावर एक उपाय म्हणजे शाळेच्या वर्गात विद्यार्थ्यांचे मन (बुद्धी) आणि हृदय एकत्र करून विद्यार्थ्याला सर्वांगीण शिक्षित करण्यासाठी शाळा काय करू शकतात याचा विचार एका नव्या दृष्टिकोनातून व्हायला हवा.जिथे वर्गांमध्ये भावनिक बुद्धिमत्तेचे मूलभूत घटक मुलांच्या मनात खोलवर रुजवण्याच्या उद्दिष्टाने शिकवले जात असतील अशा नूतन वर्गांना भेटी देऊन आपला हा प्रवास संपणार आहे.मला वाटते की,आता तो दिवस दूर नाही की,जेव्हा आत्मजाणीव,आत्मनियंत्रण आणि समानुभूतीसारख्या आवश्यक मानवी क्षमता आणि श्रवण कौशल्ये (ऐकण्याची कला),संघर्ष सोडवणे आणि सहकार्य या बाबींच्या विकासाला शालेय शिक्षणाचा एक अविभाज्य भाग मानले जाईल,त्यांना नियमित शिक्षणक्रमात सामावून घेतले जाईल.


The Nichomachean Ethics या ॲरिस्टॉटलच्या पुस्तकात सद्गुण,चारित्र्य आणि चांगले जीवन याविषयी घेतलेल्या शोधात त्याच्यासमोरील आव्हान आहे आपल्या भावनिक जीवनाचे व्यवस्थापन बुद्धिपूर्वक करण्याचे,

हुशारीने भावना हाताळण्याचे. आपल्या उत्कट इच्छा,

आवेग यांना योग्य दिशा देण्यातच शहाणपणा असतो,

भावना आपल्या विचारांना,मूल्यांना आणि जीवन टिकवून ठेवायला मार्ग दाखवतात;पण त्या खूप सहजतेने पथभ्रष्ट होऊ शकतात आणि त्या वारंवार पथभ्रष्ट होतातच.


ॲरिस्टॉटलने पाहिले तसे भावना या समस्या नाहीत तर समस्या आहे.त्यांच्या उचितपणाची आणि त्यांच्या अभिव्यक्तीची.प्रश्न हा आहे की,आपण आपल्या भावनांना कसे बुद्धिमान बनवू शकतो,रस्त्यांवर सभ्यता कशी नांदावी आणि आपल्या सामुदायिक जीवनाला इतरांची काळजी घेणारे कसे बनवता येईल.


लवकरच या ठिकाणी भेटू ….काहीतरी समजून घेण्यासाठी…!

१९/३/२४

ॲरिस्टॉटलचे आव्हान.. Aristotle's challenge..!!


"राग कोणालाही येऊ शकतो - रागावणे फार सोपे आहे;परंतु योग्य व्यक्तीवर,योग्य प्रमाणात, योग्य वेळी,योग्य कारणासाठी आणि योग्य रीतीने रागावणे हे मात्र सोपे नाही." ॲरिस्टॉटल - द निकोमॅकिअन एथिक्स


त्या दिवशी दुपारी न्यूयॉर्कच्या हवेत ऑगस्ट महिन्याची असह्य घामट उष्णता दाटलेली होती. लोकांचा जीव घाम आणि उकाड्याने बेजार झाला होता.मला हॉटेलला जायचे होते म्हणून मी बसची वाट पाहत मॅडिसन ॲव्हेन्यूवर उभा होतो.बसमध्ये चढताना बसच्या ड्रायव्हरने उत्साहपूर्ण स्मित करीत 'हाय,कसं चाललंय?' असे म्हणत माझे ज्या थाटात स्वागत केले,ते पाहून मला धक्काच बसला.तो मध्यमवयीन कृष्णवर्णीय माणूस होता.शहराच्या रहदारीतून बस मुंगीच्या पावलांनी पुढे जात असताना तो बसमध्ये चढणाऱ्या प्रत्येकाचे असेच जोशपूर्ण स्वागत करीत होता.प्रत्येक प्रवासी माझ्यासारखाच आश्चर्याने थक्क होत होता. हैराण करणाऱ्या उष्णतेने दुर्मुखलेल्या प्रवाशांपैकी फक्त काही जणांनी त्याच्या स्वागताला प्रत्युत्तर दिले.


पण जसजशी बस रेंगाळत पुढे जाऊ लागली तसतसा बसमध्ये हळूहळू का होईना;पण काहीसा जादुई बदल घडून आला.बस जिथून जात होती तिथल्या आजूबाजूच्या परिसराबद्दल ड्रायव्हर प्रवाशांना माहिती देऊ लागला.

त्याच्या चैतन्यमय धावत्या समालोचनात तो सांगत होता, अमक्या दुकानात भव्य 'सेल' लागला आहे, हे संग्रहालय खूप पाहण्यासारखे आहे बरं का आणि हो,त्या चित्रपटगृहात नुकत्याच लागलेल्या चित्रपटाबद्दल तुम्ही काही ऐकले आहे का? त्या शहरात काय काय विलोभनीय गोष्टी आहेत. याचा 'संसर्ग' त्याच्या खेळकर सुरातून इतरांनाही झाला.लोकांनी बसमध्ये चढताना धारण केलेले खिन्नपणाचे कवच कधी गळून पडले हे कोणालाच कळाले नाही.प्रत्येकजण आपल्या स्टॉपवर उतरत असताना हा आपला मोठ्याने ओरडून म्हणायचा,

"बरंय, या मजेत दिवस घालवा!" आणि प्रत्येकजण त्याला सस्मित प्रतिसाद देत बसमधून उतरू लागला.


या घटनेला वीस वर्षे होत आली तरी माझ्या मनाने तिची आठवण कायम ताजी ठेवली. त्यादिवशी बसमध्ये चढलो तेव्हा मी नुकताच मानसशास्त्रातील माझा प्रबंध पूर्ण केला होता; परंतु असे परिवर्तन कसे घडू शकते याविषयी त्या काळी मानसशास्त्र फार त्रोटक लक्ष घालायचे.भावनांच्या कार्याविषयी मानसशास्त्राला अजिबात माहिती नव्हती किंवा फार थोडी माहिती होती.तरीही हा बस ड्रायव्हर त्याच्या बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांमध्ये चांगल्या भावनेचा 'किटाणू' पसरवण्याचा विचार करीत होता,बहुधा या चांगल्या भावनेचे तरंग सगळ्या शहरात पसरले असतील.आपल्या बसमधील उतारूंच्या हृदयाची दारे उघडून त्यात खदखदणारी चिडचिड,अस्वस्थपणा दूर करून त्यांचे हृदय मृदू बनवण्याची जादू करणारा हा माणूस मला एखादा शहरी शांतिदूत वाटला.


आता वर्तमानपत्रातील या आठवड्याच्या काही घटना पहा ज्या वरील घटनेच्या टोकाच्या विरोधात आहेत :


● एका स्थानिक शाळेतील नऊ वर्षांच्या मुलाने रागाने बेभान होत शाळेतला डेस्क,संगणक आणि प्रिंटर यांच्यावर रंग ओतला,शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या गाडीला विद्रूप केले; कारण काय तर त्याच्या तिसरीतील काही वर्गबांधवांनी त्याला 'बाळ' म्हणून चिडवले होते आणि याला त्यांना दाखवून द्यायचे होते की, तो 'बाळ' नाही.


● मॅनहटन रॅप क्लबच्या बाहेर गोळा झालेल्या काही किशोरांच्या गर्दीत अनवधानाने लागलेल्या धक्क्याची परिणती ढकलाढकली व रेटारेटीत झाली.परिणामी अपमानित झालेल्या एका किशोराने ३८ कॅलिबरची स्वयंचलित बंदूक काढून गर्दीवर गोळ्या झाडल्यामुळे आठ किशोर जखमी झाले.अहवाल असे सांगतो की,अशा किरकोळ घटनांना आपला अपमान समजून केलेल्या अशा गोळीबाराच्या घटना अलीकडच्या काही वर्षात देशभरात सर्वसामान्य झाल्या आहेत.एका अहवालात हादरवून सोडणारे तथ्य असे दिसून आले की,

बारावर्षांखालील बालकांच्या खुनाच्या प्रकरणात खुद्द त्यांचे पालक किंवा सावत्र पालक दोषी असतात. पालकांच्या म्हणण्यानुसार,ते फक्त "त्यांच्या मुलांना शिस्त,वळण,लावायचा प्रयत्न करीत होते." ते टी.व्ही.पाहत असताना मूल टी.व्ही. समोर उभे राहिले,रडले किंवा त्याने अंथरूण खराब केली म्हणून त्याला इतकी मारझोड केली गेली की,त्यात हे मूल मरण पावले.


● पाच तुर्की मुली आणि स्त्रिया त्यांच्या घरात झोपलेल्या असताना घराला आग लावून त्यांना ठार मारल्याबद्दल एका जर्मन तरुणावर खटला चालवला जात आहे.नव-नाझीवादी गटाचा एक हिस्सा असलेला हा तरुण त्याची नोकरी न टिकणे,दारू पिणे आणि दुर्दैव यासाठी परकीयांना दोष देत त्यांचा बदला घेतला असे सांगतो.

कुजबुजल्या स्वरात तो विनवतो,"मी जे केले त्याबद्दल मला वाईट वाटते आणि त्याबद्दल मी अपार शर्मिंदा आहे."


प्रत्येक नवीन दिवस भरगच्च बातम्या आणतो की,सभ्यता आणि सुरक्षितता कशी विस्कळीत झाली आहे,माथेफिरूपणाने प्राणघातक हल्ला करण्याची क्षुद्र अनावर ऊर्मी कशी लोकांना कंठस्नान घालत हैदोस घालीत आहे;पण या प्रकारच्या बातम्या केवळ या गोष्टीला प्रतिबिंबित करतात की,आपल्या आणि आपल्या भोवतालच्या लोकांच्या जीवनात भावना नियंत्रणाबाहेर जाण्याचा आवेश मोठ्या प्रमाणात डोके वर काढू लागला आहे.प्रक्षोभ आणि पश्चात्तापाच्या या अनियंत्रित लाटेपासून कोणीच वाचू शकलेले नाही.या ना त्या मार्गाने ती आपल्या जीवनात येतेच येते.


गेल्या दशकात अशा वाढत्या अहवालांचे ढीग हीच बाब स्पष्ट करतात की,आपल्या कुटुंबात, समुदायात,आपल्या सामूहिक जीवनात भावना हाताळण्याची कौशल्यहीनता,

कमालीची निराशा आणि बेपर्वाईचा आलेख वरवर झेपावत आहे. या काही वर्षांत सळसळणारा राग आणि निराशा हा एक जुनाट रोग बनला आहे.बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीअभावी घराच्या एकांतात टी. व्ही.सोबत एकाकी पडलेली बालके असोत किंवा उपेक्षित,

अस्वीकृत,दुर्लक्षित किंवा वाईट वागवली गेलेली दुःखी मुले असोत किंवा वैवाहिक हिंसेच्या गलिच्छ जवळिकीला बळी पडलेली जोडपी असोत,सगळे या आजाराने पीडित आहेत.जगात सगळीकडे नैराश्याच्या वेगाने वाढत जाणाऱ्या आकड्यांतून पसरलेली भावनिक अस्वस्थता आणि धुसफूस दिसून येते आणि हिंसेची वाढती लाटही याच भावनिक अस्वस्थतेची आठवण देते.खिशात बंदूक बाळगणारे शालेय,किशोर,बंदुकीच्या स्कोटांनी संपणारी रस्त्यावरील भांडणे,दुर्घटना,आपल्याच सहकाऱ्यांना मारून टाकणारे,असंतुष्ट माजी कामगार हे सगळे याच आजाराचे पुरावे आहेत. भावनिक अत्याचार गाडी चालवताना बंदूक चालवणे,धक्कादायक घटनांनंतर येणारा ताण अशा संज्ञा गेल्या दशकात सर्वसामान्य शब्दकोशात स्थान घेऊ लागल्या आहेत. जेव्हापासून परस्परांन "दिवस चांगला जावो' अशा सदिच्छा देण्याच्या जागी 'दिवस पार पडू दे' अशा सुरक्षा केवच देणाऱ्या शब्दात झाल्यापासून वरील बदल घडले आहेत.हे पुस्तक अर्थशून्यतेतून अर्थ शोधण्याचे मार्गदर्शन करीत आहे.एक मानसशाखा म्हणून आणि गेली दहा वर्ष द न्यूयॉर्क टाइम्स'साठी वृत्तपत्र लेखक म्हणून काम करताना अतार्किकतेच्या क्षेत्राला समजून घेण्यात आपल्या शास्त्रांनी केलेल्या प्रगतीचा मी मागोवा घेत आलो आहे.(इमोशनल इंटेलिजन्स,भावनिक बुद्धिमत्ता,

डॅनिअल गोलमन,अनुवाद-पुष्पा ठक्कर साकेत प्रकाशन) मला दोन परस्परविरोधी मतप्रवाह दिसून आले.आपल्या सामूहिक भावनिक जीवनावर दुर्दैवाने घातलेला घाला एक प्रवाह रंगवत आहे,तर दुसरा त्याका काही आशादायक उपाय सुचवत आहे.


हा शोध आताच का घ्यायचा?


गेल्या शतकात वाईट बातम्यांचे जितके भरघोस पीक आले त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात भावनेवर शास्त्रशुद्ध अभ्यास केले गेले.त्यापैकी सर्वांत अधिक प्रभावशाली आहे मेंदू कसा कार्य करतो याचा उलगडा.मेंदू प्रतिमा

सारख्या नूतन तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले.आतापर्यंतच्या इतिहासात जे गूढतेच्या आवरणाआड दडले होते ते त्यावरील आवरण दूर होऊन ते दृष्टीला पडले. आपण भावना अनुभवतो,विचार आणि कल्पना करतो,स्वप्न पाहतो तेव्हा समजायला अवघड असलेला हा मेंदू नावाचा मज्जापेशींचा गोळा नेमके कसे कार्य करतो हे कळू लागले.मेंदूबद्दल या जैवमज्जाविषयक ज्ञानाच्या महापुरामुळे आपल्यात्ता कधी नव्हे इतके स्पष्टपणे समजून घेता आले की,मेंदूतील भावनेशी निगडित केंद्र रागाला कशी चालना देतात किंवा अश्रू कसे निर्माण करतात.मेंदूतील अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले भाग आपल्याला युद्ध किंवा प्रेम करायला कसे उद्दीपित करतात आणि हे सगळे भाग चांगल्या वा वाईट परिणामांसाठी परस्परांशी कसे जोडलेले आहेत.भावनांचे कार्य आणि त्यांच्या अपयशाविषयी मिळालेला या अभूतपूर्व स्पष्टतेमुळे आपत्त्या सामूहिक-भावनिक आणीबाणीवर नवनवे उपाय नजरेच्या टप्प्यात येऊ लागते आहेत. हे पुस्तक लिहिण्यासाठी मला शास्त्रीय माहितीच्या साठ्याच्या या पिकाची पूर्णपणे कापणी होईपर्यंत वाट पाहावी लागली.या पुस्तकातील मर्म इतक्या उशिराने प्राप्त होण्याचे कारण म्हणजे मानसिक जीवनातील भावनेच्या स्थानाकडे लक्ष देण्यात संशोधकांनी आश्चर्य वाटावे इतके दुर्लक्ष केले.


उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..



१७/३/२४

जरा दमानं..! A little breath..!

झाड वाढायची गती किती असते हे मला खूप वर्ष माहीत नव्हतं.ज्या बीच जंगलाचं व्यवस्थापन मी बघतो,त्यात झाडांची उंची तीन ते सात फूट इतकीच आहे.पूर्वी मी यांच्या वयाचा अंदाज जास्तीत जास्त दहा वर्ष लावला असता. पण व्यावसायिक लागवडीच्या बाहेरील विश्वात, म्हणजे नैसर्गिक जंगलात,माझा अभ्यास सुरू झाला तसं झाडांच्या वाढीचं गुपित मला उमगू लागलं.बीच वृक्षाच्या वयाचा अंदाज लावण्याची एक सोपी युक्ती आहे.त्यांच्या फांद्यांवर छोट्या गाठी असतात त्या मोजायच्या.

सुरकुत्यांचा पुंजका असल्यासारख्या या गाठी दिसतात. नवीन कोंबाच्या खाली दरवर्षी एक गाठ येते आणि फांदीची लांबी वाढत गेली की गाठ मागे पडत जाते.

दरवर्षी हे होत असतं त्यामुळे गाठींची संख्या आणि झाडाच्या वयात परस्परसंबंध लावता येतो.जेव्हा फांदीचा घेर सुमारे एक दशमांश इंच होतो तेव्हा ती गाठ सालीच्या खाली दडून जाते.माझ्या जंगलात मला एक बीचचं झाड तरुण वाटत असे.त्याच्या एका आठ इंच लांबीच्या कोवळ्या डहाळीवर मला पंचवीस गाठी दिसल्या.या झाडाच्या बुंध्याचा घेर जेमतेम एक तृतीयांश इंच होता आणि त्यावरून त्याचं वय कळून येत नव्हतं. मी जेव्हा गाठींचा हिशोब लावून त्याच्या वयाचा अंदाज घेतला तेव्हा मला ते झाड किमान ऐंशी वर्षांचं असल्याचं जाणवलं. त्या वेळेस मला हे फारच धक्कादायक वाटलं होतं,पण पुरातन जंगलातून माझा अभ्यास सुरू झाला आणि आज मला कळतंय की यात काहीच आश्चर्य नाही.(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)तारुण्यात आलेल्या झाडांना झपाट्याने वाढण्याची घाई असते.एका ऋतूत ते दीड फुटापर्यंत सहज वाढू शकतात.पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांची आईच त्यांना एवढं वाढू देत नाही.आपल्या स्वतःचं आच्छादन आणि जंगलातल्या इतर झाडांच्या छत्रीमुळे तिथल्या जमिनीवर जेमतेम तीन टक्के ऊन पडतं.त्यामुळे त्या रोपट्यांच्या वाढीला ऊन कमी पडतं.३ टक्के म्हणजे काहीच नाही! इतक्या सूर्यप्रकाशात ते बिचारं झाड जेमतेम जिवंत राहण्यापुरतं प्रकाश संश्लेषण करू शकतं.

आपला घेर आणि उंची वाढवायला त्याला ताकद शिल्लक राहत नाही. बरं,या अशा कडक संस्काराच्या विरोधात बंडही पुकारता येत नाही,कारण त्यासाठीही शक्ती नसते.तुम्ही म्हणाल,संस्कार? होय,आपल्या रोपट्यांची काळजी घेण्यासाठी झाडं शतकानुशतकांच्या एका अनुभवांतून तयार केलेल्या अध्यापन पद्धतीचा वापर करतात. 'अध्यापन' हा शब्द मी असाच नाही वापरला, ही खरोखरच 'बाळ' झाडांना शिकवण्यासाठी झाडांनी वापरली शिक्षणपद्धतीच आहे. झाडांच्या बाबतीत अध्यापन हा शब्द जंगल व्यवस्थापनातील कर्मचारी अनेक वर्षांपासून वापरत आहेत.


या पद्धतीत रोपट्यांना सूर्यप्रकाशापासून वंचित ठेवलं जातं.पण ते कशासाठी?आपलं पाल्य लवकरात लवकर स्वतंत्र व्हावं असं त्या आईबापांना वाटत नाही का? या प्रश्नाचे उत्तर झाडं 'नाही' म्हणूनच देतील.शास्त्रज्ञांना असं दिसून आलं की जी झाडं तारुण्यात संथ गतीने वाढतात ती दीर्घायुषी होतात.

झाडांच्या बाबतीत दीर्घायुष्याची व्याख्या वेगळी असल्याचा आपल्याला विसर पडला आहे,कारण लाकडासाठी झालेल्या व्यावसायिक लागवडीत ८० ते १२० वर्षांच्या वर झाडाची वाढ होऊ दिली जात नाही.नैसर्गिक परिस्थितीमध्ये प्रौढ झाडांचा घेर पेन्सिली इतका असतो आणि साधारण माणसाइतकी त्यांची उंची होते.संथ वाढीमुळे खोडातील पेशी इतक्या सूक्ष्म असतात की त्यामध्ये हवेसाठी सुद्धा जागा नसते.पण यामुळे झाडं लवचीक राहतात आणि वादळी वाऱ्यात तग धरू शकतात.आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना भक्षकांपासून संरक्षण मिळतं कारण टणक खोडात सूक्ष्मजीव शिरू शकत नाहीत.अशी वाढ झालेल्या झाडांना इजा होण्याचीही भीती नसते,कारण जखमेच्या ठिकाणी सालाची वाढ होऊन तिथे कुजण्याची प्रक्रिया थांबवली जाते.आपल्या रोपट्यांना दीर्घायू प्राप्त होण्यासाठी संगोपनाची आवश्यकता असते.पण कधीकधी यात तरुण झाडांच्या सोशिकपणाची परीक्षाच असते.आधीच्या प्रकरणात आपण पाहिलं की, बीच आणि ओकचे दाणे मातृवृक्षाच्या पायाशी पडलेले असतात.सूझान सीमार्ड या शास्त्रज्ञाने झाडांमधील मातृत्वाचा अभ्यास केला आहे.त्या म्हणतात की मातृवृक्ष आपल्या पिल्लांवर नेहमीच वर्चस्व गाजवत असतो.ही झाडं आपला वारसा पुढल्या पिढीला सोपवून जाणार असतात आणि त्यासाठी तरुण झाडांवर आपला प्रभाव पाडण्याचं काम चालू असतं.मातृवृक्ष हा जंगलातला प्रभावशाली वृक्ष असतो,

आपल्या मुळांशी असलेल्या बुरशीच्या जाळ्यातून तो जंगलातील इतर सर्व झाडांशी जोडला गेलेला असतो.

मला सापडलेलं ते 'तरुण' बीच झाड ८० वर्ष आपल्या आईच्या छायेत उभं होतं आणि त्याची आई त्या जागेवर किमान दोनशे वर्ष उभी आहे.झाडांच्या दृष्टीने दोनशे वर्षांचा कालावधी म्हणजे अंदाजे माणसाची चाळिशी.

माझ्या जंगलातल्या या तरुण झाडांना विशाल वृक्ष होण्यासाठी कदाचित अजून दोनशे वर्षं तरी शांतपणे वाट पाहावी लागणार आहे.पण त्यांच्या आईकडून ही प्रतीक्षा सुसह्य केली जाते.त्या आपल्या पिल्लांना मुळांतून जोडून घेतात आणि तिथून त्यांना साखर आणि पोषणद्रव्यांचा पुरवठा चालू असतो.आईकडून आपल्या बछड्यांची शुश्रूषा चालू असते,असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही.


झाडाखाली उगवणाऱ्या रोपट्यांकडे नीट बघितलं तर तुम्हालाही कळेल की ही तरुण झाडं विशाल वृक्ष होण्याची वाट शांतपणे पाहत आहेत का वाढण्याची घाई करत आहेत? त्यासाठी एखाद्या बीच किंवा सिल्व्हर फरच्या फांद्यांकडे पहा.जर ते झाड उंचीपेक्षा जास्त रुंद असेल तर ते अजून प्रतीक्षेच्या टप्प्यात आहे.आपल्या वाढीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नसल्यामुळे ते थोडं पसरून प्रकाशाचा शोध घेत असतं. त्यासाठी आपल्या फांद्यांना बाजूच्या दिशेने पसरवून पानांना अतिसंवेदनशील बनवतं,ज्यामुळे जो काही थोडासा सूर्यप्रकाश त्यांना सापडेल तोही वापरात आणता येईल.अनेकदा तुम्हाला अशा झाडांचे मुख्य खोडही ओळखू येणार नाही,कारण ती सपाट छपराच्या बोंसाई झाडांसारखी खूप कमी उंचीची असतात.


त्या तरुणांच्या आयुष्यात एक दिवस असा येतो की मातृवृक्षाचं आयुष्य संपतं किंवा तो आजारी पडतो.

यौवनात असलेली ही झाडं याच क्षणाच्या प्रतीक्षेत असतात.अशी घटना उन्हाळ्यातल्या वादळात होऊ शकते.जोरदार पाऊस आला की त्यांचं ठिसूळ खोड आपलं वजन सहन करू शकत नाही आणि कोलमडायला सुरुवात होते.खाली पडताना काही तरुण मंडळी चिरडली जातात.पडलेल्या झाडामुळे जंगलाच्या आच्छादनात मोठं भगदाड पडतं आणि खालच्या बालवाडीला भरपूर सूर्यप्रकाश मिळू लागतो. आता ते मनसोक्तपणे प्रकाश संश्लेषण करू शकतात.त्यांच्या चयापचयाचा वेगही वाढतो आणि झाडाची तब्येत सुधारण्यास सुरुवात होते.ही अवस्था एक ते तीन वर्ष राहते आणि नंतर पुढची वाटचाल सुरू होते.आता बालवाडीतील सर्वांनाच जोमानं वाढायचं असतं.जे युवक थेट आकाशाच्या दिशेने वाढतात तेच स्पर्धेत टिकून राहतात.ज्यांना वाटतं की थोडं इकडे तिकडे पसरून वाढावं,ते शर्यतीमध्ये मागे पडत जातात. सरळ वर वाढ होत गेलेल्या झाडांकडून आता जंगलाच्या आच्छादनात पडलेले भगदाड पुन्हा बंद होऊ लागतं आणि आपल्या आईच्या काळात होती त्याहीपेक्षा घनदाट छाया तिथे पडते.स्पर्धेत मागे पडलेल्या युवकांचा आता वाढण्याचा मार्ग बंद होत जातो.काही वर्षांतच हार मानून ते वळून जाणार असतात.पण उंच वाढणाऱ्यांना काही कमी धोके नाहीत. भरपूर सूर्यप्रकाश मिळायला लागला की झाड आपलं साखरेचं उत्पादन वाढवतं आणि नवीन कोंबांना जास्त प्रमाणात साखर पोचते.पूर्वी सावलीमुळे कोंब टणक आणि कडवट असायचे, पण आता मात्र ते हरणांसाठी गोड चवदार खाऊ बनतात.त्यामुळे काही तरुण झाडं खाल्ली जातात आणि पुढच्या हिवाळ्यापर्यंत तरी हरणांना कॅलरीज मिळून जातात.पण आता जंगलात तरुण झाडं मुबलक असल्यामुळे येणाऱ्या काळात काही झाडं मोठी नक्की होऊ शकणार असतात.पण ज्या वेळेस एकदम सूर्यप्रकाश उपलब्ध होतो तेव्हा काही फुलणारी झाडंही आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये हनीसकल  नावाची एक वेली आहे.आपली नाजूक वेल ती त्या वाढणाऱ्या झाडांच्या फांद्यांभोवती गुंडाळून घेते आणि वर जाऊ लागते.सूर्यप्रकाश मिळताच ती भरपूर फुलोरा धरते आणि काही वर्षांतच त्या नाजूक वेली पकड जीवघेणी बनते आणि झाडाला त्रासदायक ठरते.आता अशाच वाढत राहिलेल्या वेलीला अजून किती वेळ मिळेल हा यक्षप्रश्न असतो.मोठ्या वृक्षांची वाढ झपाट्याने होऊन जंगलाचे आच्छादन पुन्हा बंद झाले तर मात्र सूर्यप्रकाश न मिळाल्याने हनीसकल कोमेजून जाईल आणि काही दिवसांत मरेल.पण जर भगदाड खूप मोठं असेल तर हनीसकल झपाट्याने वाढेल आणि घेरलेल्या झाडाला मारून टाकेल.अशा वेळेस त्या मृत झाडाच्या खोडाच्या पिळदार लाकडापासून आपल्याला छान काठी करता येते.सर्व अडथळ्यांचा सामना करत जेव्हा काही झाडं उंच आणि टुमदार होतील,तेव्हा वीस वर्षांच्या आत असलेल्या तरुणांवर पुढचं संकट बेतणार असतं.कारण उंच वाढलेली झाडं पुढच्या वीस वर्षांत वठलेल्या मातृवृक्षाचे शेजारी स्वतःचा पसारा वाढवून आच्छादनात पडलेली खिंडार पुन्हा बंद करून टाकतात.आणि मग त्या अर्धवट वाढलेल्या तरुण बीच,फर आणि पाईन वृक्षांना पुन्हा एकदा मोठा वृक्ष वठण्याची प्रतीक्षा करावी लागते.याला काही दशकं लागू शकतात.पण त्या तरुण झाडांच्या नशिबाचे फासे अगोदरच पडलेले असतात.

या उंचीपर्यंत जिवंत राहिलेल्या झाडांना आता कोणी स्पर्धक नसतात.ते जंगलाचे राजकुमार किंवा राजकन्या असतात, जे भविष्यात जंगलातील सर्वोच्च स्थान पटकावणार असतात.


०७.०१.२४ या लेखमालेतील पुढील भाग..

१५/३/२४

असं जीवन पाणपिपुलीचं.! Such is the life of a water pipe.!

झिलानी म्हणजे पाणथळ जागा ओलसर जमिनींनी ती व्यापलेली असते.समोर नवेगाव बांधचे स्वयंभु जलाशय उपसागरासारखे पूर्वेकडे पसरलेले आहे.हिरव्या निळ्या डोंगरात अजून अंधार रेंगाळत आहे.शुक्राच्या चांदणीचं तळ्यात पडलेलं प्रतिबिंब मोठं लोभस वाटतंय. जलाशयाच्या लाटांवर अ‌द्भुत सावल्या पसरल्या आहेत.

त्या झुंजुमुंजु प्रकाशात सहासात धीवर जाळे पसरून कमरेएवढ्या पाण्यातून फेर धरून पुढं पुढं सरकत आहेत.

दोघं धीवर त्यांच्या विरुद्ध दिशेनं पाण्यावर काठी बडवीत माशांना जाळीकडे खेचत आहेत.पाण्यासारख्या पारदर्शी मासोळ्या उड्या घेत जाळ्याकडे जात आहेत. पूर्वेकडे तांबडं फुटत आहे.त्या पार्श्वभूमीवर धीवरांच्या सावळ्या आकृती स्फटिकाप्रमाणे वाटणारे जाळ्यांचे धागे-जाळीची टोकं एकत्रित आणण्याकरिता एकमेकांकडं हळूहळू सरकत असलेले धीवर आणि त्या पाण्यात पडलेल्या त्यांच्या तरल,असमान सावल्या दिसत आहेत.


पूर्व दिशा उजळू लागली तसे ते जलाशय प्रकाशमान होऊ लागले.आकाश निरभ्र होतं. तरी कुठं कुठं पर्वतांच्या शिखरावरील हिरव्या झाडीत पांढऱ्या ढगांचा एखादा पुंजका दिसत होता.तोदेखील आता सोनेरी भासत होता. बांधावरच्या घनदाट आंब्यातून येणाऱ्या 'क्वाक्, क्वाक्,

क्वाक्' या स्वरानं मी थबकलो.इकडं तिकडं पाहिलं.वाटलं हा आवाज तर टरकूचा पाणकोंबडीचा वाटतो.पण ते पाखरू न दिसताच,भुर्रकन झिलानीत गेल्याचा आवाज आला.झिलानीकाठच्या उंच कातळावर बसलो, की चोहोबाजूनं पाखरांचे अद्भुत स्वर कानावर यायचे.

कवड्याचे अरण्यगीत गुंजत असायचे. आकाशातून किर् किर् किर् किर् करीत राव्यांचा थवा उडत जायचा,

भारद्वाजाचे बुगु बुगु असायचे.बुलबुलांची गोड किलबिल,मैनेचा कलकलाट,नाचऱ्याची चिर् चिर्,सुंदर मनोलीची गोड चिव चिव असायची.


प्रभातकाळी आपल्यात आनंद स्फुरवू शकेल असा अन्य गायक पक्ष्यांशिवाय कोणी नाही.


या झिलानीत पाणपिपुलीची एक जोडी व त्यांची तीन पिलं राहात होती.माझी चाहूल लागताच पाणपिपुलीनं सिक्... सिक्... सिक्... सिक्...आवाजानं धोक्याची सूचना दिली. पाणपिपुल्या झिलानीकाठच्या देवभातात लपल्या.पिलं कमळाच्या पानापानांवरून किलबिलत त्यांच्यापाठोपाठ धावली.हा माणूस निरुपद्रवी दिसतो असं पाहून त्यांनी हळूहळू देवभातातून झिलानीत प्रवेश केला.दोघं कमळाच्या रुंद पानांवरून कुशलतेने हळुवार चालत होते ! पिलं मात्र त्यातल्या अंगाने पातळ असलेल्या पाणपिपुलीबरोबर,पानापानांवरून दुडदुडत असायची.

पिंगट सोनेरी रंगाचे ते तीन गोळे गुलाबी बोटांच्या पायावर पाचूच्या वर्णाच्या कमळाच्या पानावर उभे होते.सोनेरी डोकी गंभीरपणे वाकून चिमुकल्या चोचीनं पाण्यातील भक्ष्य वेचण्याचं अनुकरण करीत होती.


वाटायचं या गोजिरवाण्या पाखरांना स्पर्श करता आले असते तर! पण उंच कातळावरून पाण्यात पडलेल्या माझ्या प्रतिबिंबाच्या रूपानं मी त्यांच्यातच असे.पानावरून चालताना एखाद्याचा पाय पाण्यात पडे.

तरंगणाऱ्या पिलाला पाणपिपुलीतला नर चोचीच्या आधारानं सावरी.परंतु त्याला चोचीनं डोक्यावर मारून शिक्षा करी.जणू म्हणायचा असं पुन्हा करू नकोस.ती पिलं पूर्ववत त्याच्या मागोमाग चालायची.नर पिलांना एखाद्या पानामागच्या आळ्या दाखवून देई.पिलं त्यावर तुटून पडत,बर्फाप्रमाणं फक्त थोडा भाग पाण्याच्या पृष्ठावर तरंगणाऱ्या चिलाच्या डकवीडच्या फसव्या जाळीतून,

पायाची बोटं न अडकवू देता,कसं अलगद चालायचं याचं तो प्रात्यक्षिक करत पुढे जायचा...एखाद्या सावलीप्रमाणं धुक्याच्या तीन पुंजक्यांसारखी दिसणारी ती तेजस्वी पिलं त्याचं अनुकरण करीत.'आज्ञेचं पालन म्हणजेदीर्घायुष्य' हा धडा ते मोठ्या गंभीरपणे गिरवीत.एकदा झिलानीवर घिरट्या घालणाऱ्या पाणससाण्याला पाहून तो घाबरला.

'सिक्ऽऽ' आवाजाबरोबर ती पिलं त्याच्या पंखाखाली आली आणि तिघांना पंखात घेऊन तो जो उडाला तो पिटुंडीच्या जाळीत गडप झाला.पिलांचे लांब पाय लोंबताना दिसत होते. मोठं विचित्र व अद्भुत दृश्य होतं ते!


'पि-पि-पियु-पि-पि-पियु' सारख्या मधुर स्वरानं तो एखाद्या वेड्यासारखा त्या आवाजाच्या दिशेनं पिलांना तृणपाती टिपताना सोडून धाव घेई. झिलानीच्या मध्यावर ती उभी होती.अंगानं थोराड तपकिरी रंगाची.पंखावर सोनेरी वर्ख. झिलानीतली गवताची पानं तोडून ती कमळाच्या पानावर घरट्याचा पाया रचीत होती.तो विलक्षण वेगानं घरट्याजवळ पोहोचला.हिरव्यागार कमळाच्या पानांवर मोत्याचा चुरा विखुरावा तसे पाण्याचे थेंब दिसत होते.अशा या पाचूच्या पायघडीवरून तो हळूहळू मोठ्या ऐटीत मान वर करून तिच्याकडे जात होता.तो तिच्या नजीक जाताच तिनं पुन्हा गवताचं पातं खुडून कमळाच्या पानावर ठेवलं.तोही तिला साहाय्य करू लागला.त्यांचा विलक्षण अनुनय चालू असता,ती घरट्यात स्थानापन्न झाली.ती मोठी अद्भुत दिसे.सूर्याची किरणं त्या झिलानीवर पडली की त्या प्रकाशात ते झिलान मोठं रम्य वाटायचं.तिच्या पंखावर अवर्णनीय रंगाच्या छटा झळकावयाच्या.इतक्यात झिलानीच्या पलीकडून कुंभार कुकड्याचा मिस्किल पण खोकण्याचा आवाज आला.चिवचिवणारी ती शहाणी पिलं जागच्या जागी निःस्तब्ध थिजली.त्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले.त्यांच्या पंखासारखाच जागच्या जागी रंग असलेल्या त्या पक्ष्याचा आवाज पाणपिपुलीला आवडत नसे. त्यानंच तर एकदा त्यांची तीन पिलं गट्ट केली होती.तो त्यांचा द्वेष करी.तो धावत पिलांजवळ आला.'चिक् ऽऽ' आवाजा

बरोबर 'साई-सुट्टोऽऽ'करीत ती पोरं तुरुतुरु पळत झुडपाबाहेर त्याच्याजवळ आली.


सूर्याच्या सोनेरी प्रकाशात कमळाच्या पानापानांवरून व चिलाच्या जाळ्यातून ती पिलं त्याच्याबरोबर पुन्हा फिरू लागली.झिलानीतल्या पाण्याचा गर्द हिरवा-निळा रंग,

त्यातून वर आलेल्या कमळाच्या पानांचं छत्र,पाण्याच्या बिंदूंनी युक्त असलेली कमळपत्रं व त्यातून वावरणारी ती पिलं एखाद्या पारदर्शक छबीसारखी दिसत.ती अंड्यांतून बाहेर आल्याला आठ-एक दिवस झाले असावेत.

कमळाच्या पानापानांवरून मादी एकटी काहीतरी वेचीत होती.एखाद्या पानावर उभे राहून पाण्यातील चिलाचा पुंजका बाहेर काढून तो उलट- सुलट तपासून त्यातील कृमि-कीटक व घोंगल्या ती वेची.मध्येच थोडा - वेळ पाण्यात उतरून अलगद तरंगत समोरच्या पानावरची अळी-कोश मान वेळावून लीलेनं टिपी.कमळाच्या पानांवर चरताना पाठमोरी उभी राहिली - की ती किती सुंदर दिसे! तिचं ते उभं राहणं म्हणजे पक्षी उभं राहण्याचं अलौकिक प्रतीक वाटे. कधी कधी अशा अवस्थेत पंखाची पिसं चोचीनं स्वच्छ करू लागली की तिच्या प्रत्यंगाच्या हालचालीत तिच्या रूबाबदार,कमनीय शरीरसौष्ठवाचा प्रत्यय येई.झिलानीवर सूर्याचा प्रकाश पडला.अर्धे झिलान प्रकाशात तर अर्धे डोंगराच्या सावलीत होते. पाणपिपुली प्रकाशातून फिरत होती.कमळाच्या पानावरून तिचं प्रतिबिंब पाण्यात पडे.गळा डोके छातीचा भाग मखमली काळा.पंख कांस्य वर्णाचे.त्यावर हिरव्या-तांबड्या-पाचू रंगाच्या अद्भुत छटा सूर्यप्रकाशात दृग्गोचर व्हायच्या. तिची पिवळी चोच उठून दिसायची.कित्येक वेळा त्या चोचीच्या हालचालीवरून हिरव्या कमळवनातून ती ओळखू यायची.नर पिलांसह देवभातात गेला तो जवळजवळ तासभर दिसलाच नाही.ती दोघं एकमेकांना साद घालून संबंध अतूट ठेवीत.ती 'चुक् चुक्' करीत पुन्हा घरट्याकडे आली.निरनिराळ्या मधुर स्वरांनी तिनं त्याला साद घातली.तिच्या गोड आवाजातल्या पि-पि-पि-पि पियूच्या स्वरांनी सारं देहभान विसरून तो तिच्याकडे धावत आला.ती घरट्यात एकटी उभी होती.तो तिच्या अंगलट उभा राहिला.या वेळी जाणवलं,की मादी खरोखरच नरापेक्षा अंगानं थोराड आहे.त्यानं तिच्या चोचीपाशी चोच नेली.एकाएकी तो उडून तिच्या पंखांवर आरूढ झाला.तिनं मान खाली घातली.त्याचं सर्वांग थरथरत होतं.या मीलनानंतर ती स्तब्धपणे घरट्यात बसून राहिली.नर जो उडाला तो झिलानीकाठच्या देवधानात गेला.तेथून पंख फडफडवीत लांब पाय लोंबकळवीत जडपणे कालवा ओलांडून पलीकडच्या झिलानीत उडून गेला.ती पिलं तिच्या जवळपास तृणांकुर कुरतडत होती.तिचं त्या पिलांवर लक्ष होतं.परंतु ती पिलांजवळ मात्र जात नसे.पिलं फार जवळ येऊ लागताच ती दुसऱ्या बाजूला उडून जायची.कुणीच जवळपास नाही हे पाहून पिलं बिचारी कमळाच्या पानाच्या सावलीत,शांत उभी राहिली.त्यांची हालचाल बंद झाली.पाणपिपुली नेहमीप्रमाणं पानांवरच्या घरट्यात आली.तिनं आज एक अंडंही घातलं. ओळीत तीन अंडी दिसत होती.सूर्याच्या प्रकाशात ती एखाद्या रत्नाप्रमाणे तेजस्वी व सुंदर वाटत होती.कालदेखील तिनं एक अंडं दिलं होतं.नरमादीच्या मधुर मीलनानंतर तिनं अंडी घालायला सुरुवात केली.ती घरट्यात स्थानापन्न होताच,मधुर आवाजात त्याला साद घालू लागली.परंतु आता तो पिलांना सोडून तिच्याकडे पूर्वीइतक्या आवेगानं धावत येत नसे.आला तो पिलांना सोबत घेऊन.त्यांना पाहताच ती घरटं सोडून निघून गेली.त्या दिवशी नर 'सी-सी-सी' करीत घरट्याकडे आला.त्यानं दुरून घरटं न्याहाळलं.त्यात सुंदर रंगाची तीन अंडी होती. लगेच तो घरट्यात स्थानापन्न झाला व अंडी उबवू लागला.इतक्यात पिलांचा चिवचिवाट ऐकताच,तो धावत त्यांच्याकडे गेला.ती एखाद्या तटस्थासारखी निर्विकारपणे झिलानीच्या एका टोकाला चरत होती.घरटं सोडण्यापूर्वी त्यानं अंडी गवताच्या पानानं झाकली.


तो घरट्यात असला की पिलं निमूटपणे कमळाच्या सावलीत उभी असायची. बांधाकाठची पडाळ फुलली होती.झिलानीतली तीन शुभ्र कमळं रोज विकसित होत होती. हिरवंनिळं झिलान कुमुदाच्या फुलांनी चांदण्याप्रमाणं नित्य फुलत होतं.सायंकाळी झिलानीवरच्या सूर्याच्या परावर्तित प्रकाशात

झुडपाच्या काडीवर बसलेला पांढरा-काळा किलकिला ओलेचिंब झालेले पंख झटकताना दिसे.निरभ्र,निळ्या उंच आकाशातून सात-आठ पाणकावळे तळ्याकडे उडत जाताना दिसले. पाऊस थांबला तसं पावश्याचं ओरडणं थांबलं, सकाळी हिरव्यागार गवतावर दवाचे थेंब दिसू लागले.इतक्यात चातकाची जोडी झिलानीतल्या एका कमळाच्या पानावर येऊन बसली ती एका पानावरून दुसऱ्या पानावर जाण्याचा जणू खेळ खेळत होती.

कमळाच्या पानावरील दवानं त्यांच्या लांब शेपट्या ओल्याचिंब झाल्या. पानावर ते मोठ्या रूबाबात बसले की त्यांची लांब शेपटी पानाबाहेर येई.डोक्यावर काळी शेंडी,पांढरा गळा-पोट,काळ्या पंखांवर कवडीएवढे पांढरे ठिपके,ते पानाच्या मध्यावर खोलगट भागात साठलेल्या दवाच्या पाण्यात आपले पंख फडफडून आंघोळ करीत.तीन-चार दवाचे थेंब चोचीने हळूवार टिपीत.

कमळाच्या एका दांड्यावरून दुसऱ्या पानावर बसत.

त्यांच्या हालचालीनं अंड्यावर बसलेली मादी घरटं सोडून निघून गेली.ती सारखी 'सिक्-सिक्-सिक् सिक्' करीत काहीतरी कुरतडीत होती.मात्र तिचं सारं लक्ष घरट्याकडे होतं.आज दोन्ही पाणपिपुले घरट्याजवळ दिसत होते.ते एकमेकांशी लगट करीत होते.शेवटी एक पाणपिपुली घरट्यातील अंड्यावर बसली.मोठा अजब प्रकार होता. वाटलं,तो तिला किंवा ती त्याला अंड्यावर बसण्यास भाग पाडीत होती की काय? सकाळपासून ती तीनदा अंड्यावर बसली होती आणि तीनदा तिनं घरटं सोडलं होतं.घरट्यात आली की ती दोन्ही पायांमध्ये अंडी ठेवून उभी राही.

एकदा खाली वर मान करी.सूर्याकडे पाठ करून अंडी उबवू लागे.तो दूर झिलानीकाठी आपली पिसं चोचीनं व पायाच्या बोटांनी साफ करी.पिलं जवळच तृणपाती टोकरीत होती.दवाचं पाणी पिणाऱ्या चातकाकडे ते जरी दुर्लक्ष करीत तरी आपल्या अन्नाशी स्पर्धा करणाऱ्या पक्ष्यांना नर आपल्या जवळपास फिरकू देत नसे. त्या दिवशी पाण्यात स्तब्ध उभ्या असलेल्या ढोकरीला तिनं झिलानीतून हुसकून लावलं. झिलानीकाठच्या देवधानातील पाऊलवाटेनं एकदा टरकू,भुंग्यासारखी काळीभोर सहा-सात इवलीशी पिलं घेऊन झिलानीकडे येत होता तर त्यानं त्यांना अर्ध्या वाटेतूनच परतवून लावलं.त्या झिलानीवर त्याचं एकछत्री मुक्त साम्राज्य (जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली) होतं.एखाद्या मोठ्या सावजावर प्रथम तो 'क्वाक्' करून उंच उडी घेऊन हल्ला करी.तशी पिलं धावत येऊन त्या सावजावर तुटून पडत.


उन्हाची तिरपी किरणं तिच्या घरट्यावर पडली होती.ती हळूहळू घरट्याकडे येत होती.घरट्यात उभी राहिली होती.चोचीनं तिनं अंडी पंखाखाली सारली.सूर्याकडे तोंड करून तिनं अंडी उबविण्यास सुरुवात केली.किनाऱ्यावर टिटवीचा आवाज येत होता.तिनं आपली मान उंच सरळ केली.डोक्यावरील दोन पांढऱ्या रेघा नागिणीच्या फणीवरील आकड्यासारख्या दिसत.तिच्या पिवळ्या चंचुपुटाची हालचाल नागिणीच्या जिभेसारखी वाटायची. गुप्तधनावर बसलेली जणू नागीणच ती ! पिलं दिसामासी वाढत होती. त्यांचा रंग बदलत होता.खालचा भाग पिंगट तर वरचे अंग तपकिरी रंगाचे दिसू लागले.ढांगुळ्या पायांवर आता मुलायम पिसं दिसू लागली.पंजे कोळ्याच्या पायाप्रमाणं दिसू लागले.तो त्यांना रोज नवीन जागी नेई.त्यांना रोज नवीन पदार्थ खायला मिळत.ती शहाणी होत होती.त्यांचं सौंदर्य नित्य विकसित होत होतं.