भगवद्गीता - व्यास
(इसपू चौथं ते पाचवं शतक)
भगवद्गीतेला सर्वसामान्य लोकांसमोर आणणारे ग्रंथकार म्हणून तसंच महाभारताचे रचेते म्हणून महर्षी व्यास यांच्याकडे बघितलं जातं. महाभारतामध्ये व्यासांचाही प्रत्यक्ष सहभाग होता.महाभारताच्या मूळ ग्रंथाचं नाव 'जय' असल्याचं मानण्यात येतं.व्यासांनी हा ग्रंथ आपला मुलगा शुक आणि आपले पाच शिष्य यांना सांगितला.पुढे
त्याचं 'भारत' हे नामकरण झालं आणि त्यानंतर तो अनेक ऋषींनी पुढे कथन करत गेल्यानंतर त्याचं नाव 'महाभारत' झालं असंही मानण्यात येत.महर्षी व्यास यांचं 'कृष्णद्वैपायन' हेही नाव होतं,असं म्हटलं जातं. मात्र याबाबत मतमतांतरं आहेत.पराशर ऋषी आणि सत्यवती यांच्या पोटी व्यासांचा जन्म झाला.सत्यवती ही कोळीकन्या असून ती कुमारिका असतानाच तिनं व्यासांना जन्म दिला. व्यासाच्या जन्माची कथा विलक्षण आहे.सत्यवतीच्या वडिलांचा व्यवसाय नदीपात्रातून होडीतून लोकांना एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचवणं असा होता.एकदा सत्यवती पराशर ऋषींना होडीतून दुसऱ्या किनारी पोहोचवण्यासाठी निघाली असताना, तिच्या सौंदर्यावर पराशर ऋषी लुब्ध झाले त्यांनी तिच्याबरोबर समागम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि सत्यवतीनं त्यांना होकार दिला.याच समागमातून व्यासांचा जन्म झाला.पुढे सत्यवतीचं लग्न हस्तिनापूरचा राजा शंतनू याच्याशी झालं,सत्यवती आणि शंतनू यांचा पुत्र म्हणजे भीष्म! त्या अर्थान भीष्म आणि व्यास हे सावत्र भाऊ झाले अशा रीतीनं व्यासांचा महाभारताशीदेखील प्रत्यक्ष संबंध होताच.तसंच पूर्वी एकच वेद होता.या वेदाचे चार भाग व्यासांनी केले असं मानलं जातं.तसंच व्यासांनी महाभारताची रचना करून नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र याविषयी या ग्रंथात भाष्य केल्यानं भारतीय संस्कृतीचा हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो.
आषाढी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असंही संबोधल जातं आणि या दिवशी गुरूची पूजा केली जाते. यालाच व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं.
'व्यासोचिछष्टं जगत्सर्वम्' म्हणजेच व्यासांनी जगातलं सगळं ज्ञान उष्ट करून सोडलं आहे असा समज सर्वत्र आहे.याचं कारण भगवद्गीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये मानवी जीवनातल्या एकूणएक पैलूंना स्पर्श केला आहे.केवळ स्पर्शच नाही तर त्या त्या विषयांचं सखोल विवेचनही केलं आहे.
खरं तर हजारो वर्षांपासून भगवद्गीता वाचून अनेक जण प्रभावित झाले आणि वेगवेगळ्या कालखंडांत या ग्रंथानं वेगवेगळ रूप धारण केलं.
भगवद्गीतेपासून अष्टावक्रगीता,ईश्वरगीता,
कपिलगीता,गणेशगीता,पराशरगीता,
भिक्षुगीता,व्यासंगीता,रामगीता,शिवगीता,
सूर्यगीता,हंसगीता आणि यमगीता लिहिल्या गेल्या.मूळ भगवद्गीता हा ग्रंथ संस्कृतमध्ये असून संत ज्ञानेश्वरांनी हीच संस्कृतमधली भगद्गीता सुलभ भाषेत मराठीतून आणली.विनोबा भावे यांनी भगवद्गीतेचं मराठीत ओव्यांच्या रूपात 'गीताई' या नावानं भाषांतर केलं आहे.भगवद्गीतेवर मराठीतून, हिंदीतून आणि संस्कृतसह अनेक भाषांमधून अनेक ग्रंथ लिहिले गेले.महात्मा गांधी यांनी 'अनासक्ती योग',परमहंस योगानंदांनी 'ईश्वरार्जुन संवाद',अरविंद घोष यांनी 'एसेज ऑन गीता', इस्कॉनच्या प्रभुपादस्वामी यांनी 'गीता आहे तशी´,ज.स.करंदीकर यांनी 'तत्त्वमंजरी' अर्थात 'निर्लेप कर्मशास्त्र',जयदयाल गोयंका यांनी 'गीतातत्त्व विवेचनी टीका',दासोपंत यांनी 'गीतार्णव',कृ.ह. देशपांडे यांनी 'श्रीगीतार्थबोध', आदि शंकराचार्य यांनी 'गीताभाष्य',
रामानुज यांनी 'गीताभाष्य',टिळक मंडाले इथे तुरुंगवासात असताना त्यांनी अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत 'गीतारहस्य' हा ग्रंथ लिहिला. नारायण वासुदेव गोखले यांनी भगवद्गीतेचा इंग्रजीतून अनुवाद केला,तसंच त्यांनी 'गीतेमध्ये काय आहे?' या ग्रंथातून भगवद्गीतेची मांडणी केली.देवदत्त पटनायक यांनी 'माझी गीता' हा ग्रंथ इंग्रजीतून लिहिला.याशिवाय अनेक अभ्यासकांनी अनेक भाषांमधून भगवद्गीता सर्वसामान्य लोकां- समोर आणली.'भगवद्गीता' हा इतका महत्त्वाचा ग्रंथ आहे,की अनेक धर्मातल्या तत्त्वज्ञांनी,विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी या ग्रंथाची प्रशंसा केली आहे. महात्मा गांधींपासून ते अल्बर्ट आईन्स्टाईनपर्यंत अनेक थोरांना भगवद्गीतेनं प्रभावित करून सोडलं.आयुष्यात येणाऱ्या संकटाच्या वेळी आणि मोहाच्या वेळी काय करावं यासाठी महात्मा गांधींनी संस्कृत शिकून भगवद्गीतेचा अभ्यास केला.
आपल्या आईची जागा या ग्रंथानं घेतली,असं महात्मा गांधींनी म्हटलंय. मला आत्मिक समाधान केवळ 'भगवद्गीता' वाचून मिळतं आणि असा ग्रंथ झाला नाही आणि पुढेही कधी होणार नाही,अशा रीतीनं महात्मा गांधींनी भगवद्गीतेचं महत्त्व सांगितलं.
"मी जेव्हा भगवद्गीता वाचतो आणि त्याच वेळी विश्वाची निर्मिती कशी झाली याचा विचार करतो त्या वेळी मला सगळं काही निरर्थक भासतं,असं भगवद्गीतेविषयी बोलताना विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यानं म्हटलं.
'भगवद्गीता ही शाश्वत तत्त्वज्ञानाचा आणि अध्यात्माचा सगळ्यात सरळ आणि सुलभ सारांश आहे.म्हणून केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी भगवद्गीता हा ग्रंथ म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे.आहे,' असं विख्यात विचारवंत आणि साहित्यिक असलेल्या अँल्डस हक्स्ली यानं म्हटलं.
मॅनहटन प्रकल्पाचा प्रमुख रॉबर्ट जे. ओपेनहायमर या शास्त्रज्ञावर तर भगवद्गीतेचा खूप मोठा प्रभाव होता. तो नेहमी आपल्या- जवळ भगवद्गीतेची प्रत बाळगत असे.
योगी अरविंद,महर्षी विठ्ठल रामजी शिंदे,डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर,जर्मन विचारवंत रुडॉल्फ स्टिनर,हेन्री डेव्हिड थोरो,राल्फ वाल्डो इर्मसन, स्वामी विवेकानंद आणि भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या आयुष्यावरदेखील भगवद्गीतेनं खूप मोठा प्रभाव पाडला होता..
१९८५ साली अमेरिकेतल्या पीटर ब्रुक यानं महाभारतानं प्रभावित होऊन नऊ तासांचं नाटक 'महाभारत' याच नावानं प्रत्यक्ष सादर केलं. या नाटकाचे त्यानं चार वर्ष जगभर प्रयोग केले. त्यानंतर पीटर ब्रुकन याची लांबी कमी करून १९८९ साली दूरदर्शनसाठी सहा तासांची फिल्म बनवली.त्यानंतर डीव्हीडी ही तीन तासांची तयार केली.या फिल्मची पटकथा पीटर ब्रुकन स्वतःच लिहून ती फिल्म स्वतःच दिग्दर्शित केली होती. या फिल्मचं संगीत नोबेल पुरस्कारप्राप्त रवींद्रनाथ टागोर यांचं होतं.
'महाभारत' ही फिल्म तयार करण्यासाठी पीटर ब्रुकनं आठ वर्षं परिश्रमपूर्वक अभ्यास केला होता.या फिल्मनं अनेक पुरस्कार प्राप्त केले.इतकंच नाही तर या फिल्मन फ्रान्स,यूके,जपान,डेन्मार्क,बेल्जियम, स्वीडन,पोर्तुगाल,
नॉर्वे,नेदरलँड आणि फिनलँड इथे प्रदर्शित होऊन भरभरून यश मिळवलं. यू ट्यूबवर ही फिल्म उपलब्ध आहे.महाभारताच्या कथानकावर अनेकांनी चित्रपट काढले असले तरी शशी कपूर निर्मित 'कलयुग' हा चित्रपट खूप गाजला होता. १९८८ ते १९९० या काळात बी.आर.चोप्रा आणि त्यांचा मुलगा रवी चोप्रा दिग्दर्शित भारतात 'महाभारत' ही दूरदर्शन मालिका प्रसारित झाली.
या मालिकेवर एकूण ९ कोटी रुपये खर्च करण्यात आले. जगातली सगळ्यात जास्त बघितली गेलेली ही मालिका होती.९४ भागांत असलेल्या मालिकेचा प्रत्येक भाग हा ४५ मिनिटांचा असून ब्रिटनमध्ये बीबीसीद्वारा याचं प्रसारण केलं तेव्हा प्रेक्षकांची संख्या ५० लाखांच्यावर गेली होती.ही मालिका सुरू असताना अघोषित संचारबंदी लागल्या प्रमाणे संपूर्ण रस्त्यावर शुकशुकाट असे. ज्यांच्याकडे टीव्ही संच नाही.असे अनेक जण शेजाऱ्यांच्या घरी विनासंकोच मालिका बघण्यासाठी जात आणि गंमत म्हणजे येणाऱ्याला कोणीही 'नाही' म्हणत नसे. भीष्माची भूमिका करणारा मुकेश खन्ना हा अभिनेता तर इतका लोकप्रिय झाला की,त्यानं आपल्या कंपनीला भीष्म हेच नाव दिलं,तर श्रीकृष्णाची भूमिका करणारा नितीश भारद्वाज या अभिनेत्याला रस्त्यावर लोकांनी बघितलं तर ते चक्क त्याच्या पाया पडत.तसंच महाभारताचं शीर्षकगीत विख्यात गायक महेंद्र कपूरच्या धीरगंभीर आवाजातलं होतं.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।७।। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।८।।
'भगवद्गीता' अनेक भाषांत भाषांतरित झाली; आजवर तिच्या हजारो / लाखो प्रती विकल्या गेल्या; तेव्हा एकच सत्य समोर येतं आणि ते म्हणजे 'भगवद्गीता' आणि तिचा निर्माता महर्षी व्यास यांनी समस्त मानवजातीला अचंबित व्हावं असं जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान दिलं हेच खरं!
अति झोप,भीती,कमकुवत मन,आळस आणि दिरंगाई या पाच गोष्टींपासून माणसानं मुक्त झालं पाहिजे. - महर्षी व्यास
४ एप्रिल २०२३ या लेखातील शेवटचा भाग
समाप्त..