* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: देव अंतराळवीर होते का ? भाग शेवटचा

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२६/४/२३

देव अंतराळवीर होते का ? भाग शेवटचा

मन्ना मशीन तेच करीत होते.सकाळचे दंवबिंदू आणि एक प्रकारची बुरशी (Chlorella) यापासून प्रत्येक दिवशी सर्वांना पुरेल एवढे अन्न ते मशीन तयार करीत होते.या पळापळीत जे अन्न मिळते आहे ते खाऊन गप्प बसायचे सोडून त्या परिस्थितीतही तक्रार करणाऱ्या लोकांना मोजेस विचारतो की,तुमची निदान उपासमार होत नाही हे काय कमी आहे?नाहीतर तुम्ही काय खाणार होता.?


पण हे अन्न बनविण्यासाठी ऊर्जेचे साधन काय? त्याचे उत्तर आजच्या तंत्रज्ञानावरून मिळते. छोटी अणुभट्टी! कित्येक वर्षे चालू राहणारे आणि ऊर्जा देणारे मन्ना मशीन ही एक छोटी अणुभट्टी होती.हिमालयात अमेरिकेच्या सेन्ट्रल इन्टलिजन्स एजन्सीने अशीच एक छोटी अणुभट्टी ठेवली होती आणि तिच्या शक्तीचा उपयोग चीनवर लक्ष ठेवण्यासाठी,अनेक तऱ्हेची संवेदनाक्षम यंत्रे वापरण्यासाठी होत होता.हे प्रकरण आज आपल्याला नवीन नाही.हल्लीचेच आहे.


अशा तऱ्हेची अणुभट्टी धोकादायक किरणोत्सर्ग सोडणारच.पण त्याने कोणी मृत्युमुखी पडत नाही.पण केव्हा? तिच्या कायम सान्निध्यात राहिले नाही तर ! ती वापरायची कशी ही माहिती असेल तर !


पण पुराणकाळात अणुभट्टी बांधून घेणारे हे देव कोण?

पुराणकाळातल्या आणखी एका 'चमत्कारा'चा सुद्धा उलगडा झाला आहे.असे म्हणायला हरकत नाही.त्याला कारण मार्सेलीसमधील एक घटना आहे.


१९६४ मध्ये मार्सेलीस येथील रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रो अकौस्टिक्स (Research Institute of Electro Accoustics)

नवीन जागेत हलवण्यात आली.अनेक जणांना काही दिवसातच डोकेदुखी,मळमळणे वगैरे गोष्टींचा त्रास

व्हायला लागला.काही जण थरथर कापायलाच लागले.प्रथम वाटत होते की कोणत्या तरी किरणोत्सर्गाचा हा परिणाम आहे म्हणून! संवेदनशील यंत्रे घेऊन सर्व इमारतीची तपासणी करण्यात आली तेव्हा लक्षात आले की हा किरणोत्सर्गाचा वगैरे प्रकार नाही.तर एका व्हेन्टिलेटरमधून अगदी कमी कंपन

संख्येच्या ध्वनिलहरी आत जात आहेत व आवाजाच्या वेगापेक्षा कमी अशी कंपने सर्व इमारतीत निर्माण करीत आहेत व त्यामुळे हा त्रास होतो आहे.


काही शोधांना सुदैव कारणीभूत ठरते.तसाच प्रकार आता घडला.या संस्थेचे प्रमुख ग्लादिमीर गावरू हे २० वर्षे ध्वनिलहरींचा अभ्यास करीत होते.त्यांच्या मनात आले की जी गोष्ट चुकुन घडली आहे.ती प्रयोग करून मुद्दाम घडवून आणता आलीच पाहिजे.त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पहिली ध्वनिबंदूक बनवली.हवा येण्यासाठी ठेवलेल्या उंचीवरच्या झडपेतून अति दाबाखाली असलेली हवा ६१ ट्यूब्स् मधून हळुहळू सोडण्यात आली की ज्यामुळे १९६ हर्टझ् संख्या असलेल्या ध्वनिलहरी निर्माण होतील.घडला तो प्रकार भयानक होता.या नव्या इमारतीच्या भिंतींना तडे जायला लागले.त्याच्या आतल्या सहकाऱ्यांच्या पोटात गोळे यायला लागून त्यांची आतडी आणि पोटे पिळवटून जायला लागली.त्यांनी ताबडतोब त्यांचे उपकरण बंद केले.


त्यांनी प्रयोग चालूच ठेवले.त्यांनी २००० वॅट शक्तीची 'मृत्युची तुतारीच' बनवली की जिच्यातून ३७ हर्टझ कंपनसंख्येच्या ध्वनिलहरी निघतील. या उपकरणाची मार्सेलीसमध्ये चाचणी करता येणेच शक्य नव्हते.कित्येक मैलांच्या परिसरातील इमारतीच नाहीतर कोसळून पडल्या असत्या.आज ७५ फूट लांबीची फक्त ३ हर्टझ कंपनसंख्येच्या ध्वनिलहरी निघणारी तुतारी ते बनवीत आहेत.


भविष्यकाळाचे भीषण दृश्य डोळ्यांसमोर उभे होत असतानाच पुन्हा बायबलकडे वळल्याशिवाय राहवत नाही.'देवाने संरक्षण दिलेल्या जमातीने आपले पायसुद्धा ओले न करता नदी पार केली.आणि जेरिको शहराला वेढा घातला. शहराभोवती २१ फूट रूंदीचे तट होते.एका ठिकाणाहून त्यांना आपल्या तुताऱ्या फुंकण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यांनी आपल्या तुताऱ्या फुंकल्या.सर्व लोक ओरडत होते आणि ही तटबंदी संपूर्ण कोसळून आडवी झाली.

लोक चालतच शहरात गेले आणि त्यांनी जेरिकोवर कब्जा केला.' धर्मगुरू आणि इतरांनीही बेंबीच्या देठापासून आरडाओरडा केला असता आणि हजारो तुताऱ्या फुंकल्या असत्या तरी जेरिकोच्या तटबंदीला काही झाले नसते.पण या तुताऱ्या साध्या नव्हत्याच का?आज आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येते की अतिशय कमी कंपनसंख्येच्या ध्वनिलहरी सोडणाऱ्या जर या तुताऱ्या असतील तर जेरिकोची तटबंदी कोसळवण्याची त्यांची निश्चितच ताकद होती.


'एक्झोडस' हा बायबलचाच एक भाग.त्यामध्ये मोजेस एकदा देवाला 'तू दर्शन का देत नाहीस' म्हणून विचारतो.

तेव्हा देव म्हणतो,'तू माझा चेहरा बघू शकणार नाहीस.जो माणूस माझा चेहरा पाहील तो जिवंत राहू शकणार नाही.' जुन्या सर्व महाकाव्यात या बाबतीत आश्चर्यकारक साम्य आहे.सुमेरियन लोकांचे 'गिलगामेशचे महाकाव्य' बायबलहून जुने असावे.बायबलसारखेच त्यात देवाचे शब्द आहेत.'कोणत्याही मानवाने देव राहतात त्या पर्वतावर येता कामा नये.जो देवाकडे तोंड वर करून पाहील तो मृत्युमुखी पडेल.'


देव आणि मानव नजरेला नजर का देऊ शकत नव्हते? समोरासमोर का उभे राहू शकत नव्हते? देवांनी त्यांचा मुखवटा कधीच का उतरवला नाही? देवांची इच्छा नव्हती की मानवाने त्यांचे दर्शन घ्यावे म्हणून? का? कुठल्या धोक्याची जाणीव देवांना होती?


काही वेळा तर वाटते की सर्वच जुन्या ग्रंथांची उत्पत्तीसुद्धा एका ठिकाणी झाली असेल आणि नंतर ते वेगवेगळ्या प्रकारांनी जगातल्या सर्व देशात पोहोचले असतील.


वेगवेगळ्या तहांनी लिहिलेले जुने धर्मग्रंथ कायमच उजेडात येत आहेत.आजपर्यंत अज्ञात असलेले धर्मग्रंथसुद्धा देवांचे दैदिप्यमान रथ, देवपुत्र,रथांची चाके आणि ते सोडत असलेल्या धुराबद्दल लिहितात.तसाच विचार केला तर अगदी ॲडम आणि ईव्हच्या काळापासून दैदिप्यमान अंतराळयानांचा उल्लेख आहे. ईव्हने आकाशात पाहिले तर चार भव्य गरुडांनी ओढलेला प्रकाशमान रथ तिला दिसला.तो ॲडम जवळ येऊन थांबला.तेव्हा त्याच्या चाकातून धूर येत होता.देवांच्या अंतराळयानांचा उल्लेख केला की प्रकाश,धूर,चाके या गोष्टींचा उल्लेखही न चुकता येतो आणि हे सर्व धर्मग्रंथ या दैदिप्यमान रथांबद्दल हेही सांगतात की कोणत्याही मर्त्य मानवाला त्यांचा भव्य-दिव्यपणा कधीही शब्दात सांगता येणार नाही.


लॅमेच स्क्रोल मध्येही एका चमत्कारिक प्रसंगाचे वर्णन आहे.त्यातही सर्व लेखन उपलब्ध नाही पण जे सापडले आहे.त्यातही कितीतरी परिच्छेद नाहीसे झाले आहेत;पण शिल्लक राहिलेल्यांचा अर्थ लावता एक कथा नक्कीच सांगण्यासारखी आहे.


नोहाचे वडील लॅमेच बऱ्याच काळानंतर घरी परततात.

अचानकपणे ! घरात शिरतात तर त्यांना अगदी गोरा गोरा पान आणि सुंदर मुलगा घरात दिसतो.त्यांच्या कुटुंबात अजिबात न शोभणारा.लॅमेच संशयाने पछाडला जातो.

आणि बायकोला सांगतो की हा मुलगा त्याचा असणे शक्यच नाही.तो तिच्यावर नाना आरोप करायला लागतो.सर्व पवित्र गोष्टींची शपथ घेऊन ती सांगते की,लॅमेचला वाटते त्याप्रमाणे लॅमेच नसताना कोणत्या सैनिकापासून,अनोळखी वाटसरूपासून किंवा इतर देवपुत्रांपासून तो मुलगा झालेला नाही. (पुन्हा हे देवपुत्र कोण हा प्रश्न आलाच) पण लॅमेचचा विश्वास बसणे शक्यच नसते.तो त्याच्या बापाकडे याबाबत सल्ला विचारायला जातो.झालेला प्रकार ऐकून तोही विचारात पडतो.या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन तो मोठ्या कष्टाने प्रवास करीत शहाण्या इनोचकडे जातो.त्या मुलाचा बाप कोण याची शहानिशा होणे आवश्यकच असते.तो मुलगा देवपुत्रांसारखा गोरा,देखणा कसा दिसतो, कुटुंबातले इतर सर्वजण कसे अगदी वेगळे दिसतात.हे सर्व तो इनोचला समजावून सांगतो. सर्व ऐकल्यावर इनोच त्याला म्हणतो की मानवाची वर्तणूक पाहून देवाचा कोप झालेला आहे.आणि तो लवकरच मानवाचा नाश करणार आहे.ज्या मुलावर त्या सर्वांचा संशय आहे तो या हत्याकांडातून वाचणार आहे आणि नंतर नवीन जग निर्माण करणार आहे.तेव्हा तू तुझ्या मुलाला,लॅमेचला सांग की त्याच्या या मुलाचे नाव नोहा असे ठेव आणि त्याचा व्यवस्थित सांभाळ कर.लॅमेचला तसे करण्याशिवाय दुसरा मार्गच नसतो.


या कथेतील आश्चर्यकारक भाग म्हणजे होणाऱ्या जलप्रलयाची आगाऊ माहिती नोहाच्या आजोबांनासुद्धा देण्यात आली होती.इनोचही साधासुधा माणूस नव्हताच.

आख्यायिकेप्रमाणे इनोचसुद्धा काही काळानंतर देवाच्या दैदिप्यमान रथात बसून अंतर्धान पावला होता.कोणत्या तरी अंतराळवीरांनी पृथ्वीवरील स्त्रियांशी संबंध ठेवून मुद्दामच निर्माण केलेली ही मानवजात आहे का,असा गंभीर प्रश्न हे वाचल्यावर आपल्यासमोर उभा राहत नाही? नाहीतर पुनः पुन्हा देवपुत्रांनी,धिप्पाड अशा माणसांनी अशा जमाती निर्माण करायला का हातभार लावला असता? जेव्हा जेव्हा प्रयोग फसले,योग्य अशी निर्मिती झाली नाही तिथे अशा प्रजेचा नाशच घडवून आणण्यात आला असावा.


महाप्रलय हे ऐतिहासिक सत्य आहे.पण होणाऱ्या जलप्रलयाची आगाऊ कल्पना जर नोहाच्या आजोबांना देण्यात आली होती.बोट कशी बांधायची यांच्या सूचना नोहाला शेकडो वर्षे आधी देण्यात आल्या होत्या,तर जलप्रलय ही नैसर्गिक आपत्ती नक्कीच नव्हती.आणि तो दैवी कोपही नव्हता.

योजनाबद्ध रितीने काही निवडक व्यक्ती सोडून इतरांचा नाश करण्याची,संहार करण्याची कल्पना होती,व त्यासाठीच मुद्दाम जलप्रलय घडवून आणला अशीच शक्यता दिसते.


आजच्या काळात मुद्दाम योग्य व्यक्ती जवळ आणून अत्यंत बुद्धिमान संतती निर्माण करण्याचा प्रयोग कुणालाही मूर्खपणाचा वाटणार नाही.अशी बुद्धिमान जमात निर्माण करण्याच्या 'देवांच्या' प्रयत्नांचा उल्लेख जगातील सर्व धर्मग्रंथात आहे.कित्येक ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे की देवांना हवी होती तशी,त्यांच्यासारखी दिसणारी प्रजा अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतरच निर्माण झाली.टिआहुआन्कोची आख्यायिका काय सांगते?जगन्माता होण्यासाठीच दैदिप्यमान अंतराळयानातून एरियाना ही स्त्री आली होती म्हणून ना ?


अशीही शक्यता आहे की ज्या अज्ञात अंतराळवीरांनी अति प्राचीन काळात पृथ्वीला भेटी दिल्या होत्या,

त्यांच्याचसारखे कदाचित आपण दिसत आहोत! या देवांनी आपल्या पूर्वजांकडे कसला 'नैवेद्य' मागितला होता याचा कधी तरी विचार केला आहे? धूप आणि चंदन आणि प्राण्यांचा बळी असल्या सटरफटर गोष्टींचा नाही.


त्यांनी मागितलेल्या गोष्टींची यादी पाहिली तर त्यात आढळतात मिश्रधातूंपासून बनविलेल्या नाणी वगैरेंसारख्या गोष्टी की ज्यासाठी तंत्रज्ञानात बरीच प्रगती आवश्यक आहे.ऐतिहासिक काळातील धातू गाळण्याच्या भट्टीत तांबे कसे शुद्ध केले असेल ते कळत नाही.काही गुहांमध्ये सापडलेला कॉपर सल्फेटचा साठा मात्र अशाच काही गोष्टींची शक्यता दाखवतो.कारण तो साठा कमीत कमी ५००० वर्षांपूर्वीच्या काळातील आहे.


आपले अंतराळवीर कधी कुठल्या ग्रहावर उतरले आणि तेथील जमाती आपल्या मानाने फारच मागासलेल्या असतील,तर त्यांचे 'देव' म्हणूनच स्वागत होईल पण याचीही काही खात्री नाही म्हणा ! समजा,आपले अंतराळवीर चुकून अशा ग्रहावर उतरले की जेथील बुद्धिमान जीवन आपल्याहून फारच प्रगत आहे,तर काय होईल? कोण हे रानटी आणि मागासलेले लोक आता अंतराळयाने घेऊन फिरायला लागले आहेत अशी टवाळकीसुद्धा होईल.!


समाप्त…