एक होता राजा.त्यानं त्याचं राज्य खूप न्यायानं, आदरानं सांभाळलं.त्याचं वय झालं.त्याचा मुलगा होता तरुण वयाचा.त्याला वाटलं आता वारसा हक्कानं आपल्याकडे राज्य सहज येणार;पण राजा पुत्रप्रेमानं भाळलेला नव्हता.आपल्या मुलाची पात्रता सिद्ध झाली,तरच त्याला भावी राजा म्हणून घोषित करायचं,असं त्यानं ठरवलं होतं.त्यामुळे अरण्यात राहणाऱ्या आपल्या गुरूंकडे राजानं मुलाला पाठवलं. मुलाला राजानं निघताना सांगितलं,की तू चांगला राजा होऊ शकतोस,
असं गुरुजींना वाटलं,तरच तुझ्यावर मी राज्य सोपवेन.
राजाचा मुलगा तसा स्वभावानं चांगला होता.अस्त्र-शस्त्रविद्या,ग्रंथांचं औपचारिक शिक्षण त्यानं घेतलेलं होतं.त्यामुळे आपल्या वडिलांचे जे कोणी गुरुजी आहेत,
त्यांनी आपली एखादी परीक्षा घेतली,की काम झालं, असं त्याला वाटलं.अरण्यात चार दिवस बदल म्हणून राहण्याचाही अनुभव मिळेल,असा विचार करून राजाचा मुलगा मोठ्या उत्साहानं गुरुजींच्या कुटीकडे निघाला.
दाट अरण्यात राहणाऱ्या गुरुजींनी राजाच्या मुलाचं मोठ्या प्रेमानं स्वागत केलं.आपल्याकडे परीक्षा देण्या -
आधी काही अनुभव व प्रशिक्षण घ्यावं लागेल,असं गुरुजींनी त्याला सांगितलं. दोन दिवस विश्रांती झाल्यावर गुरुजी त्याला म्हणाले,'आता तू सकाळी सर्व आवरून लगेच वनात जायचंस.संध्याकाळीच परत यायचं.तिथं काय करायचं,हे तूच ठरवायचंस.' राजाच्या मुलाला आधी यात काही विशेष वाटलं नाही.तो वनात आत चालत गेला.दमला तेव्हा एका दगडावर बसला.एक तास गेला,
दोन तास गेले. वेळ जाता जाईना.बरं,वनात काही बघायलाही नव्हतं.ना इमारती,ना कुठलं संगीत वा नृत्य,ना कुठले क्रीडा प्रकार,राजमहालात त्याला रिझवायला
( करमणूकीसाठी ) बरीच माणसं असायची,तसंही काही नाही.कसा तरी त्यानं दिवस ढकलला.उन्हं उतरायला लागल्यावर गुरूंच्या कुटीकडे परत फिरला.गुरुजींनी त्याला विचारलं, 'कसा गेला आजचा दिवस?' राजाचा मुलगा जरा चिडूनच म्हणाला,'कसा जायचाय? ढकलला एवढंच.' गुरुजी किंचितसं हसले.ते म्हणाले,'अरे,पुढचा महिनाभर तुला रोजच अरण्यात जायचंय.तुझ्या प्रशिक्षणाचा तो भाग आहे.'
हे ऐकून राजाच्या मुलाच्या पोटात खड्डा पडला;पण गुरूंच्या शिफारसीशिवाय राजगादीचा मार्गही मोकळा होणार नव्हता.त्यानंतर पुढचा आठवडाभर तो अरण्यात जात राहिला.हळूहळू रानातल्या अनवट वाटा त्याच्या ओळखीच्या होऊ लागल्या.निर्जीव भासणाऱ्या अरण्यातील पानांची सळसळ,वाळलेल्या पाचोळ्यावरून चालताना होणारा चुर्र चुर्र आवाज,
त्याच्या चाहुलीनं थबकणारे प्राणी,झाडांवर पानांमागून चिवचिवणारे पक्षी,पाण्याच्या स्रोतांच्या आवाजाचे फरक,झाडावरून गळणारं पान,प्राणी-पक्ष्यांच्या पिलांच्या चेहऱ्यावरचं कुतूहल आणि त्यांचं बिचकून जाणं,असा एक ना अनेक गोष्टी त्याच्या ध्यानात येऊ लागल्या.रिकाम्या अरण्यात किती तरी जीवांच्या ध्वनींचं संगीत भरलेलं आहे,त्यांच्या पळण्यात,थांबण्यात,मान वळवण्यात किती लय आहे,ती त्याला जाणवू लागली.सरपटणाऱ्या जीवांच्या त्वचेवरचे रंग व रचनांची मिश्रणं त्याला मोहवू लागली.
रोज संध्याकाळी कुटीत परतल्यावर गुरुजी त्याला,आज काय केलंस हा जो प्रश्न विचारायचे, त्याची अनेक पदरांची उत्तरं आता त्याच्याकडे साठू लागली होती.नंतर असं होऊ लागलं,की अरण्यातून परत आल्यावर तो स्वत:च उत्साहानं गुरुजींना तिथल्या कथा सांगू लागला.त्याच्या चेहऱ्यावरचा कंटाळा लोप पावला आणि हर क्षणी आपल्या चोहोबाजूला चैतन्य वावरत असतं,याचं भान त्याला आलं.हळूहळू महिना पूर्ण व्हायला आला होता.त्याच्या मनातून राजपदाचा विचार जणू पुसला गेला होता.
एका संध्याकाळी परतल्यावर तो गुरुजींना म्हणाला,
'गुरुजी,आज मी मुंग्यांचं बोलणं ऐकलं.त्यांनाही शब्द असतो हे मला ठाऊकच नव्हतं.'
हे ऐकताक्षणी गुरुजींच्या चेहऱ्यावर सात्विक आनंदाचा रंग पसरला.ते शांत सुरात म्हणाले,
'बाळा,तू राजा होण्याचा पात्रतेचा बनला आहेस. तुझ्यातला अहंकार पुसला गेला आणि ज्यांच्या आवाजाकडे,भावनांकडे कोणीही कधीही लक्ष देत नाही,त्या मुंग्यांचा शब्द तू ऐकलास.समाजात उठावदार गोष्टींसाठी सगळेच काम करतात; पण जो अत्यंत दुर्लक्षित समूहाच्या कल्याणासाठी काम करतो,तोच नेता बनण्याच्या लायकीचा असतो.
आता तू राजमहालात परत गेलास तरी चालेल.
डॉ.सुरुची पांडे
आमचे मित्र एन.के पत्रकार यांनी फार दिवसापूर्वी मला पाठविलेली कथा..