* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२०/१०/२२

ये तेरा घर ये मेरा घर ..!

साधा नायक,साधी नायिका,

साधा दिग्दर्शक,साधे बोल,साधा गायक

पण हृदयाला स्पर्श करणारी सगळीच गोष्ट..!

या युट्युबवरील गाण्याखालील 'जिवंत' प्रतिक्रिया..


हे गाणं ऐकता ऐकताच लहानाचा मोठा झालो आपण जन्माला येण्याअगोदर पासूनच घर उभे राहिलेले आहे. तसा घराचा इतिहास हा फार फार जुना आहे तो आपल्याला खूपच मागे घेऊन जातो,ज्या वेळेला माणूस शिकार करून भटके जीवन जगत होता त्याकाळी वरती मोकळं निरभ्र,विस्तारित आभाळ व खाली सर्वांना सामावून घेऊन प्रेमाचा आधार देणारी जमीन हेच घर होते.अवघे विश्वचि माझे घर ही त्यावेळेला घराची व्याख्या होती. जीवन भटके असल्या कारणाने एका ठिकाणी स्थिर शांत राहण्यासाठी घराची आवश्यकता कधी भासली नाही, किंवा तशी कल्पना केली गेली नाही आणि माणूसही उत्क्रांतीच्या टप्प्यावरती होता. काही काळानंतर शिकारी,भटके जीवन थांबल्यानंतर शेतीचा शोध लागला,आणि माणूस एका ठिकाणी स्थिर राहायला लागला.


पण शेती करत असताना माणसाला जंगलाच्या जवळ जावं लागलं.आणि जंगलाच्या जवळ गेल्या कारणाने सर्वप्रथम त्याला एक विचार सुचला.( तो पर्यंत माणूस विचार करु लागला होता.व जबाबदारीची जाणीव ही झाली होती.) कुठेतरी आपल्याला निवारा असावा.इतर जंगली जनावरांकडून जीवाला धोका होऊ नये म्हणून सर्वप्रथम त्याने घर तयार केले. ते तयार करताना निसर्ग तत्परतेने धावून आला.( तोच निसर्ग आजही धावून येतो.) आणि झाडाफुलाने बनलेलं एक सुंदर घर तयार झालं.आणि त्यामध्ये तो राहू लागला. हे घर तयार करत असताना प्रेमाने जिव्हाळ्याने आपुलकीने त्याचे निर्माण होत होते.म्हणजेच ते घर मानवी उत्कंठ भावनेने तयार होत होते.अखेर ते 'आत्मा' असलेले घर तयार झाले. त्यानंतर मग माणूस विचाराने प्रगल्भ झाला आणि अनुभवातून शिकत शिकत त्याने त्या राहत्या घरातही बदल केले.आज घर, प्रसाद,बंगला,वन बीएचके,

(यामध्ये परमेश्वराचे मंदिर म्हणजे घर सुद्धा येते.) असा या घरांच्या साधेपणातून सुरु झालेला प्रवास अँन्टीकपिस म्हणजेच 'वास्तू' पर्यंत आलेला आहे.


जीवसृष्टीचा सगळा इतिहास निर्जीव फॉसिल्समधून रेखला जातो. तर खनिजं, बांधकाम साहित्य, पायाचे दगड यांसोबत,दगडांमधून दिसणारं पुराजीवशास्त्रही सापडलं.त्या शास्त्राची दशलक्ष आणि अब्ज वर्षांची मापं ओळखीची,सवयीची झाली आणि माणसांचे व्यवहार 'आखूड' वाटायला लागले.


माणसांचा इतिहास महिने-वर्षं, दशकं शतकं एवढ्यांत - संपतो. भूशास्त्रात मात्र लक्ष,कोटी आणि अब्ज वर्षांची मापं वापरली जातात. आपण काही तरी थोर आहोत असा गर्व करायला इथे जागाच नाही!तर नम्रता या गुणाचीही जरा उजळणी करा!


जीवसृष्टीतल्या बदलांचे साक्षीदार दगड-धोंडे नंदा खरे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील वैचारिक,वैज्ञानिक माहिती माणुस म्हणून विचार करायला भाग पाडते.


आश्चर्यकारक अचंबीत करणाऱ्या काही गंमतीशीर व अभ्यासपूर्ण पक्षांच्या घरट्याबद्दच्या नोंदी 'निसर्गाची नवलाई' सतीश खाडे यांच्या पाॅडकास्ट मधून मानवी संवेदनशीलतेतून 'जाणीवेतून जाणून' घेतल्या.


गरुडाचं घरटं हे डेरेदार झाडांवर असतं.ते जवळजवळ बैलगाडीच्याचाका इतकं असतं.आणि दरवर्षी त्यामध्ये काटक्यांची भरही पडतचं असते.कारण जुन्या काटक्या वाळून खाली पडतात.हे घरटं भरभक्कम व मजबूत असतं.कितीही आपत्ती,वादळ पाऊस आला तरी ते गरुडासारखचं मजबूत रहातं.त्या घरट्याला काहीही फरक पडत नाही.याठिकाणी रसिक,सौदर्यदृष्टी लाभलेल्या गरुडाचं नोंद आश्चर्याचा धक्का देवून जाते.


नर गरुड हा दररोज न चुकता फुलांनी भरलेली ढहाळी ती नाही मिळाली तरी रसरसीत पानांची ढहाळी त्या घरट्यात आणून टाकत असतो.जसा माणुस गजरा आणतो.घरात फुलदाणी आणतो.अशाच प्रकारची ही भावना असते.आणि जोपर्यंत मादी अंड्यावर बसलेली असते तोपर्यंतच दररोज गरुड न चुकता हे करत असतो.ही रसिकता पाहुन मीच विचार केला कि कधीतरीच गजरा घेतो.तो ही 'घरातून' सांगितल्यानंतरच ..!


ही घरटीही विणीच्या हंगामात वाढलेल्या नवीन येणाऱ्या 'पाहूण्यासाठी'अंड्याचे,जन्मलेल्या पिल्यांच्या संरक्षणाठी सुरक्षित ठिकाण म्हणून बांधली जातात.


काही गमंतीशीर पक्षी ही मधमाश्यांच्या पोळ्याजवळ त्यातील माशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.असे'सुरक्षित अंतर' ठेवून हे घरटं बांधलं जातं.(यामुळे त्यांना खाणारे पक्षी 'पोळ्याच्या भीतीने' त्याच्यांजवळ जात नाहीत.हा दुरदृष्टी विचार त्यामागे असतो.)


काही पक्षी हे गांधीलमाशीच्या घराजवळ आपलं घरटं बांधतात. कारण या गांधील माशा चावल्या तर भरपुर आग होते.कारण त्यांचे विष हे जहरीले असते त्यामुळे त्यांच्या वाटेला कोणीही जात नाही.काही ठिकाणी समुद्राच्या काठावर अनेक पक्षी मिळून एकत्रित घरटी बांधतात.हजारोंच्या संख्येने झाडावर एका ठिकाणी स्वसंरक्षणासाठी ती घरटी बांधलेली असतात. कोणीही शिकारी आला तर इतक्या मोठ्या समूहापुढे तो काहीही करू शकत नाही.ही सर्वजन एकाचवेळी हल्ला करु शकतात. 


बरेच पक्षी हे वड आणि पिंपळ या झाडांवरती आपली घरटी बांधतात कारण ही झाडे वादळ वाऱ्यातही मजबूतपणे उभी असतात. व या वडाच्या झाडावर जी फळ लागतात ती फळे या पक्षांना आवडतात म्हणून या झाडांची ती मोठ्याप्रमाणात निवड करतात.


मेक्सिकोच्या चिमण्यांच्या घरट्यामध्ये अलीकडे सिगारेटची थोटकं आढळली आहेत.काही जणांना असं वाटलं की त्या सिगारेटच्या मागे असणारा जो मऊ मऊ कापूस आहे त्याचा वापर ती घरटं मऊ राहण्यासाठी करत असावीत.पण तंबाखु सोबत अर्धवट जळालेल्या सिगारेटची ही थोटकं होती. त्यामुळे त्याचा आणखी जास्त गंभीरपणे अभ्यास केला असता. एक गंमतीचा असा निष्कर्ष निघाला की ही अर्धवट तंबाखू सोबत असणारी थोटकं घरट्यामध्ये टाकल्यामुळे त्याच्या उग्र वासामुळे मुंग्या कीटक यापासून त्यांचे संरक्षण व्हायचं. या उग्र वासामुळे त्यांच्या घरट्याकडे कोणीही फिरकत नाही. त्यामुळे त्यांची पिल्ले आणि त्यांची घरटं ही सुरक्षित राहतात. (हे ज्ञान त्यांनी कुठून घेतलं हे अजूनही समजलेलं नाही.हे २१ व्या शतकाला शोभेल असं उदाहरण आहे.)


असा हा घरट्यांचा इतिहास समजून घेऊन आपण आपल्या घराकडे परत येऊ.


 मी लहान असताना जवळजवळ सगळी घरं एकसारखीच असायची.साध्या मातीने ती तयार केलेली वरती साधी कौलं व बाजूनी मातीच्या भिंती हे घर बांधण्यासाठी निसर्गातीलच घटकांचा आपण वापर केलेला असायचा. त्यामुळे त्या घरामध्ये नैसर्गिक निसर्गही माणसासोबंत रहायचा. त्या घरात राहणारी माणसं ही साधी सरळ,निकोप प्रेमळ सगळ्यांवरती मोकळ्या मनाने प्रेम करणारी होती. त्या घरातील स्त्रिया घराची काळजी मनापासून घेत असायच्या वेळच्यावेळी देखभाल केली जायची. व दर वर्षी पावसाला सुरुवात होण्याअगोदर या घराचा जिर्णोद्धार केला जायचा.या सर्वगोष्टी श्रद्धेने केल्या जायच्या.माणसांचा मूळचा स्वभाव प्रेमळ असल्याकारणाने ते घरावर व सर्वांच्या वरती प्रेम करायचेत. घर हे फक्त भिंतींने तयार होत नसतं, तर घर हे घरातील माणसाच्या स्वभावाने तयार होत असतं प्रत्येक घराला त्याचा विशिष्ट असा आत्मा असतो.


दररोज सकाळी पहाटे उठून महिला त्या घरामध्ये दळप कांडप करायच्या जात्यावरती गाणी गायली जात.हे काम करत असताना हातांचा,हातातील काकणांचा लयबध्द आवाज होत असायचा.या आवाजाणेच घरातील सर्वांना उत्साही 'जाग' यायची असं हे जीवनच संगीतमय करुन टाकणार 'मनस्वीघर' सर्वांनाच हवहवसं वाटायचं.जे केलं जायचं ते सर्वांसाठी असायचं त्यामुळे त्या घरांना एक विशिष्ट प्रकारचा दर्जा प्राप्त झालेला असायचा. फार पूर्वी करमणुकीची साधने नसल्याकारणाने संध्याकाळी 'शुभंकरोती कल्याणम्' झाल्यानंतर सुसंगत,सुसंस्कृत,

सुसंवाद व्हायचा.यामध्ये सामाजिक,

आर्थिक,नैसर्गिक,कौटुंबिक,सर्व विषयातील अनुभवाची देवाणघेवाण व्हायची.व घरातील 'जाणत्या' व्यक्तीच्या आज्ञेच पालन काटेकोरपणे केलं जायचं.या सर्व सुसंवादामध्ये 'घर' ही मुकपणे आपला सहभाग नोंदवायचे.


घरातील लोकांची संख्या जरी वाढली तरी हा एकोपा अखंडच होता. हळूहळू औद्योगिक क्रांती होत गेली व शहरांनी 'गावाला' बोलवून घेतले. मग वैयक्तिक विचार बाळसे धरू लागले. स्वतंत्र राहणे ही आता गरज बनू लागले आणि भावनिक पातळीवरती असणारी माणुसकी 'कोरडी' होत गेली. घराघरात मतभेद ज्येष्ठ जाणत्या लोकांना अडगळीचे ठिकाण प्राप्त झालं.कारण प्रत्येकालाच मोकळा श्वास घ्यायचा होता. हे सर्व बघत असताना घराचं काळीज मात्र तीळ तीळ तुटत होतं.पूर्वीच्या काळी घराचा आवाज सर्वांना जाणवत होता कारण ते सगळे संवेदनशील मानसिक पातळीवरील नातं होतं.आता तो आवाज येत नव्हता कारण विचारांमध्ये झालेला अमुलाग्र बदल,घर जाग्यावरचं स्तब्ध होतं.आतील माणसं मात्र बदलत होती.


आणि माणसाचं जीवन धावपळीच झालं आणि त्यांनी ते स्वीकारलं. साध्या घरात राहणारा माणूस आज वन बीएचके मध्ये स्वतःच्या मनासारखं घर तयार करून त्यामध्ये राहू लागला.पण तो खरोखरच आनंदी आहे का? हा प्रश्न अनुत्तरीच आहे.(आनंदी रहाणं सोप आहे.पण साधं सरळ रहाणं फार अवघड आहे) धावायचं कितपत आणि कोणासाठी याला काही मर्यादा नाही. पूर्वीसारखी घराकडे जाण्यासाठीची ओढ आता आहे का? कारण आता घरात जाऊनही कामं केली जातात कुटुंबामध्ये सुसंवाद होत नाही फक्त कामापुरते बोलणं होतं.


घरातील ज्येष्ठ जाणती लोकं आता अँटिक पीस झालेले आहेत. घर हे आता दाखवण्याची वास्तू झालेली आहे. सर्व सुख सोयी पायाशी लोळण घेत असूनही माणूस प्रेमाविना कोरडा ठणठणीत राहिलेला आहे.(याला अपवाद असतील त्यांना सलाम)


नवीन घर बांधणे आता स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे कारण दिवसभर राबल्यानंतर पोटाला चार घास मिळतात. अशी सत्य परिस्थिती असताना सध्याच्या परिस्थितीमध्ये नवीन घर कसं बांधायचं याचा विचारच करून माझ्या अंगावर काटे उभे राहतात.अजूनही काही जणांसाठी घर बांधणे म्हणजे एक मोठा न सुटलेला प्रश्न आहे. लहानपणापासून मी हे ऐकत आलेलो आहे.की 'घर बघावे बांधून,लग्न करावे बघून व विहीर बघावी बांधून' त्या वेळेला मला याचा फारसा अर्थ कळत नसायचा पण ज्या वेळेला मी स्वतःच्या घराचा विचार केला त्या वेळेला माझी झोप उडाली होती,त्यामुळे आमच्यासाठी घर म्हणजे स्वप्नातीलच आहे.आता घर बांधण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे भाव आभाळाला जाऊन पोहोचलेले आहेत त्यामुळे हल्ली स्वप्नातील घर हे स्वप्न सुद्धा कोणाला पडत नाही.


(या ठिकाणी एका गोष्टीचे आठवण झाली जी व्हाट्सअप वरती वाचलेली होती.)


एका व्यक्तीने व्यवसायात प्रगती करून लंडनमध्ये जमीन विकत घेतली आणि त्यावर आलिशान घर बांधले.त्या जमिनीवर आधीच एक सुंदर जलतरण तलाव होता आणि मागे १०० वर्ष जुने लिचीचे झाड होते.


 त्या लिचीच्या झाडामुळेच त्यांनी ती जमीन विकत घेतली होती, कारण त्यांच्या पत्नीला लिची खूप आवडत होती.


काही काळानंतर घराचे नुतनीकरण करावे असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या काही मित्रांनी त्यांना नूतनीकरणाच्या वेळी सल्ला दिला की त्यांनी वास्तुशास्त्र तज्ञाचा सल्ला घ्यावा.त्यांचा अशा गोष्टींवर फारसा विश्वास नसला तरी, मित्रांचे मन राखण्याचे त्याने मान्य केले आणि ३० वर्षांपासून हाँगकाँग येथील वास्तुशास्त्राचे प्रसिद्ध मास्टर काओ यांना बोलावले.


काओंना विमानतळावरून नेले, दोघांनी शहरात जेवण केले आणि त्यानंतर ते त्यांना त्यांच्या कारमध्ये घेऊन त्यांच्या घराकडे निघाले. वाटेत जेव्हा एखादी गाडी त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा तो त्याला रस्ता देत असे.मास्टर काओ हसले आणि म्हणाले की तुम्ही खूप सुरक्षित ड्रायव्हिंग करता. ते देखील हसले आणि प्रतिसादात म्हणाले की लोक सहसा काही आवश्यक काम असतानाच ओव्हरटेक करतात, म्हणून आपण त्यांना मार्ग दिला पाहिजे.


घराजवळ पोहोचल्यावर रस्ता थोडा अरुंद झाला आणि त्याने गाडीचा वेग बराच कमी केला. तेवढ्यात अचानक एक मुल रस्त्यापलिकडून हसत हसत आणि वेगाने धावत त्यांच्या गाडीच्या समोरून रस्ता ओलांडून गेले.  त्याच वेगाने चालत असताना तो मात्र त्या रस्त्याकडे पाहतच राहिला, जणू कोणाची तरी वाट पाहत होता.  तेवढ्यात त्याच रस्त्यावरून अचानक आणखी एक मूल पुढे आलं. त्यांच्या कारच्या पुढून पळत गेले, बहुधा पहिल्याचा पाठलाग करत असावे. मास्टर काओने आश्चर्याने विचारले - दुसरे मूलही धावत बाहेर येईल हे तुला कसे कळते?


ते मोठ्या सहजतेने म्हणाले, मुले अनेकदा एकमेकांच्या आगे मागे धावत असतात आणि कोणतेही मूल जोडीदाराशिवाय असे धावत असते यावर विश्वास बसत नाही..


मास्टर काओ हे ऐकून मोठ्याने हसले आणि म्हणाले की तुम्ही निःसंशयपणे खूप स्थिर चित्त व्यक्ती आहात.


घराजवळ आल्यानंतर दोघेही गाडीतून खाली उतरले. तेवढ्यात अचानक घराच्या मागच्या बाजूने ७-८ पक्षी वेगाने उडताना दिसले. हे पाहून तो मालक मास्टर काओला म्हणाला की, "जर तुमची हरकत नसेल तर आपण इथे थोडा वेळ राहू शकतो का?"


मास्टर काओ यांना कारण जाणून घ्यायचे होते. त्यावर ते गृहस्थ म्हणाले की,  "कदाचित काही मुले झाडावरून लिची चोरत असतील आणि आमच्या अचानक येण्याने मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, तर झाडावरून पडून मुलाला दुखापतही होऊ शकते.


मास्टर काओ काही वेळ गप्प बसले, मग ते संयत आवाजात म्हणाले, "या घराला वास्तुशास्त्राच्या तपासाची आणि उपायांची गरज नाही."


त्या गृहस्थाने मोठ्या आश्चर्याने विचारले - का?*


मास्टर काओ - "जिथे तुमच्यासारखे विवेकी आणि आजूबाजूच्या लोकांचा चांगला विचार करणारे लोक उपस्थित/रहात असतील - ते ठिकाण,ती मालमत्ता वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार अतिशय 

पवित्र-आनंददायी-फलदायी असेल".


"आपले तन आणि मन जेव्हा इतरांच्या सुख-शांतीला प्राधान्य देऊ लागते तेव्हा, इतरांनाच नव्हे तर आपल्यालाही मानसिक शांती व आनंद मिळतो.


जेव्हा माणूस नेहमी स्वतःच्या आधी इतरांच्या भल्याचा विचार करू लागतो, तेव्हा नकळत त्याला संतत्व प्राप्त होते, ज्यामुळे इतरांचे भले होते आणि त्याला ज्ञान प्राप्त होते.


आपणही असे गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्या घराला फेंगशुई किंवा "वास्तू" सारख्या तंत्राची किंवा नवस बोलण्याची गरज भासणार नाही.


सिमोन द बोव्हुआरचे 'द सेकंड सेक्स' (अनुवाद - करुणा गोखले,पद्मगंधा प्रकाशन) हे पुस्तक स्त्रीवादाचे बायबल समजले जाते.या ग्रथांतील 'घराबद्दल' नोंद 


कुटुंब ही स्वतःत बंदिस्त अशी संस्था नसून एक सामाजिक संस्था आहे, म्हणूनच घरसुद्धा कुटुंबात राहणाऱ्या माणसांसाठी केवळ छप्पर नसते. ते त्या कुटुंबाच्या सामाजिक स्थानाचे प्रतीक असते. कुटुंबाची सांपत्तिक स्थिती, सांस्कृतिक व शैक्षणिक पातळी, कुटुंबातील व्यक्तींची अभिरुची,हे सर्व घराद्वारे व्यक्त होत असते.कुटुंबाचे समाजातील स्थान घर कसे ठेवले जाते यावर ठरते.


जाता जाता..


द प्रॉफेट,खलील जिब्रान पुस्तकात देवदूत प्रकरणामध्ये अल् मुस्तफा सांगतो.


तुमचं घर नौकेच्या नांगरासारखं न होता शिडासारखं असलं पाहिजे. तुमचं घर जखमेवरल्या चमकत्या खपलीसारखं नसावं : डोळ्यांचं रक्षण करणाऱ्या पापणीसारखं ते असावं.


दारांतून ये-जा करताना तुम्हाला पंख मिटावे लागू नयेत. छताला आदळेल म्हणून तुम्हाला मस्तक नमवावं लागू नये. भिंतींना तडे जाऊन त्या कोसळतील या भयान तुमचा श्वासोच्छ्वास कोंडू नये.


विजय कृष्णात गायकवाड


१७/१०/२२

★अशिक्षित डॉक्टर.. सर्जन मिस्टर हॅमिल्टन..

एक केप टाउनचा अशिक्षित माणूस जो एकही इंग्रजी शब्द वाचू किंवा लिहू शकत नव्हता,

ज्याने आयुष्यात कधी शाळेचा चेहरा पाहिला नव्हता ... त्याला मानद मास्टर ऑफ मेडिसिन देऊन सन्मानित करण्यात आले.


केप टाऊन मेडिकल युनिव्हर्सिटी जगात पहिल्या क्रमांकावर आहे,असे म्हटले जाते की जगातील पहिले बायपास ऑपरेशन या विद्यापीठात झाले.


..आणि २००३ मध्ये...


एका सकाळी जगप्रसिद्ध सर्जन प्राध्यापक डेव्हिड डेंट यांनी विद्यापीठाच्या सभागृहात घोषणा केली.


"आज आम्ही सर्वात जास्त शस्त्रक्रिया करणाऱ्या माणसाला वैद्यकशास्त्रातील मानद पदवी देत ​​आहोत."


या घोषणेने प्राध्यापकाने "हॅमिल्टन" गायले आणि संपूर्ण सभागृह उभे राहिले.  

हॅमिल्टनला सर्वांनी शुभेच्छा दिल्या ...


या विद्यापीठाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे स्वागत होते.


हॅमिल्टनचा जन्म केपटाऊनमधील दुर्गम गावात सनीतानी येथे झाला.त्याचे आईवडील मेंढपाळ होते.लहानपणी त्यांनी शेळीचे कातडे घातले आणि दिवसभर अनवाणी डोंगरांवर फिरले.  


वडील आजारी पडल्यानंतर हॅमिल्टन केपटाऊनला आले.त्यावेळी विद्यापीठाचे बांधकाम चालू होते.तो विद्यापीठात मजूर म्हणून रुजू झाला.त्याने तेथे अनेक वर्षे काम केले.दिवसभराच्या कामानंतर तो जे काही पैसे घरी मिळेल ते पाठवायचा,आणि तो स्वत: खाली संकुचित होऊन मोकळ्या मैदानात झोपायचा. त्यानंतर त्याला टेनिस कोर्टचे मैदान देखभाल कामगार म्हणून नियुक्त करण्यात आले.हे काम करता करता तीन वर्षे निघून गेली.


मग.. आश्चर्यकारक घटना घडली..


त्याच्या आयुष्याला एक विचित्र वळण लागले, आणि तो वैद्यकीय शास्त्रातील अशा टप्प्यावर पोहचला ज्या ठिकाणी अजून कोणीही पोहोचले नव्हते.


ती सोनेरी सकाळ होती,प्रोफेसर रॉबर्ट जॉयस जिराफांवर संशोधन करत होते.त्याने ऑपरेटिंग टेबलवर बेशुद्ध जिराफ ठेवला.


पण ऑपरेशन सुरू होताच जिराफने डोके हलवले.जिराफची मान घट्ट पकडण्यासाठी त्यांना एका बळकट माणसाची गरज होती.  

प्राध्यापक 'हॅमिल्टन' लॉनवर काम करत थिएटरमधून बाहेर आले.तो एक मजबूत निरोगी तरुण आहे हे पाहून प्राध्यापकाने त्याला बोलावले आणि जिराफ पकडण्याचे आदेश दिले.हे ऑपरेशन आठ तास चालले.

ऑपरेशन दरम्यान,डॉक्टरांनी चहा आणि कॉफीचा ब्रेक घेतला. तर "हॅमिल्टन" जिराफची मान पकडून उभा होता.ऑपरेशन संपल्यावर हॅमिल्टन शांतपणे निघून गेला.


दुसऱ्या दिवशी प्राध्यापकाने पुन्हा हॅमिल्टनला बोलावले. तो आला आणि जिराफची मान पकडून उभा राहिला.त्यानंतर ती तिची रोजची दिनचर्या बनली.हॅमिल्टनने अनेक महिने दुप्पट काम केले आणि कधीही जास्त पैसे मागितले नाहीत,आणि तक्रार केली नाही.


प्राध्यापक रॉबर्ट जॉयस त्याच्या चिकाटी आणि प्रामाणिकपणामुळे प्रभावित झाले आणि हॅमिल्टनला टेनिस कोर्टमधून 'लॅब असिस्टंट' म्हणून बढती मिळाली.  


आता त्याने विद्यापीठाच्या ऑपरेटिंग थिएटरमध्ये शल्यचिकित्सकांना मदत करण्यास सुरुवात केली.ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू राहिली.


१९५८ मध्ये त्यांच्या आयुष्यात आणखी एक वळण आले.या वर्षी डॉ.ख्रिश्चन बर्नार्ड विद्यापीठात आले आणि हृदय प्रत्यारोपणाचे ऑपरेशन सुरू केले.हॅमिल्टन त्यांचे सहाय्यक बनले,या ऑपरेशन दरम्यान सहाय्यक ते अतिरिक्त सर्जनकडे गेले.


आता डॉक्टर ऑपरेशन करायचे आणि ऑपरेशननंतर हॅमिल्टनला शिवणकामाचे काम देण्यात आले.त्याने उत्तम टाके केले. त्याची बोटे स्वच्छ आणि तीक्ष्ण होती.  

तो दिवसाला पन्नास लोकांना शिलाई करायचा.  

ऑपरेटिंग थिएटरमध्ये काम करत असताना त्याला शल्य चिकित्सकांपेक्षा मानवी शरीर अधिक समजले,म्हणून वरिष्ठ डॉक्टरांनी त्याला शिकवण्याची जबाबदारी सोपवली.त्यांनी आता कनिष्ठ डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे तंत्र शिकवायला सुरुवात केली.तो हळूहळू विद्यापीठातील सर्वात महत्वाचा व्यक्ती बनला. ते वैद्यकीय शास्त्राच्या अटींपासून अपरिचित होते परंतु सर्वात कुशल सर्जन असल्याचे सिद्ध झाले.


त्यांच्या आयुष्यातील तिसरा टर्निंग पॉईंट १९७० साली आला,जेव्हा या वर्षी यकृतावर संशोधन सुरू झाले आणि त्यांनी शस्त्रक्रियेदरम्यान यकृताची धमनी ओळखली ज्यामुळे यकृत प्रत्यारोपण सुलभ झाले.


त्याच्या निरीक्षणांनी वैद्यकीय विज्ञानातील महान मनांना आश्चर्यचकित केले.


आज जेव्हा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एखाद्या व्यक्तीचे यकृताचे ऑपरेशन होते आणि रुग्ण त्याचे डोळे उघडतो,नव्या आशेने पुन्हा जिवंत होतो,तेव्हा या यशस्वी ऑपरेशनचे श्रेय थेट "हॅमिल्टन"ला जाते.


हॅमिल्टनने प्रामाणिकपणा आणि चिकाटीने हे स्थान मिळवले. ते केपटाऊन विद्यापीठाशी ५० वर्षे संबंधित होते,त्या ५० वर्षात त्याने कधी सुट्टी घेतली नाही.


तो रात्री तीन वाजता घरातून निघायचा, 

विद्यापीठाकडे १४ मैल चालत जायचा आणि अगदी ठीक सहा वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश करायचा.लोक त्यांची घड्याळे त्यांच्या वेळेनुसार दुरुस्त करत असत.


त्याला हा सन्मान मिळाला जो वैद्यकीय शास्त्रात कोणालाही मिळाला नाही.


वैद्यकीय इतिहासाचे ते पहिले निरक्षर शिक्षक होते.


आपल्या आयुष्यात ३०,००० शल्यचिकित्सकांना प्रशिक्षण देणारे ते पहिले निरक्षर सर्जन होते.


२००५ मध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांना विद्यापीठात पुरण्यात आले.


यानंतर, पदवी मिळाल्यानंतर त्याच्या थडग्याला भेट देणे, छायाचित्र काढणे आणि नंतर त्यांच्या सेवेच्या कामावर जाणे विद्यापीठाने शल्य चिकित्सकांना अनिवार्य केले.

 "तुम्हाला माहित आहे की त्याला हे पद कसे मिळाले?"


  " फक्त 'हो..' "


ज्या दिवशी त्याला जिराफची मान पकडण्यासाठी ऑपरेटिंग थिएटरमध्ये बोलावण्यात आले होते,जर त्याने त्या दिवशी नकार दिला असता,जर तो म्हणाला असता,'मी मैदान देखभाल कामगार आहे,माझे काम जिराफची मान पकडणे नाही', 

तर ... विचार करा..!


 तेथे फक्त एक "होय" आणि अतिरिक्त आठ तासांची मेहनत होती,ज्यामुळे त्याच्यासाठी यशाची दारे उघडली गेली आणि तो सर्जन झाला.


 " जेव्हा आपल्याकडे काम शोधावे लागते तेव्हा आपल्यापैकी बरेच जण आपले संपूर्ण आयुष्य नोकरीच्या शोधात घालवतात."


जगातील प्रत्येक नोकरीचा एक निकष आहे आणि नोकऱ्या फक्त त्या लोकांसाठी उपलब्ध आहेत जे निकष पूर्ण करतात.जर आपल्याला काम करायचे असेल तर आपण काही मिनिटांत जगातील कोणतेही काम सुरू करू शकतो आणि कोणतीही शक्ती देखील आपल्याला रोखणार नाही.


हॅमिल्टनला हे रहस्य सापडले होते, 

त्याने नोकरीऐवजी काम करण्याला महत्त्व दिले.  

अशा प्रकारे त्याने वैद्यकीय विज्ञानाचा इतिहास बदलला.


कल्पना करा,जर त्याने सर्जनच्या नोकरीसाठी अर्ज केला तर तो सर्जन बनू शकेल का? 

 कधीही नाही.पण,त्याने जिराफची मान पकडली आणि सर्जन झाला.


बेरोजगार लोक अपयशी ठरतात कारण आम्ही फक्त नोकरी शोधतो,नोकऱ्या नाही.  


ज्या दिवशी आपण "हॅमिल्टन" प्रमाणे काम करायला सुरुवात करू, आपण यशस्वी आणि महान मानव बनू ..!


आमचे मार्गदर्शक,आदरणीय डॉ सुधीर सरवदे,  प्राध्यापक बालरोगविभाग,CPR,(थोरला दवाखाना) कोल्हापूर यांच्या व्हॉट्सऍप वरुन साभार..


१६/१०/२२

आत्ताचा क्षण जगण्यातच जगण्याचे मर्म दडलेले आहे....! " वॉल्डन "

चौकट व थडगे यामध्ये काही फुटांचे अंतर असतं.हे हेन्री डेव्हिड थोरोचे वाक्य मनापासून विचार करायला लावणारं..माझ्यासाठी ते जीवनतत्त्व होतं.त्यानंतर माझी हेन्री डेव्हिड थोरो यांच्याबाबत वाचण्यासाठी मनाची घालमेल सुरू झाली. परभणीचे आमचे दादासाहेब मनोहर सुर्वे यांनी वॉल्डनबद्दल काही माहिती दिली. या पुस्तकाबद्दल काही मनोरंजक माहिती सांगितली. मी लगेच मधुश्री पब्लिकेशन यांचे 'वॉल्डन' आदरणीय लेखक जयंत कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले पुस्तक मागवले व वाचण्यास सुरुवात केली. पुस्तक वाचत असताना ते समजून घेत असताना सत्कार्णी वेळ जात होता व त्याचबरोबर माझ्यातील मीपणाही जात होता. डॅनियल गोलमन यांनी लिहिलेलं इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकानंतर मला हे पुस्तक वाचण्यास व समजून घेण्यास वेळ लागला.पण तो वेळ माझ्यासाठी महत्त्वपूर्ण होता.


इतरांची पावले सूर्यास्ताला घराकडे वळतात पण माझी डोंगर माथ्याकडे सूर्यास्त पाहण्यासाठी वळतात. गावातील गडबड गोंधळात मी पार मागे पडलोय, पण मला सूर्यास्त दिसतो आणि माझ्या शांत-निवांत आयुष्यासाठी तो रेंगाळू शकतो हेच माझ्यासाठी खूप आहे.या वाक्याचा मी बराच वेळा विचार केला. कारण मला पुढे बराच विचार करायचा होता..!


जितराबावर बसून त्याचा फडशा पाडणाऱ्या गिधाडांना पाहून आपल्या मनात शिसारी येते पण ते मढ़ खाऊन ते गिधाड मोठे होते,उडते, हे पाहून आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा आहे हेच जीवनसत्य यातून आपल्याला सांगायचे आहे.


निसर्गात जीवांची संख्या इतकी प्रचंड व अद्भुत आहे की या भुकेच्या यज्ञात अनेक जीवांची आहुती देण्यास त्याला सहज परवडते. एक जीव दुसऱ्या जीवाचे भक्ष असतो आणि तो अजून कुठल्यातरी. पण या पृथ्वीतलावर जे अपघात व युद्ध होतात त्याच्या तुलनेत याचे महत्व अल्प (किंवा जास्त ) असावे. सुज्ञ माणूस या सगळ्याला निसर्गाचा निरागसपणा समजतो. औषधांमध्ये विषांचाही काही उपयोग असतो आणि सर्व जखमांमुळे मृत्यू ओढवत नाही हेही समजून घेतले पाहिजे.अनुकंपेचा पाया बऱ्याच वेळा अस्थिर असतो त्यामुळे त्यावर अवलंबून किती निर्णय घ्यायचे याचा निर्णय एखाद्याला घ्यावा लागतो. अनुकंपा आणि दया हे त्यांच्या जागी ठीक आहेत. आपण एखाद्याच्या मृत्यूबद्दल शोक करू शकतो पण मृत्यू' वर आपण प्रेमच केले पाहिजे..! पान नंबर ३०६ वरील हा उतारा मला जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याचा दृष्टिकोन देऊन गेला.


ज्या माणसाचे विचार सूर्याबरोबर धावतात त्याचा दिवस हि निरंतर सकाळचं असते मग घड्याळात काहीही वेळ सांगो किंवा कामाला जाणारे काहीही सांगोत मी जागा झालो की माझी सकाळ होते आणि पहाट माझ्यात भिनते. झोपेचे,आळसाचे पांघरून फेकून देणे ही एक नैतिक सुधारणाच आहे असे मी मानतो. या नविन विचाराने मी प्रभावित झालो.


सद्गुण एखाद्या टाकून दिलेल्या पोरक्या मुलासारखे कधीच एकटे राहात नाहीत. ते तुमच्या जवळ असले की इतर चांगल्या गोष्टीही तुम्हाला चिकटतातच. कन्फ्युशियसचे हे तत्वज्ञान किती खरं आहे. मला याची जाणीव झाली.


प्रयत्न केले तर आपण आपल्या स्वतःचा कडेच एका त्रयस्थ पण निरोगी नजरेने पाहू शकतो. थोडेसे अजून प्रयत्न केले तर आपले कर्म आणि त्यापासून मिळणारे फळ या दोन्ही पासून आपण अलिप्त राहू शकतो. तसेच झाले की चांगले आणि वाईट या दोन्ही गोष्टी आपण निर्विकारपणे पाहू शकतो. आपण निसर्गाशी पूर्ण एकरूप होत नाही. नाहीतर मी खाली ओढ्यात वाहणारी एखादी काटकी असलो काय किंवा वरून त्या काटकीकडे पाहणारा, पाऊस पाडणारा इंद्र असलो काय, काहीच फरक पडत नाही ही अप्रतिम वाक्ये मनाची ठाव घेणारी आहेत.


या पुस्तकात मला कीटकशास्त्र ही वाचावयास मिळाले. किर्बी आणि स्पेन्सच्या कीटक शास्त्राच्या पुस्तकानुसार कित्येक कीटक असे आहेत. जे पुर्ण वाढल्यावर तोंडही हलवीत नाहीत. जे काय खायच आहे ते त्यांनी अळीच्या स्वरूपात असतानाच खाऊन घेतले असते. या पुस्तकाच्या लेखकांनी याबाबतीत त्यांचे एक निरीक्षण लिहिले आहे,ते म्हणतात जवळ जवळ सर्व कीटकांचा आहार अळी असताना असतो त्यापेक्षा खूपच कमी असतो. उदा. खादाड अळीचे जेव्हा फुलपाखरांत रूपांतर होते तेव्हा त्याचे बोट मधाच्या अर्ध्या थेंबानेही भरते. फुलपाखरांच्या पंखाखाली दिसणारे त्याचे शरीर हे त्या आळीचे शिल्लक असलेले रूप आहे. या उरलेल्या अवयवांमध्ये बिचाऱ्या फुलपाखराला कधीकधी खाण्याचा मोह पडत असावा. हे सर्व वर्णन माझ्यासाठी अविस्मरणीय होते...


भूक लागलेली नसताना केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अन्नग्रहण करून आनंद मिळवलेला नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडायची नाही. यासाठी माणसे अन्नांच्या खमंग चवीला जबाबदार धरतात. पण माझ्या बाबतीत म्हणाल तर पदार्थाच्या चवीने मला त्या पदार्थांची अनुभूती घेता येते त्यासाठी मी चवीचा अत्यंत ऋणी आहे. चव भुकेसाठी प्रेरणादायी आहे आणि भुकेने मला प्रेरणा मिळते. माझ्या बुद्धिमत्तेच्या वाढीमध्ये व प्रतिभा स्फुरण्यामागे जंगलातील डोंगरांमध्ये वेचून खाल्लेल्या बेरींचाही वाटा आहे हे सांगण्यास मला बिलकुल कमीपणा वाटत नाही. आपला अंतरात्मा त्याचा स्वतःचा गुलाम नाही त्यामुळे होते काय, आपण बघतो पण आपल्याला खऱ्या अर्थाने दिसत नाही. आपण ऐकतो पण आपल्याला ऐकू येत नाही. आपण खातो पण आपण त्याचा आनंद घेत नाही. जो माणूस चवीने खातो तो खादाडखाऊ होऊच शकत नाही आणि जो अन्नाचे सेवन चवीने करीत नाही तो खादाडखाऊ शिवाय दुसरा काही होत नाही. मॅथ्यू यांच्या वाचनामध्ये थोडासा बदल करून सांगितलं गेलं आहे की तुम्ही ग्रहण करीत असलेल्या अन्नाने तुम्हाला कधीच अपचन होत नाही, तुम्ही ते किती भूक असताना खाता यावर ते अवलंबून असते. किती अन्न खाता आणि कुठल्या प्रतीचे खाता यावर काही अवलंबून नाही, ते तुम्ही किती श्रध्देने, आनंदाने खाता यावर त्याचे पचन अपचन अवलंबून आहे. थोडक्यात काय, अन्न हे पूर्णब्रह्म आहे यावर तुमची श्रद्धा हवी. यासारख्या सरळ साध्या सांगितलेल्या अनेक श्रद्धा या पुस्तकात जागोजागी आहेत. या श्रद्धेपुढे मी नतमस्तक आहे.


तो माणूस खरा नशीबी,

ज्याने त्याच्यातील पशु, 

मनातील आंधारे जंगल तोडून,

 त्याला हाकलून दिले आहे...


पृथ्वी म्हणजे काही इतिहासाचा एक उडालेला टवका नाही ना दगड मातीचे एकमेकांवर रचलेले थर,जशी पुस्तकांची पाने एकमेकांवर रचलेली असतात. शास्त्रज्ञ आणि साहित्यिक या टक्क्याचा आणि पानांचा अभ्यास करतीलही पण पृथ्वी म्हणजे एक जिवंत काव्य वृक्षांच्या पानांसारखे जी फळाफुलांच्या आधीच फांद्यांवर फुटतात.पृथ्वी म्हणजे काही जिवाष्म नव्हे पृथ्वी सजीव आहे. किंबहुना पृथ्वीचे आयुष्य पाहता मला तर वाटते त्यावरील सर्व जीवसृष्टी ही एक बांडगुळच आहे.अशा या पृथ्वीला वेदना दिल्या तर तिच्या एका हुंदक्या सरशी तिच्यात गाडली गेलेली मढी एका झटक्यात बाहेर पडतील. तुम्ही धातूच्या सुंदर मूर्ती ओताल,मला त्याही आवडतात पण या वाहणाऱ्या वाळूत जे मला आकार व कला पाहायला मिळतात तेच मला भावतात व ते पाहून मी अगदी खूश होऊन जातो. नुसते आकारच नाही तर तो निसर्ग ही कुंभाराच्या हातातील माती प्रमाणे त्याला पाहिजे तो आकार देऊ शकतो, किंवा घेऊ शकतो त्याची मला जास्त मजा वाटते. हे पृथ्वीचे जीवन वर्णन मनाला बरंच काही सांगून गेल.


या पुस्तकामुळे माझ्या मध्ये व माझ्या दृष्टिकोनामध्ये बदल होण्यास सुरूवात झाली आहे. शेवटी या पुस्तकातील वाक्याने मी मला जाणीव झालेला निरोगी दृष्टिकोन आपल्या समोर सादर करून मी अल्प विश्रांती घेतो.


मधुश्री पब्लिकेशन,हेन्री डेव्हिड थोरो,आदरणीय लेखक जयंत कुलकर्णी या सर्वांचा मी मनःपूर्वक आभारी आहे व त्यांना धन्यवाद देतो.अतिशय साध्या सोप्या भाषेत अवघड अशी जगण्याची जीवन पद्धत समजावून सांगितली आहे. त्यामुळेच मी वॉल्डेन व तिथे असणाऱ्या व वैविध्यपूर्ण निसर्गाचा पक्षी प्राण्यांचा माझ्या आत्म्यापासून प्रवास करु शकलो.


मनुष्याला फक्त स्वतःचा किनारा माहीत होता आणि त्याला समुद्र पार करण्याची नव्हती गरज..!


विजय कृष्णात गायकवाड

१४/१०/२२

ॲरिस्टार्कस - इसवी सनापूर्वीचा सूर्यकेंद्रित सिद्धांताचा पुरस्कर्ता…

सॅमोसचा ॲरिस्टार्कस Aristarchus of Samos 

(इ. स. पूर्व ३१०-२३०) 


ग्रीक खगोलविज्ञानामध्ये ऑरस्टार्कसचे स्थान फार महत्त्वाचे आहे. ग्रीसमधील सॅमोस या गावच्या ॲरिस्टार्कसने आकाशातील ताऱ्यांचा वेध घेत आपली निरीक्षणे नोंदविली. 'पृथ्वी सूर्याभोवती फिरते' असे सांगणारा हा पहिला खगोलविंद.अनेक प्रकारची गणिते करून त्याने पृथ्वीपासून चंद्र आणि सूर्याचे अंतर शोधून काढले. 'सूर्य चंद्रापेक्षा अठरापट दूर असला पाहिजे' हा त्याचा तर्क,तसेच 'सूर्य चंद्रापेक्षा ५८३२ पेक्षा अधिक तर ८००० पेक्षा कमी पटींनी मोठा असला पाहिजे' हा त्याचा निष्कर्ष,

वस्तुस्थितीपेक्षा त्याचे निष्कर्ष वेगळे असले तरी दूरच्या वस्तूंचा वेध कोणत्याही साधनसामग्री अभावी घेणे आणि ते मांडणे हे फार महत्त्वाचे आहे. कारण असल्या निरर्थक निरीक्षणांचा आपल्या जीवनाशी,रोजीरोटीशी काय संबंध?असे वाटणारा वर्ग पूर्वी होता.आजही आहे आणि पुढेही तो असणार आहे. ग्रहमालेचा केंद्र पृथ्वी नसून सूर्य आहे.हे त्याच्या सिद्धांताचे मुख्य सूत्र होते.त्याने आपल्या 'On the Sizes and Distances of the Sun and Moon या ग्रंथात नोंदविलेली निरीक्षणे आजही विचार करायला लावणारी आहेत.चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो तो स्वयंप्रकाशित नाही.यासारखी त्याची निरीक्षणे आज जरी फार नावीन्यपूर्ण वाटत नसली तरी इसवीसनापूर्वीच्या त्यांच्या कल्पनाशक्तीची जाणीव निश्चितच करून देणारी आहेत.अपोलो १५ यान चंद्रावर ज्या विवराजवळ उतरलेले होते त्या विवराला ॲरिस्टार्कसचे नाव देऊन त्याच्या स्मृती चिरंतन करून ठेवलेल्या आहेत. या विवराचा व्यास आहे ४० किलोमीटर आणि खोली आहे ३.७ किलोमीटर..


सफर विश्वाची - डॉ.नितीन शिंदे 

१२/१०/२२

"ओ मिस्टर ! पुस्तक विकत घ्यायचे आहे काय ?"

"ओ मिस्टर ! पुस्तक विकत घ्यायचे आहे काय? इथं नुसती पुस्तके चाळायला हे काही प्रदर्शन नव्हे" पुस्तक दुकानाचा मालक अगदी तावातावाने बोलत होता.


"अहो पण पुस्तक घ्यायचे आहे म्हणूनच चाळतोय ना?" पंचविशीतला नारायण त्या दुकानदाराला म्हणाला.


"पण आमच्याकडे तशी पद्धत नाही. पुस्तक पाहिजे असेल तर निवडा,विकत घ्या आणि चला, इथं उगाच जागा अडवून उभे राहू नका."


नारायण,ज्याचा श्वासच पुस्तक होता, त्या दुकानदाराच्या वर्तणुकीने फारच दुःखी झाला. अवघ्या तेरा वर्षाच्या बालवयात नारायणने आपल्या शाळेच्या ग्रंथालयातील सर्व पुस्तके वाचून काढली होती.अगदी हलाखीचे बालपण,वडिलांचे छत्र अडीच वर्षाचा असतानाच हरपलेले आणि आईच्या काबाडकष्टातून साकारलेले जीवन,अशा प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढणाऱ्या या मुलाचे आयुष्य वेगवेगळ्या लेखकांच्या लेखणीतून फुलत होते. स्वामी विवेकानंदांच्या कार्याने प्रभावित झालेल्या नारायणने लहानपणी साठविलेले पैसे खाऊसाठी न वापरता त्यातील सत्तावीस रुपये विवेकानंदाचे समग्र वाङ् मय कोलकत्याहून मागविण्यासाठी पाठवून दिले होते. याच नारायणला आज एक दुकानदार हटवत होता.


नारायण दुकानाची पायरी उतरला. त्याने मागे वळून दुकानाकडे पाहिले आणि आपणही मुंबईमध्ये असेच दुकान काढायचे,असे विचार त्याच्या मनामध्ये दुकानाची बांधणी करू लागले. अर्थात पंचविशीतल्या या तरुणाला ही काही सहजी शक्य होणारी गोष्ट नव्हती. कारण त्यासाठी लागणारी कोणतीच गोष्ट नारायणजवळ नव्हती. पण निदान नारायणने यानिमित्ताने त्याच्या मनातील या इच्छेचे बी पेरले होते.


जसा नारायणला पुस्तकांचा छंद होता, तसाच इंग्रजी सिनेमांचाही होता.. साधारण १९४८ साली एक दिवस तो मुंबईतील स्ट्रॅन्ड नावाच्या चित्रपटगृहामध्ये इंग्रजी सिनेमा पाहायला गेला. त्या चित्रपटगृहामध्ये शिरताना त्याची नजर तेथील एका रिकाम्या कोपऱ्याकडे गेली आणि या कोपऱ्यात जर आपण दुकान काढू शकलो तर? असा एक विचार त्याच्या मनात विजेप्रमाणे चमकून गेला. नारायणच्या मनातली विचार चक्रे फिरू लागली आणि दुसऱ्याच दिवशी,मुंबईतील त्यावेळी पंचावन्न चित्रपटगृहांचे मालक असलेल्या केकी मोदी यांच्या कार्यालयात त्यांच्यासमोर "जाऊन तो उभा राहिला. केकी मोदींसारख्या मोठ्या व्यक्तीसमोर नारायणने हा प्रस्ताव मांडला. नारायण अपरिपक्क आहे. त्याला पुस्तक व्यवसायाची कसलीही माहिती नाही हे मोदींच्या तात्काळ लक्षात आले पण त्यांना नारायणामध्ये काहीतरी विशेष असल्याचे जाणवले आणि त्यांनी नारायणचा प्रस्ताव स्वीकारला आणि अशाप्रकारे टी.नारायण शानभागच्या जीवनातील सुवर्णदिन उगवला आणि १९४८ साली नोव्हेंबर महिन्यात 'स्ट्रॅन्ड बुक स्टॉल' स्ट्रॅन्ड चित्रपटगृहामध्ये सुरू झालाही.


पुस्तकांची आवड असलेल्या नारायण शानभागांकडे त्यावेळेस पुस्तके विकत घेण्यासाठी केवळ ४५०/- रुपये होते, पण त्यांच्यातील चोखंदळ वृत्तीमुळे त्यांनी त्या भांडवलातूनही अतिशय निवडक अशी पुस्तके आपल्या स्टॉलवर ठेवली आणि बघता बघता नारायण शानभागांच्या स्ट्रॅन्ड बुक स्टॉलचे नाव अतिशय उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू मंडळींमध्ये घेतले जाऊ लागले. नारायण शानभागांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांच्या स्टॉलवरील पुस्तके लोकांना मुक्तपणे हाताळायला द्यायचे आणि त्याहूनही विशेष गोष्ट म्हणजे ते प्रत्येक ग्राहकाला पुस्तकांच्या मूळ किमतीवर २० टक्के सूट द्यायचे.स्वतःसाठी केवळ किमान नफा घेऊन बाकीचे ग्राहकांना परत करायचे तत्त्व शानभागांनी पहिल्या दिवसापासून आजवर निष्ठेने पाळले आहे.


स्ट्रॅन्डमधील पुस्तके,तिथे मिळणारी सवलत,पुस्तके चाळायला मिळत असलेले स्वातंत्र्य आणि अतिशय आदराने वागणारा मालक यामुळे शानभागांची अतिवेगाने मुखप्रसिद्धी होऊ लागली आणि अगदी यशवंतराव चव्हाणांपासून ते त्या काळात केंद्रीय अर्थमंत्री असलेले टी.टी. कृष्णम्माचारींपर्यंत वेगवेगळ्या स्तरातील अनेक व्यक्ती स्ट्रॅन्डमध्ये आपली वर्णी लावू लागल्या. शानभाग यांच्या आरंभीच्या ग्राहकांपैकी एक होते सर अंबालाल साराभाई,त्यानंतर त्यांचे चिरंजीव प्रख्यात परमाणू शास्त्रज्ञ विक्रम साराभाई आणि त्यानंतर त्यांचे लाडके शिष्य डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम किमान ४० वर्षे स्ट्रॅन्ड मध्ये येत असत. 


एकदा तर चक्क पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी आपल्या मुंबई भेटीत स्ट्रॅन्ड मध्ये भेट देण्याचे ठरविले आणि शानभागांच्या सूचनेवरून रात्री १०.३० वाजता लाल दिव्याच्या गाडीतून सायरनचा आवाज न करता नेहरूंनी स्ट्रॅन्डला भेट दिली आणि आपल्या पसंतीची पुस्तके खरेदी केली. पुढे नेहरूंच्या विनंतीवरून शानभाग स्वतः दिल्लीला जाऊन नेहरूंना पुस्तके देत असत. पण गंमत म्हणजे त्यांनाही ते २०% सूट देत होते. एके दिवशी पंडितजी शानभागांना म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानासही २०% सवलत का देतोस? त्यावर शानभाग म्हणाले, "आपण देशाचे राज्यकर्ते आहात. सर्व अद्ययावत माहिती आपल्यासाठी तयार ठेवणे,एक नागरिक म्हणून माझे कर्तव्य आणि आणि इतरांना देतो त्याप्रमाणे आपल्यालाही सवलत देताना मला आनंद होतो. '


अशाप्रकारे चांगली चांगली आणि दुर्मीळ पुस्तके समाजाला उपलब्ध करून देण्याचे काम गेली जवळजवळ पंचावन्न वर्षे शानभाग नित्यपणे करत आहेत.त्यांनी अगणित वाचक निर्माण केले,पुस्तक विकत घेण्याची सवय त्यांनी लोकांना लावली आणि त्यांच्या या कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी त्यांना राष्ट्रपती अब्दुल कलामांच्या हस्ते 'पद्मश्री' हा बहुमान देण्यात आला आहे. केवढी ही भरारी ! एका सामान्य कुटुंबात जन्मलेला नारायण केवळ आपली आवड आणि आपण ठरविलेले ध्येय याचा सातत्याने पाठपुरावा करतो आणि भारतातला 'पद्मश्री' हा बहुमान मिळालेला पहिला पुस्तक विक्रेता होतो, ही काही साधी गोष्ट नाही.


म्हणून नारायण शानभागसारख्या व्यक्तींच्या जीवनाकडून आपणही काहीतरी घेतले पाहिजे. मुळात ध्येयवेडे व्हायला पाहिजे.त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी सातत्य ठेवले पाहिजे. शानभागांच्या जीवनप्रवासाकडे जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की,ठरवलं तर आपणही आपल्याला वाटेल ते साध्य करू शकतो. फक्त आवश्यकता आहे 'स्वतःमध्ये विश्वास असण्याची. '


भरारी ध्येयवेड्यांची - डॉ.प्रदिप पवार

विठ्ठल मारुती कोतेकर