* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

६/५/२३

सिस्टिमा नॅचरे - (कॅरोलस) कार्ल लीनियस (१७३५)

१७७८ साली लीनियसचा मृत्यू होण्यापूर्वी त्याच्या 'सिस्टिमा नॅचरे' पुस्तकाची बारावी आवृत्ती निघाली होती.फरक इतकाच,की फक्त त्यात १३ ऐवजी २३०० पानं होती.! आणि त्याचे तीन खंडही निघाले होते.! या सगळ्या प्रकल्पात त्यानं साधारणपणे वनस्पतींच्या ७७०० आणि प्राण्यांच्या ४००० जातींविषयी लिहून ठेवलं.

युरोपमध्ये तोपर्यंत सजीवांच्या तेव्हढ्याच जाती माहीत होत्या.थोडक्यात,लिनियसनं त्या काळी माहीत असलेल्या सजीवांचं पूर्णपणे वर्गीकरण केलं होतं.


" निसर्गाची अर्थव्यवस्था अपरिवर्तनीय आणि पायाभूत आहे.निसर्गाचं ज्ञान नसलेला अर्थशास्त्रज्ञ म्हणजे गणिताचं ज्ञान नसलेला भौतिकशास्त्रज्ञ होय."


स्वीडिश वनस्पतिशास्त्रज्ञ,प्राणिशास्त्रज्ञ आणि फिजिशियन कार्ल लीनियस यानं निसर्गातल्या प्रजातींचं वर्गीकरण करण्याचं अतिशय क्लिष्ट आणि किचकट काम केलं.खरं तर त्याच्या आधीदेखील हे काम करण्याचे प्रयत्न साधारणपणे २०० वर्षं आधी झाले होते; पण कार्ल लीनियसचं वैशिष्ट्य असं की त्यानं हे सगळं पुस्तकरूपात नोंदवलं. १७३५ साली त्याच्या 'सिस्टिमा नॅचरे' या ग्रंथाची पहिली आवृत्ती जगासमोर आली.तिथून मात्र या पुस्तकाच्या आवृत्त्यांमागून आवृत्त्या निघतच राहिल्या आणि कार्ल लीनियसनं स्वतःचं आणि आपल्या कामाचं एक वेगळं स्थान जगात निर्माण केलं.


खरं तर कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या तितक्याच कोट्यवधी जीवप्रकारांनी नटलेल्या सृष्टीचं वर्णन आणि वर्गीकरण कसं करायचं ? प्रत्येक जीवाला कोणत्या नावानं ओळखायचं ? आणि एवढी नाव आणणार तरी कुठून? कुठलाही जीव सापडला की,त्याची नोंद पूर्वी झाली आहे की नाही हे तपासणं म्हणजे एक दिव्य परीक्षाच असायची.हे करणाऱ्यांना 'टॅक्सोनॉमिस्टस्' म्हणतात.ते कसब शिकायला आजही चक्क ८-१० वर्ष लागतात.!त्यातून प्रत्येक देशाची त्या जीवांना नाव देण्याची,त्यांची वर्गवारी करण्याची पद्धतही वेगळी असायची.ते दिसायला कसे आहेत ? देखणे की कुरूप,लहान की मोठे वगैरेंवरूनही त्यांचं वर्गीकरण व्हायचं.'बफाँ' यानं तर कुठलाही जीव माणसाला किती उपयोगी आहे यावरून त्यांचं वर्गीकरण केलं होतं!


बरं,प्रत्येक नावही प्रचंड मोठं असायचं.जमिनीत येणाऱ्या चेरीला 'फिजॅलिस अम्नो रॅमोसिम रॅमिस ॲग्न्युलॉसिस ग्लॅब्रिस फॉलीस 'डेंटोसेरॅटिस' असं नाव दिलं होतं. ते एका श्वासात म्हणणंही शक्य नसायचं!एखाद्याला तर ती शिवीच वाटली असती! त्यातून कित्येक वनस्पतींची किंवा प्राण्यांची वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या नावांनी नोंद होई.म्हणजे या सगळ्या जीवसृष्टीची जागतिक 'डिरेक्टरी' अशी नव्हतीच. म्हणजे संपूर्ण जीवसृष्टीच्या ०.०१%च सजीव आपल्याला आतापर्यंत सापडलेले होते,पण त्यांचाही आकडा काही कमी नव्हता आणि त्यांच्याही नोंदीमध्ये पूर्ण अंदाधुंदी होती! म्हणजे गोंधळच गोंधळ!


या सगळ्यातून मार्ग काढला तो कॅरोलस

 ( किंवा कार्ल ) या अतिगर्विष्ठ आणि अतिविक्षिप्त माणसानं,१७०७ साली तो स्वीडनमध्ये एका गरीब धर्मोपदेशकाच्या घरी जन्मला.त्याचं खरं नाव होत इंगेमार्सन पण त्याच्या वडिलांनी आपल्या जमिनीत आलेल्या एका मोठ्या लिंबाच्या झाडावरून त्याचं नाव लीनियस असं ठेवलं.त्यांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती.लीनियसनंही आपल्या- सारखंच धर्मोपदेशक व्हावं असं त्याच्या वडिलांना वाटायचं;पण कार्लला त्यात मुळीच रस नव्हता.


लहानपणी कार्ल लीनियस शाळेला सर्रास दांड्या मारत असे आणि तासन् तास आजूबाजूची झाडं,वनस्पती यांचंच निरीक्षण करत बसे.तो अभ्यासात फारसा हुशार नव्हता.'तू फारफार तर चांभार होऊ शकशील',असं त्याचे शिक्षक म्हणायचे.इतर काहीच येत नाही म्हणून वडिलांनीही त्याला चांभारच करायचं ठरवलं होतं;पण लीनियसनं आपल्याला आणखी एक 'चान्स' मिळावा यासाठी गयावया केली तेव्हा दया येऊन वडिलांनी तो त्याला दिला.मग मात्र लीनयस अभ्यास करायला लागला.


लीनियसला निसर्गाविषयी खूपच आकर्षण वाटे. त्याला सगळ्या गोष्टींच्या सुसंगत नोंदी ठेवाव्यात (डॉक्युमेंटेशन अँड रेकॉर्ड कीपिंग) आणि कुठल्याही गोष्टीचं नीटपणे वर्गीकरण करावं याचं चक्क वेडच होतं! एरव्ही अशा एखाद्या माणसाला इतरांनी चक्क मूर्ख ठरवून त्याची चेष्टाच केली असती;पण लीनियसच्या बाबतीत हीच गोष्ट त्याला उपयोगी पडणार होती.अशाच नोंदी या सगळ्यातून मार्ग काढला तो 'कॅरोलस करण्यासाठी १७३२ साली आर्क्टिक सर्कलच्या वर 'लाप्लांड' इथे लीनियसनं एक मोहीम काढली.तब्बल पाच महिने तिथे तळ ठोकून त्यानं अनेक तऱ्हेच्या वनस्पतींचे नमुने गोळा केले.तिथले

किटक,पक्षी आणि इतरही प्राणी त्यानं अभ्यासले.त्याच्या या मोहिमा अगदी सैन्यातल्या शिस्तीनं चालत.

त्याच्याबरोबरच्या विद्यार्थ्यांनी कसा पोशाख घालावा,(याला तो 'बॉटनिकल युनिफॉर्म वनस्पतीशास्त्रीय गणवेश' असं म्हणे!) ७ वाजता कसं बाहेर पडावं,२ वाजता जेवून ४ पर्यंत विश्रांती घेऊन पुन्हा कसं कामाला लागावं आणि या सगळ्यामध्ये त्यानं दर अर्ध्या तासानं कशी प्रात्यक्षिकं द्यावीत हे सगळं अगदी काटेकोरपणे चालायचं,पण या सगळ्या मोहिमेसाठी त्याच्याजवळ फक्त १०० डॉलर्स एवढेच पैसे होते.यामुळे त्या सगळ्यांचे प्रचंड हालही झाले.वाईट हवामान,खराब प्रदेश आणि भूक,तहान या सगळ्या हालअपेष्टा सहन करूनही लीनियसनं वनस्पतींविषयीं खूपच माहिती गोळा केली.तो सतत अनेक महिने, अनेक वर्षं पायीच चालत असे.प्राण्यांच्या कातडीवरच तो झोपायचा.असं करत कडाक्याच्या थंडीत त्यानं पायी ४६०० चौ.मैल एवढा प्रांत पिंजून काढला! तो परतला तेव्हा त्याची कीर्ती खूपच वाढली असली तरी त्याचे खिसे मात्र पूर्णच रिकामे झाले होते.

परतल्यावर त्याचं एका श्रीमंत डॉक्टरच्या सारा मोराए नावाच्या मुलीवर प्रेम बसलं.मुख्य म्हणजे त्या डॉक्टरलाही असा उचापत्या माणूस जावई म्हणून आवडला;पण 'मेडिकलची पदवी तुला मिळाल्याशिवाय मी तुझ्याशी लग्न करणार नाही,'असं सारानं त्याला सांगितलं.मग भावी सासऱ्याच्या पैशावर लीनियनं हॉलंडला जाऊन चक्क एम.डी.ही पदवी १७३५ साली मिळविली.


१७३९ साली लीनियसनं साराशी लग्न केलं. त्यानंतर १७४१ सालापर्यंत त्यानं वैद्यकीय प्रॅक्टिसही केली.त्याला याच वर्षी उप्साला इथे मेडिसनचा प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली. १७४२ साली तो वनस्पतीशास्त्राचा प्रोफेसर बनला आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तो याच पदावर होता.तो चांगल शिकवत असल्यामुळे तो विद्यार्थिप्रिय होता.


पण या सगळ्या अगोदर लीनियसन पूर्वीच विद्यार्थिदशेत असताना १७३५ साली 'स्पीशीज प्लॅटॅरम'हे वनस्पतींच्या वर्गवारीवर पुस्तक लिहिलं होतं.त्यात त्यानं त्यासाठी 'बायनॉमियल' पद्धत वापरली होती.१७३८ साली त्यानं हीच पद्धती प्राण्यांना वापरून त्याच्या 'सिस्टीमा नॅचरे' याची १३ पानांची अतिसंक्षिप्त आवृत्ती प्रकाशित केली.लीनियसच्या अगोदर सजीवांचं हे वर्गीकरण कसं करायचं याविषयी बरेच वाद होते.


व्हेल मासा आणि कुत्रा यात फरक ओळखता येतो.पण कुत्रा आणि लांडगा किंवा कुत्रा आणि कोल्हा यात फरक किती आहे? तसंच गाढव आणि घोड़ा एकाच प्रकारचे की वेगळ्या ? मग हे वर्गीकरण बाहेर दिसणाऱ्या गुणधर्मावरून करायचं की आतल्या अवयवांवरून,असे अनेक प्रश्न त्या काळी लोकांना पडत.


लीनियसनं सर्व सजीव सृष्टीचे गट पाडले.त्यांना तो 'जेनेरा' म्हणे.एक गट म्हणजे 'जीनस'. जेनेरा हे त्याचंच बहुवचन.प्राण्याची रचना, आकार किंवा पुनरुत्पादनाची पद्धत अशा कुठल्याशा गोष्टीवरून ही गटवारी केलेली असे. उदाहरणार्थ,झेब्रा आणि घोडा यांत साम्य आहे, पण घोडा आणि कुत्रा यांत खूपच कमी साम्य आहे.वगैरे

म्हणून घोडा आणि झेब्रा यांना 'ईक्वस' या गटात त्यानं टाकलं.कुत्र्यांचा त्यानं गट केला होता 'कॅनिस' कोल्ह्यांचाही तोच गट होता.यानंतर त्यानं त्या गटाचे उपगट केले. त्यांना तो 'स्पीशीज' म्हणे.म्हणजे 'ईक्वस' गटातली झेब्रा ही एक 'स्पीशीज' आहे आणि घोडा ही दुसरी स्पीशीज.म्हणजेच प्रत्येक प्राण्याचं नाव हे जीनस स्पीशीज हे जोडून होतं. उदाहरणार्थ,ईक्वस झेब्रा (म्हणजे झेब्रा) किंवा ईक्वस कॅबॅलस (म्हणजे घोडा) वगैरे.या नामकरण पद्धतीत जीनस आणि स्पीशीज हे दोन भाग असल्यानंच त्याला 'बायनॉमियल' किंवा 'बायनरी नॉमेनक्लेचर'असं म्हणतात.या दोन घटकांचा उपयोग करून नाव ठरवण्याची बायनॉमियल पद्धत तशी खूप पूर्वीपासून चालत आलीय;पण लीनियसनं ही पद्धत खूप शिस्तबद्ध रीतीनं वापरून त्याची एक सिस्टीम बनवली आणि ती प्रचलितही केली.हे विशेष होतं.


 म्हणूनच २५० वर्षांनंतरही लीनियसची हीच पद्धत अजूनही वापरली जाते!आजही जिथे जिथे लीनियसनं दिलेलं सजीवाचं नाव लिहिलं जातं त्याच्यापुढे एल.सी.अशी अक्षरं लिहिली जातात.(याचा अर्थ हे नाव कार्ल लीनियसनं दिलेलं आहे.)


'व्हेलंट' या फ्रेंच वनस्पतिशास्त्रज्ञानं १७१७ साली वनस्पतींनाही पुनरुत्पादनाचे अवयव असतात ही भन्नाट कल्पना मांडली.लीनियस या कल्पनेनं भारावूनच गेला होता.कदाचित त्यामुळे त्याच्या लिखाणात,

नामकरणात सतत सेक्सचा भाग खूप असे.

'वल्वा','लाबिया', 'प्यूब्ज','अनस','हिमेन'आणि 'क्लायटोरिया' अशी थेट लैंगिक नावं तो द्यायचा.त्याच्या लिखाणात तो वनस्पतींच्या 'लग्नाची' आणि 'संभोगांची' रसाळ वर्णनंही करे.कित्येक लोकांनी त्यावर आक्षेपही घ्यायला सुरुवात केली.'गटे' सारखी मंडळीही लीनियसचं लिखाण बायकांनी आणि विद्यार्थ्यांनी वाचू नये,असं म्हणायला लागली.मग काय मंडळी ते आणखीनच चोरून वाचायला लागली!एवढंच कशाला,अजूनही त्याविषयी वर्गात शिकवताना शिक्षक आणि विशेषतः शिक्षिका 'ते' शब्द किंवा 'ती' वर्णनं निदान सगळ्यांसमोर वाचायचं तरी टाळतात किंवा लाजत लाजत तरी वाचतात! लीनियस वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या लैंगिक अवयवांच्या थिअरीमुळे एवढा प्रभावित झाला होता की,भुंगे आणि इतर कीटक यांच्यामुळे वनस्पतींमध्ये परागीभवन होतं याकडे लीनियसनं पूर्णपणे दुर्लक्षच केलं.लीनियसनं त्याचं वनस्पतींमधलं वर्गीकरण करतानाही या वनस्पतींमधल्या लैंगिक अवयवांचाच उपयोग केला होता.


१७७८ साली लीनियसचा मृत्यू पुस्तकाची बारावी आवृत्ती निघाली होती.फरक इतकाच की,फक्त त्यात १३ ऐवजी २३०० पानं होती! आणि त्याचे तीन खंडही निघाले होते! या सगळ्या प्रकल्पात त्यानं साधारणपणे वनस्पतींच्या ७७०० आणि माहीत होत्या. थोडक्यात,लीनियसनं त्या वेळच्या माहीत असलेल्या सजीवांचं पूर्णपणे वर्गीकरण केलं होतं.लीनियसनं त्याच्या वर्गीकरणासाठी जीनस आणि स्पीशीज सोडून वापरले होते.आज त्यात किंगडम,फायलम आणि सबफायलम हेही शब्द वाढले आहेत.


लीनियसनं प्राण्यांचेही सहा प्रकार मानले.सस्तन प्राणी,सरपटणारे प्राणी,पक्षी,मासे,कीटक (इन्सेक्ट्स) आणि कृमी (वर्मुस) हे ते प्रकार.


लीनियसनं दिलेल्या नावांमध्ये आणि वर्गीकरणामध्ये कालांतरानं थोडेफार बदल केले गेले असले तरीही त्यातला बराचसा भाग आणि त्यामागची तत्त्वं अजूनही तशीच टिकून आहेत! लीनियसची वर्गीकरणाची तत्त्वं इतकी मजबूत आहेत की,पुढे जेव्हा युरोपच्या बाहेर गेल्यावर अभ्यासकांना सजीवांच्या नव्या प्रजाती मिळाल्या तेव्हा त्यांचंही वर्गीकरण करताना तीच तत्त्वं लागू पडली होती!हे सगळं काम अत्यंत अवघड असलं तरी ते दुसन्या कोणाला तरी जमलंही असतं;पण लीनियसच वैशिष्ट्य असं की,त्यानं माणसालाही या वर्गीकरणामध्ये बसवलं.माणसाच्या बाबतीत त्याच्या वर्गीकरणाची उतरंड अशी होती :


• किंग्डम - अॅनिमेलिया (Animalia) 'होण्यापूर्वी त्याच्या 'सिस्टिमा नॅचरे' प्राणी


●फायलम - कॉर्डेटा (Chordata) मज्जारज्जू असलेला.


• सबफायलम - व्हर्टिब्रेटा (Vertebrata) मणका असलेला.


• क्लास - मॅमेलिया (Mammalia) सस्तन


ऑर्डर - प्रायमेट्स (Primates) माकडवर्गीय


• फॅमिली - होमिनाइड (Hominidae)


• जीनस - होमो (Homo) माणूस


• स्पीशीज - सेपियन (Sapiens) आधुनिक 'होमो सेपियन्स' हा शब्दही लीनियसनंच प्रथम वापरला.


अर्थात काही वेळा लीनियस उगाचच काही गोष्टी घुसडून द्यायचा.समुद्रावरच्या सफरीवरून खलाशी आले आणि त्यांनी कुठल्याही काल्पनिक 'राक्षसी' प्राण्यांची किंवा चार पायावर चालणाऱ्या रानटी,मुक्या किंवा शेपटी असणाऱ्या माणसांची वर्णनं केली की,लीनियस तेही पुस्तकात घुसडायचा!आणि त्याही प्रजाती तो होमो या जीनसमधल्या वेगवेगळ्या स्पीशीजमध्ये घालायचा.


लीनियसच्या पद्धतीमध्ये त्रुटी होत्याच.मग ब्रिटिशांनी त्यात सुधारणा करून १८४२ साली नवीन स्टँडर्ड निर्माण केलं.अर्थातच फ्रेंचांना ते न आवडल्यामुळे त्यांनी त्यांचं वेगळंच स्टँडर्ड काढलं.आणखी गोंधळ म्हणजे अमेरिकनांनी लीनियसनं १७५८ साली मांडलेली पद्धतीच वापरायचं ठरवलं.म्हणजे मज्जाच मजा !


लीनियसचा दबदबा युरोपभर पसरला होता. १७३५ साली पॅरिसच्या भेटीत 'बर्नार्ड द ज्यसियू' या वनस्पतिशास्त्रज्ञाचं भाषण ऐकायला लीनियस गेला.भाषणात एका दुर्मिळ वनस्पतीचं नाव जेव्हा वक्ता विसरला,तेव्हा ते नाव मागे बसलेल्या लीनियसनं ओरडून सांगितलं.तेव्हा बर्नार्डनं चमकून मागे बघितलं आणि 'हे कोण बोललं?'असं विचारताच लीनियस उभा राहिला.त्या वेळी त्या वनस्पतिशास्त्रज्ञानं विचारलं,'तू लीनियस तर नाहीस?'लीनियसशिवाय हे उत्तर कोणीच देऊ शकणार नाही हे त्याला माहीत होतं.लीनियस जेव्हा 'हो' म्हणाला तेव्हा स्वतःचं स्टेटस किंवा प्रतिष्ठा वगैरे विसरून तो खाली त्याच्याकडे धावत गेला आणि लीनियसला त्यानं कडकडून मिठी मारली.!


लीनियस स्वतःला 'ग्रेट' मानायचा आणि गंमत म्हणजे तसं तो गर्वानं सगळ्यांना सांगायचा. स्वतःचीच स्तुती करणारे मोठमोठे लेखही तो लिहायचा.त्यानं स्वस्तुतीची चार (!) आत्मचरित्रंही लिहिली! पण गंमत म्हणजे त्या चारही आत्मचरित्रांमध्ये फारसं काहीच साम्य नव्हतं!'

आपल्यापेक्षा मोठा वनस्पति- शास्त्रज्ञ आणि प्राणिशास्त्रज्ञ अख्ख्या मानवी इतिहासात झाला नाही.'असंही तो सगळीकडे सांगे आणि लिही.


आपल्या मृत्युशिलेवर 'वनस्पतिशास्त्रज्ञाचा राजपुत्र' असं कोरलं जावं,अशीही त्याची इच्छा होती.त्याला विरोध करायलाही कुणी धजावत नसे,कारण कुणी तसंच केलंच तर त्याचं नाव कुठल्याही तणाला किंवा अत्यंत 'फालतू' वनस्पतीला तो देऊन टाके.


लीनियसला प्रसिद्धी अमाप मिळाली.एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या लीनियसला १७६१ साली 'स्वीडिश हाऊस ऑफ नोबल्स'चं सदस्य बनवण्यात आलं.वैयक्तिक आयुष्यात मात्र लीनियसला फारसं सुख मिळालं नाही.

अपंग अवस्थेत १७७८ साली लीनियसचा मृत्यू झाला. मात्र आपल्या कामाच्या रूपात आणि 'सिस्टिमा नॅचरे' या ग्रंथाच्या रूपात तो आजही जिवंत आहे.हे मात्र खरं!


४ मे २०२३ या लेखातील पुढील भाग..

४/५/२३

द प्रिन्स - निकोलो मॅकियावेली (१५३२)

निकोलो मॅकियावेलीच्या मृत्यूनंतर म्हणजे १५३२ साली 'द प्रिन्स' हे पुस्तक प्रसिद्ध झालं.मात्र,

तेव्हापासून आत्तापर्यंत हे पुस्तक 'बेस्ट सेलर' म्हणूनच गाजतं आहे.यातली भाषा खूप भिडणारी आहे.या पुस्तकात त्यानं जे काही सांगितलंय.ते एखाद्या राज्यकर्त्यासाठी जितकं उपयुक्त आहे,

तितकंच ते एकविसाव्या शतकातल्या प्रचंड मोठ्या कंपन्यांनाही लागू आहे.वरवर बघता डावपेच किंवा राजकारण आणि सत्तास्पर्धा या गोष्टी मॅकियावेलीच्या 'द प्रिन्स' मध्ये सापडतात;पण खोलवर बघता त्यामध्ये व्यवस्थापनासाठी चांगले धडेही आपल्याला आढळतात.!


'कॉम्पिटिंग फॉर द फ्युचर' या व्यवस्थापनावरच्या प्रसिद्ध पुस्तकाचा लेखक गॅरी हॅमेल एकदा म्हणाला होता,'नेतृत्व (लीडरशिप) आणि डावपेच (स्ट्रॅटेजी) या गोष्टींचा 'शोध' आपल्याला विसाव्या शतकात लागला,ही आपली समजूत चुकीची आहे.याची आपल्याला वारंवार आठवण करून द्यावी लागते.'खरं तर या कल्पना खूप जुन्या आहेत.या गोष्टी पूर्वी उद्योगधंद्यांपेक्षा राजेरजवाड्यांनाच जास्त गरजेच्या पडत.आजच्या ज्ञानार्थ व्यवस्थेत (नॉलेज इकॉनॉमी) कुणाला असं वाटेल की, सत्तेला किंवा त्यातल्या स्पर्धेला काहीच स्थान नाही;पण आज रेडस्टोन,जेफ बेझॉस,बिल गेट्स,रुपर्ट मरडॉक किंवा टाटा यांना विचारलं, तर ते या मताशी मुळीच सहमत होणार नाहीत.आणि यामुळेच निकोलो मॅकियावेलीची पुस्तकं ५०० वर्षांनंतरही बाजारात पटापट विकली जाताहेत.त्यानं सांगितलेल्या यशस्वी राज्यकारभारा-

विषयीच्या किंवा कुठलीही सत्ता मिळवून ती टिकवण्या- विषयीच्या तत्त्वाचं महत्त्व जगाला आज कळतं.


मॅकियावेली १४६९ ते १५२७ अशी ५८ वर्षे जगला.हा काळ रेनेसान्स म्हणजेच प्रबोधन काळ होता! रेनेसान्स १४०० सालापासून इटलीमध्ये सुरू झाला आणि पुढे युरोपभर पसरला.


शिक्षणाचा प्रसार,परमेश्वर निष्ठेपेक्षा माणसाच्या विकासावर भर,सगळ्याच कलांमध्ये आमूलाग्र बदल आणि भरभराट,व्यक्तिवाद आणि 'नफा मिळवणं चांगलं आणि त्यात काहीही वाईट नाही' या गोष्टींची रुजवणूक असं सगळं या काळात घडलं. 


हा व्यापारी वर्ग आणि चर्च यांच्यातला एक प्रकारे झगडाच होता.व्यापाऱ्यांच्या हातात या काळात बराच पैसा खुळखुळत होता.तसंच त्यांना तो आणखी वाढवायचा होता.मग यातून बरीच तत्त्वं,दृष्टिकोन बदलत गेले.याच काळात आजच्या सिंगापूरसारखंच एक एक शहर म्हणजेच एक एक राज्यच (सिटी स्टेट्स) असायचं.फ्लॉरेन्स,रोम,नेपल्स,व्हेनिस आणि मिलान वगैरे ठिकाणी अशी छोटी छोटी सिटी स्टेट्स तयार झाली.

यांच्यामध्ये लहानमोठी युद्धं, मारामाऱ्या,खून वगैरे गोष्टी बऱ्याच चालत. यामुळे प्रत्येक राज्यकर्त्याला प्रजेला सुखी ठेवतानाच राज्याचं संरक्षण करण्यासाठीची पावलंही उचलावी लागत आणि ही सगळी कसरत सांभाळण्या-

साठी त्याला चांगल्या नेतृत्वाची आवश्यकता भासत असे.अशा वातावरणात मॅकियावेली वाढला.


या निकोलो मॅकियावेलीला ब्रिटिश इतिहासकार 'ओल्डनिक' असं संबोधायचे.इतिहासात ओल्डनिक या शब्दाचा अत्यंत तुच्छतेनं उल्लेख करण्यात येत असे.

त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी म्हणजेच १५३२ साली जेव्हा त्याचं बहुचर्चित 'प्रिन्स' हे पुस्तक प्रकाशित झालं,तेव्हा त्याचं नाव फसवणूक,कपट,संधिसाधूपणा,

स्वार्थ आणि दुष्टपणा अशा सगळ्या दुर्गुणांशी जोडलं गेलं. इतक की, 'फ्रेडरिक द ग्रेट' सारख्या कित्येक हुकूमशहांनीसुद्धा या पुस्तकावर कडाडून टीका केली होती.या सगळ्या काळात 'मॅकियावेली-निझम' ही एक शिवीच झाली होती.दोन गट किंवा दोन पक्ष एकमेकांवर या शिवीची बरसात करत. (म्हणजे तू मॅकियावेलिनिस्ट आहेस अशी.) मात्र आज व्यवस्थापनाच्या जगात याच निकोलो मॅकियावेलीचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. हा मॅकियावेली होता तरी कोण ?


निकोलो मॅकियावेलीचा जन्म १४६९ साली फ्लॉरेन्समध्ये एका कायदेपंडित सरकारी अधिकाऱ्याच्या कुटुंबात झाला.त्याच्या लहानपणाविषयी खूपच कमी माहिती उपलब्ध आहे.त्याचं वाचन दांडगं होतं,पण तो सगळ्यात जास्त शिकला ते अनुभवातूनच! इटालियन राजकारणातल्या उलथापालथींनी मॅकियावेलीच्या आयुष्यातही खळबळच माजवली.यातल्या फ्लॉरेन्स या सगळ्यात प्रबळ राज्यात 'मेडिची' या कुटुंबाचं बरंच वर्चस्व होतं. मॅकियावेलीही फ्लॉरेन्सचाच होता.त्याच्या पूर्वजांनी मेडिची कुटुंबातल्या लोकांना एके काळी विरोध केला असल्यानं मॅकियावेलीला मेडिचींच्या राज्यात कुठलीही सरकारी नोकरी मिळाली नाही.इटलीवर १४९४ साली फ्रान्सच्या आठव्या चार्ल्स राजानं आक्रमण केलं आणि पुढची पाच दशकं इटलीमध्ये प्रचंड अस्थिरता पसरली.


१४९४ सालीच मेडिचींची सत्ता जाऊन तिथे गिरोलामो सावोनारोला नावाच्या एका मठातल्या भिक्षुकाची (फ्रायर) सत्ता स्थापन झाली;पण १४९८ साली सावोनारोलाला मृत्युदंड होऊन त्याला ठार करण्यात आलं.तेव्हा मॅकियावेली फक्त २९ वर्षांचा होता. मेडिचींच्या जागी आलेल्या राज्यसत्तेत मॅकियावेलीमधले प्रशासकीय गुण ओळखून त्याला तिथे चॅन्सलरची नोकरी मिळाली.फ्लॉरेन्सच्या विदेश खात्यामधलीही जबाबदारी मॅकियावेलीवर टाकण्यात आली.


यानंतर १४ वर्ष मॅकियावेलीनं सरकारची खूप इमाने-

इतबारे नोकरी केली.या काळात त्यानं फ्रान्स,जर्मनी आणि इटली इथल्या अनेक शहरांमध्ये अनेकदा प्रवास केला.ही त्याची वर्ष खूप आनंदात गेली.अनेक प्रकारच्या वाटाघाटींमध्ये त्याला भाग घेण्याची संधी मिळाली.

युरोपमधल्या अनेक राज्यकर्त्यांना जवळून बघण्याचा योग त्याला आला.हे सगळं अनुभवल्यामुळे तो खूप काही शिकला.याच काळात त्याचे अनेक गोष्टींबद्दलचे विचारही पक्के झाले.इथे त्याचं राजकारणातलं खरं शिक्षण त्याला मिळालेल्या अनुभवातून झालं. सरकारं कशी चालतात,

तसंच ती कशी आणि का पडतात याचा तो या वयात शांतपणे अभ्यास करत होता.ही सगळी निरीक्षणं त्याच्या पुढच्या लिखाणात उपयोगी पडणार होती.


१५०२ हे वर्ष मॅकियावेलीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचं ठरलं.एक तर या वर्षी त्यानं मारिएट्टा कॉर्सिनी हिच्याशी लग्न केलं. मारिएट्टा त्याच्या मृत्यूनंतरही २६ वर्ष जगली.

याच वर्षी त्याला रोममध्ये बोर्जियाकडे दूत म्हणून पाठवलं.


याच काळात बोर्जियानं आपल्याला सोडून गेलेल्या चौघांना कपटाने लाच दाखवून कसं परत बोलावलं आणि नंतर त्यांना कसं निर्घृणपणे नरडी दाबून मारून टाकलं हे मॅकियावेलीनं स्वतः बघितलं आणि अनुभवलं, राज्य करताना कपटाचा वापर करण,खोट बोलणं,फसवणं अशा गोष्टींचं मॅकियावेलीनं आपल्या 'द प्रिन्स' मध्ये जे समर्थन केलं होत यामागे त्याचे असेच अनेक अनुभव होते.


या काळात इटलीच्या राजकारणात प्रचंड उलथापालथी होत होत्या.पोप सहावा अलेक्झांडर याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे बोर्जियाचं वर्चस्व संपुष्टात आलं आणि मग अनेक घटना घडल्या आणि फ्रेंचांनी इटलीवर पुन्हा आक्रमण केलं.रवीना इथे झालेल्या लढाईत फ्रेंचांना पिटाळून लावण्यात यश आलं आणि इटलीत पुन्हा मेडिचीचं राज्य आलं. या घटनांचा मॅकियावेलीच्या आयुष्यावर खूपच मोठा परिणाम होणार होता.याचं कारण मेडिचींचं राज्य पुन्हा सुरू होताच मॅकियावेलीची सगळी सरकारी पदं काढून घेण्यात आली.यानंतर त्याचा खूप छळ करण्यात आला.त्याला तुरुंगातही टाकण्यात आलं.शेवटी त्याला फ्लॉरेन्समधून हद्दपार करण्यात आलं.अशा तऱ्हेनं त्याची राजकीय कारकीर्द त्याच्या वयाच्या ४३ व्या वर्षीच संपुष्टात आली.


अशा प्रतिकूल काळातही निकोलो मॅकियावेलीनं 'द प्रिन्स' हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं.खरं तर त्यानं ते पुस्तक म्हणून लिहिलंच नव्हतं.मेडिची घराण्याची मर्जी संपादन करण्याच्या खटाटोपातून हे लिहिलं गेलं होतं.तसंच हे पुस्तक त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे १५३२ साली प्रसिद्ध झालं.मात्र तेव्हापासून ते आत्तापर्यंत हे पुस्तक 'बेस्ट सेलर' म्हणूनच गाजतं आहे.


यात खूप लहान लहान अशी २६ प्रकरणं आहेत. यातली भाषा खूप भिडणारी आहे.त्याच्या 


जिवंतपणी हे पुस्तक म्हणून बाहेर आलंच नाही. ते केवळ एक हस्तलिखित म्हणून अनेकांकडे फिरत राहिलं.


या पुस्तकात त्यानं जे काही सांगितलंय ते एखाद्या राज्यकर्त्याला जितकं उपयुक्त आहे तितकंच ते २१ व्या शतकातल्या प्रचंड मोठ्या कंपन्यांनाही लागू आहे.ते सर्वप्रथम 'अँन्थनी जे' या लेखकानं १९७० साली 'मॅनेजमेंट अँड मैकियावेली' या आपल्या पुस्तकात लिहिलं आणि मॅकियावेली हा कॉर्पोरेट जगतात एकदम हिरो बनला.! वरवर बघितलं तर अमेरिकेतल्या 'डलास' किंवा 'डायनॅस्टी' अशा टेलिव्हिजनच्या सोप सीरियल्समध्ये किंवा आपल्याकडच्या 'कॉर्पोरेट' या सिनेमात जसे दाखवतात तसेच डावपेच किंवा राजकारण आणि सत्तास्पर्धा हे आपल्याला मॅकियावेलीच्या 'द प्रिन्स' मध्ये सापडतात; पण खोलवर बघता त्यामध्ये मॅनेजमेंटसाठी चांगले धडे ही आपल्याला आढळतात!


मॅकियावेलीनं माणसाच्या स्वभावाविषयी काही निरीक्षणं करून काही विधानं केली होती. त्यावरच 'द प्रिन्स' मधली निरीक्षणं आणि विधानं प्रिन्स'मधली अवलंबून होती.ती निरीक्षणं अशी होती.


 मनुष्य हा स्वार्थी,धोकेबाज,कपटी आणि पैशांच्या मागे धावणारा आहे;स्वार्थ,अहंकार आणि कपट यातच तो अडकतो.मनुष्य एक वेळ वडिलांचा मृत्यू विसरेल,पण संपत्तीतला वाटा विसरणार नाही;संपत्ती आणि जीवन यांच्या सुरक्षिततेसाठी जनता राज्यकर्त्याचं नियंत्रण स्वीकारते;राजानं माणसाचा हा स्वभाव लक्षात घेऊन प्रेमापेक्षा भीतीनंच राज्य चालवावं; दंडशक्ती वापरली तरच माणसाच्या स्वार्थाला लगाम लागू शकतो;मनुष्य म्हणजे दुर्गुणांचा पुतळा आहे,त्याला कितीही शिकवलं तरी तो सुधारू शकत नाही.


राज्य कसं मिळवावं आणि ते कसं टिकवावं,या प्रश्नाभोवतीच 'प्रिन्स' हे पुस्तक फिरतं. राज्यकारभार करण्यासाठी कुठले मार्ग निवडावेत म्हणजे यश मिळेल हे त्यानं या पुस्तकात सांगितलंय,हे मार्ग योग्य आणि नैतिक आहेत का याचा मॅकियावेलीचा काडीमात्र संबंध नव्हता,याचं कारण


 "कुठलंही ध्येय एकदा ठरलं की ते गाठण्यासाठी कुठलाही मार्ग निवडला तरी चालतो.म्हणजेच 'द एन्ड जस्टिफाइज द मीन्स' अशी थिअरी तो मानत असे.


राज्यकर्ता कसा असला पाहिजे याचं मॅकियावेली वर्णन करतो.त्याच्या मते राज्यकर्ता सिंह आणि कोल्हा या दोघांसारखा असला पाहिजे.युद्ध करायची वेळ आली तर तो सिंहासारखा बलवान तर हवाच,पण युद्ध केव्हा करावं आणि ते करायचं नसेल तर ते कसं टाळावं हे कळण्यासाठी त्याच्याकडे कोल्ह्यासारखा धूर्तपणा,हुशारी आणि व्यवहारी स्वभाव असला पाहिजे,असं तो म्हणे.


आजकाल तर सगळा देखाव्याचा जमाना आला आहे.'आपल्याला जे वाटतं आणि भासतं तेच खरं असतं (परसेप्शन इज रिअॅलिटी)' वगैरे गोष्टींवरच भर दिला जातो.त्यामुळे प्रत्यक्ष चांगलं असण्यापेक्षा चांगलं भासणं कसं जास्त जरुरीचं आहे.हे आज महत्त्वाचं मानलं जातं;पण हेही मॅकियावेलीनं त्या वेळीच म्हणून ठेवलंय. 


त्यामुळे जर राज्यकर्त्याकडे एखादा गुण नसेल तरी तो आपल्याकडे आहे असा त्यानं दिखावा करावा,असंही चक्क मॅकियावेली या पुस्तकात म्हणतो.आश्चर्य म्हणजे राज्यकर्त्यानं सद्गुणांच्या मागे लागू नये,असाही तो स्पष्ट इशारा देतो. 'जो माणूस सतत सद्गुणानं (व्हर्च्यूअस) वागतो. त्याचाही इतिहासात अनेकदा सर्वनाश झालेला दिसतो,असं मॅकियावेलीनं म्हटलंय.थोडक्यात, मॅकियावेली नैतिकता आणि राजकारण यांच्यात पूर्णपणे फारकत घेतो.


राज्यकर्त्यानं दयाळूपणाचा बुरखा घेऊन आपलं कौर्य झाकावं,राज्यकर्त्यानं बहुरूप्याचं सोंग चांगल्या प्रकारे वठवावं,राज्यकर्त्यानं समाजातल्या रूढी आणि परंपरा यांच्यात लुडबुड करू नये;अप्रिय गोष्टी हाताखालच्यां-

कडून करून घ्याव्यात आणि जर लोक चिडले, तर त्यांच्यावरच दोष ढकलावा,शेजारच्या राष्ट्राशी मैत्री करावी;पण योग्य संधी मिळाल्यावर ते राष्ट्र गिळंकृत करावं.धार्मिकतेचं प्रदर्शन करावं, भावनेच्या आहारी जाऊ नये;राज्यकर्त्यानं संयमी आणि दृढ असावं;स्तुतीला भाळून जाऊ नये; बुद्धिमान लोकांना जवळ ठेवावं,

असा त्यानं राजाला उपदेश केला.चांगलं-वाईट,नैतिक- अनैतिक,धर्म-अधर्म,इहलोक-परलोक वगैरे विचार फक्त भित्रे लोक करतात.वेळ पडली तर राज्यकर्त्यानं छळ,पक्षपात,धोकाधडी,हत्या,बेइमानी,संधिसाधूपणा,खोटारडेपणा,फसवणूक अशापैकी कुठलाही मार्ग स्वीकारावा,असंही तो म्हणतो.राज्यकर्त्यानं लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून आपण दया,धर्म,श्रद्धा आणि प्रेम यांचंच मूर्तिमंत प्रतीक आहोत असं भासवावं,पण शेवटी आपल्या फायद्याप्रमाणेच वागावं,असं मॅकियावेलीनं म्हटलंय.


पूर्वीही अशी व्यवहारी विधान अनेकांनी केली होती,पण मॅकियावेलीच महत्त्व असं की,त्यानं हे विचार सुसूत्रपणे इतक्या प्रभावीपणे मांडले की,हे पुस्तक ५०० वर्ष झाली तरी अजूनही गाजतंय! 


अशी काही अत्यंत आक्षेपार्ह किंवा अनैतिक विधानं सोडली तरीही मॅकियावेलीची काही विधानं त्याची प्रगल्भता दाखवतात उदाहरणार्थ, राज्यकर्त्याबरोबर जी माणसं फिरत असतात, ज्यांची संगत त्याला मिळते,

त्यावरून राज्यकर्त्याची किंमत ठरते.व्यवस्थापनाच्या जगात हे खूप महत्त्वाच विधान आहे.कुठल्याही कंपनीत सीईओ जशी आपली मॅनेजमेंट टीम निवडतो आणि त्यांच्यावर काम सोपवतो (डेलिगेशन) त्यावरून त्याचं यश ठरतं आणि त्याचं मूल्यमापनही होतं.


मॅकियावेली 'द प्रिन्स' मध्ये म्हणतो,

 'जो काळाची पावलं ओळखून त्यानुसार वागतो आणि आपल्या योजना आखतो,तोच यशस्वी होतो.कालबाह्य कल्पनांना चिकटून बसणारा कधीच यशस्वी होत नाही!' 


आजकाल व्यवस्थापनात 'चेंज मॅनेजमेंट' वर जे विवेचन आहे,त्याची सुरुवात तिथे झाली होती.मॅकियावेलीनं या पुस्तकात आपल्या हाताखालचे कर्मचारी आणि सैन्य यांना कसं निवडायचं, त्यांना सुखी कसं ठेवायचं,याच विवेचन केलं आहे.आपल्याला फितूर होऊन ते शत्रूपक्षाला जाऊन मिळू नयेत.हा त्यामागचा उद्देश होता! आजकालच्या सतत आणि भराभर नोकऱ्या बदलण्याच्या जगात आणि विशेषतः सॉफ्टवेअरच्या कंपन्यांना यातून बरंच शिकण्यासारखं आहे यात शंकाच नसावी. आपला 'मार्केट शेअर' कसा टिकवावा,सगळे कर्मचारी ज्यामुळे ते प्रेरित होतील असं एक ध्येय कसं निर्माण करावे.या

विषयीही चर्चा 'द प्रिन्स' मध्ये आहे.आजच्या 'व्हिजन आणि मिशन'ची मुळ मॅकियावेलीमध्ये सापडतात.


सत्ता केंद्रित असावी की विकेंद्रित असावी याविषयीही मॅकियावेली बोलून गेलाय.आजच्या परिस्थितीत कुठलीही संघटना बांधताना ती मोठी होत चालली की हे सगळे प्रश्न पुढे ठाकतातच.इथेही मॅकियावेली मदतीला धावून येतो.


दुसरे राज्य जिंकल्यानंतर तिथल्या लोकांची मनं कशी जिंकावीत या विवेचनामध्ये आपल्याला मॅकियावेलीकडून 'मर्जर्स अँड ऑक्विझिशन्स (एम.अँड ए.)'च्या संदर्भात शिकायला मिळेल. मॅकियावेली म्हणे,


'आहे ती परिस्थिती,त्या कल्पना,समजुती बदलून नवीन काही प्रस्थापित करणं सगळ्यात कठीण काम आहे.' आजच्या 'चेंज मॅनेजमेंट'वर भाषणं देणाऱ्यांनी मॅकियावेली जरूर वाचावा.नेतृत्व (लीडरशिप) याविषयीही मॅकियावेली बरंच बोलून गेलाय. 'सर्वच माणसं चांगली नसतात.हे गृहीत धरूनच चाणाक्षपणे वागावं' किंवा 'चांगलं वागणं हे ठीक आहे,पण नेत्याला वेळप्रसंगी वाईटही वागावं लागतं' किंवा 'कुठल्याही माणसाला कायम मित्र किंवा कायम शत्रू मानू नये.

'यांसारखी विधानं पाहा.तो म्हणतो,'चांगल्या नेत्याबद्दल प्रेम आणि भीती दोन्ही वाटलं पाहिजे;पण दोन्ही एकत्र असणं तसं कठीणच.त्यामुळे प्रेमापेक्षा भीती वाटली तरी चालेल!'


राज्यकारभाराविषयी इतका सल्ला देऊनही मॅकियावेली मेडिचींची मर्जी संपादन करू शकला नाही.


त्यानं मेडिचींकडे आपल्याला सरकारमधली नोकरी आणि पद पुन्हा देण्यात यावं यासाठी या काळात असंख्य पत्रं लिहिली; पण त्यांचा काहीच उपयोग झाला नाही.यामुळे राजकारणाचा पूर्ण संन्यास घेऊन तो लिखाणाकडे वळला. त्यानं 'द डिस्कोर्सेस ऑन

द फर्स्ट टेन बुक्स ऑफ लिव्ही हे पुस्तक लिहिलं.

यामध्ये तो आपल्याला 'द प्रिन्स' पेक्षा वेगळ्या रूपात भेटतो आणि लोकसत्ताक राज्यपद्धतीविषयीही बोलतो.

त्यानं 'आर्ट ऑफ वॉर','हिस्ट्री ऑफ फ्लॉरेन्स'अशीही पुस्तकं लिहिली.मॅकियावेलीचं लिखाण फक्त राजकीय गोष्टींपुरतं मर्यादित नव्हतं.त्यानं याच काळात मान्द्रागोल नावाचं इटालियन भाषेत एक विनोदी विडंबनही लिहिल.

ते रेनेसाँसमध्ये एक मास्टरपीस म्हणून गाजलं.


तरीही राजकारणाकडे मॅकियावेलीचा ओढा होताच;पण त्याला संधी मिळत नव्हती.शेवटी १५२७ साली मेडिचींची सत्ता उलथवून टाकली गेली,तेव्हा मॅकियावेली धावतच फ्लॉरेन्सला गेला आणि त्यानं सरकारी पदासाठी पुन्हा याचना सुरू केली;पण तोपर्यंत त्याच्या 'द प्रिन्स'चं हस्तलिखित अनेकांनी वाचलं होतं आणि अनेकांना तो दुष्ट आणि कपटी वाटल्यामुळे त्याचे फ्लॉरेन्समध्ये अनेक शत्रू निर्माण झाले होते.त्यामुळे 


कौन्सिलमध्ये बहुतेकांनी त्याच्याविरुद्ध मत दिलं,पण कौन्सिलचा निकाल ऐकायला मॅकियावेली जिवंत राहिला नव्हता.एका अर्थानं त्याचा अगोदरच मृत्यू झाला हे बरंच झालं,कारण ते ऐकून त्याला कदाचित मरणापेक्षा जास्त यातना झाल्या असत्या.!


'द प्रिन्स' हे खऱ्या अर्थानं क्रांतिकारी पुस्तक होतं.एक म्हणजे यापूर्वी राज्यशास्त्रावर (पोलिटिकल सायन्स) लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा हे पुस्तक जास्त शास्त्रशुद्ध होतं.यापूर्वी सेंट थॉमस अॅक्विनास आणि जॉन ऑफ सॅलिसबरी यांच्यासारख्यांनी केलेल्या आदर्शवादी (आयडिअॅलिस्ट) विवेचनापासून, धार्मिकतेपासून आणि नैतिकतेपासून या पुस्तकात पूर्णपणे फारकत घेतली होती.


'द प्रिन्स' मधल्या मॅकियावेलीचा कडवटपणा समजावून घ्यायचा असेल,तर आपल्याला १६ व्या शतकातली इटलीतली परिस्थिती समजावून घेतली पाहिजे.त्या वेळी इटली हा एकसंध देश म्हणूनही निर्माण झाला नव्हता.

व्हेनिस,जिनोआ आणि फ्लॉरेन्स यांच्यासारखी शहरं आणि कधीकधी पोप ही त्या वेळची सत्ताकेंद्र होती.या सगळ्यांमध्ये तर सतत वाद आणि युद्ध होत असतच,पण बाहेरूनही सतत आक्रमण होत असत.यातून राजकीय व्यवस्था संपूर्णपणे अस्थिर झाली होती.यामुळे फ्लॉरेन्सवर हल्ला करणाऱ्या 'रानटी' लोकांचा काहीही करून पाडाव केला पाहिजे,अशी भावना त्या वेळी तीव्र होती.या पार्श्वभूमीवर मॅकियावेलीची मतं बनत गेली आणि त्याचा राष्ट्रवादही उफाळून आला आणि तो टोकाचा कट्टर बनला.इतका की, जर्मनीमध्ये बिस्मार्क आणि नंतर हिटलर आणि इटलीत मुसोलिनी यांच्या विचार सरणीतही तो मोठ्या प्रमाणात डोकावला.


आजच्या दिखाऊ जगात आपल्याला जे वाटतं, जे भासतं,तेच खरं असतं (पर्सेप्शन इज रिअॅलिटी) वगैरे गोष्टींवरच भर दिला जातो. यामुळे प्रत्यक्ष चांगलं असण्यापेक्षा चांगल भासणं कसं जास्त गरजेचं आहे हे आज महत्त्वाचं ठरतं आहे.हेही त्या काळात मॅकियावेलीनं म्हणून ठेवलंय हे विशेष!


कुठल्याही ग्रंथालयात स्वतःला दोन मिनिटांत सुधारण्याची सेल्फ इंप्रुव्हमेंटची असंख्य पुस्तकं आपण बघतो,तसंच डेल कार्नेगीच्या 'हाऊ टू विन फ्रेंडस अँड इन्फ्लूअन्स पीपल' या पुस्तकाचं सोळाव्या शतकातलं रूप,असंच आपल्याला 'प्रिन्स'बद्दल म्हणावं लागेल,हे मात्र नक्की.!


"जो काळाची पावलं ओळखून त्यानुसार वागतो आणि आपल्या योजना आखतो तोच यशस्वी होतो.कालबाह्य कल्पनांना चिकटून बसणारा कधीच यशस्वी होत नाही." 


●निकोलो मॅकियावेली


जग बदणारे ग्रंथ - दीपा देशमुख

मनोविकास प्रकाशन मधून क्रमशः 

२/५/२३

युटोपिया - थॉमस मोर (१५१६)

१५१६ साली थॉमस मो(अ)रचं 'युटोपिया' हे पुस्तक प्रकाशित झालं या पुस्तकात त्या वेळची आर्थिक,

सामाजिक आणि राजकीय परिस्थिती याचं चित्र मोरनं 'युटोपिया'मध्ये रंगवलं होतं. 'युटोपिया' हे दोन भागांत किंवा दोन पुस्तकांच्या रूपात विभागलं गेलं आहे.पहिला भाग 'डायलॉग ऑफ कौन्सिल' या नावानं ओळखला जातो.तर दुसऱ्या भागाला '

डिस्कोर्स ऑन युटोपिया' असं म्हटलं जातं.या   पुस्तकात गाव,प्रवास,व्यापार,वाहतूक,धर्म,लष्कर

(किंवा सैन्य) अशा अनेक गोष्टींबद्दल आणि त्यांच्या नियमांबद्दल बोललं गेलंय.


कॅथलिक चर्चचा सेंट थॉमस मोर हा एक इंग्रज कायदेतज्ज्ञ,मानवतावादी,सामाजिक तत्त्ववेत्ता आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होता.'युटोपिया' या काल्पनिक बेटावरच्या राजकीय व्यवस्थेबद्दलचं 'युटोपिया' हे त्याचं पुस्तक प्रचंड गाजलं.या पुस्तकात त्यानं जे मांडलं ते सगळं काल्पनिक होतं.तरीही या पुस्तकाला प्रचंड यश मिळालं आणि थॉमस मोरलाही!या पुस्तकाकडे एक सामाजिक-राजकीय टीकात्मक,उपहासात्मक लिखाण म्हणून बघितलं जातं.


१५१६ साली थॉमस मोरचं 'युटोपिया' हे पुस्तक प्रकाशित झालं.या पुस्तकात त्याचे विडंबनात्मक विचार काळाच्या खूप पुढे जाणारे होते.त्या वेळची आर्थिक,सामाजिक आणि राजकीय परिस्थिती याचं चित्र मोरनं युटोपिया मध्ये रंगवलं होत.लॅटिनमध्येच संवाद साधत आणि लिखाणही करत त्यामुळेच 'युटोपिया'च लिखाण लॅटिन भाषेत केलं गेलं.'युटोपिया'च्या पहिल्या आवृत्तीनंतर प्रोटेस्टंट रीफॉर्मेशनचा काळ सुरु झाला.कॅथलिक चर्च आणि सुधारक यांच्यात खडाजंगी सुरू झाली.परिणामी आगीत तेल ओतल्यासारखे होईल या भीतीन युटोपिया ची पुढची आवृत्ती काढणं पुढे ढकललं गेलं. १५५१ साली 'युटोपिया' चं इंग्रजीत भाषांतर केलं गेलं. १६८५ साली त्याचं पुन्हा एकदा इंग्रजी भाषेत भाषांतर झालं.या दोन्ही आवृत्त्यांमधली भाषा जुनाट आणि क्लिष्ट होती.त्यामुळे सर्वसामान्य लोकांना सोप्या पद्धतीनं कळावं म्हणून 'युटोपिया'चं पुन्हा एकदा आजच्या वापरात असलेल्या सोप्या इंग्रजीत भाषांतर केले गेलं


युटोपिया म्हणजे एक प्रकार आदर्श व्यवस्था! वेबस्टरच्या शब्दकोशानुसार 'जिथे आदर्श राजकीय आणि आर्थिक समस्या आहे असं एक काल्पनिक बेट' अशी 'युटोपिया' ची व्याख्या केली होती.या पुस्तकात युटोपिया नावाचं एक काल्पनिक बेट दाखवलं आहे आणि या बेटावर राहणान्या लोकांना युटोपियन्स असं संबोधलं आहे.या पुस्तकाची गंमत म्हणजे यात लेखक थॉमस मोर हा स्वत:ही एक पात्र म्हणून सामील झाला होता. 'युटोपिया' हे दोन भागांत विभागलं गेलं आहे.पहिला भाग 'डायलॉग ऑफ कॉन्सिल या नावानं ओळखला जातो,तर दुसऱ्या भागाला 'डिस्कोर्स ऑन युटोपिया' असं म्हटलं जातं.या पुस्तकात गाव,प्रवास,व्यापार,वाहतूक, धर्म,लष्कर (किंवा सैन्य) अशा अनेक गोष्टींबद्दल आणि त्यांच्या नियमांबद्दल बोललं गेलंय.


पुस्तकाची सुरुवात अतिशय रंजक तऱ्हेनं होते. थॉमस मोर हा नेदरलँडमध्ये राहत असतो.राजा हेन्रीचा अँबॅसॅडर म्हणून त्याचं काम असतं. त्याची पीटर जायल्स नावाच्या एका व्यक्तीशी दोस्ती होते.जायल्स हा अतिशय बुद्धिमान असतो.एकदा थॉमस मोर चर्चमधून आपल्या घरी परतताना तो पीटर जायल्सच्या घराकडे वळतो,तेव्हा त्याला जायल्स एका वृद्ध माणसाबरोबर बोलत असलेला दिसतो.लांब दाढी असलेल्या या माणसाचं नाव राफाएल हायदलोडे असं असतं.तो पोर्तुगालहून आलेला असतो आणि तो एक तत्त्वज्ञही असतो.जगभर भटकंती केल्याच्या खाणाखुणा त्याच्या एकूणच व्यक्तिमत्त्वावर पडलेल्या दिसत असतात. त्याच्याकडे बघताक्षणी तो ज्ञानी,बहुव्यासंगी असल्याचंही लक्षात येत असतं.


राफाएल हायदलोडेशी ओळख झाल्यावर थॉमस मोर,पीटर जायल्स आणि राफाएल हायदलोडे हे तिघं जण थॉमस मोरच्या घरी येऊन त्याच्या बागेत गप्पा मारत बसतात.गप्पांमधून राफाएल एक (अन्वेषक ) हिस्टॉरिकल एक्सप्लोरर असल्याचंही समजतं. तो जगातल्या अनेक ठिकाणी फिरल्यामुळे अनेक प्रकारचे लोक आणि अनेक प्रकारच्या संस्कृती यांच्याशी त्याचा जवळून संबंध आलेला असतो.याच प्रवासात त्याला युटोपियन्सबद्दल कळलेलं असतं आणि तो युटोपियातही जाऊन पोहोचतो.युटोपियाबद्दल तो थॉमस मोर आणि पीटर जायल्स यांना सांगायला लागतो तेव्हा ते दोघंही खूपच प्रभावित होतात.थॉमस मोर तर राफाएल हायदलोडेला तू राजपुत्राचा सल्लागार म्हणून काम करायला पाहिजेस,असं उत्साहाच्या भरात सांगतो.मात्र या गोष्टीवर हायदलोडे नापसंती दर्शवतो.राजपुत्राच्या हाताखाली काम करणारी यंत्रणा आणि ते लोक अहंकारी,आत्मलीन आणि भ्रष्ट असल्याचं तो सांगतो.

आपला त्यामागचा अनुभवही तो त्यांना सांगतो.

इंग्लंडमधली सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे,असं तो म्हणतो.त्याचबरोबर तिथल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावली जाते या गोष्टीकडे तो लक्ष वेधतो.


फाशी देऊन त्यांना संपवण्यापेक्षा त्यांच्यातल्या शक्तीचा कष्टप्रद कामासाठी योग्य उपयोग करून घेतला पाहिजे,असं तो म्हणतो.मात्र त्याच्या म्हणण्याकडे कोणीही त्या वेळी लक्ष दिलेलं नसतं.


युटोपिया बेटाबद्दल हायदलोडे माहिती सांगतो. या बेटाची राजधानी ॲमेरोट असते.तिथल्या लोकांचं वैयक्तिक मालकीचं काहीही नसतं. आपल्या जवळ असलेली सगळी साधनं, सगळ्या गोष्टी ते परस्परांमध्ये शेअर करत असतात.राहण्याच्या जागेपासून ते ब्रेड आणि वाइनपर्यंत सगळं काही ते एकमेकांमध्ये वाटून घेत असतात.खरं तर तिथे पैसा ही गोष्ट अस्तित्वातच नसते.तिथले लोक सोन्याचाही तिरस्कार करताना दिसतात.सोनं हा धातू कुठल्याही उपयोगाचा नाही,असं त्यांचं म्हणंन असतं.


युटोपियामधली कुटुंब मोठी असतात.प्रत्येक कुटुंबात कमीत कमी १०,तर जास्तीत जास्त १६ सदस्य असतात.

तिथली प्रत्येक व्यक्ती दिवसातले सहा तास काम करते,

तर काही व्यक्ती कामच करत नाहीत.ती सगळी माणसं फक्त खातात,पितात आणि आराम करतात पण त्यांना त्याबद्दल कोणी जाब विचारत नाही. अर्थात युटोपियामध्ये काही कायदे लागू असतात.एकदा गुन्हा केला तर तो माफ केला जातो,त्याबद्दल कुठली शिक्षा केली जात नाही. पण तोच गुन्हा पुन्हा दुसऱ्यांदा त्याच व्यक्तीकडून घडला तर मात्र त्याला शिक्षाच ठोठावली जाते.खूपच अक्षम्य गुन्हा घडल्यास तिथल्या लोकांना गुलामासारखी कामं सोपवली जातात आणि त्याना राबवून घेतलं जातं, तिथल्या मजिस्ट्रेट्सना फिलार्च म्हणतात.ते लोकांना चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहित करतात, मात्र त्याच्याकडून अयोग्य वर्तन झालं तर मजिस्ट्रेससाठीदेखील कायदे लागू होतात. युटोपियामधले कायदे,तिथली धोरणं,या समाजात बोकाळणारा भ्रष्टाचार आणि अयोग्य निर्णयप्रक्रिया तिथल्या नागरिकांना वाचवतात. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांसाठी युटोपियामध्ये शहरंदेखील राखून ठेवली असतात.


युटोपियामधल्या लोकांना युद्ध आणि लढाया यांचा तिटकारा असतो.ते शांतताप्रिय असतात.त्यांना जंगली जनावरांची झुंनदेखील आवडत नाही. मात्र आत्मरक्षणाची वेळ आली तर ते शस्त्र उचलण्यासाठी सज्ज होतात.


थोडक्यात, 'युटोपिया हा कल्याणकारी,आदर्श असा देश आहे.युरोपियन देशांमधल्या समस्येचं मूळ पैसा हे असून युटोपियामध्ये पैसाच नाही. त्यामुळे तिथे फार गंभीर अशा समस्याही नाहीत,'असं हायदलोंडे म्हणतो.युटोपियन लोकांसारखं जगणं आणि तिथली शांतता हायदलोडे युरोपातल्या इतर देशांमध्ये बघू इच्छितो,पण त्याच वेळी इतर ठिकाणी ते शक्य नाही हेही त्याला ठाऊक असतं.


खरं तर थॉमस मोरचा काळच वेगळा होता. कोलंबसन अमेरिकेचा शोध लावण्याअगोदर एकच वर्ष आधी आठव्या हेन्रीचा जन्म झाला होता.हेन्रीच्या भावाचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे हेन्रीचं लग्न त्याच्या भावजयीबरोबर हेन्रीच्या वडिलांनी लावलं.त्या वेळी समाजामध्ये श्रीमंत-गरीब अशी प्रचंड दरी होती.काही अतिश्रीमंत लोक वैभवात लोळत होते,तर काही लोक अतिगरिबी आणि कर्ज यात बुडालेले होते. त्यांना कर्ज फेडता आलं नाही तर थेट तुरुंगात टाकलं जात असे.

सर्वसामान्य माणसांना न्याय मिळणं खूप कठीण झालं होतं.न्यायव्यवस्थेत खूप भ्रष्टाचार होता.त्या वेळी कॅथलिक चर्च नेहमीच श्रीमंत वर्गाची बाजू घेत असे.तसंच हे चर्च ख्रिस्ताच्या तत्त्वांचे पालन करत नसल्यामुळे ते खूप भरकटलंही होतं.तत्कालीन युद्धामुळे इंग्लंडची अर्थव्यवस्थादेखील कमकुवत झाली होती. त्यावर उपाय म्हणून सरकारनं जनतेवरचे कर वाढवले होते. त्यामुळे लोकांमधला असंतोष जास्तच वाढत चालला होता.


या वेळी प्रबोधनकाळ (रेनेसान्स) उदयाला येत होता आणि अनेक कलांविषयी लोकांमध्ये खूपच रस निर्माण झाला होता. इटलीमध्ये सुरू झालेली प्रबोधनाची ही लाट इंग्लंडबरोबरच युरोपातल्या इतर देशांतही चटकन पसरली. 


इरॅस्मस,मायकल अँजेलो,लिओनार्डो दा व्हिंची अशी अनेक माणसे आपापल्या कला क्षेत्रात भरीव कामगिरी करत होती.


अशा स्थित्यंतराच्या काळात,युटोपिया लिहिणाऱ्या थॉमस मोरचा जन्म ७ फेब्रुवारी १४७८ या दिवशी लंडनमध्ये मिल्क स्ट्रीट इथे जॉन मोर आणि अँग्नेस ग्रँजर यांच्या पोटी झाला.थॉमस मोरचे वडील सर जॉन मोर यांनी सुरुवातीला काही काळ वकिली केली आणि नंतर न्यायाधीश म्हणून काम केलं होत.सहा भावंडांपैकी थॉमसचा क्रमांक दुसरा होता.त्याचे शालेय शिक्षण सेंट अँथनी स्कूल या त्या वेळच्या सर्वोत्कृष्ट शाळेत झालं.

शालेय शिक्षण संपल्यावर मोरनं ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला.तिथे शास्त्रीय शिक्षणाबरोबरच तो लॅटिन आणि ग्रीक भाषांमध्ये पारंगत झाला.आपल्या मुलानं आपल्याप्रमाणेच कायदेतज्ज्ञ व्हावं,अशी जॉन मोरची इच्छा असल्यामुळे थॉमस मोरनं कायद्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. धर्माकडे ओढा असल्यामुळे थॉमस मोर काही काळ लंडनजवळच्या एका मठामध्ये आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहिला.याच काळात मोरनं प्लेटोचं 'रिपब्लिक' आणि सेंट ऑगस्टाईन यांचं लिखाण वाचलं आणि तो त्या लिखाणामुळे प्रभावित झाला.मोर उत्तम लिहायचा आणि बोलायचा.त्याची हुशारी, तर्कशुद्ध विचारसरणी आणि त्याचा प्रामाणिकपणा यामुळे त्याची प्रगती खूप चट्कन झाली.त्याचं गणित आणि लॅटिन भाषेचं ज्ञान आणि त्याचं कर्तृत्व यांच्यामुळे त्याची इंग्लिश पार्लमेंटमध्ये लंडन शहराचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक झाली.याच काळात त्याच्या व्यक्तिमत्त्वानं आठवा हेन्री प्रभावित झाला आणि त्यानं १५२९ साली मोरची 'हाय चॅन्सलर' म्हणून नेमणूक केली.


खरं तर थॉमस मोर हा आठव्या हेन्रीचा एक विश्वासू सेवक आणि मित्र होता.त्यामुळे आपल्यापेक्षा बारा वर्षांनी मोठा असलेल्या मोरला राजा हेन्री अनेक गोष्टी सांगत असे.. मोरचे विचार राजाला पटायचे आणि त्यामुळेच मोरनं त्याचा सचिव आणि वैयक्तिक सल्लागार म्हणूनही काम बघितलं.कित्येकदा राजा हेन्री मोरच्या घरी जेवायलाही जात असे.मोरच्या बागेत दोघं फिरायला जात.त्या वेळी खगोलशास्त्र,कला आणि देवधर्म अशा अनेक गोष्टींवर ते बरेचदा चर्चाही करत.


काही काळानंतर थॉमस मोरनं सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगायचं ठरवलं. १५०५ साली थॉमस मोरनं

जेन कॉल्ट हिच्याशी लग्न केलं.त्यांना मार्गारेट,

एलिझाबेथ,सिसिली आणि जॉन नावाची चार मुलं झाली.मात्र काहीच काळात जेनचा मृत्यू झाला.आणि आपल्या मुलांचं संगोपन चांगलं व्हावं या दृष्टीने थॉमस मोरनं अँलिस मिडल्टन या तरुण विधवेशी दुसर लग्न केलं. लग्नाच्या वेळी अँलिसला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेली मुलगी होती आणि तिचा सांभाळही थॉमस मोरनं पिता म्हणूनच पुढे केला.राजा आठवा हेन्री आणि थॉमस मोर या दोघांची मैत्री अगदी घट्ट असली तरी राजा हेन्री अत्यंत पराकोटीचा स्वार्थी आणि आत्मकेंद्री स्वभावाचा असून तो आपल्या जवळच्या माणसाचाही कधीही घातपात करू शकतो याची मोरला खात्री होती.


एकदा सर थॉमसचा जावई त्यांच्या राजाबरोबरच्या मैत्रीचं कौतुक करायला लागला,तेव्हा थॉमस मोर त्याला म्हणाला,जर माझ डोकं उडवून राजाला एखादा किल्ला मिळणार असेल,तर तो माझा शिरच्छेदही करायला मागेपुढे पाहणार नाही.


त्याच वेळी आठव्या हेन्रीची धार्मिकताही थॉमस मोरला कळून चुकली होती.जेव्हा मोरची चॅन्सलर म्हणून नेमणूक झाली,तेव्हा हेन्रीन आपलं कॅथरीनबरोबरचं लग्न रद्दबातल करायचं ठरवलं होतं.कॅथरीन ही आठव्या हेन्रीच्याच भावाची बायको होती;पण लग्नानंतर १८ वर्ष झाली तरीही त्याला मुलगा झाला नव्हता आणि त्या वेळी इंग्लंडमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी त्याची राजवट म्हणजे वंश पुढे चालायला पाहिजे,असं हेन्रीचं मत होतं.

शिवाय त्याचं अँन बोलेन या मुलींवर प्रेम बसलं होतं. म्हणून हेन्रीला कॅथरीनपासून सुटका हवी होती.


हेन्रीनं सातवा पोप क्लेमेंट याच्याकडे लग्नाच्या रदबदलीबद्दल विनंती केली;पण हा पोप पाचव्या चार्ल्सच्या आधिपत्याखाली होता आणि हा चार्ल्स हा कॅथरीनचाच पुतण्या होता.यामुळे पोपनं कॅथरीनबरोबरचं लग्न रद्दबातल करायला नकार दिला.त्याबरोबर चिडून जाऊन हेन्रीनं स्वतःलाच चर्च ऑफ इंग्लंडचा प्रमुख म्हणून जाहीर घोषित केलं आणि रोमन चर्च पासून स्वतःला विभक्त केलं.या वेळी राजा हाच चर्चचाही सर्वोच असल्याची शपथ सगळ्यांना घ्यावी लागली.मोर तोपर्यंत इतका लोकप्रिय आणि प्रभावशाली झाला होता,की त्याची यासाठी संमती मिळवणं राजाला गरजेचं वाटलं; पण मोरला राजाचं वागणं आणि म्हणणं न पटल्यामुळे त्यानं तशी शपथ घ्यायला नकार दिला आणि १५ मे १५३२ या दिवशी त्यानं आपल्या चॅन्सलर पदाचा राजीनामा दिला.


अखेरच्या काळात आपलं उत्पन्न कमी झाल्यामुळे आपलं जीवनमानही त्याप्रमाणे बदलायचं आणि चेल्सी या आपल्या आवडत्या ठिकाणी उरलेलं आयुष्य काढायचं असं मोरनं ठरवलं होतं;पण तोपर्यंत तो इतका प्रसिद्ध झाला होता,की त्याचं शांत बसणं हेही हेन्रीला धोकादायक वाटायला लागलं. जेव्हा अँनच्या राज्याभिषेकाच्या समारंभाला मोर गैरहजर राहिला,तेव्हा राजा हेन्री खूपच चिडला होता.


थॉमस मोर हा कॅथलिक चर्चच्या बाजूने होता. प्रोटेस्टंट सुधारणावाद्यांचं बंड मोडून काढण्यात त्याचा सहभाग होता.त्याच्यावर लाचलुचपतीचे आरोप झाले.खरं तर त्यानं आपलं चॅन्सलरचं पद सोडल्यानंतर तो पूर्ण कफल्लक झाला होता. त्याच्याजवळ कुठलीही संपत्ती नव्हती.मोरनं राजाज्ञेचं पालन केलं नाही,असा आरोप मोरवर करण्यात आला.तसंच त्यानं शपथनाम्यावर स्वाक्षरी करावी म्हणून त्याच्यावर दबाव टाकण्यात आला;पण मोरनं कुठल्याच दबावाला भीक घातली नाही.


अखेर राजानं १७ एप्रिल १५३४ या दिवशी मोरला शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी टॉवरमध्ये पाठवण्यात आलं.त्याच्यावर या काळात अनेक आरोप हे झाले.मात्र आपल्यावरचे आरोप त्यानं फेटाळून लावले.'मी राजाचा आज्ञाधारक सेवक आहे,पण त्याआधी मी परमेश्वराचा सेवक आहे.'असं थॉमस मोरनं त्याला त्याची मृत्युदंडाची शिक्षा भोगण्यासाठी नेताना म्हटलं होतं. 


आठव्या हेन्री राजाला चर्चचा प्रमुख म्हणून जेव्हा नेमलं होतं.तेव्हा त्या शपथपत्रावर सही करायला नकार दिल्यामुळे थॉमस मोरला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.


थॉमस मोर स्वभावानं खूप विनोदी आणि मिश्कील होता.आपण नेहमी आनंदानं जगलं पाहिजे,अशी त्याची धारणा होती.त्याला एका टॉवरमध्ये बंदिस्त करून ठेवलं, त्याच्यावर प्रचंड शारीरिक अत्याचार करण्यात आले.त्याच्या मृत्युदंडाची वेळ जवळ येत असतानाही त्याचा आनंदी आणि विनोदी स्वभाव काही बदलला नाही. 


मृत्युदंडाच्या वेळी त्यानं जेव्हा आपलं डोकं त्या ब्लॉकवर ठेवलं,तेव्हाही त्यानं विनोद केला होता.तो म्हणाला,'तुमची कुऱ्हाड माझ्या दाढीला मात्र लावू नका;कारण तिनं काही राजद्रोह केलेला नाहीये.'त्याचे उद्गार ऐकून त्या मारेकऱ्याला हसावं की रडावं हेच कळेना!


आपल्या राजकीय कारकीर्दीत मोरचं मन सतत सतर्क होतं आणि त्यानं या काळात भरपूर लिखाण केलं.त्यानं प्रार्थना,कविता,पत्रव्यवहार आणि 'क्रॉनिकल ऑफ रिचर्ड','आपॉलॉजी' आणि 'डायलॉग्ज',असं बरंचसं लिखाणही केलं. या सगळ्यातून मोर एक प्रगल्भ मानवतावादी विचारवंत म्हणून वाचकाला भेटतो.


६ जुलै १५३५ या दिवशी थॉमस मोरचा मृत्यू झाला.जाताना आपल्या मागे आदर्श राज्याचं सुरेख स्वप्न दाखवणारं 'युटोपिया' मागे ठेवून गेला!


"युद्धाने मिळवलेल्या वैभवासारखं लज्जास्पद दुसरं काही नाही." - थॉमस मोर


पुढील भागात पाहू 'द प्रिन्स' - 

निकोलो मॅकियावेली ( १५३२ )