* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

५/३/२४

मी घेतलेली माघार..The retreat I took..|

दुसऱ्या दिवशी आम्ही लपत छपत भक्ष्याजवळ गेलो पण रात्री बिबळ्या तिथे परतलेला नाही हे कळल्यावर जरा निराशाच झाली कारण आदल्या दिवशी आमच्यापैकी एकाला उचलण्यात अपयश आल्यावर तरी तो भक्ष्याकडे परत येईल अशी आमची अपेक्षा होती.दिवसभर इबॉटसन त्याच्यासाठी पाठवून दिलेलं ऑफिसचं काम उरकत बसला तर मी रायफल घेऊन जरा आसपासच्या जंगलातून फेरफटका मारून यायचं ठरवलं.इथे जमीन जरा टणक होती,शिवाय पाईनच्या सुयांसारख्या पानांनी आच्छादली होती.त्यामुळे कुठेही माग मिळणं शक्य नव्हतं.ज्या डोंगरापलीकडे दाट जंगल आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.त्या डोंगरावरून कडेकडेने मी निघालो.इथेही शोध घेण्याचं काम अवघडच गेलं कारण तिथे दाट झुडुपं होती व पाऊल ठरू नये असे खोल कडे होते.पण ह्या भागात जनावरं मात्र पुष्कळ होती आणि जिथे जिथे पायवाटा ओलांडून जात होत्या तिथे मला भेकर,घुरल,रानडुक्कर किंवा एकट्यादुकट्या 'सराव'चे (पहाडी सांबर) ठसे मात्र दिसले.एक खूप जुना 'स्क्रेपमार्क' (जमीनीवर पायाने खरवडल्याच्या खुणा) सोडला तर बिबळ्याचा मात्र काही माग दिसला नाही. आमचं जेवण चालू असताना रुद्रप्रयागवरून पाठवलेला जिनट्रॅप येऊन पोचला.दुपारी आम्ही तो घेऊन भक्ष्या

जवळ गेलो.तिथे तो सापळा काळजीपूर्वक लावला आणि संपूर्ण मृतदेहामध्ये सायनाईड पेरून ठेवलं.मला किंवा इबॉटसनला या विषाचा कधीच अनुभव नव्हता.


नैनितालहून निघताना एका डॉक्टर मित्राशी माझी या संदर्भात थोडी चर्चा झाली होती.तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की त्या नरभक्षकाला मारण्यासाठी ते जे काही शक्य आहेत ते सर्व मार्ग वापरावेत अशी माझ्याकडून अपेक्षा आहे. पण या बिबळ्यावर विषाचा काही परिणाम होत नाही असं.आढळून आलेलं आहे.त्यावेळेला त्याने मला सल्ला दिला की मार्जार कुळातील सर्व जनावरांसाठी सायनाईड हे योग्य विष आहे त्यामुळे मी ते वापरून पाहावं.मी ही माहिती इबॉटसनला दिली होती आणि काही दिवस अगोदर सायनाइडच्या कॅप्सूल तिथे पोचल्याही होत्या,त्यातल्याच काही कॅप्सूल आम्ही बिबळ्याने खाल्लेल्या भागात पेरून ठेवल्या.


आज रात्री बिबळ्या तिथे येण्याची शक्यता होतीच पण काल त्याने आम्हाला भक्ष्याजवळ पाहिलं असल्यानं आम्ही जवळपास कुठेही बसायचं नाही असं ठरवलं.

पायवाटेजवळच पाईनचं एक मोठं झाड होतं.ते आम्ही निवडलं व त्यावरच एक ऐसपैस मचाण बांधलं.निळ्या ज्योतीच्या स्टोव्हवर इबॉटसनने बनवलेलं जेवण जेवल्यावर आम्ही मचाणावर गवताची गुबगुबीत गादी तयार करून त्यावर जागा घेतल्या.एकमेकांशेजारी चांगले पाय ताणून झोपून सिगरेट पिता येईल इतकं ते मचाण मोठं होतं. आज तरी आमचा उद्देश भक्ष्याच्या दिशेकडून येणाऱ्या आवाजाकडे लक्ष ठेवायचं एवढाच असल्याने ते शक्यही होतं.आम्ही आळीपाळीने पहारा देत राहिलो.

यावेळी सापळा लावण्यासाठी विशिष्ट अशी पायवाट नसल्याने बिबळ्या त्यात सापडेल अशी फक्त आशाच करणं आमच्या हातात होतं.रात्री एकदा एका भेकरांने अलार्म कॉल दिला खरा पण ज्या दिशेने बिबळ्या येईल असा अंदाज होता त्याच्या अगदी विरुद्ध दिशेकडून ! तांबडं फुटल्यावर आम्ही चहा करून प्यायलो.भक्ष्याला भेट दिली.तेव्हा ते आहे तसंच पडलं होतं.ब्रेकफास्ट लवकर उरकून इबॉटसनने रुद्रप्रयाग सोडलं.मी सामानाची बांधाबांध करून गावकऱ्यांशी निरोपाच्या गप्पागोष्टी करत होतो.तेवढ्यात त्या गावापासून चार मैलांवरच्या एका खेड्यात बिबळ्याने गाय मारल्याची खबर घेऊन काही माणसं आली.त्यांना संशय होता ही गाय नरभक्षक बिबळ्यानेच मारली असावी कारण आदल्या रात्री म्हणजे माझा व इबॉटसनचा पाठलाग केला होता त्या रात्री-अगदी पहाटेच्या सुमारास त्याने गावच्या मुखियाचं घर फोडण्याचा प्रयत्न केला होता.नंतर संध्याकाळी घरापासून शंभर यार्डावर जंगलात त्या गायीला मारण्यात आलं होतं. त्यांच्या विनंतीवरून मी परत एकदा नैनितालला जाणं लांबणीवर टाकलं व माझ्याबरोबर जिनट्रॅप आणि विषाच्या कॅप्सूल्स घेऊन त्यांच्या गावात गेलो.मुखियाचं घर शेतातल्या एका उंचवट्यावर बांधलं होतं व घराकडे जाणारी पायवाट काही अंतर मऊ चिखलासारख्या मातीवरून जात होती.

याच ठिकाणी मला बिबळ्याचे पगमार्क्स मिळाले.मी डोंगर चढून येत असतानाच मुखियाने मला पाह्यलं होतं व त्याने माझ्यासाठी गरम गरम ताज्या दुधाचा आणि भरपूर गूळ घातलेला चहा तयार ठेवला होता.


अंगणातच उभं राहून मी हा भरपूर गोड पण फर्मास चहा पित असताना मुखियाने माझं लक्ष दोन दिवसांपूर्वी घर फोडण्याच्या प्रयत्नात बिबळ्याने दरवाजाची जी अवस्था केली होती त्याकडे वेधलं.सुदैवाने छताच्या दुरुस्तीसाठी त्याने तासलेले काही ओंडके घरात आणून ठेवले होते आणि सुरक्षिततेसाठी ते दरवाजाला आतून लावले होते. मुखिया म्हातारा होता आणि संधिवाताचा पेशंट होता त्यामुळे त्याने गाय दाखवण्यासाठी त्याच्या पोराला माझ्याबरोबर पाठवलं आणि मधल्या काळात माझ्यासाठी व माझ्या माणसांसाठी त्याच्या घरातली एक खोली तयार केली.एकदम धडधाकट असलेली ती गाय मला गुरांच्या वाटेच्या जरा वर एका छोट्या सपाट जमीनीच्या तुकड्यावर पडलेली आढळली.यावेळची परिस्थिती जिनट्रॅप ठेवण्यासाठी आदर्श होती.गायींची पाठ जंगली गुलाबाच्या झुडपाला टेकली होती. तिचे पाय फूटभर उंचीच्या बांधाला तटले होते.पुढचे दोन पंजे गायीच्या पुढच्या मागच्या पायांच्या मध्ये ठेवून बांधावर बसून बिबळ्याने रात्री तिचं मांस खाल्लं होतं.गायीच्या पायांमधली जमीन खणून मी माती बाजूला ठेवली.

बिबळ्याने जिथे पंजे ठेवले होते त्या ठिकाणीच मी सापळा पुरला, त्यावर थोडी पानं आणि माती पसरून ठेवली आणि अगदी पूर्वीप्रमाणेच त्यावर वाळलेली पानं,काटक्या वगैरे टाकल्या.तिथे कोणीही आलं असतं तरी तिथे मी काही उद्योग करून ट्रॅप लावलाय हे त्याच्या लक्षात सुद्धा आलं नसतं.


हे सर्व मनासारखं झाल्यावर मी परतलो आणि भक्ष्य व मुखियाचं घर यांच्या मधोमध एका झाडावर चढून गरज लागेल तेव्हा भक्ष्याकडे पतरण्याच्या तयारीत बसलो.

कालीज फीझन्टची एक जोडी त्यांच्या पाच पिल्लांबरोबर काही वेळापासनं माझ्या झाडाखाली फिरत होती. मी त्यांच्याकडे बघत असतानाच अचानक त्यांनी कशाचं तरी सावट घेतलं आणि ते खाली दरीत उडत उडत गेलं.काही सेकंदानंतर एक भेकर माझ्या दिशेला पळत आलं माझ्या झाडाखाली उभं राहून काही वेळ भुंकल्यावर आलं तसं चवड्यावर पळत डोंगराकडे निघून गेलं.त्यानंतर विशेष काहीच झालं नाही. 


रायफलच्या साईट्ससुद्धा दिसू नयेत इतका अंधार झाडाखाली पडल्यावर भी खाली उतरलो आणि माझे रबरी तळाचे बूट घालून गावाच्या दिशेने निघालो. मुखियाच्या घरापासून शंभर यार्डावर ही पायवाट तीस यार्ड लांब व वीस यार्ड रुंद अशा मोकळ्या हिरवळीच्या तुकड्यावरून जात होती.या हिरवळीवर डोंगराच्या दिशेला एक मोठा खडक होता.इथे पोचल्यावर मला अचानक आतून जाणीव झाली की आपला पाठलाग होतोय ! या परिस्थितीचा मी उपयोग करून घ्यायचं ठरवलं.मऊ चिखलाच्या जमीनीवरून दोन लांब ढांगा टाकून मी त्या खडकाच्या मागे पोचलो.माझी नजर आता मी भक्ष्याच्या दिशेला केंद्रित केली.जवळ जवळ दहा मिनिटं मी त्याच स्थितीत होतो पण आता अंधार दाटून यायला लागल्यानं मी सर्व तऱ्हेची खबरदारी घेऊन मुखियाच्या घरात गेलो.रात्री केव्हातरी मुखियाने मला उठवलं व दरवाजावर ओरखडे काढण्याचा आवाज येत असल्याचं सांगितलं.दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडला तेव्हा समोर धुळीतच नरभक्षकांचे पगमार्क्स दिसले.त्याचा माग काढताना मला कळलं की मी काल संध्याकाळी जे जे केलं होतं ते ते त्यानंही केलं होतं.मी पायवाट ज्या ठिकाणी सोडली होती त्या ठिकाणी त्यानेही सोडली होती.मऊ जमीन ओलांडून खडकापाशी आला होता,

अगदी घरापर्यंत माझ्या मागे मागे आला होता.त्यानंतर त्याने घराभोवती बऱ्याच चकरा मारल्या होत्या.


घर सोडल्यानंतर त्याने परत पायवाट पकडली होती.जेव्हा मला दिसलं की ते माग भक्ष्याच्या दिशेने जातायत तेव्हा माझ्या आशा गगनाला भिडल्या कारण मला तोपर्यंत अंदाज आला नव्हता की माणसाबरोबरच्या आठ वर्षाच्या साहचर्यानंतर नरभक्षक बिबळ्या किती हुशार होऊ शकतो! आता मी पायवाट सोडली व थोडा उंचावरच्या भागाकडून भक्ष्याकडे निघालो.थोड्या अंतरावरून मला दिसलं की भक्ष्य गायब आहे.जिकडे मी ट्रॅप पुरला होता तिथली जमीन, त्याचे पगमास सोडले तर जशीच्या तशी होती!


पूर्वीप्रमाणेच याहीवेळी त्याने त्याचे पंजे गायीच्या पायाच्या मध्ये ठेवले होते पण यावेळेला त्याने एकमेकांपासून लांब ठेवले होते.बरोबर त्या ट्रॅपच्या लिवरवर! जर मध्ये ठेवले असते तर या लिवर्समुळे ह्या ट्रॅपचा जबडा बंद झाला असता.अशाप्रकारे सुरक्षित अवस्थेत त्याने खायला सुरुवात केली होती व नंतर भक्ष्याला वळसा घालून गायीचं डोकं तोंडात धरून तिला जंगली गुलाबाच्या काट्यांमधून काही अंतर ओढत नेऊन डोंगरावरून खाली दरीत ढकलून दिलं होतं.खाली काही अंतरावर ती गाय एका ओकच्या झाडावर तटून अडकली होती. कदाचित स्वतःच्या कामगिरीवर खूष होऊन आता त्याने परत गुरांची वाट पकडली होती. त्याच्या मागावर काही अंतर गेल्यानंतर मात्र यापुढे माग दिसेनासे झालें.


आता बिबळ्या भक्ष्यावर परत येण्याची आशा संपुष्टात आली होती.तरीही मनाचं समाधान म्हणून मी.त्या गायीच्या मृतदेहामध्ये भरपूर विषाचा डोस पेरून ठेवला.मी काल विषाचा उपयोग केला नव्हता;खरं सांगायचं तर विष वापरण्याची कल्पना मला त्याहीवेळी कधी भावली नव्हती आणि आजही आवडत नाही.


दुसऱ्या दिवशी भक्ष्याची तपासणी केल्यावर मला दिसलं की विष पेरलेलं सर्व भाग बिबळ्याने खाल्ला आहे.यावेळी हे काम नरभक्षकाचं नसून योगायोगाने तिथे आलेल्या दुसऱ्या बिबळ्याचं आहे याची मला इतकी खात्री होती की गावात परतल्यावर मी मुखियाला सांगितलं की आता मी इथे थांबत नाही,पण जर कोणाला या बिबळ्याचा मृतदेह सापडला आणि त्याची कातडी त्याने पटवाऱ्याला दिली तर मी त्या व्यक्तीला शंभर रूपये देईन.एक महिन्यानंतर या बक्षिसावर दावा सांगितला गेला व त्याची कातडी पटवाऱ्याने पुरून टाकली.


सामान पॅक करायला फार वेळ लागला नाही.दुपारीच आम्ही आमच्या नैनितालच्या दूरच्या प्रवासाला सुरुवात केली.चटवापिपल पुलाकडे जाणाऱ्या छोट्या पायवाटेवर असताना आमच्या समोरून एक धामण पायवाट ओलांडून गेली.मी तिच्याकडे बघत असताना माझ्या मागेच असलेला माधोसिंग मला म्हणाला, "ती बघा साहेब,तुमच्या अपयशाला जबाबदार असलेली सैतानी शक्ती आता इथून निघून जातेय."


गढवालच्या लोकांना नरभक्षकाच्या दयेवर जगण्यासाठी सोडून निघून जाण्याची माझी कृती तुम्हाला निर्दयी वाटेल.अगदी मलाही तसंच वाटत होतं,त्याचप्रमाणे वर्तमानपत्रांमधूनही यावर टीका झाली.कारण या बिबळ्याच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रामध्ये येत होत्या.पण मला हे सांगावसं वाटतं की अतिशय तणावाखाली फार काळ आपण टिकाव धरू शकत नाही.मी मागचे काही आठवडे गढवालमध्ये राहिलो,

दिवसभर मैलोन मैल जंगलं तुडवली,असंख्य रात्री जागून काढल्या,नरभक्षकाचा हल्ला झाल्याच्या बातम्यांचा पाठपुरावा करण्यासाठी गावागावातून तंगडतोड केली,आणि कित्येक रात्री अतिशय अवघडलेल्या स्थितीत काढल्या.आता मात्र माझ्या सहनशक्तीची मर्यादा संपली होती.जिथे नरभक्षकाच्या तावडीत सहज सापडू शकलो असतो अशा एकाकी ठिकाणी बसून बसून आता मला रात्रभरडोळे उघडे ठेवणंसुद्धा अशक्य होत चाललं होतं.

ज्या रस्त्यांवर फक्त तो आणि मीच असायचो अशा रस्त्यांवरून चालत असताना आतापर्यंतशिकलेल्या सर्व युक्त्या वापरून झाल्या होत्या.एवढं होऊन सुद्धा त्याला

नशिबाचं जबरदस्त वरदान मिळाल्यासारखं त्याने मला आतापर्यंत सतत हुलकावणी दिली होती.दुसऱ्या दिवशी सकाळी परत रस्ता तपासल्यानंतर पगमार्कसवरूनच समजायचं की काल माझा पाठलाग झालाय.भुकेल्या नरभक्षकाकडून आपला पाठलाग होणं ही घटनाच न्यूनगंड निर्माण करणारी असते. अशा त-हेने शरीराने आणि मनाने थकलेल्या अवस्थेत आता मी फार दिवस रेटणं हे गढवाली जनतेसाठी तर काही फायद्याचं ठरणार नव्हतंच पण कदाचित मलाही माझ्या जीवाची किंमत द्यावी लागली असती.


स्वतःहून ओढवून घेतलेलं हे काम तात्पुरतं थांबवलं तर आपल्यावर टीका होईल हे माहीत असूनसुद्धा माझा निर्णय योग्य आहे ह्याबद्दल मी ठाम होतो.त्यामुळेच संधी मिळताच मी परत येईन असं आश्वासन तिथल्या रहिवाशांना देऊन मी परतीच्या प्रवासाला लागलो.


१३.०१.२४ या लेखातील पुढील भाग..

३/३/२४

स्वतःला सांगणारी गोष्ट Something to tell yourself

आनंदी राजपुत्र


जॉन,माझ्या मनाला भावलेली एक गोष्ट मी तुला सांगतो.ही गोष्ट आहे एका पुतळ्याची आणि एका पाकोळीची.बऱ्याच जणांना ही एक बालकथा आहे असं वाटतं.ऑस्कर वाइल्ड यांनी ही गोष्ट लिहिली आहे.

कदाचित तूही ती याआधी वाचली असावीस.ही गोष्ट मी लहान असताना नव्हे,तर वयस्क झाल्यावर माझ्या वाचण्यात आली याचा मला खरंच खूप आनंद आहे.

अशा वेळी जेव्हा माझं मन संवेदना आणि ओलावा हरवत चाललं होतं आणि माझ्या हृदयाचा ताबा अहंकाराने घेतला होता.तू जर ही गोष्ट तुझ्या लहानपणी वाचली किंवा ऐकली असशील,तर आता मी सांगतो म्हणून पुन्हा एकदा वाचशील का? कारण ही बालकथा नाहीये.तर ही प्रेमाची सुंदर गोष्ट आहे.ही गोष्ट वाचली,की माझ्या डोळ्यांत पाणी येतं,पण हृदय मात्र आनंदानं ओसंडून जातं.ही गोष्ट मी तुला थोडक्यात सांगणार आहे.कारण पुढं तुला मी जे काही सांगणार आहे त्याच्याशी या गोष्टीचा अगदी जवळचा संबंध आहे.चल तर,त्या आनंदी राजपुत्राच्या आणि त्या पाकोळीच्या दुनियेतून एक फेरफटका मारून येऊया.


त्या नगराच्या मध्यभागी असलेल्या प्रशस्त चौकात एका उंच चबुतऱ्यावर आनंदी राजपुत्राचा पुतळा विराजमान झालेला होता. त्या पुतळ्याला डोक्यापासून पायांपर्यंत सोन्याचा पत्रा जडवलेला होता आणि पुतळ्याच्या डोळ्यांमध्ये मौल्यवान नीलम रत्नं बसवलेली होती.

त्याच्या तलवारीच्या मुठीमध्ये एक मोठ्ठा माणिक झळाळत होता.एके रात्री त्या नगरात एक पाकोळी उडत उडत आली.थंडी वाढण्याआधी स्थलांतर करावं या विचारानं त्या पाकोळीचे बाकीचे मित्र कधीचे निघून गेले होते. ते सगळे इजिप्तकडं गेले होते,पण ही पाकोळी चुकून मागं राहिली होती.उडत असताना पाकोळीला उंच चबुतऱ्यावरचा आनंदी राजपुत्राचा तो पुतळा दिसला आणि त्याच्या पायांमध्ये असलेल्या जागेत थोडा आराम करावा म्हणून पाकोळी खाली उतरली.


झोपी जाण्याआधी त्या पाकोळीनं चौफेर नजर फिरवली आणि डोळे मिटणार इतक्यात, पाण्याचा एक मोठा थेंब तिच्या अंगावर पडला. 'अरेच्चा! आकाशात एकही ढग दिसत नाही आणि आता पाऊस कुठून पडतोय?' तिनं डोकं वर केलं आणि बघते तर काय,त्या आनंदी राजपुत्राचे डोळे पाण्यानं भरले होते आणि त्याच्या सोन्याच्या गालांवरून अश्रू ओघळत होते.पाकोळीच्या मनात कळ उठली. राजपुत्राबद्दल तिच्या मनात कणव आली.


'तुम्ही कोण आहात?' पाकोळीनं विचारलं.


"मी आनंदी राजपुत्र आहे"


"पण तुम्हाला रडायला काय झालं?"


आनंदी राजपुत्र सांगू लागला,"जेव्हा मी जिवंत होतो तेव्हा अश्रू कशाला म्हणतात मला माहीतच नव्हतं. विशाल महालात मी लहानाचा मोठा झालो.तिथं दुःख कशाला म्हणतात हे कळलंच नाही कधी,लोकांच्या वेदना,त्यांची आर्तता माझ्यापर्यंत कधीच पोहोचली नव्हती. मी दिवसभर महालातल्या बगीच्यात सवंगड्यांबरोबर

हुंदडायचो आणि रात्री देखण्या, तरण्या मुलींबरोबर नाचगाणी चालायची. महालाभोवती एक प्रचंड भिंत होती आणि त्या भिंतीबाहेर वेगळं जग असू शकतं,ही जाणीव माझ्या मनाला कधीच शिवली नाही.जग केवळ सौंदर्यानं नटलेलं आहे असा माझा समज होता.


"सगळेजण मला आनंदी राजपुत्र म्हणायचे." तो पुढे म्हणाला "आणि खरंच मी खूप आनंदी होतो आणि जीवनाची भरपूर मजा घेत होतो.माझं सगळं आयुष्य मजामस्ती करण्यातच संपून गेलं. माझ्या मरणानंतर मला आता हे उच्चासन मिळालं आहे.इथून मला माझ्या देशातल्या प्रजेची दुःखं,त्यांच्या वेदना,त्रास,गरिबी, उपासमारी सगळं काही दिसतं.माझं हृदय शिशाचं आहे.

त्याचा भावनांशी संबंध असता कामा नये.पण तरीही मला रडू येतंच." "इथून थोड्या अंतरावर,"आनंदी राजपुत्र पुढं सांगू लागला,"एका गल्लीमध्ये एक मोडकळीला आलेलं घर आहे.त्या घराची एक खिडकी उघडी आहे.त्या खिडकीतून मला एक स्त्री खुर्चीवर बसलेली दिसते आहे.

तिचा निस्तेज चेहरा काळजीनं आणखीनच काळवंडला आहे.त्या खोलीच्या कोपऱ्यातल्या खाटेवर तिचा आजारी मुलगा मला दिसतो आहे.तो तापानं फणफणला आहे.

आणि त्याला खायला मोसंबी हवी आहे. पण त्याच्या त्या गरीब बिचाऱ्या आईजवळ त्याला द्यायला भाताच्या पेजेशिवाय दुसरं काहीही नाहीये.ते पोर रडत आहे."


"पाकोळी,माझी चिमुकली सखी,तू माझ्या तलवारीच्या मुठीतला हा माणिक त्या गरीब स्त्रीला नेऊन देशील का? माझे पाय या चबुतऱ्याला जोडले आहे,नाहीतर मी स्वतःच गेलो असतो गं."माझे मित्र इजिप्तमध्ये माझी वाट बघत असतील." पाकोळी उत्तरली, "ते सगळे नाईल नदीवर लिलीच्या मोठमोठ्या फुलांभोवती छान घिरट्या घालत असतील."पाकोळी,पाकोळी,माझी चिमुकली सखी," आनंदी राजपुत्र म्हणाला,फक्त एक रात्र इथं थांबून मला मदत करशील का? ते पोर भुकेनं व्याकूळ झालं आहे आणि त्याची आई काहीच करू शकत नाहीये.आनंदी राजपुत्राची ती तळमळ,त्याचं दुःख बघून पाकोळीला खूप वाईट वाटलं.इथं थंडी वाढते आहे.पाकोळी म्हणाली, 

पण मी एक रात्र इथं थांबून तुमचं हे काम नक्कीच करू शकते.तुझे खूप खूप आभार सखी,आनंदी राजपुत्र म्हणाला.पाकोळीनं तलवारीच्या मुठीतला तो मोठ्ठा माणिक चोचीत पकडला आणि अंधारात त्या नगरामधून, घरांच्या कौलांवरून उडत ती दिसेनाशी झाली. जेव्हा पाकोळी त्या मोडकळीला आलेल्या घराजवळ पोहोचली तेव्हा त्या स्त्रीचा डोळा लागला होता.झटकन् खिडकीतून आत शिरत पाकोळीनं तो माणिक तिच्यासमोर,टेबलावर ठेवला आणि पाकोळी तिथून उडून गेली.


परत आल्यावर पाकोळीनं राजपुत्राला घडलेला वृत्तान्त सांगितला.आणि मग ती पाकोळी शांत झोपी गेली.

सकाळी उठल्यावर पाकोळी राजपुत्राला म्हणाली,

इजिप्तमध्ये मी करण्यासारखं तुमचं काही काम असेल तर सांगा,मला आता पटकन् निधायला हवं.पाकोळी,

पाकोळी,माझी चिमुकली सखी,आनंदी राजपुत्र म्हणाला,तू अजून एक दिवस थांबलीस तर खूप बरं होईल.माझे मित्र इजिप्तमध्ये माझी वाट बघत असतील,पाकोळी म्हणाली,उद्या ते नाईलचा दुसरा धबधबा पार करून जातील.


पाकोळी,पाकोळी,माझी चिमुकली सखी,आनंदी राजपुत्र म्हणाला,नगराच्या दुसऱ्या टोकाला इथून बरंच लांब,एका घराच्या पोटमाळ्यात मला एक तरुण दिसतो आहे.तो थंडीनं गारठला आहे. त्याच्याजवळ आग पेटवायला लाकडं नाहीयेत आणि खायला अन्नही नाहीये.भुकेनं व्याकूळ झालेला त्याचा चेहरा मला बघवत नाहीये.


"ठीक आहे मी थांबते अजून एक रात्र,पाकोळी म्हणाली,त्याला पण माणिक नेऊन द्यायचा आहे का?आनंदी राजपुत्र म्हणाला,अरेरे पण माझ्याजवळ तेवढा एकच माणिक होता.आता माझे हे डोळे शिल्लक आहेत.

हजारो वर्षांपूर्वी भारतातून आणली गेलेली ही मौल्यवान नीलम रत्नं आहेत.त्यातलं एक तू काढ आणि त्या तरुणाला नेऊन दे.म्हणजे तो ते रत्न जवाहिऱ्याला विकेल आणि आलेल्या पैशातून स्वतःसाठी अन्न आणि शेकोटीत घालायला लाकडं खरेदी करू शकेल.


नाही राजकुमार,मी असं अजिबात करणार नाही,पाकोळी रडू लागली.


पाकोळी,पाकोळी, माझी चिमुकली सखी, राजपुत्र म्हणाला,मी सांगतोय तसं कर,मी विनंती करतो तुला.

पाकोळीनं राजपुत्राच्या डोळ्यातून नीलमचा मौल्यवान खडा काढला आणि त्या तरुणाच्या दिशेनं भरारी घेतली.

परत येऊन पाकोळी राजपुत्राच्या खांद्यावर विसावली.

आणि ती राजपुत्राला तिनं आधी बघितलेल्या निरनिराळ्या देशांतल्या गमतीजमती सांगू लागली.माझी चिमुकली सखी,पाकोळी,राजपुत्र म्हणाला,तू मला खूप छान छान गोष्टी सांगितल्यास.पण सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट असते गरिबी,लोकांचं असहाय्य असणं,यापेक्षा मोठं कोडं कोणतंच नसतं.पाकोळी,लाडके,तू या नगरावरून एक फेरफटका मार आणि तुला जे काही दिसेल ते मला येऊन सांग.पाकोळी नगरावरून उडू लागली.तिनं अगदी काळोख्या,अरुंद गल्ल्यांचा फेरफटका मारला. सुतकी चेहऱ्याची लहान लहान पोरं भकास नजरेनं इकडंतिकडं बघत बसलेली तिला दिसली.एका पुलाच्या कमानीखाली काही मुलं ऊब मिळावी म्हणून एकमेकांना बिलगून झोपलेली तिला दिसली.ती मुलं कण्हत होती, रडत होती,

भूक लागली आहे,खायला हवं आहे,तिथला पहारेकरी मात्र त्यांच्यावर खेकसत होता, ए निघा,ही झोपायची जागा नाही.निघा इथून,मग ती मुलं पावसात दिसेनाशी झाली.परत जाऊन पाकोळीनं राजपुत्राला तिनं बघितलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या.आनंदी राजपुत्र म्हणाला,माझ्या पूर्ण शरीरावर सोन्याचा जाड पत्रा जडवलेला आहे.तुला जमतील तसे त्याचे तुकडे काढ आणि ते त्या बिचाऱ्या पोरांना,तुला दिसतील त्या गरिबांना नेऊन दे.पाकोळीनं तुकड्या-तुकड्यानं त्या पुतळ्यावरचं सगळं सोनं काढलं आणि गरिबांमध्ये वाटून टाकलं.आता राजपुत्राचा पुतळा पूर्ण उघडा, इतर पुतळ्यांसारखा सामान्य दिसत होता. पाकोळीनं वाटलेल्या सोन्यातून गरिबांनी पोटासाठी अन्न खरेदी केलं.पोराबाळांच्या चेहऱ्यांवर पुन्हा हसू उमटलं आणि भरल्या पोटानं ती रस्त्यांवर बागडू लागली.


पाकोळी राजपुत्राजवळ परतली आणि म्हणाली, राजकुमार,आता मी तुमचा निरोप घेते आहे.आनंदी राजपुत्र म्हणाला,पाकोळी,पाकोळी, माझी चिमुकली सखी,तू आणखी एक रात्र थांबलीस तर फार बरं होईल.

तिथं पुढच्या चौकात एक आगकाड्या विकणारी मुलगी उभी आहे.तिच्या आगकाड्या डबक्यात पडल्या आणि भिजून एकदम खराब झाल्या आहेत.जर तिला पैसे कमावता आले नाहीत तर तिचे वडील तिला खूप मारतील आणि ती रडेल.तिच्या पायात बूट नाहीत,मोजे नाहीत आणि बिचारी उपाशीही आहे.माझा हा दुसरा डोळा काढ आणि तिला नेऊन दे म्हणजे तिची मार खाण्यापासून सुटका होईल.तुम्ही म्हणत असाल,तर अजून एक रात्र मी तुमच्याजवळ थांबते,पाकोळी म्हणाली,पण दुसरा डोळा काढायला मला जमणार नाही. तुम्ही ठार आंधळे होऊन जाल,पाकोळी, पाकोळी,माझी चिमुकली सखी,राजपुत्र

म्हणाला,मी सांगतोय तसंच कर. (THE LOVE RUMI KNEW या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद,रुमी:आनंदघन-

सेरदार ओस्कान,अनुवाद-प्रमोद नाईक,मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे)


पाकोळीनं राजपुत्राचा दुसरा डोळा काढला आणि त्या चौकाकडे भरारी घेतली.त्या आगकाड्या विकणाऱ्या लहान मुलीचा पाकोळीला खूप राग आला होता,रागातच तिने ते मौल्यवान रत्न त्या मुलीच्या हातात ठेवलं.मग पाकोळी राजपुत्राकडं परत आली.आता तुम्ही आंधळे झाला आहात,पाकोळी राजपुत्राला म्हणाली,"आता मी तुमची साथ कधीच सोडणार नाही.नको,माझी चिमुकली सखी, जा तू,राजपुत्र म्हणाला, आता तू इजिप्तला निघून जावंस.नाही,मी तुमच्या जवळच राहाणार,पाकोळी निश्चयानं म्हणाली आणि राजपुत्राच्या पायाजवळ विसावली.


थोड्याच वेळात तिथं बर्फ पडायला सुरुवात झाली आणि आसमंत गारठून निघाला.बिचारी पाकोळी थंडीनं पार गारठून गेली होती,पण तिच्या लाडक्या राजपुत्राला सोडून जाणं तिला अजिबात मान्य नव्हतं.पाकोळीचं राजपुत्रावर खूप प्रेम होतं.आपल्या पंखांची फडफड करत ती कशीबशी स्वतःला ऊब द्यायचा प्रयत्न करू लागली.पण आता फार काळ तग धरणं शक्य नाही हे पाकोळीला माहीत होतं.आता एकदाच, शेवटचं,तिच्या लाडक्या राजपुत्राच्या खांद्यावर जाऊन बसण्याइतकीच ताकत तिच्या अंगात उरली होती.पाकोळी मोठ्या कष्टानं राजपुत्राला म्हणाली,अलविदा,राजकुमार,मी तुमच्या हाताचं चुंबन घेतलं तर चालेल का?"


अरे वा,माझी चिमुकली सखी,तू इजिप्तला जायचं नक्की केलंस तर!आनंदी राजपुत्र म्हणाला,मी खूप खूश आहे.तू इथं थांबून माझी खूप मदत केली आहेस.खरं तर तू माझ्या ओठांचं चुंबन घेतलं पाहिजेस कारण तू मला खूप आवडतेस,हो,मी चालले आहे,पाकोळी म्हणाली,पण इजिप्तला नव्हे,मी चालले आहे मृत्यूच्या गावाला,आणि मृत्यू म्हणजे निद्रेचंच दुसरं रूप म्हणायचं,बरोबर ना?


तिनं आनंदी राजपुत्राच्या ओठांचं चुंबन घेतलं आणि त्याच्या पायांशी कोसळली,शेवटची.


अगदी त्याच क्षणी ते आश्चर्य घडलं,आनंदी राजपुत्राच्या पुतळ्यामधून काही तरी तुटल्यासारखा आवाज आला.शिशापासून बनलेलं त्याचं हृदय,त्याचे दोन तुकडे झाले होते.


दुसरा दिवस उजाडला.त्या नगराचे नगराध्यक्ष आणि पालिकेचे अधिकारी त्या चौकातून चालले होते.

चबुतऱ्यासमोरून जाताना नगराध्यक्षांनी त्यांच्या बग्गीचा पडदा उघडून आनंदी राजपुत्राच्या पुतळ्याकडं पाहिलं.

अरे देवा,आनंदी राजपुत्राच्या पुतळ्याची इतकी दुर्दशा कशी काय झाली? ते उद्‌गारले,तलवारीतला माणिक निखळला आहे.डोळे गायब आहेत आणि सोन्याचा कणसुद्धा शिल्लक नाहीये, याची अवस्था एखाद्या भिकाऱ्यासारखी कशी काय झाली?कला शिकवणारे प्राध्यापकही सोबत होते.त्यांनी मुक्ताफळं उधळली, तसूभरही सौंदर्य उरलं नाहीये याच्यात.आता काय उपयोग या पुतळ्याचा?"


मग सर्वानुमते असं ठरवण्यात आलं,की आनंदी राजपुत्राचा तो पुतळा पाडायचा आणि तो निरुपयोगी धातू वितळवून त्याचा कुठं तरी वापर करायचा.


किती अद्भुत आहे हे,फौंड्रीचा मुकादम म्हणाला,हे तुटलेल्या हृदयाचं शिसं फौंड्रीत वितळत नाहीये.हे टाकून दिलेलंचं बरं,म्हणून त्यानं ते कोंडाळ्यात फेकून दिलं.तिथंच त्या पाकोळीचं कलेवर पडलं होतं.या नगरातल्या सर्वांत मौल्यवान दोन गोष्टी मला आणून दे.देवानं त्याच्या जवळच्या दूताला आज्ञा दिली.त्या देवदूतानं राजपुत्राचं ते शिशाचं हृदय आणि पाकोळीचं कलेवर उचललं आणि देवाकडं नेऊन दिलं.अगदी योग्य निवड केलीस,देव म्हणाला, आता माझ्या स्वर्गीय उद्यानात हा पक्षी सदैव गात राहील आणि या सुवर्णनगरीत आनंदी राजपुत्राचा सदैव गौरव केला जाईल.


समजलं ना जॉन,माझ्या प्रिय मित्रा,त्या पाकोळीला जिवंत राहण्यापेक्षा आनंदी राजपुत्राची सोबत जास्त महत्वाची वाटली. त्याच्यावर असलेल्या प्रेमासाठीच पाकोळीनं मरणालाही आनंदानं मिठी मारली.आनंदी राजपुत्राचं प्रेमसुद्धा तितक्याच ताकदीचं होतं. पाकोळीचा विरह सहन न झाल्यानं राजपुत्र अक्षरशः तुकडे तुकडे होऊन गेला.


मला त्या आनंदी राजपुत्राचा पुतळा हे अहंकाराचं स्मारक होतं असंच वाटत आलंय. पण त्या अहंकारातसुद्धा प्रभूचं तेज वसलेलं होतं.तो प्रेमळ आणि दयाळू तर होताच,पण त्याची दयाबुद्धी आणि प्रेम प्रत्यक्षात उतरायला एका पाकोळीचं त्याच्या आयुष्यात येणं गरजेचं ठरलं.तसंच आपल्या अंतरात वसलेलं प्रेम उफाळून येण्यासाठी,

आपल्या प्रेमाच्या ताकदीनं कुणी तरी आपल्याही अहंकाराच्या चिंधड्या उडवणं गरजेचं ठरतं. 

१/३/२४

बिश्नोईंची शांतिगाथा..Bishnoinchi Shantigatha..|

आधुनिक भारतात असेच ओकचे लोकांना हवेहवेसे जंगल,वनविभाग आणि व्यापारी कंपन्यांपासून वाचवायला गढवालात चिपको सत्याग्रह केला गेला.

त्यात कोणी मृत्युमुखी पडले नाही,पण त्याच्या आधी अडीचशे वर्षे दुसऱ्या एका चिपकोत ३६८ निसर्ग

भक्तांनी प्राणार्पण केले होते.ही घटना घडली होती वैराण मारवाडात.ह्या रेती - कंकराच्या मुलूखात आज पाहायला मिळते खुरटे गवत,काटेरी झुडपे आणि तुरळक कोठे बाभळी-बोरींची झाडे असलेली माळरानेच्या माळराने.दिवसाच्या रणरणीत उन्हात एक सबंध माणूस मावेल एवढीही सावली सापडणे मुश्कील,तर सबंध उंट आरामात पाय पसरू शकेल अशा सावलीची कल्पनाही करता येत नाही.पण या मारवाडात अशीही काही गांवे आहेत की ज्यांच्या आसपास खेजडीचे अनेक वृक्ष फोफावलेले आहेत.

ही बाभळीसारखी खेजडी म्हणजे वाळवंटातला कल्पवृक्ष आहे.याच्या सावलीत एकेक सबंध उंट झोप काढू शकतो.यांच्या पाल्यावर गायी,शेळ्या -

मेंढ्या,उंट पोसले जातात,आणि याच्या शेंगांची भाजी मोठी रुचकर असते.शिवाय खेजडीच्या काट्यांनी शेतांची कुंपणेच्या कुंपणे बनवली जातात.


कोणे एके काळी मारवाडच्या वाळवंटाने आजच्यासारखे पाय पसरले नव्हते.जरी पाऊस अगदी कमी होता तरी इथल्या माळरानांवर खेजडीची झाडे अमाप होती.आणि शिवाय होत्या चिक्कार बोरी,केर,सांगरी,या रानांत काळवीट,चिंकारे,नीलगायी विपुल होत्या आणि त्यांची शिकार करून राहायचे भिल्ल लोक, हजारो वर्षे त्यांचा हा जीवनक्रम चालला होता. बोरी-केरांना रुचकर फळे यायची,खेजडीला भरपूर शेंगा लगडायच्या,शिकार रगड होती. खावे-प्यावे आडदांडपणे राहावे असा सिलसिला हजारो वर्षे चालला होता.पण मग सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी मध्य आशियातून माणसांचे लोंढेच्या लोंढे यायला लागले. हे होते मुख्यतः गुराखी,यांतील अनेक जाट आणि राजपूत हळूहळू मारवाडात पसरले.भिल्लांशी भांडत-तंडत हातपाय पसरू लागले.तसा मुलूखही भरपूर होता.

फारसा काळजीचा प्रश्न नव्हता.मारवाडची आबादी वाढत चालली.पण शतकामागून शतके जशी गेली तसा या प्रचंड गुरांच्या कळपांचा प्रभाव मारवाडातल्या झाडा-झुडपांवर जाणवू लागला. हळूहळू त्यांची पैदास कमी झाली.

त्याबरोबरच जाट-राजपुतांच्या कुन्हाडींनी जुनी झाडे तुटत राहिली.दिवसेंदिवस मारवाडचे जंगल ओसाड होऊ लागले आणि आदिवासी-भिल्लांची सद्दी संपुष्टात येऊ लागली.शेवटी तेराव्या शतकात कनोजच्या राठोडांनी भिल्लांचा पराभव करून मारवाडात आपले राज्य स्थापन केले. त्यांच्याबरोबर आलेले राजपूत सर्वत्र पसरले.


इसवीच्या पंधराव्या शतकापर्यंत राठोडांचे राज्य मारवाडात पक्के पाय रोवून होते.त्यांच्यातल्या एका पराक्रमी राजाच्या राव जोधाजीच्या कारकिर्दीत एक असाधारण पुरुषाचा जन्म झाला.त्याचे नाव होते जम्बाजी.पिपासर गावात क्षत्रिय परमार कुलात ठाकूर लोहटाच्या घरी, हंसादेवीच्या पोटी इसवी सन १४५१ मध्ये जंबाजींचा जन्म झाला. ठाकूरजी होते ग्रामपती, व्यवसायाने शेतकरी आणि पशुपालक,शेतीवर भर

कमीच,कारण घरात ४०-५० गायी होत्या. वयाच्या सातव्या वर्षापासून जम्बाजी गुरांमागे होता.रानात जावे,

गुरे वळावी,आरामात झोपावे, आणि आजूबाजूला फिरणाऱ्या काळविटांच्या झुंडीच्या झुंडींची मौज पहावी- मस्तीला आलेले काळे नर कसे झुंजतात हे पाहण्याची तर फारच मजा! वर्षांमागून वर्षे गेली.जम्बाजी पंचवीस वर्षांचा झाला आणि सबंध मुलखावर संकट आले.थोडा का होईना,पण नियमित पडणारा पाऊस येईनासा झाला.

पहिल्या वर्षी घरात साठलेला थोडा कडबा होता,गुरे निभावून गेली. दुसऱ्या वर्षी तसेच अवर्षण,गुरांना चरायचे भयंकर हाल.गवताचे पान नाही.जी काय थोडी झाडे होती,ती ओरबाडून - ओरबाडून पाला खायला घातला.

पण उपाशीपोटी गुरांची दशा बघवेना,असा दुष्काळ एक नाही दोन नाही, तब्बल आठ वर्षे चालला.सर्वत्र हाहाकार झाला. ओरबाडून-ओरबाडून उरलेली सुरलेली झाडे सतत निष्पर्ण राहिली गेली.एकामागून एक ती सुकून गेली.

साठवलेला दाणा संपला.लोकांनी खेजडीच्या शेंगांवर,

बोरांच्या बियांच्या पिठावर गुजारा चालवला.पण तेही मिळेनासे झाले तशी सांगरीच्या झाडांची साल सोलून कुटून खायला लागले.मग उरलीसुरली सांगरीची झाडेही मेली.भुकेल्या लोकांनी भुकेल्या काळविटांचा फडशा पाडला आणि मग शेवटी काही निभेना तशी ते मुलूख सोडून निघून गेले.


नऊ वर्षांत सत्यानाश झाला.एक झाड - एक गुरू-एकही काळवीट दिसेनासे झाले.केवळ ठाकुरांसारखे तोलदार लोक,घरात बाजरीच्या कणगीच्या कणगी भरलेल्या होत्या म्हणून कसेबसे टिकून राहिले.जंबाजीच्या आजोबांच्या लहानपणीही असाच दुष्काळ पडला होता.पण ते म्हणायचे की,असे हाल झाले नाहीत.तेव्हा गवत सुकून गेले तरी खेजडी अमाप होती.तिच्या पाल्यावर तब्बल सहा वर्षे गुरे जगून राहिली.तिच्या शेंगांवर माणसांनी जीव धरला. पण असा कल्पवृक्ष दोन पिढ्यांत नाहीसा होत गेला होता आणि जंबाजीच्या डोळ्यांदेखत तर त्याचे बेणेच संपुष्टात आले होते.


जंबाजीच्या संवेदनशील मनावर या दुष्काळाचा अतोनात परिणाम झाला.रात्र-न् रात्र तो आजूबाजूच्या लोकांचे - गुरांचे हाल बघत तळमळत राहिला आणि शेवटी वयाच्या चौतिसाव्या वर्षी त्याला दृष्टांत झाला.निसर्गाशी भांडून,त्याच्यावर अत्याचार करून माणूस मस्तीत राहात होता.निष्पाप काळविटांची हत्या करून, दारू पिऊन,अफूच्या धुंदीत सारे जग बरबाद करीत होता.


 जंबाजीने हे सगळे बदलायचे ठरवले.हे अवर्षण हटल्यावर जर मारवाडात पुन्हा आयुष्य उभे करायचे असेल,तर माणसाला बदलायला हवे होते.या पृथ्वीवर पुन्हा खेजडी-बोर-केर-सांगरीचे आच्छादन करायला हवे होते. पुन्हा काळवीट वाचवायला हवे होते.इसवी सन १४८५ मध्ये जंबाजीने आपला संदेश जगाला दिला.


त्याच्या संदेशात २९ मूलभूत नियम होते.आणि त्यातले दोन मुख्य होते : हिरवे झाड केव्हाही तोडू नये आणि प्राणिहत्या केव्हाही करू नये.जंबाजीचा भूतदयेचा आणि मानवतेचा संदेश कोणावर काहीही जबरदस्ती न करता फैलावत चालला. 


जाट, राजपूत, ब्राह्मण त्यांच्या पंथात मोठ्या प्रमाणात सामील झाले.आयुष्याची पुढची ५१ वर्षे जम्भेश्वरांनी मननात,चिंतनात आणि आपल्या संदेशाचा प्रसार करण्यात घालवली. दिल्लीच्या सिकंदर लोदीला भेटून गोहत्या बंद करवली.आणि शेकडो खेड्यांत आपल्या अनुयायांमार्फत पृथ्वीला पुन्हा हरित वस्त्रांनी पांघरण्याचे काम चालू ठेवले.जम्भेश्वरांनी २९ नियम घालून दिले म्हणून त्यांच्या अनुयायांनी नाव पत्करले - बिश्नोई - बीस और नौई.त्यांनी आपल्या खेड्यांभोवती वृक्षवल्ली जपल्या, काळवीट, चिंकारा, नीलगायी,मोर आणि सर्व पशुपक्ष्यांना आसरा दिला. हळूहळू त्यांची खेडी,त्यांच्या जमिनी वृक्षाच्छादित होत राहिल्या. त्यांच्या गुरांना पुन्हा भरपूर चारा मिळू लागला.जमिनीचा कस वाढू लागला.

बिश्नोई सुस्थितीत आले.मारवाडातून त्यांचा पंथ राजस्थानाच्या इतर प्रदेशात,मध्य प्रदेश हरयाणांत पसरला.इतरत्र मात्र पूर्वीचीच गती चालू होती.वाळवंट पसरत होते,माळरान आणखीच रखरखीत होत होते.

लोकांना कळत नव्हते असे नाही,पण वळत मात्र नव्हते.

राठोड राजांच्या अनेक पिढ्या गेल्या.त्यांचे स्वातंत्र्य जाऊन ते मोगलांचे मांडलिक झाले.जोधपूर स्थापणाऱ्या जम्भेश्वरांच्या समकालीन,राव जोधाजीच्या वंशातल्या आठ पिढ्या गेल्या आणि महाराज अजितसिंग गादीवर आले.अजितसिंग औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्यांच्या महापराक्रमी बापाच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी जन्मले होते.औरंगजेबाने त्यांना पकडायला जंग जंग पछाडले;परंतु त्यांच्या निष्ठावंत सेवकांनी त्यांना वाचवून वाढविले.शेवटी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी जोधपूरची गादी पुन्हा मिळवली. 


पण त्या धामधुमीच्या काळात एका क्षणाचीही उसंत मिळाली नाही.सतत लढायांना तोंड देत देत त्यांनी गादी राखली.आयुष्याच्या शेवटी इसवी सन १७३० मध्ये त्यांनी जोधपूरला एक मोठा राजवाडा बांधायचा ठरवला.

जोधपूरच्या सुंदर लाल दगडांचा राजवाडा.तो बांधायला चुना हवा.तसा चुना या प्रदेशात भरपूर आहे.पण एवढ्या चुन्याची कळी करायला भरपूर जळण हवे.आता या वाळवंटात एवढ्या प्रचंड भट्टीसाठी जळण पैदा करणे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती.पण अजितसिंग महाराजांच्या सुदैवाने जोधपूरपासून सोळाच मैलांवर बिश्नोई लोकांची मोठी वस्ती होती.जवळजवळ अडीचशे वर्षांपूर्वी या लोकांनी जम्भेश्वरांचा मार्ग पत्करला होता आणि त्याच्या गावापाशी शेकडो खेजडीची झाडे वाढविली होती.त्यातल्या खेजडली गावाजवळ चुन्याच्या खाणीही होत्या. झाले! दिवाणांचा हुकूम निघाला,

'खेजडली गावी चुन्याच्या भट्ट्या सुरू करा आणि महाराजांच्या राजवाड्याचे बांधकाम चालू करा.' कामगार हजर झाले. कुऱ्हाडी घेऊन निघाले. पण काय ! बिश्नोई त्यांना आडवे आले.आम्ही जतन केलेली खेजडीची झाडे तोडायची नाहीत.ते आमच्या धर्माविरुद्ध आहे.कामगार परतले.राजवाड्यात निरोप गेला,दिवाणसाहेब गरम झाले.

काय ही मग्रुरी ! ते स्वतः जातीने घोडेस्वार घेऊन आले. कामगारांना हुकूम केला, बिश्नोईंचे काही ऐकू नका.झाडे तोडा.' कामगार सरसावले.सारा गाव गोळा झाला.

विनवण्या करू लागला.आमचा धर्म तुडवू नका.आमच्या पिढ्यान् पिढ्यांनी जतन करून ठेवलेली वृक्षसंपदा नासू नका.दिवाण म्हणाला,काही चालणार नाही,घाव पडणारच. पण गावात होती एक रणचंडी.बिश्नोई रामखोडची बायको अमृतादेवी.ती म्हणाली, झाड तुटेल आम्ही तुटल्यावरच,आधी नाही.तिने आणि तिच्या तीन मुलींनी झाडांना मिठ्या घातल्या.म्हणाल्या, तोडा हवे तर.दिवाण गरजला,बघता काय? घाव घाला. कुऱ्हाडीचे

घाव पडले.चौघींचे झाडासकट तुकडे उडाले. साऱ्या गावकऱ्यांना उचंबळून आले.त्यांनी झाडा-झाडाला मिठ्या घातल्या.बायका- मुले-पुरुष सारे सारखेच.दिवाणाचे तर माथेच फिरले.महाराजांच्या मर्जीआड कोण येतो? तोडा त्या सगळ्यांना.बघता बघता थोडेथोडके नाही,३६३ बिश्नोई जीव त्यांच्या खेजडीच्या झाडांसकट तोडले गेले!


या अघटित घटनेची बातमी म्हणता म्हणता फैलावली.गावा-गावाचे बिश्नोई खेजडलीला धावत आले.दरबारात महाराजांनाही वर्दी मिळाली.मग मात्र दिवाणाची मग्रुरी उतरली. राजा मऊ झाला.महाराज जातीने घोडेस्वार होऊन खेजडलीला आले.तो काय,

हजारो बिश्नोईंचा जमाव आक्रोश करीत असलेला बघायला मिळाला.महाराजांना पश्चात्ताप झाला. तिथल्या तिथे लोकांची माफी मागून महाराज म्हणाले : यापुढे बिश्नोईच्या गावापासचे एकही हिरवे झाड तुटणार नाही याची हमी आम्ही घेतो.त्यांनी बिश्नोईना ताम्रपट दिला : तुमच्या गावांपाशी वृक्षतोड होणार नाही,पशुहत्या होणार नाही.एवढेच नाही तर कोणी बिश्नोई दुसऱ्या गावी गेला आणि त्याला कोणी झाड तोडताना किंवा शिकार करताना दिसला तर त्याला मना करायचा अधिकार आहे.आणि तो सर्वांनी मानलाच पाहिजे.शिवाय बिश्नोईना अनेक कर माफ केले गेले.(वारुळ पुराण,माधव गाडगीळ,ई.ओ.विल्सन,

संक्षिप्त अनुवाद नंदा खरे,मनोविकास प्रकाशन,)


या गोष्टीला आज पावणेतीनशे वर्षे झाली. तब्बल पाच शतके बिश्नोई पंथ राजस्थानात, मध्य प्रदेशात,हरयाणात झाडांना सांभाळतो आहे,वन्य पशुपक्ष्यांना सांभाळतो आहे.या काळात आपल्या भारतमातेचे हरितवस्त्र अधिकाधिक फाटून त्याची पार लक्तरे झाली आहेत.भारत भूमीवर एके काळी हजारोंनी नव्हे लक्षावधींनी बागडणारे काळविटांचे - चिंकारांचे कळप केव्हाच संपून गेले आहेत.

पण बिश्नोई खेड्यांच्या आसपास मात्र अजूनही झाडी नुसती टिकूनच नाही,तर वाढत आहे.पूर्वीच्या कण्व ऋषींच्या आश्रमाच्या वर्णनाप्रमाणे त्यांच्या वस्तीजवळ निर्भय कृष्णमृगांचे कळपच्या कळप फिरत आहेत.

दिल्लीच्या अकबर बादशहाने सव्वाचारशे वर्षांपूर्वी बिश्नोई लोकांच्या देवळाजवळ काळविटांचे असे निर्भय कळप पाहिले तेव्हा लिहून ठेवले की,कलियुगात हा सत्ययुगातला देखावा पाहून मला फार आश्चर्य वाटले!आज तर हे दृश्य अधिकच विस्मयजनक आहे.पण 


आजही बिश्नोई आपल्या या अप्रूप परंपरेला जपून आहेत आणि त्याचा अभिमान बाळगून आहेत.जेथे बिश्नोईची अग्निपरीक्षा झाली,त्या खेजडली गावी अजूनही दोनशे ऐंशी वर्षांपूर्वी न तुटलेले एक झाड आहे.साठ वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या ३६३ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ३६३ झाडे लावलेली आहेत.आणि त्यांच्या प्रेमाने ती भराभर फोफावत आहेत.दर वर्षी भाद्रपद शुद्ध दशमीला तेथे एक मोठी यात्रा भरते.

२८/२/२४

मानवी शरीराचे विच्छेदन..२ Dissection of the human body


यानंतर त्यानं 'हिस्टोरिए ॲनिमेलियम' (Historiae Animalium) या आपल्या पुस्तक तसेच माहितीसंग्रहात त्या वेळी परिचित असलेल्या सगळ्याच प्राण्यांची आणि जेस्नरनं स्वतः शोधलेल्या प्राण्यांची माहिती आणि अतिशय सुबक वूड कट डिझाइन्स त्यानं मांडल्या होत्या.

गंमत म्हणजे त्यात त्यानं चक्क ड्रॅगन आणि मरमेड अशा फक्त माणसाच्या कल्पनेतल्या प्राण्यांनासुद्धा घेतलं होतं!


'हिस्टोरिया प्लँटारम' (Historia Plantarum) हे जेस्नरनं वनस्पतींच्या माहितीचं आणि चित्रांचं पुस्तक लिहिण्याचा घाट घातला होता.हेही काम अवाढव्यच होतं.दुर्दैवानं त्याच्या मृत्यूपर्यंत हे पूर्ण होऊ शकलं नाही.त्यानं 'मित्रिडेट'(Mithridates) नावाचा १३० भाषांमधलं साम्य आणि फरक सांगणारा कोशही लिहिला.त्यात एकाच अर्थाची एक प्रार्थना त्यानं चक्क २२ भाषांमध्ये लिहिली होती! त्याचं हेही काम अचाटच म्हणावं लागेल. शिवाय,त्यानं कीटकांच्या माहितीचाही असाच कोश तयार करायचा घाट घातला होता. तोही त्याच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. नंतर तो पेनी नावाच्या त्याच्या विद्यार्थ्यानं पूर्ण केला. जेस्नरनं इतरांनी केलेलं लिखाणही संपादन करून प्रसिद्ध केलं.

त्यानं केलेल्या लिखाणाची फक्त यादी करायची म्हटली तरी पुस्तकाची दोन-चार पानं सहज लागतील! इतकं करून तो थांबला नाही.त्यानं जगात अस्तित्वात असलेल्या सगळ्याच पुस्तकांची माहिती देणारी युनिव्हर्सल लायब्ररी तयार करायची योजना आखली होती.त्यासाठी त्यानं अतोनात कष्ट घेतले होते.त्यानं त्याच्या संपर्कात असलेल्या सगळ्या देशांतल्या आणि सगळ्या भाषांमधल्या आपल्या मित्रांना त्यांच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या आणि प्रकाशित झालेल्या सगळ्या पुस्तकांची माहिती पाठवून द्यायला सांगितली होती.त्यानं अनेक प्रकाशकांना आणि लेखकांना हाताशी धरून त्यांच्या पुस्तकांचे आणि त्या पुस्तकांची माहिती असलेल्या मासिकांचे कॅटलॉग्ज जमा केले होते.

जगातल्या अनेक देशांतल्या लायब्ररीजमध्ये तो स्वतः जाऊन आला होता.त्यात उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी करून घेऊन आला होता.या सगळ्यांमधला नेमका आणि महत्त्वाचा मजकूर कापून व्यवस्थित संगतवार लावण्यात तो दिवसेंदिवस बुडून जायचा.हा त्यानं तयार केलेला त्या वेळचा अजस्र डेटाबेसच म्हणावा लागेल.

आणि आश्चर्य म्हणजे हे त्यानं स्वतः कोणत्याही यंत्राची मदत न घेता केलं होतं. तो खरंचच सोळाव्या शतकातला 'वन मॅन सर्च इंजिन' होता आणि तेही मानवी सारासार बुद्धीसहित!आतापर्यंत त्याची तब्बल ७२ पुस्तकं प्रकाशित झाली होती आणि तो पुढच्या १८ पुस्तकांवर काम करत होता! पण दुर्दैवानं मध्येच त्याला प्लेग झाला.आता आपण अजून जगत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यानं आपल्याला आपल्या प्रिय पुस्तकांच्या लायब्ररीत घेऊन जायची विनंती केली.आणि आपल्या प्राणप्रिय पुस्तकांच्या सान्निध्यात त्यानं शेवटचा श्वास घेतला! त्याची अनेक प्रॉजेक्ट्स चालू असताना अशा प्रकारे वयाच्या फक्त ४९ वर्षांपर्यंत त्यानं इतकं अचाट काम केलं होतं,की आज माहितीचा महापूर असूनही कोणी हे करायला धजावेल की नाही शंकाच आहे! त्या काळातलं त्याचं हे काम आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे.


जेस्नरनं केलेलं अचाट काम पाहून त्याला मानवंदना म्हणून अठराव्या शतकाला वनस्पतिशास्त्रज्ञ कार्ल लिनियस यानं ट्यूलिपच्या एका जातीला 'ट्यूलिपा जेस्नेरियाना' असं नाव दिलं.शिवाय, एका जिनसलाही त्यानं 'जेस्नेरिया' आणि वनस्पतींच्या एका फॅमिलीला 'जेस्नेरियासी' असं नाव दिलं.आज जेस्नरला आपण आधुनिक वैज्ञानिक प्राणिशास्त्र,

वनस्पतिशास्त्र आणि बिब्लिओग्राफीचा जनक मानतो.आधीची ग्रीक पुस्तकं ही तर विज्ञानाची सुरुवात आहे. शआता आपण यापुढे जायला हवं असं युरोपियनांना प्रकर्षानं लक्षात यायला लागलं. पण अजूनही प्लेटो,ॲरिस्टॉटल,थिओफ्रॉस्ट्स, गेलन,या वैज्ञानिकांचा समाजावर इतका जबरदस्त पगडा होता,की तो भेदन नवं काही करणं हे काम प्रचंड अवघड होतं.हे फक्त बायॉलॉजीतच होतं असं नाही तर जवळपास सगळ्याच विज्ञानशाखांना यातून जावं लागलं आहे.हा पडदा भेदायला आता दुसऱ्या थिओफ्रॉस्ट्सची गरज होती! पण हा थिओफ्रॉस्ट्स स्विस डॉक्टर होता. याचं मूळ नाव थिओफ्रॉस्ट्स बॉम्बास्ट्स फॉन होहेनहाइम (Theophrastus Bombastus von Hohenhiem) (१४९३-१५४१) असं होतं! 


हा मुलगा म्हणजे मुळातच पायाला भिंगरी लावून आलेला होता.त्यामुळे हुशार असूनही त्याला घरी बसून जुनी पुस्तकं वाचून त्यात काय लिहिलंय याची पारायणं करण्यात काही फारसा रस नव्हताच! तो सतत कोणत्या तरी भटकंतीच्या दौऱ्यावर जायच्या तयारीत असे किंवा भटकायला तरी गेलेला असे. वडिलांनी लहानपणीच त्याला औषधांचं ज्ञान दिलं होतंच. तो आता त्याही पलीकडे नव्या गोष्टींच्या शोधात निघाला होता.आपल्या प्रवासात त्याला अनेक नवनव्या औषधी वनस्पतींचा शोध लागला.हा थिओफ्रॉस्ट्स मुळातच विक्षिप्त,गूढवादी आणि चक्रम होता.गंमत म्हणजे त्यालाही त्याच्या आधीच्या अल्केमींप्रमाणे वेगवेगळी रसायनं तयार करण्यात भारी रस होता.पण पूर्वीच्या अल्केमींनी परीस आणि अमृत शोधण्यात आपलं आयुष्य घालवलं होतं. होहेनहाइमला हे सगळं अनावश्यक आणि त्यामुळेच अतार्किक वाटायचं.


सोनं किंवा अमृत अशा कधीही न सापडणाऱ्या गोष्टी शोधण्यापेक्षा माणसाला गरजेच्या असलेल्या औषधी वनस्पती आणि औषधी रसायनं शोधणं आणि त्याद्वारे माणसांना होणारे वेगवेगळे रोग बरे करणं हे डॉक्टरचं कर्तव्य आहे असं त्याला वाटत होतं. यातून त्यानं औषधांमध्ये खनिजांचा उपयोग करायला सुरुवात केली. 


पण गंमत म्हणजे यातूनच त्याला आपणही कधीही आजारी न पडू देणारा खडा/दगड शोधलाय असा दावा तो करत असे.नंतर तर तो चक्क आपल्याला अमृत सापडलंय आणि अनेक राक्षस आपल्या आज्ञेत आहेत असंच सगळयांना सांगत सुटायचा.अर्थात,त्यात काही तथ्य नव्हतं. पण त्यानं शोधून काढलेली इतर औषधं मात्र खरोखर गुणकारी असावीत.होहेनहाइम ब्रसेल्समध्ये डॉक्टरकी करायचा.तो फुफ्फुसांच्या रोगांवर उपचार करायचा.त्याचा ज्योतिषावरही विश्वास होता.शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवर वेगवेगळ्या ग्रहांचं नियंत्रण असतं असं त्याला वाटायचं.उदाहरणार्थ,सूर्य हृदयावर नियंत्रण ठेवतो,चंद्र मेंदूवर आणि गुरू यकृतावर नियंत्रण ठेवतो.

अशा प्रकारे तर आपल्या सूर्यमालेतले ग्रह कमी पडले असते आणि आपल्याला राहिलेल्या अवयवांसाठी इतर ग्रहांना पाचारण करावं लागलं असतं! एखाद्या हत्यारानं आपल्याला जखम झाली तर ते हत्यारच मोडून टाकलं तर ती जखम आपोआप बरी होईल असं त्याला वाटे.!होहेनहाइम त्याच्या पेशापेक्षा इतर उद्योग करण्यासाठीच प्रसिद्ध होता.तो प्रचंड दारू प्यायचा.तो पैसाही वेडावाकडा उधळायचा.


 तो खूप गर्विष्ठही होता. त्यात त्यानं प्रसिद्ध 'हिप्पोक्रॅट्स ओथ' ही शपथ घ्यायला नकार दिला होता! अपण कसे पुढारलेल्या मतांचे आणि विज्ञानाला जुन्या बुरसटलेल्या विचारांतून बाहेर काढणारे आहोत हे दाखवण्यासाठी त्यानं गावातल्या भर चौकात चक्क गेलन आणि अविसेना यांच्या पुस्तकांची होळी केली होती. आणि त्यावेळी लोक सेल्ससला सगळ्यात हुशार मानत होते. तर हा स्वत:ला त्याच्याही पुढचा म्हणजे चक्क पॅरासेल्सस म्हणवून घेत होता! आणि आपणही आज त्याला याच पॅरासेल्सस या नावानं ओळखतो.त्याच्या अशा प्रक्षोभक कृत्यांमुळे मात्र त्याला गावाच्या बाहेर काढलं गेलं.पॅरासेल्ससच्या स्वतःच्या थिअरीज काही फार उच्च कोटीच्या होत्या असं नव्हतं.पण युरोपियनांनी अजूनही जुन्या ग्रीक पुस्तकांना प्रमाण मानून आपण नवं काहीही न करणं यावर त्याचा आक्षेप होता. आणि त्याचा परिणामही जुन्या विचारांचा पगडा डळमळीत होण्यात झाला.यातूनच पुराण

काळातल्या गोष्टींवरची झापडं दूर होऊन माणूस नव्या स्वच्छ नजरेनं विज्ञानाकडे पाहायला लागणार होता.आता विज्ञानाला धातूतल्या सोन्याची नाही तर ज्ञानाच्या सोन्याची झळाळी प्राप्त होणार होती.!


२७.०१.२४ या लेखातील शेवटचा भाग..





२६/२/२४

भगतसिंगांचे वडिलांना पत्र /Bhagat Singh's letter to his father

दि. ३० सप्टेंबर १९३० रोजी भगतसिंगांचे वडील किशनसिंह यांनी विशेष न्यायालयाला (ट्रिब्युनलला) अर्ज करून बचाव करण्याची संधी देण्याची मागणी केली होती.सरदार किशनसिंह स्वतः एक देशभक्त होते आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी तुरुंगवास भोगला होता,बचाव करण्यासाठी आपली बाजू मांडून भगतसिंगला फाशीपासून वाचविणे शक्य आहे,असे वाटल्यामुळे त्यांनी अर्ज केला होता.भगतसिंग यामुळे प्रचंड नाराज झाले,

कारण भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचे विचार याबाबत वेगळे होते.ब्रिटीश सरकारने सूड उगविण्याचे धोरण ठेवले आहे आणि न्याय हे निव्वळ थोतांड आहे.शिक्षा देण्यापासून ब्रिटीश सरकारला कोणत्याही प्रकारे थांबवले जाऊ शकत नाही.

याबाबत जर दुबळेपणा दाखवला,तर जनतेत अंकुरणारे क्रांतीचे बीज रुजू शकणार नाही असे भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना वाटत होते. इतर तुरुंगात असलेल्या साथीदारांना मी त्यांच्यासोबत विश्वासघात करतोय असे वाटू नये,म्हणून वडिलांनी केलेल्या अर्जामुळे भगतसिंग दुखावले गेले होते;पण आपल्या भावनांना यावर घालत आपली तत्त्वे त्यांच्या

पर्यंत पोहोचावीत याकरिता त्यांनी दि.४ ऑक्टोबर १९३० रोजी पुढील पत्र लिहिले.ते पत्र त्यांच्या वडिलांना उशिरा मिळाले. दि.७ ऑक्टोबर १९३० ला खटल्याचा निकाल जाहीर झाला.ते पत्र सोबत देत आहे.या पत्रावरून भगतसिंगांची आपल्याला झालेल्या फाशीच्या शिक्षेबद्दल काय भूमिका होती हे अधिक स्पष्टपणे आपल्याला कळू शकेल. मजबुती का नाम महात्मा गांधी-चंद्रकांत झटाले,न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे


दि. ४ ऑक्टोबर १९३०


पूज्य पिताजी,


माझा बचाव करण्यासाठी विशेष न्यायालयाच्या (स्पेशल ट्रिब्युनल) सदस्यांकडे आपण अर्ज पाठवला आहे,हे ऐकून मी उद्विग्न झालो आहे.ही बातमी इतकी यातनादायी होती की,मी ते शांतपणे सहन करू शकलो नाही.या बातमीने माझ्या मनाची शांतता भंग करून मनात खळबळ निर्माण केली आहे.आजच्या अवस्थेत आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा अर्ज करणे हे तुम्हाला कसे काय योग्य वाटते,हे काही मला समजू शकत नाही.एक पिता म्हणून आपली भावना आणि आपली कळकळ लक्षात घेतली,तरी माझ्याशी सल्लामसलत न करता माझ्यावतीने असे पाऊल टाकायचा आपल्याला कोणताही हक्क नाही असे मला वाटते.राजकीय क्षेत्राबाबत हे आपल्यापेक्षा नेहमीच वेगळे राहिले आहेत हे आपणास ठाऊक आहे.मी आपल्या मान्यतेचा किंवा अमान्यतेचा विचार न करता नेहमीच स्वतंत्रपणे कार्य करत आलो आहे.


मी आपला खटला गांभीर्याने लढवावा आणि आपला बचाव योग्य प्रकारे करावा ही गोष्ट माझ्या मनावर बिंबवण्याचा आपण सुरुवातीपासून प्रयत्न करत आला आहात,हे तुम्हाला आठवत असेल असे मला वाटते;पण मी नेहमीच या गोष्टीला विरोध करत आलो आहे,हेदेखील आपल्याला ठाऊक आहे.


माझा बचाव करण्याची मला कधीही इच्छा नव्हती आणि त्याकडे गंभीरतेने मी कधीच लक्षही दिलेले नाही.हे केवळ मी कोणत्या धूसर विचारसरणीपोटी केले की,त्यासंदर्भात माझ्या भूमिकेचे समर्थन करणारे नेमके असे माझे काही म्हणणे होते,हा प्रश्न वेगळा आहे आणि त्याची या ठिकाणी चर्चा करता येणार नाही.आम्ही हा खटला लढवताना एका निश्चित धोरणाचा पाठपुरावा करत आहोत हे आपल्याला ठाऊक आहे.हे धोरण,माझी तात्त्विक विचारसरणी आणि आमचा कार्यक्रम यानुसारच माझे प्रत्येक पाऊल पडले पाहिजे.

आज परिस्थिती फारच वेगळी आहे;पण ती याहीपेक्षा वेगळी असती तरीही बचाव करू पाहणारा मी शेवटचा ठरलो असतो.आमच्याविरुद्ध मोठे गंभीर आरोप केलेले असले तरीही त्या खटल्याबाबत पूर्ण अनास्था दाखविणे हीच माझी भूमिका संपूर्ण खटल्यामध्ये राहिली आहे.अशा परिस्थितीत सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी अनास्था दाखविली पाहिजे.त्यांनी न्यायालयातील कायदेशीर लढायांची पर्वा करता कामा नये. त्यांना ठोठावलेल्या कठोरात कठोर शिक्षा त्यांनी धैर्याने भोगल्या पाहिजेत असे माझे मत नेहमीच राहिले आहे.त्यांनी स्वतःचा बचाव करायलाही हरकत नाही;पण तो निखळ राजकीय विचाराने केला पाहिजे,कधीही वैयक्तिक विचारापोटी नव्हे. खटल्याच्या संपूर्ण काळात आमची योजना या तात्विक विचारसरणीला अनुरूप अशीच होती. असे करण्यात आम्ही यशस्वी झालो की नाही याचा निर्णय करणे हे माझे काम नाही.आम्ही आमचे कार्य नेहमीच निरपेक्षपणे करत आलो आहोणे. 'लाहोर कटा' च्या खटल्याचा वटहुकूम जारी करताना व्हॉइसरॉयने त्यासोबत जे वक्तव्य केले होते त्यात त्यांनी म्हटले होते की,'कटातील आरोपी कायदा आणि मानखंडणा करण्याचा प्रयत्न करत आहेत.' या परिस्थितीने जनतेसमोर ही वस्तुस्थिती ठेवण्याची संधी आम्हाला दिली की,कायदा उधळून लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत की,तो दुसऱ्या बाजूने केला जात आहे हे जनतेने ठरवावे.बाबाबतीत लोकांचे मत वेगळे असू शकते.मतभेद असणाऱ्यांपैकी कदाचित आपणही एक असाल;पण त्याचा अर्थ असा नव्हे की माझ्याशी विचारविनिमय न करता,मला कल्पनाही न देता माझ्यावतीने आपण पावले टाकावीत.


आपल्याला वाटते तसे माझे आयुष्य काही इतके मौल्यवान नाही. निदान मला तरी तसे वाटत नाही.

माझ्या तात्त्विक विचारसरणीची आहुती देऊन बचाव करावा इतके माझे आयुष्य मौल्यवान नाही. माझ्या

शिवाय माझे जे इतर साथीदार आहेत, त्यांचेही खटले माझ्या खटल्याप्रमाणेच गंभीर स्वरूपाचे आहेत.

आम्ही सर्वांनी मिळून एक सामाजिक धोरण ठरवले आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्याला चिकटून राहू.त्यासाठी आम्हाला व्यक्तिशःकितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी त्याची आम्हाला मुळीच पर्वा नाही.


पिताजी,मी फार गोंधळलोय.आपण उचललेल्या या पावलाबद्दल आपल्यावर दोषारोप करताना किंवा टीका करताना मी सभ्यतेच्या सीमा तर ओलांडत नाही ना,

आणि माझी भाषा अधिक बोचरी तर होणार नाही ना अशी धास्ती मला वाटते;पण माझे म्हणणे मी स्पष्टपणे अवश्य सांगेन.जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने माझ्याशी असा व्यवहार केला असता,तर त्याला मी विश्वासघातापेक्षा कमी लेखले नसते;पण याबाबत मी एवढेच म्हणेन की,हा एक दुबळेपणा आहे.अतिशय शोचनीय असा दुबळेपणा.


ही वेळ आपल्या सर्वांच्या परीक्षेची होती. पिताजी,आपण त्यात अयशस्वी झालात,एवढेच मला सांगायचे आहे.मला जाणीव आहे की, दुसऱ्या कोणत्याही अव्वल देशभक्ताएवढेच आपणही देशभक्त आहात.आपण आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केलेले आहे हे मला माहीत आहे;पण या कसोटीच्या वळणावर आपण असा दुबळेपणा कसा काय दाखवलात,हे मात्र मला समजूच शकत नाही.शेवटी आपण टाकलेले हे पाऊल मला मान्य नाही;हे मला आपल्याला,माझ्या इतर मित्रांना, तसेच माझ्या खटल्यात स्वारस्य असणाऱ्या सर्वांना सांगायचे आहे.न्यायालयात कोणत्याही प्रकारे बचाव करावा अशी माझी आजही भूमिका नाही.माझ्या काही साथीदारांकडून बचावासंदर्भात केला गेलेला विनंती अर्ज न्यायालयाने जरी मंजूर केला असता,तरीही मी माझा बचाव केला नसता.


उपोषणाच्या काळात विशेष न्यायालयाला (ट्रिब्युनलला) माझ्या मुलाखतीसंदर्भात मी जो अर्ज दिला होता,त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि मी माझा बचाव देऊ इच्छितो, असेही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.प्रत्यक्षात खरेतर कसलाही बचाव देण्याची माझी इच्छा नव्हती.

आजही माझे तेच मत आहे.


'बॉर्स्टल' तुरुंगात कैदी असलेल्या माझ्या साथीदारांना मी दगा दिला आणि विश्वासघात केला असेच वाटत असेल.

माझी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर स्पष्ट करायला मला संधीदेखील मिळणार नाही.या विषयासंबंधीच्या गुंतागुंतीचे सर्व सत्य जनतेला समजले पाहिजे अशी माझी इच्छा आहे म्हणून हे पत्र प्रसिद्ध करावे अशी मी आपणास विनंती करतो.


आपलाच प्रिय पुत्र,

भगतसिंग


भगतसिंगांची फाशी माफ व्हावी म्हणून गांधींनी व्हॉइसरॉय आयर्विनला लिहिलेलं एक पत्र


Letter to Viceroy


1,Daryaganj Delhi 

March 23,1931


Dear Friend,

It seems cruel to inflict this letter on you; but the interest of peace demands a final appeal.Though you were frank enough to tell me that there was little hope of your commuting the sentence of death on Bhagat Singh and two others,you said you would consider my submission of Saturday.

Dr.Sapru met me yesterday and said that you were troubled over the matter and taxing your brain as to the proper course to adopt.If there is any room left for reconsideration,I invite you attention to the following.


Popular opinion rightly or wrongly demands commutation.When there is no principle at stake,it is often a duty to respect it.


In the present case the chances are that,if commutation is granted, internal peace is most likely to be promoted.In the event of execution, peace is undoubtedly in danger.


Seeing that I am able to inform you that the revolutionary party has assured me that,in the event of these lives being spared,that party will stay its hands suspension of sentence pending cessation of revolutionary murders becomes in my opinion a peremptory duty.Political murders have been condoned before now.It is worth while saving these lives,if thereby many other innocent lives are likely to be saved and maybe even revolutionary crime almost stamped out.


Since you seem to value my influence such as it is in favour of peace,do not please unnecessarily make my position,difficult as it is, almost too difficult for future work.


Execution is an irretrievable act.If you think there is the slightest chance of error of judgment,I would urge you to suspend for VOL.51


: 6 JANUARY,1931 - 28 APRIL,1931 291 further review an act that is beyond recall.If my presence is necessary,I can come.Though I may not speak.I may hear and write what I want to say.Charity never faileth.


I am,

Your sincere friend,


From a Photostat: C.W. 9343.

Courtesy: India Office Library