* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

११/३/२४

शेतकरी मार्टिन ल्यूथर ..। Farmer Martin Luther..।

लिओनार्डोच्या मृत्यूने आपणास सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात आणून सोडले आहे.दीड हजार वर्षे ख्रिश्चन धर्मात राहणारी मानवजात आपण पाहिली व आपणाला लाजेने कबूल करावे लागते की,हे चित्र काही फारसे अभिमानास्पद आहे,असे नाही.मनुष्यप्राण्याच्या आरंभीच्या वृत्तीच्या रानांतून तो बराचसा बाहेर पडला आहेसे दिसत नाही.अद्यापीही तो पशूच आहे..अद्यापीही तो विनाशाची साधनेच निर्मिताना दिसतो.त्याची भाषा पुष्कळ वेळा फसवी व दांभिकच असते.सत्यापासून व अहिंसेपासून तो अद्यापि दूर आहे.तो प्रासाद व मंदिरे बांधण्यास शिकला,काव्ये-चित्रे-प्रवचने निर्माण करण्यास शिकला,आपल्या करमणुकीसाठी चुना व संगमरवर यांच्या उत्कृष्ट बाहुल्या करावयास शिकला;पण कलेच्या पूजेने जीवनाची पूजा करायला मात्र तो अद्याप शिकला नव्हता.तो ईश्वराची पूजा करीत असूनही अद्यापि मानवबंधूना खुशाल ठार करतो! तो खुनाचा जणू धर्मच बनवितो. तो ख्रिस्ताच्या पावलांवर पावले ठेवून जाणाऱ्यांचा ख्रिस्ताच्याच नावाने छळ करतो.ख्रिश्चन धर्मात पंधराशे वर्षे राहूनही मानव अद्यापि माणुसकी शिकला नव्हता.पण या चित्राला दुसरी,आशादायक अशीही एक बाजू आहे.हा जो मानवांचा-दांभिकांचा, दुबळ्यांचा,पशुंचा मेळावा दिसतो त्यातूनच कधीकधी प्रज्ञेचे व अनंत धैर्याचे पुरुषही निघतात,ज्या मानवी मातीतून आपण वनविले जातो,तिच्यातूनच कधीकधी दैवी सौंदर्यही प्रकट होऊ शकते,असे दैवी पुरुष विरळा ही गोष्ट खरी; पण इतिहासात मधूनमधून दिसणाऱ्या या व्यक्ती आशा दाखवितात की,याहून थोर मानव पुढे पैदा होतील,

या नमुन्याहून अधिक थोर नमुने या मातीतूनच पुढे आणखीही प्रकट होतील,भावी पिढ्यांना या व्यक्ती नीट दिसाव्यात म्हणूनच जणू त्या थोर व्यक्तींना त्यांच्या समकालीनांनी क्रॉसवर खिळे ठोकून टांगून ठेवले किंवा पुढील पिढ्यांना प्रकाश दिसावा म्हणूनच त्यांच्या शरीरांच्या मशाली पेटवून ठेवल्या..!


जोपर्यंत माणसे आपल्या मनातील कल्पना व विचार स्थापण्यासाठी दुसऱ्यास ठार करीत आहेत,तोपर्यंत मानवजात जंगलीच राहणार! तथापि,आपल्या ध्येयासाठी शांतपणे मरणास मिठी मारणारेही आहेत,तोपर्यंत आपण अखेर सुधारणार,शेवटी का होईना;पण सुसंस्कृत होणार,अशी अमर आशा बाळगण्यासही जागा आहे.


कधी कधी आपल्या ध्येयार्थ स्वतःचे बलिदान करू पाहणारा मरायला तयार असणारा समकालीनांच्या विषमय वृत्तीस बळी न पडतानाही दिसतो,मग ते सुदैव म्हणा वा दुर्दैव म्हणा.समकालीनांच्या तावडीतून वाचलेल्यांपैकी मार्टिन ल्यूथर हा एक होता.त्याला पाखंडीपणाबद्दल पुन्हापुन्हा मरणाची धमकी देण्यात येत होती.पण तो नेहमी निसटे.त्याचे वाचलेले दीर्घ जीवन मानवजातीला केवळ आशीर्वादरूप व मंगलमय होते का? आपण पाहू या.


इ.स. १५१० मधील गोष्ट.त्यावेळी रोममधील सेंट पीटर चर्चची दुरुस्ती करायची होती,त्याचा जीर्णोद्धार करायचा होता.त्यासाठी पोपने क्षमापत्रे द्यायचे ठरविले.जो कोणी या कामाला मदत करील,त्याला पापमुक्तीची प्रशस्ति-पत्रे पोप दुसरा ज्यूलियस हा देणार होता.या प्रॉमिसरी नोटांत 'चर्चला मदत करतील त्यांना प्रभू मरणोत्तर सर्व पापांची क्षमा करील.'असे आश्वासन देण्यात येत असे.सनातनी लोकांना यात काही वावगे आहे असे वाटले नाही.पोपचा स्वर्गाशी प्रत्यक्ष व्यवहार असतो,असे समजले जाई.

एखाद्याने चर्चला लहानशी देणगी दिली तर त्याचा नरकातील निवास थोडा कमी होई;देणगी मोठी असेल तर नरक नक्की चुकविता येत असे.यामुळे क्षमापत्रांचा हा पोपचा पापी धंदा चांगलाच तेजीत होता.ही पापमुक्ती पत्रे जास्तीतजास्त पैसे घेऊनच भटभिक्षुक विकीत.सेंट पीटर चर्चच्या जीर्णोद्धारार्थ ही पापमोचन-पत्रे मोठ्या गाजावाजाने विकली जाऊ लागली.ऐपतीपेक्षा अधिक पैसे देऊनही शेतकऱ्यांनी ही चिठोरी विकत घ्यावी अशी जबरदस्ती त्यांच्यावर होऊ लागली.यामुळे ल्यूथरचा संताप जागृत झाला.तो धार्मिक वृत्तीचा कॅथॉलिक व डोमिनिकन पंथी होता,तरी त्याचे मन स्वतंत्र विचारांचे होते.तो विटेनबर्ग विद्यापीठात धर्म या विषयाचा प्राध्यापक होता.ईश्वर राजकारणात ढवळाढवळ करणार नाही,तद्वतच पोपांच्या या पापमोचक पत्रांशीही त्याचा काहीच संबंध नाही,

याविषयी ल्यूथर निःशंक होता.


१५५७ सालच्या ऑक्टोबरच्या एकतिसाव्या तारखेस त्याने तेथील किल्ल्यातल्या चर्चच्या दारावर पोपच्या कृत्यांचा जाहीर निषेध करणारे पत्रक लावले,"मनुष्यांनी केलेल्या पापांच्या बाबतीत प्रभूची जी काही इच्छा असेल,

तिच्यात ढवळाढवळ करण्याची शक्ती पोपला नाही, पोपचा असा हेतू असणे शक्य नाही.पोपकडून असली क्षमापत्रे घेण्यापेक्षा काही खरीखुरी सत्कर्मे केल्यास मात्र ईश्वराचे लक्ष वेधले जाण्याचा अधिक संभव आहे.भाडोत्री धर्मोपदेशक बहुजन समाजावर करीत असलेले अनन्वित जुलूम पोपला समजल्या सेंट पीटर चर्च धुळीस मिळाले तरी चालेल;पण जनतेच्या रक्ताने व हाडामांसानी ते बांधणे नको,असेच त्यालाही निःसंशय वाटेल.ख्रिश्चन धर्मीयांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,पोप अत्यंत श्रीमंतांहूनही श्रीमंत,कुबेराचाही कुबेर आहे; तेव्हा त्याला एकट्याला सेंट पीटर चर्च बांधून काढणे मुळीच अवघड नाही.गरीब श्रद्धाळू लोकांपासून पैसे उकळून त्या पैशाने हे चर्च बांधण्यापेक्षा पोपने आपल्या स्वतःच्याच पैशाने ते का बांधू नये?" या जाहीर पत्रकाच्या शेवटी तो म्हणतो, "माझ्याशी मतभेद असणाऱ्यांना माझे आव्हान आहे.वाटल्यास त्यांनी माझी मते व माझे मुद्दे खोडून काढावेत." या वेळी ल्यूथर चौतीस वर्षांचा नवजवान होता.ल्यूथरच्या आव्हानामुळे वादाचे वादळच उठले ! पोपची सत्ता धुडकावून लावणारा हा ल्यूथर पाखंडी आहे,असे भटभिक्षुक,धर्मोपदेशक,सारे म्हणू लागले.पण जुलमामुळे गांजलेली जनता नवीन धर्म बंड करणाऱ्या या वीराभोवती उभी राहिली व 'हा आमचा पुढारी!' असे म्हणू लागली.पोपला सेंट पीटरचे कॅथॉलिक चर्च बांधायचे होते.त्याला विरोध करण्यास उभा राहिलेला ल्यूथर 'प्रॉटेस्टंट चर्च बांधणारा' म्हणून अमर झालाच,त्याच्या मनात नसतानाही त्याला प्रॉटेस्टंट चर्चचा पाया घालावा लागला. पण प्रॉटेस्टंट पंथीय सुधारणेचे कारण केवळ एवढेच नव्हते.खरी कारणे दुसरीच व फार खोल आणि गंभीर होती.या चळवळीची बीजे कित्येक शतकांपूर्वीच नास्तिक म्हणून समजल्या गेलेल्या लोकांकडून पेरली गेलेली होती.ती नवयुगात नीट रुजली;त्यांनी मूळ धरले व चर्चने जुलूम केला.तरी नव्हे,चर्चने जुलूम केल्यामुळेच - ती अंकुरली व योग्य वेळी ल्यूथरने केलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या घोषणेच्या रूपाने फुलली.धार्मिक स्वातंत्र्याचा आत्मा चारशे वर्षे साकार होऊ पाहत होता.ल्यूथरने त्या आत्म्याला देह दिला; पण देह देऊन त्याने आत्मा मारला,असेच पुढे दिसून येईल.


ल्यूथरने धार्मिक वादळ उत्पन्न केल्यामुळे त्याला १५१८ सालच्या ऑक्टोबरात ऑग्सबर्ग येथे बोलावण्यात आले व बंडखोर विचार सोडून देण्याबद्दल आज्ञा करण्यात आली.

पण ल्यूथर ठाण मांडून उभा होता.त्याने काहीही करण्याचे नाकारले.तो जर्मनीत फारच लोकप्रिय होता. दोन वर्षांपर्यंत चर्च त्याच्या वाटेला गेले नाही. पण सौम्यतेने मन वळवून काम होत नाही असे आढळताच पोप छळण्यास उभा राहिला.१५२० सालच्या जूनमध्ये एक आज्ञापत्र काढून 'ल्यूथरची मते अधार्मिक आहेत',

असा शिक्का पोपने त्यावर मारला आणि ल्यूथरची सर्व पुस्तके जाळून टाकण्याची आज्ञा केली.त्याने ल्यूथरला क्षमा मागण्यासाठी साठ दिवसांची मुदत दिली. तेवढ्या मुदतीत क्षमा मागून आपले म्हणणे मागे न घेतल्यास त्याला शापित ठरविण्यात येईल अशी धमकी दिली!ल्यूथरने शापित होणेच पसंत केले.पोपच्या पत्रकाला त्याने तेजस्वी उत्तर देऊन पोपला त्याच्या चिल्यापिल्यांसकट आशीर्वादपूर्वक सैतानाकडे पाठवून दिले.विटेनबर्ग येथील जनता व विद्यार्थी यांचा उत्साह उचंबळला. ल्यूथरने पोपच्या पत्रकाची व विरोधकाच्या लिखाणाची जाहीररीत्या होळी केली !


पोपने नाटकाच्या शेवटच्या अंकाची सजावट सुरू केली व पाखंडी ल्यूथरला भस्मसात करण्याचे ठरविले.पण अंकाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्य पात्रच पळून गेले! ल्यूथरला त्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या मित्रांनी वार्टबर्गच्या किल्ल्यात नेले व तो तिथे नाव बदलून राहू लागला.

जर्मनीमध्ये नव्या कराराचे ग्रीकमधून भाषांतर करून तो आपला वेळ घालवीत होता. 'बायबल प्रत्येकाला वाचता आले पाहिजे' असे वुइक्लिफप्रमाणेच त्याचेही मत होते व पोपांची भाष्ये,विवरणे व स्पष्टीकरणे वाचण्याऐवजी बायबल स्वतः वाचून स्वतःच त्याचा अर्थ करावा, असे त्याने प्रतिपादिले.ल्यूथर अदृश्य झाल्यावर एक महिन्याने सम्राटाने 'ल्यूथर चर्चचा पाखंडी शत्रू व स्टेटचाही वैरी आहे' असे जाहीर केले.ल्यूथर कायद्याच्या ऐहिक व पारमार्थिक बाहूत (दोर्दंडांत) सापडला.ल्यूथर आता एक तर कायमचा अंधारात तरी गडप होणार;अगर हुतात्मा तरी होणार असे स्पष्ट दिसत असता पुन्हा त्याला दैवाने हात दिला. कारण याच वेळी फ्रेंचांनी जर्मनीशी युद्ध सुरू केल्यामुळे नास्तिकांना माफी देण्यात आली! सम्राट दहा वर्षे युद्धात गुंतल्यामुळे ल्यूथरला आपल्या सुधारणेची योजना आखून कार्यक्रम निश्चित करण्यात भरपूर वेळ मिळाला.त्याला प्रारंभी तरी कॅथॉलिक चर्चपासून अलग होण्याची इच्छा नव्हती,नवीन धर्म सुरू करण्याचीही त्याची मनीषा नव्हती.तो जुन्याच धर्मातील दोष काढून टाकू इच्छित होता.त्याचा धर्मोपाध्यायाच्या उद्दामपणाला विरोध होता.या धर्मोपाध्यायांनी आपण इतरांहून श्रेष्ठ असे का समजावे,हेच त्याला कळेना.चर्चच्या अधिकाऱ्यांनी केवळ ईश्वराचेच सेवक होऊन भागणार नाही,तर त्यांनी जनतेचेही सेवक झाले पाहिजे असे त्याला वाटे. ल्यूथरने धर्मोपदेशकांना "सामान्य लोकांप्रमाणे राहा,विवाह करा,आपली वागणूक सुधारा, आढ्यतेने जनतेपासून दूर राहू नका,निराळे पोषाख नकोत,

काही नको!"असे सांगितले.


चर्चच्या काही उत्सव-समारंभानाही ल्यूथरचा विरोध होता.एका विशिष्ट पद्धतीनेच प्रार्थना केली पाहिजे,असा सनातनी कॅथॉलिकांचा आग्रह असे.ल्यूथर म्हणे की,

आपलीच प्रार्थनापद्धती प्रभूला अधिक पसंत पडेल. अर्थातच हा प्रश्न औपचारिक होता.पण सोळाव्या शतकात औपचारिकपणालाही फार महत्त्व असे. एखाद्या धार्मिक वचनाचा अर्थ कसा लावावा, यावर रणे माजत; कत्तलीही होत! एखाद्या आध्यात्मिक वाक्यात स्वल्पविराम कोठे असावा इतक्या क्षुल्लक मुद्द्यावरूनही युद्धे पेटत.!


ल्यूथरची सनातन कॅथॉलिक चर्चवरची श्रद्धा अजिबात उडाली होती असे नव्हे.'थोडी नवी तत्त्वे,थोडे नवे विचार,

काही नवे विधिनिषेध, काही जुन्या अवडंबरांची काटाछाट',असे जुने चर्च सुधारण्याचे त्याचे धोरण होते.

त्याचे काही विचार उदात्त असले,तरी त्याचे पुष्कळसे म्हणणे हास्यास्पदच होते.त्याला नवे बांधायचे नव्हते;तर जुन्यालाच थोडेसे वळण द्यायचे होते.त्याला कॅथॉलिकांनी बहिष्कृत केल्यामुळेच तो स्वतःचे नवे प्रॉटेस्टंट चर्च स्थापण्यास सिद्ध झाला.कॅथॉलिक चर्च व प्रॉटेस्टंट चर्च यांत केवळ बाह्यतःच फरक होता असे नव्हे;तर आंतर फरकही होणार होता.दोन्ही चर्चमध्ये अंतर्बाह्य भेद होता.प्रॉटेस्टंट चर्चमध्ये जो तो आपापला धर्मोपाध्याय होता,ईश्वर व भक्त यांच्या दरम्यान मधल्या पंड्यांची जरुरी राहिली नव्हती. प्रत्येकास आपापल्या इच्छेनुसार ईश्वराची पूजा करण्याची मुभा देण्यात आली होती.प्रॉटेस्टंट पंथीयांनी पोपची सत्ता मानण्याऐवजी बायबलची सत्ता मानायची होती व हे आपले धोरणच अधिक चांगले,असे प्रॉटेस्टंट रोमन कॅथॉलिकांनी पटवून देत असत.पण आता प्रॉटेस्टंट व कॅथॉलिक एकमेकांस जाळू लागले,फाशी देऊ लागले.चर्चच्या पूर्वीच्या काही पाद्रयांप्रमाणे ल्यूथरही आपल्या अनुयायांना सर्वांत महत्त्वाची एक गोष्ट सांगायला विसरला.त्याने धार्मिक सहिष्णुतेचे महत्त्व शिकविले नाही.ल्यूथर आपल्या सार्वजनिक जीवनाच्या आरंभी दयाळू,धैर्यशाली व शहाणा होता.त्याचे धैर्य शेवटपर्यंत टिकले;पण दया व प्रज्ञा यांनी मात्र त्याला पुढील वादविवादाच्या गोंधळात दगा दिला.तरुणपणी तो परित्यक्तांना व धर्मबाह्यांना दया दाखवी.स्वतः शेतकरी असल्यामुळे तो शेतकऱ्यांचा कैवारी व मोठा मित्र होता.

छळाची कटुता त्याने स्वतः चाखली होती,त्यामुळे छळल्या जाणाऱ्या राज्यांविषयी त्याला सहानुभूती वाटे.'येशू हा ज्यू होता' या निबंधात ल्यूथर लिहितो,"ज्यू हे येशूचे आप्तच आहेत. त्यांचे रक्त एकच आहे आणि रक्त व मांस यांची प्रतिष्ठा अधिक असेल तर आपण जितके ख्रिस्ताचे आहोत,त्यापेक्षा ज्यूच ख्रिस्ताचे अधिक आहेत... म्हणून माझे सांगणे आहे की,ज्यूंना आपण दयाळूपणाने वागविले पाहिजे.पोपच्या कायद्याला न मानता आपण ख्रिस्ताने शिकविलेला प्रेमाचा कायदाच पाळला पाहिजे.आपण ज्यूंचे मित्र होऊ या.पण पुढे जेव्हा शेतकरी (मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनु-सानेगुरुजी) राजेरजवाड्यांच्या जुलमाविरुद्ध बंडाची भाषा बोलू लागले,तेव्हा पोपच्या जुलमाविरुद्ध बंड करणारा ल्यूथरच राजाची बाजू घेऊन शेतकऱ्यांना शाप देऊ लागला.त्याने 'वरिष्ठ सत्ता प्रत्येकाने मानलीच पाहिजे,'अशी गर्जना केली.पोपच्या बाबतीत निर्णय ठरविण्याचा हक्क लोकांस आहे,असे म्हणणाराच ल्यूथर राजाच्या बाबतीत मात्र जनतेचा निर्णय ठरविण्याचा हक्क नाकारीत होता.राजाने काहीही अन्याय केला.तरी त्याच्याविरुद्ध बंड करणे कधीही क्षम्य होणार नाही असे तो म्हणे.स्वर्गामध्ये सामाजिक न्याय स्थापण्यासाठी तो जन्मभर धडपडला;पण पृथ्वीवर सामाजिक न्याय स्थापण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र त्याने शिव्याशाप दिले. 'खुनी व लुटालूट करणारे गुंड शेतकरी' असे एक पत्रक त्याने लिहिले.थोर इरॅस्मसूने या पत्रकावर 'केवळ रानटी' असा शेरा मारला. या पत्रकात ल्यूथर राजांना आग्रहाने सांगतो,हे शेतकऱ्यांचे बंड रक्तात बुडवून टाका." ख्रिस्ताच्या प्रेमधर्माचा हा शेवटचा भाष्यकार लिहितो, "राजेरजवाड्यांनो,इकडे या.हे बंड मोडायचे

आहे.हे अराजक थांबवायचे आहे.स्टेट वाचायचे आहे.या सारे धावून,हाणा,मारा,भोसका,ठार करा,गळे दाबा." राजेरजवाड्यांना पुन्हा असे प्रवचन पाजण्याची गरज नव्हती.या नवीन धर्मसुधारकांपासून स्फूर्ती व संदेश घेऊन त्यांनी शेतकऱ्यांस ठायी ठायी ठेचले,मारले, हाणले,ठार केले आणि अल्पावधीतच हे बंड शांत केले.ज्यूंच्या बाबतीतही त्याची पूर्वीची वृत्ती बदलली.ज्यूंना ते पुढे प्रॉटेस्टंट होतील,या आशेने त्याने सहानुभूती दाखविली होती.पण आपल्याच धर्माला चिकटून राहण्याचा त्यांचा अभंग निश्चय जेव्हा दिसून आला,तेव्हा तो त्यांच्यावरही आग पाखडू लागला.पूर्वी जसा तो शेतकऱ्यांवर तुटून पडला तसा आता तो ज्यूंवरही उलटला."ज्यूंच्या बाबतीत काय करावे?"असा प्रश्न विचारला असता त्याने जाहीररीत्या दिलेल्या उत्तरात तो म्हणतो,"त्यांची धर्ममंदिरे व त्यांच्या पाठशाळा जाळून टाका." जे जळणार नाहीत, ते मातीत गाडून टाका.त्यांची घरे लुटा,बरबाद करा.त्याची प्रार्थनापुस्तके,त्यांचे धर्मग्रंथ सारे जप्त करा. त्यांच्या धर्मोपाध्यायांना धर्म शिकविण्याची बंदी करा.जर ते ऐकणार नाहीत,तर त्यांना 'तुम्हाला ठार मारण्यात येईल,

तुमचे अवयवच्छेदन होईल', असे सांगा व तरीही त्यांनी न ऐकल्यास त्यांच्या जिभा उपटा." ज्या ज्यूंनी ल्यूथरला त्याचा देव दिला, येशू दिला,त्या ज्यूवरच त्याने अशी आग पाखडली!जवळजवळ चारशे पृष्ठांचे शापपुराण त्याने ज्यूंच्या बाबतीत खरडले आहे.


वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी,म्हणजे १५४६ साली ल्यूथर मरण पावला.जुलमांविरुद्ध बंड करून त्याने सार्वजनिक जीवनास आरंभ केला;पण शेवटी तो स्वतःच जुलूम करणारा ठरला.प्रो. जॉर्ज फूट मूर हा आपल्या 'धर्माचा इतिहास' नामक ग्रंथाच्या दुसऱ्या भागात लिहितो, " मध्ययुगातील चर्च ज्याप्रमाणे सत्ता व मत्ता यामागे उभे असे,त्याचप्रमाणे ल्यूथरचा धर्मही सत्ताधीशांना व मालदारांना आशीर्वाद देण्यासाठीच उभा राहिला.

बायबलातून इहलोकी व परलोकी नवीन आशा मिळेल असे ज्यांस वाटत होते,त्यांच्या आशेची ल्यूथरने राखरांगोळी करून टाकली..! " हेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर असे म्हणता येईल की,ख्रिस्ताने पददलितांच्या रक्षणासाठी धर्म स्थापला;पण ल्यूथरने मात्र पूर्वीच्या कित्येक कॅथॉलिकांप्रमाणेच पददलितांवर जुलूम करणारा धर्मच स्थापण्याचा यत्न केला.रूढ ख्रिश्चन धर्म ख्रिस्ताच्या धर्मापासून अद्याप फार दूर होता.



९/३/२४

सॉक्रेटिसचं रहस्य..Secret of Socrates..

लोकांशी बोलणं सुरू करताना तुम्ही तुमच्या मतभेदाचा उल्लेख सगळ्यात आधी करू नका. तुम्ही आधी त्या गोष्टींवर जोर द्या आणि जोर देत राहा ज्यावर तुम्ही दोघे सहमत आहात.जर संभव असेल,तर या गोष्टीवर जोर द्या की, तुमच्या दोघांचं लक्ष्य एकच आहे आणि तुमच्यात अंतर फक्त त्या वस्तूचं आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही कक्षापर्यंत पोहोचायला बघता आहात.


सुरुवातीपासूनच समोरच्या व्यक्तीकडून होकार मिळवत राहा.जिथपर्यंत होऊ शकेल तिथपर्यंत अशी नौबतच येऊ देऊ नका की,समोरची व्यक्ती 'नाही' म्हणेल.एकदा का समोरच्यानेही नाही म्हटलं की,

तेव्हा प्रोफेसर ओवरस्ट्रीटच्या मतानुसार नंतर त्याच्याशी सामना करणे कठीण होतं.एकदा 'नाही' म्हटल्यानंतर तुमच्या व्यक्तित्वाच्या गर्वाचं हे मागणं असतं की,तुम्ही तुमच्या बोलण्यावर अडून राहा.

तुम्हाला नंतर असं वाटू शकतं की,तुम्ही चुकीने 'नाही' म्हटलं;परंतु तुम्ही आपल्या गर्वामुळे हे स्वीकारू शकत नाही.तुम्ही एकदा जे सांगितलं,त्यावरच अडून राहणं पसंत करता.याकरता हे खूप महत्त्वाचं होऊन जातं की गप्पांची सुरुवात 'होकारानी' व्हावी.


समजदार वक्ता आपल्या श्रोत्यांकडून सुरुवातीपासूनच 'हो' म्हणवत जातो.या प्रकारे श्रोत्यांची मानसिकता सकारात्मक दिशेची बनते. हे एका बिलियर्डच्या चेंडूच्या गतीसारखं आहे. दिशा बदलण्याकरता शक्तीची आवश्यकता असते आणि त्याला विरुद्ध दिशेकडे घेऊन जायला तर खूपच शक्तीची जरूर पडते.


इथे मनोवैज्ञानिक पॅटर्न खूपच स्पष्ट आहे.जेव्हा कोणी व्यक्ती 'नाही' म्हणते तेव्हा त्याचं पूर्ण शरीर त्याच्या ग्रंथी,त्याची नर्व्हस सिस्टिम आणि त्याचं मांसपेशीय तंत्र सगळंच एका नकारात्मक स्थितीत येऊन जातं.

साधारणतःखूप सूक्ष्म परंतु नजरेत येणारी लक्षणं बघू शकतो की शारीरिक वेगळेपण आहे किंवा त्याची तयारी आहे.पूर्ण न्यूरोमस्क्युलर सिस्टिम स्वीकार करण्याच्या विरोधात जाते.याच्या विपरीत जेव्हा कोणी व्यक्ती 'हो' म्हणते तेव्हा वेगळेपणाची कुठलीच लक्षणं नजरेस येत नाहीत.पूर्ण सिस्टिम पुढे जाणारी,स्वीकार करणारी आणि सैल असते. याकरता आपण सुरुवातीलाच समोरच्या

कडून जितक्या वेळा 'हो' म्हणवतो,आपण आपल्या शेवटच्या प्रस्तावाला मान्यता मिळवण्यात सफलतेच्या जवळ जातो.हे तंत्र खूपच सोपे आहे,तरीपण याकडे नेहमी दुर्लक्षच केले जाते.असे वाटते की,जास्त करून लोक सुरुवातीलाच विरोध प्रदर्शन करून आपलं महत्त्व दाखवतात.जेव्हा कोणी विद्यार्थी किंवा ग्राहक,मुलगा,पती किंवा पत्नी सुरुवातीला 'नाही' म्हणतात,तेव्हा तुम्हाला देवदूताची बुद्धी आणि धैर्याची जरूर असते.


'हो' म्हणवण्याच्या याच तंत्रामुळे न्यू यॉर्कमधले ग्रीनविच सेविंग्ज बँकेचे टेलर जेम्स एबरसन एका ग्राहकाला आपल्या बँकेत खातं उघडण्यासाठी तयार करू शकले.


मिस्टर एबरसननी सांगितलं,हा माणूस आमच्या बँकेत खातं उघडायचं म्हणत होता.मी त्याला भरायला सामान्य फॉर्म दिला.त्याने काही प्रश्नांची उत्तरं तर इच्छेनी दिली;

पण काही प्रश्नांची उत्तरं देण्याबद्दल सरळ नाही म्हणून सांगितलं.जर असे झालं असतं,तर मी या संभावित ग्राहकाला सरळ सांगितल असतं की,जर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं नाही दिली तर आम्ही त्याचं खातं उघडू शकत नाही.मला हे स्वीकारायला लाज वाटते की,मी भूतकाळात या प्रकाराच्या गोष्टी अनेक वेळा सांगून चुकलो आहे.स्वाभाविक रूपात या प्रकारचं अल्टीमेटम देण्यानंतर मला आनंद होतो.मी या प्रकारे सांगत होतो की,बॉस कोण होता आणि बँकेच्या नियम कायद्यांची अवहेलना नाही करू शकत;पण ही गोष्ट तर निश्चित होती की माझ्या या प्रकारच्या वागण्यामुळे समोरच्या त्या व्यक्तीला महत्त्व आणि स्वागताची भावना मिळत नव्हती जो आमच्या बँकेत ग्राहक बनायला आला होता.त्या दिवशी मी बुद्धीचा प्रयोग करायचं ठरवलं.मी निश्चय केला की मी त्याला हे नाही सांगणार की बँकेला काय हवंय, तर हे सांगेन की,त्या प्रश्नांची उत्तर देणं ग्राहकाच्या हिताचं आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर ही की मी त्याला सुरुवातीपासूनच 'हो, हो' म्हणायला विवश केलं.मी त्याला सांगितलं की त्याने माहिती नाही दिली तरी त्याने काही बँकेला फरक पडत नाही.मग मी त्याला सांगितलं की,पण जर तुमचा मृत्यू झाला,तर तुम्हाला वाटणार नाही का की तुमचा पैसा तुमच्या वारसाना मिळावा,जो की कायद्याने त्यांना मिळाला पाहिजे.बिलकुल त्याने उत्तर दिलं.मी म्हटलं,काय तुम्हाला नाही वाटत की तुम्ही आम्हाला तुमच्या वारसाचं नाव सांगावं म्हणजे आम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या मृत्यूनंतर पैसे उशीर न होता आणि न चुकता देऊ शकू.परत एकदा त्याने म्हटलं 'हो'.


त्या व्यक्तीचा मूड बदलून गेला.कारण की आता त्याला कळलं होतं की,ही माहिती बँकेच्या फायद्याकरता नसून,

उलट त्याच्याच फायद्याकरता जरुरी आहे.बँकेतून रवाना व्हायच्या आधी न फक्त तो मलाच पूर्ण माहिती देऊन गेला तर त्याने माझ्या सुचवण्यावरून आपल्या आईच्या नावावरही एक ट्रस्ट अकाउंट उघडलं.हेच नाही,तर त्यांनी आपल्या आईच्या बाबतीत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आनंदाने दिली.मला लक्षात आलं की, सुरुवाती

पासूनच त्याला 'हो,हो' करवल्यामुळे तो विसरून गेला की,मुद्दा काय होता आणि तो माझ्या सुचवण्यावरून एका मागून एक मानत गेला.जोसेफ एलिसन बेस्टिंग हाउस इलेक्ट्रिक कंपनीचे सेल्समन होते.त्यांनी आम्हाला त्यांची गोष्ट सांगितली,माझ्या एरियात एक माणूस होता,ज्याला आमची कंपनी सामान विकायचं म्हणत होती.माझ्या आधीचा सेल्समन दहा वर्षांपर्यंत प्रयत्न करून चुकला होता.जेव्हा मी तो भाग सांभाळला तेव्हा तीन वर्षं मीसुद्धा प्रयत्न केला पण मला काही कुठलीच ऑर्डर मिळाली नाही.शेवटी तेरा वर्षांच्या मेहनतीनंतर आम्ही त्याला काही मोटरी विकण्यात यश मिळवलं.मला अशी आशा होती की,जर आमची मोटर त्याला पसंत पडली तर तो आमच्याकडून खूप मोटरी खरेदी करेल.


माझा विश्वास होता की,आमच्या मोटर्स त्याला निश्चितपणे आवडतील,याकरता जेव्हा तीन आठवड्यांनंतर मी त्याला भेटायला गेलो तेव्हा मी चांगल्या मूडमध्ये होतो;परंतु चीफ इंजिनिअरने मला धक्का देणारी बातमी ऐकवली,

एलिसन,मी तुमच्याकडून बाकी मोटर्स नाही विकत घेऊ इच्छित." का? मी हैराण होऊन विचारलं.कारण तुमची मोटर बरीच गरम होते.मी त्यावर हातपण ठेवू शकत नाही.मी खूप वेळपर्यंत या त-हेच्या मामल्यांवर वाद घातले होते;पण आता मी समजलो की,अशा स्थितीत वाद घालून काही फायदा होणार नाही.याकरता मी 'हो हो' करायला लावणाऱ्या तंत्रांचा उपयोग केला. अच्छा,मिस्टर स्मिथ ! मी म्हटलं.मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे की जर आमची मोटर जास्त गरम होते,तर तुम्हाला ती विकत घ्यायला नको.तुम्हाला तीच मोटर विकत घ्यायला पाहिजे जी नॅशनल इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चर्सच्या स्टँडर्डनी जास्त गरम नाही होत.नाही का?" तो सहमत झाला.मला माझा पहिला होकार मिळाला.इलेक्ट्रिकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या नियमाप्रमाणे मोटरचे तापमान खोलीच्या तापमानाच्या ७२ डिग्री फॅरेनहीटपेक्षा जास्त नको पाहिजे.बरोबर ना?"


हो तो सहमत झाला.हे अगदी ठीक आहे.पण तुमची मोटर त्यापेक्षा जास्त गरम होते.मी त्याच्याशी वाद घातला नाही.मी त्याला फक्त एवढंच विचारलं की,मिलच्या खोलीचे तापमान किती आहे.त्याने उत्तर दिलं की,

जवळपास ७५ डिग्री फॅरेनहीट्स.यावर मी म्हटलं की,जर मिलच्या खोलीचं तापमान ७५ डिग्री आणखीन जोडलं,तर ते सगळं मिळून १४७ डिग्री फॅरेनहीटपेक्षा जास्त होईल.

जर तुम्ही १४७ डिग्री फॅरेनहीटच्या गरम पाण्यात हात बुडवले तर काय तुमचे हात भाजणार नाहीत का?


एकदा परत त्याला म्हणावं लागलं,'हो'.


मला असं वाटतं की तुम्ही बरोबर आहात,त्यांनी मान्य केलं.आम्ही काही वेळ बोललो.त्याच्या नंतर त्याने आपल्या सेक्रेटरीला बोलवलं आणि आम्हाला पुढच्या महिन्याकरता ३५,००० डॉलरच्या बिझनेसची ऑर्डर दिली.अनेक वर्षांनंतर आणि बिझनेसमध्ये हजारो डॉलर्सचा घाटा सहन केल्यानंतर शेवटी हे शिकलो की,

वाद घालून कोणताच फायदा होत नाही.दुसऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजणं जास्त महत्त्वपूर्ण आणि जास्त फायद्याचं असतं.त्याच्या दृष्टिकोनातून समजून घेत मग त्याच्याकडून हो हो करवण्यात जास्त कुशलता आहे.

एड्डी स्नो ओकलँड,कॅलिफोर्नियामध्ये आमचा कोर्स स्पॉन्सर करतात त्यांनी आम्हाला सांगितलं की,ते एका दुकानाचे चांगले ग्राहक फक्त याकरता बनले की प्रोपरायटरने त्यांना 'हो,हो' करण्यावर विवश केलं होतं.एड्डीची रुची बो हंटिंगमध्ये होती आणि त्यांनी एका स्थानिक बो स्टोअरमधून उपकरण आणि सप्लाई विकत घेण्यात बरेच पैसे खर्च केले होते.जेव्हा त्यांचा भाऊ त्यांना भेटायला आला तेव्हा त्यांनी आपल्या भावाकरता एक धनुष्य भाड्यानी घ्यायचं ठरवलं.त्यांनी एका दुकानात फोन केला जिथे सेल्स क्लार्कने त्यांना सांगितलं की,ते लोक धनुष्य भाड्याने नाही देत.त्याच्या पुढे काय झालं हे सांगताना एड्डी म्हणाले की -


एका खूप आनंदी व्यक्तीने फोनला उत्तर दिलं. भाड्यानी धनुष्य देण्याच्या बाबतीतला त्याचा दृष्टिकोन अगदीच वेगळा होता.त्याने सांगितलं की,त्याला खेद आहे की तो आम्हाला धनुष्य भाड्याने देऊ शकत नाही.त्यांनी मला विचारलं की,मी याआधी कधी धनुष्य भाड्याने घेतले आहे का? मी उत्तर दिलं की,हो खूप वर्षांपूर्वी. त्यांनी मला आठवण दिली की,बहुतेक मी भाड्याचे २५ किंवा ३० डॉलर्स दिले असेन.मी परत एकदा 'हो' म्हणालो.मग त्यानी विचारलं की काय मी अशा प्रकारची व्यक्ती आहे जी पैसे वाचवू इच्छिते.सरळच होतं की मी परत 'हो' म्हणेन.मग त्याने पुढे माहिती दिली की,त्यांच्या इथे धनुष्याचे असे सेट आहेत ज्यात आवश्यक सगळे उपकरण लागले आहेत आणि त्यांची किंमत फक्त ३४.९५ डॉलर्स आहे.मी धनुष्याच्या भाड्यात जेवढे पैसे खर्च करतोय,त्याच्यापेक्षा फक्त ४.९५ डॉलर्स जास्त पैसे खर्च केल्यास मी (मित्र जोडा-डेल कार्नेगी-मंजुल पब्लिसिंग हाऊस-पूणे-अनुवाद- कृपा कुलकर्णी)


धनुष्याचा पूर्ण सेट विकत घेऊ शकतो.त्याने सांगितलं की,याच कारणाकरता त्यांनी धनुष्य भाड्याने देणे बंद करून टाकलंय.त्याचा तो तर्क मला पटला? माझ्या 'हो' च्या प्रतिक्रियेच्या कारणामुळे मी सेट खरेदी केला.सेट विकत घेण्याबरोबर मी त्याच्या दुकानातून आणखीन काही सामान खरेदी केलं आणि तेव्हापासून मी तिथला कायमचा ग्राहक बनलो.


अथेन्सचे सॉक्रेटिस जगातील महानतम दार्शनिकामधले एक होते.त्यांनी असं काही केलं जे इतिहासात केवळ मूठभर लोकच करू शकले.त्यांनी मानवाची चिंतनाची दिशाच बदलून टाकली.त्यांचा मृत्यू २४ व्या शतकाच्या आधी झाला होता;पण आजपण ते सर्वश्रेष्ठ वादविवाद करणाऱ्यांमधले मोजले जातात,जे लोकांना आपली गोष्ट पटवायला समर्थ होते.


त्यांची पद्धत काय होती? ते लोकांना हे सांगत होते की ते चूक आहेत? नाही,ते असं कधी करत नव्हते.ते त्यापेक्षा जास्त चतुर होते.त्यांचं तंत्र ज्याला सॉक्रेटिसचं तंत्र असं म्हटलं जातं,हो हो चं उत्तर येण्यावर आधारित होती. ते असे प्रश्न विचारायचे की,समोरच्याला सहमत व्हावंच लागायचं.ते एकामागून एक हो म्हणवत आणि शेवटी त्यांचे विरोधक या स्थितीत यायचे की, त्यांना त्याच निष्कर्षावर यावं लागायचं,ज्याला मानायला ते काही वेळ आधी बिलकूल तयार नसायचे.पुढच्या वेळी जेव्हा आमची इच्छा कोणाला सांगायची असेल की,ते चूक आहेत तर सॉक्रेटिसला आठवा आणि एक नम्रपणे प्रश्न विचारा - एक असा प्रश्न विचारा ज्याचं उत्तर 'हो' असेल.चीनमध्ये एक म्हण आहे ज्यात पूर्वेकडल्या खूप वर्षं जुन्या बुद्धिमत्तेचे सार आहेअलगद चालणारी व्यक्ती दूरपर्यंत जाते.त्यांनी मानवी स्वभावाला समजण्याकरता पाच हजार वर्षं लावली आणि त्यांनी आपल्या निष्कर्षाला खूपच चांगल्या पद्धतीने व्यक्त केलं आहे.अलगद चालणारी व्यक्ती दूरपर्यंत पोहोचते.

७/३/२४

गोष्ट शिकण्यासारखी A thing to learn

स्काॅटलंडयार्ड मधील ही गोष्ट आहे..!


'बेकर' नावाचा एका अतिशय श्रीमंत गृहस्थाचा पुतण्या जाॅन हा एकमेव सख्खा वारसदार होता. काका अगदी मुलाप्रमाणे जाॅन शी व्यवहार करीत होते.जाॅन चं मात्र काकांशी कधी फारसं पटत नसे.दोघांच्या विचारात जमीन

अस्मानाचा फरक होता.जाॅन ला भटकंती अतिशय प्रिय होती.वेगवेगळे प्रदेश फिरुन यावे धमाल आयुष्य जगावं,

ह्या उद्देशाने एक दिवस जाॅन घरातून बाहेर पडला... जाॅन च्या सात पिढ्या बसून खातील एवढी रग्गड संपत्ती असल्याने कसलीही कमी नव्हती. भटक-भटक भटकावं,

एखाद्या उंची हाॅटेलमधे मुक्काम ठोकावा,चैन करावी,

कंटाळा आला की दुसर्‍या शहरात जावं;हा त्याचा आयुष्यक्रम होता.इकडे काका मात्र त्याला दरवेळेस तो म्हणेल तेवढा पैसा ठरावीक तारखेला त्याने कळवलेल्या ठिकाणी पाठवत असत. 


'जाॅनने महिन्यातून एखादं पत्र लिहून आपला समाचार व झालेल्या खर्चाचा आकडा त्याने विनातपशील कळवावा.पण पत्र नसेल तर त्या महिन्यात मात्र पैसा मिळणार नाही.'


एवढी एकच त्यांची अट होती.


असे दिवसांमागून दिवस जात होते.भटक्या जाॅनला प्रवासात 'निक' नावाचा त्याच्याच वयाचा एक सोबती मिळाला.निक अतिशय चलाख व कामसू होता.तो सुद्धा तसा भटक्या स्वभावाचा होता.त्याचं आत्तापर्यंतचं आयुष्य तसं दारिद्र्यात व्यतीत झालं होतं. 


जाॅनने त्याला मित्राचं स्थान व मान दिला.त्याचा सर्व खर्च उचलण्याचं आश्वासन दिलं.जाॅन तसा आळशी प्रवृत्तीचा होता काकांना पत्र लिहिण्याची जबाबदारी त्याने निक वर टाकली. मैत्रीचं नातं मिळालं तरी निक मात्र जाॅन ला मालक समजायचा.


जाॅन ची लहानसहान सर्व कामं तो करायचा. जाॅन च्या काकांना 'जाॅन' च्या नावाने वेळच्या वेळी पत्र पाठवायचा,

काकांनी विचारणा केली नसूनही रोजच्या रोज खर्चाचा हिशोब ठेवायचा.


जाॅन चा आळस इतका वाढत गेला की पत्राखाली आपली स्वाक्षरी करायलासुद्धा तो निक लाच सांगू लागला. हळूहळू जाॅन च्या वतीने निकच सर्व ख्यालीखुशाली व पैशाचा तपशील काकांना कळवू लागला.'जाॅन' च्या सांगण्यावरुन 'निक' नावाचा मित्र मिळाल्याचं काकांना कळवलं.व 'जाॅन' च्याच सांगण्यावरुन 'निक' चं कौतुकही पत्रामधून काकांना कळवलं. काळ पुढे सरकत होता... आता काकांच्या पत्रांमधेही निक चं कौतुक येऊ लागलं.


" निक तुझ्याबरोबर आहे,तुझी काळजी घेतो, सगळे हिशोब ठेवतो,दर महिन्याला पत्रव्यवहाराची आठवण करुन देतो.निक मुळे मला आता तुझी काळजी राहिली नाही,त्याला तुझ्या मित्राप्रमाणेच वागवत जा..." असा मजकूरही त्यात वारंवार दिसू लागला.


दिवस... महिने... वर्ष... मजेत चालली होती. जाॅन प्रमाणे निक ला सुद्धा आता ऐषारामाची सवय जडली होती;पण

'जाॅन ची लहर मधेच फिरली व त्याने आपल्याला दूर लोटलं तर आपले हाल कुत्रा खाणार नाही...'असे विचार निक च्या मनात येऊ लागले.तो बोलता-बोलता हा विषय आडमार्गाने काढायचा म्हणायचा,


"अरे जाॅन,माझ्या आयुष्याचा विचार मला कधीतरी करायलाच हवा.असं किती दिवस मी तुमच्या पैशावर अवलंबून राहू?"_


"त्याची काही गरज नाही रे मित्रा,मी तुला कधीही अंतर देणार नाही."


" पण... तुझी मर्जी अचानक फिरली तर....?"_


" नाही रेऽ ते अशक्य आहे!"_


तरीदेखील माझ्या समाधानासाठी काहीतरी तू लेखी लिहून दे ना...माझ्या नावाने एखादी रक्कम बँकेत जमा करुन दे."


" कशाला? तसंही येणारे सर्व पैसे तुझ्याजवळच असतात...त्यातले हवे तेवढे पैसे काढून ठेवत जा.मला सांगूदेखील नकोस."


"अरे नाही,ही लबाडी माझ्या हातून होणार नाही; म्हणून तर काही रक्कम लेखी माझ्या नावाने करायला सांगतोय ना?" जाॅन त्यावर फक्त हसायचा व तो विषय तिथंच संपायचा. पण निक च्या मनातली काळजी मात्र कमी होत नव्हती आणि लबाडी करायला मन धजावतही नव्हतं.वर्षांमागून वर्ष गेली... हे दोघं अनेक शहरांचा दौरा करत करत स्काॅटलंडयार्डपासून खूप दूरच्या शहरात आले असताना एक दिवस अचानक तिथे एक तार आली...

 

'Mr.Becker dead.Start early...'


काका अचानक वारल्याची तार निक ने जाॅन ला वाचून दाखवली.तारेमधे लिहिल्याप्रमाणे आपल्याला ताबडतोब काकांकडे जाणं किती आवश्यक आहे ते जाॅन ला सांगितलं. " थोड्या वेळाने बोलू,माझं डोकं आत्ता खूप दुखतंय...मला जरा विश्रांती घेऊ दे." जॉन एवढंच म्हणाला... "अरे असं काय म्हणतोस? तिथं तू नाहीस... काका अचानक वारले आहेत आणि त्यांच्या अमाप संपत्तीचा तू एकमेव सख्खा वारसदार आहेस...! तू तिथं लगेच गेला नाहीस व इतर नातेवाईकांनी सगळी संपत्ती गिळंकृत केली तर...?? "

 

"हे बघ निक,माझं डोकं प्रचंड दुखतंय.मला झोपू दे."_ एवढंच बोलून जाॅन झोपून गेला.


निक ची ती रात्र तंद्रीतच गेली.सकाळी 'बिग बेन'च्या आवाजाने तो भानावर आला.बघतो तर जाॅन तापाने फणफणला होता.निक ने ताबडतोब डाॅक्टरला बोलावलं.डाॅक्टरांनी जाॅन ला तपासलं.स्टेथोस्कोप बाजूला काढून ते म्हणाले, 


" दोन दिवसांची औषधं देतो... तोपर्यंत काही चाचण्या करुन घेऊ;कारण मला हा साधा ताप वाटत नाही.ह्या परिस्थितीत तुम्ही मात्र ह्याला सोडून कुठेही जाऊ नका...!"_


डाॅक्टरांनी असं सांगितल्यावर निक ला काही सुचेनासं झालं. 'जाॅन चं काही कमी जास्त झालं तर आपलं काय होईल? आपण तर रस्त्यावर येऊ...!'_ ह्या विचाराने निक च्या छातीत धऽस्स झालं,जाॅन ची प्रकृती ढासळत गेली व चार दिवसातच जाॅन ने जगाचा निरोप घेतला...!


डेथ सर्टिफिकेट लिहिताना डाॅक्टरने विचारलं, 


"ह्याचं आणि तुमचं नातं काय? "


"अंऽऽऽ.... नातंऽऽ.....?? नातं म्हणजे खरं सांगायचं तर नोकर व मालकाचं!"_निक म्हणाला.


" म्हणजेऽऽऽ... हा इसम तुमचा?...."


क्षणभर निक च्या मनात वादळ घोंगावलं व स्वतःच्या भविष्याची काळजी भेडसावली...


डाॅक्टरांना नजरेस नजर न मिळवता तो पटकन् म्हणाला, 


"हा 'निक'...!! माझा नोकर

व मी त्याचा मालक... 'जाॅन'...!!!


डाॅक्टरांकडून निक नं 'निक' च्या नावाचं डेथ सर्टिफिकेट घेतलं व 'जाॅन' चा दफनविधी उरकला.रुमवर येऊन सामानाची आवराआवर केली व निक ने 'जॉन' बनून तडक स्काॅटलंडयार्ड गाठलं...!


.....आणि....


काकांच्या भव्य अशा 'बेकर्स व्हिला' मध्ये तो  'जाॅन' ह्या नावाने दाखल झाला.


अनेक वर्षांच्या पत्रव्यवहारातून त्याला जाॅन च्या कुटुंबाची पूर्ण माहिती झाली होती... त्याचं व जाॅन चं वयसुद्धा जवळपास सारखंच होतं... जाॅन कितीतरी वर्ष घराबाहेर असल्याने कुणाला जाॅन चा चेहरा आठवण्याची शक्यताही नव्हती व काका तर वारले होते..!!!


त्यामुळे 'निक' हा जाॅन'म्हणून तिथे सहज स्वीकारला गेला...! काकांचा एकुलता एक सख्खा पुतण्या आल्याची खबर लागल्याने १-२ दिवसातच काकांचे साॅलिसिटर आले.


"जाॅन,मी तार पाठवली होती... तुम्ही लगेच इथे याल अशी अपेक्षा होती."


"सर,मी येणारच होतो पण माझा मित्र 'निक' आजारी पडला.त्याला एकट्याला अनोळखी शहरात सोडून जाणं मला गैर वाटलं व त्या आजारातच 'निक' चा मृत्यू झाला.सारं दुःख गिळून मी इथे आलो..."_ असं म्हणून त्याने 'निक'च्या नावे बनवलेलं डेथ सर्टिफिकेट साॅलिसिटरपुढे ठेवलं.


ओऽऽह... नोऽ.!! साॅलिसिटरने दीर्घ सुस्कारा सोडला..'जाॅन',हे फार वाईट झालं...!


" काकांनी ह्या मृत्यूपत्रात आपली सर्व संपत्ती तुमच्या ह्या प्रामाणिक मित्राच्या; म्हणजे 'निक'च्या नावाने केली आहे.जाॅन,तुमच्यापेक्षा ह्या 'निक' वरच काकांचा अधिक विश्वास होता....!!!


"आणि... आता मात्र 'निक च्या पश्चात् ही सर्व संपत्ती जवळपासच्या सर्व चर्चेसमधे दान देण्यात यावी... आपल्या संपत्तीमधला एक कणही अप्रामाणिक व्यक्तीला मिळू नये',अशी काकांची अखेरची इच्छा होती..!!"_

 

हे ऐकल्यावर मात्र कोणीतरी येऊन फाऽडकन् थोबाडीत मारावी आणि डोळ्यासमोर काजवे चमकावेत...असं निक चं झालं व त्याला जाॅन बरोबरचा काही दिवसांपूर्वीच  झालेला संवाद आठवला....


सिग्नलपाशी उभे असताना जाॅन म्हणाला होता..


समोर पोलिस असताना सिग्नल न तोडणे ही तर 'Honesty' आहे;पण पोलिस नसतानाही नियमांचे उल्लंघन न करणे ही झाली.' 'INTEGRITY!!!'


साॅलिसिटरने आपल्या ब्रीफकेसमधून मृत्युपत्र काढून वाचायला सुरुवात केली... पण,सुन्न अवस्थेत असलेल्या निक च्या कानात त्यातला एकही शब्द घुसत नव्हता... त्याचं डोकं बधीर झालं होतं.त्याच्या डोळ्यासमोर फक्त समोरच्या टेबलवरील डेथ सर्टिफिकेट मधली अक्षरं नाचत होती...


_'Mr. Nick is clinically dead...!'_


लेखक - अनामिक / अज्ञात

५/३/२४

मी घेतलेली माघार..The retreat I took..|

दुसऱ्या दिवशी आम्ही लपत छपत भक्ष्याजवळ गेलो पण रात्री बिबळ्या तिथे परतलेला नाही हे कळल्यावर जरा निराशाच झाली कारण आदल्या दिवशी आमच्यापैकी एकाला उचलण्यात अपयश आल्यावर तरी तो भक्ष्याकडे परत येईल अशी आमची अपेक्षा होती.दिवसभर इबॉटसन त्याच्यासाठी पाठवून दिलेलं ऑफिसचं काम उरकत बसला तर मी रायफल घेऊन जरा आसपासच्या जंगलातून फेरफटका मारून यायचं ठरवलं.इथे जमीन जरा टणक होती,शिवाय पाईनच्या सुयांसारख्या पानांनी आच्छादली होती.त्यामुळे कुठेही माग मिळणं शक्य नव्हतं.ज्या डोंगरापलीकडे दाट जंगल आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.त्या डोंगरावरून कडेकडेने मी निघालो.इथेही शोध घेण्याचं काम अवघडच गेलं कारण तिथे दाट झुडुपं होती व पाऊल ठरू नये असे खोल कडे होते.पण ह्या भागात जनावरं मात्र पुष्कळ होती आणि जिथे जिथे पायवाटा ओलांडून जात होत्या तिथे मला भेकर,घुरल,रानडुक्कर किंवा एकट्यादुकट्या 'सराव'चे (पहाडी सांबर) ठसे मात्र दिसले.एक खूप जुना 'स्क्रेपमार्क' (जमीनीवर पायाने खरवडल्याच्या खुणा) सोडला तर बिबळ्याचा मात्र काही माग दिसला नाही. आमचं जेवण चालू असताना रुद्रप्रयागवरून पाठवलेला जिनट्रॅप येऊन पोचला.दुपारी आम्ही तो घेऊन भक्ष्या

जवळ गेलो.तिथे तो सापळा काळजीपूर्वक लावला आणि संपूर्ण मृतदेहामध्ये सायनाईड पेरून ठेवलं.मला किंवा इबॉटसनला या विषाचा कधीच अनुभव नव्हता.


नैनितालहून निघताना एका डॉक्टर मित्राशी माझी या संदर्भात थोडी चर्चा झाली होती.तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की त्या नरभक्षकाला मारण्यासाठी ते जे काही शक्य आहेत ते सर्व मार्ग वापरावेत अशी माझ्याकडून अपेक्षा आहे. पण या बिबळ्यावर विषाचा काही परिणाम होत नाही असं.आढळून आलेलं आहे.त्यावेळेला त्याने मला सल्ला दिला की मार्जार कुळातील सर्व जनावरांसाठी सायनाईड हे योग्य विष आहे त्यामुळे मी ते वापरून पाहावं.मी ही माहिती इबॉटसनला दिली होती आणि काही दिवस अगोदर सायनाइडच्या कॅप्सूल तिथे पोचल्याही होत्या,त्यातल्याच काही कॅप्सूल आम्ही बिबळ्याने खाल्लेल्या भागात पेरून ठेवल्या.


आज रात्री बिबळ्या तिथे येण्याची शक्यता होतीच पण काल त्याने आम्हाला भक्ष्याजवळ पाहिलं असल्यानं आम्ही जवळपास कुठेही बसायचं नाही असं ठरवलं.

पायवाटेजवळच पाईनचं एक मोठं झाड होतं.ते आम्ही निवडलं व त्यावरच एक ऐसपैस मचाण बांधलं.निळ्या ज्योतीच्या स्टोव्हवर इबॉटसनने बनवलेलं जेवण जेवल्यावर आम्ही मचाणावर गवताची गुबगुबीत गादी तयार करून त्यावर जागा घेतल्या.एकमेकांशेजारी चांगले पाय ताणून झोपून सिगरेट पिता येईल इतकं ते मचाण मोठं होतं. आज तरी आमचा उद्देश भक्ष्याच्या दिशेकडून येणाऱ्या आवाजाकडे लक्ष ठेवायचं एवढाच असल्याने ते शक्यही होतं.आम्ही आळीपाळीने पहारा देत राहिलो.

यावेळी सापळा लावण्यासाठी विशिष्ट अशी पायवाट नसल्याने बिबळ्या त्यात सापडेल अशी फक्त आशाच करणं आमच्या हातात होतं.रात्री एकदा एका भेकरांने अलार्म कॉल दिला खरा पण ज्या दिशेने बिबळ्या येईल असा अंदाज होता त्याच्या अगदी विरुद्ध दिशेकडून ! तांबडं फुटल्यावर आम्ही चहा करून प्यायलो.भक्ष्याला भेट दिली.तेव्हा ते आहे तसंच पडलं होतं.ब्रेकफास्ट लवकर उरकून इबॉटसनने रुद्रप्रयाग सोडलं.मी सामानाची बांधाबांध करून गावकऱ्यांशी निरोपाच्या गप्पागोष्टी करत होतो.तेवढ्यात त्या गावापासून चार मैलांवरच्या एका खेड्यात बिबळ्याने गाय मारल्याची खबर घेऊन काही माणसं आली.त्यांना संशय होता ही गाय नरभक्षक बिबळ्यानेच मारली असावी कारण आदल्या रात्री म्हणजे माझा व इबॉटसनचा पाठलाग केला होता त्या रात्री-अगदी पहाटेच्या सुमारास त्याने गावच्या मुखियाचं घर फोडण्याचा प्रयत्न केला होता.नंतर संध्याकाळी घरापासून शंभर यार्डावर जंगलात त्या गायीला मारण्यात आलं होतं. त्यांच्या विनंतीवरून मी परत एकदा नैनितालला जाणं लांबणीवर टाकलं व माझ्याबरोबर जिनट्रॅप आणि विषाच्या कॅप्सूल्स घेऊन त्यांच्या गावात गेलो.मुखियाचं घर शेतातल्या एका उंचवट्यावर बांधलं होतं व घराकडे जाणारी पायवाट काही अंतर मऊ चिखलासारख्या मातीवरून जात होती.

याच ठिकाणी मला बिबळ्याचे पगमार्क्स मिळाले.मी डोंगर चढून येत असतानाच मुखियाने मला पाह्यलं होतं व त्याने माझ्यासाठी गरम गरम ताज्या दुधाचा आणि भरपूर गूळ घातलेला चहा तयार ठेवला होता.


अंगणातच उभं राहून मी हा भरपूर गोड पण फर्मास चहा पित असताना मुखियाने माझं लक्ष दोन दिवसांपूर्वी घर फोडण्याच्या प्रयत्नात बिबळ्याने दरवाजाची जी अवस्था केली होती त्याकडे वेधलं.सुदैवाने छताच्या दुरुस्तीसाठी त्याने तासलेले काही ओंडके घरात आणून ठेवले होते आणि सुरक्षिततेसाठी ते दरवाजाला आतून लावले होते. मुखिया म्हातारा होता आणि संधिवाताचा पेशंट होता त्यामुळे त्याने गाय दाखवण्यासाठी त्याच्या पोराला माझ्याबरोबर पाठवलं आणि मधल्या काळात माझ्यासाठी व माझ्या माणसांसाठी त्याच्या घरातली एक खोली तयार केली.एकदम धडधाकट असलेली ती गाय मला गुरांच्या वाटेच्या जरा वर एका छोट्या सपाट जमीनीच्या तुकड्यावर पडलेली आढळली.यावेळची परिस्थिती जिनट्रॅप ठेवण्यासाठी आदर्श होती.गायींची पाठ जंगली गुलाबाच्या झुडपाला टेकली होती. तिचे पाय फूटभर उंचीच्या बांधाला तटले होते.पुढचे दोन पंजे गायीच्या पुढच्या मागच्या पायांच्या मध्ये ठेवून बांधावर बसून बिबळ्याने रात्री तिचं मांस खाल्लं होतं.गायीच्या पायांमधली जमीन खणून मी माती बाजूला ठेवली.

बिबळ्याने जिथे पंजे ठेवले होते त्या ठिकाणीच मी सापळा पुरला, त्यावर थोडी पानं आणि माती पसरून ठेवली आणि अगदी पूर्वीप्रमाणेच त्यावर वाळलेली पानं,काटक्या वगैरे टाकल्या.तिथे कोणीही आलं असतं तरी तिथे मी काही उद्योग करून ट्रॅप लावलाय हे त्याच्या लक्षात सुद्धा आलं नसतं.


हे सर्व मनासारखं झाल्यावर मी परतलो आणि भक्ष्य व मुखियाचं घर यांच्या मधोमध एका झाडावर चढून गरज लागेल तेव्हा भक्ष्याकडे पतरण्याच्या तयारीत बसलो.

कालीज फीझन्टची एक जोडी त्यांच्या पाच पिल्लांबरोबर काही वेळापासनं माझ्या झाडाखाली फिरत होती. मी त्यांच्याकडे बघत असतानाच अचानक त्यांनी कशाचं तरी सावट घेतलं आणि ते खाली दरीत उडत उडत गेलं.काही सेकंदानंतर एक भेकर माझ्या दिशेला पळत आलं माझ्या झाडाखाली उभं राहून काही वेळ भुंकल्यावर आलं तसं चवड्यावर पळत डोंगराकडे निघून गेलं.त्यानंतर विशेष काहीच झालं नाही. 


रायफलच्या साईट्ससुद्धा दिसू नयेत इतका अंधार झाडाखाली पडल्यावर भी खाली उतरलो आणि माझे रबरी तळाचे बूट घालून गावाच्या दिशेने निघालो. मुखियाच्या घरापासून शंभर यार्डावर ही पायवाट तीस यार्ड लांब व वीस यार्ड रुंद अशा मोकळ्या हिरवळीच्या तुकड्यावरून जात होती.या हिरवळीवर डोंगराच्या दिशेला एक मोठा खडक होता.इथे पोचल्यावर मला अचानक आतून जाणीव झाली की आपला पाठलाग होतोय ! या परिस्थितीचा मी उपयोग करून घ्यायचं ठरवलं.मऊ चिखलाच्या जमीनीवरून दोन लांब ढांगा टाकून मी त्या खडकाच्या मागे पोचलो.माझी नजर आता मी भक्ष्याच्या दिशेला केंद्रित केली.जवळ जवळ दहा मिनिटं मी त्याच स्थितीत होतो पण आता अंधार दाटून यायला लागल्यानं मी सर्व तऱ्हेची खबरदारी घेऊन मुखियाच्या घरात गेलो.रात्री केव्हातरी मुखियाने मला उठवलं व दरवाजावर ओरखडे काढण्याचा आवाज येत असल्याचं सांगितलं.दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडला तेव्हा समोर धुळीतच नरभक्षकांचे पगमार्क्स दिसले.त्याचा माग काढताना मला कळलं की मी काल संध्याकाळी जे जे केलं होतं ते ते त्यानंही केलं होतं.मी पायवाट ज्या ठिकाणी सोडली होती त्या ठिकाणी त्यानेही सोडली होती.मऊ जमीन ओलांडून खडकापाशी आला होता,

अगदी घरापर्यंत माझ्या मागे मागे आला होता.त्यानंतर त्याने घराभोवती बऱ्याच चकरा मारल्या होत्या.


घर सोडल्यानंतर त्याने परत पायवाट पकडली होती.जेव्हा मला दिसलं की ते माग भक्ष्याच्या दिशेने जातायत तेव्हा माझ्या आशा गगनाला भिडल्या कारण मला तोपर्यंत अंदाज आला नव्हता की माणसाबरोबरच्या आठ वर्षाच्या साहचर्यानंतर नरभक्षक बिबळ्या किती हुशार होऊ शकतो! आता मी पायवाट सोडली व थोडा उंचावरच्या भागाकडून भक्ष्याकडे निघालो.थोड्या अंतरावरून मला दिसलं की भक्ष्य गायब आहे.जिकडे मी ट्रॅप पुरला होता तिथली जमीन, त्याचे पगमास सोडले तर जशीच्या तशी होती!


पूर्वीप्रमाणेच याहीवेळी त्याने त्याचे पंजे गायीच्या पायाच्या मध्ये ठेवले होते पण यावेळेला त्याने एकमेकांपासून लांब ठेवले होते.बरोबर त्या ट्रॅपच्या लिवरवर! जर मध्ये ठेवले असते तर या लिवर्समुळे ह्या ट्रॅपचा जबडा बंद झाला असता.अशाप्रकारे सुरक्षित अवस्थेत त्याने खायला सुरुवात केली होती व नंतर भक्ष्याला वळसा घालून गायीचं डोकं तोंडात धरून तिला जंगली गुलाबाच्या काट्यांमधून काही अंतर ओढत नेऊन डोंगरावरून खाली दरीत ढकलून दिलं होतं.खाली काही अंतरावर ती गाय एका ओकच्या झाडावर तटून अडकली होती. कदाचित स्वतःच्या कामगिरीवर खूष होऊन आता त्याने परत गुरांची वाट पकडली होती. त्याच्या मागावर काही अंतर गेल्यानंतर मात्र यापुढे माग दिसेनासे झालें.


आता बिबळ्या भक्ष्यावर परत येण्याची आशा संपुष्टात आली होती.तरीही मनाचं समाधान म्हणून मी.त्या गायीच्या मृतदेहामध्ये भरपूर विषाचा डोस पेरून ठेवला.मी काल विषाचा उपयोग केला नव्हता;खरं सांगायचं तर विष वापरण्याची कल्पना मला त्याहीवेळी कधी भावली नव्हती आणि आजही आवडत नाही.


दुसऱ्या दिवशी भक्ष्याची तपासणी केल्यावर मला दिसलं की विष पेरलेलं सर्व भाग बिबळ्याने खाल्ला आहे.यावेळी हे काम नरभक्षकाचं नसून योगायोगाने तिथे आलेल्या दुसऱ्या बिबळ्याचं आहे याची मला इतकी खात्री होती की गावात परतल्यावर मी मुखियाला सांगितलं की आता मी इथे थांबत नाही,पण जर कोणाला या बिबळ्याचा मृतदेह सापडला आणि त्याची कातडी त्याने पटवाऱ्याला दिली तर मी त्या व्यक्तीला शंभर रूपये देईन.एक महिन्यानंतर या बक्षिसावर दावा सांगितला गेला व त्याची कातडी पटवाऱ्याने पुरून टाकली.


सामान पॅक करायला फार वेळ लागला नाही.दुपारीच आम्ही आमच्या नैनितालच्या दूरच्या प्रवासाला सुरुवात केली.चटवापिपल पुलाकडे जाणाऱ्या छोट्या पायवाटेवर असताना आमच्या समोरून एक धामण पायवाट ओलांडून गेली.मी तिच्याकडे बघत असताना माझ्या मागेच असलेला माधोसिंग मला म्हणाला, "ती बघा साहेब,तुमच्या अपयशाला जबाबदार असलेली सैतानी शक्ती आता इथून निघून जातेय."


गढवालच्या लोकांना नरभक्षकाच्या दयेवर जगण्यासाठी सोडून निघून जाण्याची माझी कृती तुम्हाला निर्दयी वाटेल.अगदी मलाही तसंच वाटत होतं,त्याचप्रमाणे वर्तमानपत्रांमधूनही यावर टीका झाली.कारण या बिबळ्याच्या बातम्या दररोज वर्तमानपत्रामध्ये येत होत्या.पण मला हे सांगावसं वाटतं की अतिशय तणावाखाली फार काळ आपण टिकाव धरू शकत नाही.मी मागचे काही आठवडे गढवालमध्ये राहिलो,

दिवसभर मैलोन मैल जंगलं तुडवली,असंख्य रात्री जागून काढल्या,नरभक्षकाचा हल्ला झाल्याच्या बातम्यांचा पाठपुरावा करण्यासाठी गावागावातून तंगडतोड केली,आणि कित्येक रात्री अतिशय अवघडलेल्या स्थितीत काढल्या.आता मात्र माझ्या सहनशक्तीची मर्यादा संपली होती.जिथे नरभक्षकाच्या तावडीत सहज सापडू शकलो असतो अशा एकाकी ठिकाणी बसून बसून आता मला रात्रभरडोळे उघडे ठेवणंसुद्धा अशक्य होत चाललं होतं.

ज्या रस्त्यांवर फक्त तो आणि मीच असायचो अशा रस्त्यांवरून चालत असताना आतापर्यंतशिकलेल्या सर्व युक्त्या वापरून झाल्या होत्या.एवढं होऊन सुद्धा त्याला

नशिबाचं जबरदस्त वरदान मिळाल्यासारखं त्याने मला आतापर्यंत सतत हुलकावणी दिली होती.दुसऱ्या दिवशी सकाळी परत रस्ता तपासल्यानंतर पगमार्कसवरूनच समजायचं की काल माझा पाठलाग झालाय.भुकेल्या नरभक्षकाकडून आपला पाठलाग होणं ही घटनाच न्यूनगंड निर्माण करणारी असते. अशा त-हेने शरीराने आणि मनाने थकलेल्या अवस्थेत आता मी फार दिवस रेटणं हे गढवाली जनतेसाठी तर काही फायद्याचं ठरणार नव्हतंच पण कदाचित मलाही माझ्या जीवाची किंमत द्यावी लागली असती.


स्वतःहून ओढवून घेतलेलं हे काम तात्पुरतं थांबवलं तर आपल्यावर टीका होईल हे माहीत असूनसुद्धा माझा निर्णय योग्य आहे ह्याबद्दल मी ठाम होतो.त्यामुळेच संधी मिळताच मी परत येईन असं आश्वासन तिथल्या रहिवाशांना देऊन मी परतीच्या प्रवासाला लागलो.


१३.०१.२४ या लेखातील पुढील भाग..

३/३/२४

स्वतःला सांगणारी गोष्ट Something to tell yourself

आनंदी राजपुत्र


जॉन,माझ्या मनाला भावलेली एक गोष्ट मी तुला सांगतो.ही गोष्ट आहे एका पुतळ्याची आणि एका पाकोळीची.बऱ्याच जणांना ही एक बालकथा आहे असं वाटतं.ऑस्कर वाइल्ड यांनी ही गोष्ट लिहिली आहे.

कदाचित तूही ती याआधी वाचली असावीस.ही गोष्ट मी लहान असताना नव्हे,तर वयस्क झाल्यावर माझ्या वाचण्यात आली याचा मला खरंच खूप आनंद आहे.

अशा वेळी जेव्हा माझं मन संवेदना आणि ओलावा हरवत चाललं होतं आणि माझ्या हृदयाचा ताबा अहंकाराने घेतला होता.तू जर ही गोष्ट तुझ्या लहानपणी वाचली किंवा ऐकली असशील,तर आता मी सांगतो म्हणून पुन्हा एकदा वाचशील का? कारण ही बालकथा नाहीये.तर ही प्रेमाची सुंदर गोष्ट आहे.ही गोष्ट वाचली,की माझ्या डोळ्यांत पाणी येतं,पण हृदय मात्र आनंदानं ओसंडून जातं.ही गोष्ट मी तुला थोडक्यात सांगणार आहे.कारण पुढं तुला मी जे काही सांगणार आहे त्याच्याशी या गोष्टीचा अगदी जवळचा संबंध आहे.चल तर,त्या आनंदी राजपुत्राच्या आणि त्या पाकोळीच्या दुनियेतून एक फेरफटका मारून येऊया.


त्या नगराच्या मध्यभागी असलेल्या प्रशस्त चौकात एका उंच चबुतऱ्यावर आनंदी राजपुत्राचा पुतळा विराजमान झालेला होता. त्या पुतळ्याला डोक्यापासून पायांपर्यंत सोन्याचा पत्रा जडवलेला होता आणि पुतळ्याच्या डोळ्यांमध्ये मौल्यवान नीलम रत्नं बसवलेली होती.

त्याच्या तलवारीच्या मुठीमध्ये एक मोठ्ठा माणिक झळाळत होता.एके रात्री त्या नगरात एक पाकोळी उडत उडत आली.थंडी वाढण्याआधी स्थलांतर करावं या विचारानं त्या पाकोळीचे बाकीचे मित्र कधीचे निघून गेले होते. ते सगळे इजिप्तकडं गेले होते,पण ही पाकोळी चुकून मागं राहिली होती.उडत असताना पाकोळीला उंच चबुतऱ्यावरचा आनंदी राजपुत्राचा तो पुतळा दिसला आणि त्याच्या पायांमध्ये असलेल्या जागेत थोडा आराम करावा म्हणून पाकोळी खाली उतरली.


झोपी जाण्याआधी त्या पाकोळीनं चौफेर नजर फिरवली आणि डोळे मिटणार इतक्यात, पाण्याचा एक मोठा थेंब तिच्या अंगावर पडला. 'अरेच्चा! आकाशात एकही ढग दिसत नाही आणि आता पाऊस कुठून पडतोय?' तिनं डोकं वर केलं आणि बघते तर काय,त्या आनंदी राजपुत्राचे डोळे पाण्यानं भरले होते आणि त्याच्या सोन्याच्या गालांवरून अश्रू ओघळत होते.पाकोळीच्या मनात कळ उठली. राजपुत्राबद्दल तिच्या मनात कणव आली.


'तुम्ही कोण आहात?' पाकोळीनं विचारलं.


"मी आनंदी राजपुत्र आहे"


"पण तुम्हाला रडायला काय झालं?"


आनंदी राजपुत्र सांगू लागला,"जेव्हा मी जिवंत होतो तेव्हा अश्रू कशाला म्हणतात मला माहीतच नव्हतं. विशाल महालात मी लहानाचा मोठा झालो.तिथं दुःख कशाला म्हणतात हे कळलंच नाही कधी,लोकांच्या वेदना,त्यांची आर्तता माझ्यापर्यंत कधीच पोहोचली नव्हती. मी दिवसभर महालातल्या बगीच्यात सवंगड्यांबरोबर

हुंदडायचो आणि रात्री देखण्या, तरण्या मुलींबरोबर नाचगाणी चालायची. महालाभोवती एक प्रचंड भिंत होती आणि त्या भिंतीबाहेर वेगळं जग असू शकतं,ही जाणीव माझ्या मनाला कधीच शिवली नाही.जग केवळ सौंदर्यानं नटलेलं आहे असा माझा समज होता.


"सगळेजण मला आनंदी राजपुत्र म्हणायचे." तो पुढे म्हणाला "आणि खरंच मी खूप आनंदी होतो आणि जीवनाची भरपूर मजा घेत होतो.माझं सगळं आयुष्य मजामस्ती करण्यातच संपून गेलं. माझ्या मरणानंतर मला आता हे उच्चासन मिळालं आहे.इथून मला माझ्या देशातल्या प्रजेची दुःखं,त्यांच्या वेदना,त्रास,गरिबी, उपासमारी सगळं काही दिसतं.माझं हृदय शिशाचं आहे.

त्याचा भावनांशी संबंध असता कामा नये.पण तरीही मला रडू येतंच." "इथून थोड्या अंतरावर,"आनंदी राजपुत्र पुढं सांगू लागला,"एका गल्लीमध्ये एक मोडकळीला आलेलं घर आहे.त्या घराची एक खिडकी उघडी आहे.त्या खिडकीतून मला एक स्त्री खुर्चीवर बसलेली दिसते आहे.

तिचा निस्तेज चेहरा काळजीनं आणखीनच काळवंडला आहे.त्या खोलीच्या कोपऱ्यातल्या खाटेवर तिचा आजारी मुलगा मला दिसतो आहे.तो तापानं फणफणला आहे.

आणि त्याला खायला मोसंबी हवी आहे. पण त्याच्या त्या गरीब बिचाऱ्या आईजवळ त्याला द्यायला भाताच्या पेजेशिवाय दुसरं काहीही नाहीये.ते पोर रडत आहे."


"पाकोळी,माझी चिमुकली सखी,तू माझ्या तलवारीच्या मुठीतला हा माणिक त्या गरीब स्त्रीला नेऊन देशील का? माझे पाय या चबुतऱ्याला जोडले आहे,नाहीतर मी स्वतःच गेलो असतो गं."माझे मित्र इजिप्तमध्ये माझी वाट बघत असतील." पाकोळी उत्तरली, "ते सगळे नाईल नदीवर लिलीच्या मोठमोठ्या फुलांभोवती छान घिरट्या घालत असतील."पाकोळी,पाकोळी,माझी चिमुकली सखी," आनंदी राजपुत्र म्हणाला,फक्त एक रात्र इथं थांबून मला मदत करशील का? ते पोर भुकेनं व्याकूळ झालं आहे आणि त्याची आई काहीच करू शकत नाहीये.आनंदी राजपुत्राची ती तळमळ,त्याचं दुःख बघून पाकोळीला खूप वाईट वाटलं.इथं थंडी वाढते आहे.पाकोळी म्हणाली, 

पण मी एक रात्र इथं थांबून तुमचं हे काम नक्कीच करू शकते.तुझे खूप खूप आभार सखी,आनंदी राजपुत्र म्हणाला.पाकोळीनं तलवारीच्या मुठीतला तो मोठ्ठा माणिक चोचीत पकडला आणि अंधारात त्या नगरामधून, घरांच्या कौलांवरून उडत ती दिसेनाशी झाली. जेव्हा पाकोळी त्या मोडकळीला आलेल्या घराजवळ पोहोचली तेव्हा त्या स्त्रीचा डोळा लागला होता.झटकन् खिडकीतून आत शिरत पाकोळीनं तो माणिक तिच्यासमोर,टेबलावर ठेवला आणि पाकोळी तिथून उडून गेली.


परत आल्यावर पाकोळीनं राजपुत्राला घडलेला वृत्तान्त सांगितला.आणि मग ती पाकोळी शांत झोपी गेली.

सकाळी उठल्यावर पाकोळी राजपुत्राला म्हणाली,

इजिप्तमध्ये मी करण्यासारखं तुमचं काही काम असेल तर सांगा,मला आता पटकन् निधायला हवं.पाकोळी,

पाकोळी,माझी चिमुकली सखी,आनंदी राजपुत्र म्हणाला,तू अजून एक दिवस थांबलीस तर खूप बरं होईल.माझे मित्र इजिप्तमध्ये माझी वाट बघत असतील,पाकोळी म्हणाली,उद्या ते नाईलचा दुसरा धबधबा पार करून जातील.


पाकोळी,पाकोळी,माझी चिमुकली सखी,आनंदी राजपुत्र म्हणाला,नगराच्या दुसऱ्या टोकाला इथून बरंच लांब,एका घराच्या पोटमाळ्यात मला एक तरुण दिसतो आहे.तो थंडीनं गारठला आहे. त्याच्याजवळ आग पेटवायला लाकडं नाहीयेत आणि खायला अन्नही नाहीये.भुकेनं व्याकूळ झालेला त्याचा चेहरा मला बघवत नाहीये.


"ठीक आहे मी थांबते अजून एक रात्र,पाकोळी म्हणाली,त्याला पण माणिक नेऊन द्यायचा आहे का?आनंदी राजपुत्र म्हणाला,अरेरे पण माझ्याजवळ तेवढा एकच माणिक होता.आता माझे हे डोळे शिल्लक आहेत.

हजारो वर्षांपूर्वी भारतातून आणली गेलेली ही मौल्यवान नीलम रत्नं आहेत.त्यातलं एक तू काढ आणि त्या तरुणाला नेऊन दे.म्हणजे तो ते रत्न जवाहिऱ्याला विकेल आणि आलेल्या पैशातून स्वतःसाठी अन्न आणि शेकोटीत घालायला लाकडं खरेदी करू शकेल.


नाही राजकुमार,मी असं अजिबात करणार नाही,पाकोळी रडू लागली.


पाकोळी,पाकोळी, माझी चिमुकली सखी, राजपुत्र म्हणाला,मी सांगतोय तसं कर,मी विनंती करतो तुला.

पाकोळीनं राजपुत्राच्या डोळ्यातून नीलमचा मौल्यवान खडा काढला आणि त्या तरुणाच्या दिशेनं भरारी घेतली.

परत येऊन पाकोळी राजपुत्राच्या खांद्यावर विसावली.

आणि ती राजपुत्राला तिनं आधी बघितलेल्या निरनिराळ्या देशांतल्या गमतीजमती सांगू लागली.माझी चिमुकली सखी,पाकोळी,राजपुत्र म्हणाला,तू मला खूप छान छान गोष्टी सांगितल्यास.पण सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट असते गरिबी,लोकांचं असहाय्य असणं,यापेक्षा मोठं कोडं कोणतंच नसतं.पाकोळी,लाडके,तू या नगरावरून एक फेरफटका मार आणि तुला जे काही दिसेल ते मला येऊन सांग.पाकोळी नगरावरून उडू लागली.तिनं अगदी काळोख्या,अरुंद गल्ल्यांचा फेरफटका मारला. सुतकी चेहऱ्याची लहान लहान पोरं भकास नजरेनं इकडंतिकडं बघत बसलेली तिला दिसली.एका पुलाच्या कमानीखाली काही मुलं ऊब मिळावी म्हणून एकमेकांना बिलगून झोपलेली तिला दिसली.ती मुलं कण्हत होती, रडत होती,

भूक लागली आहे,खायला हवं आहे,तिथला पहारेकरी मात्र त्यांच्यावर खेकसत होता, ए निघा,ही झोपायची जागा नाही.निघा इथून,मग ती मुलं पावसात दिसेनाशी झाली.परत जाऊन पाकोळीनं राजपुत्राला तिनं बघितलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या.आनंदी राजपुत्र म्हणाला,माझ्या पूर्ण शरीरावर सोन्याचा जाड पत्रा जडवलेला आहे.तुला जमतील तसे त्याचे तुकडे काढ आणि ते त्या बिचाऱ्या पोरांना,तुला दिसतील त्या गरिबांना नेऊन दे.पाकोळीनं तुकड्या-तुकड्यानं त्या पुतळ्यावरचं सगळं सोनं काढलं आणि गरिबांमध्ये वाटून टाकलं.आता राजपुत्राचा पुतळा पूर्ण उघडा, इतर पुतळ्यांसारखा सामान्य दिसत होता. पाकोळीनं वाटलेल्या सोन्यातून गरिबांनी पोटासाठी अन्न खरेदी केलं.पोराबाळांच्या चेहऱ्यांवर पुन्हा हसू उमटलं आणि भरल्या पोटानं ती रस्त्यांवर बागडू लागली.


पाकोळी राजपुत्राजवळ परतली आणि म्हणाली, राजकुमार,आता मी तुमचा निरोप घेते आहे.आनंदी राजपुत्र म्हणाला,पाकोळी,पाकोळी, माझी चिमुकली सखी,तू आणखी एक रात्र थांबलीस तर फार बरं होईल.

तिथं पुढच्या चौकात एक आगकाड्या विकणारी मुलगी उभी आहे.तिच्या आगकाड्या डबक्यात पडल्या आणि भिजून एकदम खराब झाल्या आहेत.जर तिला पैसे कमावता आले नाहीत तर तिचे वडील तिला खूप मारतील आणि ती रडेल.तिच्या पायात बूट नाहीत,मोजे नाहीत आणि बिचारी उपाशीही आहे.माझा हा दुसरा डोळा काढ आणि तिला नेऊन दे म्हणजे तिची मार खाण्यापासून सुटका होईल.तुम्ही म्हणत असाल,तर अजून एक रात्र मी तुमच्याजवळ थांबते,पाकोळी म्हणाली,पण दुसरा डोळा काढायला मला जमणार नाही. तुम्ही ठार आंधळे होऊन जाल,पाकोळी, पाकोळी,माझी चिमुकली सखी,राजपुत्र

म्हणाला,मी सांगतोय तसंच कर. (THE LOVE RUMI KNEW या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद,रुमी:आनंदघन-

सेरदार ओस्कान,अनुवाद-प्रमोद नाईक,मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे)


पाकोळीनं राजपुत्राचा दुसरा डोळा काढला आणि त्या चौकाकडे भरारी घेतली.त्या आगकाड्या विकणाऱ्या लहान मुलीचा पाकोळीला खूप राग आला होता,रागातच तिने ते मौल्यवान रत्न त्या मुलीच्या हातात ठेवलं.मग पाकोळी राजपुत्राकडं परत आली.आता तुम्ही आंधळे झाला आहात,पाकोळी राजपुत्राला म्हणाली,"आता मी तुमची साथ कधीच सोडणार नाही.नको,माझी चिमुकली सखी, जा तू,राजपुत्र म्हणाला, आता तू इजिप्तला निघून जावंस.नाही,मी तुमच्या जवळच राहाणार,पाकोळी निश्चयानं म्हणाली आणि राजपुत्राच्या पायाजवळ विसावली.


थोड्याच वेळात तिथं बर्फ पडायला सुरुवात झाली आणि आसमंत गारठून निघाला.बिचारी पाकोळी थंडीनं पार गारठून गेली होती,पण तिच्या लाडक्या राजपुत्राला सोडून जाणं तिला अजिबात मान्य नव्हतं.पाकोळीचं राजपुत्रावर खूप प्रेम होतं.आपल्या पंखांची फडफड करत ती कशीबशी स्वतःला ऊब द्यायचा प्रयत्न करू लागली.पण आता फार काळ तग धरणं शक्य नाही हे पाकोळीला माहीत होतं.आता एकदाच, शेवटचं,तिच्या लाडक्या राजपुत्राच्या खांद्यावर जाऊन बसण्याइतकीच ताकत तिच्या अंगात उरली होती.पाकोळी मोठ्या कष्टानं राजपुत्राला म्हणाली,अलविदा,राजकुमार,मी तुमच्या हाताचं चुंबन घेतलं तर चालेल का?"


अरे वा,माझी चिमुकली सखी,तू इजिप्तला जायचं नक्की केलंस तर!आनंदी राजपुत्र म्हणाला,मी खूप खूश आहे.तू इथं थांबून माझी खूप मदत केली आहेस.खरं तर तू माझ्या ओठांचं चुंबन घेतलं पाहिजेस कारण तू मला खूप आवडतेस,हो,मी चालले आहे,पाकोळी म्हणाली,पण इजिप्तला नव्हे,मी चालले आहे मृत्यूच्या गावाला,आणि मृत्यू म्हणजे निद्रेचंच दुसरं रूप म्हणायचं,बरोबर ना?


तिनं आनंदी राजपुत्राच्या ओठांचं चुंबन घेतलं आणि त्याच्या पायांशी कोसळली,शेवटची.


अगदी त्याच क्षणी ते आश्चर्य घडलं,आनंदी राजपुत्राच्या पुतळ्यामधून काही तरी तुटल्यासारखा आवाज आला.शिशापासून बनलेलं त्याचं हृदय,त्याचे दोन तुकडे झाले होते.


दुसरा दिवस उजाडला.त्या नगराचे नगराध्यक्ष आणि पालिकेचे अधिकारी त्या चौकातून चालले होते.

चबुतऱ्यासमोरून जाताना नगराध्यक्षांनी त्यांच्या बग्गीचा पडदा उघडून आनंदी राजपुत्राच्या पुतळ्याकडं पाहिलं.

अरे देवा,आनंदी राजपुत्राच्या पुतळ्याची इतकी दुर्दशा कशी काय झाली? ते उद्‌गारले,तलवारीतला माणिक निखळला आहे.डोळे गायब आहेत आणि सोन्याचा कणसुद्धा शिल्लक नाहीये, याची अवस्था एखाद्या भिकाऱ्यासारखी कशी काय झाली?कला शिकवणारे प्राध्यापकही सोबत होते.त्यांनी मुक्ताफळं उधळली, तसूभरही सौंदर्य उरलं नाहीये याच्यात.आता काय उपयोग या पुतळ्याचा?"


मग सर्वानुमते असं ठरवण्यात आलं,की आनंदी राजपुत्राचा तो पुतळा पाडायचा आणि तो निरुपयोगी धातू वितळवून त्याचा कुठं तरी वापर करायचा.


किती अद्भुत आहे हे,फौंड्रीचा मुकादम म्हणाला,हे तुटलेल्या हृदयाचं शिसं फौंड्रीत वितळत नाहीये.हे टाकून दिलेलंचं बरं,म्हणून त्यानं ते कोंडाळ्यात फेकून दिलं.तिथंच त्या पाकोळीचं कलेवर पडलं होतं.या नगरातल्या सर्वांत मौल्यवान दोन गोष्टी मला आणून दे.देवानं त्याच्या जवळच्या दूताला आज्ञा दिली.त्या देवदूतानं राजपुत्राचं ते शिशाचं हृदय आणि पाकोळीचं कलेवर उचललं आणि देवाकडं नेऊन दिलं.अगदी योग्य निवड केलीस,देव म्हणाला, आता माझ्या स्वर्गीय उद्यानात हा पक्षी सदैव गात राहील आणि या सुवर्णनगरीत आनंदी राजपुत्राचा सदैव गौरव केला जाईल.


समजलं ना जॉन,माझ्या प्रिय मित्रा,त्या पाकोळीला जिवंत राहण्यापेक्षा आनंदी राजपुत्राची सोबत जास्त महत्वाची वाटली. त्याच्यावर असलेल्या प्रेमासाठीच पाकोळीनं मरणालाही आनंदानं मिठी मारली.आनंदी राजपुत्राचं प्रेमसुद्धा तितक्याच ताकदीचं होतं. पाकोळीचा विरह सहन न झाल्यानं राजपुत्र अक्षरशः तुकडे तुकडे होऊन गेला.


मला त्या आनंदी राजपुत्राचा पुतळा हे अहंकाराचं स्मारक होतं असंच वाटत आलंय. पण त्या अहंकारातसुद्धा प्रभूचं तेज वसलेलं होतं.तो प्रेमळ आणि दयाळू तर होताच,पण त्याची दयाबुद्धी आणि प्रेम प्रत्यक्षात उतरायला एका पाकोळीचं त्याच्या आयुष्यात येणं गरजेचं ठरलं.तसंच आपल्या अंतरात वसलेलं प्रेम उफाळून येण्यासाठी,

आपल्या प्रेमाच्या ताकदीनं कुणी तरी आपल्याही अहंकाराच्या चिंधड्या उडवणं गरजेचं ठरतं.