* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१२/८/२५

१२७ तासांची झुंज / 127 hours of fighting

अ‍ॅरन रॅल्स्टनने लिहिलेलं 'वन ट्रॅटीसेवन अवर्स -बिट्विन अ रॉक अँड अ हार्ड प्लेस' हे पुस्तक अंगावर काटा आणतं.मुख्य म्हणजे या संकटातून बाहेर पडून सुरळीत आयुष्याला सुरुवात करेपर्यंतचा त्याचा लढा या पुस्तकात आलेला आहे. इच्छाशक्तीचं बळ म्हणजे काय हे पाहायचं असेल तर हे पुस्तक वाचायलाच हवं.


°….तरी तू रक्तप्रवाह कसा थांबवणार? नाही तर सुटका होऊनही रक्तस्रावाने मरण येईल.'अ‍ॅरनला कल्पना सुचते,की पाण्याच्या बाटलीची रबरी नळी वापरून त्याची आवळपट्टी तयार करायची.

त्यामुळे रक्तप्रवाह रोखायला मदत होईल.शिवाय त्याने घातलेल्या दोन शॉट्सपैकी लायक्रा कापडाची शॉट्स जखमेवर गुंडाळता येईलअसाही तो विचार करून ठेवतो.पण चाकूने हाड कापलं जाणं शक्य नाही हे माहिती असल्यामुळे हे सगळे बरेच लांबचे उपाय आहेतअसं दुसरं मन त्याच वेळी त्याला सांगत असतं.


पण तरीही अ‍ॅरन एकदा प्रयत्न करून बघायचं ठरवतोच.रबरी नळीची आवळपट्टी बांधून तो चाकू मनगटाजवळ नेतो.पण कापायला सुरुवात करण्याआधी त्याचं मन ओरडतं,'अ‍ॅरन,हे काय करतोयस?ही आत्महत्या आहे.तुझ्याकडे कितीही चांगली आवळपट्टी आणि कसलंही कापड असलं तरी तू रक्तस्राव थांबवू शकणार नाहीस.असा वेडेपणा करू नकोस.'अ‍ॅरनचं मन त्याला पुढे जाऊच देत नाही.पूर्ण हरलेल्या अवस्थेत अ‍ॅरनला आपल्या आई-वडिलांची,बहिणीची,मित्र-मैत्रिणींची आठवण होते.


त्यांच्याबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण,त्यांच्यासोबत केलेली भटकंती,त्यात झालेले अपघात,गेट-टुगेदर्स,आवडीच्या कॉन्सर्ट्स अशा किती तरी आठवणी त्याला आठवत राहतात.या आपल्या माणसांशी बोलण्याच्या तीव्र इच्छेतून तो आपला व्हिडिओ कॅमेरा बाहेर काढतो.तो दगडावर ठेवून या साऱ्यांना उद्देशून तो बोलू लागतो.कॅमेरा फिरवून काय काय घडलं ते सगळं सांगतो.


दगडामागे अडकलेला हात दाखवतो.जगाच्या दृष्टीने अस्तित्वात नसलेल्या या घळीत अडकल्यावर तुम्हा साऱ्यांच्या प्रेमाची किंमत मला अधिकच कळते आहे,असं म्हणताना त्याला रडू फुटतं.आपल्या वेडेपणामुळे आपल्या जिवलग मंडळींना किती त्रास होणार आहे याचा विचार करून त्याला प्रचंड अपराधी वाटतं;पण या भावना आवरत तो तटस्थपणे स्वतःची परिस्थिती नोंदवतो.आत्तापर्यंत सुटकेसाठी काय काय प्रयत्न केले, यापुढचा प्लॅन काय वगैरे बोलून तो कॅमेरा बंद करतो. उद्या आपण इथेच मरून गेलो तर किमान आपल्या जवळच्या लोकांना आपलं काय झालं हे तरी कळेल,या विचाराने त्याला थोडं बरं वाटतं.


रात्र होऊ लागलेली असते.थोडीही ऊब नसणारी काळोखी थंड रात्र.डासांची झुंड अ‍ॅरनवर हल्ला करते. डास मारताना त्याच्या मनात येतं,डास खाल्ले तर? या विचाराने अ‍ॅरनचमकतो. खरं तर अजून त्याच्याकडे बर्गरचा एक छोटा तुकडा असतो.पण बहुतेक सलग दोन दिवस झोप न झाल्यामुळे त्याचे विचार भरकटायला सुरुवात झालेली असते.


तिसरा दिवस उजाडतो.संपत चाललेलं अन्न-पाणी आणि झोप न मिळाल्यामुळे खालावलेली तब्येत सोडली तर परिस्थिती 'जैसे थे' असते.पहिल्यांदा अ‍ॅरनला देवाची प्रार्थना करावीशी वाटते.तो म्हणतो, 'देवा,मला तुझी मदत हवी आहे.मला सुचणारे सगळे उपाय करून झाले.आता पुढे काय ? तूच काही तरी दिशा दाखव.काही तरी इशारा कर की ज्यातून मला पुढे काय करायचं ते कळेल.' अर्थातच काही घडत नाही.थोड्यावेळाने अ‍ॅरन पुन्हा प्रार्थना करू लागतो.या वेळी सैतानाची.'देव व्यस्त असल्यामुळे तुला साकडं घालतोय.मला मदत कर. त्या बदल्यात मी तुला माझा हात द्यायला तयार आहे.तू म्हणत असशील तर मी पुन्हा कधीही ट्रेकिंग करणार नाही,पण मला यातून वाचव.' उपहासाने भरलेले स्वतःचे शब्द ऐकून तो स्वतःच हसत सुटतो.

त्याही परिस्थितीत तो स्वतःची खिल्ली उडवू शकतो !


तिसरा दिवस चढत जातो तसं सुटकेची वाट बघत राहण्याचा अ‍ॅरनला कंटाळा येऊ लागतो.घशाला-तोंडाला ओठांना पडणारा शोष आता असह्य होऊ लागलेला असतो. त्यामुळे सुटकेसाठी प्रयत्न तरी करत राहायला हवेत असं त्याला वाटतं.अ‍ॅरन ठरवतो,हात कापून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा करायचाच.

रबरी नळी हाताला आवळपट्टी म्हणून बांधून तो पुन्हा एकदा चाकू हातात घेतो.कोपराच्या थोडं खाली तो चाकूने कापायला सुरुवात करतो,पण काही केल्या चाकू त्याच्या त्वचेत घुसतच नाही.थांबून तो पुन्हा एकदा प्रयत्न करतो,पण पुन्हा तेच.अखेर कंटाळून तो आवळपट्टी काढून टाकतो.तेव्हा त्यानेच चाकू लावलेल्या ठिकाणी दोन लाल रेषा उमटतात.तेवढाच त्याने प्रयत्न केल्याचा पुरावा.चला,म्हणजे आता सुटकेची किंवा मृत्यूची वाट पाहत राहण्याशिवाय पर्याय नाही.बहुतेक मृत्यूची गाठच आधी पडण्याची शक्यता अ‍ॅरनला जास्त वाटत असते.कारण आता पाण्याचा साठा संपत चाललेला असतो.आदल्या रात्री ठरलेल्या तीन वेळांमध्ये तीन घोट प्यायल्यावर अ‍ॅरनकडचं जवळपास सगळं पाणी संपलेलं असतं.एक घोट काय तो शिल्लक असतो.बर्गरचाही एकच तुकडा राहिलेला असतो.पण भुकेची त्याला फारशी चिंता नसते.तहानेने तो व्याकूळ झालेला असतो.सगळं शरीर पाण्याची याचना करत असतं.बाकी काहीही सहन करणं शक्य आहे,पण ही तहान आणि रात्री हाडं गोठवणारा वारा सहन करणं अशक्य.या परिस्थितीत स्वतःला आणून टाकल्याबद्दल तो पुन्हा एकदा स्वतःला शिव्याशाप देत राहतो.अगदी शेवटच्या क्षणी भेटलेल्या मुलींमुळेही आपल्याला मागे फिरण्याची संधी होती.पण जणू याच संकटाला भेटण्यासाठी आपण अधीर होतो... एकट्याने बाहेर पडताना आपला ठावठिकाणा सांगण्याचे कष्ट घ्यायचे नसतील तर तुला हे भोगावंच लागणार.तिसऱ्या दिवशी अ‍ॅरनला पहिल्यांदाच लघवी लागल्याची जाणीव होते.आपण ही घळ खराब करतोय या अपराधी भावनेने त्याला वाईट वाटतं,पण इलाज नसतो.आपलं सामान खराब होणार नाही याची काळजी घेत तो लघवी करतो.आश्चर्य म्हणजे एवढ्या डीहायड्रेशननंतरही त्याची लघवी बऱ्यापैकी स्वच्छ आणि वासरहित असते.त्याच दिवशी दुपारी त्याला पुन्हा एकदा लघवीची जाणीव होते.त्याच क्षणी त्याचं मन त्याला सांगतं,'अ‍ॅरन ही लघवी भरून ठेव.तुला त्याची गरज पडणार आहे. वाळवंटामध्ये पाण्याअभावी माणसांनी स्वतःची लघवी पिऊन जीव तगवल्याची उदाहरणं त्याला माहिती असतात.त्यामुळे फार विचार न करता एका रिकाम्या बाटलीत तो लघवी करतो.या वेळेची लघवी मात्र पिवळी आणि वास येणारी असते.ती प्यावी की नाही हे त्याला ठरवता येत नाही.वास आणि चवीपेक्षाही आपल्या डीहायड्रेट झालेल्या शरीराने बाहेर टाकून दिलेलं पाणी पुन्हा शरीरात घालण्याने काही होणार नाही ना,याची त्याला काळजी असते.पण सध्या तरी तो निर्णय पुढे ढकलून टाकतो.पण त्याच्या मनात हे द्वंद्व किती तरी तास सुरूच राहतं.स्वतःच्या शरीरातला उत्सर्जित द्रव प्यावा की नाही ? थोड्या वेळाने पाहतो तो बाटलीत त्या द्रवाचे दोन भाग होऊन त्यातल्या त्यात स्वच्छ भाग वरच्या बाजूला जमा झालेला असतो.अ‍ॅरन विचार करतो,आपल्याकडे पाणी आहे तोपर्यंतच हा प्रयोग करून पाहावा.बाटली उचलून एक छोटा घोट तो तोंडात घेतो आणि गपकन पिऊन टाकतो.


मंगळवार सकाळ.अ‍ॅरनला या घळीत अडकून अडीच दिवस होऊन गेलेले असतात.आता त्याचं मन पूर्ण वेळ फक्त पाण्याचा विचार करत असतं.त्याच्याकडे उरलेला पाण्याचा शेवटचा घोट म्हणजे त्याच्याकडे उरलेला वेळ आहे,त्याचं आयुष्य आहे,असं त्याला वाटत असतं. पाणी संपलं की वेळ संपला आणि आयुष्यही.त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने जीभ ओली करण्यापुरते एक-दोन थेंब तो तोंडात टाकत असतो.त्या दिवशी अ‍ॅरन पुन्हा एकदा हात कापण्याचा प्रयत्न करून बघायचं ठरवतो.आज त्याला आदल्या दिवशीच्या तुलनेत थोडं यश मिळतं.चाकू एकदाचा त्याच्या हातात घुसतो.वेदना सहन करत करत तो पोहोचतो.त्याच्या चाकूला हाताचं हाड लागत.त्याचा शस्त्रक्रिया प्रयोग पन्हा चाकू चालवत राहतो आणि अखेरीस थोड्या वेळाने डेड एंडपाशी येऊन एकदा थांबतो.पण जखमेतून फारसा रक्तस्त्राव होत नाही.एवढी एक जमेची व्हिडिओत नोंदवतो आणि स्वतःला शाबासकी देण्यासाठी उरलेला पाण्याचा बाजू. लगेचच व्हिडिओ रेकॉर्डर काढून तो आपलं शस्त्रक्रिया कौशल्य कॉर्मेट्रीसह घोट पिऊन टाकतो.पाणी किती वेळ पुरेल याचा विचार करत बसण्यापेक्षा आता पाणी नाही ही वस्तुस्थिती मान्य करणं जास्त सोपं जाईल असं अ‍ॅरनला वाटतं.बर्गरचा एक छोटा तुकडा आणि स्वतःची लघवी याशिवाय दुसरं काहीही नाही.


आता काऊंटडाऊन सुरू..


मंगळवारचा उरलेला दिवस अ‍ॅरन आपल्या आई-वडिलांशी,

बहिणीशी आणि मित्रमैत्रिणींशी व्हिडिओवर बोलण्यात घालवतो.

आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुठल्या वस्तू कुणाला द्याव्यात याची तो निरवानिरव करतो.त्याच्या धाकट्या बहिणीचं लवकरच लग्न होणार असतं.तिच्यासाठी आणि तिच्या भावी नवऱ्यासाठी तो खास शुभेच्छा देतो.देवाची प्रार्थना करतो.पण आता सुटकेसाठी मदत कर,असं म्हणण्याचं काहीही कारण उरलेलं नसतं.तो देवाकडे फक्त संयम मागतो.स्वतःचा आब राखून मी मृत्यूला सामोरा जाऊ शकेन अशी शक्ती दे,एवढंच त्याचं मागणं असतं.असं अ‍ॅरनला वाटत असतं; पण तसं घडत नाही. बुधवार सकाळ उजाडते,घळीत कदाचित मंगळवारी रात्रीच आपण संपून जाऊ अडकल्यानंतरची चौथी सकाळ. डीहायड्रेशन आणि तब्बल चार दिवस एक क्षणही झोप न झाल्यामुळे आता अ‍ॅरन बराच काळ ग्लानीतच असतो.अर्धवट शुद्धीत त्याला अनेक भास होत असतात.कधी आई-वडील,तर कधी कुठले कुठले मित्र समोर दिसत असतात.न झोपताही तो स्वप्न पाहत असतो.जणू एका वेगळ्याच ग्रहावर तो वावरतो आहे.


असं त्याला वाटत असतं.डीहायड्रेशनमुळे आपण मरून जाऊ शकतो याचा अंदाज त्याला पहिल्याच दिवशी आलेला असतो.पण ते मरण इतकं अंत पाहणारं आणि तिळतिळ शक्ती शोषून घेणारं असेल याची त्याला कल्पना नसते.त्यापेक्षा धो धो पाऊस कोसळून त्या पाण्यात बुडून मेलेलं चांगलं,असं त्याला वाटतं.पण जेव्हा जेव्हा तो शुद्धीत असतो तेव्हा एकीकडे शरीराच्या शक्तीविरुद्ध सुटकेचा नवा प्रयत्न करण्याचे विचारही त्याच्या मनात येत राहतात.खाली पडलेल्या छोट्या दगडांचा हातोडीसारखा वापर करून आपल्याला जखडून ठेवणारा दगड फोडता येतो का असाही प्रयत्न तो करून पाहतो.मृत्यूच्या दारात उभा असतानाही जगण्यासाठी शेवटपर्यंत हात-पाय मारत राहण्याची जिद्द संपत नाही.अंगातली शक्ती संपत आलेली असताना दगड उचलून ते हातोड्यासारखे मारण्याची शक्ती त्याच्यात कुठून येते हेही अजबच ! तब्बल चार दिवस आपण या टोकाच्या परिस्थितीत टिकाव धरून राहिलो ही मोठी कामगिरी आहे याची जाणीव त्याही अवस्थेत अ‍ॅरनला असते.पण आजची रात्र मात्र शेवटची, याची त्याला खात्री असते.त्यामुळे घळीच्या भिंतीवर तो चाकूने कोरून स्वतःचं नाव,जन्मतारीख लिहितो आणि त्यापुढे मृत्यूची तारीख लिहितो ३० एप्रिल २००३.


पण त्याचं शरीर अन् मन त्याचा हा विश्वास खोटा पाडतं.गुरुवारची सकाळ उजाडते.शुद्धी-बेशुद्धीच्या सीमारेषेवर तरंगत असतानाच त्याला एक स्वप्न पडतं. त्याच्यासोबत एक छोटा मुलगा खेळत असतो.त्या ट्रान्समध्येही त्याला जाणवतं,की हा आपलाच मुलगा आहे.पंजा नसलेल्या उजव्या हाताचा आधार देऊन अ‍ॅरन त्या मुलाला डाव्या कडेवर उचलून घेतो.दोघंही आनंदात हसत-खिदळत असतात.या ट्रान्समधून तो बाहेर येतो तेव्हा त्याचं मन त्याला ओरडून सांगतं,तू जगणार आहेस ! गुरुवारी सकाळी त्याला एक नवा शोध लागतो विचित्र घाणेरडा वास येत असतो.

त्याच्या लक्षात येतं की आपला दगडामागे अडकलेला हात सडायला सुरुवात झाली आहे.त्या हाताची चाचपणी करताना त्याला अक्षरशः उन्मळून येतं.हात अडकल्या अडकल्या तो सोडवून घेण्यासाठी अ‍ॅरनने जसा थयथयाट केला तशीच अवस्था आत्ताही होते.त्या धडपडीत त्याचा हात दगडावर सारखा आपटतो आणि एक कल्पना त्याच्या मनात चमकून जाते.हाताला जोराचा हिसका देऊन तो दगडावर आपटला तर हाड तुटू शकत.चाकूने हाड तोडता न येणं हाच तर त्याच्या सूटकेतला अडथळा असतो.

अ‍ॅरन लगेचच प्रयत्न सुरू करतो.त्याच्या अंदाजाप्रमाणे खरोखर थोड्या धडकांनंतरच त्याच्या हाताचं हाड तुटतं.दगडामागे अडकलेला पंजा आणि त्याच्या खांद्याशी जोडला गेलेला हात आतून वेगळे होतात.आता फक्त वरचं मांस आणि त्वचा कापून काढली की झाली सुटका.अ‍ॅरन तातडीने चाकू काढून कामाला लागतो.एखाद्या चॉपिंग बोर्डवर चिकन ठेवून कापताना कसं वाटेल तसंच त्याला वाटत असतं.पण आता त्याचं ध्येय निश्चित असतं. बाकी कशाचाही विचार न करता तो यांत्रिकपणे चाकू चालवत राहतो.आता सुटका होणार,एवढ्या एका वाक्याचा नाद त्याला हाताच्या वेदनाही विसरायला लावत असतो... तो चाकू हातात घेतो तेव्हा सकाळचे १०.३० वाजलेले असतात.बरोबर साडेअकरा वाजता त्याचा हात पूर्ण कापला जातो .. आणि खरोखरच त्या प्रचंड शिळेपासून अ‍ॅरनची सुटका होते.हात अडकतो तेव्हा तो जेवढ्या अविश्वासाने त्याकडे पाहत राहिलेला असतो,त्याहीपेक्षा जास्त अविश्वासाने तो स्वतःच्या पुनर्जन्माकडे पाहत राहतो.अर्थात तुटलेला जखमी हात घेऊन त्या घळीतून चढून बाहेर येणं हेही मोठंच आव्हान असतं.त्याचा तोवर त्याने नीटसा विचारच केलेला नसतो.पण सुटका झाल्याच्या युफोरियामध्ये दोराच्या साह्याने हात तुटलेल्या अवस्थेतही अ‍ॅरन एका झपाट्यात ती तांत्रिक चढाई करतो.नशिबाने बाहेर पडल्यानंतर थोड्या वेळात त्याला एका डबक्यात साठलेलं पाणी मिळतं.पुढे आणखी थोड्या वेळ चालत गेल्यानंतर त्याला हायकिंगला आलेले नवरा-बायको आणि त्यांचा मुलगा भेटतात.अ‍ॅरनची अवस्था पाहून त्यांचीच बोबडी वळते.पण लवकरच ते सावरतात. त्यातली तरुण बाई पळत जाऊन पार्कच्या अधिकाऱ्यांना अ‍ॅरन बद्दल माहिती देते आणि लवकरच हेलिकॉप्टरच्या साह्याने त्याची सुटका केली जाते.


पाच दिवस मृत्यूच्या सोबत राहिल्यानंतर,स्वतःच्या मृत्यूची तारीख कोरल्यानंतर अ‍ॅरन पुन्हा जीवनाकडे परततो.


घळीत दगडाच्या तावडीतून सुटण्याची गोष्ट हा अ‍ॅरन

रॅल्स्टनच्या संघर्षकहाणीचा अर्धाच भाग आहे.त्याचा पुढचा भाग सुरू होतो तो हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर. घळीत असताना तो जितक्या सहजपणे स्वतःचा हात कापतो,जितक्या ताकदीने रक्तस्राव होणारा तुटका हात घेऊन तिथून बाहेर पडतो,तितकीच किंवा त्याहूनही जास्त शक्ती त्याला उपचार सुरू असताना लावावी लागते.अपघाताचा धक्का आणि तिथून सुटण्याची टोकाची इच्छा यामुळे अ‍ॅरन च्या शरीर-मनाने आपली प्रतिकारशक्ती अन् सहनशक्ती कित्येकपटं वाढवलेली असते.सुटकेचा निःश्वास टाकल्यानंतर त्या सहनशक्तीची खरी परीक्षा सुरू होते.त्या काळात अ‍ॅरन कित्येकदा कोलमडतो.आता हे संपून जाऊ दे,असा विचार अ‍ॅरनच्या मनात घळीत अडकलेल्या अवस्थेपेक्षा जास्त वेळा हॉस्पिटलमध्ये असताना येत राहतो. अखेर आई-वडील आणि मित्रांच्या सोबतीने अखेर तेही दिवस पार होतात.आज अ‍ॅरन आपल्या कृत्रिम हातानिशी पुन्हा एकदा भटका गिरिप्रेमी म्हणून कार्यरत आहे.फरक एवढाच, की आता कुणालाही न सांगता तो एकटा कधीही, कुठेही जात नाही.■


मागील लेखाचा शेवटचा भाग….!



१०/८/२५

१२७ तासांची झुंज / 127 hours of fighting

अ‍ॅरन रॅल्स्टन हा भटका गिरिप्रेमी एके दिवशी कल्पनातीत संकटात सापडतो आणि त्याच्यासमोर उभे ठाकतात काही जीवघेणे प्रश्न.अमेरिकेतल्या एका कॅनियनच्या घळीत १२७ तासांची एकाकी झुंज देत मृत्यूला भेटून आलेल्या अ‍ॅरनची गोष्ट वाचायलाही हिंमत हवी.


२६ एप्रिल २००३.अ‍ॅरन रॅल्स्टन हा २७ वर्षांचा भटका तरुण युटामधल्या कॅनियनलँड्स नॅशनल पार्कमधल्या ब्ल्यू जॉन कॅनियनकडे निघाला आहे.अ‍ॅरनला गिर्यारोहणाचं,सायकल

स्वाऱ्यांचं आणि एकूणच भटकण्याचं वेड आहे.त्यामुळे इंजिनियर असूनही सध्या तो एका गिर्यारोहण संस्थेत काम करतोय.सोमवार ते शुक्रवार काम करायचं आणि शनिवारी सायकल ट्रकमध्ये घालून दऱ्याखोऱ्यांत भटकायला जायचं हा त्याचा नेहमीचा शिरस्ता.हाही शनिवार त्याला अपवाद नाही.आधी रस्त्यावर ट्रक आणि नंतर कॅनियनलँड्स पार्कमध्ये सायकल लावून तो ब्ल्यू जॉन कॅनियनच्या तोंडापर्यंत चालत येतो.ही कॅनियन त्याला बऱ्याच दिवसांपासून खुणावते आहे.त्यामुळे वाटेत भेटलेल्या त्याच्यासारख्याच दोन भटक्या पोरींसोबत एका नव्या ठिकाणी गिर्यारोहणाला जाण्याचा मोह टाळून तो एकटाच ठरल्यानुसार कॅनियनमध्ये उतरतो. 


कॅनियनमधल्या घळीत उतरायचं,आसपास भटकायचं, जमलं तर संध्याकाळी परतायचं किंवा वाटल्यास तिकडेच ट्रकमध्ये मुक्काम ठोकायचा,असा त्याचा प्लॅन.कॅनियनलँड्स नॅशनल पार्क हे अमेरिकेतल्या अतिशय भव्य आणि सुंदर ठिकाणांपैकी एक मानलं जातं. ५००० वर्षांपूर्वीची भित्तिचित्रं इथे जतन केलेली आहेत. शेकडो एकरांवर पसरलेली लालसर खडकांची जमीन आणि त्यात पाताळात घेऊन जाणाऱ्या घळी.या घळींमध्ये उतरताना थोड्या वेळातच अ‍ॅरनची तंद्री लागते.सगळं जग मागे पडतं.आई-वडील,

घर,काम, मित्र,थोड्या वेळापूर्वी भेटलेल्या भटक्या मुली..सगळं सगळं.या एकतानतेच्या ओढीनेच तर तो दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकत असतो.घळ अतिशय निरुंद असते.एका वेळी दोन किंवा कधी कधी एखादाच माणूस मावेल एवढीच जागा.एके ठिकाणी अ‍ॅरनला बस टायरच्या आकाराचा एक भला मोठा दगड घळीत अडकून राहिलेला दिसतो.घळीच्या पायथ्याशी उतरण्यासाठी पायरी म्हणून वापर करायला हा दगड त्याला चांगला वाटतो.तो दगड डळमळीत नाही ना याची तो आधी चाचपणी करतो आणि खात्री पटल्यावर त्या दगडावर ओणवा होऊन एखाद्या छतावरून उतरल्यासारखा खाली उतरू लागतो.तेवढ्यात ते घडतं..अ‍ॅरन दगडावरून खाली जात असतानाच दगड जागचा हलतो आणि अ‍ॅरन सोबतच तो खाली कोसळू लागतो.काय होतंय ते कळल्यावर अ‍ॅरन प्रतिक्षिप्त क्रियेतून त्या दगडापासून दूर जायचा प्रयत्न करतो.त्यामुळे दगड त्याच्या डोक्यावर कोसळण्यापासून वाचतो खरा,पण अ‍ॅरनचा उजवा हात दगड आणि घळीच्या भिंतीमध्ये अडकतो.


या धक्क्यामुळे अ‍ॅरन पूर्ण बधिर होऊन जातो.हे काय घडलं,हेच त्याला कळत नाही.त्याची पहिली प्रतिक्रिया जे झालं ते नाकारण्याची असते... 'हे खरं नाही.असं घडणं शक्य नाही.हे नक्कीच एखादं वाईट स्वप्न असणार.पण तसं असेल तरी फारच वाईट आहे ते..' पण जेव्हा त्याला कळतं की हे स्वप्न नाही,तेव्हा बधिरतेचं रूपांतर पॅनिकमध्ये होतं.त्याचं शरीर सगळा जोर लावून अडकलेला हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतं,पण हात जागचा हलत नाही.उलट,अ‍ॅरन च्या धडपडीमुळे दगड आणखी घट्ट बसतो.मनगटापासून डोक्यापर्यंत एकच कळ जाते.त्याच्या लक्षात येतं,की आपल्या वजनाच्या चौपट-पाचपट असणाऱ्या या दगडाने आपल्याला पूर्ण अडकवून टाकलं आहे.कुणाच्या तरी मदतीशिवाय इथून हलणं अशक्य आहे. तरीही वेगवेगळ्या ठिकाणांहून जोर लावून दगड हलतो का किंवा दगडाच्या तावडीतून हात सोडवता येतो का हे बघण्याचा तो प्रयत्न करत राहतो; पण व्यर्थ.सुदैवाने त्याच्या हातातून रक्तस्राव होत नाही आणि आश्चर्य म्हणजे वेदनाही असह्य नसतात.कदाचित मानसिक धक्क्यामुळे त्याला त्या जाणवत नसतात.


दहा-पंधरा मिनिटांनी अ‍ॅरन या धक्क्यातून थोडा सावरतो.या अपघातात आणखी काय काय झालंय हे तो बघायला लागतो.

त्याचा डावा पाय आणि डावा हात सोलवटून निघालेला असतो.

डावा हात सुजायलाही लागलेला असतो.सगळं अंग घामाने निथळत असतं. पुढचा काहीही विचार करण्याआधी पाणी प्यायला हवं, अशा जाणिवेतून पाठीवर लटकणाऱ्या पाण्याच्या पिशवीची नळी तो तोंडात घालतो,तर लक्षात येतं,या गोंधळात ती पिशवी फाटून सगळं पाणी सांडून गेलं आहे.सॅकमध्ये पाण्याची आणखी एक बाटली असते. पण एक हात अडकलेला असताना सॅक काढायची कशी? हातातलं बाकीचं सामान अ‍ॅरन दगडावर काढून ठेवतो आणि सॅकचे पट्टे सोडवून त्यातली पाण्याची बाटली बाहेर काढतो.आपण काय करतोय हे लक्षात येण्याआधी बाटलीतलं जवळपास निम्मं पाणी त्याने पिऊन टाकलेलं असतं.

आपली सुटका कधी होईल माहिती नाही,तोवर आपल्याला आहे ते पाणी पुरवायला हवं,हे लक्षात आल्यावर तो स्वतःवरच चरफडतो.'अ‍ॅरन हा काही साधासुधा अपघात नव्हे.तू अशा ठिकाणी अडकला आहेस की जिथे कोणीही इतक्यात कडमडेल अशी शक्यता नाहीये. तुझ्या जिवावर बेतलं आहे. काळजी घे..' असं तो स्वतःला काहीसं चिडून सांगत राहतो.


त्याचं म्हणणं खरंच असतं.कॅनियनलँड्स पार्कमध्ये येणाऱ्यांची संख्या तशी फारशी नसते.त्यातल्या नेमक्या ब्ल्यू जॉन कॅनियनमध्ये आणि त्यातूनही तो अडकलेल्या भागात कोणी येईल ही शक्यता तर फारच धूसर. एवढंच काय,त्याच्या लक्षात येतं,की आपण कुठे चाललो आहोत हे या वेळी आपण कुणालाच सांगितलेलं नाही.एकट्याने फिरायला जाण्याआधी आपल्या प्रवासाचे सगळे तपशील कुणा ना कुणाला सांगून जायला हवेत,हा पहिला नियम न पाळण्याची घोडचूक त्याने केलेली असते.गेल्या दोन दिवसांत आपलं कुणाकुणाशी काय बोलणं झालं ते स्कॅन करायचा प्रयत्न अ‍ॅरन करतो,पण आपण कुणापाशी ब्ल्यू जॉन कॅनियनचा उल्लेख केलेला त्याला आठवत नाही.याचा अर्थ आपण सोमवारी कामावर वेळेत पोहोचलो नाही की तिथल्या मॅनेजरचा रूममेटला किंवा घरी फोन जाईल तेव्हाच आपलं काही तरी बरंवाईट झालेलं असण्याची शक्यता आहे हे लोकांना कळेल;

मग आपण कुठे गेलो असू याचा तपास लावणं आणि मग प्रत्यक्ष शोध घेणं आणखी लांब.पण तोवर ? दोन बर्गर आणि पाव लिटरहून थोडं जास्त पाणी एवढ्यावर आपण किती काळ टिकाव धरू शकू? शनिवारची दुपार झालेली असते.'खाणं आणि पाणी यांचा विचार करता जास्तीत जास्त सोमवार दुपारपर्यंत आपण टिकाव धरू शकतो.तोवर सुटका झाली नाही तर मात्र आपण जगण्याची शक्यता फारच कमी आहे. पर्याय आहे तो हात तोडण्याचा;पण ते केवळ अशक्यच. मग फक्त मृत्यूची वाट बघत राहायचं.हा विचार आल्यावर त्याचं मन बंड करून उठतं.'नाही, मी मरणार नाही.मला जगायचं आहे.यातून बाहेर पडायचा काही तरी मार्ग असेलच.मी तो शोधेन आणि बाहेर पडेन.' या विचारासरशी त्याला थोडा हुरूप येतो. इंजिनियरिंगमधला एखादा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करावा तसं तो आपली परिस्थिती समोर ठेवून विचार करू लागतो.काय केलं की हा प्रचंड दगड,किंचित का होईना,हलेल याचा विचार करणं गरजेचं असतं.अ‍ॅरनला एक कल्पना सुचते.


त्याच्याकडे वेळप्रसंगी असावी म्हणून ठेवलेली स्विस नाइफ असते.'त्याचा छिन्नीसारखा वापर करून हाताजवळच्या दगडाचे कपचे काढले तर तो या बेचक्यातून सुटेल का ? आपल्या हाताने दगडाचं किती ओझं पेललेलं असेल? किती कपचे उडवले की आपलाहात निघून दगड भिंतीवर जाऊन स्थिरावेल ? करून बघायला काय हरकत आहे,'असं म्हणत अ‍ॅरन सॅकमधून स्विस नाइफ बाहेर काढतो.एक हात अडकलेला असल्यामुळे कोणतीही कृती करायची म्हटलं की त्यासाठी त्याला बरीच खटपट करावी लागते. पण त्याला इलाज काय असतो?डाव्या हाताने स्विस नाइफ वापरणंही सोपं नसतं.डाव्या हाताने जोर लावून दगडावर वार करायचे,पण त्याच वेळी उजव्या हाताला जखम होऊन द्यायची नाही.सगळी शक्ती लावून तो ते काम सुरू करतो.बराच वेळ मन एकाग्र करून तो दगडावर मारत राहतो,पण अगदी छोटे कण बाहेर पडण्याखेरीज त्याचा दगडावर जवळपास काहीही परिणाम होत नाही.'अ‍ॅरन हात कापल्याशिवाय तुझी इथून सुटका होणार नाही.'तो स्वतःशीच ओरडून बोलतो.हे शब्द उच्चारून त्यातली भयानकता कमी होते का हेच जणू अ‍ॅरन चाचपत असतो.


'नाही,मला माझा हात कापायचा नाहीय.'


'पण तसाही तुझा हात मेलेला आहे.इथून सुटका झाली तरी तो अ‍ॅम्प्युट करण्याशिवाय पर्याय नाहीये.'त्याचं मन दोन्ही बाजूंनी बोलत असतं.


पण बोथट स्विस नाइफने हात कापण्याच्या विचारानेही अ‍ॅरनच्या छातीतून कळ उठते.त्यापेक्षा हे बिनउपयोगाचं काम बरं,असं म्हणत तो हात चालवत राहतो.निष्क्रिय राहून भलभलते विचार करण्यापेक्षा हे काम करत राहणं चांगलं असं त्याला वाटतं.आपण पूर्ण हतबल नसून आपल्या हातात काही तरी नियंत्रण आहे असं तो मानत राहतो.आपण अडकलोय याचा आपण विचारच करायला नको.या दगडाच्या कपच्या काढणं हेच आपलं सध्याचं काम आहे असं मानायला काय हरकत आहे? या शब्दांनी त्याच्या मनाची समजूत पटते; पण थोडाच वेळ.लवकरच संध्याकाळ होते.अ‍ॅरनला घळीतून दिसणारा आभाळाचा तुकडा काळवंडायला लागतो.ढगही दाटून येतात.रात्र अशा छोट्याशा सापटीत आणि तेही एक हात अडकलेल्या अवस्थेत घालवायची, या विचाराने अ‍ॅरनच्या मनावर निराशेचं मळभ दाटून येतं. या दगडाला नेमका मीच सापडलो.आतापर्यंत किती ट्रेकर्स इथे येऊन गेले असतील,पण मी त्यावर चढायला आणि हा जागचा हलायला... काय पण माझं नशीब आहे! अंगावरच पडला असता तर विषय तरी संपला असता! पण असं जायबंदी करून देव माझी परीक्षा का घेतोय ?' नाना विचार त्याच्या मनात येऊ लागतात.पण येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय गत्यंतर नसतं.

उरलेल्या पाण्यातला अर्धा घोट पिऊन रात्रीशी सामना करण्याच्या तयारीला लागतो.रात्र पडते तस त्या घळीतल तापमान झपाट्याने उतरू लागतं.डास आणि आणखी कसकसले किडे भोवती घोंघावायला लागतात.उभं राहून राहून पायाला रग लागलेली असते.अशा स्थितीत झोप लागणं अशक्य असतं,पण तरीही किमान बसता येण्याजोगी काही सोय करता येईल का याचा अ‍ॅरन विचार करू लागतो. 


त्याच्याकडे रॅपलिंगचं सामान असतं.दोर,कॅरॅबिनर्स, अँकर्स,हुक सगळं काही.मनातली निराशा बाजूला सारून तो या प्रॉब्लेमची उकल करण्याच्या मागे लागतो. थोडा वेळ निरीक्षण केल्यावर दगड जिथे दुसऱ्या बाजूला भिंतीला टेकलेला असतो तिथे अँकर करण्याची कल्पना त्याला सुचते.बराच वेळ खटाटोप करून अखेर पाय वर करून बसता येईल अशी दोरीची सीट तो तयार करतो.

पायावरचं वजन कमी झाल्यावर त्याला थोडा दिलासा मिळतो.अर्थात पंधरा मिनिटांतच त्याला त्याही स्थितीत त्रास व्हायला लागतो.पुढची रात्र तो थोडा वेळ बसून,थोडा वेळ उभा राहत आणि बराचसा वेळ स्विस नाइफने दगड फोडत काढतो.

थंडीशी सामना करण्यासाठीही ती हालचाल गरजेचीच असते.सकाळी सूर्याची किरणं घळीत येतात आणि अ‍ॅरनच्या चित्तवृत्ती पुन्हा थोड्या उल्हसित होतात.तो नव्या जोमाने दगड फोडण्याच्या कामी लागतो.मनातल्या मनात पुन्हा एकदा आपल्या संकटाचा अभ्यास करायला घेतो.आपण पुरेसा विचारच केला नाही आणि त्यामुळे एखादा उपाय सुचायचा राहून गेला तर काय, अशी भीती त्याला वाटत असते.दगड हलवल्याशिवाय आपली सुटका होणार नाही.कपचे काढून दगड हलायला तयार नसेल तर आपल्यालाच दगड हलवता येणं शक्य आहे का,त्याच्या मनात येतं.आपण दोराचा उपयोग करून पायांवरचा ताण कमी केला.

तसाच दोरीचा पुलीसारखा वापर करून दगड उचलता येऊ शकतो का?अ‍ॅरनमधला इंजिनियर जागा होतो.


 आपल्याला दगड अख्खा उचलायचा नाहीय.दगड दोन इंच जरी हलला तरी आपण हात बाजूला काढून घेऊ शकतो.नाही तरी आपण अडकलेलोच आहोत,तर हाही प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे,असं म्हणत (तो म्हणजे अ‍ॅरन) कामाला लागतो.


( मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानेटकर,समकालीन प्रकाशन,पुणे)


दगडाचे कच्चे-पक्के दुवे समजून घेत वेळाकाळाचं भान हरपून तो सगळ्या साहित्यानिशी दगडाला भिडतो जवळपास तीन तास काम केल्यानंतर दगडाभोवती दोरीचा अँकर टाकण्यात त्याला यश येतं.या यशाबद्दल तो स्वतःला एक बक्षीस देऊ करतो.ठरलेल्या वेळेआधी काही थेंब पाणी पिण्याची सवलत ! आता फक्त दोर ओढून पाहणं बाकी असतं. तो पूर्ण ताकदीनिशी दोर ओढतो,पण काहीच घडत नाही.तो भला थोरला दगड किंचितही जागचा हलत नाही.पण एवढ्यात हार जाणं त्याला मान्य नसतं.त्यामुळे पुढचे दोनेक तास जीव खाऊन तो प्रयत्न करत राहतो,पण परिणाम शून्य.


तेवढ्यात अचानक त्याला बाहेरून कसला तरी आवाज येतो.

अचानक त्याचं काळीज उसळी घेतं.तो कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करतो.दगडांवर बुटांच्या थापा पडताहेत असं त्याला जाणवतं.कुणी तरी येतंय..तो खच्चून ओरडतो,"वाचवा, वाचवा!" काहीच घडत नाही. थोडा वेळ थांबून तो कानोसा घेतो.आवाज येतच असतात.तो पुन्हा ओरडतो,शिरा ताणून ओरडतो. कोणीच ओ देत नाही,पण आवाज मात्र अजूनही येतच असतो.लक्ष देऊन पाहिल्यावर त्याच्या लक्षात येतं की घळीतल्या बिळांमध्ये एक उंदीर पळापळ करतो आहे.मघाशी उसळून वर आलेलं त्याचं मन पुन्हा मान टाकतं. त्याच्या मनात येतं,आपण उगीचच आशा धरून बसलोय.आपला अंत इथे,या घळीमध्ये होणं ठरलेलं असणार.

आणखी एका दिवसात आपल्याकडचा अन्नपाण्याचा साठा संपेल.

मग हळूहळू आपला मरणाकडे प्रवास सुरू होईल.फक्त मृत्यू कसा येईल तेवढंच काय ते रहस्य.खरोखर मृत्यू आला तर तो कसा येईल,हा विचारही अ‍ॅरनला भारून टाकतो. 


डीहायड्रेशनमुळे आपला एकेक अवयव निकामी होत जाईल का? की आपल्या किडन्या खराब होतील? किडनी निकामी झाली की नेमका काय त्रास होतो? आपल्याला खूप वेदना होतील का? प्रत्यक्ष प्राण जायला किती काळ लागेल? त्यापेक्षा ग्लानी येऊन त्यातच मरण आलं तर बरं.की तेवढ्यात पाऊस पडायला लागला आणि ही घळ पाण्याने भरून गेली तर पाण्यात गुदमरून आपला जीव जाईल ? रविवारी दुपार होते.घळीत अडकून चोवीस तास उलटलेले असतात.सगळ्या पर्यायांचा विचार करून झाल्यावर अ‍ॅरनच्या लक्षात येतं की आपली आपण सुटका करून घ्यायची असेल तर हात कापण्याला पर्याय नाही. त्याच्या स्विस नाइफमध्ये दोन चाकू असतात.त्यातल्या मोठ्या चाकूची धार दगड फोडून फोडून त्याने आणखी बोथट केलेली असते.त्यामानाने छोट्या चाकूला थोडी जास्त धार असते.पण कितीही धारदार चाकू असला तरी त्याने हाताचं हाड कापलं जाणार नाही हे अ‍ॅरनला माहीत असतं.पण त्याचं एक मन म्हणत असतं,'प्रयत्न तर करून बघ.

प्रयत्नच केला नाहीस तर इथेच मरून जाशील.' तर दुसरं मन अ‍ॅरनसमोर नाना शंका समोर उभ्या करत असतं : 'समजा हात कापणं जमलंच…


राहिलेला शेवटचा भाग…पुढील लेखामध्ये…




८/८/२५

अमीन्सचा माथेफिरू भिक्षू / The Monk of Amiens

तुपाने,मधाने व द्राक्षांनी भरलेला देश.जे कोणी परधर्मीयांपासून पॅलेस्टाईन जिंकून घेतील. त्यांच्यात ती जमीन वाटली जाईल.तर धर्मयुद्ध करा." हे भाषण ऐकून जमलेल्या कोल्ह्याकुत्र्यांनी जिभा चाटावयास सुरुवात केली.ते एकदम म्हणाले, "ईश्वराचीच अशी इच्छा आहेसे दिसते." या थोर युद्धासाठी निघण्याच्या तयारीला ते लागले.


पीटर या लोकांच्या टोळीचा नेता झाला.तो शरीराने खुजा,

बुद्धीने अप्रगल्भ व मनाने संकुचित आणि असंस्कृत होता.त्याचे चारित्र्यही तिरस्कारणीय होते. तो केसाळ झगा वापरी व पायात काहीच घालीत नसे.त्याच्या डोक्यावरचे केस पिंजारलेले असत.ही खुनशी स्वारी गाढवावर बसे.गाढवाला तो पवित्र मानी.त्याच्या हातात एक लाकडी क्रॉस असे.हा पीटर फ्रान्समध्ये व जर्मनीत सर्वत्र हिंडला. 


चर्चमध्ये,रस्त्यांत,कोपऱ्याकोपऱ्यांवर त्याने प्रचाराचा धुमधडाका उडविला.गिबन म्हणतो, "पीटरजवळ बुद्धी नव्हती,युक्तिवादही नव्हता.पण ही उणीव भरून काढण्यासाठी तो पदोपदी ख्रिस्ताचे नाव उच्चारी,मेरी व देवदूत यांचे उल्लेख करी व या सर्वांबरोबरच आपले बोलणे होत असते. असे सांगे." १०९६ च्या वसंत ऋतूंत त्याने जवळजवळ एक लाख लोकांचा तांडा जमा केला. त्यात बहुतेक सारे भिकारी,डाकू व गळेकापू होते. तो त्या सर्वांच्या अग्रभागी होता.एक पवित्र हत्ती व एक मेंढी त्या सर्वांपुढे चालत,या गोष्टीवरूनच त्याच्या बुद्धीची प्रगल्भता दिसून येते.मेंढीच्या मार्गदर्शकत्वाखाली निघालेले लोक ! अशा थाटात पीटर ख्रिश्चन नसणाऱ्या सारासीन मुसलमानांस ठार करण्याच्या अती थोर ध्येयासाठी निघाला.


त्याला दिसून आले की,सारासीन अजून बरेच दूर असले,तरी मारामारी जवळच आहे.ज्यूंची कत्तलही त्याला इष्टच होती.

त्यांचा देव ख्रिश्चनांचा देव थोडाच होता? म्हणून त्याने आधी ज्यूविरुद्धच क्रूसेड सुरू केले.जिथे जिथे तो जाई तिथे तिथे ज्यूंची वस्ती असली,तरी तो त्या सर्वांची कत्तल करी,व नंतर 'शान्तिः शान्तिः शान्तिः !' असे म्हणे.त्याचे साथीदार ते पवित्र युद्धवाले स्त्री-पुरुष, मुले, कोणालाही शिल्लक ठेवीत नसत.

ज्यूंना कोठेही जाता येत नसे.कारण या वेताळांचे लोंढे चोहोकडून धो धो करीत येत.क्वचित कोणी ज्यूंनी सर्व संपत्ती देऊ केली,तर एखादा बिशप त्यांच्या रक्षणार्थ पुढे येई;पण तोही ज्यूंची धनदौलत बळकावल्यावर पुन्हा त्या अकिंचनांना क्रूसेडर्सच्याच हवाली करी. ट्रीव्हज् शहरी ज्यू तेथील बिशपच्या दारी आश्रयासाठी गेले;पण बिशप राजवाड्याचे सर्व दरवाजे बंद करून घेऊन गच्चीवरून म्हणाला, "नीचांनो,हतपतितांनो,तुमचीच पापे तुमच्यावर उलटली आहेत.तुम्ही ईश्वराच्या पुत्राची निंदा केली आहे, माता मेरी हिची अवहेलना केली आहे.जा. मरा." या हतभागी ज्यूंनी कधी कधी तर अलौकिक धैर्य दाखविले! कत्तली करणाऱ्या या माथेफिरूंचा हा रक्ताळ धर्म स्वीकारण्यापेक्षा कितीतरी ज्यू शांतपणे मरणाला तयार होत. 


नाझरेथ येथील त्या शांतिमूर्ती येशूचा संदेश क्रूसेडर्सना कळला होता;एवढेच नव्हे,तर ते तो कृतीतही आणीत होते.

एका मध्ययुगीन बखरीत पुढील वर्णन आहे : "शांतीच्या ईश्वराला हाक मारून जणू या बाया धैर्याने पदर बांधून उभ्या राहत;आपल्या हातांनी आपली मुलेवाळे ठार मारीत व नंतर स्वतःला ठार मारीत.पुष्कळ पुरुषही धैर्याचा अवलंब करून प्रथम आपल्या बायकांस ठार मारीत;मग मुले-बाळे व नोकर-चाकर यांसही ठार करीत.कोमल स्वभावाच्या व शांत वृत्तीच्या सतीही आपली मुले ठार मारीत.परस्परांवर प्रेम जडलेली व विवाहबद्ध होऊ इच्छिणारी तरुण जोडपी खिडक्यांतून बाहेर पाहत व म्हणत,"हे प्रभो,तुझ्या नावाचे पावित्र्य राखण्यासाठी हे पाहा आम्ही काय करीत आहोत!"

आणि रक्ताचा पूर वाहू लागे ! स्त्रियांचे रक्त पुरुषांच्या रक्तात,तसेच आई-बापांचे रक्त मुलांच्या रक्तात मिसळे,

भावांचे रक्त बहिणींच्या रक्ताला,तर गुरुजनांचे शिष्याच्या रक्ताला मिळे ! त्या एकाच दिवशी अकराशे जीवांचे हनन झाले." ज्यू धर्मोपदेशक यिट्लॅक बेन अशेर याच्या कन्येची वीर व करुण रसांनी भरलेली कथा कोणी ऐकली आहे का? अशी कहाणी जगात कोणासही ऐकावयास मिळाली नसेल,

ज्यू धर्मोपदेशक येहुदा याची शूर व निर्भय पत्नी आपल्या मित्रांना विनवून म्हणाली "माझी चार मुले आहेत,ती ख्रिश्चनांच्या हाती जिवंतपणी पडता कामा नयेत.ते माझ्या बाळांना डाकू,गळेकापू बनवतील;त्यापेक्षा ती मरू देत,

ईश्वराच्या नावाच्या पावित्र्यार्थ बळी जाऊ दे." पण जेव्हा एका मित्राने एका मुलास ठार करण्यासाठी सुरा उगारला,तेव्हा ती तरुण माता दुःखाने हंबरडा फोडून,कपाळ आपटून घेऊन व छाती पिटून म्हणाली,"प्रभो,कुठं आहे तुझी प्रेमळ दया व उदार आणि वत्सल करुणा?" नंतर ती निराशेने आपल्या मित्रांस म्हणाली,"या मुलांना एकमेकांच्या डोळ्यांसमोर तरी नको रे मारू ! आरॉनच्या समक्ष ऐझॅकला मारू नको,ऐकला आरॉनचं मरण दिसता कामा नये.तो पाहा ना आरॉन दूर गेला!" मग तिने ऐझॅकला हातात घेतले.तो लहान व दिसण्यास कोवळा व सुकुमार होता.तिने त्याला ठार मारून त्याचे रक्त भांड्यात धरावे,तसे आपल्या बाह्यात घेतले.


आरॉनने हे दुरून पाहिले.तो एका पेटीमागे लपू पाहत होता.त्या बाईला बेला व याड्रोना नामक दोन सुंदर लहान मुली होत्या.त्यांनी आपण होऊन धार लावलेले सुरे आईच्या हाती आणून दिले व खाली माना घालून आईने आपले हनन करावे म्हणून त्या तिच्यासमोर वाकल्या.रॅचेलने अशा रीतीने ऐझॅक व दोन मुली यांचे बलिदान करून उरलेल्या आरॉनला हाक मारली, 'बाळ,कुठे आहेस तू? मी नाही हो तुला वाचवू शकत !' असे म्हणून तिने त्याला पेटीमागून ओढले व त्याचाही देवाला बळी दिला. 


तिच्या पतीने त्या चार सुकुमार मुलांचे बलिदान पाहून तलवारीवर पडून आत्मबलिदान केले.त्याची आतडी बाहेर आली.त्यांतून रक्त वाहत होते.त्या बाईने एकेका बाहीत दोन-दोन मुले लपविली.ती तिथे बसून विलाप करीत असता क्रूसेडर्स त्या खोलीत आले व गर्जले, "ज्यू डाकिणी,दे सगळे धन,बाह्यांत लपवून ठेवतेस काय?" पण झडती घेता बाह्यांत त्यांना ती मृत बाळे दिसली.एकाच घावासरशी त्यांनी तिलाही मुलांच्या भेटीला पाठविले.एकच घाव आणि ती मेली! किंकाळी फोडण्यासही तिला वेळ नव्हता.


ख्रिस्ताच्या नावाने युद्धे पुकारणाऱ्या ख्रिश्चनांच्या हृदयात अशी ही 'दैवी धीरोदात्त' प्रेरणा होती. एच.जी.वेल्स या इतिहासलेखकाला ज्या ध्येयामुळे व युरोपातील ज्या आत्मदर्शनामुळे उचंबळून आले ते ध्येय व तो आत्मा यांचे स्वरूप एवंविध होते. इ.स.१०९६ मध्ये पहिल्या क्रूसेडची ही भीषण लाट अशा प्रकारे युरोपभर पसरली.भिक्षू पीटर याचे सैनिक केवळ ज्यूंनाच मारीत असे नव्हे;तर ते आपल्या ख्रिश्चन बांधवांनाही लुटीत. 


या सैनिकांपैकी पुष्कळ तर जेरुसलेमपर्यंत गेलेही नाहीत.

त्यांनी आपले लहान लहान जथ्थे केले.हे जथ्थे युरोपभर प्रार्थना व लूटमार करीत आपली जीवने पवित्र करते झाले.

याच ध्येयाला त्यांनी सारे जीवन वाहिले.काही मूठभर लोक जेरुसलेमकडे गेले,पण तुर्कानी त्यांचा फत्रा उडविला !


पहिल्या क्रूसेडची दुसरी तुकडी आली.तिच्यात जरा अधिक वरच्या दर्जाचे व कडक शिस्तीचे लोक होते. पण हृदयातील दुष्टता मात्र तीच होती.त्यांनी मुसलमानांपासून जेरुसलेम जिंकून घेतले.ब्रिटिश ज्ञानकोशात 'क्रूसेडस्'बाबत लिहिताना अर्नेस्ट बार्क म्हणतो,ख्रिश्चनांनी केलेली कत्तल केवळ अमानुष होती ! रस्त्यातून रक्ताचे पाट वाहत होते. रक्तप्रवाहातून घोडेस्वार दौडत होते.रात्रीच्या वेळी आनंदाने अश्रू ढाळीत क्रूसेडर्स तेथील ख्रिस्ताच्या थडग्याजवळ गेले व त्यांनी आपले रक्ताने माखलेले हात प्रार्थनेसाठी जोडले.त्या दिवशी १०९७ च्या जुलैमध्ये पहिले क्रूसेड संपले.


यानंतर आणखी आठ क्रूसेडस् म्हणजे धर्मयुद्धे जवळजवळ दोनशे वर्षे चालली होती.नेहमी तेच ते रानटी व राक्षसी प्रकार! ज्यू,ख्रिश्चन, मुसलमान यांच्या कत्तली व लुटालुटी ! या क्रूसेडरांपैकी काही थोडे उदात्त ध्येयवादाने प्रेरित झाले असतील,नव्हे, होतेही.त्यांच्या मनात काहीतरी गूढ आंतरिक प्रेरणा स्फुरलेली होती.या जगात ख्रिश्चन धर्माला कोठेही अडथळा होऊ नये,असे त्यांना वाटे.प्रत्येक युगात काही मूर्ख;पण ध्येयवादी लोक असतातच; त्याचप्रमाणे गूढ वृत्तीचे व उत्कट भावनांचे सारासीन मुसलमानांसाठी जग निष्कंटक करू इच्छित होते.कत्तली केल्यामुळे इतर माणसे सुधारतात,

अधिक चांगली होतात,असे या वेडपटांना वाटत असते.पण हे स्वप्नात वावरणारे ध्येयवादी लोक महत्त्वाकांक्षी व स्वार्थी लोकांच्या हातची बाहुली बनतात.हे ध्येयवादी लोक युद्धाभोवती एक तेजोवलय निर्माण करतात व घाणेरड्या कर्मांवर पावित्र्याचा पोशाख चढवितात! युद्ध धार्मिक असो वा व्यापारी असो,त्यात असे काही ध्येयात्मे असल्यामुळे एखादा कवी मग त्या युद्धावर महाकाव्यही लिहितो.पण अशी काव्ये वा असे पोवाडे होऊनही लाखो निरपराध लोकांची कत्तल काही थांबत नाही.घरेदारे लुटली जातातच! मग ती काव्ये काय चाटायची? त्यामुळे एखाद्या धर्मवेड्या माणसाच्या हातातील तलवारीने छिन्नविछिन्न झालेल्या बालकाला काय कमी वेदना होतात ? केवळ स्वार्थी व हडेलहप्प माणसाने मारलेल्या मुलालादेखील होतात! क्रूसेड्सध्ये मूठभर धर्मवेडे गूढवादी लोकही होते,

एवढ्यामुळेच काही त्या युद्धांना पावित्र्य येत नाही! ती युद्धे माणुसकीस काळिमा फासणारी,निंद्य व लाजिरवाणीच ठरतात ! ख्रिश्चन चर्चलाच नव्हे; तर साऱ्या मानवजातीलाच या लांच्छनास्पद युद्धांचा कलंक लागतो.


६/८/२५

अमीन्सचा माथेफिरू भिक्षू / The Monk of Amiens

(संन्यासी पीटर…) रोमन चर्चची संघटना मानवजातीला आशीर्वादरूप व्हावी म्हणून करण्यात आलेली होती.

शांतीच्या निशाणाखाली साऱ्या जगाचे एकीकरण करण्याचा तो ऐतिहासिक कालातील पहिला प्रयत्न होता.चर्चचे पहिले पहिले काही पाद्री व धर्मादेशक खरोखरच देवाचे लोक होते.

नम्रता,सहिष्णुता,निःस्वार्थ जनसेवा,या गोष्टी त्यांच्या जीवनात भरलेल्या दिसत.


ते गॅलिलीच्या थोर दैवी धर्म संस्थापकांचे सच्चे अनुयायी भासत.या अनेक शतकांच्या इतिहासात कॅथॉलिक चर्चने कित्येकदा तरी अन्यायाविरुद्ध न्यायाची बाजू घेतलेली आहे,द्वेष सोडून शांतीची घोषणा केली आहे व युद्धातील विनाशाऐवजी सौंदर्यनिर्मितीवर भर दिला आहे.


पण चर्चचे वरचे पदाधिकारी मात्र नेहमीच हृदयातील देवाचा आवाज ऐकत नसत.त्यांचे दुसरे धंदे असत.बिशप व पोप पुष्कळदा क्षुद्र राजकारणात रंगून जात.पृथ्वीवर न्यायाचे राज्य करण्याऐवजी आपले खिसे सोन्याने कसे भरतील, एवढेच ते पाहत.त्यांच्या हाती चर्च हे दुसऱ्यांना अमानुषपणे छळण्याचे,मारण्याचे व त्यांच्यावर जुलूम करण्याचे साधन मात्र झाले.शार्लमननंतरच्या पाचशे वर्षांचा इतिहास हा मानवजातीच्या इतिहासातला अत्यंत किळसवाणा व लज्जास्पद भाग होय.या काळात चर्चमध्ये सतत स्पर्धा व मत्सरच दिसतात,धर्मवेडेपणास ऊत आलेला दिसतो आणि कत्तली, लुटालुटी व ख्रिश्चन आणि मुसलमान यांमधील धर्मयुद्धे यांचा सुळसुळाट झालेला दिसतो.या पाच शतकांचा इतिहास निरनिराळ्या इतिहासकारांनी निरनिराळ्या दृष्टींनी लिहिलेला आहे.अनेकांनी त्याची ओढाताण केली आहे.या विद्रूप व भेसूर काळाच्या इतिहासावरील रक्ताचे डाग,

त्याच्याभोवती दिव्य तेजोवलये निर्मून लपविण्याचे प्रयत्न कित्येकांनी केले आहेत.वेल्ससुद्धा आपल्या 'जगाच्या इतिहासाची रूपरेषा' या ग्रंथात मध्ययुगासमोर जणू भक्तिभावाने गुडघे टेकताना आढळतो.तो म्हणतो, "ख्रिश्चन चर्चने पवित्र युद्धाच्या नावाने लोकांतील उत्कट भावनांचे संघटित एकीकरण केले,ही फारच मोठी गोष्ट होती. हे काम महत्त्वाचे व फारच चांगले होते. ही 'पवित्र युद्धां' ची चळवळ पेटविणारा पीटर नामक ख्रिश्चन यती होता.तो रक्तपिपासू कोल्हा असूनही वेल्सला जणू हिब्रू प्रेषितच वाटतो! ती धर्मयुद्धे वाचून,त्या हकिकती ऐकून वेल्स नाचू लागतो,

उत्साहाने वेडावून जातो व लिहितो,या काळाचा इतिहास मोठा आकर्षक आहे.लेखणीवर बसून या इतिहास क्षेत्रात खूप रमावेसे वाटते. युरोपजवळ काही ध्येय आहे,असे या काळातच आपणास प्रथम आढळते.युरोपला आत्मा आहे,ही गोष्ट या काळातच प्रथम दिसून येते."


वेल्सला जे 'ध्येय' व जो 'आत्मा' या काळात दिसल्याचा भास झाला,त्याची वास्तविक किंमत काय आहे हे पाहू या.या काळाचे बिनचूक चित्र मी हे थोडक्यात देतो.या मारामाऱ्यांचे सविस्तर वर्णन कंटाळवाणे होईल.मी तर या गोष्टींकडे गंभीरपणे पाहूच शकत नाही.पण जरा फेरफटका मारून येऊ या.या धर्मयुद्धातील पहिले युद्ध उद्भवण्याचे कारण प्रथम पाहू या.शार्लमनने चाबूक मारून नाखूश व हट्टी युरोपला नवधर्माची दीक्षा दिली होती,जुना धर्म लोपला होता व चर्चचे बडे बडे अधिकारी दिवसेंदिवस व्यभिचारी व अधःपतित होत होते. काही उदारात्मे त्या काळीही होतेच.खऱ्या भक्तिप्रेमाने रंगलेले,ख्रिस्ताला शोभेसे काही सौम्य व शांत लोक या काळातही आढळतातच. 


पण अशा लोकांना चर्चमध्ये महत्त्वाचे स्थान नसे. क्षुद्र प्रवृत्तीचीच माणसे बहुधा अधिकाराच्या जागांकडे ओढली जात असतात.धकाधकी करणारे,पुढे घुसणारे,

अहंमन्य,स्वार्थपरायण लोकच सत्तेसाठी हपापलेले असतात.त्यांना झगडे करण्यात कसलीही दिक्कत वाटत नाही.वाटेल ते करायला ते तयार असतात,बिलकूल मागेपुढे पाहत नाहीत.असे लोकच पुष्कळदा चर्चमधल्या बड्या बड्या जागांवर निवडून येत.बहूतेक सर्व पोप मूर्तिमंत पापात्मेच असत.प्राचीन रोमन सम्राटांप्रमाणे पोपही भराभर धर्माच्या गादीवर येत व पुष्कळांचे खून होत.कोणाकोणांवर विषप्रयोगही होत.पोप सहावा स्टीफन,पोप बारावा जॉन,पोप सहावा अलेक्झांडर वगैरे दाखवून देतात की,सत्य हे कादंबरीहूनही विचित्र व कुरूप असू शकते.जरा गंभीर वृत्तीच्या इतिहासकारांनी अनुल्लेखाने या पापात्म्यांच्या दुष्कृत्यांची जगाला विस्मृती पाडली आहे;किंवा रोमन उत्तारे टाळून 'त्यांची कृत्ये जगजाहीर होणार नाहीत' याबद्दल काळजी घेतली आहे.या पोपांची ख्रिश्चन धर्माला न शोभणारी दुष्कृत्ये पुन्हा जिवंत करून सांगणे ठीक होणार नाही;व त्याचा काही उपयोगही नाही.यांचे खासगी जीवन कादंबरीकारास करमणुकीचे वाटेल;पण इतिहासकाराला त्याचा काडीचाही उपयोग नाही. एक गोष्ट आपण ध्यानात घेऊ या की,असल्या लोकांच्या द्वेषमत्सरातूनच रोमन कॅथॉलिक चर्च व ग्रीक चर्च यांच्यामध्ये भीषण मतभेद माजले ! मुळात ख्रिश्चन धर्मातील काही मतभेदांवरच हे दोन्ही संप्रदाय उभे होते;पण पुढे दोन्ही बाजूंस वैयक्तिक महत्त्वाकांक्षा उभ्या राहिल्या. इ.स. १०५४मध्ये रोमन चर्चच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रीक चर्चच्या पदाधिकाऱ्यांना कह्यात ठेवता येत नाही असे पाहून ग्रीक चर्च धर्मबाह्य ठरविले व "ग्रीक चर्चचे सारे पाद्री कायमचे नरकात पडतील."असे उ‌द्घोषिले.ग्रीक चर्चही स्वस्थ बसले नाहीच.त्यानेही त्याच प्रकारे उत्तर दिले.क्रूसेडस् या नावाने जो विनाशाचा भीषण भोवरा पुढे सारखा फिरू लागला.त्यात मिसळलेल्या अनेक प्रवाहांपैकी ग्रीक चर्च व रोमन चर्च यांतील भांडण हा मुख्य प्रवाह होता.क्रूसेडरमधील पहिले युद्ध म्हणजे केवळ ख्रिश्चनांचा मुसलमानांवरील हल्ला नसून त्यात ग्रीक चर्चला शरण आणण्याचाही डाव होता.


क्रूसेड्सचे दुसरे एक कारण म्हणजे,नॉर्मन लोकांनी केलेल्या स्वाऱ्यांमुळे सर्वत्र उत्पन्न झालेली अशांतता तद्वतच बेदिली.हे नॉर्मन लोक युरोपच्या पूर्वेस व पश्चिमेस सर्वत्र लोंढ्याप्रमाणे पसरले.युरोपातील आधीच लोकसंख्या खूप वाढलेल्या देशांत नॉर्मनांची आणखी गर्दी झाली.त्यांनी हजारो घरेदारे बळकावली.त्यामुळे घरादाराला मुकलेले लोक युरोपभर भटकत होते.ते आशियावर स्वारी करून परधर्मीयांना त्यांच्या घरातून हुसकून द्यायला अधीर झाले होते.ते या कामासाठी तयारच होते.तिसरे कारण युरोप व आशिया यांमधील व्यापारी स्पर्धा,क्रूसेडसूच्या नेत्यांना जेरुसलेम क्षेत्र ख्रिश्चनांस सुरक्षित करावे, असे तर वाटत होतेच; पण त्याहीपेक्षा युरोपच्या व्यापारासाठी जग बिनधोक करावे, असे अधिक तीव्रतेने वाटत होते. क्रूसेडस् करणारांना हाच हेतू अधिक उदात्त वाटत होता.


चौथे कारण म्हणजे,पोप दुसरा अर्बन याची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा,आपले जरा डळमळीत झालेले आसन भक्कम करावे असे त्याच्या मनाने घेतले.त्यासाठी त्याने आपल्याभोवती गुंड व पुंड जमवून त्या बाजारबुणग्या लुटारूंना 'धर्मयुद्ध' दिले. तो त्यांना म्हणाला,"तुम्ही तिकडे पूर्वेकडील ज्यू वगैरे विधर्मीयांना ठार कराल तर प्रभू तुम्हांस सर्व पापांपासून मुक्त करील."अशा रीतीने पोप म्हणजे जणू ईश्वराचा शापच झाला! पोप ही चर्चच्या इतिहासातील एक अत्यंत शक्तिसंपन्न व्यक्त झाली.


शेवटचे कारण यती पीटर याचा असहिष्णू स्वभाव.अमीन्सचा भिक्षू पीटर हा पहिल्या क्रूसेडचा आत्मा तो बुटका व अर्धवट होता.त्याने पहिल्या क्रूसेडमध्ये प्राण ओतला.त्यानेच धर्मयुद्धाचे ध्येय दिले.


भिक्षु पीटर हा अकराव्या शतकातला कॅटो होता. कॅटोने कार्थेज धुळीला मिळविण्यासाठी रोमनांना चिथावले,

उठविले;पीटरने 'जेरुसलेम ताब्यात घ्या' अशी ख्रिश्चनांस चिथावणी दिली.दोघेही…(मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,

अनुवाद-साने गुरुजी, मधुश्री पब्लिकेशन)अतिशयोक्तीने बोलणारे व शापवाणी उच्चारण्यात प्रवीण होते.पीटर,पोप दुसरा अर्बन याजकडे गेला व त्याने त्याला 'जेरुसलेममधले तुर्की मुसलमान ख्रिश्चन यात्रेकरूंचा अपरंपार छळ करतात',

असे सांगितले.ते अगदीच खोटे होते असे नव्हे.अकरावे शतक म्हणजे धार्मिक छळाचेच शतक म्हणा ना! सारे जग द्वेषाच्या वावटळीत सापडले होते. मुसलमान ख्रिश्चनांची,तर ख्रिश्चन मुसलमानांची कत्तल करीत होते आणि ज्यूंची कत्तल तर काय, सर्वच करीत ! न्यायासाठी शस्त्र घेण्याला योग्य असे खरोखर कोणाचेच हात नव्हते.सारेच अपराधी व दोषी,सारेच खुनी व गुन्हेगार ! पण पोपने एकांगी दृष्टी ठेवली व ख्रिश्चनांच्या पापांकडे डोळेझाक करून मुसलमानांना मात्र धडा शिकविण्याची पवित्र प्रतिज्ञा केली.त्याने इ.स. १०९५ मध्ये क्लमांड येथे धर्मसभा बोलाविली व ती पुढे जळजळीत द्वेषाचे प्रवचन केले.ते साऱ्या दुष्ट भावना जागृत करणारे व मुसलमानांबद्दल सर्वांस चीड आणणारे भाषण होते.तो म्हणाला,"तुम्ही या पवित्र युद्धात भाग घ्याल तर तुम्ही ईश्वराचीच कृपा मिळवाल असे नव्हे,तर ऐहिक दृष्टीनेही तुमचा फायदाच होईल.मेल्यानंतर ईश्वराचे राज्य,इहलोकी भरपूर लूट ! हे युद्ध अशा रीतीने दोन्ही लोकी फायदेशीर आहे.पॅलेस्टाईन म्हणजे समृद्ध व संपन्न देश.दुधा-तुपाने,

मनाने व द्राक्षांचे भरलेला देश..


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये….!



४/८/२५

वृक्षाकडून हवामानाचे नियंत्रण / Climate Control by Trees 

झाडांना तापमान,आर्द्रता आणि प्रादेशिक हवामानातील अचानक मोठे बदल हे पसंत नसतात.पण यातून त्यांची सुटकाही नसते,मोठी झाडे पण त्यांच्या तावडीतून सुटत नाहीत.झाडांना कधीतरी एकदा हवामानावर नियंत्रण ठेवता येऊ शकत असेल का,असा विचार तुमच्या मनात कधी आला का? याची प्रचिती मला जर्मनीच्या बांबर्ग गावाजवळच्या कोरड्या,वाळूयुक्त आणि नापीक जमिनीत वसलेल्या एका जंगलात आली.

इथे फक्त पाईनचे वृक्ष तग धरू शकतील असे मत वनतज्ज्ञांनी एकेकाळी मांडलं होतं.केवळ एकसुरी लागवड होऊ नये म्हणून काही बीच वृक्षही मध्ये मध्ये लावले गेले.पाईनच्या सूचीपर्णी पानगळीत तयार होणारे आम्ल बीचच्या पालवीमुळे शमेल,हा त्यामागचा उद्देश.लाकडासाठी पानझडी वृक्षांचा वापर करण्याचा विचार केला नव्हता,त्यांच्याकडे सेवा देणारं झाड म्हणून पाहिलं जात होतं. पण बीच वृक्षांना अशी दुय्यम भूमिका घेण्यात रस नव्हता.काही दशकातच त्यांनी आपला रंग दाखवला.बीच वृक्षांच्या वार्षिक पानगळीबरोबर तयार झालेल्या अल्कलाईन क्षारीय जैविक मालाची भर मातीत पडली.यामुळे मातीत अधिक आर्द्रता साठवली जाऊ लागली.

त्याचबरोबर जंगलातील वातावरण अधिक दमट होत गेले कारण बीचच्या रुंद पानांमुळे हवेचा वेग कमी झाला.संथ हवा म्हणजे कमी बाष्पीभवन, पाणी मुबलक मिळाल्यामुळे बीचची वाढ वेगाने झाली आणि पाईनपेक्षा ते जास्त उंची गाठू शकले. हे सगळं होत असताना जंगलाची जमीन आणि सूक्ष्म हवामान बदलत गेले आणि सूचीपर्णी वृक्षांपेक्षा पानझडी झाडांना अधिक योग्य झाले. झाडे आपल्या आजूबाजूचे वातावरण सोयीस्कररीत्या कसे बदलू शकतात,याचे हे उत्तम उदाहरण आहे.वनरक्षक म्हणतात की, जंगल आपल्याला हवा तसा अधिवास तयार करतात.

वर म्हटल्याप्रमाणे वाऱ्याला शांत करणे हे झाडांना नक्कीच जमते,पण पाण्याच्या नियोजनाचे काय? जंगलातल्या मातीवर घनदाट झाडी असल्यामुळे ती उष्ण वाऱ्यांपासून सुरक्षित राहते आणि पाण्याचे नियोजन शक्य होते.आकेन मधील आरडब्ल्यूटीएचच्या विद्यार्थ्यांनी माझ्या जंगलात एक अभ्यास केला.नियमित छटाई केल्या जाणाऱ्या सूचीपर्णी लागवड क्षेत्रातील आणि नैसर्गिकरीत्या वाढू दिलेल्या रुंदपर्णी बीच वृक्षांच्या क्षेत्रातील तापमानात त्यांना मोठा फरक दिसला. 

ऑगस्टमधील एका अतिशय उष्ण दिवशी सूचीपर्णी जंगलातील पारा ९८ अंश फॅरेनहाईटला पोहोचला होता.त्या दिवशी पानझडी वृक्षांच्या क्षेत्रात सूचीपर्णी क्षेत्रापेक्षा सुमारे पन्नास अंश तापमान कमी होते.तिथे जास्त जैविक माल असल्यामुळे गारवा होता आणि त्यामुळे बाष्पीभवन कमी झाले होते.जंगलात जितके जास्त जिवंत किंवा वठलेले लाकूड असेल तितका जमिनीवर जैविक मालाचा जास्त थर असतो.आणि त्यात जास्त पाणी टिकते. बाष्पीभवनामुळे वातावरण गार पडते आणि गारव्यामुळे बाष्पीभवन कमी होते. हे वेगळ्या पद्धतीने मांडायचे तर सुदृढ जंगलाला उन्हाळ्यात आपल्यासारखाच घाम येतो आणि आपल्यावर होतो तोच परिणाम इथेही होतो.

तुम्हाला एखाद्या घराकडे बघून झाडाला येणारा घाम दिसू शकतो.घराशेजारी ख्रिसमसचे झाड लावलेले आपल्याला सहज दिसून येते.ते विकत घेताना अनेकदा त्याच्या मुळापाशी असलेला गोळा तसाच असतो.ते अगदी घराजवळ लावलेले झाड कालांतराने मालकाच्या अपेक्षेपेक्षा जास्तच वाढत जाते.काही वेळा त्याच्या फांद्या छपरावर जातात आणि अशा परिस्थितीत घरावर त्यांच्या घामाचे डाग स्पष्टपणे दिसतात.ते आपल्या काखेतसुद्धा नकोसे असतात तर घरावर उमटलेले डाग आणखीच खराब दिसतात.झाडांना इतका घाम येतो की,शेजारी असलेल्या भिंतीवर किंवा कौलांवर बुरशी आणि शेवाळं जमू लागतं.
अशामुळे पावसाच्या पाण्याला अडथळा होतो आणि सुटून आलेल्या शेवाळ्यामुळे पन्हाळी तंबून राहतात. 

सतत ओले राहिल्यामुळे घरावरचे प्लास्टर निघून येते.पण जे लोक आपली गाडी झाडाखाली लावतात त्यांना मात्र त्याचा फायदा होतो.प्रचंड थंडी असली की इतरांना त्यांच्या काचेवरून बर्फ काढावा लागतो मात्र झाडाखाली लावलेल्या गाड्यांना तो त्रास होत नाही.झाड जवळ लावून घराला त्रास होतो ही बाब सोडली,तर त्यांच्यामुळे सूक्ष्म हवामान कसे नियंत्रित राहते,याबद्दल फार कुतूहल वाटते.विचार करा,सशक्त जंगलात याचा केवढा परिणाम होत असेल !

(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,
अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)

ज्यांना घाम खूप येतो त्यांना पाणीही बरंच प्यावं लागतं.पावसामध्ये झाडं पाणी पिताना दिसून येतात.मी पावसात जंगलाची फेरी मारायला सूचवणार नाही कारण अनेकदा तेव्हा वादळही असतं.पण जर तुम्ही कामानिमित्त बाहेर असाल तर तुम्हाला हे पाहता येईल.बहुतेकदा बीच वृक्ष आपली तहान शमवताना दिसतात.इतर पानझडी वृक्षासारख्या त्यांच्या फांद्या वरच्या दिशेला वळलेल्या असतात किंवा खालीही झुकतात. 

सूर्यप्रकाश आणि पाऊस पकडायला त्यांचा वरचा डेरा वेळोवेळी उघडतो.पावसाचे पाणी हजारो, शेकडो पानांवरून,फांद्यावरून वाहू लागते. फांद्यांवरून ओघळणारे हे पावसाचे पाणी खोडाकडे येऊन मिळते आणि खोडावरून जमिनीकडे जाताना छोट्या नदीचेच जणू रूप घेते. जेव्हा ते बुंध्याच्या खालच्या भागापर्यंत पोहोचते तेव्हा त्याचा वेग भरपूर वाढलेला असतो.त्यामुळे जमिनीपर्यंत आल्यावर ते फेसाळते.अशा रचनेमुळे मुसळधार पावसात झाडं शे-दोनशे गॅलन पाणी आपल्या मुळांकडे वळवू शकतात.मुळांच्या भोवती पाण्याचा साठा केला जातो आणि कोरड्या परिस्थितीत याचा उपयोग होतो.

स्प्रूस आणि फर वृक्ष मात्र असं करू शकत नाहीत.चतुर फर बीच वृक्षात मिसळून जातात पण स्प्रूस मात्र आपल्याच घोळक्यात असल्यामुळे तहानलेले राहतात.स्प्रूसचा डेरा छत्रीसारखा असतो म्हणून आपण त्या खाली उभे राहिलोच तर पाऊस लागणार नाही.पण यामुळे मुळांनाही पाऊस लागत नाही.एका स्क्वेअर यार्डात अडीच गॅलन पर्यंत पाऊस पडला (हा बऱ्यापैकी पाऊस आहे) तरी पाणी स्प्रूसच्या सुईसारख्या पानांवर आणि फांद्यांवर राहते.ढग जाऊन ऊन पडलं की पानं कोरडी होतात आणि सर्व आर्द्रता निघून जाते.पण स्प्रूस असं का करत असतील,याचं सोपं उत्तर म्हणजे त्यांना दुष्काळासाठी स्वतःला अजून अनुकूल करता आलेले नाही.

स्प्रूस थंड हवेच्या ठिकाणी मजेत असतात. तिथल्या गारव्यामुळे जमिनीतलं पाणी वाळून जात नाही.त्यांना आल्प्सचा प्रदेश आवडतो कारण तिथे भरपूर पाऊस होतो आणि दुष्काळ कधीही पडत नाही.पण तिथं बर्फ जोरदार पडतो.त्यामुळे त्यांच्या फांद्या आडव्या आणि थोड्या खाली झुकलेल्या असतात.यामुळे त्या एकमेकाचा आधार घेत जमलेल्या बर्फाचे वजन पेलू शकतात तसेच

बर्फ खाली पडायलाही मदत होते.पण कोरड्या हवेत किंवा खालच्या भागात या थंड प्रदेशातील अनुकूलनाचा काहीही उपयोग होत नाही.मध्य युरोप मधील बहुतांश सूचीपर्णी जंगले ही एकेकाळी लागवड केलेली आहेत.आपल्याला साजेशा ठिकाणी लोक झाडं लावत असतात.
अशा ठिकाणी सूचीपर्णी झाड नेहमीच तहानलेली असतात.त्यांची पानं एक-तृतीयांश पाऊस अडवून,शोषून घेऊन नंतर त्याचे बाष्पीभवन करून ती वाफ पुन्हा वातावरणात सोडण्याच्या कामात असतात. पानझडी जंगल एकूण पावसाच्या फक्त १५ टक्के पाऊस अडवतात म्हणजेच त्यांना सूचीपर्णी जंगलांपेक्षा १५ टक्के जास्त पाणी मिळते.