* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१७/३/२३

कथा माणुसकीचा 'पोऱ्या'

"ए पोऱ्या पाणी आण"

"ए पोऱ्या अरे कचोरी आण ना"

"ए पोऱ्या दोन मिसळ आण.वरुन दही टाक" पोऱ्या..


हाँटेलमधला एकमेव वेटर असलेला १४-१५ वयाचा तो पोरगा अक्षरशः धावत होता. प्रत्येक ग्राहकाला ताबडतोब आँर्डर हवी होती.तोही कुणाला नाराज करत नव्हता.


तहसील कचेरीसमोरचं ते हाँटेल नेहमीच तुडुंब भरलेलं असायचं.आमचा चहा,नाश्ता आणि डबा नाही आणला तर जेवणही तिथंच व्हायचं.चविष्ट पदार्थ आणि उत्तम सर्व्हिस त्यामुळे त्या छोट्याशा हाँटेलात कायम गर्दी असायची.आणि अशी सर्व्हिस देणारा तो हसतमुख चुणचुणीत मुलगा नेहमीच माझ्या उत्सुकतेचा विषय होता.


ग्राहक कधी कधी त्याला रागवायचे,त्याच्यावर चिडायचे पण याचा आवाज कधी चढायचा नाही."हो काका " "हो मावशी आणतो" "फक्त दोन मिनिट,आता आली तुमची मिसळ"असं सांगून तो ग्राहकांना शांत बसवायचा.


एक दिवस दुपारच्या वेळेस हाँटेलमध्ये फारसे ग्राहक नसतांना मी त्याला बोलावलं.

"नाव काय रे तुझं"

"दिलीप"

"कुठला तू?"

त्यानं बावीस कि.मी,वरच्या गावाचं नांव सांगितलं.

"शाळेत जातोस?"

"नाही.४ थी नंतर सोडली.

"का?"

"गावात दुष्काळ पडला. कामं मिळेना.अण्णांनी (त्याच्या वडिलांनी) इथं पाठवून दिलं"

"किती पगार मिळतो?"

"खाऊन पिऊन पाचशे रुपये"

"काय करतो पैशांचं?"

"गावी पाठवतो अण्णांकडे"

"पुढं शिकावसं वाटत नाही?"

"खुप वाटतं,पण काय करणार?नाईलाज आहे."

तेवढ्यात ग्राहक आल्याने संवाद संपला.मी मालकाकडे चौकशी केली.दिलीप सर्वात मोठा मुलगा,एक लहान भाऊ आणि एक बहीण,आईवडील शेतमजूर,अर्थातच घरची गरीबी त्यामुळे शाळेत हुशार असुनही दिलीप शिकू शकला नाही.दिलीप हाँटेलमध्येच झोपायचा. बाहेरच्या नळावर अंघोळ करायचा.

एकदा चार पाच दिवस तो दिसला नाही.मी मालकाकडे चौकशी केली.दिलीप गावी गेला होता.त्याचा लहान भाऊ डेंग्यूने आजारी होता. गावात इलाज झाले नाहीत.

जिल्ह्याच्या गावी नेण्याइतके पैसे नव्हते.शेवटी तो तिथंच वारला.त्याच्या अत्यविधीचा खर्चही हाँटेलमालकाने केला.


परतल्यावर तो गंभीर असेल अशी माझी कल्पना.पण हा पठ्ठ्या हसतमुखच! मी छेडल्यावर म्हंटला"साहेब किती दिवस दुःख करणार?गरीबाला शेवटी पोटापाण्यासाठी उभं रहावंच लागतं." त्यानंतर माझी आणि दिलीपची दोस्ती जमली.मी त्याला गोष्टीची,ज्ञानवर्धक पुस्तक आणून द्यायचो.तोही मला इतर ग्राहकांपेक्षा थोडी जास्त मिसळ,जास्त भजी द्यायचा.आचाऱ्याला माझा चहा जास्त स्पेशल बनवायला सांगायचा.

एक दिवस माझ्या मुलाचा वाढदिवस होता. बाहेरचं विश्व काय असतं हे दिलीपने बघावं म्हणून मी त्यालाही बर्थडे पार्टीचं निमंत्रण दिलं.पण सायंकाळी खुप ग्राहक असतात म्हणून तो नाही म्हणाला.मी हाँटेलमधून निघालो तसं त्याने मला थांबवलं.मालकाची परवानगी घेऊन तो बाहेर गेला आणि थोड्यावेळाने परतला तेव्हा त्याच्या हातात गिफ्टचं पार्सल होतं.

"साहेब मी तर येऊ शकत नाही पण तुमच्या मुलाला द्या माझ्याकडून गरीबाची भेट"

"अरे याची काय गरज होती?तू आला असतास तर खुप बरं वाटलं असतं "

"असू द्या साहेब"म्हणून त्यानं ते पार्सल माझ्या हातात कोंबलं.

रात्री वाढदिवसाची पार्टी पार पडल्यावर आम्ही सर्व गिफ्ट्स उघडली आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला.एवढ्या सगळ्या गिफ्ट्स मध्ये दिलीपचं गिफ्ट सर्वात महागडं होतं.पाचशे रुपये पगार कमवणाऱ्या त्या पोराने चक्क तीनशे रुपयाचं गिफ्ट दिलं होतं.मला एकदम गहिवरून आलं.त्या गरीबाचं मन श्रीमंतांपेक्षाही श्रीमंत होतं.

त्या घटनेला आज दोन वर्षे झालीत.आज दिलीप पुण्यात एका चांगल्या शाळेत शिकतो आहे. खटपट करुन एका फाऊंडेशनला मी त्याच्या उच्च शिक्षणापर्यंतचा संपुर्ण खर्च उचलायला राजी केलं आहे आणि दिलीप ऐवजी त्याच्या आईवडिलांना पाचशे रुपये मी दरमहिन्याला पाठवतोय.त्याबदल्यात दिलीपने चांगली नोकरी लागली की शेतमजूरांच्या शाळा सोडून दिलेल्या मुलांचं भवितव्य घडवावं असं मी त्याच्याकडून वचन घेतलंय.


ही कथा "कथा माणुसकीच्या "दीपक तांबोळी यांच्या कथासंग्रहातील आहे.

१५/३/२३

झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन मैत्र जिवांचे

काही वर्षांपूर्वी मी एका पायवाटेवरून जायचो. तो बीच वृक्षांचा एक रानवा होता.तिथे मला मॉस म्हणजे मडगजने भरलेले दगड दिसायचे. त्यांच्याकडे मी फारसं लक्ष देत नसे,पण एके दिवशी मात्र खाली वाकून मी त्या दगडांकडे निरखून पाहिलं.थोडी पोकळी असलेले विचित्र आकाराचे हे दगड मला चमत्कारिक वाटले. हलक्या हाताने एका दगडावरचं मडगजाचे आवरण मी उचलून बघतो तर काय!तो दगड नसून बीच वृक्षाचं साल होतं!मला वाटलेला 'दगड' हा चांगलाच टणक होता आणि जमिनीला चिकटून बसला होता.मडगजने लगडलेलं हे साल जमिनीला जखडलं गेलं होतं.खरंतर बीचच्या लाकडाचं किंवा सालाचं काही वर्षांतच विघटन सुरू होतं.पण हे मात्र अनेक वर्षं टिकून राहिल्यासारखं दिसत होतं.


खिशातल्या चाकूचा वापर करून मी सालाचा वरचा थर काढून टाकला आणि आत मला हिरवा रंग दिसला.हिरवा रंग ? मी आश्चर्यचकित झालो.हिरवा रंग क्लोरोफिल नावाच्या एका रसायनामुळे मिळतो.हे रसायन पानांमध्ये असतं, ज्यामुळे पानांना हिरवा रंग मिळतो.क्लोरोफिल झाडाच्या खोडातही साठवलेल असतं,पण केवळ जिवंत झाडात!म्हणजे माझ्या हातात असलेलं साल जिवंत होतं की काय!

मी आजूबाजूला जरा नीट पाहिलं तेव्हा जाणवलं की ही दगडासारखी वाटणारी सालं एका वर्तुळात मांडून ठेवली होती.सुमारे पाच फुटाच्या व्यासाचं हे वर्तुळ म्हणजे एका पुरातन झाडाचं खोड असल्याचं माझ्या लक्षात आलं.

त्याचा मधला भाग पूर्णपणे कुजून गेला होता आणि फक्त कड टिकून होती.त्या मोठाल्या घेराकडे पाहून हे झाड सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वी पाडलं गेलं असेल,असा अंदाज मी लावला.पण मग इतकी वर्ष या सालामध्ये जीव राहिला कसा ?

कोणत्याही पेशीला जिवंत राहण्यासाठी अन्न, हवा आणि पाणी हे तर लागतंच आणि ते थोड्याफार प्रमाणात मिळालं तरी त्यांची वाढ होत राहते.पण एकही पान नसताना या खोडाला प्रकाश संश्लेषण (फोटोसिंथेसिस) प्रक्रिया कशी करता आली,जी झाडांना जिंवत ठेवण्यासाठी आवश्यक असते आणि ती पानांमध्येच होते. कसं करता आलं? पृथ्वीवरील कोणताही सजीव शेकडो वर्ष भुकेला राहू शकत नाही.निसर्गाचा हा नियम त्या खोडालाही लागू होता.म्हणजे या खोडात नक्की काहीतरी प्रक्रिया सुरू आहे याची मला जाणीव झाली.या पुरातन खोडाला त्याच्या शेजाऱ्यांकडून काहीतरी मदत मिळत असणार. मुळाच्या मार्गाने ही मदत पुरविली जात असावी, असा अनुमान मी लावला.काही शास्त्रज्ञांनी या विषयात संशोधन केलं आहे.त्यात त्यांना असं दिसून आलं की,झाडांच्या मुळांशी फंगल नेटवर्क,म्हणजे कवकाची जाळी असतात ज्यातून झाडं पोषणद्रव्यांची देवाणघेवाण करतात.' काही वेळा झाडांची मुळंच एकमेकांना जोडलेली असतात आणि त्यातून देवाणघेवाण चालते.जंगलात सापडलेल्या या झाडाच्या खुंट्यात नक्की काय चाललं आहे याचा शोध मला घेता आला नाही,कारण त्या खोडाला उकरून मला त्याला कोणत्याही प्रकारची इजा करायची नव्हती.पण एक गोष्ट नक्की होती की, भोवतालच्या बीच झाडांकडून या खुंट्याला साखरेचा पुरवठा होत होता.झाडं एकमेकांना कशी जोडून घेतात याची प्रचीती कदाचित तुम्हाला रस्त्याच्या कडेच्या बंधाऱ्याकडे बघून येईल.

रस्त्याकडेच्या तिरकस भागावरून पाऊस झपाट्याने वाहतो आणि त्याबरोबर माती वाहून जाते.अशा वेळेस झाडांच्या मुळांची जाळी दिसू लागते.

जर्मनीमधील हार्झ डोंगररांगेत शास्त्रज्ञांना असे आढळून आले की हे परस्परावलंबनातून सहजीवनाचं उत्तम उदाहरण आहे.यात एकाच प्रजातीची झाडे एकमेकांना मुळातून जोडलेली असतात.आणि गरजेच्या वेळी त्यातून पोषणद्रव्यांची देवाणघेवाण होऊन आपल्या शेजाऱ्याला मदत पुरवली जाते.या अभ्यासातून असं दिसतं की जंगलात वनस्पती एकमेकांना जोडून राहतात,

ज्यामुळे त्यांचे आचरण एका भव्य विशाल - जीवासारखं असतं जसं ते आपल्याला मुंग्यांच्या वसाहतीतही पाहायला मिळतं.


इथे एक प्रश्न मनात येतो,की झाडांची मुळे मातीत अहेतुक,मुक्तपणे वाट काढत असतील का ? आणि वाटेत अपघातात एखादा स्वकीय भेटला तरच त्याच्या मुळांना जोडून घेत असतील का?आणि एकदा जोडलं गेल्यावर त्यांना पोषणद्रव्यांची देवाणघेवाण करावीच लागत असेल ? म्हणजे त्यांच्याकडून एक समूहाची उभारणी होत असल्यासारखं आपल्याला वाटतं, पण त्यांच्यासाठी ही अपघातानेच सुरू झालेली देवाणघेवाण तर नसेल? जरी हे झाडाकडून नियोजनबद्धरीत्या,हेतुपुरस्सर केले जात नसून निव्वळ योगायोगाने साधले जात असेल तरीसुद्धा जंगलाच्या परिसंस्थेसाठी ही गोष्ट जमेचीच आहे.पण निसर्ग इतका साधा सरळ नक्कीच नाही.इटलीच्या ट्यूरिन विद्यापीठाचे मासिमो माफेई यांच्या मते झाडांकडे आपल्या प्रजातीची मुळं अचूक ओळखण्याची क्षमता असते.आपल्या आणि इतर प्रजातींच्या मुळांमधला फरकही ओळखता येतो.'

पण वनस्पती अशा प्रकारचं सामाजिक जीवन का बरं जगत असतील? आपले खाद्य आपल्या स्वजातीयाशी आणि काही वेळा स्पर्धकांशीही वाटून खाण्याचं औदार्य का बरं दाखवत असतील? मानव जातीकडे या प्रश्नाला जे उत्तर आहे तेच वनस्पतींनाही लागू होतं - अशा प्रकारच्या सहजीवनाचे फायदे आहेत.एक झाड म्हणजे वन परिसंस्था नव्हे.स्थानिक हवामान नियंत्रणाची क्षमता एका झाडात नसते.वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानाला एकट्याने तोंड देणं सोपं नसतं.पण अनेक झाडं असलेल्या परिसराची परिसंस्था बनते.अशा प्रकारच्या समूहात थंडी आणि उष्णता नियंत्रणाची थोडी क्षमता असते.एकमेकांच्या साहाय्याने पाण्याचा अधिक साठा होऊ शकतो आणि हवेतील आर्द्रता वाढवता येते.अशा अनुकूल परिस्थितीत झाडं अनेक वर्ष जगू शकतात.पण यासाठी तिथल्या सर्व झाडांना सहकार्यानेच जगावं लागतं.प्रत्येक झाड जर स्वत:चा फायदा बघू लागलं तर सर्वांना दीर्घायु लाभणं शक्य होणार नाही.आणि झाडं वठण्याचे प्रमाण वाढलं की तिथं जंगलातील आच्छादन कमी होतं.अशा परिस्थितीत वादळी वारे आत शिरतात आणि उन्हाची झळ जमिनीला लागून मातीची आर्द्रता घटते.मग प्रत्येक झाडालाच संकटाला तोंड द्यावं लागतं.

त्यामुळे वनसमूहात प्रत्येक झाडाचं महत्त्व असतं आणि ते दुसऱ्याला उपयुक्त असतं.म्हणून वनपरिसंस्थेत आजारी आणि क्षीण वृक्षांनाही इतर झाडांकडून मदत केली जाते.

कोण जाणे, उद्या मदत पुरवणाऱ्याला त्या आजारी झाडाची मदत लागेल.

मोठाल्या चंदेरी -करड्या रंगाच्या खोडाचे बीच वृक्ष जेव्हा असे वागतात तेव्हा मला हत्तींच्या कळपाची आठवण होते. हत्तींच्या कळपाप्रमाणेच झाडेसुद्धा आपल्या समूहातील आजारी आणि दुर्बल झाडांची 

ते बरे होईपर्यंत काळजी घेतात.इतकंच काय तर मेलेल्या झाडालाही एकटं सोडायची त्यांची तयारी नसते.मृताला सोडून जाणं हत्तींनाही जड जातं.


या समूहात जरी प्रत्येक झाड एक सदस्य असलं तरी वनामध्ये सदस्यत्वाचे विविध स्तर असतात. उदाहरणार्थ,बहुतांश वठलेले वृक्ष शे-दोनशे वर्षांत कुजून नाहीसे होतात.मला सापडलेल्या या 'हिरव्या दगडांसारखे' काही थोडेच वृक्ष इतकी वर्षं जिवंत ठेवले जातात.पण वनपरिसंस्थेत असा भेदभाव का होत नसून असेल? मानव जातीप्रमाणे त्यांच्यातही कनिष्ठ दर्जाचे नागरिक असतात की काय? मला वाटतं वनपरिसंस्थेतही असं असतं,पण त्यात 'दर्जा' हा निकष एखादा वृक्ष इतरांना किती जोडला गेला आहे,इतरांशी त्याचा स्नेहभाव किती आहे, यावर त्याला दुसऱ्यांकडून होणारी मदत ठरत असावी.एखाद्या वनाच्या आच्छादनाकडे पाहून तुम्हालाही हे जाणवेल.प्रत्येक झाड आपला विस्तार शेजारच्या झाडाच्या पालवीच्या विस्तारापर्यंतच पसरवते,कारण तिथे पोचणारा सूर्यप्रकाश वापरला जात असतो.पण तिथपर्यंत पोहोचलेल्या पालवीला भक्कम फांद्यांनी आधार दिला जातो.दोन झाडांमध्ये धक्काबुक्की चालू आहे की काय असं वाटेल बघणाऱ्याला! खऱ्या मित्रांसारखी ही दोन्ही झाडं आपला विस्तार आणि फांद्या दुसऱ्याला त्रास होईल इतक्या वाढवतच नाहीत.त्यांना आपल्या शेजारच्या मित्राकडून प्रकाश ओरबाडून घ्यायचा नसतो. त्यामुळे मित्र नसलेल्या दिशेला ते आपल्या फांद्यांचा विस्तार वाढवतात.मित्र वृक्ष जमिनीखालूनही भक्कमरीत्या जोडलेले असतात.त्यांची मैत्री इतकी घट्ट असते की काही वेळेला एक वठला की दुसराही फार काळ टिकत नाही.वठलेल्या मित्राच्या खोडाला जिवंत ठेवण्याचे कार्य फक्त अविचल जंगलात दिसून येतं.ही मैत्री बीच वृक्षांव्यतिरिक्त इतर प्रजातींमध्येही दिसून येत असणार.ओक,फर,स्प्रूस आणि डगलस स्प्रूस वृक्षाच्या जंगलातून मी स्वतः अशी मैत्री पाहिली आहे.त्यांच्यातही कापून टाकलेल्या झाडांच्या खोडांना अशाच प्रकारे जिवंत ठेवलं गेलं होतं.युरोपमध्ये बहुतांश सूचीपर्णी जंगलं लावली गेली आहेत.यामधले वृक्ष रस्त्यावर खेळणाऱ्या उनाड मुलांसारखे वागतात.लागवड करताना त्यांच्या मुळांना कधीही भरून न येण्यासारखी प्रचंड इजा झालेली असल्यामुळे मुळाच्या जाळ्यातून ते मैत्री करू शकत नाहीत.


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर

अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन

१३/३/२३

देवत्व पावलेला नास्तिक बुद्ध उर्वरीत भाग..

बुध्द काशी क्षेत्री आले तेथील उपवनात ते राहिले.त्यांना पाच शिष्य मिळाले.त्या शिष्यांना त्यांनी ते नवीन ज्ञान दिले.नंतर ते त्यांना म्हणाले, आता हिंदुस्थानभर जा.सर्वत्र हा धर्म द्या.त्या पाचांचे पुढे साठ झाले.त्यांची कीर्ती हिंदुस्थानभर पसरली.लोक त्यांची पूजा करू लागले.

त्यांनी नवीन ज्ञान दिल.म्हणून नव्ह; तर ते काही चमत्कार करतात असे ऐकून.ख्रिस्ताची अशीच पूजा होई.

ख्रिस्ताप्रमाणे बुद्धही पाण्यावरून चालत जातात,अशी कथा पसरली.ते हवेत उंच जातात,ते वाटेल तेव्हा अदृश्य होतात,इत्यादी चमत्कारकथा वाऱ्यावर सर्वत्र गेल्या.एके दिवशी बुद्ध आपल्या शिष्यांसह एका नदीजवळ आले. ती नदी दुथडी भरून वाहात होती.प्रचंड पूर! परंतु बुद्धांनी मनात आणले आणि काय आश्चर्य? सशिष्य ते एकदम पैलातीरास गेले,अशा गोष्टी सर्वत्र पसरत होत्या.बुद्धांची पूजा होऊ लागली. त्यांनी नवीन दृष्टी दिली.म्हणून नव्हे,तर ते एक थोर जादूगार आहेत.अदभूत चमत्कार करणारे आहेत म्हणून.


काही थोड्यांनी बुद्धांचे तत्त्वज्ञान समजून घेण्याची धडपड केली.आणि फारच थोड्यांनी त्यांचे जीवन आपल्या कृतीत आणण्याची खटपट केली.बुद्ध हे चांगले जीवन कसे जगावे, ते शिकवणारे महान् आचार्य होते.


बुद्धांचे तत्त्वज्ञान व चांगल्या जीवनाविषयींचे त्यांचे विचार आपण थोडक्यात पाहू या.


प्रथम भटांभिक्षुकांचे बंड त्यांनी मोडले.ते विधी, ते यज्ञ,त्या नाना भ्रामक रूढी,सर्वांच्या मुळावर बुद्धांनी घाव घातला.मोक्षासाठी स्वत:चा उद्धार व्हावा यासाठी या गोष्टींची काही एक जरुरी नाही,असे ते स्वच्छ सांगत. देवांचे हे सेवक आधी दूर करून नंतर त्यांनी देवांनाही दूर केले.देव नकोत व हे भटजीही नकोत.देव आहेत की नाहीत याविषयी बुद्ध काहीच बोलत नसत, होय वा नाही,

काहीच ते सांगत नसत.त्यांनी त्या गोष्टीची जणू उपेक्षा केली.जर कोणी देवदेवतांविषयी त्यांना प्रश्न कला,तर ते खांदा जरा उडवीत व म्हणत,


"या देवांचा प्रश्न मला महत्त्वाचा वाटत नाही मला जिवंत माणसांचा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटतो. "


बुद्ध जसजसे परिणतवयस्क होऊ लागले, तसतसे हे जन्म मरणाच्या फेऱ्यांचे त्यांचे तत्त्वज्ञान अधिकच काव्यमय होऊ लागले. पुढेपुढे बुद्ध निराळ्याच रीतीने बोलू लागले. प्रत्येक जीव स्वतः अनेक जन्मांतून जातो,असे ते आता सांगत नसत.ते आता म्हणत; प्रत्येक जीव म्हणजे एक पेटती मशाल आहे. दुसऱ्या मशालीस ती जाऊन मिळते.आणि याप्रमाणे प्रत्येक जीवाची ज्योत अमृतत्वाच्या विश्वव्यापक ज्योतीत विलीन होते.किंवा घंटांची उपमा वापरली तर असे म्हणता येईल,की प्रत्येक जीवाचे जीवन म्हणजे उघड्या खोलीतील घंटेचे नाव आहे.

कालसोपानावरील सर्व जीवांच्या जीवन-घंटांतून नाद निघण्यास हा व्यक्तिगत नादही कारणीभूत होत असतो आणि शेवटी हा नाद स्वर्गाच्या विश्वव्यापक संगीतात विलीन होतो.


या मताभोवतालचे काव्य दूर केले,म्हणजे शेवटी मथितार्थ इतकाच उरतो,की प्रत्येक जीवनाचे फार दूरवर पोहोचणारे परिणाम होत असतात आणि प्रत्येक मानवप्राणी हा मानवजातीचा एक महत्त्वाचा घटक आहे.


वैयक्तिक अमृतत्वावर बुद्धांचा विश्वास नव्हता.त्यांना त्याची पर्वाही नव्हती.प्रत्येक मानवी जीव, प्रत्येक मानवात्मा विश्वात्मा भाग आहे,जगदात्म्याचा अंश आहे.वैयत्तिक अमृतत्वाची इच्छा करणे म्हणजे सर्वांचा प्रश्न दूर सोडून केवळ स्वतःपुरते पाहणे होय,अंशीला दूर झुगारून अंशाने आपल्यापुरते पाहणे होय.बुद्ध शिष्यांना सांगत,


"जगातील सारे दुःख आपल्या स्वार्थी महत्त्वाकांक्षेमुळे आहे.मग या स्वार्थी महत्त्वाकांक्षा ऐहिक असोत वा पारलौकिक असोत. "


परंतु जो मानवजातीच्या विशाल व महान आत्म्यासाठी स्वतःचा क्षुद्र आत्मा दूर करतो; स्वतःचा आत्मा मानवजातीच्या सेवेत जो रमवतो,तो जन्म मरणाच्या फेऱ्यांतून मुक्त व्हायला पात्र असतो.चिरशांतीच्या निर्वाणाप्रत तो जातो.


बुद्ध 'निर्वाण' या शब्दाला काय समजत असत, ते त्यांनी कधी स्पष्ट केले नाही.शिष्यांनी निर्वाणाविषयी पुष्कळदा विचारले,परंतु बुद्ध उत्तर देण्याचे टाळीत.अशा वेळेस ते नेहमी गंभीर असे मौन पाळीत.या मौनाची शिष्य क्षमा करीत ते मौन त्यानां जणू पूजाही वाटे,पवित्र वाटे, स्वर्गाची,त्या निर्वाणाच्या अंतिम दशेची कल्पना बुद्ध शब्दांत कशी आणून देणार,असा त्या मौनाचा अर्थ शिष्य करीत.जेव्हा जीव निर्वाणाप्रत जातो,तेव्हा त्याला स्वतःची जाणीव कोठून उरणार? त्या वेळेस त्याला सतही म्हणता येत नाही.असतही म्हणता येत नाही; जणू तो मृतही नाही,सजीवही नाही.ती अत्यंत परंमकोटीच्या आनंदाची स्थिती असते. जीवनाहून वा मरणाहून परम दोहोंहूनही श्रेयस्कर अशी ती स्थिती असते.बुद्धांचे शिष्य निर्वाणाचा अशा प्रकाराचा काहीतरी अर्थ लावीत,जेव्हा बुद्ध मरण पावले,तेव्हा शिष्य म्हणाले, "बुद्ध आता अपरंपार अनंत सागराप्रमाणे गंभीर झाले आहेत;सद्सतांच्या पलीकडे ते गेले आहेत.सद्सतांच्या संज्ञा,ही परिभाषा त्यांना आता लावता येणार नाही.


म्हणजे बुद्धांचा जीवात्मा जणू अवर्णनीय अशा अनंताचे स्वरूप धारण करता झाला. अनाकलनीय अशा शाश्वततेचे चिंतन करणारे ते जणू अनंत परब्रह्मच झाले.शाश्वत निःस्तब्धतेच्या,अखंड शांतीच्या संगीतात शून्यत्वाचा डंका ते वाजवीत राहिले.


माझ्या समजुतीप्रमाणे निर्वाणाचा खरा अर्थ हा असा आहे.


बुद्धांची चांगल्या जीवनाविषयींची त्यांची शिकवण अती उदात्त आहे. ते म्हणतात,"या दुःखमय संसारात आपण सारे भाऊभाऊ आहोत.जणू आपण एका कुटुंबातील आहोत." या आपल्या विशाल कुटुंबात बुद्ध केवळ मानवप्राण्यांचाच अंतर्भाव करीत,असे नव्हे; तर सर्व सजीव सृष्टीचा ते अंतर्भाव करीत.जे जे जीव जन्मतात,दुःखे भोगतात,मरतात,ते ते सारे एकाच कुटुंबातले.बुद्धांना प्रत्येक प्राणमय वस्तू, प्रत्येक जीव म्हणजे करुणेचे काव्य वाटे.मानवी वेदनांची भाषा जितक्या कोमलतेने ते जाणत तितक्याच कोमलतेने पशुपक्ष्यांचीही अस्पष्ट वेदना त्यांना कळे.मूसाप्रमाणे बुद्धांनीही वागण्याचे दहा नियम दिले आहेत.त्या दहा आज्ञांतील पहिली व सर्वांत महत्त्वाची आज्ञा 


"कोणत्याही स्वरूपात जीवाची हिंसा करू नका." ही आहे.ज्या अर्थी आपणास जीव निर्माण करता येत नाही,त्या अर्थी त्याची हिंसा करण्याचाही हक्क आपणास नाही.त्यांच्या सर्व शिकवणीचा हा मुख्य आधार आहे.


बुद्धांच्या नीतिशास्त्रातील दुसरी महत्त्वाची तत्त्वे म्हणजे नेमस्तपणा,सहनशीलता,प्रेम,इत्यादी होत.स्वतःच्या कृतीने नेमस्तपणाचे,संयमाचे महत्त्व त्यांनी पदोपदी दाखवून दिले आहे.अत्यंत सुखसंपन्न अशा घराण्यात ते जन्मले होते.परंतु त्या सुखांना ते - लवकरच विटले.नंतर ते स्वतःच्या देहाला अत्यंत क्लेश देऊ लागले.परंतु या आत्यंतिक देहदंडनेचाही त्यांना वीट आला. शेवटी मध्यम मार्ग त्यांनी पसंत केला.मध्यम मार्गात सुख आहे असे त्यांनी सांगितले.अतिरेक कशाचाही नको,अति तिथे माती,मनाचे लाड पुरविण्यापेक्षा मनावर अंकुश ठेवणे हेच हिताचे, असे त्यांनी शिकवले.भोगांध होणे,सत्तांध होणे, विजयांध होणे इत्यादींचा त्यांनी धिक्कार केला. या तिन्ही गोष्टींनी मनुष्य शेवटी बुद्धिष्ट होतो, असे ते म्हणत.अतीमहत्त्वाकांक्षा आत्म्याच्या रोगटपणाची खूण होय,दुर्बलांवर सत्ता चालवू पाहणे युद्धात विजय मिळण्याची इच्छा करणे, या साऱ्या आत्म्याच्या विकृती होत.विजय म्हणजे मृत्यूची जननी विजयी होण्याची इच्छा करणे आपल्याच बंधूंचा हेवादावा करणे; आणि आपल्या भावांचा द्वेष करणे ही गोष्ट मृत्यूहूनही वाईट होय.


परंतु मानवी मनात विजयतृष्णा आहे.ही विजयतृष्णा कशी जिंकायची? बुद्ध म्हणाले, "सहनशीलतेने"जो जिंकायला येईल त्याला क्षमा करा.त्या विजिगीषू माणसाची कीव करा.ते एक रोगी बालक आहे असे समजा.द्वेषाची परतफेड मैत्रीने व स्नेहाने करा.याच मार्गाने जगातील ही भांडखोर व रानटी मुले एके दिवशी सुसंस्कृत व शांतिप्रिय अशी माणसे होतील.दुसऱ्याला दुःख न देता स्वतः सारे सहन करण्याचे शौर्य त्यांनी शिकविले.दुसऱ्याची हिंसा न करता स्वतः मरण्याचे धैर्य त्यांनी शिकविले.एक गोष्ट खरोखर त्यांनीच शिकविली.ती म्हणजे सहनशीलपणा,सारे मुकाट्याने सहन करा. पौर्वात्यांची ही सोशीकता निस्सीम आहे.तसेच सहिष्णूताही त्यांनी शिकविली.बुद्धधर्मी मनुष्य म्हणजे पृथ्वीवरचा अत्यंत सहिष्णु प्राणी होय. मुसलमानाप्रमाणे किंवा ख्रिस्ती लोकांप्रमाणे धर्मयुद्ध करीत बुद्धधर्मीयांनी रक्त सांडले नाही. बुद्धांच्या नावाने कोणाही परमधर्मीयाचा त्यांनी कधीही छळ केला नाही.


बुद्धांनी परमेश्वराचे वैभव शिकविले नाही,तर प्रेमाचे सामर्थ्य शिकविले."सारा संसार प्रेमाने आनंदमय करणे" हे त्यांचे ध्येय होते.दुःखी, दरिद्री लोकांत राहण्यासाठी त्यांनी राज्यत्याग केला.बुद्धांची शांती देणारी परममंगल वाणी कानी पडावी म्हणून एक भिकारी त्यांच्याकडे आला.या भिकाऱ्याला मंगल आशीर्वाद देणे हे जीवनातील त्यांचे शेवटचे कर्म होते.ते आता ८० वर्षांचे होते.लोहार जातीचा त्यांचा एक शिष्य होता.त्या गरीब शिष्याकडे ते जेवले आणि त्यांना आजार जडला.ते कसेतरी मोकळ्या शेतात गेले. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, "पर्णमय शय्येवर मला ठेवा." पुन्हा ते म्हणाले, "मी आजारी पडलो म्हणून त्या लोहाराला नकाहो नावे ठेवू."


बुद्धांचे प्राण निघून जाण्याची वेळ आली. बुद्धांजवळ काही उपदेशपर शब्दांची भिक्षा मागण्यासाठी एक अस्पृश्य आला होता.त्या अती शूद्राला त्यांनी आपल्याजवळ बोलावले.त्या मरणोन्मुख महात्म्याने,त्या आसन्नमरण राजर्षीने त्या भिकाऱ्याचा हात आपल्या हातात घेतला. त्या दुःखी बंधूजवळ प्रेमाचे व करुणेचे दोन शब्द तो बोलला आणि त्याचा प्राण गेला.


जवळजवळ दोन हजार वर्षे बुद्धांच्या शिकवणीचा निम्म्या मानवजातीवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होत आहे.भूतदया, सहनशीलता,सहिष्णुता,प्रेम यांची त्यांनी दिलेली थोर शिकवण परिणाम करीत आहे.आता उरलेली निम्मी मानवजातही बुद्धांची ती वाणी ऐकायला उभी राहात आहे.तो संदेश ऐकायला आरंभ करीत आहे.


समाप्त .. 

९ मार्च २०२३ या लेखातील शेवटचा भाग.


११/३/२३

उन्नत क्षण आपल्याला शोधत येतात,आपण फक्त जागं असलं पाहिजे!

फोन आला.पत्ता मिळाला.मी त्या घरापाशी टॅक्सी नेऊन थांबवली,हॉर्न वाजवला आणि बरीच मिनिटं थांबलो.कस्टमर काही बाहेर येईना.


शेवटी उतरून दारापाशी जाऊन कडी वाजवली.

"आले, आले.." एक कापरा,वृद्ध आवाज आणि फरशीवरून काहीतरी ओढल्याची जाणीव बर्‍याच वेळाने दार उघडलं नक्षीकामाच्या झग्यात आणि फुला-फुलांच्या हॅट मधली

चाळीस सालच्या चित्रपटातून उतरून आलेली एक नव्वदीची वृद्धा.


हातातल्या दोरीमागे नायलॉनची बॅग आणि त्यामागे एक आवरलेलं,स्तब्ध शांततेतलं निर्मनुष्य घर,बिनभांड्यांचं स्वयंपाक घर,आणि बिन घड्याळाची भिंत


"माझी बॅग नेणार का उचलून गाडीत?"

मी एका हातात बॅग घेऊन दुसर्‍याने त्या वृद्धेला हात दिला "थॅंक यू!"

"त्यात काय मोठंसं, मी नेहेमीच करतो अशी मदत माझ्या आईलाही इतरांनी असंच वागवावं म्हणून."

"किती छान बोललास रे बाबा! थॅंक यू!"

तिने पत्ता दिला मला,आणि म्हणाली

"आपण शहरातून जाऊयात का?"

"ते लांबून पडेल.."

"पडू देत रे,मला कुठे घाईये..

वृद्धाश्रमात जातेय मी,आता तोच स्टॉप शेवटचा.!


मी आरश्यातून मागे पाहिलं

तिचे ओले डोळे चकाकले

"माझं कुणी राहिलं नाहीये...

आणि डॉक्टर म्हणतात

आयुष्यही फार राहिलं नाही"


मी हात लांबवून मीटर बंद केलं

"कुठून जावूयात?"

पुढचे दोन तास आम्ही शहरभर फिरलो. गल्ल्या-बोळातून,हमरस्त्यांवरून ती कुठे काम करायची ते तिनं दाखवलं.ती आणि तिचा नवरा लग्न करून रहायला आले ते घर दाखवलं.

एका जुन्या गोदामापुढे गाडी थांबवून म्हणाली, "पूर्वी इथे नृत्यशाळा होती,मी नाचले आहे इथे" काही ठिकाणी नुसतीच कोपर्‍यावर टॅक्सी थांबे. ती टक लावून इमारतीकडे पाही,अबोलपणे मग खुणेने "चल" म्हणे


सूर्य मंदावला,"थकले मी आता,चल जाऊयात"

आम्ही अबोल्यात वृद्धाश्रमात पोहोचलो टॅक्सी थांबताच दोन परिचारक पुढे आले.तिला व्हीलचेअर मध्ये बसवून तिची बॅग घेते झाले.तिने पर्स उघडली,"किती द्यायचे रे बाळा?"


"काही नाही आई,आशीर्वाद द्या."


"अरे तुला कुटुंब असेल,आणि पोटा-पाण्याची..."

"हो,पण इतर प्रवासीही आहेत,होईल सोय त्याची"खाली वाकून म्हातारीला जवळ घेतलं आणि चटकन् टॅक्सीत बसलो,डोळे चुकवत..

"मला म्हातारीला आनंद दिलास रे,सुखी रहा!"


व्हीलचेअर फिरली,गाडी फिरली माझ्या मागे 

दार बंद झालं,तो आवाज एका आयुष्याच्या बंद होण्याचा होता.


उरल्या दिवसभर मी एकही प्रवासी शोधला नाही शहरभर फिरत राहिलो,असाच विचारांत हरवून,माझ्या ऐवजी,

पाळी संपत असलेला एखादा चिडका ड्रायव्हर भेटला असता तर..मीही स्वतःच,एकदा हॉर्न वाजवून,निघून गेलो असतो तर.मला जाणवलं,मी काही खास केलं नव्हतं,


उन्नत क्षण आपण शोधून मिळत नसतात,ते क्षण आपल्याला शोधत येतात,आपण फक्त जागं असलं पाहिजे!


Original English version by Kent Nerburn.. Cab Ride - उन्नत क्षण


९/३/२३

देवत्व पावलेला नास्तिक बुद्ध

मानवजात जणू एकाच कुटुंबाची आहे.एकाच कुटुंबाच्या अनेक शाखा सर्वत्र पसरल्या आहेत. आकाशातील इतर तेजोगोलांच्या मानाने पृथ्वी ही फारच लहान आहे;आणि लहानशा पृथ्वीवरील हे मानव कुटुंब म्हणून फारच लहान वाटते.आणि या सर्व विश्वपसाऱ्यात पृथ्वीवरीलमानवासारखा प्राणी अन्यत्र नाही.असे आजचे ज्ञान तरी सांगत आहे.सर्व विश्वात अपूर्व व अद्वितीय असा हा मानव आहे.

त्याच्या जातीचा प्राणी विश्वात अन्यत्र नाही.

मानवजातीचे सारे सभासद परस्परांशी प्रेमाने व बंधुभावाने वागतील,असे वाटणे स्वाभाविक आहे.

परंतु आश्चर्य वाटते,की दोन मानवजाती जर एकत्र आल्या,तर त्यांचा परस्परांत पहिला परिचय जो होतो,तो मारामारीच्या रूपाने होतो.या मानवात काहीतरी विचित्र वेडेपणा आहे असे वाटते.


हा मानवी वेडेपणा आपण इजिप्तमध्ये,मेसापोटेमियामध्ये

व पॅलेस्टाईनमध्ये पाहिला.हा वेडेपणा दूर करू पाहणाऱ्या काही संस्फूर्त अशा दैवी पुरुषांचे प्रयत्नही आपण पाहिले.

आता आपले लक्ष पृथ्वीच्या दुसऱ्या एका भागाकडे देऊ या.हिमालयाच्या खिंडीतून जे लोक हिंदुस्थानाच्या मैदानात उतरले,त्यांनी ऐतिहासिक जीवनाची पहिली

मंगलप्रभात कशी सुरू केली, ते जरा पाहू या.


कित्येक शतके हिंदुस्थान जगापासून अलगच होता!एका बाजूस हिमालय,दुसऱ्या बाजूस अपरंपार सागर या दोन मर्यादांमध्ये त्या हिमयुगात आलेले काही खुजे कृष्णवर्ण लोक येऊन राहिले होते.हे रानटी काळे लोक सदैव भटकत असत.आपले कळप बरोबर घेऊन त्यांना चारीतचारीत ते सर्वत्र हिंडत हळूहळू त्यांनी ओबडधोबड अशी दगडी हत्यारे शोधली. पुढे काही हजार वर्षांनंतर त्यांनी तांब्याचा शोध लावला.मेसापोटेमिया व इतर पाश्चिमात्य देश यांच्याशी थोडाफार दर्यावर्दी व्यापार त्यांनी सुरू केला.


जवळजवळ दहा हजार वर्षे मूळच्या हिंदुस्थानी लोकांनी हे प्राथमिक जीवन चालविले.


परंतु हिमालयापलीकडे दुसरी एक उत्साही मानवजात वाढत होती.हे लोक उंच, गौरवर्णी व सामर्थ्यसंपन्न होते.

आशियाच्या वायव्य दिशेस कास्पियन समुद्राजवळ हे प्रथम राहत होते.पाच हजार वर्षांपूर्वी त्याच्यांत एक प्रकारची अस्वस्थता व प्रक्षुब्धता पसरली.त्याच्यांत एकदम चैतन्य संचरले.ते पृथ्वीच्या सर्व भागांत पसरू लागले.काही मध्य आशियातील इराणात आले.आणि म्हणून या सर्वांनाच 'इराणियन' किंवा 'आर्यन' असे नाव मिळाले.


आंतरिक प्रेरणेने हे आर्य सर्वत्र पसरले आणि बहुतेक सर्व युरोपियन राष्ट्रांचे पूर्वज बनले.तसेच मेडीस,इराणी व हिंदू यांचेही ते पूर्वज होते.हिंदू व युरोपियन हे एकाच पूर्वजांपासून जन्मलेले आहेत हे स्पष्टपणे दाखविण्यासाठी काही इतिहासकार 'आर्य' या शब्दाऐवजी 'इंडायुरोपीय जात' असा शब्द वापरतात.


हे इंडोयुरोपियन किंवा आर्य जेव्हा पर्वत ओलांडून हिंदुस्थानात येऊ लागले,तेव्हा या देशात राहणाऱ्या त्या खुजा व कृष्णवर्णी लोकांकडे ते तुच्छतेने पाहू लागले.या मूळच्या रहिवाश्यांना ते 'दस्यू' म्हणत.ते त्यांचा निःपात करू लागले.पुष्कळांना त्यांनी गुलामही केले.


अशा रीतीने हिंदुस्थानात जातिभेद प्रथम जन्माला आला.नवीन आलेले आर्य हे वरिष्ठ वर्ग बनले.आणि येथील जित लोकांना त्यांनी अस्पृश्य केले.आर्यांमध्ये माणसा-माणसांत हे उच्चनीच भेद मानण्याची जी मूर्ख पद्धती होती,ती अद्यापही तशीच आहे.तशीच आहे. हिंदुस्थानात नव्हे;तर 


युरोपात व अमेरिकेतही वरती ब्राह्मण व खाली तळाला अस्पृश्य असे प्रकार आहेत.ब्राह्मण

व अस्पृश्य दोघेही मेल्यावर निःपक्षपाती किड्यांना सारखीच गोड मेजवानी देतात,ही गोष्ट दिसत असली,तरीही हे मूर्खपणाचे भेद केले जातच आहेत. 


परंतु सध्या प्राचीन हिंदुस्थानाकडे पाहावयाचे आहे.


ख्रिस्त शतकापूर्वी सुमारे दोन हजार वर्षांच्या सुमारास आर्य हिंदुस्थानावर स्वारी करू लागले. आर्यांची ही स्वारी कित्येक शतके सारखी सुरू होती.हे आर्य हिंदुस्थानात आले.त्यांनी ठायीठायी राज्ये स्थापिली.या नव्या देशात निरनिराळी सोळा राज्ये त्यांनी स्थापिली,प्रत्येक जण आपापल्या राज्यात गुण्यागोविंदाने राहात होता. हत्तीची,वाघाची शिकार करीत,भूमीचे येणारे विपुल उत्पन्न उपभोगीत,एक प्रकारचे सुखी व निश्चित असे जीवन ते कंठीत.त्यांचे ते जीवन जणू स्वप्नमय होते.ते प्रत्यक्षापेक्षा कल्पना सृष्टीतीलच जणू भासे.देश उष्ण होता.जमीन सुपीक होती,विपुल होती,आणि थोड्याशा श्रमाने भरपूर पिके.फारसा वेळ काबाडकष्टात दवडावा लागत नसे.भव्य महाकाव्ये रचायला व तत्त्वज्ञाने गुंफायला त्याना भरपूर वेळ होता.पऱ्यांच्या गोष्टी लिहायला व जीवनाच्या गूढतेचा शांतपणे विचार करायला त्यांना वेळ होता.अशा या वातावरणात त्या ज्यू प्रेषिताच्या,जेरिमियाच्या,जन्मानंतर पन्नास वर्षांनी बुद्ध जन्माला आले.


बुद्धांचे मूळचे नाव शाक्यमुनी सिद्धार्थ,शाक्य कुळात त्यांचा जन्म झाला.हिमालयाच्या छायेखाली उत्तर हिंदुस्थानाच्या एका भागात त्यांचा जन्म झाला.लहानपणी त्या हिमालयाकडे त्यांनी अनेकदा पाहिले असेल.बर्फाची पांढरीशुभ्र पागोटी घालून शांतपणे उभ्या असलेल्या महाकाय देवांच्या जणू मूर्तीच अशी ती हिमालयाची शिखरे बुद्धांना आकृष्ट केल्याशिवाय कशी राहिली असतील ? हिमालयाची ती उत्तुंग,धवल शिखरे खालच्या मुलांचे चाललेले खेळ मोठ्या करुणेने पाहात असतील व म्हणत असतील,'किती पोरकट यांचे हे पोरखेळ!'


बुद्धांचा पिता शाक्य जातीचा राजा होता. राजवाड्यात सुखोपभोगात हा बाळ वाढला. बुद्ध अत्यंत सुंदर होते.राजवाड्यातील महिलांचा तो आवडता होता.राज्यात भांडणे नव्हती. लढाया व कारस्थाने नव्हती.

खाणेपिणे,गाणे, शिकार करणे,प्रेम करणे,मजा करणे म्हणजेच जीवन,वाटले तर स्वप्नसृष्टीत रमावे.हिंदूंसारखे स्वप्नसृष्टीत रमणारे दुसरे लोक क्वचितच असतील एकोणिसाव्या वर्षी गौतमाचे लग्न झाले.पत्नीचे नाव यशोधरा.सुखाचे,गोड असे सांसरिक जीवन सुरू झाले.

कशाचा तोटा नव्हता.एखाद्या पऱ्यांच्या गोष्टीतील राजाराणीप्रमाणे दोघे स्वप्नसृष्टीत जणू रंगली. मानवजातीपासून जणू ती दूर गेली.अशी दहा वर्षे गेली.अद्याप मूलबाळ नव्हते.तीच काय ती उणीव होती.गौतम सचित झाला.ईश्वराने सारे दिले.परंतु मुलाची सर्वोत्तम देणगी त्याने का बरे दिली नाही,असे मनात येई.अत्यंत सुखी अशा जीवनात विफल आशा का बरे असाव्यात ? दुधात मिठाचे खडे का पडावेत ? हे जीवन जगण्याच्या लायकीचे तरी आहे का ?


एके दिवशी रथात बसून तो हिंडायला बाहेर पडला होता.सारथी छत्र होता.रस्त्यावर एक जीर्णशीर्ण म्हतारा मनुष्य त्यांना आढळला.त्याचे शरीर गलित झाले होते.जणू सडून जाण्याच्या बेतात होते.त्याचा सारथी म्हणाला,'प्रभो,जीवन हे असेच आहे.आपणा सर्वांची शेवटी हीच दशा व्हायची आहे.'पुढे एकदा रोगग्रस्त भिकारी त्यांना आढळला.सारथी म्हणाला,"हे जीवन असेच आहे.येथे नाना रोग आहेत." गौतम विचारमग्न झाला इतक्यात न पुरलेले असे एक प्रेत दिसले.ते प्रेत सुजलेले होते,विवर्ण झाले होते.घाणीवर माशांचे थवे बसावेत,त्याप्रमाणे प्रेताभोवती माशा घोंघावत होत्या.

सारथी छत्र म्हणाला, "जीवनाचा शेवट असा होत असतो." 


(मानवजातीची कथा - हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन,साभार)


इतके दिवस गौतम राजवाड्यातील सुखांत रंगलेला होता.

अशी दुःखद दृश्ये त्याने पाहिली नव्हती.परंतु आज जीवनातील दुःख;क्लेश त्याने पाहिले.या जीवनाची शेवटी चिमूटभर राख व्हायची,हे त्याने जाणले.जीवनाचा हा केवढा अपमान! साऱ्या खटाटोपाची का अशीच इतिश्री व्हायची ? त्या ज्यू प्रेषितांप्रमाणे बुद्धांनीही निश्चय केला.मानवी दुःखावर उपाय शोधून काढण्याचे त्यांनी ठरविले.ज्यू धर्मात्मे

'मनुष्यप्राणी मूर्ख ओरडत होते.'परंतु बुद्ध एक पाऊल पुढे गेले.

ईश्वराच्या दुष्टपणाविरुद्ध बुद्धांनी बंड आरंभिले.


अति सुखामुळे गौतम उदासीन झाले होते.त्या सुखाचा त्यांना वीट आला होता.आपल्या या उदासीनतेतून अधिक उच्च व उदात्त असे सुख शोधण्यासाठी ते उभे राहिले.परिवाज्रक यती व्हावयाचे त्यांनी ठरविले.सर्वसंगपरित्याग करून बाहेर पडण्याचे त्यांनी ठरविले.चिंतनाने,उपवासाने मानवी भवितव्याचे कोडे सोडवता येईल असे त्यांना वाटत होते.


इतक्यात आपल्याला मुलगा झाला आहे असे त्यांना कळले.नवीन एक बंधन निर्माण झाले; परंतु ती सारी कोमल व प्रेमळ बंधने निग्रहाने तोडण्याचे त्यांनी नक्की केले.


एके दिवशी पुत्रजन्मानिमित्त मेजवानी होती. बुद्धांच्या पित्याने खास सोहळा मांडला होता.आणि 


त्याच दिवशी मध्यरात्री निघून जाण्यासाठी बुद्धांनी सिद्धता केली.सारी मंडळी दमून भागून झोपलेली होती.बुद्ध उठले.पत्नीकडे त्यांनी शेवटचे पाहिले.

लहान बाळ तिथे आईच्या कुशीत होते.बुद्धांच्याच जीवनातील जीवनाने ते सुंदर सोन्याचे भांडे भरलेले होते.त्या मायलेकरांचे चुंबन घ्यावे असे त्यांना वाटले.परंतु ते जागे होतील या भीतीने त्यांनी तसे केले नाही.ते तेथून निघाले.त्यांनी आपल्या सारथ्याला दोन वेगवान घोडे तयार करण्यास सांगितले.त्या घोड्यांवर बसून दोघे दूर गेले.सर्व प्रेमळ बंधने तोडण्यासाठी त्यांना लांब जाणे भाग होते. जीवनाचे रहस्य शोधण्यासाठी जो मार्ग त्यांना घ्यावयाचा होता,तो मार्ग अनंत होता.पाठीमागे एकदाही वळून न पाहता सकाळ होईपर्यंत ते खूप दूर गेले.


आता उजाडले होते.आपल्या पित्याच्या राजाच्या सीमांच्या बाहेर ते होते,एका नदीतीरी ते थांबले. बुद्ध घोड्यावरून उतरले.त्यांनी आपले ते लांबसुंदर केस कापून टाकले.अंगावरचे रत्नालंकार त्यांनी काढले.ते छत्राला म्हणाले,"हा घोडा,ही तलवार ही हिरेमाणके,हे सारे परत घेऊन जा." छत्र माघारी गेला.बुद्ध आता एकटे होते.ते पर्वतावर गेले.तेथील गुहांतून ऋषिमुनी जीवन-मरणाच्या गुढाचा विचार करीत राहात असत.वाटेत स्वतःची वस्त्रेही एका भिकाऱ्या जवळ त्यांनी बदलली.

त्यांच्या अंगावर आता फाटक्या चिंध्या होत्या.

राजवैभवाचा त्यांना वीट आला होता.ज्ञानशोधार्थ बुद्ध आता एकटे फिरू लागले.


ते त्या ऋषिमुनींच्या सान्निध्यात गेले.तेथील एका गुहेत ते राहिले.प्रत्यही ते खालच्या शहरात जात. हातात भिक्षापात्र असे.ते भिक्षा मागत,पोटासाठी अधिक कष्ट करण्याची जरुरी नव्हती.तेथील आचार्यांच्या चरणांपाशी बसून गौतम त्यांची प्रवचने ऐकत.जन्म मरणाच्या फेऱ्यांतून जीव कसा जात असतो,आणि शेवटी हा जीव अत्यंत मधुर अशा शांत निर्वाणाप्रत कसा जातो,हे सारे ते ऐकत.

जीवन मालवणे हे अंतिम ध्येय प्राप्त व्हावे म्हणून शरीराला अत्र पाणी देऊ नये, शरीर- दंडनाने स्वर्गप्राप्ती होते,असे त्या ऋषिमुनींचे मत होते.जणू शरीरदंडाच्या जादूने सर्व सिद्धी मिळतात.

या तामसी व रानटी विचारांची मोहिनी काही दिवस बुद्धांच्या मनावर राहिली.

हळूहळू त्यांनी आपले अन्न कमी केले.शेवटी तर केवळ चार शितकण ते खात.

त्यांच्या हातापायांच्या केवळ काड्या झाल्या. शरीर सुकले.केवळ हाडे राहिली.मरण जवळ आले.परंतु सत्य अद्याप दूरच होते.मरणाची छाया जवळ आली;तरी सत्यप्रकाश प्राप्त झाला नव्हता.उपासतापास,ही शरीरदंडना म्हणजे ज्ञानाचा मार्ग नव्हे,जीवनाच्या अर्थाचा शोध अशा उपायांनी लागणार नाही,असे बुद्धांना कळून आले.ते पुन्हा अन्नपाणी घेऊ लागले.शरीर पुन्हा समर्थ झाले.ते एका झाडाखाली विचार करीत बसले.


एके दिवशी सर्व रात्रभर ते ध्यानमग्रच होते.सारे जग त्यांच्या पायापाशी झोपलेले होते.आणि तिकडून मंगल उषा आली आणि त्याबरोबरच जीवन-मरणाचे कोडेही सुटले.मानवी दु:खांचा निरास करण्याचा मार्ग सापडला.ते झाले बुद्ध म्हणजे ज्यांना ज्ञान प्रकाश मिळाला आहे,असे अतःपर ते बुद्ध


उर्वरित भाग पुढील भागात..