* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२२/८/२४

सोनेरी मुलगी व डॉक्टर / The blonde girl and the doctor

गोऱ्यापान,सोनेरी केसांच्या त्या चौदा-पंधरा वर्षांच्या सुंदर मुलीचं सगळं शरीर एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारखं कडक झालेलं होतं.हात पाय वाकडे तिकडे होऊन एकाच पोझिशन मध्ये जणू घट्ट रुतून बसले होते.पाठ देखील वाकडी झाल्याने तिला सरळ स्ट्रेचर वर झोपता येत नव्हतं.थोडाही बोलण्याचा,हलण्याचा प्रयत्न केला,तर अख्ख्या शरीराला झटके येत होते.तिला नीट रडता देखील येत नव्हतं,पण वेदनेमुळे सतत डोळ्यातून पाणी झरत  होतं,त्यामुळे तिची उशी ओली झालेली होती. तिच्या आई-वडिलांनी तिचं स्ट्रेचर ढकलत आणलं होतं.कालच ते इराकमधून तडक मुंबईमध्ये पोहोचले होते,तिथून तिला कारनं पुण्याला आणलं होतं. वडील अशिक्षित कामगार,पण आई मात्र बगदाद विद्यापीठामधून सायन्सची ग्रॅज्युएट.स्वतःच्या मुलीची अशी अवस्था पाहतांना आतून खचून गेलेल्या त्या माउलीनं त्यांच्या बरोबर आलेल्या तबरेझ नावाच्या भाषांतर करणाऱ्या एका इराकी विद्यार्थ्यांच्या मदतीनं मला तिच्या या खजान नावाच्या मुलीची कहाणी सांगितली.

पाच-एक महिन्यांपूर्वी शाळेच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये नाच सादर करत असतांना खजान लंगडत असल्याचं तिच्या एका शिक्षिकेनं पाहिलं, आणि तिच्या आईला कळवलं.इराक मधल्या एका न्यूरॉलॉजिस्टनं तिची तपासणी केली,त्यात त्याला तिच्या डोळ्यात तपकिरी रंगाच्या रिंग दिसल्या. खजान ला विल्सन डिसीज नावाचा अतिशय दुर्मिळ पण गंभीर आजार असल्याचं अचूक निदान त्यानं केलं.यकृतामधल्या (लिव्हर) दोषामुळे शरीरात  कॉपर (तांबे) हा धातू साचत जातो.काही दिवसांत कॉपर ची रक्तामधली पातळी इतकी जास्त होते, कि त्याचे विषारी परिणाम सगळ्याच अवयवांवर व्हायला लागतात. पण सगळ्यात आधी लिव्हर आणि मेंदूचं अतोनात नुकसान होतं. ताबडतोब इलाज केला नाही,तर पेशंट काही आठवड्यांतच विकलांग होतो, आणि काही महिन्यांत सारा खेळ संपतो.सर्वात वाईट गोष्ट म्हणजे याची जी मुख्य दोन औषधं आहेत,त्या दोन्हींमुळे सुरुवातीच्या काळात पेशंटचा आजार वाढतो,कारण रक्तातील कॉपरची पातळी आधी वाढते मग कमी व्हायला लागते. त्यातलंही एक औषध अतिशय महाग.

खजानला पाहिलं औषध सुरु केलं गेलं,पण दुर्दैवाने तिला त्याचे इतके साईड इफेक्ट झाले कि,तिच्या सगळ्या नसा खराब होऊन ती अगदी पलंगालाच खिळली.पॅरालीसीसचाच प्रकार होता हा.बोलणं कमी झालं,शब्दोच्चार समजेनासे झाले.मग डॉक्टरांनी दुसरं औषध सुरु करायचं ठरवलं.ते अमेरिकेतून इम्पोर्ट करायचं होतं.

खजानच्या आई-वडिलांनी त्यांचं घर,जमीन आणि एक छोटंसं दुकान होतं ते सगळं विकून टाकलं. एका छोट्याशा घरात ते भाड्यानं राहू लागले.काही दिवसांतच नवीन औषध त्यांच्या हातात आलं, आणि खजानला ते देण्यात आलं.पण एखाद्या दुःस्वप्नासारखं घडलं,खजानची अवस्था आणखीनच बिघडली.बोलणं,खाणं-पिणं सगळंच बंद पडलं.आता ती वाचणार नाही,फक्त लिव्हर ट्रान्सप्लांटेशन (यकृत प्रत्यारोपण) केलं,तरच तिचा जीव वाचण्याची काही शक्यता आहे,पण त्यानंतर ही ती चालू-बोलू शकेल याची खात्री नाही असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं.

त्यांनी मग अनेक धार्मिक आणि इतर संस्थांकडे कर्ज आणि मदत मागितली,नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले,आणि ते तडक भारतात आले.

भारतातले डॉक्टर आणि इलाज सगळ्या जगात सगळ्यात चांगले असल्याचं आम्हाला अनेकांनी सांगितलं होतं.अगदी अमेरिकेतूनही भारतात पेशंट इलाज करायला येतात असंही आमच्या डॉक्टरांनी सांगितलं.सगळेच इलाज,ऑपरेशन भारतात निम्म्यापेक्षाही कमी खर्चात, जगात सर्वात स्वस्त होतात,असं कळल्यामुळे आम्ही भारतात येण्याचा निर्णय घेतला.खजानची आई मला सांगत होती. 

खरंच आहे हे! विकसित देशांमध्ये वैद्यकीय खर्च तर आवाक्याबाहेरचा आहेच,पण अगदी स्पेशालिस्ट डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळायला महिने महिने लागतात,ऑपेरेशनसाठी अनेक महिने वाट पाहावी लागते. Urgent केस असेल तर भेटेल त्याच्या हाती निमूट ऑपरेशन करून घ्यावं लागतं. यामुळेच भारतात गेली पंधरा एक वर्षं अख्ख्या जगातून पेशंट इलाजाकरिता येतात.

मला एकदा माझ्या लहानपणी एका काकांनी रोजसारखी ताटात प्रसादाची खीर वाढली.मी काही ती संपवली नाही.माझी मावशी आश्चर्यानं म्हणाली अरे खीर कशी काय टाकून देतोस?काका ताबडतोब म्हणाले कारण याला रोज विनासायास मिळते ना? ज्याला खीर बघायलाही मिळत नाही अशा एखाद्याला दे,त्याला नक्की आवडेल.भारतातल्या वैद्यक व्यवसायाचीच ही गोष्ट आहे जणू..!

खजानची आम्ही परत कसून तपासणी केली. शरीरावर जणू मांसच राहिलं नव्हतं.! रक्तही कमी. मी खजानच्या आई-वडिलांना तिची गंभीर परिस्थिती समजावून सांगितली.तिसरं,स्वस्त एक औषध चालू करून वाट पाहावं लागेल,बराच वेळ लागू शकतो हेही सांगितलं.कुठल्याही गोष्टीची मी गॅरंटी देऊ शकत नसल्याचंही स्पष्ट सांगितलं. तिची आई म्हणाली.डॉक्टर,आम्हाला तिचं ऑपरेशन नकोय.बाकी तुमची मुलगी आहे असं समजून जे तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही करा.ती बरी व्हावी म्हणून आमचा जीव तीळतीळ तुटतो,पण सगळं काही तुमच्या हातात नसतं,हे आम्हाला समजतंय. आम्ही डोळे बंद करून तुमच्यावर विश्वास ठेवतोय, पुढे जे होईल ते आमचं नशीब!"

आता मात्र केसची सगळी जबादारी माझ्यावर अली होती. नातेवाईकांनी,पेशंट्सनी पूर्ण विश्वास ठेवला, वाईटाचा दोष,संशय डॉक्टरवर नाही असं सांगितल्यावर डॉक्टर पूर्ण मनमोकळेपणाने निर्णय घेऊ शकतात.कायद्याची भाषा,संशय,धमक्या असे सुरु झाले,कि सगळेच डॉक्टर बॅकफूट वर इलाज करतात.आम्ही तिचे इलाज सुरु केले.खरंतर खजानच्या आईला या आजाराविषयी अनेक डॉक्टरांपेक्षा जास्त माहिती होती,पण तिनं कधीही उद्धटपणे प्रश्न विचारले नाहीत,कि आमच्या निर्णयांना आक्षेप घेतले नाहीत.जेवढी अवघड केस, तेवढा तो डॉक्टर जास्त अनुभवी बनतो.माझ्या विद्यार्थ्यांनी,इतर सहकाऱ्यांनी खूप मदत केली. खजानला घरच्यासारखी वागणूक दिली.प्रेमानं, सहानुभूतीनं दिलेली औषधं जरा जास्तच चांगला इफेक्ट करतात! त्यात जर पेशंटचा डॉक्टरवर पूर्ण भरवसा असेल, तर फारच उत्तम. मृत्यूच्या दाट, भीतीदायक छायेतून  खजान हळूहळू बाहेर पडली.जगण्याची आशा,परत  उभं राहण्याची जिद्द तिच्या चेहऱ्यावर दिसू लागले.काही दिवसांनी ती घोट घोट पाणी प्यायला लागली,उठून उभं राहायला लागली. अजून नीट खाता,बोलता येत नव्हतं.कडकपणा हळूहळू कमी होत होता.व्हिसाची मुदत संपल्यानं त्यांना इराकला परतावं लागलं.पण तिथूनही विडिओ कॉल करून तिच्या पालकांनी तिचे इलाज चालू ठेवले.त्यानंतर दोनदा खजान आईवडिलांसोबत भारतात येऊन गेली.त्यांच्या शेवटच्या भेटीनंतर काही महिन्यांतच मला एक हातानं लिहिलेलं पत्र मिळालं.खजाननं स्वतः इंग्लिश मध्ये लिहिलं होतं: 

मी आता कॉलेज मध्ये प्रवेश घेतलाय. तुमच्यासारखं डॉक्टर व्हायचंय मला!

तिच्या आईनं खाली अरबीत लिहिलं होतं: डॉक्टर, तुम्ही माझ्या आयुष्यात उजेड परत आणला.माझी सोन्यासारखी मुलगी मला परत मिळवून दिलीत. तुमच्यासाठी आम्ही सगळे रोज अल्लाहकडे दुआ मागतो.मला माझा देव पावला होता! आता गेली तीन वर्षं खजान एकदम छान  आहे.तिला लिहिलेल्या उत्तरात मी आवर्जून लिहिलं: तुझ्या जगण्याचं सगळं श्रेय केवळ तुझा आईच्या जिद्दिलाच आहे.

जादू,दैवी,अद्भुत म्हणता येतील अशा घटना भारतात वैद्यक शास्त्रात रोजच शेकडो वेळा घडतात.मरणाच्या दाढेतले लहानमोठ्या वयाचे रुग्ण केवळ आपल्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे,बुद्धिमतेमुळे उठून चालायला लागतात, हसत घरी जातात.हे रोजच,भारतातल्या प्रत्येक खेड्यात,शहरात,

प्रत्येकच दवाखान्यात घडत असतं.अगदी सरकारी दवाखान्यात देखील! पण यातील काही थोड्या वाईट घटनाच सगळ्यांना दाखविल्या जातात,त्यांचीच सतत चर्चा होते.चोवीस तास, वर्षभर राबणाऱ्या डॉक्टरांनी वाचवलेले लाखो जीव कुणालाच दिसत नाहीत.आजची खजानची ही कहाणी भारतातल्या अशाच शेकडो अनामिक मृत्युंजय डॉक्टरांना अर्पण!

ती सोनेरी मुलगी,खीर,आणि डॉक्टर.

डॉ.राजस देशपांडे,न्यूरॉलॉजिस्ट पुणे.

ता. क. : विल्सन्स डिसीज वर भारतात अनेक उत्तम तज्ज्ञ आहेत,आणि हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो.

एक वाचणीय नोंद- हरकारा :मध्ययुगीन कालखंडात कागदपत्रांची ने-आण करण्याचं काम हरकारे करत असत.ही पत्रे लवकरात लवकर पोहोचवणे आवश्यक असे.यासाठी हरकाऱ्यांना लहानपणापासूनच तसे शिक्षण दिले जात असे.हिंदुस्थानात असे हरकारे तयार करण्यात पुढाकार घेतला तो मुघल सम्राट अकबराने.त्याबाबची नोंद अबुल फझलने त्याच्या 'ऐन ए अकबरी'त केली आहे.हे हरकारे गुप्तहेर म्हणूनही काम करत.अकबराच्या राज्यात असे हजार हरकारे असल्याची नोंद अबुल फझलनं केली आहे. इ.स.१५८० मध्ये जेझुईट पाद्री फादर मोन्त्सेराने अकबराच्या दरबाराला भेट दिली होती.त्यानेही अकबराच्या या हरकाऱ्यांची आणि त्यांना दिल्या जात असलेल्या शिक्षणाची नोंद आपल्या प्रवास वर्णनात केली आहे.तो लिहितो की अशा लोकांच्या पायात शिशापासून तयार केलेले बूट घातले जात आणि त्यांना एका जागेवर थांबून टाचा कुल्ल्याला लागतील अशा प्रकारे जलद धावण्याचा सराव करायला लावत. (यावरूनच मराठीत 'जलद पळणे' या अर्थाचा वाक्प्रचार अस्तित्वात आला. तो म्हणजे 'ढुंगणाला पाय लावून पळणे.') अशा जलद धावू शकणाऱ्या लोकांमार्फतच त्या काळात कागदपत्रे पाठवली जात.या लोकांना म्हणत हरकारे.इराणवरून भारतात येणाऱ्या अशा हरकाऱ्यांविषयी बातीस्त ताव्हेर्निये या प्रवाशानेही अनेक नोंदी केल्या आहेत.हा फ्रेंच व्यापारी सतराव्या शतकात अनेकदा भारतात येऊन गेला होता.भारतातल्या अशा हरकाऱ्यांची नोंद दुसरा एक फ्रेंच प्रवासी तेवनो यानंही केली आहे.मराठेशाहीतही असे हरकारे असत.त्यांना म्हणत,काशीद किंवा जासूद.

दुर्गाडी : आदिलशाहीत असणारा हा मुलूख शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला तो २४ ऑक्टोबर १६५७ रोजी.जवळचेच कल्याण बंदर ताब्यात आल्यामुळे त्यांनी इथे किल्ला बांधण्याचे ठरवले.आबाजी महादेवांना हा किल्ला उभारत असताना अमाप द्रव्य सापडले.त्यातून याची बांधणी झाली.दुर्गेची कृपादृष्टी समजून याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले.याच्याजवळच शिवाजी महाराजांनी आपली गोदी उभारली होती.तिथे लढाऊ जहाजांची निर्मिती केली जायची. त्यासाठी महाराजांनी पोर्तुगीजांची मदत घेतली होती.याच आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांवर, वसईच्या पोर्तुगीजांवर आणि जंजिऱ्याच्या सिद्दीवर दहशत बसवली.शिवाजी महाराजांनी भारतीय आरमाराचा पाया घातला तो याच दुर्गाडीजवळ.


इंग्रज अनुवादकाच्या मते हा 'माहुली' असावा. माहुलीचा उच्चार कोकणी स्वरात केल्यास त्याचा अपभ्रंश झाल्यास मलंग असा होतो.मलंगचा शेवटचा राजा म्हणजे अहमदनगरच्या निजामाचा अखेरचा वारस 'हुसेन' असावा.त्यानं हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडून घेतला होता.हा मलंगचा अखेरचा सत्ताधीश.हा किल्ला अहमदनगरजवळच आहे.१६७० मध्ये तो मराठ्यांनी जिंकला.अलंग,मलंग आणि मलंग ही दुर्गत्रयी.कदाचित हा कल्याणजवळील मलंगगड असावा,हाजी मलंगगड.


दुर्ग म्हणजेच शिवाजीराजांचा दुर्गाडी असावा.दुर्गाडी ते वसई हे अंतर पायी गेल्यास नऊ तासांचे आहे.कॅरेनं केलेलं दुर्गचं वर्णन दुर्गाडीशी अगदी मिळतंजुळतं आहे.त्याच्या म्हणण्यानुसार वसईपासूनचे त्याचे अंतर एक दिवसाचेच आहे.


वाचता…वाचता…वेचलेले…







२०/८/२४

दुहेरी आणि दुटप्पी / Double and double

हॅमिल्टनच्या प्रतिपादनानंतर मुंग्या - मधमाशांसारख्या कीटकांच्या समाजप्रेमाचे रहस्य आई-मुलींपेक्षाही बहिणी-बहिणींच्यात जास्त जवळचे रक्ताचे नाते असते हेच असणार हे शास्त्रीय जगतात सर्वमान्य झाले.हे काम नुकतेच प्रसिद्ध झाले तेव्हा १९६५ साली मी हार्वर्डला विल्सनचा विद्यार्थी होतो,आणि ते वाचून विल्सन एक मोठे कोडे सुटले असे खुलले होते.पण ह्यातून प्राण्यांच्या आणि मानवाच्या समाज जीवनाबाबतचे सारे काही प्रश्न सुटले नव्हते.कागदमाशांसारखे खास रक्ताचे नाते नसलेले कीटकही इष्ट मैत्रिणींशी हातमिळवणी करतात हे ठाऊक होते.मानवी समाजात तर रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन पुण्य परोपकार, पाप ते परपीडा अशी मांडणी करण्यात येत होती.बुद्ध भिक्खू,ख्रिस्ती धर्मगुरू स्वेच्छेने ब्रह्मचर्य पत्करत होते,अनाथांची सेवा करत होते. मराठा योद्धे देव,देश अन् धर्मासाठी प्राण घेतले हाती या वृत्तीने लढत होते.औरंगजेबासारख्या प्रबळ शत्रूला नामोहरम करत होते.ह्या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा? आणि मानवी समाजांतल्या दुटप्पी वागणुकीचा कसा उलगडा करायचा?१९६५-७० ह्या काळात हार्वर्ड विद्यापीठात प्रचंड खळबळ माजलेली होती. व्हिएटनाममधले युद्ध कळसाला पोचलेले होते.पहिले आणि दुसरे महायुद्ध,नंतर एकोणीसशे पन्नासच्या दशकातले कोरियातले व एकोणीसशे साठच्या दशकातले व्हिएटनामचे युद्ध, एकोणीसशे नव्वदच्या दशकातले इराकचे पहिले युद्ध व गेल्या शतकाच्या अखेरीचे इराकचे दुसरे युद्ध ही सगळी युरोपीय समाजाची जगाच्या सत्तेवर पकड राहावी आणि त्यातून ह्या युरोपीय समाजाचे आर्थिक हितसंबंध पुष्ट होत राहावेत ह्या खटाटोपांचा भाग होती. 


एका बाजूला समानता,स्वातंत्र्य,बंधुत्वाचा घोष करत अमेरिका आपले सारे बळ एकवटून जगात इतरत्र केवळ आपल्या हितसंबंधांना अनुकूल अशा राजवटी राहाव्यात एवढीच काळजी घेत होती.त्यासाठी चिलीसारख्या देशात लोकांनी निवडून दिलेल्या राष्ट्राध्यक्ष आयेन्डेचा खून घडवून तिथे पिनोचेसारख्या सैनिकी हुकूमशहाची रक्तरंजित सत्ता पोसत होते.ही दुटप्पी वागणूक सगळ्याच अमेरिकी नागरिकांना पटत होती असे नाही,पण तीच समर्थनीय आहे असं मानणारी प्रभावी राजकीय विचारधारा अमेरिकेत नांदत होती.


अशी दुटप्पी मूल्येही कशी योग्यच आहेत ह्याची मांडणी मनुष्यप्राणी मोठ्या हुशारीने करत राहतो.भारतीय समाजात तुम्ही पूर्वजन्मी पापे केलीत,म्हणून ह्या जन्मात त्याची फळे भोगताहात असे म्हणून अन्यायांचे समर्थन केले.जायचे,आणि बहुसंख्य लोकांच्या मनावर ह्या संकल्पनेची अगदी घट्ट पकड होती. जसा युरोपीय साम्राज्यवाद फैलावला तसा जगातील भारतासारख्या देशांची आपण लूट नाही करत आहोत, तर त्यांना सुधारतो आहोत,त्यांच्या समाजांना युरोपीय सभ्यतेच्या उच्च पातळीकडे नेत आहोत म्हणून समर्थन केले गेले. 

व्हिएटनामवर आक्रमण अमेरिकी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी नाही,तर त्या देशाला साम्यवादाच्या नरकापासून वाचवण्यासाठी करतो आहोत, म्हणून सांगितले जात होते. हे युद्ध तेव्हा सुरू झालेल्या टीव्हीच्या युगात लोकांच्या डोळ्यासमोर येऊ लागले होते. 

त्यातला एक संस्मरणीय प्रसंग होता,माय लाइ ह्या खेड्याचा पूर्ण विध्वंस तिथे राहणाऱ्या सर्व रहिवाशांचे हत्याकांड.हे हत्याकांड का केले असा प्रश्न विचारल्यावर एका अमेरिकी सैनिकी अधिकाऱ्याने नामी उत्तर दिले - त्या खेड्याला वाचवायसाठी आम्हाला ते समूळ नष्ट करणे भाग पडले !


साथी हाथ बढाना !


व्हिएटनाममधल्या युद्धाने अमेरिकी समाजात एका जोरदार विचारमंथनाला चालना दिली होती.मानवी मन,मानवी समाज समजावून घेणे हा जिव्हाळ्याचा विषय बनला होता.ह्याचा मागोवा घेत हार्वर्डचे मानववंशशास्त्रज्ञ माकडांचा,अगदी अप्रगत तंत्रज्ञाने वापरणाऱ्या आफ्रिकेतल्या कलहारी वाळवंटातल्या टोळ्यांचा,

आणि मानवी समाजातल्या गुलामगिरीच्या इतिहासाचा अभ्यास करत होते. ह्या प्रवाहातून महाविद्यालयीन शिक्षणात साहित्य आणि समाजशास्त्राचा अभ्यासक असलेला बॉब ट्रिव्हर्स जीवशात्र - उत्क्रान्तिशास्त्राकडे वळला. त्याने ठरवले की आपण परोपकार-परपीडा, स्वार्थ- परार्थ-परमार्थ,आप्तार्थ-मित्रार्थ-संघार्थ, स्वहित-आप्तहित-परहित ह्या सगळ्यांचा एका नव्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. निसर्गनिवडीच्या चौकटीत हे सगळे मांडले पाहिजे.बॉब ट्रिव्हर्स आणि मी जिगर दोस्त होतो. रोज संध्याकाळी जोडीने स्कॅश खेळायचो.


ट्रिव्हर्सने ह्या सगळ्याचा उलगडा करणारे, परतफेडीचा,

देवाण- घेवाणीचा परार्थ नावाचे शास्त्रीय जगतात खास गाजलेले सैद्धान्तिक प्रतिपादन कसे विकसित केले,हे मी दोन वर्षे खेळ संपल्यावर संत्र्याचा रस पीत-पीत ऐकले. खूप मजा आली !


आदिमानवाच्या समाजात प्रत्येक जण प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर ओळखतात.वर्षानुवर्षे एकमेकांच्या संपर्कात राहतात.एकमेकांना मदत करत,एकमेकांना दुखवत राहतात.अशी सामाजिक देवाण घेवाण ही शेवटी निसर्गाच्या निवडीतूनच साकारलेली असणार. प्रत्येक व्यक्ती आपण आतापर्यंत दुसऱ्यासाठी किती झीज सोसली,दुसऱ्याचा किती फायदा करून दिला,आणि ती दुसरी व्यक्ती आपल्यासाठी किती झीज सोसते आहे,

आपला किती फायदा करून देत आहे,आपण दुसऱ्याला किती दुखावले - सुखावले,त्याने आपल्याला किती दुखावले-सुखावले ह्या साऱ्याचा हिशेब करत राहणार.

संयुक्तिक,संतुलित देवाण घेवाण दोनही पक्षांच्या फायद्याची ठरू शकेल,आणि अशा सर्वांना लाभदायक नेटक्या आदान-प्रदानांतूनच मानवी समाजाची भरभराट झाली आहे.परस्परा करू सहाय्य हे मानवी समाजाच्या यशाचे रहस्य आहे.पण दोघांचाही लाभ असला तरीही देवाण - घेवाण जर प्रमाणबद्ध असली तरच निसर्ग

निवडीला उतरेल.केवळ एकाला भरमसाट लाभ असेल तर निसर्गनिवडीत ती असमर्थनीय आहे,टाकाऊ आहे असे ठरेल. म्हणून मनुष्यप्राणी सढळ हाताने मदत कोण करतात आणि हात आखडता कोण घेतात, कोण उपकाराची जाणीव ठेवतात,आणि कोण मदत करणाऱ्यांचा विश्वासघात करतात, 


कोणाशी जवळीक करणे शहाणपणाचे आहे, आणि कोणाला दोन हात दूर ठेवणे बरे,कोणाची वाहवा करावी आणि कोणाची छी-थू करावी, कोण सज्जन,कोण दुर्जन हे सतत जोखत असतात.अशा हिशोबांतून,अजमासांतून, ठोकताळ्यांतून मानवी समाजजीवन उभारले गेले आहे.


भाषाकोविद मानव…


मनुष्यप्राणी अशा अनेक परस्परसंबंधांचा, कालचा,

आजचा, खूप वर्षांपूर्वीचा सुद्धा जमाखर्च ठेवू शकतो,तो त्याच्या सांकेतिक भाषेच्या बळावर.ही भाषा माणसाच्या आनुवंशिकतेचा मूलाधार असलेल्या डीएनेसारखीच अगदी थोड्या घटकांनी बनलेली आहे.पण त्या मोजक्या घटकांच्या जुळणीतून अनंत वैविध्य निर्माण करू शकते.


डीएनेत केवळ ॲडेनीन,थायामीन,सायटोसीन व ग्वानीन हे चार घटक ओळीने गुंफून वाटेल तेवढे वेगवेगळ्या त-हेचे जनुक बनविले जातात.केवळ चार रंगांच्या पाच मण्यांची माळ गुंफली तरी हजारांहून जास्त वेगवेगळ्या माळा बनवता येतात.दहा मण्यांच्या भरतात दहा लाखांवर,

पंधरांच्या अब्जावर ! आपल्या बोलण्यात शंभराहून जास्त ध्वनी असतात.ते ओळीने गुंफून अमाप शब्दवैविध्य निर्माण करता येते. 


हे शब्द वेगवेगळ्या वस्तू,क्रिया, संकल्पनांच्या संज्ञा म्हणून वापरता येतात.ओळीने शब्द गुंफून अगणित वाक्ये बनवता येतात.वाक्यांच्या माळांतून अगणित विधाने करता येतात, कथानके रचता येतात.आपल्या डोक्यात एक संवाद सतत चालू असतो.त्यात जगात काय चालते,

काय चालणे शक्य आहे,काय चालणे योग्य आहे ह्याचा निरंतर ऊहापोह चालू असतो. 


उलटा-पालटा,इकडून तिकडे उड्या मारत, बहिणाबाईंच्या शब्दात मन वढाळ वढाळ,जसे गुरु पिकावर।असा प्रवास सुरू असतो.हे सारे निसर्गाच्या निवडीत पारखले गेले असणार.मग ह्यातून काय काय लाभ होतात?


ह्यातून मानवाला लाभली आहे.कार्यकारण संबंधांची मीमांसा,चिकित्सा करण्याची क्षमता. ह्या सामर्थ्यामुळे आपण इतर जीवजातींवर लीलया मात केलेली आहे.इतर साऱ्या जीवजातींची प्रगती मंदगतीने होत राहते. 


उत्क्रान्तीच्या ओघात वनस्पती शत्रूचा प्रतिरोध करण्यासाठी विषोत्पादन करतात.बांबूचे कोंब असतात मोठे पौष्टिक,पण सायनाईडने ठासून भरलेले,विपुल बांबू असलेल्या प्रदेशात राहणाऱ्या काळतोंडी वानरांच्या पोटातले बॅक्टेरिया सायनाइडचे दुष्परिणाम टाळू शकतात,म्हणून असे बॅक्टेरिया पोटात बाळगणारी वानरे ह्या कोंबांवर ताव मारतात.असे समर्थ बॅक्टेरिया माणसांच्या पोटांत नाहीत,तर वानरांच्यात कुठून आले? वानरांच्या पोटातल्या बॅक्टेरियांची सायनाइड पचवायची शक्ती अपघातकी आनुवंशिक बदलातून उपजली,आणि मग बांबू खाण्याचे धाडस करणाऱ्या वानरांच्या पोटात ह्या शक्तीमुळे त्या बॅक्टेरियांना आणि त्यांना बाळगणाऱ्या वानरांना- चांगले पौष्टिक अन्न मिळू लागले.यातून त्या सशक्त बॅक्टेरियांची आणि वानरांचीही पैदास वाढली.ह्या जनुकांच्या उत्क्रान्ती प्रक्रियेला हजारो-लाखो वर्षे लागली असणार.अन् आपण? मानवाला सायनाइड म्हणजे साक्षात् मरण! पण मानवाने आपली चौकस बुद्धी,

प्रयोगशीलता वापरत शोधून काढले की कोंबांना चिरून,

पाण्यात खूप वेळ ठेवले की सायनाइडचा निचरा होतो.ही स्मरुकांच्या उत्क्रान्तीची प्रक्रिया काही दशकांतच साधली असेल,आणि एकदा समजले की ही उपयुक्त माहिती भराभर पसरली असेल. 


आज जिथे जिथे बांबू मुबलक मिळतो तिथेही तंत्रज्ञान वापरून बांबूचे कोंब बिनधास्त खाल्ले जातात.प्राण्यांना जे कमवायला हजारो पिढ्या लागतात,ते सारे आपण ज्ञानसाधनेच्या बळावर चुटकीसरशी साधतो.या ज्ञानसाधनेचा एक भाग म्हणून माणूस तऱ्हेतऱ्हेच्या कामकाजांसाठी उपयुक्त अशा कृत्रिम वस्तू,अवजारे,

आयुध्ये घडवतो.या कृत्रिम वस्तूंना जनुक-स्मरुक ह्यांच्याशी यमक जुळवायला आपण निर्मक असे अभिधान दिले आहे.शिकारीचे डावपेच ही स्मरुके,तर शिकारीची शस्त्रे ही निर्मुके,आग निर्माण करण्याची कृती ही स्मरूके,तर चुली,शेगड्या ही निर्मुके आहेत.

अशा नानाविध स्मरूक-निर्मुकांनी सज्ज मानव उंदरासारखे गवताचे बी खातो,बकऱ्यांसारखी पालेभाजी खातो,डुकरांसारखी कंदमुळे खातो, पोपटांसारखी फळे खातो,सरड्यांसारखे मुंगळे खातो,बगळ्यांसारखे खेकडे-मासे खातो, वाघांसारखी रानडुकरे खातो,आणि इतर कोणीच ज्यांना मारू शकत नाहीत असे अवाढव्य देवमासेही खातो ! आपण विषुववृत्तीय जंगलापासून ध्रुवाजवळच्या बर्फील्या वाळवंटांपर्यंत,प्रवाळाच्या बेटांपासून हिमालयातल्या पठारांपर्यंत फैलावले आहोत.


मनुष्यप्राणी अहर्निश डोके चालवत असतो. आसमंतात काय चालले आहे,आपल्याला काय काय आव्हानांना सामोरे जायला लागणार आहे, हे समजावून घेत असतो.


काही वर्षांपूर्वी मी आदिवासींचा शिष्य बनून पायी हिंडत हत्तींच्या शिरगणतीचा उपद् व्याप केला.माझे गुरू सतत बारीकसारीक खाणाखुणा धुंडाळत असायचे, कोठे खुट्ट वाजले तर कान देऊन ऐकायचे.सांगायचे,ह्या झाडाच्या बुंध्यावरचा चिखल बघ.सहा- सात फूट उंचावर आहे,

म्हणजे इथे एक मोठा नर हत्ती अंग घासून गेला आहे.

अजून चिखल ओला आहे,म्हणजे तो महाकाय जवळच कोठे तरी असणार.तिकडे कडाकडा आवाज येतोय ना,तिथे बांबूचे मोठे बेट आहे,तो चरतोय वाटते.काही राखून न ठेवता माझे आदिवासी गुरू मला शिकवत आहेत.कारण ज्ञानसंपदा ही अशी खाशी संपत्ती आहे की दिल्याने ती घटत नाही,उलट आदान-प्रदानातून वृद्धिंगत होते. ईशावास्योपनिषदात म्हटल्याप्रमाणे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। पूर्ण ज्ञान इतरांपर्यंत पोचवले तरी आपल्यापाशी पूर्ण ज्ञानच शिल्लक राहते.ह्या आगळ्या वित्त भांडारातून मानवाने सृष्टीवरची आपली पकड हळूहळू घट्ट केली आहे.


फुकटबाजी व फसवेगिरी


मानवी समाजात जसजशा एकमेकांना मदत करण्याच्या शक्यता वाढल्या तशा एकतर्फी फायदा घेण्याच्या शक्यताही वाढतात.एखाद्याने जर मोकळेपणे कुठल्या झाडाला भरपूर फळे लगडली आहेत हे सांगितले,तर इतर त्या माहितीचा फायदा उठवून पोट भरू शकतील. पण त्याच वेळी काही जण स्वत:जवळची अशी माहिती दुसऱ्यांना न देता,केवळ दुसऱ्यांच्या माहितीचा लाभ घ्यायचा अशीही अप्पलपोटेगिरी करू शकतील.शिवाय परस्परांना मदत केवळ ज्ञानाच्याच नाही,तर अनेक जिवाभावाच्या संदर्भात देण्याचे प्रसंग येतात.हिंस्र श्वापदाची चाहूल लागताच धोका पत्करूनही आरोळी देणे, शिकार करताना सावजाची पळण्याची वाट रोखून धरणे,ओढ्याचा जोराचा प्रवाह ओलांडायला हात देणे,

अशा अनेक प्रसंगांत एकमेकांना मदत करण्याचा प्रचंड फायदा मिळू शकतो.पण मदतीचा हात पुढे करणाऱ्याचे नुकसान होण्याचाही धोका असतो.


कोण सच्चेपणे मदतीचा हात पुढे करतात आणि कोण लुच्चेपणे हात आखडता घेतात,कोण पूर्वी दिलेल्या मदतीची न विसरता परतफेड करतात आणि कोण आयत्या वेळी तोंडघशी पाडतात, हे सगळे मानवी समाज जीवनातले जिव्हाळ्याचे विषय आहेत.टिचग्या कागदमाशाही आपल्या पोळ्यातल्या इतर माशांना वैयक्तिक पातळीवर ओळखतात.कोण दणकट,कोण कमकुवत हे उमगत उमगत एकमेकींपुढे वाकतात, हातमिळवणी करतात किंवा कुरघोडी करतात.

मानवी समाजात असे वैयक्तिक परस्परसंबंध अतोनात गुंतागुंतीचे बनतात.


तुकोबा म्हणतात : मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेटूं ऐसे। भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी।। कोणाशी आणि केव्हा मऊपणे वागावे, कोणाशी केव्हा कठोरपणे वागावे,कोणाला लंगोटी द्यावी, कोणाला काठी हाणावी,हे ठरवता - ठरवता माणसाच्या नीतिसंकल्पनांची उत्क्रांती झाली. 


सुष्टता,दुष्टता,कृतज्ञता,कृतघ्नना,आदर,तुच्छता, द्वेष,सूड अशा सगळ्या भावना उद्भवल्या.पुण्य, परोपकार,पाप ते परपीडा अशा संकल्पना मांडल्या गेल्या.पण जोडीला क्रोध,लोभ,मद, मोह,मत्सरही फोफावले आणि 'पुण्य इथे दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली'अशी परिस्थितीही उद्भवू शकली.मानवाला भाषेद्वारे विविध संदेश देता येतात,

नानाविध परीच्या माहितीची देवाण-घेवाण करता येते.

अशा संवादांत दुसऱ्यांना खरे काय ते सांगता येतेच,आणि तितक्याच सहजतेने दुसऱ्यांची दिशाभूलही करता येते.

खोटे सांगून अनेकदा स्वहित साधू शकते.मित्रांना आपण त्यांच्यासाठी काय,काय करतो आहोत हे सांगताना राईचा पर्वत करून त्यांच्याकडून परतफेड म्हणून अवाच्या सवा लाटता येते, शत्रूना खोटे-नाटे सांगून संकटात पाडता येते. सर्वच मानव जन्मभर इतक्या शिताफीने खऱ्या- खोट्याची सरमिसळ करत असतात की असे न करणाऱ्या सदा सत्यवचनी हरिश्चन्द्राचे खास कौतुक केले जाते.असा आहे समाजप्रिय मानवाच्या उत्क्रान्तियात्रेचा परिपाक.दुसऱ्यांना मदत करण्याची प्रवृत्ती,आणि जोडीला त्यांना फसवून स्वतःचा फायदा करून घेण्याचीही.संघासाठी स्वतःचे प्राण देण्याची तयारी,पण त्याबरोबरच ज्यांना परके मानतो त्यांच्याशी बेफाम क्रौर्याने वागण्याची,त्यांची हत्या करण्याचीही तयारी. सच्चे ज्ञान संपादन करण्याची अफाट क्षमता, आणि धादान्त खोटे बोलण्याची,फसवण्याचीही ! म्हणूनच प्रत्येक माणसाच्या अंतर्मनात काही प्रमाणात तरी स्वार्थ आणि परोपकार,हिंसा आणि करुणा,क्रौर्य आणि दया-क्षमा-शांती, खोटेपणा आणि सच्चेपणा ह्यांच्यात एक रस्सीखेच चालू असते.एक निरंतर द्वंद्व, कुतरओढ चालू राहते.समाजातही ह्या परस्परविरोधी प्रवृत्तींची स्पर्धा चालू असते.


२०.०७.२४ या लेखमालेतील पुढील लेख…

१८/८/२४

भारतीय शिल्पकला / Indian Sculpture

कळसाला पोहोचलेली भारतीय शिल्पकला..


सन १९५७ ची घटना आहे.उज्जैनला राहणारे आणि पुरातत्त्व खात्याशी संबंधित असलेले डॉ. श्रीधर विष्णू वाकणकर हे आगगाडीने दिल्लीहून इटारसीला जात होते.भोपाळ गेल्यावर त्यांना पर्वतांमध्ये काही फॉर्मेशन्स दिसली.डॉ. वाकणकरांना ती फॉर्मेशन्स ओळखीची वाटली, कारण त्यांनी तशीच फॉर्मेशन्स स्पेन आणि फ्रान्समधे बघितली होती.त्यामुळे डॉ.वाकणकरांचे कुतूहल जागृत झाले आणि पुरातत्त्व खात्याची एक टीम घेऊनच ते त्या पर्वतांमध्ये आले.त्यांच्या ह्या प्रयत्नांनी इतिहासाचं,भारतीय कलेचं,शिल्पशास्त्राचं एक गवाक्ष काहीसं किलकिलं झालं.ही जागा म्हणजे भीमबेटका.

येथे,सुमारे ४०,००० वर्षांपूर्वी भिंतींवर काढलेली चित्रं मिळाली.प्राचीन भारतीय कलेचा हा पहिला प्राप्त नमुना..!! आज हे भीमबेटका,युनेस्कोच्या संरक्षित स्मारकाच्या यादीत येतं.इथे साडेसातशे शैलाश्रयं किंवा शैलगृहं (सोप्या भाषेत 'गुहा') आहेत. यांतील पाचशे शैलगृहांमध्ये चित्रकारी केलेली दिसते.या चित्रामध्ये वाघ आहे,हरीण आहे,हत्ती आहेत,बैल,मोर वगैरेही आहेत.मुख्य म्हणजे घोडाही आहे.त्यामुळे घोडा भारतात अतिप्राचीन काळापासून होता हे सिद्ध झाले आहे.अन्यथा काही इतिहासकार अरब आक्रमकांनी घोडे भारतात आणले असं सांगत होते.भारतात जगाच्या इतर भागांच्या तुलनेने फार चांगली आणि शास्त्रशुद्ध मूर्तिकला विकसित झाली.पण ती बऱ्याच नंतर.जगातल्या पहिल्या म्हणून म्हटलेल्या ज्या मूर्ती सापडलेल्या आहेत, त्यांतील एकही मूर्ती भारतातली नाही. 


'लॉवेनमेंश फिगरीन' म्हणून नावाजलेली जगातली पहिली म्हणवली जाणारी मूर्ती जर्मनीच्या आल्प्सजवळच्या भागात सापडलेली आहे.ही साधारण तीस ते पस्तीस हजार वर्षे जुनी असावी,असं कार्बनडेटिंगचे परिणाम सांगताहेत.इजिप्तमधे आढळलेले स्फिंक्स आणि इतर मूर्ती तशा बऱ्याच नंतरच्या,म्हणजे इसवी सनापूर्वी अडीच हजार वर्षांच्या.रशियाच्या सैबेरिया भागात लाकडाची जी प्रतिमा सापडलेली आहे, तिला 'शिगीर आयडॉल' म्हटले जाते.ही मूर्ती सुमारे अकरा हजार वर्षांपूर्वी (अर्थात इसवी सनाच्या नऊ हजार वर्षांपूर्वी) लाकडावर कोरलेली आहे.

तुर्कस्तानात सापडलेल्या मूर्ती ह्या सहा हजार वर्षांपेक्षा जास्त प्राचीन आहेत.या मूर्तीमध्ये भारतीय शैली झळकते असे म्हटले जाते.मुळात माती हे सहज सोपे माध्यम अगदी प्राचीन मूर्तीमध्ये आढळते.मात्र 'माती' ही चिरकाल टिकणारी नसल्याने मातीच्या जास्त मूर्ती सापडत नाहीत.

फ्रान्समध्ये आदिमानवांच्या गुहांमध्ये (Tuc d' Audoubert) सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वीच्या मातीत बनलेल्या रानरेड्याच्या आकृती सापडतात.भारतात सिंधू घाटीमधील उत्खननात,भाजलेल्या मातीची काही चांगली शिल्पं सापडली.सिंधू घाटी, अर्थात मोहन जोदडो / हडप्पा,ह्यांचा काळ साडेपाच हजार वर्षांपूर्वीचा मानला जातो.भारतात मधमाश्यांच्या पोळ्यांमधील मेणाने तयार केलेल्या प्रतिमाही आढळतात.मात्र पुढे ह्या मेणाच्या माध्यमातून मातीचे साचे तयार होऊ लागले आणि ओतकामातून धातूंच्या मूर्ती तयार होऊ लागल्या.मोहन- जो-दडो येथील नृत्यांगनेची छोटी मूर्ती हे प्राचीनतम भारतीय धातुशिल्पाचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. 


ही मूर्ती पंचधातूंची असून वैशिष्ट्यपूर्ण आहे. मोहन-जो-दडो आणि हडप्पा येथे सापडलेल्या मूर्ती आणि मेसोपोटेमिया येथे सापडलेल्या मूर्ती यांत बरीच समानता आढळते.या मूर्तिशिल्पात सर्वांत सुरक्षित मूर्ती एका माणसाची आहे.सुमारे सात इंच उंच डोकं आणि खांदे असलेलं हे 'बस्ट' एखाद्या पुजाऱ्याचं वाटतं.याच्या चेहऱ्यावर छोटीशी दाढी असून शरीर एका शालीत आच्छादित आहे.याच उत्खननात अनेक मुद्रा (Seal) मिळाल्या. या चौकोनी असून यावर बैल आणि तत्सम गोष्टी कोरलेल्या आहेत.ह्या,बैल किंवा जनावरांच्या आकृत्या,अगदी कलात्मक रीतीने कोरलेल्या आहेत.

चारशेपेक्षा जास्त आकार असलेल्या ह्या मुद्रांची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त आहे.


भारतात मूळ प्रतिमा मेणामध्ये घडवून त्याचा साचा तयार करण्याची पद्धत रूढ होती. या तंत्राला प्राचीन शिल्पसाहित्यात'मधूच्छिष्टविधान' म्हटले आहे.

प्रथम मातीऐवजी मधाच्या पोळ्याचे मऊ मेण वापरून प्रतिमा बनविली जाते.माती, शेण व तांदळाचा कोंडा यांच्या मिश्रणात पाणी घालून केलेल्या लगद्याने ती आच्छादली जाते. प्रतिमेला आधीच एक मेणाची जाडसर वळी जोडलेली असते,जिचे दुसरे टोक प्रतिमेला आच्छादणाऱ्या साच्याच्या पृष्ठभागावर राहील, याची काळजी घ्यावी लागते.हा साचा वाळवून भट्टीत गेला की,त्यामधील सर्व मेण वितळून त्या वळीच्या वाटे वाहून जाते आणि साच्याच्या आत प्रतिमेच्या आकाराची पोकळी निर्माण होते.या पोकळीत वितळविलेल्या धातूचा (ब्राँझ,पितळ किंवा तांबे,क्वचित सोने-चांदी सुद्धा) रस ओतून मूळ मेणाच्या प्रतिमेची प्रतिकृती मिळविता येते. साच्यातून काढलेल्या प्रतिमेला नक्षीदार धातुपत्रांनी सजविण्याची किंवा धातूच्या दगडालाच ठोकून ठोकून मूर्ती घडविण्याची परंपरा प्राचीन काळात दिसून येते.


आपल्या देशात कास्य शिल्पाची किंवा धातूच्या शिल्पाची परंपरा ही जुनी आहे. 'यजुर्वेदात' चांदी,शिसे आणि कथिल या धातूंचे उल्लेख लोखंडासारख्या इतर धातूंबरोबर येतात. अर्थातच हे धातू कसे वापरायचे याची माहिती तत्कालीन लोकांना होती.काही वर्षांपूर्वी औरंगाबादजवळ असलेल्या 'दायमाबाद' येथील उत्खननात सापडलेल्या मूर्ती ह्या पंचधातूंच्या असून कार्बनडेटिंग द्वारे यांचा कालखंड तीन हजार वर्षांपूर्वीचा सिद्ध झालेला आहे. या उत्खननात मिळालेल्या प्राण्यांच्या भरीव प्रतिमांना खेळण्यांसारखी चाके आहेत.एक दुचाकी बैलगाडीही यात सापडलेली आहे.चौथ्या शतकापासून मात्र ओतकामांच्या अर्थात धातूंच्या मूर्ती आणि इतर वस्तू मुबलक स्वरूपात मिळतात.साधारण तीन प्रकारच्या धातूंच्या वस्तू निर्माण होत होत्या -


१. प्रत्यक्ष देव-देवतांच्या मूर्ती


२.पूजाविधीची उपकरणे.उदाहरणार्थ: दीपलक्ष्मी,पूजेची घंटा,उभे/ टांगते/हातात धरण्याचे दिवे इत्यादी.


३.दैनंदिन उपयोगाच्या वस्तू.उदाहरणार्थ : विविध प्रकारची भांडी,हत्यारांच्या मुठी इत्यादी


तंजावर जिल्ह्यातील 'नाचीर कोइल' हे गाव ओतकामासाठी प्रसिद्ध होते,कारण तिथे कावेरी नदीची पिवळी वाळू मुबलक मिळत होती,जी साचे बनविण्यासाठी उपयुक्त होती.याच कारणामुळे गुवाहाटी,

आसाममधील सार्तबरी, मणिपूर,वाराणसी इत्यादी ठिकाणे धातूंच्या मूर्ती आणि वस्तूंसाठी प्रसिद्ध होती.

मात्र त्याचबरोबर शिल्पशास्त्रात भारताचे कौशल्य विकसित होत होते.पुढे याच कौशल्याच्या आधारावर अवघ्या दक्षिण-पूर्व आशियात भारतीय शिल्प - तंत्रज्ञांनी अद्भुत शिल्पं उभारून दाखविली.गांधार शैली आणि मथुरा शैली अशा दोन प्रकारच्या प्रवाहांमधून भारतीय शिल्पशास्त्र विकसित झाले.


मात्र हडप्पन संस्कृती आणि पुढील मौर्य शासन, यांमधील सुमारे दोन हजार वर्षांची शिल्पं आपल्याला सापडलेली नाहीत.मौर्य साम्राज्यात उभारलेल्या शिल्पांविषयी,त्या शिल्पांच्या भव्यतेविषयी आणि प्रमाणबद्धतेविषयी सिकंदरच्या काळात भारतात आलेल्या ग्रीक इतिहासकार मेगस्थनीजने बरेच लिहून ठेवले आहे.त्याच्या 'इंडिका' ह्या पुस्तकात पाटलीपुत्राच्या वेगवेगळ्या शिल्पांविषयी आणि नगराच्या भव्यतेविषयी बरेच लिहिलेले आहे.


सम्राट अशोकाचा कालखंड हा इसवी सनापूर्वी ३०४ वर्ष ते २३२ वर्षे,अर्थात आजपासून साधारण साडेबावीसशे वर्षं मागे,असा आहे.त्याच्या'काळातील अनेक प्रतिमा,अनेक शिल्पं आजही आपल्याला पाहायला मिळतात.अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्याने माध्यम बनविले,

शिल्पकलेला.अनेक स्तंभ, अनेक स्तूप,अनेक शिलालेख,

अनेक शिल्पं, अनेक मूर्ती त्याने बनविल्या.त्याच्या काळात बनविले गेलेले चार सिंहांचे प्रतीक,आज 'अशोक चिन्ह' म्हणून आपली राष्ट्रीय ओळख आहे.हे अशोक चिन्ह सारनाथ येथे सापडले होते.सुमारे बावीसशे वर्षांनंतरही ते शिल्प व्यवस्थित होते.अगदी असेच चार सिंहांचे प्रतीक चिन्ह थायलंड-मध्येही आढळले आहे.मात्र भारतीय शिल्पशास्त्राचा कळसाध्याय आपल्याला बघायला मिळतो,तो बराच पुढे सातव्या / आठव्या शतकात.वेरूळ येथील 'कैलास लेणे' हे ते अद्भुत आश्चर्य आहे.एकाच शिलाखंडात कोरलेले हे शिल्प म्हणजे मानवी शिल्पकलेचा अप्रतिम आणि विश्वास न बसावा असा नमुना आहे.साधारण सन ६०० ते ७५० च्या दरम्यान ह्या लेण्यांची निर्मिती झाली असावी असे अनुमान काढले जाते.मात्र काही पुरातत्त्ववेत्त्यांच्या मते याचा काल बऱ्याच आधीचा असावा.तरीही उपलब्ध पुराव्यांच्या अनुसार ह्या शिल्पांच्या निर्मितीचा काळ हा राष्ट्रकूटांच्या शासनाचा आहे.राजा कृष्ण (प्रथम) याने आठव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या लेण्यांची निर्मिती प्रारंभ केली असे मानले जाते. मात्र एच.गोझ ह्या इतिहासकाराच्या अनुसार कृष्ण राजाचा पुतण्या दान्तिदुर्ग (सन ७३५ ७५६) ह्याने अगदी युवावस्थेत ह्या लेण्यांचे काम सुरू केले.मात्र एम.के. ढवळीकर ह्या इतिहासतज्ज्ञांचे मत कृष्ण राजाच्या बाजूचे आहे.मात्र त्या काळात जे काही निर्माण झाले, ते अद्भुत आहे.मानवी बुद्धीला अचंबित करणारे आहे.जगाच्या पाठीवर कोठेही,एकाच दगडाला कोरून,वरपासून खाली खोदकाम करत बनविलेले असे भव्य शिल्प नाही..!


आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ह्या पूर्ण मंदिरातील सर्वच शिल्पं अत्यंत प्रमाणबद्ध आणि रेखीव आहेत.कसलेल्या, कुशल मूर्तिकारांनी / कारागिरांनी कोरून काढलेली ही शिल्पं..! काही पिढ्यांच्या प्रयत्नांतून घडवलेली ही शिल्पं..! आपले दुर्दैव असे की,आज आपल्याजवळ ह्या मूर्तिकारांची,कलाकारांची,योजनाकारांची कसलीही माहिती उपलब्ध नाही..!! हे मंदिर,पट्टडकल (कर्नाटक) येथील विरुपाक्ष मंदिरासारखे आहे,जे कांचीच्या कैलास मंदिराची प्रतिकृती आहे.२७६ फूट लांब,१५४ फूट रुंद

आणि ९० फूट उंच असे हे मंदिर सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. युनेस्कोने ह्याचा जागतिक संरक्षित स्मारकांच्या यादीत समावेश केलेला आहे.पुढे अकराव्या / बाराव्या शतकांत पश्चिमेतून येणारी मुसलमानी आक्रमणं तीव्र झाल्यावर मंदिरांच्या बांधकामाचा वेग मंदावला आणि त्याचबरोबर उन्नत असलेल्या भारतीय शिल्पकलेला उतरती कळा लागली.कालांतराने जगाला अचंबित करणारे शिल्प बांधणारे आम्ही, त्या शिल्पकलेला पूर्णपणे विसरलो..!!


२३.०७.२४ या लेखातील पुढील भाग…


१६/८/२४

पावसाच्या मागावर/ On the trail of rain

१४.०८.२४ या लेखातील पुढील भाग…


अलेक्झांडरने जोसेफना मौसमी पावसाचा चेरापुंजीपर्यंत पाठलाग करण्याची कल्पना सांगितली.त्यांनी अविश्वासाने अलेक्झांडरकडे बघितलं.त्यांच्या म्हणण्यानुसार अलेक्झांडरला चेरापुंजीला जायची परवानगी मिळण्याची खात्री नव्हती.(त्या वेळी ईशान्य भारतात वेगवेगळी आंदोलनं आणि भूमिगत चळवळींचा जोर होता.)मात्र मौसमी पावसाच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेची त्यांनी अलेक्झांडरला अगदी बारकाईने माहिती दिली "मॉन्सून हा शब्द मौसम या अरेबिक शब्दाचा अपभ्रंश आहे.मौसम म्हणजे सीझन (ऋतू).मौसमी पावसाचा अभ्यास सतराव्या शतकात सुरू झाला.त्यावेळचे रॉयल सोसायटीचे अध्यक्ष,'धूमकेतू' फेम एडमंड हॅली यांनी मौसमी पावसाच्या प्रवासाचा एक अद्भुत नकाशा प्रसिद्ध केला.त्या काळातल्या सोयीसुविधा पाहता ते काम खरोखरच अद्वितीय होतं.त्यानंतरच्या काळात मौसमी पावसावर भरपूर संशोधन झालेलं आहे,याचं कारण पृथ्वीच्या वातावरणातील ही सर्वांत महान जलवायुमान प्रणाली आहे (जलवायुमान म्हणजे क्लायमेट).गेली तीनशे ते साडेतीनशे वर्षं संशोधन होऊनसुद्धा या रहस्याचा उलगडा अजून झालेला नाही. 


मौसमी पावसाबद्दल दरवर्षी नवी माहिती पुढे येते.ही प्रणाली मानवी मेंदूसारखंच एक रहस्य आहे." जोसेफ यांचं हे बोलणं अखंड नव्हतं. त्यांना सतत फोन येत होते. यातून वेळ मिळेल तेव्हा ते संभाषणाचा आधीचा धागा पकडून अलेक्झांडरला माहिती देत होते.या रहस्यात आणखी एक तिढा आहे.मौसमी पावसाचे ढग दोन मार्गांनी जातात.एक अरबी समुद्रावरचा आणि दुसरी बंगालच्या उपसागरातला.अरबी समुद्राच्या मार्गाने जाणारा मॉन्सून पश्चिम घाटाला अडतो.त्या ढगांतलं बहुतेक सर्व पाणी पावसाच्या रूपाने कोसळतं.पश्चिम घाट ओलांडून जे ढग पलिकडे जातात त्यात अत्यल्प बाष्प असतं.बंगालच्या उपसागरातील शाखाही याचवेळी कार्यरत होते.आमच्याकडे पाऊस सुरू होतो,त्यानंतर काही दिवसांतच चेरापुंजीत पाऊस पडायला सुरुवात होते.' ते ऐकून अलेक्झांडर म्हणाला,म्हणजे दर उन्हाळ्यात भारताला या दोन ओल्या हातांचा विळखा पडतो तर..."जोसेफना ती भाषा पीत पत्रकारितेची वाटली.त्याबद्दल त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

निसर्गाच्या या भव्य आविष्काराबद्दल असं बोलणं त्यांना अयोग्य वाटलं.मात्र त्यांनी आपलं माहिती देण्याचं काम पुढे सुरू ठेवलं. हे दोन्ही मॉन्सूनचे प्रवाह अखेरीस एकत्र येतात. बंगालच्या उपसागरातील शाखा पश्चिमेकडे वळते,कारण ती हिमालयाला अडते.जेव्हा गंगेच्या खोऱ्यात पाऊस सुरू होतो त्यावेळी तो पश्चिमेकडून आलाय की नैऋत्येकडून हे सांगणं अवघड जातं.हे जलवायुमानाचं चक्र प्रचंड गुंतागुंतीचं आहे; त्यावर बऱ्याच गोष्टींचा परिणाम होत असतो.तिबेटच्या पठाराचं तापणं,दक्षिण गोलार्धातील व्यापारी वारे,जेट प्रवाहाचा मार्ग, सोमाली जेट प्रवाहाची सुरुवात,सहाराच्या दक्षिणेकडून ९० अंशाचा कोन करून आफ्रिकेचा किनारा पार करून या जेट प्रवाहाचा पूर्वेकडे प्रवास सुरू होतो.त्याची उंची आणि वेग हेसुद्धा मौसमी पावसावर परिणाम करतात;असे आणखीही अनेक घटक आहेत.


मुख्य म्हणजे भूमीचं तापमान सागराच्या तापमानापेक्षा जास्त असायला हवं.इतकी माहिती दिल्यानंतर जोसेफ यांनी अलेक्झांडरला बाहेरच्या बागेतलं 'वेदर बलून' दाखवलं.असे बलून्स वातावरणाच्या अभ्यासासाठी हवेत सोडले जातात.त्यांच्यामार्फत हवेच्या प्रवाहाची दिशा, वाऱ्यांचा वेग आणि जेट प्रवाहाचं स्थान आणि वेग,यांची माहिती मिळते...ते म्हणाले,सोमवार,बुधवार,शुक्रवार आयात केलेले परदेशी बलून सोडतात;तर मंगळवार,

गुरुवार,शनिवारी भारतीय बनावटीचे बलून आम्ही वापरतो.भारतीय हवामानाप्रमाणेच हे भारतीय बनावटीचे बलून कधी दगा देतील सांगता येत नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली. हे बलून्स २५ ते ३० कि.मी.उंच जातात आणि फुटतात.मौसमी पावसाच्या काळात भारतातील ४० वेधशाळा रोज चार बलून आकाशात सोडतात.जे बलून्स समुद्रात जातात,ते परत मिळवता येत नाहीत. जमिनीवर पडण्याची शक्यता असलेल्या बलूनना एक सूचना चिकटवलेली असते- ही भारत सरकारची मालमत्ता आहे.सापडल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात नेऊन द्यावी.पण ते अगदी क्वचित घडतं.


कलकत्त्याच्या डमडम विमानतळावरून सोडलेले बलून्स लोकांनी परत करावेत म्हणून त्यांना तर पेनं,खेळणी,

कोऱ्या कॅसेट आणि भारतीय हवामान खात्याची अधिसूचना असलेली स्टिकर्स असलेली छोटी पिशवी बांधण्यात येते.पण तिथले लोक या वस्तू ठेवून घेतात,

बलूनचं कापड गोठ्यावर घालतात आणि खालचा कंटेनर स्वयंपाकासाठी वापरतात ! बलून कुठून कसा जाईल हे सांगणं अवघडच असतं.तैवान सरकार चीनविरुद्धचं प्रचारसाहित्य असलेले बलून्स सोडतं.त्यांतले काही आसाम आणि बंगालमध्ये सापडले आहेत." जोसेफ माहिती देत होते. "१० मेच्या आधी पडलेला पाऊस मौसमी पावसात गणला जात नाही. केरळातील पाच ठिकाणच्या पाऊसमापन केंद्रांमध्ये सतत दोन दिवस कमीत कमी एक मि.मी.पाऊस पडला की त्याच्या दुसऱ्या दिवशी मौसमी पावसाचं आगमन झाल्याचं जाहीर केलं जात.अर्थात,तेरा अक्षांशापर्यंत म्हणजे पश्चिम घाटाच्या एक तृतियांश भागापर्यंत मौसमी पावसाचे ढग बरसू लागले,की मगच भारतीय लोक सुटकेचा निःश्वास टाकतात.प्रचंड उकाड्यात तग धरून अलेक्झांडर रोज वेधशाळेत जात होता.दोन जूनला त्याच्या तपश्चर्येला यश आलं.जोसेफनी 'उद्या कोचीनला बहुतेक पाऊस येईल असं त्याला सांगितलं. त्यावर अलेक्झांडरने कोचीनला जाण्याचा मनसुबा बोलून दाखवला.पण जोसेफनी त्याला अडवलं आणि ते त्याला म्हणाले,तुला या पावसाची आणि वाऱ्यांची माहिती नाही.तुला तिथे कुणी नेणारही नाही.तू पावसाची वाट बघत इथंच थांब.कोवालम् चौपाटीवर तुला तो पहिला पाऊस अनुभवता येईल.


अलेक्झांडर तिथून बाहेर पडला.शहरातलं वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं.रस्त्यात लोक गटागटाने उभे राहून आकाशाकडे बघत होते.दरम्यान फ्रेटरला परत त्रास व्हायला सुरुवात झाली होती.त्याच्या दोन्ही हातांना मुंग्या येत होत्या.तो स्थानिक उपचार केंद्रात गेला.मात्र तिथे आपल्याला बराच काळ रहावं लागेल हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने तो नाद सोडून दिला.त्याला मौसमी पावसाचा पाठलाग जास्त महत्त्वाचा वाटत होता.तीन जूनला सकाळी तो उठला.रात्रीच मौसमी पावसाची पहिली सर पडून गेली होती.जोसेफ यांच्या कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याने त्याला सांगितलं,

मौसमी पाऊस त्याच्या सोयीनं येतो,तू कोचीनला जा,तिथे नक्की भिजशील.या टप्प्यावर या पुस्तकातली सर्वांत मोठी चूक आढळते.अलेक्झांडर आपल्याला मौसमी पावसाची सुरुवात हिमालयाच्या उत्थानामुळे झाली हे बरोबर सांगतो,पण हिमालयाचं उत्थान साठ ते ऐंशी कोटी वर्षांपूर्वी झाल्याचं सांगतो,हे चूक आहे. मायोसीन कालखंडात हिमालयाचं उत्थान व्हायला सुरुवात झाली,हे बरोबर आहे;पण हा कालखंड खूपच अलीकडचा म्हणजे साधारणपणे तीन ते एक कोटी वर्षांपूर्वीचा आहे. हिमालयाच्या उत्थानाला याच्या थोडी आधी सुरुवात झाली आणि त्याला आजचं रूप अडीच ते दोन कोटी वर्षांपासून प्राप्त झालं असावं,असं मानलं जातं.यात पाच-पंचवीस लाख वर्षं इकडे-तिकडे होऊ शकतात,पण अलेक्झांडर म्हणतो त्याप्रमाणे सहाशे मिलियन ते आठशे मिलियन (साठ कोटी ते ऐंशी कोटी) हे आकडे चुकीचे आहेत.ही एक बाब वगळली तर अलेक्झांडरचं हे पुस्तक अगदी आवर्जून वाचावं.


असं आहे.अर्थात,वाचताना अलेक्झांडरचा एक ब्रिटिश म्हणून भारताकडे आणि भारतीयांकडे बघण्याचा विशिष्ट दृष्टिकोन वारंवार प्रत्ययास येतो.अलेक्झांडरने त्याच्या वास्तव्याच्या हॉटेल्सची वर्णनं केलेली आहेत,ती अतिशयोक्तिपूर्ण वाटतात.ब्रिटिश माणूस एखाद्या वृत्तपत्राचं प्रायोजकत्व मिळवून भारतात आल्यावर अशा प्रकारच्या हॉटेलातून वास्तव्य करेल,हे खरं वाटत नाही.

पण त्याने हे पुस्तक पाश्चात्त्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून लिहिलं आहे,ही बाब इथे लक्षात घ्यायला हवी.भारतीय कारकूनशाही त्याला नडली,असं तो लिहितो.ती कारकूनशाही ब्रिटिशांनी भारतावर लादलेली देणगी आहे,हेही लक्षात घ्यायला हवं.तरीही तो ज्या पद्धतीने मौसमी पावसाचा पाठलाग करत हिंडला आणि अखेरीस चेरापुंजीला जाऊन त्याने पाऊस उपभोगला,त्याला दाद द्यायलाच हवी.या प्रवासादरम्यान अलेक्झांडर ज्या ज्या माणसांना भेटला त्यांच्याशी झालेल्या 'गॉसिप' स्वरूपाच्या गप्पाही पुस्तकात वाचायला मिळतात.त्याचं वर्णन इथे मी मुद्दाम टाळलंय.मात्र,त्याने सांगितलेली ऐतिहासिक माहिती बरीच तथ्य असलेली आणि मनोरंजक आहे. वानगीदाखल एक उदाहरण देतो.कोचीन

बंदरात मौसमी पावसाची वाट बघत असताना अलेक्झांडरला एक इटालियन जहाज दिसलं.तो धागा पकडून 'रोमनांचा मॉन्सूनशी संबंध होता' हे तो आपल्याला सांगतो.मौसमी वाऱ्यांच्या साहाय्याने शिडाची जहाजं भारतात नेणं सोपं आहे,हे लक्षात आल्यावर रोमचा भारताशी व्यापार वाढला. (खरं तर भारतीय नाविक त्याआधीपासूनआफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर जात होते.) मात्र,हा व्यापार अरब नावाड्यांच्या मार्गदर्शनाखाली होत होता,हे सांगायला अलेक्झांडर विसरतो.मलबार किनाऱ्यावर जे अवशेष सापडतात त्यात प्राचीन रोमन नाणी सापडतात.भारतातून काळी मिरी,तलम कापड, रेशमी वस्त्रं,मोती,हस्तिदंत,चंदन,

रक्तचंदन, शिसवी लाकूड,सुपारी,खायची पानं,हिरे,

कासवांच्या पाठी,तांदूळ,तूप,मध,दालचिनी,धने, आलं,नीळ आणि इतरही बरेच पदार्थ रोमला जात;याशिवाय अनेक मौल्यवान आणि अर्ध मौल्यवान रत्नांचे खडेही रोमला जात;नीरोच्या काळात कोचीनला रोममध्ये बरंच महत्त्व प्राप्त झालं होतं;भारतीय वस्तूंचं अंगभर प्रदर्शन हा श्रीमंतीची प्रसिद्धी करण्याचा राजमार्ग होता; रोमच्या सिनेटमध्ये त्यामुळे भारतीय महाराजांचं संमेलन भरल्याचा भास होत असे,असं तो नमूद करतो.

अलेक्झांडरने आपल्या प्रवासात दिल्लीत हवामान

खात्याच्या महासंचालकांची भेट मिळवली.तिथे त्याला भारतीय हवामान खात्यातर्फे मौसमी पावसाचा माग काढण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबद्दलची माहिती मिळाली.तसंच तोपर्यंत काढल्या मौसमी पावसाच्या अभ्यासाच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचीही माहिती मिळाली.डॉ.आर.पी. सरकार हे त्या वेळी भारतीय हवामानखात्याचे प्रमुख होते.त्यांनी अलेक्झांडरला सांगितलं, मौसमी पाऊस ही एक जागतिक प्रणाली आहे. सर्वच राष्ट्रांना मौसमी पावसाच्या अभ्यासात रस आहे,

कारण ती एक जागतिक समस्याही आहे. आम्ही जगभर कुठे काय घडतंय याची नोंद ठेवतो.कारण दोन-तीन दिवसांनी ती बाब आमच्यावर परिणाम करू शकते. 


ऑस्ट्रेलियावरील हवेचा दाब,ब्यूनोस आयर्स आणि ताहितीमधलं हवामान,रशियावरील वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाची दिशा,अंटार्क्टिकावर या वर्षी झालेला हिमपात, अशा अनेक घटकांचा आम्ही विचार करत असतो.त्यांनी अलेक्झांडरला एल निनोची माहिती दिली.भारत 'वर्ल्ड मेटिऑरॉजिकल ऑर्गनायझेशन'चा सदस्य असल्याचं सांगून ते म्हणाले,या जागतिक संस्थेचे एकशे साठ सदस्य आहेत.ते सतत एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यांनी मॉन्सूनच्या उन्हाळी हालचालींचा आढावा घेणारं केंद्र दिल्लीत स्थापन केलेलं आहे (समर मॉन्सून ॲ क्टिव्हिटी सेंटर- 'स्मॅक'). मॉन्सूनच्या अभ्यासासाठी अनेक आंतरराष्ट्रीय प्रयत्न झाले आहेत.

मोनेक्स एकोणऐंशी,मॉन्सून-सत्त्याहत्तर, इस्मेक्स त्र्याहत्तर आणि आयआयओई (इंटरनॅशनल इंडियन ओशन एक्स्पिरिमेंट) हे त्यातले काही आंतरराष्ट्रीय प्रयत्न."


भारतीय हवामानखात्याच्या पहिल्या महासंचालकपदी इ.स. १८७५ मध्ये एच.एफ. ब्लँडफोर्ड यांची नेमणूक झाली. ईस्ट इंडिया कंपनीने अठराव्या शतकात या खात्याची स्थापना केली होती.मात्र,मौसमी पावसाचा अंदाज घेण्याच्या त्यांच्या पद्धती अगदीच प्राथमिक स्वरूपाच्या होत्या.ब्लॅडफोर्डनी मौसमी पावसाच्या अभ्यासाचा शास्त्रीय पाया घातला. त्यांचं सारं आयुष्य त्यांनी या नैसर्गिक घटनेच्या अभ्यासाला वाहिलं.मौसमी पाऊस ही एक गुंतागुंतीची प्रणाली असल्याचं त्यांनी प्रथम जगासमोर आणलं.त्यांच्यावर मॉन्सूनने जी मोहिनी घातली ती कायमस्वरूपी होती.त्यांनी आशिया खंडात हवामानाच्या नोंदी ठेवणारी केंद्रं आणि वेधशाळांचं जाळंच उभारलं.भारत आणि ब्रह्मदेशातून (आता म्यानमार) दैनंदिन नोंदींच्या तारा रोजच्या रोज त्यांच्या कचेरीत पोहोचू लागल्या.त्यांनी पर्वतशिखरांवरही वेधशाळा बांधल्या.याशिवाय पतंगांच्या साहाय्याने वातावरणाचा अभ्यास करणारी केंद्रं जागोजाग निर्माण केली.अनेक भारतीय तरुणांना त्यांनी हवामानखात्यात भरती केलं. त्यांच्या निवृत्तीच्या सुमारास त्यांनी 'द रेनफॉल इन नॉर्दर्न इंडिया' हा ग्रंथ लिहिला. 'द इंडियन मेटिऑरॉलॉजिस्ट्स व्हेड मॅक्कम' या ग्रंथाने त्यांच्या सेवेची सांगता झाली.एकोणिसावं शतक आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे ग्रंथ मौसमी पावसाचे बायबल मानले जात.ब्लॅडफोर्डच्या निवृत्तीनंतर सर जॉन एलियट हे भारतीय हवामानखात्याचे प्रमुख बनले.त्यांच्या काळात मॉन्सूनच्या अभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय सहकाराची सुरुवात झाली. इ.स.१८९७ मध्ये पहिलं 'आंतरराष्ट्रीय मेघ अभ्यास वर्ष' जाहीर झालं,त्यात भारताचा सहभाग होता.एलियटनी फ्रेंच शास्त्रज्ञ तिसेराँस द बोर्ट यांच्या सहकार्याने भारतात मोठ्या प्रमाणावर वातावरणाचा अभ्यास सुरू केला.द बोर्टनी वातावरणातील स्तरितांबराचा शोध लावला होता.मौसमी पावसाचा अंदाज जाहीर करायची कल्पनाही सर जॉन एलियट यांचीच. (अगदी सुरुवातीला हा अंदाज गुप्त ठेवण्यात येत असे. तो फक्त वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना पाहावयास मिळे.)एलियटनंतर त्यांचा एक सहायक गिल्बर्ट वॉकर यांच्याकडे हवामानखात्याची सूत्रं आली. वॉकरनी मौसमी पावसाच्या अभ्यासास गती दिली.मौसमी पावसाच्या अभ्यासामुळे ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले.भारतीय हवामानखात्याच्या इतिहासातही त्यांचं नाव अग्रणी हवामानशास्त्रज्ञ म्हणून आदराने घेतलं जातं. वॉकर यांना प्रत्येक वैज्ञानिक घटनेचं कुतूहल वाटत असे.प्रत्येक घटनेची कारणमीमांसा केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.सर विल्यम विल्कॉक्स या इजिप्तमधल्या जलसाठा नियोजन प्रकल्पाच्या महासंचालकांनी नाइल नदीला येणाऱ्या पुरांचा आणि भारतात पडणाऱ्या पावसाचा काही तरी संबंध असल्याचं म्हटलं होतं.त्या विधानाची सत्यता सिद्ध करण्यासाठी वॉकरनी आकडेवारी गोळा केली.वृक्षतोड आणि मौसमी पाऊस यांचाही त्यांनी अभ्यास केला.सौर डागांचं चक्र आणि मौसमी पाऊस यांचा परस्परसंबंध त्यांनी तपासून बघितला.तसंच भारतातील मौसमी पाऊस आणि जागतिक हवामानचक्राचा संबंधही त्यांनी सर्वप्रथम तपासला. वॉकर यांच्या संशोधनाने त्या काळात बऱ्याच वेळा खळबळ माजली.सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि ब्यूनोस आयर्स (अर्जेंटिना) अशा जगाच्या दोन टोकांच्या शहरांच्या हवेचा दाब आणि पश्चिम घाटातील पाऊस,अंटार्क्टिकातील हिमखंड आणि भारतातील पाऊस यांचाही संबंध असावा,असं वॉकर म्हणत.ते सिद्ध व्हायला पुढे शंभर वर्षं लोटावी लागली.


वॉकरनी सर्वप्रथम पॅसिफिक महासागराचा आणि मौसमी पावसाचा संबंध असल्याचं विधान केलं.पॅसिफिक महासागरावरील हवेचा जास्त दाबाचा पट्टा आणि त्याच वेळी हिंदी महासागरावर कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती,हा कमी दाबाचा पट्टा हिवाळ्यात टिकून राहणं यांचा आणि भारतीय उपखंडात पाऊस मुबलक प्रमाणात पडण्याचा संबंध असावा,असंही वॉकरचं म्हणणं होतं.'सर गिल्बर्ट वॉकर इज फादर ऑफ मॉन्सून स्टडीज' असं यामुळेच म्हटलं जातं. या सर्वच इंग्रज मॉन्सून अभ्यासकांच्या कार्याचं सार अलेक्झांडरच्या शब्दांत सांगायचं तर ते असं सांगता येईल- मॉन्सून कळायला अनेक जन्म घेतले तरी तो कळेल याची खात्री देता येत नाही.जरा काही नवा पैलू उघड करावा तर त्याच्या आड आणखी बरंच काही दडलंय हे लक्षात येतं.' अलेक्झांडरचं पुस्तक अशा माहितीचा खजिनाच आहे.शिवाय ते एक चांगलं प्रवासवर्णन आहे.पुस्तकात शास्त्रीय माहितीबरोबर मौसमी पावसावर अवलंबून असणाऱ्या भारताच्या विविध भागांतील सामाजिक चालीरीतींचंही चित्रण आहे.अशा रंजक वर्णनाच्या साथीने आपणही नकळत केरळ ते चेरापुंजी प्रवास करतो.वाटेतला आपल्या परिचयाचा मॉन्सून अलेक्झांडरच्या नजरेतून नव्याने अनुभवतो.

अलेक्झांडर अखेर चेरापुंजीला कसा पोहोचला ही पुस्तकातली गमंत तर मुळातूनच वाचण्याजोगी आहे. बीबीसीने या पुस्तकावर आधारित माहितीपट तयार केला आहे.ज्यांना मौसमी पावसाबद्दल कुतूहल आहे त्यांनी अलेक्झांडरने केलेला हा आगळावेगळा 'मॉन्सून पाठलाग' अवश्य वाचायला हवा.


लोकांकडे कल्पना नसतात,कल्पनांना लोक असतात.- पॉल बी. रेनी.