* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२४/४/२५

कुमाऊँचे नरभक्षक / The Cannibals of Kumaon

कुमाऊँचे नरभक्षक - जिम कॉर्बेट,अनुवाद - वैशाली चिटणीस,डायमंड पब्लिकेशन्स,३१.०७.२३ या लेखातील पुढील भाग वेळच्या वेळी क्रमशः प्रकाशित केले जातील.


काडतुसांमधल्या काळ्या पावडरीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे मला काही दिसत नव्हतं.माझा नेम बहुधा एखाद्या खडकावर किंवा पालापाचोळ्यावर लागला असल्याचं माझ्या माणसांनी मला सांगितलं.त्याच जागेवर बसून मी रायफलमध्ये पुन्हा बार भरला.मी आधी ज्या जागेवर नेम धरला होता,त्याच्या खाली, गवतात मला हालचाल दिसत होती.तिथेच मला घोरूलचा पार्श्वभाग दिसला.ते गवतातून पूर्ण बाहेर आलं आणि त्याने डोंगरउतारावरून खाली गडगडत यायला सुरुवात केली.अर्ध्यावर खाली आल्यावर ते घनदाट गवतात दिसेनासं झालं.त्याच्या या धडपडीमुळे गवतात पडलेल्या दोन घोरूलांना सावधगिरीचा इशारा मिळाला आणि त्या गवतातून बाहेर येऊन ती वर, डोंगराच्या दिशेने धावायला लागली.

आता ती अधिक जवळच्या टप्प्यात होती.माझ्यासमोरच्या पानांमधून मी नीट लक्ष केंद्रित केलं.त्या दोघांपैकी आकाराने मोठ्या असलेल्या घोरूलाचा वेग कमी व्हायची वाट बघायला लागलो.तो कमी होताच,मी त्याच्या पाठीत गोळी झाडली.

त्याबरोबर दुसऱ्या घोरूलाने त्याने तिरपं वळून डोंगराच्या दिशेने धावायला सुरुवात केली,तेव्हा मी त्याच्यावर गोळी झाडली.


कधी कधी असं होतं.अशक्य वाटणारी एखादी गोष्टदेखील करणं शक्य होऊन जातं.फारशा आरामदायी नसलेल्या,काहीशा अडचणीच्या जागेत पडून,वरच्या दिशेने ६० अशाच्या कोनात २०० यार्डावर गळ्याचा फक्त लहानसा पांढरा ठिपका दिसत असलेल्या त्या घोरूलवर गोळी झाडल्यावर नेम बरोबर लागण्याची दहा लाखात एकदेखील शक्यता नव्हती.पण तरीही त्या गोळीचा नेम बरोबर लागला आणि निमिषार्धात ते घोरूल मरून पडलं,

डोंगरकडांवरून घरंगळत,छोट्या दऱ्या आणि दगड पार करत ते त्याच्या दोन साथीदारांजवळ येऊन पडलं.त्या दोन साथीदारांमुळे वाटेमधलं गवत दबल गेलं होतं.अशा पद्धतीने त्या दरीत ती तीन जनावर आमच्या पुढ्यात येऊन पडली. 


रायफलचा अशा पद्धतीने वापर झालेला कधीच बघितलेला नसल्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या त्या माणसांचे चेहरे बघणं मोठं आनंददायक होतं.त्या क्षणी सगळे जण जणू त्या नरभक्षकाला विसरले आणि तिन्ही घोरूल उचलून नेण्यासाठी गडबडगोंधळ करू लागले.


आमची ही मोहीम अनेक अर्थानी यशस्वी ठरली. घोरूलचं मांस मला सगळ्यांनाच देता तर आलंच,पण त्याचबरोबर सगळ्या गावाचा विश्वास जिंकता आला. माणसांना शिकारकथांमध्ये असलेलं औस्तुक्य कधीच कमी होत नाही.त्यामुळे माझ्याबरोबर आलेल्या तीन माणसांनी घोरूल सोलून त्याचे वाटे करताना आपल्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव दिला.मोकळ्या जागेत बसून नाश्ता करत असताना मी एका मैलावरून घोरूलला कशी गोळी घातली होती,माझ्या जादूच्या रायफलने घोरूलांना नुसतं मारलंच नव्हतं,तर माझ्या पायाशीदेखील कसं आणून टाकलं होतं याची वर्णनं ऐकून त्या तिघांच्या भोवती जमलेल्या गर्दीने टाकलेले सुस्कारेही मला ऐकू येत होते.


मला कुठे जाण्याची इच्छा होती आणि त्यासाठी किती माणसं सोबत लागणार होती,असं गावच्या प्रमुखाने मला दुपारच्या जेवणानंतर विचारलं.माझ्यासोबत शिकारीला आलेल्यांमधल्या दोघांची निवड तिथे चकरा मारणाऱ्या उत्साही लोकांच्या गर्दीतून मी केली. नरभक्षक वाघिणीने केलेल्या शिकारीची सगळ्यात अलीकडची दुर्दैवी घटना जिथे घडली होती,त्या जागेची पाहणी करण्यासाठी मी त्यांना घेऊन निघालो.


या डोंगराळ भागात हिंदू लोक राहतात आणि ते मृतदेहाचं दफन करतात.त्यांच्यामधल्याच कुणाला तरी नरभक्षक वाघाने अशा पद्धतीने मारलेलं असतं,तेव्हा मृत व्यक्तीचं दफन करण्यासाठी तिच्या नातेवाइकांना तिच्या शरीराचा थोडासा भाग - मग तो अगदी हाडाचा एखादा तुकडा का असेना मिळवणं क्रमप्राप्त असतं. त्या महिलेचा दफनविधी अजून व्हायचा होता.आम्ही त्या जागेवर जायला निघालो,तेव्हा तिच्या शरीराचा मिळेल तो भाग घेऊन येण्याची तिच्या नातेवाइकांनी आम्हाला विनंती केली.


मला अगदी लहानपणापासूनच वाचनाचा,जंगलातल्या खुणांचा अर्थ लावण्याचा छंद आहे.ती महिला जेव्हा मारली गेली होती,तेव्हा तिथे उपस्थित असलेले साक्षीदार मला भेटले होते,पण साक्षीदारांवर नेहमीच विसंबून राहता येत नाही.उलट जंगलातल्या खुणा याच घडलेल्या घटनेच्या खऱ्याखुऱ्या नोंदी असतात.घळीच्या बाजूने,झाडाच्या दिशेने आल्याने वाघीण इतरांना दिसू शकली नसण्याची शक्यता असल्याचं त्या ठिकाणी पोहोचल्यावर आणि जमिनीवर एक नजर टाकल्यावर माझ्या लगेचच लक्षात आलं. झाडाच्या खाली असलेल्या घळीत प्रवेश करून पाहणी केल्यावर मला जमिनीवर तिच्या पायांचे ठसे दिसले.ते खालच्या दिशेला असलेल्या दोन मोठ्या दगडांच्या दिशेने गेले होते.त्या ठशांवरून ती वाघीण असल्याचं आणि तिच्या आयुष्याचा सर्वोत्तम काळ संपून उतरणीचा सुरू झाल्याचं दिसून येत होतं.शिकारीच्या वेळी वाघीण दरीतून वर येऊन,झाडापासून साधारण दहा यार्ड अंतरावर दगडाच्या मागे थांबून,ती महिला झाडावरून खाली उतरण्याची वाट बघत राहिली होती. त्या महिलेची हवी होती तेवढी पानं सगळ्यांच्या आधी तोडून झाली होती.ती साधारण दोन इंची फांदीच्या आधाराने खाली उतरत असतानाच वाघीण सरपटत पुढे आली होती आणि मागच्या पायांवर उभं राहून तिने त्या महिलेचे पाय पकडले होते आणि ओढत तिला घळीत नेलं होतं.त्या दुर्दैवी महिलेने फांदीला किती घट्ट धरून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता,ते त्या फांदीकडे बघून समजत होतं.झाडाच्या खडबडीत सालीला तिच्या तळहाताच्या कातडीचा घासला गेलेला भाग लागला होता.

वाघिणीने तिला जिथे मारलं होतं, तिथे त्यांच्यामध्ये झालेल्या झटापटीच्या खाणाखुणा दिसून येत होत्या;साकळलेल्या रक्ताचा एक मोठा डाग दिसत होता.तिथून माग घेत आम्ही निघालो.

सुकलेले डाग दीपर्यंत आणि नंतर पलीकडच्या बाजूला गेलेले दिसत होते.दरीतून बाहेर पडल्यावर पुढे एका झुडपात ती जागा सापडली,जिथे वाघिणीने आपली शिकार खाऊन टाकली होती.


नरभक्षक वाघ वा वाघीण माणसाचं डोकं,हात आणि पाय खात नसल्याची एक लोकप्रिय समजूत आहे,पण ती चुकीची आहे. 


नरभक्षकांच्या खाण्यामध्ये व्यत्यय आणला नाही,तर ते रक्ताळलेल्या कपड्यांसह सगळं खात असल्याचं मी एका प्रसंगी बघितलं आहे.अर्थात,ती एक वेगळीच कहाणी आहे.तिच्याबद्दल पुन्हा कधीतरी !


या जागेवर आम्हाला त्या महिलेचे कपडे आणि काही हाड मिळाली.ते सगळं आम्ही आमच्यासोबत आणलेल्या स्वच्छ कापडात गुंडाळून घेतले.एकूण शरीराचा भाग म्हणून ती हाडं अगदी थोडी असली,तरी ती दफन विधीसाठी पुरेशी होती.आता या महिलेच्या अस्थी गंगामातेला अर्पण करता येणार होत्या.


चहा घेतल्यानंतर मी आणखी एका दुर्घटना स्थळाला भेट दिली.एका सार्वजनिक रस्त्यामुळे मुख्य गावापासून वेगळा झालेला तो काही एकरांचा परिसर होता.या जागेच्या मालकाने रस्त्यालगतच,पण डोंगरावर स्वतःसाठी एक झोपडी बांधली होती.त्याला चार वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा होता.तो,त्याची बायको,तिची धाकटी बहीण आणि त्याची दोन मुलं असे सगळे तिथे राहत होते.त्याची बायको आणि तिची बहीण एक दिवस सकाळी घरापासून थोडं वर, डोंगरावर गवत कापत असताना अचानक वाघीण तिथे आली होती आणि तिने त्या माणसाच्या बायकोला ओढून नेलं होतं.तिची धाकटी बहीण त्या वाघिणीमागे जवळजवळ १०० यार्डाचं अंतर हातात काठी उगारून, हवं तर मला घेऊन जा,पण माझ्या बहिणीला नेऊ नको.असं ओरडत धावत गेली होती.तिचं हे धाडसी कृत्य गावामधले लोक बघत होते.त्या मृत बाईला शंभरेक यार्डापर्यंत वाहून नेल्यानंतर वाघिणीने तो मृतदेह खाली ठेवला होता आणि तिच्या पाठलागावर असलेल्या तिच्या बहिणीकडे वळली होती.मोठ्याने डरकाळ्या फोडत वाघिणीने बहिणीच्या दिशेने उसळी मारताच बहीण मागे वळली होती आणि डोंगरउतारावरून वेगाने धावत,रस्ता ओलांडत गावाच्या दिशेने धावत सुटली होती.डोंगरावर काय घडलं होतं,ते तिला गावातल्या लोकांना सांगायचं होतं.त्यांनी तो सगळा प्रकार बघितला असल्याचं तिला माहीतच नव्हतं.प्रचंड वेगाने धावत आल्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता.ती प्रचंड घाबरली होती. 'काय आणि कसं सांगू' असं तिला झालं होतं.त्यामुळे तिचं सगळंच बोलणं असंबद्ध होतं.

त्यानंतर वाघिणीने ओढून नेलेल्या बाईची सुटका करण्यासाठी गावातली काही माणसं ताबडतोब बाहेर पडली होती.ती रिकाम्या हाताने परत येईपर्यंत या बहिणीची वाचा गेली होती.


मला ही सगळी गोष्ट गावात सांगण्यात आली होती.मी त्या झोपडीच्या दिशेने जाण्यासाठी डोंगर चढायला सुरुवात केली,तेव्हा ती बहीण कपडे धुवत होती.तिची वाचा जाऊन जवळजवळ वर्ष झालं होतं.तिच्या डोळ्यात दिसणारी बेदना वगळता,मला ती अगदी नॉर्मल वाटली.मी तिच्याशी बोलण्यासाठी थांबलो आणि तिच्या बहिणीला मारणाऱ्या वाघिणीच्या शिकारीसाठी मी आलो असल्याचं तिला सांगितलं.हे ऐकल्यावर तिने दोन्ही हात जोडले आणि माझ्या पायांना स्पर्श करण्यासाठी ती खाली वाकली.तिच्या या वागण्याने मला ओशाळल्यासारखं झालं,पण तिचं हे वर्तन मी समजू शकत होतो.मी तिथे नरभक्षक वाघिणीला मारण्याच्या उद्देशाने गेलो होतो खरा,


पण ती त्याच परिसरात दुसऱ्यांदा शिकार करत नसल्याची तिची ख्याती होती.एकदा खाऊन टाकलेल्या शिकारीकडेही ती पुन्हा परतत नसे.शेकडो चौरस मैल परिसरात तिचा वावर होता.त्यामुळे माझं उद्दिष्ट पूर्ण करणं,म्हणजे गवताच्या भाऱ्यामध्ये सुई शोधण्यासारखं होतं.


या मोहिमेसाठी नैनितालला येताना मी कितीतरी गोष्टी ठरवल्या होत्या.त्यांतली एक करायचा प्रयत्नही केला होता,पण ती माझ्या आवाक्याबाहेरची असल्याचं लक्षात आल्यामुळे पुन्हा ती करायला प्रवृत्त झालो नव्हतो.कुमाऊँमध्ये आलेली ही पहिलीच नरभक्षक वाघीण असल्यामुळे ज्याच्याशी सल्लामसलत करता येईल,असं तिथे कुणीही नव्हतं,पण तरीही काहीतरी करणंही आवश्यक होतं.त्यामुळे वाघीण दिसण्याची शक्यता असलेल्या ज्या ज्या जागा गावकऱ्यांनी सांगितल्या होत्या,त्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत धुंडाळत मी पुढचे तीन दिवस मैलोमैल फिरलो.


इथं मला थोडं विषयांतर करून प्रचलित झालेल्या एका अफवेचं खंडन करायचं आहे.ती अशी की,या आणि अशा अनेक प्रसंगी मी एका खेडुत बाईचा पोशाख करून जंगलात जातो,नरभक्षक वाघांना माझ्याकडे आकर्षित करून घेतो आणि कोयत्याने किंवा कुऱ्हाडीने त्यांना मारून टाकतो.काही वेळा मी एखादी साडी गुंडाळून गवत कापणं किंवा झाडावर चढून पानं तोडणं हे प्रकार केले आहेत,हे खरं आहे, पण या युक्त्या काही यशस्वी झालेल्या नाहीत.दोन प्रकरणांमध्ये मी ज्या झाडांचा आसरा घेतला होता, तिथपर्यंत वाघाने माझा पाठलाग केला होता.त्यांपैकी एकदा तो दगडामागे लपला आणि दुसऱ्या वेळी एका तुटून पडलेल्या झाडामागे लपून राहिला.या दोन्ही प्रकरणांमध्ये त्याने मला गोळी चालवण्याची संधी दिली नाही.


असो.मूळ विषयाकडे येऊ या.आता वाघिणीने हा परिसर सोडल्याचं दिसत असल्यामुळे पालीच्या लोकांची नाराजी पत्करून मी १५ किलोमीटर पूर्वेला असलेल्या चंपावतला जायचं ठरवलं.त्यासाठी सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात केली.

धुनघाट इथं नाश्ता केला आणि सूर्यास्तापर्यंत चंपावतला पोहोचलो.या प्रवासामधले सगळे रस्ते अतिशय असुरक्षित मानले जात होते.एका गावातून दुसऱ्या गावात किंवा एका बाजाराच्या ठिकाणाहून दुसऱ्या बाजाराच्या ठिकाणी जायचं असेल,तर लोक मोठ्या समूहाने जात. धुनघाटहून निघालो,तेव्हा आम्ही आठ जण होतो. वाटेतल्या गावांमधले लोक आम्हाला येऊन मिळत गेले आणि चंपावतला पोहोचलो,तेव्हा आम्ही ३० जण झालो होतो.

२२/४/२५

झाड म्हणजे नक्की काय ? What exactly is a tree? |

यांना झाड म्हणायचं का?


झाड नक्की कशाला म्हणायचे ? शब्दकोशाप्रमाणे जिच्या खोडातून फांद्या फुटून वाढतात अशी लाकडी वनस्पती म्हणजे झाड.म्हणजे वरच्या बाजूला वाढणारे खोड हा झाडाचा मुख्य भाग असायला हवा.ज्या वनस्पतींमध्ये असे नसते त्यांना 'झुडूप' म्हटले जाते.पण या व्याख्येत आकाराचे काय महत्त्व आहे? 


मेडिटेरेनियन भागातील जंगलांबाबत ऐकून मला थोडं खटकतं.झाडं कशी अजस्र असायला हवीत, ज्यांच्यासमोर आपण गवतातल्या मुंगी एवढे सामान्य वाटतो.पण कधी कधी पूर्ण उलटा अनुभव घेतो.जसा मला लॅपलॅन्ड मध्ये आला.इथल्या झाडांसमोर मला लिलिपुट राज्यामधील गलिवर असल्यासारखे वाटू लागले.


मी टुंड्रा भागातील खुजा झाडांबद्दल बोलत आहे.ही इतकी लहान असतात की चालतानाही ती तुडवली जातात.त्यांना साधारण आठ इंच वाढायलाही एखादं शतक लागतं.या वनस्पतीची विज्ञानात झाड म्हणून नोंद नाही आणि आर्क्टिक झुडपी बीच झाडांचीही नाही.या झाडाला दहा फूटांपर्यंत फांद्या येतात पण नजरेच्या खाली राहणाऱ्या या झाडाला गांभीर्याने घेतले जात नाही.पण हा निकष जर छोटे बीच आणि डोंगरी ॲश वनस्पतींना लावला तर त्यांनाही झाडे म्हणता येणार नाही. 


हरिण आणि इतर सस्तन प्राण्यांकडून या दोन्ही झाडांची भरपूर चराई होते त्यामुळे त्यांना जमिनीतून अनेक फुटवे फुटतात आणि एका झुडपासारखे दिसू लागतात. एका दशकामध्ये ही त्यांची जेमतेम वीस इंच वाढ होते.


आणि जर एखादे झाड कुऱ्हाडीने कापून टाकले तर? ते मरून गेलंय असं समजायचं का? सुरुवातीच्या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे जुनी खोडं काही शतकं त्यांच्या मित्रांच्या साहाय्याने आजही जिवंत अवस्थेत आहेत,त्यांना झाड म्हणता येईल का? आणि जर ते झाड नसेल तर मग त्यांना काय म्हणायचं? एखाद्या जुन्या खुंट्यातून नवीन खोड आले की अजूनच पंचाईत


अनेक जंगलातून हे असं होत असतं.युरोपमध्ये अनेक शतकं पानझडी झाडांची अगदी बुंध्यापासून कापणी होत असे.याचे लाकूड कोळसा बनविण्यासाठी काढले जात असे.आणि याच खुंट्यातून नवीन खोड वर येते. आज इथे असलेली पानझडी जंगलं अशीच तयार झाली आहेत.अशा छाटणीला 'कोपायसिंग' म्हणतात.ओक आणि हॉर्नबीमची जंगले कोपायसिंग मुळे तयार झालेली आहेत.या जंगलातून झाडाची छाटणी आणि त्यातून पुन्हा झाड फुटणे हे अनेक दशकं चालू आहे. यामुळे इथली झाडं प्रौढ अवस्थेतील उंची गाठू शकत नाही.त्या काळात युरोपमध्ये गरिबी होती.त्यामुळे हे लोक झाड वाढायची वाट न पाहता कोपायसिंग करीत असत.युरोपियन जंगलातून फेरफटका मारताना असे अवशेष सहज नजरेस पडतात.वेळोवेळी छटाई केलेल्या झाडांना बुंध्यातून अनेक खुरट्या फांद्या येतात आणि पालवी दाट होते.आता ह्या फांद्यांना काय म्हणावं ? ती तरुण रोपं आहेत का हजारो वर्ष जुनी झाडं ?


हा प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडलेला आहे,विशेषतः डालरना, स्वीडन इथे प्राचीन स्प्रूस वृक्षांवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना.डालरना येथील सर्वांत प्राचीन स्प्रूस झाडाची मुख्य खोडाभोवती एखाद्या सतरंजी सारखी सपाट झुडपी वाढ झाली आहे.ही सर्व वाढ एकाच झाडाची आहे आणि त्याच्या मुळांचं कार्बन १४ पद्धतीने डेटिंग म्हणजे वय काढले गेले आहे.कार्बन १४ हा अणुकिरणोत्सर्जन करतो आणि हळूहळू कुजतो. याचा अर्थ अवकाशात कार्बन १४ आणि इतर कार्बन यांचे गुणोत्तर (रेशो) बदलणार नाही.एखाद्या अविचल जैविक मालात (उदाहरणार्थ लाकडात) कार्बन १४ असला तर त्याचे विघटन चालू राहते पण नवीन अणुकिरणोत्सर्जित कार्बन मात्र जमा होत नाही.म्हणजेच त्यामध्ये जितका कमी कार्बन १४ तितकंच त्याचं वय जास्त.


संशोधनातून असे दिसले की,ते स्प्रूस ९५५० वर्ष जुने होते.त्यातली काही - फुटवे हे इतके जुने नसले तरीही शास्त्रज्ञांनी त्यांना जुन्या झाडाचा भाग मानले. 


आणि माझ्यामते हे अगदी बरोबर आहे.वयाचा अंदाज घ्यायला जमिनीवर असलेल्या वाढीचा विचार करण्यापेक्षा जमिनीखालचा भाग किती जुना आहे,हे लक्षात घेणे जास्त योग्य आहे कारण हे सगळं एकाच जिवाचा भाग आहे.

इतक्या शतकांचे हवामानाचे घाव या मुळांनीच झेलले आहेत.आणि वेळोवेळी मुळातूनच फांद्या फुटल्या आहेत.

मुळांना अनेक शतकांचा अनुभव आहे ज्याच्या आधाराने झाड आजपर्यंत जिवंत आहे. 


या स्प्रूसवर झालेल्या संशोधनामुळे जीवशास्त्रातील काही विचारसरणी बाद झाल्या आहेत.या अभ्यासाआधी स्प्रूस पाचशे वर्षांपेक्षा जास्त जगू शकते, हे कोणाला माहीत नव्हते.लोकांना वाटत होते की हा सूचीपर्णी वृक्ष स्वीडनमध्ये बर्फ कमी झाल्यावर म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वी दाखल झाला.आपल्याला जंगल आणि वृक्षांबाबत किती कमी ज्ञान आहे आणि या विश्वाची अजून किती गुपितं उलगडायची बाकी आहेत, याचं हे अनामिक झाड माझ्यासाठी प्रतीक आहे.


आता थोडं मुळांकडे वळू.हा झाडाचा सर्वांत महत्त्वाचा अवयव का बरं असेल? असं म्हणा की मुळ म्हणजे झाडाचा मेंदू.तुम्ही म्हणाल मेंदू ? हे जरा जास्तच होत नाहीये का? कदाचित असेलही पण आज आपल्याला माहिती आहे की झाडेही शिक्षण घेतात.याचा अर्थ असा की,हे ज्ञान त्यांना कुठेतरी साठवून ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी झाडांमध्ये अवयव असणार.हा अवयव नेमका कुठे आहे ते आपल्याला माहीत नाही पण मुळं हे काम अचूक करू शकतात.स्वीडन मधल्या त्या म्हाताऱ्या स्प्रूस वृक्षाला हे माहीत होतं की आपला जमिनी खालचा भाग हाच फक्त कायमस्वरूपी टिकणार आहे.मग तो ह्या शिवाय दुसरीकडे कुठे ज्ञानाचा साठा करेल? 


नवीन अभ्यासातून असेही दिसते की,झाडाच्या नाजूक मुळांच्या जाळ्यात अनेक आश्चर्यकारक गोष्टी घडल्या आहेत.


या जाळ्यातून झाडाच्या रासायनिक हालचाली चालू असतात,असे आता शास्त्रज्ञ मानतात.यात काहीच आश्चर्य नाही.मानवी अवयवांचे क्रियाकलापही रासायनिक संदेश वाहकांकडून नियंत्रित ठेवले जातात. मुळं जमिनीतले पदार्थ शोषून घेतात आणि ते झाडाला आणून देतात.आणि दुसऱ्या बाजूने प्रकाश संश्लेषणातून उत्पादित पदार्थांचे मुळांमार्फत बुरशी अवस्थेतील झाडांच्या साथीदारांना वाटप करतात. त्याचबरोबर आपल्या शेजाऱ्यांना धोक्याचे संदेशही पोचवतात.पण तरीही मुळांची बरोबरी मेंदूशी होईल का?आपण ज्याला मेंदू म्हणतो,त्यात मज्जातंतूंमार्फत होणारे संदेशवहनाचे कार्य असायला हवे आणि ते कार्य सुरळीत होण्यासाठी रासायनिक प्रक्रियेबरोबरच विद्युत आवेगांचाही वापर असायला हवा.आपल्याला झाडामधल्या नेमक्या याच क्रिया टिपता येतात. 


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,

अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन 


एकोणिसाव्या शतकातच आपल्याला हे शक्य झाले. गेल्या काही वर्षांत शास्त्रज्ञांमध्ये एक नवीन चर्चा चालू आहे.

झाडांना विचार करता येतो का? त्यांना बुद्धिमत्ता असते का?


बॉन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ सेल्युलर अँड मॉलिक्युलर बॉटनीमध्ये कार्यरत असलेले फ्रँटिसेक बलुसका आणि त्यांच्या बरोबरीच्या संशोधकांच्या मते,मुळाच्या टोकांशी मेंदू सारखे अवयव असतात.हे संदेश पोचवण्यात कार्यरत असतात,पण याव्यतिरिक्त तिथे जनावरात सापडणारे काही अणू आणि विशिष्ट प्रणालीही असतात.जेव्हा मुळांची वाढ होऊन पुढे सरकण्याची क्रिया चालू असते तेव्हा त्यांना काही उत्तेजनांची जाणीव होते.मुळं जेव्हा अशा संक्रमणाच्या क्षेत्रातून पुढे सरकत असतात तेव्हा त्यातून होणारा विद्युतप्रवाह या संशोधकांनी टिपला.पुढे सरकताना मुळाला जर विषारी पदार्थ,मोठे दगड किंवा दलदल लागली तर आपल्या वाढीमध्ये योग्य बदल करण्याच्या सूचना मुळाकडून झाडाला जातात.अशा परिस्थितीत वाढणाऱ्या मुळाचे टोक आपली दिशा बदलते आणि ते क्षेत्र टाळून पुढे जाते.


अशा वागणुकीतून झाडाची बुद्धिमत्ता,स्मरणशक्ती किंवा भावना दिसून येतात,असा वाद शास्त्रज्ञांमध्ये आज चालू आहे.याचे एक कारण म्हणजे जनावरातूनही अशा प्रकारच्या नोंदी केल्या जातात त्यामुळे झाड आणि जनावर यांच्यातले विभाजन धूसर होत जाईल,अशी भीती असू शकेल. 


पण मग काय झाले? त्यात एवढं भयानक काय आहे? शेवटी जनावर आणखी वनस्पती यातील भेद मुख्यतः स्वतःसाठी ते अन्नपुरवठा कसा करू शकतात यावरून असतो.वनस्पती प्रकाशसंश्लेषण करतात तर जनावरे इतर सजीवांना खातात.

आणि दुसरा मोठा फरक म्हणजे हाती आलेल्या माहितीचे विश्लेषण करून त्याचे क्रियेत रूपांतर होण्यास किती काळ लागतो,हा होय.मग याचा अर्थ असा होतो का की,जे सजीव संथगतीने जीवन जगतात त्यांना कमी लेखायला हवं? मला कधी कधी असं वाटतं की,जर आपल्याला वनस्पती आणि जनावरातील समानता निःशंकपणे दाखवता आली तर आपण वनस्पतींना जास्त मान देऊ !





२०/४/२५

करु विचार पुस्तकांचा / Think about books

कधी विचार केलाय का पुस्तकांचा आकार गोल किंवा त्रिकोणी का नसतो? कारण ऐकून तुम्हीही म्हणाल,वाह क्या बात है.


तुम्ही आतापर्यंत पुस्तकांचा आकार हा एकसारखाच पाहिला असेल.उभ्या,चौकोनी,आयताकृती आकाराची पुस्तके.पण पुस्तकांच्या या आकाराचा कोणता नियम आहे? की कोणती परंपरा? किंवा असे काय कारण असेल की पुस्तकांना आकार पूर्वीपासून तसाच आहे. याचा तुम्ही कधी विचार केलाय?आजकाल मोबाईल फोन्स,कारचे मॉडेल्स आणि रोजच्या वापरातील सर्वच वस्तुंच्या डिझाईनचे रोज एक्सपेरिमेंट केले जात असताना पुस्तकांबाबत आपण इतके गंभीर का? 


तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी कोणती ना कोणती पुस्तके वाचली असतीलच.त्यातील काही पुस्तके ही कंटाळवाणे तर काही हृदयाला स्पर्श करून गेली असतील.या सगळ्यामध्ये तुमच्या मनात कधी एक प्रश्न आलाय का? की पुस्तकांचा आकार हा एकसारखाच का असतो? पुस्तकं कधी गोल किंवा त्रिकोणी किंवा इतर कोणत्याच आकाराची का नसतात? आजकाल प्रत्येक गोष्टीत इतकी क्रिएटिव्ही वापरली जाते मग पुस्तकांचा आकार पूर्वीपासून तसाच का? चला जाणून घेऊया याचे खरे कारण नेमके काय…


◼️व्यावहारिक डिझाइन :


पुस्तकाचा आकार उभा किंवा आयताकृती असल्याने ते कपाटात ठेवणे,बॅगेमध्ये रोज कॅरी करणे किंवा एकावर एकवर ठेवणे सोयिस्कर पडते.पुस्तके गोल किंवा त्रिकोणी आकाराचे असले असते तर त्यांना सांभाळणे, कॅरी करणे थोडेसे कठीणच झाले असते.जरा कल्पना करा की पुस्तके गोलाकार असती तर ती पुस्तके बॅगेमध्ये कशी राहिली असती? जर पुस्तके त्रिकोणी असती तर त्या पुस्तकांचे कोपरे वाकले असते आणि लायब्ररीत पुस्तके ठेवायला जागा नसती तर काय झाले असते?


◼️छपाईचे वैज्ञानिक कारण :


छपाई मशिनमध्ये वापरल्या जाणाऱ्या मोठ्याला पेपर शीट्सचा आकार हा आयताकृतीच असतो.या पेपर्सना पुस्तकाच्या स्वरुपात कापून त्यांना दुमडण्याचा सर्वात सोयीस्कर आणि पेपर कमी वाया जाण्यासाठीची पध्दत देखील आयताकृती पेपर मुळेच शक्य आहे तर गोलाकार किंवा त्रिकोणी पुस्तके तयार म्हणजे जास्त वेळ खर्च आणि पेपर शीट्सचे जास्तीतजास्त नुकसान होण्यासारखं आहे.


◼️वाचनासाठी आकारही सोईस्कर हवा


जेव्हा तुम्ही पुस्तक उघडता तेव्हा तुमचे डोळे डावीकडून उजवीकडे आणि वरपासून खालपर्यंत असेच जातात. या वाचन पद्धतीसाठी आयताकृती पाने असणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.गोलाकार पानांवर मजकूर बसवणे आणि त्रिकोणी पानांवर मजकूर छापणे म्हणजे पानांवरची जागा वाया जाण्यासारखेच आहे.


प्राचीन काळी,लोक स्क्रोलवर आदेश (लांब पेपर रोल) लिहीत असत,परंतु हा आदेश वाचणे फार कठीण होते, रोल आदेश वाचणे फार कठीण होते,रोल पुन्हा पुन्हा उघडावा लागायचा.पण जेव्हा पुस्तकांचा शोध लागला तेव्हा आयताकृती स्वरुप सर्वात सोयीस्कर वाटले आणि आजही ते तसेच आहे.प्रोडक्शनपासून ते डिझाईनपर्यंत पुस्तके वाचायची नसतात तर त्यांचे डिझाईन करावे लागते, त्यांना छापावे लागते. छापून झाल्यानंतर ते बांधून विक्रेत्यांकडे पाठवायची असतात. ही संपूर्ण प्रक्रिया चौरस, आयताकार आकारात सर्वात सोपी आणि स्वस्त असते. हा आकार प्रकाशकांसाठी देखील सर्वात काॅस्ट-इफेक्टिव्ह असा असतो.- 


▪️संकलन : य।श।वं।त।वा।घ(नाना) 

सौजन्य : TV9 मराठी.


प्रो.डॉ.साताप्पा सावंत यांच्या व्हाट्सअप माध्यमातून माझ्यापर्यंत आलेले…


बड्डे... बिड्डे.... अन् रिटर्न गिफ्ट...


आज १७ एप्रिल माझा जन्मदिवस ! 


ज्यांना माहित होते,त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या,या सर्वांचा मी ऋणी आहे ! 


आजही मी नेहमी सारखाच भिक्षेकऱ्यांच्या सेवेसाठी ठरलेल्या स्पॉटवर गेलो,तिथे एक वेगळा सुखद धक्का बसला. श्री.अमोल शेरेकर,स्वतः दिव्यांग असून आपल्या सोहम ट्रस्टमध्ये अन्नदान प्रकल्प पहात आहेत.यांच्या निमित्ताने अनेक दिव्यांग कुटुंबांनी मला त्यांच्यात सामावून घेतले आहे. 


माझ्या स्पॉटवर मी पोचलो,मोटरसायकल स्टँड वर लावताना अचानक माझे पाच-पन्नास दिव्यांग बंधू-भगिनीं समोर दिसले. 


कुणी कुबडी घेऊन आले होते,कोणी काठी,तर कोणी व्हीलचेअरवर. 


नेमकं झालंय काय मला कळेना... 


त्यांच्याजवळ जाऊन मी भांबावून विचारले,'अरे काय झालं ? तुम्ही इथे सर्व कसे ?' 


सगळे एका सुरात म्हणाले, हॅपी बड्डे सsssर...


अच्छा असं आहे होय ? घाबरलो की रे मी... असं म्हणत हसत सर्वांचे हात हातात घेतले. 


ज्यांना हातच नाहीत त्यांच्या पायांना स्पर्श केला...!  


कोणाला पाय नाहीत,कोणाला हात नाहीत... याही परिस्थितीत कुबड्या काठ्या व्हीलचेअरवर हि मंडळी कुठून कुठून कसरत करत,बस / रिक्षा / चालत आली होती... 


हे प्रेम,हि माया कुठून आणि कशी उत्पन्न होत असेल ? 


मतिमंद म्हणून ज्यांच्यावर शिक्का बसला आहे अशी तीन मुलं माझ्या कमरेला विळखा घालून,हॅपी बड्डे ... हॅपी बड्डे... म्हणत नाचत होती... नव्हे मला नाचवत होती...! 


कसं म्हणायचं यांना दिव्यांग ? 

कसं म्हणू यांना मतिमंद ? 


समुद्रात / नदीमध्ये विसर्जित केलेली मूर्ती...


कालांतराने या मूर्तीचे हात,पाय, मुकुट आणि चेहऱ्यावरचा रंग अशा अनेक बाबी निसर्गामध्ये विलीन होतात.पण अशी हात नसलेली,पाय नसलेली,मुकुट नसलेली मूर्ती दिसूनही श्रद्धा असलेल्या माणसाचे हात नमस्कारासाठी आपोआप जुळतात... ! 


वेगवेगळ्या समुद्रातून,नदी मधून,तलावामधून अशा सर्व भंगलेल्या मूर्ती आज माझ्यासमोर प्रत्यक्ष येऊन,मूर्त स्वरूपात मला आशीर्वाद द्यायला माझ्यासमोर उभ्या होत्या...


कुणी दिव्यांग म्हणो... कोणी मतिमंद म्हणो.... माझ्यासाठी या भंगलेल्या,परंतु पवित्र मूर्तीच आहेत.... 


भंगलेल्या या पवित्र मूर्तींसमोर मग मी नतमस्तक झालो... ! 


मी कुठल्याही मंदिर मशीद गुरुद्वारा चर्चमध्ये गेलो

नाही... तरी मला भेटायला,आज द्येवच माज्या दारात आला,माऊली.... !!! 


माझ्या या सर्व देवांनी केक आणला होता,माझे स्नेही डीडी (फेसबुकचा आणि मनाने अत्यंत श्रीमंत असलेला राजा,श्री धनंजय देशपांडे) हे कानी कपाळी ओरडून सांगतात,केक नका कापू,कलिंगड कापून वाढदिवस साजरा करा... !


माझा तोच विचार होता,परंतु या सर्वांनी येतानाच खूप महागाचा केक आणला होता,आता केक नको,कलिंगड कापू असं म्हणून त्यांचा हिरमोड करण्याचं माझं धाडस झालं नाही.... Next time नक्की DD.


तर या सर्व गोष्टी आमच्या भिक्षेकरी आजी-आजोबा, मावश्या,बंधू भगिनी यांच्यासमोरच सुरू होत्या. 


डाक्टरचा आज वाडदिवस हाय,हे समजल्यानंतर आम्हाला का नाही सांगितलं म्हणून त्यांनी आधी माझी खरडपट्टी काढली. 


आगं हो,आरे हो... सांगणारच होतो;म्हणत वेळ मारून नेली. 


मी आमच्या लोकांना मग वैद्यकीय सेवा द्यायला सुरुवात केली.बाजूला सहज लक्ष गेलं,अनेक आज्या मावश्या आणि माझे भाऊ एकत्र येऊन, गंभीर चेहऱ्याने काहीतरी खलबतं करत होते.भारताची अर्थव्यवस्था, अमेरिकेने भारतावर लादलेले कर,कोसळलेला शेअर बाजार,महागाई अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते गहन चर्चा करत असावेत;असं समजून हसत मी माझं काम चालू ठेवलं.माझं काम संपलं... मी उठलो, पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालो,इतक्यात एक मावशी आली आणि दरडावणीच्या सुरात म्हणाली, 'वाडदिस हूता तर आदी आमाला का नाय सांगटलं,पयलं ह्याचं उत्तर दे...


'आगं...'


'आगं आनं फगं करू नगो,हुबा ऱ्हा...' 


रोबोट प्रमाणे तिने जिथे सांगितले तिथे मी उभा राहिलो. 


यानंतर एक भला मोठा हार माझ्या गळ्यात घालण्यात आला,पेढ्यांचे चार पाच बॉक्स समोर आले. 


काहीतरी गोड द्यायचं म्हणून कोणी उसाचा रस आणला,कोणी लस्सी,कुणी गुलाबजाम ज्याने त्याने आपापल्या परीने काही ना काहीतरी आणलं होतं. 


कुणी पारले बिस्कीट,कुणी गुड डे बिस्किट,कुणी वडापाव,कुणी केळी,तर कोणी प्रसादात मिळालेला शिरा... 


प्रत्येकाला वाटत होतं त्यांनी आणलेली प्रत्येक गोष्ट मी संपूर्णपणे खाऊन इथेच चट्टामट्टा करावी...


मी लटक्या रागाने म्हणालो.... 


'म्हातारे तु सहा केळी आणली,बाबांनं चार वडापाव आणले,

मावशीनं पारले चे सहा पुडे आणले...पाच पेढ्याचे बॉक्स आणलेत....एकदाच खाऊ घालून काय मारता का काय मला वाढदिवसाला... ?' 


ती म्हणाली 'खा रं ल्येकरा,आमी भिकारी हाव,भिकारी म्हणून,आमाला कुनी बी कायबाय देतंया, पण नौकरी, कामधंदा सोडून तू आमच्यासाठी एवड्या खस्ता खातो... तू काय कुटं कामाला जात न्हायी.... मंग तुला तरी कोन देइल... ? 


खा रं माज्या सोन्या.. तुला माज्या हातानं सोन्याचा न्हाय... पन येवडा तरी योक घास भरवू दे... खा रं... माज्या बाळा... आ कर. . आ कर...  हांग आशी...' 


आम्हाला कुनी बी देईल,तुला कोण देणार ? 


या वाक्याने अंगावर काटा आला... 


ती मला स्वतःच्या तराजूत तोलते... 


स्वतःज्या पायरीवर उभी आहे त्याच पायरीवर ती मला पाहते...


ती मला सुद्धा भिक्षेकरी समजते... 


स्वतःला जी दुःख आहेत तीच दुसऱ्याला असतील हे ती समजते... 


दुसऱ्याशी  ती एकरूप होऊन जाते... 


अद्वैत म्हणजे आणखी काय असतं ??? 


स्वतःला ठेच लागली की, आपल्या डोळ्यातून पाणी येतं,हि असते ती वेदना.... 


दुसऱ्याला ठेच लागल्यावर मात्र आपल्या डोळ्यातून पाणी येतं,तेव्हा होते ती संवेदना... ! 


आपण स्वतःच्या वेदना कुरवाळतो... 


ती दुसऱ्याच्या संवेदना जपते...


गरीब कोण .... श्रीमंत कोण.. ? 


इथे माझे डोळे दगा देतात...


भर उन्हाळ्यात डोळ्यातून मग पाऊस कोसळतो... ? 


तिच्याच पदराला मग मी डोळे पुसायला खाली वाकतो... 


'का रडतो रं...?' ती माऊली विचारते


'कुठे काय ?  मी कुठे रडतोय ?  घाम पुसत होतो...' हुंदका आवरून मी तिला स्पष्टीकरण देतो. 


'डोळ्याला कुठे घाम येतो बाळा...?' कातरलेल्या आवाजात ती बोलते... 


तीच्या पदराला डोळे पुसायला वाकलेला मी.... 


आता माझ्या पाठीवर अश्रूंच्या धारा बरसतात... 


'मावशी आता तु का रडते ?' मी मान वर करून विचारतो


'तुज्यागत माज्या बी डोळ्यांना घाम आला बाळा ....' ती पदराने डोळे पुसत हसत बोलते. 


फसवा फसवीच्या या खेळात आम्ही रोज फसतो.... रोज रोज फसतो...आणि आपण फसलोच नाही असं दाखवत पुन्हा हसतो पुन्हा पुन्हा हसतो ! 


तर,इतक्या महागाचा हार आणला,पेढे आणले... 


अच्छा,मघाची गहन चर्चा वर्गणीसाठी चालू होती,या वर्गणी मधून हार पेढे आणि इतर साहित्य आणले गेले...


मी माझ्या लोकांना म्हणालो, 'हा खर्च करायची काय गरज होती ? ऋण काढून सण करणे मला पसंत नाही... ' मी माझी नाराजी मोठ्या आवाजात बोलून दाखवली. 


ए आव्वाज खाली... 

शांत बसायचं गप गुमान...  

सांगटले तेवडंच करायचं... 

आज लय शान पना करायचा नाय... 


माझ्या वेगवेगळ्या माणसांकडून,वेगवेगळ्या धमकी वजा प्रेमळ सूचना येत राहिल्या... 


भिजलेल्या मांजरागत,भेदरून मी सर्व ऐकत राहिलो... ते सांगतील ते करत राहिलो.


यानंतर माझ्या लोकांनी रस्त्यावर माझं औक्षण केलं... 


एकाच वेळी उसाचा रस,लस्सी,पाणी,ताक,नीरा,लिंबू सरबत,

गुलाबजाम (पाकातले आणि कोरडे),पेढे (खव्याचे/  कंदी /साखरेचे /कमी साखरेचे) केक, वडापाव,समोसा,प्रसादाची खिचडी,शिरा (पायनॅपल/ साधा शिरा /कमी साखरेचा शिरा) या सर्व बाबी पोटात घेऊन मी दिवसभर गर्भार बाईसारखा कमरेवर हात ठेवून मिरवत आहे. 


माझ्यासाठी जे पार्ले बिस्कीट,गुड डे बिस्कीट,शिरा, केळी गिफ्ट म्हणून मिळाली होती,ती सर्व एका बॅगेमध्ये माहेरी आलेल्या मुलीला,सासरी जाताना आई पिशवीत घालून देईल तशा पद्धतीने भरून दिलं. 


आज खूप लोकांनी विचारलं डॉक्टर आज काय विशेष ? हो... आज एक हात आणि पाय निसर्गात विलीन झालेली नवरा बायकोची मूर्ती भेटली. 


त्यांची नऊ वर्षांची मुलगी धडधाकट आहे,सुदृढ आहे, गोड बाळ आहे,शिकायची इच्छा आहे. 


मी या दिव्यांग मूर्तीला विचारलं मी काय करू शकतो ? 


ते म्हणाले आमचे आयुष्य संपले आहे,मुलीला शिकवा... 


आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी या दिव्यांग मूर्तींना वचन दिले आहे,'आज पासून ही पोरगी माझी,जोपर्यंत तिची इच्छा आहे तोपर्यंत मी तिला शिकवेन.मी जर जिवंत असेन,तर बाप म्हणून कन्यादान करून,तिचे लग्न सुद्धा लावून देईन.'


या वेळी आई बापाच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले.... 


माझ्यासारख्या पन्नास वर्षाच्या माणसाच्या पदरात, निसर्गाने वाढदिवसाच्या निमित्ताने एक पोरगी घातली.... 


यार,वाढदिवस वाढदिवस.... सेलिब्रेशन सेलिब्रेशन म्हणजे अजून दुसरं काय असतं ? 


आपल्या वाढदिवशी आपलं अपत्य जन्माला यावं.... 


आपला आणि तिचा बड्डे सेम टु सेम दिवशी असावा, याहून भाग्य ते काय... ??? 


एका मुलीचा बाप होऊन आज माझा वाढदिवस साजरा झाला !!! 


साला आज मैं तो बाप बन गया.... ! 


मी आता निघालो. 


पारले,गुड डे,खिचडी,शिरा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींची माझी बॅग तयार होती. 


बॅगेचे वजन असेल अर्धा ते एक किलो... ! 


एक आजी मध्येच आली आणि म्हणाली,हे पैसे ठेव आणि जीवाला वाटेल ते घेऊन खा...


ती वीस रुपयांची नोट होती... ! 


नाईलाजाने उचलला जातो तो बोजा...  .

दुसरे डोक्यावर टाकतात तो भार...  

आपणहून आपल्या माणसांचं उचलतो ते वजन... ! 


रोज शंभर ते सव्वाशे किलो वजनाचं साहित्य घेऊन या कडक उन्हाळ्यात मी रस्त्यावर फिरतोय... 


मला दिलेल्या गिफ्ट ने ही भरलेली बॅग मात्र उचलताना, आज ती मला अनेक पटींनी वजनदार जाणवली... !  


या बॅगेचे वजन तरी कसं करावं ? 


फुलांचं वजन होतं माऊली,सुगंधाचं वजन कसं करायचं ??? गिफ्टच्या बॅगेचं वजन होईल सुद्धा,पण प्रेमाच्या या भावनांचं वजन करण्यासाठी मी कुठला वजन काटा आणू  ? 


आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करताना दरमहा पाच लाख रुपये पगार घेत होतो,बँकेतून पैसे काढून,पाच लाख रुपये एका खिशात सहज मावायचे.... 


"जीवाला वाटेल ते घेऊन खा"...म्हणणारी वीस रुपयांची नोट मात्र आता खिशात बसेल,एवढा मोठा खिसाच आता माझ्याकडे नाही,माऊली... !!!


काय करावं ? कसं करावं ? माझ्याकडे उत्तर नाही... ! 


आज ती किलोभर बॅग आणि ती वीस रुपयांची नोट खूप खूप वजनदार भासली... !


रिटर्न गिफ्ट द्यायची हल्ली प्रथा सुरू झाली आहे... 


मला जे माझ्या माणसांकडून गिफ्ट मिळाले त्या बदल्यात मी त्यांना रिटर्न गिफ्ट काय देऊ ? 


काय देऊ...  काय देऊ.... 


अं... काय देऊ... ??? 


Ok... 


ठरलं....


१७ एप्रिल २०२५ नंतर माझं जे काही आयुष्य उर्वरित आहे,ते माझ्या भीक मागणाऱ्या लोकांना माणसात आणण्यासाठी,जे काही मला करावे लागेल,ते करण्यासाठी माझं संपूर्ण आयुष्य त्यांना समर्पित... !!! 


यापेक्षा वेगळं माझ्याकडे रिटर्न गिफ्ट नाही...!!! 


आपले स्नेहांकित,डॉ.अभिजीत आणि डॉ.मनीषा सोनवणे,डॉक्टर फॉर बेगर्स,सोहम ट्रस्ट पुणे


१८/४/२५

चीनची मागणी,गोव्यातील खणणी,Demand from China,mining in Goa

देशाच्या अर्थव्यवस्थेचे दोन मोठे आधारस्तंभ आहेत - रस्ते,धरणे,

इमारती बांधणे आणि खाणी खणणे.आपण खणलेले बहुतेक सगळे खनिज कच्चा माल म्हणून निर्यात करतो,बहुतांश चीनला.

चीनकडून खनिजांना विशेषतःलोखंडाला गेली दहा वर्षे भरपूर मागणी आहे. शिवाय चीन आता लोखंडाचे कमी प्रमाण असलेले खनिजही वापरू शकते.तेव्हा खनिजाची मागणी, त्यातून मिळणारा फायदा चिक्कार वाढला आहे आणि गोव्याचे खनिज उत्पादन गेल्या दहा वर्षात एकदम तिप्पट,कदाचित जास्तच फुगले आहे.कदाचित जास्त म्हणणे भाग आहे,कारण नक्की किती उत्पादन होत आहे.नवीन खणण्यातून,जुने कमी प्रतीचे खनिज जे राड्यारोड्यांच्या ढिगाऱ्यात होते,त्यातून काढून,

ह्याचा काहीही हिशोब ठेवला गेलेला नाही.अगदी उघड आहे की मुद्दामच नाही.गोव्यात सरकार केवळ खाण व्यावसायिकांना वर्षअखेर आकडे पुरवा असे सांगते. अधिकृतरीत्या कोणतीही नोंद ठेवली जात नाही,खाणींच्या फाटकांशी नाही,राडा-रोडा नव्याने उकरला जातोय तेथे नाही,खनिज ट्रकांवर लादले जाते,तेथे नाही,खनिज नदीने वाहतूक करणाऱ्या तराफ्यांवर लादले जाते तेथे नाही,खनिज बंदरात गलबतांवर चढवले जाते तेथेही नाही.

इंडियन ब्युरो ऑफ माइन्सची सर्व खाणींवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आहे.राज्य सरकारच्या खनिज खात्याची पण आहे.

कोणीही बजावली नाही.कधीच बजावली नाही.गोव्याने नुकताच स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.ही पन्नासही वर्षे आंधळा दळतंय,कुत्र पीठ खातंय अशी गुजरताहेत.


खाण मालकांनी यथेच्छ उकळाउकळी,लुटालूट, फुकटबाजी,

फसवेगिरी करायची आणि राज्यकर्त्यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या,शासकानी-केंद्रातल्या आणि राज्यातल्या त्याकडे डोळेझाक करायची अशी प्रथाच पडली आहे.


म्हणतात की जेव्हा गोवा स्वतंत्र होण्याआधी भारत सरकारने गोव्याची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला,तेव्हा खनिजाच्या निर्यातुन मिळणाऱ्या पैशातून खान मालकांनी पोर्तुगीज अमंलाचा बचाव केला.म्हणून साला झारचे हुकूमशाही पोर्तुगीज सरकार त्यांच्या बाजूने होते.मग लोकशाही आल्यावर पैशाच्या जोरावर खान मालकानी सरकार मुठीत ठेवले.


पहिल्यापासून आतापर्यंत पंचायत राज्य स्थापन झाल्यावर त्याही सरपंच-सदस्यांना जाळ्यात ओढत.मी पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाचा अध्यक्ष म्हणून काम पाहात असताना एक पूर्ण दिवस वेगवेगळ्या खाणींच्या मालकांशी - व्यवस्थापकांशी चर्चा करण्यात घालवला. त्यातले अनेक जण स्पष्ट म्हणाले,चीनकडून अलीकडे मागणी खूप वाढून भाव कडाडल्यावर आम्हाला जो बेसुमार पैसा मिळायला लागला आहे,तो अगदी शिसारी आणण्याजोगा आहे.ह्या पैशामुळे साऱ्या गोव्याची नीतिमत्ता पार बिघडली आहे.अद्वातद्वा काम केल्याने शेतीचे नुकसान होते,रस्त्यावरच्या अचाट वाहतुकीमुळे खूप अपघात होतात,पण गावातून तक्रारीचा सूर उमटू दिला जात नाही.प्रत्येक पंचायत सदस्याला वर्षाला एक लाख,सरपंचांना पाच लाख,विधानसभा सदस्यांना दर खनिजाच्या ट्रकमागे शंभर रुपये,लोकसभा सदस्यांना, मंत्र्यांना कोटीच्या हिशोबात लाच दिली जाते. पोलिसांना,इतर शासकीय अधिकाऱ्यांना वेगळीच.शिवाय ह्यातले अनेक अधिकारी स्वतःट्रकांचे बेनामी मालक आहेत.अनेक पंच-सरपंचांचे स्वतःचे ट्रक आहेत. त्यांना आमच्यामुळे भरपूर प्राप्ती आहे.सगळे एकसुराने आमच्या बाजूने बोलतात.


एका महिला सरपंचांना मी मुद्दाम त्यांच्या घरी जाऊन भेटलो.त्याच दिवशी सकाळी वर्तमानपत्रात त्यांचे छायाचित्र पाहिले होते.

नमस्कार करून एका जाहिरातीद्वारे त्या आवाहन करीत होत्या गोव्यात बेकायदेशीर खाणकाम चालू असेल तर ते तातडीने कायदामान्य करून टाका.असे सगळे खाणमालकांचे हस्तक गर्दी करून शाह आयोगाने बोलावलेल्या जनसुनावणीला गेले.इतर कोणालाही त्यांनी बोलू दिले नाही.त्यांचे कमनशीब.शाह आयोगाने अशा जबरदस्तीने खाणमालकांनी जनसुनावणीचा विपर्यास केला असे ताशेरे ओढले.गोव्यातील जनता एकमुखाने खाणींच्या बाजूची आहे असा निष्कर्ष काढला नाही.


पहिली काही वर्षे खनिज कुदळींनी खाणले जात होते. अनेकांना रोजगार मिळत होता.पर्यावरणावरही प्रभाव बेताचा होता.पण जसजसे यांत्रिकीकरण झाले, खननाचा वेग वाढला,तसतसा दुष्परिणाम जाणवू लागला.मग विरोधही जागृत झाला.डिचोळी नदीच्या, तिच्या खांडेपारसारख्या उपनदीच्या काठावर खनिजांचे ढीग रचले जाऊ लागले.त्यांनी धूप होत राहून नदी गाळाने भरली,पात्र उथळ झाले.


परिणामी १९८१ साली एका प्रचंड पुराने डिचोळी गाव गिळले.लोक आणखीच जागरूक झाले.जोरात विरोधात उतरले.रस्त्यांवर दांडगी निदर्शने झाली.गोवा फौन्डेशन

सारख्या संस्था हा विषय रेटून धरायला लागल्या.१९८० सालीच वनसंरक्षण विधेयक मंजूर झाले.


सरकारी जंगलांवरील आक्रमणांचा लगाम खेचला जाऊ लागला.

पण लोकांना जाणवले की हे पुरेसे नव्हते. देशात खूपसे उत्तम जंगल सरकारी कक्षेबाहेर होते, त्यालाही संरक्षण मिळणे अत्यावश्यक होते.ह्या कळकळीतून १९९६ साली सुप्रसिद्ध गोदावर्मन खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय देऊन सर्व देशभर सर्व वनाच्छादित जमिनीची पाहणी करण्याचा आदेश दिला.


गोवा मोठ्या प्रमाणावर वृक्षराजीने झाकलेला आहे. ह्यातली बरीच भूमी खाजगी आणि अधिक प्रमाणात गावकरीची भूमी आहे.ही गावकरी मालकी भारतात एकेकाळी सर्वत्र प्रचलित असलेल्या सामूहिक भूव्यवस्थापनाचा एक लक्षणीय नमुना आहे. पोर्तुगीज-इंग्रज अमंल सुरू होण्यापूर्वी देशभर जंगल भूमी,तशीच शेतजमीनही सार्वजनिक व्यवस्थापनाखाली होती.राजे लोकांकडून कर नक्कीच उकळायचे,पण तो शेतीच्या उत्पादनातील काही हिस्सा,सर्वांनी मिळून द्यायचा,अशा स्वरूपात होता.जमिनीवर खाजगी मालकी,पैशांच्या रूपाने द्यावयाचा कर,जमिनीची खरेदी-विक्री ही व्यवस्था नव्हती.इंग्रजांनी ह्यात आमूलाग्र बदल घडवून आणले.त्यांच्या नव्या रोख पैसा - कायदा-कागदपत्रांच्या जमान्यात मूठभर सुशिक्षित उच्चवर्णीय खूप प्रभावी बनले.साऱ्या शेतजमिनी त्यांच्या कब्जात गेल्या.बहुसंख्य शेतकरी वर्ग त्यांची कुळे बनला,नागवला गेला.जोडीला सामूहिक वनजमिनी,माळराने सरकारच्या ताब्यात गेली. वनजमिनींवर जंगल खात्याचे अधिराज्य आले.ह्यातून शेतकरी कंगाल झाला ह्याचे हृदयद्रावक वर्णन जोतिबा फुल्यांच्या शेतकऱ्यांचा असूडमध्ये वाचायला मिळते.


गोव्यात सामूहिक जमिनी बऱ्याच प्रमाणात गावकरी जमिनी अथवा पोर्तुगीज भाषेत कुमिनिदाद जमिनी म्हणून लोकांच्या हातात राहिल्या.त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगल सुरक्षित राखले गेले.गोव्यात खूप दूरवर मांडवीसारख्या नदीत भरतीबरोबर खारे पाणी पोचते. ह्या नदीकाठच्या खाजण जमिनींचे खास खाऱ्या पाण्यात टिकून राहणारी वाणाची भातशेती व पावसाळ्यानंतर झिंगे-मासोळीचे उत्पादन अशी सामूहिक गायरानांची,सामूहिक खाजण शेतीची जी पोर्तुगीजांनी,स्वतःच्या फायद्यासाठी,लोकसहभागी व्यवस्था लावून दिली होती,ती गोवा स्वतंत्र भारताचा भाग झाल्यावर साहजिकच कोलमडली.गोव्यात आता आलेले शासक गोव्यात उर्वरित भारतात इंग्रजांनी बसवून दिलेली व्यवस्था अमलात आणण्यामागे लागले. त्यांनी गोव्यातली वेगळी रचना समजावून घेऊन, काहीतरी तिथल्या परिस्थितीला अनुरूप असे करावे असा विचारही केला नाही.म्हणून गावकरी वनजमिनीची मालकी,व्यवस्थापन,सगळेच मोठ्या गोंधळात पडले.


गावकरी जमिनीच्या गोंधळाबरोबरच पोर्तुगीजांनी खाणमालकांना दिलेल्या खाणपट्ट्यांच्या हक्काबद्दलही प्रचंड गोंधळ उडाला.

पोर्तुगीजांनी खाणींवर अनंत काळाची मालकी दिली होती.पण भारतीय खाण कायद्यांप्रमाणे खाण चालक असतात,खाण मालक नाहीत.त्यांना मर्यादित काळापर्यंत खाणीचे उत्खनन करायची परवानगी असते भाडेपट्टा असतो.तेव्हा भारत सरकारने साहजिकच गोव्यातील खाणजमिनीची कायम मालकीची ही प्रथा बदलली असा प्रस्ताव आणला. गोव्यातल्या खाणमालकांनी ह्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आणि दशकानुदशके हे घोंगडे भिजत पडले आहे.जरी न्यायालयाने भारतीय खनिज कायद्याप्रमाणे सर्व कारभार चालावा असा निर्णय दिला आहे.तरी अपिले आणि अनेक इतर भानगडींतून गोंधळ कायम राखला गेला आहे.तेव्हा १९८० चा वन संरक्षण कायदा,१९८६ चा पर्यावरण संरक्षण कायदा,नंतर १९८६ च्या पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत केलेली पर्यावरणातील आघातांच्या परीक्षणाबद्दलची तरतूद हे सगळे गोव्यात कसे अमलात आणायचे,ह्यावर वाद चालू राहिलेले आहेत.१९८० च्या वन कायद्याच्या आधारावर १९९६ साली गोदावर्मन कज्ज्यात सर्वोच्च न्यायालयाने देशभर सरकारी राखीव जंगलाबाहेरच्या जमिनीची पाहणी करावी व या सगळ्याच वनजमिनीला संरक्षण द्यावे असा निवाडा दिला.


गोव्यातली खूपशीच वनजमीन गावकरीची किंवा खाजगी होती.तिची पाहणी,नोंदणी आवश्यक होती.पण ही वेगवेगळ्या हितसंबंधाच्या आड येत होती.म्हणून गोव्यातली वन जमिनीची पाहणी अर्धवट झाली आहे.ह्या अस्पष्टतेचा फायदा घेऊन अनेक गैरप्रकार राबवले जाताहेत.


ह्यावर कारवाई व्हावी म्हणून गोवा फौन्डेशन ही सेवाभावी संस्था जोरदार खटपटीत आहे.त्यांना आता आणखी एक संदर्भ आहे.तो म्हणजे २००२ साली राष्ट्रीय वन्य जीव सल्लागार मंडळाच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने ह्यांच्या परिसरातील दहा किलोमीटर परिघातील प्रदेशाला संवेदनाशील परिसरक्षेत्र म्हणून संरक्षण द्यावे असा सर्वानुमते मंजूर केला गेलेला ठराव. पण असे संरक्षण दिले तर आपला बेलाशक होणारा फायदा आटेल अशी भावना असणारे केवळ गोव्यातले खाणचालकच नाहीत,तर देशभर अनेक उद्योजक आहेत.ह्या सगळ्यांचे लागेबांधे राजकारण्यांशी, शासकांशी आहेतच आहेत.त्यामुळे हा ठराव मंजूर झाल्यानंतर इतक्या -अकरा वर्षांत - संपूर्ण देशात चारशेवर अभयारण्ये राष्ट्रीय उद्याने असून ज्या राज्यात वनभूमी अगदी मोजकी आहे - अशा राज्यातल्या एका तलावकेंद्रित अभयारण्यात तेवढा अमलात आला आहे.


हा ठराव अमलात आणावा म्हणून गोवा फौन्डेशनने न्यायालयात धाव घेतली.आपल्या अस्मानी सुलतानशाहीत दुर्दैवाने हेच चालते.

नेत्यांनी - बाबूंनी बेदकारपणे कायद्यांची पायमल्ली करायची,मग नागरिकांनी न्यायालयाकडे दाद मागायची.


'वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन


सुदैवाने न्यायव्यवस्था बऱ्याच अंशी सचोटीने वागते,म्हणून देशात स्वातंत्र्याच्या लोकशाहीच्या उषःकाली पसरलेले आशेचे किरण बेबंदशाहीच्या,झोटिंगशाहीच्या काळरात्रीत लुप्त झालेले नाहीत.


जनहित याचिकांच्या,माहिती हक्काच्या मशालींनी प्रकाश तेवत ठेवला आहे.तर गोवा फौन्डेशनच्या अर्जावर शासनाने उत्तर दिले की दहा किलोमीटरचे संवेदनशील परिसरक्षेत्र काही व्यवहार्य नाही. 


उदाहरणार्थ,आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला सगळीकडून मुंबई शहराने वेढलेले आहे;तेव्हा प्रत्येक अभयारण्याची,राष्ट्रीय उद्यानाची स्वतंत्र पाहणी करून, तेथे तेथे स्थल कालानुरूप निर्णय घेतला पाहिजे.हे तर ठीक आहे.सब घोडे बारा टक्के शक्य नाही.तेव्हा न्यायालय म्हणाले,सर्वदूर ह्यानुसार संवेदनशील परिसर क्षेत्राच्या मर्यादा निश्चित करा;त्याआधी जर संरक्षित प्रदेशांपासून दहा किलोमीटरच्या आत खाणकाम, मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे असे काही हस्तक्षेप करावयाचे असतील तर राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या कार्यकारी समितीची नेटकी परवानगी मिळवूनच करता येतील.हा झाला २००५ चा न्यायालयीन निर्णय,ह्यानंतर गोव्यात अशा दहा किलोमीटरच्या आत येणाऱ्या अनेक खाणींना केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय परवानगी देत राहिले -राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या कार्यकारी समितीची परवानगी न विचारता,न पुसता.ही स्वच्छ नियमबाह्य, कायदाबाह्य कृती होती.दहा किलोमीटरच्या आत सोडाच,चक्क अभयारण्याच्या,राष्ट्रीय उद्यानांच्या मर्यादांच्या आत मंजुऱ्या देण्यात येत होत्या.


पर्यावरणीय मंजूरीच्या संदर्भात केवळ एवढाच मुद्दा नव्हता.१९९२ च्या पर्यावरण संरक्षण कायद्याप्रमाणे सुव्यवस्थितरीत्या पर्यावरणावर तसेच समाजजीवनावर, स्थानिक समाजाच्या अर्थव्यवस्थेवर,लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या आघातांचे नीट परीक्षण करवून, जनसुनावणीतून नीट माहिती घेऊन,ती वापरून परवानग्या दिल्या गेल्या पाहिजेत.ह्या सर्व परीक्षणांत अगदी अपूरी,अनेकदा जाणून-बुजून चुकीची माहिती दिली जाते.तसेच जर जनसुनावणीत ह्यातील चुका नजरेस आणून दिल्या गेल्या,तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते.सर्वत्रच पाणी,जैवविविधता,स्थानिक समाजांची उपजीविकेची साधने,स्थानिक लोकांचे आरोग्य ह्यांबाबत अगदी अपुरी,पुष्कळशी धादांत खोटी माहिती नमूद होते.पर्यावरणीय मंजुरी देण्याआधी खाणचालकांमार्फत सादर केले गेलेले अहवाल स्थानिक भाषेत लोकांपुढे नीट आली पाहिजेत.त्यांनी चुका,पूरक माहिती लक्षात आणून दिली,तर ती नीट नोंदवून मूळच्या अहवालात सुधारणा केली पाहिजे व मग ते काळजीपूर्वक तपासले जाऊन,सशर्त अथवा बिनशर्त परवानगी द्यावी किंवा नाकरावी अशी कायद्यात तरतूद आहे.परंतु अशी जनसुनावणी अगदी अयोग्य पद्धतीने होते.लोकांनी नजरेस आणून दिलेली माहिती झटकली जाते.


जनसुनावणीप्रमाणेच गोव्यातील शासनालाही सादर होणारे पर्यावरणीय आघातांचे अहवाल तपासून पाहण्यातून निश्चितच भूमिका पाहिजे.परंतु आज गोवा शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका केवळ एक पोष्ट हापीस एवढीच आहे.ते खाणचालकाने सादर केलेला अहवाल,जनसुनावणीचा वृत्तान्त दिल्लीला पाठवतात,एवढेच.त्यांनी तो तपासून,तावून सुलाखून त्यावर टीका-टिप्पणी द्यायला सांगायलाच हवी.पण तसे केले जात नाही आणि हे अयोग्य आहे असे निवेदन गोवा शासनाच्या पर्यावरण मंत्र्यांनी केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाला केले असूनही त्याकडे सर्वथा दुर्लक्ष केले जात आहे.मग दिल्लीत कशी परवानगी दिली जाते? जमिनीवर काय चालले आहे, ह्याची काहीही माहिती नसलेले ढुड्ढाचार्य एका समितीत बसून प्रत्येक प्रकल्पाला पाच-पाच मिनिटात तपासून भसाभस सगळे,अगदी निरपवाद,मान्य करतात.


मग राष्ट्रसेवा दलाचे एक कार्यकर्ते,गोव्यातील डिचोळीचे संवेदनशील अध्यापक रमेश गावस अगदी कसून सगळी माहिती गोळा करतात.त्यासाठी गुगल अर्थवरच्या उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांसारख्या अत्याधुनिक माहितीचा वापर करतात.ह्या सर्वाच्या आधारे पर्यावरणीय मंजुऱ्या कशा अयोग्य आहेत हे सिद्ध करतात.झेंटे खाणीबाबत खालील गोष्टी दाखवून देऊन त्यांनी पर्यावरण मंत्रालयाने दिलेली परवानगी उच्च न्यायालयामार्फत रद्द करवली.


तळटिप - गावाकडची जमीन ही कथा,वाघीण,प्रतिक पाटील,स्वच्छद प्रकाशन,कोल्हापूर मधील आहे.