* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१९/३/२३

आपले अंतराळयान अज्ञात ग्रहावर उतरते, तेव्हा..

ज्यूल्स व्हर्न याने काल्पनिक विज्ञानकथा लिहिल्या असे पूर्वी वाटत असले तरी आता तसे म्हणण्याचे धाडस कोणी करील असे वाटत नाही.विज्ञानाच्या काटेकोर चौकटीत आपल्या सर्व गोष्टी बसवून ज्यूल्स व्हर्न याने कथा वाङ्मयाची नवीन प्रथा पाडली.त्याच्या प्रतिभेने भूमंडळ,

आकाश,सागर या सर्व ठिकाणी संचार केला होता आणि तो असा विलक्षण द्रष्टा होता की एकोणिसाव्या शतकात जन्म घालवूनही त्याने विसाव्या शतकातील रेडिओ,

सिनेमा, विमान यासारखे शोध कल्पनेने हेरून ठेवले होते.

पण त्याच्या काल्पनिक भराऱ्या कधीच सत्यसृष्टीत उतरलेल्या आहेत.८० दिवसात कशाला?आता आपण ८६ मिनिटातच पृथ्वी प्रदक्षिणा करू शकत.! या गोष्टीला जितका काळ जावा लागला त्याहूनही कमी काळ आता आपण करीत असलेल्या अंतराळ प्रवासाला लागणार आहे.

समजा की १५० वर्षांनी एका अज्ञात सूर्याच्या दिशेने पृथ्वीवरील अंतराळयानाने झेप घ्यायचे ठरविले.

आज प्रवाशांना घेऊन जगपर्यटन करणाऱ्या प्रचंड बोटीएवढे ते अंतराळयान असेल.जवळ जवळ एक लाख टन वजनाचे,त्यापैकी ९९८०० टन वजन इंधनाचेच असेल.अंतराळात पुढे प्रवास करीत राहणाऱ्या यानाचे वजन राहील २०० टन.अशक्य वाटते? आज आपण पृथ्वीभोवती फिरत असतानाच एकेक भाग जोडून जोडून प्रचंड अंतराळयान बांधू शकतो.पण २५-३० वर्षांतच याचीही आवश्यकता राहणार नाही.त्यावेळी आपण चंद्रावरसुद्धा एखादे प्रचंड अंतराळयान बांधून ते तिथून सोडायची व्यवस्था करू शकू,आजच्या इंधनाचा मोठा भाग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर पडण्यासाठी फुकट जातो आहे.फोटॉन रॉकेटसचा शोध म्हणूनच जोरात चालू आहे.ती वापरून उडवलेली अंतराळयाने जवळ जवळ प्रकाशवेगाने जातील.फोटॉन रॉकेटसच्या इंधनावर उडणाऱ्या यानांचा उपयोग आपल्या सूर्यमालेच्याही कक्षा भेदून अंतराळ स्वारीसाठी आपण करू शकू.

नुसती कल्पनाही मनाला धक्कादायक वाटते ना?पण आज आपण अंतराळ युगाच्या उंबरठ्यावर उभे असलो तरी काही वर्षांपूर्वी हीच परिस्थिती होती हे लक्षात घ्यायला काहीच हरकत नाही.ज्यावेळी आपल्या पूर्वजांनी पहिली आगगाडी,पहिली मोटार,पहिले विमान पाहिले, आपल्या मागच्या पिढीने प्रथमच हवेतून आलेले संगीत ऐकले किंवा रंगीत टीव्ही पाहिला,त्या त्या काळात या अभूतपूर्व अशाच घटना होत्या. आपण पहिले अंतराळ उड्डाण पाहिले, उपग्रहाद्वारे प्रक्षेपित केलेली चित्रे पाहिली, बातम्या ऐकल्या.मग आपले नातू,पणतू वेगवेगळ्या सूर्यमालांवर प्रवास करतील आणि मोठमोठ्या तंत्रज्ञान महाविद्यालयात अज्ञात विश्वाचे संशोधन करतील यात अशक्य वाटण्याजोगे काय आहे? ज्या अज्ञात ताऱ्याच्या दिशेने आपले अंतराळयान जात असेल त्याची ग्रहमाला,

त्या ग्रहांचे ग्रहमार्ग,त्यांच्या जागा,त्यांची गुरुत्वाकर्षणे यांचा अभ्यास अंतराळ यात्रिक करीत असतीलच.

अर्थातच ज्या ग्रहावरील परिस्थिती सर्व दृष्टींनी जास्तीत जास्त पृथ्वीसारखी असेल त्याच ग्रहावर उतरण्याचा निर्णय अंतराळयानाचा प्रमुख घेईल.

आपण असेही समजू की ८००० वर्षांपूर्वी पृथ्वीवरील संस्कृती जितपत सुधारलेली होती, तितपतच सुधारलेल्या अवस्थेत त्या ग्रहावरील जमाती असतील.अर्थात उतरण्याआधीच या सर्व गोष्टींची निश्चिती अंतराळयानावरील यंत्रे केल्याशिवाय राहणार नाहीत.तिथे पोहोचेपर्यंत आपले इंधन संपत आले असेल तर उतरण्यासाठीही अशीच जागा निवडावी लागेल की जिथे युरेनियमसारख्या द्रव्याचा भरपूर साठा असेल.कुठल्या पर्वतराजीवर युरेनियमचा साठा असेल त्याची नोंदही यंत्रे करतीलच.आणि शेवटी आपले अंतराळयान त्या ग्रहावर उतरेल.आपले अंतराळवीर पाहतील त्या ग्रहावरील दगडी आयुधे बनविणाऱ्या,भाले फेकून शिकार करणाऱ्या,

शेळ्या-मेंढ्यांचे कळप बाळगणाऱ्या व घरगुती वापरासाठी ओबडधोबड मातीची भांडी बनविणाऱ्या जमाती.! आपण अशा संस्कृतीबद्दल इतिहासात फक्त वाचलेलेच असते.पण आपले प्रचंड अंतराळयान उतरल्यावर आणि त्यातून उतरलेले अंतराळवीर पाहिल्यावर त्या मागासलेल्या जमातीतील लोकांवर किती जबर परिणाम होईल,त्यांना किती दहशत बसेल याची काही कल्पना ? धूर व ज्वाळा सोडत आपले प्रचंड अंतराळयान उतरलेले पाहिल्यावर ते भीतीने जमिनीत तोंडे खुपसतील.डोळे वर करून बघण्याचे धैर्यही त्यांना होणार नाही.आपले अंतराळयान उतरल्यावर त्यातून मुखवटे घातलेले अंतराळवीर उतरतील.त्यांच्या डोक्यांवर शिरस्त्राणे (हेलमेट्स) व शिंगे (सन्देशासाठी अँटिना) असतील.ते उड्या मारल्यासारखे चालतील. (कंबरेला बांधलेल्या छोट्या अग्निबाणांच्या सहाय्याने) रात्रीसुद्धा दिवसासारखा स्वच्छ प्रकाश पाडतील.(सर्चलाईटसच्या सहाय्याने) मध्येच आपण करीत असलेल्या स्फोटांच्या दणक्यांनी तिथल्या लोकांची पाचावर धारण बसेल.(निरनिराळ्या खनिजांच्या शोधासाठी आपण करीत असलेले चाचणी स्फोट) आणखी विचित्र प्राणी आणि कीटक घरघर करीत, निरनिराळे आवाज करीत उडताना पाहून ते भीतीने थरथरा कापतील.(हेलिकॉप्टर्स व इतर अनेक कामांना उपयोगी पडणारी छोटी छोटी वाहने.)


लपून छपून आपल्या अंतराळवीरांवर त्या जमातीतले लोक लक्ष ठेवून राहतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपले अंतराळवीर त्यांची नेमून दिलेली कामे कष्ट घेऊन चोख करीत राहतील.या 'देवांपासून काही धोका तरी दिसत नाही,एवढे लक्षात आल्यावर ते काही तरी भेटवस्तू घेऊन आपल्या अंतराळवीरांना भेटायला येतील.

कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपले अंतराळवीर झपाट्याने त्यांची भाषा शिकतील आणि त्यांना समजावतील की ते देव वगैरे नाहीत.त्यांच्यासारखीच माणसे आहेत पण दुसऱ्या ग्रहावरून आलेली!पण या सत्य बोलण्याचा परिणाम त्यांच्यावर होणेच शक्य नाही.हे सत्य त्यांच्या आकलनाबाहेरचे असेल.त्यावर ते विश्वासच ठेवणार नाहीत. त्यांना एकच गोष्ट पटलेली असेल की हे अंतराळवीर दुसऱ्या ताऱ्यांवरून आले, आकाशमार्गाने आले.हे निरनिराळे चमत्कार करीत आहेत,सर्व शक्तिमान आहेत,तेव्हा ते देवच असले पाहिजेत.देव नाहीत तर कोण असतील? अंतराळवीरांनी मदतीचा पुढे केलेला हात हातात घेण्याचे भानही त्यांना राहणार नाही आणि त्यांच्यावर झालेल्या आक्रमणाची उमजही त्यांना होऊ शकणार नाही.यानंतर काय काय घडेल याची कल्पना करणे तसे अवघडच असले तरी काही गोष्टी निश्चितच घडतील.तिथल्या जमातीतल्या काही लोकांचा तरी विश्वास हे अंतराळवीर संपादन करतील. युरेनियमसारख्या द्रव्यांनी झालेल्या स्फोटांनी कुठे एखादा प्रचंड खड्डा वगैरे पडला असेल तर तो शोधायची कामगिरी त्यांना सांगितली जाईल.कारण परतीच्या प्रवासासाठी त्यांना त्याचीच आवश्यकता असेल.त्या जमातीतल्या एखाद्या बुद्धिमान माणसाला हे अंतराळवीर 'राजा' म्हणून घोषित करतील आणि आपल्याशी कधीही संपर्क जोडण्यासाठी त्याला एक रेडिओ सेटही देतील. राजाच्या शक्ती प्रदर्शनाचा तो एक तऱ्हेचा राजदंडच असेल.समाजसुधारणा, संस्कृती,नीति यांच्या साध्या साध्या कल्पना, साधे साधे नियम आपले अंतराळवीर त्यांना शिकवतील की ज्यामुळे त्यांची सुधारणा झपाट्याने होण्यास मदत होईल.अंतराळवीर अशा जमातीचा पाया घालतील की तिची नैसर्गिकपणे प्रगती होण्यासाठी जितका काळ जाणार असेल त्यातला बराचसा काळही वाचेल. नैसर्गिक उत्क्रांतीतील एक पायरी गाळूनच ही छोटी नवी जमात प्रगती करून घेईल.

आपल्या स्वतःच्या अनुभवावरून ही जमात अंतराळ प्रवास करण्याइतकी प्रगत होईपर्यंत किती काळ जाईल हे आपल्याला माहीत आहेच.!

मग आपले अंतराळवीर पृथ्वीवर परत यायची तयारी करायला लागतील.त्यांच्या तेथील अस्तित्वाच्या स्वच्छ खुणा ते मागे ठेवतील पण शास्त्रे,

तंत्रविज्ञान,गणित या विषयात प्रगत झाल्यावरच तेथील जमातींना उलगडतील अशा त्या खुणा असतील.आपण परत निघाल्यावर 'देवांनी' परत जाऊ नये असा हट्ट त्या ग्रहावरील लोकांनी करणे आणि तो हट्ट पाहून त्यांचे समाधान करण्यासाठी, 'आम्ही पुन्हा परत येऊ' असे वचन आपल्या अंतराळवीरांनी त्यांना देणे या गोष्टी अगदी स्वाभाविकपणे घडतील आणि मग आपली अंतराळयाने पुन्हा एकदा आकाशात झेप घेतील व त्यांच्या नजरेआड होतील.मग ती जमात आनंदाने बेहोष होईल,कारण त्यांचे 'देव' त्यांच्यात राहून गेलेले असतील. त्यांच्या या अनुभवांवरून ते काव्ये रचतील, महाकाव्ये रचतील,पिढ्यानपिढ्या त्यांच्या आधारे देवांच्या भेटीची स्मृती नष्ट होऊ दिली जाणार नाही.

अंतराळवीरांची प्रत्येक गोष्ट पवित्र म्हणून जतन केली जाईल.तोपर्यंत लिहिण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली असेल तर देवांच्या विलक्षण चमत्कारिक,गूढ आणि पारलौकिक भेटीचा संपूर्ण वृत्तांत लिहिला जाईल.देव 'आम्ही नक्की परत येऊ' असे सांगून गेले आहेत हे लिहायला कोणीच विसरणार नाही.त्यात जी चित्रे काढली जातील ती सुवर्णाची झळाळी असणारे कपडे घातलेल्या व उडत्या रथातून आलेल्या देवांची असतील. त्यातल्या गोष्टी सागर आणि जमिनीवर प्रवास करणाऱ्या देवांच्या रथांबद्दलच्या आणि त्यांच्याकडे असणाऱ्या विजेसारखा गडगडाट करणाऱ्या अस्त्रांबद्दल असतील. त्यांच्यामधले शिल्पकार हातोडा आणि छिन्नी घेऊन खडकांवर चित्रे खोदायला सुरुवात करतील.ते खडकांवर चितारतील ती अंतराळवीरांसारखा पोषाख घातलेल्या, डोक्यावर शिरस्त्राणे व अँन्टिना असलेल्या, छातीवर पेट्या बांधलेल्या देवांची चित्रे! चेंडूसारख्या गोल यानांवर बसून उडणाऱ्या देवांची चित्रे! प्रकाशकिरण सोडणाऱ्या छोट्या काठ्या (लेसर गन्स) आणि विविध आकारातील जंतू आणि कीटक की ज्यांचा संबंध होता देवांच्या निरनिराळ्या वाहनांशी!

आपल्या कल्पनाशक्तीला काही अंतच नाही.तेव्हा त्यानंतर त्या ग्रहावर काय काय घडेल, याचीसुद्धा आपल्याला कल्पना करता येईल. ज्या जागेवर आपले अंतराळयान उतरले असेल ती जागा पवित्र म्हणून घोषित केली जाईल. नंतर तर ते यात्रेचे ठिकाणच बनेल.त्या जागांवर मंदिरे,पिरॅमिडस् बांधले जातील.ही बांधकामे अर्थातच आपल्या अंतराळवीरांनी घालून दिलेल्या कोणत्या तरी खगोलशास्त्राच्या नियमानुसारच होतील.जमाती जमातीमधली युद्धे कधीच थांबणारी नसतात.तेव्हा कदाचित अशा युद्धात या सर्व जागा हळुहळू उदध्वस्तही होतील,लोक देशाधडीला लागतील आणि या पवित्र वास्तूंवर जंगलांचे आक्रमण होईल.

नाहीतर भूकंप,महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींनी ही बांधकामे जमिनीखाली गाडली जातील.अनेक पिढ्यांनंतरचे संशोधक पुन्हा या सर्व गोष्टी शोधून काढतील आणि त्यांचा अर्थ लावायचा प्रयत्न करतील.

अमेरिकेची प्रचंड आरमारी जहाजे प्रथमच दक्षिण समुद्रात शिरल्यावर किंवा कोर्टेससारखा रानटी स्पॅनिश सैन्याधिकारी दक्षिण अमेरिकेत उतरल्यावर काय हाहा:कार माजला होता,हा इतिहास आपल्याला तसा ताजा आहे.त्यामुळेच आपले अंतराळवीर जेव्हा एखाद्या अज्ञात ग्रहावर आक्रमण करतील तेव्हा तिथल्या संस्कृतीवर,तिथल्या मागासलेल्या जमातींवर किती जबरदस्त परिणाम होईल याची,अंधुकशी का होईना,पण आपण कल्पना करू शकतो.

भविष्यकाळात नजर टाकेपर्यंत आपल्याला आपला भूतकाळ नीट समजू शकत नाही हे जे म्हटले आहे त्याचे कारण असे की आज आपण अशाच कुठल्या तरी पल्ल्यावर उभे आहोत. ज्यांचा अर्थ आजपर्यंत लागत नव्हता अशा गूढ आणि रहस्यमय गोष्टी आज आपल्याला पृथ्वीवर सापडत आहेत.हजारो वर्षांपूर्वी जे अंतराळवीर असेच आपल्या पृथ्वीवर उतरले होते त्यांनीच मागे ठेवलेल्या या अंधुकशा खुणा आहेत का? या प्रश्नाचे उत्तर आता शोधलेच पाहिजे.

हे मान्य आहे की या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपल्या भूतकाळातच घेऊन जात आहेत;पण आपल्या भविष्यकालीन योजनांशी ही उत्तरे अगदी निगडित आहेत.या प्रश्नांची उत्तरे शोधेपर्यंत आपले भविष्यकाळातील यश आपल्यापासून दूर पळणार आहे.म्हणूनच या महत्त्वाच्या कोड्यांची उकल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

३ मार्च २०२३ या लेखातील पुढील भाग..

१७/३/२३

कथा माणुसकीचा 'पोऱ्या'

"ए पोऱ्या पाणी आण"

"ए पोऱ्या अरे कचोरी आण ना"

"ए पोऱ्या दोन मिसळ आण.वरुन दही टाक" पोऱ्या..


हाँटेलमधला एकमेव वेटर असलेला १४-१५ वयाचा तो पोरगा अक्षरशः धावत होता. प्रत्येक ग्राहकाला ताबडतोब आँर्डर हवी होती.तोही कुणाला नाराज करत नव्हता.


तहसील कचेरीसमोरचं ते हाँटेल नेहमीच तुडुंब भरलेलं असायचं.आमचा चहा,नाश्ता आणि डबा नाही आणला तर जेवणही तिथंच व्हायचं.चविष्ट पदार्थ आणि उत्तम सर्व्हिस त्यामुळे त्या छोट्याशा हाँटेलात कायम गर्दी असायची.आणि अशी सर्व्हिस देणारा तो हसतमुख चुणचुणीत मुलगा नेहमीच माझ्या उत्सुकतेचा विषय होता.


ग्राहक कधी कधी त्याला रागवायचे,त्याच्यावर चिडायचे पण याचा आवाज कधी चढायचा नाही."हो काका " "हो मावशी आणतो" "फक्त दोन मिनिट,आता आली तुमची मिसळ"असं सांगून तो ग्राहकांना शांत बसवायचा.


एक दिवस दुपारच्या वेळेस हाँटेलमध्ये फारसे ग्राहक नसतांना मी त्याला बोलावलं.

"नाव काय रे तुझं"

"दिलीप"

"कुठला तू?"

त्यानं बावीस कि.मी,वरच्या गावाचं नांव सांगितलं.

"शाळेत जातोस?"

"नाही.४ थी नंतर सोडली.

"का?"

"गावात दुष्काळ पडला. कामं मिळेना.अण्णांनी (त्याच्या वडिलांनी) इथं पाठवून दिलं"

"किती पगार मिळतो?"

"खाऊन पिऊन पाचशे रुपये"

"काय करतो पैशांचं?"

"गावी पाठवतो अण्णांकडे"

"पुढं शिकावसं वाटत नाही?"

"खुप वाटतं,पण काय करणार?नाईलाज आहे."

तेवढ्यात ग्राहक आल्याने संवाद संपला.मी मालकाकडे चौकशी केली.दिलीप सर्वात मोठा मुलगा,एक लहान भाऊ आणि एक बहीण,आईवडील शेतमजूर,अर्थातच घरची गरीबी त्यामुळे शाळेत हुशार असुनही दिलीप शिकू शकला नाही.दिलीप हाँटेलमध्येच झोपायचा. बाहेरच्या नळावर अंघोळ करायचा.

एकदा चार पाच दिवस तो दिसला नाही.मी मालकाकडे चौकशी केली.दिलीप गावी गेला होता.त्याचा लहान भाऊ डेंग्यूने आजारी होता. गावात इलाज झाले नाहीत.

जिल्ह्याच्या गावी नेण्याइतके पैसे नव्हते.शेवटी तो तिथंच वारला.त्याच्या अत्यविधीचा खर्चही हाँटेलमालकाने केला.


परतल्यावर तो गंभीर असेल अशी माझी कल्पना.पण हा पठ्ठ्या हसतमुखच! मी छेडल्यावर म्हंटला"साहेब किती दिवस दुःख करणार?गरीबाला शेवटी पोटापाण्यासाठी उभं रहावंच लागतं." त्यानंतर माझी आणि दिलीपची दोस्ती जमली.मी त्याला गोष्टीची,ज्ञानवर्धक पुस्तक आणून द्यायचो.तोही मला इतर ग्राहकांपेक्षा थोडी जास्त मिसळ,जास्त भजी द्यायचा.आचाऱ्याला माझा चहा जास्त स्पेशल बनवायला सांगायचा.

एक दिवस माझ्या मुलाचा वाढदिवस होता. बाहेरचं विश्व काय असतं हे दिलीपने बघावं म्हणून मी त्यालाही बर्थडे पार्टीचं निमंत्रण दिलं.पण सायंकाळी खुप ग्राहक असतात म्हणून तो नाही म्हणाला.मी हाँटेलमधून निघालो तसं त्याने मला थांबवलं.मालकाची परवानगी घेऊन तो बाहेर गेला आणि थोड्यावेळाने परतला तेव्हा त्याच्या हातात गिफ्टचं पार्सल होतं.

"साहेब मी तर येऊ शकत नाही पण तुमच्या मुलाला द्या माझ्याकडून गरीबाची भेट"

"अरे याची काय गरज होती?तू आला असतास तर खुप बरं वाटलं असतं "

"असू द्या साहेब"म्हणून त्यानं ते पार्सल माझ्या हातात कोंबलं.

रात्री वाढदिवसाची पार्टी पार पडल्यावर आम्ही सर्व गिफ्ट्स उघडली आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला.एवढ्या सगळ्या गिफ्ट्स मध्ये दिलीपचं गिफ्ट सर्वात महागडं होतं.पाचशे रुपये पगार कमवणाऱ्या त्या पोराने चक्क तीनशे रुपयाचं गिफ्ट दिलं होतं.मला एकदम गहिवरून आलं.त्या गरीबाचं मन श्रीमंतांपेक्षाही श्रीमंत होतं.

त्या घटनेला आज दोन वर्षे झालीत.आज दिलीप पुण्यात एका चांगल्या शाळेत शिकतो आहे. खटपट करुन एका फाऊंडेशनला मी त्याच्या उच्च शिक्षणापर्यंतचा संपुर्ण खर्च उचलायला राजी केलं आहे आणि दिलीप ऐवजी त्याच्या आईवडिलांना पाचशे रुपये मी दरमहिन्याला पाठवतोय.त्याबदल्यात दिलीपने चांगली नोकरी लागली की शेतमजूरांच्या शाळा सोडून दिलेल्या मुलांचं भवितव्य घडवावं असं मी त्याच्याकडून वचन घेतलंय.


ही कथा "कथा माणुसकीच्या "दीपक तांबोळी यांच्या कथासंग्रहातील आहे.

१५/३/२३

झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन मैत्र जिवांचे

काही वर्षांपूर्वी मी एका पायवाटेवरून जायचो. तो बीच वृक्षांचा एक रानवा होता.तिथे मला मॉस म्हणजे मडगजने भरलेले दगड दिसायचे. त्यांच्याकडे मी फारसं लक्ष देत नसे,पण एके दिवशी मात्र खाली वाकून मी त्या दगडांकडे निरखून पाहिलं.थोडी पोकळी असलेले विचित्र आकाराचे हे दगड मला चमत्कारिक वाटले. हलक्या हाताने एका दगडावरचं मडगजाचे आवरण मी उचलून बघतो तर काय!तो दगड नसून बीच वृक्षाचं साल होतं!मला वाटलेला 'दगड' हा चांगलाच टणक होता आणि जमिनीला चिकटून बसला होता.मडगजने लगडलेलं हे साल जमिनीला जखडलं गेलं होतं.खरंतर बीचच्या लाकडाचं किंवा सालाचं काही वर्षांतच विघटन सुरू होतं.पण हे मात्र अनेक वर्षं टिकून राहिल्यासारखं दिसत होतं.


खिशातल्या चाकूचा वापर करून मी सालाचा वरचा थर काढून टाकला आणि आत मला हिरवा रंग दिसला.हिरवा रंग ? मी आश्चर्यचकित झालो.हिरवा रंग क्लोरोफिल नावाच्या एका रसायनामुळे मिळतो.हे रसायन पानांमध्ये असतं, ज्यामुळे पानांना हिरवा रंग मिळतो.क्लोरोफिल झाडाच्या खोडातही साठवलेल असतं,पण केवळ जिवंत झाडात!म्हणजे माझ्या हातात असलेलं साल जिवंत होतं की काय!

मी आजूबाजूला जरा नीट पाहिलं तेव्हा जाणवलं की ही दगडासारखी वाटणारी सालं एका वर्तुळात मांडून ठेवली होती.सुमारे पाच फुटाच्या व्यासाचं हे वर्तुळ म्हणजे एका पुरातन झाडाचं खोड असल्याचं माझ्या लक्षात आलं.

त्याचा मधला भाग पूर्णपणे कुजून गेला होता आणि फक्त कड टिकून होती.त्या मोठाल्या घेराकडे पाहून हे झाड सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वी पाडलं गेलं असेल,असा अंदाज मी लावला.पण मग इतकी वर्ष या सालामध्ये जीव राहिला कसा ?

कोणत्याही पेशीला जिवंत राहण्यासाठी अन्न, हवा आणि पाणी हे तर लागतंच आणि ते थोड्याफार प्रमाणात मिळालं तरी त्यांची वाढ होत राहते.पण एकही पान नसताना या खोडाला प्रकाश संश्लेषण (फोटोसिंथेसिस) प्रक्रिया कशी करता आली,जी झाडांना जिंवत ठेवण्यासाठी आवश्यक असते आणि ती पानांमध्येच होते. कसं करता आलं? पृथ्वीवरील कोणताही सजीव शेकडो वर्ष भुकेला राहू शकत नाही.निसर्गाचा हा नियम त्या खोडालाही लागू होता.म्हणजे या खोडात नक्की काहीतरी प्रक्रिया सुरू आहे याची मला जाणीव झाली.या पुरातन खोडाला त्याच्या शेजाऱ्यांकडून काहीतरी मदत मिळत असणार. मुळाच्या मार्गाने ही मदत पुरविली जात असावी, असा अनुमान मी लावला.काही शास्त्रज्ञांनी या विषयात संशोधन केलं आहे.त्यात त्यांना असं दिसून आलं की,झाडांच्या मुळांशी फंगल नेटवर्क,म्हणजे कवकाची जाळी असतात ज्यातून झाडं पोषणद्रव्यांची देवाणघेवाण करतात.' काही वेळा झाडांची मुळंच एकमेकांना जोडलेली असतात आणि त्यातून देवाणघेवाण चालते.जंगलात सापडलेल्या या झाडाच्या खुंट्यात नक्की काय चाललं आहे याचा शोध मला घेता आला नाही,कारण त्या खोडाला उकरून मला त्याला कोणत्याही प्रकारची इजा करायची नव्हती.पण एक गोष्ट नक्की होती की, भोवतालच्या बीच झाडांकडून या खुंट्याला साखरेचा पुरवठा होत होता.झाडं एकमेकांना कशी जोडून घेतात याची प्रचीती कदाचित तुम्हाला रस्त्याच्या कडेच्या बंधाऱ्याकडे बघून येईल.

रस्त्याकडेच्या तिरकस भागावरून पाऊस झपाट्याने वाहतो आणि त्याबरोबर माती वाहून जाते.अशा वेळेस झाडांच्या मुळांची जाळी दिसू लागते.

जर्मनीमधील हार्झ डोंगररांगेत शास्त्रज्ञांना असे आढळून आले की हे परस्परावलंबनातून सहजीवनाचं उत्तम उदाहरण आहे.यात एकाच प्रजातीची झाडे एकमेकांना मुळातून जोडलेली असतात.आणि गरजेच्या वेळी त्यातून पोषणद्रव्यांची देवाणघेवाण होऊन आपल्या शेजाऱ्याला मदत पुरवली जाते.या अभ्यासातून असं दिसतं की जंगलात वनस्पती एकमेकांना जोडून राहतात,

ज्यामुळे त्यांचे आचरण एका भव्य विशाल - जीवासारखं असतं जसं ते आपल्याला मुंग्यांच्या वसाहतीतही पाहायला मिळतं.


इथे एक प्रश्न मनात येतो,की झाडांची मुळे मातीत अहेतुक,मुक्तपणे वाट काढत असतील का ? आणि वाटेत अपघातात एखादा स्वकीय भेटला तरच त्याच्या मुळांना जोडून घेत असतील का?आणि एकदा जोडलं गेल्यावर त्यांना पोषणद्रव्यांची देवाणघेवाण करावीच लागत असेल ? म्हणजे त्यांच्याकडून एक समूहाची उभारणी होत असल्यासारखं आपल्याला वाटतं, पण त्यांच्यासाठी ही अपघातानेच सुरू झालेली देवाणघेवाण तर नसेल? जरी हे झाडाकडून नियोजनबद्धरीत्या,हेतुपुरस्सर केले जात नसून निव्वळ योगायोगाने साधले जात असेल तरीसुद्धा जंगलाच्या परिसंस्थेसाठी ही गोष्ट जमेचीच आहे.पण निसर्ग इतका साधा सरळ नक्कीच नाही.इटलीच्या ट्यूरिन विद्यापीठाचे मासिमो माफेई यांच्या मते झाडांकडे आपल्या प्रजातीची मुळं अचूक ओळखण्याची क्षमता असते.आपल्या आणि इतर प्रजातींच्या मुळांमधला फरकही ओळखता येतो.'

पण वनस्पती अशा प्रकारचं सामाजिक जीवन का बरं जगत असतील? आपले खाद्य आपल्या स्वजातीयाशी आणि काही वेळा स्पर्धकांशीही वाटून खाण्याचं औदार्य का बरं दाखवत असतील? मानव जातीकडे या प्रश्नाला जे उत्तर आहे तेच वनस्पतींनाही लागू होतं - अशा प्रकारच्या सहजीवनाचे फायदे आहेत.एक झाड म्हणजे वन परिसंस्था नव्हे.स्थानिक हवामान नियंत्रणाची क्षमता एका झाडात नसते.वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानाला एकट्याने तोंड देणं सोपं नसतं.पण अनेक झाडं असलेल्या परिसराची परिसंस्था बनते.अशा प्रकारच्या समूहात थंडी आणि उष्णता नियंत्रणाची थोडी क्षमता असते.एकमेकांच्या साहाय्याने पाण्याचा अधिक साठा होऊ शकतो आणि हवेतील आर्द्रता वाढवता येते.अशा अनुकूल परिस्थितीत झाडं अनेक वर्ष जगू शकतात.पण यासाठी तिथल्या सर्व झाडांना सहकार्यानेच जगावं लागतं.प्रत्येक झाड जर स्वत:चा फायदा बघू लागलं तर सर्वांना दीर्घायु लाभणं शक्य होणार नाही.आणि झाडं वठण्याचे प्रमाण वाढलं की तिथं जंगलातील आच्छादन कमी होतं.अशा परिस्थितीत वादळी वारे आत शिरतात आणि उन्हाची झळ जमिनीला लागून मातीची आर्द्रता घटते.मग प्रत्येक झाडालाच संकटाला तोंड द्यावं लागतं.

त्यामुळे वनसमूहात प्रत्येक झाडाचं महत्त्व असतं आणि ते दुसऱ्याला उपयुक्त असतं.म्हणून वनपरिसंस्थेत आजारी आणि क्षीण वृक्षांनाही इतर झाडांकडून मदत केली जाते.

कोण जाणे, उद्या मदत पुरवणाऱ्याला त्या आजारी झाडाची मदत लागेल.

मोठाल्या चंदेरी -करड्या रंगाच्या खोडाचे बीच वृक्ष जेव्हा असे वागतात तेव्हा मला हत्तींच्या कळपाची आठवण होते. हत्तींच्या कळपाप्रमाणेच झाडेसुद्धा आपल्या समूहातील आजारी आणि दुर्बल झाडांची 

ते बरे होईपर्यंत काळजी घेतात.इतकंच काय तर मेलेल्या झाडालाही एकटं सोडायची त्यांची तयारी नसते.मृताला सोडून जाणं हत्तींनाही जड जातं.


या समूहात जरी प्रत्येक झाड एक सदस्य असलं तरी वनामध्ये सदस्यत्वाचे विविध स्तर असतात. उदाहरणार्थ,बहुतांश वठलेले वृक्ष शे-दोनशे वर्षांत कुजून नाहीसे होतात.मला सापडलेल्या या 'हिरव्या दगडांसारखे' काही थोडेच वृक्ष इतकी वर्षं जिवंत ठेवले जातात.पण वनपरिसंस्थेत असा भेदभाव का होत नसून असेल? मानव जातीप्रमाणे त्यांच्यातही कनिष्ठ दर्जाचे नागरिक असतात की काय? मला वाटतं वनपरिसंस्थेतही असं असतं,पण त्यात 'दर्जा' हा निकष एखादा वृक्ष इतरांना किती जोडला गेला आहे,इतरांशी त्याचा स्नेहभाव किती आहे, यावर त्याला दुसऱ्यांकडून होणारी मदत ठरत असावी.एखाद्या वनाच्या आच्छादनाकडे पाहून तुम्हालाही हे जाणवेल.प्रत्येक झाड आपला विस्तार शेजारच्या झाडाच्या पालवीच्या विस्तारापर्यंतच पसरवते,कारण तिथे पोचणारा सूर्यप्रकाश वापरला जात असतो.पण तिथपर्यंत पोहोचलेल्या पालवीला भक्कम फांद्यांनी आधार दिला जातो.दोन झाडांमध्ये धक्काबुक्की चालू आहे की काय असं वाटेल बघणाऱ्याला! खऱ्या मित्रांसारखी ही दोन्ही झाडं आपला विस्तार आणि फांद्या दुसऱ्याला त्रास होईल इतक्या वाढवतच नाहीत.त्यांना आपल्या शेजारच्या मित्राकडून प्रकाश ओरबाडून घ्यायचा नसतो. त्यामुळे मित्र नसलेल्या दिशेला ते आपल्या फांद्यांचा विस्तार वाढवतात.मित्र वृक्ष जमिनीखालूनही भक्कमरीत्या जोडलेले असतात.त्यांची मैत्री इतकी घट्ट असते की काही वेळेला एक वठला की दुसराही फार काळ टिकत नाही.वठलेल्या मित्राच्या खोडाला जिवंत ठेवण्याचे कार्य फक्त अविचल जंगलात दिसून येतं.ही मैत्री बीच वृक्षांव्यतिरिक्त इतर प्रजातींमध्येही दिसून येत असणार.ओक,फर,स्प्रूस आणि डगलस स्प्रूस वृक्षाच्या जंगलातून मी स्वतः अशी मैत्री पाहिली आहे.त्यांच्यातही कापून टाकलेल्या झाडांच्या खोडांना अशाच प्रकारे जिवंत ठेवलं गेलं होतं.युरोपमध्ये बहुतांश सूचीपर्णी जंगलं लावली गेली आहेत.यामधले वृक्ष रस्त्यावर खेळणाऱ्या उनाड मुलांसारखे वागतात.लागवड करताना त्यांच्या मुळांना कधीही भरून न येण्यासारखी प्रचंड इजा झालेली असल्यामुळे मुळाच्या जाळ्यातून ते मैत्री करू शकत नाहीत.


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर

अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन

१३/३/२३

देवत्व पावलेला नास्तिक बुद्ध उर्वरीत भाग..

बुध्द काशी क्षेत्री आले तेथील उपवनात ते राहिले.त्यांना पाच शिष्य मिळाले.त्या शिष्यांना त्यांनी ते नवीन ज्ञान दिले.नंतर ते त्यांना म्हणाले, आता हिंदुस्थानभर जा.सर्वत्र हा धर्म द्या.त्या पाचांचे पुढे साठ झाले.त्यांची कीर्ती हिंदुस्थानभर पसरली.लोक त्यांची पूजा करू लागले.

त्यांनी नवीन ज्ञान दिल.म्हणून नव्ह; तर ते काही चमत्कार करतात असे ऐकून.ख्रिस्ताची अशीच पूजा होई.

ख्रिस्ताप्रमाणे बुद्धही पाण्यावरून चालत जातात,अशी कथा पसरली.ते हवेत उंच जातात,ते वाटेल तेव्हा अदृश्य होतात,इत्यादी चमत्कारकथा वाऱ्यावर सर्वत्र गेल्या.एके दिवशी बुद्ध आपल्या शिष्यांसह एका नदीजवळ आले. ती नदी दुथडी भरून वाहात होती.प्रचंड पूर! परंतु बुद्धांनी मनात आणले आणि काय आश्चर्य? सशिष्य ते एकदम पैलातीरास गेले,अशा गोष्टी सर्वत्र पसरत होत्या.बुद्धांची पूजा होऊ लागली. त्यांनी नवीन दृष्टी दिली.म्हणून नव्हे,तर ते एक थोर जादूगार आहेत.अदभूत चमत्कार करणारे आहेत म्हणून.


काही थोड्यांनी बुद्धांचे तत्त्वज्ञान समजून घेण्याची धडपड केली.आणि फारच थोड्यांनी त्यांचे जीवन आपल्या कृतीत आणण्याची खटपट केली.बुद्ध हे चांगले जीवन कसे जगावे, ते शिकवणारे महान् आचार्य होते.


बुद्धांचे तत्त्वज्ञान व चांगल्या जीवनाविषयींचे त्यांचे विचार आपण थोडक्यात पाहू या.


प्रथम भटांभिक्षुकांचे बंड त्यांनी मोडले.ते विधी, ते यज्ञ,त्या नाना भ्रामक रूढी,सर्वांच्या मुळावर बुद्धांनी घाव घातला.मोक्षासाठी स्वत:चा उद्धार व्हावा यासाठी या गोष्टींची काही एक जरुरी नाही,असे ते स्वच्छ सांगत. देवांचे हे सेवक आधी दूर करून नंतर त्यांनी देवांनाही दूर केले.देव नकोत व हे भटजीही नकोत.देव आहेत की नाहीत याविषयी बुद्ध काहीच बोलत नसत, होय वा नाही,

काहीच ते सांगत नसत.त्यांनी त्या गोष्टीची जणू उपेक्षा केली.जर कोणी देवदेवतांविषयी त्यांना प्रश्न कला,तर ते खांदा जरा उडवीत व म्हणत,


"या देवांचा प्रश्न मला महत्त्वाचा वाटत नाही मला जिवंत माणसांचा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटतो. "


बुद्ध जसजसे परिणतवयस्क होऊ लागले, तसतसे हे जन्म मरणाच्या फेऱ्यांचे त्यांचे तत्त्वज्ञान अधिकच काव्यमय होऊ लागले. पुढेपुढे बुद्ध निराळ्याच रीतीने बोलू लागले. प्रत्येक जीव स्वतः अनेक जन्मांतून जातो,असे ते आता सांगत नसत.ते आता म्हणत; प्रत्येक जीव म्हणजे एक पेटती मशाल आहे. दुसऱ्या मशालीस ती जाऊन मिळते.आणि याप्रमाणे प्रत्येक जीवाची ज्योत अमृतत्वाच्या विश्वव्यापक ज्योतीत विलीन होते.किंवा घंटांची उपमा वापरली तर असे म्हणता येईल,की प्रत्येक जीवाचे जीवन म्हणजे उघड्या खोलीतील घंटेचे नाव आहे.

कालसोपानावरील सर्व जीवांच्या जीवन-घंटांतून नाद निघण्यास हा व्यक्तिगत नादही कारणीभूत होत असतो आणि शेवटी हा नाद स्वर्गाच्या विश्वव्यापक संगीतात विलीन होतो.


या मताभोवतालचे काव्य दूर केले,म्हणजे शेवटी मथितार्थ इतकाच उरतो,की प्रत्येक जीवनाचे फार दूरवर पोहोचणारे परिणाम होत असतात आणि प्रत्येक मानवप्राणी हा मानवजातीचा एक महत्त्वाचा घटक आहे.


वैयक्तिक अमृतत्वावर बुद्धांचा विश्वास नव्हता.त्यांना त्याची पर्वाही नव्हती.प्रत्येक मानवी जीव, प्रत्येक मानवात्मा विश्वात्मा भाग आहे,जगदात्म्याचा अंश आहे.वैयत्तिक अमृतत्वाची इच्छा करणे म्हणजे सर्वांचा प्रश्न दूर सोडून केवळ स्वतःपुरते पाहणे होय,अंशीला दूर झुगारून अंशाने आपल्यापुरते पाहणे होय.बुद्ध शिष्यांना सांगत,


"जगातील सारे दुःख आपल्या स्वार्थी महत्त्वाकांक्षेमुळे आहे.मग या स्वार्थी महत्त्वाकांक्षा ऐहिक असोत वा पारलौकिक असोत. "


परंतु जो मानवजातीच्या विशाल व महान आत्म्यासाठी स्वतःचा क्षुद्र आत्मा दूर करतो; स्वतःचा आत्मा मानवजातीच्या सेवेत जो रमवतो,तो जन्म मरणाच्या फेऱ्यांतून मुक्त व्हायला पात्र असतो.चिरशांतीच्या निर्वाणाप्रत तो जातो.


बुद्ध 'निर्वाण' या शब्दाला काय समजत असत, ते त्यांनी कधी स्पष्ट केले नाही.शिष्यांनी निर्वाणाविषयी पुष्कळदा विचारले,परंतु बुद्ध उत्तर देण्याचे टाळीत.अशा वेळेस ते नेहमी गंभीर असे मौन पाळीत.या मौनाची शिष्य क्षमा करीत ते मौन त्यानां जणू पूजाही वाटे,पवित्र वाटे, स्वर्गाची,त्या निर्वाणाच्या अंतिम दशेची कल्पना बुद्ध शब्दांत कशी आणून देणार,असा त्या मौनाचा अर्थ शिष्य करीत.जेव्हा जीव निर्वाणाप्रत जातो,तेव्हा त्याला स्वतःची जाणीव कोठून उरणार? त्या वेळेस त्याला सतही म्हणता येत नाही.असतही म्हणता येत नाही; जणू तो मृतही नाही,सजीवही नाही.ती अत्यंत परंमकोटीच्या आनंदाची स्थिती असते. जीवनाहून वा मरणाहून परम दोहोंहूनही श्रेयस्कर अशी ती स्थिती असते.बुद्धांचे शिष्य निर्वाणाचा अशा प्रकाराचा काहीतरी अर्थ लावीत,जेव्हा बुद्ध मरण पावले,तेव्हा शिष्य म्हणाले, "बुद्ध आता अपरंपार अनंत सागराप्रमाणे गंभीर झाले आहेत;सद्सतांच्या पलीकडे ते गेले आहेत.सद्सतांच्या संज्ञा,ही परिभाषा त्यांना आता लावता येणार नाही.


म्हणजे बुद्धांचा जीवात्मा जणू अवर्णनीय अशा अनंताचे स्वरूप धारण करता झाला. अनाकलनीय अशा शाश्वततेचे चिंतन करणारे ते जणू अनंत परब्रह्मच झाले.शाश्वत निःस्तब्धतेच्या,अखंड शांतीच्या संगीतात शून्यत्वाचा डंका ते वाजवीत राहिले.


माझ्या समजुतीप्रमाणे निर्वाणाचा खरा अर्थ हा असा आहे.


बुद्धांची चांगल्या जीवनाविषयींची त्यांची शिकवण अती उदात्त आहे. ते म्हणतात,"या दुःखमय संसारात आपण सारे भाऊभाऊ आहोत.जणू आपण एका कुटुंबातील आहोत." या आपल्या विशाल कुटुंबात बुद्ध केवळ मानवप्राण्यांचाच अंतर्भाव करीत,असे नव्हे; तर सर्व सजीव सृष्टीचा ते अंतर्भाव करीत.जे जे जीव जन्मतात,दुःखे भोगतात,मरतात,ते ते सारे एकाच कुटुंबातले.बुद्धांना प्रत्येक प्राणमय वस्तू, प्रत्येक जीव म्हणजे करुणेचे काव्य वाटे.मानवी वेदनांची भाषा जितक्या कोमलतेने ते जाणत तितक्याच कोमलतेने पशुपक्ष्यांचीही अस्पष्ट वेदना त्यांना कळे.मूसाप्रमाणे बुद्धांनीही वागण्याचे दहा नियम दिले आहेत.त्या दहा आज्ञांतील पहिली व सर्वांत महत्त्वाची आज्ञा 


"कोणत्याही स्वरूपात जीवाची हिंसा करू नका." ही आहे.ज्या अर्थी आपणास जीव निर्माण करता येत नाही,त्या अर्थी त्याची हिंसा करण्याचाही हक्क आपणास नाही.त्यांच्या सर्व शिकवणीचा हा मुख्य आधार आहे.


बुद्धांच्या नीतिशास्त्रातील दुसरी महत्त्वाची तत्त्वे म्हणजे नेमस्तपणा,सहनशीलता,प्रेम,इत्यादी होत.स्वतःच्या कृतीने नेमस्तपणाचे,संयमाचे महत्त्व त्यांनी पदोपदी दाखवून दिले आहे.अत्यंत सुखसंपन्न अशा घराण्यात ते जन्मले होते.परंतु त्या सुखांना ते - लवकरच विटले.नंतर ते स्वतःच्या देहाला अत्यंत क्लेश देऊ लागले.परंतु या आत्यंतिक देहदंडनेचाही त्यांना वीट आला. शेवटी मध्यम मार्ग त्यांनी पसंत केला.मध्यम मार्गात सुख आहे असे त्यांनी सांगितले.अतिरेक कशाचाही नको,अति तिथे माती,मनाचे लाड पुरविण्यापेक्षा मनावर अंकुश ठेवणे हेच हिताचे, असे त्यांनी शिकवले.भोगांध होणे,सत्तांध होणे, विजयांध होणे इत्यादींचा त्यांनी धिक्कार केला. या तिन्ही गोष्टींनी मनुष्य शेवटी बुद्धिष्ट होतो, असे ते म्हणत.अतीमहत्त्वाकांक्षा आत्म्याच्या रोगटपणाची खूण होय,दुर्बलांवर सत्ता चालवू पाहणे युद्धात विजय मिळण्याची इच्छा करणे, या साऱ्या आत्म्याच्या विकृती होत.विजय म्हणजे मृत्यूची जननी विजयी होण्याची इच्छा करणे आपल्याच बंधूंचा हेवादावा करणे; आणि आपल्या भावांचा द्वेष करणे ही गोष्ट मृत्यूहूनही वाईट होय.


परंतु मानवी मनात विजयतृष्णा आहे.ही विजयतृष्णा कशी जिंकायची? बुद्ध म्हणाले, "सहनशीलतेने"जो जिंकायला येईल त्याला क्षमा करा.त्या विजिगीषू माणसाची कीव करा.ते एक रोगी बालक आहे असे समजा.द्वेषाची परतफेड मैत्रीने व स्नेहाने करा.याच मार्गाने जगातील ही भांडखोर व रानटी मुले एके दिवशी सुसंस्कृत व शांतिप्रिय अशी माणसे होतील.दुसऱ्याला दुःख न देता स्वतः सारे सहन करण्याचे शौर्य त्यांनी शिकविले.दुसऱ्याची हिंसा न करता स्वतः मरण्याचे धैर्य त्यांनी शिकविले.एक गोष्ट खरोखर त्यांनीच शिकविली.ती म्हणजे सहनशीलपणा,सारे मुकाट्याने सहन करा. पौर्वात्यांची ही सोशीकता निस्सीम आहे.तसेच सहिष्णूताही त्यांनी शिकविली.बुद्धधर्मी मनुष्य म्हणजे पृथ्वीवरचा अत्यंत सहिष्णु प्राणी होय. मुसलमानाप्रमाणे किंवा ख्रिस्ती लोकांप्रमाणे धर्मयुद्ध करीत बुद्धधर्मीयांनी रक्त सांडले नाही. बुद्धांच्या नावाने कोणाही परमधर्मीयाचा त्यांनी कधीही छळ केला नाही.


बुद्धांनी परमेश्वराचे वैभव शिकविले नाही,तर प्रेमाचे सामर्थ्य शिकविले."सारा संसार प्रेमाने आनंदमय करणे" हे त्यांचे ध्येय होते.दुःखी, दरिद्री लोकांत राहण्यासाठी त्यांनी राज्यत्याग केला.बुद्धांची शांती देणारी परममंगल वाणी कानी पडावी म्हणून एक भिकारी त्यांच्याकडे आला.या भिकाऱ्याला मंगल आशीर्वाद देणे हे जीवनातील त्यांचे शेवटचे कर्म होते.ते आता ८० वर्षांचे होते.लोहार जातीचा त्यांचा एक शिष्य होता.त्या गरीब शिष्याकडे ते जेवले आणि त्यांना आजार जडला.ते कसेतरी मोकळ्या शेतात गेले. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, "पर्णमय शय्येवर मला ठेवा." पुन्हा ते म्हणाले, "मी आजारी पडलो म्हणून त्या लोहाराला नकाहो नावे ठेवू."


बुद्धांचे प्राण निघून जाण्याची वेळ आली. बुद्धांजवळ काही उपदेशपर शब्दांची भिक्षा मागण्यासाठी एक अस्पृश्य आला होता.त्या अती शूद्राला त्यांनी आपल्याजवळ बोलावले.त्या मरणोन्मुख महात्म्याने,त्या आसन्नमरण राजर्षीने त्या भिकाऱ्याचा हात आपल्या हातात घेतला. त्या दुःखी बंधूजवळ प्रेमाचे व करुणेचे दोन शब्द तो बोलला आणि त्याचा प्राण गेला.


जवळजवळ दोन हजार वर्षे बुद्धांच्या शिकवणीचा निम्म्या मानवजातीवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होत आहे.भूतदया, सहनशीलता,सहिष्णुता,प्रेम यांची त्यांनी दिलेली थोर शिकवण परिणाम करीत आहे.आता उरलेली निम्मी मानवजातही बुद्धांची ती वाणी ऐकायला उभी राहात आहे.तो संदेश ऐकायला आरंभ करीत आहे.


समाप्त .. 

९ मार्च २०२३ या लेखातील शेवटचा भाग.


११/३/२३

उन्नत क्षण आपल्याला शोधत येतात,आपण फक्त जागं असलं पाहिजे!

फोन आला.पत्ता मिळाला.मी त्या घरापाशी टॅक्सी नेऊन थांबवली,हॉर्न वाजवला आणि बरीच मिनिटं थांबलो.कस्टमर काही बाहेर येईना.


शेवटी उतरून दारापाशी जाऊन कडी वाजवली.

"आले, आले.." एक कापरा,वृद्ध आवाज आणि फरशीवरून काहीतरी ओढल्याची जाणीव बर्‍याच वेळाने दार उघडलं नक्षीकामाच्या झग्यात आणि फुला-फुलांच्या हॅट मधली

चाळीस सालच्या चित्रपटातून उतरून आलेली एक नव्वदीची वृद्धा.


हातातल्या दोरीमागे नायलॉनची बॅग आणि त्यामागे एक आवरलेलं,स्तब्ध शांततेतलं निर्मनुष्य घर,बिनभांड्यांचं स्वयंपाक घर,आणि बिन घड्याळाची भिंत


"माझी बॅग नेणार का उचलून गाडीत?"

मी एका हातात बॅग घेऊन दुसर्‍याने त्या वृद्धेला हात दिला "थॅंक यू!"

"त्यात काय मोठंसं, मी नेहेमीच करतो अशी मदत माझ्या आईलाही इतरांनी असंच वागवावं म्हणून."

"किती छान बोललास रे बाबा! थॅंक यू!"

तिने पत्ता दिला मला,आणि म्हणाली

"आपण शहरातून जाऊयात का?"

"ते लांबून पडेल.."

"पडू देत रे,मला कुठे घाईये..

वृद्धाश्रमात जातेय मी,आता तोच स्टॉप शेवटचा.!


मी आरश्यातून मागे पाहिलं

तिचे ओले डोळे चकाकले

"माझं कुणी राहिलं नाहीये...

आणि डॉक्टर म्हणतात

आयुष्यही फार राहिलं नाही"


मी हात लांबवून मीटर बंद केलं

"कुठून जावूयात?"

पुढचे दोन तास आम्ही शहरभर फिरलो. गल्ल्या-बोळातून,हमरस्त्यांवरून ती कुठे काम करायची ते तिनं दाखवलं.ती आणि तिचा नवरा लग्न करून रहायला आले ते घर दाखवलं.

एका जुन्या गोदामापुढे गाडी थांबवून म्हणाली, "पूर्वी इथे नृत्यशाळा होती,मी नाचले आहे इथे" काही ठिकाणी नुसतीच कोपर्‍यावर टॅक्सी थांबे. ती टक लावून इमारतीकडे पाही,अबोलपणे मग खुणेने "चल" म्हणे


सूर्य मंदावला,"थकले मी आता,चल जाऊयात"

आम्ही अबोल्यात वृद्धाश्रमात पोहोचलो टॅक्सी थांबताच दोन परिचारक पुढे आले.तिला व्हीलचेअर मध्ये बसवून तिची बॅग घेते झाले.तिने पर्स उघडली,"किती द्यायचे रे बाळा?"


"काही नाही आई,आशीर्वाद द्या."


"अरे तुला कुटुंब असेल,आणि पोटा-पाण्याची..."

"हो,पण इतर प्रवासीही आहेत,होईल सोय त्याची"खाली वाकून म्हातारीला जवळ घेतलं आणि चटकन् टॅक्सीत बसलो,डोळे चुकवत..

"मला म्हातारीला आनंद दिलास रे,सुखी रहा!"


व्हीलचेअर फिरली,गाडी फिरली माझ्या मागे 

दार बंद झालं,तो आवाज एका आयुष्याच्या बंद होण्याचा होता.


उरल्या दिवसभर मी एकही प्रवासी शोधला नाही शहरभर फिरत राहिलो,असाच विचारांत हरवून,माझ्या ऐवजी,

पाळी संपत असलेला एखादा चिडका ड्रायव्हर भेटला असता तर..मीही स्वतःच,एकदा हॉर्न वाजवून,निघून गेलो असतो तर.मला जाणवलं,मी काही खास केलं नव्हतं,


उन्नत क्षण आपण शोधून मिळत नसतात,ते क्षण आपल्याला शोधत येतात,आपण फक्त जागं असलं पाहिजे!


Original English version by Kent Nerburn.. Cab Ride - उन्नत क्षण