* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१४/५/२३

कृत्रिम बुद्धिमत्ता : काल,आज आणि उद्या

१९५० साली मांडलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आज प्रत्यक्षात आलेली दिसते. आपल्या हातातल्या भ्रमणध्वनीपासून ते मंगळावर जाणाऱ्या यानांपर्यंत आणि खेळ खेळणाऱ्या संगणकांपासून ते विनाचालक वाहनांपर्यंत आज सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता आपली अनिवार्यता पटवून देत आहे. विश्व व्यापून दशांगुळे उरणाऱ्या या कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास,प्रवास आणि भविष्याचा आढावा घेणारा हा लेख.


कृत्रिम बुद्धिमत्ता,आर्टिफिशियल इंटेलिजन्स 'एआय'चा उल्लेख आजच्या काळात सहजपणे होऊ लागला आहे.

ह्या संज्ञा जनमानसात प्रचलित होत आहेत.अमेझॉनची 'अलेक्सा', ॲपलचे सिरी सारखे मदतनीस,आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तत्पर आहेत,तर आंतरजालावर आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायला आवडतील याचा अंदाज लावण्यापर्यंत,आधुनिक जगात आपल्या अवतीभोवती कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वत्र आढळत आहे..


मानवनिर्मित प्रज्ञ- यंत्रमानवाच्या अस्तित्वाचा उल्लेख ग्रीक पौराणिक कथांमध्येही आल्याचे आढळते.ग्रीक तत्त्वज्ञ ऑरिस्टॉटलने तर्कशुद्ध विचार करण्याचा युक्तिवाद (सिलॉजिजम) सर्वप्रथम केला.त्यात दोन किंवा अधिक स्वीकृत विधानांवरून,तर्कशुद्ध निष्कर्ष पद्धतशीरपणे काढला जातो आणि त्या आधारे तिसरे किंवा नवीन तार्किक विधान मांडले जाते. मनुष्याला जन्मजात मिळणाऱ्या बुद्धिमतेच्या क्षमतेचा स्वतःला दाखला देणारा तो महत्त्वपूर्ण क्षण होता.


ॲरिस्टॉटलने प्रस्तुत केलेल्या संकल्पनेपासून सुरुवात झाली असली,तरी ज्या स्तरावरील कृत्रिम बुद्धिमत्ता आजच्या काळात विचारात घेतली जाते आणि विकसित होत आहे.त्याचा इतिहास केवळ गेल्या शतकातला आहे.


१९५०च्या दशकात शास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि तत्त्वज्ञांच्या समुदायाने कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना केली.त्यात ब्रिटिश तरुण बहुज्ञ अॅलन ट्युरिंग होते,ज्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची गणितीय शक्यता शोधली.त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की,


'समस्या सोडवण्यासाठी आणि निर्णय घेताना मनुष्य उपलब्ध माहिती तसेच,कारणांचा आधार घेतात,तर यंत्रे तसे का करू शकणार नाहीत?' 


१९५० साली 'कम्प्यूटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स' ह्या शोधनिबंधात त्यांनी बुद्धिमान यंत्रे कशी तयार करत येतील आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी कशी करावी,

ह्यांची तार्किक चर्चा केली.ट्युरिंगची संकल्पना तात्त्विकरीत्या योग्य असली,तरी कार्य सुरु करताना अनेक अडथळे आले.संगणकांना मूलभूतपणे बदलण्याची सर्वप्रथम आवश्यकता होती; कारण १९४९ पर्यंत वापरात असलेले संगणक, 


आज्ञावली कार्यान्वित करू शकत होते,परंतु ते साठवण्याची तरतूद त्यांच्यात नव्हती.थोडक्यात सांगितलेले कार्य संगणक करू शकत होते परंतु काय केले ते स्मृतीत ठेवण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे,संगणक अत्यंत खर्चिक होते.केवळ प्रतिष्ठित विद्यापीठे आणि मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनाच ह्या अनोख्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे धारिष्ट करणे शक्य होते.


तसेच,प्रज्ञ यंत्र निर्मितीची संकल्पना निधी स्रोतांना पटवून देणाऱ्या समर्थकांची आवश्यकता होती.


संज्ञा बोध आणि आकलन (कॉग्निटिव्ह) विज्ञानावर संशोधन करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रवर्तक,जॉन मॅक् कार्थी आणि मार्विन मिन्स्की कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जातात.त्यांनी दिलेली व्याख्या अशी आहे.


कृत्रिम बुद्धिमत्ता ही यंत्रांची विशिष्ट कार्य करण्याची क्षमता आहे,ज्यासाठी मानवी बुद्धिमत्तेची आवश्यकता असते.


१९५६ साली डार्टमाउथ परिषदेत,मॅक् कार्थी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर मुक्त चर्चेसाठी विविध क्षेत्रांतील प्रमुख संशोधकांना एकत्र आणले. एका मोठ्या सहयोगी प्रयत्नाची कल्पना करून, कृत्रिम बुद्धिमत्ता ही संज्ञा त्यांनी,त्याच परिषदेत तयार केली.संज्ञानात्मक शास्त्रज्ञ मार्विन मिन्स्की तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल आशावादी होते;परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राबद्दल प्रमाणित पद्धती निश्चित करण्यासाठी परिषदेत अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकले नाही.तरीही कृत्रिम बुद्धिमत्ता साध्य करण्यायोग्य आहे ह्या विचारावर एकमत झाल्यामुळे संशोधनाने वेग घेतला.


१९५७ ते १९७४ हा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या भरभराटीचा काळ होता.जलद,वापरायला सुलभ आणि अधिक माहिती संचयित करणारे संगणक तयार होत होते,जे तुलनात्मक स्वस्त होते.यंत्र स्वयंअध्ययनाच्या ( मशीन लर्निंग) तर्कात सुधारणा होऊन,कोणती समस्या सोडवण्यासाठी कोणता तर्क उपयोगात आणायचा,ते ठरवता यायला लागले.हर्बर्ट सायमन,जॉन शॉ आणि अॅलन नेवेल ह्यांनी तयार केलेल्या 'जनरल प्रॉब्लेम सॉल्व्हर च्या साहाय्याने समस्या सोडवल्या जाऊ लागल्या,तर जोसेफ वायझेनबॉम यांनी तयार केलेल्या 'एलायझा' ह्या चॅटबॉटला बोलीभाषेचा अर्थबोध होत होता.


ह्या यशामुळे काही सरकारी संस्थांची खात्री पटली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनासाठी त्यांनी निधी मंजूर केल्यामुळे आशा आणि अपेक्षा उंचावल्या.सरकारी संस्थांना अशा यंत्रांमध्ये अधिक स्वारस्य होते,जे बोलीभाषेचे लिप्यांतर आणि भाषांतर कर शकतील,तसेच अपक्व माहितीवर (रॉ डेटा) प्रक्रिया करतील. भाषा आकलनाची मूळ तत्त्वे जरी तयार झाली असली,तरी नैसर्गिक भाषाप्रक्रियेचे (नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग) अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बराच लांबचा पल्ला गाठायचा होता.


संवाद साधण्यासाठी एका शब्दाचे अनेक अर्थ, त्याबरोबरच संदर्भ जाणून घेणे आवश्यक असते. सगळ्यांत मोठी समस्या अशी होती.काही ठोस करण्यासाठी तितक्या ताकदीच्या संगणकीय शक्तीचा अभाव त्यामुळे यंत्राद्वारे भाषानुवाद करण्यासाठी अपेक्षित यश मिळाले नाही.


त्यानंतर अडथळ्यांचे डोंगर उभे राहायला लागले आणि संशोधनाची गती मंदावली.कृत्रिम बुद्धिमत्तेचे दोन प्रमुख संशोधक,रॉजर रॉन्क आणि मार्विन मिन्स्की ह्यांनी व्यापारी समूहांना असा इशारा दिला होता,की


कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनकार्याचा उत्साह अनियंत्रित होत असल्यामुळे १९८०च्या दशकात नैराश्याची लहर उठेल.


ह्युबर्ट ड्रेफस यांनी भूतकाळातील कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाच्या सदोष गृहीतकांवर प्रकाश टाकला आणि १९६६ च्या सुरुवातीला अचूक भाकीत केले,की कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाची पहिली लाट सार्वजनिक आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरेल.


नोम चॉम्स्कींसारख्या समीक्षकांनी असा युक्तिवाद केला,की कृत्रिम बुद्धिमत्ता आंशिक प्रमाणात सांख्यिकीय तंत्रावर अवलंबून असल्याने संशोधन अयोग्य दिशेने जाण्याची शक्यता आहे.



१९७४ ते १९८० दरम्यान संशोधनासाठी मंजूर होणाऱ्या निधीत घट झाली.पर्यायाने संशोधनाचा वेग थंडावला,

टीका होऊ लागली,वातावरण निराशाजनक झाले.त्यामुळे हा काळ 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा शीतकाल' समजला जातो.

कृत्रिम बुद्धिमत्ता समुदायात निराशावादाने सुरवात होऊन त्याला श्रृंखलाक्रियेचे स्वरूप आले.त्याचे पर्यवसान कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन न होण्यात झाले.


विकासकांनी दिलेली अवाजवी आश्वासने, वापरकर्त्यांच्या अवास्तव अपेक्षा आणि जाहिरातबाजीचा अतिरेक कारणीभूत झाला. काही वेळा नवीन तंत्रज्ञान उदयाला येण्याआधी त्याचा प्रमाणाबाहेर उदोउदो होतो,तसेच काहीसे झाले.कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून असेलेले अब्जावधी डॉलर्सचे उद्योग-व्यवसाय कोसळू लागले.


१९८०च्या दशकात गणितीय तर्काचा विस्तार होऊन तंत्रज्ञानासाठी दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ झाल्यावर उत्साह पुन्हा सळसळायला लागला.१९९०च्या दशकात कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल आस्था वाढत जाऊन आशावाद निर्माण झाला.


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात असे उतार-चढाव आले,तरीही यशस्वी तंत्रज्ञान विकसित होत आहे.'शीतकाल' कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला मिटवू शकला नाही.ती अल्पकालीन स्थिती होती.आज हजारो अनुप्रयोग (अॅप्लिकेशन) कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनेवर विकसित झाले आहेत.


१९९०च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान मोठ्या प्रणालींचा घटक म्हणून वापरले जाऊ लागले.पूर्वी विज्ञानकल्पनेच्या क्षेत्रात असणाऱ्या किंवा वाङ्मयाच्या कपोलकल्पित कक्षेत असलेल्या अनेक नवकल्पनांचे वास्तवात रूपांतरण गेल्या काही दशकांमध्ये झाल्याचे प्रकर्षाने जाणवते.


यंत्रांना किती आणि काय-काय शिकवायचे त्याला कधीतरी मर्यादा येतील,त्यामुळे मानवासारखी विचारशक्ती आणि बुद्धिमत्ता जर यंत्रांमध्ये निर्माण करायची असेल,तर यंत्राच्या स्वयं-अध्ययनाची आवश्यकता भासायला लागली.जॉन हॉपफील्ड आणि डेव्हिड रुमेलहार्ट यांनी गहन अध्ययन (डीप लर्निंग) तंत्र लोकप्रिय केले,ज्यामुळे संगणकांना पूर्वानुभवरून शिकणे शक्य झाले.


मोठ्या प्रमाणातील मजकूर,प्रतिमा,ध्वनिफीत, चित्रफीत यांसारख्या असंरचित माहितीचा संचय यंत्रे गहन स्वाध्यायात करतात.मानवाच्या साहाय्यातेशिवाय पूर्वीचे संदर्भ आणि विद्यमान माहितीच्या आधारे यंत्रे स्वअध्ययन करण्यासाठी सक्षम होतात.


विशेषज्ञ तंत्राचे (एक्स्पर्ट सिस्टिम) जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगणकशास्त्रज्ञ एडवर्ड फीगेनबॉमने मानवाच्या निर्णयप्रक्रियेसदृश तज्ज्ञ प्रणाली सादर केली.


एखाद्या क्षेत्रातील तज्ञाने ठरावीक परिस्थितीत दिलेल्या प्रतिसादाचे रूपांतर संगणक प्रणालीत केले,तर तीच प्रणाली वापरून तज्ज्ञ नसलेली कोणतीही व्यक्ती सल्ला देऊ शकेल,असा त्यामागचा हेतू होता. उद्योग-व्यवसायांमध्ये तज्ज प्रणाली मोठ्या प्रमाणात वापरल्या जाऊ लागल्या.


काय बदल झाला असेल ज्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला पुन्हा सोन्याचे दिवस आले असतील,असा प्रश्न मनात येतो.आज्ञावली लिहिण्याचे तंत्र बुद्धिमान झाले?की संगणक प्रणाली तयार करणारे अधिक बुद्धिमान झाले? असे दिसून येते,की संगणकाचे स्मृति-तंत्र सुधारित झाले.


संगणकाची माहिती संचयनाची मर्यादा कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाला मागे खेचत होती.गॉर्डन मूर ह्यांनी निर्धारित केलेल्या 'मूर नियमानुसार संगणकाची संचयनक्षमता आणि गती दरवर्षी दुप्पट होते.परंतु,मूरने वर्तवलेला वेग आणि संचय प्रत्यक्षात साध्य करण्यासाठी विलंब होत होता.जवळपास तीस वर्षांच्या कालखंडानंतर तंत्रज्ञानाने मूरच्या नियमाला गाठले.


तर्क-वितर्काच्या आधारे कृत्रिम बुद्धिमत्ता संगणकाला विवेकी कार्यासाठी सक्षम करते. १९९७ साली,

'आयबीएम'ने बुद्धिबळात निपुण विशेषज्ञ प्रणालीचा महासंगणक 'डीप ब्लू' निर्माण केला.रशियन ग्रॅण्डमास्टर गॅरी कास्परोव्हला शह देऊन हरवणाऱ्या पहिल्या संगणकाने इतिहास रचला.कृत्रिमरीत्या बुद्धिमान निर्णय घेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेल्याने,हा सामना सुप्रसिद्ध झाला.


सॉफ्टवेअर विकसित करून विंडोज कार्यप्रणालीवर कार्यान्वित केले.बोलीभाषेचा अर्थ लावण्याच्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे पडले.रोबोटिक्स शास्त्रज्ञ सिंथिया ब्रेझिल ने तयार केलेला यंत्रमानव 'किस्मत',

भावना ओळखण्यात आणि प्रदर्शित करण्यात यशस्वी ठरला.


२००५ ते २०१९ दरम्यान वाक् आणि भाष्य अभिज्ञान,

स्वचलित यांत्रिक प्रक्रिया (रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन),

वस्तु-आंतरजाल (इन्टरनेट ऑफ थिंग्स),सक्षम निवासस्थान (स्मार्ट होम) तत्सम तंत्रज्ञानाला गती मिळाली.


भाषांतर,संगणकीय प्रतिमा ओळखणे,खेळात निष्णात संगणकप्रणाली यांत बहुतांश प्रगती आणि यश २०१० पासून मिळाले.


२०१२ साली संशोधन आणि उद्योग-व्यवसायांना यंत्र- स्वयंअध्ययन क्षेत्रात स्वारस्य निर्माण झाल्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेकरिता होणाऱ्या गुंतवणूक आणि निधीत आकस्मिक वाढ झाली.


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेला संगणकीय शक्तीच्या (वेग आणि संचय) पातळीवर आणल्यावर तंत्र हाताळू शकणार नाहीत अशी कोणतीच समस्या उरणार नाही,असे वाटायला लागले. ह्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनात आलेल्या उतार-चढावांच्या कारणांना पुष्टी मिळते.


आपण सध्या 'बिग डेटा'च्या युगात आहोत. आपल्याकडे प्रचंड प्रमाणात माहिती गोळा करण्याची क्षमता आहे;परंतु त्यावर प्रक्रिया करणे किचकट आणि गुंतागुंतीचे असते.

मूरचा नियम कदाचित तंतोतंत साध्य होत नसेल;परंतु संगणकीय विदा (डेटा) जमा होण्याचा वेग मंदावलेला दिसत नाही.


निरीक्षण,विश्लेषणक्षमता,समस्यांची उकल, अध्ययन हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म समजले जातात.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने प्रणाली तयार करताना,

गणिती तार्किक पद्धती बुद्धिमत्तेत विलीन होते.ह्या संयोगामुळे अपक्व माहितीमधील वैशिष्ट्य ओळखून,

विश्लेषण करून,प्रतिरूप देता येते.


यंत्र जर मनुष्याची स्वभाववैशिष्ट्ये,क्षमता आणि बौद्धिक शक्ती वेगाने स्वतःत निर्माण करू शकले,तर त्याच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आहे असे म्हणता येईल.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मानवी बुद्धीप्रमाणे विचार करणारा संगणक, कार्य करणारा संगणक-नियंत्रित यंत्रमानव किंवा सॉफ्टवेअर तयार करता येते.


काही यंत्रे केवळ एकाच विशेष कार्यासाठी तयार केली जातात.कार्याचा विशिष्ट उद्देश समजून घेऊन ते साध्य करण्यासाठी अशी यंत्रे समर्थ असतात उदाहरणार्थ बुद्धिबळात खेळी ओळखून सर्वोत्तम संभाव्य चाल ठरवणारी संगणक प्रणाली तर,काही यंत्रणा साठवलेल्या माहितीच्या आधारे साजेशी गाणी,प्रेक्षणीय स्थळे सुचवतात.


आपल्या घरापासून ते रस्त्यावरच्या गाड्यांपर्यंत सगळीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत असल्याचे दिसत आहे.आपल्या दैनंदिन जीवनावर आणि कार्यावर यंत्रे आणि संगणकांचा परिणाम होत आहे.प्रभाव पडत आहे.कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्व वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे,त्यात नजीकच्या काळात झपाट्याने होणारी उत्क्रांती.स्वचलित यांत्रिक प्रक्रिया (रोबोटिक्स) आणि वस्तु आंतरजाल या तंत्रज्ञानांच्या साहाय्याने आंतरजालग्राही साधने (वेव-एनेबल्ड डिव्हायसेस) स्वतः आकलन करू शकतील,असे कौशल्य त्यांच्यात निर्माण केले जात आहे.


कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र व्यापक होत आहे.अनेक शाखा- उपशाखांमध्ये विस्तारित होत आहे. तंत्रज्ञान,बैंकिंग,क्रय-विक्रय,शिक्षण,कृषिउद्योग, विज्ञान,आधारभूत संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर),ऊर्जा अशा अनेक क्षेत्रांकरिता फलदायी ठरत आहे. अनेक अत्याधुनिक अनुप्रयोगांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार असल्याचे गृहीत धरले जात आहे.


वैद्यकीय क्षेत्रात,लक्षणांवरून रोगनिदान करण्यापासून,

औषधोपचार आणि शस्त्रक्रियेसंबंधित प्रक्रियेपर्यंत फार मोलाची मदत होत आहे.यंत्राच्या साहाय्याने शल्यचिकित्सा करताना किमान छेद देऊन शस्त्रक्रिया करणे संभव होत आहे.तसेच,रुग्णांचे अहोरात्र निरीक्षण करून त्यांना अखंड आरोग्यसेवा देण्यासाठी यांत्रिक मदतनीस म्हणजे चालते-फिरते यंत्रमानव तयार केले जात आहेत.


बैंक आणि वित्तीय संस्थांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असते.तिथल्या आर्थिक व्यवहारांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने लक्ष ठेवले जात आहे.डेबिट / क्रेडिट कार्डावर संशयास्पद किंवा अनपेक्षित व्यवहार आढळले, तर गैरव्यवहारांचा शोध घेणे आणि वेळीच आळा घालणे शक्य झाले आहे.


खेळ आणि मनोरंजन क्षेत्राने तर फारच भरारी घेतली आहे.आपली आवड ओळखून साधने, गाण्यांचा अल्बम आपल्यासाठी तयार करतात. चित्रपट,मालिका सुचवतात.शिवाय आंतरजालावर खेळताना इतर खेळाडूंची आवश्यकता पडत नाही.कारण त्यांची जागा बॉट्सनी घेतली आहे.चित्रालेख (ग्राफिक्स) आणि 'चेतनीकरण'(ॲनिमेशन) प्रगत झाल्यामुळे आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिअँलिटी) विश्व आपल्या पसंतीप्रमाणे आपल्याला आपल्या उभे करता येते.


मासिक मराठी विज्ञान परिषद पत्रिका,नोव्हेंबर २०२२

वैशाली फाटक-काटकर,माहिती - तंत्रज्ञान तज्ञ

भाग - १





१२/५/२३

अघटित सत्यघटना..!

मी नोकरीवर अलिबागला रुजू झालो.

येणारी प्रत्येक केस माझ्या पुस्तकी ज्ञानात भर टाकत होती.प्रत्येक पेशंट शिकवत होता.


त्या दुपारी अशीच एक स्त्री आली.


लग्न होऊन ११ वर्षांनंतर नवसासायासाने

आलेले गर्भारपण.पण काय व्हावं ?


आमच्या अलिबागच्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या बैलानं नेमकी हिला ढुशी दिली आणि शिंग तिच्या पोटाला भोसकून बाहेर आलं ! तिला साऱ्यांनी मिळून हॉस्पिटलमध्ये आणलं होतं.जखम पाहिली तर पोट भोसकले गेले होते.


त्यामधून डोकावत होतं उदरपोकळीचं संरक्षक आवरण,आतड्यांचं एक वळण व बाळाचा एक हात ! जखम अगदी नुकतीच झालेली होती.हाताच्या आणि आतड्याच्या हालचाली दिसत होत्या. ही ७ महिन्यांची पहिलटकरीण.तिच्या दृष्टीनं हे दृश्य काही बरे लक्षण नव्हते. शिंगाने गर्भाशयाची भिंतही छेदली होती.त्यातून बाहेर आलेला तो चिमुकला हात 'काही तरी करा हो' म्हणून विनवणी करीत होता जणू.परिस्थिती गंभीर होती.

आता एकूण प्रसंग बघा.


गर्भाशयाला इजा म्हणजे बाळालाही इजा झालेली असण्याची शक्यता.


तसं असेल तर आता सातव्यातच बाळंतपण करावं लागणार.म्हणजे मग मूल जगण्याची आशा फारच कमी.


त्या साठीही सिझेरियन करावं लागणार,म्हणजे पोटावर वण येणार आणि शिवाय मुलाचीही खात्री नाही.काय उपयोग ?


आईच्या जीवासाठी हे करणं भाग पडू शकते आणि मुलाच्या जीवाला धोका संभवू शकतो ही गोष्ट मी नातेवाईकांना तातडीने समजावून सांगितली.


आता त्या घरातलं हे बाळ म्हणजे

किती मोलाचं कौतुक.त्याच्या जन्मघडीची सारे घरदार वाट बघत बसलेलं.किती बेत,किती स्वप्नं जन्माआधीच त्याच्या भोवती विणलेली असतील !


रोजच्या रस्त्याने जाता-जाता सांडाने सारं क्षणात उधळून दिलं.मी सांगायला गेल्यावर त्यांनी निक्षून सांगितलं, "की आईचा जीव वाचवायचा बघा.बाळाला हात लावू नका."

 ते मला लिहून द्यायला तयार होते.पण

त्यांच्या सहीने शस्त्रक्रियेमधील प्रश्न कुठे सुटत होता?

तांत्रिक बाबी पुऱ्या होतील पण सद्सद्विवेक बुद्धीचं काय? 

मी बाळाबाबतची त्यांची अट न स्वीकारता ऑपरेशन करण्याचे मान्य केलं.मुला बाबत काहीही न केलं तर आईच्या जीवाला धोका पोहोचू शकतो,अशा वेळी मला योग्य वाटेल ते मी करीन असे सांगितले.पण ते ठाम होते.प्रसंग आणीबाणीचा होता.मी माझ्या विवेकाला स्मरुन ठरवलं,की बाहेर आलेला हात आत लोटून गर्भाशय शिवून घेता आले तर ठीक. नाहीतर बाळंतपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन जादा रक्तस्त्राव झाल्यामुळे आईचा जीव वाचवण्यासाठी हे करावं लागलं,असं सांगण्याचं मी ठरवलं.

 

मी नाही म्हटले असते तर ते तरी कोठे जाणार  होते?

१०० मैलांपर्यंत काही सोयीही नव्हत्या.


मी पोटावर छेद घेतला.इतर इजा फार गंभीर नव्हती.गर्भाशयानेच पुढे राहून इतर अवयवांचे रक्षण केले होते.पण बाळाचा हात काही केल्या आत जाईना.


गर्भाशयाचे स्नायू चांगलेच जाड व भक्कम असतात.हाताभोवती त्यांचं घट्ट आकुंचन झाले होते.गर्भाशयाला सुदैवाने दुसरी काही इजा नव्हती.


 हा एवढा हात आत गेला आणि जखम शिवली की माझं कर्तव्य पार पडलं असं माझ्या मनात येत होतं.


पण नेमकं तेच होत नव्हतं आणि तो चिमुकला हात आता पांढरा पडायला लागला होता.हे लक्षण धोक्याचं होतं.रुधिराभिसरण थांबलं की अवयव प्रथम निळा पडतो आणि मग पांढरा.पुढचा टप्पा

म्हणजे गॅंगरीन!हात कापून तर गर्भाशय शिवता येणार नव्हते.


माझ्या मनात असला विचार डोकावून गेला याचाच मला धक्का बसला.


पण मी घायकुतीला आलो होतो आणि या छोट्या हाताशी झगडताना रंजीस आलो होतो.


माझ्यावरचा हा पेचप्रसंग आमच्या जुन्या वॉर्डबॉयच्या लक्षात आला. त्याचं नाव सांडे !


तो ऑपरेशन थिएटर मध्ये डोकावला.आता हा प्राणी कायमच प्यायलेला असायचा.तारेतच चालायचा.

त्याच्या ' आनंदाला ' व्यत्यय तो कसा माहीतच नव्हता.त्याला बघता क्षणी वाटायचं,याला 'चालता हो' म्हणावं.पण त्याचा कुणाला त्रास नसे आणि त्याचं काम तो चोख करीत असे.


थिएटरची स्वच्छता आणि शस्त्र क्रियेची सामुग्री निर्जंतुक करणं ही त्याची नेमलेली कामं.आधीच माझ्याकडे मनुष्य बळ कमी.त्यात याला जाऊ देणं परवडण्यासारखं नव्हतं.


शिवाय त्याची एक जमेची बाजू म्हणजे त्याच्या कधीही दांड्या नसायच्या.नेहमी कामावर हजर !


मी तो हात हलके आत लोटण्यासाठी झगडत होतो.


तेवढ्यात सांडे म्हणाला,

"साहेब,गरम सुईचा चटका द्या हाताला,हात दचकून मागे जाईल! "


मी मेडिकलचे शिक्षण घेतलं त्या रुग्णालयात किंवा अभ्यासासाठी पालथ्या घातलेल्या पुस्तकांत ही सूचना नव्हती.पण माझे सर्व पर्याय संपले होते.


मन घट्ट करून आणि परमेश्वराचे नाव घेऊन, मनात लाख वेळा त्या बाळाला सॉरी म्हणत एक इंजेक्शनची सुई लाल तापवून मी त्या हातावर टेकवली.


आणि..... खरंच हात आत गेला !

मुलानं ओढून घेतला म्हणायला हवं. 

मग सगळं एकदम सोपं झालं. 


आश्चर्य म्हणजे बाई पूर्ण दिवस घेऊन सुखरूप बाळंत झाली आणि बाळाच्या हातावर डागाचा कसलाही मागमूस नव्हता !


हा सगळा दैवी चमत्कारच म्हणावा लागेल.

गुरू, हा  माणसाला कोणत्या रुपात भेटेल हे सांगता येत नाही हेच खरे.कल्पनातीत अडथळ्यांमधूनही सुखरूप सुटका हे अघटीतच घडले होते. 


यालाच, 'ही तर श्रींची इच्छा' म्हणत असावेत. 


हा आमचा वॉर्डबॉय आता हयात नाही.मी इतर कुणाची नावे घेतली नाहीत,


पण या थरार नाट्याच्या सुखांत शेवटाचे श्रेय हे त्याचेच आहे. 


पुढे त्याच्या ' सांडे ' आडनावावरून आमच्यात एक विनोद प्रचलित झाला होता, 

'सांडानं मारलं पण सांडेनं तारलं ! ' 


( " Behind the mask " या डॉ.सुभाष मुंजे 

या शल्यविशारदाने लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या श्यामला वनारसे यांनी ' बिहाइंड द मास्क ' याच नावाने केलेल्या अनुवादित व मॅजेस्टिक प्रकाशन,मुंबई 

प्रकाशित पुस्तकातून वेचलेला एक थक्क करणारा अनुभव.


मित्र एन.के यांनी व्हाट्सअप वरती पाठविलेली कथा..

१०/५/२३

झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन.. ' समाजसुरक्षा '

बागकाम करणाऱ्या माळ्यांकडून मला अनेक वेळा विचारणा होते की,आमची झाडं फार जवळजवळ तर लावली गेली नाहीत ना? ते एकमेकांचा सूर्यप्रकाश किंवा पाणी तर हिसकावून घेणार नाहीत ना?व्यावसायिक वनीकरण करणाऱ्यांच्या दृष्टीने ही शंका रास्त आहे.कारण झाडाचा घेर झटपट वाढवून लाकूड तयार होण्यासाठी त्यांची खटपट चालू असते. पानं छान गोलाकारात पसरली की झाडांची वाढ लवकर होते खरी,पण त्यासाठी ऐसपैस जागा लागते.लागवडीची झाडं सुमारे पाच वर्षात काढली जातात.त्यांची वाढ लवकर व्हावी यासाठी त्यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या वनस्पती छाटून टाकल्या जातात आणि आपल्या झाडांना मुक्तपणे वाढवू दिलं जातं.व्यावसायिक लागवडीत झाडं फार काळ नसतात कारण लाकडासाठी त्यांची कत्तल होणार असते.त्यामुळे या पद्धतीच्या व्यवस्थापनाची वैगुण्यं कधीच जाणवतच नाही.


पण यात कसली वैगुण्यं आली? हे योग्यच आहे ना की,

स्पर्धा करणारी झाडे जर आजूबाजूला वाढत नसतील तर अधिक सूर्यप्रकाश आणि मुबलक पाणी मिळाल्यामुळे लागवडीच्या झाडांची झपाट्याने वाढ होईलच.हो,हे भिन्न प्रजातीच्या झाडांबाबत बरोबर आहे.भिन्न प्रजातीच्या झाडांत जीवनावश्यक संसाधनांसाठी एकमेकांत चढाओढ चालू असतेच,पण एकाच प्रजातीच्या झाडांमध्ये तसं होत नाही.आपण आधीच्या प्रकरणात पाहिलं की,


बीच झाडांमध्ये मैत्री केली जाते आणि एकमेकांना पोषणद्रव्यं पुरवली जातात.कारण जंगलातील कमकुवत सभासदांना गमावून सर्वांनाच तोटा होत असतो. एखादा सभासद वठला तर जंगलाच्या आच्छादनात खिंडार पडून परिसंस्थेच्या सूक्ष्म हवामानाचे संतुलन बिघडते.ही अडचण नसती तर कदाचित प्रत्येकच झाड स्वैरपणे वाढलं असतं.मी 'कदाचित' असं म्हटलं,कारण बीच झाडांमध्ये संसाधनांचा मिळून उपभोग घेण्यात फायदे आहेत.


आर.डब्ल्यू.टी.एच.आकेनमध्ये असलेल्या इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायरमेंटल रिसर्चच्या काही विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीच्या बीच वृक्षांच्या जंगलात चालणाऱ्या प्रकाश संश्लेषणात एक चमत्कारिक गोष्ट आढळून आली.त्यांना असं दिसलं की अशा जंगलातील झाडं एकमेकांशी ताळमेळ बसवत आपलं कार्य करत असतात, ज्यामुळे सर्वांचं प्रकाश संश्लेषण यशस्वी होतं. पण हे तर आपल्या अपेक्षेविरुद्ध आहे,कारण प्रत्येक बीचचं झाड भिन्न परिस्थितीत वाढत असतं.काही जास्त खडकाळ भागात असतात तर काहींना अधिक पाणी मिळतं.काहींच्या मातीत पोषणद्रव्यं मुबलक असतात तर काही अगदी उघड्या जमिनीवर वाढत असतात. त्यामुळे प्रत्येक झाडाची वाढ कमी जास्त होते. काही ठिकाणी पोषणद्रव्यं भरपूर असतात तर काही अगदीच ओसाड या कारणामुळे प्रत्येक झाडाचं प्रकाश संश्लेषण वेगळ्या प्रमाणात होत आहे,असं वाटणं साहजिकच आहे.


आणि म्हणूनच ह्या विद्यार्थ्यांचा बीच जंगलातला अनुभव आश्चर्यकारकच आहे.


बीच जंगलातल्या प्रत्येक झाडाच्या प्रकाश संश्लेषणाचा दर एकच असतो.


विद्यार्थ्यांना असं जाणवलं की जंगलांमधल्या सबळ आणि दुर्बल घटकांच्या प्रकाश संश्लेषण क्षमतेत समतोल साधला जात आहे.आपला घेर कितीही असला तरी एका प्रजातीच्या प्रत्येक झाडाचं प्रत्येक पान प्रकाशाचा वापर करून तेवढ्याच प्रमाणात साखर बनवतं,जेवढी साखर इतर पानं बनवतात. हा समतोल त्यांच्या मुळातून साधला जात होता. अर्थातच जमिनीखाली या झाडांची देवाणघेवाण आनंदाने चालू होती.ज्याच्याकडे जास्त साखर तयार होते. 


तो कमी उत्पादन करणाऱ्या सभासदाला हातभार लावत होता.आणि या विनिमयात त्या बीच वृक्षांना पुन्हा एकदा बुरशींची मदत मिळत होती.आपल्या प्रचंड जाळ्याचा वापर करून ते या वितरण व्यवस्थेत सामील होत होते. काही देशात सोशल सिक्युरिटी म्हणजे सरकारी सामाजिक सुरक्षा प्रक्रिया असते.

यामध्ये समाजात कोणी मागे पडू नये.याची काळजी घेतली जाते.बीचच्या या जंगलात असंच काहीसं चालू होतं. 


अशा प्रणालीमध्ये झाडांना एकमेकांपासून फार दूर राहता येत नाही.किंबहुना,आपल्या बांधवांबरोबर अगदी खेटून उभं राहणं त्यांना जास्त पसंत असतं.

अशामुळे वाढ झालेल्या जंगलात त्यांची खोडं एकमेकांपासून जेमतेम तीन फुटाच्या अंतरावर असतात आणि पालवीचा घेरही कमी असतो. 


व्यावसायिक वनीकरण करणाऱ्यांच्या मते झाडाच्या वाढीसाठी ही योग्य परिस्थिती नाही आणि मधली झाडं कापून टाकून वाढीसाठी जागा केली पाहिजे.परंतु 


जर्मनीतील लूबेक मधील माझ्या काही सहकाऱ्यांच्या अभ्यासात असे आढळलं की,दाटीवाटीने वाढलेल्या बीच जंगलात उत्पादकता अधिक असते आणि वर्षाभरात जंगलातून लाकडाव्यतिरिक्त इतर जैविक मालात वाढ झाली तर ते निरोगी जंगल परिसंस्थेचं लक्षण समजलं जातं. 


सहकार्याने जेव्हा झाडं एकत्र वाढतात तेव्हा पोषणद्रव्यं आणि पाण्याचं योग्य वितरण होऊ शकतं आणि प्रत्येक झाडाला आपल्या क्षमतेनुसार वाढता येतं.पण जेव्हा आपण एका झाडाला मदत म्हणून त्याच्या तथाकथित 'स्पर्धकांना' काढून टाकतो.तेव्हा इतर झाडं 


एकटी पडतात.मग आपल्या शेजाऱ्याला एखादा संदेश पाठवला तर तो वाया जातो,कारण शेजारी फक्त खुंट उरलेले असतात.


अशा परिस्थितीत प्रत्येक झाडाला स्वतःच्या जोरावर जगावं लागतं आणि त्या वेळेस प्रत्येकाची जैविक उत्पादकता वेगवेगळी होते. काही झाडं मोठ्या जोमाने साखरेचं उत्पादन करतात आणि धष्टपुष्ट बनतात.पण याचा अर्थ ते दीर्घायुषी होतात असं नव्हे,कारण एका झाडाचं आरोग्य जंगलाच्या आरोग्यापेक्षा फार काही वेगळं नसतं.या परिस्थितीत जंगलात अनेक झाडं अपयशी ठरू शकतात.ज्या अशक्त झाडांना इतरांकडून मदत मिळू शकली असती ते आता मागे पडत जातात.

प्रतिकूल जागेमुळे असो,पोषणाअभावी असो,तात्पुरती कमजोरी असो किंवा जनुकीय रचना कमकुवत असो; कारण कोणतंही असलं तरी अशी झाडं कीटक आणि बुरशींच्या आहारी जाऊ लागतात.


आता तुम्ही विचाराल की उत्क्रांती अशीच चालते ना? परिस्थितीला लायक असतील तेच टिकतील,असंच असतं ना? या वाक्यावर झाडं आक्षेप घेतील.त्यांचं कल्याण त्यांच्या समूहावर अवलंबून असतं.जेव्हा दुर्बल सदस्य नाहीसे होतात तेव्हा त्यांच्यावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होतो.प्रखर सूर्यप्रकाश आणि वादळी वारे आत शिरून अनुकूल हवामानाचं संतुलन बिघडवतात आणि सुदृढ सभासदही कमकुवत होऊ लागतात.त्या वेळेस त्यांच्या शेजारी मदतीला कोणी नसतो आणि कीटकांच्या हल्ल्यासमोर भल्याभल्यांचा टिकाव लागत नाही.


पूर्वी मीसुद्धा झाडांना अशा प्रकारची 'मदत' करायचो.

माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात झाडांची दाटी कमी करण्यासाठी काही झाडांना मी 'गर्डलिंग' करायचो.


या प्रक्रियेत झाडाच्या बुंध्याचं तीन फूट रुंदीचे साल काढून टाकलं जातं.काही वर्षांतच ते झाड मरून जातं.त्याची पालवी जाते आणि जमिनीत फक्त निर्जीव लाकडाचं खोड उभं असतं.असं केल्याने इतर झाडांना अधिक सूर्यप्रकाश पोहोचतो. 


लागवडीच्या व्यवस्थापनाची ही पद्धत तुम्हाला जरा क्रूर वाटते का? मला तर नक्कीच वाटते, कारण या पद्धतीत मरण संथपणे येतं.त्यामुळे मी भविष्यात कधीच 'गर्डलिंग'चा वापर जंगलाच्या व्यवस्थापनात करणार नाही.तेव्हाही मला हे जाणवलं होतं की,गर्डलिंग केलेल्या बीच वृक्षांनी जगण्यासाठी खूप धडपड केली आणि आश्चर्य म्हणजे त्यातले काही आजपर्यंत तग धरून आहेत.


खरंतर एकदा साल काढून टाकलं तर झाड जगू शकत नाही कारण पानातून तयार झालेली साखर मुळापर्यंत पोहोचू शकत नाही.मुळांची उपासमार होते आणि ते पाणी पम्पिंगची प्रक्रिया बंद करू लागतात. 


अशा वेळेस जमिनीतलं पाणी झाडाच्या वरच्या भागाला पोहोचू शकत नाही आणि हळूहळू झाड वठायला लागतं.पण मी गर्डलिंग केलेली काही झाडं थोड्याफार प्रमाणात वाढत होती.आज मला कळतंय की त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांकडून मदत मिळत होती.जमिनीखालच्या जाळ्यामुळे शेजाऱ्यांना गर्डलिंग केलेल्या झाडाच्या मुळाला साखर पुरवठा करता येत होता आणि ते जिवंत राहू शकत होतं.काही झाडांनी आपलं गेलेलं सालही वाढवायला सुरुवात केली.मला नक्कीच आज या कृत्याची लाज वाटत आहे.यातून मला एक शिकायला मिळालं ते म्हणजे जंगल परिसंस्थेत झाडाचं सामूहिक सहजीवन किती शक्तिशाली असतं ते! एक प्रचलित म्हण आहे, 


'कोणत्याही साखळीची ताकद त्याच्या सर्वांत कमकुवत सभासदाइतकीच असते.'कोण जाणे, कदाचित झाडांनीच ही म्हण आपल्याला दिली असेल. 


आणि स्वाभाविकपणे त्यांना हे कळतं त्यामुळे आपल्या स्वकीयांना मदत करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत.


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

१५ मार्च २०२३ या लेखातील पुढील भाग..

८/५/२३

वर्क्स - ॲरिस्टॉटल - (१८३७)

" जेवढं जास्त कळत जातं,तेवढं आपल्याला काहीच कळलेलं नाही,हे कळतं."


'वर्क्स' या ग्रंथामध्ये ॲरिस्टॉटलचे सिद्धान्त अतिशय सुसंगतपणे आणि अनेक दाखल्यांसह मांडले आहेत.

तर्कशास्त्रानुसार स्वर्गावरची वक्तव्यं,आत्मा,निसर्गाचा मानवाने स्वतःच्या कल्याणाकरता केलेला उपयोग,अशा अनेक गोष्टींबद्दल त्यानं आपली मतं या पुस्तकात मांडली होती.

'मानवाचं कल्याण करत असताना निसर्गाची तसूभरही हानी होता कामा नये.' 


असं त्याचं मत होतं.निसर्ग आणि प्राणिजात हे परस्परपूरक आहेत असं तो म्हणे.तत्त्वज्ञानावर आणि विश्वाच्या रहस्यांवर बोलणारा ॲरिस्टॉटल त्याच वेळी कविता आणि नाटक या विषयांवरही तितकाच समरस होऊन बोलत असे.


प्राचीन ग्रीसमधला,अभिजात काळातला ॲरिस्टॉटल हा एक प्रचंड प्रभावशाली तत्त्वज्ञ होऊन गेला.ॲरिस्टॉटलचा गुरू प्लेटो ॲरिस्टॉटला 'फादर ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी' म्हणायचा.ॲरिस्टॉटलनं जवळपास सर्वच विषयांमध्ये मुशाफिरी केली होती.भौतिकशास्त्र असो वा जीवशास्त्र;वनस्पतीशास्त्र असो वा खगोलशास्त्र;तर्कशास्त्र असो वा सौंदर्यशास्त्र; कविता असोत वा नाटकं;संगीत असो वा वक्तृत्व;मानसशास्त्र असो वा भाषाशास्त्र; अर्थशास्त्र असो वा राज्यशास्त्र या सर्व विषयांतला त्याचा अभ्यास पाहून आजही बुद्धिवंत अवाक् होतात.आणि त्यावर चर्चा करतात.ऑरस्टॉटलनं त्या काळात (ख्रिस्तपूर्व ३८४) २५० प्रबंध लिहिले होते.त्यातले केवळ ३० प्रबंध आज उपलब्ध आहेत.त्याचे सगळे प्रबंध एकत्र करून त्यावर जो ग्रंथ तयार झाला त्यालाच 'वर्क्स' असं संबोधलं गेलं.ख्रिस्ती बुद्धिवाद्यांनी ऑरस्टॉटलचं काम जगासमोर आणलं.


"वर्क्स" या ग्रंथामध्ये ॲरिस्टॉटलचे सिद्धान्त अतिशय सुसंगतपणे आणि अनेक दाखल्यांसह मांडले आहेत.

यामध्ये तर्कशास्त्रानुसार स्वर्गावरची वक्तव्यं,आत्मा,

निसर्गाचा मानवाने स्वतःच्या कल्याणाकरिता केलेला उपयोग,अशा अनेक गोष्टींबद्दल त्यानं आपली मतं मांडली होती.मानवाचं कल्याण करत असताना निसर्गाची तसूभरही हानी होता.कामा नये,असं त्याचं मत होतं.निसर्ग आणि प्रणित हे परस्परपूरक आहेत,असं तो म्हणे.


ऑरिस्टॉटलच्या विश्लेषणात्मक ज्ञानाचा प्रभाव त्या काळापासून संपूर्ण पाश्चिमात्य तत्त्वज्ञानावर पडला.

एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी ॲरिस्टॉटलनं तर्कशास्त्राचा वापर केला. तत्त्वज्ञानामध्ये त्यानं गणिताचा वापर करून सूत्रही तयार केली होती.मेटॅफिजिक्स हा शब्द पहिल्यांदा ॲरिस्टॉटलच्या सिद्धान्तातल्या गोष्टींसाठी वापरण्यात आला होता.मात्र ऑरिस्टॉटलन स्वतः मात्र या संकल्पनेसाठी फिलॉसॉफी हा शब्द वापरला.विज्ञान हे गणित आणि विज्ञान यांच्यापेक्षा वेगळं आहे.असे तो म्हणात असे.निसर्गातल्या कुठल्याही गोष्टीच अस्तित्व हे निसर्गातल्या गोष्टींची हालचाल,त्यांची वाढ

आणि त्यातले बदल यावर अवलंबून असते असं अरिस्टॉटलचं म्हणणं होतं.तसचं सबस्टन्स हा शब्द देखील त्यांनच पहिल्यांदा वापरला.प्रत्येक गोष्ट ही सबस्टन्स म्हणजेच नैसर्गिक कणांनी बनलेली असते,असं तो म्हणत असे.लोकांचं ज्ञान है त्यांच्या ज्ञानग्रहण करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं,असंही तो म्हणायचा.इथेही ॲरिस्टॉटलचं म्हणणं आणि प्लेटोचं म्हणणं यात फरक होता.प्लेटोचं तत्त्वज्ञान हे कल्पनेवर (आयडियाज) अवलंबून असायचं,तर ॲरिस्टॉटलचं तत्त्वज्ञान वस्तुनिष्ठ आणि प्रायोगिक गोष्टींवर अवलंबून होतं.


प्रत्येक वस्तू,अगदी सजीवदेखील ठरावीक पदार्थांपासून बनलेले असतात,असं ॲरिस्टॉटल म्हणत असे.त्यांची क्षमता त्या पदार्थांवर अवलंबून असते.एखादी निर्जीव वस्तू किंवा पुतळा हादेखील ज्या कणांपासून बनला आहे त्या कणांमधल्या क्षमतेवर तो अवलंबून असतो,असं ॲरिस्टॉटलचं मत होतं. 


सजीवांमध्ये आत्मा आहे असं आपण मानलं पाहिजे आणि मानवजातीचं अस्तित्व हे तर्क संगत,शास्त्रशुद्ध आणि काही कारणांसाठी आहे,असंही तो म्हणे.

वनस्पतींमध्ये आत्मा कमी प्रमाणात असतो,तर प्राण्यांमध्ये तो जास्त प्रमाणात असतो,असं ॲरिस्टॉटल म्हणे.


प्राणिशास्त्रातलं ॲरिस्टॉटलचं योगदान अनमोल आहे.ऑक्टोपसपासून अनेक समुद्री प्राण्यांचं विच्छेदन करून ॲरिस्टॉटलनं आपल्या प्रयोगांची अचूक निरीक्षणं नोंदवली.कोंबडीच्या पिल्लांची एम्ब्रिऑलॉजिकल डेव्हलपमेंट त्यानं सविस्तरपणे मांडली.इतकंच नाही तर व्हेल्स आणि डॉल्फिन्स इतर माशांपेक्षा कसे वेगळे आहेत.याचीही मांडण ॲरिस्टॉटलनं केली होती. काही समुद्री जीव (अंडी घालणारे) आणि काही प्रत्यक्ष पिल्लांना जन्म घालणारे या विषयांवरची शेकडो निरीक्षणं ॲरिस्टॉटलनं आपल्या ग्रंथात नोंदवली होती.रक्त असलेले आणि रक्त नसलेले असे प्राण्यांचे त्यानं दोन गट केले होते.प्लॅन्ट ऍनिमल असाही एक गट त्यानं शोधला होता. सर्वसामान्य काही लक्षणं समान असलेल्या काही जाती एकत्र येतात आणि त्यांची प्रजाती बनते यालाच जेनेरा म्हणतात.हा जेनेरा शब्द पहिल्यांदा ॲरिस्टॉटलनं वापरला.या प्रजाती किंवा जेनेरा एकत्र येऊन एक फॅमिली बनते. 


ऑक्टोपसचे सगळे हात म्हणजे त्याचे प्रजननाचे अवयव आहेत,असंॲरिस्टॉटलनं म्हटल्यावर अनेकांनी त्याच्या या म्हणण्याला विरोध केला होता.अगदी १९ व्या शतकापर्यंत त्याचं हे विधान अमान्य करण्यात आलं होतं;पण प्रयोगांती ते पुढे खरं ठरलं!


ॲरिस्टॉटलचा आत्मविश्वास आणि निरीक्षण इतकं दांडगं होतं की अनेक गोष्टी तो त्यावरून ठामपणे सांगत असे आणि लोकांचाही त्यावर विश्वास बसत असे.प्रत्यक्षात मात्र त्याचे तर्क गंमतशीर तर असतच,पण चुकीचेही असत. आपल्या हृदयात बुद्धी असते असं तो म्हणायचा. तसंच निसर्गातले पशु-पक्षी आणि वनस्पती यांच्यामध्ये एक शिडी असून शिडीच्या प्रत्येक पायरीवर कोणी ना कोणी असतं,मात्र मनुष्य हा एकमेव प्राणी शिडीच्या सर्वात वरच्या पायरीवर असल्याचं तो छातीठोकपणे सांगत असे.आज जरी अशी वाक्यं गमतीदार वाटत असली,तरी त्या काळात ॲरिस्टॉटल बोले आणि दल हाले अशी परिस्थिती होती.


भूशास्त्र (जिऑलॉजी) आणि हवामानशास्त्र (मीटिरीऑलॉजी) हे शब्दही ॲरिस्टॉटलनं व्यापक अर्थानं वापरले.जलचक्रांबद्दलची विस्तृत माहितीही त्यानंच शोधून काढली.पृथ्वीवरच समुद्रातलं गोड पाणी वाफेच्या रूपात ढगांमध्ये जमा होत आणि थंड होऊन पावसाच्या रूपात पुन्हा पृथ्वीवर येतं,असं त्यानं लिहून ठेवलं.हाच सिद्धान्त आज आपण वॉटर सायकल किंवा जलचक्र म्हणून ओळखतो.


माती,वायू,पाणी, सूर्य या सगळ्यांमध्ये एक आकर्षण असतं,असंही ऑरिस्टॉटलचं म्हणणं होतं.भूकंप,

ज्वालामुखी,इंद्रधनुष्य,धूमकेतू,आकाशगंगा

सगळ्यांबद्दल त्यानं लिहिलं होतं.ॲरिस्टॉटलनं बनवलेलं पृथ्वीच्या इतिहासाचं मॉडेल आधुनिक विज्ञानाशी साम्य दाखवताना दिसतं.पृथ्वीवरचा भूभाग कायम बदलत असून त्यामुळे एखाद्या ठिकाणची आर्द्रता किंवा कोरडेपणाही त्याप्रमाणे बदलत असतो,असं तो म्हणे.या विश्वविज्ञानाच्या बाबतीत विश्वाला सुरुवात किंवा शेवट नाही, त्यात होणारे बदल आणि या बदलाचं चक्र हे अनंत काळ चालणारे असल्याचं ॲरिस्टॉटलचं म्हणणं होतं.विश्व हे खूप मर्यादित स्वरूपाचं आहे.तसंच ते एकात एक असलेल्या आणि चमचमणाऱ्या इथरच्या दंडगोलांनी बनलेलं असून ते दंडगोल पारदर्शक असल्याचंही तो सांगत असे.नेमके यातले मोठे दंडगोल पृथ्वीभोवती फिरतात आणि या दंडगोलांमध्ये तारे असल्यामुळे तेही आपोआपच पृथ्वीभोवती फिरत असल्याचं ॲरिस्टॉटल म्हणत असे.या विश्वात एकूण ५५ दंडगोल असून ते वेगवेगळ्या आकाराचे आहेत.या वेगवेगळ्या आकाराच्या दंडगोलांमध्ये पोकळी असून ती देखील इथरच्या वाफेने भरलेली आहे,अशा चित्रविचित्र गोष्टी तो ठामपणे सांगत असे.


ॲरिस्टॉटलचा दबदबा त्या काळी चर्चवरच नव्हे तर सर्वत्र होता.त्यामुळे त्याने म्हटलेलं कुठलंही वाक्य प्रमाण अशी समजूत त्या काळी होती.एखादा वजनाने जड असलेला दगड आणि एखादं वजनानं हलकं असलेलं पक्ष्याच पीस दोन्हीही उंच ठिकाणावरून खाली टाकले तर दगड हा पक्ष्याच्या पिसाच्या आधी खाली पडेल कारण जड वस्तू हलक्या वस्तूपेक्षा लवकर खाली पडते असं त्याचं मत होतं.काही लोक जेव्हा त्याच्या म्हणण्याची शहानिशा करून बघत, तेव्हा तसंच घडत असे.याचं कारण हवेच्या खालून असलेल्या दाबामुळे पक्ष्याचं पीस हे दगडापेक्षा किंचित उशिरा पडत असे आणि मग लोक ॲरिस्टॉटलची वाहवा करत,तोच कसा खरा असं म्हणून त्याची प्रशंसा करत. 


आपण काहीही सांगितलं तर लोक डोळे मिटून त्यावर विश्वास ठेवतात त्यावर विश्वास ठेवतात.हे

ॲरिस्टॉटलला माहीत असल्यामुळे तो हास्यास्पद वाटतील अशा अनेक गोष्टी सांगत असे.


सजीव जसे वागतात तशाच निर्जिव वस्तूही वागताल असं त्याला वाटे आणि म्हणूनच सजीवांचे सगळे नियम तो निर्जिव वस्तूंनाही लावत असे.एखादी वस्तू वरून खालीच का पडते याचे उत्तर देताना,माणूस नाही का बाहेर गेला तरी काळी वेळाने पुन्हा आपल्या घरीच परत येतो,

त्याप्रमाणे वरून फेकलेली वस्तू खाली,म्हणजे तिच्या घराकडेच परतते असा त्याचा दावा होता.


केवळ तर्कावर मांडलेल्या ॲरिस्टॉटलच्या गोष्टींना पुढे जवळ जवळ १९०० वर्षांचा कालावधी गेल्यावर गॅलिलिओ नावाचा शास्त्रज्ञ आला.आणि त्याने प्रयोगाच्या साहाय्याने ॲरिस्टॉटलचं लोकांच्या मनावरचं गारूड आणि डोळ्यावरची झापड उतरवली.


ॲरिस्टॉटलच्या कल्पनेप्रमाणे माणूस आणि पृथ्वी हे विश्वाच्या केंद्रस्थानी होते.त्याचं हे मत चर्चलाही मान्य होतं.त्याच्या मताविरुद्ध कोणी बोललं तर त्याला कठोर शासन होत असे.ॲरिस्टॉटलचा रसायनशास्त्र या शाखेतलाही अभ्यास होता.त्याच्या म्हणण्यानुसार प्रत्येक पदार्थ हा चार नैसर्गिक तत्त्वांपासून बनलेला आहे.पृथ्वी,अग्नी,हवा आणि पाणी ही ती चार तत्त्वं.


हवेलासुद्धा वजन असतं,हाही सिद्धान्त त्यानं प्रथम मांडला.


ॲरिस्टॉटलन राज्यशास्त्र हा विषयही अभ्यासला.

'मनुष्य हा नैसर्गिकदृष्ट्या राजकीय प्राणी आहे,असं त्यानं म्हणून ठेवलंय.


कोणत्या प्रकारचं सरकार अस्तित्वात असायला हवं आणि ते कसं संतुलित ठेवता येईल यावरही त्यानं विस्तृत चर्चा केली आहे.लिहिताना त्यानं ग्रीक शब्दकोशाचा वापर केला आहे. लोकशाहीबद्दल ॲरिस्टॉटलनं केलेली चर्चा

आधुनिक राज्यशास्त्रासाठी दिशादर्शक आहे. 


ॲरिस्टॉटलच्या कामाचा आवाका इतका प्रचंड होता.

प्रत्येक विषयाचा त्यानं अभ्यास केला होता आणि त्या अभ्यासातून त्यानं प्लेटोच्या विचारांबाबत आपले मतभेद स्पष्टपणे मांडले होते.तत्त्वज्ञानावर आणि विश्वाच्या रहस्यांवर बोलणारा ॲरिस्टॉटल त्याच वेळी कविता आणि नाटक या विषयांवरही तितकाच समरस होऊन बोलत असे.नाटकाची संहिता,त्यातली पात्रं, पात्रांच्या भावमुद्रा,

नाटकाचं दिग्दर्शन,त्यातली गाणी या सगळ्यांविषयी त्यानं सखोलपणे मांडणी केली होती.त्याच्या सौंदर्यशास्त्र (एस्थेटिक्स) या विषयावरच्या विवेचनात त्यानं खलनायक कसा असावा याविषयीही लिहून ठेवलंय.

खलनायक हा कुरूप,घृणास्पद किंवा बावळट,निर्बुद्ध दाखवता कामा नये.तो कपटी तर असावाच,पण हुशार आणि देखणाही असावा.नाही तर तो नायिकांना आपल्या पाशात कसा ओढू शकेल?आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीतल प्राण,प्रेम चोप्रा,डॅनी आणि विनोद खन्ना यांच्याकडे बघितलं की याची प्रचीती येते.


ॲरिस्टॉटलचा जन्म ख्रिस्तपूर्व ३८४ साली ग्रीसमधल्या मॅसेडोनियाजवळ झाला.त्याचे वडील राजवैद्य होते.

ॲरिस्टॉटल लहान असतानाच त्याचे वडील निकोमॅक्स यांच निधन झालं.त्यानंतर काहीच दिवसात त्याच्या आईचादेखील मृत्यू झाला.त्यानंतर त्याचा सांभाळ त्याच्या नातेवाईकांनी केला.तो सॉक्रेटिसचा शिष्य असलेल्या प्लेटोला आपला गुरू मानत असे आणि प्लेटोनं सुरू केलेल्या अकॅडमीमध्ये तो शिकायला जात असे. वयाची १७ ते ३७ वर्ष हा कालावधी त्यानं प्लेटोच्या अकॅडमीमध्ये व्यतीत केला.या अकॅडमीमधला तो अत्यंत हुशार विद्यार्थी होता, नैतिकता या विषयावर प्लेटो जास्त बोलत असे, कारण त्याला हा विषय मनापासून आवडत असे.


प्लेटो निसर्गातलं सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवण्यापेक्षा गणितामध्ये शोधत बसायचा.प्लेटोची ही गोष्ट ॲरिस्टॉटलला मुळीच आवडत नसे.अनेक विषयांवर प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्यात मतभेद होते.याच कारणामुळे प्लेटोलाही ॲरिस्टॉटल आपली परंपरा पुढे नेणारा वारस वाटत नसे.प्लेटोच्या मृत्यूनंतर ॲरिस्टॉटलनं अॅथेन्स सोडलं. ॲरिस्टॉटलनं स्वतःची लिसीयम नावाची एक अकॅडमीही काढली.शिकवताना तो एका जागी स्थिर राहत नसे,तर फिरत फिरत आपल्या शिष्यांना ती गोष्ट समजावून सांगत असे. त्यामुळे त्याच्या शिष्यांना 'पेरीपॅटेटिक्स' असं लोक म्हणत.ॲरिस्टॉटलला लिहायला इतके आवडत असे,की पपायरसच्या पानांची तो बंडलच्या बंडल सहजपणे संपवत असे.


ॲरिस्टॉटलच्या मनातलं कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नसे.या कुतूहलापोटीच त्याला आपण या जगात कुठल्या गोष्टीमुळे आहोत,आपलं अस्तित्व म्हणजे काय,आपल्या असण्यामागे कुठला हेतू असू शकतो का,इतकंच नाही तर संपूर्ण विश्व असण्यामागे काही उद्देश असेल का? अशा प्रकारचे अनेक प्रश्नं त्याला सतावत असत. त्याच्या अशा प्रकारच्या हेतूवादाचा प्रभाव अनेक शतकं समाजमनावरच नव्हे,तर विज्ञानाच्या प्रगतीवरही झाला.


ग्रीसमध्ये जन्मलेल्या ॲरिस्टॉटलला ग्रीसचा खूप मोठा तत्वज्ञ म्हणून मान होता.ख्रिस्तपूर्व ३२३ मध्ये त्याचा मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूनंतरही अलेक्झांडर या त्याच्या शिष्यानं त्याचे विचार समाजात रुजवले.


विश्वविज्ञानातली अनेक तत्त्वं पुढे ॲरिस्टॉकर्स, हिपॉकर्स आणि टॉलेमी मांडत राहिले. ॲरिस्टॉकर्स यानं पुढे ग्रहताऱ्यांचा अत्यंत खोलवर अभ्यास करून ॲरिस्टॉटलच्या चुका दाखवल्या.ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे सूर्य आणि तारे पृथ्वीभोवती फिरतात असं नसून पृथ्वी,चंद्र आणि इतर ग्रह हे सूर्याभोवती फिरतात असं त्याने सांगितलं.पण ॲरिस्टॉटलचा शब्द म्हणजे परमेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द असं समजणाऱ्या लोकांनी ॲरिस्टॉकर्सचं म्हणणं धुडकावून लावलं.ॲरिस्टॉटल च्या सिंहासनाला तडा देण्याचं पुढे १६-१७ व्या शतकात विज्ञानानेच केलं.असं असलं तरीहीॲरिस्टॉटल आणि त्याच्या विचारांवर,सिद्धांतांवर आधारलेला त्याचा 'वर्क्स' या ग्रंथाचं योगदान जगाला महत्त्वाचं वाटतं हे मात्र खरं!



४ मे २०२३ या लेखातील पुढील भाग..