* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

७/६/२३

एक्सपेरिमेंट इन प्लँट हायब्रिडायझेशन - ग्रेगॉर मेंडेल (१८६६)

वनस्पतींचा अभ्यास करताना ग्रेगॉर मेंडेल नावाच्या धर्मगुरूनं आनुवंशिकतेचं गूढ उलगडलं.त्याच्या सिद्धान्तामुळे माणसांमध्ये येणाऱ्या आनुवंशिक विकृतीबद्दलचा अभ्यास करणं शक्य झालं.माणसाच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये ४६ गुणसूत्रं (क्रोमोसोम्स) म्हणजे गुणसूत्रांच्या २३ जोड्या असतात.पण अनेक वेळा गुणसूत्रांमध्ये आधिक्य किंवा कमतरता निर्माण झाली तर पुढल्या पिढीत विकृती निर्माण होऊ शकते. त्यामुळे 'एक्सपेरिमेंट इन प्लँट हायब्रिडायझेशन' या मेंडेलच्या ग्रंथाचं योगदान मानवजातीच्या कल्याणासाठी उपकारक ठरलं!



चार्ल्स डार्विन यानं उत्क्रांतिवादाची तत्त्वं मांडली, पण आनुवंशिकतेविषयी तो पूर्णपणे अनभिज्ञ होता.

विज्ञानाच्या शाखेत आनुवंशशास्त्र ही शाखा दाखल झाली,तिनं मानवी शरीरातली किती तरी रहस्य उलगडली,यामुळे अनेक विकृती का होतात याविषयी

देखील माणूस सतर्क झाला.आणि पुढे त्या विकृतींची कारणं कळल्यामुळे त्यावरचे उपायही शास्त्रज्ञांनी शोधून काढले.या आनुवंशिकतेचं गूढ वनस्पतींचा अभ्यास करताना ग्रेगॉर मेंडल नावाच्या धर्मगुरूला कसं उलगडलं ही एक खूपच रोचक कहाणी आहे. मेंडेलच्या झपाटले-

पणातून 'एक्सपरिमेंट इन प्लॅट हायब्रिडायझेशन' हा ग्रंथ कसा प्रकाशझोतात आला आणि त्यावर आधारलेली आनुवंश-शास्त्राची शाखा कशी विकसित झाली हे जाणून घेणं खूपच विलक्षण आहे.!


'एक्सपरिमेंट इन प्लॅट हायब्रिडायझेशन' हा पेपर १८६५ मध्ये प्रकाशित झाला; पण त्या वेळी त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. या ग्रंथात ग्रेगॉर मेंडेलनं वनस्पतींवरचे प्रयोग लिहिले आहेत.काही झाडांना पांढऱ्याच रंगाची फुलं का येतात?लाल रंगाची का येत नाहीत ? एखाद्या झाडाला ठरावीक प्रकारचाच वाटाणा का येतो? अशा आपल्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर उत्तरं शोधण्यासाठी तो आपल्या सहकाऱ्यांबरोबरही चर्चा करत असे. खरं तर यासाठी मेंडेलनं अनेक पुस्तकंही वाचली; पण तरीही त्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं नीटपणे मिळाली नव्हती. आपल्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्यालाच शोधावी लागतील,या विचारापर्यंत मेंडेल येऊन पोहोचला आणि त्यानं आपल्या बागेत काही प्रयोग करायला सुरुवात केली.


मेंडेलला फर्टिलायझेशन करून नवीन पिढीत येणारे गुणधर्म तपासायचे होते आणि त्यासाठी त्याला भराभर नवीन तयार होणाऱ्या पिढ्या हव्या होत्या.त्यामुळे त्यासाठी आपण वाटाण्याच्या रोपांची लागवड केली तरच आपल्याला हवे ते परिणाम मिळतील,असं त्याला वाटलं.

ही रोपं निवडण्यामागे काही कारणं होती.वाटाण्याचं झाड हे वर्षभरात कुठल्याही ऋतूत लावलं तरी चालणारं होतं. त्याचं जीवनचक्र तीन-चार महिन्यांत पूर्ण होतं.तसंच वाटाण्याच्या रोपांमधलं वैविध्य ठळकपणे शोधता येत होतं.उदाहरणार्थ,हिरवा आणि पिवळा वाटाणा किंवा वाटाण्याचा पृष्ठभाग (गुळगुळीत किंवा सुरकुतलेला) तसंच या वाटाण्याच्या आधी येणाऱ्या फुलाचा रंगही वेगळा असतो.पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या वाटाण्यांच्या रोपांची मेंडेलनं लागवड केली. अशा रीतीनं मेंडेलच्या प्रयोगाचं काम आपल्या बागेतच सुरू झालं.


मेंडेलच्या चिकाटीला तोडच नव्हती. त्यानंतरच्या आठ वर्षांत मेडेलनं आपल्या बागेत ३०००० रोपांची लागवड केली.त्यातल्या १० हजार रोपांच्या वाढीतल्या बारीकसारीक बदलांच्या नोंदी तो ठेवत राहिला.त्यानं वाटाण्यांच्या तपासणीसाठी त्यांचे सात गुणधर्म नक्की केले.म्हणजे वाटाण्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आहे की खडबडीत,तो वाटाणा पिवळा आहे की हिरवा, वाटाण्याची वेल उंच आहे की ठेंगणी,

तिच्या टोकाला फुलं येतात की मध्ये खोडावर येतात वगैरे.


खरं तर हे काम खूपच कंटाळवाणं होतं; पण मेंडेलनं मात्र कधी कंटाळा किंवा आळस केला नाही.गणिताचा वापर करून तो अनेक प्रयोग करत असे.वेगवेगळ्या रंगांच्या फुलांच्या झाडांचं तो फलनसंकर(क्रॉसफर्टिलायझेशन) करत असे.दोन संकरित झाडांचं पुन्हा क्रॉस फर्टिलायझेशन केल्यानंतर त्याला आणखी गमतीदार परिणाम दिसायचे.उंच झाडां-बरोबर उंच झाडं हायब्रिड केली तेव्हा नव्या पिढीतली झाड उंच निघायची.ठेंगणी झाड ठेंगण्या झाडांबरोबर हायब्रिड केली तर ती ठेंगणी निघायची.मात्र उंच झाडांबरोबर ठेंगणी झाड हायब्रिड केली तेव्हा येणारी झाडं उंच निघाली.तेव्हा तो थोडा गोंधळात पडला. नंतर त्याला असं वाटलं की,सजीवातल्या प्रत्येक पेशीमध्ये प्रत्येक गुणधर्मासाठी प्रत्येक गुणधर्मासाठी दोन घटक असावे लागतात.खरं तर ही कल्पना 'जीन'च्या जवळ जाणारी होती आणि मेंडेल त्याला 'एलिमेंट' असं संबोधत असे.म्हणजे वाटाण्याच्या रंगासाठी त्याच्या प्रत्येक पेशीमध्ये असलेले दोन घटक त्याच्या आई-वडिलांकडून प्रत्येक एक असे आलेले असतात.हे जसं रंगासाठी असतं,तसंच ते त्या झाडाच्या उंचीसाठी देखील असतं.थोडक्यात,प्रत्येक गुणधर्मासाठी दोन-दोन घटक असतात.म्हणजेच वाटाण्याच्या वेलीचं उदाहरण बघितलं, तर त्यातली आई ही वेल उंच असेल,आणि 

त्या वेलीच्या प्रत्येक पेशीत उंचीचे घटक दोन्हीही उंच-उंच असे असले आणि वाटाण्यातले वडील ही वेल समजा ठेंगणी असली,तर त्या वडील वेलीच्या प्रत्येक पेशीत उंचीचे घटक ठेंगणा ठेंगणा असे असले तर त्याच्या संकरफलना (क्रॉसफर्टिलायझेशन) मधून जी वेल निर्माण होईल,त्या वेलीच्या प्रत्येक पेशीत उंच,ठेंगणा असे आई-वडिलांकडून प्रत्येकी एक असे उंचीचे घटक येतील. 


मग आता ही नवी वेलं उंच असेल की ठेंगणी हे कसं ठरवायचं ? हा प्रश्न जेव्हा मेंडेलसमोर आला,तेव्हा त्याने एक अनोखी मांडणी केली. प्रत्येक गुणधर्मासाठी एक प्रबळ (डॉमिनंट) आणि एक दुर्बळ (रिसेस्हिव्ह) असे प्रकार असल्याचं त्याचं म्हणणं होतं.म्हणजेच वाटाण्याच्या वेलीमध्ये उंचीसाठी उंच ठेंगणा यातला 'उंच' हा प्रबळ समजला जाईल आणि अर्थातच 'ठेंगणा' हा दुर्बल समजला जाईल. थोडक्यात,वेलीमध्ये पुढल्या उंचीसाठी उंच आणि ठेंगणा दोन्हीही घटक असतील तेव्हा ती वेल उंच निघेल कारण 'उंच' हा प्रबळ असल्यामुळेच तितकाच प्रभावी असल्याचं मेंडेलचं मत होतं.


म्हणजेच वाटाण्याच्या एका हिरव्या वेलीमध्ये हे दोन घटक हिरवा हिरवा असे आहेत आणि दुसऱ्या हिरव्या वेलीमध्ये ते तसेच हिरवा हिरवा असतील तर जेव्हा दोघांचे हायब्रिड तयार होईल तेव्हा नवीन वेलीत सगळेच घटक हिरवे असल्यानं नवीन वेलही हिरवीच निघेल;पण त्यानंतर दुसऱ्या पिढीत मात्र हायब्रिड करताना मेंडेलला वेगळेच गंमतशीर परिणाम मिळाले.त्यानं हिरवी दिसणारी पण संकरित झालेल्या दोन वेली घेतल्या.ज्यांच्यात उंचीचे घटक प्रत्येकी हिरवा,

पिवळा असे होते. त्यानं त्यांचं पुन्हा संकरफलन (क्रॉस

फर्टिलायझेशन) केलं,तेव्हा त्याला दुसऱ्या पिढीतल्या वेलींपैकी ६०२२ हिरव्या, तर २००१ पिवळ्या वेली दिसल्या.तसंच गुळगुळीत वाटाणे जेव्हा त्याला ५७७४ वेलींवर मिळाले, तेव्हा खरखरीत पृष्ठभागाचे त्याला १८५० वेलीवर मिळाले. उंच आणि ठेंगण्या वेलींचे वाटाणे यांच्यातही हे प्रमाण ७८७:२७७ असं मिळालं. म्हणजेच इथेही हे प्रमाण जवळजवळ ३:१ असं होतं.हे असं का होतं,याचं उत्तर मेंडेलनं गणित आणि संख्याशास्त्र वापरून शोधलं. 


प्रत्येकी हिरवा आणि पिवळा असे दोन्ही घटक असलेली दोन हायब्रिड वेली पुन्हा क्रॉस फर्टिलाइझ केल्या तर प्रत्येक आई-वडील वेलीतून नवीन वेलीत रंगाचा कुठला तरी प्रत्येकी एक घटक येईल.म्हणजे आपल्याला नवीन वेलीमध्ये रंगाचे घटक चार तऱ्हेनं मिळू शकतात.हिरवा-हिरवा,हिरवा- पिवळा,पिवळा-हिरवा आणि पिवळा- पिवळा.संख्याशास्त्राच्या नियमाप्रमाणे या चारही शक्यता समानच होत्या.


म्हणजे नवीन पिढीतल्या २५% मध्ये हिरवा-हिरवा हे घटक असतील.२५% मध्ये हिरवा-पिवळा असे.२५% मध्ये पिवळा-हिरवा आणि शेवटच्या २५% मध्ये पिवळा-पिवळा असे घटक असतील.यातल्या पहिल्या तीन प्रकारांत एक तरी हिरवा घटक असल्यानं आणि तो प्रबळ असल्यानं त्या सगळ्या वेली हिरव्या होतात आणि या ७५% वेली असतात.फक्त शेवटच्या प्रकारात एकही 'हिरवा' घटक नसल्यानं ती वेल पिवळी होते.या वेली फक्त २५% एवढ्याच असतात.यामुळे हिरव्या आणि पिवळ्या वेलींचं प्रमाण ३:१ असं येत होतं.


त्यानंतरच्या अभ्यासातून मेंडेलनं 'सेग्रिगेशन' आणि 'इंडिपेंडंट अॅसॉर्टमेंट' असे दोन नियम सांगितले.

यासाठी त्यानं वाटाण्याच्या पुढल्या पिढ्यांवर अनेक प्रयोग केले आणि काही गणितं मांडली.त्यात त्यानं वाटाण्याच्या वेलीच्या उंचीचा आणि रंगाचा विशेषतःतो वाटाणा पिवळ्या रंगाचा असतो का हेही तपासून बघितलं.


त्यानं मांडलेल्या नियमातल्या सेग्रिगेशननुसार आई आणि वडील यांच्यातल्या गुणधर्मांसाठी दोन दोन घटक असतात आणि मूल जन्माला येताना एक एक घटक एकत्र होतात आणि ती जोडी मुलामध्ये येते या जन्मलेल्या मुलामध्ये आलेल्या दोन घटकांमधला जो घटक प्रबळ असतो त्यावरून त्या मुलाचा म्हणजेच उंची किती असेल हे ठरतं. 


तसंच इंडिपेंडंट अॅसॉर्टमेंट या नियमाप्रमाणे बघितलं तर अशा दोन गुणधर्मामध्ये काही संबंध नसतो.

उदाहरणार्थ,वाटाण्याचा रंग हिरवा असेल आणि त्यावर सुरकुत्या असतील तर त्यांच्यातले सगळे गुणधर्म स्वतंत्रपणे काम करत असावेत असे मेंडलनं सांगितले.तसंच हे वाटाण्यावरचं संशोधन होतं त्यामुळे इतर सगळ्या सजीवांना हेच नियम लागू होतील असं काही नव्हतं.असं असलं तरी संशोधनाआधीच मेंडेलनं जेनेटिक्स म्हणजेच अनुवंशशास्त्र या शाखेतलं काम सुरू केलं होत म्हटलं तरी चालेल.


अखेर आठ वर्षांनंतर मेडेलला त्याच्या हव्या त्या प्रश्नांची उत्तरं सापडली.ती त्यानं एका प्रबंधात मांडली. ८ फेब्रुवारी १८६५ या दिवशी मेंडेलनं 'नॅचरल हिस्ट्री सोसायटी' इथल्या ४० बुद्धिमान विद्वान मंडळींसमोर आपला प्रबंध वाचून दाखवला.

टाळ्यांच्या कडकडाटात लोक प्रतिसाद देतील,असं मेंडेलला वाटलं; पण गणिती पद्धतीनं मांडणी केल्यामुळे मेंडेलचं म्हणणं बऱ्याच जणांना नीटसं समजलं नाही आणि मेंडेलनं काही तरी विशेष आणि महत्त्वाचं सांगितलं आहे,असं कुणालाच वाटलं नाही. उपस्थितांमधला तर एक मेंडेलला ऐकू जाईल अशा रीतीनं कुजबुजला,'आठ वर्षं वाटाण्यावर असे प्रयोग करत बसायचं म्हणजे मूर्खपणाच.' मेंडेलला वाईट वाटलं;पण तो निराश झाला नाही. 


त्यानंतर एकच वर्षाने म्हणजे १८६६ या वर्षी मेंडेलनं आपल्या निरीक्षणावर आधारित एक संशोधनपर लेख तयार केला. तो त्यानं 'अॅन्युअल प्रोसिडिंग्ज ऑफ नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी' या जर्नलमध्ये प्रकाशित केला;पण दुर्दैवानं त्या वेळी मेंडेलच्या या रीसर्च पेपरची दखल विशेष घेतली गेली नाही.मेंडेलचा हा रीसर्च पेपर तिथल्या लायब्ररीत पुढली ३५ वर्ष धूळ खात पडून राहिला.


 माझं संशोधन आज ना उद्या जगासमोर येईल आणि त्याचं महत्त्व जगाला एक दिवस नक्कीच कळेल,असं मेंडेलनं आपल्या मित्रांजवळ म्हणून ठेवलं होतं.


आनुवंशिकतेबद्दलचे सगळे सिद्धान्त जगासमोर यायला मेंडेलच्या मृत्यूनंतर १६ वर्षं जावी लागली.इंग्लंडमधला वनस्पतीशास्त्रज्ञ बॅटेसन याच्या हाती मेंडेलचे पेपर पडले आणि तो वेडाच झाला.त्यानं मेंडेलचे शोधनिबंध इंग्रजीत भाषांतरित केले.त्यानं १९०५ साली मेंडेलचं हे संशोधन ग्रंथरूपात जगासमोर प्रकाशित केलं. त्यानंच 'जेनेटिक' हा शब्द तयार करून पहिल्यांदा वापरला.

तसच याच दरम्यान हॉलंडचा ह्युगो द हाईस,जर्मनीतला कार्ल कॉरेन्स आणि आणि ऑस्ट्रियामधला एरिक व्हॉन शिओमाक या तीन शास्त्रज्ञांनी मेंडेलचे निष्कर्ष शोधून पुन्हा जगासमोर आणले.आता मात्र मेंडेलला जगभरातून विज्ञानाच्या जगात मान्यता मिळाली;पण ते सुख बघायला तो जिवंत नव्हता.


२२ जुलै १८२२ या दिवशी मोराविया देशामध्ये म्हणजे पूर्वीचं ऑस्ट्रिया आणि आताचं चेक प्रजासत्ताक इथं एका गरीब शेतकरी कुटुंबात ग्रेगॉर योहान मेंडेल याचा जन्म झाला.मेंडेल आपल्या आई- वडिलांबरोबर लहान असतानाच शेतातली कामं करायला लागला.या कामात त्याला खूप गोडी वाटत असे.मेंडेल अतिशय चुणचुणीत आणि चुळबुळ्या स्वभावाचा मुलगा होता.त्यामुळे काम करत असतानाही,त्याला प्रत्येक गोष्टीविषयीचं कुतूहल स्वस्थ बसू देत नसे.त्याला शेतातल्या पिकांबद्दल,

फळाफुलांच्या रंगांबद्दल,आजूबाजूच्या परिसराबद्दल अनेक प्रश्न पडायचे आणि मग तो आपल्या आई-वडिलांना असे प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. बिचाऱ्यां-जवळ मेंडेलच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नसत.मात्र आपला मुलगा इतर मुलांपेक्षा खूप वेगळा आणि बुद्धिमान आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं.त्याला शाळेत घातलं पाहिजे, असंही त्यांना वाटत असे;पण त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की,दोन वेळा पोटभर जेवायचीच मारामार होती.अशा परिस्थितीत मेंडेलच्या शिक्षणाचा विचार करणंही त्यांना कठीण वाटे.तरीही मेंडेलच्या वडिलांनी काहीही करून आपल्या मुलाला शिकवायचंच, असा निर्धार केला आणि त्याला शाळेत दाखल केलं.


मेंडेल जसजसा मोठा होत होता,तसतशी त्याची झाडंझुडं,पानंफुलं,इतर वनस्पती यातली गोडी दिवसें-

दिवस वाढतच होती;पण घरची परिस्थिती आणखीनच हलाखीची होत होती.अशा अवस्थेत शिकायचं की घरची परिस्थिती सावरायची,असा पेच त्याच्यापुढे पडत असे.

मेंडेलनं यातून मार्ग काढण्यासाठी धार्मिक विषयातला अभ्यास करायचा ठरवलं.त्यासाठी त्यानं एका चर्चमध्ये प्रवेश घेतला.चर्चमध्ये दाखल होताच त्यानं ग्रेगॉर या संताला आदरांजली म्हणून त्याचं नाव धारण केलं.आता सगळेच त्याला ग्रेगॉर योहान मेंडेल या नावानं ओळखू लागले. धार्मिक विषयावरचं शिक्षण घेत असताना तिथल्या शिक्षकांना मेंडेलची भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांतली गोडी लक्षात आली. त्यामुळे चर्चमधल्या वरिष्ठ पदावरच्या मंडळींनी त्याला व्हिएन्ना विद्यापीठात भौतिकशास्त्र या विषयातलं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. विद्यापीठात भौतिकशास्त्राच्या अभ्यासाबरोबरच मेंडेलनं आपल्या धार्मिक विषयातलं शिक्षणही लक्ष देऊन पूर्ण केलं.आपलं दोन वर्षांचं शिक्षण पूर्ण करून मेंडेल पुन्हा चर्चमध्ये परतला आणि

त्यानं फादर ग्रेगॉर मेंडेल म्हणून आपल काम सुरू केलं.मेंडेल ज्या चर्चमध्ये काम करत होता, त्या चर्चची स्वत:ची पाच एकराची जागा होती. या जागेत मोठी विस्तीर्ण अशी बाग होती.त्या बागेची निगा राखण्याचं काम मेंडेल स्वतः करत असे.बागेत तासन् तास कसा वेळ जातो.हे त्याचं त्यालाही कळत नसे.प्रत्येक रोपट्यावरून तो अतिशय मायेनं हात फिरवत असे.अशा वेळी लहानपणी जे प्रश्न त्याच्या मनाला पडत,ते पुन्हा उसळी मारून वर यायला लागले.यातूनच त्याचं संशोधन सुरू झालं आणि त्याचा शेवट त्यानं लिहिलेल्या रीसर्च पेपरमध्ये झाला.


६ जानेवारी १८८४ या दिवशी ग्रेगॉर मेंडेलचा मृत्यू झाला.अखेरच्या दिवसांमध्ये त्याला हृदय,किडनी आणि जलोदर यांचा त्रास होत होता.या काळात तो आपलं वजन कमी करण्यासाठी चर्चिलप्रमाणेच रोज २०- २० सिगार्स ओढत असे.आपलं संशोधन जगाला कळेल याचाही नाद त्यानं शेवटी सोडला होता. 


वेगवेगळ्या भाज्या पिकवणं,मधमाशा,उंदीर आणि सफरचंद यांचा अभ्यास करणं आणि चर्चमध्ये धर्मोपदेशकाचं काम करणं यातच त्यानं आपला वेळ घालवला.


मेंडेलच्या सिद्धान्तामुळे माणसामध्ये येणारी आनुवंशिक विकृती याबद्दलचा अभ्यास करणं शक्य झालं.माणसाच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये ४६ गुणसूत्रं (क्रोमोसोम्स) म्हणजे गुणसूत्रांच्या २३ जोड्या असतात.पैकी २३ जोड्या या आईकडून,तर २३ जोड्या वडिलांकडून येतात; (जग बदलणारे ग्रंथ, दीपा देशमुख, मनोविकास प्रकाशन) पण अनेक वेळा गुणसूत्रांमध्ये आधिक्य किंवा कमतरता निर्माण झाली तर किवा एखादा भाग लोप पावला तर किंवा स्थानांतर झालं तर पुढल्या पिढीत विकृती निर्माण होऊ शकते. 


दुभंगलेले ओठ,हिमोफिलिया,वर्णकठीणता, अशी काही उदाहरण आपल्याला सांगता येतील. त्याचप्रमाणे सिकलसेल अॅनिमिया, रातांधळेपणा,सिस्टिक फायब्रॉसिस असे जवळजवळ ४००० प्रकारचे मानवी आनुवंशिक विकार सापडले आहेत.या आजारांवर मात करण्यासाठी जेनेटिक इंजिनीअरिंग ही एक नवी शाखा सुरू झालीय. त्यासाठी जगभरातून मधुमेह,

हृदयविकार यांसारख्या विकारांवर उपचार करण्याचे प्रयत्न केले जाताहेत.


साधारणपणे दीडएकशे वर्षांपूर्वी वनस्पतींवर केलेल्या या प्रायोगिक सिद्धान्तांचा उपयोग आपल्याला आजही मेंडेलच्या संपूर्ण जीवसृष्टीच्या जनुक आणि आनुवंशिक शास्त्रात होतोय. मेंडेलच्या 'एक्सपरिमेंट् इन प्लॅट हायब्रिडायझेशन' या ग्रंथाचं योगदान मानवजातीच्या कल्याणासाठी उपकारक ठरलं आहे यात शंकाच नाही !


" माझं संशोधन आज ना उद्या जगासमोर येईल आणि त्याचं महत्त्व जगाला एक दिवस नक्कीच कळेल.-" ग्रेगॉर मेंडेल




३/६/२३

स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो.

किंग आर्थर नावाचा एक राजा होता.एका बेसावध क्षणी त्याच्या शेजारच्या राज्यातील राजाने त्याच्यावर हल्ला केला व त्यास कैद करून तुरुंगात बंदिस्त केले.पण तरुण आर्थरच्या विचारांनी त्याचे मतपरिवर्तन झाले आणि त्याने आर्थरला जीवदान द्यायचे ठरवले.


पण त्यासाठी त्याने आर्थर समोर एक आव्हानात्मक अट ठेवली की तो आर्थरला एक प्रश्न विचारेल आणि त्याचे उत्तर देण्यासाठी वर्षभरासाठी मुक्त करेल.त्या वर्षभरात आर्थर त्याचे उत्तर देऊ शकला तर आर्थरला कायमचे अभय नाही तर मृत्युदंड.


तर तो प्रश्न होता की,

" स्त्रियांना नेमके काय पाहिजे ? "

या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भल्या भल्यांनी हात टेकले होते,तर तरुण आर्थरकडून हे उत्तर शोधले जाणे म्हणजे चमत्कारच ठरला असता.पण जीव वाचवायचा असेल तर उत्तर शोधलंच पाहिजे म्हणून तो स्वतःच्या राज्यात परतला.


तिथे त्याने अनेकांकडे विचारणा केली.त्यात त्याची राणी,नावाजलेले विद्वान,दरबारातले गणमान्य व्यक्ती एवढेच काय तर राजविदुषकाचे ही मत घेतले.पण कुणीही या प्रश्नावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.


मग काही जणांनी सुचवले की राज्याच्या बाहेरच्या जंगलात जी म्हातारी चेटकीण राहते तिला जाऊन भेट,

तिच्याशी सल्लामसलत कर.ती नक्कीच समर्पक उत्तर देऊ शकेल.पण तिचा सल्ला घेणे तुला चांगलेच महागात पडू शकते.कारण ती चेटकीण केलेल्या उपकारांची अवाजवी किंमत वसूल करण्यासाठी कुप्रसिद्ध होती.

हाताशी असलेला वेळ वेगाने संपत होता म्हणून अखेर आर्थरने तिच्याकडे जायचे ठरवले.


चेटकिणीने आर्थरचा प्रश्न नीट ऐकून घेतला व धूर्तपणे उत्तरली,"मी या प्रश्नाचे उत्तर अवश्य देईन पण त्याबदल्यात तुला माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल;तुझा मित्र लॅन्सलॉटला माझ्याबरोबर लग्न करावे लागेल."


सर लॅनस्लॉट आर्थरचा जवळचा मित्र होता व त्याची ओळख एक कुलीन व्यक्तिमत्त्व व शूर योद्धा अशी होती.


तिची हि मागणी ऐकून आर्थर सर्वार्थाने हादरला.ती चेटकीण जख्खड म्हातारी व दिसायला अत्यंत कुरूप होती.तिच्या मुखात केवळ एकच सुळा होता.तिच्या कंठातून चित्रविचित्र आवाज येत राहायचे व ती जिथे जाईल तिथे दुर्गंध पसरायचा.


आर्थरने तिची मागणी धुडकावून लावली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या मित्राला जिवंतपणी नरकयातना भोगायला लावायचे पाप त्याला माथी घ्यायचे नव्हते.


पण लॅन्सलॉटला जेव्हा हे कळले त्याने तडक चेटकिणीची मागणी पूर्ण करण्याचा हट्ट आर्थरकडे धरला.तो म्हणाला माझ्या मित्राच्या प्राणांपुढे हा त्याग काहीच नाही.

नाईलाजाने का होईना आर्थरने लॅन्सलॉटचे म्हणणे मान्य केले.लॅनस्लॉट व चेटकीण यांच्या विवाहाची घोषणा झाली.


तेव्हा चेटकिणीने आर्थरचा जीव वाचवणारे उत्तर दिले की.


" स्त्रीला तिच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार हवा असतो. "


हे उत्तर ऐकून सर्वांना जाणीव झाली की चेटकिणीने एक महान सत्य उघड केले आहे.


शेजारच्या राज्याच्या राजालाही हे उत्तर पटले व त्याने आर्थरला सर्व बंधनांतून मुक्त केले.या घटनेच्या आनंदोत्सवाबरोबरच चेटकीण व लॅन्सलॉट यांचा विवाह धूमधडाक्याने पार पडला.


विवाहाच्या पहिल्या रात्री जड पावलांनी घाबरत घाबरतच लॅन्सलॉटने शयनकक्षात प्रवेश केला. पण समोरचे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.मंचकावर चेटकिणीऐवजी एक अतिसुंदर रूपगर्विता तरुणी बसली होती.


धक्क्यातून सावरल्यावर त्याने त्या तरुणीला विचारले की हा बदल कसा काय झाला ?


त्यावर ती म्हणाली की, मी चेटकीण असतानाही तू माझ्याशी एवढा प्रेमाने वागलास म्हणून मी ठरविले आहे की दिवसातला अर्धाच काळ मी चेटकीणीच्या रूपात राहीन आणि उरलेला अर्धा काळ या सुंदर व तरुण रूपात.


आता मी कोणत्या वेळी चेटकिणीच्या रूपात राहायचे अन कोणत्या वेळी या रूपात राहायचे हे तुला ठरवायचे आहे.


यावर लॅनस्लॉटच्या मनात दोन विरुद्ध पर्यायांमुळे विचारांचे द्वंद्व सुरू झाले.दिवसा तरुणी होऊ दिले तर सर्वांसमोर रुपवान पत्नी म्हणून मिरवता येईल.पण एकांतात काय?


अन् त्याउलट पर्याय निवडला तर कसे होईल ?


आता कल्पना करा की लॅन्सलॉटच्या जागी तुम्ही आहात अन एका पर्यायाची निवड करायची आहे तर अशा वेळी तुम्ही कोणता पर्याय निवडला असता ?


तुमचा पर्याय ठरला असेल तर खाली लॅन्सलॉटचे उत्तर वाचा.


कुलीन लॅन्सलॉट चेटकिणीला म्हणाला की, आजपासून जरी तू माझी पत्नी असलीस तरी केव्हा कसे राहायचे हे ठरविण्याचा हक्क पूर्णपणे तुझाच आहे.तुला जेव्हा जसे आवडेल तेव्हा तू तशी राहा.

माझी कसलीही हरकत राहणार नाही.


हे ऐकून चेटकीण लॅन्सलॉटवर प्रचंड खूष झाली व तिने त्याला वचन दिले की ती चेटकिणीच्या रूपाचा कायमचा त्याग करेन.कारण लॅनस्लॉटने तिला आदराने वागवले व तिच्या आयुष्याचे निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क तिला दिला.


अनामिक..

२/६/२३

विचार करायला लावणारी माणुसकी..!

घड्याळात रात्रीच्या नऊचे टण ठण टण टण टोल पडले तसे तशी माझी चिंता अधिकच वाढली.माझेसमोर बाबांचं कलेवर सकाळी बारा वाजेपासून पडलेलं,त्यांचा अंत्यविधी करायचा होता.पंधरा मजली या इमारतीत हजारों कुटुंबे होती,पण कोणाचाच कोणाशी संपर्क नाही.

शेजारच्या फ्लॅटमध्ये काय घडतंय हे ही कोणाला माहित नसायचं.जो तो आपापल्या कोषात मग्न,दरवाजे बंद करून तीन चार रूमच्या त्या सदनिकांमध्ये प्रत्येक जण मोबाईल,संगणक,whats app,face book,twitter, instagram च्या आभासी जगात व्यस्त.


सकाळीच मी आमच्या अपार्टमेंटच्या समूहावर बाबांच्या निधनाची पोस्ट टाकलेली.प्रत्येकाचे RIP,भावपूर्ण श्रध्दांजली,ईश्वर मृत्म्यास शांती देवो,तुम्हांस दुःख सहन करण्याची शक्ती,ओम शांती सारख्या मेसेजेसनी whats app फुल झालं.vertually सगळं झालं म्हणजे जणू संपलं,केलंय आपण सांत्वन हीच धारणा सगळ्यांची.पण कोणी प्रत्यक्ष येऊन मला भेटले नाही,मदत करणे तर दूरच.


बरे माझे नातेवाईकही भरपूर,सांगायला खंडीभर आणि कामाला नाही कणभर अशा वृत्तीचे.बाबा आजारी असल्याचं मी सगळ्यांना कळविलेलं.


"चांगल्या डाॅक्टरला दाखवा,ट्रिटमेंट करा,काळजी करु नका,होतील बाबा बरे,अशा संदेशांनी,होय संदेशचं आभासी जग.कोणी video call वरही बोलले,पण प्रत्यक्ष भेटीचा प्रत्यय त्यात कसा येणार.


प्रत्येकाची कारणे वेगवेगळी होती नाही येण्याची,कोणाच्या घराचं बांधकाम,मुलांच्या परीक्षा,नोकरीतून रजा न मिळणं,कोणाचा भराला आलेला शेती हंगाम,अर्थात कोणी येणार नव्हतंच.


"अहो,काहीतरी करा ना.रात्र वाढतेय,पिंटू ही पेंगुळलाय,पण झोपत नाही आहे.आजोबांना सारखं उठवायला सांगतोय,कसं समजावू त्याला."


" होय ग..मी प्रयत्न करतोय, कोणाला तरी बोलावतो मदतीला "


साडेनऊचा टोल घड्याळाने दिला.हे घड्याळही बाबांच्याच पसंतीचं,जुन्या काळातलं,टण टण टोल देणारं,माझ्या आधुनिक फ्लॅटमध्ये विराजमान झालेलं,

अनेकवेळा दुरूस्त करून कार्यरत ठेवलेलं.


दुपारपासून मी मदतीसाठी उंबरठे झिजविले.

जोशींकडे गेलो तर दरवाजा उघडून तेच बाहेर आले,"नाही जमणार हो मला यायला,माझ्या मुलाची दहावीची परीक्षा चालू आहे,त्याला आणायला जायचंय"


चौथ्या माळ्यावरील गुप्तांकडे गेलो...अरे भाईसाब मेरा छोटा भाई आ रहा है विदेशसे,उसे लेनेके लिए एअरपोर्ट जाना है मुझे...


तेराव्या माळ्यावरील मायकल फर्नांडीस म्हणाला,"आलो असतो रे,पण आज आमची अल्कोहोल अँनानिमसची मिटींग असते दर रविवारी,प्रबोधनात्मक भाषण तर असतेच,पण मला रूग्णांचे समुपदेशनही करावे लागते. घाबरु नकोस.धीर धर,स्वतःला सांभाळ."


सी विंगमधील पराडकरांकडे गेलो तर,अरे आज आमचं दासबोधाचं निरूपण असतं अशा (मौतीत जाणं,सुतकीय कार्य ) प्रसंगी आज नाही येता येणार मला.


शेजारचा"स्वामीनाथन" नात्यातील लग्नासाठी जाणार होता तर दहाव्या माळ्यावरील "सुत्रावे" विक एंडला गेलेला.


दुसर्‍या माळ्यावरील "कोटनाके" कवी संमेलनासाठी जाणार होते.प्रत्येकाची काही ना काही कामे घाबरू नको,

येईल कोणी मदतीला ही कोरडी सांत्वनपर वाक्ये.


काय करू..?आज पावसानेही हैराण केलेलं.दिवसभरात पावसाची रिप रिप चालू होती,आता त्याचाही जोर वाढला होता,मला तर भडभडून आलं.


मुंबईच्या उपनगरातचं माझ्या पत्नीची बहीण राहात होती,पण तिलाही नववा महिना असल्याने माझा साडूही येऊ शकत नव्हता. 


शेवटी मनाचा निग्रह करून उठलो,माझ्या इमारतीच्या समोरच भाजी विकणारा संतोष राहात होता.

हातगाडीवरचं त्याचा भाजीचा ठेला होता.


"संतोष"माझा काहिसा कापरा,आर्त,दाटलेला,अवरूध्द

स्वर ऐकून तो म्हणाला,"काय झालं साहेब,,,काही अडचण आहे काय ? रडताय कशापायी"


अरे दुपारी बाबा वारले,आता दहा वाजत आलेत,अजूनही मी त्यांची अंतेष्टी करु शकलो नाही.मदतच नाही मिळाली रे मला कोठे."


"ओह...बाबा गेलेत.आपण करू बाबांची अंतेष्टी.काळजी करू नका.माझे चार दोस्त आताच बोलावतो.करू आपण सगळं व्यवस्थित"त्याने फटाफट मोबाईलवरुन आपल्या मित्रमंडळींशी संपर्क साधला.


ये महेश,येतांना अंतेष्टीचं सगळं सामान घेऊन येशील,?होय आपल्या बाबासारखेच आहेत ते,या कार्याला आपला हातभार लागलाच पाहिजे.दिनेश,शिवा,आणि मधुकरलाही सांगशील.सगळं कसं फटाफट झालं पाहिजे,रात्र वाढतेय,पाऊसही हैराण करतोय.


संतोष व त्याच्या मित्रांनी बाबांची आंघोळ घालण्यापासुन तर तिरडी बांधण्यापर्यंतची सगळी कामे अर्ध्या तासात उरकली.


"मी वैकुंठरथाची व्यवस्था करतो." "अहो निलेश दादा कशाला वैकुंठ रथ हवा,माझा भाजीचा ठेला आहेच की आणि मोठी छत्रीही,बाबांना अजिबात ओलं होऊ देणार नाही."


चितेची लाकडेही संतोष व त्याच्या मित्रांनी फटाफट रचली.बाबांना सरणावर ठेवलं आणि माझ्या संयमाचा बांधच फुटला,संतोषनं मला सावरलं,माझ्या खांद्यावर हात ठेवून मला सहारा देत,मला मुखाग्नी द्यायला लावला.

पाणी पाजण्यासाठी माझ्यासोबत तोही चितेभोवती फिरला.बराच वेळ माझ्या खांद्यावर थोपटत राहिला.

चितेच्या ज्वाळा कमी झाल्या तशी संतोष म्हणाला," चला दादानु,घरी चला...वहिनी वाट बघत्याल" संतोषनं मला घरी सोडलं. 


"येतो दादा"...

"थांब संतोष" मी खिशात हात घालून दोन दोन हजाराच्या तीन नोटा काढल्या," घे संतोष"..हे काय दादानु,पैसे नकोत मला." 


"अरे तुम्ही खर्च केलात,वेळेवर धावून आलात,ही माझ्यासाठी फार मोठी मदत होती,याचं मूल्य पैशात होण्यासारखं नाहीच आहे,पण शेवटी हा व्यवहार आहे,घ्या हे पैसे" दादानु.."तुमचे बाबा आमचे बी बाबाचं की.नको मला पैसे.


शेवटी काय असतं दादानु,'माणूस मरतो हो,माणुसकी नाही.इथे व्यवहार गौण ठरतो दादा,येतो मी…


वहिनीस्नी सांभाळा,पिंटूच्या आणि तुमच्या खाण्यासाठी काही घेऊन येतो.


बाहेर पाऊसही आता मंदावला होता.बाबांना निरोप देण्यासाठीच जणू त्यानेही हजेरी लावली होती.


या आभासी जगातही कोठेतरी माणुसकी अजूनही शिल्लक होती.


नरदेह दुर्लभ या जगी

नराचा नारायण व्हावा

माणूस बनून माणुसकी जपण्याचा

अट्टाहास मनी बाळगावा.


डाॅ.शैलजा करोडे

नेरूळ नवी मुंबई

१/६/२३

आपणच वाट आणि आपणच वाटसरू अशी माणसाची अवस्था होती.

आयुर्वेद..


५,००० वर्षांपूर्वी भारतात आयुर्वेदाचा जन्म झाला असं मानलं जातं.आयुर्वेदाची सुरुवात कशी झाली त्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात.त्यातली एक कथा अशी,

की पुराणात भगवान विष्णूचा अवतार मानला जाणारे धन्वंतरी मुनी हे देवांचे वैद्य होते,तर सुश्रुत मुनी हे जेव्हा देव आणि दानव समुद्रमंथन करत होते, तेव्हा हातात अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी पृथ्वीतलावर अवतरले अशी कथा आहे.धन्वंतरी मुनींनी आपलं वैद्यकशास्त्राचं ज्ञान सुश्रुत या त्यांच्या शिष्याला दिलं.या दोघांनी मिळून शल्यक्रियेविषयी एक पुस्तक लिहिलं.ते पुस्तक नागार्जुन नावाच्या औषधशास्त्राशी संबंधित माणसाच्या हाती लागलं.त्यानं ते नीट जतन केलं आणि पुढे नेलं.ते जगातल्या पहिल्या काही शल्यविशारदांपैकी एक असले पाहिजेत.आयुर्वेदाची पाळंमुळं रुजवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.हळदीची रोगप्रतिबंधकशक्ती,रोगांचा अटकाव करणारे मिठाचे गुणधर्म या सगळ्या गोष्टींबरोबर एकूणच औषधी वनस्पती वापरून बहुतेक सारे आजार बरे करण्याची कल्पना प्रथम त्यांनीच मांडली.किंबहुना आज सर्रास वापरली जाणारी प्लास्टिक सर्जरी ते त्या काळातच करायचे! फक्त त्यांची पद्धत कालानुरूप अतिशय ओबडधोबड असे,इतकाच काय तो फरक.त्यांच्या सगळ्या शस्त्रक्रिया भुलेविनाच होत असल्या तरी त्या बहुतेक वेळा यशस्वी व्हायच्या हे विशेष! त्यांच्या कौशल्यामुळे विक्रमादित्याच्या दरबारातल्या नवरत्नांमध्ये नंतर त्यांचा समावेश झाला.


आयुर्वेदाबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे. ख्रिस्तपूर्व १३०० च्या सुमाराला भारतात रोगाच्या एका भयानक साथीनं थैमान घातलं होतं! त्यात लाखो माणसं दगावली. पुराणकथांमध्ये चरक मुनींनी लिहून ठेवलंय,की 'या भयानक संकटातून काय मार्ग काढायचा यावर विचार करण्यासाठी अनेक ऋषिमुनी हिमालय पर्वताच्या पायथ्याशी जमले.त्यांनी भारद्वाज मुनींना स्वर्गात देवांचा राजा असलेल्या इंद्राकडे पाठवून वैद्यकीय उपचारां -

विषयीचं ज्ञान पृथ्वीवर आणायला सांगितलं.भारद्वाज मुनींनी त्यानुसार दीर्घायुष्यासाठी काय करायला हवं याविषयी इंद्राशी चर्चा करून मिळवलेली माहिती घेतली आणि पृथ्वीवर परत येऊन आत्रेय मुनींना दिली.त्यातून आत्रेय मुनींनी तक्षशिला प्रांतामध्ये आयुर्वेदाविषयीचं गुरुकुल सुरू केलं.त्यामुळेच आत्रेय मुनींना भारतीय वैद्यकशास्त्राचा जनक मानलं जातं.त्यांच्या अग्निवेश,

भेल,जतुकर्ण,पराशर,हरित आणि क्षरपाणी या सहा शिष्यांनी वैद्यकीय विषयांवर अनेक प्रबंध लिहिले.

संस्कृतमधल्या आयुर्वेद या शब्दाचा सोपा अर्थ निरोगी दीर्घायुष्याचं ज्ञान असा लावता येईल.आयु म्हणजे आयुष्य आणि वेद म्हणजे ज्ञान.आयुर्वेदामध्ये माणसाचं आचरण आणि त्याचा आहार,स्वच्छता,व्यायाम आणि दिनक्रम यांच्याविषयी महत्त्वाचे सल्ले दिलेले आहेत.

सुरुवातीचं आयुर्वेदाचं ज्ञान चरक आणि सुश्रुत या दोघांनीच मिळून बनलेलं होतं. पण नंतर वाग्भटांनी लिहिलेला 'अष्टांग हृदय' नावाचा तिसरा प्रकारही आला.त्यात चरक आणि सुश्रुत यांच्या पद्धतींचा अर्क एकत्र करून थोडक्यात मांडलेला आहे.


सुश्रुतसंहितेमध्ये कुष्ठरोगाविषयी लिहिलेलं आढळतं.यात माणसाच्या संवेदना बोथट होतात, हातापायांची बोटं झडतात,शरीराचा आकार बेढब होतो,हातापायांवर व्रण उमटतात आणि नाक झडून चपटं होत जातं या सगळ्या लक्षणांची वर्णनं आहेत.ग्रीकांनी हा रोग भारतातून आपल्याकडे नेला आणि रोमनांनी मग तो इजिप्तमधून युरोपात पसरवला असं मानलं जातं.तसंच १८१७ साली पार्किन्सननं वर्णन केलेल्या पार्किन्सन्स डिसीज या रोगाशी अतिशय मिळतीजुळती वर्णनं कंपवात या नावानं सुश्रुतसंहितेमध्ये वाचायला मिळतात! सुश्रुतसंहितेमध्ये अनेक प्रकारच्या शल्यक्रियांविषयीही कमालीच्या अचूकतेनं लिहिलेलं आहे.उदाहरणार्थ,मोतीबिंदूवरच्या जवळपास आजच्या युगातल्या शस्त्रक्रियेचं वर्णन सुश्रुतांनी लिहिलेलं होतं.!


सगळ्या रोगांची मुळं वात,पित्त आणि कफ अशा तीन प्रकारच्या प्रकृतींच्या असंतुलनामध्ये असतात असं म्हटलं आहे.तसंच माणसाच्या शरीरात रस,रक्त,मांस (स्नायू), मेद (चरबी), अस्थी (हाड),मज्जा (हाडाच्या आतला चरबीसारखा मऊ पदार्थ),आणि शुक्र (वीर्य) असे सात महत्त्वाचे धातू असतात असं आयुर्वेद मानतं.आयुर्वेदाच्या उपचारपद्धतींमध्ये प्रामुख्यानं रुग्णाला विविध प्रकारची तेलं चोळणं,काढे आणि औषधं देणं,एनिमा देणं,त्याचं शरीरमर्दन करणं आणि शल्यक्रिया करणं यांचा समावेश होतो. पंचकर्मही आयुर्वेदात करतात. त्यात वमन,

विरेचन,नस्य,बस्ती,रक्तमोक्षण अशा पाच प्रकारे औषधोपचार केला जातो.तसंच गोमूत्र आणि गाईचं शेण या गोष्टींमध्ये जंतुनाशक तत्त्वं भरपूर प्रमाणात असल्यानं त्यांचा औषधांमध्ये वापर करावा असं आयुर्वेद मानतं.


इतर गोष्टींबरोबरच आयुर्वेदाचंही वर्णन भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या व्यास ऋषींनी आपल्या 'वेद' या नावानं ओळखल्या गेलेल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं होतं. त्याचे चार मुख्य भाग मानले जातात.ते म्हणजे ऋग्वेद,सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद ऋग्वेदामध्ये सगळ्यांच्या अस्तित्वाविषयी लिहिलेलं आहे.तसंच विविध रोग आणि त्यांच्यावरच्या उपचारपद्धती यांचंही वर्णन त्यात आहे.


विश्वाची निर्मिती झाली तेव्हा त्यात पृथ्वी, जल,

अग्नी,वायू आणि आकाश या पंचमहाभूतं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटकांचा समावेश होता असं मानलं जातं. माणूस हा विश्वामधलाच एक भाग असल्यामुळे त्याच्याही शरीरात हे पाच घटक असतातच,असं आयुर्वेद मानतं.


मग या घटकांचं माणसाच्या शरीरात असणारं प्रमाण किती असतं यावरून त्याची प्रकृती ठरते.यातूनच आयुर्वेदात वात,पित्त आणि कफ या दोषांविषयीची चर्चाही आढळते.


साहजिकच माणसाच्या शरीरात जेव्हा पंचमहाभूतांचं प्रमाण बिघडतं तेव्हा या तीन गोष्टींचं प्रमाण आणि संतुलनही बिघडतं असा त्यामागचा सिद्धान्त आहे.

उदाहरणार्थ,जेव्हा माणसाच्या शरीरात उष्णता वाढते तेव्हा पित्तदोष वाढतो,कोरडेपणा वाढला की वातदोष वाढतो आणि ओलेपणा वाढला की कफदोष वाढतो.असं काही झालं की माणूस आजारी पडतो,असं आयुर्वेद मानतं.हे सगळं होण्याचं कारण म्हणजे माणसाच्या सवयी,मन किंवा आजूबाजूचा परिसर यामध्ये बदल होतो.

मन आणि शरीर यांना जडणारे विकार आणि त्यांच्यावर आवश्यक असणारे उपचार यांचंही वर्णन त्यात केलेलं आहे.उदाहरणार्थ,वात प्रकृतीच्या लोकांना मलावरोध,

सांधेदुखी, अस्वस्थपणा हे आजार जडण्याची शक्यता जास्त असते.पित्त प्रकृतीच्या लोकांना जळजळ, रोगसंसर्ग,शरीराच्या आत व्रण पडणं हे विकार जडण्याचं प्रमाण जास्त असतं.कफ प्रवृत्तीच्या लोकांमध्ये वजन जास्त असणं,त्यांना मधुमेह होणं आणि हृदयाचे आजार होणं या गोष्टी आढळतात.


दोषांबरोबरच आयुर्वेद माणसाच्या शरीरातल्या धातू आणि मल या आणखी दोन गोष्टींना महत्त्वाचं मानतं.धातू हे माणसाच्या शरीराच्या रचनेशी संबंधित असतात.असे एकूण ७ धातू आणि मल म्हणजे शरीरातल्या अनावश्यक गोष्टी बाहेर टाकून देण्याचं काम करणाऱ्या गोष्टी.असे ३ प्रकारचे मल म्हणजे स्वेद (घाम), पुरिष (विष्ठा),आणि मूत्र (लघवी) असतात.


अथर्ववेदामध्ये अनेक आजारांचं आणि उपचारांचं वर्णन केलेलं आहे.त्यात मुख्यत्वे संधिवात,अपस्मार,कावीळ,

हत्तीरोग आणि हृदयविकार यांच्याविषयी लिहिलेलं आढळतं.सुरुवातीच्या उपचारपद्धती जादू किंवा धार्मिक बाबींवर आधारित असायच्या.यासंबंधी दोन पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आढळतं.एक म्हणजे चरक मुनींचं रोग आणि त्यांच्यावरचे उपचार यांचं वर्णन असणारं चरकसंहिता आणि दुसरं म्हणजे शस्त्रक्रियांविषयीचं धन्वंतरी मुनींच्या बनारसमध्ये राहणाऱ्या सुश्रुत या शिष्याचं सुश्रुतसंहिता.चरकसंहिता हा एक भन्नाटच प्रकार आहे.अतिशय विस्तारानं सगळ्या आजारांचं आणि त्यावरच्या उपचारांचं वर्णन असलेल्या या ग्रंथात तब्बल १२० प्रकरणं आहेत! त्यांचे सूत्र,निदान,शरीर,इंद्रिय, चिकित्सा,कल्प आणि सिद्धी असे ८ विभाग पाडलेले आहेत.सुश्रुतसंहितेतल्या शल्यक्रियेविषयीची माहिती

देखील ८ विभागांमध्येच लिहिलेली आहे. हे ८ विभाग म्हणजे आयुर्वेदाची खासियत,काया चिकित्सा, बाल चिकित्सा,ग्रह चिकित्सा,शल्य चिकित्सा, शल्यक तंत्र,

अदाग तंत्र,रसायन तंत्र आणि वजीकरण तंत्र ही ती ८ तंत्र आहेत.!


प्रसूतीच्या वेळी काही अडचण आली तर शस्त्रक्रिया (सिझेरियन) करून मुलाला आईच्या पोटातून सुखरूप बाहेर काढलं जावं अशी कल्पना काही काळानं आली.

हिंदू धर्म सुरुवातीपासूनच सोशिकपणा आणि कर्म करत राहणं या गोष्टींवर भर देत आला असताना भारतातून वैद्यकीय क्षेत्रात इतकं योगदान कसं मिळालं असेल असा प्रश्न अनेकांना पडतो.याचं उत्तर क्लिष्ट असलं तरी योगाभ्यास हा त्याचा एक मोठा पैलू मानला पाहिजे.मोहेंजोदडोमध्येसुद्धा योगमुद्रा कोरलेल्या आढळल्या.तसंच बुद्ध धर्मातले मुनी आणि जोगिणी रोग्यांवर उपचार करण्यासाठी इस्पितळ बनवत होते. याचाही इतिहासात उल्लेख आढळतो.दक्षिण भारत आणि सिलोन (आता श्रीलंका) इथंही स्थानिक प्रथांनुसार वैद्यकीय उपचारांमध्ये सतत प्रगती होत गेली.तमिळ लोकांच्या उपचारपद्धती अथर्ववेदापेक्षा वेगळ्या होत्या.

'सिद्ध' नावाच्या प्रसिद्ध तमिळ उपचारपद्धतीची सुरुवात बोगर आणि रामदेवर नावाच्या दोघांनी केली असं मानलं जातं.बोगर चीनमध्ये जाऊन आला होता तर रामदेवनं मक्केला जाऊन अरबांना अल्केमीचं तंत्र शिकवलं होतं.

गौतम बुद्धांच्या असंख्य शिष्यांपैकी कश्यप यांनी लहान मुलांच्या आजारांवर अनेक उपाय सुचवले.त्यांचा भर लसणाच्या औषधी गुणधर्मांचा जास्तीतजास्त प्रमाणात वापर करण्यावर असे.हिप्पोक्रॅट्सच्या शपथेतल्यासारखेच नियम भारतीय डॉक्टर्स पाळायचे.


त्यात भर म्हणजे कुठल्याही विवाहित स्त्रीवर तिचा नवरा हजर असल्याशिवाय उपचार केले जाऊ नयेत असाही एक संकेत होता!


आयुर्वेदात माणूस आजारी पडण्याच्या सहा पातळ्यांचं वर्णन केलं आहे.पहिल्या पायरीत माणसाच्या शरीरात एक किंवा अनेक दोषांची प्रमाणाबाहेर वाढ होते.दुसऱ्या पायरीत हे दोष इतके वाढतात,की त्यांचे दुष्परिणाम जाणवायला लागतात.तिसऱ्या पायरीत हे दोष हाताबाहेर जातात,आणि आता ते दृश्य स्वरूपात माणसाच्या शरीरावर दिसायला लागतात.चौथ्या पायरीत हे दोष माणसाच्या शरीराची दुर्बल किंवा आधी व्याधिग्रस्त झालेली जागा हुडकून ती आपणच बळकावून टाकतात.पाचव्या पायरीत माणूस पूर्णपणे रोगी किंवा आजारी झालेला असतो.सहाव्या आणि शेवटच्या पायरीत माणसाला दोषांवर आधारित ठरावीक प्रकारच्या व्याधी होतात.त्यामुळे आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब करणारे डॉक्टर्सही त्यांच्या उपचारपद्धतींमध्ये रुग्णाच्या तब्येतीचा इतिहास,त्याच्या सवयी,राहणीमान आणि त्याला कोणते दोष प्रमाणाबाहेर सतावतात हे बघूनच उपचार करतात.

बरेचदा या उपचारांची सुरुवात त्याच्या शरीराच्या शुद्धीकरणानं होते.कारण रोग्याच्या शरीरात साठलेल्या विषारी प्रवृत्तींना (किंवा दोषांना) बाहेर काढलं नाही तर त्या शरीरात आणखी पसरतात,असं आयुर्वेद मानतं. तसंच या प्रवृत्ती शारीरिकच नव्हे तर मानसिकही असू शकतात.उदाहरणार्थ,कधीकधी नैराश्याचे झटके येणं हा एक प्रकारचा रोगच माणसाला भेडसावत असू शकतो.

अशा वेळी त्या माणसाला राग का येतो याकडे बारीक लक्ष ठेवून तो बाहेर पडू देणं आणि तो परत येऊ नये. यासाठी हळूहळू उपाय योजणं ही मात्रा असू शकते.राग येताना आपल्याला काय वाटतं याकडे रुग्णानं लक्ष देणं आणि तसं परत होऊ नये यासाठी विचार करणं अशी ही उपचारपद्धती बरेचदा अतिशय यशस्वी ठरते!छातीत साठून राहिलेला कफ किंवा पोटात सतत अपचन होऊन येणारे गॅसेस अशा शारीरिक दोषांना बाहेर काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेकदा पंचकर्म केलं जातं.पंचकर्म म्हणजे ओकाऱ्या काढणं,रेचकाचं सेवन करणं,एनिमा घेऊन मलाद्वारे दोष बाहेर टाकणं,नस्यक्रिया करून नाकातून दोष बाहेर टाकणं आणि दूषित रक्ताला वाहू देणं या पाच क्रिया.यामुळे अनेकांना त्यांच्या त्रासातून मुक्तता मिळते अशी आयुर्वेदाची तत्त्वं आहेत.


नंतरच्या काळात मुस्लिमांच्या आक्रमणानं अरबी औषधपद्धतींची भारताला ओळख करून दिली. मग त्यात ग्रीक वैद्यकांची आणि गेलनच्या शोधांची भर पडणार होती.अकराव्या शतकात तुर्कस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या भारतीय भूमीवरच्या आक्रमणाबरोबरच युनानी उपचार पद्धतीही भारत

भूमीवर आली.आजही ही उपचारपद्धती वापरणारे हकीम नावाचे वैद्य आहेतच !


११ जानेवारी २०२३ या लेखातील पुढील भाग