* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२०/२/२४

निरोप घेता / Saying goodbye..

१६८० च्या दशकाच्या सुरुवातीचा काळ ! जेव्हा एडमंड हॅली आणि त्याचे मित्र क्रिस्टोफर रेन आणि रॉबर्ट हुक लंडनच्या कॉफी हाउसमध्ये बसून एक सहजच पैज मारणार होते,ज्याचा परिपाक पुढे जाऊन आयलॅक न्यूटनच्या प्रिन्सीपिआ ग्रंथात होणार होता,जेव्हा हेन्री कॅव्हेंडिश पृथ्वीचं वजन करणार होता आणि अशीच इतरही खूपच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद कामं हाती घेतली जाणार होती,जी  या पुस्तकाच्या गेल्या पाचशे-सहाशे पानांत बघितलीत. अशा वेळी आणखी असंच एक मैलाचा दगड गाठला जात होता मॉरिशस बेटावर किनाऱ्यापासून दूर हिंदी महासागरात, मादागास्कर बेटाच्या पूर्वेला साधारणपणे १३०० किलोमीटर्सवर ! त्या ठिकाणी कुणी विसरलेला खलाशी किंवा खलाश्याचा पाळीव प्राणी हा नामशेष होत आलेल्या 'डोडो' पक्ष्यांच्या उरल्यासुरल्या छोट्या गटावर वारंवार हल्ले करत,त्यांना पुरतं नामशेष करण्यात गढलेला होता.डोडो पक्षी बिचारे उडू न शकणारे, भोळेभाबडे आणि समोर आलेल्यावर विश्वास ठेवणारे आणि चपळपणे पळूही न शकणारे असल्याने ते सुट्टीवर जमिनीवर वेळ घालवण्यासाठी आलेल्या खलाश्यांचा कंटाळा घालवण्यासाठी अगदीच सोप्पं आणि सहज हाती लागणारं सावज बनत असत! लक्षावधी वर्षं मानव अगदीच दूर असल्यामुळे त्यांना मानवाच्या विचित्र,विक्षिप्त आणि भीतिदायक वागणुकीची सवयच नव्हती ! आता आपल्याला त्या वेळची ती नेमकी कारणं,ती नेमकी परिस्थिती माहीत नाही किंवा ते शेवटचे क्षण नक्की सांगता येणार नाहीत,जेव्हा शेवटचा डोडो नामशेष होत होता,त्यामुळे आपल्याला हे नक्की सांगता येणार नाही की, यापैकी आधी काय आलं ते जग,ज्यात प्रिन्सीपिआ होता की जे जग,ज्यात 'डोडो' नव्हता! पण आपण हे सांगू शकतो की,त्या दोन्ही गोष्टी साधारणपणे एकाच काळात घडल्यात! मला हे मान्य आहे की,मानवाचा चांगुलपणा आणि त्याचबरोबर दुष्टपणा एकाच काळात घडताना दाखवणारी अशी दुसरी जोडी तुम्हाला शोधणं कठीण जाईल! सजीवांची अशी एक प्रजाती असणं की,जी या ब्रह्मांडातली गुढातली गूढ रहस्यही समजू शकेल,शोधू शकेल आणि त्याच वेळी काहीही कारण नसताना एका अभागी,दुर्दैवी प्राण्यावर हल्ले करत त्याला 'आपण का संपवले जातोय' हे कळूही शकत नसताना पार नामशेष करून पृथ्वीवरून त्याचा एकही जीव शिल्लक ठेवत नसेल? खरंच,डोडो पक्षी हे इतके अजाण,भोळे आणि अडाणी होते की,तुम्हाला जर एखाद्या ठिकाणचे सर्व डोडो शोधायचे असतील,तर फक्त एक डोडो पकडायचा त्याला केकाटत ठेवायचं की,त्या भागात आसपास असणारे सगळेच्या सगळे डोडो 'काय झालं? काय झालं?' बघायला आपणहून येऊन उभे राहतील तुमच्यासमोर !!


आणि डोडोंना तशी अपमानास्पद आणि वाईट वागणूक देणं तिथेचं संपलं नाही बरं! १७५५ साली,'शेवटचा' डोडो नष्ट होऊन सत्तर वर्षं उलटल्यावरची गोष्ट


ऑक्सफर्डच्या ॲशमोलियन म्युझियमच्या डायरेक्टरने त्यांच्या संग्रहात असणारा पेंढा भरलेला डोडो पार मळलेला आणि कुबट वास येणारा झाला असल्याने त्याला उचलून चक्क शेकोटीत टाकण्याचं फर्मान सोडलं! तो प्रचंड धक्कादायक निर्णय होता.कारण,पेंढा भरलेला अथवा कशाही अवस्थेतला तो अख्ख्या जगातला एकमेव डोडो पक्षी शिल्लक होता,त्यामुळे तिथून जाणाऱ्या दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने हैराण होऊन आणि दचकून आगीत हात घालत तो डोडो वाचवण्याचा प्रयत्न केला; पण त्याला फक्त त्या डोडोचं मुंडकं आणि पायाचा भाग काय तो वाचवता आला होता.!


साध्यासरळ व्यवहारज्ञानाच्या अशा गोष्टीसुद्धा पाळल्या न गेल्याने आणि अक्कलशून्य वागणुकीमुळे आता डोडो पक्षी होता तरी कसा नक्की हे ही आपल्याला कळायची संधीच शिल्लक राहिलेली नाही! 'बऱ्याच मंडळींना वाटत असतं,त्याहीपेक्षा खूपच कमी माहिती आता आपल्याजवळ शिल्लक आहे डोडो पक्ष्याची! काही सागरसफरीवर गेलेल्या अशास्त्रीय प्रवाशांकडून केलं गेलेलं धोपट वर्णन, तीन-चार ऑइल पेंटिंग्ज आणि काही किरकोळ हाडं किंवा कडक झालेले अवयव' - हे उद्विग्न शब्द आहेत.१९ व्या शतकातल्या निसर्गशास्त्रज्ञ एच. ई. स्ट्रीकलॅन्ड यांचे! स्ट्रीकलॅन्ड यांनी खेदानं असं नोंदवलंय की,आपल्याकडे काही प्राचीन समुद्रीसैतानांचे आणि महाकाय डुलत जाणाऱ्या डायनोसॉर्ससारख्या प्राण्यांचे अवशेष आहेत;पण दुर्दैवानं जो पक्षी आपल्याच वर्तमानकाळात अस्तित्वात होता,त्याचे मात्र काहीच शिल्लक नाही.असा पक्षी ज्याला आपल्याकडून फक्त आपली अनुपस्थिती हवी होती! तर आजमितीला 'डोडो' पक्ष्याविषयी आपल्याला काय माहिती आहे तर ते इतकंच तो मॉरिशस बेटावर राहत होता; तो जाडजूड लठ्ठ अंगाचा होता; पण त्याचं मांस चवदार नव्हतं, 'कबुतर' जातीतला तो सर्वांत आकाराने मोठा पक्षी होता;पण नक्की किती ते मात्र सांगता येणार नाही.कारण,त्यांच्या वजनाचे कुठे संदर्भ उपलब्ध नाहीत.स्ट्रीकलॅन्डच्या हाडं आणि अवशेषांच्या उपलब्ध माहितीवरून आणि ॲशमोलियनच्या शिल्लक राहिलेल्या अवशेषांवरून अंदाज बांधता येतो की,डोडो साधारणपणे अडीच फूट उंच आणि आधीच्या टोकापासून ते शेपटीपर्यंत तेवढाच अडीच फूट लांब असावा! उडू शकत नसल्याने तो जमिनीवरच अंडी घालत असे - ज्यामुळे त्यांची अंडी हे त्या बेटावर माणसांनी आणलेल्या कुत्रे, डुक्कर आणि माकडांसाठी आयतच खाद्य ठरत असतील.'डोडो' हा साधारणपणे १६८३ सालपर्यंत 'नामशेष झाला.(१६९३पर्यंत तर अगदीच,पार नाहीसाच झाला). त्यानंतर मात्र आजतागायत आपल्याला त्या पक्ष्याविषयी काहीही माहिती मिळालेली नाही, इतकंच की आता तो यापुढे पृथ्वीवर कधीच दिसणार नाही! 


आपल्याला त्याच्या पुनरुत्पादनाच्या,खाण्याच्या सवयीविषयी कुठलीच माहिती नाही.तो कुठपर्यंत संचार करत होता,त्याचा आवाज तो शांत असताना कसा यायचा किंवा संकटात असताना सूचना देण्यासाठी कसा ओरडायचा याचीही माहिती नाही आणि पृथ्वीवर 'डोडो'चं एकसुद्धा अंड उपलब्ध नाही.माहितीनुसार, डोडोशी मानवाचा संपर्क हा जेमतेम सत्तर वर्षंच होता.हा म्हणजे अगदीच अल्पकाळ ! आणि तो बघता आपण असं म्हणूच शकतो की,मानवाची हजारो वर्षं अशी सवय असल्याने आपण कितीतरी प्राण्यांना अशा प्रकारे कायमचं नष्ट, नामशेष करून मोकळे झाले असू! कुणाला काय माहीत की मानव हा किती भयंकर संहार करणारा प्राणी आहे ते! पण हे निर्विवाद सत्य आहे की पृथ्वीच्या पाठीवर गेल्या ५० हजार वर्षांत मानव जिथे जिथे गेलाय तिथे तिथे त्याने प्राण्यांना संपवण्याचं काम केलंय कधी कधी तर प्रचंड संख्येने !


अमेरिकेपुरतं बोलायचं तर गेल्या १० ते २० हजार वर्षांमध्ये मानवाने इथे पाऊल ठेवल्यापासून ३० प्रकारचे मोठमोठ्या जातीचे काही तर फारच मोठ्या,महाकाय जातीचे प्राणी एकेका तडाख्यात नष्ट केलेत! निव्वळ उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतच आधुनिक मानवाचं आगमन झाल्यापासून,या शिकारी मानवाने आपल्या तीक्ष्ण भाल्यांच्या आणि संघटन कौशल्याच्या जोरावर मोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या जातींपैकी तीन चतुर्थांश जाती संपवल्या आहेत! तर युरोप आणि आशियामध्ये, जिथे प्राण्यांना माणसांपासून सावध राहण्यासाठी जरा जास्त वेळ लागला,तिथे ही एक तृतीयांश ते निम्म्या इतक्या जाती नष्ट झाल्याच ! आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या बरोबर विरुद्ध कारणासाठी ९५ टक्के इतक्या प्राण्यांच्या जाती नष्ट झाल्या! केवळ सुरुवातीच्या काळात 'शिकारी' मंडळींची संख्या त्यामानाने कमी होती आणि प्राण्यांची संख्या भलतीच जास्त होती (उदाहरणार्थ उत्तर सैबेरियाच्या टंड्रा भागात एक कोटींवर 'मॅमथ' या हत्तीच्या जातीच्या प्राण्यांचे अवशेष बर्फात गाडले गेले असल्याचा अंदाज आहे) आणि कदाचित काही पंडितांच्या मते इतरही काही कारणं असावीत की वातावरणातले बदल किंवा जगभर थैमान घालणारे साथीचे रोग वगैरे…


अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरीच्या रॉस मॅकफीनं म्हटल्याप्रमाणे - तुम्हाला त्यांची शिकार करायला हवी असं वाटावं,अशा काही धोकादायक प्राण्यांना मारण्यात,माणसाला काय भौतिक फायदा असणार असतो? आपण असे किती 'मॅमथ-स्टिक्स' खाणार असतो? इतर काहींच्या मते प्राण्यांना पकडून त्यांच्या कत्तली करण्याचं दुष्कर्म करणं भलतंच सोपं!टीम फ्लॅनरीने म्हटलंय की,ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत तर प्राण्यांना कदाचित आपण पळून जायला हवं हेही कळलं नसावं !


काही नामशेष झालेले प्राणी इतके विलक्षण देखणे आणि भव्य होते आणि ते असते तर थोडंफार त्यांना हाताळणं शिकावं लागलं असतं इतकंच ! कल्पना करा की,जमिनीवर राहणारे 'स्लॉथ' जे थेट तुमच्या वरच्या मजल्यावरच्या खिडकीला डोकावतायेत,अशी कासवं जी फियाट कारच्या आकाराएवढी आहेत.पश्चिम ऑस्ट्रेलियात वाळवंटातल्या रस्त्याच्या बाजूला ऊन खात पहुडलेले तब्बल ६ मीटर (१८ ते २० फुट) लांबीचे मॉनिटर जातीचे सरडे काश!! पण गेले ते सगळे !! आणि आपण आता एका संपत चाललेल्या ग्रहावर उरलेले आहोत! आजमितीला अख्ख्या जगात मिळून केवळ चारच खरोखर अजस्र (१००० किलो किंवा जास्त वजन असणारे) भूचर प्राणी शिल्लक आहेत हत्ती, गेंडे, हिप्पोपोटॅमस आणि जिराफ! कित्येक लाखो वर्षं पृथ्वीवरच जीवन इतकं नीरस आणि विझत जाणार नव्हतं ! मग असाही प्रश्न उभा राहतो की,अश्मयुग आणि अलीकडच्या काही वर्षांमधलं 'लुप्त होत जाणं' हे एकाच नामशेष होण्याच्या प्रक्रियेचा भाग तर नाहीत? थोडक्यात म्हणजे 'मानव' हा इतर प्राण्यांच्या दृष्टीने 'अशुभ वार्ता' बनून तर अवतरलेला नाही?


खेदाची सत्यता अशी की, तेच खरं असू शकेल! शिकॅगो युनिव्हर्सिटी पुराजीवशास्त्रज्ञ डेव्हिड राऊपच्या मते,

'आपण जर का जीवशास्त्रीय इतिहास बघितला,तर पृथ्वीच्या पाठीवर दर चार वर्षांनी एक प्रजाती नष्ट होण्याची सरासरी राहिलेली आहे!' द सिक्स्थ एकटींकशन या पुस्तकात रिचर्ड लिकी आणि रॉजर लेविननी म्हटलंय की,ती जी सरासरी आहे त्याच्या कदाचित १,२०,००० पट इतकी प्रचंड प्रजाती नामशेष करण्याची कामगिरी मानव जन्माला आल्यापासून त्याच्यामुळे घडली असावी ! १९९०च्या दशकाच्या मध्यात,आता ॲडलेडमधल्या साउथ ऑस्ट्रेलियन म्युझियमच्या प्रमुख असणाऱ्या निसर्गशास्त्रज्ञ टीम फ्लॅनरीला आपण या प्राण्यांच्या 'नामशेष' होण्याच्या प्रक्रियेबद्दल किती अनभिज्ञ आहोत,याचा धक्काच बसलाय. अगदी अलीकडच्या गोष्टी गृहीत धरूनही त्याने मला २००२च्या आमच्या भेटीदरम्यान सांगितलं, 'तुम्ही जिथे म्हणून बघाल तिथे काही ना काही कच्चे दुवे किंवा मोठमोठ्या रिक्त जागा दिसतील - डोडोसारख्या म्हणजे काहीच थांगपत्ता नसणाऱ्या किंवा कसलंच रेकॉर्ड शिल्लक नसणाऱ्या !' फ्लॅनरीने त्याच्या एका ऑस्ट्रेलियन चित्रकार मित्राला,पीटर शाउटनला बरोबर घेऊन एका महत्वाकांक्षी योजनेला सुरुवात केली. ती म्हणजे जगभर फिरून जे काही हरवलंय,जे काही गेलंय किंवा जे आजतागायत माहीतच नाही अशा गोष्टी धुंडाळायच्या हेच काम ! हे दोघांच्याही आवडीचं आणि त्यांनी त्याचा जणू ध्यासच घेतलेला! त्यांनी चार वर्षं अनेक जुने नमुने धुंडाळले,बुरशी आलेले जुने कुबट वास येणारे नमुने तपासले,जुने अवशेष बघितले,जुनी ड्रॉइंग्ज,

जुनी हस्तलिखित नजरेखाली घातली - जे जे म्हणून उपलब्ध होतं ते ते बघितलं! त्यांनी पाहिलेल्या तशा बहुतेक सर्व प्राण्यांची मग अंदाजे मांडणी करत शाउटननं पुरुषभर उंचीची चित्रं काढली आणि फ्लॅनरीने त्यासंबधी माहितीपर चार शब्द लिहिले! आणि त्यातूनच मग अ गॅप इन नेचर हे अद्भुत पुस्तक जन्माला आलं! त्यामध्ये गेल्या तीनशे वर्षांत नामशेष झालेल्या बहुसंख्य प्राण्यांची माहिती आपल्याला कॅटॅलॉग स्वरूपात पाहायला मिळते.


काही प्राण्यांचा अभ्यास करताना त्यांना सुस्थितीतले रेकॉर्ड्स मिळाले;त्यासंदर्भात अभ्यास करून कुणीही विशेष काही केल्याचं दिसत नव्हतं,अगदी वर्षानुवर्षं किंवा आयुष्यभर! 'स्टेलर्स काऊ' हा वॉलरससदृश प्राणी (काहीसा ड्युगॉन्गशी संबंधित) म्हणजे नामशेष झालेला अलीकडचा सर्वांत मोठा प्राणी! हा खरंच महाकाय होता - जवळपास ९ मीटर (३० फुट) लांबी आणि १० टन (१०,००० किलो) वजन!आपल्या आधुनिक जगाला याची माहिती केवळ एका अपघाताने झाली,जेव्हा १७४१ साली एका रशियन मोहिमेचं जहाज फुटून ती मंडळी एका किनाऱ्याला लागली? जिथे हे प्राणी बऱ्याच संख्येने शिल्लक होते - बेरिंगच्या सामुद्रधुनीत असणाऱ्या कमांडर बेटावर !


एक समाधानाची बाब म्हणजे त्या मोहिमेत जॉर्ज स्टेलर हा निसर्गशास्त्रज्ञ सहभागी होता,ज्याने त्या प्राण्यात विशेष रस घेऊन अभ्यास केला.फ्लॅनरीने म्हटलंय,त्याने त्या प्राण्यासंबंधी भरपूर,विपुल टिपणं काढली होती! इतकंच नव्हे,तर त्या प्राण्याची मापं घेताना त्याच्या लांबलचक मिश्यांचीसुद्धा मापं घेतली होती.फक्त एकाच गोष्टीविषयी त्याने लिहिलेलं आढळत नाही त्यातल्या नर - प्राण्याच्या लिंगाविषयी परंतु मादीच्या जननेंद्रियाविषयी मात्र त्याने टिपणं काढलेली आढळतात! त्याने त्या प्राण्याच्या कातडीचा एक तुकडाही जपून आणला होता,ज्यामुळे आपल्याला आज त्या प्राण्याच्या कातडीचा पोत कळतो;पण आपण नेहमी इतके सुदैवी नसायचो !


स्टेलरला इतकं करताना एक मात्र करता आलं नव्हतं,ते म्हणजे त्या 'समुद्रगायीला' वाचवणं! स्टेलरने तिचा शोध लावल्यापासून पुढच्या सत्तावीस वर्षांत त्या प्राण्याची प्रचंड शिकार होत गेलीपण इतर बरेच प्राणी त्या कॅटलॉगमध्ये समाविष्ट करता नाही येऊ शकले.कारण, त्यांच्याविषयी फार काही माहितीच उपलब्ध होऊ शकली नाही. 'द डार्लिंग डाऊन्स हॉप्पिंग माउस,' 'चॅथम आयलंड स्वॅन्स',असेन्शन आयलंड फ्लाईटलेस क्रेकं,जवळपास पाच प्रकारची समुद्री कासवं आणि इतरही काही प्राणी हे काळाच्या पडद्याआड गेलेत आणि आपण त्यांना कायमचे हरवून बसलोय ! त्यांची नावच काय ती शिल्लक आहेत! फ्लॅनरी आणि शाउटनला असंही आढळलं की,बऱ्याच बाबतीत नामशेष झालेले प्राणी हे त्यांच्या क्रूर आणि बेलगाम कत्तलींमुळे नव्हे तर अत्युच्च मूर्खपणामुळेही झालेत.!१८९४ साली न्यूझीलंडच्या उत्तर आणि दक्षिणेकडच्या बेटांजवळच्या सागरी वादळांच्या पट्ट्यात असणाऱ्या एका एकाकी खडकावर, स्टीफन्स आयलंडवर जेव्हा एक दीपगृह बांधण्यात आले,तेव्हा तिथे राहणाऱ्या दीपस्तंभाच्या कर्मचाऱ्यांची मांजर रोज त्याच्याकडे काही विचित्र छोटे पक्षी तोंडात धरून आणत असे,त्या कर्मचाऱ्याने इमानदारीत त्यातले काही मृत पक्षी वेलिंग्टनच्या म्युझियमकडे पाठवले.तिथला म्युझियमचा प्रमुख ते बघून उत्तेजित झाला.कारण,ते उडता न येणाऱ्या 'रेन' प्रकारचे छोटे पक्षी होते.कदाचित, उडता न येणाऱ्या अशा बसून राहणाऱ्या पक्ष्याची अत्यंत दुर्मीळ अशी ती जात! तो लगोलग त्या स्टीफन्स आयलंडच्या दिशेने निघाला; पण तो तिथे पोहोचेपर्यंत तिथल्या मांजरीने तिथल्या झाडून सर्व पक्ष्यांना ठार मारलं होतं. आता आजमितीला आपल्यासमोर शिल्लक आहेत केवळ १२ पेंढा भरलेले स्टीफन आयलंडवरचे पक्षी !


अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ निअरली एव्हरीथिंग - बिज ब्रायसन-अनुवाद-प्रसन्न पेठे (आपलं अस्तित्वच नव्हतं तिथपासून ते आज आपण इथे असेपर्यंतचा सारा प्रवास)- मंजुल पब्लिशिंग हाऊस..


पण निदान आपल्याजवळ तेवढे तरी आहेत म्हणायचे! बऱ्याचदा असं होत आलंय की, एखादी प्रजाती हयात असताना मानवाचं त्याकडे लक्षच गेलेलं नाही आणि ती प्रजाती पूर्ण नामशेष झाल्यावर मात्र आपल्याला जाग आल्याचं दिसतं ! आता कॅरोलिना पॅराकीटचंच बघा ना! लखलखत सोनेरी डोकं आणि पाचूसारखा हिरवागार रंग असणारा हा अतिशय मनोहारी,देखणा पक्षी एकेकाळी उत्तर अमेरिकेत असायचा आणि खरं तर पोपट इतक्या उत्तरेकडे फार आढळत नाहीत हेही आपल्याला माहितीये! एक काळ असा होता,जेव्हा ते अक्षरशः मुबलक संख्येने त्या भागात वस्ती करून होते. त्यांच्यापेक्षा जास्त संख्या केवळ भटक्या कबुतरांचीच असावी! पण हे कॅरोलिना पॅराकीटसुद्धा शेतकऱ्यांच्या मते त्यांचे शत्रू ठरले आणि मग त्यांच्या अतिशय सहज शिकारी होऊ लागल्या - एकतर त्यांना घट्ट कळप करून एकत्रच उडायची सवय आणि दुसरं म्हणजे बंदुकीचा एक बार जरी झाला तरी ते झटकन कळपात वर उसळायचे आणि नंतर आपल्या मेलेल्या जातभाईंना बघायला पुन्हा तिथेच जायचे, मग काय? १९व्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या - अमेरिकन ऑर्नीथॉलॉजी या आपल्या उत्कृष्ट पुस्तकात चार्ल्स विल्सन पीअल याने एका प्रसंगाचं वर्णन केलंय... जेव्हा त्याने एका झाडावर वस्ती करून असणाऱ्या त्या पक्ष्याच्या कळपावर आपली शॉटगन पूर्ण रिकामी केली होती -


उर्वरित भाग २३.०२.२४ या लेखामध्ये..।


१८/२/२४

झाडावर चढणारे कासव..! A turtle climbing a tree..!

भर दुपारी उन्हाच्या वेळी पवनीचे माधवराव पाटील व मी एका झरीजवळ झुडपाआड बसून तिथल्या पाण्यावर उतरणाऱ्या हरोळीचं छायाचित्र घ्यावं म्हणून त्यांची प्रतीक्षा करीत होतो.ह्या वर्षी खूप उन्हाळा जाणवत होता. पतझडीनं सारी जंगलं शुष्क वाटत होती. अग्निदिव्यातून निघालेल्या टेंबुर्णीला कोवळी, लाल,लुसलुशीत,नितळ पानं फुटत होती.करू, ऐन व धावड्याला खूप डिंक येऊन बुंध्यावरून ओघळत होता.टेंबुर्णीच्या झाडाखाली पिकलेल्या फळांचा सडा पडलेला होता.मोहाच्या फुलांचा वास साऱ्या आसमंतात दरवळत होता.चार पाच हरोळ्या उडत उडत झरीजवळच्या चारोळीवर बसल्या.त्यांच्या नादमधुर मुग्ध आवाजानं सारा परिसर मुखरित झाला.

टेपरेकॉर्डर चालू करून तो आवाज ध्वनिमुद्रित करीत असता समोरच्या नाल्यातील झुडपाच्या बुडात काहीतरी हललं.मी त्या बुडाकडे निरखून पाहिलं.उन्हानं सुकलेल्या रेतीच्या थराशिवाय कुठल्याही जिवाचं तिथं अस्तित्व दिसलं नाही.टेप बंद करून मी हरोळीकडे पाहात होतो.

तो झुडपाच्या बुडातील वाळूचा थर खालून हातानं ढकलल्यागत हलला.माझा डोळ्यांवर विश्वास बसेना.


ह्या उत्पाताचं काय कारण असावं.?धरणीकंप? पण तो एवढ्या लहान क्षेत्रात होईल कसा ? चिचुंद्री?परंतु पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या अशा शुष्क जागेत ती राहणं शक्य नव्हतं.हा काय प्रकार असावा म्हणून मनात अटकळ बांधत असता वाळूचा ढीग झुडपाभोवती पसरला.मी त्या मातकट तपकिरी कवचाकडे पाहात होतो. कवच जसं जोरानं वर येत होतं,तशी वाळू बाहेर पडत होती.आणि सावधगिरीनं,हळूच कवचयुक्त डोकं रेतीतून बाहेर येताना दिसलं.त्यानंतर कातडीयुक्त लांब मान त्यानं बाहेर काढली. पिचके डोळे त्यानं एक दोनदा मिचकावले. एकदा माझ्याकडे पाहिलं आणि सन्नाट्यानं पाचोळ्यात दिसेनासा झाला.तळं सोडून आलेला उन्हाळ्यातला हा पहिला कासव असावा.


उन्हाळ्याच्या आगमनाबरोबर तळ्यातील चाम,बहर-फ्रेश वॉटर टरटल- डुंबरे व चिखल्या- पॉन्ड टॉरटाईज जातीचे कासव इथल्या डोंगरावर चढू लागले.वर्षातून आठ महिने इथल्या खोल पाण्यात राहणारे हे कासव उन्हाळ्यात डोंगरावर का चढू लागतात ह्या रहस्याचा उलगडा झाला नाही.पर्वत आहे म्हणून गिर्यारोहण करणारा माणूस हा एकमात्र प्राणी नाही !


थोड्याच दिवसात सारा डोंगर कासवांनी भरून गेला.एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित जमलेले कासव यापूर्वी माझ्या पाहण्यात नव्हते. परातीएवढे मोठे काळसर-तपकिरी रंगाचे चाम,ताटाएवढे वहर,थाळीएवढे डुंबर व चिखल्या जातीचेकासव,रखडत,खरडत,दगडगोटे व ऐनाडी- ऐनाच्या झुडपांतून डोंगर चढताना आढळून आले.भर उन्हाळ्याच्या वेळी ओढ्या-नाल्याच्या ओल्या रेतीत,जांभूळ व करंजाच्या सावलीत डोकं खुपसून चाम व कासव विसावा घेत.एखाद्या ठिकाणी तुम्ही तासभर बसलात की सहज दहा एक कासव जाताना दिसले असते. त्यांना पकडणं मोठे कठीण,चाहूल लागताच ती पाचोळ्याच्या जाड थरात दडून बसतात.


कवच ल्यालेले हे उन्हाळी पाहुणे ऐनाडीच्या डिंकावर आधाशाप्रमाणं तुटून पडायचे.कासव डोंगरातील जंगलात का येतात याचं हे एक कारण होतं.दिवसा डुंबरं व चिखल्या दिसायचे.चांदण्या रात्री चाम व वहराच्या पाठी डोंगर चढताना चमकत.


एकदा मला वीस पंचवीस फूट उंचीवर असलेल्या ऐनाच्या आडव्या फांदीवर एक भला मोठा कासव डिंक खाताना दिसला.त्याचं छायाचित्र काढण्यासाठी चोरपावलानं जवळ गेलो, तसं त्या कासवानं अकस्मात स्वतःला खाली लोटून दिलं. कासव धपकन् खाली पडल्याचा आवाज आला. 


जलदगतीनं तो पाचोळ्यात घुसला.एकदा तर गिधाड पहाडावर; करूच्या गुळगुळीत बुंध्यावरून कासव डिंक खाण्याकरता चढताना मी पाहिला.चारी पायांच्या पंजांची नखं सालीत रोवून तो झाडावर चढत होता.बुंध्याला खाचा घातल्यानं डिंक खाली ओघळत होता. जमिनीपासून पांढऱ्या पिवळसर नितळ डिंकावर त्यानं यथेच्छ ताव मारला.तीन-चार फूट उंचावर असलेला तो कासव माझी चाहूल लागताच जलदीनं सरपटत खाली उतरला व पाचोळ्यात दिसेनासा झाला.


एकदा ऋद्धी धीवरानं भला मोठा चाम पकडून आणला होता.यापूर्वी एवढा मोठा चाम माझ्या पाहण्यात नव्हता.

त्याचं कवच मऊ,गुळगुळीत व घुमटाकार दिसत होतं.

कवचाची वाढलेली किनार लवचिक होती.त्याच्या नाकपुड्याचं रूपांतर दोन बारीक सोंडात झालं होतं.ह्या सोंडा पाण्यावर काढून तो बाहेरची हवा घेई.त्याच्या गळ्याला दोरीनं बांधलं होतं.इथं येईपर्यंत तो गळफास ठरून वाटेतच त्याचा अंत झाला होता.त्याची मान धडापासून वेगळी केल्यानंतर त्याच्या तोंडात लाकडाचा तुकडा घातला तेव्हा त्याच्या धारदार जबड्यानं लाकडाचे तुकडे तुकडे केले. चाम एवढ्या मोठ्या आकारापर्यंत वाढतात याची मला कल्पना नव्हती.त्याची लांबी मोजली तेव्हा तीन फुटांवर भरली.त्याला उचलायला दोन माणसं लागली.नवेगाव बांधच्या प्राणिसंग्रहालयासाठी मोठा जिवंत चाम मिळविण्याचा मी खूप प्रयत्न केला,पण माझी निराशा झाली.


डिंक खाण्याकरिता निघालेले कासव एकदा जंगलातील वणव्यात सापडले. पालापाचोळा पेट घेत होता.मला वाटलं,ते भाजून होरपळून निघेल.पण आगीची ऊब लागताच ते जागच्या जागी थिजले,

डोके पाय त्याने कवचात ओढून घेतले होते.आग त्यांच्या अंगावरून गेली.पोटाजवळच्या कवचाला आगीची झळ लागली होती.अग्निदिव्यातून निघालेले ते कासव हळूहळू वणव्याच्या विरुद्ध दिशेने निघून गेले.नवेगाव बांध जलाशयाच्या मध्यावर मालडोंगरी नावाचं छोटंसं बेट आहे.जलाशयाचं पाणी जसं आटू लागतं तसे उघडे पडू लागलेले तिथले काळे खडक पाणकावळे व करोते- दि इंडियन डार्टर- यांच्या शिटीनं पांढरेशुभ्र दिसू लागतात.एकदा त्या बेटाकडं डोंगीतून जाताना पाण्यावर डोकावत असलेल्या झाडाच्या थुटावर कासवाच्या जोडीचा समागम चाललेला दिसला. डोंगी जवळ येताच त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या.बेटाजवळच्या खडकावर एक कासवाची जोडी अनुनयात मग्न होती.

तिथल्या उथळ पाण्यात मादीच्या पाठीवर बसलेला नरकासव प्रियेसह जलक्रीडा करताना दिसला.


जिकडेतिकडे खूप पाऊस पडला.एक दिवस एक कासवी जलाशयाच्या भातशेतीच्या बांधावर खड्डा करताना दिसली.पुढील पायांच्या नखांनी माती उकरू लागली.

पाठीच्या साहाय्याने ती माती एका बाजूला सारीत होती.माती उकरून ती काय साध्य करीत आहे,हे माझ्या ध्यानात न आल्यामुळे दूर अंतरावरील ऐनाडीच्या झुडपात बसून मी तिच्याकडे पाहात राहिलो.खड्डा उकरून झाल्यावर बाहेर मातीचा ढीग दिसत होता.खड्ड्याच्या चोहोबाजूनं निरीक्षण केल्यावर तिला समाधान वाटलं.ती स्वतःभोवती एकदा गोल फिरली.मागची बाजू खड्ड्यात ओणावून चेहऱ्यावर आनंदी भाव आणून तिनं खड्डा भरून अंडी घातली.आश्चर्य व आनंदाच्या संमिश्र भावनेनं तिच्या ह्या महत्कृत्याबद्दल मी मनोमन आभार मानले.शांत व स्निग्ध नजरेनं मला ती जणू पिऊन टाकीत होती.हा विधी उरकल्यावर अंड्यांनी भरलेला खड्डा तिनं मातीनं झाकला. त्यावर उभी राहून पोटानं माती थोपटली.वरून पाऊस पडत होता.त्यावर पुन्हा एकदा फिरून खड्डा नीट झाकला की नाही याची खात्री करून घेऊन खड्ड्यावर ती थोडा वेळ विसावली.


हे सारं इतक्या विलक्षण,गतीनं घडलं की मी अचंब्यानं तिच्याकडे पाहात राहिलो.आमच्या वस्तुसंग्रहालयासाठी तिचं एखादं अंड हवं होतं. पण ती जवळपास असेपर्यंत अंडं घ्यावं असं वाटेना.कारण मी थोडी जरी घाई केली असती, तरी तिनं घाबरून सर्वनाश केला असता.अंडी तिनं पुनश्च उकरून ती चट्ट केली असती.तेथून ती प्रयाण करीपर्यंत मला वाट पाहावी लागली. तळ्याकडे गेल्यावर थोड्या अंतरापर्यंत तिचा पाठलाग केला.न जाणो ती परत घरट्याकडे आली तर? ती जशी पाण्यात शिरली तसा मी धावत तिच्या घरट्याकडे गेलो.काळजीपूर्वक माती उकरून अंडी मोजली.ती एकूण वीस होती.त्यातील एक अंडं काढून घेतलं.ते कबुतराच्या अंड्याएवढं,

गोलाकार,पांढऱ्या रंगाचं होतं.तिला संशय येऊ नये म्हणून परत तो खड्डा मातीनं भरून थोपटला.पूर्वी दिसत होता तसा हातानं सारवला.(जंगलाचे देणं - मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,नागपूर)

कासवाची अंडी दोन महिन्यांत उबतात असे प्राणिशास्त्रावरील ग्रंथात नमूद केलं आहे.

पण माधवराव पाटलांचं म्हणणं असं की कासवाची अंडी उबवायला आठ ते नऊ महिन्यांचा काळ लागतो. कासव आपली अंडी उबवीत नाहीत. अंडी योग्य वेळी उबताच पिलं घरट्यातून बीळ करून बाहेर येतात आणि तळ्याकडे परत जातात.

याविषयी मात्र त्यांचं दुमत नव्हतं.त्यांच्या शेताच्या बांधावर कासव पावसाळ्यात दरवर्षी अंडी घालतात. बांधावर फिरून त्यांनी कासवाचं एक घरटं शोधून काढलं.नुकतीच कासवानं त्यात सहा अंडी घातली होती.ती उकरून काढून त्यांच्या वाड्यात पुरली.आठनऊ महिन्यांचा कालावधी लोटल्यावर जून महिन्यात ती उकरून पाहिली.अंडी जशी होती तशी सापडली.त्यातील एक अंडं प्रयोगादाखल फोडलं असता त्यातून लिबलिबीत मांसाचा गोळा बाहेर पडला.वाटलं,अंडं कुजलं असणार.त्यावर थंड पाणी ओतलं तर काय आश्चर्य? त्या गोळ्यातून एका जिवाची हालचाल दिसू लागली.एक-दीड तास त्यावर पाणी टाकीत राहिल्यावर तो जीव चालू लागला.त्याला पाण्यात ठेवले.दोन दिवसांत त्याचा रंग बदलून कासवासारखा आकार आला.कासवाचं पिलू दिवसादिवसांनी वाढत होतं.एकदा नवेगाव जलाशयाकाठच्या जंगलातून भटकताना मला जमिनीवर पडलेली कासवाची पाठ दिसली.ती हातात घेऊन खालीवर न्याहाळून पाहिली.

डोके,मान व पोटातील अवशेष दिसत नव्हते.नुसता पोटापाठीचा मोकळा सांगाडा राहिला होता.ते कवच माधवराव पाटलांना दाखवीत मी विचारलं,


'पाटील, हा काय प्रकार?'


'नीलगाईनं ते कासव खाल्लं आहे.'


मी त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागलो.

आपलं म्हणणं अधिक स्पष्ट करीत ते म्हणाले,

'तळ्यावर पाणी प्यायला आलेल्या नीलगाईला हे कासव दिसलं असावं.कासव दिसताच नीलगाय त्याच्या पाठीवर पुढचे पाय ठेवून जोराने दाबते.दाब बसताच कासवाची मान आपोआप बाहेर येते.ती तोंडात धरून नीलगाय तिला जोराने हिसडा देते.

हिसडा बसताच त्याचा सारा अंतर्भाग बाहेर येतो व तो लगेच अधाशीपणे ती खाऊन टाकते.' पवित्र मानलेल्या नीलगाईनं मांसाहार करावा याचं मला आश्चर्य वाटलं.



१६/२/२४

काम आनंदाने असे कराल. Do the work with pleasure.

१९१५ मध्ये अमेरिकेमध्ये दहशतीचं वातावरण होतं.

विश्वयुद्ध एक वर्षापेक्षा अधिक काळ सुरु होतं.युरोपातले देश एकमेकांना निष्ठुरपणे मारत होते.मानवाच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंसा कधी झाली नव्हती.शांततेचं वातावरण पुन्हा स्थापन होऊ शकणार होतं का? कुणाला ठाऊक नव्हतं.परंतु वुडरो विल्सनने एकदा प्रयत्न करून पाहायचं ठरवलं.त्यांनी युरोपच्या शासकांकडे व सेनापतींकडे शांती-संदेश घेऊन एक व्यक्तिगत प्रतिनिधी,एक शांतिदूत पाठवण्याचा निर्णय घेतला.विल्यम जेनिंग्ज ब्रायन,जे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते,ते शांतीदूत बनून जायला तयार होते.त्यांना मानवतेची सेवा करायची इच्छा होती व त्यामुळे आपलं नाव इतिहासात अमर व्हावं असं त्यांना वाटत होतं.परंतु विल्सनने आपला जिगरी दोस्त आणि सल्लागार कर्नल एडवर्ड एम हाउस याला शांतिदूत बनवून पाठवून दिलं.ही बातमी ब्रायनला ऐकवण्याची जबाबदारीही कर्नल हाउसवर सोपवली गेली,ज्यामुळे त्यांना वाईट वाटू नये.

कर्नल हाउसने आपल्या रोजनिशीत लिहिलं आहे,"जेव्हा ब्रायनने ऐकले की मला शांतिदूत बनवून युरोपला पाठवले जातेयतेव्हा ते उघडपणे निराश झाले.ते म्हणाले की,'हे काम मी स्वतः करू इच्छित होतो." यावर मी उत्तर दिलं-'राष्ट्रपतींना असं वाटत होतं की शांतिदूताच्या रुपात जर आपण गेला असता तर सगळ्या जगाचे लक्ष या गोष्टीकडे आकर्षित झाले असते आणि लोकांना नवल वाटले असते की आपणे तिथे का गेलात?'तुम्हाला इशारा समजला? हाउसने ब्रायनला एका तन्हेने हे सांगितले,ते काम इतकं महत्त्वपूर्ण नव्हतं की त्यांच्यावर सोपवले जावे.ब्रायनचं समाधान झालं.कर्नल हाउसपाशी दुनियादारीची समज होती,अनुभव होता आणि कूटनीतीचे ज्ञानही होते.


त्यांना हा अमूल्य नियम माहीत होता.समोरच्या व्यक्तीवर कुठलेही काम अशा तऱ्हेने सोपवा,की तो खुश होऊन तुम्ही सांगितलेले काम करेल.


वुडरो विल्सनने जेव्हा विलियम गिब्ज मॅकाडूला आपला कॅबिनेट सदस्य बनवले,तेव्हा त्यांनीही हीच नीती वापरली.हा तो सर्वोच्च सन्मान होता, जो ते कुणालाही देऊ शकले असते.पण विल्सनने हा प्रस्ताव अशा तऱ्हेने मांडला की ज्यामुळे मॅकाडूला दुप्पट महत्त्व मिळेल. मॅकाडूच्या स्वतःच्या शब्दातच ही कहाणी ऐका.


" त्यांनी (विल्सननी) म्हटलं की ते आपली कॅबिनेट बनवताहेत आणि जर मी वित्तमंत्री बनलो तर त्यांना खूप आनंद होईल.त्यांची बोलण्याची तन्हा खूप सुखद होती.त्यांनी असं दाखवलं की त्यांचा प्रस्ताव स्वीकार करून मी त्यांच्यावर उपकार करतोय."


दुर्भाग्याने विल्सन नेहमी अशा व्यवहारकुशलतेने वागले नाही.जर त्यांनी असं केलं असतं तर आज इतिहास काही वेगळाच झाला असता. उदाहरणार्थ,अमेरिकेला लीग ऑफ नेशन्समध्ये सामील करण्याचाच मामला घ्या.

विल्सनने सीनेट व रिपब्लिकन पार्टीला या प्रकरणात खुश ठेवले नाही.एलिहू रूट वा चार्ल्स इव्हान्स ह्यूज किंवा हेन्री कॅबॉट लॉज यांना आपल्या बरोबर घेऊन गेले नाही.त्याऐवजी त्यांनी आपल्या पार्टीच्या अनोळखी सदस्यांना शांती-वॉनॅनला बरोबर नेलं.त्यांनी रिपब्लिकन्सला अपमानित केलं आणि त्यांना ही गोष्ट जाणवून दिली की लीगचा विचार रिपब्लिकन पार्टीचा नसून खुद्द विल्सनचा आहे.विल्सनने त्यांना स्पर्शसुध्दा करू दिला नाही.मानवी संबंधांना इतक्या वेगळ्या प्रकारे हाताळल्यामुळे त्यांनी आपल्या कारकिर्दीचा सत्यानाश केला,आपली तब्येत बिघडवून घेतली,आपलं आयुष्य कमी करून घेतलं.यामुळेच अमेरिकेला लीगच्या बाहेर राहावं लागलं आणि विश्वाचा इतिहास बदलला.


समोरच्या व्यक्तीवर कार्य अशा त-हेने सोपवा की ती खुश होऊन तुमच्या म्हणण्याप्रमाणे काम करेल.ही नीती केवळ राजनेते किंवा कूटनीतीज्ञच वापरत नाहीत.फोर्ट वेन, इंडियानाचे डेल ओ.फेरियरने आम्हाला सांगितले की त्यांनी कसे आपल्या छोट्या मुलाकडून आनंदाने सोपवलेले काम करून घेतले.


" जेफवर झाडावरून पडलेल्या पिअर्स गोळा करण्याचे काम सोपवले गेले होते,जेणेकरून हिरवळ कापायला आलेल्या माणसाला थांबून त्या उचलाव्या लागू नयेत.

त्याला हे काम पसंत नव्हतं आणि बहुतेक वेळा हे काम होतंच नसे किंवा द्याल तर इतक्या वाईट त-हेने व्हायचे की हिरवळ कापणाऱ्याला अनेकदा थांबून थांबून खाली पडलेल्या पिअर्स गोळा कराव्या लागत. सरळ रागावण्याऐवजी मी एक दिवस त्याला म्हटलं,"जेफ, मी तुझ्याशी एक तडजोड करीन म्हणतो.पिअर्सने भरलेली एक टोपली उचलण्यासाठी मी तुला एक डॉलर देईन.पण तुझं काम संपल्यावर मला एकही फळ जमिनीवर दिसलं तर मी प्रत्येक पिअर्समागे एक डॉलर तुझ्याकडून परत घेईन.बोल,सौदा मंजूर आहे? तुमच्या लक्षात आलंच असेल की त्यानंतर एकसुध्दा पिअर्स जमिनीवर पडलेली आढळली नाही.तो केवळ जमिनीवर पडलेल्या सर्व पिअर्स वेचून घेत नसे तर मला त्याच्यावर नजर ठेवावी लागत असे की कुठे तो झाडावरची फळं तोडून आपली टोपली भरत तर नाही ना!"


मी अशा एका व्यक्तीला जाणतो जी भाषणाचा आग्रह,

मित्रांची आमंत्रणं अशा प्रकारे अस्वीकार करायची की लोक नाराज होत नसत.त्याची पध्दत काय होती ? तो आपण खूप व्यग्र आहोत अन् त्याला हे काम करायचं,ते काम करायचं असं न सांगता,आधी तर तो आमंत्रणासाठी धन्यवाद देत असे.मग ते आमंत्रण स्वीकार करायला तो कसा असमर्थ आहे हे सांगून दुसऱ्या एखाद्या वक्त्याचं नावही सुचवत असे. दुसऱ्या शब्दात,तो समोरच्या व्यक्तीला आपल्या अस्वीकृतीबद्दल अप्रसन्न होण्याची संधीच देत नसे.तो ताबडतोड समोरच्या व्यक्तीच्या विचारप्रवाहाला कुणा अन्य वक्त्याकडे वळवून देत असे,

जो त्याचं आमंत्रण स्वीकार करण्याच्या स्थितीत असे.

गुंटुर स्किमित्झ पश्चिम जर्मनीत आमच्या अभ्यासक्रमात भाग घेतला.त्यांनी आपल्या फूड स्टोरमधील एका कर्मचाऱ्याचे प्रकरण सांगितले.ही कर्मचारी जिथे वस्तु दर्शनी फळ्यांवर ठेवलेल्या असतात,त्यांना किंमतीचे लेबल लावण्याच्या कामात निष्काळजीपणा करीत होती.

यामुळे समस्या निर्माण व्हायची आणि ग्राहक तक्रार करायचे.वारंवार समजावून, फटकारून आणि वाद घालूनसुध्दा फारसा फायदा झाला नाही.शेवटी स्किमित्झने तिला आपल्या ऑफिसात बोलावले आणि म्हणाले, 'मी तुझी दुकानात लेबल लावायच्या कामावर सुपरवायझर म्हणून नेमणूक करतोय.भविष्यात तुला ह्यावर लक्ष ठेवावे लागेल की सगळ्या वस्तूंना लेबलं लावली आहेत की नाही.' या नव्या जबाबदारीने वक्षबदललेल्या पदनावामुळे तिचा व्यवहार पूर्णपणे बदलून गेला आणि त्यानंतर ती आपले काम व्यवस्थित करू लागली.काय म्हणता? हा पोरकटपणा आहे? कदाचित असेलही.पण जेव्हा नेपोलियनने 'लिजन ऑफ ऑनर'च्या सन्मानार्थ आपल्या शिपायांना १५,००० क्रॉस वाटले,आपल्या अठरा अधिकाऱ्यांना 'मार्शल ऑफ फ्रान्स'चे सन्मान दिले आणि आपल्या सेनेला 'ग्रँड आर्मी' असे संबोधित केले,तेव्हा त्यालाही पोरकट समजण्यात आले होते.नेपोलियनची यावरून निंदा केली गेली.

युद्धाच्या आगीत होरपळलेल्या सैनिकांच्या हातात त्याने खेळणी किंवा खुळखुळे दिल्याची टिका करण्यात आली.यावर नेपोलियनने उत्तर दिले," मानवावर खेळण्यांनीच शासन केले जाऊ शकते." 


पदवी देऊन नेपोलियनला उपयोग झाला होता, हे तुमच्याही उपयोगी पडू शकेल.उदाहरणार्थ,स्कार्सडेल,न्यू यॉर्कमध्ये राहणारी माझी एक मैत्रीण अर्नेस्ट जेंट या गोष्टीने त्रस्त होती की काही मुले तिच्या हिरवळीवर धावून ती खराब करतात.

तिने मुलांना धमकावले,लालूच दाखवली,पण काही फरक पडला नाही.मग तिने त्या टोळीच्या पुढाऱ्याला बोलावले आणि त्याला एक पदवी बहाल करून त्याला महत्त्वपूर्ण होण्याचा अनुभव दिला.तिने त्याला आपला 'हेर' म्हणून नेमलं.तिने आपल्या 'हेराला' सांगितले की तो हिरवळीचं रक्षण करेल अन् अनधिकृत लोकांना तिथे घुसण्याची परवानगी देणार नाही. यामुळे तिची समस्या सुटली. तिच्या 'हेराने' मागच्या अंगणात एक शेकोटी पेटवली. तो लॉनवर येणाऱ्या मुलांना भाजून राख करण्याची धमकी देत असे.


जेव्हा तुम्ही आग्रह कराल तेव्हा समोरच्याला अशा त-हेने सांगा की ते त्याच्या किती फायद्याचे असेल.आपण कटू आदेश देऊ शकतो,"जॉन, उद्या ग्राहक येणार आहेत आणि मला स्टॉकरूम स्वच्छ हवी.म्हणून व्यवस्थित केर काढ,स्टॉक नीट फळीवर लावून ठेव आणि काऊंटर स्वच्छ पुसून घे." किंवा आपण याच विचारांना अशा त-हेने व्यक्त करू शकतो,की जॉनला त्याचे फायदे समजून येतील,जे त्याला हे काम करण्यामुळे प्राप्त होतील.


" जॉन,आपल्याकडे एक काम आहे,ते ताबडतोब करायला हवंय. जर ते लगेच केलं तर आपल्याला नंतर कठीण जाणार नाही.मी उद्या काही ग्राहकांना आपला माल दाखवायला आणणार आहे.मी त्यांना स्टॉकरूम दाखवू इच्छितो,पण त्याची अवस्था फार चांगली नाहीये.जर तू ती रूम झाडून घेशील,माल फळीवर रचून,काऊंटर स्वच्छ करशील तर सर्वकाही व्यवस्थित दिसेल आणि कंपनीची प्रतिमा उंचावण्यात तुझे महत्त्वाचे योगदान राहील."


तुम्ही सुचवलेली कामं पूर्ण करून जॉन खूश होईल का? कदाचित फार नाही खुश होणार, पण आताची सांगण्याची पद्धत ऐकून नक्कीच खूश होईल. तेव्हा तुम्ही त्याला फायदे सांगितले नव्हते.आम्ही जर असं धरून चाललो की जॉनला आपल्या स्टॉकरूमच्या प्रतिमेचा अभिमान वाटतो,आणि तो कंपनीची चांगली प्रतिमा बनवण्यात योगदान देण्यास इच्छुक आहे तर त्याची काम करायची भूमिका अधिक सहयोगपूर्ण असेल याची शक्यता जास्त आहे. जॉनला हेसुद्धा सांगायला हवं की,ते काम आता नाही तरी नंतर करायचेच आहे. काम आत्ताच उरकले तर नंतर करावे लागणार नाही.



एक महत्वाची सुचना …!


भारताचे नौकानयन शास्त्र..Navigation of India.. हा दिनांक १४.०२.२३ रोजी लिहिलेल्या लेखामध्ये एका आफ्रिकन दुभाष्याला घेऊन हा,त्या भारतीय जहाजाच्या मालकाला भेटायला गेला.हे वाक्य एका आफ्रिकन दुभाष्याला घेऊन हा,( वास्को डी गामा ) त्या भारतीय जहाजाच्या मालकाला भेटायला गेला.असे वाचावे.



१४/२/२४

भारताचे नौकानयन शास्त्र.. Navigation of India..

एका आफ्रिकन दुभाष्याला घेऊन हा,त्या भारतीय जहाजाच्या मालकाला भेटायला गेला. 'चंदन' नावाचा तो भारतीय व्यापारी अत्यंत साध्या वेषात खाटेवर बसला होता.जेव्हा वास्को-डी-गामाने भारतात येण्याची इच्छा दाखविली,तेव्हा सहजपणे त्या भारतीय व्यापाऱ्याने सांगितले,'मी उद्या भारतात परत चाललोय.तू माझ्या मागोमाग ये...' आणि अशा रीतीने वास्को-डी-गामा भारताच्या किनाऱ्याला लागला..!!


दुर्दैवाने आजही शाळेत शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकांत 'वास्को-डी- गामाने भारताचा 'शोध' लावला असा उल्लेख असतो..!!'


मार्को पोलो (१२५४ - १३२४) हा साहसी दर्यावर्दी समजला जातो. इटलीच्या ह्या व्यापाऱ्याने भारतमार्गे चीनपर्यंत प्रवास केला होता.हा तेराव्या शतकात भारतात आला. मार्को पोलोने त्याच्या प्रवासातील अनुभवांवर एक पुस्तक लिहिलंय - 'मार्व्हल्स ऑफ द वर्ल्ड'. याचा अनुवाद इंग्रजीमधेही उपलब्ध आहे. या पुस्तकात त्याने भारतीय जहाजांचं सुरेख वर्णन केलेलं आहे.त्यानं लिहिलंय की,भारतात विशाल जहाजं तयार होतात.

लाकडांचे दोन थर जोडून त्याला लोखंडी खिळ्यांनी पक्के केले जाते. आणि नंतर त्या सर्व लहान- मोठ्या छिद्रांमधून विशेष पद्धतीचा डिंक टाकला जातो,ज्यामुळे पाण्याचा प्रवेश पूर्णपणे निषिद्ध होतो.


मार्को पोलोने भारतात तीनशे नावाड्यांची जहाजं बघितली होती.त्यानं लिहिलंय,एका एका जहाजात तीन ते चार हजार पोती सामान मावतं आणि त्याच्या वर राहण्याच्या खोल्या असतात. खालच्या लाकडाचा तळ खराब होऊ लागला की त्याच्यावर दुसऱ्या लाकडाचा थर लावला जातो.जहाजांचा वेग चांगला असतो. इराणपासून कोचीनपर्यंतचा प्रवास भारतीय जहाजांमधून आठ दिवसांत होतो.पुढे निकोली कांटी हा दर्यावर्दी पंधराव्या शतकात भारतात आला.याने भारतीय जहाजांच्या भव्यतेबद्दल बरंच लिहिलंय.डॉ. राधा कुमुद मुखर्जी यांनी आपल्या 'इंडियन शिपिंग' या पुस्तकात भारतीय जहाजांचं सप्रमाण सविस्तर वर्णन केलंय.पण हे झालं खूप नंतरचं.म्हणजे भारतावर इस्लामी आक्रमण सुरू झाल्या- नंतरचं.याच काळात युरोपातही साहसी दर्यावर्दीचं पेव फुटलं होतं.युरोपियन खलाशी आणि व्यापारी जग जिंकायला निघालेले होते. अजून अमेरिकेची वसाहत व्हायची होती.हाच कालखंड युरोपातील रेनेसाँचा आहे.त्यामुळे सर्व प्रकारच्या इतिहासलेखनामधे,

विकीपिडियासारख्या माध्यमांमध्ये युरोपियन नौकानयन शास्त्राबद्दलच भरभरून लिहिलं जातं.पण त्याच्याही दीड-दोन हजार वर्षांपूर्वीचे भारतीय नौकानयनाच्या प्रगतीचे पुरावे मिळाले आहेत.


आपल्याकडे उत्तरेत इस्लामी आक्रमण सुरू होण्याच्या काळात,म्हणजे अकराव्या शतकात, माळव्याचा राजा भोज याने ज्ञान-विज्ञानासंबंधी अनेक ग्रंथ लिहिले किंवा लिहून घेतले.त्यातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे 'युक्ती कल्पतरू.' हा ग्रंथ जहाजबांधणीच्या संदर्भातला आहे. जवळच्या आणि लांबच्या प्रवासासाठी लहान - मोठी,

वेगवेगळ्या क्षमतेची जहाजं कशी बनवली जावीत याच सविस्तर वर्णन ह्या ग्रंथात आहे. जहाजबांधणीच्या बाबतीत हा ग्रंथ प्रमाण मानला जातो.वेगवेगळ्या जहाजांसाठी वेगवेगळं लाकूड कसं निवडावं यापासून तर विशिष्ट क्षमतेचं जहाज,त्याची डोलकाठी यांचं निर्माण कसं करावं ह्याचं गणितही ह्या ग्रंथात मिळतं.


पण ह्या ग्रंथाच्या पूर्वीही,हजार - दोन हजार वर्षं तरी,भारतीय जहाजं जगभर संचार करीत होतीच.म्हणजे हा 'युक्ती कल्पतरू' ग्रंथ,नवीन काही शोधून काढत नाही,तर आधीच्या ज्ञानाला 'लेखबद्ध' करतोय.कारण भारतीयांजवळ नौकाशास्त्राचं ज्ञान फार पुरातन काळापासून होतं.चंद्रगुप्त मौर्यच्या काळात भारताची जहाजं जगप्रसिद्ध होती.ह्या जहाजांद्वारे जगभर भारताचा व्यापार चालायचा. यासंबंधीची ताम्रपत्रं आणि शिलालेख मिळालेले आहेत. बौद्ध प्रभावाच्या काळात,बंगालमधे सिंहबाहू राजाच्या शासनकाळात सातशे यात्रेकरू श्रीलंकेला एकाच जहाजाने गेल्याचा उल्लेख आढळतो.कुशाण काळ आणि हर्षवर्धनच्या काळातही समृद्ध सागरी व्यापाराचे उल्लेख सापडतात.इस्लामी आक्रमकांना भारतीय नाविक तंत्रज्ञान काही विशेष मेहनत न घेता मिळून गेले.त्यामुळे अकबराच्या काळात नौकानयन विभाग इतका समृद्ध झाला होता की जहाजांच्या डागडुजीसाठी आणि करवसुलीसाठी त्याला वेगळा विभाग बनवावा लागला.


पण अकराव्या शतकापर्यंत चरम सीमेवर असणारं भारतीय नौकानयन शास्त्र पुढे उतरंडीला लागलं.

मोगलांनी आयत्या मिळालेल्या जहाजांना नीट ठेवलं इतकंच,पण त्यात वाढ केली नाही.दोनशे वर्षांचं विजयनगर साम्राज्य तेवढं अपवाद.त्यांनी जहाजबांधणीचे कारखाने पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही तटांवर सुरू केले आणि ८० पेक्षा जास्त बंदरांना ऊर्जितावस्थेत आणलं.पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं आरमार उभारलं आणि नंतर आंग्र्यांनी त्याला बळकट केलं.


पण अकराव्या शतकाच्या आधीचे वैभव भारताच्या जहाजबांधणी उद्योगाला पुढे आलेच नाही.त्याच काळात स्पेन आणि पोर्तुगाल यांनी जहाजबांधणीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली अन् भारत मागे पडला.पण तरीही,इंग्रज येईपर्यंत भारतात जहाजं बांधण्याची प्राचीन विद्या जिवंत होती.सतराव्या शतकापर्यंत युरोपियन राष्ट्रांची क्षमता अधिकतम सहाशे टनांचं जहाज बांधण्याची होती.

पण त्याच सुमारास त्यांनी भारताचे 'गोधा' (कदाचित 'गोदा' असावे. स्पॅनिश अपभ्रंशाने गोधा झाले असावे) नावाचे जहाज बघितले,जे १,५०० टनांपेक्षाही मोठे होते.भारतात आपल्या वखारी उघडलेल्या युरोपियन कंपन्या-म्हणजे डच, पोर्तुगीज,

इंग्रज,फ्रेंच इत्यादी - भारतीय जहाजं वापरू लागली आणि भारतीय खलाशांना नोकरीवर ठेवू लागली. 


सन १८११ मधे ब्रिटिश अधिकारी कर्नल वॉकर लिहितो की,'ब्रिटिश जहाजांची दर दहा / बारा वर्षांनी मोठी डागडुजी करावी लागते.पण सागवानी लाकडापासून बनलेली भारतीय जहाजं गेल्या पन्नास वर्षांपासून डागडुजीशिवाय उत्तम काम करताहेत.

'भारतीय जहाजांची ही गुणवत्ता बघून 'ईस्ट इंडिया कंपनी' ने 'दरिया दौलत' नावाचे एक भारतीय जहाज विकत घेतले होते,जे ८७ वर्षं,डागडुजी न करता व्यवस्थित काम करत राहिले.ब्रिटिशांनी मराठ्यांकडून भारतावरील राज्य हिसकावून घेण्याच्या काही वर्ष आधीच,म्हणजे १८११ मधे एक फ्रांसीसी यात्री वाल्तजर साल्विन्सने 'ले हिंदू' नावाचे एक पुस्तक लिहिले.त्यात तो लिहितो,'प्राचीन काळात नौकानयनाच्या क्षेत्रात हिंदू सर्वांत अघाडीवर होते आणि आजही (१८११) ते या क्षेत्रात आमच्या युरोपियन देशांना शिकवू शकतात.'


इंग्रजांनीच दिलेल्या आकड्यांप्रमाणे १७३३ ते १८६३ मधे एकट्या मुंबईतल्या कारखान्यात ३०० भारतीय जहाजं तयार झाली,ज्यांतील अधिकांश जहाजं ब्रिटनच्या राणीच्या 'शाही नौदलात' सामिल करण्यात आली.यातील 'एशिया' नावाचे जहाज २,२८९ टनांचे होते आणि त्यावर ८४ तोफा बसविलेल्या होत्या. बंगालमधे चितगाव,हुगळी (कोलकाता),सिलहट आणि ढाकामधे जहाजं बनविण्याचे कारखाने होते.१७८१ ते १८८१ ह्या शंभर वर्षात एकट्या हुगळीच्या कारखान्यात २७२ लहान-मोठी जहाजं तयार झाली.अर्थात भारतीय जहाज-बाधणीच्या पडत्या काळात जर ही परिस्थिती असेल तर अकराव्या शतकापूर्वी भारताच्या जहाजबांधणी उद्योगाची स्थिती किती समृद्धशाली असेल,याचा अंदाज येऊ शकतो. मात्र अशा दर्जेदार गुणवत्तेची जहाजं बघून इंग्लंडमधील इंग्रज,ईस्ट इंडिया कंपनीला,ही जहाजं न घेण्यासाठी दबाव टाकू लागले.सन १८११मध्ये कर्नल वॉकरने आकडे देऊन हे सिद्ध केले की,'भारतीय जहाजांना फारशी डागडुजी लागत नाही.आणि त्यांच्या 'मेंटेनन्स'ला अत्यल्प खर्च येतो.तरीही ते जबरदस्त मजबूत असतात.' (ही सर्व कागदपत्रं ब्रिटिश संग्रहालयात, ईस्ट इंडिया कंपनीच्या अभिलेखागारात [आर्काईव्हल मध्ये सुरक्षित आहेत.) मात्र इंग्लंडच्या जहाज बनविणाऱ्या व्यापाऱ्यांना हे फार झोंबलं. इंग्लंडचे डॉ.टेलर लिहितात की,भारतीय मालाने लादलेलं भारतीय जहाज जेव्हा इंग्लंडच्या किनाऱ्याला लागलं,तेव्हा इंग्रजी व्यापाऱ्यांमध्ये अशी गडबड उडाली की,जणू शत्रूनेच आक्रमण केले आहे.लंडनच्या गोदीतील (बंदरातील) जहाज बांधणाऱ्या कारागिरांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाला लिहिलं की,जर भारतीय बांधणीची जहाजं तुम्ही वापरायला लागाल तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, आमची अन्नान्न दशा होईल..!


ईस्ट इंडिया कंपनीने त्या वेळी हे फार मनावर घेतलं नाही.

कारण भारतीय जहाजं वापरण्यात त्यांचा व्यापारिक फायदा होता.मात्र १८५७ च्या क्रांती-युद्धानंतर भारतातले शासन सरळ इंग्लंडच्या राणीच्या हातात आले.आणि राणीने विशेष अध्यादेश काढून भारतीय जहाजांच्या निर्मितीवर बंदी घातली.१८६३ पासून ही बंदी अमलात आली आणि एका वैभवशाली,समृद्ध आणि तांत्रिक दृष्ट्या पुढारलेल्या भारतीय नौकानयन शास्त्राचा मृत्यू झाला !


 सर विलियम डिग्वीने या संदर्भात लिहिलेय की,'पाश्चिमात्य जगाच्या सामर्थ्यशाली राणीने,प्राच्य सागराच्या वैभवशाली राणीचा खून केला.आणि जगाला 'नेव्हिगेशन' हा शब्द देण्यापासून तर प्रगत नौकानयन शास्त्र शिकवणाऱ्या भारतीय नाविक शास्त्राचा,प्रगत जहाजबांधणी उद्योगाचा अंत झाला..!


१२.०२.२४ या लेखातील शेवटचा भाग..


अष्टगंध प्रकाशनाचं नवं पुस्तक....


पातीवरल्या बाया : सचिन शिंदे


बाई सुपारीचं खांड,दोहो बाजूंनी चेंदते बाई अंतरीचा धागा,मना मनाला सांधते


ठाव लागेना मनाचा,बाई कालिंदीचा तळ उठणाऱ्या वेदनेची,बाई दाबतेय कळ


वेदनेची गाणी गाते,बाई कंठातला सूर ढगफुटी तिच्या जगी,बाई आसवांचा पूर


दोन काठांना जोडते,बाई तरंगती नाव सुखासीन नांदणारं,बाई मायाळू गं गाव


बाई कोवळ्या मनाची,डुलणारी मऊ वेल जणू टणक देहाची,बाई बाभळीची साल


संथ भरलेला सदा,बाई नदीचा गं डोह तप्त ग्रीष्माच्या झळाचा,बाई पोळणारा दाह


बाई राबणारे कर,सदा सृजनाचा मळा कापे सरसर दुःख,बाई धारदार विळा


आमचे परममित्र कवी सचिन शिंदे यांची कलाकृती लवकरच हाती येईल.उत्सुकता वाचण्याची..!!

१२/२/२४

भारताचे प्रगत नौकानयन शास्त्र.. Advanced Navigation of India..

जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या बँकॉकच्या प्रशस्त विमानतळाचे नाव आहे -सुवर्णभूमी विमानतळ.या विमानतळात प्रवेश केल्यावर सर्व प्रवाशांचे लक्ष आकृष्ट करते ती एक भली मोठी कलाकृती आपल्या पुराणात वर्णन केलेल्या समुद्रमंथनाची..! या कलाकृतीभोवती फोटो आणि सेल्फी घेणाऱ्यांची एकाच झुंबड उडालेली असते.याच सुवर्णभूमी विमानतळावर,थोडं पुढं गेलं की एक भला मोठा नकाशा लावलेला आहे. साधारण हजार,

दीड हजार वर्षांपूर्वीचा हा नकाशा आहे.'पेशावर' पासून तर 'पापुआ न्यू गिनी 'पर्यंत पसरलेल्या ह्या नकाशाच्या मध्यभागी ठसठशीत अक्षरात लिहिलंय इंडिया.!आणि याचं नकाशात सयाम (थायलंड) ला ठळक स्वरूपात दाखवलंय.अर्थात हा नकाशा उच्च स्वरात सांगतोय 'अरे,कोणे एके काळी ह्या विशाल पसरलेल्या भारतीय संस्कृतीचा सयाम (थायलंड) हा एक हिस्सा होता आणि आम्हाला त्याचा प्रचंड अभिमान आहे !!'


जवळजवळ साऱ्याच दक्षिण पूर्व आशियामधे ही भावना आढळते.आपल्या राष्ट्रध्वजात हिंदू मंदिराचे चिन्ह अभिमानाने बाळगणारा कंबोडिया तर आहेच.पण गंमत म्हणजे या भागातला एकमात्र इस्लामी देश आहे - ब्रुनेइ दारुस्सलाम. ह्या देशाच्या राजधानीचं नाव आहे - बंदर श्री भगवान.हे नाव 'बंदर श्री 'भगवान' ह्या संस्कृत नावाचा अपभ्रंश आहे.पण इस्लामी राष्ट्राच्या राजधानीच्या नावात 'श्री भगवान' येणं हे त्यांना खटकत तर नाहीच, उलट त्याचा अभिमान वाटतो.जावा,सुमात्रा,मलय,

सिंहपूर,सयाम, यवद्वीप इत्यादी सर्व भाग, जे आज इंडोनेशिया, मलेशिया,सिंगापूर,थायलंड,कंबोडिया,

विएतनाम वगैरे म्हणवले जातात, त्या सर्व देशांवर हिंदू संस्कृतीची जबरदस्त छाप आजही दिसते. 


दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी दक्षिण भारतातले हिंदू राजे ह्या प्रदेशात गेले.त्यांनी फारसे कुठे युद्ध केल्याचे पुरावे सापडत नाहीत.उलट शांततापूर्ण मार्गांनी,पण समृद्ध अशा संस्कृतीच्या जोरावर संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया हा हिंदू विचारांना मानू लागला.


आता इतक्या मोठ्या प्रमाणावर जर हिंदू राजे, त्यांचे सैनिक,सामान्य नागरिक दक्षिण-पूर्व आशियात गेले असतील तर ते कसे गेले असतील..? अर्थातच समुद्री मार्गाने.म्हणजेच त्या काळात भारतामधे नौकानयन शास्त्र अत्यंत प्रगत अवस्थेत असेल.त्या काळातील भारतीय नौकांची आणि नावाड्यांची अनेक चित्रं,शिल्पं कंबोडिया,

जावा,सुमात्रा,बालीमधे मिळतात. पाचशेपेक्षा जास्त लोकांना घेऊन जाणाऱ्या नौका त्या काळात भारतात तयार व्हायच्या. एकूण समुद्रप्रवासाची स्थिती बघता,

त्या काळात भारतीयांजवळ बऱ्यापैकी चांगले दिशाज्ञान आणि समुद्री वातावरणाचा अंदाज असला पाहिजे.अन्यथा त्या खवळलेल्या समुद्रातून, आजच्यासारखा हवामानाचा अंदाज आणि दळणवळणाची साधनं नसतानाही इतका दूरचा पल्ला गाठायचा,त्या देशांशी संबंध ठेवायचे, व्यापार करायचा,भारताचे 'एक्स्टेन्शन' असल्यासारखा संपर्क ठेवायचा... म्हणजेच भारतीयांचं नौकानयन शास्त्र अत्यंत प्रगत असलंच पाहिजे.


१९५५ आणि १९६१ मधे गुजराथच्या 'लोथल'मधे पुरातत्त्व खात्याद्वारे उत्खनन करण्यात आले.लोथल अगदी समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं नाही,तर समुद्राची एक चिंचोळी पट्टी लोथलपर्यंत आलेली आहे.मात्र उत्खननात हे दिसले की सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी लोथल हे अत्यंत वैभवशाली बंदर होते.तेथे अत्यंत प्रगत आणि नीट नेटकी नगररचना वसलेली आढळली.पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोथलमधे जहाजबांधणीचा कारखाना होता, असे अवशेष सापडले.लोथलहून अरब देशांमधे, इजिप्तमधे मोठ्या प्रमाणावर व्यापार चालायचा याचे पुरावे मिळाले.साधारण १९५५ पर्यंत लोथल किंवा पश्चिम भारतातील नौकानयन शास्त्राबद्दल फारसे पुरावे आपल्याजवळ नव्हते. लोथलच्या उत्खननाने या ज्ञानाची कवाडं उघडली गेली.पण यावरून असं जाणवलं की, अगदी समुद्रकिनाऱ्यावर नसणारं लोथल जर इतकं समृद्ध असेल आणि तिथे नौकानयनाच्या बाबतीत इतक्या गोष्टी घडत असतील तर गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या पश्चिम भारताच्या किनाऱ्यावरील बंदरांमधे याहीपेक्षा सरस आणि समृद्ध संरचना असेल.


आज ज्याला आपण नालासोपारा म्हणतो, तिथे हजार / दीड हजार वर्षांपूर्वीपर्यंत 'शुर्पारक' नावाचे वैभवशाली बंदर होते.तिथे भारताच्या जहाजांबरोबर अनेक देशांची जहाजं व्यापारासाठी यायची. तसंच दाभोळ,तसंच सुरत.

पुढे विजयनगर साम्राज्य स्थापन झाल्यावर त्या राज्याने दक्षिणेतील अनेक बंदरं परत वैभवशाली अवस्थेत उभी केली आणि पूर्व व पश्चिम अशा दोन्ही दिशांमध्ये व्यापार सुरू केला.मेक्सिकोच्या उत्तर पश्चिम टोकाला,म्हणजेच 'दक्षिण अमेरिकेच्या' उत्तर टोकाला जिथे समुद्र मिळतो,तिथे मेक्सिकोचा युकाटान प्रांत आहे. या प्रांतात त्यांच्या पुरातन 'माया' संस्कृतीचे अनेक अवशेष आजही मोठ्या प्रमाणावर जपून ठेवलेले आहेत.याच युकाटान प्रांतात जवाकेतू नावाच्या जागी एक अति प्राचीन सूर्यमंदिर अवशेषांच्या रूपात आजही उभे आहे.या सूर्य मंदिरात एक संस्कृतचा शिलालेख सापडला,

ज्यात शक संवत ८८५ मधे 'भारतीय महानाविक' वूसुलीन येऊन गेल्याची नोंद आहे.!


 रॉबर्ट बेरोन वोन हेन गेल्डर्न (१८८५ - १९६८) या लांबलचक नावाचा नामांकित ऑस्ट्रियन एंथ्रोपोलोजिस्ट होऊन गेला.हा विएन्ना विद्यापीठात शिकला.पुढे १९१० मध्ये भारत आणि ब्रह्मदेशाच्या दौऱ्यावर आला. 


भारतीयांच्या प्रगत ज्ञानाविषयी प्रचंड कुतूहल वाटले म्हणून त्याने अभ्यास सुरू केला. 


त्याने दक्षिण-पूर्व देशांबद्दल प्रचंड संशोधन केले.आणि त्याच्या पूर्ण अभ्यासाअंती त्याने ठामपणे असे मांडले की,भारतीय जहाजे,कोलंबसच्या कितीतरी आधी मेक्सिको आणि पेरूमधे जात होती!भारतीय नौकांचा प्रवास विश्वव्यापी होत होता.याचा यापेक्षा दुसरा कुठला स्पष्ट पुरावा हवा आहे..? आणि तरीही आम्ही म्हणत राहणार की अमेरिकेला कोलंबसने शोधलं आणि भारताचा 'शोध' वास्को-डी-गामा ने लावला.!! (भारतीय ज्ञानाचा खजिना - प्रशांत पोळ) मुळात वास्को-डी-गामा हाच भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला.

हरिभाऊ (विष्णू श्रीधर) वाकणकर हे उज्जैनचे प्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ता.भारतातील सर्वांत प्राचीन वसाहतीचा पुरावा म्हणून ज्या 'भीमबेटका' गुहांचा उल्लेख होतो,त्या डॉ.वाकणकरांनीच शोधून काढलेल्या आहेत.


डॉ.वाकणकर त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भात इंग्लंडला गेले होते.तिथे एका संग्रहालयात त्यांना वास्को-डी-गामाची दैनंदिनी ठेवलेली दिसली.ती त्यांनी बघितली आणि त्याचा अनुवाद वाचला.त्यात वास्को-डी-गामाने तो भारतात कसा पोहोचला याचे वर्णन केले आहे.वास्को-डी-गामाचे जहाज जेव्हा आफ्रिकेतील जान्जीबारला आले,तेव्हा त्याने तिथे त्याच्या जहाजाच्या तिप्पट आकाराचे मोठे जहाज बघितले.


उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..