* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

६/४/२४

जीवशास्त्राचा जन्म..Birth of Biology..

३.१ ॲनॅटॉमी


इ.स.१५४३ या वर्षानं वैज्ञानिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि जुन्या ग्रीक संकल्पनांना मूठमाती दिली.याच वर्षी निकोलस कोपर्निकस या पोलिश खगोलशास्त्रज्ञानं पृथ्वी नव्हे तर सूर्य हा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे आणि पृथ्वीप्रमाणेच इतर काही ग्रहही वर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती फिरत असतात असं ठणकावून सांगितलं.

त्याच वर्षी १५४३ मध्ये आधुनिक विज्ञानाचा पाया रचणारं आणखी एक महत्त्वाचं दुसरंही पुस्तक प्रकाशित झालं. त्या पुस्तकाचा लेखक होता,बेल्जियमचा ॲनॅटॉमिस्ट अँड्रेस व्हेसायलियस (१५१४-१५६४) आणि त्या पुस्तकाचं नाव होतं 'दे कॉर्पोरिस ह्युमानी फॅब्रिका' (ऑन द स्ट्रक्चर ऑफ द ह्यूमन बॉडी)!


व्हेसायलियस हा एक जिगरी माणूस होता. माणसाचा मृतदेह बघून कधी कुणाला आनंद होईल का? पण असा आनंद होणारा व्हेसायलियस या नावाचा एक माणूस खरंच होऊन गेला! व्हेसायलियसचं सुरुवातीचं शिक्षण ब्रसेल्समध्येच झालं.आता त्याला वैद्यकशास्त्राचा अभ्यास करायचा होता आणि त्या काळी यासाठीचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे पॅरिसमध्ये येणं हा होता.साहजिकच व्हेसायलियसनं आता १५३१ साली,वयाच्या १८ व्या वर्षी ब्रसेल्समधलं आपलं घर सोडून पॅरिस विद्यापीठाचा रस्ता धरला.तिथे त्याला शिकवायला सिल्व्हियस नावाचा गेलनचा शिष्य होता.सिल्व्हियसचा अर्थातच गेलनच्या तत्त्वांवर प्रचंड विश्वास होता.गेलननं सांगून ठेवलेली प्रत्येक गोष्ट तो ब्रीदवाक्य मानायचा.पण हे सगळं व्हेसायलियसला मात्र पटायचं नाही.


आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो इटलीला गेला.तिथे त्याला मोंडिनोनं आधी केलेल्या कामाबद्दल कळलं आणि पुरातनकाळापासून जे चालत आलंय त्यावरच विश्वास न ठेवता आपणही स्वतंत्रपणे संशोधन करून या सगळ्या गोष्टी पडताळून पाहू शकतो असं त्याच्या लक्षात आलं आणि तिथेच त्यानं हेच आपल्या जीवनाचं ध्येय ठरवून टाकलं.आता त्याला माणसाच्या शरीराचं विच्छेदन स्वतः करून बघायचं होतं. प्रत्येक गोष्ट स्वतः करून बघितल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही हे त्याचं त्यामागचं तत्त्व असे.पण त्याला अशी संधी मिळणं अशक्यच होतं.त्या काळचा धार्मिक विचारांचा पगडा बघता असं करायच्या प्रयत्नात त्यालाच जाळलं किंवा फासाला लटकावलं गेलं असतं! मग अशा परिस्थितीत मानवी शरीराबद्दलची आपली उत्सुकता कशी पुर्ण करणार?अभ्यास करण्यासाठी मानवी प्रेतं कुठून आणणार? त्या काळी जास्तीत जास्त स्मशानात माणसाच्या शरीराच्या कुठून तरी मिळालेल्या अवशेषांमधून उरलेली हार्ड व्हेसायलियसला तपासायला मिळायची, एवढंच ! व्हेसायलियस आणि त्याचा एक मित्र मग सदोदित या हाडांच्या मागावर असायचे! एके दिवशी एकदा त्यांना पॅरिस शहराच्या परिसरात एक प्रेत दिसलं.

गिधाडांनी त्याचे लचके तोडलेले असले तरी त्या प्रेतातली हाडं आणि त्या हाडांमधले स्नायू या गोष्टी मात्र अजून शिल्लक होत्या. ते बघताच व्हेसायलियस आणि त्याच्या मित्राला हर्षवायूच झाला! माणसाच्या शरीराचा सांगाडा मिळायची संधी त्यांच्यासमोर चालून आली होती.पण तेव्हा दुपारचं लख्ख ऊन होतं. साहजिकच त्यांना कुणीतरी बघायची दाट शक्यता होती,त्यामुळे घाईघाईत त्यांनी त्या प्रेताच्या सांगाड्याचा काही भागच कसाबसा काढून घेतला.पण व्हेसायलियसनं रात्री पुन्हा तिथे येऊन त्या प्रेतातला मेंदू काढून घेतला आणि आपल्या घरी घेऊन आला.पण असे अवयव घरी आणलेले कुणी पाहिलं तर काय, म्हणून दिवसाउजेडीही त्याला आपल्या घरी हा अभ्यास करणं शक्य नव्हतं.कारण त्या काळी दिवसा काम करायचं तर दारंखिडक्या सताड उघड्या ठेवून घरात सूर्यप्रकाश येईल अशा बेतानं काम करावं लागायचं.अजून विजेचे कृत्रिम दिवे यायचे होते.या सगळ्या गोष्टींमुळे रात्रीच्या वेळी एका छोट्याशा खोलीत मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात व्हेसायलियसनं त्या प्रेताच्या सांगाड्यामधली सगळी हाडं माणसाच्या शरीरात असतात तशी रचून ठेवली.

तो असं करू शकायचं कारण म्हणजे माणसाच्या शरीराचा आणि त्यातल्या हाडांचा व्हेसायलियसनं इतका दणदणीत अभ्यास केला होता,की आता कुठलंही हाड तो डोळे बंद करून नुसत्या स्पर्शावरून ओळखू शकत होता ! शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या २२ व्या वर्षी व्हेसायलियसला इटलीमधल्या पडुआ भागातल्या राजानं तिथल्या विद्यापीठात प्राध्यापकाचं काम करण्यासाठी आमंत्रित केलं. व्हेसायलियसनं पाच वर्षं ते काम केलं.तिथेही डोळ्यांना दिसतील आणि सिद्ध होऊ शकतील अशाच गोष्टी तो कटाक्षानं शिकवे.त्याच्या आधीचे शिक्षक पाठ्यपुस्तकात दिलेल्या माहितीच्या आधारे आंधळेपणानं विद्यार्थ्यांना शिकवायचे.त्या पद्धतीवर अर्थातच गेलनच्या विचारांचा पगडा होता.पण व्हेसायलियसचं मात्र तसं नव्हतं.तो अतिशय विचारपूर्वक शिकवे. त्याच्या आधीचे प्राध्यापक विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी माहिती सांगायचे आणि मग दुसऱ्याच माणसाला प्राण्यांचं शरीरविच्छेदन करायला बोलवायचे.हे शरीर

विच्छेदन सुरू असताना फक्त त्याचं वर्णन हे शिक्षक करायचे.पण व्हेसायलियस मात्र स्वतःच प्राण्यांच्या शरीराचं विच्छेदन करायचा आणि त्याचे विद्यार्थी त्या टेबलच्या भोवती गोळा होऊन शिकायचे.त्या काळी अर्थातच मानवी शरीराचं विच्छेदन करायला परवानगी नसायची,त्यामुळे प्राण्याच्या शरीराचं विच्छेदन करून शिकायचं आणि त्यावरून माणसाच्या शरीरात काय असेल याचा अंदाज बांधत बांधत उपचार करायचे,असा द्राविडी प्राणायाम चाले! या आधीचे सगळेच डॉक्टर्स आणि ॲनॅटॉमिस्ट हेच करत आले होते. पण कोणत्याही प्राण्याची रचना आणि माणसाच्या शरीराची रचना यात काही फरक असेल की नाही? शिवाय,आधी होऊन गेलेल्या हिप्पोक्रटस,गेलन या लोकांनीही बरेचसे अनुमान प्राण्यांच्या शरीरावरूनच काढले होते.त्यामुळेच व्हेसायलियसला हे फरक किंवा आधीच्या शिकवण्यातल्या चुका प्रकर्षानं लक्षात येत होत्या आणि आपण पिढ्यान् पिढ्या चुकीचं शिकत आलो आणि आपल्याला आताही चुकीचंच शिकवावं लागत आहे.


ही खंत त्याच्या मनात फार बोचत होती.एका न्यायाधीशाला व्हेसायलियसचं काम आवडलं आणि त्यानं देहदंडाच्या शिक्षेनंतर मृत झालेल्या आरोपींची प्रेतं व्हेसायलियसला त्याच्या शरीरविच्छेदनाच्या कामासाठी मिळावीत अशी १५३९ साली व्यवस्था केली.त्यामुळे व्हेसायलियसला आता अभ्यास करायला मुबलक मृतदेह मिळणार होते! त्यानं तसा जबरदस्त अभ्यास केलाही.

या सगळ्यातून व्हेसायलियसनं स्वतःच्या निरीक्षणांतून चारच वर्षांत १५४३ साली 'दे ह्युमॅनी कॉर्पोरिस फॅब्रिका' हे नितांत सुंदर पुस्तक लिहिलं. या पुस्तकाची दोन वैशिष्ट्यं होती.एक तर त्या काळी छपाईची कला व्यवस्थित नावारूपाला आली होती.त्यामुळे या पुस्तकाच्या हजारो प्रती युरोपभर पाठवता येणं शक्य झालं होतं.आणि दुसरं म्हणजे या पुस्तकात स्वच्छ,नेटक्या आणि अप्रतिम आकृत्या काढलेल्या होत्या.त्या आकृत्या त्यानं त्या वेळचा इटलीमधला प्रसिद्ध चित्रकार टायटन याचा शिष्य जँ स्टिव्हॅझून फॉन कॅल्कॅर या गुणी चित्रकारानं काढलेल्या होत्या. या चित्रांमध्ये मानवी शरीर नैसर्गिक अवस्थांमध्ये दाखवलं होतं.त्यातले अवयव आणि स्नायूंची रचना खूपच अचूक आणि चांगल्या प्रकारे दाखवली होती.पण हा ग्रंथ प्रकाशित करू नये असं व्हेसायलियसच्या मित्रांचं मत होतं.कारण व्हेसायलियसनं माणसाच्या शरीराविषयी इतक्या खोलात जाऊन अभ्यास केला आहे आणि त्यापुढे जाऊन त्याविषयी ग्रंथ लिहिला आहे.असं तत्कालीन सत्ताधाऱ्यांना समजलं असतं तर व्हेसायलियसचं काही खरं नव्हतं! पण तरीही व्हेसायलियसनं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता त्याचा ग्रंथ बाहेर काढलाच.हा ग्रंथ तब्बल ७ खंडांचा मिळून बनलेला होता.काही दिवसांनी त्यानं या ग्रंथाची क्विक रेफरन्ससारखी एक छोटी आवृत्तीही काढली.त्यानं नंतर इतरही काही पुस्तकं लिहिली.१५३८ साली व्हेसायलियसनं व्हेनिसेक्शन किंवा रक्त काढणं याविषयी एक पत्र लिहून ते छापलं.तोपर्यंत कोणत्याही माणसाला आजार झालेला असताना त्याच्या शरीरातून भरपूर रक्त वाहू दिलं की तो माणूस बरा होतो असा ब्लडलेटिंग या नावानं ओळखला जाणारा समज अगदी प्रचलित होता. पण हे करत असताना त्या माणसाच्या शरीराच्या कुठल्या भागातून रक्त वाहू द्यावं याविषयी मात्र संभ्रमच होता.

कुठून रक्त वाहू द्यायचं हे त्या माणसाला कुठला आजार झाला आहे त्यावरून ठरवावं,आणि त्या आजाराच्या जवळच्या भागातून हे रक्त काढलं जावं असं गेलनचं मत होतं.पण इतर काही जणांना मात्र त्या माणसाच्या शरीरातून कुठूनही अगदी थोडं रक्त वाहू दिलं तरी चालण्यासारखं होतं.अमुक अमुक ठिकाणातूनच ते गेलं पाहिजे असं काही बंधन नसतं असं त्यांना वाटे.

व्हेसायलियसनं या बाबतीत मात्र गेलनची बाजू उचलून धरली. त्यासाठी त्यानं माणसाच्या शरीरातल्या अवयवांच्या आकृत्या काढून या सगळ्या प्रकाराचं नीट विश्लेषणही केलं.


त्यानंतर गेलनचा सगळा अभ्यास मृत माणसांच्या शरीरावर प्रयोग न करता मृत प्राण्यांच्या शरीरावर प्रयोग करून बेतलेला आहे हे व्हेसायलियसच्या लक्षात आलं.त्यामुळे मग त्यानं गेलननं लिहिलेल्या प्रबंधांवर पुन्हा नव्यानं काम केलं आणि त्यात असलेल्या अनेक चुका प्रसिद्ध केल्या. पण काही गेलन समर्थकांनी व्हेसायलियसवर त्याचंच म्हणणं चुकीचं असल्याचा आरोप केला. पण अशा गोष्टींनी डगमगून जाणाऱ्यांपैकी व्हेसायलियस अजिबात नव्हता.त्यानं आपलं काम तसंच पुढे सुरू ठेवलं.आता तर त्यानं आपल्या संशोधनाच्या आधारे मोंडिनो दे लुझी आणि ॲरिस्टॉटल यांच्या काही गैरसमजांवरही तोफा डागल्या.

गेलन आणि या दोघांनी माणसाच्या अनेक विधानं केली होती.ती साफ चूक असल्याचं व्हेसायलियसनं दाखवून दिलं. उदाहरणार्थ,माणसाच्या हृदयाला चार झडपा असतात आणि माणसाच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांचा उगम यकृतात होत नसून, हृदयात होतो हेही व्हेसायलियसनं प्रथमच सिद्ध केलं.१५४३ साली त्यानं जेकब करेर वॉन गेबवायलर नावाच्या ब्रसेल (स्वीत्झर्लंड) मधल्या कुप्रसिद्ध माणसाच्या प्रेताचं जाहीररीत्या शरीरविच्छेदन केलं.त्यातून त्यानं आपल्या वेगवेगळ्या संकल्पनांचं जाहीर प्रात्यक्षिकच दिलं.त्याचा सांगाडा अजूनही 'अनॅटॉमिकल म्युझियम ऑफ ब्रसेल'मध्ये जपून ठेवला आहे. हा जगातला सर्वात जुना डिसेक्शन केल्यानंतर जपून ठेवलेला सांगाडा आहे..! काही काळानंतर पाचव्या चार्ल्स राजानं त्याच्या दरबारात डॉक्टर म्हणून काम बघण्यासाठी व्हेसायलियसला आमंत्रण दिलं.व्हेसायलियसनं हे आमंत्रण स्वीकारलं,या काळात त्याचा सगळा वेळ सैनिकांबरोबर प्रवास करणं,त्यातल्या जखमी सैनिकांवर औषधोपचार करणं,प्रेतांचं शरीरविच्छेदन करणं आणि राजाच्या मित्रपरिवारापैकी कुणी विचारलेल्या वैद्यकीय गोष्टींशी संबंधित असलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं यात जाई.याच काळात व्हेसायलियसनं औषधी वनस्पती आणि त्यांचा वैद्यकशास्त्रात होणारा वापर यावरही एक प्रबंध लिहिला.त्यावरही धार्मिक कारणांवरून टीकेची झोड उठली. राजानं त्याला कडक शिक्षा द्यावी अशी लोकांकडून मागणी व्हायला लागली.१५५१ साली राजानं खरंच या आरोपांमध्ये तथ्य आहे का आणि त्याचा धार्मिक प्रथांवर काही अनिष्ट परिणाम घडतो आहे का,हे तपासण्यासाठी एक समिती नेमली.त्या समितीला व्हेसायलियस निर्दोष असल्याचं आढळलं.पण तरीही व्हेसायलियसवर होत असणाऱ्या टीकेचं प्रमाण काही कमी झालं नाही.त्यातल्या काही टीकेची पातळी तर अगदी हास्यास्पदच होती.'सजीव' अच्युत गोडबोले अमृता देशपांडे व मधुश्री पब्लिकेशन उदाहरणार्थ,एकानं लिहिलं होतं,की गेलनची सगळी मतं बरोबरच होती.


पण गेलनच्या काळापासून आजच्या युगापर्यंत माणसाच्या शरीरातच बदल झालेले आहेत आणि जर असे बदल झालेले असतील तर त्याला बिचारा गेलन तरी काय करणार? त्यामुळे त्याची मतं त्या वेळच्या माणसांच्या दृष्टीनं बरोबरच होती. व्हेसायलियसचंच यात चुकलं आहे! चार्ल्स राजानं पदत्याग केल्यावर त्याचा मुलगा फिलिप्स (दुसरा) याच्या कृपाछत्राखाली व्हेसायलियसचं काम अगदी छान सुरू होतं. आता त्याच्या 'दे ह्युमॅनी कॉर्पोरिस फॅब्रिका' या ग्रंथाची दुसरी आवृत्तीही बाजारात आली होती.तसंच त्याला सरकारतर्फे उर्वरित आयुष्यासाठी निवृत्तिवेतन मिळणार होतं.१५६४ साली व्हेसायलियस एका धार्मिक स्थळाच्या यात्रेला गेला.त्यावेळी जेरुसलेमला पोहोचल्यावर त्याला एक निरोप मिळाला.त्यात म्हटलं होतं, की त्याचा मित्र आणि शिष्य फैलोपियस याच्या मृत्यूमुळे पडुआ विद्यापीठात वैद्यकशास्त्र शिकवायला आता कोणीच उरले नव्हतं.ही जागा व्हेसायलियसनं घ्यावी अशी विनंती त्याला करण्यात आलेलीहोती.व्हेसायलियसनं ती विनंती स्वीकारली खरी.पण तिथे जात असताना समुद्रातून येणाऱ्या वादळी वाऱ्यानं त्याची तब्येत पार खच्ची करून टाकली .हे इतक्या वेगाने घडलं की त्यातच त्याचा मृत्यू झाला. ..अपुर्ण 

४/४/२४

पाहूणचार करा मनापासून / Be kind and considerate..

उमेशने फोन ठेवला तशी त्याची बायको उल्का लगबगीने त्याच्याजवळ आली.


"कुणाचा फोन होता?तुम्ही कुणाला या या म्हणत होतात?"तिने काळजीयुक्त उत्सुकतेने विचारलं


"अगं काही नाही.दादाचा फोन होता.पुढच्या आठवड्यात येतोय आपल्याकडे"

"एकटेच ना?"


"नाही.सगळ्या कुटुंबासह येतोय.चार दिवस लागोपाठ तहसील आँफिसला सुटी आहे म्हणेे.स्वतःची एक दिवस सुटी घेऊन पाच दिवस आपल्याकडे रहाणार आहे."


" आणि तुम्ही त्यांना हो म्हंटलंत?"


"हो.का?तीन वर्षांनी येतोय तो आपल्याकडे.मग नाही कसं म्हणायचं?"


उल्काने कपाळावर हात मारुन घेतला.


"अहो तुम्हांला समजत कसं नाही?"तिच्या बोलण्यात आता संताप आणि उद्विग्नता दिसत होती "अहो मागच्याच महिन्यात आपण माझ्या मावसबहिणीच्या लग्नाकरीता आठवडाभर सुटी घेतली होती.आणि पुढच्या महिन्यात माझा चुलतभाऊ अमेरिकेहून येतोय.

त्याच्यासाठी आठवडाभर सुटी लागणार आहे.आता मला सांगा या महिन्यात आपल्या दोघांनाही कशी सुटी मिळेल?" उमेशचा चेहरा उतरला.ही गोष्ट त्याच्या लक्षातच नव्हती आली."अगं पण उल्का आपण त्यांच्याकडे हक्काने जायचं,सातआठ दिवस मनसोक्त रहायचं,मजा करायची आणि आता ते यायचं म्हणताहेत तर कोणत्या तोंडाने नाही म्हणणार?शेवटी विलासदादा माझा मोठा भाऊ आहे.आपण जातो तेव्हा तो सुटी घेतोच ना?"


"अहो ती काय खेड्यातली माणसं!त्यांना कसली आली आहेत कामं?रिकामटेकडी नुसती!आणि विलासदादांचं मला काही सांगू नका.चांगली गव्हर्नमेंटची नोकरी आहे त्यांची! भरपूर सुट्या मिळतात त्यांना.

आपल्यासारखा थोडीच आहे प्रायव्हेट जाँब!एक सुटी घ्यायची मारामार.तिथे पाच दिवस सुट्या मिळणार तरी कशा?" तिचा हा मुद्दा मात्र बरोबर होता.उमेश हो तर म्हणून बसला होता पण त्यालाही सुटीसाठी बाँसच्या विनवण्या कराव्या लागणार होत्या.त्यातून विलासदादा येणार त्याच दिवसात काही फाँरेन डेलीगेट्स येणार होते.म्हणजे सुटी मिळण्याची शक्यता जवळजवळ नव्हतीच.उल्का तणतणत किचनमध्ये निघून गेली.तिथेही तिची बडबड सुरुच होती.उमेशला आठवलं गेली कित्येक वर्ष तो कुटूंबासह दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यात त्याच्या गावी चोपड्याला जायचा.चोपडा हे जळगांव जिल्ह्यातलं तालुक्याचं गांंव.तसं बऱ्यापैकी शहर पण पुण्याची सर त्याला कशी येणार?पण तरीही सगळ्यांना तिथे जायला आवडायचं.याचं कारण म्हणजे विलासदादा आणि सरीतावहिनींचं आदरातिथ्य.ते  त्यांना कधीही काही कमी पडू देत नसत.सरीतावहिनी ग्रुहिणीच होती पण नायब तहसीलदार असलेला विलासदादा खास त्यांच्यासाठी सुटी घ्यायचा.ते रात्री बेरात्री केव्हाही येवोत विलासदादा आपली कार घेऊन ६० किमी.अंतरावरच्या जळगांवला त्यांना घ्यायला यायचा.तसंच परततांना सोडायला यायचा.घरी आल्यापासून खाण्यापिण्याची चंगळ असायची.हाताला विलक्षण चव असलेली सरीता

वहिनी रोज खान्देशी पदार्थांबरोबरच भारतातले वेगवेगळे पदार्थ करुन त्यांना खाऊ घालायची.एंजाँयमेंटचे रोज वेगवेगळे प्लँन्स बनायचे.शेतात फिरणं,कधी जळगांव, धुळ्याला चक्कर मारणं तर कधी जवळपासच्या टुरीस्ट प्लेसेसना भेट देणं अशा गोष्टींची चंगळ असायची.त्या आठवड्यात दादा,वहिनी त्यांचा इतका भरभरुन पाहुणचार करायचे की शेवटच्या दिवशी निघतांना सगळ्यांचे पाय जड व्हायचे.उमेशची मुलं तर रडायचीच.

विलासदादाकडे आलं आणि निघतांना कपडेलत्ते आणि महागड्या गिफ्ट्स मिळाल्या नाहीत.असं कधीही व्हायचं नाही.अर्थातच विलासदादाकडचे ते चारपाच दिवस प्रचंड आनंदाचे आणि सुखाचे असायचे.


उमेशला ते सगळं आठवलं आणि तो मनातून स्वतःवरच नाराज झाला.विलासदादा आणि सरीतावहिनी जेवढं चोपड्याला आपण गेल्यावर आपल्यासाठी करतात त्याच्या निम्मं तरी आपल्याला जमेल का या विचाराने तो धास्तावला.खरं तर तो पुण्याला आल्यापासून विलासदादा फारच कमी वेळा त्याच्या घरी आला होता.आला तरी चारपाच तासांच्यावर त्याच्याकडे थांबला नव्हता.

कुटूंबासह चारपाच  दिवसासाठी येण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती.त्यामुळे त्याचा पाहूणचार चांगलाच व्हायला पाहिजे होता.पण उल्का अशी तोंड फुगवून बसली तर काही खरं नव्हतं.


दोन दिवसांनी त्याने उल्काला विचारलं

"मग काय ठरवलंस तू?"

"कशाबद्दल विचारताय तुम्ही?"उल्काने कपाळावर आठ्या पाडत विचारलं.

" तेच गं.दादा आल्यावर सुटी घ्यायचं?"

"तुम्हीच घ्या सुटी.तुमचे भाऊ आणि वहिनी आहेत ते" "का?तुझे ते कोणीच नाहीत का?"

त्याने संतापाने विघारलं "बरं ठिक आहे मी सुटी घेईन.पण सकाळच्या स्वयंपाकाला तर तुच पाहिजेस ना?नाही म्हणजे मला येतो स्वयंपाक पण वहिनींसमोर मी स्वयंपाक करणं बरं दिसेल का?शिवाय त्याच पिरीएडमध्ये जर्मनीचं शिष्टमंडळ आपल्या कंपनीला भेट देतंय.माझ्या जमदग्नी बाँसला विचारणंही मुश्कील आहे"

"मी पण तर त्याच कंपनीच्या मेन आँफिसला काम करते ना?मग मला कशी मिळेल सुटी? आणि हे बघा या गोष्टीवरुन आता वाद नकोत.तुमच्या भावापेक्षा माझा दहा वर्षांनी अमेरिकेहून येणारा भाऊ जास्त महत्वाचा आहे."


" मग काय मी माझ्या भावाला हाकलून देऊ?" उमेशचा पारा आता चांगलाच चढला होता."काही हाकलायची गरज नाही.दिवसभर असेही ते पुणं पहायला बाहेर असतील.संध्याकाळी आपण असूच की त्यांचा पाहुणचार करायला!शिवाय आपली मुलं असतीलच त्यांच्यासोबत"हा मुद्दा उमेशला पटला.पण त्याचं समाधान  काही झालं नाही.सहकुटूंब तीन वर्षांनी त्याच्याकडे येणाऱ्या भावाला असं एकटं घरी सोडून जाणं त्याच्या पचनी पडत नव्हतं.पण त्याचाही नाईलाज होता.शहरातले प्राँब्लेम्स् दादावहिनीला काय माहीत असणार!शिवाय दादा वहिनी समजून घेतील असंही त्याला वाटलं.सोमवारी संध्याकाळी विलासदादाने त्याला महाराष्ट्र एक्स्प्रेसने बसल्याचं आणि सकाळी साडेचारला पुण्याला पोहचणार असल्याचं कळवलं." तू ओला किंवा टँक्सी करुन घरी ये" असं उमेश त्याला म्हंटला खरा पण साठ किमी.अंतरावरुन त्याला घ्यायला येणारा दादा त्याला आठवला." आपल्याकडे फोर व्हिलर असती तर गेलो असतो घ्यायला."असं त्याने स्वतःचं समाधान करुन घेतलं.

अर्थात फोर व्हिलर असती तरी भल्या पहाटे झोपेतून उठून तो जाणं शक्यच नव्हतं हे त्यालाही कळत होतं.


दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजताच घराची बेल वाजली.उमेश अनिच्छेनेच उठला तर उल्काच्या मनात विचार आला "या लोकांना पुण्याला यायला हीच गाडी मिळाली होती का?असं दुसऱ्यांच्या झोपा मोडणं यांना शोभतं का?शेवटी खेड्यातलेच ना!यांना मँनर्स कुठून येणार?" उमेशने दार उघडून त्यांना आत घेतलं.

" दादा झोप झाली नसेल तर झोपा थोडं" विलासदादाकडे पहात उमेश म्हणाला.भाऊजी अहो पाच वाजलेत.आमची रोजची उठायची हीच वेळ आहे.त्यामुळे आता झोप येणं शक्यच नाही.आणि गाडीत झाली चांगली झोप आमची "सरीतावहिनी म्हणाली.तिचा आवाज ऐकून बेडरुममध्ये झोपलेली उल्का पाहुण्यांना मनातल्या मनात शिव्या देत उठली.हाँलमध्ये येऊन तिने सगळ्यांचं खोटंखोटं का होईना स्वागत केलं.सकाळी आठ वाजता उमेश आणि उल्का दोघंही आँफिसला जायची तयारी करु लागले.ते पाहून विलासदादा आश्चर्याने म्हणाला " हे काय ?आँफिसला निघालात की काय?का सुटी नाही घेतली?" साँरी दादा.सुटीचा अर्ज दिला होता पण ती मंजूर नाही झाली.कंपनीत फाँरेनचे डेलीगेट्स व्हिजीटला येताहेत.त्यामुळे सुटी मिळणं कठीणच होतं.प्लीज जरा समजून घे ना!अरे पण मग उल्काला तर सुटी घ्यायला सांगायचं.नाही ना दादा मलाही सुटी नाही मिळाली" उल्का बाहेर येत म्हणाली. विलासदादाने सरीता

वहिनीकडे पाहिलं.तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट जाणवत होती.


" अगं मग आम्हांला तसं सांगायचं ना !नसतो आलो आम्ही.तुम्ही दोघंही नसतांना आम्ही घरात थांबणं बरं तरी दिसतं का?" सरितावहिनी नाराजीने म्हणाली.


असं कसं म्हणता वहिनी?तुम्ही इतक्या वर्षांनी येणार आणि आम्ही नाही म्हणायचं?अहो असंही तुम्ही दिवसा कुठेतरी बाहेरच साईटसाईंगला जाणार.संध्याकाळी आम्ही आहोतच ना!आज मला वाटतं तुम्ही सिंहगडावर जाऊन यावं.तिथंलं पिठलंभाकरी खाण्यात खुप मजा येते.संध्याकाळी तुम्ही येण्याच्या आत आम्ही येऊ.मग करता येईल पाहुणचार" उमेश मखलाशी करत म्हणाला.

दादा आणि वहिनीने एकमेकांकडे पाहिलं.पण दोघंही काही बोलले नाहीत.


" तसं आम्ही आज परत एकदा साहेबांना भेटून  सुटीचं विचारतोच आहे"उल्का पर्स गळ्यात टांगत म्हणाली "चला करा एंजाँय.भेटू संध्याकाळी बरं दादा भेटतो संध्याकाळी"

उमेशनेही हात हलवत दादाचा निरोप घेतला.ती दोघं गेल्यावर सरीता विलासकडे पहात म्हणाली."बघितलंत कसे आहेत तुमचे भाऊ? आपल्यालाकडे येतात तेव्हा आपण त्यांच्याकरीता काय नाही करत?साधी आपली दुपारच्या जेवणाचीसुध्दा व्यवस्था केली नाही त्यांनी.सिंहगडावर जेवा म्हणे.आपल्याला कसचं आलंय त्या पिठलं भाकरीचं कौतुक?आणि किती वेळा जाणार त्या सिंहगडावर?त्यांना असं वाटतं जसं आपण पुणं पाहिलेलंच नाहिये."


तेवढ्यात उमेशची मुलं बाहेर आली म्हणून सरीता चुप झाली.विलासलाही त्यांचं हे वागणं पटलं नव्हतं.कुठून इथे आलो असं त्याला होऊन गेलं.


संध्याकाळी उमेश आणि उल्का घरी परतले तेव्हा विलास आणि सरीता घरीच होते."अरे!गेला नाहीत सिंहगडावर?" उमेशने विलासच्या मुलांना विचारलं.काका आम्ही दोनदा बघितलाय सिंहगड.बोअर होतं आम्हांला परत परत तेच बघायला. आम्ही केळकर म्युझियमला जाऊन आलो."

" बाबा आज खुप मजा आली" उमेशचा मुलगा मध्येच म्हणाला "काकूंनी आज खुप छान स्वयंपाक केला होता.

इतके जेवलो आम्ही की बस!" काकू छानच करतात स्वयंपाक"उल्का सरीताकडे पहात म्हणाली.मग थोडा वेळ थांबून म्हणाली "वहिनी तुमच्या हातची ती खान्देशी शेवभाजी मला खुप आवडते.प्लीज कराल आज?" हो हो शेवभाजी!मलाही खुप आवडते.कराल वहिनी?"उमेशने विचारलं "ठिक आहे करते" सरीता म्हणाली खरं पण उल्का चोपड्याला येते तेव्हा एकाही कामाला हात लावत नाही हे तिला आठवलं.इथे मात्र ती हक्काने तिच्याकडून कामं करुन घेत होती.


" बरं मला सांग तुला सुटी मिळाली की नाही?" विलासने सरीताच्या चेहऱ्यावरची नाराजी पहात उमेशला विचारलं.

नाही ना दादा.माझा इमिजिएट बाँस तर नाहीच म्हणतोय आणि मोठे साहेब आज आँफिसला नव्हते.उद्या परत विचारतो. उल्काला तरी मिळाली का सुटी?नसेल मिळत तर सरळ विदाऊट पे करायला सांग.असं किती दिवस आम्ही एकटंच घरात बसायचं?"


" हो रे दादा मला कळतंय ते!पण काय करणार आमच्या कंपनीत विदाऊट पे केली तर नोटीस देऊन सरळ काढून टाकतात.शिवाय बोनस वगैरेवरही परीणाम होतो.

भाऊजी,आपली इमेजही खराब होते.प्रमोशनवरही परीणाम होतो" उल्का म्हणाली.विलासदादा काही बोलला नाही.मात्र यांना सुटीचं जमत नव्हतं तर आपल्याला सरळ नकार दिला असता.असं आपल्याला घरात बसवून ठेवण्यात काय फायदा?" हा नैसर्गिक विचार त्याच्याही मनात डोकावून गेला.


दुसऱ्या दिवशीही दिर-जावेच्या जेवणाची कुठलीही व्यवस्था न करता उल्का आणि उमेश निघून गेले.मात्र जातांना "वहिनी तुम्हांला स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर "झोमँटो" वरुन जेवण पाठवून देवू का?" एवढं तिने विचारलं.हाँटेलचं काहीही न आवडणारी सरीता हो थोडीच म्हणणार होती?


दुपारी पाच वाजता शिपाई निरोप घेऊन आला.उमेशला मोठ्या साहेबांनी बोलावलं होतं.उमेशची छाती धडधडू लागली.जमदग्नी बाँस काय बोलेल याचा नेम नव्हता.

" सर मला तुम्ही बोलावलंत?"उमेशने त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करतांना घाबरत घाबरत विचारल." मिस्टर थोरात तुम्ही सुटीचा अँपलिकेशन दिला होता?मी शिर्केंनाही विचारलं.ते तर म्हणाले की तुम्ही अर्ज तर सोडाच तोंडीसुध्दा विचारलेलं नाही."नाही सर.मी सुटी मागितली नव्हती.उमेश गोंधळून उत्तरला मग तुम्ही तुमच्या भावाला सुटी मिळत नाही असं का सांगितलं?"


उमेशच्या अंगावर तर जणू वीजच कोसळली.अवाक् होऊन तो साहेबाकडे पहातच राहिला.ही गोष्ट साहेबांपर्यंत कशी पोहचली हे त्याच्या लक्षात येईना." बोला मिस्टर थोरात.सुटी न मागता तुम्ही सुटी मिळत नाही असं तुमच्या भावाला का सांगितलं?" साहेबांनी दरडावून विचारुन विचारलं.उमेशच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या."स..र..स..र म..ला वाटलं ते जर्मनीचे लोक आले होते तर मला कुणी सुटी देणार नाही.असा परस्पर अंदाज तुम्ही कसा काय लावलात?अगोदर अर्ज दिला असता.तो रिजेक्ट झाला असता तर तुम्ही तसं म्हणू शकला असता.याचा अर्थ असा की तुम्हांला सुटी घ्यायचीच नव्हती.घरी आलेलं भावाचं कुटुंब कसं लवकर निघून जाईल याचीच तुम्ही वाट पहात होतात.हो ना?"


" नाही सर.सर तसं नाही.मी ...मी..."

" काहो तुम्ही पुण्यात रहाता म्हणजे तुम्ही स्वतःला खुप माँडर्न,स्मार्ट,हुशार आणि चोपड्यात रहाणारा तुमचा भाऊ,वहिनींना गावंढळ,रिकामटेकडे,मागासलेले समजता का?"


"नाही सर तसं.."


"तुम्ही चोपड्याला गेलात की त्यांनी तुम्हांला घ्यायला यावं.सातआठ दिवस तुमच्या दिमतीला रहावं.तुम्ही म्हणाल ते खाऊ पिऊ घालावं,तुमची सरबराई करावी,तुम्हांला कपडेलत्ते करावे.आणि तुमच्याकडे ते येतात तेव्हा तुम्ही साधी सुटी घेऊन घरी राहू नये?मान्य आहे की तुमचं लाईफ फास्ट आहे आणि त्यांचं लाईफ शांत आहे.याचा अर्थ असा नाही की ते टाकावू आहेत,रिकामटेकडे आहेत.उलट त्याचं आयुष्य सुखासमाधानाचं आहे.आपल्यापेक्षा त्यांची घरं मोठी आहेत,सगळ्या सुखसुविधा आहेत.या मोठ्या घरांसारखीच त्यांची मनंही मोठी आहेत.त्या फ्लँटनामक खुराड्यात राहून आपली मनंही खुराड्यासारखीच छोटी,संकुचित झालीयेत.अहो तुमच्या भावाला तुमच्यापेक्षा दुप्पट पगार आहे.

मिळणारा मानही तुमच्यापेक्षा जास्त आहे.मनात आणलं असतं तर दोन नंबरच्या मार्गाने त्यांनी करोडोची कमाई केली असती आणि तुमच्या

सारख्याला घरगडी म्हणून ठेवलं असतं.पण ते इमानदार आहेत.त्यांनी पैसा नाही नाव कमावलंय.

साहेब संतापून बोलत होते.


पण सर तुम्हांला हे कसं कळलं आणि तुम्ही विलासदादाला कसं ओळखता?"साहेब हसले.

"मिस्टर थोरात तुमचे भाऊ माझे मित्र आहेत."

उमेशला परत एक मोठा धक्का बसला.

" आता ते माझे मित्र कसे तेही सांगतो.मीही चोपडा तालुक्यातलाच.पण गेली कित्येक वर्ष पुण्याला स्थायिक झालोय.तीन वर्षापूर्वी आमच्या शेतीच्या कामासाठी मी तहसील कार्यालयात गेलो होतो.तीन लाख कबुल करुनही आमचं काम होत नव्हतं.कुणीतरी तुमच्या भावाचं इमानदार अधिकारी म्हणून नाव सुचवलं.आम्ही त्यांना जाऊन भेटलो.अडचण सांगितली.दोन वर्षांपासून होत नसलेलं काम तीन दिवसात झालं तेही एक पैसा खर्च न करता.चर्चा करतांना साहजिकच तुमची ओळख निघाली.आपल्या भावाचे बाँस म्हणून तुमचे भाऊ आम्हांला तुमच्या घरी जेवायला घेवून गेले.आमचा आदरसत्कार केला.तेव्हापासून आम्ही मित्र आहोत.

दर महिन्याला आमचं फोनवर बोलणं होत असतं. माझी काही मदत लागली तर सांगा.असं मी त्यांना एकदा म्हंटल्यावर त्यांनी माझ्या वहिनीसाठी तुमच्या कंपनीत नोकरी असेल तर बघा."अशी विनंती केली.

त्यांच्या सांगण्यावरुनच आम्ही तुमच्या मिसेसला आपल्या कंपनीत लावून घेतलंय." हे ऐकल्यावर उमेशला आणखी एक मोठा धक्का बसला.त्याचबरोबर उल्काचं दादावहिनींसोबतचं वागणं आठवलं.आणि शरमेनं त्याची मान खाली गेली.


आज सकाळीच त्यांचा फोन आला.भावाची सुटी मंजूर करा अशी त्यांनी मला विनंती केली.तेव्हा मला हे कळलं.


सर दादाने तुमच्या मैत्रीबद्दल आणि त्यांच्या ओळखीमुळे मिसेसला नोकरी मिळाली आहे.याबद्दल मला कधीही काही सांगितलं नाही.मी म्हंटलं ना ही माणसं विशाल ह्रदयाची असतात.अशी उपकाराची जाणीव ते करुन देत नाहीत.शिवाय तुम्ही या ओळखीचा गैरफायदा घ्याल असंही त्यांना वाटलं असेल.उमेश मान खाली घालून उभा राहिला.काय बोलावं तेच त्याला सुचेनासं झालं.सर मग काय करायचं सुटीचं?"जरा वेळाने उमेशने घाबरत विचारलं.काय करायचं म्हणजे?तुमची सुटी मंजूर झालीये सोमवारपर्यंतची.तुम्ही अर्ज ठेवून जा.पण सर दादा रविवारपर्यंतच रहाणार आहे.साहेब हसले.नाही मिस्टर थोरात.रविवारी मी त्यांना माझ्या घरी सहकुटुंब पाहुणचाराला बोलावलंय.इतका चांगला माणूस माझ्याकडे पाहूणा म्हणून येतोय याचा मलाच खुप आनंद होतोय.खरं तर त्यांना सुटी नाही नाहीतर मीच त्यांना दोनतीन दिवस माझ्याकडे ठेवून घेतलं असतं.आणि आता तुमच्याही हातात तीन दिवस आहेत.तुम्हीही तुमच्या भावाला छान पाहुणचार करा.त्यांना कशाचीही कमतरता भासू देऊ नका.पैसे हवे असतील तर माझ्याकडून घ्या.पण काहीही कमी पडू देऊ नका.असं समजा की तुम्ही चोपड्याला रहाताय आणि ते तुमच्याकडे पुण्याहून आले आहेत म्हणजे तुमची मानसिकता बदलेल.


" साँरी सर आमच्याकडून चुक झाली.पुन्हा असं होऊ देऊ नका.नाहीतर माझ्याशी गाठ आहे.ओके या तुम्ही थँक्स सर " 


तो जाण्यासाठी वळला तसे साहेब म्हणाले एक मिनिट.तुमच्या मिसेसचीही सुटी मंजूर करायला सांगितलंय.त्यांनाही सोबत घेऊन जा रिक्षातून एकत्र परतताना उल्का उमेशला रागाने म्हणाली.अजब जबरदस्ती करतात साहेब.मी मागितलेली नसतांनाही मला सुटी दिली.आता घालवा तीन दिवस त्या रिकामटेकड्या माणसांसोबतउल्का तोंड सांभाळून बोल आणि त्यांच्याशी नीट वाग.ही नोकरीही तुला दादामुळेच मिळालीये आणि मनात आलं तर तो तुला कधीही नोकरीतून बाहेर करु शकतो?"

"काय्यsss!काही काय सांगताय?"

मग उमेशने तिला सगळी कहाणी सांगितली.


घरी परतल्यावर उल्का सरीताला म्हणाली.वहिनी मी चांगली भांडून सुटी घेतलीये बरं का!आणि आता तुम्ही कोणतंच काम करायचं नाही.असं समजा तुमच्या लहान बहिणीकडे तुम्ही आला आहात.आता तीन दिवस मी तुम्हांला चांगला पाहुणचार करणार आहे.


उमेशने विलासदादाकडे पाहिलं.तो त्याच्याचकडे बघून गालातल्या गालातल्या हसत होता.मी तुझ्या साहेबांना फोन केला त्याचं तुला वाईट तर नाही ना वाटलं?" 

"नाही दादा.उलट आमचे डोळे उघडले साहेबांनी.साँरी दादा आम्ही असं वागायला नको होतं.मला माफ कर विलासदादाने त्याच्या पाठीवर थोपटलं इट्स ओके उमेश.झालं गेलं विसरुन जा.आजकाल घरोघरी हेच चालतं.मोठ्या शहरातली माणसं गावाकडच्या लोकांना नेहमीच कमी दर्जाची,रिकामटेकडी समजतात.हा तुमचा दोष नाही.हा तुम्ही रहाता त्या शहराचा गुणधर्मच आहे.

चल जाऊ दे.आता तीन दिवस आम्हांला एंजाँय करु दे"


(ही गोष्ट दीपक तांबोळी यांच्या "अशी माणसं अशा गोष्टी " या पुस्तकातील आहे.) 

२/४/२४

अखेरचे आवाहन…Last call... (2)

३१.०३.२४ या लेखातील पुढील शेवटचा भाग..


आपल्या जगापुढील एक दुसरे अरिष्ट म्हणजे युद्धाचे.

अलीकडच्या घडामोडीवरून आपल्याला स्पष्ट कळून आले आहे की,राष्ट्र मोठ्या प्रमाणावरील विध्वंसाच्या शस्रांचे साठे कमी करीत नसून उलट वाढवीत आहेत.

जगातील अत्यंत विकसित राष्ट्रांतील सर्वात बुद्धिमान माणसांनी आज लष्करी तंत्रशास्त्राला वाहून घेतले आहे.आण्विक अस्त्रांच्या चाचण्यावर बंदी घालण्याचा मर्यादित करार होऊनही आण्विक अस्त्रांचा प्रसार थांबलेला नाही. 


उलट अलीकडेच पहिल्या गौरेतर,पौर्वात्य आणि कमी विकसित राष्ट्राने कम्युनिस्ट-चीनने-अणुस्फोट केला आहे.

त्यामुळे साऱ्या मानवजातीसमोर अणुयुद्धाचा भयंकर धोका अमर्याद प्रमाणावर उभा आहे.आतापर्यंत माणसांनी आण्विक युद्धाचे स्वरूप व धोके या संबंधीच्या वास्तव परिस्थितीला आपल्या मनात थारा दिला नाही;कारण त्यांना ती कल्पनाच मुळी अतिशय मानसिक यातना देणारी व न मानवणारी होती.पण त्यामुळे अशा युद्धाचे स्वरूप बदलत नाही किंवा धोके टळत नाहीत.केवळ त्या विचाराला थारा न दिल्यामुळे चिंता तात्पुरती दूर होत असेल पण त्यामुळे मानसिक शांतता व भावनात्मक सुरक्षितता लाभत नाही.आजही माणसाला युद्धाचे आकर्षण वाटते,ही सत्यस्थिती आहे.पण अनुभवावरून आपणास हे कळून आले पाहिजे की,युद्धाची कल्पना आजकाल विसंगत ठरली आहे.एके काळी अनिष्ट प्रवृत्तीचा फैलाव व वाढ यांना आळा घालण्याच्या दृष्टीने युद्ध उपयुक्त ठरत असेल पण आधुनिक काळातील शस्त्रांची विध्वंसक शक्ती इतकी मोठी आहे की,त्यामुळे अनिष्ट प्रवृत्तीला पायबंद घालण्याचे साधन या दृष्टीनेही युद्धाची उपयुक्तता नाहीशी झाली आहे.


सायरनांचे मधुर गीत


जीवन हे जगण्यालायक आहे आणि माणसाला जगण्याचा हक्क आहे हे आपल्याला मान्य असेल तर आपण युद्धाला दुसरा पर्याय शोधून काढलाच पाहिजे.

अवकाशयाने बाह्य अवकाशात भराऱ्या मारत असताना आणि विध्वंसनाची भयंकर क्षेपणास्त्रे वातावरणातून मृत्यूसाठी हमरस्ते तयार करत असताना कोणताही देश युद्धात आपण विजय मिळवू याची खात्री देऊ शकणार नाही.मर्यादित प्रमाणात युद्ध झाले तरी मानवी

हालअपेष्टा, राजकीय अशांतता व आध्यात्मिक भ्रमनिरास यांचा अनर्थकारक वारसा,परंपरा शिल्लक राहते.पण जागतिक महायुद्ध झाले तर परमेश्वराच्या कृपेने असे महायुद्ध न होवो - माणसाने आपल्या चुकीने अखेर आपला नाश ओढवून घेतला याची मुग्ध आठवण म्हणून फक्त धुमसणारी राख शिल्लक राहील.आधुनिक काळातील माणसे जर युद्धाची खुमखुमी बाळगतील तर या पृथ्वीचा डान्टेच्या कल्पनेतही आला नसेल एवढा भयंकर नरक करतील.म्हणून आपणा सर्वांना आणि माझे भाषण ऐकणाऱ्या व हे भाषण वाचणाऱ्या सर्वांना माझी एक सूचना आहे:अहिंसेचे तत्त्वज्ञान व कृती यांचा ताबडतोब अभ्यास केला जावा आणि मानवी संघर्षाच्या सर्व क्षेत्रात, इतकेच काय पण राष्ट्रांराष्ट्रांतील संबंधांच्याही क्षेत्रात अहिंसेच्या अख्खाचे गंभीर प्रयोग केले जावेत,अखेर राष्ट्रच युद्ध करतात,राष्ट्रांनीच मानवजातीच्या अस्तित्वाला धोका आणणारी शस्त्रास्त्रे तयार केली आहेत.केवळ विध्वंसकच नव्हे तर ती आत्मघातक आहेत."


त्याचबरोबर आपल्याला काही प्राचीन सवयींच्या,

उदाहरणार्थ अफाट सत्तेच्या व्यवस्थेवर विचार करावयाचा आहे आणि अवर्णनीय गुंतागुंतीचे प्रश्न सोडवायचे आहेत. यावेळी आपणापुढे दोन पर्याय आहेत.एक म्हणजे मानतावादाचा पूर्ण त्याग करून,जी शस्त्रास्त्रे आपणच निर्माण केली आहेत,त्यांची धास्ती घेऊन निष्क्रिय होणे किवा वांशिक अन्यायाप्रमाणेच राष्ट्राराष्ट्रांतील युद्ध व हिंसा यांना तातडीने आळा घालणे.गौरकाय लोक व निग्रो यांच्यातील समानता म्हणजे दहशतीखाली वावरणाऱ्या आणि विनाशाकडे चाललेल्या जगातील समानता ठरणार असेल तर त्यामुळे गौरकाय लोक अगर निग्रो यांपैकी कोणाचेच प्रश्न सुटणार नाहीत.निःशस्त्रीकरण व शांतता साध्य करण्याकरिता ज्या समस्या सोडवाव्या लागतील त्यांचे गुंतागुंतींचे स्वरूप मी क्षुल्लक लेखू इच्छित नाही.

पण मला वाटते,या क्षेत्रात आपण मानसिक व आध्यात्मिक फेरमूल्यमापन करण्याची तयारी दाखविल्याशिवाय या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक अशी इच्छाशक्ती,धैर्य व दूरदृष्टी आपण व्यक्त करू शकणार नाही. आपण आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यामुळेच ज्या गोष्टी वास्तव व जबरदस्त आहेत, असे आपणास वाटते,त्या वस्तुतःअवास्तव व मृत्यूच्या पाशात नेणाऱ्या आहेत,याची जाणीव होईल.जे नवे जग अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.त्या जगात प्रवेश करण्यासाठी आपण तयारी,इतकेच काय पण उत्सुकता व्यक्त केली पाहिजे.केवळ नकारात्मक मार्गाचा अवलंब करून आपण शांततामय जगाची रचना करू शकणार नाही.आम्ही युद्ध करणार नाही,एवढेच म्हणणे पुरेसे नाही.शांततेसाठी कळकळ दाखविणे व तीसाठी त्याग करणे आवश्यक आहे.युद्ध नकारात्मक उच्चाटन करण्यावर केवळ आपण लक्ष केंद्रित न करता शांततेच्या सक्रिय पुनरुच्चारावर भर दिला पाहिजे.


ग्रीक वाड्मयात युलिसिस व सायरन जमात यांच्याविषयी एक रमणीय कथा आहे.सायरन लोक इतके मधुर गात की,त्यांचे गायन ऐकण्यासाठी त्यांच्या बेटाकडे गलबत वळविण्याचा मोह खलाशांना आवरत नसे.या गायनाच्या मोहामुळे ते आपली गलबते या खडकाळ बेटाकडे वळवीत.गलबतातील खलाशी आपले घरदार,

कर्तव्य व प्रतिष्ठा विसरून गायनाच्या मोहाने समुद्रात उड्या टाकत आणि मृत्युमुखी पडत.युलिसिसने सायरन लोकांच्या मोहाला बळी पडावयाचे नाही,असा निर्धार केला.त्याने प्रथम गलबतावरील शिडाला स्वतःला बांधून टाकण्याचे ठरविले आणि त्याच्या खलाशांनी आपले कान मेणाने बुजवून टाकले. पण अखेर स्वतःचा बचाव करण्याचा अधिक चांगला मार्ग त्यांना सुचला.त्यांनी आपल्या गलबतावर ऑफियस या उत्कृष्ट गवयाला घेतले.सायरन लोकांच्या संगीतापेक्षा त्याची गीते अधिक नादमधुर होती.ऑफियस गाऊ लागला की,सायरनांचे गायन ऐकण्याची कोण फिकीर करतो? यासाठी आपण युद्धाचे केवळ नकारात्मक उच्चाटन करण्याकडे लक्ष न देता शांततेचा सक्रिय पुनरुच्चार करण्यावर भर दिला पाहिजे.युद्धाच्या बदसुरापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असे आणि मधुर संगीत - स्वर्गीय संगीत शांततेच्याद्वारे प्रगट होईल,

इकडे लक्ष दिले पाहिजे.जी कोणालाही जिंकता येणार नाही, अशी नकारात्मक अधिक अस्त्रांची शर्यत थांबविली पाहिजे आणि तीऐवजी जगातील सर्व राष्ट्रांच्या हितासाठी शांतता व भरभराट यांना मूर्त स्वरूपाच्या म्हणून माणसाने सृजनशीलतेचा उपयोग करण्याची सक्रिय शर्यत सुरू केली पाहिजे.थोडक्यात शस्त्रास्त्रांच्या शर्यतीऐवजी शांततेसाठी शर्यत चालू झाली पाहिजे.जर आपण शांततेसाठी निर्धाराने अशी मोहीम सुरू केली तर आतापर्यंत आशेचे जे दरवाजे घट्टपणे बंद राहिले होते,ते आपण उघडू शकू आणि संभाव्य विश्वसंहाराच्या विलापगीतांचे रूपांतर सृजनशील पूर्तीच्या स्तोत्रांत करू.

थोडक्यात वांशिक अन्याय,दारिद्र्य व युद्ध या समस्या सोडविण्यावर माणसाचे अस्तित्व अवलंबून आहे.आणि माणूस आपल्या वैज्ञानिक प्रगतीबरोबरच नैतिक प्रगती कशी किती करतो आणि एकोप्याने राहण्याची व्यवहारी कला कितपत शिकतो,यावर वरील समस्यांची सोडवणूक अवलंबून आहे.


जो प्रेम करीत नाही तो परमेश्वराला ओळखीत नाही !


काही वर्षांपूर्वी एक विख्यात कादंबरीकार निधन पावला.त्याच्या कागदपत्रांत नियोजित कादंबऱ्यांच्या कथासूत्रांची यादी होती.त्यांतील एक महत्त्वाचे कथासूत्र पुढीलप्रमाणे होते.खूप ठिकाणी विखुरलेल्या एका कुटुंबाला वारसाहक्काने एक घर मिळाले आणि या घरात त्यांना एकत्र राहणे भाग पडले.मानवजातीपुढील ही एक मोठी समस्या आहे.आपल्याला वारसाहक्काने एक मोठे घर जगरूपी विशाल घर मिळाले आहे.या घरात काळे व गौरकाय, पौर्वात्य व पाश्चिमात्य,जेन्टाईल व ज्यू,कॅथॉलिक व प्रॉटेस्टंट,मुसलमान व हिंदू अशा सर्वांनी एकोप्याने रहावयास शिकले पाहिजे. विचारसरणी,संस्कृती व हितसंबंध या बाबतीत गैरवाजवी रीतीने विभक्त झालेले हे कुटुंब आहे. यापुढे आपणांस एकमेकांशिवाय जगणेच अशक्य असल्यामुळे आपण काही झाले तरी या विशाल जगात एकोप्याने रहाण्यास शिकले पाहिजे.याचा अर्थ आपल्या निष्ठा विभक्त असण्यापेक्षा अधिकाधिक प्रमाणात जागतिक झाल्या पाहिजेत.आपल्या वैयक्तिक समाजात जे काही सर्वोत्कृष्ट आहे.त्याचे जतन करण्याकरिता आपण समुच्चयाने मानवजातीविषयी सर्वांत जास्त निष्ठा व्यक्त केली पाहिजे.विश्वबंधुत्वा

साठी दिले गेलेले हे आवाहन म्हणजे वस्तुतः सर्व मानवजातीविषयीसर्वंकष व बिनशर्त प्रेम दाखविण्याचे आवाहन आहे. स्वतःची जमात,वंश,वर्ग व राष्ट्र यांच्या पलीकडे अधिक विशाल दृष्टिकोन ठेवण्याचे हे आवाहन आहे.अखंड जगाचा या कल्पनेविषयी बराच गैरसमज होता आणि त्या कल्पनेचा चुकीचा अर्थ लावला जात होता.तिच्यावर नीत्शेने तीव्र दुबळेपणाचा व भेकडपणाचाच शिक्का मारला होता.पण आज मानवजात टिकविण्यासाठी ही कल्पना अगदी आवश्यक झाली आहे.जेव्हा मी प्रेमाविषयी बोलतो,तेव्हा काही तरी भावनात्मक व दुबळी विचारसरणी व्यक्त करत नाही.त्यात वायफळ बडबडीपेक्षा काहीतरी विशेष अर्थ आहे.सर्व महान धर्मांनी जीवनातील सर्वश्रेष्ठ ऐक्याचे तत्त्व म्हणून जी शक्ती मानली त्या शक्तीसंबंधी मी बोलत आहे.प्रेम म्हणजे अंतिम सत्याचे दार उघडण्याची किल्ली होय. अंतिम सत्यासंबंधीच्या हिंदू,मुसलमान,

ख्रिश्चन, ज्यू व बौद्ध या धर्मीयांच्या या कल्पनेचे समालोचन सेंट जॉन यांच्या पहिल्या पत्ररूपी प्रवचनात उत्तम रीतीने केले गेले आहे.


आपण एकमेकांवर प्रेम करूया;कारण प्रेम म्हणजे परमेश्वर,आणि प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा जन्म परमेश्वरापासून झाला असून तो परमेश्वराला ओळखतो.जो प्रेम करीत नाही तो परमेश्वराला ओळखत नाही.कारण परमेश्वर म्हणजे प्रेम आहे.जर आपण एकमेकांवर प्रेम केले तर आपल्यात परमेश्वराचे वास्तव्य राहते आणि त्याचे प्रेम आपल्यातील प्रेमाला परिपूर्णता आणते.


उद्धार तरी होईल किंवा सर्वनाश तरी होईल


ही वृत्ती सगळीकडे फैलावेल,अशी आपण आशा करूया.ॲर्नल्ड टॉइन्बी म्हणतात,"मृत्यू व अनिष्टता या तिरस्करणीय निवडीपेक्षा जीवन व सत् या चांगल्या निवडी करण्यातील प्रेम ही अंतिम शक्ती आहे.

म्हणून प्रथम आपल्याला अशी ओढ लागली पाहिजे की,प्रेम हाच अंतिम शब्द राहील.यापुढे आपल्याला द्वेषाच्या देवतेची पूजा करून किंवा टोल्यास टोला या विचारसरणीपुढे नमून चालणार नाही. अधिकाधिक जोराने उफाळणाऱ्या द्वेषरूपी लाटांमुळे इतिहासाचे महासागर खवळले जातात.द्वेषाचा आत्मघातकी मार्ग अवलंबून ज्यांनी नाश करून घेतला अशा राष्ट्रांच्या व व्यक्तींच्या उदाहरणांनी इतिहास नटलेला आहे.आता जगापुढील समस्या सोडविण्याची प्रेम ही एकच किल्ली आहे."


समारोप करताना मी हे सांगू इच्छितो की, मानवजात या काळात कसोटीत उतरेल आणि विनाशाकडे झपाट्याने चाललेल्या या युगाला नवी गती देईल.या काळातील परिस्थिती तंग व अनिश्चित असूनही काही तरी अतिशय अर्थपूर्ण घडत आहे.पिळवणूक व दडपशाही यांच्या जुन्या व्यवस्था ढासळून पडत आहेत आणि निःसत्त्व भासणाऱ्या या जगातून न्याय समता यांच्या व्यवस्था उदयास येत आहेत.पददलित लोकांपुढे संधीची द्वारे हळूहळू खुली होत आहेत,आणि राष्ट्रातील वस्त्रहीन व अनवाणी लोकांमध्ये आपण कोणी तरी आहोत ही भावना निर्माण होत आहे आणि निराशेच्या निबिड पर्वतांतून ते आशेचा बोगदा काढत आहेत.


अंधकारात जीवन कंठत असलेल्या लोकांना महान प्रकाश दिसू लागला आहे;काही ठिकाणी, व्यक्तींनी व गटांनी प्रेमाची प्रवृत्ती व्यक्त करून नैतिक प्रगल्भतेची भव्य उंची गाठली आहे. खऱ्याखुऱ्या अर्थाने जीवन जगण्याच्या दृष्टीने हा महान काळ आहे.याचमुळे भविष्यकाळाविषयी मी अद्याप निराश झालेलो नाही.

भूतकाळातील सहजसुलभ आशावाद आज अशक्य झाला असेल,शांतता व स्वातंत्र्य यांच्या लढ्यात आघाडीला असणाऱ्या लोकांना अद्यापही तुरुंगवासात दिवस कंठावे लागत असतील, आणि त्यांना ठार करण्याच्या धमक्या दिल्या जात असतील,त्यांचा एकसारखा छळ केला जात असेल आणि या छळामुळे आपण हा थोडा बोजा सहन करू शकणार नाही अशी निराशेची भावना त्यांच्यात निर्माण होण्याचा आणि अधिक शांत व समाधानी जीवनाचा अवलंब करण्याचा मोह त्यांना होण्याचा संभव असेल,आज आपणामुळे जागतिक पेचप्रसंग निर्माण झाला असेल आणि त्यामुळेच जीवनाच्या खवळलेल्या संग्रामात आपण गुरफटून गेलो असू पण प्रत्येक आणीबाणीच्या प्रसंगांत जसे धोके असतात तशी संधीही मिळते.त्यामुळे उद्धार तरी होईल किंवा नाश तरी होईल.या निबिड त्रस्त जगात अद्यापही माणसांच्या अंतःकरणात परमेश्वराचे राज्य होणे शक्य आहे.