* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

७/९/२४

रंजक गोष्ट / Interesting thing

निव्वळ कुतुहलापोटी एखाद्या प्राण्याच्या अधिवासाचा माग काढणं,त्यासाठी पडतील ते कष्ट झेलणं,ती अभ्यासपूर्ण निरिक्षणं इतरांनाही सांगण्याच्या ऊर्मीपोटी सकस लेखन करणं,या सगळ्याचं एक नाव म्हणजे डायेन ॲकरमन. तिने वटवाघुळं,सुसरी अशा विशेष प्रसिद्ध नसणाऱ्या प्राण्यांसंबंधी संशोधन केलं.तिच्या रंजक मोहिमांच्या गोष्टी सांगणारं हे पुस्तक.


वैज्ञानिक बनण्यासाठीचा एक अत्यावश्यक गुण म्हणजे कुतूहल,आणि ते कुतूहल शमवण्यासाठी लागणारी अफलातून चौकसबुद्धी.अशा व्यक्ती ज्ञानसंपादनाने झपाटलेल्या असतात;मधमाश्यांप्रमाणे दिसेल तिथे अक्षरशःनाक खुपसतात आणि आपला ज्ञानसंग्रह समृद्ध करतात.डायेन ॲकरमन ही अशाच खास व्यक्तींपैकी एक.ती स्वतः ज्ञानसंग्राहक तर आहेच;ती तिचं ज्ञान ग्रंथबद्धही करते.तिने अनेक विषयांसंबंधी लिहिलेली पुस्तकं गाजली;बऱ्याच ज्ञानशाखांत ती संदर्भग्रंथ म्हणून वापरली जातात.तिचं ज्ञान त्या-त्या ज्ञानशाखेत क्षेत्रपरीक्षण करून मिळवलेलं ज्ञान असतं;विज्ञानाच्या प्रगतीला ते हातभारच लावतं.यामुळेच ॲकरमनला विज्ञानजगतात देखील आदराचं स्थान मिळालं आहे.'द मून बाय द व्हेल लाइट अँड अदर ॲडव्हेंचर्स अमंग बॅट्स,पेंग्विन्स, क्रोकोडिलियन्स अँड व्हेल्स.' हे तिचं १९९४ सालचं पुस्तक म्हणजे लोकार्थी विज्ञानाचा (पॉप्युलर सायन्स) एक उत्कृष्ट नमुना मानला जातो.मुळात डायेन ॲकरमन ही कवी.तिने पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून कलाशाखेतील पदवी मिळवल्यावर कॉर्नेल विद्यापीठातून 'मास्टर ऑफ फाइन आर्ट्स' आणि पीएच.डी. मिळवली.तिचे पाच कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. ती 'न्यूयॉर्कर' या नियतकालिकामध्ये स्तंभलेखक म्हणून काम करू लागल्यावर तिने विज्ञानशाखांकडे लक्ष वळवलं.

वेगवेगळ्या मानवी समूहांतील प्रेमासंबंधीच्या कालच्या आणि आजच्या कल्पना,प्रेमभावनेचे वेगवेगळे पदर,

विविध देशांमधल्या प्रेम व्यक्त करण्याच्या भावना,

आख्यायिका आदींचा सखोल अभ्यास करून तिने 'नॅचरल हिस्टरी ऑफ लव्ह' (१९९४) हा मानवशास्त्रीय ग्रंथ लिहिला.त्यासाठी ती बऱ्याच देशांत हिंडली.अनेक ग्रंथालयांतून तिने संदर्भ गोळा केले;पुराणं,मिथकं,

आख्यायिका समजावून घेतल्या;पाळीव प्राण्यांपासून ते खेळणी,वस्तू,मित्र- मैत्रिणी अशा विविध प्रकारच्या प्रेमाबद्दलचं संशोधन गोळा केलं.तिने या क्षेत्रातील शास्त्रज्ञांची भेट घेतली. त्याशिवाय तत्त्वज्ञान आणि मानसशास्त्रीय अभ्यासाचा धांडोळा घेऊन मगच तिने हा ग्रंथ लिहिला.हा ग्रंथ लिहिण्याआधी तिने 'अ नॅचरल हिस्टरी ऑफ सेन्सेस' हा ग्रंथ १९९० मध्ये लिहून पूर्ण केला होता.त्यातूनच 'नॅचरल हिस्टरी ऑफ लव्ह' लिहायची प्रेरणा तिला मिळाली होती. पंचेंद्रियांमुळे आपल्याला होणाऱ्या जाणिवांमध्ये आपण 'स्पर्श' या भावनेचा कधी झटकन समावेश करत नाही.खरं तर आपली त्वचा हीदेखील एक ज्ञानेंद्रियच आहे.चुंबन ही मानवी व्यवहारातील आणि जोडीदार टिकवण्यातील एक महत्त्वाची घटना;पण तितकंच तिचं महत्त्व नाही,तर अजाण बालकालाही आईचं ममत्व कळतं ते चुंबनामुळेच.

हे चुंबन कसं उत्क्रांत झालं हे 'अ नॅचरल हिस्टरी ऑफ सेन्सेस' वाचताना आपल्या कळतं. हा ग्रंथ लिहिताना ॲकरमननी जे परिश्रम घेतले ते वाचूनसुद्धा आपण थक्क होतो.मुख्य म्हणजे स्वतः विज्ञानाचं शिक्षण घेतलेलं नसताना असे वैज्ञानिक ग्रंथ लिहिणं हे सोपं काम नव्हे.'द मून बाय द व्हेल लाइट...' हे पुस्तक देखील शास्त्रीय माहिती सुलभ आणिरंजक करून कशी सांगावी याचा आदर्श नमुना आहे.पुस्तकाचं हे शीर्षक डायेनबद्दलही काही सांगतं.मुळातच अतिशय चौकस अणि तितक्याच उपद् व्यापी असलेल्या डायेनला एका जागी टेबल-खुर्चीवर बसून काम करण्याचा कंटाळा.त्यामुळेच ती कधी वाघुळं,तर कधी पेंग्विन,काही वेळा सुसरी आणि तत्सम प्राणी,तर कधी देशमाशांचा अभ्यास करणाऱ्या पथकांमध्ये स्वयंसेवक म्हणून सामील झाली होती.हे पुस्तक त्याचाच परिपाक आहे.


'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात' ही म्हण डायेनच्या बाबतीत १०० टक्के लागू पडते. तिच्या निरागस बाल

सुलभवृत्तीतून तिचा चौकस स्वभाव आणि कुतूहलक्षम बुद्धी प्रकट होते. कुतूहल भागवण्याच्या प्रयत्नात ती बदनामही होते.याची एक-दोन उदाहरणं फारच मजेशीर आहेत.शिकागोच्या सीमेवरील वॉकेगॉन या खेड्यात ॲकरमन कुटुंबाचं बैठं घर होतं. (आश्चर्याची गोष्ट म्हणजे या खेड्यात जन्मलेली ८० बालकं पुढे लेखक /पत्रकार बनली.'हा तिथल्या मातीचा गुण आपल्याला चिकटला' असं डायेन म्हणते.) त्याच गावात व्हिक्टर हा डायेनचा चुलत भाऊ राहत होता.डायेन त्याला टिकटॉक म्हणायची.टिकटॉक हा तिचा सर्वोत्तम मित्र होता. एकदा डायेनने टिकटॉकला मानेभोवती टॉवेल बांधून त्याच्या बैठ्या घराच्या छपरावरून खाली उडी मारायला जवळजवळ तयार केलं.माणसं खरच उडू शकतात की नाही हे तिला बघायचं होतं.दुर्दैवाने हा बेत तिच्या काकूच्या कानावर पडला.मग एकदा डायेन आणि टिकटॉकने बरेच वेगवेगळे नको ते पदार्थ गोळा करूर पडला,उकळवून त्याचा बाटलीभर रस तयार केला.जवळ राहणाऱ्या नॉर्मी वुल्फ नावाच्या एका स्कॉलर पण आगाऊ मुलाला तो पाजून काय परिणाम होतो हे बघायचा त्या दोघांचा बेत होता;त्याचाही काकूला पत्ता लागलाच.एकदा डायेनच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली.घरातल्या जमिनीला स्पर्श न करता संपूर्ण घरभर फिरता येणं शक्य आहे का, हे बघायचं तिने ठरवलं.तिच्या आणि टिकटॉकच्या या माकड उद्योगात काही खुर्चा आणि इतर वस्तू आडव्या झाल्या.आपण आर्क्टिक सागरात अडकलो तर बर्फाच्या तरंगणाऱ्या तुकड्यांवरून जमिनीपर्यंत पोहोचणं शक्य होईल का हे पाहणं,हा या उद्योगामागचा डायेनचा उद्देश काकूमुळेच फसला.'पुन्हा हिच्या नादी लागलास तर बघ !' अशा काकूच्या दमदाटीनंतर व्हिक्टरची आणि तिची दोस्ती कायमची संपली.डायेनच्या मते,तिचं कुतूहल तिला कधीच स्वस्थ बसू देत नसे.शिवाय तिचा अनुभवसिद्ध ज्ञानावर विश्वास होता.ही बालपणीची सवयच तिला आयुष्यभर नवनव्या विषयांकडे आकर्षित करत राहिली.उदा.१९८९ मध्ये ती दक्षिण ध्रुवीय प्रदेशात शिडाच्या गलबतातून भटकायला गेली. ती या उद्योगाकडे का वळली? याआधीच काही महिने तिने सॅन डिएगो प्राणि

संग्रहालयात स्वयंसेवक म्हणून काम केलं होतं.तिथे तिच्यावर पेंग्विनची पिल्लं वाढवायची जबाबदारी सोपवण्यात आली होती.प्राणिसंग्रहालयात पेंग्विनांची कशी काळजी घेतली जाते याचे बारकावे डायेन नमूद करते - सर्व वातावरण हुबेहूब आर्क्टिकसारखं.या स्वयंसेवकांना 'पेंग्विन घरा'त प्रवेश करण्यापूर्वी एक खास पोषाख परिधान करावा लागतो.त्यानंतर पाय जंतुरोधक द्रवात बुडवून झाले की नंतरच पेंग्विन घराचं दार उघडलं जातं.पेंग्विनांचा उबदार प्रदेशातील कुठल्याच प्रकारच्या सूक्ष्म जीवांशी कधीच संबंध येत नाही.त्यामुळे ही काळजी घ्यावी लागते. डायेन पेंग्विन घरात शिरल्याबरोबर अतिशय थंड झोंबऱ्या हवेच्या स्पर्शाने दचकली.तिथे खूप कल्ला सुरू होता.समोर २० पाळण्यांत पेंग्विनांची पिल्लं उभी होती.हे रूढार्थाने पाळणे नव्हते.तसे ते जमिनीवरच होते.त्यांत मोठे गुळगुळीत गोटे होते.पेंग्विनच्या घरट्यांची ही नक्कल होती.त्यावर टर्किश टॉवेल पसरले होते. बालपेंग्विन सारखे पडत असतात.त्यांना इजा होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली होती.जवळच्या स्वयंपाकघरात पिलांसाठीचं खास अन्न बनवलं जात होतं.ते अगदी छोट्यांना पाच वेळा,तर मोठ्या पिलांना दर दिवशी चार वेळा भरवण्यात येत होतं.पिलांच्या खोलीत कायम मंद उजेड असेल याची काळजी घेतलेली होती.

पेंग्विनांना माणसांची भीती वाटत नाही.उलट,हा प्राणी कोण याबद्दल त्यांच्या मनात खूप कुतूहल असतं.त्यांच्या जवळ गेलेल्या माणसाकडे ती दोन वर्षांच्या मानवी मुलांप्रमाणे डगमगत चालत येतात.बुटांच्या नाड्या चोचीत धरून खेचतात.स्वेटरच्या बाहीत चोची खुपसून त्याची तपासणी करतात,नाही तर त्या माणसांना बिलगून जवळीक साधायचे प्रयत्न सुरू करतात.इथल्या अनुभवामुळे डायेनच्या मनात अंटार्क्टिकाला जाण्याची इच्छा निर्माण झाली.डायेनची अंटार्क्टिकाची सफर 'न्यूयॉर्कर'नेच घडवून आणली होती.


तिथल्या स्मशानशांततेने ती अतिशय प्रभावित झाली.

अधून मधून ही शांतता भंग करणारे,प्रचंड संख्येने असलेले पेंग्विनांचे कळप पाहून,हे पाहणाऱ्या काही मोजक्या लोकांत आपण आहोत,या विचाराने ती स्वतःला भाग्यवान समजू लागली,आणि अजूनही समजते.तिथले तिने टिपलेले अनुभव खरं तर इतरांनाही आले असणार,

पण कुणीही ते लिहून ठेवलेले नसावेत,कारण माझ्या वाचनात ते प्रथमच आले.अंटार्क्टिकवर जाणं सोपं नाही. अगदी अमेरिकेतूनही वर्षाला दोन ते तीन वेळा तिथे विमानं जात असतात.दुसरा मार्ग म्हणजे चिलीतल्या केप हॉर्न इथून जहाजाने जायचं. इथले सागरी प्रवाह हृदयात धडकी भरवणारे आहेत.द.अमेरिका आणि द.ध्रुवीय प्रदेश या दरम्यान दुसरा भूभाग नाही.डायेन या मार्गाने निघाली.प्रवासात त्यांचं जहाज चांगलंच हलत होतं.लाटांच्या विरोधात झुंजताना दारूड्यासारखं झुलत होतं.त्यामुळे डायेनचं पोटही ढवळून निघालं होतं.

अंटार्क्टिकाच्या जवळ आल्यावर तिने पोर्टहोलमधून बाहेर बघितलं.एकही वनस्पती नसलेल्या डोंगररांगा दूरवर पसरल्या होत्या.त्या तिला भयाण वाटल्या.हे दक्षिण ध्रुवीय प्रदेशाचं डायेनला घडलेलं पहिलं दर्शन.जहाज नेल्सन बेटातल्या हार्मनी नावाच्या छोट्या खाडीत उभं करण्यात आलं.छोट्या होड्यांतून ही मंडळी बेटाच्या किनाऱ्याच्या दिशेने निघाली.त्यांच्या स्वागताला किनाऱ्यावर जेंटू पेंग्विनांची एक टोळी उभी होती.ही मंडळी किनाऱ्यावर उतरताच 'हे कोण पाहुणे आले आपल्याकडे' अशा कुतूहलाने ते पुढे आले.सर्वच प्रकारचे पेंग्विन हे काळे-पांढरे असतात.याला काउंटर शेडिंग (विरुद्ध रंगी) असं म्हटलं जातं.हटके भटके -निरंजन घाटे,

समकालीन प्रकाशन)


त्यांचं पांढरं पोट आणि पांढरी हनुवटी पाण्याखालून बघितली तर वरून पाण्यात येणाऱ्या पांढऱ्या प्रकाशात एकरूप झाल्याने दिसायला अवघड जातात.यामुळे त्यांना मासे पकडणं सोपं जातं.त्याचप्रमाणे पाण्याखालून पोहणाऱ्या शिकारी लिओपर्ड सीलनाही पेंग्विन दिसू शकत नाहीत.त्यांच्या काळ्या पाठीमुळे हिमखंडांवर बसलेल्या लिओपर्ड सीलना ते वरून लक्षात येत नाहीत. संशोधकांनी पेंग्विनांचा माग घेण्यासाठी काही पेंग्विनांच्या गळ्यात ॲल्युमिनिअयमची कडी अडकवली असता ती कडी सूर्यप्रकाशात चमकल्यामुळे लिओपर्ड सीलना ती दिसली, तेव्हा त्या सीलनी नेमकी कडी अडकवलेली पेंग्विनच टिपून मारली.तेव्हा त्या संशोधकांनी पेंग्विनांच्या गळ्यात काळी कडी अडकवायला सुरुवात केली.


(निसर्गात रमलेली पत्रकार-लेखिका डायेन ॲकरमन)


(उर्वरित राहिलेला भाग ०९.०९.२४ या दिवशीच्या लेखामध्ये..)

५/९/२४

हसा आणि हसा / smile and smile..

०३.०९.२४ या लेखातील पुढील शेवटचा भाग..


तुम्ही स्वतःला आनंदी मानू लागलात तर नेमकी हीच गोष्ट तुम्हाला अधिक आनंदी करेल.प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व तत्त्ववेत्ता विल्यम जेम्स म्हणतो…। 


वरवर पाहता आपल्याला असे दिसते की, भावनेच्या मागोमाग कृती जाते; पण वास्तवात तसे नाही.कृती आणि भावना या एकमेकींच्या हातात हात घालून जातात. म्हणूनच आपल्या कृतीला आपण नियंत्रणात आणून भावनांवर सुद्धा नियंत्रण ठेवू शकतो. कारण कृती ही प्रत्यक्षपणे करणे-न करणे आपल्या मर्जीवर अवलंबून असते,पण भावनांवर आपले नियंत्रण नसते.म्हणजेच आनंद मिळवणे हे सर्वस्वी आपल्याच हाती असते.आपल्या दुःखाला आपल्याइतके जबाबदार दुसरे कोणीच नसते.आनंदी वागून, आनंदी बोलून,सर्वत्र आनंदच आनंद पसरतो!


तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवून तुम्ही आनंदी होऊ शकता.आनंद हा बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाही तर तो तुमच्या अंतरंगातच दडलेला असतो.


तुम्ही कोण आहात? काय आहात? कोठे आहात? किंवा तुम्ही काय करता हे आनंद मिळवण्यासाठी महत्त्वाचे नसते.तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटते ते सगळ्यात महत्त्वाचे असते ! एकाच ठिकाणी,एकाच प्रकारचे काम करणाऱ्या दोन माणसांना त्याचा मोबदला,मानमरातब सारखाच मिळत असतो. तरी एकजण सुखी आणि दुसरा दुःखी असतो, असे का होते? यामागे आहे दोघांची वेगवेगळी मानसिकता.शहरापासून अगदी दूरवर,शेतामध्ये जुनीच अवजारे घेऊन घाम गाळत आनंदाने राबणारे शेतकरी आणि न्यूयॉर्क,शिकागो आणि लॉस एंजलिस

सारख्या मोठ्या शहरांत अद्ययावत एअरकंडिशन्ड ऑफिसमध्ये दुर्मुखलेल्या चेहऱ्याने काम करणारी माणसे अशी टोकाच्या मनोवृत्तीची माणसे जगात एकाच वेळी अस्तित्वात असू शकतात.


 शेक्सपिअरही असेच म्हणाला होता.जगात चांगले आणि वाईट असे काहीच नाही.आपले विचारच त्यांना चांगले वा वाईट ठरवत असतात.'


तसेच लिंकननेसुद्धा एकदा सांगितले जर माणसाने मनाचा निश्चय केला की,मी आनंदी राहीन,तरच तो आनंदी राहू शकतो.ॲबीच्या मते, हे खरे आहे,मी स्वतः अशा सत्याला सामोरे गेलो आहे.लाँग आयलंड,न्यू यॉर्क येथील रेल्वेस्टेशनच्या कडेने चालत असताना माझ्या पुढ्यात एकदम तीस ते चाळीस अपंग मुले कुबड्या आणि काठ्या घेऊन आली.जिना चढण्याचा अशक्यप्राय प्रयत्न करूनही त्यांना ते शक्य नव्हते.मग त्यांना उचलून वर ठेवावे लागले;पण त्या मुलांच्या हसण्याने आणि उत्साहाने मी आश्चर्यचकित झालो.त्या मुलांबरोबर असणाऱ्या गृहस्थांशी याबद्दल मी बोललो तेव्हा ते म्हणाले, होय ! तुम्ही म्हणता ते खरे आहे.जेव्हा मुलाला सुरुवातीला समजते की, त्याला आता अपंग होऊन जगावे लागणार आहे, तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो;पण कालांतराने हळूहळू तो त्यातून बाहेर येतो आणि हे आपले नशीब आहे असे मानून त्याचा स्वीकार करतो आणि मग इतर सर्वसाधारण मुलाइतकाच तोही आनंदी राहतो.


खरोखरच त्या मुलांना सलाम ! त्यांच्यामुळे मी आयुष्यातला एक मोठा धडा शिकलो की,जो मी कधीच विसरणार नाही.


स्वतःला बंद करून घेऊन कामाचे ढिगारे उपसत बसल्याने एकाकी तर वाटतेच,पण त्यामुळे इतरांशी मैत्री करण्याची संधीही हातातून निसटून जाते.मेक्सिकोमध्ये राहणारी सिनोरा मारीया ही तरुणी नोकरी करत होती त्या ठिकाणी ती एकटी,एकाकी बसत असे.त्या ऑफिसमध्ये तिचे इतर सहकारी जवळ-जवळच्या टेबलवर बसत. ते हसत-खेळत,गप्पा मारत काम करत.

याचा तिला खूप हेवा वाटे.सुरुवातीच्या दिवसांत ती संकोचाने त्यांच्याशी बोलणे टाळत असे.पण काही आठवड्यांनंतर तिला वाटले,की या बायका बोलायला येतील अशी अपेक्षा धरण्यापेक्षा आपणच आपल्या जागेवरून उठून त्यांना भेटायला जाऊ.पुढच्या वेळेस ती जेव्हा बॉटरकूलरकडे पाणी प्यायला गेली तेव्हा तिने त्यांना विचारले,हाय ! कशा आहात तुम्ही सगळ्या ? मग ती प्रत्येकाशीच असे बोलू लागली.त्याचा चांगला परिणाम ताबडतोब दिसायला लागलालू सगळे तिच्याकडे पाहून हसले.सगळ्यांनी तिला उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे ऑफिसमधले वातावरण हलके-फुलके झाले व तिचे काम ती अधिक आनंदाने करू लागली.हळूहळू त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊ लागले.तिचे काम आणि तिचे आयुष्य अधिक सुंदर झाले.


संतसाहित्यामधील हा एक निवडक परिच्छेद आणि त्यामधील उपदेश अत्यंत काळजीपूर्वक वाचा,पण फक्त वाचून उपयोग नाही.जर तुम्ही असे वागलात,तर मात्र तुमचे भले नक्कीच होईल. (निबंधकार अल्बर्ट हुबार्ड)


घराबाहेर पडल्यावर चेहऱ्यावर प्रसन्नता आणा. तुमच्या फुफ्फुसात जास्तीत जास्त ताजी हवा भरून घ्या.

सूर्यप्रकाशाला सामोरे जा आणि तो डोळ्यांत साठवून घ्या.तुमच्या मित्रमैत्रिणींशी हसत खिदळत बोला.चांगल्या गोष्टीचे मनापासून टाळ्या वाजवून स्वागत करा.

तुमच्याबद्दल कोणी काही गैरसमज करून घेईल म्हणून भिऊ नका. तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टींचा,तुमच्या शत्रूचा एक मिनिटही विचार करू नका.आत्ता,या क्षणी तुम्हाला काय करायला आवडेल याचे पक्के नियोजन करा.म्हणजे मग कोणत्याही प्रलोभनाला तुम्ही बळी पडणार नाही.

तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही येऊन पोहोचाल.ज्या उदात्त आणि महान गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यावर तुमचे लक्ष केंद्रित करा आणि काही दिवसांनंतर तुम्हाला जाणीव होईल की तुमच्या नकळत तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत.तुमची तुमच्याबद्दलची तुमच्या मनातली प्रतिमा साकार होत आहे असे तुम्हाला जाणवेल,तुम्ही परोपकारी,उत्साही,अनेक क्षमता असणारे झालेले असाल.विचार हेच सर्वश्रेष्ठ असतात. धाडसी वृत्ती,मनमोकळेपणा,आनंदीवृत्ती हे सगळे असणारा योग्य मानसिक दृष्टिकोन जपा. योग्य दिशेने विचार करणे म्हणजे नवनिर्मिती. प्रबळ आंतरिक इच्छेने काहीच असाध्य राहात नाही आणि प्रत्येक प्रामाणिक प्रार्थना देव ऐकतोच.आपल्या हृदयात जपलेल्या प्रतिमेप्रमाणेच आपण बनतो.प्राचीन चायनीज लोक खरोखर खूप शहाणे होते.जगरहाटी त्यांना चांगली समजत होती.एक जुनी म्हण सांगते की,जी तुम्ही आणि मी सतत समोर ठेवली पाहिजे - ज्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू येत नाही,त्याने कधीच दुकान उघडू नये.तुमच्या हसण्यामधून तुमच्या सदिच्छा (मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी, मंजुल प्रकाशन) लोकांपर्यंत पोहोचतात.तुमचे हसू पाहणाऱ्यांची आयुष्ये उजळून निघतात.जगाच्या तिरस्काराला कंटाळलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी तुमचे हसू एखाद्या काळोख्या ढगाआडून प्रकटलेल्या सूर्यकिरणांसारखे असते.बॉसचा तणाव असणारी एखादी व्यक्ती किंवा एखाद्या दुकानदाराचा त्याच्या गिऱ्हाइकामुळे असणारा तणाव किंवा शिक्षकांच्या किंवा पालकांच्या तणावाखाली असणारे विद्यार्थी,एखाद्या हास्याच्या लकेरीमुळेही सुखावतात.त्यांना नवा हुरुप येतो. जगात अजूनही शिल्लक असणारा आनंद नव्याने सापडतो.


नाताळमधील गर्दीच्या तणावामुळे विक्रेत्यांना आलेली मरगळ झटकण्यासाठी काही वर्षांपूर्वी न्यूयॉर्क शहरातील एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये खालील तत्त्वज्ञान लिहून ठेवले होते.


नाताळातील मौल्यवान हसू…!!


यासाठी पैसे पडत नाहीत.पण ते खूप काही देऊन जाते.ज्याला हे मिळते तो अधिक समृद्ध होतो,पण तो जे देतो त्याचे काहीच कमी होत नाही.हे एका क्षणात घडते,पण त्याच्या गोड आठवणी आयुष्यभर दरवळत राहतात. कोणाचीही श्रीमंती हास्यावाचून पुरी होत नाही आणि कोणत्याही गरिबाला याचा थोडा जरी फायदा मिळाला तरी तो गरीब राहत नाही.हास्यामुळे घरात आनंदी आनंद पसरतो. व्यवसाय - धंद्यात बंधुभाव निर्माण होतो आणि मित्रांमध्ये घट्ट मैत्री होते.

थकलेल्याला हास्यामुळे विश्रांती मिळते.निरुत्साही झालेल्यांसाठी ते टॉनिक असते. दुःखी असणाऱ्यांना हास्यामुळे नवीन पहाट उगवल्यासारखे वाटते.हास्य हा कोणत्याही संकटावर निसर्गाने निर्माण केलेला उतारा आहे.ते विकले जात नाही. त्यासाठी याचना करावी लागत नाही.ते उसने मिळत नाही किंवा ते कोणी चोरूही शकत नाही.उलट,दुसऱ्याला ते देण्याने आपल्यालाही काहीतरी मिळते.आणि आता नाताळच्या या तोबा गर्दीत आमचे विक्रेते इतके थकले आहेत की,त्यांनी तुम्हाला हसू दिले नाही,तर आम्हीच तुम्हाला तुमचे हसू त्यांच्यासाठी सोडून जाण्याची विनंती करतो.ज्यांच्याकडे आता हसू उरले नाही,त्यांनाच हसू देण्याची जास्त गरज आहे,नाही का?


हसा,हसा,आणि फक्त हसा…



३/९/२४

हसा फक्त हसा..! Smile just smile..!

एका मोठ्या पार्टीत एक गर्भश्रीमंत स्त्री प्रत्येकावर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत होती.न्यू यॉर्क शहरातील त्या पार्टीत उंची वस्त्रे, हिरे आणि मोती यांनी झगमगणारी तिची श्रीमंती,तिच्या चेहऱ्याच्या बाबतीत मात्र अगदीच कुचकामी ठरत होती.ती किती सुंदर आहे किंवा नाही यापेक्षाही तिच्या चेहऱ्याबाबत लक्षात राहणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावरून ओसंडून वाहणारा रुक्षपणा आणि स्वार्थीपणा. तुमचे कपडे आणि तुमच्या दागदागिन्यांपेक्षा तुमच्या चेहऱ्यावरील मृदू,

मैत्रीपूर्ण भावच तुमच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी देतात,ही सामान्यतः प्रत्येकालाच माहिती असलेली गोष्ट बहुधा तिला जाणवलीच नव्हती.


चार्लस स्कॅब हा पूर्वी अजिबात हसत नसे,पण हसण्यात केवढी जादू दडली आहे,हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा तो आमूलाग्र बदलला..! स्कॅबचे आनंदी व्यक्तिमत्त्व,

लोकांनी प्रेम करावे ही त्याची क्षमता,त्याचे मंत्रमुग्ध करणारे हसू यातच त्याच्या असामान्य यशाचे गुपित दडले आहे.शब्दांपेक्षा कृती ही खूप काही बोलून जाते. जेव्हा तुम्ही हसून एखाद्याला भेटता तेव्हा जणू तुम्ही असेच म्हणत असता की,मला तू आवडतोस,तुला भेटून मला आनंद झाला,तू मला सुखी केलेस. 


कुत्र्यांच्या लोकप्रियतेमागे हेच कारण असावे,की कुत्र्यांना आपल्याला पाहून इतका आनंद होतो की,ती आपल्या अंगावर उड्या मारतात.साहजिकच आपल्यालाही त्यांना पाहून आनंद होतो.लहान बाळाचे हसूही अत्यंत लोभसवाणे असते.


डॉक्टरांच्या वेटिंगरूममध्ये बसून कंटाळलेल्या इतर पेशंट्सना तुम्ही कधी निरखून पाहिलंय? सगळेजण अत्यंत गंभीर चेहऱ्याने डॉक्टरांना भेटण्यासाठी तिथे ताटकळत बसलेले असतात. प्राण्यांचे डॉक्टर डॉ.स्टिफन मिसुरीतील रेटाउन येथे दवाखाना चालवत असत.त्यांनी वसंत ऋतूतील एका खास दिवसाची आठवण सांगितली.

त्या दिवशी त्यांची वेटिंगरूम प्राण्यांना रोगप्रतिबंधक लस देण्यासाठी जमलेल्या लोकांनी व त्यांच्या प्राण्यांनी खच्चून भरलेली होती.सगळे काही न बोलता शांत बसून होते. साधारण सहा किंवा सात पेशंट्स उरलेले असताना एक तरुण स्त्री आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला आणि एका छोट्या कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन आली.खूप वेळ बसावे लागल्यामुळे वैतागलेल्या एका सभ्य प्रौढ गृहस्थां शेजारी ती बसली.तेवढ्यात ते छोटे बाळ त्या आजोबांकडे पाहून बोळकं पसरून असं काही हसलं की,त्यानंतर गंभीरपणे किंवा लांब चेहरा करून बसून राहणे कुणालाच शक्य झाले नाही.मग लगेच ते आजोबा त्या बाळाविषयी, त्यांच्या नातवंडांविषयी बोलू लागले आणि त्या हॉलमधील सगळी माणसेच त्यामध्ये सहभागी झाली आणि मग सगळे ताणतणाव,कंटाळा विरून त्या हॉलमध्ये आनंद व उत्साह भरून गेला.खोट्या,यांत्रिक हसण्यामुळे मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडण्याचीच शक्यता जास्त असते.असे हसणाऱ्या माणसांविषयी मनात एक चीड उत्पन्न होते.समोरच्याच्या मनात आनंद लहरी उमटतील असे खरेखुरे,अगदी हृदयातून उमटणारे हसू आयुष्य बदलून टाकू शकते.


मिशिगन विद्यापीठातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ प्रोफेसर जेम्स मॅकोनेल हे हास्य या संकल्पनेबद्दल असे म्हणतात की,हसू शकणारे लोक चांगले व्यवस्थापक असतात, उत्तम शिक्षक असतात आणि त्यांचे विक्रीकौशल्य विशेष उल्लेखनीय असते. ते मुलांनासुद्धा चांगल्या पद्धतीने वाढवतात. नुसतीच नाके मुरडण्याऐवजी एकदा मोकळे हसून पाहा,अनेक चांगल्या भावनांचा उगम त्यातून होतो. शिक्षा करण्यापेक्षा प्रोत्साहन देणे हीच उत्तम शिकवण आहे.एक एम्प्लॉयमेंट मॅनेजर जी न्यूयॉर्कमधील एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काम करते; तिचे असे म्हणणे आहे की,मला शक्य झाले तर, चेहऱ्यावर उत्साहवर्धक हसू असणारी व्यक्ती जरी अर्धवट शिकलेली असेल तरी गंभीर चेहऱ्याच्या पी.एच.डी. झालेल्या व्यक्तीपेक्षा, अशा व्यक्तीलाच मी पसंत करेन.


जरी काही वेळा आपल्या चेहऱ्यावरचे हसू दिसले नाही,

तरी त्याचा होणारा परिणाम हा अतिशय प्रभावशाली असतो.आपली उत्पादने व सेवा विकण्यासाठी फोन कॉल्स करणाऱ्या लोकांसाठी अमेरिकेत फोनपॉवर नावाचा एक अभिनव उपक्रम केला गेला.त्यात त्यांना असे सांगण्यात आले की,तुमच्या बोलण्यातून तुमचे हास्य समोरच्या व्यक्तीला समजायला हवे आणि याचा त्यांच्या विक्रीवर चांगला परिणाम झाल्याचे लक्षात आले.


ओहियोसिनसिनाटी येथील कंपनीमध्ये संगणक विभागाचा व्यवस्थापक असणाऱ्या रॉबर्ट क्रायरने अभिमानाने सांगितले की,त्यांच्या कंपनीसाठी लायक कॉम्प्युटर इंजिनिअरची नेमणूक त्याने अचूकपणे कशी केली :त्याच्या कंपनीसाठी कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएच.डी.केलेला एक चांगला हुशार उमेदवार ताबडतोब हवा होता.परड्यु युनिव्हर्सिटीतून पदवी घेतलेला,उत्तम क्वालिफिकेशन असलेला उमेदवार शेवटी निवडला गेला.त्याच्याशी बरेचवेळा फोनवर बोलल्यानंतर असे लक्षात आले की,त्याला अनेक कंपन्यांकडून बोलावले गेले होते.त्यांपैकी काही कंपन्या तर आमच्यापेक्षा मोठ्या आणि नावाजलेल्या होत्या.तरीही त्याने मात्र आमच्या कंपनीची निवड केली. मी त्याला विचारले,त्याने इतरांना डावलून आम्हाला का निवडले?तो एक क्षणभर थांबून विचारपूर्वक म्हणाला,मला असे वाटते की,माझ्याशी बोलणाऱ्या इतर मॅनेजर्सचे बोलणे अत्यंत थंड व व्यावहारिक होते;एखादा सौदा केल्यासारखे ते बोलणे होते.पण तुमचा आवाज मला फार आश्वासक वाटला व तुम्ही मला आमंत्रित करत आहात,तुम्हाला माझे बोलणे ऐकायचे आहे आणि तुमच्या संस्थेचा एक भाग म्हणून तुम्हाला मी हवा आहे असे मला जाणवले.


अमेरिकेतील एका खूप मोठ्या रबर कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या अध्यक्षाचे निरीक्षण असे आहे,

की कोणतेही काम लोक जेव्हा हसून-खेळून करतात तेव्हाच ते त्यामध्ये यशस्वी होतात.हा मोठा उद्योजक जुन्या काळातील असला,तरी फक्त काबाडकष्ट हीच यशाचे दार उघडण्याची जादूची किल्ली नव्हे,यावर त्याचा विश्वास होता.त्याचे म्हणणे असे होते,मला अशी यशस्वी माणसे माहिती आहेत की,ज्यांनी त्यांचा व्यवसाय अत्यंत आनंदाने केला आहे आणि मी अशीही माणसे पाहिली आहेत की,ज्यांनी मौजमजा विसरून फक्त काम केले आहे;पण मग त्यांच्या व्यवसायात त्यांना मंदी आली, त्यांचा आनंद नाहीसा झाला आणि ते अपयशी ठरले.तुम्ही लोकांना आनंद दिलात, तर निश्चितच ते तुमच्याबरोबर आनंदात वेळ घालवतील.


माझ्या क्लासमधल्या हजारो व्यावसायिकांना मी नेहमी सांगतो एक आठवडाभर तुम्ही सातत्याने प्रत्येक तासाला कोणालातरी स्माईल द्या आणि मग इथे येऊन त्याचे काय परिणाम झाले ते सांगा. हे खरंच शक्य आहे का? न्यूयॉर्कमधील एका स्टॉकब्रोकरचे पत्र आता पाहा :


मि.स्टेनहार्ड लिहितात - अठरा वर्षांपूर्वी माझे लग्न झाले आणि अठरा वर्षांच्या काळात मी माझ्या पत्नीकडे पाहून क्वचितच हसलो असेन किंवा सकाळी उठल्यापासून ते ऑफिसला जाईपर्यंत दोन डझन शब्दसुद्धा मी रोज तिच्याबरोबर बोलत नाही.सतत फक्त कुरकुर करत असे.मी कधी तिच्याबरोबर सिनेमालासुद्धा गेलो नाही.पण जेव्हा तुम्ही मला हसून बोलण्याचा सल्ला दिलात व तो अनुभव कथन करण्यास सांगितलात,तेव्हा मी मनाशी विचार केला की,मी आठवडाभर प्रयत्न करून पाहीन. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळीच आरशातल्या माझ्या खिन्न,आंबट चेहऱ्याकडे पाहून मी स्वतःला बजावले,बिल तू आता हसणार आहेस आणि या क्षणापासून हसतच राहणार आहेस. मी नाश्ता करताना बायकोला हसून गुड मॉर्निंग म्हणालो.तुम्ही म्हणाला होतात की,ती आश्चर्यचकित होईल;पण कार्नेगी साहेब,तुम्ही चुकलात.

तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे घडले.ती चक्क घाबरली.तिला धक्काच बसला,पण जेव्हा मी तिला विश्वास दिला की यात काहीही अनपेक्षित नाही आणि आता असे नेहमीच घडत राहणार आहे तेव्हा तिला खूप आनंद झाला.आणि खरोखरच त्या दिवसापासून अवघ्या दोनच महिन्यांनी आमचे घर सुखासमाधानाने न्हाऊन निघाले.ऑफिसला जाताना आमच्या लिफ्ट ऑपरेटरलासुद्धा मी गुड मॉर्निंग असे हसून म्हणू लागलो.ऑफिस मधील दरवानालासुद्धा हसून अभिवादन करू लागलो.माझ्या कॅशिअरने माझ्याकडे सुट्टे पैसे मागितले तेव्हाही मी त्याच्याकडे पाहून हसलो.स्टॉक एक्स्चेंजच्या दरबारात उभे राहून तेथे जमलेल्या लोकांकडे पाहून हसताना तर मला कुणीच पाहिले नव्हते.काही दिवसांतच माझ्या लक्षात आले की,प्रत्येकजण माझ्या सुहास्याला हसून प्रतिसाद देत होता.माझ्याकडे काही तक्रारी घेऊन येणाऱ्या किंवा टीका करणाऱ्याचे म्हणणेसुद्धा मी काळजीपूर्वक ऐकू लागलो.त्यावर आनंदाने उपाय सुचवू लागलो आणि माझ्या लक्षात आले की,तडजोडीने अनेक समस्या सुटतात.निदान सोप्या वाटतात.मला असेही जाणवले की,हास्य माझ्याकडे संपत्ती खेचून आणते आहे.


माझा एक मित्र माझा भागीदार होता.त्याच्या स्टाफपैकी त्याचा एक क्लार्क फार उमद्या स्वभावाचा होता.जगाकडे बघण्याच्या माझ्या दृष्टिकोनात बदल केल्यामुळे मला होणारे फायदे त्याला सांगावे म्हणून मी जेव्हा त्याच्याशी बोललो तेव्हा त्याने मला प्रांजळ कबुली दिली की,पूर्वीचे माझ्याबद्दल त्याचे मत,महानालायक,खडूसप्राणी असे होते.पण आता ते बदलले होते.


कामाच्या पद्धतींमधून पूर्णपणे हद्दपार केलेली टीका,

रागाऐवजी कौतुक आणि स्तुती या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात क्रांती घडली.मला काय पाहिजे आहे यावर भर देण्यापेक्षाही मी आता समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून त्या घटनेकडे पाहू लागलो आणि खरे सांगायचे,तर मी आता पहिल्यापेक्षा खूप वेगळा,

अधिक आनंदी,अधिक श्रीमंत आहे.खरेतर मित्रांच्या बाबतीतली ही श्रीमंती,संपत्तीच अधिक टिकाऊ असते.

हसावेसे वाटत नाही तेव्हा दोन गोष्टी कराव्यात.पहिली म्हणजे बळजबरीने स्वतःला हसवा.एकटे असताना मुद्दाम शिट्टी वाजवा किंवा गाणे म्हणा.मग आपोआपच तुम्हाला आनंद होईल.तुम्ही स्वतःला आनंदी मानू लागलात तर नेमकी हीच गोष्ट तुम्हाला अधिक आनंदी करेल.प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व तत्त्ववेत्ता विल्यम जेम्स म्हणतो…। 


तो काय म्हणतो ते वाचू पुढील भागात,याच ठिकाणी अगदी न चुकता… तोपर्यंत हसून धन्यवाद व आभार… विजय गायकवाड..!

१/९/२४

संस्कृती विध्वंसक सायरस / Culture Destroyer Cyrus

ज्या राष्ट्रांनी ज्ञानदेवांची,धर्म-प्रेषितांची थोर विभूती म्हणून,हेच खरे महावीर म्हणून पूजा केली अशा राष्ट्रांचे आपण धावते दर्शन घेतले.आता आपण अशा एका देशाकडे वळू या,की जेथे योद्धा म्हणजेच परमश्रेष्ठ मनुष्य मानला जाई,जेथे विषयलंपटता,पशुता व स्वार्थ हेच परमोच्च सद्गुण मानवी सद्‌गुण मानले जात. हिंदुस्थान व चीन यांना इतर आशियापासून अलग करणाऱ्या पर्वतांना ओलांडून आपण पलीकडे जाऊ या.आपण पश्चिमेकडे जाऊ या. ते पहा इराणचे मैदान.आपण मागे पाहिले आहे, की काही आर्यशाखा येथे वसाहती करून राहिल्या होत्या.या सर्व शाखांना 'मेडीज' किंवा 'पर्शियन' असे संबोधण्यात येते.हे अर्धवट जंगली,साहसी,रक्ततृषार्त असे लोक होते. 


पायांपासून डोक्यापर्यंत ते कातड्यांचा पोशाख करीत,

अती ओबडधोबड असे अन्न खात.दोनच गोष्टी ते शिकत.घोड्यांवर बसणे व लढणे, शांततेने शेती किंवा व्यापार करणे ही गोष्ट त्यांना कमीपणाची वाटे.त्यांना ज्या गोष्टीची जरूर वाटे, ती ते खुशाल लुटीत.

स्वतःला लागणाऱ्या वस्तू जे विकत घेत,त्यांना ते दुबळे म्हणून संबोधित;बावळट म्हणून ते त्यांचा उपहास करीत.सर्वत्र लूटमार करीत ते दौडू लागले.

ठायीठायी त्यांनी पुरे-पट्टणे धुळीस मिळविली.सारे आशिया खंड उध्वस्त व दग्ध नगरांच्या धुळीने व राखेने भरून गेले.आतापर्यंत एवढे मोठे साम्राज्य कोणी मिळविले नव्हते,अशी शेखी ते मारू लागले.

प्रचंड साम्राज्य बांधणारे मेडीज हे पहिले होत.त्याचे अनुकरण पर्शियाने केले.खि.पू.६०६ मध्ये मेडीज लोकांनी निनवी शहर घेतले. असीरियन लोकांची सत्ता त्यांनी कायमची नष्ट केली.भूतलावरून त्यांनी त्यांचे उच्चाटन केले. त्यानंतर छप्पन वर्षांनी सम्राट सायरस पुढे आला.सायरसने मेडिजी लोकांच्या वैभवाचा बुडबुडा फोडला.पर्शियाच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षाच्या मोठ्या बुडबुड्याचा धक्का लागून मीडियन सत्तेचा बुडबुडा नष्ट झाला.ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकाच्या मध्याला ही गोष्ट झाली. यात शतकात चीनमध्ये आणि हिंदुस्थानात लाओत्से,कन्फ्युसियस व बुद्ध झाले.इतिहासाच्या ग्रंथातून या तीन शांती प्रधान महात्म्यांविषयी फारसे लिहिलेले नसते.कारण ते रणधुमाळी वाजवणारे नव्हते.ते स्वप्नसृष्टित रमणारे अवलिय होते प्रचंड सैन्य घेऊन त्यांनी कधी राष्ट्रावर स्वाऱ्या केल्या नाहीत.परंतु सायरस आदळआपट करणारा वीर होता.तो जागतिक साम्राज्याचा निर्माता होता.तो आपल्या पायांखाली सारे आशिया खंड तुडविणारा सेनानी होता.यासाठी मूर्ख इतिहासकारांनी त्याला 'मोठा' ही पदवी दिली आहे.थोर सम्राट,असे त्याला संबोधण्यात येते.सायरस मोठा होता.

परंतु कशात? तो अहंकाराने मोठा होता; कारस्थाने गाजविण्यात मोठा होता;भोगलालसेत मोठा होता.इतर कशातही तो मोठा नव्हता.सायरसच्या जन्माविषयी, त्याच्या आरंभीच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. पर्शियन दंतकथा सांगतात,की त्याच्या आईबापांस एक स्वप्न पडले.ते एक दुष्ट स्वप्न होते.ते स्वप्न सायरसविषयीचे होतेआईबापांनी भीतीने सायरसचा त्याग केला.त्याला त्यांनी रानावनात नेऊन सोडले.तिथे तो वास्तविक मरावयाचाच.परंतु एका कुत्रीने त्याला पाळले आणि अत्यंत आश्चर्यकारक रीतीने तो जगला, वाचला.

नंतर एका धनगराला तो आढळला.त्याने त्याला मुलगा म्हणून पाळले.तो मोठा झाला.पुढारीपणाचे गुण जन्मजातच त्याच्याजवळ होते.ते दिसून येऊ लागले.

पुढारी अर्थातच लोक समजतात,त्या अर्थान पुढारीपणाचे गुण म्हणजे पहिल्या नंबरचे दुष्ट असणे,गुंड असणे.

सायरसने स्वयंसेवकाचा संघ गोळा केला.आजोबा अस्त्यगस यांना त्याने पदच्युत केले,आणि मेडीज व पर्शिया यांचा तो राजा झाला.परंतु एवढ्याने त्याचे समाधान झाले नाही.सुखी व समाधानी अशा लहानशा राज्याचा राजा होऊन राहणे हे त्याला पुरेसे वाटेना.त्याची महत्त्वाकांक्षा अमर्याद होती.कॅन्सरच्या रोगाप्रमाणे,

काळपुळीप्रमाणे आपले साम्राज्य सर्व खंडभर पसरावे असे त्याला वाटत होते. अत्युष्ण कटिबंधापासून ते अती शीत कटिबंधापर्यंत आपले सम्राज्य पसरले पाहिजे असे त्याला वाटत होते,ते त्याला पर्शियाविषयी खूप प्रेम वाटत होते म्हणून नव्हे;पर्शियाचे नाव सर्वत्र व्हावे म्हणून नव्हे;

त्याला फक्त स्वतःविषयी प्रेम हाते.तो स्वतःचा पुजारी होता. त तृष्णांध होता,लालसोन्मत्त होता.सायरसने पर्शियाचे राज्य बळाकावले,त्याच्या आधी दहाच वर्षे क्रोशियस हा लीडियाचा राजा झाला होता. आशिया मायनरमधील ग्रीक वसाहतींच्या समुदायाला 'लीडिया' म्हणत.एजियन समुद्राच्या पूर्व बाजूस ह्या वसाहती पसरल्या होत्या.राजा क्रोशियस हा प्राचीन काळातील जणू कुबेर होता!प्राचीन काळातील जे.पी.मॉर्गन होता.स्वतःजवळच्या संपत्तीचा त्याला अत्यंत अभिमान होता.तो प्रत्येक देशातील यात्रेकरूंस बोलावी.हेतू हा,की त्यांनी आपल्या या संपत्तीची कीर्ती सर्वत्र न्यावी.तो त्या परदेशीय पाहुण्या समोर आपली सारी माणिकमोती,सारे जडजवाहीर मांडी आणि नंतर त्यांना विचारी, 


पृथ्वीवरील सर्वांहून सुखी प्राणी मी नाही का?" त्याच्या या अहंकारी प्रश्नाला ग्रीक तत्त्वज्ञानी सोलोन याने स्पष्ट उत्तर दिले होते,मनुष्य मेल्याशिवाय त्याला सुखी म्हणता येणार नाही. मनुष्य जन्मभर सुखी होता की दुःखी हे त्याच्या मरणकाळच्या स्थितीवरून कळते.जेव्हा सायरसने आपले दिग्विजय सुरू केले, तेव्हा क्रोशियसला मनात वाटले,की त्याच्याआधी आपणच दिग्विजयाची दौड मारावी म्हणून त्याने देवाला कौल लावून विचारले,इराणच्या सम्राटाबरोबर लढाई पुकारली तर ते शहाणपणाचे होईल की मूर्खपणाचे?परंतु देवाने नेहमीप्रमाणे दूयर्थी उत्तर दिले.देवाने सांगितले, जर तू सायरसच्याविरुद्ध जाशील तर मोठे साम्राज्य नष्ट करशील.'याचा अर्थ सायरसचे साम्राज्य नष्ट होईल किंवा स्वतः क्रोशियसच आपले साम्राज्य गमावील असा होतो.देवाने दिलेला निर्णय निर्दोष होता.या ना त्या बाजूने देवाचे म्हणणे खरेच होणार होते.देवाने दिलेला कौल नेहमीच खरा होत असतो.परंतु देवाने दिलेल्या उत्तराचा क्रोशियसने स्वतःला अनुकूल असा अर्थ लावला, क्रोशियसने असा अर्थ लावला,की,जर आपण सायरसशी लढाई केली,तर आपण विजयी होऊ व सायरसचे साम्राज्य रसातळास जाईल. 


समतोल विचारसरणीच्या व डोके शाबूत असलेल्या त्याच्या एका प्रधानाने युद्ध करू नका,असे सांगितले,

तो म्हणाला,युद्ध करून काहीही मिळणार नाही.उलट सारे गमावून बसाल.युद्ध ही भयंकर गोष्ट आहे,तशीच ती मूर्खपणाचीही आहे.युद्ध ही गोष्ट निसर्गाच्या

व्यवस्थेच्या विरुद्ध आहे.कारण युद्धामुळे बापांना मुलांची प्रेतक्रिया करावी लागते.वास्तविक मुलांनी वडिलांना मूठमाती द्यायची असते, परंतु युद्धामुळे हे असे विपरित प्रकार होतात.युद्ध ही अनैसर्गिक वस्तू आहे." परंतु क्रोशियसने तो उपदेश झिडकारला.त्याने सायरसवर स्वारी केली.त्याचा पराजय झाला. घाईघाईने तो आपल्या सार्डिस राजधानीस परत आला.परंतु सायरस पाठीवर होताच.त्याने सार्डिस शहराला वेढा घातला व फार त्रास न पडता ती राजधानी जिंकली.( मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी,मधुश्री पब्लिकेशन)


सायरसने क्रोशियसला कैद केले. आशियामायनरमधील ग्रीकांना शरण आणण्यासाठी हार्पागॉस (या नावाचा अर्थ 'लुटणारा' असा आहे.) नावाच्या आपल्या अधिकाऱ्यास मागे ठेवून सायरस पूर्वेस खाल्डिआकडे दिग्विजयार्थ निघाला.बांबिलोन ही खाल्डियाची राजधानी बाबिलोन अती सुंदर शहर होते.किती भव्य प्रासाद,किती उद्याने उपवने ! तेथील स्त्री-पुरुष अत्यंत सुसंस्कृत होते.लंडनच्या आकाराची पाच शहरे मावतील एवढा बाबिलोनचा विस्तार होता.आजच्या न्यूयॉर्कमधील सुधारणा व संस्कृती यांच्याशी शोभतील अशा तेथील सुधारणा व संस्कृती होत्या.बाबिलोनमध्ये न्यूयॉर्कपेक्षा धावपळ कमी असेल, गती, वेग जरा कमी असेल, परंतु सदभिरूची व सुसंस्कृतपणा यांत ते कमी नव्हते. ते शहर एका विस्तृत मैदानाच्या मध्यभागी वसलेले होते.शहराभोवती साठ मैल घेराच्या प्रचंड भिंती होत्या.त्या भिंतींना धातूंचे भक्कम दरवाजे होते.ते शहर चुना व पितळ यांच्या एखाद्या प्रचंड मनोऱ्याप्रमाणे आकाशात उंच गेले होते.शहरातील अत्यंत उंच अशा इमारतीहूनही उंच जागी शहरातील झुलत्या बागा होत्या. कृत्रिम बागांचे मजल्यावर मजले उभारण्यात आले होते.आधीचा राजा नेबुचद्रेझ्झर याने आकाशाला मिठी मारायला जाणारी अशी ती उद्यानांची इमारत उभारली होती.बागांचा फुलता-झुलता असा हा मनोरा मोठा अपूर्व होता.जणू फुललेल्या वृक्षवेलींचा घवघवीत असा प्रचंड पुष्पगुच्छ बाबिलोन शहर आकाशातील प्रभूच्या चरणी अर्पित होते.शहराच्या मध्य भागातून युफ्रेटिस नदी वाहात होती.तिच्यावर प्रचंड दगडी पूल होता.अफाट दळणवळणात व्यवस्था असावी म्हणून नदीखालूनही एक बोगदा होता.नदीच्या खालून व नदीच्या वरून असे हे रस्ते होते.नदीतीरावरच्या राजवाड्यात सुंदर ग्रंथालय होते.तिथे खाल्डियाचा ज्ञानोपासक राजा नबोनिडस आपल्या राष्ट्राच्या इतिहासाचा काळजीपूर्वक अभ्यास करीत बसे;आणि मातीच्या विटांवर तो लिहून ठेवीत असे.युद्धाच्या गोष्टींपासून त्याचे विचार दूर होते.सभोवतालचे राजे युद्ध व कारस्थाने करीत असताना राजा नबोनिडस ज्ञानोपासनेत रमला होता.आणि अकस्मात सायरस आला! प्रचंड वादळाप्रमाणे तो आला. त्याने शहरातील सैनिकांना व भटाभिक्षुकांना लाचलुचपती दिल्या.ते धर्माधिकारी लाचलुचपतीला बळी पडले.फितुरीस यश आले. लढाई शिवायच सायरस राजधानीच्या दरवाज्यातून आत आला.बाबिलोनिया जिंकून सायरसने इजिप्तकडे दृष्टी वळविली.पहिले पाऊल म्हणून त्याने बाबिलोनमधील ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये परत पाठविले.बाबिलोनमध्ये

जवळजवळ सत्तर वर्षे हे ज्यू कैदी म्हणून राहात होते.त्यांना सायरस जणू उद्धारकर्ता वाटला ! परंतु सायरसने ज्यूंना त्यांची मातृभूमी परत दिली,ती उदारपणाने व निरपेक्षपणाने दिली नव्हती.पर्शियाच्या साम्राज्यशाही धोरणातील तो एक भाग होता.

पॅलेस्टाईनमध्ये मित्रराष्ट्र असण्याची सायरसाला फार जरूर होती. 


कारण घुसण्याचा मागचा दरवाजा म्हणजे पॅलेस्टाईन.

सायरसच्या डोळ्यांसमोर आयुष्यभर एकच ध्येय होते.ते म्हणजे साम्राज्यनिर्मितीचे.ही एकच महत्त्वाकांक्षा त्याला होती.पर्शियन साम्राज्याच्या बाहेर सूर्य कोठे प्रकाशणार नाही.एवढे मोठे साम्राज्य त्याला स्थापावयाचे होते.


परंतु इजिप्त जिंकून घेण्यापूर्वीच सायरस मारला गेला.

एका युद्धात तो स्वतः जातीने लढत होता. आपला भव्य देह त्याने शत्रूच्या शस्त्रास्त्रांसमोर उभा केला आणि तो ठार झाला.प्रदेश,आणखी प्रदेश,असे करणाऱ्या सायरसला शेवटी योग्य ते उत्तर मिळाले.त्याच्या तृप्त न होणाऱ्या तृष्णेला अंतिम जवाब मिळाला.सहा फूट लांबीच्या त्याच्या देहाला भरपूर पुरेल असा जमिनीचा तुकडा मिळाला.मर्त्यलोकींचा पुरेपूर वाटा त्याला लाभला.


सायरसने आरंभलेले दिग्विजयाचे कार्य त्याच्या मुलाने कंबायसिसने पुढे चालविले आणि कंबायसिसचे काम पुढे डरायसने हाती घेतले. कंबायसिसने इजिप्त उद्ध्वस्त केला,डरायसने बाबिलोनचा पुरा विध्वंस केला.एक हजार वर्षांची पुंजीभूत होत आलेली संस्कृती त्यांनी धुळीस मिळविली.त्या संस्कृतीला मागे खेचून पुन्हा आपल्या रानटीपणाशी त्यांनी ती आणून ठेवली.त्यांना यापेक्षा अधिक चांगले काही माहीत नव्हते.कारण ते वेडेपीर होते.सारे लष्करी आक्रमक-सायरस,अलेक्झांडर,हॅनिबॉल, सीझर, नेपोलियन सारे एकजात वेडेपीर होते, मूर्खशिरोमणी होते,ज्याचे म्हणून डोके ठिकाणावर असेल,तो कधीही आपल्याच मानवबंधूच्या कत्तली करून आपली कीर्ती वाढवावी अशी इच्छा करणारा नाही;रक्ताचे पाट वाहवून तो स्वतःचा गौरव वाढवू इच्छिणार नाही. आपले हे जग अद्याप अर्धवट रानटी स्थितीतच आहे.

अजूनही,दिग्विजय करू पाहणाऱ्या या भूतकाळातील खाटकांची आपण पूजा करीत असतो.मागील जेत्यांना आपण भजतो व आजचे जे जेते आहेत त्यांना तरुणांच्या डोळ्यांसमोर अनुकरणीय आदर्श म्हणून आपण ठेवतो. 


आपण जेव्हा खरोखर सुधारू,सुसंस्कृत होऊ,तेव्हा जग जिंकू पाहणाऱ्या या साऱ्या तलवारबहाद्दरांना आपण वेड्यांच्या दवाखान्यात ठेवू अत्याचारी अशा माथेफिरू वेड्यांच्यामध्ये त्यांना ठेवू,कारण या संहारकारी सैतानांचे खरे स्थान तेच होय.


ज्याने साम्राज्य मिळवले पण संस्कृती विध्वंसली असा सायरस…