* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

५/१०/२४

रात्र झाडावर / Night on the tree

०३.१०.२४ या लेखातील पुढील शेवटचा भाग..।


या ठिकाणी कातळ फारच निसरडा होता आणि अजून वर जाण्यात काही अर्थ नव्हता.त्यामुळे मी उंची कायम ठेवत डोंगराच्या कडेकडेने डावीकडे जायला सुरूवात केली.जवळजवळ अर्धा मैल प्रचंड फर वृक्षांच्या जंगलातून चालल्यावर मी एका गवताळ उतारावर येऊन पोचलो.हा गवताळ पट्टा पहाडाच्या अगदी माथ्यावरून चालू होऊन खाली जंगलात घुसला होता.जंगलातून बाहेर पडून गवताळ पट्ट्याकडे येत असतानाच मला एक जनावर एका छोट्याशा उंचवट्यावर उभं असलेलं पलीकडच्या बाजूला दिसलं.पुस्तकातल्या चित्रांवरून मला कळलं की हेच ते काश्मिरी हरीण आहे व जेव्हा त्याने डोकं वर केलं तेव्हा कळलं ती मादी आहे! गवताळ पट्ट्याच्या माझ्या बाजूला जंगलाच्या कडेपासून तीस यार्डावर एक मोठा चार फूट उंचीचा खडक वर आला होता.चरताना तिने डोकं खाली घातल्यावर एक दोन ढांगा टाकायच्या आणि डोकं वर केल्यावर स्तब्ध मुरून बसायचं असं करत करत मी ते तीस यार्ड ओलांडले आणि खडकाच्या आडोशाला लपलो. 


त्या मादीकडे बहुतेक पहारा देण्याचं काम

असणार आणि ज्या पद्धतीने ती डोकं उंचावल्यावर सारखी सारखी उजवीकडे बघत होती त्यावरून मला कळलं की तिचे जोडीदारही तिथेच आहेत.तिला न कळता गवतातून तिच्या फार जवळ जाणं शक्य नव्हतं. परत जंगलात शिरून वरच्या बाजूने वळसा घालून पलीकडे जाता आलं असतं पण वारा वरून खाली वाहत असल्याने तिला ताबडतोब गंध लागला असता.तिसरा पर्याय असा होता की जंगलात शिरून खाली उतरायचं व लांब वळसा घालून तिच्या जवळच्या जंगलातल्या कडेला जायचं पण याला फारच वेळ लागला असता आणि मला खूप उभा चढ चढायला लागला असता.मग शेवटी मी ठरवलं की आहे तिथेच थांबायचं आणि बिबळ्याच्या कॉलला ही हरणं चितळ व सांबरांप्रमाणेच प्रतिक्रिया देतात का ते बघायचं. 


त्या दिवसभरात मला एक दोन ठिकाणी बिबळ्याचे स्क्रेपमाक्स (जमीन खरवडल्याच्या खुणा) दिसले होते त्यामुळे त्या भागात बिबळ्यांचा वावर होता हे निश्चित होतं.फक्त एक डोळा खडकाच्या बाहेर काढून मी ती मादी चरत असेपर्यंत थांबलो व नंतर बिबळ्याचा कॉल दिला ! माझ्या कॉलच्या पहिल्या आवाजासरशी ती मादी सर्रकन वळली व माझ्या दिशेला तोंड करून पुढच्या पायाचे खूर जमीनीवर आपटू लागली.कळपातल्या इतर सभासदां -

साठी हा सावधानतेचा इशारा होता.पण ती मादी जोपर्यंत कॉल देत नाही तोपर्यंत ते हालचाल करणार नव्हते व मला तर त्यांना पाहायचं होतं.त्या मादीलाही जोपर्यंत बिबळ्या दिसणार नाही तोपर्यंत ती कॉल देणार नव्हती.मी तपकीरी रंगाच्या ट्वीड कोट घातला होता.माझा डावा खांदा खडकाच्या थोड्या बाहेर काढून मी तो खालीवर हलवायला सुरुवात केली.ही छोटीशी हालचालही त्या मादीच्या नजरेतून सुटली नाही. एक दोन पावलं पुढे येत तिने कॉल द्यायला सुरुवात केली.ज्या धोक्याच्या जाणिवेमुळे तिने तिच्या सहकाऱ्यांना इशारा दिला होता तो धोका आता तिच्या नजरेसमोर होता आणि आता त्यांना त्यांची जागा सोडून तिच्याजवळ जायला हरकत नव्हती.सर्वात प्रथम एक पिल्लू त्या हिमाच्छादित जमीनीवरून उड्या मारत तिच्याजवळ येऊन उभं राहिलं.त्यानंतर तीन नर आणि शेवटी एक वयस्क मादी असा सहा जणांचा संपूर्ण कळप तीस यार्डावर माझ्यासमोर उभा होता.मादी अजूनही कॉल देतच होती आणि इतर सर्वजण कान ताठ करून आवाज व वाऱ्याची दिशा अजमावण्यासाठी मागे पुढे करत स्तब्ध उभं राहून माझ्या मागच्या जंगलात एकटक पहात होते.वितळणाऱ्या बर्फावर उभा असल्याने माझी बैठक सुखावह नव्हती आणि फार वेळ तिथे तसाच राहिलो असतो तर थंडी भरण्याची शक्यता होती.मी सुप्रसिद्ध काश्मिरी हरणांचा प्रातिनिधीक कळप पाह्यला होता आणि त्यातल्या मादीचा अलार्म कॉलही ऐकला होता पण मला अजून एक गोष्ट ऐकायची होती, ती म्हणजे नराचा कॉल


म्हणून मी परत एकदा खांद्याचा थोडा भाग बाहेर काढून वरखाली हलवला.आता मात्र मला नर, माद्या व पाडस या सर्वांचे वेगवेगळ्या पट्टीतले कॉल्स ऐकण्याचं समाधान मिळालं! माझ्याकडच्या परमीटप्रमाणे मला एका नराची शिकार करायला परवानगी होती आणि त्यातल्या एका नराची शिंग तर विक्रमी आकाराची होती पण मला आज असं वाटलं की सध्यातरी मला 'टॉफी'ची काही गरज नाहीये आणि तसंही नराचे मास जरा चिवटच असतं त्यामुळे मी रायफल वापरण्याऐवजी एकदम उठून उभा राह्यलो व आश्चर्यचकीत झालेली ती हरणं क्षणार्धात नाहीशी झाली.लगेचच मला त्या गवताळ उताराच्या पलीकडच्या अंगलातल्या झुडुपांतून ती जातानाची खसपस ऐकायला मिळाली.


आता बंगल्यावर परतण्याची वेळ झाली होती. गवताळ उतारावरून सरळ खाली उतरायचं व तिथून जरासा विरळ जंगलातून वाट काढत पायथा गाठायचं असं मी ठरवलं.उतार फार जोराचा नव्हता त्यामुळे पावलं जरा काळजीपूर्वक टाकली तर एका धावेत बरंच खाली जाता आलं असतं.शंभर यार्ड रूंदीच्या त्या गवताळ पट्ट्यावरून धावत धावत जवळजवळ सहाशे यार्ड गेल्यावर मला समोर पांढुरकं काहीतरी दिसलं.ते गवताळ उताराच्या डाव्या बाजूला जंगलाच्या कडेलाच एका छोट्या खडकावर उभं होतं आणि माझ्यापासून तीनशे यार्ड खाली होतं.पहिल्याप्रथम मला वाटलं की तो जंगलात हरवलेला एखादा बोकड असावा. मागच्या पंधरा दिवसांत आम्हाला मांसाहारी जेवण मिळालं नव्हतं आणि मी तर फॉर्टस्कला सांगितलं होतं की येताना मी काहीतरी शिकार आणीन.बोकडाने मला पाहिलं होतं आणि जर मी त्याच्या मनातला संशय दूर करू शकलो तर कदाचित तो मला अगदी जवळून जाऊ देण्याची शक्यता होती आणि हे करताना त्याचा पाय पकडता आला असता.त्यामुळे उतरताना मी थोड़ी डावी दिशा पकडली व नजरेच्या कडेलाच त्या प्राण्याला ठेवलं.जर तो त्याच जागेवर उभा राहिला तर या आख्ख्या पहाडावर त्याला पकडण्यासाठी दुसरी योग्य जागा मिळाली नसती.कारण त्या पाच फूट उंच खडकाखाली एकदम तीव्र उतार होता व त्याला हालचाल करायला जागाच नव्हती.त्याच्याकडे सरळ न बघता वेग कायम ठेवत मी खडक ओलांडला आणि ओलांडत असतानाच त्याचे पुढचे पाय पकडण्यासाठी हात आडवा फिरवला. शिंकेसारख्या आवाज काढत तो थोडा मागे सरकला आणि माझ्या पकडीतून सुटका करून घेण्यात यशस्वी झाला.खडक ओलांडल्यावर मी थोडा थांबलो आणि वळून बघितलं तर मला

आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.मी ज्याला बोकड समजत होतो तो चक्क 'अल्बिनो' कस्तुरी मृग होता.माझ्यापासून फक्त दहा फूटांवर त्याच्या जागी ठाम पाय रोवून शिंकल्यासारख्या आवाजात माझा निषेध करत होता!मला चकवल्याबद्दल तो स्वतःची पाठ थोपटून घेत असावा.काही दिवसानंतर ही घटना मी काश्मिरच्या गेम वॉर्डनला सांगितली.


तेव्हा त्याने त्या कस्तुरीमृगाची शिकार न केल्याबद्दल हळहळ व्यक्त केली व मला त्या जागेचा अचूक ठावठिकाणा विचारायला लागला.पण माझी एखाद्या जागेबद्दलची स्मरणशक्ती व वर्णन फारसं चांगलं नसल्यामुळे मला नाही वाटत की तो कस्तुरीमृग कुठल्यातरी संग्रहालयाची शोभा वाढवत असेल.


नर बिबळ्याला त्याच्या इलाक्यात दुसऱ्या बिबळ्याचं अतिक्रमण झालेलं अजिबात खपत नाही. हा... आपला नरभक्षक बिबळ्या पाचशे चौ.मैल इतक्या मोठ्या प्रदेशात वावरत होता आणि त्यात कित्येक इतरही बिबळे असतील हे कबूल, पण या विशिष्ट भागात तो गेले कित्येक दिवस होता व कदाचित तो त्या भागाला स्वतःचा इलाका समजत असण्याची शक्यता होतीच.त्यात परत बिबळ्यांच्या समागमाचा हंगाम नुकताच संपला होता.त्यामुळे माझ्या कॉलला तो जोडीदाराच्या शोधात असलेल्या मादीचा कॉल समजण्याचीही शक्यता होती म्हणूनच चांगला अंधार पडेपर्यंत मी थांबलो व नंतर मी बिबळ्याचा कॉल दिला... आणि काय आश्चर्य... जवळजवळ चारशे यार्डावर जरासं खालून पण उजव्या बाजूने माझ्या कॉलला प्रतिसाद दिला गेला.आमच्या दोघांच्यामध्ये विखुरलेले दगड, खडक व काटेरी रान होतं त्यामुळे तो माझ्याकडे सरळ रेषेत येणार नाही तर वरून वळसा घालून येणार असा माझा अंदाज होता.त्याने परत कॉल दिला तेव्हा माझा अंदाज खरा असल्याचं मला लक्षात आलं.पाच मिनिटानंतर माझ्या झाडाखालून डोंगराच्या कडेने जाणाऱ्या पायवाटेवर साधारण दोनशे यार्डावर मी त्या कॉलचं स्थान निश्चित केलं.त्याला दिशा देण्यासाठी मी परत एकदा कॉल दिला.त्यानंतर तीन चार मिनिटांनी त्याच दिशेकडून पण शंभर यार्ड जवळून त्याचा प्रतिसाद आला.


पायवाटेवरच्या वळणाच्या थोडं पलीकडे व माझ्यापासून फक्त साठ यार्डावर आल्यावर त्याने परत एक कॉल दिला.पण यावेळी मात्र डोंगराच्या वरच्या दिशेने त्याला प्रतिसाद दिला गेला! ही गुंतागुंत जेवढी अनपेक्षित होती तेवढीच दुर्दैवी होती.कारण आता तो बिबळ्या माझ्या खूपच जवळ आला होता आणि प्रथम माझा कॉल व आता थोडं वर त्या मादीचा कॉल ऐकून त्याला असं वाटलं असणार की लाजरी मादी थोडी दूर डोंगरावर जाऊन त्याला तिथे बोलावते आहे.तरीही तो ज्या वाटेवरून येत होता तसाच येत राहण्याचीही थोडीशी शक्यता होतीच.

किमान वरून येणाऱ्या वाटेला ती जिथे मिळत होती तिथपर्यंत तरी! तसं झालं तर त्याला बोकड दिसणार होता आणि त्याला त्याचा काही उपयोग नसतानाही तो त्याला मारण्याची शक्यता होती.पण आज बोकडाचं नशीब जोरावर होतं आणि माझं नव्हतं.कारण तो त्या दोन वाटांमधला कर्ण पकडून वरच्या वाटेला लागला.त्याला मी पुढचं ऐकलं तेव्हा तो माझ्यापासून शंभर यार्ड दूर गेला होता,म्हणजेच त्याच्या प्रेयसीच्या जवळ शंभर यार्ड! त्या दोघांचे सादप्रतिसाद एकमेकांच्या जवळ येत गेले आणि शेवटी थांबले.बराच वेळ शांततेत गेल्यानंतर जिथे गवत संपत होतं व दाट जंगल सुरू होत होतं त्या कडेवरून त्या दोघांची गुरगुर मला ऐकायला आली.आज हा बिबळ्या बऱ्याच बाबतीत सुदैवी ठरत होता कारण आता अंधार गडद झाला होता.खरंतर बिबळे हे समागमाच्या वेळी शिकार करायला सोपे असतात.


वाघांचंही तसंच आहे.पण शिकाऱ्याची मानसिक तयारी मात्र पाहिजे.नर वाघ त्यावेळेला फार धसमुसळे असतात व त्यांना त्यांचे दात व नख्या किती धारदार आहेत याचं भान त्यांना राहत नाही आणि त्यामुळे वाघीणी या काळात फारच संवेदनाशील व चिडचिड्या झालेल्या असतात.


आज तर हा बिबळ्या जिवानिशी निसटला होता पण आज ना उद्या तो माझ्या बंदुकीच्या टप्प्यात गवसणारंच होता कारण त्याचे दिवस भरत आले होते... पण क्षणभर मला असं वाटलं की माझेच दिवस भरलेत की काय ? कारण कोणतीही पूर्वसूचना न देता वाऱ्याचा एक झंझावात एकाएकी माझ्या झाडावर आदळला.मला तर वाटलं की ते झाड परत पूर्वीसारखं उभं राहूच शकणार नाही,पण वाऱ्याचा रेटा कमी झाला व आमची स्थिती पहिल्यासारखी झाली.पुढचा धोका ओळखून मी चटकन रायफल एका फांदीला बांधली आणि दोन्ही हात मोकळे ठेवले. त्या झाडाने आजपर्यंत कित्येक वादळं पचवली असणार,पण एकट्याने... स्वतःच्या वजनात एका माणसाची भर पडून वाऱ्याचा दाब वाढलेला असताना नव्हे!रायफल नीट बांधल्यावर मी एकापाठोपाठ एकेका फांदीच्या टोकावर चढून गेलो व हाताला लागतील ते पाईन कोन्स व डहाळ्या तोडून टाकल्या.कदाचित माझा कल्पनाविलास असेल,पण मी झाडाला असं 'हलकं' केल्यानंतर परिस्थिती सुधारली आणि ते झाड कमी हेलकावे खायला लागलं.सुदैवाने झाड जरा तरुण व चिवट असावं आणि त्याची मुळंही खोलवर गेलेली असणार.त्या वादळात एखाद्या गवताच्या पात्याप्रमाणे इकडून तिकडे हालल्यानंतरही त्याने टिकाव धरला आणि शेवटी तासाभरानंतर वादळ शमलं.आता बिबळ्या येण्याची संधी हुकली होती.त्यामुळे मी झकासपैकी एक सिगरेट ओढली व त्या बोकडाला सोबत करण्यासाठी स्वप्नांच्या राज्यात प्रवेश केला.सकाळी झाडाखालून आलेल्या हाकेसरशी मला त्या राज्यातून जमीनीपासून पन्नास फूटपर्यंत आणलं.खाली पाह्यलं तर कालची दोन माणसं जोडीला दोन जवान पोरांना घेऊन आली होती.


मी जागा झाल्याचं पाहून त्यांनी खालूनच मला विचारलं की रात्री मला बिबळ्याचे कॉल्स ऐकायला आले का? आणि झाडाची ही अवस्था कशी झाली? माझ्या उत्तराने त्यांची करमणूक झाली असणार... मी त्यांना म्हणालो की रात्री माझ्या त्या बिबळ्याशी बराच वेळ गप्पागोष्टी झाल्या व नंतर काहीच काम न उरल्याने मी झाडाच्या बऱ्याच फांद्या तोडून टाईमपास केला.


मग मी त्यांना विचारलं की काल रात्री जोराचा वारा आल्याचं त्यांना जाणवलं का ? तेव्हा एक पोरगा म्हणाला,

"जोराचा वारा? साहेब असलं वादळ आम्ही कधी पाह्यलं नव्हतं,माझ्या तर घरांची छपरंच उडाली! त्यावर त्याचा जोडीदार म्हणतो,"त्यात काय एवढं साहेब ? शेरसिंगला त्याची झोपडी पाडून नवी बांधायचीच होती. उलट या वादळामुळे त्याचा झोपडी पाडण्याचा खर्च वाचलाय.


३/१०/२४

झाडावरची रात्र / Night in the tree

पाईनच्या वृक्षावरची रात्र…


दुसऱ्या दिवशी इबॉटसन पौरीला परतला. तिसऱ्या दिवशी सकाळी मी रुद्रप्रयागच्या पूर्वेकडच्या काही गावांना भेट देत असताना एका गावात जाणाऱ्या पायवाटेवर मला बिबळ्याचे पगमार्कस मिळाले.रात्री त्याच गावातल्या एका घरात घुसण्याचा त्याने प्रयत्न केला होता.त्या पगमार्कसचा माग काढत दोन मैल गेल्यावर मी काही दिवसांपूर्वी इबॉटसन बरोबर बोकड बांधून बसलो होतो त्या ठिकाणावर आलो.अगदी सकाळची वेळ असल्याने मला वेळ भरपूर होता व तिथल्या ओबडधोबड जमीनीवरच्या एखाद्या खडकावर तो बिबळ्या ऊन खात बसलेला असण्याची शक्यता होती.त्यामुळे मी एका थोड्या पुढे आलेल्या शिळेवर आजूबाजूला दिसणाऱ्या विस्तीर्ण टापूवर नजर ठेवून पालथा पडून राहिलो.

आदल्या दिवशी थोडा पाऊस पडून गेल्याने वातावरणातला सगळा धूसरपणा निघून गेला होता आणि खूप लांबवरचं स्वच्छ व स्पष्ट दिसत होतं.जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी तेवीस हजार फूट उंच पहाडावर अप्रतिम निसर्गाचं सौंदर्य जसं दिसू शकेल तसंच इथूनही दिसत होतं.माझ्या बरोबर समोर खालच्या बाजूला अलकनंदाचं निसर्गरम्य खोरं दिसत होतं.त्याच्यामधून ती नदी नागमोडी वळणं घेत एखाद्या चंदेरी रिबीनसारखी सळसळत जात होती.


अलकनंदाच्या पलीकडे इकडे तिकडे विखुरलेली छोटी छोटी गावं व त्यातली रस्त्याच्या दोन्ही अंगाला असलेली पाटीच्या छपरांची घरं दिसत होती.काही घरं फक्त गवती छपरांची होती.खरंतर ह्या इमारती म्हणजे त्यांची रांगेत बांधलेली घरंच आहेत.हा पहाडी इलाका असल्याने लागवडी योग्य जमीन एकतर कमी असते व त्याचा इंचन् इंच इथल्या गरीब जनतेला मूल्यवान असल्याने जागेची बचत करण्यासाठी अशी एकमेकांना खेटून घरं बांधली जातात.डोंगररांगांच्या वर मोठमोठे हिमकडे आहेत आणि त्यातून हिवाळ्यात किंवा वसंत ऋतूच्या सुरुवातीला अवाढव्य ॲव्हेलँचीस कोसळतात.त्याहीपलीकडे आकाशाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या पांढऱ्या शुभ्र पुठ्यातून कापून काढल्यासारख्या हिमालयाच्या रांगा दिसतात. यापेक्षा सुंदर दूश्याची कल्पनाही करता येणार नाही.पण सूर्य जसजसा पश्चिमेला पहाडा पलीकडे जाईल तसतशी वाढत जाणारी दहशत... प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कल्पनाच करता येणार नाही अशी जबरदस्त दहशत,या संपूर्ण इलाक्यावर आपली पक्कड घेणार होती.गेली आठ वर्षे अव्याहतपणे हेच चालू होतं.


मी खडकावर बसून तासभर झाला असेल तशी दोन माणसं डोंगरावरच्या त्यांच्या गावातून खाली बाजाराच्या दिशेने उतरताना मला दिसली.मी कालच यांच्या गावाला भेट दिली होती.मला पाहिल्यावर ती थांबली आणि सांगितलं की,सूर्य उगवण्याच्या जरासं अगोदर त्यांनी याच दिशेकडून बिबळ्याचे कॉल्स ऐकले होते.एखादा बोकड बांधून नशीब अजमावावं का नाही याबद्दल आम्ही जरा चर्चा केली.माझे सर्व बोकड वेळोवेळी बिबळ्याने उचलल्याने याक्षणी माझ्याकडे बोकड नव्हता तेव्हा ते म्हणाले की आम्ही बोकड पैदा करतो आणि सूर्यास्ताच्या अगोदर दोन तास याच ठिकाणी भेटतो.


(मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे,आरती प्रकाशन)


माणसं गेल्यावर मी जवळपास बसायला एखादं योग्य झाड आहे का ते बघितलं.या सर्व भागात एक पाईनचं झाड एकटंच उभं होतं.ती माणसं ज्या वाटेने गावाकडून आली होती त्या वाटेवरच डोंगराच्या कडेला ते उभं होतं. त्याच्याबरोबर खालून आणखी एक वाट निघून डोंगराच्या अंगावरून त्या ओबडधोबड खणलेल्या भागाच्या कडेने जात,मी जिकडे होतो तिकडे येत होती. झाडावरून खूप विस्तीर्ण प्रदेश दिसणार होता. पण ते चढायला फारच अवघड होतं आणि त्याची पानंही दाट नव्हती.पण तेवढं एकच झाड असल्याने माझ्याकडे पर्याय काहीच नव्हता त्यामुळे मी त्याच झाडावर बसण्याचा निर्णय घेतला.मी बंगल्यावर जाऊन चार वाजता परत आलो तेव्हा ती माणसं एका बोकडाला घेऊन तिथे उभीच होती.मी कुठे बसणार आहे या त्यांच्या प्रश्नावर जेव्हा मी त्या झाडाकडे बोट दाखवलं तेव्हा ते हसायलाच लागले.त्यांचं म्हणणं होतं की दोराच्या शिडीशिवाय त्या झाडावर चढणं अशक्य आहे आणि जरी मी ते जमवलं तरी बिबळ्यालाही ते शक्य असल्यानं मला धोका होताच.गढवालमध्ये झाडावर चढता येणारे दोनच गोरे लोक होते (इबॉटसन त्यापैकी एक) व त्या दोघांनाही लहान असताना पक्ष्यांची अंडी जमवण्याचा शौक होता. 'waiting untill you come to a bridge before crossing it' या इंग्लिश म्हणीचं हिंदीत भाषांतर करता येणं शक्य नसल्याने मी त्यांचा पहिला प्रश्न अनुत्तरीतच ठेवला.दुसऱ्या शंकेला मात्र फक्त रायफलकडे बोट दाखवून उत्तर दिलं.


जवळजवळ वीस फुटापर्यंत त्या झाडाला फांद्याच नसल्याने त्या झाडावर चढणं खरोखरच अवघड होतं पण एकदा तिथे पोचलं की मग मात्र पुढे सर्वच सोपं होतं.

माझ्याकडे एक लांब दोर होता.त्याच्या एका टोकाला त्या माणसांनी माझी रायफल बांधल्यावर दुसऱ्या टोकाकडून मी वर ओढून घेतली आणि नंतर मी अगदी शेंड्याला जाऊन बसलो.या ठिकाणी मात्र पाईनच्या सुयांसारख्या पानांच्या झुपक्यांमुळे मला लपायला बऱ्यापैकी जागा मिळाली.हा बोकड चांगला 'आवाजी' आहे असं आश्वासन मला त्या माणसांनी दिलं आणि झाडाखालच्या जमीनीवर आलेल्या मुळांना त्याला बांधल्यावर ती माणसं निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी ती परत येणार होती. माणसं दृष्टिआड होईपर्यंत तो बोकड त्या दिशेला पाहत होता व त्यानंतर त्याने झाडाखालचं गवत खायला सुरुवात केली.या क्षणापर्यंत तो एकदाही ओरडला नव्हता याची मला तेव्हा तरी काळजी वाटली नाही कारण थोड्या वेळाने त्याला एकटेपणाची जाणीव होईल आणि तो त्याचं काम चोख बजावेल असं मला वाटलं.जर तसं झालं तर मात्र माझ्या उंचावरच्या जागेवरून मला चांगली संधी मिळणार होती.मी जेव्हा झाडावर जागा घेतली तेव्हा हिमाच्छादित शिखरांच्या सावल्या अलकनंदापर्यंत पोचल्या होत्या.


हळूहळू त्या डोंगरावरून सरकत सरकत माझं झाड ओलांडून गेल्या व शेवटी सर्व पहाडांची शिखरं लाल रंगात न्हाऊन निघाली.ही लाल रंगाची चमक कमी होऊ लागली आणि जिकडे जिकडे सूर्याच्या क्षितिज समांतर येणाऱ्या किरणांनी पहाडांना स्पर्श केला होता,तिथून ते प्रभा फाकू लागले आणि रंगीबेरंगी ढगांमध्ये त्यांच्या सुंदर रंगांनी बंदिस्त झाले.ज्यांना ज्यांना सूर्यास्ताची मजा घेण्याची नजर आहे (सांगताना वाईट वाटतं पण असे लोक फार थोडे आहेत) त्यांना त्यांच्या त्यांच्या भागातला सूर्यास्त हा सर्वोत्कृष्ट वाटतो.मीही त्याला अपवाद नाही कारण मलाही असंच वाटतं की आमच्या गढवाल-कुमाऊंमधल्या सूर्यास्ताला जगात तोड नाही.त्यानंतर विचाराल तर उत्तर टांगानिका मधल्या सूर्यास्ताला मी दुसरा नंबर देईन.तिथे वातावरणातल्या काहीतरी वैशिष्ट्यांमुळे किलीमांजारोची हिमाच्छादित शिखरं आणि त्यावर नेहमीच तरंगणारे ढग सूर्यास्तात अक्षरशः वितळलेल्या सोन्यासारखे दिसतात.

आमच्या हिमालयामधले सूर्यास्त बहतेक करून लालसर गुलाबी किंवा सोनेरी असतात.आज पाईनच्या झाडावरून मी जो सूर्यास्त पाहत होतो वा गुलाबी रंगाचा होता. कापलेल्या पुठ्यांसारख्या दिसणाऱ्या पहाडांच्या खोलगट दऱ्यातून निघालेले पांढरे किरण गुलाबी ढगांमधून आरपार जाऊन पुढे मोठे मोठे होत आकाशात विलीन होत होते.बऱ्याच माणसांप्रमाणे त्या बोकडाला देखील सूर्यास्तामध्ये वगैरे स्वारस्य नसावं ! तोंड पोचेल तिथपर्यंत गवत खाल्ल्यानंतर त्याने खुराने उकरून स्वतःसाठी थोडा खळगा तयार केला, खाली बसला,अंग दुमडलं व गाढ झोपी गेला!आता मात्र गंभीरपणे विचार करायची वेळ आली होती.माझ्या झाडाखाली निवांत झोपलेल्या बोकडाकडून मी अपेक्षा केली होती की तो ओरडून बिबळ्याला आकर्षित करेल,पण मी त्याला पाहिल्यापासनं त्याने गवत खाताना सोडलं तर एकदाही तोंड उघडलं नव्हतं आणि आता इतका सुंदर उबदार बिछाना मिळाल्यावर तो कदाचित रात्रभर झोपून राहण्याची शक्यता होती. आता रात्री झाडावरून उतरून चालत बंगल्यावर जाणे म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांमध्ये जाणूनबुजून अजून एकाची भर टाकण्यासारखं होतं; आणि तसं पाहिलं तर समोर भक्ष्य नसताना सगळ्याच जागा सारख्या होत्या म्हणून मी ठरवलं की आहे तिथंच थांबायचं आणि बिबळ्यालाच स्वतःकडे बोलवायचं !

मला जर कोणी विचारलं की इतकी वर्ष जंगलात घालवल्यानंतर मला सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट कोणती तर मी सांगेन की जंगलवासींच्या भाषा व त्यांच्या सवयी शिकताना मला सर्वात जास्त आनंद मिळाला आहे.

जंगलांमध्ये एकच अशी भाषा नसते,प्रत्येक प्रजातीला स्वतःची भाषा आहे आणि जरी काही प्रजातींची शब्दसामग्री मर्यादित असली तरी (साळींदर किंवा गिधाडं) एकाची भाषा दुसऱ्याला समजू शकते.माणसाचं स्वरयंत्र इतर जनावरांपेक्षा लवचिक असतं (रॅकेट टेल्ड ड्रोंगोसारखे काही पक्षी यालाही अपवाद आहेतच) त्यामुळे तो बऱ्याच पशुपक्ष्यांशी संवाद साधू शकतो. जंगलवासींची भाषा बोलता येणे ही गोष्ट तुमच्या आनंदात शंभरपटींनी भर टाकतेच पण जर ठरवलं तर त्याचा चांगला उपयोगही करून घेता येतो.एक उदाहरण पुरेसं होईल...अगदी आता आता पर्यंत ईटन येथे हाऊसमास्टर असलेला लिओनेल फोर्टेस्क व मी एकदा फोटोग्राफी आणि शिकारसहलीसाठी १९१८ च्या सुमारास हिमालयाच्या सफरीवर गेलो होतो.संध्याकाळी आम्ही एका उंच पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या फॉरेस्ट बंगल्यामध्ये पोचलो.आम्हाला "Vale of Kashmeer" या ठिकाणी पोचायचं होतं. 


ते ठिकाण या उंच पहाडाच्या पलीकडे होतं. आम्ही खूप दिवस अवघड वाट तुडवली होती आणि आमचं सामान वाहणाऱ्या माणसांना आता विश्रांतीची गरज होती त्यामुळे आम्ही ती रात्र बंगल्यावरच काढायचं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी फॉर्टस्क त्याच्या नोंदी करण्याच्या कामात व्यग्र असल्याने मी जरा पहाडावर फेरफटका मारून "रेड काश्मिर डियर" मिळतंय का ते पहायचं ठरवलं.मला कित्येक लोकांनी सांगितलं होतं की स्थानिक अनुभवी शिकाऱ्यांच्या मदतीशिवाय काश्मिरी हरणं मिळणं शक्य नाही. फॉरेस्ट बंगल्याच्या चौकीदारानेही या मताला दुजोरा दिला होता.मला तर ही काश्मिरी डिअर्स नक्की कोणत्या उंचीवर मिळतात याचीही कल्पना नव्हती,पण तरीही मला संपूर्ण दिवस मोकळा मिळाला असल्याने माझा मीच प्रयत्न करायचं ठरवलं.हा पहाड बारा हजार फूट उंच होता आणि त्याच्यावरूनच काश्मिरला जाणारा 'पास' होता.साधारण आठ हजार फूट चढून वर आल्यानंतर वादळ सुरू झालं.ढगांच्या रंगावरूनच मी ओळखलं की बहुतेक आज आपल्याला गारपीटीचा सामना करावा लागणार. मी आतापर्यंत गारपीटीमुळे आणि त्यावेळेला हमखास पडणाऱ्या वीजांमुळे कित्येक जनावरं आणि माणसं दगावलेली पाहिली आहेत. 


त्यामुळे झाडाची निवड मी अतिशय काळजीपूर्वक केली.

उतरत्या डेऱ्याची,मोठी व फर सारखी झाडं सोडली आणि दाट पानोळा व गोल माथा असलेलं एक छोटंसं झाड निवडलं. त्यानंतर जवळपास फिरून वाळकी लाकडं व फरचे कोन जमा करून झाडाखाली मस्तपैकी शेकोटी पेटवली.जवळजवळ तासभर वीजा चमकत होत्या,

गडगडाट होत होता आणि गारपीट होत होती पण मी झाडाखाली सुरक्षित व उबदार राहिलो.गारपीट थांबल्याबरोबर सूर्य ढगाबाहेर आला आणि झाडाखालून उठून बाहेर आल्यावर मला साक्षात पऱ्यांच्या राज्यात पाऊल टाकल्याचा भास झाला.जमीनीवर पडलेल्या असंख्य गारांमुळे लाखो बिंदूवरून सूर्यकिरणं परावर्तीत होत होते आणि त्यात गवताची ओली पाती आणि चमचमणारी पानं भर टाकत होती.तसाच पुढे दोन ते तीन हजार फुटाचा चढ़ चढून मी डोंगरातून पुढे आलेल्या एका मोठ्या शिळेपर्यंत येऊन पोचलो. या शिळेच्या खाली निळ्या पहाडी अफूचा ताटवा होता.हिमालयातील ही सर्वांत सुदंर रानफुलं आहेत.गारपीटमुळे त्यांचे देठ जरी मोडलेले असले तरी शुभ्र बर्फाने आच्छादलेल्या जमीनीवर विखुरलेली ती आकाशी रंगाची फुलं म्हणजे अविस्मरणीय दृश्य होतं.


राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!


१/१०/२४

सिरी भूवलय / Siri Earth Ring

अद्भुत आणि चमत्कारिक ग्रंथ


आपल्या भारताच्या ज्ञानभांडारात इतक्या जबरदस्त आणि चमत्कारिक गोष्टी लपलेल्या आहेत की,त्या बघून मन अक्षरशः थक्क होतं..! 'हे ज्ञान आपल्या जवळ आलंच कुठून' अशा प्रश्नात आपण गुरफटले जातो.

मग,'त्या काळात हे असलं भारी ज्ञानभांडार आपल्या जवळ होतं, मग आता का नाही..? कुठं गेलं हे ज्ञान..? 'हे प्रश्न आपल्याला सतावत राहतात...!


याच श्रेणीतला असा अद्भुत ग्रंथ आहे - 'सिरी भूवलय'.किंवा श्री भूवलय.जैन मुनि आचार्य कुमुदेंदू ह्यांनी रचलेला.कर्नाटकात जेव्हा राष्ट्रकूटांचं शासन होतं,मुस्लीम आक्रमक यायला बरीच वर्षं होती आणि सम्राट अमोघ - वर्ष नृपतुंग (प्रथम) हे जेव्हा राज्य करत होते,त्या काळातला हा ग्रंथ.अर्थातच सन ८२० ते ८४० च्या काळात केव्हा तरी लिहिला गेलेला..!


मात्र मागील हजार वर्षे हा ग्रंथ गायब होता.

कुठे कुठे याचा उल्लेख यायचा.पण ग्रंथ मात्र विलुप्तावस्थेतच होता.हा ग्रंथ मिळाला कसा, याचीही मजेदार गोष्ट आहे -


राष्ट्रकुटांच्या काळात कोण्या मल्लीकब्बेजी या बाईने या ग्रंथाची एक प्रत नकलून घेतली आणि आपले गुरू माघनंदिनीजी यांना शास्त्रदान केली.या ग्रंथाची प्रत हस्ते-परहस्ते सुप्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक धरणेन्द्र पंडितांच्या घरी पोहोचली.हे धरणेन्द्र पंडित,बंगळूर- तुमकुर रेल्वे मार्गावरील दोड्डबेले नावाच्या लहानशा गावात रहायचे.या ग्रंथाबद्दल त्यांना फारशी माहिती नसली,तरी याचं महत्त्व ते जाणून होते.म्हणूनच आपले मित्र,चंदा पंडितांबरोबर ते 'सिरी भूवलय' या ग्रंथावर कन्नड भाषेत व्याख्यानं द्यायचे.


या व्याख्यानांमुळे,बंगळूरच्या 'येल्लप्पा शास्त्री' ह्या तरुण आयुर्वेदाचार्याला,हा ग्रंथ धरणेन्द्र शास्त्रींकडे आहे हे समजले.या ग्रंथासंबंधी येल्लप्पा शास्त्रींनी बरेच काही ऐकले होते.तेव्हा हा ग्रंथ मिळवायचाच,हा निश्चय पक्का होता. मग काहीही करून ह्या ग्रंथाचे हस्तलिखित मिळविण्यासाठी येल्लप्पा शास्त्रींनी,दोड्डाबेलाला जाऊन धरणेन्द्र शास्त्रींच्या पुतणीशी विवाह केला.पुढे १९१३ मधे धरणेन्द्र शास्त्रींचे निधन झाले.पूर्ण वेळ विद्याभ्यासात दिल्याने त्यांच्या घराची आर्थिक स्थिती फारच खराब झालेली होती.म्हणून त्यांच्या मुलाने,धरणेन्द्र शास्त्रींच्या काही वस्तू विकावयास काढल्या.त्यांत 'सिरी भूवलय' हा ग्रंथही होता.अर्थातच आनंदाने येल्लप्पा शास्त्रींनी हा ग्रंथ विकत घेतला. त्यासाठी त्यांना बायकोचे दागिने विकावे लागले. मात्र ग्रंथ हातात आल्यावरही शास्त्रींना त्याची उकल करता येत नव्हती.१२७० पानांच्या ह्या हस्तलिखितात सारेच अगम्य होते.पुढे १९२७ ला प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी करमंगलम श्रीकंठय्याजी बंगळुरात आले.त्यांच्या मदतीने ह्या ग्रंथाची किवाडं काहीशी किलकिली झाली. या हस्तलिखितातील माहितीच्या आधारे प्रयत्न करत करत,त्यातील सांकेतिक माहितीची फोड करायला तब्बल ४० वर्षे जावी लागली.सन १९५३ मधे कन्नड साहित्य परिषदेनं ह्या ग्रंथाचं पहिल्यांदा प्रकाशन केलं.ग्रंथाचे संपादक होते - येल्लप्पा शास्त्री,

करमंगलम श्रीकंठय्या आणि अनंत सुब्बाराव.यांतील अनंत सुब्बाराव हे तंत्रज्ञ होते.त्यांनीच पहिला कन्नड टाईपरायटर तयार केला होता.


असं काय महत्त्वाचं होतं ह्या ग्रंथात,ज्यासाठी लोकं आपलं आख्खं आयुष्य वेचायला तयार होती..?


हा ग्रंथ,इतर ग्रंथांसारखा एखाद्या लिपीत लिहिलेला नाही,तर हा अंकांमधे लिहिलेला आहे.हे अंकही १ ते ६४ मधील आहेत.हे अंक किंवा आकडे विशिष्ट पद्धतीने वाचले की एखाद्या विशिष्ट भाषेत,विशिष्ट ग्रंथ वाचता येतो. ग्रंथ- कर्त्याच्या,अर्थात मुनी कुमुदेन्दूच्या मते हा ग्रंथ १८ लिप्या आणि ७१८ भाषांमध्ये वाचता येतो.


हा ग्रंथ म्हणजे अक्षरशः विश्वकोश आहे.ह्या एका ग्रंथात अनेक ग्रंथ दडलेले आहेत.रामायण, महाभारत,वेद,

उपनिषदे,अनेक जैन ग्रंथ या एका ग्रंथात सामावलेले आहेत.गणित,खगोलशास्त्र,रसायनशास्त्र,इतिहास,वैद्यक,तत्त्वज्ञान यांसारख्या अनेक विषयांवरील ग्रंथही या एकाच ग्रंथात वाचता येतात.या ग्रंथाची १६,००० पाने होती असा ग्रंथातच कुठे उल्लेख आहे.त्यांतील फक्त १२७० पानेच सध्या उपलब्ध आहेत. एकूण ५६ अध्याय असलेल्या ह्या ग्रंथाच्या फक्त तीन अध्यायांचीच उकल करणे सध्या शक्य झाले आहे.१८ लिप्या आणि ७१८ भाषांपैकी सध्या कन्नड,तामिळ,तेलुगु,संस्कृत,मराठी, प्राकृत इत्यादी भाषांमधूनच हा ग्रंथ वाचता येतो.एखाद्या संगणकीय विश्वकोशासारखे या ग्रंथाचे स्वरूप आहे.ह्या ग्रंथाची संपूर्ण संहिता जेव्हा उलगडली जाईल,तेव्हा त्याची प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट होऊ शकतील.


हा ग्रंथ लिपीत नसून आकड्यात आहे,हे आपण बघितलंच.त्यातही फक्त १ ते ६४ अंकांचाच वापर केलेला आहे.आता कुमुदेंदू मुनीनी फक्त ६४ पर्यंतच आकडे का घेतले..? तर ६४ हे ध्वनींचे संकेत आहेत,ज्यात ऱ्हस्व,दीर्घ आणि लुप्त मिळून २७ स्वर; क, च, न, प सारखे २५ वर्गीय वर्ण; य, र, ल, व सारखे अवर्गीय व्यंजन इत्यादी मिळून ६४ ही संख्या होते.या संख्या २७ × २७ च्या चौकोनांमध्ये मांडल्या जातात.आता हे जे ७२९ अंक चौकोनांमध्ये येतात,ते ग्रंथात दिलेल्या निर्देशांनुसार खालून- वर,वरून-खाली, उभे-आडवे वगैरे करून लिहिले आणि ते त्या भाषेच्या वर्णक्रमानुसार मांडले (उदा - ४ हा अंक असेल तर मराठी तील वर्ण 'घ' येईल.क,ख,ग,

घ..प्रमाणे) तर छंदोबद्ध काव्य अथवा धर्म,दर्शन, कला…वगैरे प्रकारचा ग्रंथ तयार होतो…!


काय अफाट आहे हे...!


आणि किती अद्भुत..! आपण आपल्या 'सुडोकू'चा लहानसा चौकोन तयार करायला संगणकाची मदत घेतो.अन् इथे हजार / बाराशे वर्षांपूर्वी एक जैन मुनी आपल्या कुशाग्र आणि अद्भुत बुद्धीचा परिचय देऊन फक्त अंकांमधून विश्वकोश तयार करतात..!


सारंच अतर्क्स..!!


या ग्रंथाचं प्रत्येक पान म्हणजे २७ × २७ असा ७२९ अंकांचा भला मोठा चौकोन आहे.या चौकोनाला चक्र म्हणतात.अशी १२७० चक्रे सध्या उपलब्ध आहेत.या चक्रांमध्ये ५६ अध्याय आहेत आणि एकूण श्लोकांची संख्या सहा लाखांच्या वर आहे.या ग्रंथाचे एकूण ९ खंड आहेत. उपलब्ध असलेली १२७० चक्रे ही पहिल्या खंडातीलच आहेत,ज्याचं नाव आहे - 'मंगला प्रभृता'. एक प्रकारे हा खंड म्हणजे इतर खंडांची फक्त ओळख आहे.अंकांच्या स्वरूपात यात १४ लाख अक्षरं आहेत.

यातून ६ लाख श्लोक तयार होतात.


या प्रत्येक चक्रात काही 'बंध' आहेत.बंध म्हणजे अंकांना वाचण्याची पद्धत किंवा एका चक्राच्या आत अंक मांडण्याची पद्धत.दुसऱ्या शब्दात सांगायचं तर 'बंध' म्हणजे तो श्लोक,किंवा तो ग्रंथ वाचण्याची किल्ली किंवा पासवर्ड) आहे.या बंधामुळे आपल्याला त्या चक्रातील ७२९ अंकांमधला पॅटर्न कळतो आणि मग त्या त्या भाषेप्रमाणे तो ग्रंथ उलगडू लागतो.या बंधाचे वेगवेगळे प्रकार आहेत.जसे - चक्र-बंध, नवमांक-बंध,

विमलांक-बंध,हंस-बंध,सारस-बंध, श्रेणी-बंध,मयूर-बंध,

चित्र-बंध इत्यादी.गेल्या अनेक वर्षांपासून ह्या भूवलय ग्रंथाला 'डी-कोड' करण्याचे काम चालू आहे.अनेक जैन संस्थांनी हा ग्रंथ,प्रकल्प म्हणून स्वीकारला आहे.इंदूरला जैन साहित्याच्या संशोधनाचं 'कुन्दकुंद ज्ञानपीठ' उभं राहिलंय,जिथे डॉ.महेंद्र कुमार जैन यांनी या विषयावर बरेच काम केले आहे.आय. टी. क्षेत्रातल्या काही जैन तरुणांनी या विषयावरील वेबसाईट तर चालू केलीच आहे,पण संगणकाची मदत घेऊन या ग्रंथाला 'डी-कोड' करण्याचं काम केलं जातंय.अगदी लहान प्रमाणात त्याला यशही आलंय.


मात्र तरीही....


आज एकविसाव्या शतकाचं सोळावं वर्ष संपलेलं असतानाही,जगभरातले अनेक जैन विद्वान या ग्रंथावर काम करत असतानाही,प्रगत संगणक प्रणालीचे अल्गोरिदम वापरूनही...ह्या ग्रंथाची उकल झालेली नाही..! ५६ पैकी फक्त तीनच अध्याय 'डी-कोड' होऊ शकले आहेत...


मग हजार - बाराशे वर्षांपूर्वी,आजच्यासारखी कसलीही साधनं हाताशी नसताना,मुनी कुमुदेन्दूंनी इतका क्लिष्ट ग्रंथ कसा रचला असेल..? बरं, मुनिवर्य कन्नड भाषिक होते.मग त्यांना इतर भाषांचे असे अवजड अल्गोरिदम्स तयार करणं कसं जमलं असेल..?


आणि मुळात इतकी कुशाग्र आणि अफाट बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ कुठून आली असेल..?


'इंडोलॉजी'च्या क्षेत्रातलं,भारतातलं आदरानं घेतलं जाणारं नाव आहे.श्री.एस. श्रीकांत शास्त्रींचं (१९०४ - १९७४). त्यांनी 'भूवलय' ह्या ग्रंथाबद्दल लिहून ठेवलंय हा ग्रंथ कन्नड भाषा, कन्नड साहित्य,तसेच संस्कृत,प्राकृत,

तमिळ, तेलगु साहित्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे.हा ग्रंथ भारताच्या आणि कर्नाटकच्या इतिहासावर प्रकाश टाकतो.भारतीय गणिताच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ म्हणजे महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ आहे.भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवनविज्ञानाच्या विकासाच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. तसेच तो शिल्पे आणि प्रतिमा,प्रतीके यांच्या अभ्यासासाठी देखील उपयुक्त आहे.यातील रामायण,महाभारत,भगवत गीता,ऋग्वेद आणि इतर ग्रंथांची फोड करता आली तर त्यांची आणि सध्या उपलब्ध असलेल्या ग्रंथांची तुलना अभ्यासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल.नष्ट झालेले अनेक जैन ग्रंथ सिरी भूवलयमध्ये सापडू शकतात.


ह्या ग्रंथाची माहिती जेव्हा आपले पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद ह्यांना मिळाली,तेव्हा त्यांचे उत्स्फूर्त उद्गार होते 'हा श्री भूवलय ग्रंथ म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे..!' ( भारतीय ज्ञानाचा खजिना-प्रशांत पोळ,स्नेहल प्रकाशन )


एका अर्थानं हे खरंय.कारण जगाच्या पाठीवर कुठेही असा 'एकात अनेक ग्रंथ' असलेला, कूट पद्धतीनं लिहिलेला विश्वकोश आढळत नाही.आपलं दुर्दैव इतकंच की,भारतीय ज्ञानाचा हा अमोल खजिना आपल्याला तरी कुठे माहीत होता..


 

२९/९/२४

पाखरांचे प्रेम / love of birds

पक्ष्यांच्या घरट्यांची रचना त्यांच्या कुळाप्रमाणं बदलत असते.रातवा पक्षी अजिबात घरटं बांधीत नाही.मादी जमिनीवर अंडी घालते.जमिनीवर घरटं बांधणारे दुसरे पक्षी बहुतेक बशीच्या आकाराचं घरटं तयार करतात. त्यांपैकी कुररी (टर्न) आणि जलचर पक्षी घरट्याच्या अस्तराशिवाय शंख-शिंपल्यांचे तुकडे, खडे किंवा गवतासारख्या वस्तू यांचा उपयोग करतात.ज्या पक्ष्यांची झाडावर वीण होते,असे पक्षी काटक्या,मुळ्या,

गवत,शेवाळ,इत्यादी वस्तूंचा उपयोग करून घरटी बांधतात.देवकन्हई मात्र चिखलाचं घरटं बांधते.होल्याचं घरटं म्हणजे आडव्या-तिडव्या ठेवलेल्या चार काटक्या,

नारंग पक्ष्याचं घरटं चेंडूसारखं गोलाकार आणि सुबक असतं.शिंपी पक्षी आपलं घरटं पानांनी शिवून तयार करतो. सुगरण पक्षी तर सुंदर आणि कलापूर्ण घरटी विणण्याकरिता प्रसिद्ध आहे.यजुर्वेदात तिच्या घरट्याचा उल्लेख आढळतो.



'सोमाय लवनालभते त्वष्ट्रे कौलीकान्'


अर्थात सौम्य स्वभावासाठी लवा नावाच्या पक्ष्याकडं व कलाकुसरीसाठी सुगरण पक्ष्याकडं पाहावं.


पक्ष्यांविषयीच्या ग्रंथांतून पाखरांच्या घरट्यांविषयी सविस्तर वर्णनं दिलेली असतात; परंतु पाखरं प्रत्यक्षात घरटी कशी बांधतात याविषयीचं निरीक्षण क्वचितच नोंदलेलं असतं.


 जिज्ञासू पक्षिनिरीक्षकांकरिता ही एक चित्ताकर्षक कामगिरीच आहे.पक्षी पिलांना भरविताना पाहणं जितकं सोपं आहे,तितकं घरटी बांधताना त्याचं निरीक्षण करणं सोपं नाही. याचं कारण असं की,

काही पक्षी आपली घरटी मोठ्या गूढपणे बांधीत असतात.घरटी बांधताना त्यांना कोणी पाहिलं,तर ते घरटं अपुरं सोडून ते निघून जातात.पुन्हा तिकडं फिरकतदेखील नाहीत.


याचा प्रत्यय आपणाला ऋग्वेदात केलेल्या वर्णनावरून येतो.पक्ष्याच्या पिलाप्रमाणं गूढस्थळी ठेवलेला,निधीप्रमाणं मौल्यवान, स्वर्गाहून आणलेला आणि दगडात झाकलेला सोम इंद्रानं प्राप्त केला. (१. १३०. ३). एका ठिकाणी पक्ष्यांची घरटी मृदू असतात असा उल्लेख आहे,तर अन्यत्र ती घरटी उबदार असल्याचा निर्देश आहे. (९. २०. ५)


सुरुवातीला घरट्याची जागा पक्षी जोडीनं शोधतात.अडई नावाची रानबदकं घरट्याची जागा भुईताडाच्या हिरव्या झुडपात निवडतात. झुडपात प्रवेश करण्यासाठी भुयार करतात. भुयार करताना पानं एकमेकांत गुंतवितात.काही चोचीनं छाटून टाकतात.आतल्या भागात बशीच्या आकाराची गादी करतात.त्यासाठी ताडाची पानं आणि पिसं उपयोगात आणतात. बहिरी ससाणा मात्र झाडाच्या शेंड्यावरील मजबूत फांदीच्या दुबेळक्यात घरटं करतो. सर्पगरुड आपलं घरटं उंच वृक्षाच्या शेंड्यावर करतो.

तेथून सारा टापू त्याच्या दृष्टिक्षेपात येतो. 


केम कुकडी आपलं तरंगतं घरटं पाणवनस्पतीच्या साहाय्यानं उंच वाढलेल्या देवधानात करते.परंतु हे घरटं पाण्यापासून फार दूर नसतं.कारण जेवढं घरट्यात प्रवेश करणं सोपं जावं,तेवढंच घरट्यातून निसटून पाण्यात जायलादेखील सहज शक्य व्हावं,असा त्यांचा हेतू असतो.सारस पक्ष्यांची जोडी एका ठरावीक क्षेत्रात,उथळ पाण्यात पाणवनस्पतीचा उंचवटा करून,त्यावर खोलगट आकाराचं घरटं बांधते, तेव्हा ते एखाद्या बेटासारखं दिसू लागतं.


बरेच पक्षी आपलं घरटं साध्या रीतीनं बांधतात. मत्स्य गरुडाची जोडी नवेगावबांध सरोवरातील बेटावर घरटं बांधताना मी अनेक वेळा पाहिली आहे.दर वर्षी त्यांना घरट्यासाठी नवीन जागा शोधावी लागत नाही.झाडावरील जुन्याच घरट्याची ते डागडुजी करतात.त्याकरिता चोचीत काटक्या घेऊन जुन्या घरट्यावर त्या रचतात. 


कित्येकदा हिरव्या पानांची एखादी फांदी तोडून नेतात.

त्यावरून समजतं,की या गरुडानं घरटं बांधण्यास सुरुवात केली आहे.घरट्याचं तक्तपोस तयार होताच त्यावर बसून हे गरुड काटक्या नीट रचून घेतात.ज्या वेळी तक्तपोस उंच होतं,त्या वेळी ते पायांनी तुडवितात.काड्या खाली-वर करून मध्य भागाला खोलगट आकार देतात.


जमिनीवर,तसेच झाडावर घरटी तयार करणारे पक्षी घरटी बांधण्याचं काम ठरावीक एका जागेवर बसून करतात.

घरटं बांधण्याची सामग्री चोचीनं रचीत असतात.त्यानंतर पायांनी तुडवून त्यास मध्यभागी खोलगट आकार देतात.


झाडावर कावळे घरटी बांधताना पाहणं मोठं मनोरंजक असतं.कावळ्यांच्या जोड्या आपापल्या जुन्या घरट्याचा ताबा घेऊन,त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करतात.

घरट्यात जोडीपैकी एक थांबतो.दुसरा घरट्यासाठी काड्या जमा करू लागतो.अनुभवी कावळे घरटं सोडून कधीही जाणार नाहीत.


तरुण कावळ्यांच्या जोड्या घरट्याचं साहित्य गोळा करून ते बांधायला सुरुवात करतात. मोठ्या प्रयत्नानं त्या घरटं रचीत असतात.पुन्हा पुन्हा जोडीनं काड्या गोळा करायला जातात; परंतु एवढ्या प्रयासानं बांधीत असलेल्या घरट्याची प्रगती होत नाही,याचं त्यांना आश्चर्य वाटतं.एकदा मला याचं कारण पाहण्याची संधी मिळाली.

तरुण कावळे घरट्याची सामग्री आणायला गेले,की शेजारच्या घरट्यातील कावळा हळूच त्यांच्या घरट्यातील काड्या चोरून स्वतःच्या घरट्यात आणून ठेवीत होता. तरुण कावळे घरट्याचं साहित्य घेऊन परतले, की तो शेजारचा कावळा,आपण त्या गावचे नाही,असा भाव आणून दुसरीकडं पाहात राही.


पंकोळीसारखे पक्षी आपली घरटी चिखलानं बांधतात.ते बांधताना पाहणं मोठं चित्तवेधक असतं.पक्ष्यांच्या अंड्यांतील जीवांचा विकास ती पाखरांच्या शरीराच्या तापमानाइतकी उबदार ठेवल्यानं होतो.अगदी कमी अथवा जास्त तापमानामुळं अंड्यातील जीव मरून जातो. पक्षी अंड्यांवर बसून त्यांचं योग्य ते तापमान ठेवतात.

पक्ष्याची मादी सर्वच अंडी एका वेळी घालू शकत नाही.

ठरावीक दिवसांच्या अंतरानं ती अंडी घालते.बरेचसे पक्षी रोज एक किंवा एक दिवसा आड एक अंडं देतात.

रानबदकानं घातलेल्या अंड्यांची संख्या मोठी असते.ही संख्या पुरी करायला रानबदकांना एखादा पंधरवडा तरी लागतो.अंडी उबविण्यास मात्र एकाच दिवशी सुरुवात करतात,याचं कारण असं,की शेवटचं अंडं घातल्याशिवाय ती उबविण्यास सुरुवात करीत नाहीत.


 घुबड मात्र एक-दोन अंडी घालताच ती उबविण्यास सुरुवात करीत असल्यानं सगळी अंडी उबविण्यास त्याला दीर्घ काळ लागतो.इतर पक्षी मात्र सुरुवातीच्या काळात अंडी उबवीत नाहीत,तर ती नुसतीच झाकून ठेवतात...


पोट आणि छाती यांच्या मध्ये कातड्याचा भाग असतो.

त्याचा उपयोग पक्षी अंडी उबविण्यासाठी करतात. या कातडीभोवतीची पिसं फुलवून हे पक्षी अंड्यावर त्याचं आवरण घालीत नाहीत, तोपर्यंत ती थंडच असतात.


अंडी उबविण्याचं काम फक्त मादीचं नसतं.लावा आणि पाणपिपुली या पक्ष्यांत फक्त नरच अंडी उबवितो; परंतु बऱ्याच पक्षिकुळांत नर आणि मादी आळीपाळीनं अंडी उबविण्याचं कार्य करतात. अशा वेळी ते एकमेकांपासून घरट्याचा ताबा कसा घेतात, हे पाहणं मोठं मनोरंजक असतं. 


पाखरमाया,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सिताबर्डी-नागपूर


पाखरांच्या बाबतीत अंडी उबविणं हे कार्य म्हणजे त्यांचा आनंदसोहळा असतो.ते त्यांच्या बाबतीत नुसतं उबविणं राहात नाही,तर ते 'जाणिजे यज्ञकर्म' असतं.असंही दिसून येतं,की अनेक तासांनंतरही अंडी उबविणारा जोडीदार घरटं सोडायला तयार नसतो.घरट्यातून, अल्पकाळ का होईना,नर-मादींना जी मुक्तता लाभते,ती शांततापूर्वक असते.अशा प्रयत्नात एक प्रकारचं आश्वासन असतं.त्यामुळं त्यांचे संबंध दृढ होतात.जोडीदाराला मुक्त करण्यासाठी येणारा पक्षी अंड्यांवर बसण्याचा हेतू अनेक प्रकारांनी व्यक्त करतो.तो पोटावरची पिसं फुलवितो.

हळूवार कूजन करतो.बसलेल्या पक्ष्याला डोक्यानं दुशी मारतो.शक्य असल्यास घरटं बांधण्याचं साहित्य घेऊन येतो.साहजिकच अंड्यांवर बसलेल्या जोडीदाराला नाइलाजानं उठावं लागतं.तो घरट्याचं प्रथम निरीक्षण करतो.अंडी पाहून त्यांवर पुनश्च बसण्याचा मोह त्याला टाळता येत नाही;परंतु जोडीदार ही संधी साधून अंड्यांवर बसतो.पक्षी अंड्यांवर बसला,की तो चोचीच्या टोकानं अंडी घुसळतो.अंड्यांवर बसला असताना हे कार्य तो सतत करीत असतो.अंड्यांवर निरीक्षणासाठी चिन्हं केली,तर असं दिसून येईल की,ही अंडी गोल गोल फिरत असतात.जेणेकरून साऱ्यांना समान ऊब मिळते.जमिनीवर घरटी करणारे पक्षी घरट्याबाहेर चुकून गेलेलं अंडं पुन्हा लोटून आत घेतात.तुम्ही एखादं अंडं घरट्याच्या किनाऱ्यावर ठेवल्यास,पक्षी जेव्हा तिथं येईल,

तेव्हा हा प्रकार त्याच्या लवकर लक्षात येणार नाही.पण जेव्हा तो घरट्यातील अंड्यांवर स्थानापन्न होईल,तेव्हा त्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटून घरट्याच्या काठावर पडलेलं अंडं तो चोचीनं पुन्हा आत घेईल.अंडं जर त्याच्या आवाक्याबाहेर असेल, तर तो उठून अंड्यापर्यंत जाऊन ते ढकलीत घरट्यात लोटील.


अंड्यातून जीव बाहेर पडण्याची वेळ येते तेव्हा आतील पिलू शरीराचं प्रसरण करीत गोलगोल फिरत असतं.या जीवनचक्रातून जात असताना अंडं तडकतं.तीक्ष्ण अशा चोचीतील दातऱ्यानं पिलू आपल्या भोवतीच्या कवचाला बारीक छिद्र पाडतं.छिद्र उत्तरोत्तर मोठं होत असतं.अशा त-हेनं कवच फोडून द्विज बाहेर येतो.


माता-पिता या जन्मसोहळ्याकडं अनिमिष नेत्रांनी पाहात असताना,त्यांचं निरीक्षण करण्याचा आपण एक अपूर्व अनुभव घेत असतो.अंड्याला छिद्र पाडण्यापूर्वी अंतर्नाद येत असतो.माता-पिता वारंवार घरट्यातील अंड्यांकडं पाहात असतात.पूर्वीप्रमाणे अंड्यांवर बसण्यापेक्षा किंचित पंख पसरून मादी उभी राहाते.हे अभूतपूर्व दृश्य पाहून मला केशिराज संकलित कुकडीयेच्या दृष्टांताची आठवण झाली.


'कुकडी असे : ते आंडी घाली : पीलीं होति : तेयांसि पाखवा दे : अमृतकळा असे ते संचरे : तयातवं तीयें वाढति ।।' यातील अमृतकळेची कल्पना अभूतपूर्व आहे. कोंबडी अमृतकळेचा संचार पिलांना 'पाखवा' देऊन म्हणजे स्पर्शानं करते.


ज्या वेळी अंड्यांतून पिलं बाहेर पडतात,तेव्हा त्यांचे माता-पिता अंड्यांची कवचं उचलून बाहेर फेकतात.


पानगळीनंतर  पाने-फुले सोडून गेली म्हणून झाड त्यांचा द्वेष करत बसत नाही.ते वठत नाही. आपल्या जीवनावरचे प्रेमही सोडत नाही. आपल्या अंगची पुन्हा बहरण्याची आशा सोडत नाही.अनुकूल ऋतू आला की पुन्हा ते बहरून उठते.निसर्गात अशी अनेक दृश्ये आपण बघत असतो.पण त्यातून आपण आवश्यक तो बोध घेत नाही.कुणी सोबत सोडली,नाती तुटली, प्रेमभंग झाला

की माणूस लागलीच वठायला लागतो.जीवनातून उठतो.किंवा इतरांना जीवनातून उठवतो.फुलण्याची शक्यता असूनही तो फुलणे सोडतो.म्हणून हे असे होतो.झाडाला जसा नवा ऋतू भेटतो,तसेच माणसांनाही नवे कुणीतरी भेटत असते.नवे काही तरी घडण्याची शक्यता असतेच.त्यासाठी माणसांनी अवेळी वठून जाणे सोडले पाहिजे.!


डॉ.रवींद्र श्रावस्ती