* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१४/३/२५

हरपलेले ज्ञान / Lost knowledge..!

ज्या प्राचीन भारताच्या लखलखत्या,वैभवशाली खजिन्याविषयी आपण बोलतोय,तो ज्ञानाचा खजिना नेमका गेला कुठे..? हे अत्यंत अमूल्य असे प्राचीन ज्ञान कुठे हरवले..? अनेक गोष्टी आपण भारतीयांनी सर्वप्रथम शोधल्या असे आपण म्हणतो,त्या गोष्टी नेमक्या कुठे विखरून गेल्या..? असे प्रश्न अनेक जण विचारतात.असे प्रश्न समोर येणे स्वाभाविकच आहे.एके काळी अत्यंत समृद्ध असलेला आपला देश इतका गरीब कसा काय झाला..? त्या प्राचीन ज्ञानाचा काहीच उपयोग झाला नाही का..? असेही प्रश्न समोर येतात.


काहीजण तर खवचटपणे असेही म्हणतात की,'जगात एखादा नवीन शोध लागला की,प्राचीन भारताची ही अभिमानी मंडळी ताबडतोब उसळी मारून समोर येतात आणि म्हणतात की,हा शोध तर भारतीयांनी फार आधीच लावला होता...!'


असे अनेक प्रश्न आणि अनेक आरोप... मग खरी वस्तुस्थिती काय आहे..?


पहिली गोष्ट ही की,त्या काळात आपला देश हा संपत्तीने आणि संस्कृतीने सर्वांत समृद्ध असलेला देश होता. आणि ही माहिती जगभर होती.म्हणूनच जगज्जेत्या म्हणवल्या जाणाऱ्या सिकंदरला (अलेक्झांडरला) अगदी लहानपणापासून वाटत होतं की,भारताला जिंकून घ्यावं.अकराव्या शतकापासून भारतावर आक्रमण करणाऱ्या मुसलमान आक्रमकांना भुरळ पडली होती ती भारताच्या वैभवाची.


भारताला जाण्यासाठी म्हणून निघालेला कोलंबस अमेरिकेला पोहोचला,तर वास्को-डी-गामा,मार्को पोलो या लोकांना भारताचे प्रचंड आकर्षण होते.


थोडक्यात,आपल्यासारख्या समृद्ध देशाबद्दल जगाला कुतूहल असणे स्वाभाविकच होते.आणि ही समृद्धी आपण आपल्या ज्ञानाच्या बळावर मिळवलेली होती.( भारतीय ज्ञानाचा खजिना,

प्रशांत पोळ,स्नेहल प्रकाशन )


हे ज्ञान कशा स्वरूपात आपल्या देशात जतन करून ठेवलं होतं..? त्या काळात छपाईचे तंत्रज्ञान अवगत नसल्याने ग्रंथ नकलून घेत.ते ग्रंथ लिहिणे,अर्थात नकलून घेणे,हा एक सोहळाच असायचा.

रामायण, गीता,महाभारत,वेद,उपनिषदे यांसारखे ग्रंथ नकलून घेण्यास महिनोन् महिने लागत.अगदी व्युत्पन्न शास्त्र्यांच्या घरीही फारसे ग्रंथ किंवा पोथ्या नसत.


हे ग्रंथ किंवा पोथ्या ठेवण्याच्या जागा म्हणजे विद्यापीठं, गुरुकुल आश्रम,मठं,देवस्थानं आणि मंदिरं.या ठिकाणी हे ग्रंथ अगदी भक्तिभावाने आणि व्यवस्थित ठेवलेले असायचे.


विद्यापीठांमध्ये मोठमोठी ग्रंथालयं होती.नालंदाच्या ग्रंथालयाबद्दल इतिहासात तुटक,तुटक माहिती आढळते.मात्र निश्चित आणि भरभक्कम पुरावा मिळाला तो हिंदीचे प्रसिद्ध लेखक आणि संशोधक राहुल सांकृत्यायन (१८९३ - १९६३) यांना.हे बौद्ध धर्माचे अभ्यासक होते.बौद्ध धर्माच्या प्राचीन ग्रंथांसाठी यांनी तिबेटपासून श्रीलंकेपर्यंत अनेक प्रवास केले.तिबेटला तर ते अनेकदा गेले.त्या काळात तिबेटवर चीनचे आक्रमण झालेले नव्हते.तिबेटच्या तत्कालीन सरकारने त्यांना विशिष्ट अतिथीचा दर्जा दिलेला होता आणि त्यांना कोणत्याही बौद्ध मंदिरात जाण्याचा मुक्त परवाना होता.राहुल सांकृत्यायननी याचा चांगला उपयोग करून घेतला.पाली आणि संस्कृत भाषेतले अनेक प्राचीन ग्रंथ त्यांनी वाचले आणि त्यांतले बरेचसे भारतातही आणले. याच प्रवासात मध्य तिबेटच्या एका बौद्ध आश्रमात त्यांना एक महत्त्वाचा ग्रंथ मिळाला.


बाराव्या,तेराव्या शतकांतील तिबेटी भिख्खू,'धर्मस्वामी' (मूळ नाव चागलोत्सावा. ११९७ - १२६४) ने लिहिलेला हा ग्रंथ.हा धर्मस्वामी सन १२३० च्या सुमारास नालंदाला भेट द्यायला गेला.बख्तियार खिलजीने ११९३ मध्ये नालंदाला उद्ध्वस्त केले होते.त्यामुळे नालंदाचे ग्रंथालय आणि नंतरचा तो विध्वंस डोळ्यांनी बघितलेली माणसं तिथं होती.त्या उद्ध्वस्त नालंदाच्या परिसरात फक्त सत्तर विद्यार्थी,'राहुल श्रीभद्र' ह्या ऐंशी वर्षांच्या बौद्ध शिक्षकाकडे विद्याध्ययन घेत होती.आणि या सर्वांची काळजी घेत होता,जयदेव नावाचा एक ब्राम्हण.या सर्वांशी बोलून धर्मस्वामीने जे चित्र नालंदाचे उभे केले आहे,ते भव्य आणि समृद्ध अशा विद्यापीठाचे आहे.दहा हजार विद्यार्थी,दोन हजार शिक्षक आणि संशोधक असलेले हे विद्यापीठ होते.


विद्यापीठाचे ग्रंथालय देखील विद्यापीठासारखेच प्रचंड होते. 'धर्मगंगा' नाव असलेल्या ह्या ग्रंथालय परिसरात तीन मोठमोठ्या इमारती होत्या.त्यांची नावं होती - रत्नसागर,रत्नोदधी आणि रत्नगंजका.यांतल्या रत्नोदधी ह्या नऊ मजल्याच्या (होय,नऊ मजल्याच्या. धर्मस्वामीने तसा उल्लेख त्याच्या पुस्तकात केला आहे.आणि ह्यूएनत्संग सकट काही चिनी प्रवासी-विद्यार्थ्यांनीही नऊ मजली उंच इमारतीचा उल्लेख केलाय.) इमारतीत अनेक प्राचीन (त्या काळातील प्राचीन.अर्थात त्या काळापूर्वी दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीचे.अर्थातच ख्रिस्तपूर्व एक हजार वर्षांचे) ग्रंथ सुरक्षितपणे ठेवण्यात आलेले होते.या दुर्मीळ ग्रंथांपैकी 'प्रज्ञापर मिता सूत्र' या ग्रंथाचा उल्लेख धर्मस्वामी करतोय.प्राचीन चिनी संशोधक झुआन झांग हा ह्या ग्रंथालयासंदर्भात लिहितो -'हा संपूर्ण ग्रंथालय परिसर, विटेच्या भिंतींनी बंदिस्त होता.या परिसराला एकच मोठे दार होते, जे उघडल्यावर आत आठ मोठमोठी दालनं दिसायची.ह्या ग्रंथालयात किती ग्रंथ असतील..? अक्षरशः अगणित.हजारो.कदाचित लाखो पण.आणि ग्रंथ म्हणजे हस्तलिखितं.भूर्जपत्रांवर,ताम्रपत्रांवर आणि कागदांवरही लिहिलेली.दुर्मीळ,प्राचीन अशी ही अमाप ग्रंथसंपदा.


बख्तियार खिलजी ह्या क्रूरकर्त्यानं ही सारी ग्रंथसंपदा जाळली.

आणि हे सर्व ग्रंथभांडार जाळून नष्ट करायला त्याला तीन महिन्यांपेक्षाही जास्त वेळ लागला..!


कोण होता हा बख्तियार खिलजी..?


'इख्तीयारुद्दिन मुहम्मद बिन बख्तियार खिलजी' या लांबलचक नावाचा हा प्राणी आताच्या दक्षिण अफगाणिस्तानातल्या 'गर्मसीर' ह्या लहानशा गावातला एक टोळीप्रमुख.पुढे हा कुतुबुद्दीन ऐबकच्या सैन्यात सेनापती झाला आणि दिल्ली बळकावल्यावर ऐबकाने त्याला बिहार आणि बंगाल जिंकायला पाठवले.


११९३ मध्ये याने नालंदा विद्यापीठाचा विध्वंस केला आणि विद्यापीठातील अत्यंत दुर्मिळ असा ग्रंथसंग्रह जाळून टाकला.सतत तीन महिने त्याचं सैन्य ग्रंथालयातून पुस्तकं आणून आगीत टाकत होतं. पण तरीही पुस्तकं उरतच होती.इतका विशाल ग्रंथसंग्रह होता तो.बख्तियार खिलजीनं फक्त नालंदाचं ग्रंथभांडारच नाही जाळलं,तर बंगाल मधल्या विक्रमशिला आणि उड्डयनपूर या विद्यापीठांनाही जाळून उद्ध्वस्त केलं.तिथलाही असाच मोठा ग्रंथसंग्रह नष्ट केला गेला.दुर्दैवाने हा क्रूरकर्मा बख्तियार खिलजी आज 'बांगला देशचा' राष्ट्रीय नायक आहे..!


नालंदा विश्वविद्यालय हे त्या काळातील सर्वांत मोठं विद्यापीठ असल्याने त्याला नष्ट करण्याची,त्यातील पुस्तक जाळून टाकण्याची बातमी इतिहासकारांनी नोंदवून घेतली.मात्र आपल्या खंडप्राय असलेल्या विशाल देशात अशी अनेक लहान-मोठी विद्यापीठं आणि कितीतरी गुरुकुलं होती.पुढच्या दोनशे-तीनशे वर्षांच्या काळात या ठिकाणची ग्रंथसंपत्ती ही,मुस्लीम आक्रमकांद्वारे अशाच प्रकारे नष्ट करण्यात आली.


बाराव्या शतकानंतर, भारतात विद्यापीठं नष्ट झाल्याने वेगवेगळ्या विषयांवर होत असलेले संशोधनाचे प्रकल्प बंद पडले. भारतीय ज्ञानाचा हा ओघच थांबला. उच्च स्तरावरचं ज्ञान घेणं आणि देणं, नुसतं कठीणच नाही, तर अशक्य झालं. ग्रंथांची निर्मिती थांबली. आणि म्हणूनच अगदी अपवाद वगळता, बाराव्या शतकानंतर लिहिलेले महत्वाचे अथवा मौलिक ग्रंथ आढळत नाहीत.


अकराव्या शतकात,माळव्याचा राजा भोज याने संकलित केलेला 'समरांगण सूत्रधार' हा महत्त्वाचा ग्रंथ.यात ८३ अध्याय असून अनेक विषयांसंबंधी लिहिलेले आहे.पुढे अठराव्या शतकात जगन्नाथ पंडिताने 'सिद्धांत कौस्तुभ' हा खगोलशास्त्रावरचा ग्रंथ लिहिला आहे.पण हे तसे अपवादच.आपलं प्रचंड मोठं ज्ञानभांडार मुस्लीम आक्रमकांनी नष्ट केल्या-मुळे ज्ञानाचा जिवंत आणि खळाळता प्रवाह आटला. थांबला.त्यातूनही जे तुरळक ग्रंथ शिल्लक होते,ते इंग्रजांनी आणि इतर युरोपियनांनी आपापल्या देशात नेले.खगोलशास्त्रावरील 'नारदीय सिद्धांता'चा ग्रंथ आज भारतात उपलब्धच नाही.अर्थात त्याचे कोणतेही हस्तलिखित आपल्याजवळ नाही.


मात्र बर्लिनच्या प्राचीन ग्रंथसंग्रहालयात हा ग्रंथ (त्याच्या मूळ हस्तलिखित स्वरूपात) उपलब्ध आहे.(Webar Catalogue no.862). खगोलशास्त्रावरचाच 'धर्मत्तारा पुराणातील' सोम चंद्र सिद्धान्तावरील ग्रंथ भारतात मिळतच नाही.त्याचे हस्तलिखित बर्लिनच्या संग्रहालयात आहे (Webar Catalogue no.840). प्राचीन खगोलशास्त्रात 'वसिष्ठ सिद्धांत' महत्त्वाचा मानला जातो.या सिद्धांताचे उल्लेख अनेक ठिकाणी येतात.या ग्रंथाचेही हस्तलिखित भारतात उपलब्ध नाही. 


ते आहे - इंग्लंडमधल्या मेकेंजी संग्रहालयाच्या विल्सन कॅटेलॉग मध्ये १२१ व्या क्रमांकावर..! आर्यभटाचे 'आर्यअष्टकशतः' आणि 'दशगीतिका' हे दोन्ही दुर्मीळ ग्रंथ बर्लिनच्या वेबर कॅटेलॉगमध्ये ८३४ व्या क्रमांकावर उपलब्ध आहेत.एकुणात काय,तर ग्रंथांच्या रूपात असलेलं आपलं बरंचसं ज्ञान मुसलमान आक्रमकांनी नष्ट केलं,उद्ध्वस्त केलं.जे काही ग्रंथ शिल्लक राहिले,त्यांना इंग्रजी शासनाच्या काळात इंग्रज,डच,फ्रेंच आणि जर्मन संशोधकांनी युरोपला नेलं.मग ज्ञानाचा साठा आपल्याजवळ राहील तरी कुठून..?


आपली हिंदू परंपरा ही वाचिक आहे.आणि ह्या परंपरेमुळेच आपले अनेक ग्रंथ,पुराणे,उपनिषदं,वेद इत्यादी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाचिक स्वरूपात हस्तांतरित होत राहिले.

मात्र शाहजहा आणि औरंगजेबाच्या काळात,ज्या क्रौर्याने आणि बर्बर्तेने मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांना मारण्यात आले, त्यामुळे ही वाचिक परंपराही पुढे काहीशी क्षीण झाली...! मात्र इतकं सारं होऊनही आज जे ज्ञान आपल्यासमोर आहे,ते प्रचंड आहे.अद्भुत आहे. 


विलक्षण आहे.'सिरी भूवलय' सारखा ग्रंथ आजही आपण पूर्ण वाचू शकलेलो नाही.आजही दिल्लीचा 'लोह स्तंभ' कशामुळे गंजत नाही,हे कोडं आपण सोडवू शकलेलो नाही.

'अग्र भागवताच्या' अदृश्य शाईचे रहस्य आजही आपण उकलू शकलेलो नाही..थोडक्यात काय, तर आपल्या प्राचीन ज्ञानाचा शोध घेण्याचा हा अद्भुतरम्य प्रवास असाच चिरंतन चालू राहील असे वाटते..!



१२/३/२५

आव्हान द्या / Challenge

जर अजून काही कामाला येणार नसेल तर हे करा.


चार्ल्स श्वाबचा एक मिल मॅनेजर होता.ज्याच्या मिलमध्येमजूर पुरसे उत्पादन करत नव्हते.श्वाबने मॅनेजरला विचारले,"असं का आहे की, तुमच्यासारखा सक्षम मॅनेजर असूनसुद्धा इथे पुरेसं उत्पादन होत नाहीये?" मॅनेजरने उत्तर दिले," मी नाही जाणत.मी मजुरांना समजावलं,प्रोत्साहित केलं,त्यांना लालूचपण दाखवली,मी त्यांना घाबरवलं-धमकावलं,

नोकरीवरून काढून टाकायची भीतीपण दाखवली;पण काही फायदा झाला नाही. ते कोणत्याही प्रकारे पुरेसं उत्पादन नाही करत." चर्चा संध्याकाळी होत होती आणि रात्रपाळीचे लोक कामावर येणार होते.श्वाबनी मॅनेजरकडून खडूचा तुकडा मागवला.मग त्याने आपल्या जवळ उभ्या असलेल्या मजुराला विचारलं,"आज तुमच्या शिफ्टने किती हिट्स केल्या?

'सहा' काही न सांगता श्वाबने खडूने फरशीवर मोठ्या अक्षरात लिहिले 'सहा' आणि तो गेला.(मित्र जोडा आणि प्रभावशाली बना.डेल कार्नेगी, मंजुल प्रकाशन)



जेव्हा रात्रपाळीचे लोक कामावर आले तेव्हा त्यांनी '६' लिहिलेलं बघितलं आणि विचारलं,याचा काय अर्थ आहे.


दिवसपाळीच्या लोकांनी सांगितले,"आज मोठे साहेब आले होते.त्यांनी आम्हाला विचारलं की, आमच्या शिफ्टने किती हिट्स केल्या? आम्ही त्यांना सांगितले,की आम्ही सहा हिट्स केल्यात. त्यांनी याच जमिनीवर तो आकडा लिहिला." दुसऱ्या दिवशीच्या सकाळी जेव्हा श्वाब परत मिलमध्ये आले,तेव्हा रात्रपाळीच्या शिफ्टने '६'ला मिटवून त्याच्या जागेवर मोठ्या अक्षरामध्ये '७' लिहिलं होतं.


जेव्हा दिवसपाळीचे लोक दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर आले,तेव्हा त्यांनी बघितलं की,फरशीवर मोठ्या अक्षरात '७' लिहिलं आहे.अच्छा,ते नाइट शिफ्टवाले समजत आहेत की,ते आमच्यापेक्षा जास्त योग्य आहेत.त्यांना धडा शिकवावाच लागेल. दिवस पाळीच्या लोकांनी उत्साहाने काम केले आणि जेव्हा ते घरी जाऊ लागले तर जाता जाता त्यांनी मोठ्या अक्षरात लिहून टाकलं '१०'. काम खूप वेगात होऊ लागलं.


काही काळानंतर ज्या मिलचं उत्पादन मर्यादेच्या उत्पादनापेक्षा खूप कमी होतं,त्याच्यात दुसऱ्या मिलपेक्षा जास्त उत्पादन होऊ लागलं.


या घटनेमुळे आम्हाला काय शिकवण मिळते? श्वाब म्हणतो की,काम करून घेण्याची एक पद्धत आहे. चढाओढीला प्रेरित करणे.पैसे कमवण्याची हीन चढाओढ असा अर्थ इथे अपेक्षित नाही,तर श्रेष्ठ होण्याच्या आकांक्षेशी आहे.


श्रेष्ठ होण्याची आकांक्षा ! आव्हान! उत्साही लोकांना प्रेरित करण्याचा अचूक मार्ग ! आव्हानाशिवाय थियोडोर रुजवेल्ट कधी अमेरिकेचे राष्ट्रपती बनू शकले नसते.क्युबाहून परत आल्यानंतर त्यांना न्यू यॉर्क स्टेटच्या गव्हर्नर पदाचा उमेदवार बनवलं गेलं.विपक्ष पार्टीने हे शोधून काढले की,ते या राज्याचे वैध नागरिक नव्हते. यावर रुजवेल्ट घाबरून गेले आणि आपलं नाव परत घेण्या बाबतीत विचार करू लागले,तेव्हा न्यू यॉर्कच्या अमेरिकन सीनेटर थॉमस कॉलियर फ्लॅटने त्याच्या समोर आव्हान ठेवलं.थियोडोर रुजवेल्टच्या समोर अचानक येऊन त्यांनी आपल्या जोरदार आवाजात म्हटले,"काय सान जुआन हिलचा हिरो डरपोक आहे.भित्रा आहे?" रुजवेल्टने मैदान सोडलं नाही आणि बाकी इतिहास आहे.एका आव्हानाने फक्त त्याचं जीवनच बदलले नाही तर त्याच्या देशाच्या भविष्यावर खूप जास्त प्रभाव पडला.


प्राचीन ग्रीसमध्ये किंग्जगार्डचं आदर्श वाक्य होतं,'भितात सगळेच;

परंतु बहादूर लोक आपल्या भीतीला एका बाजूला ठेवतात आणि पुढे जातात. अनेक वेळा तर ते मरून जातात; परंतु जीत नेहमी त्यांचीच होते.'आपल्या भीतीला जिंकण्याच्या संधीपेक्षा मोठं आव्हान आणखीन काय असू शकते ?


जेव्हा अल स्मिथ न्यू यॉर्कचे गव्हर्नर होते,तेव्हा त्यांनी पण आव्हान देण्याची युक्ती केली.त्या वेळेस सगळ्यात कुख्यात सिंग सिंग जेलमध्ये कोणी वॉर्डन नव्हता.जेलच्या भिंतींना घेऊन अनेक अफवा आणि स्कँडल हवेत पसरवल्या जात होत्या. स्मिथला सिंग सिंगच्या वॉर्डच्या रूपात एका दमदार माणसाची गरज होती.एका लोहपुरुषाची;परंतु कोण? त्यांनी न्यू हैम्प्टनच्या लुइस आर.लॉजला बोलावलं.


"सिंग सिंगच्या वॉर्डन बनण्याच्या बाबतीत तुमचा काय विचार आहे?" त्यांनी स्मित हास्य करत लुइसला विचारलं,लुइस अवाक झाला.सिंग सिंगच्या संकटाची त्याला जाणीव होती.

एक राजनैतिक नेमणूक होती आणि राजनेत्यांच्या मूडवर निर्भर करीत होती.खूप वॉर्डन आले होते आणि येऊन गेले होते.त्यामधून एक तर तीन आठवड्यांपर्यंतच टिकू शकला होता.त्याला आपल्या करियरबाबत चिंता होणं अगदी स्वाभाविक होतं.हे संकट ओढावून घ्यायचं ?


स्मिथने तो मागे पुढे पाहत होता ते पाहिलं.तो आपल्या खुर्चीच्या मागे टेकला आणि हसला," हे बघ तरुण माणसा,मी तुला दोष देत नाही की तुला भीती वाटतेय.काम खूप कठीण आहे.तिथे जाण्याकरता आणि टिकून राहण्याकरता एका खूपच दमदार माणसाची गरज आहे." म्हणून तो गेला आणि तो तिथे टिकला;तिथेच राहून तो त्याच्या वेळेचा एक प्रसिद्ध वॉर्डन बनला.त्याचं पुस्तक '२०,००० इयर्स इन सिंग सिंग'च्या लाखो प्रती खपल्या.रेडिओ बातम्यांनी आणि जेलच्या त्याच्या गोष्टींना डझनवारी सिनेमांना प्रेरित केले. अपराध्यांचे 'मानवीयकरणा'चे त्याचे उपाय जेल क्षेत्रात चमत्कारात गणले गेले.महान फायरस्टोन टायर अँड टायर कंपनीचे संस्थापक हार्वे एस. फायरस्टोनने सांगितले आहे,"मी हे नाही मानत की पगार आणि केवळ पगारामुळेच चांगल्या लोकांना आपल्या कंपनीत आणू शकतो किंवा त्यांना तिथे ठेवलं जाऊ शकतं.

मला वाटतं की,खरं आकर्षण तर कामाचं स्वरूप आहे." 


महान बिहेव्हियरल साइंटिस्ट फ्रेडरिक हर्जबर्ग या गोष्टीशी सहमत आहेत. त्यांनी हजारो लोकांच्या काम करण्याच्या दृष्टिकोनांचे बारकाईने अध्ययन केले, ज्यात फॅक्ट्रीच्या मजुरांना घेऊन सिनियर एक्झिक्युटीव्हपण होते. तुम्हाला काय वाटतं की, त्यांच्या शोधात कोणतं तत्त्वं सगळ्यात प्रेरक राहिलं असेल. त्यांच्या कामाची कोणती बाजू त्यांना सगळ्यात अधिक आनंद देत होती? पैसा? कामाचं चांगलं वातावरण? सुविधा? नाही,यापैकी काहीच नाही. ते सगळ्यात मोठे तत्त्व ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळते ते होतं कामाची प्रवृत्ती. जर काम वेधक आणि आव्हानात्मक आहे, तर लोक ते काम करायला प्रेरित होतील आणि चांगल्या त-हेने करायला प्रोत्साहित होतील.


हेच प्रत्येक सफल व्यक्ती पसंत करते.आव्हान,आत्म -

अभिव्यक्तीची संधी,ती संधी ज्यामुळे तो आपली किंमत,

आपली श्रेष्ठता सिद्ध करू शकेल. जिंकून दाखवू शकेल.या कारणामुळेच तर चढाओढ इतकी लोकप्रिय आहे.श्रेष्ठ होण्याची आकांक्षा महत्त्वपूर्ण होण्याची आकांक्षा.


१०/३/२५

मध्यरात्रीचे सूर्य / The midnight sun

ज्या स्वप्नाचा गेली दहा वर्षे जीव खाऊन पाठलाग केला,जे स्वप्न पाहताना कधी झोप आलीच नाही,ज्याने गेल्या दहा वर्षात खूप रडवले,थकवले,हरवले अशा नुकत्याच साकार होऊ पाहणाऱ्या त्या स्वप्नाची हि कथा,माऊली आपल्या सर्वांसमोर सादर... कारण हे स्वप्न पाहण्याची शक्ती तुमच्याच मुळे मिळाली आहे.... फक्त तुमच्यामुळे !!!


तर,आयुष्याच्या सुरुवातीला भीक मागणाऱ्या आजोबांनी मदत केली होती;त्यांच्या मदतीमधून उतराई व्हायचे,त्यांच्या उपकाराचे कर्ज डोक्यावर होते त्यातून उतराई व्हायचे,या भावनेतून,

भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्र प्रमुख म्हणून असलेली नोकरी 2015 साली सोडून काम सुरू केले. आमच्या या भीक मागणाऱ्या समाजाला वैद्यकीय सेवा,स्वयंरोजगार आणि पुनर्वसन तसेच भिक मागणाऱ्या मुलांचे शिक्षण असे एका मागोमाग एक अनेक प्रकल्प सुरू झाले. 

हे सर्व काम भीक मागणारे लोक जिथे असतात,तिथेच म्हणजे रस्त्यावर,उकिरडा किंवा गटारा जवळ,भर गर्दीतल्या फुटपाथ वर चालते. दीडशे किलोचे साहित्य मोटर सायकल गाडीवर आणि बॉडीवर वागवताना या दहा वर्षात अनेक छोटे-मोठे एक्सीडेंट झाले.वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळी हाडे मोडून घेतली. 


हरकत नाही,चूल पेटवायची म्हटल्यानंतर लाकडं जाळावीच लागतात... !


भिक्षेकर्‍यांच्या घरात चूल पेटावी,म्हणून मी हाडं घातली.. ! 


तर,याचना करणाऱ्या लोकांनी स्वयंरोजगार करावा, सन्मानाने नागरिक म्हणून जगावे यासाठी त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गांनी काम करण्यासाठी प्रवृत्त करायला सुरुवात केली.


हळूहळू तुम्ही सर्वजण मला भेटत गेलात... माझा हूरूप वाढला... तुम्हीच माझे आई बाप झालात... ! 


माझ्या आई बापाने जन्म दिला,तुम्ही कर्म दिले ! 


तर,हे सर्व करत असताना लक्षात आले;की जन्मल्यापासून ते आतापर्यंत शिक्षण किंवा कोणत्याही स्किल्स भिक्षेकरी वर्गाकडे नाहीत.आणि म्हणून नोकरी,धंदा - व्यवसाय यांच्यापासून हे लोक खूप दूर आहेत.यांनी नोकरी धंदा व्यवसाय करावा म्हणून,यांना काहीतरी शिकवायचे म्हटले तर,कुठेतरी बसवून यांना काहीतरी प्रशिक्षण द्यावे लागेल याची जाणीव झाली. 


यानंतर भीक मागणाऱ्या लोकांसाठी एखादे प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र उभे करून तिथे व्यवसायाभिमुख स्किल्स देऊन यांना यांच्या पायावर उभे करावे हा विचार डोक्यात आला,परंतु त्यासाठी एखादी जागा ताब्यात असणं गरजेचं होतं.


मग सरकारी,निमसरकारी,बिगर सरकारी अशा सर्व यंत्रणांना "आम्हाला जागा देता का ?  जागा... ? म्हणत झोळी घेऊन फिरलो. 


"अनेक माणसं भिंती वाचून,छपरापासून,इतरांच्या माये वाचून,

माणूस होण्याचा प्रयत्न करत,रस्त्या रस्त्यात भीक मागत आहेत... यांना माणूस बनवण्याचा प्रयत्न करत आहे... जिथून कोणी उठवणार नाही; अशी भाड्याने का होईना पण जागा देता का ?  जागा....?"


गावकरी होण्यासाठी झटणाऱ्या,या "सम्राटांसाठी मी नट झालो..." मी जिथे जायचो त्या सर्व ठिकाणी माझ्या कामाचे कौतुक व्हायचे....  परंतु जागा द्यायचा विषय आल्यानंतर,आमच्या जागेत हे गलिच्छ लोक येणार ? किती घाण करतील हे लोक ?  असा विचार होऊन आम्हाला कायम नकार मिळत गेले. 


पुण्यातील अनेक बिल्डिंग मधल्या सोसायटी मधील चेअरमन साहेबांचे पाय धरून त्यांचा हॉल रीतसर भाड्याने मागितला,पण अत्यंत प्रेमाने,प्रत्येकाने शेजारच्या बिल्डिंगमध्ये विचारा,असा सल्ला दिला. 


शेजारच्या बिल्डिंग वाल्यांनी,त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगचा रस्ता दाखवला.... 


आम्ही रस्त्यावरचे,शेवटी रस्त्यावरच राहीलो, यांच्यासाठी प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र काढण्याचे स्वप्न दरवेळी भंगत गेले...! 


ज्यांना भीक मागणे सोडायचं आहे,ज्यांना आमच्या केंद्रात काम करायचे आहे,असा वर्ग,दरवेळी मला भेटला;की विचारायचा, 'सर मिळाली का जागा आपल्याला ?' 


अनेक हितचिंतक विचारायचे,'डॉक्टर तुम्हाला जागा मिळत नाही म्हणजे काय ? समाजाचे काम करणाऱ्याला,दानशूर लोक दोन-चार एकर जागा सहज देतात... तुम्हाला चार-पाचशे स्क्वेअर फुटाची जागा मिळेना ?  अहो काय हे... ??' 


'इतके पुरस्कार आणि सत्कार होतात,पण तुम्हाला कोणी जागा का देत नाही ???' 


या सर्वांच्या प्रश्नामुळे माझ्या जखमेवर आपोआप मीठ पडायचे... डोकंच चालायचं नाही...! 


खूप वेळा काम झाल्यानंतर,अंगावरचा apron काढून भिक्षेकऱ्यांमध्येच बसून मी काय करावं,कोणाशी बोलावं,कसा मार्ग काढावा ? याचा डोक्याला हात लावून विचार करत असे...


असा भिक्षेकऱ्यांमध्ये बसलेलो असताना,सहानुभूतीने, भिकारी समजून,माझ्या पुढ्यात भीक म्हणून खूप लोक पैसे टाकायचे...


धडधाकट आहे,अंगावर कपडे पण चांगले आहेत;तरी भीक मागतोय बघ कसा नालायक...अशी माझ्या माघारी,माझ्याच विषयी झालेली कुजबुज सुद्धा मी कितीतरी वेळा ऐकली. 


हे ऐकून,डोळ्याच्या वाटेने अश्रू ओघळायचे...प्रचंड राग यायचा... खूप वेळा वाटायचं,शासनाला किंवा इतर कोणालाच या कामाची गरज वाटत नाही... तर मला तरी ती गरज का वाटावी ? मरू दे.... सोडून देतो उद्यापासून हे सर्व... ! 


मी पूर्णतःहरून फ्रस्ट्रेट होऊन जायचो... 


मी उठणार इतक्यात,मामा मामा,म्हणत चार-पाच वर्षाचं मूल मांडीवर येऊन बसतं... 'तु का ललतो मामा,तुला भूक लागली ?' महिनाभर आंघोळ न केलेलं,काळकुट्ट एक बाळ माझ्या गालाचा मुका घेत विचारतं.... 


भीक मागण्यात व्यस्त असलेली त्याची आई मागून बोलते, ' हा मामाला भूक लागली आसंल,म्हणून मामा रडतो...!'


भूक हेच आमच्या लोकांसाठी अंतिम सत्य... ! 


भुकेच्या पलीकडे काही नाहीच... ! 

भुकेसाठी लढायचं .... भुकेसाठी मरायचं... ! जन्माला येऊन एवढं एकच करायचं...!!!


या भुकेची शिसारी आली आहे आता मला...! 


भूक.... मग ती कसलीही असो.... माणसाला वाकायलाच लावते... ! 


यानंतर ते बाळ त्याच्याकडे एकमेव शिल्लक असलेला वडापाव माझ्या तोंडापुढे धरतो आणि म्हणतो,'तू खा मामा,माजं पोट भरलंय...' 


ज्याच्याकडे खूप काही आहे,त्याने देणं आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याने देणं... यात खूप फरक आहे. 


प्रश्न एकच,खरा श्रीमंत कोण ??? 


आत्तापर्यंत सावकाशपणे वाहणारे अश्रू नकळतपणे मग महापूर होतात... 


भावनेच्या भरात,त्या नागड्या पोराला मी घट्ट मिठी मारतो... तेवढ्यातूनही तो मामा मामा म्हणत मला घास भरवतो...माहित नाही कसा, पण तो बाळकृष्ण होतो आणि मी सुदामा होऊन जातो... !


यानंतर मला माझीच लाज वाटायला लागते...


हि नागडी पोरं अशीच नागडी जगणार,मोठी होणार, भूक भूक करत नागडी आणि बेवारस म्हणूनच मरणार...


स्वतःकडे काही नसताना ज्याने तुला वडापाव खाऊ घातला,त्याला तू आयुष्यभर उपाशी ठेवणार ? 


ज्यांनी तुला मामा म्हटलं,काका म्हटलं,बाळा,सोन्या म्हणत नातू,मुलगा मानलं,ज्यांनी तुझ्याकडे आशेने डोळे लावले... त्यांना असंच रस्त्यावर बेवारस मरायला सोडून देणार ? 'सोडून देतो सर्व म्हणताना,लाज वाटत नाही का रे तुला ?' मीच हा माझा मलाच प्रश्न विचारायचो...  


डोक्यात प्रचंड गदारोळ उठायचा...


पण या आणि अशा प्रकारच्या अनेक प्रसंगांनी मला फ्रस्ट्रेशन मधून बाहेर काढलं,लढण्याचं सामर्थ्य दिलं. 


यानंतर हात वर करून शरणागती पत्करलेला मी,पुन्हा पुन्हा सज्ज व्हायचो...! 


हे असं.... एक नाही,दोन नाही,पाच नाही,तर तब्बल दहा वर्षे म्हणजे आजपर्यंत सुरूच आहे. 


दहा वर्षे मी या गोष्टीची दाहकता भोगतो आहे...


मधल्या काळात तुम्हा सर्वांसारखाच... एक मोठ्या मनाचा... मनाची गडगंज श्रीमंती असणारा भला माणूस निसर्गाने माझ्या झोळीत टाकला. 


त्यांचे नाव दानिशभाई शहा !!! 


हातात पुरस्कार आणि कपाळावर नकार अशा माझ्यासारख्याच्या पाठीवर त्यांनी हात ठेवला. 


बिबवेवाडी परिसरात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या सोयी करता त्यांची मालकी हक्काची बिल्डिंग आहे. त्यापुढील साधारण दोन हजार स्क्वेअर फुट जागा पार्किंग साठी त्यांनी शिल्लक ठेवली होती. 


ही मोकळी जागा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी मोफत वापरण्यास आपल्याला देऊ केली आहे. 


त्यांनी पाठीवर ठेवलेल्या हातामुळे माझी दहा वर्षाची घुसमट एका क्षणात थांबली. 


काही माणसं असे दैवी हात घेऊन जन्माला येतात आणि एखाद्याच्या आयुष्याचं भलं करून जातात... वर आपण काहीच केलं नाही या अविर्भावात नामा निराळे होतात... ! 


मला या माणसाचा हेवा वाटतो...!!! 


ते फक्त जागा देऊन थांबले नाहीत,स्वतःच्या घरचं कार्य आहे असं समजून चारही बाजूंनी पत्र्याचे शेड आणि डोक्यावर छप्पर करून दिले... दरवेळी मला ते या जागेवर बोलावून विचारायचे डॉक्टरसाहेब आणखी काय करूया ? दरवेळी मी घुम्यागत त्यांच्या पायांकडे पाहत राहायचो... काही मागायला माझी जीभ उचलायची नाही..मी बोलत नाही असे पाहून... ते इकडे तिकडे,

जागेकडे पाहत,मागे हात बांधून फिरत राहायचे..फिरता फिरता स्वतःशीच बोलत राहायचे,'उन्हाळ्यात उकडणार... मोठे पंखे लागतील...थंडीच्या दिवसात लवकर रात्र होते, लवकर अंधार होईल.... चांगल्या लाईट इथे लागतील...प्रत्येक वाक्यानंतर लाईट आणि पंख्यांची ऑर्डर दिली जायची.पुढच्या वेळी असंच हात मागे बांधून फिरता फिरता मला विचारायचे, 'डॉक्टर साहेब तुम्ही काहीतरी बोला ना,तुम्ही काहीच बोलत नाही... ' त्यांच्या इतक्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला मी....  भिजलेल्या मांजरागत भेदरून जायचो... मी काय बोलणार ? 


पुन्हा स्वगत म्हणायचे,आपल्या कडे आपल्या जागेत आता रोज पाहुणे येणार,त्यांचे सामान ते कुठे ठेवणार.? 


डाव्या तळहातावर उजव्या हाताच्या बोटांनी ताल धरत, गाणं म्हणाल्यागत ते बोलत राहायचे... काय करूया...? अजुन काय करूया...? काय काय करूया.... ??? म्हणत पुन्हा ते कोणालातरी फोन लावायचे,यापुढे लोखंडी कपाट आणि लॉकरची ऑर्डर,सीसीटीव्हीची ऑर्डर,रेडीमेड टॉयलेट ची ऑर्डर जायची...


त्यांनी तळ हातावर धरलेला तो ताल होता;की माझ्या हृदयाची धडधड... हे मात्र मला कधी समजलं नाही...! 


माझ्या या लोकांना,इतर लोक भिकारी म्हणतात,मी त्यापुढे जाऊन त्यांना भिक्षेकरी किंवा याचक म्हणतो... 


हा देव माणूस याही पुढे जाऊन माझ्या लोकांना पाहुणे म्हणतो... !


भीक मागणाऱ्या समाजात मी उठतो बसतो, त्यांच्याबरोबर माझं नातं तयार झालंय म्हणून मला त्यांच्याविषयी जिव्हाळा आणि प्रेम वाटणे स्वाभाविक आहे पण दानिश भाईंचं काय ? 


त्यांना या लोकांबद्दल का जिव्हाळा वाटत असावा ? मी यावर खूप विचार करत असे. 


पाऊस पडून गेल्यानंतर मागे एक आल्हाददायक वातावरण तयार होते... मातीतून एक सुगंध यायला लागतो... पाऊस पडून गेला तरी मागे त्या पावसाच्या पाऊलखुणा उरतात...! 


दया,क्षमा,शांती,सहानुभूती,करुणा,माया,प्रेम या सर्वांचं मिश्रण असणारे अनेक महापुरुष आपल्याकडे होऊन गेले... या महापुरुषांनी आपले अवतार संपवताना आपल्या पाऊलखुणा मागे ठेवल्या.... 


यातलीच एक पाऊलखुण म्हणजे दानिश भाई शहा असावेत ! 


पाऊस पडून गेल्यानंतरचा सुखद गारवा आणि मातीचा मंद सुवास म्हणजे दानिश भाई...


दया,करुणा, प्रेम निर्माण होण्यासाठी अशांना एखादा प्रसंग किंवा व्यक्ती समोर असण्याची गरज वाटत नाही... यांचे पात्र कायम प्रेम आणि करुणा यांनीच काठोकाठ भरलेले आणि भारलेले असते...


तहानलेल्या बाळाला पाहून आईला जसा पान्हा फुटावा, तसं एखाद्या गोरगरिबाचे दुःख आणि वेदना पाहून यांच्या पात्रालाही पान्हा फुटतो... आणि मग झिरपत राहतात जिव्हाळा,माया आणि प्रेम नावाच्या भावना... !


यातलंच एक नाव श्री.दानिश भाई... !!!


आता जागा मिळण्यासारखी अशक्यप्राय गोष्ट दानिशभाई मुळे शक्य झाली.


दहा वर्षांची माझी फरपट थांबल्यानंतर,आता मला काय वाटत असेल,हे मी कोणत्या शब्दात,कसं सांगू ? 


आपण भविष्यात जेव्हा कधी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आणि रोजगार  केंद्र सुरू करू त्यावेळी तेथील प्रकल्प कसे असावेत याचा विचार खूप वर्षांपूर्वीच मी आणि मनीषाने करून ठेवला होता. 


आपण जे काही प्रशिक्षण आणि रोजगार देणार आहोत त्यामुळे आपल्याकडे कामासाठी येणाऱ्या लोकांच्या शरीराला कोणत्याही प्रकारे इजा होता कामा नये, आपण जे काही करू त्यामुळे प्रदूषण तर वाढणार नाहीच;परंतु अस्तित्वात असलेले प्रदूषण कमी होईल, कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल अशा व्यवसायाची प्रशिक्षण द्यायचे,जेणेकरून गरीबातला गरीब व्यक्ती सुद्धा या व्यवसायाच्या आधारावर जगू शकतो.... असे आणि आणखीही बरेच काही निकष आम्ही ठरवले होते. 


त्या आधारावर खालील चार प्रकल्प या जागेत सुरू करायचे ठरवले आहे.


१. रस्त्यावर पडलेल्या फुलांची पावडर (चुर्ण)


वैद्यकीय त्यातूनही आयुर्वेदिक क्षेत्रात असल्यामुळे समजले,डोक्याला लावण्यासाठी आयुर्वेदिक तेल, विविध आजारांवर उपयुक्त असे मसाजसाठी तेल, अनेक मलम,त्वचेची निगा राखणारे क्रीम यासाठी अनेक कंपन्यांना खरोखरच्या फुलांची पावडर हवी असते. (हल्ली ऑरगॅनिक / नैसर्गिक चा बोलबाला असल्यामुळे कंपन्यांचा भर कृत्रिम रंग आणि वास (Essence) न वापरण्याकडे आहे )


हे आमच्या पथ्यावर पडले...! 


अशी फुले आम्ही गोळा करून त्यांची पावडर करून या कंपन्यांना विकणार आहोत. 


अनेक फुलं देवाच्या दारात,मंदिराबाहेर पडलेली असतात,त्याला निर्माल्य म्हटले जाते.... 


अनेक फुलांच्या पाकळ्या,फुलविक्रीच्या दुकानाबाहेर किंवा रस्त्यावर अनेकदा उकिरड्यावर पडलेल्या असतात, त्याला कचरा म्हटले जाते...


आपण कोणाच्या संगतीत आहोत त्यावरून आपली प्रतिष्ठा ठरते हेच खरं ...!!! 


आपण "निर्माल्य" की "कचरा"... ? 


हे आपण कुणाच्या सहवासात आहोत त्यावर ठरते. 


असो. 


आमचे भीक मागणारे लोक (तरुण मुलं) फिरून हे निर्माल्य आणि कचरा उचलतील,किलोच्या भावाने आपण तो विकत घेऊन त्यांना पैसे देऊ. 


ज्यांना आपण बैठे काम करण्यासाठी निवडले आहे, असे आपले वृद्ध लोक फुलांची रंग आणि जाती नुसार (जात म्हणजे गुलाब,झेंडू,निशिगंधा,जास्वंद वगैरे वगैरे ) वर्गवारी करतील. 


यानंतर या फुलांचे शुद्धीकरण करून त्यांना विशिष्ट तापमानात सुकवले जाईल.या प्रक्रियेत सर्व अशुद्धी (Impurities) इथे नष्ट होतील. 


यानंतर वर्गवारीनुसार फुलांची पावडर (चूर्ण) केले जाईल. 


स्वच्छतेचे सर्व निकष पाळून (Extremely hygienic conditions) याचे पॅकिंग केले जाईल,त्यावर स्टिकर लावले जाईल. यातील बऱ्याचशा बाबी मशीन वर होणार आहेत,या मशीन अत्यंत सुरक्षित आणि एका क्लिकवर चालणाऱ्या आहेत... जवळपास पाच लाखांच्या या मशिन्स आपल्याला सेंचुरी एन्का हि कंपनी देणार आहे.माझे ज्येष्ठ स्नेही डॉ.निलेश लिमये सर यांचा या मशीन घेऊन देण्यात सिंहाचा वाटा आहे. 


तर,आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना प्रोफेशनली आपण हे प्रॉडक्ट विकणार आहोत, मिळालेला सर्व पैसा हा आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना रोजगार म्हणून देणार आहोत.


आपल्या या प्रकल्पात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जात आहेत.... 


रस्त्यावरचा कचरा आणि निर्माल्य उचलले जाईल... (जे नदीत जाते आणि नद्या प्रदूषित होतात) 


कचरा आणि निर्माल्या मधून तयार होणारी लक्ष्मी... 


कितीतरी भुकेल्यांची भूक भागवून अन्नपूर्णा होईल... 


भीक मागणाऱ्या लोकांना स्वयंपूर्ण बनवून सन्मानाने जगण्याचा आशीर्वाद देईल ! 


 २. शोभेचा बुके


तुळशी बागेत खोटे परंतु अत्यंत आकर्षक मोती मिळतात,सोन्यासारख्या दिसणाऱ्या तारा मिळतात. माझी आई या सर्व बाबींचा उपयोग करून अत्यंत सुंदर असा एक बुके तयार करते. ₹फुलांचा बुके कितीही महाग असला आणि छान असला तरी तो चार दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. 


माझी आई,जो बुके बनवते,त्याला फार खर्च येत नाही, दिसतो इतका सुंदर,की कुणीही प्रेमात पडावं... ! 


आणि याचे सौंदर्य किमान पाच वर्षे टिकते. 


माझ्या आयुष्यातली प्रथम शिक्षिका,प्रथम प्रशिक्षिका माझी आई... लहानपणी डोळे उघडले तेव्हा तीच दिसली होती...  तेव्हा मी तीच्या छायेखाली होतो.... 


आज थोडा वयाने मोठा झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा तीच दिसली... आता तीच्या छायेखाली माझ्यासारखे अनेक अभिजीत घालत आहे...


या प्रकल्पात तिला आम्ही प्रशिक्षिका म्हणून येण्याची विनंती केली आहे... 


आईच ती... नाही म्हणेल कशी.... ? 


आईच्या मार्गदर्शनानुसार,आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना विकत घेण्याची विनंती करू.रोटरी क्लब,लायन्स क्लब तथा अन्य संस्थांना कार्यक्रमावेळी फुलांचे बुके वापरण्या ऐवजी आमचे बुके विकत घेण्याची विनंती करू. 


यातून जो निधी मिळेल,तो आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस दिला जाईल. 


३. लिक्विड वॉश


कपडे आणि भांडी सोडून सर्व डाग (फरशी,किचन कट्टा,गाड्या,टॉयलेट,खिडकीच्या काचा,टीव्ही अथवा इतर वस्तूंच्या ग्लासेस, आणखीही बरेच काही) साफ करणारे लिक्विड वॉश आपले लोक या ठिकाणी तयार करणार आहेत.यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान आणि फॉर्म्युला मेहता सोप कंपनी यांनी आपल्याला विनामूल्य देऊ केले आहे.(ज्येष्ठ मेहता सर हे दानिश भाईंचे अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत,या जन्मात तरी दोघांचे ऋण मला फेडणे शक्य नाही)


हे लिक्विड वॉश आपण,समाजामध्ये लोकांनी विकत घ्यावे यासाठी विनंती करणार आहोत,त्याचप्रमाणे आयटी कंपन्या,मॉल्स अशा मोठ्या संस्थांच्या हाउस कीपिंग डिपार्टमेंटला भेटून आपले लिक्विड वॉश विकत घेण्यासाठी त्यांना विनंती करणार आहोत. 


यातून मिळणारा निधी,आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत. 


Big Bucks या कंपनीचे मालक श्री विपुल भाई शहा यांनी सुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. 


४. फेकलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करणे... 


ज्यांना शिवणकला येते अशा वृद्धांना आपण या ठिकाणी बसवून त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेणार आहोत. 


अंध आणि अपंग लोकांना या पिशव्या विकायला लावणार आहोत. 


समाजामध्ये प्लास्टिक पिशव्या न वापरण्याविषयी अपील करणार आहोत. 


पिशव्यांची विक्री करून,मिळणार आहे तो निधी, पिशव्या शिवणाऱ्या,पिशव्या विकणाऱ्या आणि समाजात प्रबोधन करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत.


तर असे या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूप आहे... ! 


हा प्रकल्प म्हणजेच आपल्याकडे एक नवीन बाळ येणार आहे... ! 


बाळाचं नाव काय ठेवायचं ? बारसं कधी करायचं ? अशी आमच्याकडे लगबग सुरू आहे... 


भिक्षेकर्‍यांसाठी प्रशिक्षण केंद्र / रोजगार केंद्र सुरू करण्यासाठी जागा हवी...  हे दहा वर्षे उरात जपलेलं स्वप्न पाठलाग करून सुद्धा प्राप्त झाले नाही,मी आशा सोडली होती...


जेव्हा कधी या प्रकल्पाचा विचार करायचो,तेव्हा कायम समोर काळाकुट्ट अंधार दिसायचा...  अमावस्येच्या काळ्याकुट्ट रात्री सारखा ! 


परंतु अनेक अनाकलनीय घटना माझ्या सुद्धा नकळतपणे घडत गेल्या,आणि हे राखेत निपचित पडलेलं... विझत चाललेलं स्वप्न, नव्या जोमानं मशाल होत पुन्हा पेटून उठलं... 


या मशालीच्या प्रकाशाने माझे डोळे दिपून गेले... 


डोळ्यासमोरच्या काळ्याकुट्ट अंधारात दूरवर दिसणारा अत्यंत प्रखर आणि तेजस्वी असा हा प्रकाश म्हणजे माझ्या आयुष्याच्या मध्यरात्री उगवलेला जणू सूर्य वाटला... !


ज्या भीक मागणाऱ्या समाजासाठी आपण काम करतो, त्यांच्याही आयुष्यात असाच काळाकुट्ट अंधार आहे ; या प्रकल्पाच्या निमित्ताने त्यांच्या सुद्धा घरात आता दिवा लागेल... सन्मानाने ! 


दुसऱ्याचा प्रकाश उधार घेऊन जे जगतात त्यांना ग्रह म्हणतात.... ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो, ते तारे म्हणून मिरवतात...


आजपर्यंत माझ्या आणि मनीषा च्या आधाराने जगलेले जे ग्रह आहेत,ते या प्रकल्पाच्या निमित्ताने तारे होतील.... 


आयुष्याच्या या टप्प्यावर,काळ्याकुट्ट मध्यरात्री,

आता ते स्वतःच सूर्य म्हणून उगवतील... ते स्वयंप्रकाशित होतील... स्वयंपूर्ण होतील... तेजस्वी तारा होतील सूर्यासारखा!


ठरलं... आता ठरलं.... 


आपल्या या नवीन बाळाचं नाव 'मध्यरात्रीचे सूर्य...!!!" हेच ठेवायचं ठरलं...


तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने शुभेच्छांमुळे इथवर तरी आलो....


आता सगळ्यात मोठे आव्हान आणि माझी परीक्षा इथून पुढे सुरू होईल...


सुरुवातीच्या टप्प्यात आपण साधारणपणे २५ लोकांना या प्रकल्पात सहभागी करून घेणार आहोत. 


आमच्या या लोकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून ...

 १. प्रत्येक व्यक्तीस रुपये १५० प्रतिदिन


२. सकाळचा चहा नाष्टा आणि दुपारचे जेवण. 


३. याचसोबत कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा / किराणा


अंदाजे रुपये ३०० दर दिवशी एका व्यक्तीसाठी खर्च आहे... 


२५ लोकांसाठी रुपये ७५०० प्रति दिवस...


सुट्ट्या वगळता २५ दिवस जरी काम झाले तरी महिन्याचा खर्च रुपये १,८७,००० (एक लाख सत्याऐंशी हजार)... 


यात कच्चा माल,फिरतीसाठी वाहन,पेट्रोल,मेंटेनन्स म्हणजे लाईट बिल वगैरे वगैरे खर्च समाविष्ट नाहीत. 


आमच्याकडे काम करणाऱ्या सर्वांना रोजच्या रोज पगार देणे मला भाग आहे... 


रोजच्या रोज चूल पेटवायची असेल तर रोज त्यात लाकडं सुद्धा घालावी लागतील...!


असो...


हा प्रकल्प नेमका काय आहे,कुठून कुठवर आलो, यामागे नेमकं उद्दिष्ट काय आहे, फलित काय मिळेल, आव्हानं काय आहेत याची सर्वांगीण कल्पना यावी, यासाठी आपल्यासमोर,वरील प्रमाणे सर्व काही व्यक्त केलं आहे. 


चैत्र शु. १ गुढीपाडवा,अर्थात ३० मार्च २०२५  या शुभ दिनापासून प्रकल्प सुरू करण्याची मनीषा आहे...!


पुढे जे जसे घडेल तसे नक्की कळवत राहीन...


प्रश्न खूप आहेत,पण तुम्हा सर्वांच्या साथीनं उत्तरं सुद्धा मिळतील,असा विश्वास आहे... 


इथवर ज्याने आणून सोडलंय,तो पुढे न्यायला नाही कसा म्हणेल...हि श्रद्धा आहे...


आपण दिलेल्या आशीर्वाद आणि शुभेच्छांवर, मनापासून निष्ठा आहे...


मला काही नको... फक्त सोबत रहावे,मी चालत राहीन, प्रयत्न करत राहीन, वाटेत मात्र कधी मोडला माझा कणा,तर फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा...!!! 


१ मार्च २०२५


आपले स्नेहांकित,


डॉ.अभिजीत आणि डॉ.मनीषा सोनवणे

डॉक्टर फॉर बेगर्स