* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२०/८/२३

शोध 'शून्या'च्या उगमाचा - The search for the origin of 'zero' - Amir Axel

अंकशास्त्रात अत्यंत महत्त्वाचा असणारं 'शून्य' कुणी आणि कसं शोधलं याचं कोडं इस्त्रायली गणितज्ज्ञ अमीर ॲक्झेल यांना लहानपणापासून पडलं होतं.गणिताचा अभ्यास करतानाच या शून्याच्या उगमाचा पुराव्यासकट शोध घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला.त्यासाठी जगभर उभा आडवा प्रवास केला.शून्याबरोबरच वेगवेगळ्या प्राचीन संस्कृतींतील गणनपद्धतीच्या इतिहासाचाही शोध घेणाऱ्या ॲक्झेल यांचा हा रोमांचक प्रवास.


भारतीय तत्त्ववेत्ता ब्रह्मगुप्त याने शून्याचा शोध लावून अंकगणितात बहुमूल्य भर टाकली,असं आपण आजपर्यंत ऐकत आलो आहोत आणि साऱ्या जगाला अभिमानाने सांगतही आलो आहोत.भारतात पाचव्या किंवा सहाव्या शतकात शून्याची संकल्पना अस्तित्वात आली,मग अरबांमार्फत व्यापाराच्या माध्यमातून ती युरोपात पोहोचली,असेच उल्लेख आजपर्यंत आपण ऐकले.मात्र,एवढ्या माहितीवर अमीर ॲक्झेल नावाच्या

एका इस्त्रायली गणितज्ञाचं समाधान झालं नाही.त्यांना स्वत:च्या डोळ्यांनी शून्याच्या उगमाचा ठोस पुरावा पाहायचा होता. लहानपणापासून हा एकच ध्यास बाळगून असलेल्या ॲक्झेल यांनी त्यासाठी अनेक देशांतून वेडावाकडा प्रवास केला. 'फाइंडिंग झीरो' हे त्यांचं पुस्तक एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की तो पूर्ण करण्यासाठी माणूस काय काय करू शकतो याचीच प्रचिती देतं.

आपल्याला वाटतं त्यापेक्षा आकडे आणि गणनप्रक्रिया या खूप प्राचीन गोष्टी आहेत. झाँ द हिंझेलिन या बेल्जियन भूसंशोधकाला १९६० मध्ये सध्याच्या युगांडा आणि काँगोच्या सीमाप्रदेशात,'इशांगो' मध्ये एक जरा वेगळंच दिसणारं हाड सापडलं.ते बबूनच्या मांडीचं होतं. त्यावर बऱ्याच खुणा होत्या.त्या खुणा म्हणजे गणना करण्याची पद्धत असावी,असा अंदाज संशोधनानंतर बांधण्यात आला.हे हाड वीस हजार वर्षांपूर्वीचं,म्हणजे पुराश्मयुगीन काळातील आहे.त्यानंतर गणनपद्धतीत आपण आज वापरतो ते आकडे कसे जन्माला आले,प्रथम कशासाठी

वापरले गेले,हे रहस्य अजूनही अंकशास्त्रज्ञांना भुरळ पाडत असतं.ॲक्झेल देखील त्यातलेच एक.गणित आणि विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या ॲक्झेल यांना आकड्यांच्या मुळाशी जायचं वेड होतं. वाचकालाही आपल्याबरोबर आकड्यांच्या शोधाची सफर घडवावी,

असं वाटत असल्यामुळे त्यांनी आकडे आणि इतर विषयांवर वीस पुस्तकं लिहिली. पहिलीत प्रवेश घेतलेल्या अमीर ॲक्झेल यांच्या वर्गात शिक्षिकाबाईनी प्रश्न विचारला, "शाळेत काय काय शिकणार ?" प्रत्येकजण आपापल्या मगदुराप्रमाणे उत्तर देत होता. छोट्या ॲक्झेलने उत्तर दिलं," हे आकडे येतात कुठून?" हा प्रश्न पुढेही ॲक्झेलच्या डोक्यात रुंजी घालत राहिला.

ॲक्झेलचे वडील एका आलिशान जहाजाचे कप्तान होते.हे जहाज हौशी प्रवाशांना भूमध्य सागरातील प्रेक्षणीय शहरांची सहल घडवून आणत असे.ते जहाज पुराणप्रसिद्ध कोर्फू,इबिझा,माल्टा या बेटांसह जुगारासाठी प्रसिद्ध असलेल्या माँटे कार्लोला भेट द्यायचं.कप्तानाला अधूनमधून त्याचा कुटुंबकबिला बरोबर न्यायची मुभा असायची.ॲक्झेल कुटुंबीयसुद्धा बऱ्याच वेळा अशा सफरीवर जात असत.त्यामुळे वर्षातला बराच काळ अमीर शाळेत जाऊ शकत नसे.मग हा बुडालेला अभ्यास भरून काढण्यासाठी त्याला खास शिकवणी लावली जायची.शिवाय जहाजावर तो रोज काही काळ स्वतः अभ्यास करत असे आणि घरी परतल्यावर शाळेची परीक्षा देत असे.हे जहाज मोनॅकोला पोहोचलं, की नांगर टाकला जायचा आणि एका जलद मोटरबोटीने जहाजावरचे प्रवासी आणि सेवकवर्ग किनाऱ्यावर पोहोचायचे.रात्री जहाजावरले बहुतेक प्रवासी तिथल्या माँटे कार्लोच्या कॅसिनोत हजेरी लावत असत.अमीर ॲक्झेल आणि त्याची बहीण इलाना यांना ते अल्पवयीन असल्यामुळे या जुगारी अड्ड्यात जाण्यास बंदी असायची.मग ही दोघं कॅसिनोच्या बाहेर जहाजावरील काही नोकरांबरोबर किंवा एकमेकांशी खेळत वेळ काढत असत.अमीरच्या वडिलांचा एक वैयक्तिक सहायक होता,त्याचं नाव 'लोट्झी'.त्याच्याबरोबर राहण्यात दोघांना मजा यायची.कॅसिनोच्या आत काय काय चालू असेल,

याबद्दल ती दोघं फक्त कल्पनाच करू शकायची.पण एक दिवस त्यांचं नशीब खुललं. एक दिवस लोट्झीने कॅसिनोच्या दरबानाला सांगितलं,की 'मुलांना त्यांच्या आईकडे ताबडतोब न्यायला हवं,काही तातडीची गरज उद्भवली आहे.'आणि उत्तराची वाट न पाहता तो मुलांना घेऊन सरळ कॅसिनोच्या आत शिरला. 

कॅसिनोत मुलांना प्रवेश नसतो,त्यामुळे कुठल्याही क्षणी आपल्याला गचांडी धरून रस्त्यावर फेकून देण्यात येईल,ही भीती अमीरला सतावत होती.पण तसं काही घडलं नाही. कॅसिनोत मोठमोठाली टेबलं होती.त्यांवर मोठमोठे आकडे लिहिलेले होते.पलीकडे मोठ्या घमेल्यासारखं एक चक्र होतं.त्यातही आकडे होते.

टेबलांवरचे आणि त्या फिरत्या चक्रातले आकडे एकसारखेच होते.चक्र फिरू लागलं की त्यात चेंडू टाकला जात होता.अमीरला त्या आकड्यांची भुरळ पडली.चक्रात चेंडू फिरता फिरता सात आकड्याच्या खाच्यात पडला.'ही तर एक अविभाज्य संख्या आहे.' लोट्झी म्हणाला. अमीरला त्या वाक्याचं कुतूहल वाटलं. लोट्झीकडे नेहमीच काही तरी महत्त्वाची माहिती असायची तशीच याबाबतही असणार,हेअमीरने ओळखलं. यानंतर त्या जहाजाच्या सफरीत लोट्झीने ॲक्झेल यांना गणिताचे प्राथमिक धडे द्यायला सुरुवात केली.

एक दिवस ॲक्झेल यांनी लोट्झीला विचारलं, "हे आकडे कुठून आले? ते कुणी तयार केले ?" "खरं सांगायचं तर ते कुणालाच ठाऊक नाही." लोट्झी म्हणाला,"मला जेवढी माहिती आहे त्यानुसार युरोपात जे आकडे वापरले जातात त्यांना 'अरबी आकडे' म्हणतात.मुळात ते 'हिंदू आकडे' आहेत म्हणे.त्यामुळे काही वेळा त्यांना हिंदू-अरबी असंही म्हटलं जातं.मागे एकदा तुझ्या वडलांबरोबर मी अरबी बंदरात थांबलो होतो त्या वेळी मी

तिथे वापरण्यात येणारे आकडे उतरवून घेतले,पण आपण वापरतो त्या आकड्यांमध्ये आणि अरबांच्या वापरातल्या आकड्यांमध्ये 'एक' हा आकडा सोडला तर कसलंच साम्य नाही.' ॲक्झेल यांच्या बालमनात आकड्यांबद्दलचं कुतूहल अशा तऱ्हेने चाळवलं गेलं.यानंतर जेव्हा 

ॲक्झेल जहाजावर सफरीला गेले त्या वेळी जहाज ग्रीसला गेलं.इथे लोट्झीने अमीर यांना ग्रीक आकड्यांची आणि ग्रीकांनी गणितात केलेल्या प्रगतीची माहिती दिली.'ग्रीक लोक आकड्यांसाठी अक्षरं वापरायचे.त्यांना 'शून्य' माहीतच नव्हतं.तरीही ग्रीकांनी इ.स.पूर्व पाचव्या शतकात मोठमोठी बांधकामं केली.प्रचंड इमारती उभारल्या.' जहाज पाँपेईला पोहोचलं त्या वेळी लोट्झीने अमीर यांना रोमन आकड्यांचा परिचय करून दिला.तेही आकड्यांसाठी अक्षरंच वापरत आणि त्यांनाही शून्य माहीत नव्हतं;पण त्यांनी भूमितीत अचंबा वाटावी अशी प्रगती केली होती. लोट्झीकडून ॲक्झेल यांना अशी बरीच माहिती मिळत गेली.'लोट्झीने मला गणिताबद्दलची जेवढी माहिती दिली तेवढी आणि तशी माहिती मला शाळेत कधीच मिळाली नसती.त्या गणितप्रेमीमुळे माझं आकड्यांबद्दलचं प्रेम वाढीस लागलं,' असा उल्लेख अमीर ॲक्झेल आवर्जून करतात. प्राथमिक पदवी (मॅट्रिक) मिळवल्यानंतर अमीर यांनी इस्रायली लष्करात सक्तीची सेवा केली. त्यानंतर १९७२ मध्ये त्यांना बर्कले इथल्या कॅलिफोर्निया विद्यापीठात गणित विषयात पदवीचं शिक्षण घेण्याकरिता प्रवेश मिळाला.

अमेरिकेकडे प्रयाण करण्यापूर्वी निरोप देताना लोट्झी त्यांना म्हणाला, "तू अगदी लहान असताना माझ्याकडे 'आकडे कुठून आले' अशी विचारणा केली होतीस,

आठवतं? कदाचित तुला ते अमेरिकेत कळू शकेल.मागे एकदा मी एका वैज्ञानिक नियतकालिकामध्ये काही माहिती वाचली होती.एका फ्रेंच पुरातत्त्वज्ञाने आशियामध्ये आकड्यांच्या उगमाबद्दल काही पुरावे मिळवले होते,असं त्यात लिहिलं होतं. शून्यासंबंधीचं ते संशोधन प्रसिद्ध झालं त्याला एक तप तरी होऊन गेलं असेल बघ.मला नक्की आठवत नाही.माहिती मिळाली तर बघ!" कॅलिफोर्निया विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून अमीत गणित आणि सांख्यिकी विषयाचे प्राध्यापक बनले.लग्न करून ते बोस्टनला राहू लागले.पुढे २००८ मध्ये डॉ.अँड्रेस रोयमर नावाच्या मेक्सिकोत राहणाऱ्या जुन्या दोस्ताच्या आमंत्रणामुळे अमीत मेक्सिको सिटीत गेले. तिथल्या वस्तुसंग्रहालयाला ॲक्झेलनी भेट द्यावी असं रोयमरना वाटत होतं.या संग्रहालयाची भेट ॲक्झेल यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली.संग्रहालयाच्या दारातून आत शिरल्याबरोबर समोर एक वर्तुळाकृती दगड होता.बारा फूट व्यासाच्या या पाषाण वर्तुळाचं वजन चोवीस (ब्रिटिश) टन होतं.त्याच्या मध्यभागी ॲझ्टेक

सूर्यदेव-टोनातिऊचा चेहरा होता.ही प्राचीन दिनदर्शिका असावी असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. माया संस्कृतीत तर याहूनही जुने म्हणजे इ. स. पूर्व ३७००च्या सुमाराचे चित्रलिपीतले आकडे सापडतात.संग्रहालयातील माया आणि ॲझ्टेकांची चित्रलिपीतील आकडेमोड बघून ॲक्झेल यांना पुन्हा एकदा आकड्यांचं मूळ शोधावंसं वाटू लागलं.आकड्यांचं मूळ भारतात आहे,हे लोट्झीने

खूप आधीच सांगितल्याचं त्यांना आठवलं.त्यामुळे त्यांनी भारतात जायचं नक्की केलं.त्याआधी त्यांनी भारताची जास्तीत जास्त माहिती मिळवायचा प्रयत्न केला.भारतात जाऊन आलेल्या मित्रमंडळींशी चर्चा केली.हिंदू, बौद्ध आणि जैन धर्म,भारतीय संस्कृती, भारतातील प्रमुख भाषा वगैरे बाबींवर त्यांनी सुमारे वर्षभर वाचन केलं.या वाचनाच्या केंद्रस्थानी भारतीय तत्त्वज्ञान आणि गणित हे विषय होते.या वाचनातून ॲक्झेल यांची खात्री पटली,की भारतीय माणसालाच सर्वप्रथम 'शून्य' आणि 'अनंत' या संकल्पना सुचल्या असणार. कारण इतका अमूर्त विचार युरोपियन माणसाला करता येणं शक्य नव्हतं.पुढे कधी तरी या संकल्पना अरबांकडून युरोपात आल्या आणि रुजल्या असाव्यात,आणि त्याआधारे खरं तर पाश्चात्त्य प्रगतीचा पाया घातला गेला असावा अशी त्यांना खात्रीच वाटू लागला.१० जानेवारी २०११ रोजी अमीर दिल्लीत येऊन पोहोचले.त्यांच्याजवळ सी.के.राजू या प्राध्यापकांचा पत्ता होता.२००९ मध्ये सिडनीत 'विज्ञानाच्या इतिहासा संबंधी एक चर्चासत्र झालं होतं.

या चर्चासत्रात प्रा.राजूंच्या निबंधामुळे प्रचंड खळबळ आणि वादावादी झालेली होती.याचं कारण 'पाश्चात्त्य ज्या संकल्पना ग्रीक गणितींनी प्रथम मांडल्या असं म्हणतात त्या सर्व संकल्पना ग्रीकांनी 'भारतीयांकडून मिळवल्या होत्या', असं राजूंनी या चर्चासत्रात ठामपणे म्हटलं होतं. त्याबद्दल राजूंची टिंगलटवाळीसुद्धा झालेली होती. तेव्हापासून अमीर आणि प्रा.राजू परस्परांच्या संपर्कात होते.त्या ई-मैत्रीचं रूपांतर आता प्रत्यक्ष भेटीत झालं होत.अमीर यांना राजूंचा ठामपणा,त्यांच्या निबंधाची मांडणी आणि बोलण्यातील ऋजुता आवडली होती. राजूंनी मांडलेला एक मुद्दा त्यांना खूप महत्त्वाचा वाटत होता.राजूंच्या म्हणण्यानुसार पायथागोरस भारतात येऊन गेला असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.


तो इजिप्तला भेट देऊन आला होता,फिनिशियात जाऊन आला होता. ज्ञानार्जनाकरता भटकणं त्याला कमीपणाचं वाटत नसे.त्या काळात व्यापारी काफिले भारतातून अरबस्तानमार्गे ग्रीसपर्यंत ये-जा करत. त्यांच्याबरोबर प्रवासीही असत.(आपण 'यवन' हा शब्द वापरतो तो 'आयोनीज' या शब्दाचं अपभ्रष्ट रूप आहे.आयोनिया हा प्राचीन ग्रीसचा एक भूभाग.) अशा भटकंतीत पायथागोरस तक्षशिलेस येऊन गेला असावा,असं राजूंचं म्हणणं होतं.ते तर्काधिष्ठित असलं तरी त्यासाठी ठोस पुरावा उपलब्ध नव्हता. भारतातल्या या भेटीत प्रा.राजूंनी अमीर यांना एक पुस्तक दाखवलं.त्यात पुढील ओळी होत्या.


'कुठलीही गोष्ट एक तर खरी असते किंवा नसते तरी. ती एकाच वेळी खरी आणि खोटीही असू शकते,किंवा खरी नसली तरी खोटीही नसू शकते,ही बुद्धदेवाची शिकवण आहे.'हे वाचून ॲक्झेल चक्रावले." ( हटके भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन,पुणे ) हे पुरातन तत्त्वज्ञ नागार्जुनाचं वचन आहे. 


हे सगळं समजावून घ्यायचं असेल तर त्यासाठी काही काळ पूर्वेचं तत्त्वज्ञान आत्मसात करण्याचे प्रयत्न करावे लागतील." राजूंनी सांगितलं.मग अमीर  यांना राजूंनी भारतीय तत्त्वज्ञानाचे धडे द्यायला सुरुवात केली.राजूंच्या मते त्या वचनाचा अर्थ 'शून्य' असा होता.ते ब्रह्मांडाच्या पोकळीचं वर्णन होतं.शून्याचा शोध घेण्यासाठी अमीर यांना राजू यांनी जपानी गणितज्ञ टाकाओ हायाशी यांचा संदर्भ दिला काही काळापूर्वी हायाशींनी खजुराहो इथे काही अंकांची छायाचित्रं घेतली होती.त्यांनी या आकड्यांबाबत जरी विस्तृतपणे लिहिलं असलं तरी एक गोची होती.ज्या मंदिरावर त्यांना हे आकडे कोरलेले सापडले होते त्याचं नाव त्यांनी जाहीर केलं नव्हतं.

खजुराहोत एकूण ८५ मंदिरं होती.त्यातली बहुतेक निसर्गप्रकोपामुळे पडझड झालेल्या स्थितीत असली तरी वीस मंदिरं अजूनही सुस्थितीत होती.डेव्हिड युजिन स्मिथ यांनी गणिताच्या इतिहासावर लिहिलेल्या आपल्या एका पुस्तकात म्हटलं आहे,की 'खजुराहो इथल्या एका मंदिरावर एक जादुई चौकोन (मॅजिक स्क्वेअर) कोरलेला आढळतो. ही मंदिरं ८७० ते १२०० या काळातली आहेत.' अमीर यांना वाटत होतं की हायाशी हाच मजकूर वाचून खजुराहोला पोहोचले असावेत;पण तसं नव्हतं.भारतात पुरातत्त्व विद्येचा पाया घालणाऱ्या सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी इ.स.१८६० च्या दशकातच खजुराहोच्या मंदिरांचा अभ्यास करताना सर्वप्रथम हा गणिती चौकोन बघितला होता आणि त्याची नोंद केली होती.त्या नोंदी वाचून हायाशी खजुराहोत पोहोचले होते.अमीर यांनी दहाव्या शतकापासून मागे जात शोध घ्यायचं ठरवलं.खजुराहोत पोहोचल्यानंतर त्यांनी तिथे बरीच देवळं बारकाईने बघितली,

स्थानिकांजवळ आणि प्रवासी मार्गदर्शकांकडे चौकशी केली;पण त्यांना त्या चौकोनाची माहिती मिळेना.अमीर त्या चौकोनाची चौकशी करत असताना जवळच काही फ्रेंच प्रवासी मंदिर बघत होते.त्यांतल्या एकाने पूर्वेकडच्या मंदिरांच्या समूहामध्ये एका मंदिराच्या दाराच्या चौकटीवर एका चौकोनात आकडे बघितले होते.हा मंदिरसमूह गावाच्या दुसऱ्या टोकाला होता.तिकडे सहसा कुणी जात नसे,कारण त्या मंदिरांची बरीच पडझड झाली होती.ते ऐकून अमीर ॲक्झेल त्या दिशेने निघाले. ते विवक्षित मंदिर शोधायला त्यांना थोडा वेळ लागला.ते इ. स. ९५४ मध्ये उभारलेलं पार्श्वनाथाचं देऊळ होतं.अखेरीस त्या मंदिरात अमीर यांना तो चौरस सापडला.


७  १२  १ १४


२  १३  ८  ११


१६  ३  १०  ५


९   ६  १५   ४


या चौरसातील सर्व उभ्या आणि आडव्या ओळींतील आकड्यांची बेरीज ३४ आहे.दोन्ही कर्णांवरील संख्यांची बेरीजही ३४ येते.तसंच या चौरसात एकही आकडा पुन्हा वापरला नाही.


अभ्यासपुर्ण व वैचारीक लेखातील शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..

१८/८/२३

मुन्नी एक गोष्ट जगण्याची-Munni teaches to live..

रविवारची दुपार होती.भरपेट जेवण करून पेपर वाचत पडलो होतो.तेवढ्यात फोन वाजला.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुण्यात काही दरवेश्यांना चार अस्वलांसह पकडलं होतं.त्या अस्वलांना पेशवे पार्कमध्ये नेलं गेलं.

डॉ.विनय गो-हे यांनी तीन अस्वलं पेशवे पार्कमध्ये ठेवून घेण्याची तयारी दाखवली.मग चौथं अस्वल आमच्या पार्कमध्ये घ्यावं,अशी विनंती करण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी मला फोन केला होता.मी ताबडतोब आयुक्त बंगल्यावर फोन लावला.रवींद्र सुर्वे नावाचे एक कार्यतत्पर अधिकारी त्या वेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त होते.त्यांनी लगेगच हे अस्वल मर्यादित कालावधीसाठी ठेवून घेण्याची परवानगी दिली.

आम्ही ताबडतोब पेशवे पार्क गाठलं.चारही अस्वलं खाऊन-पिऊन मजेत झाडाच्या सावलीत आराम करत होती.त्यांना सांभाळणारे दरवेशीही तिथेच बसून होते.त्या अस्वलांमधल्या मध्यम बांध्याच्या बोलक्या डोळ्यांच्या,

अत्यंत देखण्या मादीने माझं लक्ष वेधून घेतलं.पाहताक्षणी तिलाच सोबत न्यायचं असं मी ठरवून टाकलं.

वनाधिकाऱ्यांच्याच जीपमधून तिला पार्कमध्ये आणलं.

दुर्गा टेकडीवरून आणलेले दोन मोठे आणि एक छोटा पिंजरा जोडून तिच्यासाठी तात्पुरता पिंजरा तयार केला आणि तिला त्यात सोडलं.आल्या आल्या तिला केळी,

सफरचंद आणि दूध मिसळून छान शिकरण खायला दिलं.हा खाऊ आवडीने गट्टम करून ती झोपी गेली.तिचा मालकही तिच्यासोबतच आमच्याकडे आला होता. तो माझ्याच वयाचा आणि माझ्यासारखीच दाढी असलेला माणूस होता.माझ्या शिफारशीनुसार आयुक्त सुर्वेसाहेबांनी त्याला कायमस्वरूपी नोकरीवर घेण्याची तयारी दर्शवली.

पण त्याला काय वाटलं कोण जाणे,तो दुसऱ्याच दिवशी निघून गेला.आमच्याकडे आलेल्या अस्वलीचं नाव होतं सिमरन,दरवेशी तिला लाडाने मुन्नी म्हणत असे.मुन्नी त्याच्या मुलांसोबत त्यांच्या कुटुंबातच वाढली होती.

त्यांच्यासोबतच गावोगाव फिरत होती.बघ्यांसाठी खेळ करत होती.त्यांचं भटके घर चालवण्यासाठी मेहनत करत होती. हीच मुन्नी आता आमच्या पार्कची सदस्य झाली होती.वास्तविक यापूर्वी माझा आणि अस्वलाचा काहीच संबंध आला नव्हता.प्राणिसंग्रहालयात किंवा दरवेशांसोबत पाहिलं असेल तेवढंच.जर्सीमध्ये दक्षिण अमेरिकी 'स्पेक्टॅकल्ड बेअर'च्या प्रजोत्पादनाचा प्रोजेक्ट जवळून पाहण्याचं भाग्य मला लाभलं होतं;पण तिथेही माझा त्या प्रकल्पात प्रत्यक्ष सहभाग नव्हता.तसं पाहिलं तर अस्वलाशी माझं अप्रत्यक्ष नातं जुळलं ते दुर्गा भागवतांमुळे.त्यांचं 'अस्वल' हे पुस्तक मला अतिशय आवडून गेलं होतं.दुर्गाबाईंनी किती विलक्षण बारकाईने अस्वलांच्या सवयी आणि स्वभावाचं रेखाटन त्यात केलं आहे!अस्वलांच्या जाती,त्यांची वसतिस्थानं,आहार- विहाराच्या सवयी, स्वभाववैशिष्ट्यं,अस्वलाची वागणूक इत्यादी. धिप्पाड देह असूनही अस्वल आळशी नसतं. उलट,ते अत्यंत कष्टाळू अन् मेहनती असतं. शूर आणि दांडगं असतं.बऱ्यापैकी चंचलही असतं.त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल बऱ्याच ठिकाणी वाचनात आलं होतं.

त्यामुळे एकीकडे या प्राण्याबद्दल उत्सुकता होती आणि हा पूर्ण नवा ताकदवान लहरी प्राणी आपल्याला झेपेल ना,याची धाकधूकही वाटत होती.त्यातच रात्री प्रतिभाला मुन्नीने पिंजरा तोडल्याचं स्वप्न पडलं.उरलेली रात्र तिने जागून काढली.पहाट होण्याआधीच ती पिंजरा शाबूत असल्याची खात्री करून आली. सुदैवाने मुन्नीने असा कोणताही उद्योग केला नव्हता.आदल्या दिवशीच्या धावपळीमुळे ती थकून झोपून गेली असावी.सकाळी

उठल्यावर तिला दूध-पाव खायला घातला.

महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या नाकातील वेसण कापून काढली.तिला औषधपाणी केलं.सुदैवाने कोणताही त्रास न होता मुन्नी आमच्या पार्कवर रुळली.एवढंच नव्हे,तर पार्कमधल्या आणि पार्कमध्ये येणाऱ्या बालगोपाळांचं ती आकर्षण बनली.

सुर्वेसाहेबानंतर पर्यावरणप्रेमी प्रवीणसिंह परदेशी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त झाले.त्यांनी आमच्या पार्कच्या विकासामध्ये खूपच रस घेतला.ते वरच्यावर सहपरिवार पार्कवर येत असत.त्यांची मुलंही सोबत असत. सगळी छोटी मंडळी पार्कमध्ये धमाल करत असत.विशेषतः मुन्नीसाठी फ्रुट सॅलड तयार करायचं आणि आम्हा कर्मचाऱ्यांपैकी कुणी तरी मुन्नीला ते खिलवत असताना पाहायचं,हा या बालस्वयंसेवकांचा आवडीचा उद्योग.बोराटे अण्णा हे मुन्नीचे पालक.त्यांनी भांडं स्वच्छ धुऊन त्यात दूध ओतलं की कुणी केळी,कुणी चिकू, कुणी इतर काही फळांचे तुकडे करून त्यात टाकत.

मग त्यावर मध ओतला की झालं मुन्नीचं 'फ्रुट सॅलड विथ हनी' तयार. पिंजऱ्यावर चढून बोराटे अण्णा सरकतं दार थोडंसं वर उचलायचे.अचूक टायमिंग साधून मी भांड पटकन आत सरकवायचो.दार खाली केलं की ओठांचा चंबू करून मुन्नी फ्रुट सॅलड भुरकणं सुरू करायची. खाऊन झाल्या झाल्या तिला लगेचच पाणी लागायचं.

त्याच भांड्यात आम्ही लगेच नळी धरत असू.खाणं-पिणं आटोपलं की पिंजऱ्याच्या मागच्या बाजूला स्लीपिंग सेक्शनमध्ये जाऊन लोळणं हा मुन्नीचा आवडता कार्यक्रम.कधी कधी ती नाठाळपणा करायची,पण एरवी तिचा दिनक्रम शांतपणे चालू असायचा.


मुन्नी वयात आली आणि तिच्यात नैसर्गिक बदल दिसू लागले.आता तिला जोडीदाराची गरज होती.विणीच्या हंगामात ती खूपच वैतागलेली असायची.अशा वेळी खाणं-पिणं तिच्यादृष्टीने दुय्यम असायचं.कधी कधी ती आवडीचं खाणंही उलटवून टाकायची पिंजऱ्याचे अर्धा इंची लोखंडी गजांचे वेल्डिंग पॉइंट्स तोडून,ते वाकवून थयथयाट करायची.तिच्यासाठी दररोज दूध, पाव,केळी,

सफरचंद,मनुका,खजूर,मध अशा अत्यंत संतुलित आहाराची,मेजवानीची सोय आम्ही करत असू.


पुढे केंद्र सरकारच्या आदेशानुसार मुन्नीला पेशवे पार्कच्या जागेतून कात्रज इथे स्थलांतरित झालेल्या राजीव गांधी पार्कमध्ये हलवण्यात आलं.तिथे तिला अनुरूप जोडीदार मिळाला.त्यांना मुलंबाळं झाली.आणि तीही तिथे आनंदात नांदली.मुन्नीला कात्रजला हलवल्यानंतर कित्येक दिवस दर मंगळवारी मी तिला भेटायला जात असे.तिच्या पिंजऱ्याजवळ जाऊन हाक मारताच ती खंदकाच्या भिंतीजवळ यायची आणि मागच्या पायावर उभी राहून माझ्याकडे बघत बसायची. बराच वेळ आम्ही एकमेकांना न्याहाळत असू. मी तिच्याशी बोलत असे;तीही मजेत ऐकत असे.मी खंदकापासून तिच्या नजरेआड होईपर्यंत ती माझ्याकडे बघत असायची.पुढे पुढे माझं जाणं-येणं कमी झालं,पण तरीही मुन्नी माझी ओळख विसरली नाही.माझा एक जुना मित्र खूप वर्षांनी नागपूरहून भेटायला आला होता.त्याला घेऊन मी प्राणिसंग्रहालयात फिरायला गेलो.


सवयीने अस्वलाच्या पिंजऱ्याजवळ गेलो आणि मुन्नीला हाक मारली.मुन्नी काही दिसली नाही.मला वाटलं,की कदाचित तिला माझी हाक ऐकू गेली नसेल किंवा ती विश्रांती घेत असेल.मी थोडा वेळ थांबलो.इतक्यात एक छोटं अस्वल अगदी मुन्नीसारखंच दोन पायांवर उभं राहिलं.घशातून खाकखूक केलं आणि निघून गेलं.यापूर्वी मुन्नी सोडून तिथल्या कोणत्याही अस्वलाने मला असा प्रतिसाद दिला नव्हता.मी मनात म्हटलं, 'हे नक्कीच मुन्नीचं पोर असणार.पण मुन्नी कुठेय?' माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली.दुसऱ्याच दिवशी अस्वलांचा केअरटेकर कौशिक भेटला.तो म्हणाला "सॉरी सर,तुम्हाला सांगायचं राहून गेलं.गेल्या आठवड्यात मुन्नी गेली!"


पण त्याने बातमी सांगण्याआधीच मुन्नीच्या पिल्लाने तिचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवला होता..


पुण्याला परममित्र सतीश खाडे अभिनव जलनायक या पुस्तकाचे लेखक यांना भेटायला गेलो होतो.त्यावेळी त्यांनी भेट म्हणून भरपूर पुस्तके दिली.त्यातीलच एक  'सोयरे वनचरे',अनिल खैर,प्रकाशक - समकालीन प्रकाशन पुणे यांचे हे पुस्तक वाचत असताना.या कथेने घेतलेला मनाचा वेध.. 

१६/८/२३

चंपावतची नरभक्षक … भाग २ |Cannibals of Champawat... Part 2

३०.जुलै ३०२३ या लेखातील पुढील भाग..


कधी कधी असं होतं.अशक्य वाटणारी एखादी गोष्टदेखील करणं शक्य होऊन जातं.फारशा आरामदायी नसलेल्या,

काहीशा अडचणींच्या जागेत पडून,वरच्या दिशेने,६० अंशाच्या कोनात, २०० यार्डावर गळ्याचा फक्त लहानसा पांढरा ठिपका दिसत असलेल्या त्या घोरूलवर गोळी झाडल्यावर नेम बरोबर लागण्याची लाखात एकदेखील शक्यता नव्हती,पण तरीही त्या गोळीचा नेम बरोबर लागला.आणि निमिषार्धात ते घोरूल मरून पडलं.

डोंगरकडांवरून घरंगळत, छोट्या दऱ्या आणि दगड पार करत ते त्याच्या दोन साथीदारांजवळ येऊन पडलं.त्या दोन साथीदारांमुळे वाटेमधलं गवत दबलं गेलं होतं. अशा पद्धतीने त्या दरीत ती तीन जनावरं आमच्या पुढ्यात येऊन पडली.रायफलचा अशा पद्धतीने वापर झालेला कधीच बघितलेला नसल्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या त्या माणसांचे चेहरे बघणं मोठं आनंददायक होतं. त्या क्षणी सगळे जण जणू त्या नरभक्षकाला विसरले आणि तिन्ही घोरूल उचलून नेण्यासाठी गडबडगोंधळ करू लागले.आमची ही मोहीम अनेक अर्थांनी यशस्वी ठरली.

घोरूलचं मांस मला सगळ्यांनाच देता तर आलंच,पण त्याचबरोबर सगळ्या गावाचा विश्वास जिंकता आला. माणसांना शिकारकथांमध्ये असलेलं औसुक्य कधीच कमी होत नाही.त्यामुळे माझ्याबरोबर आलेल्या तीन माणसांनी घोरूल सोलून त्याचे वाटे करताना आपल्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव दिला.मोकळ्या जागेत बसून नाश्ता करत असताना मी एका मैलावरून घोरूलला कशी गोळी घातली होती,माझ्या जादूच्या रायफलने घोरूलांना नुसतं मारलंच नव्हतं,तर माझ्या पायाशीदेखील कसं आणून टाकलं होतं याची वर्णनं ऐकून त्या तिघांच्या भोवती जमलेल्या गर्दीने टाकलेले सुस्कारेही मला ऐकू येत होते.मला कुठे जाण्याची इच्छा होती आणि त्यासाठी किती माणसं सोबत लागणार होती,असं गावच्या प्रमुखाने मला दुपारच्या जेवणानंतर विचारलं. माझ्यासोबत शिकारीला आलेल्यांमधल्या दोघांची निवड तिथे चकरा मारणाऱ्या उत्साही लोकांच्या गर्दीतून मी केली.नरभक्षक वाघिणीने केलेल्या शिकारीची सगळ्यात अलीकडची दुर्दैवी घटना जिथे घडली होती,त्या जागेची पाहणी करण्यासाठी मी त्यांना घेऊन निघालो.या डोंगराळ भागात हिंदू लोक राहतात आणि ते मृतदेहाचं दफन करतात.

त्यांच्यामधल्याच कुणाला तरी नरभक्षक वाघाने अशा पद्धतीने मारलेलं असतं,तेव्हा मृत व्यक्तीचं दफन करण्यासाठी तिच्या नातेवाइकांना तिच्या शरीराचा थोडासा भाग मग तो अगदी हाडाचा एखादा तुकडा का असेना मिळवणं क्रमप्राप्त असतं. त्या महिलेचा दफनविधी अजून व्हायचा होता.आम्ही त्या जागेवर जायला निघालो,तेव्हा तिच्या शरीराचा मिळेल तो भाग घेऊन येण्याची तिच्या नातेवाइकांनी आम्हाला विनंती केली.मला अगदी लहानपणापासूनच वाचनाचा, जंगलातल्या खुणांचा अर्थ लावण्याचा छंद आहे. ती महिला जेव्हा मारली गेली होती,तेव्हा तिथे उपस्थित असलेले साक्षीदार मला भेटले होते, पण साक्षीदारांवर नेहमीच विसंबून राहता येत नाही.उलट जंगलातल्या खुणा याच घडलेल्या घटनेच्या खऱ्याखुऱ्या नोंदी असतात.घळीच्या बाजूने,झाडाच्या दिशेने आल्याने वाघीण इतरांना दिसू शकली नसण्याची शक्यता असल्याचं त्या ठिकाणी पोहोचल्यावर आणि जमिनीवर एक नजर टाकल्यावर माझ्या लगेचच लक्षात आलं. झाडाच्या खाली असलेल्या घळीत प्रवेश करून पाहणी केल्यावर मला जमिनीवर तिच्या पायांचे ठसे दिसले.ते खालच्या दिशेला असलेल्या दोन मोठ्या दगडांच्या दिशेने गेले होते.त्या ठशांवरून ती वाघीण असल्याचं आणि तिच्या आयुष्याचा सर्वोत्तम काळ संपून उतरणीचा सुरू झाल्याचं दिसून येत होतं.शिकारीच्या वेळी वाघीण दरीतून वर येऊन,झाडापासून साधारण दहा यार्ड अंतरावर दगडाच्या मागे थांबून,ती महिला झाडावरून खाली उतरण्याची वाट बघत राहिली होती.त्या महिलेची हवी होती तेवढी पानं सगळ्यांच्या आधी तोडून झाली होती.ती साधारण दोन इंची फांदीच्या आधाराने खाली उतरत असतानाच वाघीण सरपटत पुढे आली होती आणि मागच्या पायांवर उभं राहून तिने त्या महिलेचे पाय पकडले होते आणि ओढत तिला घळीत नेलं होतं.त्या दुर्दैवी महिलेने फांदीला किती घट्ट धरून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता,ते त्या फांदीकडे बघून समजत होतं.झाडाच्या खडबडीत सालीला तिच्या तळहाताच्या कातडीचा घासला गेलेला भाग लागला होता.वाघिणीने तिला जिथे मारलं होतं, तिथे त्यांच्यामध्ये झालेल्या झटापटीच्या खाणाखुणा दिसून येत होत्या;

साकळलेल्या रक्ताचा एक मोठा डाग दिसत होता.तिथून माग घेत आम्ही निघालो.सुकलेले डाग दरीपर्यंत आणि नंतर पलीकडच्या बाजूला गेलेले दिसत होते.दरीतून बाहेर पडल्यावर पुढे एका झुडपात ती जागा सापडली,जिथे वाघिणीने आपली शिकार खाऊन टाकली होती.


नरभक्षक वाघ वा वाघीण माणसाचं डोकं,हात आणि पाय खात नसल्याची एक लोकप्रिय समजूत आहे,पण ती चुकीची आहे.नरभक्षकांच्या खाण्यामध्ये व्यत्यय आणला नाही,तर ते रक्ताळलेल्या कपड्यांसह सगळं खात असल्याचं मी एका प्रसंगी बघितलं आहे.


अर्थात,ती एक वेगळीच कहाणी आहे. तिच्याबद्दल पुन्हा कधीतरी!


या जागेवर आम्हाला त्या महिलेचे कपडे आणि काही हाडं मिळाली.ते सगळं आम्ही आमच्यासोबत आणलेल्या स्वच्छ कापडात गुंडाळून घेतलं.एकूण शरीराचा भाग म्हणून ती हाडं अगदी थोडी असली,तरी ती दफन विधीसाठी पुरेशी होती.आता या महिलेच्या अस्थी गंगामातेला अर्पण करता येणार होत्या. चहा घेतल्यानंतर मी आणखी एका दुर्घटना स्थळाला भेट दिली.एका सार्वजनिक रस्त्यामुळे मुख्य गावापासून वेगळा झालेला तो काही एकरांचा परिसर होता.या जागेच्या मालकाने रस्त्यालगतच,पण डोंगरावर स्वतःसाठी एक झोपडी बांधली होती.त्याला चार वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा होता. तो,त्याची बायको,तिची धाकटी बहीण आणि त्याची दोन मुलं असे सगळे तिथे राहत होते.

त्याची बायको आणि तिची बहीण एक दिवस सकाळी घरापासून थोडं वर,डोंगरावर गवत कापत असताना अचानक वाघीण तिथे आली होती आणि तिने त्या माणसाच्या बायकोला ओढून नेलं होतं.तिची धाकटी बहीण त्या वाघिणीमागे जवळजवळ १०० यार्डाचं अंतर हातात काठी उगारून, "हवं तर मला घेऊन जा,पण माझ्या बहिणीला नेऊ नको" असं ओरडत धावत गेली होती.तिचं हे धाडसी कृत्य गावामधले लोक बघत होते.त्या मृत बाईला शंभरेक यार्डापर्यंत वाहून नेल्यानंतर वाघिणीने तो मृतदेह खाली ठेवला होता आणि तिच्या पाठलागावर असलेल्या तिच्या बहिणीकडे वळली होती. मोठ्याने डरकाळ्या फोडत वाघिणीने बहिणीच्या दिशेने उसळी मारताच बहीण मागे वळली होती.आणि डोंगरउतारावरून वेगाने धावत,रस्ता ओलांडत गावाच्या दिशेने धावत सुटली होती.डोंगरावर काय घडलं होतं,ते तिला गावातल्या लोकांना सांगायचं होतं.त्यांनी तो सगळा प्रकार बघितला असल्याचं तिला माहीतच नव्हतं.प्रचंड वेगाने धावत आल्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता.ती प्रचंड घाबरली होती. "काय आणि कसं सांगू' असं तिला झालं होतं.

त्यामुळे तिचं सगळंच बोलणं असंबद्ध होतं.त्यानंतर वाघिणीने ओढून नेलेल्या बाईची सुटका करण्यासाठी गावातली काही माणसं ताबडतोब बाहेर पडली होती.


ती रिकाम्या हाताने परत येईपर्यंत या बहिणीची वाचा गेली होती.


मला ही सगळी गोष्ट गावात सांगण्यात आली होती.मी त्या झोपडीच्या दिशेने जाण्यासाठी डोंगर चढायला सुरुवात केली, तेव्हा ती बहीण कपडे धुवत होती.तिची वाचा जाऊन जवळजवळ वर्ष झालं होतं.तिच्या डोळ्यात दिसणारी वेदना वगळता,मला ती अगदी नॉर्मल वाटली.मी तिच्याशी बोलण्यासाठी थांबलो आणि तिच्या बहिणीला मारणाऱ्या वाघिणीच्या शिकारीसाठी मी आलो असल्याचं तिला सांगितलं.हे ऐकल्यावर तिने दोन्ही हात जोडले आणि माझ्या पायांना स्पर्श करण्यासाठी ती खाली वाकली.तिच्या या वागण्याने मला ओशाळल्यासारखं झालं,पण तिचं हे वर्तन मी समजू शकत होतो. मी तिथे नरभक्षक वाघिणीला मारण्याच्या उद्देशाने गेलो होतो खरा, पण ती त्याच परिसरात दुसऱ्यांदा शिकार करत

नसल्याची तिची ख्याती होती.एकदा खाऊन टाकलेल्या शिकारीकडेही ती पुन्हा परतत नसे. शेकडो चौरस मैल परिसरात तिचा वावर होता. त्यामुळे माझं उद्दिष्ट पूर्ण करणं, म्हणजे गवताच्या भाऱ्यामध्ये सुई शोधण्यासारखं होतं.


या मोहिमेसाठी नैनितालला येताना मी कितीतरी गोष्टी ठरवल्या होत्या.त्यांतली एक करायचा प्रयत्नही केला होता,पण ती माझ्या आवाक्याबाहेरची असल्याचं लक्षात आल्यामुळे पुन्हा ती करायला प्रवृत्त झालो नव्हतो. कुमाऊँमध्ये आलेली ही पहिलीच नरभक्षक वाघीण असल्यामुळे ज्याच्याशी सल्लामसलत करता येईल,असं तिथे कुणीही नव्हतं,पण तरीही काहीतरी करणंही आवश्यक होतं.त्यामुळे वाघीण दिसण्याची शक्यता असलेल्या ज्या ज्या जागा गावकऱ्यांनी सांगितल्या होत्या,

त्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत धुंडाळत मी पुढचे तीन दिवस मैलोन् मैल फिरलो.


इथं मला थोडं विषयांतर करून प्रचलित झालेल्या एका अफवेचं खंडन करायचं आहे.ती अशी की,या आणि अशा अनेक प्रसंगी मी एका खेडुत बाईचा पोशाख करून जंगलात जातो, नरभक्षक वाघांना माझ्याकडे आकर्षित करून घेतो आणि कोयत्याने किंवा कुन्हाडीने त्यांना मारून टाकतो.काही वेळा मी एखादी साडी गुंडाळून गवत कापणं किंवा झाडावर चढून पानं तोडणं हे प्रकार केले आहेत,हे खरं आहे,पण या युक्त्या काही यशस्वी झालेल्या नाहीत.दोन प्रकरणांमध्ये मी ज्या झाडांचा आसरा घेतला होता,तिथपर्यंत वाघाने माझा पाठलाग केला होता.

त्यांपैकी एकदा तो दगडामागे लपला आणि दुसऱ्या वेळी एका तुटून पडलेल्या झाडामागे लपून राहिला.या दोन्ही प्रकरणांमध्ये त्याने मला गोळी चालवण्याची संधी दिली नाही.असो.मूळ विषयाकडे येऊ या.आता वाघिणीने हा परिसर सोडल्याचं दिसत असल्यामुळे पालीच्या लोकांची नाराजी पत्करून मी १५ किलोमीटर पूर्वेला असलेल्या चंपावतला जायचं ठरवलं.त्यासाठी सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात केली.धुनघाट इथं नाश्ता केला आणि सूर्यास्तापर्यंत चंपावतला पोहोचलो.या प्रवासामधले सगळे रस्ते अतिशय असुरक्षित मानले जात होते.


एका गावातून दुसऱ्या गावात किंवा एका बाजाराच्या ठिकाणाहून दुसऱ्या बाजाराच्या ठिकाणी जायचं असेल,

तर लोक मोठ्या समूहाने जात.धुनघाटहून निघालो,तेव्हा आम्ही आठ जण होतो. वाटेतल्या गावांमधले लोक आम्हाला येऊन मिळत गेले आणि चंपावतला पोहोचलो,

तेव्हा आम्ही ३० जण झालो होतो.आम्हाला येऊन मिळालेल्या वीसेक जणांच्या गटातली माणसं दोन महिन्यांपूर्वी चंपावतला गेली होती.त्यांनी मला अतिशय करुण कहाणी सांगितली - 'चंपावतच्या या दिशेने जाणारा रस्ता काही मैलांवर एका डोंगराच्या दक्षिणेच्या कडेने जातो.तो दरीच्या साधारण ५० यार्डावर आहे.दोन महिन्यांपूर्वी आम्ही वीसेक जण मिळून चंपावतच्या बाजाराला जात होतो.दुपारची वेळ होती.आम्ही या रस्त्याने चालत होतो.तेवढ्यात आम्हाला खालच्या दरीतून आत्यंतिक वेदनांनी विव्हळत रडणाऱ्या कुणातरी माणसाचा आवाज ऐकू यायला लागला.तो आवाज जसजसा जवळ यायला लागला,तसे आम्ही सगळे जण अतिशय भेदरून रस्त्याच्या कडेला थांबलो.थोड्याच वेळात एक वाघ आमच्या नजरेच्या टप्प्यात आला. तो एका बाईला घेऊन जात होता.वाघाने तिला पाठीकडून तोंडात पकडलं होतं.त्यामुळे एका बाजूने तिचे केस जमिनीवर लोंबकळत होते आणि दुसरीकडून तिचे पाय ती बाई तिची छाती पिटून घेत होती आणि मदतीसाठी देवाचा आणि माणसांचा धावा करत होती. ५० यार्डावरून अगदी स्पष्ट दिसत असलेला तो वाघ तिला घेऊन निघून गेला.तो काही अंतरावर गेल्यावर त्या बाईचा आवाज ऐकू येईनासा झाला.त्यानंतर आम्ही 'आमचा रस्ता धरला'


" आणि तुम्ही २० जणांनी काहीच केलं नाही?" मी त्यांना विचारलं. "नाही साहेब,आम्ही सगळे जण अतिशय घाबरलो होतो.घाबरलेला माणूस करणार तरी काय? आणि समजा,आम्ही धोका पत्करून वाघाच्या तावडीतून त्या बाईची सुटका केली असती,तरी ती जखमांमुळे इतकी रक्तबंबाळ झालेली होती की.काही केल्या जगली नसती."

नंतर मला समजलं की, ती बाई चंपावतजवळच्याच एका खेडेगावात राहत होती.ती सरपणासाठी वाळलेली लाकडं गोळा करत असताना वाघाने तिला उचललं होतं. तिच्याबरोबरचे इतर लोक गावात धावत गेले होते आणि त्यांनी इतरांना या घटनेबद्दल सांगितलं होतं.तिला शोधण्यासाठी गावातले लोक निघत असतानाच हे घाबरलेले लोक तिथे जाऊन पोहोचले होते.वाघ तिला कुठल्या दिशेने घेऊन गेला होता,हे त्यांना माहीत असल्यामुळे तेही गावकऱ्यांच्या मदतीसाठी निघाले त्यांची कहाणी पुढे सुरू झाली.


'त्या बाईच्या सुटकेसाठी निघालो,तेव्हा आम्ही ५० ते ६० जण होतो.गावकऱ्यांपैकी अनेकांकडे बंदुका होत्या.ती स्त्री जिथे सरपण गोळा करत होती,त्या जागेपासून फर्लांगभर अंतरावर लाकडं पडलेली होती.वाघाने जिथून तिला उचललं होतं, तिथे तिचे फाडलेले कपडे आम्हाला मिळाले. त्यानंतर आम्ही ढोल वाजवायला आणि बंदुका चालवायला सुरुवात केली.दरीच्या उजवीकडे वरच्या दिशेने आम्ही मैलभर चढून गेलो असू, तेवढ्यात आम्हाला एका मोठ्या दगडावर ती बाई मरून पडलेली दिसली.बाई कसली, नुकतीच वयात येत असलेली पोरसवदा मुलगीच होती ती! तिच्या शरीरावरचं सगळं रक्त चाटून तिचं शरीर स्वच्छ करण्याव्यतिरिक्त वाघाने तिला काही केलं नव्हतं.

आमच्याबरोबर कुणीही महिला नव्हती.कुणीतरी दिलेल्या लुंगीमध्ये तिचं शरीर गुंडाळलं जात असताना आम्ही सगळे पुरुष एकमेकांच्या नजरा टाळत होतो.जणू काही ती मुलगी पाठीवर झोपली होती आणि तिला स्पर्श झाल्यावर ती लज्जित होऊन उठणार होती'


मी कोण होतो आणि तिथे कशासाठी आलो होतो,या संदर्भातलं एक पत्र चंपावतच्या तहसीलदारांना पाठवलं होतं.मी राहत होतो,त्या डाक बंगल्यात ते त्याच रात्री मला भेटायला आले.या बंगल्याच्या परिसरात बरीच माणसं मारली गेलेली असल्यामुळे तिथे न राहता,तिथून काही मैलांवर असलेल्या बंगल्यात राहायला जाण्याविषयी त्यांनी मला सुचवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तहसीलदारांबरोबरच लवकर बाहेर पडून दुसऱ्या बंगल्यात जायचं ठरवलं. शव्हरांड्यात बसून माझा नाश्ता सुरू असतानाच दोन माणसं तिथे आली.या डाक बंगल्यापासून दहा मैल अंतरावर असलेल्या गावात वाघिणीने एक गाय मारल्याची बातमी घेऊन ती आली होती.तहसीलदारांना चंपावतमध्ये काही तातडीचं काम आलं होतं. "ते काम करून मी संध्याकाळी बंगल्यावर परत येतो आणि आजची रात्र तुमच्याबरोबर घालवतो." असं सांगून त्यांनी माझी रजा घेतली.माझ्या वाटाड्यांना चालण्याची सवय होती,असं दिसत होतं.आम्हाला ज्या गावात जायचं होतं,तो रस्ता डोंगरउताराचा असल्यामुळे आम्ही अतिशय कमी वेळेत दहा मैलांचं अंतर पार केलं.

गावात पोहोचल्यावर मला एका गोठ्यात नेण्यात आलं. तिथे बिबट्याने अर्धवट खाऊन टाकून दिलेलं एका आठवड्याचं एक वासरू पडलं होतं. बिबट्याची शिकार करत बसण्याइतका वेळ माझ्याकडे नसल्यामुळे मी त्या वाटाड्यांना इनाम दिलं आणि नव्या बंगल्याचा रस्ता धरला. तहसीलदार अजून आलेले दिसत नव्हते आणि अंधार पडायला अजून तासभरापेक्षाही जास्त वेळ होता.त्यामुळे मी बंगल्याच्या चौकीदाराबरोबर बाहेर पडलो.त्याने मला एक जागा सांगितली.त्याच्या म्हणण्यानुसार,त्या जागी पाणी पिण्यासाठी एक वाघ येत असे.ही जागा म्हणजे,एका ओहोळाचा वरचा भाग होता. तिथूनच बागेला पाणी दिलं जात होतं.त्या ओहोळाच्या परिसरात असलेल्या मऊशार जमिनीवर मला बऱ्याच दिवसांपूर्वीचे वाघाच्या पावलांचे ठसे आढळले,पण त्यापूर्वी पाली या गावाजवळच्या दरीत,जिथे वाघिणीने बाईला मारलं होतं,तिथे पाहिलेल्या ठशांपेक्षा हे ठसे अगदी वेगळे होते.मी बंगल्यावर पोहोचलो, तोपर्यंत तहसीलदारदेखील परत आलेले होते.आम्ही व्हरांड्यात गप्पा मारत बसलेलो असताना,मी दिवसभरात जे जे अनुभवलं होतं, ते ते त्यांना सांगितलं.इतक्या लांबवर मला विनाकारणच तंगडतोड करावी लागली.असल्याबद्दल खंत व्यक्त करून त्यांनी सांगितलं की,त्यांना कामासाठी कुठेतरी बऱ्याच लांबच्या ठिकाणी जायचं असल्यामुळे त्यांना ताबडतोब निघावं लागणार होतं.


ते रात्री माझ्याबरोबर राहणार असल्याचं त्यांनी मला दिवसभरात दोन वेळा सांगितलं असल्यामुळे त्यांच्या या सांगण्याचं मला थोडं आश्चर्यच वाटलं.ते रात्री तिथं राहणार नसल्याची मला चिंता नव्हती,पण रात्रीच्या वेळी बाहेर पडण्याचा धोका ते पत्करत होते,याची मला काळजी वाटत होती.पण त्यांनी माझं काहीही ऐकून घेतलं नाही.चार मैलांवरच्या ज्या परिसरात माणसं दिवसाउजेडीदेखील मोठा समूह सोबतीलाअसल्याशिवाय बाहेर पडत नव्हती,त्या परिसरात जाण्यासाठी सोबतीला मिणमिणता प्रकाश देणारा धुरकट कंदील हातात धरलेला एक माणूस घेऊन त्यांनी त्या व्हरांड्याबाहेर असलेल्या काळ्याकुट्ट अंधारात पाऊल ठेवलं,तेव्हा मी माझी हॅट उंचावून त्या धाडसी माणसाला अभिवादन केलं.ते दिसेनासे होईपर्यंत मी तिथेच थांबलो आणि मग बंगल्यात शिरलो.


या बंगल्यासंदर्भात माझ्याकडे एक छोटीशी कहाणी आहे,पण मी ती इथे सांगणार नाही.कारण हे जंगलकथांचं पुस्तक आहे.आणि निसर्गनियमांच्या विरुद्ध ठरतील,अशा गोष्टी या जंगलकथांबरोबर जाऊ शकत नाहीत.


कथा अजून सुरुच आहे.लवकरच या ठिकाणी पुढील कथेसोबत भेटू..

१५/८/२३

राहून गेलं सांगणारा वन बेडरुम फ्लॅट | A one bedroom flat that tells the story

माझ्या वडिलांचे स्वप्न हाेते की मी अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करुन अमेरीकेतील बहुराष्ट्रिय कंपनीत नाेकरीला लागावे.जेव्हा मी अमेरीकेत आलाे तेव्हा हे स्वप्न जवऴपास पुर्ण हाेत आले हाेते.आता शेवटी मला जिथे हवे तिथे मी पाेहचलाे हाेताे.मी असे ठरवले हाेते की पाच वर्ष मी इथे राहुन बक्कळ पैसा कमवेल की जेणे करुन भारतात गेलाे की पुण्यासारख्या शहरात सेटल हाेईल.

माझे वडिल सरकारी नाेकरीत हाेते. त्यांची आयुष्यभराची कमाई म्हणजे एक बेडरुमचा फ्लॅट,अन तुटपुंजी पेंशन,

पण मला त्यांच्यापेक्षा जास्त कमवायचे हाेते.

घरची,आई-बाबाची खुप आठवण यायची.एकटं वाटु लागायच.स्वस्तातल एक फाेन कार्ड वापरुन मी आठवड्यातन २-३  वेळा त्यांना काँल करत हाेताे.दिवस वार्‍यासारखे उडत हाेते.दाेन वर्ष पिझ्झा बर्गर खाण्यात गेली.अजुन दाेन वर्ष परकिय चलनाचे दर पाहण्यात गेले.रुपयाची घसरण झाली की मला जाम आनंद व्हायचा.लग्नासाठी राेज नवनवीन स्थळ येत हाेती. शेवटी ते करण्याचा मी निर्णय  घेतला.आईवडिलांना सांगितले मला फक्त दहा दिवसांची सुट्टी भेटेल त्या दहा दिवसातच सर्व काही झाल पाहिजे. स्वस्तातले तिकीट पाहुन मी १० दिवसांची सुट्टी घेतली.मी खुश हाेताे,आईबाबांना भेटणार हाेताे. नातेवाईक व मित्रांसाठी खुप सार्‍या भेटवस्तु घ्यायच्या हाेत्या.त्याही राहुन गेल्या.

घरी पाेहचल्यावर आलेल्या सर्व स्थळांचे फाेटाे मी पाहिले,

वेळ कमी असल्याने त्यातीलच एका मुलीची निवड केली.

मुलीचे वडिल समजुतदार हाेते.दाेन दिवसात माझे लग्न लागले.खुप सारे मित्र येतील असं वाटत असताना फक्त बाेटावर माेजता येतील असे मित्र लग्नाला आलेले. लग्नानंतर आईबाबांना काही पैसे हातावर  टेकवले. "आम्हाला तुझे पैसे नकाे पाेरा पण वरचेवर भेटायला येत जा " अस बाबा सांगताना त्यांचा आवाज खाेल गेला हाेता.बाबा आता थकले हाेते,चेहर्‍यावरच्या सुरुकुत्या,

पिकलेल्या भुवया त्याची जाणीव करूण देत हाेत्या. शेजार्‍यांना त्यांची काळजी घेण्याची विनंती  केली व आम्ही अमेरिकेला पाेहचलाे.


पहिले दाेन वर्ष बायकाेला हा देश खुप आवडला.वेगवेगळे स्टेट्स अन नँशनल पार्क पाहुन तिला भारी वाटत हाेत.

बचत कमी हाेऊ लागली पण ती खुश हाेती.हऴुहऴु तीला एकाकी वाटु लागल.कधीकधी ती आठवड्यातुन दाेनदा किंवा तिनदा भारतात फाेन करु लागली. दाेन वर्षानी आम्हाला मुले झाली.एक मुलगा अन एक मुलगी.मी जेव्हा जेव्हा आईबाबांना काँल करायचाे तेव्हा तेव्हा ते नातवंडाना घेऊन भारतात येण्याची विनवणी करायचे.

त्यांना नातवंडाना पाहायचे हाेते.


दरवर्षी मी सहकुटुंब भारतात यायचे ठरवायचाे. पण पैशांच गणित काही जुळायच नाही. जाण्याचा बेत रद्द करावा लागायचा.वर्षामागन वर्ष सरत हाेती,भारतात येऊन जायचे स्वप्न लांबत चालले हाेते.एक दिवस अचानक ऑफिसमध्ये असताना भारतातन काॅल आला, "माेहन बाबां सकाळीच गेले रे".खुप प्रयत्न केला पण सुट्टी काही भेटली नाही,अग्निला तर साेडा पण नंतरच्या विधीला पण जायला जमले नाही. मन उद्विग्न झालेल.

दहा दिवसात दुसरा काॅल आला,आईची पण प्राणज्याेत मालवली हाेती. साेसायटीतील लाेकांनी विधी केले,

नातवंडाचे ताेंड न पाहताच आई वडिल ह्या जगातुन निघुन गेले हाेते.आईबाबा जाऊन दाेन वर्ष सरली. ते गेल्यानंतर एक पाेकळी तयार झालेली.

आईबापाची शेवटची इच्छा इच्छाच राहिलेली.

 मुलांचा विराेध असताना भारतात येऊन स्तिरस्थावर हाेण्याचे मी ठरवले.पत्नी मात्र आनंदात हाेती.

राहण्यासाठी घर शाेधत हाेताे पण आता पैसे कमी पडत हाेते नवीन घर ही घेता आले नाही.मी परत अमेरिकेत आलाे.मुले भारतात राहयला तयार नसल्याने त्याना पण घेऊन आलाे.मुले माेठी झाली,मुलीने अमेरिकी मुलासाेबत लग्न केल.मुलगाही आनंदात अमेरिकेत राहताे.मी ठरविले हाेते आता पुरे झाले,गाशा गुंडाळुन भारतात आलाे.

चांगल्या साेसायटीत 'दाेन बेडरुमचा' फ्लँट घेण्यापुरते पैसे माझ्याकडे हाेते.फ्लॅटही घेतला. 


आता मी साठ वर्षाचा आहे. ह्या 'दाेन बेडरुमच्या' फ्लॅटमधे आता मी फक्त एकटाच राहताे.उरलेल आयुष्य जिच्यासाेबत आनंदात घालवायच ठरवलेल तिन इथेच जीव साेडला.


कधीकधी मल वाटते हा सर्व खटाटाेप केला ताे कशासाठी? ? याचे माेल ते काय? ?


माझे वडील भारतात राहत हाेते तेव्हा त्याच्या नावावरही एक फ्लॅट हाेता.माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त काही नाही.फक्त एक बेडरुम जास्त आहे.त्या एका बेडरुमसाठी मी माझे आईवडिल गमावले,मुलांना साेडुन आलाे, बायकाेपण गेली. 


खिडकितुन बाहेर पाहताना मला माझे बालपण आठवते,त्या सुंदर आठवणी मनात फेर धरु लागतात.

अधुन मधुन मुलांचा अमेरिकतन फाेन येताे ते माझ्या तब्येतीची चाैकशी करतात, अजुनही त्यांना माझी आठवण येते यातच समाधान आहे. 


आता जेव्हा माझा मृत्यु हाेईल तेव्हा कदाचित शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करतील देव त्यांच भल कराे.


पुन्हा प्रश्न कायम आहे.हे सर्व कशासाठी अन् काय किंमत माेजुन.


मी अजुनही उत्तर शाेधताेय.


फक्त एका बेडरुम साठी ?

जगण्याचे माेल त्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे.त्यासाठी आयुष्य पणाला लाऊ नका.


(written by An unintended Indian Engineer who hv lived his dream life in USA)


लेखक - अनामिक 


माझ्या वाचनात अलीकडेच आलेली.


१२/८/२३

प्राचीन आश्चर्ये का अंतराळप्रवास …भाग २

अनेक पुराणवस्तू संशोधकांच्या मते शारीरिक पुनर्जन्मावर या इतिहासपूर्व काळातील लोकांचा दृढ विश्वास होता.पण त्या काळातील कोणत्याही धर्माच्या तत्त्वज्ञानात या पुनर्जन्माच्या कल्पनेचा पुसटसासुद्धा उल्लेख नाही.'आत्मा अमर आहे' या सिद्धान्तावरील हा दृढ विश्वास असता तर मसाला भरून राजे,राण्या,

राजकन्या,राजपुत्र यांची प्रेते ताजीतवानी ठेवण्यासाठी इतके कष्ट घेण्याची गरज इजिप्शियन लोकांना नक्कीच नव्हती;पण पुराणकालीन इजिप्तमधील शेकडो ममीज् चक्क शारीरिक पुनर्जन्मावरील स्पष्ट विश्वासाचा पुरावा देत हजारो वर्षे आपल्या नजरेस पडत आहेत.देवांचा संबंध पुन्हा इथेही येतोच.कारण जुनी चित्रे,काव्ये दर्शवतात की या जतन करून ठेवलेल्या शरीरांना पुनर्जन्म देण्यासाठी ताऱ्यांवरून परत येण्याचे वचन देवांनी दिले होते.


ममीज् जतन करून ठेवलेल्या थडग्यात नाणी, अविनाशी सोने,हिरे,माणके यांचे अलंकार, त्यांच्या आवडत्या वस्तू तर आढळतातच;पण जिवंत गाडून टाकलेले नोकर-चाकर,दास-दासीसुद्धा आढळतात.जुने आयुष्य नव्याने सुरू करण्याचीच सर्व तयारी दिसते.ही थडगी अणुस्फोटालाही दाद न देण्याइतकी भक्कम आहेत.

नुसत्या काळाचा तर त्यांच्यावर परिणाम होणेच शक्य नव्हते.पण पुनर्जन्माची ही कल्पना इतकी दृढपणे त्यांच्या मनात रूजलीच कशी? आपल्या शरीरात जीव ओतला जाईल.हा विश्वास निर्माण झाला कसा?त्याच्या मागची भूमिका अत्यंत क्रांतिकारक आहे.जतन करून ठेवलेले शरीर संरक्षक आणि अभेद्य ठिकाणी ठेवायचे की ज्यामुळे शरीराचे आणि त्यातील पेशींचे रक्षण होईल आणि हजारो वर्षानंतर पुन्हा नव्या जीवनाची घडण केली जाईल ही विचारसरणी आली कशी त्यांच्या मनात ? धार्मिक

भावना क्षणभरच बाजूला ठेवू पण फॅरोह राजांना निश्चितच देव आणि त्यांच्या चालीरितींबद्दल जास्त माहिती होती.त्यांच्यापैकी कोणत्या राजाच्या मनात,

कोणत्या कारणाने ही कल्पना प्रथम रूजली असेल ? 'मी स्वत:साठी असे थडगे बनवीन की ज्याचा हजारो वर्षांत नाश होणार नाही.ते मी अशा ठिकाणी बांधीन की, कित्येक मैलांवरून दिसू शकेल.देवांनी वचन दिले आहे की ते परत येतील आणि मला उठवतील.' (का भविष्यकालीन डॉक्टरच मला पुन्हा जिवंत करण्याचा मार्ग शोधतील ? )


पण सध्याच्या अंतराळ युगाशी ममीज् चा काही संबंध आहे?


डॉक्टर आणि खगोलशास्त्रज्ञ रॉबर्ट एरिंजर यांनी १९२६ मध्ये लिहिलेल्या 'अमरत्वाची संभाव्यता' (The prospect of Immortality) या पुस्तकात सुचविले आहे की विसाव्या शतकातच मानव स्वतःला 'गोठवून घेऊ शकेल.वैद्यकीय आणि जीवनशास्त्राच्या दृष्टीने मानव जिवंत राहील पण त्याच्या पेशी नेहमीपेक्षा कोट्यावधी पटीने हळुहळू काम करून फक्त जिवंत राहतील.अशक्य?

रक्तपेढीसारख्या हल्ली अस्थिपेढी अस्तित्वात आहेत.

वर्षानुवर्षे अस्थी गोठवलेल्या परिस्थितीत ठेवून गरजे-

नुसार त्या पुन्हा वापरता येतात.रक्त तर अनंत काळपर्यंत (-) १९६° सेंटिग्रेड तापमानात ठेवून देता येते.शरीरातील पेशी द्रवरूप नायट्रोजनच्या तापमानात त्याच तऱ्हेने अनंतकाळ जिवंत ठेवता येतात.कोणत्या तरी फॅरोह राजाच्या मनात आलेली कल्पना सत्यसृष्टीत उतरण्याची वेळ हजारो वर्षानंतर खरोखरच आली आहे का?मार्च १९६३ मध्ये अमेरिकेतील ओक्लाहामा युनिव्हर्सिटीच्या दोन जीवशास्त्र तंत्रज्ञांनी खात्री पटवली की इजिप्तची राजकन्या मेने हिच्या कातडीच्या पेशी पुन्हा काम करण्याच्या परिस्थितीत आहेत.ही राजकन्या तर हजारो वर्षांपूर्वी मरण पावली आहे.त्याच वर्षी रशियन टेलिव्हिजनवर दोन कुत्रे दाखवले गेले.आठ दिवस त्यांना पार गोठवून टाकले होते, बाहेर काढल्यावर ते हळुहळू जिवंत झाले.


अमेरिकेच्या अंतराळ योजना कार्यक्रमात आज एक कठीण पेच उभा आहे.त्यात गुप्त असे काहीच नाही.

अंतराळातील कोणत्याही ग्रहावर स्वारी करायची म्हटले तर जो काळ जाईल तो शेकडो वर्षांचा सुद्धा असेल.

त्यासाठी दीर्घं निद्रावस्थेतील (Hibernation) परिस्थितीत अंतराळवीरांना जिवंत कसे ठेवायचे? 


प्रोफेसर एरिंजर यांची आज टर उडवली जाते.त्यांनी भविष्यात मानवाचा कृमिकीटक व आग यांनी नाश होणार नाही असे भविष्य वर्तवले आहे. अति शीत थडग्यात किंवा पेट्यात मृत माणसे ठेवली जातील.

वैद्यकशास्त्रात झपाट्याने जे शोध लागत आहेत; त्यात एक शोध असाही असणार आहे की मृत माणसे ज्या कारणांनी मरण पावलेली असतील त्यावर इलाज सापडला की ते कारणच शरीरातून काढून टाकायचे की तो माणूस पुन्हा जिवंत होईल..


पण मुख्य मुद्दा राहतोच.आपल्या प्राचीन पूर्वजांना पुनर्जन्माची ही कल्पना प्रथम कोणी दिली ?


शरीरातील सर्वच पेशी एकच कार्य करीत नाहीत. त्यांची निर्मिती,वाढ आणि क्षय या गोष्टी जन्मभर चालू असतात.

पण त्यांची क्रयशक्ती कमी करायची,ज्यामुळे त्यांचा क्षय लवकर होणार नाही.आणि त्यामुळे माणसाचे आयुष्यही वाढेल; ही क्रांतिकारक कल्पना इजिप्शियन लोकांच्या मनात आली कशी ? इथेच ममीज् चा आणि प्राचीन भूतकाळात पृथ्वीला भेटी दिलेल्या अंतराळवीरांचा काही संबंध असेल ? एखाद्या राजाने राजपुत्राने,समाजातील प्रतिष्ठित माणसाने 'देव',त्यांची प्रेते अशा तऱ्हेने जतन करून अविनाशक दगडी पेट्यात ठेवताना पाहिले होते का? का काही देवांनीच (अंतराळवीरांनी) त्यांना आपणहून या मागची भूमिका समजावून सांगितली होती?


आजपासून काही शतकात पृथ्वीवरील मानवजात अंतराळ प्रवासात प्राविण्य मिळवील हे निर्विवाद ! या आधी अंतराळ प्रवासाच्या संशोधनाबरोबर इतर शास्त्रांच्या संशोधनातही प्रगती करावी लागणार आहे.इलेक्ट्रॉनिक्स सारख्या फक्त एखाद्याच तंत्रातील प्राविण्य उपयोगी पडणार नाही.मानवप्राणी शेकडो वर्षे जिवंत ठेवण्याचे कार्य वैद्यकशास्त्र आणि जीवनशास्त्रातील तज्ञांना अंतराळ संशोधनाचा एक भाग म्हणूनच पार पाडावे लागणार आहे.पण प्रक्रिया करून जतन केलेली शरीरे हजारो वर्षांनी पुन्हा चालती बोलती करण्याचे ज्ञान इतिहासपूर्व काळातील देवांना (अंतराळवीरांना) होते का ?-सुमेरियन राजे आणि बायबलमधील अनेक व्यक्तिरेखांचे कल्पनातील आयुष्यमान आपण पाहिले आहे.अंतराळयानात प्रकाश वेगाने प्रवास करताना जाणाऱ्या काळात आणि पृथ्वीवरील काळात फार मोठी तफावत असणार हे आपल्याला कळत आहे.


'ममीज्' हा त्यांच्या अमर्याद आयुष्याचा दुसरा पुरावा असेल का? पुराण काळातल्या या व्यक्तींना अतिशीत पेट्यात गोठवून ठेवत असतील तर? समजा की प्राचीन काळातील अज्ञात अंतराळवीरांनीच त्या काळातील प्रमुख व्यक्तींना असे दीर्घ निद्रावस्थेत ठेवले होते आणि नंतरच्या त्यांच्या प्रत्येक भेटीच्या वेळी पुन्हा जिवंत करून संभाषण केले होते प्रत्येक वेळी परत जाताना या व्यक्तींना अंतराळवीरांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे अतिशीत करून ममीज् बनविण्याचे काम धर्मगुरू करीत असतील आणि त्यांना पुन्हा देव येईपर्यंत भव्य मंदिरात ठेवून देत असतील. अशक्य? हास्यास्पद ? सबंध हिवाळा निद्रावस्थेत घालवणारे प्राणी आपल्याला माहिती नाहीत? थंडीने गोठून लाकडासारखे बनणारे काही तऱ्हेचे मासे उष्ण पाण्यात आल्यावर पुन्हा पोहायला सुरुवात करतात हे आपल्याला माहिती नाही ? मग ममीज् ची कल्पना इजिप्शियन लोकांच्या मनात निसर्गाकडे बघून आली का? पण अशी कोणतीही टूम निघाली की श्रद्धेने ती आचरणाऱ्यांचा एक पंथ तयार होतो; हे ऐतिहासिक सत्य आहे पण इजिप्शियन लोकात असा पंथ कधी होता असे आढळलेले नाही.इजिप्तचे हवामान लक्षात घेता निसर्गाकडून अशी निद्रावस्था ते शिकले असतील असे वाटत नाही.फॅरोहांच्या थडग्यात सोने,हिरे,मोती यांचे अलंकार असायचेच पण शिवाय धान्य,मसाले, कापड यांचीही तरतूद असायची.नंतर कोणत्याही राजाने ही थडगी उघडली की या सर्व गोष्टींचा नवीन साठा भरून ठेवत.पुनर्जन्म ही थोड्या काळाने मिळणारी गोष्ट नव्हती,तर ती हजारो वर्षांनी मिळणारी होती,याची इजिप्शियन लोकांना पूर्ण जाणीव होती.ही थडगी लुटण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. 'देव' हे प्राचीन काळात परग्रहांवरून आलेले अंतराळवीर होते.या सिद्धातांशी या लुटमारीचा तसा संबंध नाही.पण जून १९५४ मध्ये सक्कर येथे असा काही प्रकार न झालेले थडगे मिळाले. पहिल्या खोलीत रत्नांची पेटी होती तशीच होती. दगडी शवपेटी बाहेर काढून ठेवायच्या झाकणाने बंद केली नव्हती तर सरकत्या झाकणाने.९ जून रोजी समारंभाने ही शवपेटी उघडली तर आत काहीच नव्हते.

अक्षरशः काही नाही.आपले रत्नभांडार मागे ठेवून 'ममी' निघून तर गेली नव्हती?


मंगोलियात जे थडगे सापडले आहे ते एखादी छोटी टेकडी आतून लाकडी फळ्यांनी आच्छादिलेली असावी असे दिसते.वर्षानुवर्षे राहणाऱ्या बर्फाने ती शीतगृहच वाटते.

त्यात स्त्री-पुरुषांच्या ममीज्,अन्न,वस्त्रे,रत्ने याशिवाय संगीताची वाद्ये ठेवली होती.एका खोलीत एक चित्र आहे.

एका मोठ्या चौकोनात सहा चौरसांच्या तीन ओळीत डोक्यावर चित्रविचित्र शिंगे,पाठीवर पंख असलेल्या स्फिंक्ससारख्या आकृत्या आकाशात उडण्यास सज्ज आहेत असे वाटते.पण ही प्रतिकृती निनेव्ह येथील असीरियन राजवाड्यातील दगडी गालिच्याची प्रतिकृती आहे.असे तज्ञांचे मत आहे हे आश्चर्य !


ॲन्डीज पर्वत,सैबेरिया,चीन,सुमेरिया,इजिप्त, दक्षिण आफ्रिका या सर्व ठिकाणी ममीज् सापडल्या असल्या तरी पुनर्जन्माची ही कल्पना आपल्या पूर्वजांच्या मनात भरवली कोणी,या कोड्याचा उलगडा मात्र अजून होत नाही तो नाहीच.सर्वच मृत माणसांबरोबर त्यांच्या गरजेच्या वस्तू आहेत,दागदागिने आहेत,स्वेच्छेने पुरून घेणारे नोकर-चाकर आहेत.सर्व जगात घडणाऱ्या या गोष्टी काय योगायोगाच्या आहेत?


दहा दहा हजार वर्षांपूर्वीच्या ममीज् जेरिको येथे सापडल्या आहेत.प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये आठ हजार वर्षांपूर्वी बनवलेली कित्येक डोकी सापडतात.त्या काळात साधी मातीची भांडी बनवण्याची क्षमतासुद्धा त्या लोकात नव्हती. जेरिको येथे दुसऱ्या भागात अगदी सरळ रेषेत बांधलेली प्राचीन घरे आढळतात.त्यांच्या गोलाकार भिंती आतल्या बाजूला वळलेल्या आहेत घुमटासारख्या.कार्बन- १४ या पद्धतीने या घरांचे 'वय' आहे १०४०० वर्षे. 


इजिप्शियन धर्मगुरुंनी ११००० वर्षांचा इतिहास हेरोडोटसला सांगितला होता. ते नक्की खरेच असेल की यालाही योगायोगच म्हणायचे ? फ्रान्समध्ये प्राचीन शिलांवर आधुनिक पद्धतींच्या हॅटस्,पॅन्ट्स,जॅकेट्स् घातलेल्या माणसांची चित्रे आहेत.ही चित्रे कोणी कोरून काढली? जनावरांची कातडी पांघरून वावरणाऱ्या प्राचीन काळातल्या अत्यंत मागासलेल्या लोकांना, विसाव्या शतकातल्या माणसांची चित्रे काढण्याइतकी कल्पनाशक्ती असेल? ही चित्रे आपल्या सबंध इतिहासात गोंधळ माजवायला कारणीभूत होत आहेत.फ्रान्समधील गुहेत काढलेली अप्रतिम पेंन्टिग्जसुद्धा आपल्याला थक्क करतात.ती अगदी कालच पूर्ण झाली आहेत असे वाटते.

आपले पाषाणयुगातील रानटी पूर्वज जर अशी चित्रे काढू शकत असतील,तर त्यांनी राहण्यासाठी झोपड्या वगैरे कधी का बांधल्या नाहीत? लक्षावधी वर्षांपासून पक्षी स्वतःसाठी घरटी बांधत आहेत.इतर प्राणी आसरा शोधत आले आहेत,पण मानवसदृश प्राण्याला स्वतःसाठी आसरा कधी बांधता आला नव्हता.


बोर्निओच्या पश्चिम किनाऱ्यावरील दऱ्याखोऱ्यात जे गुहांचे जाळे आहे त्यातल्या गुहा तर कॅथेड्रलसारख्या भव्य आहेत.आणि त्यामध्ये अत्यंत तलम अशा वस्त्रांचे नमुने सापडले आहेत.कितीही इच्छा झाली तरी प्राचीन काळातल्या रानटी लोकांनी ही वस्त्रे बनविली असतील अशी कल्पनाच करता येत नाही.या सर्व शोधांनी पुराणवस्तू संशोधनाच्या चाकोरीतून बाहेर पडायची निकड जास्तीच जाणवायला लागते.गेल्या दोन हजार वर्षांच्या इतिहासाबद्दल तसा काही संशय नाही पण परग्रहांवरील अंतराळवीरांनी,त्या अज्ञात जमातींनी,

आपल्यावर संस्कार करायला सुरुवात केली तो काळ साधारणतः १०,००० ते ४०,००० वर्षे इतकाच असावा एवढेच वाटते.याहून जास्ती काही सांगता येत नाही.

कोणत्याही प्राचीन अवशेषांचे 'वय' सांगणारी गाजलेली कार्बन- १४ पद्धत या संशोधनात उपयोगी पडेल असे वाटत नाही.मानवशास्त्र,भूगर्भशास्त्र यांचे संशोधक

मिळालेल्या ऐतिहासिक गोष्टींचे 'वय' शोधून काढण्यासाठी ही पद्धत वापरतात.या पद्धतीच्या बाबतीत एक गोष्ट गृहीत धरली जाते रेडिओ अँक्टिव्ह आयझोटोप कार्बन वातावरणामध्ये नेहमी एकाच पातळीवर असतो.

माणसे आणि प्राणी कोणत्या तरी पद्धतीने झाडे,मुळे,

गवत, पाने खातच असतात.त्यामुळे त्यांच्याही शरीरात एकाच प्रमाणात हा कार्बन असतो.सर्व अणू किरणोत्सर्गी पदार्थांचे आयुष्य ठरलेले असते आणि मग ते नाश पावतात.सर्व प्राणीमात्रात त्यांच्या मृत्यूनंतर आणि झाडे तोडल्यानंतर ही क्रिया सुरू होते.दर ५६०० वर्षांनी कोणत्याही सेद्रिंय पदार्थांमधला अर्धा कार्बन नष्ट होतो. म्हणजे ५६०० वर्षांनी त्याच्यात १/२ कार्बन राहतो,

११२०० वर्षांनी १/४,२२४०० वर्षांनी १/ ८ भाग कार्बन शिल्लक राहतो.वातावरणातले कार्बनचे प्रमाण माहीत असल्याने व प्रयोगशाळेत जुन्या सेद्रिंय अवशेषात किती कार्बन शिल्लक आहे हे कळू शकत असल्याने, एखाद्या हाडाचे किंवा कोळशाच्या तुकड्याचे वयही सांगता येते.

पण आज वातावरणात जितका कार्बन आहे तितकाच हजारो वर्षांपूर्वीही होता ही जी गोष्ट आपण गृहीत धरून चाललो आहोत तीच जर बरोबर नसली तर? देव अणुस्फोटासारखी उष्णता निर्माण करू शकत होते,असे सर्व पौराणिक वाड्मयात लिहिले आहे;म्हणजे त्या

काळात सर्व गोष्टींमध्ये कार्बनची पातळी खूपच होती.

आजच्याएवढी नव्हतीच.मग चुकीची उत्तरे मिळण्याचा संभव वाढतो.या पद्धतीचा मुख्य तोटा म्हणजे ज्या पदार्थांचे वय आपण शोधून काढत असतो तो नष्ट होतो.शिवाय मौल्यवान धातू,दगड वगैरे गोष्टी किती जुन्या आहेत ते आपण शोधून काढू शकत नाही.संशोधन करण्यात येणारा पदार्थ जितका जुना तितकी ही पद्धत अचूक निर्णय देऊ शकत नाही.ती अविश्वसनीय ठरते.

सेद्रिंय पदार्थ समजा ३०,००० ते ५०,००० वर्षे इतका जुना असेल,तर याच कालखंडात कुठे तरी, इतकीच माहिती ही पद्धत देऊ शकते.तेव्हा कार्बन-१४ या पद्धतीवरच आपण अवलंबून राहू शकणार नाही.यापेक्षा चांगल्या आणि विश्वसनीय पद्धती शोधून काढणे आवश्यक आहे.


१०.८.२३ या भागातील पुढील दुसरा भाग समाप्त..