* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२२/५/२५

हठयोगी बेडूक / Hatha Yogi Frog

सोलापूर हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आषाढ-श्रावणात पाऊस पडला नाही,की भाद्रपद महिन्यातील पुनवेला भल्या मोठ्या दुरडीत भातुकलीतल्या खेळातलं एक मातीचं घर बांधून,त्यात बेडूक ठेवून जोखमार लोक घरोघरी देवीच्या नावानं जोगवा मागत फिरत.पाऊस पडावा म्हणून देवीची करुणा भाकीत.

लहानपणी हे दृश्य मी अनेकदा पाहिलं आहे.कित्येकदा कुतूहलानं आम्ही पोरंदेखील त्यांच्या मागोमाग जात असू.पुढं पावसाला सुरुवात व्हायची. आमच्या घराजवळ माळरान होतं.वर्षभर कोरडं राहणारं तिथलं तळं पावसात भरून जाई.डबकीदेखील तुडुंब व्हायची.जिकडं-तिकडं चिखल होई.रात्री डरॉऽव डराँऽऽव असं बेडूक ओरडू लागायचे.आई म्हणायची,


'बेडूक ओरडतायत.आता खूप पाऊस पडेल.'


सकाळी उठून मी पहिल्यांदा तळं आणि डबकी पाहायला धाव घ्यायचा.पाच-पन्नास बेडूक पाण्यात बसलेले दिसायचे.मातकट रंगाचे हे बेडूक आपल्या लांब जिभेनं कीटक खाताना दिसायचे.

काही दिवसांनी कायापालट होऊन त्यांची कातडी पिवळी जर्द होई. डोळे सुवर्णमण्यासारखे चमकू लागत.एकेका बेडकीला पाठकुळी घेऊन बेडूक टुणटुणा उड्या मारीत चालायचे.पाठीवर बसलेला बेडूक खालच्या बेडकीच्या गळ्याभोवती हातांनी घट्ट धरून राही.काही दिवसांनी या जोड्या अलग अलग होऊन जिकडंतिकडं पांगत.


माझ्या बालमनात एक विचार येई.वर्षभर कधी न दिसणारे हे गलेलठ्ठ बेडूक आता पावसाच्या सुरुवातीला कुठून येत असतील?


माझी एक चुलत आजी तळ्याकाठच्या एका कुडाच्या घरात राहायची.त्या घरावर पत्र्याचं छप्पर होतं. तळ्याकडं भटकत गेलो,की मी तिच्या घरी जात असे. ती शकुन पाहायची.कोणी ना कोणी बायाबापड्या तिच्यासमोर बसलेल्या असायच्या.त्या आजीकडं शकुन बघायला आलेल्या असायच्या.प्रश्नार्थक मुद्रेनं त्या आजीच्या कवड्यांच्या माळेकडं पाहात असायच्या. आजीच्या हातातली हलणारी माळ हळूहळू निश्चल व्हायची.आजी त्या माळेकडं एकाग्रतेनं पाहात असायची.मात्र स्थिर झाली,की त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची ती उत्तरं द्यायची.आपलं मनोगत सांगायची. थोडा जरी पाऊस पडला,तरी पत्रे वाजायचे.कधी कधी माळ सारखी हलायची.स्थिर व्हायची नाही.तेव्हा आजी देवीवर संतापून काहीबाही बोलायची.तिची दोन्ही रूपं मला पाठ होती.

घरासमोरच्या छपरीत बसून एरवी ती पडणाऱ्या पावसाकडं आणि तळ्याकडं पाहात राही. अशी बसली,की ती खुशीत असायची.मी हळूच तिच्या शेजारी उगी बसून राहायचा.ती विचारी,


"काय,शाळेत गेला नाहीस वाटतं?अन् पावसात भिजलास किती ? तळ्यात हुंदाडला असशील.जा,घरी जाऊन कपडे बदल.नाही तर आजारी पडशील!"


मला तिला आज एक प्रश्न विचारायचा होता.तळ्याच्या कडेनं साबणाच्या फेसासारखे दिसणारे पुंजके मी प्रत्येक पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेकदा पाहिले होते.त्याविषयी शंका विचारायची होती.


"आजी,एक विचारू?" मी लाजत तिच्या अंगाला बिलगत म्हटलं. "काय विचारणार आहेस पोरा?"


" तसं नाही ग.त्या तळ्याकाठी साबणाचा फेस आल्यासारखे पुंजके दिसतात.ते काय आहे?"


तो अपशकुनी प्रश्न विचारायचा नसतो."असं म्हणून ती बराच वेळ गप्प बसली.मी तिच्या सुरकुतलेल्या चेहेऱ्याकडं पाहात होतो.तिच्या नाकाजवळ,गालावर एक मोत्याएवढा मस होता.तो देखील आता हलत होता.


"पोरा,आभाळातून चांदण्या तुटून खाली पाण्यात पडल्या,की त्यांचा तसा फेस येतो."


पण तुटलेल्या ताऱ्याविषयी तिची इच्छा नसताना बोलावं लागलं हे तिला काही आवडलं नाही.ती स्वतःशीच काहीतरी पुटपुटत राहिली.नंतर माझ्या पाठीवर हळुवार धपका देत म्हणाली,


"अंधार होतोय् आता जा घरी."


दुसऱ्या दिवशी काठी टेकीत टेकीत आजी आमच्या घरी आली.

तळ्यापलीकडच्या आळीत आमचं घर होतं. तिला पाहताच आई म्हणाली,


"आलाव, मामी ? बसा."


काठी उजव्या हाताशी ठेवून ती खांबाला टेकून बसली. आईची तिच्यावर माया आणि श्रद्धा होती.आईबरोबर आजीही जेवली.

अंथरुणावर पडल्या पडल्या तिला झोप लागली.नंतर जाग आल्यावर ती आईला माझ्याविषयी सांगत होती,


"मला हा पोर अनेक शंकाकुशंका विचारून भंडावून सोडतो."


"होय?" आईनं विचारलं.


"हो,ग." आजी म्हणाली.


आई तिला म्हणाली-


"काल मला विचारीत होता,की रात्री ओरडणाऱ्या बेडकुळ्या आणि त्यांची पिलं आली कोठून? मी सांगितलं,ती आभाळातून खाली पडली म्हणून."


बेडकांविषयीचं बालपणी मनात असलेलं हे कुतूहल कधी गेलंच नाही.सृष्टीतील ही आश्चर्य घेऊनच मी वाढत होतो.


माझी आई आणि आजी या दोघींना निसर्गाविषयी किती ज्ञान असणार ? माझ्या कुतूहलाचं समाधान होईल अशी उत्तरं त्या द्यायच्या.त्यांनीदेखील ते कोणाकडून तरी असंच ऐकलं असणार.


या कुतूहलातील गूढतेमुळंच मला जीवशास्त्रात अधिक गोडी वाटली.विद्यार्थी दशेपासूनच त्याचा सखोल अभ्यास मी केला.पुढं योगायोगानंवन्यजीवशास्त्रज्ञ झालो.माझ्या मनात असलेल्या जिज्ञासेची उत्तरं शोधली,त्यांची उत्तरं मिळालीही.परंतु ती ऐकायला माझी आजी आणि आई हयात राहिल्या नाहीत.


अनेक वर्षांनी वनाधिकारी झाल्यावर रानावनात फिरताना पावसाळ्यात मला अनेक रंगांचे बेडूक आढळून येत.काही पिंगट हिरवे,तर काही तपकिरी वर्णाचे असायचे.क्वचितच चट्टेपट्टे असलेले बेडूक दिसायचे.पाखरांच्या रंगांत असलेली विविधता बेडकांच्या वर्णातही आढळून यायची.त्यांतले काही वातावरणाला योग्य असा रंगात बदल करायचे.अनेकदा मी त्यांना स्पर्शही करी,तेव्हा त्यांची कातडी मऊ आणि ओलसर लागे.माझी चाहूल लागताच डबक्याच्या काठावर बसलेला पाच-पंचवीस बेडकांचा समूह टुणटुणा उड्या मारीत पाण्यात प्रवेश करी.काही पाण्यात तरंगत,तर काही तोंड पाण्यावर काढून बसलेले असत.

डबक्याजवळच्या झाडाखाली बसून मी त्यांचं निरीक्षण करी.सारं काही सामसूम झाल्यावर ती सर्व बेडकं पुन्हा काठावर येऊन चरू लागत.लांब चिकट जिभेच्या साहाय्यानं गांडुळं,कृमि-कीटक,

गोगलगाई यांना गिळताना दिसत.त्यांच्या तोंडात दात असल्यामुळं भक्ष्याला निसटून जाता येत नसे.


काही दिवसांनी त्यांचा डराँऽडराँऽऽव असा आवाज येऊ लागे.साऱ्यांनाच ओरडता येत नसे.मोठ्या आकाराची बेडकी त्या ओरडणाऱ्या बेडकाजवळ येई.तो टुणकन् उडी मारून तिच्या पाठीवर स्वार होई.पुढच्या पायांनी तिला गळ्याजवळ घट्ट धरी.मग ध्यानात येई,की आवाज करणारे बेडूक नर होते आणि आकारानं मोठ्या असलेल्या माद्या होत्या.या काळात पाण्याच्या काठावर जिकडंतिकडं अशा बेडकांच्या जोडगोळ्या दिसतात. त्यांच्या विणीच्या काळाला सुरुवात झालेली असते. मादी मोत्याच्या माळेसारखी अंडी घालते.त्या अंड्यांच्या गोळ्यांवर नर शुक्राणू सोडतो.अंडी पाण्यात फुगून मोठी होतात.त्यांवर साबणाच्या फेसासारखं आवरण दिसू लागतं.एखाद्या आठवड्यानंतर या पुंजक्यातून बेडकांची अर्भकं बाहेर पडायची.या अर्भकांचं प्रौढ बेडकांशी साम्य नसतं.त्या अर्भकांना शेपटी आणि कल्ले असल्यामुळं ती माशाच्या पिलांसारखी पाण्यात संथपणे पोहताना दिसायची.ती अर्भकं पाच-सहा अवतारांतून जात.शेवटी दोन महिन्यांनी त्यांची शेपटी गळून पडे आणि त्यांचं पूर्ण बेडकात रूपांतर होई.


ही झाली राणा बेडूक म्हणजे फ्रॉगची कथा.


परंतु जंगलात भेक म्हणजे 'टोड' नावाचा बेडकाचा प्रकारही आढळून येई,भेक दिसायला बेडकासारखाच. परंतु भेकाची कुडी वेगळी आहे.चाराच्या सालीसारखी त्याची पाठ खडबडीत असते.त्यावर छोटे छोटे उंचवटे असतात.भेकाला दात नसतात.

त्याला चालता किंवा रांगता येतं.परंतु बेडकासारख्या उड्या मारता येत नाहीत.डिवचलं असता त्याच्या कानाच्या पूढील आणि मागील भागांतून विष स्रवतं.विणीच्या हंगामात भेक मोठ्यानं ओरडतात.ते स्वभावानं मोठे आक्रमक असतात.कित्येकदा त्यांच्यात लढाई जुंपली,तर एकमेकांना ते ठारही करतात.या दोहोंपेक्षा आणखी एक प्रकारचा उंच झाडाच्या फांद्यांवर राहणारा वृक्षमंडूक असतो.त्याचेही अनेक प्रकार आहेत.वृक्षमंडूकांचं विशेष लक्षण असं,की त्यांच्या पायांना वाटोळ्या गिरद्या असतात.त्यांच्या योगानं ते फांद्यांची चांगली पकड घेऊ शकतात.गिरद्या दाबल्यामुळं फांद्या आणि गिरद्या यांच्यामधली हवा निसटून जाते आणि पंज्यावरील बाहेरच्या हवेच्या दाबानंच मंडूक फांदीला चिकटून राहतो.


पावसाळ्यानंतर अन्नपाणी आणि हवा यांवाचून जमिनीखाली राहणाऱ्या बेडकांच्या जीवनक्रमाविषयी अठराव्या शतकापर्यंत जीवशास्त्रज्ञांना काही माहिती नव्हती.बेडूक दगडाच्या आतील थरात अनेक वर्षं राहतात असा लोकांचा समज होता.विल्यम बकलँड या जीवशास्त्रज्ञानं अथक प्रयत्नांनंतर त्यांच्या अज्ञात अशा जीवनक्रमाचं कोडं उलगडलं.त्यानं असं निदर्शनास आणलं की,बेडूक शाडूच्या दगडात एखाद्या वषर्षापेक्षा अधिक काळ जिवंत राहू शकत नाही.(सछिद्र नसलेल्या जमिनीत बेडूक गाडले गेले,तर ते मृत्युमुखी पडतात.) त्यांच्या जननग्रंथीजवळ वसापिंड असतो.बेडूक महानिद्रेत जाण्यापूर्वी हे वसापिंड मोठे होतात.या महानिद्रेत त्यांचा अन्न म्हणून उपयोग होतो.


प्राचीन काळापासून भारतीयांना मात्र बेडकांच्या जमिनीखालील जीवनक्रमाविषयी माहिती असल्याचं आढळून येतं.वराहमिहिराच्या बृहत्संहितेत 'उदकार्गल'वर (म्हणजे जमिनीखालील पाण्याचं ज्ञान ज्यामुळं होतं,ते शास्त्र) एक सविस्तर अध्याय आहे. वराहमिहिरानं हे प्रकरण सारस्वत मुनी आणि मनु या पूर्वाचार्यांच्या 'उदकार्गल' या ग्रंथावर आधारित असल्याचा उल्लेख केला आहे.


आपल्या पूर्वजांचं निसर्गज्ञान किती विस्तृत आणि सखोल होतं,याची प्रचीती भूगर्भातील पाणी ओळखण्यासाठी त्यांनी ज्या खुणा दिल्या आहेत, त्यांवरून होतं.पाणी व वनस्पती यांचा परस्परसंबंध आहे.वृक्ष,लता,वेली यांचं वारुळाशी सान्निध्य,तसंच सर्प, विंचू,घोरपड आणि बेडूक यांचं जमीन खोदताना दिसणारं अस्तित्व हे देखील जलविषयक ज्ञानाशी संबंधित आहे.त्यात राणा बेडूक आणि भेक यांच्या अस्तित्वाला अतिशय महत्त्व आहे.


'दागार्गल' विद्येमुळं आणखी एका अज्ञात अशा समस्येवर प्रकाश पडला आहे.पावसाळ्यानंतर बेडूक कुठं जातात? ते जमिनीखाली राहात असल्याची माहिती यामुळं मिळते.एवढंच नव्हे,तर रानावनांत बेडूक कोणकोणत्या वृक्षांच्या आधारानं राहतात,हे देखील ज्ञात होतं.बेडूक आणि भेक पावसाळ्यानंतर महानिद्रा घेतात;परंतु त्यांचा नेमका शोध कुठं घ्यायचा आणि त्यासाठी जमीन जास्तीत जास्त किती खोल खणायची, ती कोणत्या दिशेला खोदायची,हे देखील या शास्त्रात सांगितलेलं आहे.


पाखरमाया,मारुती चितमपल्ली, साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी, नागपूर


विस्तारभयास्तव मूळ सर्व श्लोक उद्धृत करणं शक्य नसल्यामुळं जिथं बेडकाचा उल्लेख आहे, तेवढाच संक्षिप्त निर्देश केला आहे.


जलरहित देशी वेताचे झाड असेल,तर सुमारे दीड पुरुष खोलीवर पाणी असतं.हे खोदकाम करताना अर्धा पुरुष खोलीवर पांढरा बेडूक आढळून येतो.


चिह्नमपि चार्धपुरुषे मण्डूकः पाण्डुरोऽथ मृत् पीता। (७)


जलरहित प्रदेशात जांभळीच्या झाडाखाली पाणी असतं.त्या झाडाखाली खणत असताना एक पुरुष खोलीवर बेडूक दिसून येतो.


मृल्लोहगन्धिका पाण्डूरा च पुरुषेऽत्र मण्डूकः । (८)


जिथं बेल आणि औदुंबर ही झाडं अगदी जवळ असतात,अशा ठिकाणी जमीन खोदल्यास अर्धा पुरुष खोलीवर काळा बेडूक सापडेल.


पुरुषैस्त्रिभिरम्बु भवेत् कृष्णोऽर्द्धनरे च मण्डूकः । (१८)


ज्या सप्तपर्णी वृक्षाभोवती वारूळ असतं,तिथं निश्चितपणे पाणी असतं.अर्धा पुरुष खोल खणलं,तर तिथं हिरवा बेडूक दिसून येतो.


पुरुषार्धे मण्डूको हरितो हरितालसन्निधा भूश्व। (३०)


ज्या वृक्षाच्या मुळ्यांच्या जाळ्यात बेडूक आढळून येतो, तिथं जलाचं अस्तित्व असतं :


सर्वेषां वृक्षाणामधःस्थितो दर्दुरी यदा दृश्यः । (३१)


कदंब वृक्षाच्या जवळ वारूळ असेल,तर त्या ठिकाणी पाणी लागतं एक पुरुष खोलीवर सोनेरी रंगाचा बेडूक दिसतो :


कनकनिभो मण्डूको नरमात्रे मृत्तिका पीता । (३९)


पीलू (अक्रोड किंवा किंकणेलाचा) वृक्षाच्या अस्तित्वावरून जल असल्याचा सुगावा लागतो.त्या ठिकाणी एक पुरुष खोलीवर भेक मंडूक आढळून येतो.


चिह्नं दर्दुर आदै मृत्कपिला तत्परं भवेर्द्धारता । (६४)


करीर (कारवी किंवा वेळू) वृक्षामुळं जलाचं ज्ञान होतं. तिथं एक पुरुष खोलीवर पिवळ्या बेडकाचं अस्तित्व असतं.


दशभिः पुरुषैज्ञेयं पुरुषे पीतोऽत्र मण्डूकः । (६७)


यावरून एवढ कळून येतं की,बेडूक चार ते सात फूट खोलवर महानिद्रा घेत असलेला आढळून येतो. तसेच, बेडकांना आश्रय देणाऱ्या झाडांचाही उल्लेख दिसून येतो.


बेडूक अंदाजे आठ महिने जमिनीखाली कसा राहात असावा,याचं मला नेहमीच गूढ वाटत आलं आहे. बेडकाची फुफ्फुसं आदिम स्थितीत असल्यामुळं श्वसनक्रियेस अपुरी पडतात.त्यांना जोड म्हणून कातडीच्या द्वारे प्राणवायूची देवाणघेवाण होते.महानिद्रेत बेडकाचं तोंड बंद असतं.बेडूक ज्या वेळी जमिनीखाली महानिद्रेत असतो,त्या काळात त्याला प्राणवायू कसा आणि कोठून मिळतो,याचं स्पष्टीकरण कोणत्याही शास्त्रीय ग्रंथात केलेलं आढळत नाही.


वन्य जीव खरोखरीचं योगी असल्याचं महर्षी पतंजलीनं म्हटलं आहे.योगासनांची सुमारे ऐंशी ते नव्वद टक्के नावं वन्य जीवांच्या नावांवरून ओळखली जातात.'हठयोग साधने'त साधक खेचरी मुद्रेचा अवलंब करतो. या तंत्रात साधक आपल्या जिभेचा शेंडा मुखातील नाकाच्या द्वारात घालून तासन् तास बसतो.अर्थात या वेळी प्राणवायू घेणं बंद असतं.या अवस्थेत साधकानं स्वतःला जमिनीत पुरून घेतल्याचे अनेक दाखले मिळतात.जमिनीखाली महानिद्रेत असताना बेडूकदेखील हीच क्रिया करीत असावा.


माणसाच्या पिनियल तंत्रिकेत 'सिरोटोनिन' (serotonin) नावाचं रासायनिक द्रव्य तयार होतं. या रसायनाचा संबंध कुंडलिनी जागृत करण्यासाठी होतो. हे रसायन निसर्गात खजूर,केळी,आलुबुखार यांमध्ये आढळून येतं.तसेच,बडा-पिंपळाच्या पिंपरातही ते मोठ्या प्रमाणात आढळून येतं.तसेच,ते बेडकाच्या शरीरातही तयार होतं.बेडकाच्या शरीरातील 'सिरोटोनिन'चा उपयोग त्याला महानिद्रावस्थेत होत असावा,असं अनुमान करता येईल.


पावसाळा संपल्यावर सर्वच प्रकारचे बेडूक काही जमिनीखाली जात नाहीत.काही खंदकातील भेगांत निवारा शोधतात.पर्वताच्या कडेकपारीवर राहणारे बेडूक दगडाच्या छिद्रांत आणि फटींमध्ये आसरा घेतात. वृक्षमंडूक झाडाच्या ढोलीत,तसेच छिद्रांत महानिद्रा घेतात.


अकराव्या शतकात होऊन गेलेल्या सु तुंग पो या प्रसिद्ध जपानी कवीचं सुंदर चरित्र लिन युतांग यानं लिहिलं आहे.त्यात एका आशयघन प्रसंगाचा उल्लेख केला आहे,तो असा :


'लोयांग नावाचा एक गृहस्थ एकदा चुकून खंदकात पडला.

त्या खंदकातील भेगांत बेडकांनी आश्रय घेतलेला होता.सूर्य उगवताच त्या बेडकांनी भेगांतून तोंड बाहेर काढलं आणि सूर्याचं किरण खावे,तशी ते बेडूक तोंडाची हालचाल करीत असल्याचं त्या गृहस्थानं पाहिलं. भुकेलेल्या त्या गृहस्थानं बेडकाचं अनुकरण केलं आणि आश्चर्य म्हणजे,त्याची भूक नाहीशी झाली.त्या खंदकातून नंतर लोयांगची सुटका करण्यात आली. त्याला पुन्हा कधीच भूक लागली नसल्याचं कवी सांगतो.'


कोळी या कीटकाची पिलं सूर्यशक्तीवर लहानाची मोठी होताना मी पाहिली हेत.बेडकाच्या बाबतीत असंत घडत असावं.


२०/५/२५

शत्रु बनवू नका / do not make enemies

जेव्हा थियोडोर रुजवेल्ट व्हाइट हाउस मध्ये होते, तेव्हा त्यांनी स्वीकार केलं होतं की,जर ७५ टक्के संधी समोर असतील,तर अपेक्षेपेक्षा जास्त सफलता त्यांना मिळेल.जर विसाव्या शतकातल्या महान लोकांमधल्या एकाचे हे म्हणणे आले,तर मग तुम्ही आणि मी आहेच कोण ? जर ५५ टक्के संधी तुमच्यासाठी अनुकूल असतील,तर तुम्ही वॉल स्ट्रीटवर जाऊन एका दिवसात लाखो डॉलर्स कमवू शकता;पण जर असं नसेल तर मग तुम्हाला काय हक्क आहे की,तुम्ही दुसऱ्या लोकांना त्यांच्या चुका सांगाल ?


शब्दांनीच नाही;पण नजरेने,आवाजाच्या स्वरावरून, तुमच्या हावभावावरून तुम्ही लोकांना सांगू शकता की, ते चूक आहेत.जर तुम्ही त्यांची चूक सांगता,तर काय ते तुमच्याशी सहमत होतात? कधीच नाही.कारण तुम्ही त्यांची बुद्धिमत्ता,गर्व आणि आत्मसन्मान यांवर सरळ आघात केला आहे.यामुळे उलटून ते तुमच्यावर वार करू इच्छितील;परंतु या कारणामुळे ते आपल्या विचारांना कधीच बदलणार नाहीत.


तुम्ही जरी प्लेटो वा इमॅन्युअल कान्टच्या पुऱ्या तर्काना घेऊन त्यांच्यावर चढाई केली तरी ते आपले विचार बदलणार नाहीत.कारण तुम्ही त्यांच्या भावनेला ठेच पोचवली आहे.


या प्रकारांनी आपली गोष्ट कधीच सुरू करू नका,"मी तुमच्यासमोर अचूक गोष्ट सिद्ध करायला जातो आहे." ही चुकीची सुरुवात आहे.दुसऱ्या शब्दांमध्ये तुम्ही समोरच्याला हे सांगत आहात की,'मी तुमच्यापेक्षा जास्त स्मार्ट आहे.मी तुम्हाला एक-दोन गोष्टी अशा सांगायला जातो आहे,ज्यामुळे तुमचे विचार तुम्ही बदलाल?'


हे एक आव्हान आहे.यामुळे विरोध उत्पन्न होतो आणि यामुळे श्रोता तुम्हाला सांगायच्या आधीच तुमच्याबरोबर युद्ध करायला तत्पर होतो.


चांगल्याहून चांगल्या परिस्थितीतही लोकांचे समज किंवा विचारधारेला बदलणं कठीण आहे.मग याला अधिक कठीण का बनवायचं ? स्वतःच स्वतःला कमकुवत का बनवायचं ?


जर तुम्ही काही सिद्ध करायला जात आहात,तर कोणालाही त्याचा पत्ताही लागायला नको.याला चतुराईने,कुशलतेने अशा प्रकारे करायला हवं की, कोणाला याची जाणीवही झाली नाही पाहिजे.या विचारांना अ‍ॅलेक्झेंडर पोपने संक्षिप्तमध्ये या प्रकारे व्यक्त केलं.


शत्रू निर्माण करण्याचे अचूक उपाय आणि त्यापासून कसा बचाव करायचा ? मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,कृपा कुलकर्णी,मंजूल प्रकाशन


लोकांना कोणतीही गोष्ट अशा प्रकारे शिकवायला हवी की,त्यांना तो पत्ताही पण लागला नाही पाहिजे की,आपण काही शिकवायला जातो आहोत.


गॅलिलिओने तीनशे वर्षांपूर्वी हे म्हटलं होतं की,तुम्ही कुणालाच काही शिकवू शकत नाही.तुम्ही फक्त त्याला आपल्या आतून शिकण्यात मदत करू शकता.सॉक्रेटिस जे अ‍ॅथेन्समध्ये आपल्या अनुयायींना परत परत सांगत होते- 'मी केवळ एकच गोष्ट जाणतो आणि ती ही आहे की,मी काहीच जाणत नाही.'


मी हा दावा नाही करत की,मी सॉक्रेटिसपेक्षा जास्त बुद्धिमान आहे.याकरता मी लोकांना हे सांगायचं बंद केलं आहे की,ते किती चूक आहेत आणि यामुळे मला खूपच फायदा मिळाला.


जेव्हा कोणी व्यक्ती असं सांगतो जी तुमच्या दृष्टीने चुकीची आहे;पण तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की ते चुकीचे आहेत,

तेव्हाही या प्रकारे सांगणं चांगलं नाही का होणार : " या,आपण आता बघू.माझं मत तुमच्यापेक्षा वेगळं आहे;पण मी चुकीचाही असू शकतो.मी अनेक वेळा चुकीचा ठरतो आणि जर चूक माझी आहे,तर मी आपली चूक सुधारीन.या,आपण तथ्यांचं अवलोकन करू." आमच्या क्लासच्या एका सदस्याने,मोन्टालाच्या कार डीलर हेरॉल्डचा प्रयोग केला.त्यांनी सांगितलं की, ऑटोमोबाईल बिझनेसच्या तणावग्रस्त वातावरणात ते कायमच ग्राहकांच्या तक्रारींवर जास्त लक्ष देऊ शकत नसत आणि त्यात ते उदासीनताच दाखवत होते.या कारणामुळे बिझनेसमध्ये नुकसान व्हायला लागले, ग्राहक रागवायला लागले आणि वातावरण बिघडायला लागले.त्यांनी आमच्या वर्गाला सांगितलं,"माझ्या शैलीने फायदा होत नाही,हे मला जाणवल्यावर मी आपलं तंत्र बदलून टाकलं.मी आपल्या ग्राहकांना हे म्हणायला सुरुवात केली,'आमच्या डीलरशीपमुळे इतक्या चुका झाल्यात की,मला बऱ्याचदा लाजिरवाणं व्हावं लागतं. तुमच्या बाबतीतही बहुतेक आमची चूक झाली आहे. मला याबाबतीत सविस्तरपणे सांगा.'या शैलीमुळे ग्राहकाचा राग लगेच थंड होत होता आणि जेव्हा तो आपली तक्रार सांगायचा तो जास्तच तर्कशुद्ध पद्धतीने सांगायचा.

खरंतर अनेक ग्राहकांनी तर मला इतक्या चांगल्या त-हेने त्यांचं म्हणणं ऐकल्याबद्दल धन्यवादही दिलेत.दोन ग्राहक तर आपल्या मित्रांनाही बरोबर घेऊन आले म्हणजे ते इतक्या चांगल्या ठिकाणाहून कार खरेदी करू शकतील.आजच्या स्पर्धेच्या युगात आम्हाला या प्रकारच्या ग्राहकाची गरज आहे आणि मला विश्वास आहे की,जर आम्ही ग्राहकांच्या विचारांच्या प्रति सन्मान दाखवू आणि त्यांच्या बरोबर कूटनीती व शिष्टाचाराचा व्यवहार करू तर आम्ही आपल्या प्रतिस्पर्थ्यांच्या पुढे निघून जाऊ शकतो.


जर तुम्ही हे आधीच कबूल केलं की,तुम्ही चुकू शकता तर तुम्ही कधी संकटात नाही पडणार.यामुळे भांडण्याची संभावना संपेल आणि यामुळे तुमच्या प्रतिस्पर्ध्यालाही प्रेरणा मिळेल की तोसुद्धा तुमच्या एवढाच मोकळा,निष्पक्ष आणि विशाल हृदयाचा होऊन जाईल.


जर तुम्हाला पूर्ण खात्री आहे की,समोरचा चूक करतोय आणि तुम्ही त्याला सरळ सरळ हे सांगता तर काय होतं? एक उदाहरण बघा.मिस्टर एस.न्यू यॉर्कचे तरुण वकील होते.एकदा ते युनायटेड स्टेट्स सुप्रीम कोर्टात एका महत्त्वाचा खटल्यात (लास्टगार्टन विरुद्ध लीअ कॉर्पोरेशन २८० यू.एस.३२०) वाद घालत होते. या खटल्यात खूप संपत्ती तर पणाला लागली होतीच, न्यायाचा एक महत्त्वाचा प्रश्न गुंतलेला होता.वादाच्या वेळी सुप्रीम कोर्टाच्या एका जजने त्यांना विचारले, "अ‍ॅडमिरेल्टी लॉमध्ये वेळेची सीमा सहा वर्षांची असते, हो ना?" मिस्टर एस.थांबले,

त्यांनी जजकडे एक क्षणभर पाहिलं आणि मग स्पष्टपणे सांगितलं, "युअर ऑनर,अ‍ॅडमिरल्टी लॉमध्ये कुठलीच सीमा असत नाही?" पूर्ण कोर्टात शांतता पसरली.आमच्या वकिलाने सांगितलं आणि खोलीचं तापमान शून्यावर आलं.मी बरोबर होतो.न्यायाधीश चूक होते आणि मी त्यांची चूक त्यांना सांगून टाकली;पण काय यामुळे त्यांचा व्यवहार माझ्याबरोबर मैत्रीचा झाला? नाही.मला आताही भरोसा आहे की,तो खटला मीच जिंकलो असतो.मी याच्या आधी इतका छान वाद कधीच घातला नव्हता;पण मी आपली गोष्ट मनवायला सफल झालो नाही.निकाल माझ्या विरुद्ध झाला.


मी एका ज्ञानी आणि प्रसिद्ध जजला हे सांगण्याची चूक केली होती की, तो चुकीचा होता.खूप कमी लोक तार्किक असतात. आपल्यातले जास्त लोक पूर्वग्रहामुळे ग्रस्त असतात. आपल्यात पहिल्यापासून ईर्षा,शंका,भीती आणि अहंकार असतो आणि जास्त करून लोक आपला विचार बदलवायला बघत नाही मग प्रश्न त्यांच्या हेअर स्टाइलचा असू दे.धर्माचा असू दे,साम्यवादाचा असू दे वा त्यांच्या सिनेमातल्या हिरोचा असू दे.त्यामुळे तुमची जर इच्छा आहे की,लोकांच्या चुका तुम्ही सांगाव्या तर प्रत्येक सकाळी न्याहारीच्या आधी पुढे लिहिलेला उतारा वाचा. याला जेम्स द्रार्वे रॉबिन्सनचे ज्ञानवर्धक पुस्तक द माइंड इन द मेकिंगमधून घेतलं आहे.


आपण कुठल्याही विरोधी किंवा तीव्र भावनेच्या आपल्या विचारांना नेहमी बदलत असतो;पण जर आम्हाला कोणी सांगितलं की,आम्ही चुकीचे आहोत तर या आरोपामुळे चिडून जातो आणि आपल्या हृदयाला कडक बनवतो.आपण आपल्या समजुती बनवण्याच्या वेळी अविश्वसनीयरीत्या बेपर्वा असतो;परंतु जर कोणी आमच्या चुकीच्या विश्वासाला दूर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या विचारांच्या प्रति जास्तीच्या आसक्तीचा अनुभव करायला लागतो.स्पष्ट रूपात आम्हाला आपल्या विचारांवर प्रेम नसतं,तर आपल्या आत्मसन्मानावर प्रेम असतं.


जे अशा वेळी आम्हाला धोक्याचं दिसायला लागतं... मानवीय संबंधांमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण शब्द 'माझं' हा असतो आणि शहाणपणा यातच आहे की,याचा सामना कुशलपणे केला पाहिजे.याची शक्ती एकसारखीच असते.मग मामला 'माझं' जेवण,'माझा' कुत्रा,'माझं' घर, 'माझे' वडील,'माझा' देश,किंवा 'माझा' देव यांच्याशी संबंधित असो.आम्ही न फक्त या गोष्टीने चिडतो की, मंगळावरच्या कालव्याच्या बाबतीत आमचे विचार किंवा आमचा 'अ‍ॅपिक्टेटस' या शब्दाचा उच्चार चूक आहे किंवा सेलिसिनची चिकित्सकीय उपयोगितेच्या बाबतीत आमचे विचार चुकीचे आहेत किंवा वॉटरलूची तारीख आम्हाला बरोबर माहिती नाही.आम्ही यावर विश्वास ठेवत राहणं पसंत करतो की,आम्ही ज्याला खरं मानतो तेच खरं आहे आणि जेव्हा आमच्या मान्यतांवर शंका घेतली जाते,तेव्हा आम्ही उत्तेजित होऊन जातो आणि आम्ही याला चिकटून राहण्याकरता वेगवेगळे बहाणे शोधायला लागतो.परिणाम हा होतो की,आमची तथाकथित तर्क करण्याची शक्ती आपल्या वर्तमान मान्यतांकरता तर्क शोधण्यात खर्च होते.


प्रसिद्ध मनोवैज्ञानिक कार्ल रॉजरने आपलं पुस्तक ऑन बिकमिंग अ पर्सनमध्ये लिहिलं आहे.


मी तर या गोष्टीला खूप महत्त्व देतो की,मी स्वतःला समोरच्याच्या नजरेने समजण्याची अनुमती देतो.मी मागच्या वाक्याला ज्या त-हेने म्हटले आहे ते तुम्हाला विचित्र वाटलं असेल.दुसऱ्याला समजायला आम्हाला स्वतःला अनुमती द्यावी लागते ? मला वाटतं की,हेच बरोबर आहे.बहुतेक गोष्टींच्या बाबतीत (जे आम्ही दुसऱ्या लोकांकडून ऐकतो) आमची पहिली प्रतिक्रिया मूल्यांकन किंवा निष्कर्ष काढण्याची असते आणि आम्ही समजण्याची मेहनतच नाही करत.जेव्हा एखादी व्यक्ती काही भावना,विचार किंवा विश्वासाला व्यक्त करतात तेव्हा आमची प्रवृत्ती लगेच हे जाणून घ्यायची असते की,'ही बरोबर आहे','हे मूर्खतापूर्ण आहे','हे असामान्य आहे','हे अतार्किक आहे','हे चुकीचे आहे','हे बरोबर नाही आहे'.कधी तरीच आम्ही स्वतःच स्वतःला या गोष्टीची अनुमती देतो की,आम्ही समोरच्याला पूर्ण रितीने समजण्याचा प्रयत्न करू आणि हे जाणून घेऊ की,समोरच्याचा दृष्टिकोन काय आहे.


मी एकदा एका इंटेरियर डेकोरेटरकडून आपल्या घराकरता नवीन पडद्याची सजावट केली.जेव्हा बिल आलं,तेव्हा मला जोरात झटका बसला.


काही दिवसांनी माझी एक मैत्रीण आली आणि तिने खोलीत लावलेले नवे पडदे बघितले.जेव्हा तिला किंमत कळली तेव्हा ती म्हणाली,"अच्छा! इतके महाग? मला वाटतं की

दूकानदाराने तुम्हाला लुटलं!" हे खरं होतं का? हो,तिने मला खरं सांगितलं होतं;पण खूप कमी लोक हे स्वीकारू शकतात की,ते या प्रकारे मूर्ख बनले आहेत.यामुळे माणूस होण्याच्या नात्याने मी स्वतःचा बचाव करायला सुरुवात केली.मी तिला म्हटलं की, चांगल्या क्वालिटीचं सामान महागच येतं आणि कलात्मक वा सुंदर वा चांगलं सामान फूटपाथवर नाही मिळत.दुसऱ्या दिवशी माझी आणखीन एक मैत्रीण आली आणि तिने पडद्यांची मनसोक्त तारीफ केली.तिने उत्साही स्वरात सांगितलं की,जर मीसुद्धा माझ्या घरात इतके सुंदर पडदे लावू शकली असती तर? त्या वेळी माझी प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळी होती.मी म्हटलं,"खरं सांगू,मला तर असं वाटलं की,मी याची खूपच जास्त किंमत दिली.यांना विकत घेऊन मी पस्तावलो आहे." जेव्हा आपण चूक असतो,तेव्हा आपण मनातल्या मनात आपली चूक मान्य करतो.हेच नाही जर समोरचा समजूतदारपणे आणि कूटनीतीने काम करेल,तर आपण त्याच्या समोरही आपली चूक कबूल करू शकतो आणि आपल्या खरेपणावर आणि उदारतेवर अभिमान बाळगू शकतो.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये...


१८/५/२५

४.२ स्पिशीज / 4.2 Species

स्पॉटेनियस जनरेशन खरं की खोटं?' या द्वंद्वात असतानाच बायॉलॉजीच्या क्षेत्रात आणखी एक प्रश्न उपस्थित झाला.तो म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या,न दिसणाऱ्या,माहीत असणाऱ्या आणि माहीत नसणाऱ्या अशा सगळ्याच जिवांचं वर्गीकरण कसं करायचं? सगळ्या सजीवांना एकाच विकासाच्या शिडीवर चढवायचं की त्यांचे वेगवेगळे गट करायचे?आपल्या सभोवती इतक्या प्रकारचे असंख्य सजीव आहेत. त्यांच्यात कमीअधिक प्रमाणात साधर्म्य आणि फरक आहेत,त्यामुळे यांच्यात वर्गीकरण कसं करावं हा प्रश्न आता अनेकांना सतावायला लागला.


वर्गीकरण करायला सुरुवात केल्यानंतर तर पुढे आणखीच वेगळे प्रश्न निर्माण झाले.सजीवांची प्रत्येक जात कोणत्या निकषांवर वेगळी मानायची?आपल्याला रस्त्यात दिसणारी सगळी कुत्री एकाच जातीची आहेत का? वेगवेगळ्या प्रकारचे आंबे देणारी आंब्याची झाडं एकाच जातीची की वेगवेगळ्या ? मग कोणत्याही प्राण्याची स्वतंत्र जात किंवा स्पिशीज ही गोष्ट ठरवणार कशी? स्पिशीज या संकल्पनेची व्याख्या तरी करणार कशी ? स्पिशीज ही साधारणपणे कोणत्याही सजीवाची एकच जात असते.या जातीतले नर आणि मादी समागम करून त्याच जातीच्या सजीवांना जन्म देऊ शकतात आणि ही नवी पिढीही पुढे प्रजनन करून पुन्हा त्याच जातीच्या सजीवांना जन्म देऊ शकते,ज्या जातींच्या इंडिव्हिज्युअल्समध्ये (सदस्यांमध्ये) असे संबंध शक्य असतात त्याच जातींतले सगळे सजीव बाहेरून दिसायला जरी वेगवेगळे दिसले तरी ते एकाच जातीचे,स्पिशीजचे आहेत असं समजावं.यात मग आशियांतली माणसं असो की आफ्रिकेतली माणसं असोत,ती समागम करून पुढच्या प्रजननक्षम जिवांना जन्म देऊ शकतात,त्यामुळे सगळी माणसं ही दिसायला जरी भिन्न असली तरी ती एकाच जातीची आहेत.


पण गंमत म्हणजे आशियातले हत्ती आणि आफ्रिकेतले हत्ती दिसायला बऱ्यापैकी सारखे असले तरी ते प्रजनन करू शकत नाहीत,त्यामुळे ते दोन वेगवेगळ्या जातींत मोडतात ! गंमत म्हणजे कोणताही सजीव आपल्यासारख्याच दुसऱ्या सजीवाशी समागम करून आपल्यासारखीच प्रजा निर्माण करतो आणि नंतर ती प्रजाही पुन्हा तशाच अनेक सजीवांना जन्म देते ही संकल्पना किती जुनी असावी? ही संकल्पना चक्क निओलिथिक काळापर्यंत मागे जाते !


खरं तर स्पिशीज ही संकल्पना इतकी मोठी आणि महत्त्वाची आहे की खुद्द जीवशास्त्राची अनेक अंगांनी प्रगती होत राहिली तरी गेल्या कित्येक शतकांपासून स्पिशीज या संकल्पनेची व्याख्या करण्यात वैज्ञानिकांचं अजूनही एकमत होताना दिसत नाही! सतराव्या शतकापासून ते आज एकविसाव्या शतकापर्यंत केल्या गेलेल्या स्पिशीजच्या किमान २६ महत्त्वपूर्ण आणि मान्यता पावलेल्या व्याख्या आहेत !


मुळात जगात अस्तित्वात असलेल्या सगळ्या सजीवांचं वर्गीकरण करताना उद्भवलेला हा स्पिशीजचा प्रश्न आहे. वर्गीकरणाचा अभ्यास करणाऱ्या बायॉलॉजीच्या शाखेला 'टॅक्सॉनॉमी' म्हणतात.आणि त्यातही प्रचंड खोलात जाऊन स्पिशीज कशाला म्हणावं किंवा दोन खूपच सारखे असणारे सजीव एकाच स्पिशीजमध्ये येतात की वेगवेगळ्या ? या प्रश्नाचा मागोवा घेणारी समस्या इतकी मोठी झाली,की याच प्रश्नाची चक्क विज्ञानाची एक नवीच शाखा निर्माण झाली.तिला 'मायक्रोटॅक्सॉनॉमी' म्हणतात !


या मधला सगळ्यात अवघड प्रश्न हा आहे,की सजीवाची कोणती जात कोणत्या स्पिशीजमध्ये मोडते हे कसं ठरवणार? कारण वरवर सारखे दिसणारे प्राणी किंवा वनस्पती आपापसात लैंगिक संबंध प्रस्थापित करून प्रजनन करू शकतातच असं नाही.शिवाय,

बऱ्यापैकी वेगळ्या दिसणाऱ्या वनस्पती आणि प्राणी आश्चर्यकारक रीतीनं एकाच स्पिशीजचे घटक असतात आणि ते चक्क प्रजननही करू शकतात ! त्यातून सूक्ष्मजीवांमध्ये तर आणखीच घोळ होते.ते सगळेच आकारानं खूप लहान. त्यातून मायक्रोस्कोपखाली पाहिलं तर त्यांचा फक्त बाहेरून आकार कळणार.मग दंडुक्यांच्या आकाराचे,गोलाकार,मण्यांच्या माळेच्या आकाराचे,स्वल्पविरामच्या

(,)आकाराचे असे कित्येक सूक्ष्मजीव होते,आहेत.मग यांच्यातही काही जाती,उपजाती आहेत का ?


यातही मजा म्हणजे गाढव आणि घोडा हे वेगवेगळ्या प्रजाती असून ते कधीकधी ते चक्क समागम करतात आणि खेचराला जन्म देतात! प्राण्यांच्या आणि काही वेळा वनस्पतींच्याही अशा विचित्र वागण्यामुळे स्पिशीजचा हा प्रश्न खरं तर न उकलणारा गुंताच होत चालला होता.


खरं तर असं आहे,की स्पिशीजमध्येसुद्धा एक सलगता आहे.जसं लाल आणि पिवळा या दोन रंगांच्या वेगवेगळ्या जातींमध्ये मरून,

वाइन कलर,भगवा, केशरी,आंबा रंग अशा अनेक छटा येऊ शकतात.त्यातल्या काही लाल रंगाकडे जास्त झुकणाऱ्या आणि पिवळ्या रंगाकडे कमी झुकणाऱ्या तर काही पिवळ्या रंगाकडे जास्त झुकणाऱ्या आणि लाल रंगाकडे कमी झुकणाऱ्या असतात.प्राण्यांच्या बाबतीतही दोन भिन्न वाटणाऱ्या स्पिशीजमध्येही काही थोड्या सारख्या, काही थोड्या वेगळ्या अशा अनेक प्रजाती असू शकतात.काही वैज्ञानिकांच्या मते यांच्यामध्येही वेगवेगळ्या प्रमाणात प्रजनन होत असतं आणि त्या सजीवांचं संपूर्ण पॉप्युलेशनच या सलगतेच्या धाग्यावर कोणत्याही दिशेनं प्रवास करू शकतं । 


आणि आपल्याला आता दिसणारे सजीव हे कायम असेच आहेत असंच माणूस त्यांचा अभ्यास करताना गृहीत घरतो,ही त्यात माणसानं केलेली चूक आहे. उत्क्रांती होताना एका मूळ सजीवापासून पुढे जसे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सजीव निर्माण होताना दिसतात,हे होताना त्यांच्यात होणारे बदल अगदी सूक्ष्म असतात,पण तेवढ्यात नव्या प्रकारच्या जिवांनी आपल्या मूळ स्पिशीजपासून फारकत घेतलेली असते! त्यामुळेच त्यांना वेगवेगळं ओळखणं ही अनेकदा खूपच अवघड गोष्ट होऊन बसते.


सतराव्या शतकापर्यंत स्पिशीज हा शब्द फारच ढोबळमानानं वापरला जात होता,कोणत्याही प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या वरवर सारख्या दिसणाऱ्या गटासाठी तो वापरला जायचा. १६८६ मध्ये जॉन रे यानं 'स्पिशीज' हा शब्द फक्त कोणत्याही सजीवाच्या एक आणि एकाच गटासाठी वापरला.आणि पाहता पाहता या शब्दाचं संकल्पनेत रूपांतर झालं.


जे सजीव आपापसातल्या समागमातून पुढची प्रजननक्षम प्रजा निर्माण करू शकतात,पण त्यांच्यातल्या त्यांच्यात थोडाफार फरक असू शकतो अशा सजीवांची एकच जात स्पिशीज म्हटली पाहिजे, अशी व्याख्या जॉन रे यानं मांडली.म्हणजे पिवळं फूल देणारी जास्वंद आणि लाल फूल देणारी जास्वंद ही दोन वेगळी झाडं दिसली तरी ते आपापसात प्रजनन करू शकतात आणि त्यांची स्पिशीज ही एकच आहे.


यानंतर कार्ल लिनियस यानं प्रत्येक जिवाला स्वतंत्र ओळख मिळावी या दृष्टीनं जीनस आणि स्पिशीज या दोघांचं मिळून त्या सजीवांना नाव देण्याची पद्धत निर्माण केली.पण या गोष्टीनं काही स्पिशीजची व्याख्या कशी करावी हा प्रश्न काही सुटला नाही हे मात्र खरं.


सजीवाच्या एका जातीतून दुसरी जात विकसित होत जाते ही स्पिशीज निर्माण होण्याची प्रक्रिया डार्विनच्या काळापर्यंत लक्षात आलेली नव्हती.त्यामुळे सगळ्या स्पिशीज या कधीही न बदलणाऱ्या स्वयंभू असतात असंच मानलं गेलं होतं.
त्यातून या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेताना माणसाला अनेक इतरही गोष्टी कळत गेल्या.


ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकातल्या अ‍ॅरिस्टॉटलपासून एकविसाव्या शतकातल्या अनेकांनी या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.अ‍ॅरिस्टॉटलनं सारखी कार्य करणाऱ्या सजीवांना एका स्पिशीजमध्ये टाकलं.त्यानं यात सारखे गुणधर्म असलेल्या सजीवांना लक्षात घेतलं नव्हतं.

थोडक्यात,त्यानं सजीवांच्या सारख्या गुणधर्मांपेक्षा खाण्यायोग्य वनस्पती,पाळीव प्राणी अशा प्रकारे सारख्या प्रकारची उपयुक्तता किंवा कार्यं यांना विचारात घेतलं होतं.


१७३५ मध्ये लिनियसनं स्पिशीज स्वयंभू म्हणजे कधीही न बदलणाऱ्या असतात असं मानलं,पण त्यानंतर काहीच काळात त्याला त्यांच्यात हायब्रिडायझेशन शक्य आहे हे लक्षात आलं!आणि हायब्रिडायझेशनमधूनच नव्या स्पिशीजचा उगम होतो हेही त्याला कळलं.हीच गोष्ट पुढे चार्ल्स डार्विननं आपल्या 'ऑन द ओरिजिन ऑफ स्पिशीज'मध्ये मांडली.खूप काळ लोटल्यावर नव्या स्पिशीज कशा निर्माण होतात हे त्यानं सांगितलं होतं.पण मूळ स्पिशीजपासून दोन वेगळ्या स्पिशीज कशा निर्माण होतात हे डार्विननं सांगितलं नव्हतं.मूळ स्पिशीजपासून वेगळी स्पिशीज निर्माण होताना मधली कोणतीतरी ओळखू न येणारी स्थिती असेलच की.


पुढे १९२० आणि ३०च्या दशकात मेंडेलियन इनहेरिटन्स थिअरी आणि डार्विनची नॅचरल सिलेक्शन थिअरी एकत्र करून मॉडर्न सिंथेसिस नावाच्या नव्याच थिअरीचा पाया घातला. 


या थिअरीला कधीकधी निओ-डार्विनिझमही म्हणतात.त्यातून स्पिशीजच्या संकल्पनेला पुन्हा चालना मिळाली. या प्रक्रियेत एडवर्ड बॅग्नाल पोल्टन (Edward Bagnall Poulton) (१८५६ ते १९४३) यानं स्पिशीजच्या संकल्पनेत आणखी अनेक महत्त्वाचे मुद्दे घातले.तो डार्विनच्या नॅचरल सिलेक्शन थिअरीचा जोरदार पुरस्कार करायचा.डार्विनचं 'ओरिजिन ऑफ स्पिशीज' हे पुस्तक त्याला सगळ्यात महान पुस्तक वाटायचं.एकाच भौगोलिक ठिकाणी निर्माण झालेल्या नवीन स्पिशीजना त्यानं 'सिंपॅट्रिक' असं नाव दिलं


सजीव, अच्युत गोडबोले, अमृत देशपांडे, मधुश्री पब्लिकेशन


पुढे थिओडोशियस डोब्झान्स्की आणि अर्स्ट मेयर यांनी या संकल्पनेचा विस्तार केला. मेयर यानं तर आपल्या पुस्तकात जेव्हा एका स्पिशीजपासून दुसरी स्पिशीज वेगळी होते तेव्हा नव्या स्पिशीजमध्ये जनुकीय पातळीवर होणाऱ्या बदलांचं वर्णन केलं होतं.याला त्यानं 'रिप्रॉडक्टिव्ह आयसोलेशन' म्हटलं होतं.


यानंतर तर स्पिशीजच्या संकल्पनेला अनेकांनी हात घातला,पण याचा परिणाम स्पिशीज म्हणजे नेमकं काय,हा प्रश्न सोडवण्यापेक्षा त्या प्रश्नाचे वेगवेगळे पैलूच समोर येत राहिले.त्यापैकी काहींनी तर म्हटलं की स्पिशीजचा प्रश्न हा इतका गुंतागुंतीचा प्रश्न आहे,की तो जितका सोडवण्याचा प्रयत्न करू तितका त्यातला गुंता वाढत जाईल ! आतापर्यंत स्पिशीजची व्याख्या करताना अनेकांनी अनेक विधानं केलेली आहेत.त्यातली काही अशी :


बायॉलॉजीमध्ये स्पिशीज या संकल्पनेइतकी अवघड संकल्पना कोणतीच नाही.आणि या संकल्पना विशद करताना वैज्ञानिकांत कधी नव्हे इतकी वेगवेगळी मतं आहेत. - निकोल्सन १८७२. ("No term is more difficult to define than 'species,' and on no point are zoologists more divided than as to what should be understood by this word." - Nicholson 1872).


एखादी स्पिशीज वेगळी ओळखू आल्यानंतर,स्पिशीज या संकल्पनेची वैश्विक व्याख्या करणं सोपं जाईल,पण आधी स्पिशीज वेगळी ओळखता येणं गरजेचंच आहे.थोडक्यात,हे दोन एकमेकांवर अवलंबून असलेले प्रश्न आहेत ! - डोब्झान्स्की (१९३७)


स्पिशीजच्या व्याख्येच्या यशातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे,की वस्तुस्थिती काय आहे यापेक्षा आपण त्यातले हायपोथिसिस किती व्यवस्थित मांडू शकतो यावर त्या व्याख्येचं यश अवलंबून आहे. - ब्लाँड (१९७७)


स्पिशीजची व्याख्या करण्याचा प्रयत्न करणं हे बायॉलॉजिस्ट्सचं फार जुन्या काळापासून चालत आलेलं अपयश आहे. हे २००१ मध्ये केलं गेलेलं विधान आहे.


या सगळ्यावरून आपल्याला एकच गोष्ट कळते.ती म्हणजे स्पिशीज ही सेक्शुअल रिप्रॉडक्शननं सतत बदलत जाणारी प्रवाही गोष्ट आहे.शेवटी स्पिशीज या गोष्टीची व्याख्या करणं म्हणजे नदीच्या प्रवाहासोबत वाहणाऱ्या पाण्याच्या एका रेणूचा पाठलाग करण्यासारखंच हे आहे!

१६/५/२५

पळस गाणारं झाडं / The tree that sings the song

पळसाचं झाड माझं लक्ष वेधतं ते चैत्रात.सारा वृक्ष लाल फुलांनी बहरून जातो.झाड पर्णहीन होतं. साऱ्या झाडावर फुलंच फुलं दिसतात.वाटतं रंगाचं सरोवर आपण पाहात आहोत.रामायणात प्रभू रामचंद्र विंध्य पर्वताच्या पायथ्याजवळ आल्यावर सीतेला म्हणतात-


'आदीप्तानिव वैदेहि सर्वतः पुष्पितान्नगान् । 

स्वैः पुष्पैः किंशुकान्पश्य मालिनः शिशिरात्यये ।।" 


सीते ! बघ,वसंत ऋतूत पळस जणू फुलांच्या माळा ल्याला आहे. फुललेला पळस पाहून वाटतं की, जणू तो आगीनं जळत आहे.


पळसाच्या लाकडात सुप्त अग्नी असतो.प्राचीन काळी यज्ञासाठी अग्नी प्रज्वलित करण्याकरिता पळसाच्या लाकडाचा उपयोग केला जाई.जणू वसंतात हा सुप्त अग्नी फुलांच्या रूपानं बाहेर पडतो.साहेबानं यालाच 'फ्लेम ऑफ फॉरेस्ट' म्हटलं.तेवढं आपल्या लक्षात राहिलं. साहेबांच्या देशात पळसाचं झाड नाहीच.त्यातील मूळ कल्पना संस्कृतातूनच घेतली आहे.


एरवी पळसाच्या झाडाइतकं अनाकर्षक जंगलात काहीच नसावं.आंबा व मोहाचा आकार डेरेदार असतो.तसा प्रत्येक वृक्ष बीजातूनच आकार घेऊन जन्माला येतो.पण पळसाचं झाड मात्र आकारहीन असतं.वनातील जमीन निकस व्हायला लागली की पळसाचं प्रमाण वाढू लागतं.गुरंढोरं,शेळ्यामेंढ्या पळसाच्या पानाला तोंड लावीत नाहीत.त्या निकृष्ट जमिनीत ती वाढू लागतात.पळस निकृष्ट जमिनीचं प्रतीक आहे.कुवार व चिरपल्लवी जंगलात तुम्हाला पळसाचं झाड दिसणार नाही.पळसाला जसा आकार नाही तसाच त्याच्या सुंदर फुलांना गंधही नाही.फुलांचा बहर संपू लागताच त्याला कोवळी पालवी फुटते.ती पाने मुंगसाच्या कानासारखी लालसर दिसतात.


पण फुललेला पळस मला आवडतो तो वेगळ्याच कारणाकरिता.पळस फुलला की गुलाबी रंगाच्या पळसमैना-रोझी पॅस्टर-यांचे थवेच्या थवे युरोप, आशिया,मध्यपूर्व प्रदेश,

तुर्कस्थान ह्या भागातून भारतातील पळसाच्या जंगलात येतात.आभाळात त्यांचे थवे पाहिले की वाटतं ढग आले आहेत.प्रचंड किलकिलाट करीत ते फुललेल्या पळसावर उतरू लागतात.पळसाच्या फुलांत भरपूर मध असतो.तो ते प्राशन करीत असतात.पळस-मैना पळसात परपरागन आणि परफलन घडविण्याला फार साहाय्य करतात.पक्षिनिरीक्षणाचे पहिले धडे फुललेला पळस देतो.पोपट,पाणपोपट,हळदू, कोतवाल,भृंगराज,साळुंकी,मैना,बुलबुल आणि सूर्यपक्षी असे अनेक प्रकारचे पक्षी मधासाठी येत असतात.सर्वांनाच मध हवा असतोच असं नाही. काही त्या फुलांतील कीटकांसाठी येतात.तो फुलांनी बहरलेला वृक्ष मधमाश्यांच्या गुंजारवानं निनादित होतो.तो अनाकर्षक वृक्ष फुलांवरील पक्षी व मधमाश्यांच्या आवाजानं जणू गाऊ गुणगुणू लागतो.ते झाड गाणारं झाड होतं.


आपल्या आयुष्यात कुणी पळसाचं झाड लावलं अन् त्यानं त्या झाडाची फुलं पाहिली असं सहसा घडत नाही.त्याचं कारण पळसाचं झाड फार हळूहळू वाढतं.वर्षानुवर्षं ते वनवणव्यात जगत-मरत असतं.जमिनीत मुळाचा कंद होत असतो.हा कंदच पुढं आनंदकंद होऊन फुलांनी बहरून आनंद देतो. कुणी तो आवडीनं घराच्या बागेत लावत नाही.पण परवा सर एडविन ऑर्नल्डचं 'दि लाइट ऑफ एशिया' हे बुद्धाचं चरित्र वाचताना मध्येच थांबलो. सिद्धार्थाची आई मायादेवी आपल्या राजवाड्याच्या उद्यानातील पळसाच्या वृक्षाखाली नित्य बसत असल्याचा उल्लेख आहे.मला पळसाविषयीची सप्तशतीतील सुंदर गाथा आठवली. " पोपटाच्या चोचीप्रमाणं लालभडक अशा पळस-पुष्पांनी पृथ्वी शोभायमान झालेली आहे. जणू बुद्धाच्या चरणाशी वंदन करण्यासाठी लोटांगण घालणाऱ्या भिक्षुसंघाप्रमाणं हे दृश्य दिसत आहे."


पळसाची लाल नारिंगी फुलं पोपटाच्या चोचीसारखी दिसतात.म्हणून पोपटाला किंशुक हे वैकल्पिक नाव आहे.

नवेगाव तळ्याकाठच्या जंगलात पिवळ्या फुलांचा पळस पाहिला,तसा पांढऱ्या फुलांचाही.हा पिवळा व पांढरा पळस फुलला की जपानी लोक चेरीची फुलं पाहायला जावेत तसा मी मुद्दाम तो फुलोरा पाहायला जात असे.आपल्याकडे अशी फुलं पाहायला जायची आवड कमी.


आपल्या संस्कृत व प्राकृत वाङ्मयात वसंतोत्सवाची विपुल वर्णनं आहेत.त्यावरून आपल्या प्राचीन जीवनातल्या निसर्गप्रेमाची साक्ष आपणाला मिळते. 


पण ही निसर्गपूजा जीवनातून नष्ट होऊन ग्रंथात जाऊन बसली आहे.ह्या उलट जपानमध्ये घडलं. त्यांनी निसर्गाचं हे वातावरण जीवनात आणलं आहे.नाही तर चेरीत व पळसात काय फरक आहे ? चेरीच्या फुलोऱ्याचे पंधरा-वीस दिवस सोडले तर इतर वेळी या झाडाचं रूप पळसासारखंच अनाकर्षक असतं.चेरीच्या मोहराला जपान्यांनी जागतिक माहात्म्य मिळवून दिलं.चेरीवर शेकडो लक्षावधी हायकू लिहिण्यात आल्या.चेरीचा मोहर पाहायला जगातील निसर्गप्रेमी जपानला जातात.


तुम्ही पळसवनात गेलात की पळसाखाली केसरी रंगाच्या फुलांचा सडा पडलेला असतो. कांचनमृगाला पळसाची फुलं खायला फार आवडतात.गाथा सप्तशतीत एक बहारीचं वर्णन आहे.


" रानात जागोजागी पेटलेल्या वणव्याच्या लाल ज्वालांच्या ओळींनी वनप्रदेशात प्रकाशित झालेली झाडं पाहून अज्ञ कांचनमृगाला ती फुलांनी बहरलेली पळसाची झाडंच वाटली.म्हणून बिचारा कांचनमृग अरण्यातून बाहेर पडलाच नाही." कोवळ्या पानाबरोबर लवकरच पळसाला चापट तांबड्या रंगाच्या शेंगा धरू लागतात.त्यांना पळसपापडी म्हणतात.वाटतं की झाड पुन्हा वेगळ्याच पानांनी बहरलं आहे.पळसपापडी इतकी हलकी असते की वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीबरोबर रुणुझुणु वाजू लागते.ती वाऱ्यानं सहज दूरवर विखुरली जाते.


'पळसाला पानं तीनच' ही म्हण मी अनेकदा वाचली आहे.पण तिचा अर्थ जाणवला तो कै. धनुर्धारीलिखित 'वाईकर भटजी' ही कादंबरी वाचताना.१८९७ साली लिहिलेली ही कादंबरी वाचताना गोल्डस्मिथच्या 'दि व्हिकर ऑफ वेकफिल्ड'ची आठवण होते.


खूप वर्षांपूर्वी मी पळसावर एक कथा लिहिली होती.


"त्या माळरानातून तो बौद्ध भिक्षु रोज भिक्षेसाठी गावात जाई.तो एक महान शिल्पकार होता. माळरानातून जात असता समोरच्या डोंगरमाथ्यावर पळसाचं वन होतं.

पळसाच्या तीन बहिणी हातात हात घालून वाऱ्याबरोबर नृत्य करू लागल्या की तो कलाकार त्यांच्याकडे कौतुकानं पाहात पुढं निघून गेला की त्या खुदकन् हसत.तीन बहिणींचे ते मधुर स्मित त्याच्या मनातच राही.


गावात एका वेश्येच्या दारात उभा राहून त्यानं भिक्षा मागितली.मोत्याचा शुभ्र हार तिनं त्याला स्वागतार्थ प्रदान केला.तो तिला म्हणाला,'नको.मला पळसाच्या द्रोणात पाणी हवंय.बुद्धदेवांच्या चरणांवर वाहण्यासाठी.'


फार वर्षांपूर्वी मी नांदेड जिल्ह्यातील पैनगंगेकाठच्या सहस्रकुंडाला होतो.नदीच्या काठचा प्रदेश सपाट व विस्तृत.या घनदाट झाडीत वसंत आला की त्यातील पळसवनाला फुलांचा बहार येई.


जंगलांचे देणे,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर


जंगलात ठिकठिकाणी मथुरा लमाणांचे तांडे होते. त्यांचा मुख्य धंदा गाई पाळण्याचा.मथुरा लमाणांच्या स्त्रिया दिसायला फार सुंदर असतात.राधेच्या कुळातील म्हणून की काय !


ऐन दुपार झालेली.वृक्षाच्या छाया देखील तळाशी लपलेल्या.

आमची बैलगाडी अशाच एखाद्या तांड्याजवळ आलेली.

ओढ्यातील खडकावर बसून न्हात असलेल्या स्त्रिया दुरून दिसायच्या.गाडीच्या धावांच्या खडखडाटाचा आवाज कानी पडताच त्या तरुणी एखाद्या सुसरीप्रमाणं चपळतेनं पाण्यात शिरायच्या.सुंदर चेहरा,डोक्यावर केसांचा उंच खोपा.

लज्जावनत सुंदर चेहऱ्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलेलं.म्हणून गाथा सप्तशतीकारानं तरुणांना सावधगिरीची सूचना दिलीय. "पळसाच्या फांद्यांवर पिवळसर तांबडी फुलं डवरली आहेत.मुला,या बहरात वसंताचे सामर्थ्य दिसत असल्यामुळे लोकांना त्याची भीती वाटते."


होळी जवळ आलेली.पळसाच्या लाखेपासून तयार केलेल्या रंगीत रोंगणाने त्या तरुणी आपल्या लांबसडक बोटांची नखं रंगवायच्या.पळसाच्या फुलापासून पिवळाधमक रंग तयार करून वनाधिकाऱ्याची त्या वाट पाहात असायच्या. वनाधिकारी म्हणजे त्या भागातील सर्वात मोठा अंमलदार.मी अनेकदा त्या रंगात न्हालोय.सुटका व्हायची ती भरपूर बक्षीस दिल्यावरच.आता ह्या गोष्टीला अनेक वर्षं झालीत.पण असा वसंत आला की वरील साऱ्या प्रसंगाची आठवण होते.त्या वेळी मी बावरून जाई.आता त्याचे विलासविभ्रम आठवतात.त्यांचं जाणीवपूर्वक स्पर्शसंक्रमण आठवतं.

गुलालानं भरलेले त्यांचे गोरे चेहरे आठवतात.'पाठ असलेल्या एखाद्या कवितेचा गर्भित अर्थ लागावा पण खूप विलंबानं तसा...'